Category: History

  • अनुच्छेद ३७० : दशा आणि दिशा

    अनुच्छेद ३७० : दशा आणि दिशा

    “अनुच्छेद 370: दशा आणि दिशा”
    (साप्ताहिक विवेक, दि. २९ जून ते ५ जुलैच्या अंकात प्रकाशित झालेला लेख.)

    केंद्रामध्ये भाजपा आणि  राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांना स्पष्ट बहुमत मिळाल्यापासून अनुच्छेद 370चा मुद्दा पुन्हा एकवार जोर पकडू लागला आहे. तसा हा मुद्दा सुरुवातीपासूनच विवादित. त्यातून या अनुच्छेदाला विरोध करणारे सरकार अस्तित्वात आल्यापासून तर हे अनुच्छेद रद्द करावे, अशी जोरदार मागणी होणे साहजिकच होते. ही मागणी जितकी तीव्रतेने होऊ लागली, तितक्याच तीव्रतेने या अनुच्छेदाच्या पाठीराख्यांनी विरोधही सुरू केला आहे. गंमत म्हणजे या दोन्हीही बाजू आपापले म्हणणे मांडण्यासाठी हाती असलेल्या सर्व माध्यमांचा – मुख्यत्वेकरून नव्यानेच लोकप्रिय झालेल्या फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप इ. सोशल मीडियाचा – पुरेपूर वापर करीत आहेत. आणि  यातून हा मुद्दा कळणे वा त्याच्यावर मोकळेपणाने चर्चा होणे तर दूरच, परंतु सामान्यजनांच्या मनात एक प्रकारचा संभ्रम मात्र निर्माण झालाय.

    खरे तर अनुच्छेद 370चे मूळ शोधू गेल्यास आपण पोहोचतो ते शेख अब्दुल्लापर्यंत. आता हा कोण शेख अब्दुल्ला? तर काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांचे वडील व सध्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे आजोबा म्हणजे हा शेख मुहंमद अब्दुल्ला. अत्यंत बेरकी व धूर्त राजकारणी. हरिसिंह काश्मीर नरेश असताना हा त्यांच्याशी, नेहरूंशी, माउंटबॅटनशी आणि  पाकिस्तानशी अशा चौघांशीही सारखेच सौहार्द राखून होता. खाजगीत चौघेही त्याला एकमेकांचा ‘एजंट’ समजायचे. आपल्या याच धूर्ततेच्या जोरावर त्याने काश्मीरचे पंतप्रधानपद पटकावले होते आणि  काश्मीरची सत्ता या ना त्या स्वरूपात कायम आपल्याच घराण्यात कशी राहील, याचीही यशस्वी योजना करून ठेवली होती! वाचून आश्चर्य वाटेल, परंतु भारतीय घटनेचे प्रमुख रचनाकार असलेल्या डॉ.आंबेडकरांचा अनुच्छेद 370ला कडाडून विरोध होता (संदर्भ: India Today, 28 मे 2014). याच शेख अब्दुल्लाने नेहरूंसोबत मिळून त्या अनुच्छेद 370ची निर्मिती केली. नेहरूंनाही सरदार पटेलांच्या आक्रमक आणि  दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेल्या धोरणांना शह देण्यासाठी असे काहीतरी हवेच होते. या दृष्टीने पाहू गेल्यास, जिला राजकीय चूक म्हणता येईल, ती काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्र संघाकडे नेण्याची नेहरूंची चाल ही पटेलांना शह देणारी अशीच एक दुर्दैवी खेळीही असू शकते.

    ज्या प्रकारे इतर संस्थानांचे विलीनीकरण झाले, त्याच प्रकारे काश्मीरचे विलीनीकरण होणेही सहज शक्य होते. परंतु जेव्हा 1947च्या हिवाळयात भारतीय सैन्य पाकिस्तान्यांशी निकराची झुंज देत होते, तेव्हा हे अब्दुल्ला महाशय काश्मीरचे स्वतंत्र सैन्य उभारण्यात मश्गूल होते. वर ‘भारतीय सैन्य निघून गेल्यावर काश्मीर अगदी उघडयावर पडायला नको’ असे साळसूद कारण तयारच होते त्यांचे. याला नेहरूंचीही काहीच हरकत नव्हती. उघडच आहे की अब्दुल्लाला काश्मीरसाठी केवळ विशेष दर्जाच हवा होता असे नाही, तर त्याला सर्ंपूण स्वायत्तताही हवी होती. (Working a Democratic Constitution: History of Indian Experience, लेखक Granville Austin). आणि  अनुच्छेद 370द्वारे त्याने ती एक प्रकारे मिळवलीदेखील. असा सगळा प्रकार पाहून निराश झालेले सरदार पटेल आपले स्वीय सचिव व्ही.शंकर यांच्याशी खाजगीत बोलताना म्हणाले होते, ”जवाहर रोएगा!” (Article 370: The Untold Story, लेखक मेजर जनरल शेर थापलियाल, Indian Defense Review मध्ये 27 मे 2014 रोजी प्रकाशित झालेला लेख.)

    राजनीतीची वक्रगती पाहा – घटना समिती आणि  काँग्रेस कार्यकारिणी अशा दोन्हीही ठिकाणी अनुच्छेद 370चा मसुदा स्पष्टपणे नाकरण्यात आला होता. नेहरूंनी त्यानंतर अत्यंत हुशारीने हे अनुच्छेद मान्य करवून घेण्याची जबाबदारी त्या अनुच्छेदाचे प्रखर विरोधक असलेल्या सरदार पटेलांवरच सोपवली. आणि पटेलांनाही नाइलाजाने ती पार पाडावी लागली. 24 जुलै 1952 रोजी, ज्या वेळी सरदार पटेल हयात नव्हते, त्या वेळी नेहरूंनी संसदेत भाषण करताना ”सरदार पटेलच ह्या अनुच्छेदाबद्दल एकहाती सारे र्निणय घेत होते” असे धडधडीत असत्य व पराकोटीच्या कृतघ्नपणाचे विधान केले होते. त्या वेळी या विधानावर बरीच टीकाही झाली होती. किंबहुना गोपालस्वामी अय्यंगारासारख्या, नेहरूंच्या जवळचे समजल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यालाही ही बाब अजिबात पसंत पडली नव्हती.

    मुळात अनुच्छेद 370चा घटनेत समावेश हा ‘तात्पुरत्या’ स्वरूपाचा होता. आणि  म्हणूनच घटनेच्या ‘भाग 21′मध्ये त्याचा समावेश करण्यात आलाय. परंतु आरक्षणाची तरतूदही तात्पुरती असावी, असे स्वत: डॉ. आंबेडकरांचेही मत होतेच की! काय झाले त्याचे? जसे त्या विषयावर राजकीय डावपेच खेळले गेले आणि  मुळात एका अतिशय उदात्त हेतूने निर्मिलेल्या संकल्पनेचा खेळखंडोबा झाला, तीच या अनुच्छेद 370चीही अवस्था झाली आहे. आज ना भारत सरकारचे कायदे काश्मीरला लागू होऊ शकतात, ना काश्मीरमध्ये आधीच अस्तित्वात असलेले नागरिकत्व, जमिनीची खरेदी-विक्री इ. संदर्भातले कायदे रद्द होऊ शकतात. त्यामुळे ना कुणी भारतीय माणूस काश्मीरचा नागरिक होऊ शकतो, ना तिथे जमीनजुमला घेऊ शकतो. एवढेच कशाला, याच अनुच्छेद 370ची कृपा अशी की, भारत देश – सार्वभौम भारतीय गणराज्य, काश्मीरच्या राज्य सरकारच्या मान्यतेशिवाय कितीही गरज पडली तरीही अंतर्गत सुरक्षेच्या कारणास्तव वा आर्थिक मुद्दयावर काश्मीरमध्ये कदापिही अणीबाणी घोषित करू शकत नाही, आता बोला! आणि  याहून धक्कादायक बाब अशी की, संपूर्ण भारतात काश्मीर हे असे एकमेव राज्य आहे, ज्याची स्वत:ची स्वतंत्र घटना आहे! भारतात अंदमान-निकोबार, हिमाचल प्रदेश आदी अनेक राज्यांना विशेष दर्जा देण्यात आलाय, परंतु काश्मीरसारखी स्वायत्ततेची खैरात अन्य कोणत्याच राज्यावर करण्यात आलेली नाही! हे सारे केवळ चीड आणणारेच नव्हे, तर फुटीरतेला उत्तेजन देणारेही आहे. बरे, काश्मीर भारताचा घटक बनून राहावा यासाठी ही स्वायत्तता दिली असे म्हणावे, तर ही किंमत खूपच जास्त होते आहे. तुमच्या हाताचा अंगठा तुटला, तर तुम्ही काय कराल? एखाद्या निष्णात शल्यकर्मीकडून तो बसवून घ्याल ना? तरच तो अंगठा तुमच्या हाताचा अविभाज्य घटक म्हणून राहील! मात्र तुम्ही जर तो अंगठा केवळ फेव्हिकॉलने हाताला चिकटवून ठेवलात तर? ना तो अंगठा पुन्हा हाताशी जुळू शकेल, ना निघू शकेल, ना त्याला हातातून रक्तपुरवठा होईल, ना तो वस्तू पकडून हाताला मदत करू शकेल. तो स्वत: तर सडलेल्या अवस्थेत राहीलच, परंतु त्याच्या रोगटपणामुळे उर्वरित हातालाही कायमच त्रास होत राहील! पटेलांचे ऐकून जर काश्मीरवर एकदाच सैनिकी कारवाई झाली असती, तर ते एकदाच होऊन गेलेले शल्यकर्म ठरले असते. याउलट सध्या जी अवस्था आहे, ती अंगठा फेव्हिकॉलने चिकटवण्यापलीकडे अन्य काहीच नाहीये. बरे, यातून काश्मीर प्रश्न सुटण्याऐवजी मुळात चिघळलाच आहे. शिवाय गेल्या 60-65 वर्षांत मुळातच मुस्लीम बहुसंख्या असलेल्या काश्मीरमधील अनेक गटांना मुस्लीम राष्ट्र असलेले पाकिस्तान जवळचे वाटू लागलेय, हे वेगळेच. आणि याउप्पर काश्मीरमधील हिंदू पंडितांनी सहन केलेल्या व सहन करत असलेल्या अत्याचारांना तर सीमाच नाही. गोष्टी भलेही वेगवेगळया असतील, परंतु साऱ्यांचे मूळ एकच आहे, व ते म्हणजे अनुच्छेद 370!

    अर्थात हे अनुच्छेद 370 रद्द केले म्हणजे काश्मिरात एका रात्रीत सारे आलबेल होईल, असे मुळीच नाही. त्यासाठी काश्मिरी जनतेच्या मनात विश्वासच निर्माण करावा लागणार आहे. शांतपणे आणि  कठोरपणेच हे शल्यकर्म करावे लागणार आहे. त्यासाठी आवश्यकता आहे ती मनमोकळया चर्चेची. त्या चर्चेसाठी आवश्यक असणारे मोकळे आणि समसमान वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने अनुच्छेद 370 रद्द करणे हे अतिशय सकारात्मक पाऊल ठरेल. हो, आता यास काही साचलेली डबकी नक्कीच विरोध करतील; परंतु कोणताही बदल आणि  त्यातही सकारात्मक बदल हा स्वीकारायला कठीणच असतो. मात्र हेही तितकेच खरे की रात्रीच्या स्थितीत बदल घडला, तरच नवी पहाट दिसू शकते. होय ना?

    – विक्रम श्रीराम एडके.
    (लेखक इतिहासतज्ञ आणि वक्ते आहेत.)
    (मूळ लेखाची लिंक: http://magazine.evivek.com/?p=5921)

    image

  • सावरकरांची उडी, नव्हे — भारतीय स्वातंत्र्याची गुढी!

    सावरकरांची उडी, नव्हे — भारतीय स्वातंत्र्याची गुढी!

    आज ८ जुलै. आजच्याच दिवशी स्वा. सावरकरांनी मार्सेल्स बंदरात ती त्रिखंड गाजविणारी जगप्रसिद्ध उडी ठोकली होती. आता काही टिनपाट लोक म्हणतात की, सावरकर ५ मिनिटंही पोहोले नसतील आणि ती उडी गाजलेली नव्हे तर गाजवलेली होती इ. काहीजण तर या उडी मारण्याच्या पराक्रमासाठी सावरकरांना पळपुटे म्हणण्याइतकी मजल मारतात!

    वास्तविक सावरकर किती वेळ पोहोले, हे महत्वाचं नाहीच आहे. त्या पोहोण्याचे परिणाम काय झाले हे महत्वाचे! आणि सावरकर फक्त पाचच मिनिटं पोहोले हे सांगायला सावरकरांचे जातीयवादी टीकाकारच कश्याला हवेत? सावरकर तुरुंगात असताना एका चीनी बंद्याने सावरकरांना अतिशय भक्तिभावाने विचारले होते, ‘महाराज आपण किती दिवस पोहत होता’? तर सावरकर शांतपणे उत्तरले होते, ‘दिवस कसले, पाच मिनिटंही पोहलो नसेन’! हे स्वत: सावरकरांनीच लिहून ठेवलंय. त्याचवेळी त्या चीनी बंद्याचा कसा हिरमोड झाला हेही त्यांनी प्रांजळपणाने लिहिले!

    आता जरा काय घडलं हे पाहूयात. सावरकरांविरुद्ध अटक वॉरंट निघालं त्यावेळी सावरकर इंग्लंडमध्ये नव्हतेच. ते फ्रान्समध्ये होते. याचाच दूसरा अर्थ असा की, सावरकर जर इंग्लंडमध्ये परतलेच नसते, तर इंग्रज सरकार त्यांना बापजन्मीही पकडू शकले नसते. फ्रान्समधून बाहेर पडण्याच्या आणि भूमिगत राहून क्रांतिकार्य करण्याच्या हजारो वाटा होत्या. पण तरीही सावरकर परतले आहेत ते केवळ ‘मी सापडत नाही म्हणून माझ्या अनुयायांना त्रास दिला जातोय. तो थांबवावा’ यासाठी! यातून हेच स्पष्ट होते की, सावरकरांना जर फ्रान्सच्या एका बंदरात उडी मारून पळूनच जायचे असते, तर मुळात ते फ्रान्सहून इंग्लंडला अटक करवून घ्यायला आलेच नसते! दुसरे असे की, सावरकरांचे इंग्लिश अनुयायी श्री. गाय आल्ड्रेड हे सावरकरांना एकदा इंग्लंडच्या तुरुंगात भेटले आणि त्यांनी विचारले की, तुम्हाला इथून पळून जाण्याची काही व्यवस्था करू का? सावरकरांनी त्यांना स्वच्छ सांगितले की, मी माझी योजना तयार केली आहे. हे स्वत: आल्ड्रेड यांनीच आपल्या आत्मचरित्रात नोंदवले आहे. याचाच अर्थ असा की, सावरकरांच्या डोक्यात दुसरेच काहीतरी शिजत असले पाहिजे. आता ते काय, हे पाहू!

    दि. ८ जुलै १९१० रोजी सावरकरांनी पहारेकऱ्यास शौचाला जायची परवानगी मागितली. तो त्यांना घेऊन गेला व शौचालयाबाहेरच थांबला. सावरकरांनी आत जाताच दार लावून घेतले. त्या दाराला असलेल्या पोर्टहोलवर आपला कोट टांगला. ते त्या पहारेकऱ्याच्या लक्षात आले. पण बहुतेक लज्जेमुळे सावरकरांनी असे केले असावे, असा विचार करून तो गप्प बसला. त्या दाराच्या बरोब्बर समोर – थोडे वरच्या बाजूला – समुद्राकडे उघडणारे एक दुसरे पोर्टहोल होते. सावरकरांनी आदल्या दिवशीच आपल्या यज्ञोपविताने मापे घेऊन ठेवली होती. त्यांनी उपनेत्र (चष्मा – सावरकरांचा शब्द!) काढून बाजूला ठेवले. आणि सारे शरीर त्या उघड्या पोर्टहोलमधून खाली झोकून दिले. विचार करा — पलिकडे किती फूटांवर पाणी आहे, मुळात पाणी आहे की नाही याचीदेखील कल्पना नसताना सावरकरांनी उडी घेतलीये! यापाठी सावरकरांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याची नुसती कल्पनाच केलेली बरी!

    जहाज ते पाणी यांत २७ फुट अंतर होते. इतक्या उंचावरून समुद्राच्या पाण्याचा फटका किती जोरात बसतो, याची कल्पना पट्टीचे पोहणारे करू शकतात! जहाज ते बंदराची भिंत यात सुमारे ८ फुट अंतर होते. सावरकरांची उंची सुमारे पाच-साडेपाच फुट. म्हणजेच उडी मारताना घाई-गडबडीत थोडी जरी वेडीवाकडी हालचाल झाली असती, तरीही कपाळमोक्ष ठरलेलाच! बरं पाण्यात पडल्यावर तरी सुटका झाली का? अजिबात नाही. क्षणाचीही उसंत न घेता सावरकर जहाजाला वळसा घालून बंदराच्या भिंतीच्या दिशेने पोहायला लागले. बंदराची भिंत सुमारे ९ फुट उंचीची होती. सतत पाण्याशी संपर्क येऊन ती किती निसरडी झाली असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता! शिवाय तिचा वापर माणसांच्या चढ-उतारासाठी कधीच केला जात नसल्याने तिला हात-पाय रोवायला किंचितही जागा नव्हती. सावरकर तश्याही परिस्थितीत वर चढले. एक-दोन नव्हे, तर तब्बल ९ फूट! आणि मग ते पळत सुटले. सावरकरांना घ्यायला मादाम कामा आणि श्री. व्हि. व्हि. एस.  अय्यर येणार होते, हा कुणीतरी पसरवलेला ऐतिहासिक अपसमज आहे. वास्तविक असे कुणीही येणार नव्हते. एव्हाना पहारेकऱ्यांना सावरकर निसटल्याची कल्पना आलीच होती. ते सावरकरांच्या मागे लागले. सावरकरांनी तश्याच अवस्थेत एक फ्रेंच पोलिस गाठला. मात्र सावरकरांची अवस्था पाहून आणि त्यांचे बोलणे नीटसे न समजल्यामुळे तो सावरकरांची काहीच मदत करू शकला नाही.  तोपर्यंत पोहोचलेल्या इंग्रजी पहारेकऱ्यांनी त्या फ्रेंच पोलिसास काहीतरी चिरीमिरी दिली, सावरकरांना आपल्या ताब्यात घेतले आणि पुन्हा जहाजाच्या दिशेने चालवले!

    हे ते सावरकरांचे तथाकथित ५ मिनिटांचे पोहणे! उपरोक्त वर्णन वाचून सावरकरांनी किती जोखीम उचलली याची वाचकांना कल्पना आलीच असेल! हा कसला पराक्रम, ही तर फसलेली योजना – असंही काही मित्रांना वाटण्याचा संभव आहे! सावरकरांनी श्री. गाय आल्ड्रेडला सांगितलेली ‘योजना’ सुरू होते ती नेमकी इथेच!!

    सावरकरांना पळूनच जायचे असते तर ते कधी इंग्लंडला परतलेच नसते. भूमिगत राहून कार्य केले असते. मग सावरकरांनी इंग्लंडला येऊन, परत इंग्रजांच्या खर्चाने फ्रान्सला जाऊन आणि मग जाहीर उडी ठोकून काय मिळवले? याचे उत्तर दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांनी दिले! एखाद्या देशाचा गुन्हेगार जर दुसऱ्या देशाच्या भूमिवर असेल, तर त्याला पकडण्यासाठी त्या संबंधित देशांमध्ये ‘गुन्हेगार हस्तांतरणाचा करार’ असावा लागतो — असे आंतरराष्ट्रीय कायद्याचे तत्त्व आहे! तसा तो करार इंग्लंड आणि फ्रान्सदरम्यान होता. मात्र त्याची एक प्रक्रिया असते. ती न पाळताच सावरकरांना इंग्रज पहारेकऱ्यांनी ओढत नेले होते. थोडक्यात एक बेकायदेशीर गोष्ट घडली होती. दुसऱ्या दिवशीची सारी फ्रेंच वर्तमानपत्रे ही इंग्लंडच्या या बेकायदेशीर वागण्यावर टीकेची झोड उठवण्यात रंगून गेलेली होती! ज्या साम्राज्यावर कधीच सूर्य मावळते नाही त्या इंग्रजी साम्राज्याला आपल्या कूटनीतीच्या बळावर सावरकरांनी एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील बेकायदेशीर गोष्ट करायला भाग पाडले होते. अवघ्या इंग्रज सरकारचा आपल्या योजनेत एखाद्या प्याद्यासारखा वापर करून घेतला होता! हळूहळू हे टीकेचे लोण जगभरात पसरले. फ्रान्सच नव्हे तर अवघा युरोप, अमेरिका खंड, पार जपान, रशिया आदी दूरचे देशही इंग्लंडवर जहरी टीका करू लागले व सावरकरांना सोडण्याची मागणी करू लागले. अवघे जग या एकाच विषयाने दुमदुमून गेले! मार्सेल्सच्या महापौरांनी इंग्रज सरकारला खरमरीत पत्र लिहून सावरकरांना सोडण्याची मागणी केली. वाद इतका वाढला की, सारे प्रकरण अखेर आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यावे लागले! कल्पना करा — आंतरराष्ट्रीय न्यायालय, जिथे दोन देश एकमेकांशी भांडतात. तिथे इंग्लंड आणि फ्रान्स हे दोन देश एकमेकांशी भांडताहेत. तेही कुणासाठी? तर एका तिसऱ्याच गुलाम देशातील विनायक दामोदर सावरकर नावाच्या माणसासाठी! एका रात्रीत ‘भारत नावाचा काहीतरी देश आहे आणि तिथले नागरिक अन्यायी इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झगडताहेत’ ही बाब जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली! कश्यामुळे? तर सावरकरांनी चाणक्यमतिने केलेल्या एका खेळीमुळे!! त्यानंतर लवकरच फ्रान्सच्या पंतप्रधानांना त्यागपत्र द्यावे लागले. भारताने, विशेषत: सावरकरांनी मिळवलेल्या या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्धीचा फायदा भारतीय स्वातंत्र्यलढ्याला पुढे अनेकदा झाला. तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे!

    आज या उडीला शंभर वर्षांहूनही अधिक काळ लोटलाय. मात्र त्यापाठी सावरकरांनी दाखवलेल्या आंतरराष्ट्रीय राजनीतीच्या सूक्ष्म आकलनाची खुमारी यत्किंचितही कमी झालेली नाही. सावरकरांच्या राजनीतीपटुत्वापुढे नतमस्तक होताना सार्थपणे म्हणावेसे वाटते की, सावरकरांनी मारलेली उडी ही नुसती उडी नव्हती तर भारतीय स्वातंत्र्याची उभारलेली गुढी होती!!

    (संदर्भ साभार: संशोधिका श्रीमती Anurupa Cinar – www.anurupacinar.com)
    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या:  www.vikramedke.com)

  • पानिपत: पराभवाचा नव्हे, विजयाचा इतिहास

    पानिपत: पराभवाचा नव्हे, विजयाचा इतिहास

    डोक्यात पराभव पक्का बसलेला असेल, तर सगळ्या गोष्टींत पराभवच दिसतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पानिपतचे युद्ध! अर्थातच या युद्धात मराठ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र सगळेच म्हणतात त्याप्रमाणे हा मराठी साम्राज्याचा पराभव होता असे काही मला वाटत नाही.

    पानिपताने मराठ्यांची दिल्ली आणि उत्तर भारतावरील सत्ता धुवून टाकली हे खरे. अहमदशहा अब्दाली हा विजेता ठरला हेही खरे. मात्र या युद्धात अफगाणांचे एवढे काही प्रचंड नुकसान झाले की, त्यांना भविष्यात ‘कधीच’ हिंदुस्थानकडे नजर वाकडी करून पाहाण्याची दुर्बुद्धी झाली नाही. याउलट १७६१ साली सुटलेली उत्तर हिंदुस्थानवरील पकड मराठ्यांनी १७७१ पर्यंत परत एकवार प्रस्थापित केली, तीही दुप्पट जोमाने! थोडक्यात, अहमदशहाचा विजय तात्कालिक होता आणि मराठ्यांचा पराभवही. मात्र अहमदशहाचे नुकसान हे सार्वकालिक होते तर मराठ्यांचे नुकसान केवळ तात्कालिक! तुलनाच करायची झाली तर अहमदशहाच्या विजयाची तुलना अलेक्झँडरच्या विजयाशी करता येईल. त्या तात्पुरत्या विजयाची जेवढी किंमत, तेवढीच या विजयाची आणि तेवढीच मराठ्यांच्या पराभवाचीही. मग याला पराभव कसे म्हणता येईल?

    मराठ्यांची मोत्ये गळाली, खुर्दा उडाला; सगळे खरे. परंतू युद्धाची किंमत ही चुकवावीच लागते, मग विजय मिळो वा पराभव! पराभवी मानसिकता बदलून पाहा, मग जाणवेल की पानिपत हा तात्पुरता पराभव तर दीर्घकालीन विजयच होता.

    खरं तर, आपला यात फारसा दोषही नाही. कारण शाळांमध्ये आपल्याला “पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला” हेच शिकवले जाते. मुळातच इतिहासाकडे सकारात्मकतेने पाहायची सवय लागणे गरजेचे आहे. ती नसेल तर सारेच विजय पराभव वाटू लागतील. बाकी पराभवी मानसिकतेचा इतिहास शिकून विजयी वीर कसे निर्माण होणार, हा एक यक्षप्रश्नच आहे!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्याने ऐकण्यासाठी भेट द्या – www.vikramedke.com)

    image