दोन भेटी

बाजीराव ८ ऑक्टोबर १७३५ ला (Bajirao I – An Outstanding Cavalry General. Author Col. R. D. Palsokar. Pp 183) उदयपूरकडे निघाले. त्यांच्यासोबत सुमारे ८ ते १० सहस्र सैन्य होते. त्याशिवाय इतर मराठी फौजा मेवाड ते बुंदेलखंडदरम्यान (Palsokar. Pp 183) पसरलेल्या होत्या. जानेवारी १७३६ च्या अखेरीस त्यांनी तापी ओलांडली (Selections of Peshwa Daftar. Author G. S. Sardesai. Vol. 14.42 quoted at The Era of Bajirao. Author Uday S. Kulkarni. Pp 205). पुढे उदय कुलकर्णी (Pp 206-07) वंशभास्करच्या (Vol. 6) हवाल्याने एक घटना देतात. अशीच घटना ई. जयवंत पॉल (Bajirao The Warrior Peshwa. Pp 145) सर जदुनाथ सरकारांच्या हवाल्याने देतात.

घडले असे की, महाराणा जगतसिंहांनी (दुसरा) पेशव्यांचे ५ सहस्र रुपये नजराणा, मानाची वस्त्रे, घोडे आणि एक हत्ती देऊन यथोचित स्वागत केले. दुसऱ्या दिवशी त्यांना राजदरबारात सन्मानपूर्वक बोलावण्यात आले. तिथे त्यांच्या स्वागतासाठी स्वतः महाराणा सामोरे आले. दरबारात दोन आसने ठेवली होती. एक बाजीरावांसाठी आणि दुसरे साक्षात महाराणांसाठी. बाजीराव पुढे चालत गेले आणि आसनावर न बसता खाली जमिनीवर बसले. एवढेच नव्हे, तर तेथीलच एक चामर घेऊन ते महाराणांना वारासुद्धा घालू लागले. महाराणा अर्थातच भांबावून गेले. ते म्हणाले (Sardesai. E. Jaiwant Paul), “तुम्ही ब्राह्मण आहात, मी तुमची सेवा करायला हवी”. त्यावर बाजीरावांनी त्यांना उत्तर दिले की, “मी इथे फक्त तुम्हालाच राजा मानतो कारण तुमच्या पदरी १६ उमराव आहेत”!

काही दिवसांनी बाजीरावांनी जयपूरला प्रस्थान केले. तिथे त्यांची सवाई जयसिंहांशी भेट झाली. या ही भेटीबद्दल “वंशभास्कर”च्याच हवाल्याने कुलकर्णी (Pp 208, 209) लिहितात. सवाई जयसिंहांनी जगतसिंहांच्या इतकाच सन्मान बाजीरावांनी मलाही द्यावा अशी मागणी केली. बाजीरावांनी त्यांना ताबडतोब उत्तर दिले, “(स्वैर अनुवाद)उदयपूरच्या महाराण्यांनी कधीच मुघलांची सत्ता मानली नाही, त्या संदर्भाने मी त्यांना आमच्या छत्रपतींसारखेच मानतो. तुम्ही लोक मात्र यवनांच्या चाकरीतच धन्यता मानत आलात. त्यामुळे तुम्ही खरे तर मला कनिष्ठ. पण तरीही मी तुम्हाला बरोबरीचा दर्जा देतोय (गुह्यर्थ – मी त्यांच्याकडे बसलो तसा तुमच्याकडेही खाली बसेन अशी स्वप्नं पाहू नका!). आपण बरोबरीच्या आसनांवर बसू. मी उजवीकडे बसेन आणि तुम्ही डावीकडे बसा”! या भेटीत बाजीरावांनी हुक्क्याची मागणी केली आणि सवाई जयसिंहांना त्रास होत असूनही मुद्दामच त्यांच्या तोंडावर (Paul. Pp 146) धूर सोडत राहिले (Kulkarni. Pp 209. with reference from Vansh Bhaskar)! अशी वागणुक देण्यामागे सवाई जयसिंहांच्या पूर्वजांनी स्वराज्याला दिलेल्या त्रासाची आठवण बाजीरावांना असल्यास नवल नाही!

गंमत अशी की, बाजीरावांनी एकीकडे महाराणा जगतसिंहांना सन्मान दिला आणि दुसरीकडे सवाई जयसिंहांना त्यांची जागा दाखवून दिली, यात बाजीरावांचे चातुर्य आणि माणसांना जोखण्याचा स्वभाव तर दिसतोच. परंतु बाजीरावांचे खरे कर्तृत्व यात दिसते की, बाजीरावांनी जशी सवाई जयसिंहांकडून चौथाई व इतर रक्कम वसूल केली (Palsokar. Pp 183) तशीच जगतसिंहांकडूनही रक्कम वसूल केली (तत्रोक्त)! किंबहूना दिल्ली दरबाराकडून इतर मागण्याही मान्य करून घेतल्या. थोडक्यात, भावनिकता आपल्या जागी आणि राजकारण आपल्या जागी! अर्थातच बाजीरावांच्या सगळ्याच मागण्या काही मान्य झाल्या नाहीत. त्याचीच परिणती पुढे दिल्लीवर धडक देण्यात (मार्च १७३७) आणि नंतर भोपाळमध्ये निज़ामाला मार देण्यात (डिसेंबर १७३७) झाली. कुलकर्णी (Pp 202) सरदेसाईंच्या हवाल्याने (Marathi Riyasat. Vol. 3. Pp 215) शाहूंचे एक वाक्य देतात त्यातच बाजीरावांचे महत्त्व आणि स्थान कळून येते. शाहू म्हणतात, “मला १ लाख सैन्य आणि बाजीराव यांच्यातून एक निवडायला सांगितले, तर मी बाजीरावांनाच निवडेन”!

— © विक्रम श्रीराम एडके

(बाजीरावांचे चरित्र व युद्धनीतीचे अभ्यासक आणि व्याख्याते. अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *