Category: Politics

  • परावर्तित प्रसिद्धीचे दिवाने!!

      ईस्माईल दरबार या संगीतकाराने “हम दिल दे चुके सनम”, “देवदास” आणि “किस्ना”ची काही गाणी सोडता काय संगीत निर्माण केलेय हा एक संशोधनाचाच विषय ठरावा. कुणाच्याही लक्षात नसलेला हा माणूस अचानकच प्रसिद्धीच्या झोतात आला ते “ए. आर. रहमानने ऑस्कर मिळवले नसून विकत घेतलेय” या विधानामुळे!
      अश्या प्रकारच्या प्रसिद्धीला मी परावर्तित प्रसिद्धी म्हणतो. म्हणजे, स्वत: तर काहीच कर्तृत्व दाखवायचे नाही, परंतू इतर कुणी स्वकष्टाने वर येत असेल तर त्याचेही प्रतिमाभंजन करायचा प्रयत्न करायचा. माझी रेष तुझ्या रेषेपेक्षा मोठी होऊ शकत नाही, तर थांब तुझी रेषच पुसतो – असा आकस दाखवायचा. सूर्यावर दगड फेकला की चार-दोन प्रकाशाचे शिंतोडे आपल्यावरही उडतील, असा हा साधासरळ हिशोब असतो.
      संस्कृतमध्ये एक फार सुंदर सुभाषित आहे –
    “घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभरोहणम् ।
    येनकेनप्रकारेण प्रसिद्धो पुरुषो भवेत् ।।”
    अर्थात, प्रसिद्धीसाठी हपापलेला माणूस प्रसंगी स्वत:च्याच घरातली भांडी फोडतो, स्वत:चे कपडे फाडतो, एवढेच नव्हे तर गाढवावरही स्वार व्हायला तयार होतो; कारण त्याला कोणतीही किंमत देऊन प्रसिद्ध व्हायचेच असते!
      ऑस्कर ऍकॅडमीने ५ कोटी डॉलरचा दावा ठोकण्याची धमकी दिल्यावर तत्क्षणीच शेपूट घालणारा ईस्माईल दरबार आणि मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडून जाईन या आपल्या विधानावरून पलटी मारणारे यू. आर. अनंतमूर्ती यांच्यात तत्त्वतः काहीच फरक नाही, असे मला वाटते! दोघांचीही जातकुळी एकच – दोघेही परावर्तित प्रसिद्धीचे दिवाने!!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (www.vikramedke.com)

    image

  • आरंभ हैं प्रचंड..!

      काल काँग्रेसची अधिकृत प्रतिक्रिया होती की, हा भाजपचा अंतर्गत मामला आहे. आता लवकरच राहूल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी घोषित करून त्यांच्या नावे फटाके-पेढे आदी जल्लोष करवून घेण्यात आल्यास मला नवल वाटणार नाही. अर्थातच काल काँग्रेसने दिलेली प्रतिक्रिया यावेळी भाजप देईल! परंतू पंतप्रधानपदाचे प्रत्याषी घोषित करणं हा खरंच एखाद्या पक्षाचा अंतर्गत मामला असतो का हो? तसं असतं तर भाजप काल सहजच आडवाणींचं नाव घोषित करू शकले असते आणि सोनिया गांधी २००४ सालीच पंतप्रधान झाल्या असत्या. तेव्हा असा कोणताही अंतर्गत मामला नसतो, तर जो काही असतो तो पक्षाला जनतेतून बहुमत मिळवून देऊ शकणारा निर्णय असतो. थोडक्यात, तो जनतेच्या दबावाचा परिणाम असतो – एकप्रकारे जनतेचाच निर्णय असतो.
      त्यातल्या त्यात भाजपचे श्रेय एवढेच की, त्यांनी अनेकांची नाराजी पत्करून जनतेचा हा निर्णय स्वीकारण्याची हिंमत दाखवली. काँग्रेसही यावर राजकीय प्रतिक्रिया देत न बसता जर काल लोकांनी उत्स्फूर्तपणे वाजवलेल्या फटाक्यांचा, वाटलेल्या पेढ्यांचा आणि केलेल्या जल्लोषाचा योग्य अन्वयार्थ लावेल तर बरं. जनतेला बदल हवा आहे आणि जनता ते वारंवार कृतीतून दाखवून देते आहे. जनमताच्या विरूद्ध जाणारे इतिहासाच्या पानापुरतेही उरत नाहीत, हा इतिहास आहे. काँग्रेसचे तसे काही होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे. अर्थात त्यांनी स्वत:ला सावरण्याची आणि जनतेला किंमत देण्याची नितांत आवश्यकता आहे.
      दुसरीकडे भाजप आणि सामान्य मोदीसमर्थकांनीही आता जल्लोषात वेळ न घालवता आता मतदारांमध्ये जागृती करायची आवश्यकता आहे. आम्ही तुमच्या भावनेला प्रतिसाद दिला आता चेंडू तुमच्या कोर्टात आहे, ही बाब जनतेपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. तरच त्यांना कालचा निर्णय “कॅश” करता येईल. लढाई जिंकलेली नाही – खरं तर अजून लढाई सुरूदेखील झालेली नाही. रणनीतीचे काही टप्पे तेवढे गाठले गेले आहेत. या युद्धाला कुणी “ॐ × रोम” म्हणो अथवा अन्य काही, परंतू आता कुठे खऱ्या युद्धाला तोंड फुटेल. तयार राहा. तूर्तास, “आरंभ हैं प्रचंड..”!

    – © विक्रम श्रीराम एडके.

    image