Category: Bajirao

  • यह तो पूरा शैतान है..!

    जेम्स ग्रँट डफ History of Mahrattas च्या पहिल्या खंडात लिहितो की, निज़ामने जेव्हा बाजीरावांना पूर्वी कधीच पाहिले नव्हते, तेव्हा त्याने आपल्या पदरचा एक चित्रकार बाजीरावांकडे धाडला. चित्रकाराला स्पष्ट सूचना होत्या की, तुला बाजीरावांचे जे काही पहिले दर्शन होईल, तसेच्या तसे चित्र काढून मला दाखव. चित्रकार परत आल्यावर त्याने जे चित्र काढले त्याचे वर्णन डफ करतो –
    “The painter executed his task, and on his return exhibited the Peishwa mounted, with the head and heel ropes of his horse in his feeding bag, like that of a common Mahratta, his spear resting on his shoulder, whilst he was rubbing with both his hands some ears of ripened Joowaree, which he was eating as he rode”.

    The Era of Bajirao, पृ. ३०९ येथे लेखक उदय कुलकर्णी मात्र उपरोक्त चित्रकार बादशाह मुहंमदशाहने पाठवल्याचे सांगतात. चित्रकाराला बाजीराव कसे दिसले यासाठी त्यांनी एक सुंदर काव्य दिले आहे –
    “तुरंगमावरी मूर्ती शोभे एक रिकिबित पाय
    दुजा आडवा घोड्यावरती घोडा ठुमकत जाय
    मानेवरती ठेऊनि दिधली अनीन घोड्याची ती
    स्कंधी भाला हसत मुखावरी शोभे अनुपम कांती
    मंदिल मस्तकी रुभरि अांगी अंगरखा तो साजे
    पचंग कटीला वस्त्र नेसले ब्राह्मणघाटीचे जें
    स्वताच हाती कणसे चोळुनी दाणे टाकी वदनी
    लाल ठेविल्या मिरच्या त्यातुनी खाई मधुनी मधुनी”

    रियासतकार सरदेसाई लिहितात (Ibid 310. Quoted from – Peshwa Bakhar, pp 26, 1878) असं बेफिकिर योद्ध्यासारखं वर्णन ऐकून बादशाहच्या मुखातून एकच वाक्य निघालं, “This is but the Devil” – “यह तो पूरा शैतान है”!!

    बाजीराव हे पेशवे असूनही त्यांच्या सैनिकांमध्ये त्यांच्याप्रमाणेच एक होऊन राहात होते, ते जे खातील तेच खात होते, ते जे पितील तेच पीत होते! डफचेच शब्द वापरून सांगायचे झाले तर –
    “Bajee Rao was handsome in his person, and his manner was more that of a frank soldier than of a smooth courtier; when in the field with his troops he kept up no state, and shared in all the privations of the meanest horseman”.

    — © विक्रम श्रीराम एडके
    (बाजीरावांच्या युद्धनीतीचे अभ्यासक आणि ‘मस्तानीपल्याडचे बाजीराव’ या विषयावर व्याख्यान देणारे वक्ते. अधिक माहितीसाठी पाहा www.vikramedke.com)

  • दोन भेटी

    बाजीराव ८ ऑक्टोबर १७३५ ला (Bajirao I – An Outstanding Cavalry General. Author Col. R. D. Palsokar. Pp 183) उदयपूरकडे निघाले. त्यांच्यासोबत सुमारे ८ ते १० सहस्र सैन्य होते. त्याशिवाय इतर मराठी फौजा मेवाड ते बुंदेलखंडदरम्यान (Palsokar. Pp 183) पसरलेल्या होत्या. जानेवारी १७३६ च्या अखेरीस त्यांनी तापी ओलांडली (Selections of Peshwa Daftar. Author G. S. Sardesai. Vol. 14.42 quoted at The Era of Bajirao. Author Uday S. Kulkarni. Pp 205). पुढे उदय कुलकर्णी (Pp 206-07) वंशभास्करच्या (Vol. 6) हवाल्याने एक घटना देतात. अशीच घटना ई. जयवंत पॉल (Bajirao The Warrior Peshwa. Pp 145) सर जदुनाथ सरकारांच्या हवाल्याने देतात.

    घडले असे की, महाराणा जगतसिंहांनी (दुसरा) पेशव्यांचे ५ सहस्र रुपये नजराणा, मानाची वस्त्रे, घोडे आणि एक हत्ती देऊन यथोचित स्वागत केले. दुसऱ्या दिवशी त्यांना राजदरबारात सन्मानपूर्वक बोलावण्यात आले. तिथे त्यांच्या स्वागतासाठी स्वतः महाराणा सामोरे आले. दरबारात दोन आसने ठेवली होती. एक बाजीरावांसाठी आणि दुसरे साक्षात महाराणांसाठी. बाजीराव पुढे चालत गेले आणि आसनावर न बसता खाली जमिनीवर बसले. एवढेच नव्हे, तर तेथीलच एक चामर घेऊन ते महाराणांना वारासुद्धा घालू लागले. महाराणा अर्थातच भांबावून गेले. ते म्हणाले (Sardesai. E. Jaiwant Paul), “तुम्ही ब्राह्मण आहात, मी तुमची सेवा करायला हवी”. त्यावर बाजीरावांनी त्यांना उत्तर दिले की, “मी इथे फक्त तुम्हालाच राजा मानतो कारण तुमच्या पदरी १६ उमराव आहेत”!

    काही दिवसांनी बाजीरावांनी जयपूरला प्रस्थान केले. तिथे त्यांची सवाई जयसिंहांशी भेट झाली. या ही भेटीबद्दल “वंशभास्कर”च्याच हवाल्याने कुलकर्णी (Pp 208, 209) लिहितात. सवाई जयसिंहांनी जगतसिंहांच्या इतकाच सन्मान बाजीरावांनी मलाही द्यावा अशी मागणी केली. बाजीरावांनी त्यांना ताबडतोब उत्तर दिले, “(स्वैर अनुवाद)उदयपूरच्या महाराण्यांनी कधीच मुघलांची सत्ता मानली नाही, त्या संदर्भाने मी त्यांना आमच्या छत्रपतींसारखेच मानतो. तुम्ही लोक मात्र यवनांच्या चाकरीतच धन्यता मानत आलात. त्यामुळे तुम्ही खरे तर मला कनिष्ठ. पण तरीही मी तुम्हाला बरोबरीचा दर्जा देतोय (गुह्यर्थ – मी त्यांच्याकडे बसलो तसा तुमच्याकडेही खाली बसेन अशी स्वप्नं पाहू नका!). आपण बरोबरीच्या आसनांवर बसू. मी उजवीकडे बसेन आणि तुम्ही डावीकडे बसा”! या भेटीत बाजीरावांनी हुक्क्याची मागणी केली आणि सवाई जयसिंहांना त्रास होत असूनही मुद्दामच त्यांच्या तोंडावर (Paul. Pp 146) धूर सोडत राहिले (Kulkarni. Pp 209. with reference from Vansh Bhaskar)! अशी वागणुक देण्यामागे सवाई जयसिंहांच्या पूर्वजांनी स्वराज्याला दिलेल्या त्रासाची आठवण बाजीरावांना असल्यास नवल नाही!

    गंमत अशी की, बाजीरावांनी एकीकडे महाराणा जगतसिंहांना सन्मान दिला आणि दुसरीकडे सवाई जयसिंहांना त्यांची जागा दाखवून दिली, यात बाजीरावांचे चातुर्य आणि माणसांना जोखण्याचा स्वभाव तर दिसतोच. परंतु बाजीरावांचे खरे कर्तृत्व यात दिसते की, बाजीरावांनी जशी सवाई जयसिंहांकडून चौथाई व इतर रक्कम वसूल केली (Palsokar. Pp 183) तशीच जगतसिंहांकडूनही रक्कम वसूल केली (तत्रोक्त)! किंबहूना दिल्ली दरबाराकडून इतर मागण्याही मान्य करून घेतल्या. थोडक्यात, भावनिकता आपल्या जागी आणि राजकारण आपल्या जागी! अर्थातच बाजीरावांच्या सगळ्याच मागण्या काही मान्य झाल्या नाहीत. त्याचीच परिणती पुढे दिल्लीवर धडक देण्यात (मार्च १७३७) आणि नंतर भोपाळमध्ये निज़ामाला मार देण्यात (डिसेंबर १७३७) झाली. कुलकर्णी (Pp 202) सरदेसाईंच्या हवाल्याने (Marathi Riyasat. Vol. 3. Pp 215) शाहूंचे एक वाक्य देतात त्यातच बाजीरावांचे महत्त्व आणि स्थान कळून येते. शाहू म्हणतात, “मला १ लाख सैन्य आणि बाजीराव यांच्यातून एक निवडायला सांगितले, तर मी बाजीरावांनाच निवडेन”!

    — © विक्रम श्रीराम एडके

    (बाजीरावांचे चरित्र व युद्धनीतीचे अभ्यासक आणि व्याख्याते. अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • सोशल मिडिया हाताळताना

    मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. मला माहितीये, फारच वापरून वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे हे, पण खरं आहे. आणि या समाजप्रियतेतूनच संपर्काची वेगवेगळी साधने विकसित झाली. कालौघात या साधनांचे स्वरूपही बदलत गेले. हा वेग इतका प्रचंड आहे की पत्रे, फोन आणि मोबाईल एकत्र पाहिलेली पिढी अजूनही अस्तित्वात आहे. परंतु गेल्या दशकभरात या संपर्काच्या क्षेत्राने त्याच्या मूळच्याच अतिप्रचंड वेगालाही चक्कर यावी असे वळण घेतले आणि उभा ठाकला सोशल-मिडिया! सोशल मिडिया म्हणजे काय? फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॅप, इन्स्टाग्राम, युट्यूब, स्नॅपचॅट वगैरे वगैरे? ही तर सोशल मिडियाची उदाहरणं झाली! या उदाहरणांना सोशल मिडिया का म्हणायचं, याच्या ४ मुख्य कसोट्या आहेत.

    १) वेब २.० : पारंपारिक वेबचे स्वरूप असे असते की त्यावरील मजकूर केवळ वाचता येतो. परंतु वेब २.० हे परस्परसंवादी व्यासपीठ आहे. एखाद्या वेबसाईट अथवा अॅपला सोशल मिडिया म्हणण्याची पहिली कसोटी ही, की ती वेबसाईट अथवा अॅप वेब २.० वर आधारित असावी.

    २) मजकूर : वर सांगितल्याप्रमाणे पारंपारिक वेबवरील मजकुर हा त्या वेबासाईटकडूनच फक्त पुरवला जायचा. इतरांनी फक्त वाचायचं. त्यापलिकडे वाचकांचा सहभाग अतिशय मर्यादित होता. एकप्रकारे ही सगळी एकमार्गी वाहतूक होती. परंतु सोशल मिडिया मात्र ‘वेब २.०’वर चालतो. तेव्हा दुसरी कसोटी ही की सोशल मिडियावर त्या वेबसाईटच्या अथवा अॅपच्या चालक-मालकांपेक्षाही त्याचे वापरकर्ते आणि वाचक त्या वेबसाईट अथवा अॅपवरीलवरील मजकूर लेखनाच्या, फोटोंच्या किंवा व्हिडिओजच्या स्वरूपात निर्माण करू शकले पाहिजेत.

    ३) प्रोफाईल्स : प्रोफाईल्स म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर खाती. जसे आपले बँकेत खाजगी खाते असते, तसेच सोशल मिडियावर खाते तयार करता येते. ही झाली तिसरी कसोटी.

    ४) नेटवर्किंग : अनेक खाती नुसती आहेत, पण त्यांचा परस्परांशी काही संपर्कच नसेल, तर ते माध्यम मृतच म्हणावे लागेल! आणि म्हणूनच सोशल मिडियाची चौथी कसोटी आहे ती म्हणजे त्यावरील खात्यांची परस्परांशी जोडणी.

    या ४ कसोट्या पूर्ण करणाऱ्या कोणत्याही ऑनलाईन व्यासपीठाला सोशल मिडिया असे म्हणतात.

    संपर्काचे एक प्रभावी माध्यम म्हणून सुरू झालेला हा सोशल-मिडिया कधी आपल्यासमोरील संगणकातून निघून लॅपटॉपच्या रूपाने मांडीवर विसावला आणि कधी तिथून उडी मारून मोबाईलच्या रूपाने आपल्या खिश्यात जाऊन बसला, समजलंही नाही. हल्ली तर प्रत्येक बाबतीत लोक सोशल मिडियावर अवलंबून राहू लागलेयत. पूर्वी लग्न जुळवताना पत्रिका पाहिली जायची आता पत्रिकेच्याही आधी एकमेकांची फेसबुक अकाऊंट्स तपासली जातात. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, तिच्या आवडी-निवडी काय, राजकीय मते काय वगैरे एकूण एक माहिती आजकाल योग्यप्रकारे शोधली तर कुणालाही काही क्लिक्सवर सहज उपलब्ध आहे. जगाच्या एका कोपऱ्यातला माणूस दुसऱ्या कोपऱ्यातील माणसाशी फोन, पत्रे यांच्यापेक्षाही वेगाने आणि स्वस्तात बोलू लागला, जोडला गेला. एवढेच नव्हे, तर या दशकात जगभरातील कित्येक मोठमोठे राजकीय, सामाजिक उठाव हे या सोशल मिडियाच्याच जोरावर झाले. ‘व्हायरल’ हा एकेकाळी काळजीचा वाटणारा शब्द आता परवलीचा बनलाय.

    हे जितके छान आहे, तितकेच धोक्याचेसुद्धा आहे. लोक जास्त जास्त मनोमोकळे झालेयत आणि तितकेच भेद्य अर्थात व्हल्नरेबलसुद्धा. जाणता-अजाणता आपण कुठे जातो, काय करतो, काय आवडते, काय नाही आवडत, एखाद्या व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल आपले बरे-वाईट मत काय वगैरे अनंत गोष्टींची माहिती सोशल मिडियावर शेअर करत असतो. सध्याचे युग हे माहितीचे युग आहे. माहिती हे आजच्या जगात शस्त्र आहे आणि या शस्त्राचा वापर चतुर लोक कसा करू शकतात याचे केंब्रिज अॅनालिटिकासारखे उदाहरण फार जुने नाही. या तथाकथित पॉलिटिकल कन्सल्टिंग कंपनीने फेसबुकवरील एका अॅपद्वारे बेकायदेशीररित्या लोकांची माहिती मिळवली आणि तिचा वापर करून निवडणुकांवर प्रभाव टाकायचा प्रयत्न केला. फेसबुकवर आपण “तुम्ही मागच्या जन्मी कोण होता” वगैरे टाईमपास चाचण्या देत असतो ना? नीट पाहा, या चाचण्यांचे अॅप्स आपली पब्लिक प्रोफाईल आणि इतरही अनेक प्रकारची माहिती मागवत असतात. ‘त्याने काय फरक पडतोय’ अथवा ‘माझ्याकडे काय आहे चोरण्यासारखं’ म्हणून आपण सहज त्यांना परवानग्या देऊन टाकतो. परंतु केंब्रिज अॅनालिटिकाच्या प्रकरणात माहिती एकाची, गोळा केली दुसऱ्याने आणि वापरली तिसऱ्यानेच. तेव्हा, ‘माझी माहिती चोरून कुणाला काय मिळणार आहे’ म्हणण्याआधी लक्षात घ्या की, तुमच्या माहितीचा वापर हा तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल इतक्या वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो.

    काही दिवसांपूर्वी एके ठिकाणी माझे थोरले बाजीरावांवर व्याख्यान होते. व्याख्यानानंतर एक माझ्याच वयाच्या आसपासचा तरुण मुलगा भेटायला आला. मला म्हणाला, ‘मी सुद्धा बाजीरावांचा अभ्यासक आहे’. मी म्हणालो, ‘वाह, कोणकोणते संदर्भ अभ्यासता तुम्ही’? माझा विचारण्याचा हेतू असा की, एखादा नवीन संदर्भग्रंथ किंवा अभ्यासाचा मुद्दा समजावा. तर तो उत्तरला की, ‘खूप कसून अभ्यास करतोय मी बाजीरावांचा. व्हॉट्सॅपवर त्यांच्याबद्दल आलेले सगळे मेसेजेस वाचलेयत मी’! मला गंमत वाटली. मी स्वतःही काही परिपूर्ण नाही, परंतु तो तरुण मित्र मात्र व्हॉट्सॅपलाच संदर्भ समजून बसला होता. वर म्हणालो त्याप्रमाणे, सध्याचे युग माहितीचे युग आहे. आपली नेमकी गडबड होते ती इथेच. आपण माहिती आणि ज्ञान यांच्यात फरक आहे, हेच मुळात समजून घेत नाही. साधी गोष्ट सांगतो. ज्ञानाला आह्वान नसते, माहितीची मात्र दुसरी बाजूसुद्धा असू शकते. उदाहरणच द्यायचं झालं तर, दुधी भोपळ्याचा रस एखाद्यासाठी चांगला आहे की नाही, हे कोण व्यवस्थित सांगू शकतं? फक्त तज्ञ डॉक्टर! कारण, त्यांच्याकडे त्याबाबतीत ज्ञान आहे. याउलट सोशल मिडियावर तुम्हाला दुधी भोपळ्याचा रस जणू अमृतच असतो इथपासून ते दुधी भोपळ्याचा रस म्हणजे विषच इथपर्यंत सगळ्या स्वरूपाची माहिती दिसेल! तिची कोणती तरी एकच बाजू बरोबर असणार, परंतु ज्ञान मात्र संपूर्ण बरोबर असतं! व्हॉट्सॅप, ट्विटर, फेसबुक, युट्यूब किंवा इतर कोणत्याही सोशल मिडियावर आलेल्या कोणत्याही पोस्टला, फोटोला, व्हिडिओला; ते विशेषतः इतिहास, धर्म, राजकारण, विज्ञान इ. विषयांवर असतील तर, जर आपण उपरोक्त वाक्याची कसोटी लावली आणि त्यांना पारखून घेऊ लागलो, तर विचार करा, केवढ्या साऱ्या अफवा थांबतील!

    या विषयाला आणखी एक पैलू आहे. हायपोकॉण्ड्रिया नावाचा एक विकार असतो. यात व्यक्तीला सतत वाटत राहाते की आपल्याला काहीतरी भयंकर आजार झालाय. जरासं काही झालं की या व्यक्ती त्या लक्षणांवरून आपल्याला त्याच्याशी संबंधित एखादा मोठा आजार झाल्याचा समज करून घेतात. याच विकाराचं एक भावंड आहे, त्याला म्हणतात सायबरकॉण्ड्रिया! नावाप्रमाणेच या विकारात लोक एखाद्या आजाराबद्दल ऑनलाईन वाचून किंवा बघून आपल्यालाही तोच आजार झाल्याचा समज करून घेतात. टाईम्स ऑफ इंडियातील १८ जानेवारी २०१६च्या बातमीनुसार गुगलवरील दर २० मागे १ सर्च हा वैद्यकीय गोष्टींशी संबंधित असतो. आज हा आकडा काय असेल, याची कल्पनाच केलेली बरी. केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांमध्ये स्वनिदानाचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय आहे.

    केवळ सायबरकॉण्ड्रियाच नव्हे, तर सध्या सर्वत्र वाढत चाललेले तणाव, अस्वस्थता, निद्रानाश इ. अनेक गोष्टींच्या मुळाशी हेच सोशल मिडिया, मोबाईल आणि इंटरनेटचे व्यसन आहे. इंटरनेट अॅडिक्शन डिसॉर्डर आणि त्याचाच भाऊ फेसबुक अॅडिक्शन डिसॉर्डर हे प्रकार उंबऱ्याशीच नव्हे तर उंबऱ्याच्या आत, तुमच्या-माझ्या आयुष्यामध्ये येऊन ठेपले आहेत व आपल्या मन:शांतीशी छेडछाड करताहेत. फेसबुक, इंटरनेट, मोबाईल यांच्यापलिकडे काही जग असतं, हेच जणू विसरून गेलो आहोत आपण! तुम्हाला गोल्डफिश माहितीये? अॅक्वेरियममध्ये ठेवतात तो मासा. त्याची एखाद्या गोष्टीवरची सरासरी एकाग्रता किती वेळाची असते, ठाऊक आहे? सुमारे ९ सेकंद! आणि माणसाची किती आहे? जवळजवळ ८ सेकंद! दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं, तर आपण गोल्डफिशपेक्षाही जास्त चंचल झालो आहोत. मी मुद्दामहून झालो आहोत म्हणतोय कारण, इ. स. २००० मध्ये आपली सरासरी एकाग्रता होती, जवळजवळ १२ सेकंद! म्हणजेच गेल्या १८ वर्षांत आपल्या एकाग्रतेची सरासरी जवळजवळ १/३ कमी झालीये!! डेलॉईट मोबाईल कन्झ्युमर सर्व्हे २०१६च्या आकडेवारीनुसार, ६१% लोकांना झोपेतून उठल्यावर पहिल्या ५ च मिनिटांत मोबाईल लागतो. ८८% लोक पहिल्या अर्ध्या तासात तर तब्बल ९६% लोक पहिल्या तासाभरात मोबाईल पाहातात. झोपण्याच्या १५ मिनिटे आधीपर्यंत मोबाईल पाहाणाऱ्यांचे प्रमाण ७४% आहे. याच सर्वेक्षणानुसार मोबाईल उघडल्या उघडल्या लोक आधी सोशल नेटवर्किंग साईट्स तपासतात, त्याखालोखाल मेसेजेस आणि इमेल्सचा क्रमांक लागतो. हा सर्व्हेदेखील जवळजवळ ३ वर्षे जुना आहे. आता काय परिस्थिती असेल, याची कल्पनाच केलेली बरी! हे कुठेतरी थांबावे असे नाही वाटत का? काही मिनिटे जरी इंटरनेट, व्हॉट्सॅप, फेसबुक गडगडलं तरीही आपण चिंताक्रांत होतो, हीच खरी चिंतेची परिस्थिती नाही का? ‘डिजिटल डिटॉक्स’ आणि त्यापेक्षाही ‘डिजिटल डिटॅचमेंट’ ही आता हळूहळू काळाची गरज बनू पाहातेय.

    बघा ना, पूर्वी एकेकाळी कॉलेजमध्ये कुणीतरी आवडायचं. पण बोलण्याची हिंमत कुठे? आज बोलू, उद्या बोलू करत कित्येकांची शिक्षणं झाली आणि त्याच्या किंवा तिच्या लग्नाला हजेरीसुद्धा लावून झाली. दहा-एक वर्षांपूर्वी सोशल मिडिया नावाचा मेघदूत अवतरला आणि ज्याच्याशी किंवा जिच्याशी नजरेला नजर भिडवण्याचीसुद्धा हिंमत नव्हती, हळूहळू त्या व्यक्तीला संगणकाच्या पडद्याआडून फ्रेण्ड रिक्वेस्ट टाकणे जमू लागले! आमच्या नगरकडे ना, फ्रेण्डशिप करत नाहीत. मागतात! एकेकाळी “फ्रेण्डशिप देतीस का” हे तीन जादुई शब्द पोट्ट्यांसाठी “आय लव्ह यू”इतकेच महत्त्वाचे होते. उच्चारणाऱ्याला आणि ऐकणारीला सर्रास ठाऊक असायचं की गाडी मैत्रीपूरच्या फाट्यावरून पलिकडे न्यायचीये. अर्थातच फाटा आहे तिथे फाट्यावर मारणंसुद्धा आहे! त्या तीन जादुई शब्दांनी कित्येकांना चपलेची चव कशी असते, याचाही अनुभव दिलाय. सोशल मिडियाने ही भिती कमी केली. ब्लॉकचा धोका होता, पण चपलेपेक्षा त्याने कमी दुखतं म्हणतात. एकेकाळी जशी गुलाबांची संख्या हे ब्युटीक्वीन्सच्या पॉप्युलॅरिटीचं परिमाण असायचं, त्याची जागा हळूच पेण्डिंग फ्रेण्डरिक्वेस्ट्सनी घेतली. ब्युटीसुद्धा हळूहळू गार्ड्स आणि फिल्टरपाठी लपू लागली! काही मंडळी जिला फ्रेण्डशिप मागू शकले नव्हते तिला “झालं का जेवण” विचारण्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्याचे बरेवाईट परिणामसुद्धा भोगले. तरुणाईला, मदर्स डे ला मानलेली सासू आणि फादर्स डे ला मानलेल्या सासऱ्यांची दर्शनं घडू लागली. पोरं बऱ्याच विषयांवर बोलती झाली. “फूड व्लॉगर (Food Vlogger)” या व्यवसायाची दहा वर्षांपूर्वी कुणी कल्पना तरी केली असती का हो? पण आज हा व्यवसाय आहे! हे आणि असे कित्येक बदल या पिढीने नको तितक्या वेगात पचवले. पुढे पुढे जाताना बरंच काही मागं राहून गेलं. नव्या पुस्तकांचा वास आता मनाच्या दुर्लक्षित कप्प्यात कुठेतरी पडून आहे, तसाच तळमळून लिहिलेल्या प्रेमपत्रांचा चुंबनस्पर्शसुद्धा कुठेतरी हरवलाय. लेखणीचा स्पर्श कामाशिवाय होतच नाही आता. क्लिक आणि टचची भुरळ पडू लागलीये. कवितांची जुनी डायरी दूर कुठेतरी हरवलीये. पुस्तक वाचता वाचता छातीवर उपडं ठेवून तासनतास विचार करणं जणू दुसऱ्याच कोणत्यातरी युनिव्हर्समध्ये व्हायचं. कालचं वर्तमानपत्र आज जुनं होतं, इथं मिनिटभरापूर्वी लिहिलेली पोस्टसुद्धा जुनी वाटू लागलीये. प्रेम आजही फुलते. नाती आजही बनतात. पण पूर्वी ती तुटल्यावर जितकी सलायची तितकी आता सलत नाहीत. लाईक आणि कमेंटपुरत्याच कॉम्प्लिमेंट्सने छाती फारशी धडधडत नाही. आज एक प्रोफाईल अनफ्रेण्ड केली की तिच्या जागी दुसरी सहज तयार असते. एकूण जगण्याचाच अटेन्शन-स्पॅन कमी झालाय. जणू सबंध आयुष्याचाच सोशल-मिडिया झालाय!

    बदल सृष्टीचा नियम आहे. पण तो बदल स्वीकारताना आपला मूळ गाभा, व्यक्तीमत्त्व तर त्याने चुरमडून जात नाहीये ना; आपल्यातल्या चांगल्या आणि साध्यासुध्या गुणांची किंमत तर त्यासाठी मोजावी लागत नाहीये ना, हे पाहायला नको? आजच्या काळात, सोशल मिडिया वापरणे कुणीच टाळू शकत नाही; परंतु तो आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनवताना आपलं जगणंच त्याच्यावर सोपवणं कितपत योग्य? कुठेतरी अंतर राखता आले पाहिजे. कुठेतरी आयुष्यातल्या इतर सहजसुंदर नैसर्गिक गोष्टींचा आस्वाद घ्यायला शिकले पाहिजे. आहे तो क्षण साजरा करायला शिकले पाहिजे. सगळ्याच गोष्टी कॅमेऱ्यात आणि नंतर इन्स्टाफीडमध्ये बंदिस्त करायचा अट्टाहास का? आणि सगळ्यांत महत्त्वाचे. कुठे थांबायचे हे ठरवायला शिकले पाहिजे. थोडक्यात, सोशल मिडिया आपलं आयुष्य हाताळायला लागलाय, त्याच्या आत आपणच त्याला योग्यप्रकारे हाताळायला शिकले पाहिजे!

    — © अॅड. विक्रम श्रीराम एडके

    (अभ्यासक आणि व्याख्याते. २६ जानेवारी २०१९ दिनी प्रकाशित झालेल्या वार्षिक ‘सहजीवन’ साठी लिहिलेला लेख.)

  • हिंदू चैतन्याचे अवतार!!

    बाजीराव सरकारांचे सार्वजनिक व्यक्तीमत्त्व कसे होते? चिमाजी अप्पा एका पत्रात लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३०), “वाटेस घोड्यावर बसोन चालले होते. तेव्हा एके गावचा पाटील भेटीस आला. तेव्हा असावध होते. त्यामुळे पाटलासी सहजात बोलले, जे कोंबड्यांचे प्रयोजन आहे. घेऊन येणे”. इथे चिमाजी खरे तर रागावून लिहितायत की, राऊंनी उघडउघड पाटलाकडे कोंबड्या मागितल्या. परंतु बाजीराव असेच होते. राजकारणात कुटील, मात्र त्याव्यतिरिक्त जे मनात असेल तेच ओठांवर ठेवणारे शिपाईगडी. ते उघडपणे मांसाहार करीत. मद्यप्राशन करीत. त्याकाळी पाहायला गेलं तर दोन्हीही ब्राह्मण्याला न शोभणाऱ्या गोष्टी. परंतु तसंच पाहायचं झालं तर, हिंदुपदपातशाही हे एकच उद्दीष्ट मनी बाळगून पायाला भिंगरी बांधल्यागत देशभर ससैन्य संचार करणे तरी कुठे ब्राह्मण्यात बसते? बाजीरावांना जाणीव होती की, सध्याचा काळ हा धर्म-धर्म करीत बसण्याचा नाही, तर त्या धर्माचं रक्षण करण्याचा आहे. खाणे-पिणे हे गौण आहे. ज्याला सबंध समाजाला आपलंसं करायचं असतं, त्याला आपल्या घरातल्या परंपरा बाहेरही लादण्याचा अट्टाहास करुन चालत नसतं. सतत फिरतीवर असणाऱ्याने, मुलुखगिरी-शिपाईगिरी करणाऱ्याने तर खाण्याचे चोचले करुच नयेत. तिथे सोवळेपणाची अपेक्षाही मूर्खपणाची आहे. जे मिळेल ते आणि जसे मिळेल तसे खाण्याची तयारी हवी, तरच मोहीमा साधतात.

    बाजीराव असेच होते. त्यांचे सैनिकच नव्हे तर ते स्वतःसुद्धा कधीच मोहीमांवर शिदोरी नेत नसत. काय करायचेय निष्कारण ओझे? भूक लागली, तर शत्रूचा मुलुख लुटून खायचं. ते साधणारे नसेल, तर मिळेल त्या गावी, मिळेल ती मीठभाकरी खायची. कित्येकदा तर हे जगज्जयी मराठी सैन्य घोड्यावरुन उतरतही नसे. कुठूनतरी कणसं आणायची. हातावरच हुरडा मळायचा. पोटात ढकलायचा. आणि वरुन पाणी मारायचं. हे जसे शिंदे, होळकर, सोमवंशी, जाधव, पवार, विंचूरकर करीत; तसाच त्यांचा लाडका पेशवाही करी! सरदार, सैनिकांसोबत मोहीमा करायच्या आणि खाण्यापिण्याच्या वेळी मात्र स्वत:चं सामाजिक श्रेष्ठत्व कुरवाळायचं, असा दुटप्पीपणा बाजीरावांच्या स्वभावात नव्हता. ते आपल्या सर्व थरांतल्या सरदारांसोबत राहात. त्यांच्यासोबतच जेवत. सगळे मित्र गप्पा मारत. झोप आली तर आकाशाच्या पांघरुणाखाली फत्तराचं अंथरुण करीत ताणून देत. आपले धनी आपल्यातच मिळून मिसळून वागतात, हे जेव्हा सैन्याला दिसतं, तेव्हाच कुठे सैन्य एकजिनसी राहातं. आणि म्हणूनच पालखेडसारख्या मोहीमांमध्ये हजारों किलोमीटर्सचा प्रवास घडूनही सैनिकांपैकी कुणीच हूं की चूं केलं नाही अथवा बाजीरावांवर शंका घेतली नाही. कारण, त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसत होतं की; ज्या परिस्थितीतून आपण जातोय, जे खातोय, जसं राहातोय, तसंच आपला पेशवाही राहातोय. त्याने स्वतःसाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा बादशाही थाट केलेला नाही. आपले भोग हेच त्याचेसुद्धा भोग आहे. मग क्षोभ कसा काय होणार? हेच बाजीरावांच्या सैन्याच्या अजिंक्यतेमागचं एक अतिशय महत्त्वाचं कारण होतं. बाजीराव सैन्यात राहून जसे थट्टामस्करी करायचे, सैन्यासोबत एकत्र बसल्यावर गाणी गायचे तसेच प्रसंगी कुणी चुकलाच तर “शिपाईगिरी कशास करता? रांडा जाले असते तर कामास येते” (मस्तानी – द. ग. गोडसे, पृ. १६२) असे अस्सल भाषेत सुनवायचेसुद्धा! त्यामुळेच सैन्याला ते जास्त आपल्यातले वाटायचे.

    स्वतः शाहू छत्रपतींना बाजीरावांच्या ह्या गुणांची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी बहुतांश बाबतीत राऊंना स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळेच अनेकदा मोहीमांवर बाजीराव परस्पर निर्णय घ्यायचे, तरी बाजीरावांच्या निष्ठेबद्दल शाहू थोडीदेखील शंका बाळगत नसत. बाजीरावांवर कधीच नाराज होत नसत. उलट १७२८ मध्ये सातारा दरबारातील पेशव्यांचे मुतालिक लिहितात (तत्रोक्त), “..राऊ स्वामींची मर्जी अवघियांनी पालावी. त्यांचे चित्तास क्षोभ करु नये”! किंवा मस्तानीच्याही संदर्भात शाहूंचे चिटणीस गोविंद खंडो दि. २१ जानेवारी १७४० यादिवशी नानासाहेबांना लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३२), “ऐसियास राजश्री स्वामींची मर्जी पाहाता ते वस्तू (मस्तानी) त्याजबरोबर (बाजीराव) न द्यावी, ठेवून घ्यावी, चौकी बसवावी; त्यामुळे राऊ खटे जाले, तऱ्ही करावे ऐसी नाही”! एवढी मर्जी सांभाळत असत शाहू बाजीरावांची.

    दुर्दैव असे की, बाजीरावांचे हे वेगळेपण, देशकालपरिस्थितीनुरुप आवश्यक असलेली वागणूक, सामाजिक स्तरावर किती जरी क्रांतिकारक असली, तरी वैयक्तिक स्तरावर त्यांना कधीच समजून घेतले गेले नाही. मित्र, सैन्य आणि मालक कायमच बाजीरावांच्या बाजूने असताना त्यांना तत्कालीन इतरांची फारशी साथ लाभल्याचे दिसून येत नाही. राऊंच्या अकाली जाण्यामागे हेदेखील कारण आहे, असे वाटते. नासिरजंगला हरवून पुण्यासही न परतता खरगोण प्रांतातील जहागिरीची व्यवस्था पाहायला बाजीराव निघाले होते. जाताना त्यांनी “मस्तानीस तिकडे पाठवून द्या” असेही चिमाजींना सांगितले होते. चिमाजींनी ते मान्य केले. नानासाहेबांना लिहिलेल्या पत्रात चिमाजी लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३३), “पुण्यास गेल्यावर तिची रवानगी त्यांजकडे करावी, आपले निमित्य वारावे, त्यांचे प्राक्तनी असेल ते होईल ऐसा विचार केला आहे”. परंतु प्रत्यक्षात मात्र मस्तानीस न पाठवता काशीबाईंनाच रावेरखेडी पाठवण्यात आले. किचन-पॉलिटिक्सचे धागे हे असे गुंतागुंतीचे होते! काशीबाई येण्यापूर्वीच बाजीरावांना ताप भरला होता. त्या आल्यानंतर अवघ्या २-३ दिवसांतच बाजीराव गेले! इतरांचे माहिती नाही, परंतु स्वतः बाजीरावांच्या मनात अखेरपर्यंत कुणाबद्दलच किंतु नव्हता. २३ मार्च १७४० यादिवशी ते बुऱ्हाणपुराहून मातोश्री राधाबाईंना त्याच अप्पांबद्दलच्या काळजीपोटी लिहितात (रियासत, पृ. ३९५), “आपांस उष्णकाळामध्ये बाहेर जाऊ न द्यावे”.

    समकालीनांनी व उत्तरकालीनांनी बाजीरावांबद्दल काही का गैरसमज करुन घेतलेले असेनात, सर जदुनाथ सरकार मात्र दिघेंच्या “Peshwa Bajirao I & Maratha Expansion” च्या प्रस्तावनेत म्हणतात, “Bajirao was a heaven born cavalry leader. In the long and distinguished galaxy of Peshwas, Bajirao was unequalled for the daring and originality of his genius and the volume and value of his achievements”! परंतु मला सर्वाधिक भावते ते इंग्रज इतिहासकार सर रिचर्ड कार्नॅक टेंपल यांचे मत. आपल्या “Shivaji & The Rise of Marathas” ग्रंथात ते बाजीरावांबद्दल लिहितात, “He died as he lived, in camp under canvas among his men, and he is remembered to this day among the Marathas as the fighting Peshwa and the incarnation of Hindu energy”! Incarnation of Hindu Energy, अर्थातच “हिंदुंच्या चैतन्याचा अवतार”! केवढे चपखल विशेषण आहे हे. बाजीरावांचे अवघे आयुष्य अवघ्या चारच शब्दांत पकडणारे अमोघ विशेषण!! खरोखर बाजीराव हे हिंदूंच्या चैतन्याचे अवतारच तर होते!! त्यांनी आमची मरगळ झटकून टाकली व आम्हांला स्वाभिमान शिकवला. हिंदुपदपातशाहीची कल्पना आमच्या मनांत ठाम केली. छत्रसालसारख्या दूरदेशीच्या राजाला मदत करुन “हिंदू तेवढा एक” हा संदेश आपल्या कृतीतून दिला. स्वराज्याचे साम्राज्य केले. आणि हे सारे करताना, वैयक्तिक ऐषाराम, सुखदुःख, तहान-भूक यांची काडीमात्रही पर्वा केली नाही. स्वार्थ नेहमीच दुय्यम मानला. अवघे ४० वर्षांचे आयुष्य. त्यात अवघ्या २०व्या वर्षी पडलेली पेशवाईची अवघड जबाबदारी. केवळ २०च वर्षांत स्वराज्याचा चारही बाजूंनी अतोनात विस्तार करण्याचे कर्तृत्व. त्यासाठी अथकपणे लढलेल्या लढाया आणि सर्वच्या सर्व लढायांमध्ये अजिंक्यपद!! खरोखर तो एक झंझावातच होता. आमच्या फाटक्या झोळीत कधीच न मावणारा झंझावात. म्हणूनच आम्ही त्याला कधीच गवसणी घालू शकलो नाही. तो आला, कर्तव्य केले आणि वै. शु. १३, अर्थात २८ एप्रिल १७४० यादिवशी निजधामी निघूनसुद्धा गेला, आज नाही तर काहीशे वर्षांनी तरी आपले कर्तृत्व ह्या निद्रिस्त हिंदुसमाजास समजेल, ह्या खात्रीने!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    *लेखकाच्या नावाशिवाय अथवा स्वत:च्या नावाने कॉपी करुन या लेखामागील कष्टांचा अपमान करु नये.
    (लेखक बाजीरावांच्या युद्धनीतीचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. अधिक माहितीसाठी पाहा www.vikramedke.com)

    image

  • असल उत्तर

    १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धातली घटना आहे. पाकिस्तान आधीपासूनच जिहादी मनोवृत्तीचे राष्ट्र, त्यामुळे ते युद्धखोरीसाठी सातत्याने तयारच असायचे. त्यातच अमेरिकेने त्यांना एम-४७ आणि एम-४८ पॅटन रणगाडे पुरवल्यामुळे तर त्यांची ताकद काहीच्या काहीच वाढली होती. याउलट भारताकडे मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या वेळचे काही जुने एम-४ शेरमन रणगाडे, काही सेंच्युरियन रणगाडे आणि काही हलके एएमएक्स-१३ रणगाडे असे अत्यंत जुनाट आणि तुटपुंजे असे शस्त्रबळ होते. पाकिस्तानला ही गोष्ट पक्की ठाऊक होती. त्यामुळे त्यांनी एक योजना आखली. पंजाबच्या खेमकरण क्षेत्रात त्यांनी १-२ नव्हे तर चक्क २२० पॅटन रणगाडे उतरवले. त्यांच्यापुढे आपल्या मोजक्या युद्धसामग्रीचा टिकाव लागणे कदापिही शक्य नव्हते. एवढे प्रचंड बळ उतरवून खेमकरण क्षेत्र झटक्यात जिंकून घ्यायचे आणि त्याच्या बदल्यात काश्मिरची मागणी करायची, असा पाकिस्तानचा डाव होता!

    खेमकरण क्षेत्रात त्यावेळी आपली ४थी माऊंटन डिव्हिजन तैनात होती. त्यांच्याकडे थोडंफार पायदळ आणि उपरोक्त तिन्ही प्रकारचे प्रत्येकी ४५ रणगाडे होते. या डिव्हीजनचे नेतृत्व करत होते मेजर जनरल गुरबक्ष सिंह (की हरबक्ष सिंह?)!! इतक्या कमी सामर्थ्यानिशी पाकिस्तानशी भिडणं म्हणजे अक्षरशः आत्महत्या ठरली असती. त्यांनी ताबडतोब आपल्या डिव्हिजनला ते क्षेत्र रिकामे करत माघार घेण्याचा हुकूम सोडला. दिनांक होता ८ सप्टेंबर १९६५!!

    पाकिस्तानच्या गोटात ही बातमी पोहोचताच त्यांना आनंदाचे भरतेच आले!! त्यांनी अजून जोरात आगेकूच आरंभली. आणि इथेच ते गुरबक्ष सिंहांच्या सापळ्यात अडकले!! गुरबक्ष सिंहांनी आपल्या सैन्याला माघार घेण्याचा हुकूम अवश्य दिला होता, पण माघार म्हणजे पळून जाणे नव्हे. गुरबक्ष सिंहांनी आपल्या सैन्याला खेमकरण भागातल्याच ‘असल उत्तर’ गावाला तिन्ही बाजूंनी घेरलेल्या अवस्थेत पेरून ठेवले होते. खेमकरण भाग मुळातच सुपीक आणि भुसभुशीत मातीचा. त्यातून दिवस ऊसाच्या हंगामाचे. बहरलेल्या ऊसांच्या शेतांमुळे भारतीय सैन्य सहजच लपून गेले होते. गावाला तिन्ही बाजूंनी घेरल्यामुळे आपोआपच इंग्रजी U सारखा आकार तयार झाला होता. आणि त्या व्यूहात समोरून पाकिस्तानी सैन्य आत घुसतच चालले होते!!

    पण नुसती व्यूहरचना करून उपयोग नव्हता. जोपर्यंत पाकिस्तानकडे पॅटन रणगाडे होते, तोपर्यंत आपला कोणताही व्यूह भेदणे त्यांच्यासाठी डाव्या हाताचा मळ होता. दि. ९ सप्टेंबर!! पाकिस्तानी रणगाडे आपल्या व्यूहात अगदी आतवर शिरले. आणि काही कळायच्या आतच भारतीय सैन्याने त्यांच्यावर न भूतो न भविष्यति मारा करायला सुरुवात केली. आपले रणगाडे नुसते आग ओकत होते आग!! पाकिस्तान्यांनी उत्तर देण्यासाठी प्रयत्न केला, तर त्यांच्या रणगाड्यांची आतवर शिरलेली पहिली फळी जागची हललीच नाही! त्यांनी जरा अजून जोर लावून हलायचा प्रयत्न केला तर.. हाय रे दुर्दैवा.. त्यांचे रणगाडे जमिनीत रुतून बसले होते आणि जितकी जास्त हालचाल करू तितके अजूनच रुतत चालले होते. कसा काय झाला होता हा चमत्कार?

    त्याकाळी भारत आणि पाकिस्तान दोघांकडेही रात्री युद्ध करण्याची क्षमता नव्हती. गुरबक्ष सिंहांनी ८ सप्टेंबरच्या रात्रीच त्याठिकाणची भुसभुशीत जमीन लक्षात घेऊन तिथे पाण्याचे टँकरच्या टँकर रिते केले होते. ते कमी म्हणूनच की काय, जवळच्या एका कालव्याचे सगळेच्या सगळे पाणी त्याठिकाणी वळवले होते. आधीच जमीन भुसभुशीत, त्यात प्रचंड पाणी!! दलदल तयार झाली अक्षरशः तिथे!! आणि दुसऱ्या दिवशी जडशीळ पाकिस्तानी रणगाडे अलगद त्या दलदलीत सापडले! एकदा पहिली फळी अडकली म्हटल्यावर मागच्या सर्व फळ्या आपोआपच अचल झाल्या!! भारतीय सैन्यासाठी आयती मेजवानीच जणू!! जणू काही रणगाड्यांचा सराव चाललाय अश्या थाटात निपचित पडलेल्या शत्रूवर तिन्ही बाजूंनी तुफान मारा केला आपण. पाकिस्तानने २२० रणगाडे म्हणजेच त्यांच्या समग्र क्षमतेच्या १/३ रणगाडे उतरवले होते. मात्र त्या एकाच दिवसांत आपण त्यांचे तब्बल ९७ रणगाडे उडवले आणि जवळजवळ ११ रणगाडे हस्तगत केले, आपल्या केवळ १० रणगाड्यांच्या मोबदल्यात!! इतर लोक तर सोडाच, पण पाकिस्तानचा कमांडर मेजर जनरल नासिर अहमद खान स्वतःच या लढाईत गंभीररित्या जखमी झाला!! भरपूर ताकद असलेल्या परंतु कवडीचीही अक्कल नसलेल्या पाकिस्तानला बिनशर्त माघार घ्यावी लागली, हे सांगावयास नकोच!! लवकरच त्यांचे वायुदल लाहोरहून झेपावणार होते. पण त्यांची अशी काही दातखिळ बसली, की ते वायुदल कधी झेपावलेच नाही!! याच युद्धादरम्यान कंपनी क्वार्टर मास्टर हवलदार अब्दुल हमिद यांनी एकहाती ६ रणगाडे मारले आणि ७ वा उद्ध्वस्त करताना त्यांना वीरमरण आले. या पराक्रमासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र हा सर्वोच्च लष्करी सन्मान प्रदान करण्यात आला.

    ही लढाई ‘असल उत्तरची लढाई’ म्हणून ओळखली जाते. ‘असल उत्तर’ जणू नीच पाकिस्तान्यांना भारतीय जवानांनी दिलेले ‘असल उत्तर’च (खरे प्रत्युत्तर!) ठरले!! दुसरं महायुद्ध वगळता रणगाड्यांनी लढलं गेलेलं हे जगातलं सर्वांत मोठं युद्ध!! पाकिस्तानच्या पराभवाचे स्मरण म्हणून त्या जागेचे नाव ‘पॅटन नगर’ असे ठेवण्यात आले!! ते गाव आजही उभे आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही म्हण सिद्ध करणारी भारताची विजयपताका उंचावत!!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी अथवा विविध विषयांवर लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com]

    image