Category: Pravaas Chitre

  • प्रवासचित्रे : ३. भारद्वाज

    व्याख्याने-कार्यक्रमांनिमित्त होणाऱ्या सततच्या प्रवासाने मला काय दिलं? तर जीवाभावाची माणसं आणि कोणत्याही, अगदी कोणत्याही पुस्तकातून कधीच मिळू शकणार नाही अशी शिकवण! परवा मुंबईच्या व्याख्यानावेळी मी अधिवक्ता श्री. भारद्वाज चौधरी यांच्या घरी राहायला होतो!

    चौधरीसाहेब म्हणजे एकदा नव्हे तर चक्क दोनदा युपीएससी फायनल पार केलेला माणूस. साधेसुधे वकील नाहीत, तर गेली ९ वर्षे थेट सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करताहेत ते. अपार बुद्धीमत्ता, निढळाच्या घामाने कमावलेली श्रीमंती आणि कट्टर शिवसैनिकाचं भाबडं मन; यांचा त्रिवेणीसंगम म्हणजे आमचे भरद्वाज चौधरी! बोलता बोलता ते त्यांच्या लहानपणीचे किस्से सांगत होते.

    घरी अठराविश्वे दारिद्र्य. पहाटेच लवकर उठायचं. आवरुन ५.२०ची गाडी पकडायची. ती शाळेपासून ३-५ किमी अंतरावर सोडायची. तिथून रोज पायपीट. एवढं करुन शाळेत पोहोचायला दोन-एक मिनिटं जरी उशिर झाला, तरी गेट बंद आणि दप्तर डोक्यावर घेऊन साडेसात एकरात पसरलेल्या मैदानाला पळत पळत चकरा मारण्याची शिक्षा! ठाण्यातली नामवंत शाळा ती. शाळा सगळी ब्राह्मणांची. शिक्षकही ब्राह्मण आणि विद्यार्थीही. हे एकटेच ब्राह्मणेतर – आगरी! सतत एवढ्यातेवढ्या कारणांवरुन शिक्षा व्हायच्या त्यांना. गृहपाठ तपासायचा असला की, शिक्षक म्हणायचे –
    “भरद्वाज, उभा राहा”!
    “केलाय मी गृहपाठ सर”!
    “तुला विचारलं? विचारलं मी? चल वर्गाच्या बाहेर हो”!
    अशी परिस्थिती. चूक कुणाचीही असो, मार भरद्वाजला!

    ते भरद्वाज चौधरी, माझ्यासारख्या ‘ब्राह्मणा’चे एका फोरस्टार हॉटेलात आतिथ्य करत होते. सारी कामे बाजूला सारत सतत सोबत करत होते. माझ्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार आपली गाडी दिमतीला देत होते, स्वतः चालवत होते. भावना निखळ मैत्रीची!! न राहावून मी शेवटी विचारलंच –
    “मग तुम्हाला नाही वाटलं इतरांसारखं ब्राह्मणद्वेष्टा बनावंसं? तुमच्याकडं तर कारणसुद्घा होतं. कुणीच दोष दिला नसता तुम्हाला ब्राह्मणद्वेष करण्यासाठी”!

    ह्यावर त्यांनी दिलेलं उत्तर मी आजवर ऐकलेलं सर्वोत्तम उत्तर होतं. तिथे फरक कळतो रिकामटेकडे बिग्रेडी आणि अतीव मेहनतीने सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेला बुद्धिमंत ह्यांच्यातला! “तुम्हाला नाही वाटलं ब्राह्मणद्वेष्टा बनावंसं?”, ह्यावर भरद्वाज एकाच वाक्यात उत्तरले –
    “ते लोक माझी गरीबी पाहून माझ्याशी वाईट वागले होते, माझी जात पाहून नव्हे”!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • प्रवासचित्रे : २. नीलेश

    “स्टेशनला येणार का”?
    “१०० रु. होतील”!
    “म्हणजे? मीटरप्रमाणे नाही घेणार का? कश्यासाठी बसवलंय मग ते”?
    “मीटरने परवडत नाही साहेब. तिकडून भाडं नाही मिळत लवकर. असं करा, ८० द्या”.
    “स्टेशनवरुन भाडं मिळणार नाही? कोण विश्वास ठेवेल यावर! मीटरप्रमाणे नेत असलात तर चला, ८० च काय १८० सुद्धा देईन”.
    “नाही जमणार”.
    “ठिकंय. दुसरी रिक्षा पाहातो मी”.

    एक बारीक चणीचा, तिशीचा दिसणारा मनुष्य आमची ‘चर्चा’ ऐकत होता. तो जवळ आला आणि मला म्हणाला,
    “साहेब, माझ्यासोबत चला. मीटरप्रमाणं न्हेतो”.

    मी जाऊन त्याच्या रिक्षात बसलो. त्याने खटका ओढला. जरा पुढं गेल्यावर तो बोलला,
    “किती म्हणत होता हो साहेब तो मा×××द”?
    “१००”, मी म्हणालो, “नंतर ८० पर्यंत आला होता”!
    “आईची ×× त्याच्या! ह्या असल्या मा××××मुळे आम्ही लोक बदनाम झालोय. लईतलई ५५ रुपये होतील इथून. कमवायचंच, तर ६० सांगायचे. पण हाव काय जगू देती का मान्साला”?

    त्याच्या बोलण्यावरुन मला दोन गोष्टी समजल्या. स्टेशनपर्यंत जायचे मीटरप्रमाणे ५५ रु. होतात, हे एक. आणि मकारारंभी शिवी त्याची आवडती दिसतेय, हे दुसरं! त्याच्या आवाजाने तंद्री भंगली माझी –
    “स्टेशनवर कुठं सोडायचं साहेब”?
    “शिवनेरी डेपोला”!

    या प्रश्नानंतर तशी संवादाला फारशी जागाच उरली नव्हती. मीही मुंबईला पोहोचून द्यायच्या असलेल्या व्याख्यानाचे मुद्दे मनात घोळवत शांत बसलो. पण त्याला गप्पा मारण्याची सवय असावी. तोच बोलला –
    “नीलेश नाव साहेब माझं. त्यो मा×××द तसलाचे! ह्या लोकांमुळं धंदा बदनाम होतो साहेब आमचा”!

    खरं तर हे फारच फिल्मी वाक्य आहे. “चँद लोगोंकी वजहसे पूरी कौम बदनाम होती है”, लेव्हलचं. ते कितपत खरं, माहिती नाही. पण त्याच्या पुढच्या वाक्याने मात्र मला त्याच्या बोलण्यात रस निर्माण झाला. नीलेश म्हणाला,
    “परवा एक ताई आलत्या. कल्याणीनगरला सोडा म्हणाल्या. मी न्हेलं. लई सामान होतं, त्ये मागं टाकलं त्यांनी. उतरल्या. गेल्या. मला तिथून बालेवाडीचं भाडं लागलं. तिकडून परत शिवाजीनगरला आलो एकाला घेऊन. तो उतरता उतरता म्हन्ला, तुमचं सामान मागच्या मागं कुणी मारुन न्हेईल, जपून ठेवा. मी विचार करायला लागलो, आपलं सामान? म्हनून मागं जाऊन पाहिलं तर ल्यॅप्टाप! जास्त डोकं खाजवावं नाही लागलं. सकाळच्या ताईशिवाय कुनाचा असनार? तसाच ग्येलो कल्याणीनगरला त्यांना जिथं सोडलं तिथं. त्या शोधतच होत्या. लई रडत होत्या. दिला ल्यॅप्टाप. आपल्याला काय करायचंय? मला १००० रु. काढून द्यायला लागल्या त्या. म्हने, माझं सगळं कालेजचं काम होतं ह्याच्यात, हरवला असता तर करियर बर्बाद झालं असतं. मी म्हन्लं, ह्ये माझं मीटर. चालूच ठेवून आलोय. ह्यात झालेयत त्येवढे द्या. वर काही नको मला”!

    “मग”?

    “त्यांनी दिले. मी आलो. आयुष्यात काय कमवायचं साह्येब? मानसं कमवली तर सगळं कमवलं. त्यांच्या १००० रु. वर मी माडी बांधनार न्हवतो. तुमच्या १०० रु. वर त्यो मा×××द माडी बांधनार न्हवता. आयुष्य ह्ये असलंये”!

    मला त्याच्या साध्यासरळ तत्त्वज्ञानाची गंमत वाटत होती. कुणीतरी श्रोता लाभलेला पाहून त्यालाही बोलण्यात आनंद वाटत होता. तो उत्साहात येऊन म्हणाला,
    “साहेब मी फक्त एकालाच मानतो. मानसं जोडनं पन मी त्याच्याकडूनच शिकलो. द्येव होता त्यो. ह्ये बगा..”
    असं म्हणून त्याने त्याचा मोबाईल माझ्या हातात दिला. मी की-पॅड उघडलं. समोर वॉलपेपरला एकच फोटो होता –
    “बाळासाहेब ठाकरे”!
    आम्ही दोघेही एकदमच म्हणालो. त्या प्रतिमेपुढे बोलणंच खुंटलं. शब्दाला नि:शब्द आणि काळाला स्तब्ध करणारा माणूस तो. त्यांना देव मानणारे लक्षावधी लोक मला सच्चे वाटतात. नीलेशही क्षणार्धात मनाला स्पर्शून गेला!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा – www.vikramedke.com]

  • प्रवासचित्रे : १. षण्मुगम

    सोलापूरात बाजीराव सांगून निघालो, तर रेल्वेत षण्मुगम भेटला. अर्थात, भेटला असं मी आत्ता म्हणतोय. भेटला तेव्हा तर आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो – ना नाव माहिती होते! माझ्या शेजारच्याच आसनावर तो बसला होता. लुंगी सांभाळत नाश्त्याची कसरत चालली होती त्याची. गडी साधारण चाळीशीचा. त्यातून तमिळ, हे बघताक्षणीच समजत होतं. आता तमिळ म्हटलं की, माझे अष्टसात्त्विक भाव जागृत होतात खरं तर, पण त्या राज्याला प्रचंड बुद्धीवैभव असूनही मख्ख चेहऱ्याचा आणि भिडस्तपणाचा शापच आहे की काय, न कळे. षण्मुगमच्या चेहऱ्यावरचे त्रयस्थ भाव पाहून मी स्वत:हून काहीच बोललो नाही. कानात रहमान घातला आणि ब्रह्मानंदी टाळी लागली माझी.

    जरावेळाने त्याने एक तमिळ मासिक काढले आणि वाचत बसला. तो वाचत असलेल्या लेखाच्या शीर्षकातली अक्षरे लावायचा मी आपसूकच प्रयत्न करु लागलो – “पा.. सं.. गा.. २”! आता यात माझ्या तमिळ अक्षरज्ञानाचा वाटा किती आणि लेखावर असलेल्या ‘सूर्या’च्या चित्राचा वाटा किती, हा एक संशोधनाचाच विषय ठरावा! कानात इयरफोन्स असले की, माणूस अंमळ मोठ्यानेच बोलत असतो. माझे हे तमिळ-साक्षरता अभियान षण्मुगमने ऐकले आणि हसला. मीही तत्परतेने इयरफोन्स काढले.
    त्याने विचारले, “नी तमिळाऽ (तुम्ही तमिळ आहात का)?
    मी बावरुन म्हणालो, “इल्लऽसाऽऽर, येनक्के तेरीयो.. कोंचोकोंचो (नाही सर, मला येते थोडी थोडी)! ना मराठी ईर्कऽ (मी मराठी आहे)”!

    त्याला आश्चर्य वाटले. मराठी असून या माणसाला तमिळ कशी काय येते? कोणत्याही तमिळ माणसाने विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर देणे मला सर्वाधिक रम्य वाटते. मी त्याला रहमानबद्दलची माझी आवड सांगितली. कसं त्या आवडीपायी तमिळ गाणी ऐकायला सुरुवात केली, तेही सांगितले. अर्थ कळत नसायचा, त्यामुुळे इंटरनेटवर अर्थ शोधू लागलो. त्यातून काही शब्द समजले. मग कुठून शिकता येईल ही भाषा? मी तमिळ चित्रपट पाहू लागलो. सब-टायटल्स वाचून शिकू लागलो. कामानिमित्ताने चेन्नईवारी होणार असेल, तर चुकवत नाही मी. गेली ९ वर्षे हाच क्रम आहे माझा. असे करुन करुन आता मला तमिळ ३०-४०% बोलता येते आणि ५०-६०% समजते!

    हे सारे मी त्याला थोडे हिंदी, थोडे इंग्रजी, थोडे तमिळ असे सांगितले. कुणीतरी आपल्या राज्याची भाषा शिकण्यासाठी एवढी मेहनत घेतंय, हे ऐकून त्याला धक्का बसला. अभिमान वाटला. या संमिश्र भावनांनी काहीसा अंतर्मुख झाला षण्मुगम. जरा वेळ कुणीच काही बोललं नाही. रेल्वेची लयबद्धता तेवढी शांततेवर लकेरी उमटवत होती. विचार केल्यासारखा चेहरा करुन षण्मुगम बोलला,
    “म्येरा पूरा बाचपान चेन्नै में गया. म्येरा मामा ता वुदर. कपडा का बिजनेस करता ता वो. मैं तो कबी इस्कूल गया नै. मेरेको क्या आयेगा? बाचपानसेई मामा का पास जानेकू ओना. वो मे को सिकाता, बिजनेस. मई बारा साल का ता, जब वो मे को पूणा ले आया. और बोला, मैं चार दिन बाद आयेगा. ये तेरा कोली. इदर रैनेका. मैं डर गया. पर वो माना नै. मेको सौ रुपै देके चला गया. वो चार दिनमें बोत मराटी सिका मैं. बूक तो लगती ना. प्यास तो लगती ना. सिका. काना बोलना सिका. पीना बोलना सिका. चार दिन बाद मामा आया तो मै पूरा मस्त देकके बोत कुश उवा. बोला, अब तू तैय्यार ओ गया. पिर मामाने कबी पूणाके उदर द्यान इ नै दिया. मैं चेन्नैसे कपडा लाता. बेचता. अबी मामातो मर गया. पर मैं अकेला पूरा माराष्ट्र गूमता. कपडा बेचता. उंगंऽ मोळीऽ.. क्या कैते उसकू..”?

    “भाषा”, मी म्हणालो.

    “आं! तुमारा बाषा की वजऽ से. सब समजता मे को. काली बोलते नै आता”!

    मला आता षण्मुगमच्या कथेत रस वाटू लागला होता. पण आम्हां वकीलांचं एक तत्त्व असतं. समोरच्याला पूर्ण मोकळं होऊ द्यायचं. फारच भरकटू लागला तर त्याला रुळावर आणायचं, की सुरु पुन्हा गाडी! षण्मुगम पुढं सांगू लागला,
    “अबी तुमने ये पडने का कोशिश किया. मैं तो कबी इस्कूल गयाई नै. पिर बी पडता. देक-देकके, सुन-सुनके. तमिळ पडता. इंग्लिश पडता. इंदि पडता. बिलकुल तुमारे जैसा. बिजनेसमें नजर बोत लगती. वो काम आता सिकनेको. तुम बोला वो सुनके मेैं को अपना बाचपान याद आया”!

    मी ऐकत होतो. मध्येच तो एखादा हिंदी शब्द अडला, तर सांगायचो मी. तो पुन्हा बोलू लागला,
    “मैं गरीब अन्पड. पिर बी सिका. मेको बोत गुस्सा आता जब कोई बोलता, ‘तमिळ बोत मुश्किल’ या ये-वो बाषा बोत हार्ड. ऐसे कैसे ओ सक्ता? बाषा आदमीके वास्ते बनाई, आदमी बाषा के वास्ते नई. अगर कोई ओर बोलता तो तुम बी बोल सकता”.

    जगाच्या दृष्टीने अडाणी असलेला षण्मुगम भल्याभल्या सुशिक्षितांना न समजलेलं तत्त्व सांगत होता –
    “आदमी दुसरे आदमीका बाषा सिकेगा तो ई तो दुनियामें बात ओगा. ये मेरा बाषा, ये तेरा बाषा करके बैटे तो किसीको कुच नई मिलेगा. अपनी बाषा का प्राऊड ओना. पर उससे सिकना नई रुकना चाईए. जितना ज्यादा सिकेंगा उतनी अपनी कुद की बाषा और प्यारी लगती. सिकना. लेकीन अपनी बाषा, अपनी माँ को कबी गाली नई देना. तुमारा रजनीकांत अमारा तलैवा. कैसे बना? अमारा दिल जीत के ना! अबीबी मराटी बोलता वो. तमिळसे प्यार करता. पर मराटी चोडके नई”!

    आम्ही खूप गप्पा मारल्या नंतर. तमिळ गाण्यांच्या भेंड्या लावल्या. त्याला मराठी बोलायला लावलं. चांगलीच दोस्ती झाली आमची. कोण कुठला हा षण्मुगम, आयुष्यात पुन्हा कदाचित कधीच भेटणार नाही मला. पण अशिक्षित माणूस सुशिक्षिताला काहीतरी शिकवून गेला. धूमकेतूसारखा आला आणि मनोगाभाऱ्यातला एक कोपरा उजळून गेला. इतरवेळी त्या कोपऱ्यात सुशिक्षितपणाच्या माजाचाच अंधार साचलेला असायचा!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)