Author: Admin

  • अवतार कल्पना

    अवतार कल्पना

    अवतार कल्पना
    अवतार कल्पना

    पृथ्वीवर जीवनाची उत्पत्ती पाण्यात झाल्याचा सिद्धांत चार्ल्स डार्विनने मांडला [संदर्भ: Darwin, Francis ed (1887), Vol. 3, “The Life & Letters Of Charles Darwin, Including An Autobiographical Chapter”, London : John Murray, Pg. 18]. आजही काही वर्ग सोडल्यास बहुतांशी शास्त्रज्ञ हाच सिद्धांत मानतात. यातूनच पुढे डार्विनचा उत्क्रांतिवाद जन्मास आला. मीही आज उत्क्रांतिवादच समजावून सांगणार आहे, पण जरा वेगळ्या प्रकारे! मला आकळला तसा. पहा पटतोय का!
    जीवनाची उत्पत्ती पाण्यात झाल्याचे ऋषींनी शोधले. जीवन निर्माण करणं परमेश्वराच्याच हातात, त्यामुळे त्यांनी या प्राथमिक जीवनास परमेश्वराचा, पालनकर्ती देवता श्रीविष्णूचा अवतार मानले. नाव दिले, “मत्स्यावतार”! पुढे आणखी उत्क्रांती झाली. आता जीव पाण्यासोबतच जमिनीवरही राहू शकत होता. याला आपण नाव दिलं, “कूर्मावतार”. आणखी थोडी प्रगती झाली. प्राथमिक स्तरावरचे रानटी प्राणी निर्माण झाले. याला आपण नाव दिलं “वराहावतार”! आता मानवही निर्माण झाला होता. वन्य मानव! पशुतुल्य रानटी मानव! हाच तो “नृसिंहावतार”! आता मानव माणसात येत होता. सुसंस्कृत होत होता. पण अजून पूर्णत: मानव न होता “वामन”च राहिला होता. हा झाला “वामनावतार”. हळूहळू मानव शस्त्रे वापरायला शिकला. सुसंस्कृत तर बनला, परंतू रानटी जीवनातील शीघ्रकोपीता अजून संपली नव्हती. हाच तो परशुधारी राम, अर्थातच “परशुराम”! आणखी थोडी प्रगती झाल्यावर मानव आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकला. त्याच्यातली मानवता वाढीस लागली होती. हाच तो मर्यादापुरुषोत्तम “श्रीरामावतार”! थोडा आणखी प्रगत झाल्यावर मानवाने सारी भौतिकता तर वश केलीच, शिवाय अध्यात्मावरही प्रभुत्व मिळवलं. त्याला म्हटलं गेलं, “श्रीकृष्णावतार”. कालौघात मानवाला भौतिक प्रगतीची क्षणभंगुरता कळून चुकली आणि अध्यात्म हेच शाश्वत सत्य असल्याचं जाणवलं. हाच तो करुणामयी “श्रीबुद्धावतार”! काहींच्या मते “आदी शंकराचार्य” हे नवमावतार आहेत. त्याही परिस्थितीत उपरोक्त विधान योग्यच ठरते! यापुढे असेल तो मानवीय उत्क्रांतिचा परमोच्च बिंदू, “कल्क्यावतार”! हा अजून व्हायचाय.
    काय, “दशावतार” संकल्पनेकडे याआधी कधी अश्या दृष्टीकोनातून पाहिलंच नव्हतं ना? हिंदुंची ही पौराणिक संकल्पना (काही अतिशहाण्यांच्या भाषेत दंतकथा) इतकी निखालसपणे वैज्ञानिक असेल, असं कधी वाटलंच नव्हतं ना? पण आता जे आहे ते आहे! अवतारांची अशी संकल्पना जगात फक्त हिंदूंकडेच आहे, तेव्हा ही शतप्रतिशत हिंदू ऋषिंनीच निर्माण केलीय, यात काही दुमत असायचं कारण नाही. काही जण म्हणतात की, बुद्धाचा दशावतारांत समावेश हा नंतरचा आहे. त्यांचं म्हणणं जरी खरं मानलं तरी, अवतारकल्पना किमान २००० वर्षे तरी निश्चितपणे जुनी आहे. शंकराचार्यांना नववा अवतार मानल्यासही ती किमान १२०० वर्षे जुनी ठरते. अर्थातच, त्यावेळी उत्क्रांतिवादाचा तथाकथित जनक मानला जाणार्या डार्विनचे पार खापर-खापर-खापर-खापर पणजोबाही काय करत होते, आणि कश्या परिस्थितीत जगत होते, हे काही मी वेगळे सांगायला नको!
    या अश्या संपन्न हिंदू धर्मात आपण जन्मलो याचा अभिमान बाळगा. आपल्या संस्कृतीरुपी महासागरात जरा डोळसपणाने बुड्या मारायला शिका. लक्षावधी मोती दडलेयत तिथे! आज मला एक सापडला, न जाणो उद्या तुम्हालाही सापडतील! या मोत्यांचा सर मातृभूस अर्पण करुयात. जिद्द बाळगुयात, प्रयत्न करुयात आणि भारतमातेस पुनरपि गतगौरव प्राप्त करून देऊयात!
    – © विक्रम श्रीराम एडके

     

  • अस्वस्थ मनाचे चिंतन

    अस्वस्थ मनाचे चिंतन

    आज सकाळी सकाळी जाग आली तीच मुळी जिया खानने आत्महत्या केल्याच्या बातमीने. ती काही माझी आवडती अभिनेत्री अथवा आवडती सौंदर्यवती नव्हती. आमच्यात समान म्हणावी अशी एकच गोष्ट म्हणजे, वय! अवघ्या पंचविशीच्या कुणाही तरुण जीवाचे जाणे जितके चटका लावणारे असते, तितकाच तिच्या जाण्याचा त्रास झाला मला.
    प्रत्येकासाठी आपापली दु:खे मोठी असतात हे खरे, पण कोणते दु:ख आणि कोणता त्रास इतका मोठा असतो की, परमेश्वराने दिलेली सगळ्यात मोठी भेटवस्तू – हे आयुष्यच संपवावेसे वाटावे? मी हिंदू संस्कृतीला, अध्यात्माला मानणारा माणूस आहे, त्यामुळे आजच्या भौतिक जगात तुम्हाला माझे म्हणणे खुळे वाटेल, पण आपल्यापैकी प्रत्येकाला परमेश्वराने काही ना काही उद्देश देऊन या पृथ्वीवर पाठवलेले असते असे मी मानतो. आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट कोणते हे शोधणे आणि सर्व शक्तिनिशी ते पुरे करणे, हे अतिशय रोमांचक आह्वान आहे! त्यासाठी आवश्यक ती सारीच शस्त्रास्त्रे परमेश्वराने आपल्याला बरोब्बर पुरवलेली असतात. ती न जाणता, न वापरताच खेळ असा अर्ध्यावर विस्कटणे, हा कुठला न्याय? हा रडीचाच डाव नव्हे काय? काही ना काही पेनल्टी तर द्यावीच लागणार ना मग त्यासाठी! ईशावास्योपनिषदातला तिसरा मंत्र सांगतो की, जे कुणी आत्महत्या करतात त्यांना मानवी जीवनाचे मूल्य कळण्यासाठी “असूर्य”नामक लोकात पाठवून दिले जाते. खरे-खोटे माहिती नाही, पण कर्म करणे परंतू फलांपासून मात्र पळणे हे बेजबाबदारपणाचे, पळपुटेपणाचे लक्षण आहे एवढे निश्चित!
    आणि संकटे कुणाला नसतात हो? स्वामी विवेकानंदांना आयुष्यभर ७३ प्रकारच्या व्याधी साथ करत होत्या! त्यातच त्यांचा अंतही झाला. पण त्याही परिस्थितीत त्यांनी विश्वविजय केला, सगळ्या जगाला हिंदू तत्त्वज्ञान समजावून दिलं! इतका त्रास सहन करण्यापेक्षा आत्महत्या सोपी, असा खुळचट विचार नाही केला त्यांनी. वीर सावरकरांनी अंदमानात सतत ११ वर्षे जे अमानुष अत्याचार भोगले, ते नुसते वाचले तरीही डोळ्यांतून पाणी येते. अनेकदा आत्महत्येचे विचार मनात आल्याचे सावरकरांनीच प्रांजळपणे लिहून ठेवलेय. पण म्हणून त्यांनी मातृभूमीला वाहिलेले हे जीवन संपवले नाही. उलट त्यांनी मृत्यूलाच ठणकावून सांगितले की, “अरे मृत्यो.. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला? अग्नि जाळिसी न मला खड्ग छेदितो, भिऊनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो!” आणि खरोखरच सावरकरांच्या या ललकारीने घाबरलेला काळ पुढे आयुष्यभर त्यांना स्पर्श करण्याचे साहस करू शकला नाही. शेवटी तो आला तोही सावरकरांच्याच इच्छेने, त्यांच्याच आमंत्रणाने! दुर्दैवाने या दोन्हीही महामानवांबद्दल जिया खानला किंचितशीही माहिती असण्याची सुतराम शक्यता नव्हती. खरं सांगू गेलं तर, स्वप्नरुपी बीजांत मुळातच ऊर्मी नसेल तर ते अडचणींच्या उन्हापुढे करपणारच ना! पण म्हणून बीज आणि आसपासची मातीच नष्ट करणे हे काही त्याला उत्तर होऊ शकत नाही. त्याऐवजी जियाने त्याला मेहनत, सकारात्मकता आणि विश्वासाचे खत-पाणी घातले असते तर बरे झाले असते, असे वाटते. असो. जाणारा जीव तर गेला. आता काही जरी वाटले, तरी त्याला काय अर्थ आहे? तिची कर्मे तिला आज ना उद्या भोगावी तर लागणारच. पण तिचे हे भोग लवकरच संपो, तिला सत्याची जाणीव होवो आणि तिला लवकरात लवकर सद्गती मिळो अशी मन:पूर्वक प्रार्थना मात्र मी करतो. जियाच्या जाण्याने भौतिकतेलाच सर्वस्व मानणार्या तरुणाईने काहीतरी धडा घ्यावा, हीदेखील अपेक्षा आहेच. बघूयात, ही अपेक्षा पूर्ण होते की नाही. शेवटी काळाइतके अनिश्चित, बलवान आणि उत्तरदायी दुसरे काय आहे!
    – © विक्रम श्रीराम एडके.

  • आपल्या इतिहासाचे प्रदूषण

    आपल्या इतिहासाचे प्रदूषण

    हिंदुत्वाचा दृष्टीकोन काही काळ बाजूला जरी ठेवला, तरीही आपल्याकडे अक्षरशः निस्तेज इतिहास शिकविला जातो, ही बाब खरोखर अक्षम्य आहे. आपण भारतीय मुळात अतिशय निकृष्ट दर्जाचे जिणे जगत होतो आणि सुरुवातीला मुघल व नंतर इंग्रजांनी आपल्याला सभ्यता, संस्कृती शिकवून आपल्यावर न भूतो न भविष्यति असे उपकार केले; अश्याच थाटात आपल्याकडे इतिहास – विशेषतः शालेय इतिहास मांडला जातो.
    “मुघलांनी या देशाच्या बहुसांस्कृतिकतेत भर घातली”, हे सांगताना “मुघलांच्या आगमनापूर्वी हा देश अतिशय शांततेने नांदत होता” हे सत्य का सांगितले जात नाही? बहुसांस्कृतिकता ही काही आपली गरज नव्हे! “इथे आलेले सगळेच तुर्की राजे हे एकजात रानटी, धर्मांध आणि विकृत वासनांनी पछाडलेले होते” हे सत्य का सांगितले जात नाही?
    मुघल साम्राज्याचा अधिकृत काळ आहे इ. स. १५८२-१८५७. म्हणजे सुमारे ३०० वर्षे. शालेय इतिहासाची पुस्तके उलगडून पाहा, या मुघल साम्राज्याबद्दल पानेच्या पाने भरून लिहिलेले असते. परंतू आपल्याला कल्पनाही नसते की, विजयनगरचे अतिप्रचंड, सुसंस्कृत आणि १००% स्वदेशी असलेले साम्राज्यही तितकीच, म्हणजे जवळजवळ ३०० वर्षे मोठ्या दिमाखात उभे होते (१३३६-१६४६)! का? कारण सोपे आहे. शालेय इतिहासाच्या पुस्तकात विजयनगरच्या वाट्याला पुरती ४ पानेही आलेली नसतात! परकीयांचा उदोउदो करण्यातून फुरसत तर मिळाली पाहिजे ना! या मुघल साम्राज्याचा माज उतरवणारे आणि सर्व जगात आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजविणारे मराठा साम्राज्य तरी महाराष्ट्र सोडून इतरत्र कुठे सविस्तर शिकविले जाते? आणि महाराष्ट्रातही “धार्मिक भावना” या बाष्कळ मथळ्याखाली शिवछत्रपती आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासावरून कात्री फिरविण्याचाच प्रयत्न होताना दिसत नाही का?
    परवा मी खानदेशात व्याख्यान द्यायला गेलो होतो. बोलता बोलता मी खानदेशातील निकुंभ (हल्लीचे निकम) राजवंशाबद्दल बोललो. या निकुंभ घराण्याने ८०० वर्षांहूनही अधिक काळ (१०००-१८५८) खानदेशावर सत्ता चालविली (Gazetter of the Bombay Presidency, Vol. XII, Khandesh). आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवले. एवढेच नव्हे तर ज्या अकबराला हल्ली चांगला ठरविण्याचा, महान प्रशासक वगैरे ठरविण्याचा प्रयत्न होतोय, त्या आक्रमक अकबरालाही या निकुंभांनीच हरवून हाकलून लावले होते. मला वाटले की, ही बाब सर्व श्रोत्यांना माहिती असेल. परंतू हा इतिहास कुणालाच माहिती नव्हता. तुरळक लोकांनी निकुंभांबद्दल केवळ ऐकले होते एवढेच! खरं सांगायचं तर त्या श्रोत्यांचा यत्किंचितही दोष नाही. आजच्या “सेक्युलर” वातावरणात निकुंभांसारख्या “सांप्रदायिक” राजांचा इतिहास शिकवलाच जात नाही याला कोण काय करणार? त्यांनी आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याऐवजी महान अकबरासारख्या “सेक्युलर” सम्राटापुढे हार पत्करली असती तर कुठेतरी त्यांचा उल्लेख व्हायची संधी तरी होती. निकुंभांनी आपल्याच कर्माने ती घालवली असेल, तर कुणाचा काय दोष? दोष सगळा त्या निकुंभांचाच, नाही का!
    ही अशी सगळी अवस्था आहे! ही तर फक्त १-२ उदाहरणे झाली. असा नि:सत्व इतिहास शिकविला जातो. त्याच्यापासून कुणाला काय प्रेरणा लाभणार? असा इतिहास शिकून मोठी झालेल्या पिढीला का म्हणून या देशासाठी लढावेसे वाटेल? का या देशाच्या इतिहासात योगदान द्यावेसे वाटेल? त्यांना स्वत:पुरताच विचार करावासा वाटला तर त्यांना दोष कसा काय देता येईल? लक्षात घ्या, देशासाठी काहीतरी करून दाखवायचे असेल तर ह्रदयात राष्ट्रभक्तीची आग असावी लागते आणि या आगीत इतिहासापासून घेतलेल्या स्फुर्तीचेच तेल ओतावे लागते – अन्यथा दुसरीकडून कुठून कार्यप्रेरणा मिळणार? प्रेरणेचा अभाव असणार्या पिढीकडून अपेक्षा तरी कशी काय करता येईल? म्हणजे आपणच गाढवे आणि खेचरे जन्माला घालायची, पण त्यांच्याकडून अपेक्षा मात्र श्यामकर्णी अश्वांच्या दर्जाची करायची अथवा आपण मातीची मडकी घडवायची परंतू त्यांनी पोलादी कणखरपणाच दाखवायला हवा असा अट्टाहास करायचा! याला काय अर्थ आहे?
    १५०० वर्षे चाललेल्या आक्रमणांच्या शृंखलेत मध्यपूर्वेतील आक्रमकांनी आपली केवळ डोकी मारली, परंतू अवघ्या १५० वर्षांच्या काळात धूर्त इंग्रजांनी कावेबाजपणाने बरोब्बर आपल्या डोक्यांच्या आतले मेंदूच मारले! त्याचेच हे असे परिणाम आपण आज भोगतो आहोत. यानंतरही अजून किती काळ भोगणार आहोत, देवच जाणे!
    – © विक्रम श्रीराम एडके.

  • क्रांतिकारकांचे मेरुमणी

    क्रांतिकारकांचे मेरुमणी

    क्रांतिकारकांचे मेरुमणी
    क्रांतिकारकांचे मेरुमणी
  • भारतीयांची गुलामगिरी ची मानसिकता

    भारतीयांची गुलामगिरी ची मानसिकता

    भारतीयांची गुलामगिरी ची मानसिकता
    भारतीयांची गुलामगिरी ची मानसिकता
  • स्वातंत्र्यवीरांचे सागरासुक्त

    स्वातंत्र्यवीरांचे सागरासुक्त

    स्वातंत्र्यवीरांचे सागरासुक्त
    स्वातंत्र्यवीरांचे सागरासुक्त