Category: Ramayana

  • रावणाचं फर्स्ट इम्प्रेशन!

    रावणाचं फर्स्ट इम्प्रेशन!

    वाल्मिकी रामायणात रावणाचा उल्लेख अगदी बालकांडापासूनच असला तरीही रावणाचं पहिलं वर्णन येतं ते थेट अरण्यकांडात स्वतः रावणाच्याच तोंडून. सर्ग ३१ मध्ये अकम्पन नावाचा राक्षस लंकेला जातो आणि रामाने जनस्थानातून राक्षसांचे उच्चाटन केल्याची बित्तंबातमी तो रावणाला सांगतो. तेव्हा क्रोधाने फुत्कारणारा रावण श्लोक क्र. ५ ते ७ येथे त्याला म्हणतो, “माझा अपराध करून इंद्र, यम, कुबेर आणि विष्णूही सुखाने नाही जगू शकणार. मी काळाचाही काळ आहे. मी आगीलाही जाळून टाकू शकतो. आणि मृत्यूलाही मृत्यूमुखी पाडू शकतो मी. मी जर चिडलो तर वाऱ्यालाही रोखू शकतो आणि सूर्यालाही भस्म करू शकतो”. रावण हे जे काही बोलतो यात आलंकारिकता आहे, परंतु अतिशयोक्ती अजिबातच नाही. त्याने खरोखर तिन्ही लोक पादाक्रांत केलेले आहेत, देवादिकांनाही हरवलेलं आहे आणि एक साक्षात शंभूमहादेव व कार्तवीर्य सहस्रार्जुन सोडले तर कुणीच रावणाचं काहीच वाकडं करू शकलेलं नाहीये.

    त्यानंतर पुढच्याच सर्गात रावण आपल्याला दिसतो ते शूर्पणखेच्या नजरेतून. लक्ष्मणाकडून प्रताडित झालेली शूर्पणखा लंकेला जाते, तेव्हा तिला रावण कसा दिसतो? अरण्यकांड, सर्ग क्र. ३२, श्लोक क्र. ४ ते २३ इथे वाल्मिकी लिहितात –

    “विमानाच्या अग्रभागी बसलेला, तेजाने झळझळणारा रावण तिने पाहिला. इंद्राच्या सभोवती जसे मरुद्गण असतात तसेच त्याच्या आसपास त्याचे सचिव होते. त्याचं स्वर्णसिंहासन सूर्यासम चमकत होतं. आणि ज्याप्रमाणे सोन्याच्या वीटांनी बनलेल्या यज्ञवेदीमध्ये स्थापित अग्नि तुपाच्या आहूतीने अधिकच प्रज्वलित होतो, तसा तो रावण दिसत होता. समरभूमीवर तोंड वासलेल्या यमराजासारखा तो रावण देवता, गंधर्व, भूत, ऋषी यांनाही अजेय होता. देवासुर संग्रामाच्या वेळी त्याच्या शरीरावर वज्र आणि अशनीने ज्या जखमा झाल्या होत्या, त्याच्या छातीवर ऐरावताने जे सुळे खुपसले होते त्या सगळ्यांचे व्रण तो मिरवत होता. त्याला वीस भुजा, दहा तोंडे होती. त्याची छत्रचामरादी आभूषणे प्रेक्षणीय होती. त्याचे वक्षस्थळ विशाल होते. आणि तो सगळ्याच राजलक्षणांनी संपन्न होता. त्याचे शरीर त्याने धारण केलेल्या वैदूर्यासारखेच होते. त्याने तप्तसुवर्णाची आभूषणे परिधान केली होती. त्याचे बाहू सुंदर, दात शुभ्र, चेहरा मोठा व शरीर पहाडासारखे होते. देवांशी युद्ध करताना विष्णुने त्याच्यावर शेकडो वेळा चक्राचा प्रहार केला होता. इतर युद्धांतही अनेक शस्त्रांचे वार त्याच्या शरीराने झेलले होते. आणि अशा देवांच्या शस्त्रांनाही लीलया पचवलेल्या शरीराने तो शांत समुद्रालाही अशांत करून टाकायचा. तो अतिशय चपळ होता. तो पर्वतशिखरे उपटून फेकून द्यायचा. देवांना चिरडून टाकायचा. तो धर्माचा समूळ नाश करायचा आणि परस्त्रियांचं सत्व नासवायचा. तो सर्व प्रकारच्या दिव्यास्त्रांमध्ये पारंगत आणि यज्ञांमध्ये विघ्न उत्पन्न करणारा होता. एकदा तर त्याने भोगवतीला जाऊन नागराज वासुकीला हरवून तक्षकाच्या प्रिय पत्नीचे अपहरण केले होते. कैलासावर जाऊन त्याने कुबेराचे विमान हुसकावले होते. त्याने रागात येऊन कुबेराचे चैत्ररथ वन, नलिनी नावाची पुष्करणी आणि इंद्राचे नंदनवन व इतर उद्यानांची नासधूस केली होती. पर्वतासारखा तो चंद्र आणि सूर्याला आपल्या हातांनी रोखू शकायचा. पूर्वी त्याने घोर वनात दहा सहस्र वर्षे तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला आपल्या मस्तकांचा बळी अर्पिला होता. आणि त्यामुळेच त्याला देवता, दानव, गंधर्व, पिशाच्च, पक्षी व सापांपासून अभय प्राप्त झालं होतं. एक मनुष्यप्राणी वगळता त्याला कुणाकडूनही मृत्यू येऊच शकत नव्हता. ब्राह्मणांद्वारा केलेल्या मंत्रोच्चारांनी यज्ञांतून निघणारा सोम तो महाबली नासवून टाकायचा. यज्ञातून मिळणारे फळ नासवणारा तो ब्रह्महत्यादि क्रूरकर्मे करायचा. तो कर्कश, निर्दय आणि सदैव प्रजेचं अहित करण्यातच गुंतलेला असायचा. समस्त प्राणिमात्रांना भयकारी असा तो क्रूर व महाबलशाली भाऊ शूर्पणखेने पाहिला. तो दिव्य वस्त्राभरणांनी विभूषित आणि दिव्य माळांनी सुशोभित होता. तो राक्षसांचा राजा, महाभाग पौलस्त्यकुलनंदन त्या आसनावर प्रलयकाळी सगळ्यांचा संहार करणाऱ्या काळासारखाच भासत होता”.

    हे मूळ रामायणातील रावणाचे फर्स्ट इम्प्रेशन आहे! यात त्याची बुद्धी, बल, पराक्रम, क्रौर्य सारे सारे काही एकाचवेळी अत्यंत समर्थपणे मांडले आहे. मी वाल्मिकी रामायणावर तीन दिवस व्याख्याने देतो (संपर्क) तेव्हा पहिला सबंध दिवस जवळजवळ दोन तास रावणावर बोलत असतो, एवढा महाप्रचंड पसारा आहे रावणाच्या बल, बुद्धी आणि पराक्रमाचा. तो शास्त्रांचा ज्ञाता आहे, अस्त्रांचा धर्ता आहे. तो वेदशास्त्रसंपन्न आहे, तो चक्रवर्ती साम्राज्याचा कर्ता आहे. एका सम्राटाकडे असायलाच हवे ते सारे गुण त्याच्यात एकवटले आहेत आणि इतके असूनही तो केवळ त्याच्या दुर्गुणांमुळे कसा रसातळाला गेला ते स्खलन वाल्मिकींनी अतिशय प्रांजळपणाने मांडले आहे.

    असा गुणावगुणांचा खजिना असलेला रावण कलाकृतींतून साकारणे म्हणजे सोपे काम नव्हे. आधुनिक काळात विचार केला तर फक्त आणि फक्त रामानंद सागरांच्या ‘रामायणा’त (१९८७-८८) अरविंद त्रिवेदींनी साकारलेला रावणच या सगळ्या कसोटींवर खरा उतरतो. बाकी बॉलिवूडने कालपरवा रिलिज झालेल्या टिझरमध्ये रावणाच्या डोळ्यांत काजळ, केसांचा मॉडर्न कट वगैरे दाखवून, त्याला व्हायकिंग्ससारखे कपडे घालून जॉन स्नोप्रमाणे ड्रॅगनवर (की वटवाघळावर?) बसलेले दाखवून विविधांगी पटलांनी समृद्ध अशा या बहुढंगी व्यक्तिमत्त्वाचा पार विनोदी विदूषक करून सोडलाय. ज्यांची जेवढी झेप तेवढीच त्यांची मांडणी! आणि ज्यांचा जेवढा आवाका तेवढीच त्यांना रामकथा कळते. बाकी श्रीरामचन्द्रार्पणमस्तु!!

    — © विक्रम श्रीराम एडके

    [अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com]

  • आरआरआर — भारताची कथा भारताच्या भाषेत जगाला सप्रेम!

    आरआरआर — भारताची कथा भारताच्या भाषेत जगाला सप्रेम!

    एक आहे जो वरिष्ठ अधिकाऱ्याच्या केवळ एका आज्ञेसाठी सहस्रोंच्या प्रक्षुब्ध जमावात फक्त एक लाठी घेऊन एकटाच घुसतो. जबर जखमी होतो पण आरोपीला पकडून आणतोच आणतो. त्याचं नाव आहे अल्लुरी रामराजू! दुसरा आहे तो जो पूर्ण वाढ झालेल्या जंगली वाघाला जाऊन बिनधास्त भिडतो. वाघ त्याच्या चेहऱ्यावर डरकाळी फोडतो तर हा पठ्ठ्या त्या वाघालाच घाम फोडणारी शतपट डरकाळी फोडतो. त्याचं नाव आहे कोमारम भीम! राम अग्नि आहे तर भीम जल. जलतत्त्व प्राण आणि उदानवायूत विभागले गेले तर अग्निशी अतूट मैत्री करते आणि तीच तत्त्वे जर एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली तर देवासुरांनाही लाजवेल असा संग्राम होतो! याच अतूट मैत्रीची आणि दुर्लभ शत्रुत्त्वाची कथा म्हणजे एस. एस. राजमौलीचा नवाकोरा चित्रपट, ‘आरआरआर’ अर्थात ‘रौद्रं रणं रुधिरम्’!

    एखादी चौकट उभी करण्यासाठी अवकाश आणि काळाला छेद देणारी असीम कल्पनाशक्ती दिग्दर्शकाकडे असणे आवश्यक असते. पण त्याहूनही जास्त आवश्यक असते ती अजून एक गोष्ट, अमर्याद आत्मविश्वास. कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वास राजमौलीकडे जितका आहे, तितका क्वचितच कुणाकडे असेल. पहिल्या दृश्याच्या पहिल्या चौकटीपासून प्रेक्षकाचे डोळे पडद्याला घट्ट जखडून टाकण्याची भीमरूप शक्ती त्याच्याकडे आहे. या एकाच मुद्यावर भारतातीलच नव्हे तर जगभरच्या बहुतांशी दिग्दर्शकांनी राजमौलीचे पाय धुवून चरणामृत प्यायले पाहिजे, तेव्हा कुठे त्याच्या तेजाचा एखादाच अंश त्यांच्यात उतरू शकेल. आपल्या बुद्धीला पटत असतं की समोर जे दिसतंय ते प्रत्यक्ष जगात कधीच घडू शकत नाही, पण आपलं मनच राजमौलीला फितूर होतं आणि बुद्धीला पोत्यात घालून एखाद्या हिंस्र मांजराला दूर सोडून यावं तसं आपण हसत हसत सोडून येतो. आणि हे एकदा घडत नाही तर प्रत्येक चौकटीत घडतं, तीन तास घडतं आणि चित्रपट पाहाणाऱ्या एक, दोन नव्हे तर कोट्यवधी रसिकांसोबत घडतं. म्हणजे त्या दिग्दर्शकभालतिलकाची ताकद केवढी असेल, कल्पना करा फक्त. त्याचे चित्रपट, त्यांच्या चौकटी, त्यांचं प्रत्येक दृश्य ‘चांदोबा’मधील एखादी कथा सादर व्हावी आणि रंगीबेरंगी चित्रे उभारून यावीत तशी आपल्यासमोर उलगडत जातात आणि आपण लहान मूल होऊन त्या विश्वात हरखून जातो. प्रेक्षकांना रडवणं खूप सोपं असतं हो, आणि या देशाच्या श्रद्धेला व येथील बहुसंख्यकांच्या सहनशील धर्माला शिव्या घालून विचारवंत म्हणून मिरवणं तर त्याहूनही सोपं असतं. पण दुनियादारीने गांजलेल्या, पिचलेल्या प्रेक्षकाचं निरागस लहान मूल करून टाकणं आणि त्याला तीन तास अवर्णनीय अनुभव देत गुंतवून टाकणं नुसतं अवघडच नाही तर अशक्यसुद्धा आहे. राजमौली हा चमत्कार लीलया करतो, एकदा नाही तर सहस्रावधी वेळा करतो!

    ‘आरआरआर’चं दुसरं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो शब्दबंबाळ नाही. उलट तो शक्य तितका वेळ चित्रभाषेत बोलत राहातो. आणि जेव्हा चित्रभाषेला अजूनच शतपटींनी उठावदार करण्याची गरज असते, तेव्हा आणि तेव्हाच तो संवादांचा आश्रय घेतो. राजमौलीच्या आजवरच्या समस्त चित्रपटमालिकेत शांततेचा सर्वाधिक परिणामकारक वापर केलेला चित्रपट जर कोणता असेल, तर तो हा आहे! पात्रं तर मौनातून व्यक्त होतातच, परंतु कीरवाणीचं तांडव घालणारं अनुपम पार्श्वसंगीत पडद्यावर अनेक वेळा पूर्णपणे गप्प होतं आणि त्या त्या दृश्यांचा परिणाम न भूतो न भविष्यति वाढतो! राजमौलीने किती सूक्ष्म चिंतनातून दृश्यं रचली असतील, फक्त विचार करून पाहा. कीरवाणीचे पार्श्वसंगीत तर मी गेल्या कित्येक वर्षांत [कदाचित ‘बाहूबली – द कन्क्लुजन’नंतर (२०१७) पहिल्यांदाच!] ऐकलेले सर्वश्रेष्ठ रहमानेतर पार्श्वसंगीत आहे. हिंदी, विशेषतः मराठी चित्रपटसृष्टीने हा मुद्दा समजून घ्यायला पाहिजे की, नुसते संगीताचे तुकडे उत्तम असून चालत नाही तर ते पार्श्वसंगीत तांत्रिकदृष्ट्या निर्दोषदेखील असले पाहिजे. कीरवाणीचे संगीत आणि त्यासोबतचे ध्वनीसंयोजन शब्दशः निर्दोष आहेत. एकच गोष्ट केवळ विरस करते ती म्हणजे गाणी उत्तमच असली तरी त्यांच्यावर ‘बाहूबली’चा नको वाटण्याइतपत प्रभाव आहे. पण गाण्यांसाठीसुद्धा राजमौलीने अशा सुरेख जागा काढल्या आहेत की काय महिमा वर्णू! वर म्हणालो होतो ना की, चित्रभाषेच्या पुढचे संवाद आहेत, तसंच जिथे संवादांच्या पुढे जाण्याची गरज पडते तिथेच फक्त राजमौलीने गाणी वापरली आहेत.

    के. व्ही. विजयेंद्र प्रसादांची कथा मुळातच एखाद्या रमणीसारखी देखणी आहे. पण जेव्हा त्या कथेला राजमौली पटकथेचा श्रृंगार चढवतो तेव्हा तर तिची अशी काही त्रिभुवनसुंदरी होऊन जाते की, कुणीही सहज प्रेमात पडावं! दोन महानायक, दोघांचाही अफाट चाहतावर्ग. पण असं एकदाही म्हणायला जागा नाही की याला कमी वाव दिलाय आणि त्याला जास्त. उलट दोन्हीही मुख्य पात्रे सतत एकमेकांना आणि पर्यायाने चित्रपटालाही उत्कर्षाकडे खेचतच राहातात! इतकी संतुलित पटकथा मी गेल्या अनेक वर्षांत मुख्य प्रवाहातील कोणत्याच चित्रपटात पाहिली नव्हती. दोन्हीही मुख्य पात्रांची सुसंगती (केमिस्ट्री) ही नुसती सुंदरच नाही तर आजच्या काळात दुर्लभदेखील आहे. एवढी निर्व्याज मैत्री पडद्यावर साकारायला माणूसही तसाच सच्चा असावा लागतो. राजमौलीच्या सच्चेपणाला तारक आणि रामचरण दोघांनीही अजोड साथ दिली आहे. पडद्यावर पात्रांमध्ये सुसंगती दिसण्यासाठी मुळात ती कलाकारांमध्ये असायला हवी, हे दोघेही त्या सुसंगतीचे अप्रतिम उदाहरण म्हणून समोर येतात. विशेष म्हणजे पटकथेत सर्वत्र सांकेतिकतेचा मुक्तहस्ते वापर केलाय. तो इतका सोपा आहे की, सामान्यातिसामान्य प्रेक्षकालाही चटकन कळावा पण इतका संयत आहे की तो कुठेच भडक, बटबटीतसुद्धा न वाटावा. हाच तो पटकथेतील समतोल! चित्रपटात अनेक दृश्ये, संवाद असे आहेत की त्यांचा संदर्भ इतर वेगवेगळ्या प्रसंगांत लागत जातो. पण तो संदर्भ किती जरी बारीक असला तरीही नंतरच्या त्या त्या दृश्यात तो बरोब्बर तीव्रतेने आठवतोच आठवतो. राजमौली चित्रभाषाकोविद असण्याचे याहून मोठे कोणते उदाहरण असेल!

    मला अभिमान आणि काहीसा खेददेखील वाटत राहातो की, चित्रपट माध्यमाचा अभ्यास करत असल्यामुळे बरेचदा एखाद्या चित्रपटाच्या कथेत येणारी वळणं मला अचूक समजतात. परंतु इथे मी प्रामाणिकपणे मान्य करतो की, मध्यंतराच्या जरासं आधी कथेत जो एक अनपेक्षित धक्का बसतो तो मला बापजन्मीदेखील ओळखता नसता आला. इतकी सोपी युक्ती वापरून राजमौलीने तो आधी लपवलाय की त्यामुळेच तो ओळखायला अशक्य झालाय. या, या अद्वितीय सामर्थ्याला मी मान लववून प्रणाम करतो! त्यानंतर थोड्याच वेळात एका प्रसंगामध्ये भीमाच्या पाठिशी जलधारा नाचत असतात तर रामच्या पाठिशी अग्नितांडव सुरू असते, तो राजमौलीच्या दिग्दर्शनाचा परमोच्चबिंदू आहे. की ज्या भीम रामाला खांद्यावर घेतो व ते दोघे मचाणावर उडी मारतात तो राजमौलीच्या दिग्दर्शनाचा परमोच्चबिंदू आहे? खरं सांगू, अशी शेकडो दृश्ये सांगता येतील. प्रत्यक्षात सबंध चित्रपटच राजमौलीच्या दिग्दर्शनाचा परमोच्चबिंदू आहे!

    एक वेंकटेस्वरुलुचा (समुद्रकणी) अपवाद वगळता चित्रपटात एकही पात्र उगाचच नाही. समुद्रकणीसारख्या ख्यातकीर्त अभिनेत्याला इतकी सोपी भूमिका का दिली असावी? कदाचित चित्रपट बहुभाषिक असल्यामुळे तमिळ प्रतिनिधित्वासाठी ते केलं असावं. पण तो एक अपवाद आहे. बाकी प्रत्येक पात्र ज्याला पडद्यावर वावरण्यासाठी विशिष्ट वेळ दिला आहे, ते प्रत्येक पात्र असं खुबीने योजलंय की त्याने कथा काही कोस तरी पुढेच नेली पाहिजे. सुरुवातीला मला वाटलं होतं की सीतेचे (आलिया भट्ट) पात्र उगाच आहे की काय, पण तिसऱ्या अंकात सुरुवातीला ती कथेला जे निराळेच वळण देऊन जाते, ते अचंबित करणारे आहे. रामायणावर चिंतन करताना मला कायम वाटायचं की वनवासी राम हा दाढी मिश्या वाढवलेलाच असणार. रामचरण हा त्या माझ्या कल्पनेतला राम साक्षात साकारतो. पण वाचिक आणि कायिक अभिनय या दोन्हीही बाबतीत त्याला तारकने अक्षरशः कच्चा खाल्लाय! अजय देवगणने लहानश्याच भूमिकेत अक्षरशः जीव ओतलाय. ॲलिसन डूडी, रे स्टिव्हनसन यांनी खलनायक चपखल साकारलेयत. ऑलिव्हिया मॉरीस कमालीची गोड दिसते.

    के. के. सेंदिलकुमारचे छायांकन अप्रतिम झाले आहे. पण खरा कस संपादक ए. श्रीकर प्रसादचा लागला असणार. एवढ्या सुंदर शॉट्सपैकी काय ठेवायचं काय काढायचं आणि एवढा प्रचंड परीघ असलेल्या चित्रपटाची चटपटीत मांडणी करायची म्हणजे काही खायचे काम नाही! ‘बाहूबली’तील विभास जबरदस्त होते, तर ‘आरआरआर’मधील विभास त्याहूनही श्रेष्ठतर झाले आहेत. दुसरे म्हणजे नेपथ्य कसे उभारावे व त्याचा कसा शंभर टक्के वापर करून घ्यावा, याचा वस्तुपाठ म्हणजे ‘आरआरआर’! साडेपाचशे कोटींच्या बजेटमधील एकूणएक रुपया पुरेपूर वापरून घेतलाय आणि त्यातून झालेली निर्मिती नुसती अचाटच नाही तर चपखलदेखील झाली आहे! एका एका दृश्यावर परिच्छेदामागून परिच्छेद लिहिता येतील खरं तर, पण विस्तारभयास्तव एकच सांगतो. तिसऱ्या अंकाचा उत्कर्षबिंदू पाहा. केवढ्या सुंदर सांकेतिकतेतून राजमौलीने दाखवून दिलंय की या राष्ट्राचं उत्थान व्हावयाचं असेल तर राम आणि भीम एकत्र येण्यातूनच ते होऊ शकतं! त्याच प्रसंगापूर्वी म्हणजे तिसऱ्या अंकाच्या सुरुवातीला राजमौली रामायणाची कथा पूर्णपणे उलट फिरवतो, ती माझ्या मते या पटकथेतील सगळ्यांत सुंदर जागा आहे.

    वर एका परिच्छेदात मी प्रेक्षकांसाठी निरागस शब्द वापरलाय. तो जाणूनबुजून वापरलाय बरं का! तसं बघायला गेलं तर रामराजू आणि भीम एकमेकांना कधीच भेटले नव्हते. त्यांचं खरं क्रांतिकार्यदेखील चित्रपटाच्या कथाभागानंतर जवळपास दहा वर्षांनंतर सुरू झालंय. थोडक्यात चित्रपट हा त्या दोघाही महान क्रांतिकारकांची काल्पनिक मूळकथा (ओरिजिन स्टोरी) मांडतो. हा ऐतिहासिक चित्रपट नाहीये तर इतिहासाची किनार असलेली काल्पनिका (फॅण्टसी) आहे. दुसऱ्या शब्दांत सांगतो, राजमौलीने चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली नाहीये तर सबंध चित्रपटच सिनेमॅटिक लिबर्टी आहे! पण तरीही तुरळक विवाद सोडल्यास बहुतांशी प्रेक्षकांनी त्याला हसतमुखाने स्वीकारलंय. का? हिंदी ऐतिहासिक चित्रपटांमध्ये लहानसा बदल जरी केला तरी लोक चवताळतात. इथे तर खऱ्याखुऱ्या पात्रांना कल्पनेचा साज चढवलाय तरीही लोकांच्या भावना दुखावत नाहीयेत. का? या सगळ्या ‘का?’चं उत्तर एकच आहे आणि ते हे की, चित्रपट ‘वोक’ नाहीये  आणि म्हणूनच तो प्रेक्षकांनी आपला म्हणून स्वीकारलाय. बहुतांशी वेळा हिंदीत किंवा इतरही तथाकथित आशयघन चित्रपटसृष्टींमध्ये ऐतिहासिकपट बनवताना जेव्हा जेव्हा सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाते, तेव्हा तेव्हा दिग्दर्शक त्याची ‘वोक’ – पण कालबाह्य झालेली मूल्यं पात्रांवर, कथेवर लादायचा प्रयत्न करतो. त्याने पात्रांचे सोशल विदुषक होतात आणि कथेची बेचव भेळ होऊन बसते. म्हणून लोक चवताळतात. म्हणून लोक नाकारतात. राजमौली असा मूर्खपणा करत नाही. तो त्याच्या मायबाप प्रेक्षकांना मूर्खात काढत नाही. तो आपल्या कलाकृतीतून रसिकांना उद्धट शिवी घालत नाही. तो लोकांच्या निर्भेळ भावनांना कलेतून अलगद साद घालतो. त्याचा चित्रपट आस्थेच्या, श्रद्धेच्या प्रतीकांना विचित्र विचारसरणींपायी दूर लोटत नाही, उलट अभिमानाने मिरवतो. त्याची ऐतिहासिक पात्रं काल्पनिकतेचा साज लेऊन जरी आली तरी ती जी मूल्यं मांडतात ती काल्पनिक पॉलिटिकल करेक्टनेसची नाहीत. त्याची पात्रं जी मूल्यं मांडतात ती या राष्ट्राच्या मातीतील आहेत, कालजयी आहेत, चिरंतन आहेत आणि म्हणूनच सुसंगत आहेत. म्हणून लोक त्यांना प्रेमाने स्वीकारतात.

    राजमौलीचा विकास नीट पाहा. ‘बाहूबली’ द्वयी (२०१५-१७) साकारायला ‘मघाधीरा’पेक्षा (२००९) लाखपटींनी अवघड होती. पण मी अत्यंत जाणीवपूर्वक विधान करतो की, ‘आरआरआर’ हा ‘बाहूबली’पेक्षा लाख पटींनी गुंतागुंतीचा व साकारायला अवघड आहे. आणि म्हणूनच सांगतो, राजमौली त्याच्या भरमसाठ बजेटमुळे यशस्वी नाही. राजमौली भारताची कथा, भारताच्याच भाषेत अत्यंत अभिमानाने सबंध जगाला डंके की चोट पे ऐकवतो, म्हणून यशस्वी आहे. ‘आरआरआर’चं सार हेच आहे. ‘आरआरआर’ या बाबतीत ‘बाहूबली’पेक्षाही सरस आहे!

    *५/५

    — © विक्रम श्रीराम एडके

    [अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com]

  • सजीवीकरणातून साकारलेल्या वैश्विक कथा : लव्ह डेथ + रोबॉट्स

    भारतीय (विशेषतः उत्तरेकडील) चित्रपटसृष्टी आणि अभारतीय चित्रपटसृष्टी यांच्यात एक मूलभूत अंतर आहे. भारतीय चित्रपटसृष्टी या सजीवीकरणाला (ऍनिमेशन) लहान मुलांनी पाहायची गोष्ट मानतात तर अभारतीय चित्रपटसृष्टी मात्र जे जे काही प्रत्यक्ष चित्रणातून साध्य होऊ शकत नाही अथवा ज्याची साथ लाभल्यास प्रत्यक्ष चित्रण अनेक पटींनी अधिक खुलते अशी गोष्ट म्हणजे सजीवीकरण, असे मानतात. पहिल्या वाक्यात मुद्दामहूनच दोन गोष्टी लिहिल्या आहेत. एक म्हणजे अभारतीय चित्रपटसृष्टी. कारण, केवळ पाश्चात्यच नाही तर अनेकानेक पौर्वात्य चित्रपटसृष्टीदेखील सजीवीकरणात अग्रेसर आहेत त्या केवळ सजीवीकरण म्हणजे लहान मुलांच्या गोष्टी असा डबक्यातला विचार न करण्यामुळेच. याचे अतिशय प्रसिद्ध उदाहरण म्हणजे आपणां सर्वांनाच ठाऊक असलेला युगो साकोंचा ‘रामायण – द लिजण्ड ऑफ प्रिन्स राम’ हा १९९२ सालचा चित्रपट. वरवर लहान मुलांसाठी वाटणारा हा चित्रपट मोठ्यांच्याही मनाला तितकाच हात घालतो. आज सुमारे दोन दशके उलटल्यावरही या चित्रपटाच्या तोडीचे काहीच आपल्याकडे बनले नाही, हा दैवदुर्विलास नसून आपले या माध्यमाकडे झालेले दुर्लक्ष आहे, असे माझे ठाम मत आहे. या बाबतीत आपल्याकडील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी उत्तरेकडील चित्रपटसृष्टींपेक्षा लाखों पटींनी पुढे आहेत, हा दुसरा मुद्दा. सजीवीकरण जरी नाही तरी केवळ विभासांच्या (व्हिज्युअल इफेक्ट्स) जीवावर उभे राहिलेले अनेकानेक चित्रपट तमिळ, तेलुगू, मलयाळम चित्रपटसृष्टींत दिसतात. तसे ते हिंदीतही दिसतातच. पण तुलना केल्यास हिंदीवाले तांत्रिकदृष्ट्या अजूनही खूपच मागे आहेत.

    हे नमनालाच घडाभर तेल मी का ओततोय? काही वर्षांपूर्वी एक चित्रपटदिग्दर्शक माझ्याकडे आला होता. त्याला ओटिटी प्लॅटफॉर्म्सवर पिच करण्यासाठी कल्पना हव्या होत्या. मी त्याला सुचवले की, “चित्रपटसृष्टींमध्ये विज्ञानकथा हा प्रकार फारसा का हाताळला जात नाही माहितीये? कारण त्यांना कथा कळत नाही आणि विज्ञान तर त्याहून कळत नाही. त्यांची सगळी अक्कल विज्ञानाच्या नावाखाली उथळ पाण्याच्या बालिश खळखळाटात. मी तुला दहा परिपक्व विज्ञानकथा देतो. त्या कथा आपण सजीवीकरण अधिक प्रत्यक्ष चित्रण अशा मिश्रणातून मांडू. ही कल्पना जर चालून गेली तर हवी तितकी पर्वे करू शकतो आपण”. त्याने त्यावर नेहमीचेच उत्तर दिले, “लहान मुलांसाठीचे कार्टून्स ओटिटीवर कोण पाहील”? मी म्हणालो, “अरे बाबा, सगळ्या कथा प्रौढांसाठीच असतील”. पण त्याला काही ते पटलं नाही. अर्थातच तो प्रकल्प बारगळला. आणि काही दिवसांपूर्वी माझ्या दृष्टीस डेव्हिड फिंचर, टिम मिलर व जोशुआ डोनेन कार्यकारी निर्माता असलेली नेटफ्लिक्स मालिका “लव्ह डेथ + रोबॉट्स” पडली. अधाश्यासारखा पहिला सीझन खात असताना त्या तथाकथित दिग्दर्शक मिनिटाला मिनिटागणिक कचकचीत शिव्या घालताना जी काही मजा आली, त्याला तोड नाही.

    लघुपटसंग्रह अथवा अँथॉलजीचा सगळ्यांत मोठा लाभ हा असतो की, प्रेक्षकांना ठराविक विषयावर खूप मोठ्या आवाक्यातील अभिव्यक्ती हाताळलेल्या पाहायला मिळतात. “लव्ह डेथ + रोबॉट्स” या शीर्षकातच मालिकेतील कथांचे विषय सहजपणे दिसतात. संग्रहातील प्रत्येक कथा या शीर्षकातील एक किंवा अनेक विषयांचा मागोवा घेतात. पण हा मागोवा त्या घेतात, विविध विज्ञानकथालेखकांच्या लेखणीच्या जोरावर. मालिकेतील बहुतांशी कथा या कोणत्या ना कोणत्या लघुविज्ञानिकेचे दृक्माध्यमासाठी केलेले अनुकूलन (अडॅप्टेशन) आहेत.

    प्रलयोत्तर (पोस्ट-अपोकॅलिप्टिक) इंग्लंडमध्ये अवैध मारामारीत सहभाग घेणारी नायिका (सॉनी’ज् एज) ही धक्कातंत्राचे उत्तम उदाहरण आहे. प्रलयोत्तर जगात तीन यंत्रमानव फिरायला आलेयत (थ्री रोबॉट्स) ही कथा प्रलयोत्तर जगाचाच विषय हाताळते, पण त्यांचा दृष्टीकोन पूर्णतः वेगळा आहे. त्या कथेतून केवळ स्टेटस सिम्बॉल म्हणून विविध ऐतिहासिक स्थळे फिरणाऱ्या पण प्रत्यक्षात इतिहासाची फारशी जाण व आवड दोन्हीही नसणाऱ्या पर्यटकांवर उत्कृष्ट रूपक साधले आहे. त्या पुढील ‘द विटनेस’ ही कथन आणि तंत्र अशा दोन्हीही पातळ्यांवर या संग्रहातील माझ्या सर्वाधिक आवडत्या कथांपैकी एक. का, ते तुम्हीच बघून ठरवा. ‘सूट्स’ कथेतून आक्रमक आणि आक्रमित यांच्या वरवर दिसणाऱ्या भूमिकांवर कमालीचे तिरकस भाष्य केले आहे. ही कथा पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की, सध्यादेखील जगभरात व्हिक्टिमकार्ड खेळणाऱ्यांकडून हेच सुरू नाहीये का! ‘सकर ऑफ सोल्स’ अभिजात थराराचा अनुभव देते, तर ‘बियॉण्ड द अक़ीला रिफ्ट’ मायावादाकडे एका वेगळ्याच दृष्टीने पाहाते. ‘गुड हंटिंग’ ब्रिटिशांच्या वसाहतवादासोबतच औद्योगिक क्रांतिचा विषय चीनी पुराणशास्त्राच्या पार्श्वभूमीवर हाताळते, तर ‘द डम्प’ भयकथा आणि तत्त्वज्ञानाच्या सीमेवर गूढ नृत्य करते. विज्ञानकथेची एक उपशैली आहे, ‘मिलिट्री-सायफाय’. त्या शैलीत मोडणारी ‘शेप शिफ्टर्स’ ही कथा कल्पनाविलासाच्या आडून वर्णद्वेष आणि अमेरिकेतील दासप्रथा मांडू पाहाते, तर ‘द हेल्पिंग हँड’ अवकाशातील थराराचा रोमहर्षक पट उलगडते. मिलिट्री-सायफाय प्रकारचीच ‘लकी १३’ निष्ठा आणि श्रद्धेची एक आगळीच कहाणी सांगते. ‘आईस एज’ कथा सिद्ध करते की मनाची कवाडे जर उघडी असतील तर कल्पना करायला, ती कागदावर मांडायला आणि कागदावर मांडलेली कल्पना पडद्यावर चित्रित करायला कसलंच बंधन नसतं. युद्धाच्या काळात कम्युनिस्ट रशियाच्या सैन्याने केलेला एक प्रयोग केवढा अंगाशी येतो याचं काल्पनिक, तरीही भयकारी पण तितकंच ह्रदयस्पर्शी चित्रण ‘द सिक्रेट वॉर’मध्ये आढळते.

    नुकतेच या मालिकेचे दुसरे पर्व प्रकाशित झाले. पहिल्या पर्वात असलेल्या १८ भागांच्या तुलनेत दुसरे ८ च भागांचे पर्व निम्म्याहून छोटे आहे. पण त्यातही ‘ऑटोमेटेड कस्टमर सर्व्हिस’ तंत्रज्ञानावर आणि बिगटेक कंपन्यांवर प्रमाणाबाहेर विसंबणाऱ्या समाजाचं भयाण वास्तव चित्रित करते. ही कथा काल्पनिक आहे, पण ती कल्पना सत्यात उतरायचा दिवस कदाचित कल्पनेहूनही जवळ असेल. पुराणकाळापासून माणसाने कायमच अमरत्त्वाचा ध्यास घेतलाय. पण ज्या अमरत्त्वाला उत्तर मानावं ते नीतिमत्तेचे केवढे मोठे प्रश्न उपस्थित करू शकते, याचा मागोवा ‘पॉप स्क्वाड’ घेते. कदाचित म्हणूनच पुराणांतरी अमरत्त्व मागणारे बहुतांशी राक्षस असावेत. अमरत्त्वाचीच दुसरी गहन बाजू सांगण्याचा प्रयत्न ‘स्नो इन द डेझर्ट’ मार्मिकपणे करते. ‘द टॉल ग्रास’ ही अतिशय नेटकेपणाने विणलेली पक्की भयकथा आहे. आणि भयकथेच्याच अंगाने जाणारी लहानशी ‘ऑल थ्रू द हाऊस’देखील तितकीच कमाल आहे. ‘लाईफ हच’ ही जीवनसंघर्षकथा (सर्व्हायवल स्टोरी) काळजाचे ठोके चुकवते. पण या दोन्हीही पर्वांमध्ये मिळून माझी सर्वाधिक आवडती कथा आहे ती, ‘द ड्राऊन्ड जायण्ट’. अतिशय काव्यात्म भाषेत उलगडणारी ही विज्ञानकथा घटनात्मक कमी आणि अंतर्मुख करायला लावणारीच जास्त आहे.

    पण म्हणून दोन्हीही पर्वांमध्ये वाईट कथाच नाहीत असं नाही. ‘व्हेन द योगर्ट टुक ओव्हर’ ही कथा रूपक म्हणून अतिशय उत्तम आहे, पण लघुपट म्हणून तितकीशी भिडत नाही. त्या उलट ‘फिश नाईट’ अतिशय उत्तमरित्या मांडली आहे, पण अखेरीस एकूणात मुद्दा नसल्यासारखी वाटते. ‘ब्लाईंड स्पॉट’ कथा वाईट नाही, पण त्यात काही ‘वाह’ म्हणावं असं घडतही नाही. तिला मी चांगली, पण श्रेष्ठ नाही अशा वर्गात टाकेन. या उलट ‘अल्टरनेट हिस्ट्रीज’मध्ये क्षमता अचाट होती, पण त्याचा १% ही वापर त्यांनी केला नाही. त्यांचं सगळं लक्ष सतत काहीतरी विनोदी घडवण्यातच जास्त होतं. ‘झिमा ब्लू’ ही कथा एखाद्या अमूर्त चित्रशैलीसारखी आहे. तुम्ही तासनतास तिची स्तुती करू शकता, पण त्या स्तुतीसुमनांतील एकही मुद्दा सिद्ध करू शकत नाही. ती अतिशय प्रेडिक्टेबल तर आहेच, पण त्यांनी रहस्योद्घाटन खूप आधीच केल्यामुळे तिचा पडायचा तेवढाही प्रभाव पडत नाही. दुसऱ्या पर्वात मुळातच कमी कथा आहेत. त्यामुळे ‘आईस’ ही वाईट जरी नाही तरी त्यातल्या त्यात दुर्बळ असलेली कथा अधिकच वाईट प्रकारे उठून दिसते एवढंच. अर्थात, हे माझे मत झाले. तुमच्या दृष्टीने दोन्हीही पर्वांतील चांगल्या व वाईट कथा या पेक्षा वेगळ्या असू शकतात. मुद्दा फक्त एवढाच आहे की, संग्रह म्हटला म्हणजे दर्जात्मक एकजिनसीपणाचा बळी हा जातोच.

    मालिकेचे मला सर्वाधिक भावलेले वैशिष्ट्य म्हणजे, वेगवेगळ्या कथांचे सजीवीकरण वेगवेगळ्या स्टुडियोजनी केले आहे. त्यामुळे क्वचित विषय सारखेच असले तरी प्रत्येक कथेचं व्यक्तिमत्त्व दुसरीहून स्वतंत्र दिसून येतं! काही कथांचं सजीवीकरण चित्रासारखं विस्मयचकित करणारं झालंय तर काहींचं पात्रे अगदी जिवंत वाटावीत इतकं खरंखुरं झालंय. सजीवीकरण म्हणजे पोरखेळ न मानता अभिव्यक्तीचं माध्यम मानलं तर ते कथाकथनात काय साध्य करून देऊ शकतं हे अनुभवायचं असेल, तर ही मालिका पाहिली’च’ पाहिजे. विशेषतः त्यातील काही कथा या सजीवीकरण अधिक चित्रपटीय कथनतंत्रे यांची इतकी अफाट सांगड घालतात की, त्यांचा एकत्रित परिणाम हा कमालीचा रोमहर्षक घडतो. तुम्ही जर सजीवीकरण म्हणजे चारदोन माहितीतील स्टुडियोज इतकाच मर्यादित विचार करत असाल, तर ही मालिका तुमची या विषयाकडे बघण्याची दृष्टीची बदलून सोडू शकते. सजीवीकरण हा मोठ्ठा परीघ पकडून या मालिकेने एखादे कलात्मक प्रदर्शन भरवावे तशा कथेगणिक विविध शैली समर्थपणे हाताळल्या आहेत. एका विशिष्ट मुद्यावर इथे टिप्पणी करणे मला अतिशय गरजेचे वाटते. आपल्याकडे जेव्हा सजीवीकरण करतात, तेव्हा त्या व्यक्तींची त्वचा अगदीच नितळ दाखवतात, त्यांच्या कपड्यांवरील सुरकुत्याही अगदीच आळशीपणाने रेखाटतात. उलट माझ्या दृष्टीने चांगले व खरेखुरे वाटणारे सजीवीकरण तेच ज्यात पात्रांची त्वचा ही तुमच्या-माझ्या त्वचेसारखीच सुरकुत्या, डाग, वांग, खड्डे यांचे चपखल मिश्रण असलेली, त्रुटीपूर्ण दिसते. ज्यात कपड्यांवर सुरकुत्या या यादृच्छिक नव्हे तर, हालचालींना अनुरूप अशाच पडतात. या दोन्हीही संग्रहांमध्ये जेव्हा जेव्हा सजीवीकरणाची शैली वास्तववादाकडे झुकलीये, तेव्हा तेव्हा त्यांनी या बारीकसारीक बाबीदेखील साध्य करून दाखवल्या आहेत!

    मी वर एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे भारताबाहेर बहुतांशी ठिकाणी सजीवीकरणाला लहान मुलांपुरतंच मर्यादित मानत नाहीत. त्यामुळे दोन्हीही पर्वांतील कथा या प्रौढांसाठीच आहेत. त्यांच्यात कामुकता, रक्तपात, बीभत्सपणा, नीचपणा यांची रेलचेल आहे, इतकी की काही काही वेळा मालिका केवळ नेटफ्लिक्सची आहे म्हणून या गोष्टी घुसडल्या किंवा तशाच कथा निवडल्या की काय असे वाटून जाते. थोडक्यात, काहीतरी टोकाचं दाखवणं म्हणजेच वेगळा विचार करणं हा प्रकार इतरत्रही कमीअधिक प्रमाणात का होईना आहेच. किंबहूना तो इतरत्र आहे, त्याचीच नक्कल इकडचे अनेक तथाकथित ‘स्वतंत्र’ विचार करणारे करतात, हे उघड गुपित आहे. पण अर्थात, प्रौढांसाठी म्हटलं की ‘तेवढंच’ येत नाही. मालिकेतील बहुतांशी कथा या विचारप्रवर्तक आहेत, अंतर्मुख करून सोडणाऱ्या आहेत, लेकी बोले सुने लागे असे रूपक करणाऱ्या आहेत. ईशोपनिषदात अध्यात्म आणि विज्ञान यांच्यापैकी कशालाच कमी लेखलेले नाही, उलट दोन्हींनाही उचित महत्त्व दिलेलं आहे. विज्ञान म्हणजे तरी काय, तर भौतिक जगात सिद्ध करता येण्याजोगे तत्त्वज्ञानच असे मी मानतो. “लव्ह डेथ + रोबॉट्स”मधील बहुतांशी कथांच्या मुळाशी असेच विज्ञानाचे तत्त्वज्ञान आहे. त्यामुळेच त्या कथा आणि पर्यायाने दोन्हीही संग्रहच त्या त्या देशकालपरिस्थितीपुरते मर्यादित न राहाता वैश्विक होऊन जातात. आणि ज्याचे डोळे बाहेरूनच नव्हे तर आतूनही उघडे असतात, त्याला वैश्विकता ही भावतेच भावते!

    *४.७५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेखन वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • After The Storm

    After The Storm

    “And if you must, then for performing this Yadnya, you shall offer me the Earth you just conquered”, Kashyapa’s voice was calm as the Maanasarovar.


    He looked at him with utmost respect. Sage Kashyapa was not a man who’d joke around. So he rose from the ground. Previously he’d risen, like a flame from the most pious pier. But that was the time when he had to fight Kaartaveerya Sahasrarjuna and his cronies. Though only a few days had been passed since then, it felt like ages. And those days saw the metamorphosis of Rama, the youngest child of Sage Jaamadagni and Sati Renuka into the most feared Parashurama, the wielder of the fiercest battle-axe. He withstood all the hardships of the war only because of the training Kashyapa gave to him. So when this time he rose, it was out of devotion, love and affection towards his Guru.

    He took some water from the Kamandalu in his hand and without thinking twice poured it into the feet of Kashyapa, who said,
    “People earn, people spend. And in between, they give up some portion. Sometimes out of fear, sometimes out of respect and sometimes simply as a duty. But rarely anyone gives up everything he just earned, only because his Guru asked him to. You are rarest even amongst those, for you had rightfully earned this Earth through Blood and Steel, and yet you didn’t even blink once when it comes to renounce it”.

    “Word of the Guru, is the word of Veda for me”, said Parashuram humbly.

    “Then you must do one more thing for me”, Kashyapa said with a smile.

    “Tell me, what it is and consider it done”.

    “Listen, before you promise”.

    “I give you my word and I’ll give my life to keep it”.

    “Very well then. Since, you have given up your claim on the Earth, you don’t have any right to dwell in it. Therefore, as the rightful owner of the planet, I banish you from my land”!

    ‘But where’d he go?’, ‘If the earth is owned by Kashyapa, where’d Rama live?’, whispered the thousand spectators. But not Parashurama. His voice was the same as it was before hearing this dreadful wish of his Guru, when he said,
    “As you please Gurudeva”.

    And the Emperor left with his hands empty and a heart filled with the satisfaction of fulfilling his duty.

    Kashyapa knew, if the order is to be restored on the Earth, it must be ruled by the Kings, not by a Sage who conquered it in the heat of passion. And this would happen only if the conquerer leaves. So he aimed for the greater good, with but a small sacrifice.

    Parashurama understood the true meaning of his Guru’s wish. But he has bigger problem to solve right now; finding a piece of Earth, that is not part of the existing Earth! His thoughts wandered around this question and so do his feet, until he reached to an impasse.

    Behind him was the earth, he was forbidden to dwell. In front of him was the vast ocean, which could have devoured anything and everything. Going back was not an option and going further was impossible. But impossible were the things he did conquer, from his very birth to single-handedly defeating the greatest Emperor of his time; all through his knowledge and might.

    He stood in front of the ocean. The ocean looked fierce with the army of infinite battle-ready tides. The scion of Bhrugus was never the one to run away from a good fight. He took out his bow and mounted an arrow on it. He then remembered his father, the most revered Sage Jamadagni. He remembered his mother, the Goddess Renuka herself. He remembered his Guru Kashyapa who trained him to defeat everything labeled ‘impossible’. And then he remembered God Shiva who opened the secrets of Dhanurveda in front of him. He bowed to his ancestors of Bhrugu clan who withstood each and every trouble life threw at them. And with the might that destroyed the Haihayas, he released it.

    The arrow sped to the sky and caught fire. Within a second it started to look like there are two Suns above, one that bestows the gift of life and another that would snatch it. The arrow crashed into the ocean with a huge explosion. And the ocean dried. It retreated back in a haste. And when the steam cleared, there was land. Land, that was never owned by anyone. Parashurama marched towards it.

    In his Aashrama, Sage Kashyapa took a moment from his busy day and simply smiled.

    — © Vikram Shriram Edke

  • रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव

    रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव

    आज विजयादशमी. आजच्याच दिवशी प्रभू श्रीरामांनी राक्षसराज रावणाचा संहार केला. पण हा संहार नेमका केला कसा? काय अस्त्र वापरलं? रावणाच्या मृत्यूच्या क्षणी नेमकं काय घडलं? समकालीन वाल्मिकींनी रामायणात या बद्दल सविस्तर लेखन केलं आहे.

    वाल्मिकी लिहितात, राम आणि रावणामध्ये द्वैरथ युद्ध झाले (युद्धकांड, स. १०७, श्लो. १). दोन्ही बाजूचे सैन्य लढायचे सोडून त्यांचेच युद्ध पाहात बसले (तत्रोक्त २). राम आणि रावण दोघांनाही स्वतःच्या विजयावर पूर्ण विश्वास होता (७). रावणाने त्वेषाने रामाच्या रथावरील ध्वज तोडण्यासाठी बाण चालवले, पण तो असफल झाला (९). रामानेही उट्टे काढण्यासाठी महासर्पासारखा असह्य व ज्वलंत बाण रावणाच्या ध्वजावर सोडला. हा बाण नेमका रावणाचा ध्वज फोडून जमिनीत जाऊन रुतला (१२). या प्रकाराने चवताळलेला रावण रोषपूर्वक बाणांचा वर्षावच करू लागला. त्याने रामाच्या घोड्यांचा वेध घेतला. पण त्यांच्यावर विशेष काहीच परिणाम झाला नाही (१६). यानंतर तर रावणाने अजूनच चिडून जाऊन बाणांसोबतच गदा, चक्र, परिघ, मुसळ, पर्वतशिखर, वृक्ष, शूल, परशू यांचा वर्षाव करायला प्रारंभ केला (१७-१८). वाल्मिकी लिहितात, रावणाने अजिबातच न थकता (अश्रान्तह्रदयोद्यम:) सहस्रावधी बाण चालवले. याला उत्तर म्हणून रामानेही शतसहस्रावधी बाण सोडले (२२). दोन्हीकडून चाललेल्या या वर्षावाने सबंध आकाश भरून गेले होते, इतके की श्वास घ्यायलादेखील जागा शिल्लक राहिली नाही (२६). दोन्हीकडचे बाण एकमेकांवर आपटून जमिनीवर पडू लागले (२५). दोघांनीही एकमेकांचे घोडे जखमी करून टाकले (२७).

    हा रोमहर्षक संग्राम सुरू असताना एक मुहूर्त (मुहूर्तमभवद्) म्हणजे अठ्ठेचाळीस मिनिटं उलटली (२८).  दोघांचे सारथीदेखील निष्णात होते. ते कधी रथाला गोल फिरवित, तर कधी सरळ नेत, कधी पुढे जातोय असं दाखवून एकदम मागे आणत तर कधी माघार घेतोय असं दाखवून पुढे नेत (३१-३२). राम आणि रावण दोघेही एकमेकांवर वार करण्यात काही एक कसर सोडत नव्हते. दोघांचेही रथ आता जणू काही भरलेल्या मेघासम (जलदाविव) दिसू लागले होते (३३-३४). आता दोन्हीही रथांचे जू एकमेकांना भिडले होते, पताका एकमेकींना स्पर्शू लागल्या होत्या (३५-३६). रामाने चार बाण मारून रावणाच्या घोड्यांना मागे ढकलले (३६-३७). त्यामुळे तळतळलेल्या रावणाने अनेक बाण चालवून रामाला जखमी करून टाकले (३७-३८). रामाने चेहऱ्यावर कोणतीच पीडा दाखवली नाही. रावणाने ताबडतोब रामाचा सारथी मातलीला लक्ष्य केले, अर्थात मातलीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही (३९-४०). आता मात्र रामाच्या क्रोधाला पारावार राहिला नाही (४१-४२). राघवाने बाणांचे जाळेच (शरजालेन), अर्थात बाणांचा समूहच सोडून रावणाला माघार घ्यायला (विमुखं रिपुम्) लावली (४१-४२). रघुनाथाने रावणावर वीस, तीस, साठ, शेकडो, हजारो बाण सोडले. त्यावर रावणाने बाणांचा वर्षाव केला (४२-४४). पुन्हा एकवार भयंकर युद्ध सुरू झाले. त्या तुंबळ युद्धाला पाहून अप्सरा आणि गंधर्वदेखील म्हणू लागले, ‘रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव’! (५२).

    त्यानंतर रघुकुळाची कीर्ती वाढवणाऱ्या रामाने धनुष्यावर एक विषारी बाण चढवला आणि रावणाचे मुंडकेच उडवून टाकले (५३-५४). पण काय आश्चर्य, त्या जागी ताबडतोब दुसरे मस्तक दिसू लागले. रामाने ते सुद्धा अविलंब धडावेगळे केले. हा प्रकार शंभरदा घडला. जणू काही या गोष्टीला काही अंतच नव्हता (५६-५८). हे असे महाभयंकर रणकंदन रात्र न् दिवस चालले (६५-६६). आता मात्र राम काळजीत पडला (५९).

    रामाला काळजीत पडलेला पाहून मातली म्हणाला, ‘हे वीरवर तुम्ही काय त्याच्या हल्ल्यावर केवळ प्रतिहल्ला करत आहात? त्याच्यावर ब्रह्मास्त्र चालवा. रावणाच्या विनाशाची घडी समीप आलीये’ (युद्धकांड, स. १०८. श्लो. १-२). मातलीच्या या सांगण्यावरून रामाने फुत्कारणाऱ्या सापासारखा एक तेजस्वी शर हाती घेतला. हे तेच अमोघ ब्रह्मास्त्र होते जे ऋषींनी (गीताप्रेसच्या प्रतीनुसार अगस्त्य ऋषींनी) रामाला दिले होते. हे अस्त्र पूर्वी ब्रह्माने त्रिलोकजयकांक्षी इंद्राला अर्पण केले होते (तत्रोक्त ३-५).

    तो बाण कसा होता? वाल्मिकी लिहितात, त्या बाणात वायूचा वेग, त्याच्या फाळात आग आणि सूर्य, त्याच्या रचनेत आकाश आणि त्याच्या जडपणात मेरू-मंदराचलांची प्रतिष्ठापना केली होती. तो सर्व भूतमात्रांच्या तेजाने बनलेला, सूर्यासारखा जाज्वल्य होता. तो स्वर्णभूषित, सुंदर पंखांचा, प्रलयाग्निच्या धूरासारखा भयंकर, दीप्तिमान, सापासारखा विषारी, माणसं, हत्ती व घोडे यांना भेदणारा व चपळ होता. दरवाजे, परिघच काय तर पर्वतांनाही भेदण्यास तो सक्षम होता. त्याचं सबंध शरीर रक्त, मेदात न्हायल्यासारखं सुदारुण होतं. तो वज्रासमान दिसणारा, मोठ्ठा आवाज करणारा व शत्रूंची झुंडच्या झुंड नष्ट करणारा होता. तो सगळ्यांना छळणाऱ्या, फुत्कारणाऱ्या सापासारखा भयंकर होता. कावळे, गिधाडं, बगळे व जंबुक इत्यादींना नित्य भक्ष्य प्रदान करणारा, साक्षात यमराजाचेच रूप होता! (६-११)

    असा तो सायक महाबली रामाने वेदोक्त विधीपूर्वक धनुष्यावर चढवला. त्यासरशी सर्व प्राणी संत्रस्त झाले व धरती दोलायमान होऊ लागली. अत्यंत चिडलेल्या रामाने मोठ्या ताकदीने प्रत्यंचा खेचली व तो बाण रावणावर सोडला. वज्रधारी इंद्राच्या हातून सुटलेल्या दुर्धर्ष वज्रासारखा तो बाण रावणाच्या छातीवर जाऊन आदळला! त्याचा वेग एवढा प्रचंड होता की तो रावणाची छाती फोडून, ह्रदय भेदून, रुधिराक्त असा जमिनीत जाऊन रुतला!! रावणाच्या निष्प्राण हातांतून धनुष्य व बाण गळून पडले. त्या महावेगशाली, महातेजस्वी राक्षसराजाचे शरीर वज्राचा फटका खाल्लेल्या वृत्रासुरासारखे रथातून जमिनीवर आपटले. तो बाण मात्र काम संपवून सहजपणे रामाच्या भात्यात पुन्हा जाऊन बसला. इकडे आपला स्वामी मेल्याचे पाहाताच समस्त राक्षस भितीपोटी पळू लागले तर चेव चढलेले वानर त्या राक्षससैन्यावर तुटून पडले! रावणाचा मृत्यू घोषित होताच सर्वत्र दुंदुभी निनादू लागल्या आणि समग्र वातावरण रामाच्या जयजयकाराने भरून गेले!! (१४-२७)

    रावणवध हा केवळ स्त्रीचे अपहरण करणाऱ्या एका राक्षसाचाच वध नव्हता, तर तो होता एका सार्वभौम सत्तेच्या अहंकाराचा एका राज्यविहिन वनवासीने वनवासींच्याच साह्याने केलेला पराभव! ही सामर्थ्य, बुद्धी व धोरणीपणाच्या जोरावर सत्याने असत्यावर विजय मिळवल्याची गाथा आहे. रामायण, ही भारताच्या इतिहासाची चिरंतन महागाथा आहे!!

    — © विक्रम श्रीराम एडके

    (रामायणाचे अभ्यासक आणि व्याख्याते. अधिक माहितीसाठी, तसेच रामायणावरील व्याख्यानांच्या आयोजनासाठी संपर्क करा, www.vikramedke.com)

    टीप: येथे लेखनाच्या सोयीसाठी तसेच वाल्मिकी रामायणातील उल्लेखांच्या संदर्भानुसार रामाचा एकेरी उल्लेख केला आहे. या मागे श्रीराम या देवतेच्या अवमानाचा चुकूनदेखील उद्देश नाही. लेखकही अन्य कोट्यवधी भारतीयांसारखाच रामभक्त आहे. शिवाय आवडत्या देवतेचा एकेरी उल्लेख करण्याची आपली पिढ्यानपिढ्यांची पद्धत आहे.

  • पंचेश्वरम्

    लंकादहन करून हनुमान जसा परततो तसे युद्धकांड सुरू होते. श्रीराम हनुमानाला लंकेचे वर्णन करायला सांगतात. लक्षात घ्या, हनुमान हा जरी सीतेचा शोध लावण्यासाठीच गेलेला असला, तरीही लंकादहन करताना आणि त्याहीपूर्वी लंकेत भ्रमण करताना त्याने अतिशय बारीक नजरेने सगळे टिपलेय. तेच तो आता रामाला तपशीलवार सांगतो की (युद्ध. सर्ग ३), “लंका अत्यंत संपन्न असून मत्त हत्तींनी व्याप्त आणि रथांनी समृद्ध आहे. तिला चार मोठमोठे आणि दुर्जेय असे दरवाजे आहेत. या चारही दरवाजांवर यंत्रे बसवलेली आहेत ज्यांच्यातून शत्रूसैन्यावर बाणांचा आणि दगडांचा वर्षाव केला जाऊ शकतो. तिथेच लोखंडाने बनलेल्या अनेक काटेदार शतघ्नीसुद्धा तैनात आहेत. लंकेच्या चहुबाजूंनी अभेद्य अशी तटबंदी आहे. तिच्याभोवती खंदक आहेत ज्यात मगरी आणि मोठमोठे मासे वास करतात. खंदकांवर उपरोक्त चारही दरवाजांना जोडणारे असे चार पूल आहेत. शत्रूसैन्य या पुलांवर चढलं की त्या पुलांना पाण्यात पाडण्याची यंत्रांकरवी सोय केलेली आहे. या पैकी कोणत्याच कामांमध्ये ढिलाई न होण्याकडे रावण स्वतः जातीने लक्ष पुरवतो. याउप्पर लंकेच्या भोवती या कृत्रिम तटबंदीखेरीज नद्या, पर्वत आणि जंगलदेखील आहे. लंका ही समुद्रकिनाऱ्यापासून बरीच आत दक्षिणेकडे आहे. त्यातही ती उंचावर वसलेली आहे. तिच्या पूर्वद्वारावर दहा सहस्र राक्षसांचा खडा पहारा आहे. हे सैनिक हातात शूल धारण करतात आणि युद्धप्रसंगी तलवारींनी झुंजतात. असंच दक्षिणद्वारी एक लाखाचं चतुरंग अर्थातच हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ यांनी सुसज्ज सैन्य आहे. लंकेच्या पश्चिमेकडे सैन्यसंख्या दहा लाख आहे. हे सैनिक अस्त्रशस्त्रांमध्ये निपुण आहेत व त्यांच्याकडे ढाल आणि तलवारीसुद्धा आहेत. उत्तरेच्या दरवाजापाशी असेच दहा कोटी सैनिक उभे आहेत. त्यांच्यापैकी काही रथी आहेत व काही अश्वारोहणात निपुण असून सगळेच उच्चकुळांमध्ये जन्मलेले वीर आहेत. लंकेच्या मध्यभागी साधारण एक कोटीचे सैन्य असावे. परंतु मी इकडे येण्यापूर्वी खंदकांवरील सगळे पुल तोडून टाकलेयत. खंदक फोडून टाकलेयत. सगळीकडे आगी लावल्यायत. ठिकठिकाणी तटबंदी तोडून टाकलीये आणि सुमारे एक चतुर्थांश सैन्यदेखील मारलेय. जर आपण एखाद्या उपायाने समुद्र लांघू शकलो, तर लंका नष्ट झालीच म्हणून समजा”!

    हनुमानाची लंकेवर आक्रमण करण्यासाठी घाई चाललीये याचे कारण उघड आहे की, त्याला रावणाचे झालेले नुकसान दुरुस्त करायला वेळच मिळू द्यायचा नाहीये. त्याने लंकेचे अतिशय बारीकसारीक वर्णन केलेय. जणू लंकेचा शब्दबद्ध नकाशाच! त्यातही एक गोष्ट विशेष लक्ष वेधून घेते. ती म्हणजे (श्लो. २४ ते २७) लंकेच्या पूर्वेला दहा हजार, दक्षिणेला एक लाख, पश्चिमेला दहा लाख आणि उत्तरेला दहा कोटी सैन्य आहे. आता खरोखरच त्या काळी लंकेची लोकसंख्या एवढी होती का या भानगडीत न पडता आपण मुद्याची गोष्ट तेवढी लक्षात घेऊ. मुद्याची गोष्ट अशी की, लंकेच्या पूर्वेकडे सगळ्यांत कमी सैन्य आहे आणि घड्याळी पद्धतीने ते अनुक्रमे दक्षिण, पश्चिम व उत्तरेपर्यंत वाढत जाते. काय कारण असावे याचे? श्रीलंकेचे भौगोलिक स्थान पाहा. पूर्व आणि दक्षिण किनारपट्टीपासून कोणत्याही देशाची भूमी भरपूर लांब आहे. याउलट उत्तर आणि पश्चिमेपासून भारत खूपच जवळ आहे. त्यामुळेच रावणाने उत्तर आणि पश्चिमेकडे, जिथून आक्रमण होण्याची सर्वाधिक शक्यता आहे, तिकडे महाप्रचंड आणि विशेष सैन्य ठेवलेय तर पूर्व व दक्षिणेकडे तुलनेने कमी सैन्य ठेवलेय.

    ही तर झाली सामरिक रचना. परंतु श्रीलंकेच्या भोवती आज अशीच एक आध्यात्मिक रचनासुद्धा आहे. कोणती? लंकेच्या किनारपट्टीवर वेगवेगळ्या ठिकाणी पाच वेगवेगळी शिवमंदिरे आहेत. यांनाच पंचेश्वरम् असे म्हणतात! पहिले आहे ते उत्तरेला जाफनास्थित नगुलेश्वरम्. वायव्येला असलेले मन्नार जिल्ह्यातील केतिश्वरम् हे दुसरे. तिसरे आहे ते ईशान्येकडील त्रिंकोमाली जिल्ह्यातील कोणेश्वरम्. चौथे पश्चिमेला पुट्टालम जिल्ह्यातील मुन्नेश्वरम्. आणि पाचवे आहे दक्षिणेकडील मातरा जिल्ह्यातील तोण्डेश्वरम्! जणू श्रीलंकेचे रक्षण करण्यासाठी तिच्याभोवती उभे असलेले भगवान शिवशंकरच! त्यांचीही रचना बहुतांशी रावणाच्या सैन्यरचनेसारखीच आहे. उत्तरेपाशी तीन शिवमंदिरे आहेत आणि पश्चिम व दक्षिणेकडे अनुक्रमे एक एकच शिवमंदिरे आहेत. जणू एखादं आध्यात्मिक सुरक्षकवचच! कदाचित उत्तर आणि पश्चिमेकडून अर्थातच भारतातून जास्त दळणवळण असल्याने भाविकांची संख्या जास्त असेल व म्हणूनही मंदिरे तिकडे अधिक संख्येने असू शकतील. सतराव्या शतकात पोर्तुगीझ मिशनऱ्यांनी ही पाचही मंदिरं ध्वस्त केली होती. अनेक ठिकाणी मंदिरांच्या जागी चर्च बांधले होते. तिथे भाविकांनी वेळोवेळी परत मंदिरे उभारली आहेत.

    मी येत्या मार्चमध्ये श्रीलंकेला जातोय. या वेळच्या वेळापत्रकात सगळेच नाही तरी पंचेश्वरांपैकी दोन मंदिरांचे दर्शन घेण्याचा कार्यक्रम आहे. एक कोणेश्वरम् आणि दुसरे मुन्नेश्वरम्! यांपैकी कोणेश्वरमला दक्षिण कैलास (तमिळ: तेन कैलासम्) असे म्हणतात. याचं कारण काय असावं याचा शोध घेताना मला एक ब्लॉग आढळला. त्यात कैलास पर्वत आणि कोणेश्वरम् यांचे भौगोलिक स्थान दिले आहे. कैलासाचे स्थान ३१° ४’ उत्तर व ८१°१८’ पूर्व असे सांगितले आहे तर कोणेश्वरमचे स्थान ८°३५’ उत्तर व ८१°११’ पूर्व असे सांगितले आहे. (गुगलवर हीच स्थाने अनुक्रमे ३१°०६’ उत्तर व ८१°३१’ पूर्व आणि ८°५८’ उत्तर व ८१°२४’ पूर्व अशी आढळतात.) उपरोक्त ब्लॉगच्या लेखकाचा दावा आहे की, दोन्ही स्थाने पूर्णार्थाने जरी नाही तरी बऱ्यापैकी एकाच रेखांशावर येतात! हे वाचायला छान वाटतं, परंतु भूगोलातील कुणा तज्ञाने याची सत्यता पडताळून सांगितली तरच विश्वास ठेवलेले चांगले. दुसरे असे की, स्थानिक मान्यतेनुसार रावणाचा वध केल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी ज्या स्थानी भगवान शिवाची अर्चना केली, त्या स्थानावर मुन्नेश्वरम् मंदिर उभे आहे. मला तरी वाल्मिकी रामायणात असा कोणताच संदर्भ अद्याप आढळलेला नाही. परंतु कधीकधी स्थानिक श्रद्धा व परंपरांचे महत्त्व लेखी गोष्टींपेक्षा अधिक हे असतेच.

    दोन्हीही मंदिरांचे दर्शन घेतल्यावर त्यांच्याबद्दल सविस्तर लिहितोच. मी येत्या २ मार्च ते ९ मार्च कालावधीत श्रीलंकेला जातोय. रामायणाशी संबंधित काही स्थळे, काही पर्यटनस्थळे पाहातानाच तिथे रोज एक याप्रमाणे सोबत येणाऱ्या यात्रेकरूंसाठी वाल्मिकींच्या रामायणावर पाच व्याख्याने देणार आहे मी. तुम्हीही सहभागी होऊ इच्छित असाल, तर अद्याप जागा शिल्लक आहेत. ‘माय ट्रॅव्हल वर्ल्ड’च्या श्रीमती वीणा निंबाळकर यांच्याशी +919921907772 या क्रमांकावर संपर्क साधा आणि आजच आपल्या जागा आरक्षित करा! चला अनुभवूया रावणाच्या राज्यात रामायण!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • मुकम्मल ग़ज़ल : ९६

    रात्रीचे जवळजवळ साडेअकरा वाजलेयत आणि मी एका पंक्चरवाल्याच्या दुकानात बसून हे लिहितोय. घरी जायला अजून एखादा तास लागेल. एखादा तास मी थांबू शकत नाही का? मी थांबू शकतो. अंतर्मनात उसळणारा समुद्र नाही थांबू शकत. अर्ध्या तासापूर्वी सी. प्रेमकुमारचा “९६” बघून बाहेर पडलोय. तेव्हापासून सैरभैर झालोय मी. बऱ्याच वर्षांनंतर पडद्यावरच्या प्रेमकहाणीसाठी, त्या पात्रांसाठी, ते कुणीतरी जवळचे, सगे-सोयरे असल्यासारखी काळजी वाटली मला. आणि आता मी इथे डोकं खाजवत बसलोय की, मी या चित्रपटाबद्दल निष्पक्ष लिहू शकेन का? की पुरात वाहावत जाईन मी? कधीकधी बाजू घेणंच खरी निष्पक्षता असते!

    प्रेमाची स्वतःची एक भाषा असते, भावनेची! आणि या भावनेला जेव्हा शब्दांचा स्पर्श होतो, तेव्हा त्याची आपोआप कविता होते. भाषा सिनेमाचीही असते. चित्रांची, प्रतिमांचा, संकेतांची. आणि म्हणूनच सिनेमात जेव्हा प्रेम हाताळलं जातं, तेव्हा ती नुसतीच चित्रमालिका न राहाता, त्याचं चित्रकाव्य व्हावंसं वाटतं. तुम्हाला ग़ज़ल ठाऊक आहे? चांगल्या ग़ज़लेचा एक गुण असतो. तिचा प्रत्येक शे’र मुकम्मल असतो, परिपूर्ण असतो. स्वतःच संपूर्ण कविता असतो. आणि तरीही जेव्हा ते सारे शे’र एकत्र येतात, तेव्हा निर्माण होणारी अनुभूती अजूनच स्वतंत्र, अजूनच वेगळी आणि अजूनच गहिरी असते. “९६”ची प्रत्येक फ्रेम एक मुकम्मल शे’र आहे आणि सबंध चित्रपट मुकम्मल ग़ज़ल! सिनेमा जर प्रतिमांची भाषा बोलणारा असेल, तर त्याला संवादांची अशी कितीशी गरज असणार? सुरुवातीच्या काही दृश्यांत आलेली एखादी प्रतिमा, एखादं पात्र नंतर कधीतरी बरोब्बर नेमक्या जागेवर जाऊन लागणे, हा खरं तर सतर्क पटकथेचा नियम. तो या चित्रपटात इतक्या काही खूबीने जागोजागी वापरलाय की त्यांना ‘वाह’ म्हणण्यापेक्षा आपोआपच ‘आह’ म्हटले जाते. किंबहूना सबंध चित्रपटच आपल्या मनावर अलगद सुऱ्या फिरवत राहातो, हळूहळू धागा-धागा उसवत राहातो, आठवणींची एक एक आवरणे उलगडत राहातो, अशक्य कोटीचा त्रास देत राहातो आणि विचारांच्या पलिकडची शांतता देऊन जातो. असं उसवण्याची ताकद कितीशा कलाकृतींमध्ये असते?

    गेल्याच आठवड्यात मणिरत्नमचा “सीसीव्ही” प्रदर्शित झाला. त्यातसुद्धा विजय सेतूपती होताच ना? मग त्याने लगेचच पुढच्या आठवड्यात इतकी वेगळी भूमिका घेऊन का समोर उभं राहावं? इतकी वेगळी भूमिका आणि इतका अवर्णनीय सुंदर अभिनय की, तुलनेपुरतादेखील आपल्याकडचा कुणी अभिनेता सुचू नये? का? गौतम मेननचा “व्हिटिव्ही” पाहून आठ वर्षांपूर्वी ‘जेसी’ला पक्षी त्रिषा कृष्णनला घाल-घाल शिव्या घातल्या होत्या, एवढी ताकदवान भूमिका होती ती. तिनेही त्यापलिकडचा चटका लावून जावं? राम आणि जानकी ही नावे निव्वळ सांकेतिकतेपुरती न उरता त्याहून खूपच जास्त मोठी व्हावीत? रावणाने जेव्हा सीतेचं अपहरण केलं होतं तेव्हा ती एक एक दागिना खुणेसाठी सोडत गेली होती. तोच प्रसंग संपूर्णपणे वेगळ्या संदर्भात ज्यावेळी “९६”मध्ये घडतो, तेव्हा के. रामचंद्रन आणि एस. जानकीच्या प्रेमाचे पावित्र्य अजूनच ठसठशीतपणे जाणवते. आणि चित्रपट एका, अगदी एखाद्या क्षणासाठीसुद्धा हे पावित्र्य सोडत नाही. असं तरल पातळीवरचं प्रेम आपल्याकडे पाहून कित्येक वर्षे लोटली, कोण जाणे! कदाचित नव्वदच्या दशकाचा संदर्भ असल्यामुळे ते प्रेम इतकं अशारीर, आंतरिक असावं का? अशा कशा चुकीच्या पिढीत जन्माला आलो आपण की त्याकाळचा साधेपणा मनाच्या पाटीवरून पुसला जात नाही आणि तरीही नवीन काळाची नवीन बाराखडी त्याच पाटीवर मन मारून लिहिण्याखेरीज पर्यायसुद्धा नाही.

    संवाद त्या मानाने खूपच कमी आहेत, पण जेव्हा आहेत त्या त्या प्रत्येक वेळी प्रतिमांच्या भाषेहून लाखपटींनी पुढे जाता येण्यासारखे असेल, तेव्हाच आहेत. आपल्याकडे चांगली आणि टिकाऊ गाणी हल्ली का होत नाहीत, माहितीये? कारण त्यांच्यासाठी जी भावना लागते ना ती मुळातच आपल्याकडच्या चित्रपटांच्या आडात नाही आणि म्हणूनच ती गाण्यांच्या पोहऱ्यातसुद्धा येत नाहीत. परंतु “९६”ची गाणी अशा नेमक्या जागी येतात की जिथून संवादांच्याही पुढे लाखपटींनी जाता येण्यासारखे असेल. गोविंद वसंताचे संगीत आणि अनेकविध गीतकारांचे शब्द मिळून असलेला हा अल्बम माझ्या मते यावर्षीचा आत्तापर्यंतचा सर्वश्रेष्ठ रहमानेतर अल्बम तर आहेच, परंतु तितकेच श्रेष्ठ पार्श्वसंगीतसुद्धा आहे. प्रतिमा, संवाद, गीते यांच्याहीपुढे लाखपटींनी जाऊन हे पार्श्वसंगीत चित्रपटाची खोली वाढवते.

    जसजसा चित्रपटाचा शेवट जवळ येऊ लागला होता ना, तसतसं मला दोन भीती ग्रासू लागल्या होत्या. एक, संपू नये असं वाटत असतानाही चित्रपट का संपतोय ही भीती आणि सुरुवातीपासूनच रहस्यांची सुयोग्य किनार लावून चढत असलेला मनोरा पाहाता अखेरीस एखाद्याच चुकीने तो कोसळणार तर नाही ना ही दुसरी. आणि जेव्हा शेवटची फ्रेम आली, खरं सांगतो, सप्पकन एखादं हत्यार आत रुतावं तशी रुतली ती, आणि तिथेच राहिलीये मनाच्या पटलावर छापल्यासारखी, कधीच न निघण्यासारखी. असाच आहे हा चित्रपट. अनेकदा अनुभवाव्याशा ग़ज़लेसारखा. खूप लिहूनही शब्दांमध्ये पूर्णार्थाने न गवसणारा!

    — © विक्रम श्रीराम एडके

    *५/५

  • कॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण

    कलियुग हे आसुरी शक्तींचं युग आहे. त्रेता आणि द्वापारातच आसुरी शक्तींनी प्रचंड उच्छाद मांडलेला असताना, कलीत त्या शक्ती चरमसीमेवर नसतील तरच नवल! अशीच एक प्राचीन कृष्णशक्ती पृथ्वीवर आलीये. मागच्या अनेक युगांतरी तिचा ब्रह्मांडावर नियंत्रण मिळवण्याचा डाव फसला होता. परंतु हे युग काळीम्याला पोषक आहे. यावेळी चूक होणेच शक्य नाही. सबंध विश्वावरच नव्हे तर सगळ्यांच मितींमध्ये आपलं काळं साम्राज्य पसरायचं असेल, तर एका चेहऱ्याची गरज आहे. कुठे मिळणार तो चेहरा? दुसरीकडे नागराजचा काका असलेला सैतानी नागपाशा अमृतप्राशन केल्यामुळे अमर आहे, परंतु तरीदेखील तो नागराजपुढे वारंवार हरतच आलाय. तो का प्रत्येकवेळी हरतो, याचे कारण शोधून त्याच्या कुटील गुरूंनी एक आगळाच प्रयोग आखलाय यावेळी. हा प्रयोग पूर्ण होणार तोच, उपरोल्लिखित महाकाय कृष्णशक्ती पृथ्वीच्या आयामात प्रवेश करते आणि घटनांचे सारे संदर्भच बदलून जातात. सुरू होते कलियुगातले रामायण, अर्थात नागायण!

    आर्ष महाकाव्यच नव्हे तर इतिहास म्हणून गौरविलेले रामायण गेली हजारो वर्षे आपण वाचत, ऐकत, पाहात आलोय. अनेकांनी आपापल्या बुद्धी आणि प्रतिभेनुसार त्याचा अन्वयार्थ लावायचे प्रयत्नही केले. त्यातून उद्भवलेल्या शेकडो कलाकृती, ग्रंथ, नाटके, सिनेमे, कादंबऱ्या आपापल्या वकूबानुसार आज प्रसिद्ध आहेत. परंतु कॉमिक्सच्या विश्वात, विशेषतः भारतीय कॉमिक्सच्या विश्वात रामायणावर थेटपणे नव्हे तर वेगळ्या कथेच्या संदर्भाने भाष्य क्वचितच झाले असेल. कॉमिक्स वाचणाऱ्यांना सुपरिचित असलेल्या ‘राज कॉमिक्स’ने हे शिवधनुष्य (कोटी हेतुत:!) उचलले आणि उचललेच नव्हे तर त्याला प्रत्यंचा चढवून अचूक संधानही केलेय. त्यातूनच उभी राहिलीये काळ, दिशा, स्थल सगळ्यांनाच भेदून उरणारी महागाथा ‘नागायण’!

    या ‘नागायणा’त श्रीराम आहेत, सीता, लक्ष्मण, हनुमान, कैकेयी, जटायू, विश्वामित्र, राक्षस, वानर आणि अगदी रावणसुद्धा आहेत! मला आवडलेली सगळ्यांत मोठी गोष्ट म्हणजे यांतलं एकही पात्र ओढून-ताणून नाहीये. बहुतांश पात्रे नैसर्गिकरित्या आधीपासूनच राज-कॉमिक्सविश्वाचा भाग असलेली आहेत. त्यांच्या मूळ स्वभावांचे रामायणानुसार लावलेले अन्वयार्थ इतके चपखल बसतात की वाटावं, १९८६ पासून ‘राज कॉमिक्स’ जणू याच एका शृंखलेची तयारी करत होते! वाल्मिकींचे ‘रामायण’ जसे बाल, अयोध्या, अरण्य किष्किंधा, सुंदर, युद्ध आणि उत्तर अशा ७ कांडांमध्ये पसरलेले आहे, तद्वतच अनुपम सिन्हा व जॉली सिन्हांचे हे ‘नागायण’ वरण, ग्रहण, हरण, शरण, दहन, रण, समर, इति अशी ८ कांडे व १ उपसंहार अशा एकूण ९ खंडांत (पक्षी कॉमिक्समध्ये) पसरलेले आहे. यांपैकी कोणतेही कॉमिक्स दुसऱ्याहून यत्किंचितही कमी नाही. भारतीय कॉमिक्सविश्वाला सुपरकमांडो ध्रुवसारखे एकमेवाद्वितीय न अन्य कोऽपि पात्र देणारे Anupam Sinha नि:संशय शतकातील सर्वश्रेष्ठ कॉमिक-लेखकांपैकी एक आहेत आणि ‘नागायण’ची रोमहर्षक कथा व तितकीच रोमांचक मांडणी हे या गोष्टीचे जिवंत पुरावे आहेत.

    ज्यांनी मूळ वाल्मिकींचे रामायण वाचलेले असेल, त्यांना कथेचा काही काही ठिकाणी अंदाज येईल. हा म्हटलं तर दोष आहे. परंतु हे संदर्भ अनेकवार अनपेक्षित ठिकाणी आलेले असल्यामुळे ते उलगडताना अनुभवणे हा एक वेगळाच सौख्यदायी अनुभव आहे. अनेक ठिकाणी मूळ स्रोताशी विलग होताना घेतलेले स्वातंत्र्य कथेसाठी पोषकच ठरले आहे. परंतु त्यासोबतच पात्रांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांचा मूळ कथेवर होणारा परिणाम या सबंध शृंखलेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. सबंध कथाच भविष्यकाळात घडत असल्यामुळे नागराज आणि सुपरकमांडो ध्रुव या महानायकांच्या वैयक्तिक आयुष्यांमध्ये प्रचंड उलथापालथ झाली आहे. त्यांचे दिसणे आणि पेहरावही कथेला अनुरुप बदललेयत. आणि तरीही अंतरी ते पूर्वीचेच नागराज व ध्रुव आहेत. हा समतोल राखणे ही मोठीच अवघड जबाबदारी, परंतु ती येथे लीलया पार पाडली गेली आहे. आणि याचवेळी अरेषीय पद्धतीने मांडणी करताना पुढच्या पिढ्यांनाही उचित स्थान देऊन त्यांची चपखल स्थापनादेखील केली आहे. अर्थात ‘राज कॉमिक्स’ हे नागराजच्या तुलनेत ध्रुवला, तो सगळ्यांपेक्षा वरचढ असूनही, कायमच सापत्नभावाची वागणुक देत आलंय, हा माझ्या मनातील जुनाच सल याही शृंखलेत काहीसा जाणवतो.

    तुम्ही याआधी ‘राज कॉमिक्स’ वाचले नसेल तर काही गोष्टींचे संदर्भ लागणे अवघड जाऊन रसभंग होण्याची शक्यता आहे. या शृंखलेत हल्लीच्या परिस्थितीला अनुलक्षून काही ईस्टर-एग्ससुद्धा आहेत. परंतु ते डोळसपणे वाचणाऱ्यालाच सापडतील. अर्थात क्वचित काही गोष्टी सोडल्यास ही सबंध शृंखलाच मोठी अविस्मरणीय व अक्षरशः ‘कलेक्टर्स एडिशन’ घेऊन संग्रही ठेवावी अशीच झाली आहे. कॉमिक्स म्हणजे पोरासोरांनी वाचायच्या गोष्टी, हा आरोप तर ‘राज कॉमिक्स’ने केव्हाच धुवून टाकलाय, किंबहूना ‘नागायण’द्वारे ते या बाबतीत अजूनच शंभर पावले पुढे गेले आहेत. कधी जर ‘राज कॉमिक्स’मधील पात्रांवर चित्रपट बनलेच तर ‘नागायण’ हे शंभर ‘इन्फिनिटी वॉर’लाही भारी ठरेल, एवढा त्याचा आवाका आहे आणि एवढी त्याची महत्त्वाकांक्षी मांडणी आहे. तुम्ही तर वाचाच, परंतु आपल्या आर्ष ग्रंथांपासून दूर गेलेल्या पुढच्या पिढ्यांनाही मनोरंजक चित्रकथेद्वारे मांडलेली ही शृंखला वाचायला द्या, त्यांना त्याचे संदर्भ आणि अन्वयार्थ उलगडून सांगा व हलकेच त्यांना मूळ ग्रंथांकडे घेऊन या. संस्कार असेच होत असतात!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [www.vikramedke.com]

  • बुद्धिमतां वरिष्ठम्

    सुग्रीवाने फक्त सीता कुठे आहे, याचाच शोध लावायला सांगितले होते (किष्किंधा. सर्ग ४१). त्याप्रमाणे हनुमानाने सीतेचा शोध लावलादेखील (सुंदर १५). वास्तविक सुग्रीवाने सांगितलेले काम इथेच संपले होते. आता कुणी प्रश्न विचारेल, मग लंका जाळण्याची काय गरज होती, काम तर झाले होते ना? पण लक्षात घ्या, सांगितले तेवढेच काम करतो तो असतो सांगकाम्या! हनुमान काय सांगकाम्या होता का? वाल्मिकींनी जागोजागी हनुमानाचे वर्णन केलेले आहे. किष्किंधाकांड सर्ग २ येथे तो सुग्रीवाचा मंत्री आणि सचिव (श्लो. ५, १२) असल्याचे सांगितले आहे. त्याच सर्गात हनुमानाला उद्देशून वाक्यकोविद (श्लो. १३) अर्थात चर्चा आणि वाटाघाटी करण्यात कुशल, असे विशेषण वापरले आहे. पुढे सर्ग ३ येथे तर स्वतः राम हनुमानाला वेदज्ञ (श्लो. २८), व्याकरणपटू (श्लो. २९), देहबोलीचा जाणकार (श्लो. ३०) म्हणतो आणि हनुमाच्या भाषेची, वाणीची व स्पष्टपणे विषय मांडण्याची स्तुती (श्लो. ३१-३३) करतो. पुढे सर्ग ४४ येथे सुग्रीव स्वतः हनुमानाला नीतीशास्त्राचा पंडित म्हणतो आणि वर हेही सांगतो की, नीतीशास्त्र व देशकालपरिस्थितीचं भान ठेवून वागणारा असा तू एकमेव आहेस (श्लो. ७). अशी वर्णनं जागोजागी आहेत, फक्त विस्तारभयास्तव ती सारी देत नाही एवढंच. आता हे तर निश्चित झालं की, हनुमान केवळ सांगकाम्या दूत नव्हता तर राजकारण आणि पुढे वाढून ठेवलेलं युद्ध यांची व्यवस्थित जाणीव असलेला ‘बुद्धिमतां वरिष्ठम्’ असा महाबली होता. त्याने खरोखर सीतेचा नुसता शोधच नाही लावला, तर त्या गोष्टीचा पुरावा म्हणून तिला रामाची अंगठी दिली आणि बदल्यात तिचा चूडामणिसुद्धा रामाला दाखवण्यासाठी घेतला (सुंदरकांड, सर्ग ३६, ३८). तिला पूर्णपणे आश्वस्त केलं (सर्ग ३९).

    केवळ एवढेच करून हनुमान भारताच्या मुख्यभूमीवर परतत नाही. तर तो विचार करतो की (सर्ग ४१, श्लो. २-४), “सीता तर सापडली, आता फक्त थोडंसंच काम बाकी आहे. राक्षसांसोबत सामभाव वापरून फायदा नाही. पैसा त्यांच्याकडे भरपूर आहे, त्यामुळे दान वापरूनही फायदा नाही. मुळातच गर्विष्ठ असल्यामुळे भेदनीती वापरण्यातही काही अर्थ नाही. तेव्हा यांच्यावर ताकदच वापरली पाहिजे”. पण थोडंसंच उरलेलं काम म्हणजे तरी कोणतं? हनुमान स्वत:शीच विचार करतोय (श्लो. ५-९), “जो माणूस मुख्य कामासोबतच इतर लहानसहान पण गरजेची कामं करतो, त्यानेच खरं कार्य पार पाडलं म्हणावं. जर का याच भेटीत मी राक्षसांच्या ताकदीचा अंदाज लावू शकलो, तरच भविष्यात होणाऱ्या युद्धाचं नियोजन नीट करता येईल. आणि असा अंदाज लावायचा तर रावणाचे मंत्री, सैन्य आणि सहाय्यकांसोबत काही तरी करून भांडण उकरून काढलं पाहिजे”! आणि म्हणून मग हनुमानाने राक्षसांना डिवचण्यासाठी प्रमदावनाचा विध्वंस केला, काही जणांना वाटतं त्याप्रमाणे माकडचाळा म्हणून नाही. एवढा बुद्धिमान होता हनुमान.

    उद्यानाचा असा विध्वंस झाल्याचं समजल्याबरोब्बर रावणाच्या डोळ्यांत रागाने अश्रू उभे राहिले (सर्ग ४२, श्लो. २३). त्याने किंकर नावाचे ८० सहस्र राक्षस हनुमानाच्या नाशासाठी पाठवले (श्लो. २५). गदा, परीघ वगैरे शस्त्रांनी संपन्न असे ते राक्षस जसे हनुमानावर धावून आले (श्लो. २८), तशी महावीराग्रणी हनुमंताने गर्जना केली (श्लो. ३३-३६),
    “राम, लक्ष्मण आणि सुग्रीव यांचा विजय असो. सहजपणे पराक्रम करून जाणाऱ्या कोसलेंद्र श्रीरामाचा मी दास आहे. शत्रूसैन्याचा नाश करणारा मी मारुतात्मज हनुमान आहे. मी हजारो झाडे आणि दगडधोंडे फेकत जेव्हा युद्ध करेन, तेव्हा एकच काय तुमचे सहस्र रावण जरी आले तरी माझी बरोबरी करू शकणार नाहीत. तुमच्या डोळ्यांदेखत मी लंकेचा नाश करेन आणि सीतेला प्रणाम करून निघूनसुद्धा जाईन”!

    ही नुसती रणगर्जना नव्हती, तर वाक्यज्ञ हनुमानाने जाणूनबुजून राक्षसांना डिवचण्यासाठी वापरलेले शब्द होते. थोड्याफार फरकाने हेच शब्द तो राक्षसांचा चैत्यप्रासाद तोडल्यावरही वापरतो (सर्ग ४३). हनुमानाने एक परीघ उचलला (सर्ग ४२, श्लो. ३९) आणि वीजेच्या चपळाईने तो त्या सैन्यात घुसला व रणमदाने न्हाऊन एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे राक्षसांचा संहार करू लागला. बघता बघता त्याने सारे किंकर संपवले. रावणाचा चैत्यप्रासाद उद्ध्वस्त केला. प्रहस्ताचा पुत्र जम्बुमालीची छाती फोडून त्याला मारले (सर्ग ४४). रावणाच्या मंत्र्याचे सातच्या सात पुत्र यमसदनी धाडले (सर्ग ४५). विरूपाक्ष, यूपाक्ष, दुर्धर, प्रघस, भासकर्ण असे रावणाचे ५ पराक्रमी सेनापतीसुद्धा एकहाती मारले (सर्ग ४६). एवढेच नव्हे, तर रावणाचा मुलगा अक्ष याला तर पार जमिनीवर आपटून मारलं (सर्ग ४७). रावणाचा मुलगा मेघनाद तथा इंद्रजित याने ब्रह्मपाशात हनुमानाला बांधलं खरं, पण तो ब्रह्मपाश नष्ट झाला तरी हनुमान सुटण्यासाठी काहीच करत नाहीये हे इंद्रजिताच्या लक्षात आलं (सर्ग ४८, श्लो. ४९-५०). का केलं हनुमानाने असं? कारण, हनुमानाला राक्षसांची ताकद पारखायची होती, ती पारखून झाली होती. आता त्याला रावणाला जोखायचं होतं (श्लो. ४७).

    रावणाला पाहिल्यावर हनुमान मनातल्या मनात मनापासून त्याच्या रूप, बल आणि पराक्रमाची स्तुती करतो. रावण जर अधर्माच्या बाजूने नसता, तर इंद्रासह समस्त देवांचाही संरक्षक होऊ शकला असता, असाही विचार करतो (सर्ग ४९). पण म्हणून तो रावणाच्या व्यक्तिमत्त्वापुढे दबून जातो का? तर बिलकुल नाही! तो आधी रावणाला गोडीत समजावतो. मग राम मनुष्य आहे आणि तुझ्या वरदानात मनुष्यापासून भय नसल्याची अट नाही, हे सुद्धा सांगतो. हनुमान म्हणतो, मी एकटाच तुझ्या समस्त लंकेचा नाश करू शकतो, पण रामाची आज्ञा नाही म्हणून थांबलोय. आणि रामापुढे तर ब्रह्मा, रुद्र आणि इंद्रदेखील युद्धात टिकू शकत नाही, तेव्हा वेळीच सावध हो. थोडक्यात सांगायचं तर हनुमान रावणाला अत्यंत सभ्य भाषेत तू जे करतोय ते किती चुकीचं आहे आणि आता थांबला नाहीस तर बदल्यात राम तुझं काय करील हे सांगतो. हनुमानाचे हे सबंध भाषण मूळातूनच वाचण्यासारखे (सर्ग ५१) आणि डिप्लोमॅटिक चर्चा करताना एखाद्या राजदूताने कसे बोलावे व कसा आपल्याच देशाचा कार्यभाग रेटावा याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अर्थातच रावणाला ते पटले नाही. तो वास्तविक हनुमाला मारण्याचीच आज्ञा देणार होता, पण विभीषण मध्ये पडला व म्हणाला की, दूताला मारणं न्यायोचित नसतं (सर्ग ५२, श्लो. ५). ज्या हनुमानाने एकहाती सबंध रावणसैन्याचा धुव्वा उडवला होता त्याला मारू नका तर दुसरा दंड द्या असं विभीषण म्हणतोय. काय गंमत आहे ना, वरवर वाटतं की विभीषणाने हनुमानाला वाचवलं. प्रत्यक्षात त्याने रावणालाच मूर्खपणा करण्यापासून आणि हनुमानाच्या हातून मरण्यापासून वाचवलंय! रावणाने मग हनुमानाला मारण्यापेक्षा त्याचा न्यायोचित अंगभंग करायचं ठरवलं आणि त्याच्या शेपटीला आग लावण्याची आज्ञा दिली (सर्ग ५३). पण याचा परिणाम उलटाच झाला. हनुमाला काही व्हायच्या ऐवजी त्याने त्या जळत्या शेपटीने सबंध लंकाच जाळली (सर्ग ५४). नंतर सीता ठिक आहे की नाही याची खात्री करून (सर्ग ५६) तो सहजपणे उत्तरेकडे झेपावला.

    रामादिंची भेट झाल्यावर हनुमानाने त्यांना संपूर्ण वृत्तांत तर सांगितलाच, परंतु सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्याने लंकेचं चक्षर्वैसत्यम् वर्णनसुद्धा केलं. लंकेत असलेले दुर्ग, दरवाजे, सैन्याचं बलाबल आणि त्यांची संख्या व मांडणी सारी सारी गोळा केलेली माहिती हनुमानाने सांगितली (युद्ध. सर्ग ३). किंबहूना रावण आणि विभीषण यांच्यात मतभेद आहेत हे बरोब्बर जोखून त्याने नंतर जेव्हा विभीषण आश्रय मागायला आला, तेव्हा रामाला योग्य सल्लासुद्धा दिला (युद्ध १६).

    हे सारं मी का सांगतोय? कारण आज हनुमान जन्मोत्सव! हनुमानाला उगाचच आपल्याकडे फक्त बळाची देवता समजलं जातं. तो बुद्धिमानसुद्धा होता, हे ठाऊक तर असतं. पण बुद्धिमान होता म्हणजे नेमका काय, हे हल्ली फारसं कुणाला ठाऊक नसतं. त्यामुळेच हनुमानाची ही वेगळी, परंतु खोलात माहिती नसलेली बाजू दाखवणं मला कर्तव्य वाटतं. त्यासाठी हा लेखप्रपंच. स्वा. सावरकर म्हणतात, देवाचे गुण भक्तात उतरतात. मग हनुमानाची पूजा करणाऱ्या आम्ही त्याच्याकडून फक्त शक्तीच का घ्यावी? फक्त बुद्धी तरी का घ्यावी? आम्ही हनुमंताची डोळस भक्ती करावी आणि त्याचं बुद्धी-बळ दोन्हीही अंगिकारावं, तरच तो मारुतीराया प्रसन्न होईल ना? तेव्हा हनुमानाची भक्ती करता करता त्याच्या पावलावर पाऊल टाकण्याचीही योग्यता तो देवो, हीच सर्वांना हनुमान जन्मोत्सवाची शुभेच्छा!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (संपर्क: www.vikramedke.com)