Category: Hindutva

  • डोवालसाहेबांच्या भाषणातले कटू तात्पर्य

    हिंदुस्थानचे राष्ट्रीयसुरक्षा-सुमंत (‘सल्लागार’ या अरबी-उद्भव शब्दासाठी मी योजलेला संस्कृतनिष्ठ मराठी शब्द. एकतर शिवकालीन इतिहासामुळे ‘सुमंत’ सर्वांना माहिती आहे आणि शिवाय तो उपयोजण्यास सोपाही आहे! मूळ रामायणकालीन संस्कृत शब्द आहे ‘सुमंत्र’ अर्थात ‘चांगले सुचविणारा’!) श्री. अजित डोवाल यांनी तब्बल ७ वर्षे पाकिस्तानात हेरगिरी करत काढली आहेत. काही दिवसांपूर्वी ‘विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशन’च्या कार्यक्रमात सहभागी झाले असताना श्री. डोवाल यांनी स्वतःच एक अनुभव सांगितला होता. मला तो मोठा अर्थपूर्ण वाटल्यामुळे येथे सांगतोय.

    डोवालसाहेब पाकिस्तानात असताना मुसलमानवेष करून राहायचे. लाहौरला (प्रभू श्रीरामांचे सुपुत्र ‘लव’ यांच्या नावावरून असलेले मूळ हिंदू नाव ‘लवपूर’) एक मोठी ‘मज़ार’ आहे. तिथे ते एकदा गेले. धार्मिक विधी करीत असताना त्यांना जवळच बसलेल्या एका म्हाताऱ्या हाजीने हाक मारून जवळ बोलावले. डोवालसाहेब त्यांच्याकडे गेले. दुआ-सलामच्याही आधी हाजीसाहेब ताडकन म्हणाले, “तू हिंदू आहेस”!
    डोवालसाहेब गडबडले, पण त्यांनी चेहऱ्यावर तसे भासवले नाही. चेहरा निर्विकार ठेवून ते म्हणाले, “तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी मुसलमानच आहे”!
    त्या हाजीने डोवालसाहेबांना आपल्या मागे येण्याची खूण केली. त्याप्रमाणे हे त्याच्या पाठोपाठ गेले. काही कक्ष ओलांडल्यावर एका लहानश्या कक्षात दोघेही पोहोचले. हाजीसाहेबांनी दार आतून लावून घेतले आणि पुन्हा डोवालसाहेबांकडे वळून म्हणाले, “तू हिंदू आहेस”!
    डोवालसाहेब विचारले, “असं कश्यावरून म्हणता”?
    त्यावर हाजीसाहेबांनी हसून सांगितले, “कारण, तुझे कान टोचलेले आहेत”!
    आता असा बिनतोड पुरावाच दिला म्हटल्यावर डोवालसाहेब वरमले. कहीतरी बोलून वेळ मारून नेण्यासाठी ते म्हणाले, “होय, मी पूर्वी हिंदू होतो. आता मात्र धर्मांतरण करून मुसलमान झालोय. अनेक वर्षे झाली त्याला”.
    हाजीसाहेब तरीसुद्धा हसून म्हणाले, “तू खोटं बोलतोयस. तू अजूनही हिंदूच आहेस”!
    आता मात्र डोवालसाहेबांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. ते काही बोलणार तेवढ्यात हाजीसाहेबच पुढे म्हणाले, “आणि माहितीये, मी तुला कसे काय ओळखले? कारण, मीसुद्धा हिंदूच आहे”!!
    डोवालसाहेब धक्क्याने पडायचेच बाकी राहिले होते! हाजीसाहेब (?) पुढं सांगू लागले, “या हरामखोरांनी माझं सारं कुटूंब मारून टाकलं. बलात्कार केले, लुटालूट केली. मी एकटाच वाचलो. आणि आता या मज़ारच्या आश्रयाने राहातोय. इथले लोक मला हाजी समजतात. मीही बाहेर त्यांच्यासारखाच नमाज़ पढतो. पण आत या माझ्या खोलीत मात्र मी रोज गुपचुप यांची पूजा करतो -“, असं म्हणून त्यांनी एक शंकराची आणि दुर्गेची मूर्ती डोवालसाहेबांना दाखवली. “..तुझ्यासारखा कुणी दिसला की मला माझं कुटूंबच परत मिळाल्यासारखं वाटतं बघ! आणि म्हणूनच माझी सगळीकडे बारीक नजर असते, की कर्णछेदन केलेला कुणी सापडतो का”!

    मित्रहो, ‘अमन की आशा’ आणि पाकिस्तानशी चर्चा या गोष्टी बोलायला खूप सोप्या आहेत. किंबहूना त्या बोलायला फारशी अक्कलसुद्धा लागत नाही. केवळ मनात अहिंसा आणि प्रेमाच्या बेगडी कल्पना असल्या की काम भागतं! परंतु खरं सांगायला गेलं, तर पाकिस्तान हा केवळ एक आतंकवादी देशच नाहीये तर ‘दार-उल-इस्लाम’च्या अभद्र कल्पनेने पछाडलेला एक अभद्र देश आहे. तो जोपर्यंत आपली जिहादी मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी मैत्री शक्यच नाही कारण, भारतासारख्या काफीर देशाला ते सातत्याने शत्रूच समजणार! कालच पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकला २६ वर्षं तुरुंगवासाची शिक्षा फर्मावली – अपराध काय, तर एका दूरचित्रवाणी कार्यक्रमात तिने एका तथाकथित धार्मिक गीतावर नृत्य केले होते! या दर्जाचे माथेफिरू आहेत ते. आणि आधुनिक शिक्षण वगैरे मिळाल्यावर तर त्यांची धर्मांधता उलट अजूनच वाढते! या सगळ्याचे मूळ त्यांच्या ‘शिकवणूकी’त आहे. ती शिकवणूक जोपर्यंत आहे, तोपर्यंत शांतता नांदणे शक्यच नाही! आणि दुर्दैवाने ती शिकवणूक भारतातही जोरदार प्रचारली जातेय. आपले पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी याबाबतीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय योग्य भूमिका घेताहेत, पण तेवढेच पुरेसे नाहीये. आपणही यात हातभार लावला पाहिजे. आपल्या डोक्यात घुसलेलं हे ‘फेक्युलॅरिझम’ नावाचं भूत समूळ उखडून फेकलं पाहिजे. लक्षात घ्या, कट्टरतेला प्रेमाने जिंकणं हा कल्पनाविलासापुरताच असलेला बेगडी आदर्शवाद झाला. प्रत्यक्ष युद्धभूमीवर मात्र कट्टरतेला त्याहून आक्रमक अशी प्रतिकट्टरताच हरवते, हा इतिहास आहे. तेव्हा हीच वेळ आहे कट्टरांच्या विरोधात प्रतियोगिता म्हणून का होईना, पण धर्माभिमानी होण्याची! नाहीतर तो दिवस दूर नाही की आपल्याला आपल्याच भूमीवर त्या हाजीसाहेबांसारखेच अज्ञातवासात जगावे लागेल. ‘लवपूर’ही एकेकाळी आपलीच भूमी नव्हती का! डोवालसाहेबांच्या भाषणातलं कटू तात्पर्य हे असं आहे!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने ऐकण्यासाठी/आपल्या परिसरात आयोजिण्यासाठी क्लिक करा:  www.vikramedke.com)

    image

  • नरकचतुर्दशीच्या निमित्ताने

    व्याख्यानांच्या निमित्ताने प्रवास करताना मनुष्यस्वभावाचे अनेक नमुने पाहावयास मिळतात. वाईट कुणीच नसतं. केवळ व्यक्ती तितक्या प्रकृती एवढंच! असाच एके ठिकाणी गेलो असता, एक बाई भेटल्या. प्रचंड स्त्रीवादी! पितृसत्ताक पद्धती झुगारून समानता मागता मागता हल्लीच्या बहुतांश स्त्रीवादी बायका जश्या नकळत ‘स्त्रीवर्चस्वाचा’ टोकाचा आग्रह धरतात ना, अगदी तश्या! बोलताना त्यांच्या तोंडी एका दमात तस्लिमा नसरीनपासून ते शोभा देपर्यंत एकाहून एक नावे येत होती. स्त्रीवर किती अत्याचार होतात आणि तिने त्यापासून कशी सुटका करून घेतली पाहिजे, हाच एक धोशा. बाईंचा नवरा अजून या जगात तग धरून आहे का आणि असल्यास अश्या प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची जिद्द त्या महानुभावाने कशी कमावली, हे विचारण्याचा मला वारंवार मोह होत होता. पण तो मी टाळला. म्हटलं, बाई रागाने अंगावर धावून आल्या तर मी एवढास्सा जीव कधी कसा चेंदामेंदा होऊन जाईन समजणारही नाही! वर मीच स्त्रीयांवर अत्याचार वगैरे करणारा ठरेन ते वेगळंच! काहीही न बोलणारा श्रोता मिळाल्यामुळे बाईंना बहुतेक अजूनच चेव आला असावा. त्या त्वेषाने माझ्या दिशेने बोट करत म्हणाल्या, “तुम्ही इतिहासकारही स्त्रियांचा केवढा अपमान करता. तुम्ही म्हणता ‘हिस्टरी’ म्हणजे ‘हिज् स्टोरी’! का असं? इतिहास काय फक्त तुम्हां पुरुषांचाच असतो का? बायकांचा नसतो? ‘हिज् स्टोरी’च का? ‘हर स्टोरी’ का नाही? सांगा ना. सांगा. आता सांगा..!!”

    खरं तर इतिहासाचा ‘गमभन’ही धड माहिती नसणाऱ्या मला बाईंनी थेट ‘इतिहासकार’च ठरवून टाकल्यामुळे मी मनापासून सुखावलो होतो. पण म्हणून काय हा असा आपल्याला समस्त पुरुषजातीचे प्रतिनिधित्व (तेही न मागताच!) देत केलेला हा असा हल्ला सहन करायचा? मी हात उंचावत त्यांना थांबवलं. म्हणालो, “मी भारतीय संस्कृतीला मानणारा माणूस आहे. आपली संस्कृती ना स्त्रीवादी आहे ना तुम्हाला वाटते तशी पुरषसत्ताक. ती सत्यवादी आहे! आता राहिला प्रश्न ‘हिज् स्टोरी’ की ‘हर स्टोरी’चा, तर ते केवळ इंग्रजाळलेल्यांचे चोचले आहेत. आपल्याकडे ‘इतिहासा’ला ‘इतिहास’ असंच म्हणतात. इति + ह + आस = इतिहास. शब्दशः  अर्थ होतो, ‘पूर्वी असे घडले’!! यात कसला आलाय स्त्री आणि पुरुषाचा संबंध”?

    या बोलण्याने बाई जराश्या वरमल्या. मूक श्रोत्याकडून अश्या ‘वेगळ्याच’ प्रत्युत्तराची त्यांना अपेक्षा नसावी. मी पुढे म्हणालो,
    “तुम्ही ‘न स्त्रीस्वातंत्र्यमर्हति’ सांगणाऱ्या मनू ऋषींना स्त्रियांचा शत्रू ठरवता. पण कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का की, मनू नेमकं काय म्हणाले आहेत? अध्याय ९ वा, श्लोक ३ –
    ‘पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।
    रक्षंति स्थविरे पुत्रा: न स्त्रीस्वातंत्र्यमर्हति।।’
    अर्थात स्त्रीचे कुमारवयात पिता रक्षण करतो, तरुणपणी पति आणि उतारवयात मुलगा. स्त्रीला स्वातंत्र्य नसते! इथे ‘स्वातंत्र्य’ हा शब्द आधीच्या तीन ओळीत आलेल्या ‘रक्षण’ या शब्दाच्या संदर्भात वापरलाय. आणि सर्वत्र वर्तमानकालीन रुपे वापरली आहेत, त्याअर्थी मनू काही ‘स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नयेत’ असं आज्ञार्थी बोलत नाहीयेत, तर उलट त्याकाळचं समाजजीवन समजावून सांगताहेत की, ‘आपल्या समाजात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीच्या रक्षणाची इतकी काही काळजी घेतली जाते की, तिला स्वसंरक्षणासाठी करण्याची वेळ यावी इथपर्यंत गोष्टी पोहोचूच दिल्या जात नाहीत! थोडक्यात स्त्रीच्या सुखासाठी पुरुषांना कामाला लावलंय. यात काडीचा तरी स्त्रीद्वेष आहे का”?

    ही ‘बातमी’ बाईंना नवीच असावी! परंतु त्यांच्या स्त्रीवादी (की स्त्रीनियंत्रणवादी!) विचारांना असा पराभव झेपणारा नसावा. त्या काही न बोलता उठून गेल्या. हे सारं आजच आठवण्याचं कारण असं की, आज आहे नरकचतुर्दशी! आजच्याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून त्याने जबरदस्तीने बंदीवान करून ठेवलेल्या स्त्रीयांची सुटका केली होती. परंतु बराच काळ नरकासुराच्या ताब्यात राहिलेल्या त्या स्त्रियांच्या चारित्र्यावर मूर्ख समाजाने संशय घेणे साहजिकच होते. अहो, जिथे समाजाने साक्षात सीतामाईंच्या चारित्र्यावर संशय घेतला होता, तिथे या सामान्य स्त्रियांची काय कथा? किंबहूना शतपैलू मतिच्या श्रीकृष्णांसमोर या ऐतिहासिक घटनेचे उदाहरण असणारच! प्रभू श्रीरामचंद्रांचे त्यासंदर्भातले वर्तन अतिशय सरळमार्गी होते. श्रीकृष्ण अतिशय कुटील नीतीज्ञ! विवाहित सीतेवर संशय घेणे वेगळे आणि या कुमारिकांवर संशय घेणे वेगळे! श्रीकृष्ण एका शब्दाचेही स्पष्टीकरण देण्याच्या फंदात पडले नाहीत. त्यांनी सरळ त्या सगळ्या १६१०० युवतींशी एकाच मंडपात विवाहच करून टाकला. आणि एवढ्या एकाच कृतीने स्वत: राजा असलेले श्रीकृष्ण त्या स्त्रियांच्या चारित्र्याबाबत काय विचार करतात, याचा संदेश लोकांपर्यंत न बोलताच पोहोचवला! आता काय बिशाद होती कुणाची त्या तरुणींच्या चारित्र्यावर संशय घेण्याची! शिवाय या एकाच कृतीने त्या स्त्रियांचे पुनर्वसन तर झालेच, शिवाय त्यांना समाजात आवश्यक तो दर्जाही मिळाला! एकाच फटक्यात सोळा सहस्र आयुष्ये बरबाद होण्यापासून वाचली! श्रीमद्भागवतपुराणाच्या १० व्या स्कंधाच्या ५९ व्या अध्यायात या सर्व युवतींना श्रीकृष्णांनी स्वतंत्र महाल, दास-दासी इ. पुरवल्याचेही उल्लेख आहेत. त्याअर्थी स्त्रीमुक्तीवाल्यांनी आजचा दिवस ‘खराखुरा स्त्रीमुक्तीदिन’ म्हणून साजरा करायला हरकत नाही!!

    माझा स्त्रीमुक्तीवादाला काडीचाही विरोध नाही. कुणी काय विचार करावा हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. इस्लाम वा ख्रिश्चॅनिटीचा इतिहास स्त्रियांवरील अनन्वित अत्याचारांनी गच्च भरलेला आहे. त्याच्या खुणा जर पाहायच्या असतील तर आजही ISIS आणि तालिबानमध्ये काय चालतं ते तुम्ही पाहू शकता. किंबहूना त्यांच्या धर्मग्रंथांमध्येच अश्याप्रकारच्या अनेकानेक अन्यायांना नुसती परवानगीच दिलेली नाहीये, तर त्याचे धर्माच्या नावाखाली समर्थनही केले आहे. परंतु जर कुणी त्याच तागडीत हिंदू धर्मालाही तोलणार असतील, तर मात्र माझा आक्षेप आहे. धर्माचे तथाकथित ठेकेदार काय म्हणतात याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही, परंतु हिंदूंचा कोणताही धर्मग्रंथ स्त्रियांवर अत्याचार सुचवत नाही, एवढे मी एक अभ्यासक या नात्याने निश्चितपणे सांगू शकतो! आणि अतिरेकी-स्त्रीवाद्यांना आवडणार नाही, परंतु भारतीय संस्कृती कोणत्याही बाबतीत स्त्रियांची बाजू घेत नाही, एवढेही मी तितक्याच निश्चयाने सांगू शकतो. आणि न रागावता विचार करणार असाल, तर भारतीय संस्कृती कोणत्याही बाबतीत पुरुषांची बाजू घेत नाही हेही मी तितक्याच ठामपणे सांगू इच्छितो! भारतीय संस्कृती बाजू घेते ती केवळ सत्याची. त्याअर्थी हिंदू संस्कृती कायम नैसर्गिक न्यायाच्या बाजूने असते. स्त्रीवादी मान्य करणार नाहीत कदाचित, परंतु स्त्री आणि पुरुषाची रचना भिन्न असते. स्त्रीमध्ये निसर्गतःच नाजूकपणा, सौम्यता असते. हिंदू संस्कृती हे ओळखून त्या-त्या बाबींमध्ये पुरुषाला तिची काळजी घ्यायला लावते. स्त्रीला वरचा दर्जा देते. म्हणून तर ‘न स्त्रीस्वातंत्र्यमर्हति’ असा काळजीचा संदेश देणारे मनू त्याच मनूस्मृतीत ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते..’ सांगून स्त्रीला थेट देवतेचा दर्जा देतात. तद्वतच पुरुषातही निसर्गतः काही रचनात्मक वैगुण्ये असतात, तिथे हिंदू संस्कृती स्त्रियांना पुढाकार घ्यायला लावते! उदाहरणार्थ – संसाररथ हाकणे!! हे पुरुषाच्या एकट्याच्या हातचे काम नोहे!! तिथे स्त्रियांमधली विचारक्षमता, समंजसपणा, सहनशीलताच कामी येते. इतके साधे सोपे आहे हे सारे! खरं तर, आपण जेव्हा केव्हा एखाद्या गोष्टीसाठी हिंदू संस्कृतीला दोष देऊ पाहातो, तेव्हा शंभरातील नव्व्याण्णव वेळा तरी तो आपल्याच गैरसमजाचा वा अनाभ्यासाचा दोष आहे, असे खुशाल समजावे! माझे अनुभवाचे बोल आहेत हे. आपण गैरसमज करतो ते आपला हिंदू धर्म आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास नसतो म्हणून. म्हणजे दोष आपल्याच दृष्टीकोनाचा असतो, पण बोल मात्र हिंदू धर्म आणि संस्कृतीला लावला जातो. आणि नेमक्या अश्याचवेळी ‘सत्यमेव जयते’सारख्या उथळ मालिका बनवणाऱ्यांचं फावतं. मी तर त्याहीपुढे जाऊन असे म्हणेन की, आज जी स्त्रियांवरील अत्याचारांत वाढ झालेली दिसतेय ते आपली हिंदू संस्कृतीशी असलेली नाळ तुटण्यामुळे आणि आपल्या दिवसेंदिवस सेक्युलर होण्याच्या फालतू अट्टाहासामुळेच. नाहीतर जर समाजात स्त्रियांच्या चारित्र्याचे रक्षण करण्यासाठी झटणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचा आदर्श ठेवला गेला असता, नारीला देवतेचे स्थान देणाऱ्या मनूंचा आदर्श ठेवला गेला असता, तर समाजाचा स्त्रीकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही सुधारला नसता का? चुकीच्या आधुनिकीकरणाचे तोटे आहेत ते हे असे! असो. जे झाले ते झाले. इथून पुढे तरी आपण स्त्रीमुक्ती, त्यासंदर्भात भारतीय संस्कृती यांचा पुनर्विचार करायला शिकूयात. आपल्या मुलांना खरोखरचे हिंदू संस्कार देऊयात. त्यांना उद्याचे युगपुरुष श्रीकृष्ण वा स्मृतीकार मनू होण्याची प्रेरणा देऊयात. आजच्या नरकचतुर्दशीच्या निमित्ताने याच प्रेमादरपूर्वक शुभेच्छा!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच व्याख्याने डाऊनलोड करण्यासाठी अथवा आपल्या परिसरात/शाळा-महाविद्यालयांत लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

    image

  • पहिले ते ‘हरिकथानिरुपण’, दुसरे ते ‘राजकारण’!!

    प्रभू रामचंद्रांनी जेव्हा सीतामाईचा परित्याग केला, तेव्हा त्या बिचाऱ्या ऋषी वाल्मिकींकडे आश्रयासाठी राहिल्या. वाल्मिकींनी जाणले की, राजाचे कर्तव्य म्हणून श्रीरामांना सीतेचा त्याग करणे आवश्यकच होते, परंतू त्यापोटी सीतेवर झालेला अन्यायही अस्वस्थ करून सोडणारा होता. वाल्मिकींनी सीतेला ठेवून घेतले. लव-कुशांचा जन्म झाला. त्यांचेही वाल्मिकींनी यथासांग संगोपन-शिक्षण केले. त्यांना ‘रामायण’ शिकवले. आणि योग्य वेळ येताच श्रीरामांच्या राज्यातील यज्ञाचे निमित्त करून दोन्हीही पोरांना तिकडे रामकथा गाण्यासाठी पाठवले. दोन गोजिरवाणी पोरं! अयोध्येत सगळीकडे फिरायची. चौका-चौकात, पारा-पारांवर अस्खलित संस्कृतमध्ये रामकथा गायची. लोक भावविभोर व्हायचे. मंत्रमुग्ध व्हायचे. नकळत ही दोन्ही पोरं कित्ती रामासारखी दिसतात, अशी तुलनाही सुरू व्हायची त्यांच्या मनांत! मात्र वाल्मिकींनी सक्त ताकीद दिली होती दोघांना की, कुणीही किती जरी खोदून-खोदून विचारले तरीही आपले वडील कोण ते सांगायचे नाही. फार-फार तर ‘आम्ही वाल्मिकींचे शिष्य आहोत’, एवढेच सांगायचे! झाले!! पोरांची कीर्ती हळूहळू सर्व राज्यभर पसरली. यथावकाश स्वत: रामाकडून त्यांना बोलावणे आले. पोरं भर दरबारात प्रत्यक्ष प्रभू राम, लक्ष्मण, भरत, शत्रूघ्नांसमोर रामकथा गायली. कथा ऐकताना, विशेषतः सीतात्यागाचा प्रसंग ऐकताना साऱ्या-साऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. पोरांचे श्रीरामांच्या चेहऱ्याशी असलेले साम्य तर वादातीतच होते. रामाची मुलं असती, तर आज एवढीच असली असती – हाही विचार सर्व आप्तजनांना स्पर्शून जात होता. अखेरीस स्वत: रामरायांनीच विचारले की, तुम्ही कोण, कुणाची मुले? बास!! त्याचक्षणी तिथे ऋषी वाल्मिकी स्वत: आले आणि त्यांनी श्रीरामांना सांगितले की ही तुमचीच मुलं आहेत. वाल्मिकींनी सर्व दरबारास या मुलांची हकीकत सांगितली. सीतेची पवित्रता सांगितली! सर्वांची सहानुभूती सीतेच्या बाजूने झाली. श्रीरामांनाही तेच हवे होते. परंतू मनात कुठेतरी शंका होती. ती वाल्मिकींनी ओळखली आणि श्रीरामांना, साक्षात प्रभू श्रीरामांना दरडावून सांगितले की, ‘रामा, मी ऋषी वाल्मिकी, प्रचेताचा दहावा वंशज (म्हणजेच किमान दहा पिढ्यांची शुद्धता असलेला ब्राह्मण!) तुला सांगतोय की, सीता ही निष्कलंकच आहे”!! या निर्वाणीच्या सुरानंतर सारेच प्रश्न मिटले. राम-सीता दोघेही लव-कुशांसह पुन्हा एक झाले!

    हा प्रसंग काय आहे हो? सीतेला आश्रय देणे, लव-कुशांचा जन्म होऊन ते मोठे होईपर्यंत वाट पाहाणे आणि योग्य वेळ येताच डाव टाकून रामाला सीतेचा स्वीकार करायला भाग पाडणे — या सर्व गोष्टींना एकच शब्द लागू पडतो – ‘राजकारण’!! होय हे राजकारण आहे. आणि वाल्मिकींनी हे राजकारण केलं म्हणूनच लव-कुशांना आश्रिताचं जिणं न जगता त्यांच्या अधिकाराचं राज्य मिळालं, सीतेवरचा खोटा कलंक दूर झाला. वाल्मिकी जर आश्रमाच्या दाराशी आलेल्या गर्भवती सीतेलाही पाहून ‘मी तर तपस्वी आहे, मला या राजकारणाशी काय देणं-घेणं’ असे म्हणून गप्प बसले असते तर? अन्याय करणाऱ्यापेक्षाही तो अन्याय मूकपणे पाहाणारा जास्त मोठा पापी असतो. या न्यायाने वाल्मिकीही त्यांच्या निष्क्रियतेमुळे पापाचे वाटेकरी बनले असते. परंतू वाल्मिकींकडे नीर-क्षीर-विवेक होता. त्यांनी योग्य निर्णय घेतला. राजकारणात भाग घेतला, मत व्यक्त केले. त्यासाठी प्रत्यक्ष रामचंद्रांनाही खडसवायला कमी केले नाही! हेच प्रत्येक विचारी मनुष्याचे कर्तव्य असते!

    लोक मला विचारतात की, ‘विक्रमजी तुम्ही वक्ते आहात. इतिहासावर लिहिणे, व्याख्याने देणे हे तुमचे काम आहे. असे असताना तुम्ही या घाणेरड्या राजकारणावर का लिहिता’? लोक हा प्रश्न माझ्यावरील प्रेमापोटीच करतात, हे मी जाणतो. परंतू या प्रश्नाचे उत्तर उपरोक्त ऐतिहासिक घटनेत आहे मित्रांनो. खरे आहे की मी वक्ता आहे, लेखक आहे आणि तेच माझे कर्तव्यही आहे. मात्र या सगळ्याआधी मी एक ‘हिंदुत्ववादी’सुद्धा आहे! किंबहूना मी हिंदुत्ववादी आहे म्हणूनच वक्ता आणि लेखक आहे. आणि मी असे मानतो की, आजच्या काळात हिंदुत्व पसरवायचे तर त्यासाठी राजकीय सत्ता ही आवश्यकच आहे. त्यासाठी मीच कश्याला, प्रत्येक सच्च्या हिंदुत्ववाद्याने निवडणुकांच्या काळात हिंदुहितवादी माणसेच कशी सत्तास्थानी जातील, हे पाहायला हवे. आणि ती तशी गेल्यावर त्यांच्यावर सातत्याने अंकुशही ठेवायला हवा. म्हणूनच मी राजकारणावर लिहितो आणि लिहितच राहाणार. पक्षातीत विचार करून हिंदुहितास पाठिंबा देतच राहाणार. मग पक्ष भाजप असो वा शिवसेना वा अन्य कुणी! कुणाचीही अंधभक्ती नाही. बरोबर तर बरोबर. आणि चूक तर चूकच! जिथे समष्टीविचारांसाठी वाल्मिकींनी प्रत्यक्ष रामालाही खडसावले, तिथे आजचा तर कोणताही नेता रामाच्या योग्यतेचाही नाही. मग त्यांना जाब विचारण्यात कसली अडचण? कसली भक्ती? हो, एक मात्र निश्चित की, मी वाल्मिकींच्या पासंगालाही पुरणारा नाही. मात्र माझी सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून मी माझ्या परीने खारीचा वाटा उचलू शकतोच की! स्वत: समर्थांनीही ‘हरिकथानिरुपणा’नंतर दुसरे कर्तव्य ‘राजकारण’च सांगितलेय, नव्हे का? गरज पडली तेव्हा समर्थांनी राजकारणावर प्रभाव टाकणारे वर्तन केलेच ना? मग त्याच समर्थांना आदर्श मानणाऱ्या आपण सर्वांनीही त्यांच्याच मार्गावरून चालायला नको? तेव्हा समाजशिक्षणासाठी काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने सद्य राजकारणावर मते बाळगली आणि व्यक्त केलीच पाहिजे. शिवाय निवडणुका या काही दिवसांपुरत्याच असतात. त्यांची एकदा उत्तरपूजा झाली, की माझे नेहमीचे लेखन आहेच!! बाकी सत्ता कुणाची का येईना परंतू खान्ग्रेस आणि कास्टवादीची यायला नको. सेना किंवा भाजप यांच्यापैकी कुणाची जरी सत्ता आली तरीही मला सारखाच आनंद होईल. उलट सेना व भाजप या दोघांपैकी एक पक्ष सत्ताधारी आणि दुसरा विपक्ष झाला तर माझा आनंद द्विगुणितच होईल. हो, राज्यात सत्ताधारी आणि विपक्ष दोघेही हिंदुत्ववादी असतील, तर दुग्धशर्करा योगच नव्हे काय? तेव्हा उद्या होऊ घातलेल्या प्रत्यक्ष रणसंग्रामासाठी दोन्हीही पक्षांना मन:पूर्वक शुभेच्छा!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच लेखकाची व्याख्याने डाऊनलोड करून ऐकण्या/आयोजिण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

    image

  • तुम्हाला पुरोगामी व्हायचंय का? सोप्पं आहे!!

    हल्लीच्या जगात ‘श्वास घेण्या’पेक्षाही सोपी गोष्ट कोणती झालीये माहितीये? ‘पुरोगामी होणे’!! त्यासाठी काय करायचं? काहीच नाही, जाणून-बुजून सातत्याने हिंदूंना अपमानास्पद वाटेल असं वागत राहायचं, की ठरलातच तुम्ही पुरोगामी! मग यात सरळसरळ तुमचा ढोंगीपणा दिसला तरीही चालेल. कारण तुम्हाला काहीच करावं लागत नाही. हे मूर्ख हिंदूच ‘तुमचा ढोंगीपणा हा कसा तुमचा ढोंगीपणा नसून प्रामाणिकपणा आहे’ हे जीवाच्या आकांताने सांगायला पुढे येतात. अहो उलट तुम्ही जितका जास्त ढोंगीपणा कराल तितकी वरची पुरोगामी श्रेणी मिळेल तुम्हाला. म्हणजे थोडासा ढोंगीपणा केला की – ‘विवेकवादी’, त्याहून अधिक केला की – ‘पुरोगामी’आणि आणि ढोंगीपणाची कमाल मर्यादा गाठली की – ‘भारतीय सेक्युलर’!! आणि हे सारं अगदी सोप्पं असतं बरं का. काय करायचं – समजा कुणा गुंडांच्या जमावाने एखादा अहिंदू तरुण मारला (मग कारण काही का असेना!), तर या कृत्याचा आपल्या घरातील कुणी माणूस गेल्यागत निषेध करायचा. आणि म्हणायचं — “हिंदू दहशतवाद्यांच्या जमावाने अमुक धर्माच्या अहिंदूचा निर्घृण खून केला”. परंतू याच्या नेमकं उलट घडलं तर मात्र म्हणायचं – “समाजकंटकांच्या एका जमावानं तरुणाची हत्या केली”. लक्षात ठेवा, पुरोगामी ठरण्याचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम आहे, तो म्हणजे ‘अपराधी हिंदू नसेल तर त्याच्या धर्माचं कदापिही नाव घ्यायचं नाही. अगदीच जघन्य अपराध असला तर मात्र हळूच अल्पसंख्याक म्हणून विषय संपवायचा’!! समजलं?

    तुम्हाला सर्वधर्मसमभाववादी व्हायचंय का? सोप्पं आहे! समजा एखाद्या हिंदू मुलीवर, तुम्ही कल्पनेतही कल्पना करू शकणार नाही इतका बीभत्स बलात्कार झाला, तिच्या शरीराची शक्य ती सारी विटंबना केली गेली, इतकेच नव्हे तर बळजबरी तिचे कुणा ‘शांतिप्रिय’ धर्मात धर्मपरिवर्तन केले गेले तर..? तर ‘अजिबात लक्ष द्यायचे नाही’!! सेक्युलॅरिझमचे भारतीय अवतार असल्या फालतू गोष्टीकडे लक्ष देत नसतात. तुम्हाला त्यासाठी फारसे प्रयत्नही करावे लागणार नाहीत बरं! कारण हिंदूंची मनं इतकी बधीर झालेली आहेत की, मुळात तेच या गोष्टीकडे लक्ष देणार नाहीत. अहो, जिथं बलात्कार आणि खून असे दुहेरी अपराध केलेला अपराधी केवळ अल्पवयीन (आणि अल्पसंख्य!) आहे एवढ्याच कारणापोटी किरकोळ शिक्षेवर सुटतो आणि लोकांना त्याचे काहीही वाटत नाही, तिथे बलात्कार आणि धर्मपरिवर्तनाच्या प्रकरणातली पीडीता जिवंत वाचलीये म्हटल्यावर कोण कश्याला मरायला या बातमीला महत्व देईल? त्यातूनही जर कुणी हा विषय काढायला गेलंच तर आपण आधी भरपूर आरडाओरडा करायचा आणि त्यानंतर ‘कुणा स्वयंपाक्याला त्यानेच बनवलेली पोळी नुसती दाखवणं (इथे रेटून ‘खाऊ घातली’ असं म्हणायचं बिनधास्त!) हा त्याच्या धर्मस्वातंत्र्यावर कसा घाला आहे आणि हाच एक कसा राष्ट्रीय महत्वाचा विषय आहे’ हे तारस्वरात ओरडून सांगायचं! की झालातच तुम्ही सर्वधर्मसमभाववादी!! अभिनंदन!

    तुम्हाला ‘सामाजिक बांधिलकीचा पुरोगामी सर्वधर्मसमभाववादी’ व्हायचंय का? नाव थोडं मोठं आहे, पण होणं फार सोप्पं आहे. काहीही खास करायचं नाही. फक्त ‘दैनिक भास्कर’चा आदर्श डोळ्यापुढं ठेवून वागायचं. अहो खरंच! ‘दैनिक भास्कर’ काय करतंय — सध्या रक्षाबंधन आलाय ना, म्हणून ते मुलींसाठी मोहीम चालवतायत – “मी राखी बांधणार नाही”. का? अहो मुलींवर बलात्कार नाही का होत? मग जगातल्या सगळ्याच पुरुषांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायला मुलींना प्रोत्साहन द्यायचं आणि राखी बांधणार नाही असं सांगायचं. मग भलेही तुमचा भाऊ साक्षात रामाचा अवतार का असेना. नाही म्हणजे नाही म्हणजे नाहीच. याचे दोन फायदे होतात. एकतर तुम्ही ‘साबांपुस’ होता आणि दुसरे म्हणजे आपोआपच तुम्ही ‘स्त्रीवादी’ही ठरता! आहे की नाही एका तिकीटात दोन खेळ!! हो मात्र एक काळजी घ्यायची बरं का. की हा असा खेळ फक्त हिंदूंच्याच सणांच्या बाबतीत करायचा. अन्यधर्मीयांच्या बाबतीत चुकूनही नाही. अन्यथा जीवावर बेतू शकतं तुमच्या!! जरा जपून! हे हिंदू मात्र मूर्ख असतात. ते नुसतं हे धार्मिक अतिक्रमण सहनच करत नाहीत, तर उलट आधूनिकतेच्या नावाखाली तुम्हाला पाठिंबा पण देतात. द्या टाळी! आणि त्यातूनही कुणी समजा विचारलंच की, “का हो, रक्षाबंधनच का? स्त्रीजातीवर बलात्कार होतात तर ‘मी आजपासून व्हॅलेंटाईन-डे साजरा करणार नाही’, असं का म्हणू नये”? तर त्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. तोंडात पुरोगामित्वाच्या शेणाची गुळणी धरून गप्प राहायचं. तुमचं काम हिंदूच करतील. नाही त्या प्रश्नकर्त्यास प्रतिगामी-प्रतिगामी म्हणून त्याचं जगणं दुष्कर करून टाकलं त्यांनी, तर नाव लावणार नाही! आणि हे ‘दैनिक भास्कर’ केवळ उदाहरण झालं हो. तुम्ही या गोष्टीची आपल्याला हवी ती आवृत्ती काढू शकता. फक्त एक सूत्र लक्षात ठेवायचं — “हिंदूंचा कोणताही सण आला रे आला, की काही ना काही कारण काढून पुरोगामित्वाच्या नावाखाली त्याला विरोध करत राहायचं”. बास! अन्यधर्मीयांच्या सणांमध्ये डोकावायला जायचं नाही. त्यांना धार्मिक स्वातंत्र्य असतं ना! मग? एवढं पाळायचं फक्त. की झालातच तुम्ही ‘साबांपुस’!!

    तुम्हाला कलाप्रेमी पुरोगामी व्हायचंय का? मग त्यासाठी तुम्हाला ‘आमिर खानचा फॅन’ व्हावं लागेल. म्हणजे काय करायचं? एकतर त्याच्या चित्रपटांना कम्पल्सरी चांगलंच म्हणायचं. दुसरं म्हणजे त्या चित्रपटांमध्ये तो जे करतो त्याला अभिनय आणि सदरच्या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी तो जे काही चाळे करेल (ते किती का सवंग आणि प्रसंगी उचलेगिरी का असेना!) त्याला ‘हट के मार्केटिंग’ म्हणायचं. मग भलेही तो अभिनयाच्या बाबतीत कमल हासन, चियान विक्रम, नाना पाटेकर, धनुष, सूर्या शिवकुमार, प्रकाश राज, प्रसेनजित चटर्जी या सगळ्यांपुढे ‘बच्चा’ का असेना! भलेही उपरोक्त यादीपैकी जवळजवळ सगळेच राष्ट्रपती पारितोषिकासारख्या सर्वोच्च सन्मानाने अनेकवार गौरविलेले का असेनात. अश्यावेळी बिनधास्त म्हणायचं – “हे पुरस्कार सगळे विकत घेतलेले असतात हो. आमिरवर कायमच अन्याय होतो. शिवाय पुरस्कार काही अभिनयाचा मापदंड असतो का” वगैरे वगैरे..! थोडक्यात तो पडद्यावर जो अभिनयाचा अभिनय करतो, त्याला अभिनय म्हणायचं! याबाबतीत प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीनिवडीमुळे जरासा मतभेद होऊ शकतो म्हणा. त्यामुळे इथपर्यंत तुम्हाला कुणीही काही म्हणणार नाही. मात्र याखेरीज तो पडद्याबाहेर जे जे म्हणून काही करेल, त्याला ‘सामाजिक बांधिलकी’च म्हणायचं. याहून कमी काही म्हणायचंच नाही. चांगलं’च’ म्हणायचं. मग तो ‘सत्यमेव जयते’च्या नावाखाली केलेला निम्न दर्जाचा खोटारडेपणा असो वा अण्णा हजारे आणि त्यांचे सहकारी उपाशीपोटी उपोषणाला बसले असताना त्याच ठिकाणी याचा रोजा सोडण्याचा अट्टाहास असो वा आपला चित्रपट प्रदर्शित होत असतानाच बरोब्बर वेळ साधून ‘नर्मदा बचाव’वाल्यांना दिलेला पाठिंबा असो वा चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या नावाखाली त्याने केलेला नंगानाच असो! चांगलं’च’ म्हणायचं! आणि हो, त्याचा आगामी चित्रपट ‘साधूसंतांच्या तथाकथित ढोंगीपणावर’ आधारित आहे. मग तर काय सगळ्या सेक्युलर पुरोगाम्यांना मेजवानीच! तेव्हा ही संधी साधायची आणि कलाप्रेमी पुरोगामी व्हायचं. अर्थात अगदी आमिर खान नको असेल तर मात्र तुम्ही आपापल्या वकूबाप्रमाणे शाहरुख खान, महेश भट, शबाना आझमी इ. नाही पाठिंबा देऊ शकता. तो तुमचा निर्णय!

    उपरोक्त उपायांखेरीजही पुरोगामी होण्याचे इतर हजारो उपाय आहेत बरं का. पण ते नंतर कधीतरी. तूर्त सुरुवात करण्यासाठी हे सोप्पे सोप्पे उपाय बहुमूल्य आहेत! तर म्हणून मी म्हणत होतो की, हल्लीच्या जगात ‘श्वास घेण्या’पेक्षाही ‘पुरोगामी होणं’ जास्त सोप्पं झालंय. तेव्हा अशी शतकानुशतकांतून एकदाच येणारी सुवर्णसंधी का म्हणून दवडायची? संधीसाधू होऊन संधी साधूयात आणि तुम्ही-आम्ही-आपण सारे पुरोगामी होऊयात. देव-देश-धर्म जाऊ द्या खड्ड्यात! बोला, पुरोगामित्वाचा..?

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

    image

  • सेक्युलरी गौडबंगाल : एक चिंतन

    सेक्युलरी गौडबंगाल : एक चिंतन

    आपल्या बऱ्याच मित्रांना स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणवून घ्यायची खाज असते. कारण काय, तर म्हणे भारत हा एक सेक्युलर देश आहे. या ‘सेक्युलर’ शब्दाचे उपद्रवमूल्य समजल्यामुळे हा शब्द एखाद्या शिवीसारखा वापरणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. पण या सेक्युलर-भक्तांना आणि विरोधकांनाही एक गोष्ट अजिबात ठाऊक नसते की, भारतात हे सेक्युलरी गौडबंगाल आलं कधी?

    तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल मित्रहो, परंतू हा ‘सेक्युलर’ शब्द भारताच्या संविधानात ४२व्या घटनादुरुस्तीअन्वये घुसडण्यात आला! मी मुद्दामच ‘घुसडण्यात आला’ असे म्हणतोय, कारण भारतात ढोबळमानाने १९७५ ते १९७७ आणीबाणी होती आणि ही उपरोक्त घटनादुरुस्ती झाली आहे १९७६ साली! तेव्हा हा ‘सेक्युलर’ शब्द घटनेत कुणी टाकला असेल, काय हेतूने टाकला असेल, आणि किती मोकळ्या वातावरणात टाकला असेल; हे वेगळे सांगायलाच नको! म्हणजे थोडक्यात, घटना अस्तित्वात आल्यापासून सुमारे पाव-शतक या ‘सेक्युलर’ देशाच्या घटनेत ‘सेक्युलर’ हा शब्दच नव्हता आणि तरीही हा देश ‘सेक्युलर’ होता!!

    अजून एक गंमत सांगतो. भारतात आज अस्तित्वात असलेला कोणताही कायदा उघडून पाहा. त्यात धारा (सेक्शन) क्र. २ हा नेहमीच व्याख्या-विभाग (डेफिनिशन क्लॉज) असतो. अगदी संविधानातसुद्धा! या व्याख्याविभागात त्या-त्या कायद्यात आलेल्या सर्वच पारिभाषिक शब्दांची त्या-त्या कायद्याला अभिप्रेत असणारी व्याख्या केलेली असते. आणि त्या-त्या कायद्यात तो-तो शब्द केवळ त्याच आणि त्याच अर्थाने वापरला जातो, अन्य नाही! आपल्या देशाच्या संविधानाचा गाभा हा त्याच्या प्रस्तावनेत (प्रिऍम्बल) आहे. हा ‘सेक्युलर’ शब्ददेखील त्याच प्रस्तावनेत येतो, परंतू तुम्हाला नवल वाटेल – व्याख्याविभाग तर सोडाच, परंतू संपूर्ण संविधानात कुठेही ‘सेक्युलर’ या शब्दाची व्याख्याच केलेली नाही! आता बोला!! आता व्याख्याच नाही म्हटल्यावर ‘आपला देश धर्मनिरपेक्ष, की निधर्मी’ असे प्रश्न उभे राहाणे साहाजिकच आहे ना!

    तेव्हा आपले जे कोणी मित्र स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेण्यात धन्यता मानत असतील, त्यांनी एक गोष्ट पक्की समजून असावे की ते स्वत:स एक अव्याख्यित आणि प्रसंग व राजकीय सोयीनुसार सातत्याने बदलणाऱ्या अर्थाची बिरुदावली चिकटवताहेत! कारण संविधानात या शब्दाची व्याख्याच नसल्यामुळे प्रत्येकवेळी व्याख्येसाठी बाह्य साधनांवरच अवलंबून राहाणे भाग आहे. आणि अमुकच ठिकाणी केलेली व्याख्या अधिकृत असादेखील काही नियम नसल्याने प्रसंगानुसार अथवा व्याख्या करणाऱ्या न्यायसंस्थेनुसार ही व्याख्या सतत बदलत राहाणेही साहजिकच आहे! मग ती अगदी ‘निधर्मी’ पासून ते ‘धर्मनिरपेक्ष’ पर्यंत काहीही होऊ शकते. आणि त्या-त्या प्रमाणे आपल्या या सेक्युलरांध मित्रांचे वैचारिक अस्तित्वही बदलत जाते! आहे की नाही गंमत!

    खरं तर आपल्या देशात अधूनमधून जे विचित्र प्रवाह वाहातात, त्याचे मूळ हे या ‘सेक्युलर’नामक अव्यक्त शब्दास अवास्तव महत्व देण्यात आहे! या शब्दाचा आपल्याकडे नेहमीच राजकीय स्वार्थाच्या अनुषंगाने अन्वयार्थ लावला जातो, हे एक उघड गुपित आहे! त्यामुळेच रझा अकादमीसारख्या संस्थेवर बंदी घातलीच जात नाही, मात्र ‘हिंदूराष्ट्र सेना’ या अद्यापि आरोप सिद्धदेखील न झालेल्या संघटनेवर बंदी घालण्याची भाषा बोलली जाते. आसारामबापूंवर टिकेचे भलेमोठे सत्र चालते परंतू त्याचप्रकारचा आणि तितकाच गंभीर गुन्हा केलेल्या पॉल दिनाकरनबद्दल कुणालाच चकार शब्दही काढावासा वाटत नाही! ‘मोस्ट वॉण्टेड’ अबू सालेम तुरुंगातच एखाद्या मल्लासारखी शरीरयष्टी कमावतो मात्र अद्यापपावेतो आरोपपत्रही दाखल न झालेले स्वामी असीमानंद आणि साध्वी प्रज्ञासिंहजी तुरुंगात नरकयातना भोगतात! मालेगावच्या तरुणांना पुराव्याअभावी निर्दोष सोडले जाते आणि नंतर देशाचे तत्कालीन गृहमंत्री असलेले एक पूर्व-सांसद पोलिसांना खुशाल ‘मुसलमानांना हात लावाल तर खबरदार’ अशी सरसकट धार्मिक भेदभाव करणारी धमकी देऊन टाकतात! काही धर्माने हिंदू असलेल्या गुंडांनी पुण्यातल्या त्या मुसलमान तरुणाला मारले, तर ते हिंदूंनी मुसलमानाला मारणे ठरते, मात्र त्याच काळात मुसलमानांनी त्या निखिल तिकोनेवर केलेला जीवघेणा हल्ला केवळ ‘माथेफिरू जमावाने’ केलेला हल्ला ठरतो. धनंजय देसाईंची पुण्यातल्या प्रकरणाबाबत चौकशी करावी हीच पहिली जबाबदारी असताना त्याचा छडा लावण्याआधीच आपल्या अतिहुशार आणि पराकोटीच्या कार्यकुशल गृहमंत्र्यांना त्यांची दाभोळकर-प्रकरणातही चौकशी करायचा मोह होतो, तो कश्याच्या आधारावर? सर्वोच्च न्यायालयाने शाहबानो प्रकरणात दिलेला निकाल तत्कालीन सरकारला का डावलावासा वाटतो? दहशतवादाचा रंग ठरवताना हटकून फक्त भगवा रंगच का आठवतो – जेव्हा की लोकांना बरोब्बर माहिती आहे सबंध जगात कोण दहशतवाद माजवतंय! आणि या सगळ्यावर कडी म्हणजे धार्मिक आणि जातीय अभिनिवेश चुचकारणारे आपल्याकडे ‘सर्वसमावेशक’ ठरतात, तर देशाच्या सर्व नागरिकांना समान पातळीवर ठेवून ‘समान नागरी कायदा’ लागू करा म्हणणारे मात्र ‘सांप्रदायिक’ ठरतात! या सगळ्या गमती-जमतींची उत्तरं ही ‘सेक्युलर’ शब्दाच्या भारतीय आवृत्तीत दडलेली आहेत!

    असे हे ‘सेक्युलर’ नावाचे गौडबंगाल आहे. आणि आगामी काळात हे गौडबंगाल कितपत चालवून घ्यायचे हे आपण ठरवायचे आहे. ‘तथाकथित अल्पसंख्याकांना (जे आता अजिबातच अल्पसंख्य नाहीत) गोंजारायचे, सहस्रावधी वर्षांपासून हा देश ज्यांनी सुजलाम-सुफलाम केला त्या बहुसंख्याकांना लाथाडायचे आणि आपलेच वर्चस्व कसे कायम राहील एवढेच पाहायचे’ एवढाच सांप्रतच्या राजकीय परिस्थितीत ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ होऊन बसलाय. आणि तो अर्थ आजचा नाही तर पार खिलाफतवाल्या बांडगुळांना कुरवाळणाऱ्या अहिंसेच्या बेगडी पुजाऱ्यापासून चालत आलाय. या प्रकाराला भुलून मतं देण्याचा मूर्खपणा आता थांबवायला हवा आपण, मग तो कोणता का राजकीय पक्ष असेना! या अश्याप्रकारचा ‘सेक्युलर’ असण्यावर मतं मिळत नाहीत, हे दिसले की कित्येक ‘जाणत्या राजां’चा आणि त्यांच्या ‘हुजऱ्यां’चा सूरही कसा बदलेल पाहाच! अश्या वेळी त्यांनाही सर्वात आधी बहुसंख्यकांचाच विचार करावा लागतो की नाही हेही पाहाच! तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘सेक्युलर’ असण्याच्या भारतीय आवृत्तीचे पिढ्यानपिढ्या चालत आलेले गौडबंगाल संपेल!!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी व विविध विषयांवर लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी पाहा: www.vikramedke.com)

  • RIP नव्हे, ‘सद्गती’ म्हणा!!

    RIP नव्हे, ‘सद्गती’ म्हणा!!

    कुणी व्यक्ती गेली की सोशल मिडियावर श्रद्धांजलीचे सत्रच सुरू होते. त्यातही हल्ली आपल्या भावना एवढ्या काही स्वस्त झाल्या आहेत की, आपल्याला Rest In Peace एवढे ३ शब्दही टंकित करण्याची तसदी घ्यावीशी वाटत नाही, अथवा तितका वेळ नसतो. त्यामुळे मंडळी थोडक्यात RIP लिहून मोकळी होतात! याच RIP संदर्भात काही गोष्टी स्पष्ट करणे आवश्यक वाटते. पाहा पटतात का —

    १) RIP अर्थात Rest In Peace चा शब्दशः अर्थ होतो – ‘(शरीर) शांततेत आराम करो’. आपण तो शब्द इतक्या काही सहजपणे वापरतो की, त्याचा अर्थ तरी आपल्याला समजतो की नाही असा प्रश्न पडावा. ही मुळात ख्रिश्चन संकल्पना आहे मित्रांनो. त्यांच्यात शरीरालाच सारे महत्व दिले जाते. ते मानतात की, न्यायाच्या दिवशी परमेश्वर सर्वांना त्यांच्या थडग्यातून उठवून त्यांच्या पाप-पुण्याचा हिशोब करेल. तो दिवस कधी येईल, माहिती नाही. परंतू तोवर त्या शरीराला त्याच्या थडग्यात आराम मिळो, यासाठी म्हणतात Rest in Peace. आता यात सामान्य तर्कबुद्धीच्याही व्यक्तीला पडणारे प्रश्न असे की,

    अ) मृत्यूनंतर काही दिवसांतच शरीराचे विघटन होते. मग कोणत्या शरीराला पुन्हा उठवणार?
    ब) समजा सर्वशक्तिमान परमेश्वर जर कुठूनही शरीराची तत्त्वे गोळा करून ते निर्माण करणारच असेल, तर मग शरीर पुरायची गरज काय? हिंदू ज्याप्रमाणे शरीर जाळतात (ही प्रथा ग्रीकांनी आपल्याकडून जशीच्या तशी उचलली!) त्याप्रमाणे जाळल्यावरही परमेश्वर ते निर्माण करेलच की!
    क) शरीर खरोखरीच जर इतके गरजेचे असते, तर परमेश्वराने मुळात ते नष्टच का होऊ दिले असते?
    ड) झाडाझुडुपांमध्येही जीव असतो आणि त्यांचा तर अंतिमसंस्कारही होत नाही. मग हा परमेश्वरी न्यायाचा नियम त्यांनाही लागू आहे का?
    इ) या नियमानुसार डायनोसॉर्सचे नेमके काय झाले?

    ही प्रश्नांची यादी कितीही वाढवता येईल. तूर्त इतकेच सांगून थांबतो की, ही ख्रिश्चन संकल्पना नंतर मुसलमानांनीही जशीच्या तशी उचलली आणि कित्येक अडाणी हिंदूच नव्हेत तर कट्टर हिंदुत्ववादी मित्रही अर्थ समजून न घेता हीच पद्धत पुढे चालवित आहेत!

    २) हिंदू धर्म सांगतो —

    ‘वासांसि जीर्णानि यथा विहाय नवाणि गृह्णाति नरोऽपराणि ।
    तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवाणि देही ।।’
    (गीता, २/२२)
    अर्थात आपण ज्याप्रमाणे वस्त्रे जुनी झाल्यावर ती टाकून नवीन वस्त्रे घालतो, त्याचप्रमाणे शरीर जुने झाल्यावर देही (देह धारण करणारा – आत्मा) ते टाकून नवीन देह परिधान करतो!

    मृत्यूच्या प्रसंगी शरीरातून काहीतरी निघून जाते, हे वैज्ञानिक स्तरावर सारेच मान्य करतात. परंतू हिंदूंनी सहस्रावधी वर्षांपूर्वीच त्या संकल्पनेसाठी ‘देही’ असा शब्द योजून आपला द्रष्टेपणा दाखवून दिला आहे. आईन्स्टाईन ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सांगतो. त्याआधारे ऊर्जा नष्ट होत नाही, तर तिचे केवळ एका प्रकारातून दुसऱ्यात रुपांतर तेवढे होते. त्यालाच अनुसरून हा चैतन्यरूप देही एकदा निघून गेला की, तो दुसऱ्या प्रकारात रुपांतरीत व्हावयास हवा. परंतू शरीर धारण करणे हा त्याचा गुणधर्म असल्याने तो शरीरच धारण करतो! या संकल्पनेत आणखी एक संकल्पना मिसळली जाते ती म्हणजे पाप-पुण्य! ज्याच्या त्याच्या कर्मांनी देही नंतर कोणते शरीर धारण करणार हे ठरते. यात सर्वच सजीव सृष्टी येते – ८४ लक्ष योनी!! यात झाडाझुडपांसहीत सर्वच सजीव, सजीव असण्याचे आणि नियमबद्ध असण्याचे उत्तर मिळते!

    परंतू देहीचे जाणे आणि दुसरे शरीर धारण करणे यात जो काळ जातो, तो त्या देहीला त्याच्या पाप-पुण्याच्या हिशोबात भोगायचा असतो. पापाचे पारडे जड असेल, तर देही जास्त लांब जाऊ शकणार नाही. इथेच घुटमळत राहील – परंतू वाईट अवस्थेत. पुण्याचे पारडे जड असेल तरीही देही ते भोगून परत इथेच घुटमळेल! म्हणूनच हिंदू संस्कृती पाप आणि पुण्य दोन्हीही शून्यावर यावे यासाठी ‘निष्काम कर्मयोग’ सांगते! तरच देहीला घर्षणरहित गती प्राप्त होईल ना! तर थोडक्यात हा प्रवास आहे. यात आप्तजनांच्या आणि शुभचिंतकांच्या शुभेच्छांचा खूप मोठा वाटा आहे.

    पण आपण काय करतो? आपण त्या आत्म्याला शुभेच्छा देण्याऐवजी ‘चिरशांति लाभो’ म्हणतो आणि नकळतच त्याच्या प्रवासाला चाप लावतो! एखादी ऊर्जा प्रवासाला निघते आणि आपण मात्र आपल्या प्रार्थनेची कळ दाबून तिला स्तब्ध राहायला सांगतो! यावर जर कुणाचा विश्वासच नसेल, तर माझे काहीच म्हणणे नाही (मग अश्या परिस्थितीत काहीही – अगदी RIP म्हणण्याची तरी औपचारिकता कश्यासाठी दाखवायची मग उगाच?). परंतू जर तुम्ही स्वत:ला हिंदू म्हणवून घेत असाल तर तुमचे हे वागणे धर्माविरुद्ध तर आहेच, सोबत अनेक वैज्ञानिक सिद्धांतांच्याही विरुद्ध आहे.

    आता प्रश्न उभा राहील की, RIP नसेल म्हणायचे तर मग काय म्हणायचे? याचेही उत्तर आहे. हा केवळ दृष्टीकोनाचा फरक आहे मित्रांनो. पाश्चात्य लोक कुणाची आठवण काढल्या-काढल्या ती व्यक्ती समोर आली तर गमतीने म्हणतात – Think of the devil & devil is here याउलट आपण म्हणतो ‘शंभर वर्षं आयुष्य आहे तुम्हाला’!! आहे की नाही दृष्टीकोनाचा फरक! तद्वतच ‘चिरशांति लाभो’ ऐवजी आपल्याकडे म्हणतात “गतात्म्यास सद्गती लाभो” – May The Soul Attain Sadgati. याचेही लघुरुप करून AS असे म्हणता येईलच की! RIP पेक्षा छोटे आणि सोप्पे!!

    तर अशी ही सद्गतीची संकल्पना आणि दृष्टीकोन! ज्यांचा या कश्यावरच विश्वास नाही, परमेश्वर त्यांचे भले करो. मात्र ज्यांचा हिंदू धर्मावर आणि त्यातील वैज्ञानिकतेवर विश्वास आहे, ती मंडळी तरी याउप्पर RIP चा रिप-रिप पाऊस थांबवून ‘सद्गती लाभो’ (AS) असे सार्थपणे म्हणतील, अशी अपेक्षा!!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी व आपल्या परिसरांत अनेकानेक विषयांवर लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी क्लिक करा – www.vikramedke.com)

  • ब्राझीलच्या कार्निव्हलमध्ये शिवशंभो — एक नवी सुरुवात?

    भारत देश किती जरी दांभिक-धर्मनिरपेक्षतेच्या गाळात रुतत असला, तरीही शेष जग कसे हळुहळू परंतू निश्चितपणे हिंदू धर्म, संस्कृती आणि हिंदुत्वाकडे आकर्षित होते आहे, याची अनेक उदाहरणे मी सातत्याने देत असतो. मग तो लिसा मिलर या अमेरिकन विदुषीचा “We Are All Hindus Now” हा अमेरिकेचे हिंदुत्वाकडे वाढते आकर्षण साधार सांगणारा लेख असो (लिंक: http://www.thedailybeast.com/newsweek/2009/08/14/we-are-all-hindus-now.html) वा कोस्टारिका देशाने पाडलेले श्रीगणेशाचे सुंदर नाणे असो वा घाना या आफ्रिकन देशात प्रतिवर्षी वाढत जाणारा गणेशोत्सवाचा प्रभाव असो (लिंक: http://www.patheos.com/blogs/drishtikone/2013/09/hinduism-growing-in-africa-without-proselytizing/) वा अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये सातत्याने चर्चेसचे मंदिरांमध्ये होत असलेले रुपांतर असो (लिंक: http://vikramedke.com/blog/churches-chi-hotayat-mandire-chahul-badalatya-pravahachi/) वा कॅलिफोर्नियात साजरा होणारा हिंदू-मास असो (लिंक: http://www.hafsite.org/CA_Declares_Oct_Hindu_American_Month) वा अन्य काही!

    आजही मी असेच एक अगदी अलिकडचे उदाहरण सादर करतोय. रिओ-दि-जानेरोचा सांबा-महोत्सव (कार्निव्हल) अवघ्या जगात प्रसिद्ध आहे. “रिओ” या इंग्रजी चित्रपटातही त्याचे अतिशय मनोवेधक दर्शन सर्वांनी घेतले आहे! यावर्षीही (३ मार्च २०१४) तो अतिशय उत्साहाने साजरा होतोय. विविध सांबा-कलाकार आणि स्थानिक मंडळी या महोत्सवात अतिशय उत्साहाने सहभागी होत असतात. विविध मूर्त्या, आराशी यांची मिरवणुकीत रेलचेल असते! यावर्षीही या मिरवणुकीत अनेक प्रकारच्या आराशी होत्या. परंतू सर्वांचे लक्ष वेधून घेत होती ती ‘सल्गिरो सांबा स्कुल’च्या आराशीतील मूर्ती! तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ती होती देवाधिदेव महादेवांची अतिप्रचंड आकाराची मूर्ती! आहे की नाही गंमत.

    इथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, ब्राझील हा एक ख्रिश्चन देश आहे. किंबहुना ख्रिस्ताची अतिप्रचंड मूर्ती याच रिओ शहरात आहे. तेथील वार्षिक महोत्सवात शिवशंकरांची मूर्ती समाविष्ट करावीशी वाटणे, ही हिंदुत्वाच्या दृष्टीने निश्चितच अत्यंत आशादायी आणि सकारात्मक बाब आहे! इतर अनेक देशांप्रमाणे ब्राझीलनेही हिंदुत्वाचा सनातन मार्ग अनुसरण्याची ही केवळ सुरुवात आहे. तरीही प्रश्न उरतोच की, सबंध जग हळूहळू या मार्गावर चालू लागताना ही हिंदुत्वाची गंगोत्री मूळात जिथून उगम पावली तो हिंदुस्थान खोट्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा कधी उतरवणार? अन्यथा देव न करो, परंतू भविष्यात परिस्थिती अशी होईल की, जगभरात सर्वत्र हिंदूच हिंदू दिसतील परंतू हिंदुत्वाच्या पितृभूत मात्र हिंदू औषधालाही सापडणार नाही. हे होता उपयोगी नाही. शेवटी आपला वारसा जपणं आणि तो वाढवणं आपल्याच हाती आहे, हो ना?

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्याने ऐकण्यासाठी क्लिक करा:  www.vikramedke.com)

    image

  • अभिव्यक्तीस्वातंत्र्य असेही..!

    गिरीश कर्नाड ही व्यक्ती तर आपणा सर्वांना माहितीच असेल. ते लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत. अभिनेतेही आहेत. परंतू एवढीच एक ओळख नाहीये त्यांची. या सगळ्यासोबतच श्री. कर्नाड हे सेक्युलॅरिझमच्या भारतीय आवृत्तीचे मूर्तीमंत प्रतीकही आहेत! मग त्यासाठी ते विविध मंचांवरून हिंदूत्वविरोधी वक्तव्ये (बऱ्याचदा प्रसंग सोडून!! आठवा काही महिन्यांपूर्वी व्हि. एस. नायपॉल यांच्यावर त्यांनी केलेली टिका!) करीत असतात. मराठा साम्राज्याच्या शूर पेशव्यांना कित्येकदा पाठ दाखवून पळालेल्या जिहादी टिपूचे समर्थन करत असतात. त्यांना तुघलकही आवडतो म्हणे! मागील वर्षी तर या महानुभावांनी कमालच केली. जयपूरच्या साहित्य महोत्सवात त्यांनी भारतरत्न रवींद्रनाथ ठाकूरांचा उल्लेख “एक थर्डक्लास नाटककार” असा केला. त्यावरून बरेच वादळही उठले होते. कर्नाडांनी त्यावेळी स्वत:च्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे जोरदार समर्थनही केले होते!

    नुकताच या प्रकरणाचा उत्तरार्ध पार पडला. मात्र सुदैवाने म्हणा वा दुर्दैवाने, परंतू तो कर्नाडांसाठी फारसा आनंददायी नाहीये!

    बेंगरुळूच्या “रंगशंकरा”ने श्री. कर्नाड यांच्या नाट्यरचनांवर आधारित एका महोत्सवाचे आयोजन केले होते. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात काही चर्चासत्रे होणार होती, कर्नांडांच्या नाटकांचे प्रयोग होणार होते, इतकेच नव्हे तर कर्नाडांनी दिग्दर्शित केलेला चित्रपटही दाखवला जाणार होता. असा सगळा ‘कर्नाडमय’ प्रकारचा मोठ्ठा घाट घातलेला होता! या कार्यक्रमात २३ ऑक्टोबर रोजी पुदुच्चेरीच्या एका नाट्यसंस्थेने बसवलेले आणि कर्नाडांनी लिहिलेले “ड्रिम्स ऑफ टिपू सुलतान” नाटक सादर होणार होते. नाटक व्यवस्थित चालू असताना अखेरच्या १५ मिनिटांत मात्र गंमत घडली! मंचावर अचानक एका अतिरेक्याने प्रवेश केला आणि तो जोरजोराने भारतविरोधी घोषणा द्यायला लागला. पुदुच्चेरीच्या त्या दिग्दर्शकाने नाटकाचा अखेरचा प्रसंग बदललाय हे प्रेक्षकांच्या लक्षात येईपर्यंत, पात्रांपैकी एकाने त्या अतिरेक्याला मारल्याचा अभिनय केला. मग दुसऱ्याने त्याच्या चेहऱ्यावरील बुरखा बाजूला केला. मग त्यांच्यापैकी एकजण म्हणाला ‘अरे हे तर गिरीश कर्नाड’! आणखी एकजण म्हणाला, ‘कर्नाड मेले’! एकाने त्या अतिरेक्याच्या (की कर्नाडांच्या!) पात्राचे खिसे तपासले, तर त्यात काही कागद सापडले. मग एकाने ‘हे फालतू आहे’ असं म्हणून ते सारे कागद फेकून दिले!
    तोपर्यंत प्रेक्षकांमध्ये कुजबूज आणि चुळबूळ सुरू झालेली! काहींनी विरोध करत थेट रंगमंचावर धाव घेतली. कडाक्याचे भांडण होईल असे वाटत असतानाच ‘रंगशंकरा’च्या संचालिका आणि अभिनेत्री अरुंधती नाग मध्ये पडल्या आणि ‘कुणाला जर या खोडसाळपणाबद्दल दिग्दर्शकाला जाब विचारायचा असेल तर त्यांनी संध्याकाळी ७.३० च्या प्रयोगात थेट दिग्दर्शकालाच विचारावं’ असं सांगितलं.

    संध्याकाळच्या प्रयोगातही हाच प्रकार! परत गोंधळ सुरू झाला तेव्हा दिग्दर्शक कुमार वल्लवन स्वत:च मंचावर आले आणि त्यांनी सांगितले की, “एवढा गोंधळ घालायला काय झालं? मंचावर उभे राहून दुसऱ्या नाटककाराचा अपमान करणे तर आम्ही श्री. कर्नाडांकडूनच शिकलो आहोत! त्यांनीही नाही का रवींद्रनाथांचा अगदी असाच अपमान केला? त्या घटनेचा जर आम्ही असा प्रतिकात्मक निषेध करतोय तर काय चुकलं? रवींद्रनाथांना थर्डक्लास नाटककार म्हणणे हे जर कर्नाडांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य असेल, तर त्याचा असा निषेध करणे हे आमचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नव्हे काय”!!

    यानंतर काय झाले हे समजू शकलेले नाही, परंतू कर्नाडांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य त्यांच्याच महोत्सवात त्यांच्यावरच उलटले हे नक्की. बाकी त्यांचे दात घश्यात गेले किंवा काय हे कर्नाडच जाणे!!
    (‘इंडियाफॅक्ट्स’मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीच्या आधारे.
    मूळ बातमीची लिंक – http://www.indiafacts.co.in/girish-karnad-medicine/)

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या – www.vikramedke.com)

    image

  • चर्चेसची होताहेत मंदिरे : चाहूल बदलत्या प्रवाहाची

    मी माझ्या व्याख्यानांतून आणि लेखनातून एक गोष्ट कायम मांडत असतो की, हिंदूंनी जर दांभिक-धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुतेची सद्गुणविकृती सोडली नाही, तर लवकरच जगभरात सर्वत्र हिंदुच हिंदू दिसतील परंतू सनातनच्या उगमस्थानी भारतात मात्र औषधालाही हिंदू सापडणार नाहीत. एकीकडे भारतातील सामान्य हिंदू आधुनिकतेच्या खोट्या कल्पनांपायी आपल्या समृद्ध धर्म आणि संस्कृतीपासून दूर जात असताना उरलेले जग (त्यातही विशेषत्वाने पाश्चात्य देश!) हळूहळू का होईना परंतू हिंदू संस्कृती अंगिकारत आहे. एवढेच नव्हे तर तिथे हिंदू धर्माचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतोच आहे.
    हा मुद्दा मी पूर्वीदेखील फेसबुकवर आणि अन्यत्र मांडला आहे. त्यासाठी वेळोवेळी प्रसंगोपात उदाहरणेही दिली आहेत. मग तो श्रीमती लिसा मिलर या अमेरिकन विदुषीचा We Are Hindus Now हा “The Newsweek”मध्ये (सध्याचे “Daily Beast”) प्रकाशित झालेला लेख असो, वेगवेगळ्या देशांनी हिंदू देवीदेवतांची नाणी पाडण्याचे प्रसंग असो, कॅलिफोर्नियात साजरा होणारा हिंदू मास असो, घाना या आफ्रिकन देशातील स्थानिक आफ्रिकन रहिवाश्यांमध्ये वाढत जाणारा गणेशोत्सवाचा प्रभाव असो, वा अन्य काही! आज असेच अजून एक उदाहरण मी आपल्यासमोर मांडणार आहे.
    दिनांक २९ जुन २०१२ रोजी Times Of India मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. तिचे शीर्षक आहे, “Churches are turning into temples in UK and US!” बातमीत लिहिलेय की, इंग्लंड आणि अमेरिकेत अनेकानेक एकरांत पसरलेल्या जुन्या चर्चेसचे रुपांतर हिंदू मंदिरांमध्ये होतेय. अनेक हिंदू संघटना अशी जुनी चर्चेस लक्षावधी डॉलर्सना विकत घेऊन, त्यांचे नुतनीकरण करून, हिंदू मंदिरे बनवत आहेत. यासाठी बातमीत अनेक उदाहरणेही देण्यात आली आहेत. श्रीस्वामीनारायण मंदिर संस्थानने सुमारे वर्षभरापूर्वी अनेक एकरांत पसरलेले ८० वर्ष जुने चर्च सुमारे १० लक्ष ३० सहस्र डॉलर्सना विकत घेतले व त्याचे मंदिरात रुपांतर केलेय. नुकतेच त्यांनी टोरोंटो (कॅनडा) येथील एक १२१ वर्ष जुने ऐतिहासिक चर्च सुमारे १० लक्ष ६० सहस्र डॉलर्सना विकत घेतले असून त्याच्याही मंदिरीकरणाचे काम जोरात सुरु आहे. बातमीनुसार अशी किमान पाच तरी चर्चेस आत्तापर्यंत मंदिरीकरणासाठी विकत घेण्यात आली आहेत! नुकतेच डल्लास (टेक्सास) येथील एक ४० वर्षे जुने चर्चदेखील याच उद्देशाने सुमारे ७ लक्ष डॉलर्स खर्चून विकत घेण्यात आले आहे. बातमीनुसार या सर्व खरेदीसाठी पैसा पुरवणारे लोक हे मुख्यतः विदेशांत स्थायिक झालेले गुजराती भाविक आहेत आणि अशी मंदिरे बांधली जावीत यासाठी ते वाट्टेल तेवढा पैसा मोजायला तयार आहेत.
    या सगळ्याची सुरुवात १९८२ साली इंग्लंडमध्ये झाली. तेथील “सेण्ट निनीयन” हे जवळपास २.५ एकरांत पसरलेले चर्च सुमारे २ लक्ष पाउंड्स खर्चून विकत घेण्यात आले व त्याचे रुपांतर मंदिरात केले गेले. १९९८ साली बोल्टनमध्येही असेच एक ७० वर्षे जुने चर्च विकत घेऊन त्याचे मंदिर केले गेले. विशेष म्हणजे यांपैकी बहुतेक चर्चेसचे नक्षीकाम व त्यांवरील येशू ख्रिस्त आणि माता मेरी आदींची चित्रे ऐतिहासिक ठेवा असल्याने जसेच्या तसेच ठेवण्यात आले आहेत. या सर्व नवमंदिरांना केवळ हिंदुच नव्हे तर, परिसरातील सर्वच धर्मांचे भाविक भेट देतात.
    धर्म ही किती जरी आध्यात्मिक आणि वैयक्तिक बाब असली तरीही वास्तव जगात केवळ मागणी असलेल्या गोष्टींचाच पुरवठा केला जातो. आणि ज्याअर्थी अमेरिका आणि युरोपात एवढा प्रचंड पैसा खर्चून चर्चेसचे रुपांतर मंदिरांत केले जातेय, त्याअर्थी तिकडे कश्याचा अस्त आणि कश्याचा उदय होतोय, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही; असे मला वाटते! सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी पाश्चात्य जगतात लावलेला हिंदू धर्माचा वेलू गगनावरी गेला आहे, वरवरच जातोय! परंतू या वेलूचे भारतवर्षात असलेले बीज भारतीय हिंदूंच्या सद्गुणविकृतीमुळे नासणार तर नाही ना, अशी सार्थ भीतीही वाटतेय! स्वामी विवेकानंद भारतातील हिंदूंना “अमृतपुत्र” अश्या उपाधीने गौरवित असत. त्या अमृतत्त्वाची जाणीव मात्र येथील हिंदूंना कधी होईल, न कळे! ज्यांच्या जीवनशैलीची भ्रष्ट नक्कल करण्यात येथील आधुनिक समाज गुंतलाय, तीच मंडळी आज आपण प्रतिगामी म्हणून त्यागलेल्या सनातन जीवनशैलीकडे आशेने पाहातायत. अंगिकारतायत. हे सत्य आम्हांला उमगेल तो सुदिन! पाश्चात्यांकडून एखादी गोष्ट आल्यास तिचा डोळे झाकून स्वीकार करण्यात आम्ही पटाईत आहोत – भविष्यात हिंदू धर्म आणि त्याची महती पाश्चात्यांकडूनच समजावून घेण्याची वेळ आपल्यावर आल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये! आणि तसे झाले तर मात्र नक्कल करण्यात पटाईत असलेले एतद्देशीय दांभिक-धर्मनिरपेक्ष त्याच हिंदू धर्माला फॅशन स्टेटमेंट समजून डोक्यावर घेत नाचतील, हेही तितकेच खरे! अजूनही वेळ गेलेली नाहीये – हिंदू धर्म स्वत:हूनच समजून घ्या, आचरणात आणा – अभिमान बाळगा या दैवी परंपरेचा – येणारा काळ आपलाच आहे!

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी अथवा विविध क्रांतिकारक-महापुरुष आणि हिंदू संस्कृतीवर लेखकाचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी संपर्क करा: www.vikramedke.com)

  • श्रीगणेश विज्ञान

    श्रीगणेश विज्ञान

    श्रीगणेश विज्ञान

    shri ganesh

    खूप दिवसांपासून या विषयावर लिहायचे मनात होते. आजचा मुहूर्त अगदी योग्य आहे.
    श्रीगणेश-जन्माची कथा आपणा सर्वांना माहितीच आहे. तरीही संदर्भासाठी थोडक्यात देतो.
    “पार्वतीने आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार केली. त्यात प्राण फुंकून त्याला स्वत:चा मुलगाच मानले. पुढे या मुलाचे शिर श्रीशंकराच्या हातून उडवले जाते. पार्वतीचा विलाप पाहून शिवशंकर एखाद्या दुसर्या बालकाचे शिर आणण्याची आज्ञा …देतात. शिवगण चुकून एका हत्तीच्या पिल्लाचे शिर घेऊन येतात. मानवी शिर शोधण्याइतका वेळ उरला नसल्याने अखेरीस तेच शिर लावले जाते, आणि अश्याप्रकारे गणेशाचा जन्म होतो.”
    आता या कथेत खालील गोष्टी महत्वाच्या आहेत.

    १) देवी पार्वती आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार करतात. ही मूर्ती सजीव होते.

    २) कोणतेच दुसरे शिर न मिळाल्याने शिवगण एका हत्तीच्या पिल्लाचे शिर आणतात. अखेरीस तेच शिर लावले जाते.

    आता या कथेकडे व्यवस्थित पाहिल्यास कळते की ही कथा म्हणजे “क्लोनिंग” आणि “अवयावारोपण” करण्याचा जगातील पहिला प्रयोग असू शकतो. कसे ते पहा. पार्वती आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार करते, जी सजीव होते. जीवशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास, आपण जेव्हा एक साधी चुटकी वाजवतो, तेव्हाही सहस्रावधी पेशी शरीरापासून विलग होतात. पार्वतीने जाणून-बुजून अंगावरील मळ खरवडला होता. तिला जिवंत उति (tissues) मिळवावयाच्या असाव्यात ही शक्यता नाकारता येत नाही. तात्विक दृष्ट्या हे सहज-शक्य आहे. तसेच शंकराने गणेशाचे शिर उडवल्यावर घाईने दुसरे शिर हवे असते, कारण त्या बालकाचा प्राण गेला होता पण मध्ये फार काळ गेला नसल्याने “वैद्यकीय मृत्यू (Clinical Death)” झाला नसावा. शिवगणांनी वेंधळेपणा केल्यावर पुन्हा मानवी शिर शोधण्यात आणखी कालापव्यय झाला असता. म्हणून हत्तीचेच शिर बसवले गेले. हा तत्कालीन अवयावारोपणाचा प्रकार असण्यात अशक्य काय आहे? आजही विज्ञान मानवी अवयवांचे रोपण करू शकते. अजून थोडी प्रगती झाल्यावर प्राण्यांच्या अवयवांचे रोपण होऊ शकेलच ना? म्हणजे ही देखील गोष्ट तात्विक-दृष्ट्या अशक्य नाही.

    आता हे सगळे वाचल्यावर काही लोक एक ठेवणीतला प्रश्न विचारतील, “एवढी प्रगती इतक्या प्राचीन काळी झाली असणे कसे शक्य आहे?” त्यांना मी विचारतो की, का अशक्य आहे? केवळ काळ फार प्राचीन आहे, हे काही कारण नाही होऊ शकत. या प्रश्नकर्त्या मंडळींचे खरे दुखणे काय असते माहितीय का? ते आहे “न्यूनगंड”. हो, न्यूनगंड. एखादी गोष्ट हिंदू म्हणजेच भारतीय म्हटली की ती वाईटच असली पाहिजे, हा तो न्यूनगंड होय. हीच गोष्ट जर कुणा युरोपीय अथवा अमेरिकन संशोधकाने (विशेषत: बायबलमध्ये) शोधली असती तर मात्र आम्ही ती मानानार्यांत अग्रभागी असलो असतो! कारण “साहेबं वाक्यं प्रमाणं!” आपण गोऱ्या कातडीच्या मानसिक गुलामीतून बाहेर यायला आजही तयार नाही हेच खरे! बरे, हिंदू संस्कृती आणि धर्म हा जगात सर्वाधिक विज्ञान-निष्ठ असल्याचे हिंदू सोडून जगातील सगळ्याच संशोधकांचे मत आहे. पण आमचा न्यूनगंड आणि आपसातील भांडण मात्र आपल्याला हे सत्य स्वीकारण्यापासून रोखतेय!
    हिंदूंच्या विज्ञान-निष्ठेचे आजवर शेकडो पुरावे सापडले आहेत, पण ज्यांनी झोपेचे सोंग घेतलेय त्यांच्या नजरेला ही गोष्ट कशी पडणार? त्यांना मुळात आपले वेद-पुराणे हेच खोटे वाटतात. चला, क्षणभर वादासाठी तेही गृहीत धरू. आता पुन्हा वरील कथा पहा. याही परिस्थितीत वरील कथा पाहिल्यास ती वैद्यकीय-दृष्ट्या १००% योग्य असल्याचेच आढळेल! मग निदान व्यासांनी “विज्ञान-कथा” लिहिली एवढे तरी मान्य कराल? आणि कुठेतरी या गोष्टी खरोखर असल्याशिवाय इतकी “सुयोग्य” विज्ञान-कथा तरी कशी सुचेल? या कथेपेक्षाही कितीतरी प्राचीन काळात “ऋभू” नावाच्या ३ बंधूंनी विविध शस्त्रक्रिया केल्याचे पुरावे ऋग्वेदात आहेत. “चरक” हा “सर्जन” शस्त्रक्रियेपूर्वी आपली हत्यारे उकळून घेत असल्याचे त्यानेच लिहून ठेवलेय. याचा अर्थ त्याला इतक्या प्राचीन काळातही सूक्ष्मजीवांचे ज्ञान होते असाच होतो ना? विमान बनवण्याची प्राचीन भारतीय विधी मीच पूर्वी प्रसिद्ध केली होती. राजा भोज याच्या “समरांगण सूत्रधार” नामक ग्रंथात तर “यंत्रमानव” बनविण्याचीही विधी दिलीय. मग इतके सगळे विज्ञान असणार्या संस्कृतीत मी म्हणतो त्याच प्रमाणे गणेश-जन्म झाला नसेल कशावरून? पहा, विचार करा. “सूज्ञांना” पटेल.
    “गणपती बाप्पा मोरया”
    सर्व “सूज्ञांना” गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि “अज्ञांसाठी” बुद्धिदात्या गणेशाकडून बुद्धीची मागणी!

    आपलाच,
    – © विक्रम श्रीराम एडके.