Blog

  • होस्साना – जयघोष प्रेमाचा… जयघोष माझ्या "देवा"चा..!

    ११ किंवा १२ जानेवारी २०१० चा काळ असावा. मला त्या काळात तमिळ अजिबातच कळत नव्हतं (अजूनही फार कुठं कळतंय!). तिरूअनंतपूरम ते मदुराई या रेल्वेप्रवासात भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला मी माझ्या “देवा”च्या गाण्यांचे शब्द आठवून-आठवून अर्थ विचारात होतो. त्यावेळी ते तमिळ कुटुंब भेटलं. नवरा-बायको आणि दोन लहान मुलं! ते “अण्णा” भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते पण संगीतात त्यांना प्रचंड रुची. आणि शिवाय कुणाही तमिळ व्यक्तीइतकेच “रहमानियन“! आम्ही खूप वेळ बोलत होतो. त्या भल्या माणसाने मला “सहाना सारल.. (शिवाजी – द बॉस – २००७)”, “एल्लापगळूम.. (आळगिया तमिळ माकन – २००७)” अशी कित्येक गीते संपूर्ण समजावून सांगितली. अचानक मी त्यांना विचारलं, “होस्साना म्हणजे काय हो”? ते थोडेसे विचारात पडले, म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे हा तमिळ शब्द नाहीये. इंग्लिशही नाही. त्याचा अर्थ कदाचित वेगळा काहीतरी होत असावा”.
      त्या काळात गौतम वासुदेव मेननच्या “विनईतांडी वरुवाया”ची गीते प्रकाशित झालेली होती. “देवा”ची गाणी “चढायला” थोडा वेळ घेतात पण आधी प्रकाशित झालेलं एकक-गीत (Single) “होस्साना” मात्र पूर्णपणे चढलं होतं. त्या भेटीत फक्त “होस्साना” हा तमिळ शब्द नाही एवढीच माहिती कळली.
      किती सुंदर गीत! अहाहा..! “देव” नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येतो. ‘मुखडा-अंतरा” पद्धतीची फिल्मी गीते ऐक्नार्यांसाठी “होस्साना” एक वेगळा अनुभव होता. गाणं आल्या-आल्याच “हिट” झालं. नगरला आल्यावर आधी “होस्साना”चा अर्थ शोधला. “ऑक्सफर्ड शब्दकोश”नुसार त्याचा अर्थ होतो “Shout of Adoration”. मूळचा हिब्रू असलेला हा शब्द माथ्यू – २१ : ९, १५ अश्या ठिकाणी येशूच्या जयघोषासाठी वापरला गेलाय.
      हे सारं कळल्यावर त्या गाण्याचा एक नवाच अर्थ उलगडला! होस्साना! जयघोष! प्रेमाचा जयघोष! नव्याने आयुष्यात येऊ घातलेल्या प्रेमाचा जयघोष! प्रेमाला सलाम! वाह, क्या बात हैं! किती सुंदर कल्पना! मानलं तामरईला (होस्सानाची गीतकार)! मानलं विजयप्रकाश-सुझेनला! आणि हो, मानलं माझ्या “देवा”ला! गाण्याच्या सुरुवातीला असलेल्या व्हायोलीनच्या सुंदर तुकड्याचाही अर्थ कळला! अहाहा, जणू “तो” त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रेमाचेच स्वागत करतोय! हे सारे कळाल्यावर माझी अवस्था खरोखर पहिल्या कडव्यात म्हटल्याप्रमाणे –
    “नान आडीपोगिरेन..!
    सुक्कू नुरागीरेन..!”
    (I was shaken..!
    I was broken into pieces..!)
    अशीच झाली!

      हिंदीत हे गीत विजयप्रकाशच्याऐवजी “लिओन डिसुझा” या नव्या गायकाने गायलेय. RAP देखील त्यानेच गायलेय. सुरुवातीला ऐकताना तो “राशीद अली” वाटतो. पण अजून अजून ऐकल्यावर कळते कि लिओनला स्वत:चा असा एक अतिशय सुंदर आवाज आहे. आणि याउप्परही मी म्हणेन की, सनी लिओनच्या या काळात लिओन डिसुझा या नवख्या गायकाचे गाणे हिट करून दाखवणे हे माझ्या “देवा”चेच कर्तृत्व नव्हे काय? जावेद अख्तरने हिंदीत हे गीत तामरईइतक्याच ताकदीने लिहिलेय. तुम्हाला मूळ तमिळ गाण्याची सवय झाली असेल तर हे गीत चढायला थोडा वेळ लागेल. पण एकदा का हे गीत चढले, तर चढलेच! माझी तर अवस्था हे गीत ऐकून –
    “अब क्या बताऊँ मैं,
    किस हाल में हूँ मैं…
    यहाँ-वहाँ बस अपना दिल और होश ढूंढ़ता हूँ मैं..!”
    अशीच झालीय!
      या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यातील “ब्लाझे”च्या RAP चा भागदेखील लिओनने स्वत”च्या पद्धतीने गाण्याच्याच चालीत गायलाय. ब्लाझेचे RAP ऐकायची सवय असणार्यांना हे RAP वाटणारच नाही. चित्रपटातील प्रसंगाला हे अधिक धरून आहे. “देवा”च्या या प्रयोगशीलतेला दाद द्यावी तितकी कमीच! नव्याने ऐकणार्यांना तर हा इंग्लिश भाग अधिकच गोड वाटेल!

      आज माझ्या देवा”चा वाढदिवस! त्याचे संगीत तर अमर झालेच आहे, आणि संगीताच्या रूपाने तोही अजरामर! मग अश्या वेळी त्याला उदंड आयुष्य चिंतणारा मी कोण? मी फक्त त्याच्या चरणांवर हे वाकुडे लेखनपुष्प वाहून नतमस्तक होऊ शकतो. खरोखर माझी तेवढीच इच्छा आहे. मला खात्री आहे, “होस्साना” तुम्हालाही नक्की आवडेल!

  • इलयराजा", "रहमान" आणि "क्या हैं मुहब्बत…

    गुरुदत्तच्या “प्यासा (१९५७)” मधील “ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है…” ज्याला माहिती नसेल असा संगीत-रसिक सापडणे अशक्यच! खरोखरंच, किती सुंदर संगीताची निर्मिती व्हायची त्या काळात! आजही ती अवीट गीते अंगावर रोमांच उभा करतात. याउलट आजच्या काळातील संगीत पहा. “आत्माहीन” एवढे एकाच विशेषण त्यास शोभून दिसेल. याचे मुख्य कारण म्हणजे आजची चित्रपट-गीते ही केवळ तत्काळ आणि तेवढ्यापुरती गाजावित म्हणूनच बनवली जातात. आणि इतकेच नव्हे तर बरेचदा त्यांत मांडलेल्या भावनाही यांत्रिकच असतात. त्यामुळेच आज गाजणारं गीत महिन्याभरानंतर कुणाच्या लक्षातही नसतं.
        अर्थातच या सगळ्याला इलयराजा आणि रहमानसारखे काही सन्माननीय अपवादही आहेत (आणि जी. व्ही. प्रकाशकुमारसुद्धा – पण त्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचाय). रहमान आणि राजाबाबतीत बोलायचं झालं तर, दोघांचीही संगीतरचनेची शैली भिन्न आहे. उदाहरणार्थ, राजा सरांचा भर गीताची मूळ चाल जशीच्या तशी ठेवण्यावर अधिक असतो. मग जेवणात वरून मीठ भुरभुरावं तश्या ते त्या गीतात वाद्यसंयोजनाद्वारे भावना भुरभूरतात. त्या गीतातील भावनांची अभिव्यक्ती सुयोग्य गायक अथवा गायिकेद्वारे करवून घेणे त्यांना अधिक आवडते. अश्याप्रकारे सिद्ध केलेली त्यांची पाकक्रिया परिपूर्ण असते आणि शिवाय श्रोत्यालाही समजायला सोपी असते. याउलट रहमान सर मात्र गीताच्या मूळ चालीत शब्दांखेरीज संगीताचे वेगवेगळे थर (Layers) पेरतात – कधी वैशिष्ट्यपूर्ण वाद्यसंयोजनाद्वारे तर कधी वैशिष्ट्यपूर्ण ध्वनिमिश्रणाद्वारे. त्यांना गीतातील भावनांच्या अभिव्यक्तीसाठी विशिष्ट गायक-गायिकेची गरज असतेच असे नाही, तर त्यांच्या गीतातील भावना ही चाल, वाद्यासंयोजन, वैविध्यपूर्ण ध्वनींचा वापर अश्या खुपश्या घटकांचा एकत्रित परिणाम असतो. त्यामुळेच त्यांची गीते एकदा ऐकल्यावर काळातही नाहीत, किंबहुना कंटाळवाणीच वाटतात. पण हळूहळू, अधिकाधिक ऐकत गेल्यावर त्यातील नवनव्या गोष्टी मनात रुंजी घालू लागतात. याला मी ते गाणे “चढणे’ असे म्हणतो! ही नवनव्या गोष्टी सापडण्याची प्रक्रिया कधीकधी त्या गीताच्या प्रकाशनानंतर वर्षभरही चालू असते आणि यामुळेच ते गीत महिन्याभरात मरत नाही, उलट जुन्या दारूसारखे अधिकाधिक परिपक्व होत जाते, तजेलदार होत जाते.
        याचा अर्थ असा नव्हे की, राजा सर गुंतागुंतीच्या रचना करतंच नाहीत अथवा रहमान सर साध्यासोप्या रचना करतंच नाहीत. सर्वांना समजावे म्हणून हिंदीतीलच उदाहरणे पाहू. “बातें हवा हैं… (चीनी कम – २००७)” या गीतातील दोन्हीही मध्यमेळ (Interludes) ऐका. एकीकडे सिम्फनी आणि दुसरीकडे रॉक! आणि या दोन्हींच्या एकत्रित परिणामाद्वारे गाण्याच्या अभिव्यक्तीत होणारा बदल हा एकदा ऐकून समजणारा नाही; किंबहुना विचित्रच वाटणारा आहे. आज ५ वर्षांनंतरही मी आश्चर्यात बुडालेलो आहे की इतक्या गुंतागुंतीच्या थरांत या साध्यासोप्या चालीची मांडणी करणे कसे सुचले असेल? किंवा “पा(२००९)” मधील “उडी उडी…” या गीताची ३ विविध भावना मांडणारी ३ विविध रूपे (व्हर्जन्स) आहेत. एकाच चालीतून वेगवेगळ्या वाद्यांद्वारे ३ वेगवेगळ्या भावनांची मांडणी अतिशय रोमांचक आहे. हेही गीत (३ही रूपे) एकदा ऐकून समजणारे नाही. याउलट, रहमान सरांच्या “झूठा ही सही (२०१०)” तील गाणी ऐका. अतिशय सोप्या चाली आणि तितकंच सोपं वाद्यसंयोजन! एकदा ऐकूनच “चढतील” (अपवाद फक्त त्यातील “मूनलाईट”चा!).
        हे सारं विस्ताराने मांडण्याचं कारण म्हणजे “एक दीवाना था (२०१२)”मधील एकमेव नवीन गाणे “क्या हैं मुहब्बत…”! अतिशय साधीसोप्पी चाल, तितकंच साधं (सामान्य नव्हे!) वाद्यसंयोजन! सुरुवातीला मुद्दामच गुरुदत्तच्या गीताची आठवण सांगितली, कारण त्याच धर्तीवर हेही गीत “तरन्नुम” पद्धतीचं! विशेष म्हणजे रहमानची आधीचीच सुरेख असलेली गायकी हरेक गाण्यात अजूनच सुधारत चाललीय! खास करून “मुहब्बत खुदा हैं, खुदा हैं मुहब्बत…” हे शब्द गाताना त्याची सांगीतिक बुद्धिमत्ता आणि गायकी ऐका. कित्येक वर्षांत तरन्नुम हा गीत-प्रकार कुणी हाताळला नव्हता, कारण नुसते “शेर” विशिष्ट पद्धतीने मांडणे म्हणजे तरन्नुम नव्हे तर गीताचा एकूण परिणामही अर्थवाही व्हायला हवा असतो. “संगीताच्या देवा”ने हे सारेच आह्वान अतिशय ताकदीने पेललेय आणि तरीही गीताचा ताजेपणा व प्रामाणिकपणा अबाधित ठेवलाय! तुमच्या वेगवेगळ्या मनोवस्थेत हे गीत तुम्हाला वेगवेगळे वाटेल. कधी ते “Jazz” वाटेल तर कधी ‘गझल” तर कधी “प्रेम म्हणजे नक्की काय हो?” असा सनातन प्रश्न विचारणाऱ्या तत्ववेत्त्याचे मुक्त चिंतन! काहीही असो, हे गीत प्रत्येक वेळी तितकेच गोड वाटते, सुंदर वाटते, प्रामाणिक वाटते! जुन्या गीतांची आवड असणाऱ्या श्रोत्यांना तर हे गीत ऐकल्यावर “तो” सुवर्णकाळच परत आल्यासारखं वाटेल. विशेषत: त्यातील एकूणएक शब्द लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला निश्चितच जावेद अख्तरच्या प्रतिभेला प्रणाम करावासा वाटेल.

        एकूण सांगायचं झालं तर, इलयराजाही रहमानसारखी गुंतागुंतीची रचना करू शकतो आणि रहमानही इलयराजासारखी सोपी! पण यावेळी मात्र रहमान हा राजाच्या सोपेपणापेक्षाही एक पाऊल पुढे गेलाय! हा “शिष्यादिच्छेत्पराजयम्” स्वत: इलयराजालाही निश्चितच आवडेल आणि माझी खात्री आहे की तुम्हां सर्वांना सुद्धा!

  • वेदकाळात ब्राह्मणवाद : एक पोकळ कल्पना

    हल्ली वेद मानणार्यांवर ब्राह्मणवादाचा आरोप करण्याची FASHION च झालीय. जो तो उठतो आणि स्वत:ची पातळी, अभ्यास वगैरे काहीही न बघता असले बिनबुडाचे आरोप करीत सुटतोय. कदाचित तो त्यांचा स्वत:ला “पुरोगामी” ठरविण्याचा मार्ग असावा. पण माझ्यासारख्या संशोधकासाठी मात्र त्यांच्या आरोपात किती तथ्य आहे हे शोधणे, आणि तथ्य नसेल तर सत्य काय ते सर्वांसमोर मांडणे क्रमप्राप्त ठरते, म्हणून हा लेखनप्रपंच.
      वेदांतील सर्वांत जुना आणि प्रमुख वेद म्हणजे ऋग्वेद. एखादी गोष्ट ऋग्वेदाच्या बाबतीत खरी असेल तर ती इतर ३ वेदांच्या बाबतीतही खरी असते. आणि ऋग्वेदाबाबतीत एखादी गोष्ट खरी नसेल तर ती इतर ३ वेदांनीही स्वीकारलेली नसते हे आपणास माहिती आहे. तेव्हा शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने जर ऋग्वेदात ब्राह्मणवाड नसेल तर इतर ३ वेदांतही तो नाही हे मानण्यास प्रत्यवाय नाही. असा विचार करून मनात काहीही पूर्वकल्पना न ठेवता जेव्हा मी ऋग्वेद संहिता तपासू लागलो तेव्हा संशोधनांती हाती आलेले निष्कर्ष धक्कादायक होते. तेच आत्ता तुमच्यासमोर मांडतोय.
       ऋग्वेदाच्या १० मंडलांत मिळून एकूण १०२८ सूक्ते आहेत. हि सारी सूक्ते एकूण ३९० ऋषींनी लिहिलीयत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण मला सापडलेल्या माहितीनुसार, या मंत्रद्रष्ट्या ऋषीपैकी २१ स्त्रिया स्त्रिया आहेत आणि याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे त्या सार्या ऋषीपैकी ४७ ऋषी अब्राह्मण आहेत! या अब्राह्मण ऋषींची नावे आणि त्यांनी रचलेल्या सूक्तांची(ऋचांची नव्हे!) संख्या येथे देत आहे.
    मधुछंद  विश्वामित्र (११)
    जेता  मधुछंदस (१)
    अंबरिष (१)
    वर्षागीर (१)
    इंद्र (३)
    मरुत (१)
    विश्वामित्र  गाथिन (४९)
    ऋषभ  वैश्वामित्र (३)
    कत वैश्वामित्र (२)
    प्रजापति वैश्वामित्र (५)
    भारताश्वमेध राजा (१)
    संवरण प्राजापत्य (२)
    कुमार आग्नेय (२)
    वैवस्वत (५)
    ययाती (१)
    नहुष (१)
    साम्वरण (१)
    वैश्वामित्र वाच्य (२)
    रुणन्चय राजर्षी (१)
    सिंधुद्विप आंबरिष (१)
    यमी (२)
    विवस्वान (१)
    यम (२)
    शंख यामायन (१)
    दमन यामायन (१)
    देवश्रवा यामायन (१)
    सुंशुक यामायन (१)
    मथित यामायन (१)
    विमद ऐन्द्र  अथवा प्राजापती (७)
    वसुक्र ऐन्द्र (३)
    इंद्रस्नुषा (१)
    अभिताप सौर्य (१)
    मुष्कवान ऐन्द्र (१)
    वैकुंठ ऐंद्र (३)
    नाभानेदिष्ट मानव (२)
    सर्प ऐरावत जरत्कर्ण (१)
    सावित्री सूर्या (१)
    इंद्राणी (३)
    वृषाकपि ऐन्द्र (१)
    रेणू वैश्वामित्र (१)
    शार्यत मानव (१)
    अर्बुद सर्प (१)
    उर्वशी (1)
    सर्वाहारी ऐन्द्र (१)
    अप्रतिरथ ऐन्द्र (१)
    अष्टक वैश्वामित्र (१)
    पणय: असुर तथा देवशुनी सरमा (१)
    लबरुपापन्न ऐन्द्र (१)
    हिरण्यगर्भ प्राजापती (१)
    अग्नी, वरूण, सोम (१)
      यावरून असे दिसते कि सुमारे १३९ म्हणजे ऋचान्च्या एकूण संख्येच्या १०% हूनही अधिक ऋचा या अब्राह्मण मंत्रद्रष्ट्या ऋषींनी लिहिल्या आहेत. वरील आकडेवारीबद्दल कुणाला शंका असल्यास आपण स्वत: ऋग्वेद संहिता पाहून खात्री करू शकता.
      यावरून कुणीही सूज्ञ व्यक्ती हाच निष्कर्ष काढेल कि वेदकाळात कोणत्याही प्रकारचा जातीयवाद अजिबातच अस्तित्वात नव्हता. कुणीही व्यक्ती (मग ती स्त्री असो वा पुरुष) त्याच्या गुण आणि कर्मांनी योग्य तो वर्ण प्राप्त करून घेऊ शकत असे. जातीव्यवस्था ही कधीही भारतीय समाजाचा भाग नव्हती, हिंदू धर्माचा तर नव्हतीच. जातीव्यवस्था ही अहिन्दुंच्या आक्रमणामूळे झालेले जे अनेक दुष्परिणाम आहेत त्यांपैकी एक आहे – आणि आजचे राजकारणी व अन्य भारतद्वेषी लोक तिला खतपाणी घालत आहेत आणि ते ही “ब्राह्मणवाद” नामक एका निरर्थक आणि पोकळ शब्दाचा आश्रय घेऊन! अश्यांना किती थारा द्यायचा हे आपणच ठरवा. आपण सूज्ञ आहात.
    जयतु भारतं ||

    – © विक्रम श्रीराम एडके
    edkevikram@gmail.com