Category: Hindutva

  • हिंदुत्व हे मोठे अजब रसायन आहे

    हिंदुत्व हे मोठे अजब रसायन आहे. ते संपले म्हणून कुणी पोत खाली करू गेले तर त्याची ज्वाळा दुप्पट त्वेषाने वर वरच उफाळते.
       जगज्जेत्या शिकन्दराला भ्रम होता की हा हा म्हणता म्हणता हिंदुस्थान काबीज करेल. तो शिकंदर हिंदुस्थानचे साधे अंगणही बघू शकला नाही! कालौघात चाणक्यही गेले आणि चंद्रगुप्तही, केवळ हिंदुत्व तेवढे टिकून राहिले. म्लेन्छांनी या भूमीला उणीपुरी ६०० वर्षे गुलाम करून ठेवले. आता हिंदुत्व औषधालाही उरणार नाही असे वाटत असताना ते नुसते तगलेच नाही तर या भूमीत त्याने शिवप्रभून्सारखा संजीवन योद्धाही जन्मास घालून दाखवला. शिवप्रभूही गेले आणि शंभूछ्त्रपतीही पण तोवर हिंदुत्वाची धुरा बाजीराव बल्लाळ नावाच्या महायोद्ध्याने केव्हाच पेलली होती!
       इंग्रजी अंमलातही हे दैवी रसायन आपले अस्तित्व दाखवून देताच होते, कधी १८५७ च्या रूपाने तर कधी अनेकानेक क्रांतिकारकांच्या रूपाने! पुढे जन्माला आला तो विनायक दामोदर सावरकर नावाचा महानायक, हिंदू-हृदय-सम्राट! या महानायकाने हिंदुत्वाचा उद्घोष असा काही केला की सबंध देश ढवळून निघाला! पुन्हा तोच प्रश्न, सावरकरांच्या नंतर कोण?
       सावरकरांच्या नंतर कोण? अरे केव्हाच जन्माला आला होता एक हिंदू-हृदय-सम्राट! “बाळ” नावाचा “बाप” माणूस, ज्याने गेली पाच दशके केवळ हिंदूंच्याच कशाला, सर्वच सच्च्या देशभक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
       आज हा बापही गेला. पण म्हणून हिंदुत्व पोरके झाले असे मानायचे काही कारण नाही. मराठी वाघ जरी अनंताच्या यात्रेवर प्रयाण करता झाला असला तरीही, गुजरातचा सिंह अजून जिवंत आहे. म्हणून म्हणतो, हिंदुत्व संपले नाही, हिंदुत्व संपत नाही. ते एक मोठे अजब रसायन आहे. ते संपले म्हणून कुणी पोत खाली करू गेले तर त्याची ज्वाळा दुप्पट त्वेषाने वर वरच उफाळते!
    © विक्रम श्रीराम एडके.
  • श्रीगणेश विज्ञान

     

    खूप दिवसांपासून या विषयावर लिहायचे मनात होते. आजचा मुहूर्त अगदी योग्य आहे. श्रीगणेश-जन्माची कथा आपणा सर्वांना माहितीच आहे.

    तरीही संदर्भासाठी थोडक्यात देतो.
    पार्वतीने आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार केली. त्यात प्राण फुंकून त्याला स्वत:चा मुलगाच मानले. पुढे या मुलाचे शिर श्रीशंकराच्या हातून उडवले जाते. पार्वतीचा विलाप पाहून शिवशंकर एखाद्या दुसर्या बालकाचे शिर आणण्याची आज्ञा …देतात. शिवगण चुकून एका हत्तीच्या पिल्लाचे शिर घेऊन येतात. मानवी शिर शोधण्याइतका वेळ उरला नसल्याने अखेरीस तेच शिर लावले जाते, आणि अश्याप्रकारे गणेशाचा जन्म होतो.”

    आता या कथेत खालील गोष्टी महत्वाच्या आहेत.

    १) देवी पार्वती आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार करतात. ही मूर्ती सजीव होते.
    २) कोणतेच दुसरे शिर न मिळाल्याने शिवगण एका हत्तीच्या पिल्लाचे शिर
    आणतात. अखेरीस तेच शिर लावले जाते.

    आता या कथेकडे व्यवस्थित पाहिल्यास कळते की ही कथा म्हणजे “क्लोनिंग” आणि “अवयावारोपण” करण्याचा जगातील पहिला प्रयोग असू शकतो. कसे ते पहा. पार्वती आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार करते,
    जी सजीव होते. जीवशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास, आपण जेव्हा एक साधी चुटकी वाजवतो, तेव्हाही सहस्रावधी पेशी शरीरापासून विलग होतात. पार्वतीने जाणून-बुजून अंगावरील मळ खरवडला होता. तिला जिवंत
    उति (tissues) मिळवावयाच्या असाव्यात ही शक्यता नाकारता येत नाही. तात्विक दृष्ट्या हे सहज-शक्य आहे. तसेच शंकराने गणेशाचे शिर उडवल्यावर घाईने दुसरे शिर हवे असते, कारण त्या बालकाचा प्राण गेला होता पण मध्ये फार काळ गेला नसल्याने “वैद्यकीय मृत्यू (Clinical Death)” झाला नसावा. शिवगणांनी वेंधळेपणा केल्यावर पुन्हा मानवी शिर शोधण्यात आणखी कालापव्यय झाला असता. म्हणून हत्तीचेच शिर बसवले गेले. हा तत्कालीन अवयावारोपणाचा प्रकार असण्यात अशक्य काय आहे? आजही विज्ञान मानवी अवयवांचे रोपण करूशकते. अजून थोडी प्रगती झाल्यावर प्राण्यांच्या अवयवांचे रोपण होऊ शकेलच ना? म्हणजे ही देखील गोष्ट तात्विक-दृष्ट्या अशक्य नाही. आता हे सगळे वाचल्यावर काही लोक एक ठेवणीतला प्रश्न विचारतील, “एवढी प्रगती इतक्या प्राचीन काळी झाली असणे कसे शक्य आहे?” त्यांना मी विचारतो की, का अशक्य आहे? केवळ काळ फार प्राचीन आहे, हे काही कारण नाही होऊ शकत. या प्रश्नकर्त्या मंडळींचे खरे दुखणे काय असते माहितीय का? ते आहे “न्यूनगंड”. हो, न्यूनगंड. एखादी गोष्ट हिंदू म्हणजेच भारतीय म्हटली की ती वाईटच असली पाहिजे, हा तो न्यूनगंड होय. हीच गोष्ट जर कुणा युरोपीय अथवा अमेरिकन संशोधकाने शोधली असती तर मात्र आम्ही ती मानानार्यांत अग्रभागी असलो असतो! कारण “साहेबं वाक्यं प्रमाणं!” आपण गोऱ्या कातडीच्या मानसिक गुलामीतून बाहेर यायला आजही तयार नाही हेच खरे! बरे, हिंदू संस्कृती आणि धर्म हा जगात सर्वाधिक विज्ञान-निष्ठ असल्याचे हिंदू सोडून जगातील सगळ्याच संशोधकांचे मत आहे. पण आमचा न्यूनगंड आणि आपसातील भांडण मात्र आपल्याला हे सत्य स्वीकारण्यापासून रोखतेय! हिंदूंच्या विज्ञान-निष्ठेचे आजवर शेकडो पुरावे सापडले आहेत, पण ज्यांनी झोपेचे सोंग घेतलेय त्यांच्या नजरेला ही गोष्ट कशी पडणार? त्यांना मुळात आपले वेद-पुराणे हेच खोटे वाटतात. चला, क्षणभर वादासाठी तेही गृहीत धरू. आता पुन्हा वरील कथा पहा. याही परिस्थितीत वरील कथा पाहिल्यास ती वैद्यकीय-दृष्ट्या १००% योग्य असल्याचेच आढळेल! मग निदान व्यासांनी “विज्ञान-कथा”
    लिहिली एवढे तरी मान्य कराल? आणि कुठेतरी या गोष्टी खरोखर असल्याशिवाय इतकी “सुयोग्य” विज्ञान-कथा तरी कशी सुचेल? या कथेपेक्षाही कितीतरी प्राचीन काळात “ऋभू” नावाच्या ३ बंधूंनी विविध शस्त्रक्रिया केल्याचे पुरावे ऋग्वेदात आहेत. “चरक” हा “सर्जन” शस्त्रक्रियेपूर्वी आपली हत्यारे उकळून घेत असल्याचे त्यानेच
    लिहून ठेवलेय. याचा अर्थ त्याला इतक्या प्राचीन काळातही सूक्ष्मजीवांचे ज्ञान होते असाच होतो ना? विमान बनवण्याची प्राचीन भारतीय विधी मीच पूर्वी प्रसिद्ध केली होती. राजा भोज याच्या “समरांगण सूत्रधार” नामक ग्रंथात तर “यंत्रमानव” बनविण्याचीही विधी दिलीय. मग इतके सगळे विज्ञान असणार्या संस्कृतीत मी म्हणतो त्याच प्रमाणे गणेश- जन्म झाला नसेल कशावरून?
     पहा, विचार करा. “सूज्ञांना” पटेल.

    गणपती बाप्पा मोरया”

    सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

    आपलाच,
    विक्रम श्रीराम एडके.
    (संपर्क : edkevikram@gmail.com)