Category: TV

  • दक्षिणपंथी – यातिसई

    दक्षिणपंथी – यातिसई

    तमिळकम् ची तीन घराणी. पांड्य, चोळ आणि चेर. यांच्यापैकी पांड्य घराण्यातील सुप्रसिद्ध राजा म्हणजे कोचडय्यान रणधीरन्! सुप्रसिद्ध असं मी म्हणतो, प्रत्यक्षात या लोकांना आपल्याकडच्या विचारवंत म्हणवणाऱ्यांनी एकेका परिच्छेदात गुंडाळून आपल्या आवडीच्या आक्रमकांचा उदोउदो केल्याचं आपल्याला ठाऊकच आहे. तर हा कोचडय्यान रणधीरन्. रणधीरन् त्याचं नाव. को म्हणजे राजा. चडय्यान म्हणजे आयाळ. आयाळ असलेला राजा तो कोचडय्यान! या रणधीरनने चेर, चोळ वगैरे अनेकांचा पराभव केला व स्वतः सार्वभौम झाला. त्यामुळे अर्थातच त्याच्याबद्दल इतर अनेकांना प्रचंड राग होता. त्या अनेकांपैकी एक म्हणजे काल्पनिक ऐनार जमातीतला तरुण योद्धा कोदी! कोदीची महत्त्वाकांक्षा आणि त्यातून उद्भवणारं नाट्य मांडणारी कथा म्हणजे धरणी रासेन्द्रनचा चित्रपट ‘यातिसई’!

    ऐतिहासिक चित्रपट म्हटला म्हणजे त्यासाठी भरमसाठ बजेटच असलं पाहिजे, हा आपल्याकडे मजबूत रुजलेला गैरसमज आहे. मणिरत्नमने ‘पोन्नियिन सेल्वन’ (२०२२-२३) बनवला तेव्हा त्याचंही बजेट सुमारे पाचशे कोटी असल्याचं सांगितलं जातं. धरणी मात्र हा गैरसमज उचलतो, चुरगाळतो, चुरमडतो आणि पार बोळा करून कचऱ्याच्या टोपलीत टाकून देतो. जी सिनेमॅटिक अचिव्हमेंट भल्याभल्यांना शेकडो कोटी ओतूनही साधता आलेली नाही ती धरणीने ‘यातिसई’मध्ये अक्षरशः सात ते दहा कोटींमध्ये साधून दाखवलीये. इतक्या कमी बजेटमध्ये, नवखे कलाकार घेऊन धरणी पडद्यावर जे काही चितारतो, ती एक एक फ्रेम वास्तववादाचं लेणं लेऊन अंगावर येत राहाते. राजाच्या पुढे जाण्यासाठी जसा रहमानला नवाच साऊंड आणणं भाग होतं, तसंच राजमौलीच्या पुढे जाण्यासाठी ऐतिहासिक चित्रपटांची नवीच मांडणी करू शकणारा कुणीतरी पुढं येणं खूपच आवश्यक आहे. का? कारण तसं झालं तरच माध्यम पुढं जात असतं. ‘यातिसई’ ते करून दाखवतो. पण, राजमौली एका चित्रपटाने राजमौली नाही, त्याच्या पाठीशी वीस वर्षांची सातत्यपूर्ण तपश्चर्या आहे. रहमानसुद्धा सातत्यातूनच पुढे जाऊ शकलाय. ते सातत्य धरणी राखू शकला तरच तुलनेला अर्थ आहे, अन्यथा एक चित्रपट हा केवळ आणि केवळ योगायोगाच्या कक्षेत जातो.

    चित्रपट जरी कोदीची कथा असली तरीही त्याचा मूळ मुद्दा आहे तो म्हणजे सत्ताकांक्षा! या सत्ताकांक्षेपायी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, कोणत्याही पातळीची कारणं देऊ शकतो आणि कोणत्याही पशूला लाजवेल असं वागू शकतो हे दाखवण्यात चित्रपट काहीही हातचं राखून ठेवत नाही. मी बऱ्याच वर्षांत युद्धाची दृश्यं इतकी वास्तववादी आणि भीतीदायक पाहिली नव्हती. आपल्याकडच्या युद्धपटांमध्ये हिंसेचं स्टायलायझेशन करून दाखवलं जातं. ‘यातिसई’ मात्र कसलाही आडपडदा न ठेवता, अगदीच कमीत कमी बजेटमधूनही युद्धाची काळी बाजू इतक्या प्रखरपणे मांडतो की दुर्बळ मनाचे प्रेक्षक सहनच करू शकणार नाहीत. अखिलेश कदामुत्तुचा कॅमेरा या कथेचा एकूण एक पदर टिपत जातो. पात्रांच्या दिसण्यावर आणि वावरण्यावर अतिशय सूक्ष्म मेहनत केली गेल्याचे पदोपदी जाणवत राहाते. माझी आपल्याकडच्या ऐतिहासिक चित्रपटांबद्दल जी एक कायमच तक्रार असते की, त्यातील पात्रांचे कपडे नवेकोरे आणि म्हणूनच कृत्रिम वाटत राहातात. त्या तक्रारीला दिग्दर्शकाने इथे जागाच ठेवलेली नाही, एवढी वेशभूषा उत्कृष्ट जमून आलीये.

    १२१ मिनिटांचा हा चित्रपट बहुतांशी प्राचीन संगम तमिळ भाषेत आहे. हा आणखी एक प्रयोग. धरणीने जे विश्व उभं केलंय त्यात ती भाषा अजूनच रांगडा गोडवा आणते. महेंद्रन् गणेशन् चं संपादन चटपटीत असलं तरीही चित्रपट मध्यांतरानंतर काहीसा ओढल्यासारखा वाटतो. पण नंतर लगेचच तो आपली वाट पुन्हा शोधतोच. तो ओढल्यासारखा वाटण्यामागेही मोठं कारण हेच आहे की, चित्रपटात काडीमात्रही सस्पेन्स नाही. सारं काही सरळसोट. कदाचित, दिग्दर्शकाला तेच अपेक्षित असेल. पण त्याने चित्रपटाच्या व्यावसायिक मूल्यांवर काहीसा दुष्परिणाम व्हायचा तो होतोच. शिवाय त्यातून चित्रपट हा किंचित कलात्मकतेकडे झुकतो व त्याचे व्यावसायिक मूल्य थोडे उणावते. बजेटच्या कमतरतेमुळे विभास पारच गरीब वाटतात. विशेषतः युद्धप्रसंग अत्युत्कृष्ट दर्जाचे झालेले असताना खोट्या जखमा आणि रक्ताच्या विभासी चिळकांड्या खूपच खुपतात. नवख्या कलाकारांचा नवखा उत्साह कधीकधी नियंत्रणात आणायला हवा होता, असं वाटतं. दिग्दर्शकावर स्नायडरच्या ‘३००’चा (२००६) व हिस्ट्री चॅनलच्या ‘व्हायकिंग्स’चा (२०१३-२०) प्रचंड प्रभाव असल्याचे उघडपणे दिसते. चोळ किल्ल्यातील पुजाऱ्याचे पात्रही उगाच चवीपुरता काहीतरी प्रपोगण्डा असावा म्हणून घुसडल्यासारखे वाटत राहाते. पण तरीही ‘पोन्नियिन सेल्वन’ ज्या कारणांमुळे आवडता आवडता राहून जातो, नेमक्या त्याच कारणांमुळे ‘यातिसई’ आवडून जातो.

    साकल्याने पाहाता चित्रपट एक दुर्मिळ गोष्ट साधतो, ती म्हणजे विधान! चित्रपट त्याच्या विषयाबद्दल ठाम विधान करतो. त्याच्या नायकांची काळी बाजू दाखवायला तो चुकत नाही. आणि इतिहासातील स्तुत्य म्हणवल्या गेलेल्या पात्रांनाही मार खाताना दाखवायला तो कचरत नाही. चित्रपट वास्तवाच्या जितके जवळ जातात तितके ते एक तर चुकत जातात किंवा मोठे भासत जातात. ‘यातिसई’चा शब्दशः अर्थ होतो ‘दक्षिण दिशा’. दक्षिणेकडे जाणारा हा चित्रपट खचितच दुसऱ्या प्रकारातला आहे!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com]

  • अर्धवट शिजलेली थाळी – पोन्नियिन सेल्वन २

    अर्धवट शिजलेली थाळी – पोन्नियिन सेल्वन २

    दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी, विशेषतः तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टी या हिंदी चित्रपटसृष्टीपेक्षा अनेक पटींनी पुढे असल्याचे मी गेली पंधरा वर्षे तरी लिहितो व सांगतो आहे. सुरुवातीला लोक खूप हसायचे माझ्यावर. पण मी सत्याची कास सोडली नाही. याला सोशल मिडियावर आणि बाहेरसुद्घा अनेक साक्षीदार असतील व आहेत. मग उजाडलं २०१५ हे ऐतिहासिक वर्ष! या वर्षी रिलिज झाला, एस. एस. राजमौली या चित्रमार्तंडाचा चित्रपट ‘बाहूबली – द बिगिनिंग’! आणि तिकिटबारीवर दिग्विजयाचा वणवाच पेटला. त्यानंतर राजमौलीचे दोन्हीही चित्रपट जग जिंकून घेणारे ठरले. पण ‘बाहूबली’चं सगळ्यांत मोठं यश जर कोणतं असेल तर ते हे की, राजमौलीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टींची व्यावसायिक दारे सबंध जगासाठी उघडून दिली. त्यानंतर ‘केजीएफ’ (२०१८) ‘पुष्पा – द राईज’, (२०२१) ‘कार्तिकेय २’ (२०२२), ‘आरआरआर’ (२०२२), ‘कान्तारा’ (२०२२) अशा एकामागोमाग एक व्यावसायिक ब्लॉकबस्टर्सनी सबंध राष्ट्राला मोहिनीच घातली. राजमौलीने आधीच मोठ्या असलेल्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टींना स्वप्नांचा आवाका अजूनच विस्तारायला शिकवलं!

    याच वाहत्या गंगेत मणिरत्नमसारख्या नाणावलेल्या दिग्दर्शकाने आपलं कित्येक दशकांचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं. आणि ते स्वप्न होतं, कल्कि कृष्णमूर्तीच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या तमिळ जनमानसावर पिढ्यानपिढ्या राज्य करणाऱ्या कादंबरीचं चित्रपटात रूपांतरण! मणिरत्नम दिग्दर्शक म्हणून थोरच आहे. त्याचे ‘मौना रागम्’ (१९८६), ‘अग्नि नक्षत्रम्’ (१९८८), ‘दलपति’ (१९९१), ‘रोजा’ (१९९२), ‘बॉम्बे’ (१९९५), ‘दिल से’ (१९९८), ‘इरुवर’ (१९९७), ‘अलैपायुदे’ (२०००), ‘आयुधा येळद’ (२००४), ‘कन्नत्तिल मुत्तमिट्टाल’ (२००२), ‘गुरू’ (२००७), ‘ओ कादल कन्मणी’ (२०१५) हे आणि असे अनेक कित्येक चित्रपट पाहून मी सिनेमा शिकलोय. आणि असे माझ्यासारखे लक्षावधी चाहते सबंध भारतात असतील मणिरत्नमचे! पण वर उल्लेखिलेली यादी नीट वाचा. हे सगळे सिनेमे मानवी भावभावनांच्या भोवती फिरणारी नाट्यं आहेत. मणिरत्नम गुरू आहे नात्यांची गुंतागुंत मांडण्याचा आणि उकलण्याचा! पण ऐतिहासिक चित्रपटासाठी तेवढंच आवश्यक नसतं. शेकडों कोटींचं बजेट आणि त्यापाठोपाठ येणारी भव्यता हाताळणंसुद्धा तितकंच आवश्यक असतं. मोठ्या प्रकल्पाचं बारीक व्यवस्थापन तर आत्मा असतो अशा कोणत्याही चित्रपटाचा. इथे केवळ आर्थिक व्यवस्थापन अपेक्षित नाही, तर कथा, पात्रयोजना, चित्रपटाची दिशा, मांडणी, संगीतापासून ते संपादनापर्यंत शेकडो गोष्टी या सगळ्यांवर दिग्दर्शकाचं पूर्ण नियंत्रण अपेक्षित आहे.

    मणिरत्नमने त्याच्या आयुष्यातलं पहिलं मोठं बजेट हाताळलं ते ‘रावण’च्या (२०१०) वेळी, ५५ कोटी! ‘रावण’चं बॉक्स ऑफिसवर दहन झालं. त्यापाठोपाठ त्याने लगेच मोठ्या बजेटचा प्रयत्न ‘कडल’मध्ये (२०१२) करून पाहिला, ते बजेट होतं ५० कोटी. त्या चित्रपटालाही बॉक्सऑफिसवर जलसमाधी मिळाली. परिणामी त्याच्या पुढच्या ‘ओके कन्मणी’चं बजेट थेट ६ कोटी एवढं खाली आलं. या छोट्या बजेटच्या चित्रपटाने जगभरात मिळून सुमारे ५६ कोटी कमावले. म्हणजे बजेटच्या नऊ पट परतावा. या अफाट यशानंतर मणिरत्नमने परत एकदा ३४ कोटींचा ‘काऽट्र वेलियिडयी’ (२०१७) बनवून पाहिला, पण तो बॉक्स ऑफिसवर धराशायी झाला. त्याचा पुढचा चित्रपट ‘चेक्का चिवन्ता वानम्’ (२०१८) ४२ कोटींच्या बजेटमध्ये बनला व त्याने सुमारे १५० कोटींचा व्यवसाय केला. यातून काय समजते? मणिरत्नम हा मानवी नात्यांच्या कथा सांगण्यात वस्ताद आहे. पण त्याने जेव्हा जेव्हा तीच थीम मोठ्या बजेटवर मांडायचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा तो चित्रपट आपटलाय. ‘चेक्का चिवन्ता वानम्’च्या यशात मणिरत्नमपेक्षाही मोठा वाटा हा अरविंद स्वामी, विजय सेतुपती आणि सिम्बू यांच्या एकत्रित स्टारपॉवरचा होता. इथे मणिरत्नमला लक्षात आलं असणार की, मोठं बजेट हाताळताना येणाऱ्या मर्यादांना स्टारपॉवरच्या जोरावर झाकता येऊ शकतं. हा मुद्दा आणि ‘बाहूबली’चं यश यांच्या एकत्रिकरणातून उभं राहिलं मणिरत्नमचं स्वप्न, ‘पोन्नियिन सेल्वन’ (२०२२-२३)! पण एक गोष्ट इथे लक्षात घेतली गेलीच नव्हती. कोणती?

    ‘पोन्नियिन सेल्वन’मधील सगळेच अभिनेते हे तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्स जरी असले तरी उत्तरेकडे माझ्यासारखे काही जन्माचे पंखे वगळता त्यांच्या नावावर तिकिट काढणारे खूपच थोडे लोक असतील. गंमत म्हणजे नेमकी हीच अडचण ‘बाहूबली’चीसुद्धा होती. पण राजमौलीने कथाच अशी गुंफली की ती जगभरातील सगळ्याच प्रेक्षकांना आपल्या जवळची वाटली. ‘पोन्नियिन सेल्वन’ने मात्र गृहित धरलं की त्याच्या प्रेक्षकांनी मूळ कादंबरी वाचलेलीच आहे. परिणामतः उत्तरेकडच्या प्रेक्षकांना गुंतागुंतीची कथा, अनोळखी पात्रांच्या परस्परसंबंधांतून, अनोळखी पद्धतीने मांडलेली कळलीच नाही. त्यामुळेच मणिरत्नमचा चित्रपट हा तमिळखेरीज इतर चार भाषांमध्ये रिलिज होऊनसुद्धा बॉक्स ऑफिसवर तमिळ भाषेच्या सीमा काही ओलांडू शकला नाही. इतर ठिकाणी बॉक्स ऑफिसवर एवढी वाईट अवस्था होती की आत्ता काही दिवसांपूर्वीपर्यंत ‘पोन्नियिन सेल्वन’च्या दुसऱ्या भागाला तेलुगू भाषिक राज्यांमध्ये वितरकच मिळत नव्हता. आणि मी ठामपणे सांगतो की, तमिळभाषिक पट्ट्यांमध्येसुद्धा ‘पोन्नियिन सेल्वन १’ जो चालला तो काही चित्रपट चांगला होता म्हणून नव्हे तर त्या कादंबरीशी तमिळ मनाचा अनेक पिढ्यांचा नॉस्टॅल्जिया जोडलेला होता म्हणून. पहिल्या भागाचे सविस्तर विश्लेषण मी त्यावेळी लिहिलेल्या रसग्रहणात केलेच होते, ते काही इथे नव्याने करत बसत नाही.

    पण पहिल्या भागातील त्रुटी दुसऱ्या भागात जरादेखील दूर झालेल्या दिसत नाहीत. साचा आणि मांडणी याबाबतीत ‘पोन्नियिन सेल्वन’चा बाज हा राजमौलीच्या शैलीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे त्यांच्यात तुलना करणं ‘पोन्नियिन सेल्वन’ व मणिरत्नम दोघांवरही अन्याय करणारं ठरेल. परंतु स्वतंत्रपणे पाहू गेलं तरीही ‘पोन्नियिन सेल्वन २’मधील त्रुटी सहजच नजरेत भरतात. उदाहरणच द्यायचं झालं तर, चित्रपट सुरू होतो आदित्य करिकालन (विक्रम) आणि नंदिनीच्या (ऐश्वर्या राय) अपुऱ्या प्रेमापासून. त्यांची प्रेमकथा सांगताना मणिरत्नमने पहिल्या ५-१० मिनिटांतच रहमानच्या तीन दैवी गाण्यांची विल्हेवाट लावून टाकलीये. माझं एक प्रामाणिक मत आहे ते म्हणजे गेल्या ३० वर्षांत रहमान एवढा आभाळाहूनही मोठा होऊ लागलाय की त्याचं संगीत हाताळणं हे भल्याभल्या, मी मी म्हणणाऱ्या दिग्दर्शकांच्याही आवाक्याबाहेर जाऊ लागलंय. या माझ्या मताला दक्षिणेकडे अपवाद होता केवळ तीन दिग्दर्शकांचा – मणिरत्नम, शंकर आणि गौतम वासुदेव मेनन! आज ‘पोन्नियिन सेल्वन २’ पाहून आल्यापासून मी या यादीतून मणिरत्नमचं नाव काढून टाकतोय. तीन दैवी गाणी हो. मणिरत्नमने चिल्लर असल्यासारखी वापरली. ‘चिन्नन्जिरू निलवे’सारखं सर्वांगसुंदर गीत, पण गाण्याचे शब्द, चाल, गायकी, संयोजन एक दु:ख मांडतात तर मणिरत्नमचे व्हिज्युअल्स काहीतरी भलतीच असंबद्ध गोष्ट दाखवत असतात. रहमान तिकडे जीव खाऊन वाजवतोय आणि पडद्यावर अगदी एखादा सर्वसामान्य दिग्दर्शकही मांडणार नाही असलं निरर्थक घडतंय. हीच कथा बाकीच्याही गाण्यांची. रहमानने संगीतात जितकं ग्रँज्यर ओतलंय, चित्रपट त्याच्या तुलनेत अगदीच सपक वाटतो.

    नुसता रहमानलाच वाया घालवला असता तर चाललं असतं. परंतु मणिरत्नमने एकूण एक अभिनेत्यालाही पार वाया घालवलंय. विक्रमच्या पात्राला काहीही आलेख नाही. त्याने किती जरी कायिक अभिनयाचा वस्तुपाठ उभा केलेला असला तरी तो क्षणात सूज्ञ वाटतो तर क्षणात वेडा. त्याचं आतल्या आत कुढणं, तिळतिळ जळणं त्याने संहितेच्या पुढे जाऊन जिवंत केलंय. पण संहिता आणि दिग्दर्शक दोघेही त्याला जरादेखील साथ देत नाहीत. त्यामुळेच त्याचं पुढं जे काही होतं ते किती जरी ऐतिहासिक सत्य असलं तरी प्रेक्षकांना त्याने काडीमात्रही फरक पडत नाही. मागच्या भागात विक्रमच्या तोडीस तोड अभिनय कुंदवईच्या भूमिकेत तृषा कृष्णनने केला होता. या भागात मात्र तिला दुय्यम पात्रापेक्षाही लहान भूमिकेत सीमित करण्यात आलंय. ज्याच्या नावावर हा सगळा तो डोलारा उभा केलाय तो पोन्नियिन सेल्वन अर्थात अरुळमोळीवर्मनच्या पात्राला तर काही म्हणजे काहीच काम नाही. सबंध चित्रपटात तो काहीच करत नाही. इतकं निरर्थक पात्र मांडलंय ते की, त्याला समजा चित्रपटातून वजा केलं तरी चित्रपटावर फार फार तर १०-२०% फरक पडेल. प्रेक्षकांना तर तेवढाही फरक पडणार नाही. जयम् रवीने काम चांगलंच केलंय हो, पण त्याला कथेतून न्याय मिळायला नको का?

    चांगलं काम आणि कथेत न्याय या दोन्हीही मुद्यांवर त्यातल्या त्यात बाजी मारून जातो तो म्हणजे वल्लवरायन् वंदियादेवन् साकारणारा कार्ती! त्याच्या आणि तृषाच्या गाण्यातच फक्त रहमानच्या संगीताला मणिरत्नमचे व्हिज्युअल्स न्याय देतात. पण तिथेही मणिरत्नमने एकच कडवं वापरून सगळ्यावर पाणी फिरवलंय. ते जाऊ द्या. पण अखेरच्या दृश्यांमध्ये कुत्र्यासारखा मार खाऊन साखळदंडाने जखडलेला वल्लवरायन् पुढच्याच दृश्यात युद्धावर जाऊन पराक्रम गाजवतो, हे कसं बरं पटावं? ते पटलंही असतं, पण कुठे? तर राजमौलीच्या काल्पनिक चित्रपटात. लक्षात घ्या, प्रत्येक चित्रपट आपलं स्वतंत्र तर्कशास्त्र आणि आपली स्वतःची सृष्टी घेऊन येतो. त्यामुळेच राजमौलीच्या चित्रपटात पात्रांचं अतिरंजित वागणं खटकत नाही, नोलनच्या चित्रपटात काळाशी केलेला खेळ खटकत नाही. कारण ही मंडळी आपापल्या कथांचं जग आणि तर्कशास्त्र व्हिज्युअली पूर्णपणे स्थापित करूनच आत बुडी मारतात. मंदाकिनी प्रत्येक वेळी योग्य वेळेत हव्या त्या ठिकाणी कशी काय पोहोचते, याला चित्रपटाच्या तर्कशास्त्रात काहीच उत्तर नाही. ‘पोन्नियिन सेल्वन २’ आव आणतो वास्तववादाचा आणि दाखवतो अतिरंजित गोष्टी, म्हणूनच मग त्या बालिश वाटू लागतात. राजकुमार रावसारख्या चित्रपटात सलमान खानच्या चित्रपटासारख्या गोष्टी दाखवल्या तर काय होईल, विचार करा. तेच इथं होतं.

    माझं काय म्हणणं आहे की, एकदा अतिरंजिततेच्या सीमेत प्रवेश केलाच तर मग तिथे तरी पूर्णपणे झोकून द्यावं ना? ते ही इथे होत नाही. सगळेच प्रसंग अत्यंत अर्धवट शिजल्यासारखे वाटत राहातात. पडद्यावर एखादी गोष्ट घडतेय तर तिला काहीतरी अर्थ आहे, तिचा कथेवर परिणाम होणार आहे, म्हणून मग त्या गोष्टीला स्क्रिनटाईममधून म्हणा वा इतर गोष्टींतून आवश्यक तेवढं वजन तरी द्यावं की नाही? पण दुर्दैवाने असं एकाही प्रसंगात घडत नाही. प्रसंग महत्त्वाचा असो की बिनमहत्त्वाचा, तो सारख्याच रसहीन लयीत पडद्यावर घडत राहातो. काहीतरी आनंदी झालं काय किंवा कुणी मेलं काय, प्रत्येक प्रसंग हा एखादा बॉक्स टिक केल्यासारखा उरकायचा म्हणून उरकला जातो. थोडक्यात, चित्रपटाला कसलाही ऱ्हिदम नाही. शेवट तर प्रमाणापलिकडे चुकलाय. मणिरत्नमने ‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट म्हणून न करता वेबसीरीज म्हणून २-३ पर्वांमध्ये साकारला असता, तर तो नक्कीच आत्ताच्यापेक्षा जरा तरी बरा झाला असता. परंतु २ चित्रपटांत मिळून ६ तासांतच सगळी कथा कोंबल्यामुळे चित्रपट म्हणजे नुसत्या क्रिकेटच्या सामन्याच्या हायलाईट्स झाले आहेत. लढाया आणि विभास तर अक्षरशः लुटुपुटूचे वाटावेत इतके नवख्यासारखे हाताळले आहेत. अनेक राज्यांचं सैन्य एकत्र येऊन लढलेलं अखेरचं युद्ध तर इतक्या कमी वेळात इतक्या अपरिपक्व पद्धतीने उरकलंय की, ना त्याचा प्रभाव पडतो ना त्याला काही अर्थ राहातो. त्यात भर पडते ती अगणित पात्रांच्या गर्दीची. कोण कुणाचं काय लागतं आणि कुणाचं कुणाशी काय आहे हे शेवटपर्यंत कळत नाही, एवढी पात्रं घुसवली आहेत कथेत. त्यातही बहुतांशी दाढीधारी पात्रं इतकी सारखी दिसतात की तमिळेतर प्रेक्षकांचा खात्रीने घोळ होणार म्हणजे होणारच. हिंदी संवाद संस्कृतप्रचुर आहेत तर हिंदी गाणी ऊर्दूने पोखरून टाकलेली, हा विरोधाभास या भागातही कायम आहे व तो मागच्या भागाइतकाच कानांना टोचतो. अशा एक ना अनेक गोष्टी सांगता येतील.

    मग चित्रपटात काहीच चांगलं नाही का? खूप चांगल्या गोष्टी आहेत. अभिनय शंभर नंबरी सोन्यासारखा आहे. रहमानने कित्येक शुष्क आणि निर्जीव प्रसंगांमध्ये सगळी ताकद पणाला लावून प्राण फुंकले आहेत. लोकेशन्स अतिशय चपखल आहेत. वेशभूषा, केशभूषा दोन्हीही आघाड्या देखण्या व अप्रतिम झाल्या आहेत. पण यातील एकही गोष्ट, अगदी एक सुद्धा गोष्ट अनियंत्रित हाताळणीला झाकू शकत नाही. मणिरत्नमचा संपूर्णपणे तृप्त करणारा अखेरचा चित्रपट माझ्या दृष्टीने ‘ओ कादल कन्मणी’ होता. त्यानंतरच्या त्याच्या चित्रपटांनी यश जरी पाहिलं तरी त्या यशात गिमिकचा वास येतो, समाधानाची चमक दिसत नाही. तो मास्टर डिरेक्टर मी शोधतोय, पण दुर्दैवाने तो क्लासिक मणिरत्नम त्याच्याच ड्रीम प्रोजेक्टमध्येसुद्धा एखाद-दोन प्रसंगांचा अपवाद वगळता कुठेच गवसत नाही. मी मोठ्या आशेने वाट पाहातोय त्याची. कदाचित पुढच्या एखाद्या चित्रपटात सापडेल.

    *२.५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com]

  • रावणाचं फर्स्ट इम्प्रेशन!

    रावणाचं फर्स्ट इम्प्रेशन!

    वाल्मिकी रामायणात रावणाचा उल्लेख अगदी बालकांडापासूनच असला तरीही रावणाचं पहिलं वर्णन येतं ते थेट अरण्यकांडात स्वतः रावणाच्याच तोंडून. सर्ग ३१ मध्ये अकम्पन नावाचा राक्षस लंकेला जातो आणि रामाने जनस्थानातून राक्षसांचे उच्चाटन केल्याची बित्तंबातमी तो रावणाला सांगतो. तेव्हा क्रोधाने फुत्कारणारा रावण श्लोक क्र. ५ ते ७ येथे त्याला म्हणतो, “माझा अपराध करून इंद्र, यम, कुबेर आणि विष्णूही सुखाने नाही जगू शकणार. मी काळाचाही काळ आहे. मी आगीलाही जाळून टाकू शकतो. आणि मृत्यूलाही मृत्यूमुखी पाडू शकतो मी. मी जर चिडलो तर वाऱ्यालाही रोखू शकतो आणि सूर्यालाही भस्म करू शकतो”. रावण हे जे काही बोलतो यात आलंकारिकता आहे, परंतु अतिशयोक्ती अजिबातच नाही. त्याने खरोखर तिन्ही लोक पादाक्रांत केलेले आहेत, देवादिकांनाही हरवलेलं आहे आणि एक साक्षात शंभूमहादेव व कार्तवीर्य सहस्रार्जुन सोडले तर कुणीच रावणाचं काहीच वाकडं करू शकलेलं नाहीये.

    त्यानंतर पुढच्याच सर्गात रावण आपल्याला दिसतो ते शूर्पणखेच्या नजरेतून. लक्ष्मणाकडून प्रताडित झालेली शूर्पणखा लंकेला जाते, तेव्हा तिला रावण कसा दिसतो? अरण्यकांड, सर्ग क्र. ३२, श्लोक क्र. ४ ते २३ इथे वाल्मिकी लिहितात –

    “विमानाच्या अग्रभागी बसलेला, तेजाने झळझळणारा रावण तिने पाहिला. इंद्राच्या सभोवती जसे मरुद्गण असतात तसेच त्याच्या आसपास त्याचे सचिव होते. त्याचं स्वर्णसिंहासन सूर्यासम चमकत होतं. आणि ज्याप्रमाणे सोन्याच्या वीटांनी बनलेल्या यज्ञवेदीमध्ये स्थापित अग्नि तुपाच्या आहूतीने अधिकच प्रज्वलित होतो, तसा तो रावण दिसत होता. समरभूमीवर तोंड वासलेल्या यमराजासारखा तो रावण देवता, गंधर्व, भूत, ऋषी यांनाही अजेय होता. देवासुर संग्रामाच्या वेळी त्याच्या शरीरावर वज्र आणि अशनीने ज्या जखमा झाल्या होत्या, त्याच्या छातीवर ऐरावताने जे सुळे खुपसले होते त्या सगळ्यांचे व्रण तो मिरवत होता. त्याला वीस भुजा, दहा तोंडे होती. त्याची छत्रचामरादी आभूषणे प्रेक्षणीय होती. त्याचे वक्षस्थळ विशाल होते. आणि तो सगळ्याच राजलक्षणांनी संपन्न होता. त्याचे शरीर त्याने धारण केलेल्या वैदूर्यासारखेच होते. त्याने तप्तसुवर्णाची आभूषणे परिधान केली होती. त्याचे बाहू सुंदर, दात शुभ्र, चेहरा मोठा व शरीर पहाडासारखे होते. देवांशी युद्ध करताना विष्णुने त्याच्यावर शेकडो वेळा चक्राचा प्रहार केला होता. इतर युद्धांतही अनेक शस्त्रांचे वार त्याच्या शरीराने झेलले होते. आणि अशा देवांच्या शस्त्रांनाही लीलया पचवलेल्या शरीराने तो शांत समुद्रालाही अशांत करून टाकायचा. तो अतिशय चपळ होता. तो पर्वतशिखरे उपटून फेकून द्यायचा. देवांना चिरडून टाकायचा. तो धर्माचा समूळ नाश करायचा आणि परस्त्रियांचं सत्व नासवायचा. तो सर्व प्रकारच्या दिव्यास्त्रांमध्ये पारंगत आणि यज्ञांमध्ये विघ्न उत्पन्न करणारा होता. एकदा तर त्याने भोगवतीला जाऊन नागराज वासुकीला हरवून तक्षकाच्या प्रिय पत्नीचे अपहरण केले होते. कैलासावर जाऊन त्याने कुबेराचे विमान हुसकावले होते. त्याने रागात येऊन कुबेराचे चैत्ररथ वन, नलिनी नावाची पुष्करणी आणि इंद्राचे नंदनवन व इतर उद्यानांची नासधूस केली होती. पर्वतासारखा तो चंद्र आणि सूर्याला आपल्या हातांनी रोखू शकायचा. पूर्वी त्याने घोर वनात दहा सहस्र वर्षे तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला आपल्या मस्तकांचा बळी अर्पिला होता. आणि त्यामुळेच त्याला देवता, दानव, गंधर्व, पिशाच्च, पक्षी व सापांपासून अभय प्राप्त झालं होतं. एक मनुष्यप्राणी वगळता त्याला कुणाकडूनही मृत्यू येऊच शकत नव्हता. ब्राह्मणांद्वारा केलेल्या मंत्रोच्चारांनी यज्ञांतून निघणारा सोम तो महाबली नासवून टाकायचा. यज्ञातून मिळणारे फळ नासवणारा तो ब्रह्महत्यादि क्रूरकर्मे करायचा. तो कर्कश, निर्दय आणि सदैव प्रजेचं अहित करण्यातच गुंतलेला असायचा. समस्त प्राणिमात्रांना भयकारी असा तो क्रूर व महाबलशाली भाऊ शूर्पणखेने पाहिला. तो दिव्य वस्त्राभरणांनी विभूषित आणि दिव्य माळांनी सुशोभित होता. तो राक्षसांचा राजा, महाभाग पौलस्त्यकुलनंदन त्या आसनावर प्रलयकाळी सगळ्यांचा संहार करणाऱ्या काळासारखाच भासत होता”.

    हे मूळ रामायणातील रावणाचे फर्स्ट इम्प्रेशन आहे! यात त्याची बुद्धी, बल, पराक्रम, क्रौर्य सारे सारे काही एकाचवेळी अत्यंत समर्थपणे मांडले आहे. मी वाल्मिकी रामायणावर तीन दिवस व्याख्याने देतो (संपर्क) तेव्हा पहिला सबंध दिवस जवळजवळ दोन तास रावणावर बोलत असतो, एवढा महाप्रचंड पसारा आहे रावणाच्या बल, बुद्धी आणि पराक्रमाचा. तो शास्त्रांचा ज्ञाता आहे, अस्त्रांचा धर्ता आहे. तो वेदशास्त्रसंपन्न आहे, तो चक्रवर्ती साम्राज्याचा कर्ता आहे. एका सम्राटाकडे असायलाच हवे ते सारे गुण त्याच्यात एकवटले आहेत आणि इतके असूनही तो केवळ त्याच्या दुर्गुणांमुळे कसा रसातळाला गेला ते स्खलन वाल्मिकींनी अतिशय प्रांजळपणाने मांडले आहे.

    असा गुणावगुणांचा खजिना असलेला रावण कलाकृतींतून साकारणे म्हणजे सोपे काम नव्हे. आधुनिक काळात विचार केला तर फक्त आणि फक्त रामानंद सागरांच्या ‘रामायणा’त (१९८७-८८) अरविंद त्रिवेदींनी साकारलेला रावणच या सगळ्या कसोटींवर खरा उतरतो. बाकी बॉलिवूडने कालपरवा रिलिज झालेल्या टिझरमध्ये रावणाच्या डोळ्यांत काजळ, केसांचा मॉडर्न कट वगैरे दाखवून, त्याला व्हायकिंग्ससारखे कपडे घालून जॉन स्नोप्रमाणे ड्रॅगनवर (की वटवाघळावर?) बसलेले दाखवून विविधांगी पटलांनी समृद्ध अशा या बहुढंगी व्यक्तिमत्त्वाचा पार विनोदी विदूषक करून सोडलाय. ज्यांची जेवढी झेप तेवढीच त्यांची मांडणी! आणि ज्यांचा जेवढा आवाका तेवढीच त्यांना रामकथा कळते. बाकी श्रीरामचन्द्रार्पणमस्तु!!

    — © विक्रम श्रीराम एडके

    [अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com]

  • मर्यादांमध्ये अडकून पडलेला – पोन्नियिन सेल्वन: १

    मर्यादांमध्ये अडकून पडलेला – पोन्नियिन सेल्वन: १

    दहाव्या शतकाच्या मध्यात चोळ साम्राज्याच्या सीमा इतर राज्यांच्या सीमांना धक्के देऊ लागल्या होत्या. ‘कडारम कोण्डान’ राजेन्द्र चोळाचं सर्वंकष साम्राज्य अद्याप अवतरायचं आहे, परंतु दुसरा परान्तक तथा सुन्दर चोळाचं (प्रकाश राज) साम्राज्य मात्र डौलाने उभं होतं. आणि त्या डौलाला पेलून धरणारे दोन समर्थ खांदे होते, ते म्हणजे आदित्य करिकालन् (चियान विक्रम) आणि अरुळमोळीवर्मन् (जयम् रवी). परंतु सुन्दर चोळाचं राज्य अवैध मानणारेही काही लोक होतेच की! काय कारण होतं त्यापाठी? त्याचं झालं असं की, मुळात सम्राट होता गण्डरादित्य चोळा. त्याच्यानंतर राज्य त्याचा मुलगा मदुरान्तकाला मिळायला हवं होतं. पण तो पडला खूपच लहान. त्यामुळे राज्य गेलं सुन्दर चोळाकडे. तेव्हा राज्य हे खरा वारस म्हणून मदुरान्तकाकडेच जायला हवं, असं काहींना वाटल्यास नवल नाही. गंमत केव्हा झाली, जेव्हा हे वाटणारे ते तथाकथित काही लोक खरोखरच मदुरान्तक गादीवर यावा म्हणून षडयंत्र करायला लागले!

    ही झाली एक बाजू. दुसरी बाजू अशी की, युवराज आदित्य करिकालन् हा राज्यात राहातोच कुठे? पळवूर नंदिनीशी (ऐश्वर्या राय) प्रेमात ताटातूट झाल्यापासून तो रांगड्या शिपाईगड्यासारखा सतत मोहिमेवरच असतो. त्याच्यामुळे दुखावलेली नंदिनी एखाद्या विदुलेसम आहत आहे व सूड घेण्यास उत्सुक आहे. तिसरीकडे अरुळमोळीवर्मनही श्रीलंका जिंकायला गेलाय. त्याच्या जीवावर पांड्य उठलेले आहेत. थोडक्यात काय तर चोळांच्या बाजूने काय लोक असतील ते असोत, पण विरोधात मात्र एकापाठोपाठ एक आघाड्या उघडतच चालल्यायत. मणिरत्नमचं स्वप्न म्हणावा असा ‘पोन्नियिन सेल्वन’ सुरूच या गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर होतो. कल्कीच्या मूळ कादंबरीप्रमाणेच आपल्याला हा सगळा खेळ वल्लवरायन् वंदियादेवन् (कार्ती) च्या नजरेतून दिसतो. कल्कीच्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीवर आधारित असणे हे जसे चित्रपटाचे बलस्थान आहे तसेच तेच त्याचे मर्मस्थानदेखील!

    मी बलस्थान म्हणतोय ते यासाठी की, तमिळनाडूतील लोकांना पिढ्यानपिढ्या ओढ लावलेली ही अभिजात कथा चित्रपटाला भक्कम पाया देते. परंतु दुर्दैवाने कथेचा अतिपरिचय हाच चित्रपट म्हणून माध्यमांतर होताना अवज्ञेचे कारणही ठरतो. कथेचा भलामोठा आवाका कवेत घ्यायला दोन चित्रपटही अपुरे वाटतात. आणि जेव्हा चित्रपट संपायला आला तरीही नव्याने पाहाणाऱ्या प्रेक्षकांना पात्रांची धड नावेच उलगडलेली नसतात, तेव्हा तर या कादंबरीवर चित्रपट करायच्या ऐवजी दोन-तीन पर्वे चालणारी एखादी मालिकाच बनवली असती, तर जास्त बरं झालं असतं, असं वाटू लागतं.

    मणिरत्नमने अखेरचा सर्वांगसुंदर चित्रपट जर कोणता दिला होता आठवायचे झाले तर पार ‘ओ कादल कन्मणी’पर्यंत (२०१५) मागे जावे लागते. त्यानंतर त्याने केलेले दोन्हीही चित्रपट ‘काऽट्र वेलियिडयि’ (२०१७) आणि ‘चेक्का चिवन्ता वानम्’ (२०१८) एकापेक्षा अनेक पातळ्यांवर फसलेच होते. त्यातही ‘चेक्का चिवन्ता वानम्’ची कथा ही जवळपास ‘पोन्नियिन सेल्वन’सारखीच आहे. मी कायम म्हणत असतो की, राजमौलीचा ‘मघाधीरा’ (२००९) हा नुसता चित्रपट नाहीये, तर जगातले सगळ्यांत महागडे ‘पिच’ आहे. त्या पिचच्याच जोरावर राजमौलीने ‘बाहूबली’ (२०१५-१७) पटकावला. नेमके तेच मणिरत्नमने ‘पोन्नियिन सेल्वन’च्या आधी ‘चेक्का चिवन्ता वानम्’ बनवून केले. पण मणिरत्नमचं स्वप्न जरी असलं तरीही प्रत्येक कलाकृती ही एका विवक्षित काळानंतर कालबाह्यच होत जाते. नेमका तोच जरामरणादि भयांचा शाप या कलाकृतीला भोवताना दिसतोय. आणि म्हणूनच कादंबरी म्हणून रोमहर्षक असू शकणारी कथा चित्रपटात माध्यमांतरित होताना पारच सपाट वाटू लागते.

    मणिरत्नम हा मानवी भावभावनांची आणि परस्परसंबंधांची गुंतागुंत मांडण्याच्या बाबतीत वस्ताद आहे अक्षरशः! पण बाहूबल्योत्तर भव्यपटांना केवळ याच मुद्यावर शंभर गुण मिळवून भागत नाही आता, तर साहसदृश्ये, युद्धप्रसंग आदी विभागांतही बाजी मारावी लागते. आणि त्या दोन्हीही आघाड्यांवर मणिरत्नमचं दिग्दर्शन नवखं, अक्षरशः बालीश वाटतं. आणि निम्मा चित्रपट इथेच गंडतो. त्या प्रसंगांमध्ये पडद्यावर नुसता गोंधळच दिसतो, विचारपूर्वक नियोजिलेल्या आणि कौशल्यपूर्वक चितारलेल्या चौकटी दिसतच नाहीत. त्या प्रसंगांमधील रविवर्मनचा सततचा हलता कॅमेरा त्रासात अजूनच भर घालतो. बरं एवढं होऊन ही घसरण थांबते म्हणावं, तर तसंही नाही. चित्रपट जरी चार-पाच भाषांमध्ये प्रदर्शित केलेला असला तरीही मुळात तो बनवताना पॅन-भारतीय प्रेक्षकांचा जराही विचार केलेला दिसून येत नाही. किंबहूना प्रेक्षकांपैकी सगळ्यांनीच मूळ कादंबरी वाचली आहे आणि त्या सगळ्यांनाच मुख्य घटना व त्यातील मैलाचे दगड माहिती आहेत, असेच गृहित धरल्याचे जागोजागी दिसून येते. त्यामुळे प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग हा आपोआपच चित्रपटापासून तुटतो, दुसरा दूर जातो आणि तिसरा कधी जवळच येत नाही. कितीही चांगली डबिंग केलेली असली तरीही शेवटी चित्रपट हा वैश्विक कथा न बनता एक काहीशी परकी वाटणारी, काठावरूनच पाहिल्यासारखी तमिळ कलाकृतीच तेवढा राहातो. हाच प्रकार याआधी लोकेश कनगराजच्या ‘विक्रम’बाबतही (२०२२) झाला होता व त्यामुळेच तो दक्षिणेकडे धो-धो चालूनही उत्तरेकडे ‘बाहूबली’, ‘केजीएफ’ (२०१८-), ‘आरआरआर’सारखा (२०२२) रुजलाच नाही. ‘पोन्नियिन सेल्वन’देखील त्याच मर्यादांमध्ये अडकून पडतो. शिवाय जर चित्रपटाचा मूळ प्रेक्षकवर्ग हा कादंबरी वाचलेला, ती पडद्यावर पाहून स्मरणरंजनात दंग होणारा असेल, तर मग अखेरच्या प्रसंगातील ट्विस्टला काही एक अर्थ उरत नाही. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे अरुळमोळीवर्मन् हा इतिहासात कोण आहे हे माहिती असणाऱ्यांसाठी तर शेवटच्या प्रसंगातील लटकंती अजिबातच अनावश्यक ठरते. ‘बाहूबली’च्या पहिल्या भागाच्या धक्कादायक शेवटाशी साधर्म्य साधणारे काहीतरी दाखवायचे म्हणून असे दाखवले की काय, अशी सार्थ शंका आपल्याला वाटून जाते. परंतु त्या शेवटाने सबंध देशाला महिनोन्महिने विचार करायला भाग पाडले होते, इथे मुळातच हाताळणी विचार न करता अगदी घाईत केलेली असल्यामुळे त्या धक्क्याचा प्रभाव ताबडतोब ओसरूनदेखील जातो.

    मला या कथेमागचा इतिहास, कादंबरी व त्यापाठची भूमिका या सगळ्या गोष्टी सखोल माहिती असूनही चित्रपट माझ्या मनाचा ठाव घेत नाही, याचं कारण म्हणजे इळांगो कुमारवेल, बी. जयमोहन आणि मणिरत्नमचे लेखन. वर सांगितल्याप्रमाणे लेखक-दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना कथा माहिती असल्याचे गृहित धरले आहे. पण ते एकवेळ बाजूला ठेवले तरीही पटकथालेखनाला काहीच दिशा नाहीये. त्यामुळे कार्तीचे प्रसंग छान वाटतात, विक्रमचे प्रसंग छान वाटतात, तृषाचे प्रसंग छान वाटतात, जयम् रवीचे प्रसंग छान वाटतात पण तरीही त्या प्रसंगांची एकत्र मोट बांधूनही चित्रपट एकूणात प्रभाव पाडू शकत नाही. दुसरं म्हणजे ज्याला पटकथालेखनात कॉन्फ्लिक्ट म्हणतात आणि नायकांच्या प्रवासात जे अडथळे येणं अपेक्षित असतं, त्या दोन्हीही गोष्टी समप्रमाणात घडत नाहीत. पात्रांची कथा सांगण्याऐवजी कथाच पात्रांच्या मागे वाहावत जाते. त्यामुळे काही प्रसंग सुसह्य तर काही असह्य कंटाळवाणे होतात. चित्रपटाची १६७ मिनिटांची भलीमोठ्ठी लांबी पार करूनही कथा फारशी पाहिलीच नाही, असे जाणवत राहाते. त्याला संपादक ए. श्रीकर प्रसादही काहीच करू शकत नाही. कथावस्तू कोणत्याही चित्रपटाचा आत्मा असतो. परंतु त्याभोवती जर तितकेच सामर्थ्यवंत शरीर नसेल, तर तो आत्मा भटकतच राहातो. इथे तेच झाले आहे. कल्कीची दमदार कथा साथीला आहे या भ्रमात चित्रपटाच्या इतर तांत्रिक बाबींकडे फारसे लक्ष न दिले गेल्यामुळे चित्रपट हा घाईघाईत उरकल्यासारखा वाटतो व चित्रपटगृहाबाहेर पडल्यानंतर त्याचा प्रभाव फारसा स्मरणात राहात नाही. पुन:प्रत्ययाची ओढ नसणे हे इतक्या मोठ्या बजेटच्या चित्रपटासाठी धोक्याचेच आहे.

    चित्रपटाची सगळ्यांत जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे कलाकारांची निवड. विक्रमने आदित्य करिकालनचं धुमसणं पडद्यावर अक्षरशः साकार केलंय. त्यातून पुढे काय घडणार आहे हे ठाऊक असणाऱ्यांना तर त्याच्या अभिनयाची वेगळीच झिंग चढेल. पण त्याच्या पात्ररचनेवर मणिरत्नमच्याच ‘रावणन्’चा (२०१०) नको तितका प्रभाव आहे. त्यातही त्याने अगदी अशीच, हेच सगळे कंगोरे असलेली भूमिका चितारली होती. तो साक्षात विक्रम आहे म्हणूनच इथेदेखील तो त्या भूमिकेच्या सगळ्याच मर्यादांना पलांडून जातो, एवढंच. तो भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांपैकी एक खचितच आहे, फक्त त्याने चुकीच्या संहिता निवडण्याचा शाप तेवढा ओलांडला पाहिजे. त्याच्या खालोखाल चपखल जमलाय तो कार्तीचा वल्लवरायन् वंदियादेवन्! त्याला इतर कोणत्याही अभिनेत्यांच्या तुलनेत सगळ्यांत जास्त स्क्रिनटाईम आहे. परंतु त्याने त्यातील एक एक मिनिट वसूल केलाय मस्तपैकी! त्याच्या एकट्याच्याच वाट्याला चित्रपटातील बहुतांशी विनोदी प्रसंग आलेले असल्यामुळे त्याला पाहाणे मजेदार वाटते. पण त्याचे पात्र उगाचच उठवळ दाखवले आहे. तो दिसेल त्या प्रत्येक स्त्रीशी फ्लर्ट करतो. मग तो राणी बघत नाही, राजकुमारी बघत नाही, त्याला अगदी नावाडीसुद्धा चालते. त्याचा घोडा बायकांचे कपडे पळवतो. हेच सगळे कादंबरीतही असेल तर हा परत एकवार माध्यमांतराचाच दोष म्हटला पाहिजे. कारण, तो जे काही करतो तेच सगळे समजा पळुवेट्टरायरच्या (हिंदीत पर्वतेश्वर) माणसांपैकी कुणी केले असते तर त्याची घृणा वाटली असती. इथे तेच सगळे खपवून का घ्यायचे, तर केवळ तो नायकांच्या बाजूचा आहे म्हणून? त्याचेही पाठलागाचे प्रसंग, युद्धाचे प्रसंग अतिशय नवशिक्यासारखे चित्रित केले आहेत.

    अरुळमोळीवर्मनच्या भूमिकेत जयम् रवी अतिशय राजस वाटतो. त्याला पहिल्यांदाच इतक्या मोठ्या थाटाची भूमिका मिळाली आहे आणि तो ती मन लावून करतो. ऐश्वर्या ही दैवी सुंदरी दिसणे कथेत अपेक्षित आहे व तशी ती विभासादी वापरून का होईना, पण दिसते. अभिनयाच्या बाबतीत तिने चांगलेच काम केलेले असले तरीही तिच्या दिखाऊ अभिनयाला तृषाने आपल्या नैसर्गिक सामर्थ्याच्या जोरावर सुस्पष्ट मात दिली आहे. तिचे सौंदर्य अधिक नैसर्गिक वाटते आणि म्हणूनच तिची भूमिका प्रेक्षकांना अधिक जवळचीदेखील वाटते. तिच्या पात्राची चतुराई त्या भावनेत अजूनच भर घालते. मी वर जे लिहिलेय की, चित्रपटातील सगळ्यांत जास्त भावलेली गोष्ट म्हणजे पात्रांची निवड, ते अशाच मार्मिक गोष्टींमुळे. प्रकाश राजची भूमिका शब्दशः ‘चेक्का चिवन्ता वानम्’मधल्या ‘सेनापती’चीच आहे व ती त्याने इथेही तशीच्या तशीच वठवली आहे. मणिरत्नमला मुळातच आपल्या चित्रपटांतून आपल्याच आधीच्या चित्रपटांतील गोष्टींची पुनरावृत्ती करायचा वाईट छंद आहे. ‘गुरू’मध्येही (२००७) ‘मौना रागम्’ची (१९८६) जाणवण्याइतपत पुनरावृत्ती होती. तोच प्रकार इथेही दिसून येतो. पार्तिबन्, शरदकुमारादी नेहमीच्या यशस्वी कलाकारांनी नेहमीसारखेच त्यांच्या त्यांच्या भूमिकेचे पदर लीलया उलगडले आहेत. अळवारकाडियान नम्बीची वेड पांघरून पेडगावला जाणारी भूमिका जयरामने परिपूर्णतेने वठवली आहे. माध्यमांतराच्या दोषाचं आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर चित्रपटातील विनोद हा किंचित असंवेदनशीलतेच्या अंगाने जाणारा आहे. सत्तर वर्षांपूर्वी कादंबरी लिहिली त्यावेळी तमिळनाडूच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत ते चालून गेलेलं असलं तरीही आजच्या काळात ते काहीसं अप्रस्तुतच वाटतं. शिवाय मणिरत्नमची विचारसरणी आणि कादंबरीला अभिप्रेत असलेली विचारसरणी या दोन्हींचा संगम करण्याच्या द्राविडी प्राणायामात चित्रपट ना धड या बाजूचा राहातो, ना त्या बाजूला जातो.

    चित्रपटाची आवडून गेलेली दुसरी गोष्ट म्हणजे दिव्य प्रकाश दुबेंनी लिहिलेले हिंदीतील संवाद. मी व्यक्तीश: चित्रपट त्या त्या मूळ भाषेत पाहाण्याचा खंदा पुरस्कर्ता आहे. परंतु इथे मात्र हिंदी संवाद निव्वळ मीटर भरण्यापुरते न राहाता त्या काळाला साजेसे संस्कृतप्रचुर व अर्थवाही झालेले आहे. याउलट महबूबची गाणी मात्र परकीय शब्दांची रेलचेल असलेली आहेत. ती ऐकताना एखाद्याला आपण एतद्देशीय चोळांचा गौरव ऐकतोय की आक्रमणकारी मुघलांचा असा प्रश्न पडल्यास नवल नाही. त्यामुळे संवाद वेगळ्या संस्कृतीचे आणि गाणी वेगळ्याच असा एक ठिगळछाप प्रकार चित्रपटाचा रसभंग करणारा ठरतो. रहमानचे संगीत किती जरी दैवी असले तरी हिंदीतच नव्हे तर तमिळमध्येसुद्धा लिरिक्स फारसे प्रभावी झालेले नाहीत. वैरामुत्तूची कमतरता पदोपदी जाणवते. शिवाय एक ‘राच्चस मामने’ वगळता इतर सगळ्यांच गाण्यांचं चित्रण अतिशय सुमार पद्धतीने केल्यामुळे रहमानच्या प्रतिभेला पडद्यावर अजिबात न्याय मिळत नाही. तरीदेखील अनेक प्रसंग रहमानने नुसत्या पार्श्वसंगीताच्या ताकदीवर जिवंत केले आहेत! चित्रपटात अगदी सुरुवातीलाच मणिरत्नमच्याही आधी रहमानचे नाव येते, हीच त्याच्या अद्वितीयतेची पावती आहे. विक्रम गायकवाडांची रंगभूषा (खात्री करणे आवश्यक), तोट्टा तरणीचं नेपथ्य आणि एका लखानीची वेशभूषा या चित्रपटाच्या अत्यंत जमेच्या बाजू.

    मला वाटतं महापुरुषांप्रमाणेच काही कलाकारही त्या त्या काळाची अपत्यं असतात. मणिरत्नम हा अत्यधिक प्रतिभेचा धनी आहे. त्याने काही काळ विश्रांती घेऊन स्वतःचा नव्याने शोध घ्यायचा प्रयत्न केल्यास त्याच्याकडे सांगण्यासारखे कदाचित अजूनही खूप काही असू शकेल. परंतु दशकभरापूर्वीपर्यंत जशी चौकटींची आखणी, कथाकथन आदी सगळ्याच विभागांमध्ये त्याची स्वतंत्र छाप दिसायची, तशी या चित्रपटात एकाही चौकटीत दिसत नाही. फार लांब कशाला, त्याच्याच मागच्या ‘चेक्का चिवन्ता वानम्’ची सुरुवातीची चौकट आठवा, आरशात दिसणाऱ्या प्रतिबिंबातून पात्र दाखवणे केवढे रंजक होते! त्या दर्जाची एकही चौकट या चित्रपटात दिसत नाही. अखेरचं नौकायुद्ध अतिशय रोमांचक झालंय, परंतु तोपर्यंत एक तर वेळ निघून गेलेली आहे आणि दुसरे म्हणजे त्यासारख्या प्रसंगांची त्याहून चांगली हाताळणी अनेक इंग्रजीच नव्हे तर प्रादेशिक चित्रपटांतूनही प्रेक्षकांनी आधीच पाहिली आहे. मानवी मनाच्या गुंतागुंतीइतकीच बजेटला न्याय देणाऱ्या गोष्टींमधील गुंतागुंत कौशल्यपूर्वक मांडली गेली असती तर ‘पोन्नियिन सेल्वन’चा पहिला भाग सुसह्य झाला असता. सध्याची कलाकृती तमिळमध्ये अभिनेते, संगीत व स्मरणरंजनाच्या जोरावर चालून जाईल, परंतु इतरत्र ती चालणे व त्याहून पुढे स्मरणात राहाणे अतिशय दुरापास्त आहे.

    *३/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [इतर लेख वाटण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • टबू – असंतांची गोष्ट

    टबू – असंतांची गोष्ट

    १८१४ साल आहे. इंग्लंडचं अमेरीकेशी तुंबळ युद्ध सुरू आहे. ईस्ट इंडिया कंपनी ही जणू प्रतिपरमेश्वरच असावी इतकी ताकदवान आहे. इंग्लंडचा राजा तिसरा जॉर्ज हा शब्दशः वेडा आहे आणि सारा कारभार हा त्याचा अहंमन्य, दारुडा पोरगा चौथा जॉर्ज (मार्क गॅटिस) सांभाळतो आहे. अशा भयाण वातावरणात एक छोटीशी घटना घडते. डेलनी शिपिंग कंपनीचा मालक होरेस डेलनीचा (एडवर्ड फॉक्स) मृत्यू होतो. आणि साऱ्या इंग्लंडचेच नव्हे तर अमेरीकेचेही राजकारण ढवळून निघते. का? अशी कोणती मालमत्ता होती होरेस डेलनीकडे की जिच्यासाठी सगळ्यांनीच झुरावं?

    त्याहून धक्कादायक गोष्ट घडते ती वेगळीच. डेलनीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्याचा आफ्रिकेत बेपत्ता झालेला मुलगा जेम्स (टॉम हार्डी) अचानक अवतरतो. होरेसच्या मालमत्तेचा तो एकमेव वारसदार आहे. त्याच्या आगमनाने त्याच्या बहिणीचा नवरा थॉर्न गियरी (जेफरसन हॉल) जो इतके दिवस मालमत्तेच्या वाटाघाटींमध्ये मध्यवर्ती होता, तो एकदमच निष्प्रभ होऊन जातो. जेम्सच्या येण्यामुळे राजकारणाची सगळीच समीकरणं बदलतात आणि तो अचानकपणे इंग्लंडचं राजघराणं, ईस्ट इंडिया कंपनी आणि निर्दय अमेरीकेसाठी पायात सलणारा काटा होऊन बसतो.

    ‘टबू’ या छोट्याशा मालिकेची ही गोष्ट. आणि विशेष म्हणजे या कथेमध्ये कुणीच, अगदी एकही व्यक्ती संत नाही. सगळेच स्वार्थी, नीच, आणि कुकर्मांनी बरबटलेले आहेत. इंग्लंडचं राजघराणं माजलेलं आहे, ईस्ट इंडिया कंपनी त्याहून दुप्पट माजलेली आहे आणि अमेरीका आत्यंतिक निर्दय आहे. असे तीन हत्ती मिळून ज्याची शिकार करायची ठरवतात तो जेम्स डेलनी सिंह आहेच, पण तोही सज्जन नाही. हे तिघं मिळून काय पापी असतील त्यांच्या दहापट तो पापी आहे. सत्य, सुंदर, पवित्र असं त्याच्याकडे काहीच नाही. आहे ते एक स्वप्न आणि मनाच्या अडगळीत कुठेतरी हरवलेली मानवता. तो या तिघांना नुसतं अंगावरच घेत नाही तर ज्या बेक्कार पद्धतीने झुंजवतो, त्याला तोड नाही. तोड नाही म्हणजे शब्दशः तोड नाही. इतकं सूक्ष्म कंगोऱ्यांचं राजकारण क्वचितच एखाद्या मालिकेत पाहायला मिळतं. सगळ्यांत कमालीची गोष्ट ही की, एक सिंह आणि तीन हत्तींच्या महासंग्रामाची ही देदिप्यमान गाथा निर्मात्यांनी मंद आच ठेवूनही केवळ आठच भागांमध्ये सुफळ, संपूर्ण सांगून दाखवलीये. ‘टबू’ कुणी निर्मिलीये माहितीये? ज्या स्टीव्हन नाईटने ‘पीकी ब्लाईंडर्स’ लिहिली व बनवलीये तो या मालिकेचा लेखक तर आहेच शिवाय निर्मिकांपैकी एक आहे! अन्य दोघे निर्मिक आहेत स्वतः टॉम हार्डी आणि त्याचे वडील चीप्स हार्डी. आणि सांगतो, रीड्ली स्कॉट हा या मालिकेच्या निर्मात्यांपैकी एक आहे. आता लावा दर्जाचा अंदाज!!

    टॉम हार्डी काय ताकदीचा कलावंत आहे, हे मी नव्याने सांगण्याची गरज नाही. ही सबंध मालिका म्हणजे त्याच्या एकट्याचा अश्वमेध, एकट्याचा दिग्विजय म्हटला तरी चालेल इतका तो जबरदस्त खेळतो. वर म्हटल्याप्रमाणे जेम्स हा खलनायकांपेक्षा दहापट जास्त पापी आहे. आपण त्याला कचकचीत शिव्या घालतो आणि तरीही तोच जिंकावा असं मनापासून वाटत राहातं आपल्याला. ही नुसती लेखकाची ताकद नाही तर टॉमच्या अद्वितीय अभिनयाचं हे यश आहे. तो जेव्हा जेव्हा I have a use for you हे वाक्य उच्चारतो, मार्लन ब्रँडोने साकारलेल्या व्हिटो कॉर्लिऑनीचे एक वेगळेच, ब्रिटीश रूप दिसते! टॉमइतका स्क्रिनटाईम नसूनही तोडीस तोड काम केलंय ते जोनाथन प्राईसने. त्याने साकारलेला सर स्टुअर्ट स्ट्रेंज हा ब्रिटीश अरीस्टोक्रसीचं मूर्तीमंत रूप भासतो. आणि त्याच्याहूनही कमी स्क्रिनटाईम असून मार्क गॅटिसने आपली भूमिका खणखणीत वाजवलीये. अक्षरशः किळस वाटायला लावतो तो प्रिन्स जॉर्जची. ऊना चॅप्लिन मुळातच भारी आहे. पण तिच्यापेक्षा जास्त लक्षात राहाते ती जेसी बक्लीने साकारलेली लोर्ना. काय सुंदर विणलीये तिची भूमिका!

    एक भारतीय म्हणून इंग्लंडने आपल्यावर पारतंत्र्याच्या काळात केलेल्या अत्याचारांबद्दल आपल्याला मनस्वी चीड असते. स्वा. सावरकर वगैरे क्रांतिवीरांनी अंदमानसारख्या नरकात काय यातना भोगल्या असतील याची आपण वर्णने वाचलेली, ऐकलेली असतात. परंतु इंग्लंडच्या अमानुषतेची या मालिकेत दृश्य झलक जेव्हा दिसते तेव्हा शरीरच नव्हे तर मनही शहारून जातं. आणि अशा चहुबाजूंनी अमानुषतेने वेढलेल्या जगात जेव्हा एक कुणीतरी त्या नीचतम इंग्लंडला, त्या क्रूरतम ईस्ट इंडिया कंपनीला आणि त्या स्वार्थपरायण अमेरीकेला त्यांच्याच खेळात बोटावर नाचवतं, तेव्हा पाहायला मजा येणं साहजिकच आहे. पण ही मालिका यातील कोणतीही गोष्ट संयततेच्या मर्यादेबाहेर जाऊ देत नाही. किंबहूना मालिकेतील भडकपणात संयतता आहे, बटबटीत गोष्टींमध्ये तरलता आहे, म्हणूनच त्या कित्येक पट अधिक अंगावर येतात. मालिकेचं छायाचित्रण तर अप्रतिम आहेच, परंतु संपादनाने मालिकेचा वेग असा काही मस्त राखलाय की ज्याचं नाव ते!

    पटकथालेखनात म्हणतात की, तुमच्या नायकाला सहजासहजी लक्ष्यापर्यंत पोहोचू देऊ नका, त्याच्यासमोर अडचणींचे डोंगर उभे करा, तरच तुमची कथा मनोरंजक होऊ शकेल. ‘टबू’ हा नियम पाळता-पाळता कित्येकदा तोडून, मोडून, फेकून देते आणि तरीही मालिकेची रंजकता कणभरानेही कमी होत नाही. मी सहज म्हणून एखादाच भाग पाहावा असा विचार करून बसलो होतो, तो कधी या खोल डोहात आकंठ बुडालो माझं मलाच समजलं नाही. ‘टबू’ची तुलनाच करायची झाली तर ती नैसर्गिकपणे केवळ ‘पीकी ब्लाईंडर्स’शीच होऊ शकते. मात्र ‘टबू’चा आवाका आणि विस्तार कमी असल्यामुळे असेल कदाचित, पण मला व्यक्तिश: ही मालिका ‘पीकी ब्लाईंडर्स’पेक्षा अनेक पटींनी जास्त आवडलीये. तरीही मला तिची तुलना आणखी एका मालिकेशी करायचा मोह टाळता येत नाहीये, ती म्हणजे ‘बॉडीगार्ड‘! कारण दोन्हीही मालिकांची पहिली पर्वं विलक्षण उत्तुंग झाली आहेत आणि तरीही दुसरे पर्व येणार येणार म्हणूनही त्यांचा अद्याप तरी काहीच पत्ता नाहीये. अर्थात ‘बॉडीगार्ड’ ही कर्तव्यपरायण सैनिकाची गोष्ट असली तरी ‘टबू’ मात्र शब्दशः असंतांची गोष्ट आहे आणि म्हणूनच अधिक मादकदेखील आहे. नुसती मादकच नाही तर चटक लावणारी, जहरी मादक!

    *४.७५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • मार्मिक भाष्याने समृद्ध – बिफॉरेनर्स

    मार्मिक भाष्याने समृद्ध – बिफॉरेनर्स

    नॉर्वेतील पुढारलेल्या, शहरी ओस्लोमध्ये एके दिवशी अचानकपणे अश्मयुगीन लोक, प्राचीन व्हायकिंग्स आणि एकोणिसाव्या शतकातील मंडळी झुंडीच्या झुंडीने प्रकट होऊ लागतात. सुरुवातीचा बावरलेपणा ओसरल्यावर आजचे जगही त्यांना सामावून घेते, किमान प्रयत्न तरी करते. पण ते आजच्या लोकांचे पूर्वज असले तरीही त्यांच्या संस्कृतींमध्ये भूमी-आकाशाएवढे अंतर आहे. काही बाबतीत ते बरोबर आहेत तर काही बाबतीत आजचे लोक. यातून साहजिकपणे संघर्ष उद्भवतो. या पार्श्वभूमीवर ओस्लोच्या पोलिस दलातील अधिकारी लार्स हालंडला (निकोलाई क्लीव्ह ब्रोश) एका अश्मयुगीन महिलेच्या खुनाच्या तपासासाठी काहीशा अनिच्छेनेच इन्क्लुझिव्हनेसच्या हट्टापायी भरती केलेली, व्हायकिंग काळातून आलेली तरुण अधिकारी आल्फ्हिद्र एंगिन्स्दोत्तिरसोबत (क्रीस्टा कोसोनेन) काम करावं लागतं. कथानकाचा एक एक पापुद्रा उलगडू लागतो तसतसं आपल्याला आकळू लागतं की, त्या खुनाचे धागेदोरे काळात खूपच खोलवर हरवलेले आहेत. हे बीज आहे ‘एचबीओ’ची नॉर्वेजियन मालिका ‘बिफॉरेनर्स’चं.

    मागच्या दशकात मध्यपूर्वेत रक्तरंजित युद्धसापेक्ष परिस्थितीमुळे विविध देशांमधून सहस्रावधी निर्वासित बाहेर पडले. मानवतेबद्दलच्या चुकीच्या संकल्पनांमुळे या निर्वासितांना आश्रय देण्यासाठी डाव्या विचारसरणींनी ग्रासलेल्या युरोपियन राष्ट्रांमध्ये चढाओढ सुरू झाली. हे निर्वासित एकटे आले नाहीत. ते येताना त्यांची कालबाह्य विचारसरणीदेखील सोबत घेऊन आले. पारशी जसे हिंदुस्थानच्या संस्कृतीत दुधामध्ये साखर मिसळावी तसे मिसळून गेले, तसे हे निर्वासित मिसळले नाहीत. उलट आपापल्या आश्रयदात्यांच्या राष्ट्रांनाच आपल्यासारखे कालबाह्य बनविण्यासाठी ते झटू आणि झगडू लागले. त्यातून युरोपात दंगली, हल्ले आणि जाळपोळींचे जे सत्र सुरू झाले ते थांबण्याचे नाव घेत नाहीये. उलट वाढतच चाललेय. इन्क्लुझिव्हनेसच्या भस्मासुराने त्या त्या राष्ट्रांचा बळी घ्यायला सुरुवात केली. ‘बिफॉरेनर्स’ या घटनाक्रमावर अतिशय मार्मिक भाष्य करते. ते त्यांच्या कथेच्या परीघात सोयीस्कर जेण्डर पॉलिटिक्स, रिव्हर्स रेसिझम, व्हिक्टिम कार्ड, अशा अनेक पॉलिटिकली इनकरेक्ट परंतु खऱ्याखुऱ्या मुद्यांना हात घालतात. ख्रिश्चॅनिटी आणि नॉर्स मंडळींचा मूळ पंथ यांच्यातील संघर्ष अधोरेखित करतात. मालिकेचे नावच ‘बिफोर’ आणि ‘फॉरेनर्स’ या दोन शब्दांचा शब्दच्छल आहे. असे इतरही सुरेख शब्दच्छल मालिकेत ऐकायला व पाहायला मिळतात, उदाहरणार्थ टाईम अधिक इमिग्रंट्स अर्थात ‘टाईमिग्रंट्स’.

    मालिकेत वापरलेली एकूण एक गाणी चपखल आहेत. परंतु त्यांनी शीर्षकगीत म्हणून वापरलेल्या बॉबी ब्लॅण्डच्या ‘एण्ट नो लव्ह इन द हार्ट ऑफ द सिटी’च्या निवडीला तोडच नाही. मालिकेच्या सुरुवातीला नायक हार्ट ऑफ द सिटीमध्ये घर घेतो आणि त्याच दिवशी घडू लागलेल्या घटनांमुळे तो संपूर्ण भागच हळूहळू बदलून जातो, या वर गाणे तिरकस भाष्य करते. पण तेवढ्यावरच ते थांबत नाही, तर त्याचे इतरही पैलू कथेच्या ओघात आपल्याला एक एक करून गवसत जातात. या गाण्यासोबत जी श्रेयावली येते, ती त्यांनी जवळपास प्रत्येक भागासाठी नव्याने चित्रित केली आहे. सांस्कृतिक आक्रमणाचा राष्ट्रावर पडणारा प्रभाव त्या चित्रणातून ज्या जबरदस्त रीतीने मांडलाय, तसा मी तरी कोणत्याच मालिकेत आजवर बघितला नव्हता. शहरातील बदलत जाणाऱ्या ग्राफिटी, दरवेळी नव्याने बकाल होत जाणारे भाग इतक्या सूक्ष्म दृष्टीने चित्रित केले आहेत की मनापासून दाद द्यावीशी वाटते.

    ‘बिफॉरेनर्स’कडे भरमसाठ बजेट नाही. परंतु ती कमतरता भरून काढणारी अद्वितीय कल्पनाशक्ती आहे त्यांच्याकडे. विज्ञानकथेच्या परीघात राहूनही ते मानवी नातेसंबंध, राजकारण, धर्म यांच्यावर जी टीप्पणी करतात, ती वाखाणण्यासारखी आहे. मालिका जसजशी पुढे जाऊ लागते तसतसे कथेचे कंगोरे विस्तारत जातात, परंतु क्वचित अपवाद वगळता मालिका कुठेच आपल्या मुळांपासून दूर जात नाही. उलट कथेच्या ओघात निर्माण होणाऱ्या शक्य तितक्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं द्यायचा प्रयत्न करते. त्या उत्तरांमधून निर्माण होणाऱ्या नवनव्या प्रश्नांमधून वाट काढत कथानक पुढे नेण्याची त्यांची शैली स्तुत्य आहे. मालिकेत काही खरोखरीच्या ऐतिहासिक पात्रांचा वापर केलेला आहे. भारतीय मनाला असा वापर काहीसा वादग्रस्त वाटणारा असला, तरीही मालिका या प्रत्येक पात्राची काल्पनिक चांगली आणि काल्पनिक वाईट, अशा दोन्हीही बाजू धिटाईने मांडते. ऐतिहासिक नाट्य मांडत असतानाही ते विज्ञानकथेचे बोट कुठेच सुटू देत नाहीत, हे विशेष. हे वैशिष्ट्यच ‘बिफॉरेनर्स’ला केवळ चांगली नव्हे तर शब्दशः एकमेवाद्वितीय मालिका बनवते.

    अर्थात त्यातही काही प्रमाणात अनावश्यक नग्नता व अतिरेकी प्रणयाचा अट्टाहास काहीसा विरस करतोच. शिवाय पात्रांना गुंतागुंतीचे बनविण्यासाठी त्यांची पार्श्वभूमी उगाचच मोडकी दाखवणं या क्लिषेचा मालिकेत अतिरेक जाणवतो. ते कमी म्हणूनच की काय, मुख्य पात्रांना उगाचच काहीतरी व्यसन दाखवण्याची क्लृप्तीदेखील काहीशी अनाठायी वाटते. पण जगात संपूर्णतः परिपूर्ण असं काय असतं?

    अद्यापपावेतो दोनच पर्वे व एकूण बाराच भाग, हे गणित डेलिसोप्सच्या फास्टफूडवर पोसलेल्यांना कदाचित पचणार नाही. परंतु अभिजात लेखन आणि विचारपूर्वक मांडणी काय असते हे समजून घ्यायचे असेल, तर ते पचवून घ्यायलाच हवे. प्रत्येक भागामध्ये काही ना काही नैसर्गिक कलाटणी आणणे, हे मालिकेचे आणखी एक वैशिष्ट्य. या वैशिष्ट्यांना धरूनच मालिका एक खून ते आंतरराष्ट्रीय राजकारण या भल्यामोठ्या आवाक्यात लीलया संचार करते. पहिले पर्वच नव्हे तर दुसरेही मोठे रहस्योद्घाटन करत अधांतरीच संपते. तिसऱ्या पर्वासाठी त्यांनी भांडवलाची जमवाजमव सुरू केल्याचे नुकतेच कळते आहे. ते त्यांना हवे तितके मिळावे, ही माझी मनापासून इच्छा आहे. खूप दिवसांनी काहीतरी वेगळे आवडले आहे. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण व्हायलाच हवी!

    *४.५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • आरआरआर — भारताची कथा भारताच्या भाषेत जगाला सप्रेम!

    आरआरआर — भारताची कथा भारताच्या भाषेत जगाला सप्रेम!

    एक आहे जो वरिष्ठ अधिकाऱ्याच्या केवळ एका आज्ञेसाठी सहस्रोंच्या प्रक्षुब्ध जमावात फक्त एक लाठी घेऊन एकटाच घुसतो. जबर जखमी होतो पण आरोपीला पकडून आणतोच आणतो. त्याचं नाव आहे अल्लुरी रामराजू! दुसरा आहे तो जो पूर्ण वाढ झालेल्या जंगली वाघाला जाऊन बिनधास्त भिडतो. वाघ त्याच्या चेहऱ्यावर डरकाळी फोडतो तर हा पठ्ठ्या त्या वाघालाच घाम फोडणारी शतपट डरकाळी फोडतो. त्याचं नाव आहे कोमारम भीम! राम अग्नि आहे तर भीम जल. जलतत्त्व प्राण आणि उदानवायूत विभागले गेले तर अग्निशी अतूट मैत्री करते आणि तीच तत्त्वे जर एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली तर देवासुरांनाही लाजवेल असा संग्राम होतो! याच अतूट मैत्रीची आणि दुर्लभ शत्रुत्त्वाची कथा म्हणजे एस. एस. राजमौलीचा नवाकोरा चित्रपट, ‘आरआरआर’ अर्थात ‘रौद्रं रणं रुधिरम्’!

    एखादी चौकट उभी करण्यासाठी अवकाश आणि काळाला छेद देणारी असीम कल्पनाशक्ती दिग्दर्शकाकडे असणे आवश्यक असते. पण त्याहूनही जास्त आवश्यक असते ती अजून एक गोष्ट, अमर्याद आत्मविश्वास. कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वास राजमौलीकडे जितका आहे, तितका क्वचितच कुणाकडे असेल. पहिल्या दृश्याच्या पहिल्या चौकटीपासून प्रेक्षकाचे डोळे पडद्याला घट्ट जखडून टाकण्याची भीमरूप शक्ती त्याच्याकडे आहे. या एकाच मुद्यावर भारतातीलच नव्हे तर जगभरच्या बहुतांशी दिग्दर्शकांनी राजमौलीचे पाय धुवून चरणामृत प्यायले पाहिजे, तेव्हा कुठे त्याच्या तेजाचा एखादाच अंश त्यांच्यात उतरू शकेल. आपल्या बुद्धीला पटत असतं की समोर जे दिसतंय ते प्रत्यक्ष जगात कधीच घडू शकत नाही, पण आपलं मनच राजमौलीला फितूर होतं आणि बुद्धीला पोत्यात घालून एखाद्या हिंस्र मांजराला दूर सोडून यावं तसं आपण हसत हसत सोडून येतो. आणि हे एकदा घडत नाही तर प्रत्येक चौकटीत घडतं, तीन तास घडतं आणि चित्रपट पाहाणाऱ्या एक, दोन नव्हे तर कोट्यवधी रसिकांसोबत घडतं. म्हणजे त्या दिग्दर्शकभालतिलकाची ताकद केवढी असेल, कल्पना करा फक्त. त्याचे चित्रपट, त्यांच्या चौकटी, त्यांचं प्रत्येक दृश्य ‘चांदोबा’मधील एखादी कथा सादर व्हावी आणि रंगीबेरंगी चित्रे उभारून यावीत तशी आपल्यासमोर उलगडत जातात आणि आपण लहान मूल होऊन त्या विश्वात हरखून जातो. प्रेक्षकांना रडवणं खूप सोपं असतं हो, आणि या देशाच्या श्रद्धेला व येथील बहुसंख्यकांच्या सहनशील धर्माला शिव्या घालून विचारवंत म्हणून मिरवणं तर त्याहूनही सोपं असतं. पण दुनियादारीने गांजलेल्या, पिचलेल्या प्रेक्षकाचं निरागस लहान मूल करून टाकणं आणि त्याला तीन तास अवर्णनीय अनुभव देत गुंतवून टाकणं नुसतं अवघडच नाही तर अशक्यसुद्धा आहे. राजमौली हा चमत्कार लीलया करतो, एकदा नाही तर सहस्रावधी वेळा करतो!

    ‘आरआरआर’चं दुसरं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो शब्दबंबाळ नाही. उलट तो शक्य तितका वेळ चित्रभाषेत बोलत राहातो. आणि जेव्हा चित्रभाषेला अजूनच शतपटींनी उठावदार करण्याची गरज असते, तेव्हा आणि तेव्हाच तो संवादांचा आश्रय घेतो. राजमौलीच्या आजवरच्या समस्त चित्रपटमालिकेत शांततेचा सर्वाधिक परिणामकारक वापर केलेला चित्रपट जर कोणता असेल, तर तो हा आहे! पात्रं तर मौनातून व्यक्त होतातच, परंतु कीरवाणीचं तांडव घालणारं अनुपम पार्श्वसंगीत पडद्यावर अनेक वेळा पूर्णपणे गप्प होतं आणि त्या त्या दृश्यांचा परिणाम न भूतो न भविष्यति वाढतो! राजमौलीने किती सूक्ष्म चिंतनातून दृश्यं रचली असतील, फक्त विचार करून पाहा. कीरवाणीचे पार्श्वसंगीत तर मी गेल्या कित्येक वर्षांत [कदाचित ‘बाहूबली – द कन्क्लुजन’नंतर (२०१७) पहिल्यांदाच!] ऐकलेले सर्वश्रेष्ठ रहमानेतर पार्श्वसंगीत आहे. हिंदी, विशेषतः मराठी चित्रपटसृष्टीने हा मुद्दा समजून घ्यायला पाहिजे की, नुसते संगीताचे तुकडे उत्तम असून चालत नाही तर ते पार्श्वसंगीत तांत्रिकदृष्ट्या निर्दोषदेखील असले पाहिजे. कीरवाणीचे संगीत आणि त्यासोबतचे ध्वनीसंयोजन शब्दशः निर्दोष आहेत. एकच गोष्ट केवळ विरस करते ती म्हणजे गाणी उत्तमच असली तरी त्यांच्यावर ‘बाहूबली’चा नको वाटण्याइतपत प्रभाव आहे. पण गाण्यांसाठीसुद्धा राजमौलीने अशा सुरेख जागा काढल्या आहेत की काय महिमा वर्णू! वर म्हणालो होतो ना की, चित्रभाषेच्या पुढचे संवाद आहेत, तसंच जिथे संवादांच्या पुढे जाण्याची गरज पडते तिथेच फक्त राजमौलीने गाणी वापरली आहेत.

    के. व्ही. विजयेंद्र प्रसादांची कथा मुळातच एखाद्या रमणीसारखी देखणी आहे. पण जेव्हा त्या कथेला राजमौली पटकथेचा श्रृंगार चढवतो तेव्हा तर तिची अशी काही त्रिभुवनसुंदरी होऊन जाते की, कुणीही सहज प्रेमात पडावं! दोन महानायक, दोघांचाही अफाट चाहतावर्ग. पण असं एकदाही म्हणायला जागा नाही की याला कमी वाव दिलाय आणि त्याला जास्त. उलट दोन्हीही मुख्य पात्रे सतत एकमेकांना आणि पर्यायाने चित्रपटालाही उत्कर्षाकडे खेचतच राहातात! इतकी संतुलित पटकथा मी गेल्या अनेक वर्षांत मुख्य प्रवाहातील कोणत्याच चित्रपटात पाहिली नव्हती. दोन्हीही मुख्य पात्रांची सुसंगती (केमिस्ट्री) ही नुसती सुंदरच नाही तर आजच्या काळात दुर्लभदेखील आहे. एवढी निर्व्याज मैत्री पडद्यावर साकारायला माणूसही तसाच सच्चा असावा लागतो. राजमौलीच्या सच्चेपणाला तारक आणि रामचरण दोघांनीही अजोड साथ दिली आहे. पडद्यावर पात्रांमध्ये सुसंगती दिसण्यासाठी मुळात ती कलाकारांमध्ये असायला हवी, हे दोघेही त्या सुसंगतीचे अप्रतिम उदाहरण म्हणून समोर येतात. विशेष म्हणजे पटकथेत सर्वत्र सांकेतिकतेचा मुक्तहस्ते वापर केलाय. तो इतका सोपा आहे की, सामान्यातिसामान्य प्रेक्षकालाही चटकन कळावा पण इतका संयत आहे की तो कुठेच भडक, बटबटीतसुद्धा न वाटावा. हाच तो पटकथेतील समतोल! चित्रपटात अनेक दृश्ये, संवाद असे आहेत की त्यांचा संदर्भ इतर वेगवेगळ्या प्रसंगांत लागत जातो. पण तो संदर्भ किती जरी बारीक असला तरीही नंतरच्या त्या त्या दृश्यात तो बरोब्बर तीव्रतेने आठवतोच आठवतो. राजमौली चित्रभाषाकोविद असण्याचे याहून मोठे कोणते उदाहरण असेल!

    मला अभिमान आणि काहीसा खेददेखील वाटत राहातो की, चित्रपट माध्यमाचा अभ्यास करत असल्यामुळे बरेचदा एखाद्या चित्रपटाच्या कथेत येणारी वळणं मला अचूक समजतात. परंतु इथे मी प्रामाणिकपणे मान्य करतो की, मध्यंतराच्या जरासं आधी कथेत जो एक अनपेक्षित धक्का बसतो तो मला बापजन्मीदेखील ओळखता नसता आला. इतकी सोपी युक्ती वापरून राजमौलीने तो आधी लपवलाय की त्यामुळेच तो ओळखायला अशक्य झालाय. या, या अद्वितीय सामर्थ्याला मी मान लववून प्रणाम करतो! त्यानंतर थोड्याच वेळात एका प्रसंगामध्ये भीमाच्या पाठिशी जलधारा नाचत असतात तर रामच्या पाठिशी अग्नितांडव सुरू असते, तो राजमौलीच्या दिग्दर्शनाचा परमोच्चबिंदू आहे. की ज्या भीम रामाला खांद्यावर घेतो व ते दोघे मचाणावर उडी मारतात तो राजमौलीच्या दिग्दर्शनाचा परमोच्चबिंदू आहे? खरं सांगू, अशी शेकडो दृश्ये सांगता येतील. प्रत्यक्षात सबंध चित्रपटच राजमौलीच्या दिग्दर्शनाचा परमोच्चबिंदू आहे!

    एक वेंकटेस्वरुलुचा (समुद्रकणी) अपवाद वगळता चित्रपटात एकही पात्र उगाचच नाही. समुद्रकणीसारख्या ख्यातकीर्त अभिनेत्याला इतकी सोपी भूमिका का दिली असावी? कदाचित चित्रपट बहुभाषिक असल्यामुळे तमिळ प्रतिनिधित्वासाठी ते केलं असावं. पण तो एक अपवाद आहे. बाकी प्रत्येक पात्र ज्याला पडद्यावर वावरण्यासाठी विशिष्ट वेळ दिला आहे, ते प्रत्येक पात्र असं खुबीने योजलंय की त्याने कथा काही कोस तरी पुढेच नेली पाहिजे. सुरुवातीला मला वाटलं होतं की सीतेचे (आलिया भट्ट) पात्र उगाच आहे की काय, पण तिसऱ्या अंकात सुरुवातीला ती कथेला जे निराळेच वळण देऊन जाते, ते अचंबित करणारे आहे. रामायणावर चिंतन करताना मला कायम वाटायचं की वनवासी राम हा दाढी मिश्या वाढवलेलाच असणार. रामचरण हा त्या माझ्या कल्पनेतला राम साक्षात साकारतो. पण वाचिक आणि कायिक अभिनय या दोन्हीही बाबतीत त्याला तारकने अक्षरशः कच्चा खाल्लाय! अजय देवगणने लहानश्याच भूमिकेत अक्षरशः जीव ओतलाय. ॲलिसन डूडी, रे स्टिव्हनसन यांनी खलनायक चपखल साकारलेयत. ऑलिव्हिया मॉरीस कमालीची गोड दिसते.

    के. के. सेंदिलकुमारचे छायांकन अप्रतिम झाले आहे. पण खरा कस संपादक ए. श्रीकर प्रसादचा लागला असणार. एवढ्या सुंदर शॉट्सपैकी काय ठेवायचं काय काढायचं आणि एवढा प्रचंड परीघ असलेल्या चित्रपटाची चटपटीत मांडणी करायची म्हणजे काही खायचे काम नाही! ‘बाहूबली’तील विभास जबरदस्त होते, तर ‘आरआरआर’मधील विभास त्याहूनही श्रेष्ठतर झाले आहेत. दुसरे म्हणजे नेपथ्य कसे उभारावे व त्याचा कसा शंभर टक्के वापर करून घ्यावा, याचा वस्तुपाठ म्हणजे ‘आरआरआर’! साडेपाचशे कोटींच्या बजेटमधील एकूणएक रुपया पुरेपूर वापरून घेतलाय आणि त्यातून झालेली निर्मिती नुसती अचाटच नाही तर चपखलदेखील झाली आहे! एका एका दृश्यावर परिच्छेदामागून परिच्छेद लिहिता येतील खरं तर, पण विस्तारभयास्तव एकच सांगतो. तिसऱ्या अंकाचा उत्कर्षबिंदू पाहा. केवढ्या सुंदर सांकेतिकतेतून राजमौलीने दाखवून दिलंय की या राष्ट्राचं उत्थान व्हावयाचं असेल तर राम आणि भीम एकत्र येण्यातूनच ते होऊ शकतं! त्याच प्रसंगापूर्वी म्हणजे तिसऱ्या अंकाच्या सुरुवातीला राजमौली रामायणाची कथा पूर्णपणे उलट फिरवतो, ती माझ्या मते या पटकथेतील सगळ्यांत सुंदर जागा आहे.

    वर एका परिच्छेदात मी प्रेक्षकांसाठी निरागस शब्द वापरलाय. तो जाणूनबुजून वापरलाय बरं का! तसं बघायला गेलं तर रामराजू आणि भीम एकमेकांना कधीच भेटले नव्हते. त्यांचं खरं क्रांतिकार्यदेखील चित्रपटाच्या कथाभागानंतर जवळपास दहा वर्षांनंतर सुरू झालंय. थोडक्यात चित्रपट हा त्या दोघाही महान क्रांतिकारकांची काल्पनिक मूळकथा (ओरिजिन स्टोरी) मांडतो. हा ऐतिहासिक चित्रपट नाहीये तर इतिहासाची किनार असलेली काल्पनिका (फॅण्टसी) आहे. दुसऱ्या शब्दांत सांगतो, राजमौलीने चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली नाहीये तर सबंध चित्रपटच सिनेमॅटिक लिबर्टी आहे! पण तरीही तुरळक विवाद सोडल्यास बहुतांशी प्रेक्षकांनी त्याला हसतमुखाने स्वीकारलंय. का? हिंदी ऐतिहासिक चित्रपटांमध्ये लहानसा बदल जरी केला तरी लोक चवताळतात. इथे तर खऱ्याखुऱ्या पात्रांना कल्पनेचा साज चढवलाय तरीही लोकांच्या भावना दुखावत नाहीयेत. का? या सगळ्या ‘का?’चं उत्तर एकच आहे आणि ते हे की, चित्रपट ‘वोक’ नाहीये  आणि म्हणूनच तो प्रेक्षकांनी आपला म्हणून स्वीकारलाय. बहुतांशी वेळा हिंदीत किंवा इतरही तथाकथित आशयघन चित्रपटसृष्टींमध्ये ऐतिहासिकपट बनवताना जेव्हा जेव्हा सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाते, तेव्हा तेव्हा दिग्दर्शक त्याची ‘वोक’ – पण कालबाह्य झालेली मूल्यं पात्रांवर, कथेवर लादायचा प्रयत्न करतो. त्याने पात्रांचे सोशल विदुषक होतात आणि कथेची बेचव भेळ होऊन बसते. म्हणून लोक चवताळतात. म्हणून लोक नाकारतात. राजमौली असा मूर्खपणा करत नाही. तो त्याच्या मायबाप प्रेक्षकांना मूर्खात काढत नाही. तो आपल्या कलाकृतीतून रसिकांना उद्धट शिवी घालत नाही. तो लोकांच्या निर्भेळ भावनांना कलेतून अलगद साद घालतो. त्याचा चित्रपट आस्थेच्या, श्रद्धेच्या प्रतीकांना विचित्र विचारसरणींपायी दूर लोटत नाही, उलट अभिमानाने मिरवतो. त्याची ऐतिहासिक पात्रं काल्पनिकतेचा साज लेऊन जरी आली तरी ती जी मूल्यं मांडतात ती काल्पनिक पॉलिटिकल करेक्टनेसची नाहीत. त्याची पात्रं जी मूल्यं मांडतात ती या राष्ट्राच्या मातीतील आहेत, कालजयी आहेत, चिरंतन आहेत आणि म्हणूनच सुसंगत आहेत. म्हणून लोक त्यांना प्रेमाने स्वीकारतात.

    राजमौलीचा विकास नीट पाहा. ‘बाहूबली’ द्वयी (२०१५-१७) साकारायला ‘मघाधीरा’पेक्षा (२००९) लाखपटींनी अवघड होती. पण मी अत्यंत जाणीवपूर्वक विधान करतो की, ‘आरआरआर’ हा ‘बाहूबली’पेक्षा लाख पटींनी गुंतागुंतीचा व साकारायला अवघड आहे. आणि म्हणूनच सांगतो, राजमौली त्याच्या भरमसाठ बजेटमुळे यशस्वी नाही. राजमौली भारताची कथा, भारताच्याच भाषेत अत्यंत अभिमानाने सबंध जगाला डंके की चोट पे ऐकवतो, म्हणून यशस्वी आहे. ‘आरआरआर’चं सार हेच आहे. ‘आरआरआर’ या बाबतीत ‘बाहूबली’पेक्षाही सरस आहे!

    *५/५

    — © विक्रम श्रीराम एडके

    [अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com]

  • परिपूर्ण दर्जाचे लेणे – लाईन ऑफ ड्युटी

    परिपूर्ण दर्जाचे लेणे – लाईन ऑफ ड्युटी

    आपल्याकडे म्हण आहे की, एक सडका आंबा अवघी पेटी नासवून टाकतो. पण सध्याचं वास्तव त्याच्या अगदी उलट झालंय. सगळ्या पेट्याच नासक्या आंब्यांनी भरलेल्या आहेत. त्यात एखादाच आंबा चांगला असेल आणि दैवयोगाने त्याच्यावरच जर सडके आंबे वेचून फेकायची जबाबदारी आली तर? वरवर पाहाता हे काम अतिशय धाडसी, साहसी, शूर वगैरे गुणांनी संपन्न अशा रुबाबदार नायकाचं अथवा नायकांचं वाटतं. पण लक्षात घ्या, आपण बोलतोय ते वास्तवाबद्दल. वास्तवात जर सडक्या आंब्यांचीच बहुसंख्या असेल तर त्या चांगल्या आंब्याला त्यांना वेचून काढणे तर दूरच, पण निव्वळ जगणेदेखील अवघड होऊन बसणार हे सांगायला काही कुणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही. पाण्यात राहून मगरीशी वैर करणाऱ्या माश्याला प्रत्यक्षात केवळ मगरीपासूनच नव्हे तर स्वजातीय माशांपासूनही तितकाच धोका असतो की, न जाणो मगर याच्या नादाने आपल्यावरच उलटली तर काय? व्हिसलब्लोअर्स हे नाटक, सिनेमे आणि कथा, कादंबऱ्यांमध्येच नायक असतात. प्रत्यक्ष जगात त्यांच्यापैकी कित्येकांना लपत-छपतच जगावं लागतं. तुम्ही म्हणाल मासे काय, आंबे काय, मी काय खाण्यापिण्याच्या गोष्टींवर बोलतोय की काय! नाही, मी बोलतोय ते ब्रिटनच्या ‘बीबीसी’ची जगप्रसिद्ध मालिका, ‘लाईन ऑफ ड्युटी’बद्दल!

    पोलिसांचं काम असतं, अपराध्यांवर वचक ठेवणं. पण पोलिसच गुन्हेगार झाले तर त्यांच्यावर वचक कोण ठेवणार? इथे येते ब्रिटिश पोलिस खात्यातील भ्रष्टाचारविरोधी शाखा, अर्थातच काल्पनिक ‘एसी १२’. या शाखेचा महाधिक्षक असलेल्या टेड हेस्टिंग्सचं (एड्रियन डनबार) एकच सूत्र आहे जे त्याच्या एका संवादातून वारंवार येतं, ‘I’m interested in bent Coppers and bent Coppers only’ . बेण्ट कॉपर्स अर्थात भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांच्या पलिकडे तो कसलाच विचार करत नाही. आणि एकदा का त्याला तसा वास आला तर तो कुणाच्या बापाच्यानेही थांबत नाही. या कामात त्याला मदत करतात त्याचे दोन निष्ठावंत सैनिक, स्टीव्ह अर्नॉट (मार्टिन कॉम्प्स्टन) आणि केट फ्लेमिंग (विकी मॅक्क्ल्यूर). एकेका पर्वात एकेका भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याचा पर्दाफाश करतानाच ते व पर्यायाने मालिका ही कुठेच भाषणबाज न होता देखील सबंध व्यवस्थेवर बोचरं भाष्य करून जाते.

    या शेवटच्या मुद्यावर ‘लाईन ऑफ ड्युटी’ची तुलना ही ॲमेझॉनच्या ‘बॉश’शी (२०१४-२१) करता येईल. त्यातदेखील व्यवस्थेवर याच दर्जाचं भाष्य केलंय. यातदेखील ‘बॉश’सारखेच कसलाही धरबंद नसलेले अपराधी आणि नियमांच्या बेड्यांनी बांधलेले पोलिस आहेत. पण एका महत्त्वाच्या बाबतीत मात्र ‘लाईन ऑफ ड्युटी’ ‘बॉश’पेक्षा वेगळा मार्ग निवडते. हा या मालिकेचाच नव्हे तर ‘स्पूक्स’सारख्या (२००२-११) काही ओव्हर-द-टॉप मालिका वगळता बहुतांशी ब्रिटिश मालिकांचा स्थायीभाव आहे, तो म्हणजे नाट्यमयतेतील संयतपणा! प्रत्यक्षात दाखवताना ते एखादंच साहसदृश्य दाखवतील अथवा दाखवणारही नाहीत, पण आतमध्ये मात्र नाट्यमयतेचा कल्लोळ सुरू असतो व तो सूचकपणे त्यांच्या संहितांमधून बरसत असतो. कंटेंटच्या तात्पुरत्या मुसळधार पावसापेक्षा अशी दमदार रिमझिम मला भारी आवडते, अंतरात्म्यापर्यंत चिंब करून सोडते पार! ‘लाईन ऑफ ड्युटी’मध्येदेखील पहिल्या पर्वाच्या शेवटी जसा कथेत एक गूढ धक्का बसतो, तसा मालिकेच्या पटाचा अंदाज येऊ लागतो. तो पट इतका भव्य आहे की, आपले नायक त्याच्यापुढे खुजे वाटू लागतात. सामना अवचितच मानवी राम आणि महाकाय रावणाच्या सामन्यासारखा असंतुलित वाटू लागतो. त्रेतायुगात या युद्धाचा निकाल काय लागला होता, आपल्याला ठाऊकच आहे, पण कलियुगात कशाची खात्री देता येते का?

    आपल्याकडे अशा विषयावर मालिका बनवताना एक तर व्यवस्थेची खूपच वरवर चाचपणी तरी केली जाते किंवा मग वोक कलाकारांचा अराजकवादी प्रपोगण्डा राबवून समस्त व्यवस्थेलाच खलनायक ठरवलं जातं. ‘लाईन ऑफ ड्युटी’ दोन्हीही प्रकारचा वेडगळपणा करत नाही. ते राजकारण, हितसंबंध वगैरे कशा कशाचीच पर्वा न करता थेट एखाद्या तीक्ष्ण दाभणीसारखे आतपर्यंत घुसत जातात, त्यातून निघणाऱ्या रक्त, पू यांच्याकडे लक्ष न देता मालिकेतील पात्रांचं शल्यकर्म सुरूच असतं. आणि अर्थातच ते नायक आहेत म्हणून त्यांना प्लॉट-आर्मर असण्यापेक्षा ते सगळेच आपापल्या कृतींचे परिणामही अतिशय कठोरपणे भोगतात. दुसरे म्हणजे ही मालिका कुठेच व्यवस्थेला खलनायक ठरवत नाही. उलट त्यातील सुष्ट पात्रांचा ते ज्या व्यवस्थेला सुधारू पाहातायत त्या व्यवस्थेच्या मूळ शिवस्वरूपावर अतोनात विश्वासच आहे. किंबहूना त्यांचा तसा विश्वास आहे, म्हणूनच ते सातत्याने हा द्राविडी प्राणायाम सहस्रावधी संकटांनंतरही करतच राहातात. या बाबतीत ही मालिका ‘बॉश’पेक्षा वरचढ आहे. कारण, हॅरी बॉशला निदान एका मर्यादेपलिकडे ढकलल्यावर थेट बॅटमॅन बनायचं सुख तरी आहे. पण ‘लाईन ऑफ ड्युटी’मधील एकही सुष्ट पात्र तसं करणं तर सोडाच, पण व्यवस्थेच्या विरोधात जाऊन व्हिजिलंट जस्टिस लादण्याचं मनातही आणत नाहीत. ते त्या व्यवस्थेच्या जाचक बंधनांत राहूनच आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत राहातात कारण, जर व्यवस्था सुधारण्यासाठी ती तोडण्याची गरज पडत असेल तर त्याच व्यवस्थेने त्यांच्यासारखे चांगले अधिकारीदेखील घडवले आहेत या सत्याशी आपोआपच प्रतारणा ठरेल. या दाहक परंतु सत्य अशा विरोधाभासामुळेच त्यांची हतबलता जास्त बोचत राहाते पाहाणाऱ्याला.

    ‘लाईन ऑफ ड्युटी’चं सगळ्यांत उत्कृष्ट वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात संशयाची सुई कुणाकडेही, अगदी कुणाकडेही फिरू शकते. हा तसा म्हटलं तर घासून-घासून गुळगुळीत झालेला प्रकार आहे. पण ही मालिका त्याच क्लिषेला वास्तववादी पुराव्यांचा असा काही भरभक्कम पाया देते की, प्रत्येक संशयित हा खरोखरच अपराधी वाटू लागतो. वर मी एका ठिकाणी लिहिले आहे की, केट आणि स्टिव्ह हे टेडचे निष्ठावंत आहेत, पण मालिकेच्या एकूण प्रवासात या तिघांच्याही निष्ठांचा अतिशय अनपेक्षित ठिकाणी अनेकदा कस लागतो व त्यातून कल्पनातीत कलाटण्या मिळत जातात. लेखनाच्या या सूक्ष्म कंगोऱ्यांसाठी या मालिकेची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे!

    दुसरं खरोखर अनुभवण्यासारखं वैशिष्ट्य म्हणजे मालिकेत दाखवलेल्या अत्यंत वास्तववादी उलटतपासण्या अर्थातच इंटरॉगेशन्स. मालिकेच्या नाट्यमयतेतील निम्मं नाट्य हे या उलटतपासण्यांमध्ये आहे. आणि तरीही मी शपथेवर सांगू शकतो की एकदाही, अगदी एकदाही नाट्यमयता आणण्यासाठी म्हणून त्यांनी या चौकश्यांमध्ये आपण बॉलिवूडच्या सिनेमांत पाहातो तशा छपरी युक्त्या वापरलेल्या नाहीत. सगळं काही कायद्याने आणि कमीत कमी कल्पनाविलास करून! त्यामुळे त्यांचा उमटणारा ठसा हा अमिट आहे. अत्युत्कृष्ट ‘लाईफ ऑन मार्स’चा (२००६-०७) अत्यंत फालतू सिक्वल ‘ॲशेस टू ॲशेस’ (२००८-१०) पाहून माझे कीली हॉजच्या अभिनयाबद्दल अतिशय वाईट मत झाले होते. पण तिला या मालिकेत पाहून मी तिच्या अभिनयाच्या अक्षरशः प्रेमात पडलोय. आणि केवळ तिच नव्हे तर लेनी जेम्स, डॅनियल मेज, थँडीवे न्यूटन, स्टिव्हन ग्रॅहम, केली मॅक्डोनाल्ड अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या, वेगवेगळा बाज असणाऱ्या अभिनयसंपन्न कलाकारांनी मालिकेची मजा अनेकपटींनी वाढवली आहे. त्यातही टेड हेस्टिंग्सचे काम करणाऱ्या एड्रियन डनबारच्या वाट्याला आलेले संवाद इतके काही अप्रतिम आहेत की बासच! मालिकेत इन्क्लुझिव्हनेसच्या बळजबरीपायी जागोजागी व बरेचदा मुख्य भूमिकांमध्येही अनेक भारतीय वंशाचे कलाकारदेखील दिसतात. मी इथे जाणीवपूर्वक बळजबरीपायी असा शब्द वापरतोय, नाहीतर पटेल अशा गुजराती आडनावाच्या माणसाचं नाव गुरजित असं पंजाबी कोण ठेवतं बरं!

    मालिकेत सूचकता आहे, नग्नता नाही. शिव्या आहेत पण त्यांचा मुक्तहस्ते वापर नाही. आपल्याकडच्या ज्या तथाकथित ओटिटी प्लॅटफॉर्म्सना वाटतं की या दोन गोष्टींशिवाय मालिका बनूच शकत नाही, त्यांनी ही मालिका पाहू नये, अन्यथा जन्माचा धक्का बसण्याची शक्यता आहे. पण या दोन गोष्टींव्यतिरिक्तही हल्ली जी इन्क्लुझिव्हनेसची जबरदस्ती केली जाते, तिला न्याय देण्यासाठी मालिकेने केलेली कसरत वाखाणण्याजोगी आहे. स्त्रिया सगळ्या चांगल्याच दाखवल्या पाहिजेत, विशिष्ट रंगाचे लोक गुन्हेगार नाही दाखवले पाहिजेत, विशिष्ट पंथाचे लोक आतंकवादी नाही दाखवले पाहिजेत वगैरे तथाकथित पोस्ट-ट्रूथ पॉलिटिकल करेक्टनेसच्या अट्टाहासाचा या मालिकेत दुसरी बाजूसुद्धा दाखवून शिताफीने समाचार घेतलाय. एका सीझनमध्ये तर एका लहान मुलाला जाणीवपूर्वक अकल्पनीय घाणेरड्या गोष्टी करताना दाखवलंय. आणि ही गोष्ट उगाचच घुसडलेली नाही, तर तिला मालिकेच्या विश्वात अतिशय पक्का आधारसुद्धा दिलाय.

    ही ब्रिटिश मालिका असल्यामुळे आपल्याकडील मालिकांसारखे तिचे भरमसाठ एपिसोड्स नाहीत. सहा सीझन्स मिळून एकूण छत्तीसच एपिसोड्स आहेत. पण एक एक एपिसोड खराखुरा हिरा आहे हिरा! मालिकेची आत्तापर्यंत नऊ वर्षांत फक्त सहाच पर्वे झाली. सातवे पर्व यायला कथेत जागा आहे, पण ते येईलच असे नाही. आले तरी ते २०२३ च्या आधी खचितच येणार नाही. पण हाती असलेली सहा पर्वे देखील परिपूर्ण आहेत. एका वाक्यात सांगतो, काहीतरी परिपूर्ण आणि तरीही दर्जात्मकदृष्ट्या सर्वश्रेष्ठ पाहू इच्छित असाल तर, डोळे झाकून ‘बॉडीगार्ड’वाल्या (२०१८) जेड मर्क्युरिओच्याच तैलबुद्धीतून साकारलेली ‘लाईन ऑफ ड्युटी’ निवडा व अर्थातच डोळे उघडे ठेवून पाहा!

    *५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • सोल्गॅझम देणारे जॅझ – बॉश

    सोल्गॅझम देणारे जॅझ – बॉश

    ‘बॉश’च्या अखेरच्या पर्वात एक पात्र बॉशचा उल्लेख ‘Bosch is a living legend’ असा करते. हे वाक्य, हे लहानसंच वाक्य एखाद्या सुईसारखे माझ्या कानावाटे मेंदूत शिरले आणि सात पर्वांच्या, सात चित्रकोड्यांच्या, किमान सात हजार आठवणींचे धागे त्याने उसवायला सुरुवात केली. खरं तर नायकाचं नायकत्व अधोरेखित करणारं, त्याची स्तुती करणारं हे वाक्य. पण मला ते तसे वाटलं नाही. मला वाटला तो क्रूर विनोद, आपल्या आसपासच्या जगातील वाढतच चाललेला विरोधाभास अधोरेखित करणारा. बॉश या मालिकेत जे जे काही म्हणून करतो, ते ते सारं त्याचं एक पोलिस अधिकारी म्हणून कर्तव्यच असतं. पण साला, आपण अशा जगात राहातो ना की, हिरो होण्यासाठी हिरोगिरी करण्याची आजकाल गरजच उरलेली नाही, आपलं काम प्रामाणिकपणे करणे ही बेसिक गोष्टच हल्ली एवढी दुर्मिळ झालीये की, तिची पूर्तता करणारी कुणीही व्यक्ती आपसूकच हिरो, शब्दशः लिव्हिंग लिजण्ड वाटू लागते. मायकेल कॉनेलीच्या कादंबऱ्यांवर आधारित अमेझॉनची ‘बॉश’ ही मालिकाच व्यवस्थेवर नेमके भाष्य करणाऱ्या अशा क्रूर विनोदांनी, विरोधाभासांनी भरलेली आहे.

    मी आजवर जितक्या काही मालिका पाहिल्या त्यात ‘बॉश’ सगळ्यांत वेगळी आहे. हिरोनिमस तथा हॅरी बॉश हा एलएपीडीतील हॉलिवूड डिव्हिजनचा होमिसाईड डिटेक्टिव्ह. मालिकेच्या प्रत्येक पर्वात तो एक केस सोडवतो व हा मोठा स्टोरी आर्क गाठतानाच तो काही छोट्या केसेससुद्धा सोडवतो. तुम्ही म्हणाल या परिच्छेदातील पहिलं वाक्य चुकलंय का? कारण या प्रकारच्या मालिकांचा सध्या इतका सुळसुळाट झालाय की स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मच्या गर्दीत डोळे झाकून दगड भिरकावला तरी तो सहजपणे अशाच एखाद्या मालिकेला लागेल. खरंय! ‘पोलिस प्रोसिजरल ड्रामा’ या जॉन्रामध्ये नको तितक्या मालिका बनल्या आहेत. पण तरीही मी छातीठोकपणे सांगतो की, ‘बॉश’ या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. आणि त्याचं कारण आहे, या मालिकेतील अतोनात वास्तववाद! म्हणजे नेमकं काय? तर एक पोलिस डिटेक्टिव्ह असतो, त्याच्यासमोर एखाद्या गुन्ह्याचा तपास लावायचे काम येते, तो ते काम आपल्या अक्कलहुशारीने करतो व अपराध्याला त्याच्या योग्य शिक्षेपर्यंत पोहोचवतो. हा झाला साध्यासरळ पोलिस प्रोसिजरल ड्राम्याचा फॉर्म. ‘बॉश’मध्ये हे सगळे गुण असूनही ती या पैकी कोणत्याही मार्गाने क्वचितच जाते. किंबहूना जातच नाही म्हटलं तरीही चालेल. उलटपक्षी बरेचदा बॉशसमोर येणाऱ्या केसेस हळूहळू मागची सीट पकडतात. ‘बॉश’ ही त्या अर्थाने डिटेक्टिव्ह मालिका नाहीच. तिचा मूळ उद्देश आहे व्यवस्थेवर दिलखुलास भाष्य करणं!

    आपल्याला वाटतं की गुन्हा घडतो आणि पोलिस त्याचा छडा लावतात. पण ही प्रक्रियेची अक्षरशः दोन टोकं आहेत. या दोन टोकांच्या मध्ये जो पेपरवर्कचा डोंगर असतो, कल्पनेपलिकडचं हीनतम अंतर्गत राजकारण असतं, अत्यंत घाणेरड्या मनोवृत्तींचा गुंता असतो आणि छडा लावल्यानंतरही शिक्षेची कसलीच शाश्वती नसते. बहुतांशी पोलिस प्रोसिजरल ड्रामाज हे प्रोसिजरच्या या भल्यामोठ्ठ्या तुकड्याला एक तर हातच लावत नाहीत. किंवा तो अक्षरशः तोंडी लावण्याइतपतच सूचकपणे येतो. का? कारण सोपं आहे! यांच्यापैकी एकही प्रकार प्रेक्षकवर्गासाठी ग्लॅमरस नाही. उलट लिहायला, मांडायला आणि दाखवायला कमालीचा अवघडच आहे. ‘बॉश’ मी सगळ्यांत वेगळी म्हणतो ते यासाठीच की तिचा सगळा खेळ हा या नॉन-ग्लॅमरस प्रक्रियेत चालतो व गुन्हा घडणे आणि गुन्ह्याचा छडा लागणे या गोष्टी नैसर्गिकरित्या दुय्यम ठरत जातात.

    याच मार्गाने जाणारी एक कमाल ब्रिटिश मालिका आहे, ‘लाईन ऑफ ड्युटी’ (२०१२-). पण ती बॉशसारखी एकनायकानुवर्ती नाही व तिचा विषयदेखील गुन्ह्यांशी संबंधित कमी व भ्रष्टाचाराशी संबंधित अधिक आहे. ‘बॉश’ची तुलनाच करायची झाली तर ती फक्त दुसरी एक ब्रिटिश मालिका ‘लुथर’शीच (२०१०-) होऊ शकते. एक तर दोन्हीही मालिका या पोलिस प्रोसिजरल आहेत. दोन्हीही मालिका या प्रोटॅगनिस्टच्या नावाने आहेत. दोन्हींचेही नायक हे समाज, डिपार्टमेंट, जग, यांनी अत्यंत नाडलेले आहेत. दोघांच्याही वैयक्तिक आयुष्यात कृष्णविवराएवढं दु:ख आहे जे त्यांना तिळातिळाने शोषून घेतंय. दोघेही सत्याचा शोध घेण्यासाठी कुणालाही बिनधास्त नडतात. किंबहूना दोघेही बॅटमॅन बनण्यापासून शब्दशः एक पाऊल मागे आहेत! पण तरीही दोन्हीही मालिकांमध्ये मूलभूत फरक आहे. लुथर हा माणूस व पोलिस अधिकारी म्हणून जितका भयानक व जबरदस्त असतो, त्याच्या एक टक्क्यानेही तो प्रत्यक्षात वागत नाही. उलट तो सतत काहीसा अपोलोजेटिकच वागत असतो. बॉश तसा अजिबात नाही. तो त्याच्या लिव्हिंग लिजण्ड असण्याला साजेसा वागण्याची धमक ठेवतो. तो अक्षरशः उद्धट वाटण्याइतपत खरं बोलतो. आणि त्यासाठी गरज पडेल तेव्हा कुणालाही फाट्यावर मारायला घाबरत नाही. तो सरळसोट भाला आहे, जो एकदा सुटला की लक्ष्यभेद करतोच करतो, मग भले लक्ष्यावर आपटून मोडलो तरी बेहत्तर! ‘बॉश’ची ओपनिंग थीम म्हणजे ‘कॉट अ घोस्ट’चं गाणं ‘आय गॉट अ फिलिंग दॅट आय काण्ट लेट गो’. बास! बॉश या एकाच तत्त्वावर काम करत असतो. मालिकेचं सार आहे त्या गाण्यात. अपराध घडलाय ही फिलिंग त्याला न्याय होईपर्यंत लेट गो करूच देत नाही. रात्रीचा दिवस करून आणि जग इकडचं तिकडे करून तो काम करतच राहातो. मी व्यक्तिश: ब्रिटिश मालिकांचा किती जरी पंखा असलो, तरीही मी प्रामाणिकपणे सांगतो, ‘बॉश’ ‘लुथर’पेक्षा शेकडो पटींनी भारी आहे!

    सध्याच्या पुरोगामी व्यवस्थेमध्ये सुष्टांपेक्षा दुष्टांच्या मानवाधिकारांना जास्त किंमत दिली जाते. एखाद्या पोलिस अधिकाऱ्याने एखाद्या गुन्हेगाराला कायद्याने अटक केली तरी त्यावरून देशभर दंगली उसळून सबंध देश दिवसेंदिवस जाळला जाऊ शकतो व तो निवडणुकीतील भलामोठ्ठा मुद्दादेखील ठरू शकतो. अपराधी वाट्टेल ते करू वा बोलू शकतो, पोलिस अधिकाऱ्याने मात्र विनम्रतेचा पुतळा बनूनच वागले पाहिजे. त्याने हात बांधूनच काम केले पाहिजे. त्याने का उलट वार केला, तर त्याचं करिअर संपलंच समजा. या सगळ्यामुळे पोलिसदलात काय सुधारणा झाल्या असतील त्या असोत, पण त्याने एक झालं ते म्हणजे गुन्हेगारांसाठी अत्यावश्यक असणारा पोलिसांचा धाकच संपला. वाघाचे दात पाडल्यावर, नखे कापल्यावर त्याला कोण घाबरेल हो? आज कुणीही अपराधी हा सहजपणे लिंग, रंग, धर्म वगैरेंपैकी जे साजेल ते व्हिक्टिम कार्ड खेळून सहजच कायद्याचे गज वाकवू शकतो आणि निसटूनही जाऊ शकतो. याची अगदी खोऱ्याने उदाहरणे आपल्या आसपास रोज दिसतात. बॉशच्याही पायात व्यवस्थेच्या, आसपासच्या स्वार्थी वातावरणाच्या, कल्पनातीत राजकारणाच्या बेड्या आहेत. बॉश त्या बेड्या कधीच तोडत नाही, किंवा त्या तोडणं त्याच्या मूळच्या सैनिकी व्यक्तिमत्त्वातच नाही. पण त्या साखळीला वेळोवेळी ताणून आवाक्याबाहेरच्या आणि पगारापलिकडच्या गोष्टी करायला तो एकदाही मागे हटत नाही. त्याच्याबद्दल बोलताना एकदा त्याच्यावर फारसा खुश नसलेला एक अधिकारीदेखील बोलून जातो, Bosch goes where the truth takes him. इतके असूनही मी म्हणेन की बॉश नायक नाहीये. ज्या व्यवस्थेच्या रक्षणासाठी रात्रंदिवस झटतो, प्रत्यक्षात त्याच व्यवस्थेचा बळी आहे तो बळी!

    आपल्याकडेही पोलिस आणि एकूणच व्यवस्थेबद्दल शेकडो सिनेमे आणि मालिका बनल्या आहेत, पण त्या ‘बॉश’पुढे एकजात सपाट वाटतात. कारण, किती जरी नाही म्हटले तरी त्या मनोरंजनाच्या सापळ्यात अडकून पात्रांना काळ्यापांढऱ्या रंगात रंगवू पाहातात. ‘बॉश’ ती चूक एकदाही करत नाही. ‘बॉश’मधील एक एक पात्र म्हणजे एक एक वल्ली आहे अक्षरशः! जेरी एडगर (जेमी हेक्टर), ल्यु. बिलेट्स (एमी अकिनो), क्रेट (ग्रेगरी स्कॉट कमिन्स), बॅरल (ट्रॉय इव्हान्स), चीफ अर्विंग (लान्स रेडिक), एलेनॉर विश (सेराह क्लार्क), हनी चँडलर (मिमी रॉजर्स) वगैरे प्रत्येकाच्या कपाटात त्यांचे त्यांचे व्यक्तिगत राक्षस लपलेले आहेत आणि त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यामागे शेकडो मुखवटेसुद्धा आहेत. गंमत म्हणजे मालिकेतील घटना लॉस एंजेलिसमध्ये घडत असल्या तरी एलए ही मालिकेसाठी नुसती जागा नाहीये, तर मालिकेतील महत्त्वाचे पात्र आहे ते खरोखर. मालिकेतील पात्रांना लागू पडणारे सगळे नियम एलएलाही तितकेच लागू पडतात. खरं तर मालिकेत एक मॅडी बॉश (मॅडीसन लिंट्झ) सोडल्यास कोणतेही पात्र पूर्णपणे काळे नाही वा पांढरेदेखील नाही. अगदी हॅरी बॉशसुद्धा पूर्णपणे पांढरा नाही. त्याच्यातही शेकडो त्रुटी आहेत, दोष आहेत. बॉशची अशी बहुढंगी भूमिका करणाऱ्या टायटस वेलिव्हरचे काम एकदा पाहाच. ही मालिका नायकाचे दोष दाखवताना एकदाही हात आखडता घेत नाही. किंबहूना मालिका कशातच हात आखडता घेत नाही. जे राजकीय मुद्दे बोलायला तर सोडाच चारचौघांत विचार करायलाही अडचणीचे वाटतात, त्यावर ‘बॉश’ने बिनधास्त सीझनच्या सीझन काढलेयत. त्यांचा ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’वरील सीझन तर स्क्रिनवर एखादा स्फोटक राजकीय मुद्दा किती संयतपणे व त्रयस्थपणे दाखवावा याचा वस्तुपाठ आहे अक्षरशः! त्या तुलनेत आपल्याकडील तथाकथित पुरोगामी म्हणून मिरवणारे कलाकार फक्त आणि फक्त उथळ खळखळाट तेवढा करतात, वैचारिकता औषधालाही दिसत नाही त्यांच्या कामात. अर्थात ‘बॉश’मध्येही इन्क्लुझिव्हनेसचा प्रमाणापलिकडचा अट्टाहास, एकाही अगदी एकाही पात्राचं वैवाहिक आयुष्य ठिक नसणं वगैरे प्रपोगण्डा आहेच.

    ‘बॉश’ची मला दुसरी सगळ्यांत जास्त भावलेली गोष्ट म्हणजे त्यात अ‍ॅक्शन जवळपास नगण्य आहे. पात्रे नुसतीच बोलत राहातात, रटाळ कामं करत राहातात, अत्यंत निरर्थक गोष्टींतून मागोवा काढत राहातात. अगदी दिड-दोन मिनिटे चालणारे सीन्स आहेत मालिकेत. अनेक उपकथानकं एकाच वेळी चालू असतात. तरीही असं वाटत राहातं की काहीच घडत नाहीये मालिकेत. पण एपिसोड संपल्याक्षणी जाणवतं, च्यायला ‘झी मराठी’वाल्यांच्या हजार एपिसोड्समध्ये जेवढं कथानक पुढे जात नाही तेवढं यांनी एकाच भागात पुढे नेलंय. मला सांगा, पोलिसांचं प्रत्यक्ष आयुष्य असंच असतं ना हो! थरारक पाठलागाचे, मारधाडीचे प्रसंग कितीसे येत असतील खऱ्या पोलिसांच्या आयुष्यात? क्वचितच ना! ‘बॉश’ला मी अतोनात वास्तववादी म्हणालो ते यासाठीच. ते नॉनग्लॅमरस रिअ‍ॅलिझममध्ये बुडी मारायला क्षणभरही घाबरत नाहीत. कारण, त्या एक एक बुडीतून ते शंभर टक्के रत्नच बाहेर काढतात! नुसतीच बडबड असूनही मी पैज लावून सांगतो की, मालिका एका क्षणासाठीही कंटाळवाणी होत नाही. उलट मी तर म्हणेन की, मी आजवर ऐकलेले बेस्ट डायलॉग्स जर कुणा मालिकेत असतील, तर ते ‘बॉश’मध्येच. एक एक प्रसंग हा नुसता चित्रकोड्याच्या एका तुकड्यासारखाच नाहीये, तर एकाच घटनेच्या शेकडो कंगोऱ्यांपैकी एक एक कंगोरा उलगडून दाखवणारा आहे. नॅरेटिव्ह स्ट्रक्चर कसं लेयर्ड आणि तरीही कसं एकजिनसी असावं ते शिकावं तर या मालिकेकडूनच. संवेदनशील असाल तर या गोष्टी अक्षरशः अंगावर येतात, व्यापून टाकतात, भिती वाटायला लावतात. मालिकेचा मुख्य भर हा अंगावर काटा आणणाऱ्या अवास्तव साहसदृश्यांपेक्षा आत्म्याला शहारा आणणार्‍या माईंडगेम्सवर आहे. आणि त्यात ही मालिका पूर्ण गुण मिळवते!

    या मुद्याच्या बाबतीत तुलनाच करायची झाली तर ‘बॉश’ ही काहीशी जॅझ संगीतासारखी आहे. वरवर काहीसा आळशी, क्रमहीन वाटणारा हा संगीतप्रकार जसा तयार कानाच्या माणसाला समाधीप्रत नेऊ शकतो, नेमके तेच ही मालिका करते. किंबहूना त्यामुळेच कदाचित कॉनेलीने बॉशच्या अंधाऱ्या आयुष्यात जॅझचं पातळसर चांदणं लिहिलेलं असणार. जॅझ हा माझा वीकपॉईण्ट. रहमानने या संगीतप्रकाराची ओळख करून दिल्यापासून मी खुळावल्यासारखा जॅझ ऐकत असतो. ही मालिका मला प्रमाणापलिकडे आवडण्याचे हे ही एक कारण आहे की, या मालिकेत एखाद्या म्युझिकलएवढं जॅझ आहे. या मालिकेनेच ‘आर्ट पेपर’सारख्या दैवी कलाकारासोबत माझी ओळख करून देऊन केलेले उपकार मी जन्मात कधी विसरणार नाहीये. मालिका पाहा अथवा पाहू नका, पण संगीताचे चाहते असाल तर स्पॉटीफायवर हॅरी बॉशची प्लेलिस्ट जरूर ऐका. जॅझ आवडत असेल तर अक्षरशः वेड लागेल वेड! हॅरी बॉश हा असा बेक्कार माणूस आहे, ज्याची रहमानशी ओळख करून द्यायला, त्याच्यासोबत तासनतास रहमानबद्दल बोलायला मला अतिशय आवडेल. आणि खरं सांगतो, हे असं मला फारच थोड्या लोकांबद्दल वाटतं.

    प्रत्येक पर्व हे कॉनेलीच्या एकाहून अधिक कादंबऱ्यांवर आधारित आहे. पण पर्व संपल्यावर ते केस संपल्याची भावना देण्याइतकेच आपल्याला एखादी परिपूर्ण कादंबरी ‘पाहिल्याची’ भावना देऊन जाते. इतकी परिपूर्णता मी तरी साहित्यावर आधारित कोणत्याच मालिकेत अथपासून इतिपर्यंत पाहिलेला नाही. भल्याभल्या मालिका शेवटाकडे ढासळताना पाहिल्या आहेत मी. ‘बॉश’ ही त्या दिव्य यादीत येते, जिला परफेक्ट शेवट कसा करावा ते समजले आहे. काही मालिका या ब्रेन्गॅझम देतात, काही माईंड्गॅझम देतात. ‘बॉश’ ही त्या दुर्मिळ प्रकारातील मालिका आहे जी तुम्हाला क्षणोक्षणी ब्रेन्गॅझम आणि माईंड्गॅझम तर देतेच, पण त्याच्याही पलिकडे जाऊन ती तुम्हाला वेळोवेळी भयानक ताकदीचा सोल्गॅझमसुद्धा देते. आणि खरंच सागतो सोल्गॅझम होणे हा आजच्या जगात शब्दशः दुर्मिळातील दुर्मिळ प्रकार आहे, अगदी या मालिकेच्या दर्जासारखाच! मनापासून सांगतो, इतकं लिहूनही ‘बॉश’चं दहा टक्केसुद्धा रसग्रहण मला जमलंय असं वाटत नाहीये. लवकरच येणारा ‘बॉश’चा स्पिनऑफदेखील या दर्जाला साजेसाच ठरो, अशी सार्थ अपेक्षा आहे.

    *५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

    टीप: मालिकेत एकूण ७ पर्वे आहेत. भारतात अधिकृतरित्या ६ च प्रकाशित झाले आहेत. वाट पाहायची नसल्यास शेवटचे पर्व कसे मिळवायचे, ते सूज्ञांस सांगणे न लगे.

  • लोणच्यासारखी मुरत जाणारी – चक

    लोणच्यासारखी मुरत जाणारी – चक

    ‘बाय मोअर’ सुपरमार्केटच्या ‘नर्ड हर्ड’ या अत्यंत रटाळ आणि गचाळ अशा संगणक दुरुस्ती विभागात काम करणाऱ्या चार्ल्स तथा चक बार्टोव्स्कीचं (झकॅरी लेव्ही) आयुष्य एका रात्रीत पार बदलून जातं. त्याचं कारण म्हणजे चकचा एकेकाळचा स्टॅनफर्डसारख्या प्रथितयश विद्यापीठातील परममित्र आणि कालौघात परमशत्रू बनलेला ब्राईस लार्किन (मॅथ्यू बोमर). ब्राईसच्या कारस्थानामुळे चकला विद्यापीठाने काढून टाकलं होतं. त्या घटनेलाही आता चार वर्षं उलटून गेली. किंबहूना त्या घटनेमुळेच चकसारखा जग बदलू शकणारा अत्यंत हुशार विद्यार्थी आज ‘बाय मोअर’सारख्या फडतूस ठिकाणी काम करतोय. ब्राईस मात्र अजूनही त्याचा पिच्छा सोडत नाहीये. जगाच्या दृष्टीने साधा अकाऊंटंट असलेला लार्किन प्रत्यक्षात सीआयएचा अत्यंत खतरनाक गुप्तहेर आहे. पण तो आपल्याच देशावर उलटतो आणि ‘इंटरसेक्ट’ नावाचं सीआयएचं सगळ्यांत गुप्त संशोधन चोरतो. त्यावेळी झालेल्या मारामारीत ब्राईस तर मरतो, पण मरताना तो इंटरनेटचा सबंध प्रोग्राम चकला पाठवतो. आणि हा येडा चकदेखील तो बिनधास्त डाऊनलोड करतो. तो प्रोग्राम संगणकावर उघडताक्षणी पडद्यावर सहस्रावधी निरर्थक प्रतिमा दिसू लागतात. प्रतिमांचा तो स्फोट पाहाताच चकची तंद्री लागते आणि चक भोवळ येऊन कोसळतो. त्याला शुद्ध येते तेव्हा सकाळ झालेली असते व प्रोग्राम पूर्ण रन होऊन नष्टदेखील झालेला असतो.

    त्या एका रात्रीत चकचं सारं आयुष्यच बदलून जातं. झालं असं असतं की, तो प्रोग्राम म्हणजे एक महासंगणक असतो. कूटप्रतिमांच्या स्वरूपात महाप्रचंड विदा तो चकच्या डोक्यात भरतो. आणि ती विदा म्हणजे प्रत्यक्षात सीआयएचा संपूर्ण विदानिधी (डेटाबेस) असतो. ब्राईस लार्किन, चकचा एकेकाळचा घनिष्ठ मित्र व जन्माचा वैरी, मरता-मरता चकच्या हाती सबंध अमेरिकेच्या सुरक्षेच्या किल्ल्या देऊन गेलेला असतो. या एका योगायोगामुळे साधाभोळा, काहीसा मूर्ख आणि अत्यंत अननुभवी चक अचानकपणे सीआयए आणि एनएसए या दोन्ही गुप्तदलांसाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण मालमत्ता (ऍसेट) होऊन बसतो! चकची सुरक्षितता ही अमेरिकन शासनाच्या प्राधान्यक्रमात सर्वांत वरच्या स्थानी येते. व त्यासाठी सीआयए आपली बेस्ट गुप्तहेर सेराह वॉकर (य्वेन स्ट्राहोव्स्की) तर एनएसए आपला सर्वश्रेष्ठ असॅसिन जॉन केसी (ऍडम बाल्डविन) अशा दोघांना पाठवतात. आणि मग सुरू होतो ‘चक’ नावाचा पाच पर्वे (२००७-१२) चाललेला अत्यंत विनोदी, अतिशय तंत्रशुद्ध रितीने मांडलेला, उत्तम अभिनयाने नटलेला, श्रेष्ठ लेखनाने सजलेला आणि पराकोटीचा रोमांचक असलेला खेळ!

    ‘चक’ची सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मालिका नुसती एस्पियोनाज-थ्रिलर नाही तर एस्पियोनाज-सिटकॉम-थ्रिलर आहे. या बाबतीत तुलनाच करायची झाली तर तिची तुलना जेम्स कॅमेरॉनच्या ‘ट्रू लाईज’सोबत (१९९४) करता येऊ शकते. अच्छा तुम्ही जर नीट विचार केला तर तुम्हाला दिसेल की ऍमेझॉन प्राईमवरील तथाकथित हिट मालिका ‘द फॅमिली मॅन’ने (२०१९-) ‘ट्रू लाईज’च्या संकल्पनेची शब्दश: चोरी केलीये. ते एक असो. पण ‘चक’ असं काही करायला जात नाही. उलट ‘ट्रू लाईज’च नव्हे तर पॉप कल्चरशी संबंधित अक्षरशः हजारो गोष्टींना ते आपल्या प्रत्येक एपिसोडमधून मानवंदना देतात. तुम्हाला जर ते सारे संदर्भ माहिती नसतील तरीही ‘चक’ अत्यंत मनोरंजक राहातेच, पण जर ते संदर्भ माहिती असतील तर तिच्या मनोरंजनमूल्याला काही मर्यादाच राहात नाहीत. ‘चक’मधील विनोद हे त्या संदर्भांमधून तर येतातच पण त्याहून जास्त ते परिस्थितीकडे पाहाण्याच्या तिरकस दृष्टीकोनातून येतात. शिवाय ‘चक’ची कथा ही अनेक पातळ्यांवर चालते. म्हणजे गुप्त मिशन्स ही एक पातळी. ‘बाय मोअर’चा स्टाफ, त्यांचे उपद्व्याप, त्यांच्या अडीअडचणी ही दुसरी पातळी. चकचं वैयक्तिक आयुष्य, त्याची बहिण एली (सेराह लँकेस्टर), तिचा बॉयफ्रेण्ड डेव्हन तथा कॅप्टन ऑसम (रायन मॅक्पार्ट्लीन) ही तिसरी पातळी. या तिन्ही पातळ्या कथानकांच्या दृष्टीने सशक्त तर आहेतच पण तिन्ही ठिकाणी विनोदाला अतिशय वाव आहे व त्याचा या मालिकेने अतोनात फायदा करून घेतलाय. गंमत म्हणजे जवळपास प्रत्येक एपिसोडमध्ये हे तिन्ही स्तर एकमेकांना छेदतात व एकमेकांवर प्रभाव टाकत असतात. ही बाब ज्या सुरेख पद्धतीने संहितेत लिहिली व दिग्दर्शनातून मांडलीये की मन अक्षरशः तृप्त होऊन जाते! खूप थोड्या मालिका असतात ज्या असं बौद्धिक, वैचारिक आणि समाधान देऊ शकतात.

    त्याच धर्तीवर अजून एक विधान करतो की, खूप थोड्या मालिका अशा असतात ज्यातील प्रत्येक पात्र हे ती भूमिका साकारलेल्या अभिनेत्यासाठीच लिहिलंय असं वाटतं. ‘चक’ ही पात्रयोजनेच्या बाबतीत अत्यंत परिपूर्ण आहे. मुख्य कलाकारच नव्हे तर मॉर्गन ग्राईम्स (जोशुआ गोम्स), बिग माईक (मार्क ख्रिस्तोफर लॉरेन्स), लेस्टर पटेल (विक्रम सहाय), जेफ्री बार्न्स (स्कॉट क्रिन्स्की), जनरल बेकमन (बोनिता फ्राईडरिकी) अशा दुय्यम पात्रांच्या बाबतीतदेखील त्या त्या अभिनेत्याखेरीज इतर कुणाचाच विचारदेखील करवत नाही. मॉर्गनचे पात्र तर एखाद्या पात्राचा परिपोष कसा करावा याचा निव्वळ वस्तुपाठ आहे. किंबहूना मॉर्गन ‘द बिग बँग थियरी’मधील (२००७-१९) हॉवर्ड वॉलोविट्झचे (सायमन हेल्बर्ग) पात्र यांच्या आलेखात कमालीचे साम्य आहे. गंमत म्हणजे दोन्हीही मालिका वेगवेगळ्या नेटवर्क्सवर पण तरीही एकाच दिवशी (२४ सप्टेंबर २००७) सुरू झाल्या होत्या!

    आपल्याकडे अशा विषयावर मालिका बनली तर इतकी सशक्त कथावस्तू नसेल एकवेळ, पण कमालीची नग्नता असणार म्हणजे असणारच! किंबहूना आपल्याकडील मेंढरीकरण झालेल्या मालिका त्याच मार्गाने जाव्यात याची ‘गरीबांच्या तारान्तिनो’ने पुरेपूर काळजी घेऊन ठेवलीये. ‘चक’ मात्र या ही आघाडीवर बाजी मारून जाते. तिच्यात उत्तानपणा आहे, पण नग्नता नाही. त्वेषाने केलेली वक्तव्ये आहेत, पण शिव्या नाहीत. किंबहूना त्या गोष्टी टाळल्यामुळेच ‘चक’चे रंजनमूल्य व स्मरणमूल्य कित्येक पटींनी वाढले आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे पर्वांमध्ये मांडल्या जाणाऱ्या आधुनिक मालिका म्हटल्या की त्या बहुसंख्यकांचा द्वेष करणाऱ्या व डाव्या विचारसरणीची काहीही करून भलामण करणाऱ्याच असणार, हे सांगायला कुणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. क्वचित एखाद्या अपवादाने सिद्ध होणारा अलिखित नियमच आहे म्हणा ना हा! ‘चक’चे वेगळेपण मात्र असे की, ती डाव्या विचारसरणीची भलामण करीत नाही, वर्णभेद मिटवण्याच्या बुरख्याआड गोऱ्यांचा द्वेष करीत नाही, अशांतीच्या दूतांचे गोडवे गात नाही.

    किंबहूना ‘चक’मध्ये जो प्रपोगण्डा आहे तो प्रवाहाच्या नेमका उलट आहे. स्पॉयलर न देता सांगायचं तर एकवार तिच्यातील मुख्य खलनायकाच्या इंडस्ट्रीचा लोगो पाहा! असे हजारो, होय शब्दशः हजारो छुपे संदर्भ ही मालिका प्रत्येक एपिसोडगणिक देते. किंबहूना या मालिकेतील बहुतांशी नावे, पात्रे, स्थळे, घटना यांच्यात अनेक छुपे अर्थ आहेत. ते शोधणे व त्यांचा अन्वयार्थ लावणे हा एक वेगळाच मजेदार खेळ आहे. जॉन केसीचे पात्र तर उघडपणे कन्झर्व्हेटिव्ह आहे. तो रोनाल्ड रेगनचा चाहता नव्हे तर अक्षरशः भक्त आहे. तो क्लिंटन दांपत्याचा द्वेष करतो. तो सातत्याने अमेरिकेतील बंदुका बाळगू देण्याच्या स्वातंत्र्याची अभिमानाने भलामण करतो. तो कम्युनिस्टांना प्रकटपणे नावं ठेवतो. तोच कशाला, मालिकेतील नायक व नायकाच्या बाजूचे सगळेच कमालीचे राष्ट्रभक्त आहेत. ते सगळेच बलिदान, कुटूंबव्यवस्था, लग्नसंस्था इ. मूल्यांवर अतोनात विश्वास ठेवतात. बहुसंख्य भारतीयांच्या दृष्टीने ही मूल्ये अगदीच साहजिक असली तरीही सांप्रत जगाच्या हिशोबात त्यांना उजव्या विचारसरणीचीच मूल्ये मानतात. केसीचं काम करणारा ऍडम बाल्डविन प्रत्यक्ष आयुष्यात अगदी तसाच आहे. मुख्य नायक ‘चक’ची भूमिका करणारा झकॅरी लेव्ही अतिशय धार्मिक ख्रिश्चन आहे. आणि हे दोन्हीही योगायोग खचितच नाहीत! पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मालिका उजव्या विचारसरणीची आहे म्हणून ती चांगली आहे, असं नाहीये, तर ती एक चांगली मालिका आहे जी उजव्या विचारसरणीची आहे. हा लहानसा फरक समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे, विशेषतः आपल्याकडील उजव्यांनी! अपवाद वगळता आपल्याकडच्या बहुतांशी उजव्यांचं असं दिवास्वप्न असतं की, एखादी मालिका अथवा चित्रपट केवळ उजव्या विचारसरणीचा आहे म्हणून तो लोकांनी डोक्यावर घ्यावा, बाकी तो मनोरंजनाच्या आणि तांत्रिक आघाडीवर थोडा कमी पडला तरी चालेल. प्रत्यक्ष जगात असं नाही चालत. तंत्रशुद्ध पद्धतीने उजव्या विचारसरणीचा सार्थ व मनोरंजक ‘उरी’ (२०१९) किंवा ‘बाहूबली’सारखा (२०१५-१७) चित्रपट बनवा, तो धो-धो चालेल. पण केवळ उजव्या विचारसरणीच्या जोरावर लोक कधीच ‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ (२०१९) अथवा ‘पीएम नरेंद्र मोदी’ (२०१९) स्वीकारणार नाहीत, त्यांना रटाळ आणि फ्लॉपच म्हटलं जाणार. ही साधी गोष्टच लक्षात न आलेले लोक मग सबंध चित्रपटसृष्टीवरच बहिष्कार घालण्याची भाषा बोलू लागतात व लोकांची मते आपल्याला हवी तशी बनवू शकणारे एक फार मोठे अवजार आपल्या कर्माने दूर लोटतात! डावे कधीच अशा चुका करत नाहीत.

    चुकांच्या विषयावरून आठवलं, ‘चक’मध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत बरं का! उदाहरणार्थ- मालिका काही ठिकाणी खूपच अतिशयोक्ती करते, तिच्यात वापरलेले विज्ञानही बरेचदा छद्मतेच्या सीमेत जाते. एवढंच कशाला, मालिकेचे अखेरचे पर्व तर काहीसे दिशाहीनच वाटते. ‘चक’ ही ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’चा (२०११-१६) दर्जा अधूनमधून गाठूनही तो राखण्यात कमी पडते, ते या लहानसहान चुकांमुळेच! मला व्यक्तिश: मालिकेचा शेवट अतिशय वेगळा, अकल्पनीय व खऱ्या अर्थाने बिटरस्वीट वाटला. पण तो सगळ्यांना आवडेलच असे नाही. अरे हो, बिटरस्वीटवरून आठवलं, ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा (२०११-१९) शेवट बिटरस्वीट असेल, असं म्हणाला होता ना खुनी म्हातारा? त्यावरून आणखी एक आठवलं, ‘एचबीओ’वर ‘जीओटी’ सुरू होण्याच्या बरोब्बर सहा दिवस आधी आधी ‘चक’च्या एका एपिसोडमध्ये (११ एप्रिल) ‘जीओटी’चा एक अत्यंत अर्थपूर्ण असा संदर्भ आहे! ‘चक’चा शेवट ‘जीओटी’पेक्षा दहा कोटी पटींनी चांगला आहे. पण मग ‘चक’ ही वाईट मालिका आहे का? काही मालिका असतात ज्या पाहून (किंवा न पाहाताच) तुम्ही इतरांसमोर भाव खाऊ शकता. या मालिका असतात ज्या तुम्ही केवळ सगळं जग बघतं म्हणून केवळ बघता आणि एकदा बघून झाल्यावर त्या परत पाहाण्याची तुमची अजिबातच इच्छा नसते. काही मालिका असतात ज्या तुम्ही आयुष्यात करायला काहीच नाहीये या गैरसमजातून केवळ बघायच्या म्हणून बघता. पण या सगळ्याच्या पलिकडे, काही मालिका असतात ज्या पाहाताना तुम्हाला त्या कधी संपूच नये असं वाटत असतं. या मालिका नुसत्या संपत नाहीत, तर सोबत तुम्हाला पार रितं करून सोडतात. ‘चक’ ही या तिसऱ्या प्रकारची मालिका आहे. ती खदखदून हसवते, त्यातील अनेकानेक धक्कादायक गोष्टींनी रोमांच उभे करते, संपू नये असं वाटायला लावते आणि संपल्यावर एखाद्या फर्मास लोणच्यासारखी मुरत जाते, आयुष्यभर!

    *४.७५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]