Category: Politics

  • अनाठायी टीका नकोच!!

    समजा आपल्या देशाने एखादा जिहादी आतंकवादी पकडला. त्याची रोज चौकशीही होतेय. तो रोज त्याच्या थोड्या थोड्या साथीदारांची नावेही सांगतोय. परंतु तरीही चौकशी पूर्ण होण्याच्या आत शासन त्या लोकांची नावं जाहीर करतं का हो? नाही करत! का? अहो कारण सोप्पं आहे. अर्धवट माहितीच्या आधारे नावं जाहीर केली, तर तो ज्यांची नावे घेणार आहे ते अपराधी सावध नाही का होणार! जिथे मोठ्ठा समूह हाती लागण्याची शक्यता आहे, तिथे चार-दोन छोटे मासे पकडून समाधान मानावं लागेल. त्यामुळे कोणतंही शासन अशी नावं चौकशीच्या दरम्यान जाहीर करत नाही. किंबहूना कुणाची चौकशी चाललीये आणि ती कोणत्या दिशेने चाललीये, हेही सांगितलं जात नाही. हे झालं जरासं अवघड उदाहरण. मला जो मुद्दा मांडायचाय तो आणखी सोपा करून सांगतो. समजा माझ्याकडे रोज एक सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे. तर मी ‘तिचं पोट फाडून सारीच अंडी पळवूयात’ असा मूर्ख विचार करेन का हो? कधीच नाही. अगदी पप्पूबाबाही असला वेडाचार करणार नाही!

    हेच नेमकं भारत सरकार स्विस बँकेतील खातेधारकांच्या संदर्भात करतंय. आज शासनाचे ऍटर्नी श्री. मुकुल रोहत्गींनी जे आवेदन दाखल केले, त्यात असं स्पष्टपणे म्हटलंय की, ज्यांच्याविरोधात चौकशी चालू नाही अश्या कुणाचीच नावे उघड करता येणार नाहीत. आणि चौकशी चालू असेपर्यंत तर कुणाचीच नावे उघड करता येणार नाहीत. याचा अर्थ विरोधकांनी आणि अर्धवट फेसबुकराव व ट्विटकरांनी ताबडतोब असा लावायला सुरुवात केली, की मोदीसरकारने काळापैसाधारकांची नावे उघड करायला नकार दिला अथवा मोदीसरकार त्या खातेधारकांना पाठिशी घालतेय. असं अजिबातच नाहीये. ना श्री. रोहत्गींच्या आवेदनातून तसे सूचित होतेय. त्यांचं म्हणणं केवळ एवढंच आहे की, सर्वच खातेधारकांची नावे उघड करता येणार नाहीत – फक्त ज्यांच्याविरोधात भारताचा आक्षेप आहे त्यांचीच नावे उघड करता येतील. तीही त्यांच्याविरोधातली चौकशी पूर्ण झाल्यावरच!

    असे का म्हटले असावे बरं त्यांनी? यामागे कारण आहे मित्रांनो. आणि त्या कारणाचं नाव आहे ‘डबल टॅक्सेशन अव्हॉईडंस ऍग्रीमेंट’ नावाचा आंतरराष्ट्रीय करार. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा करार अनेक देशामध्ये आहे. जरी हा करार करयोजनेच्या नावाखाली असला, तरी प्रत्यक्षात या करारातून दोन्हीही संलग्न देशांना एकमेकांच्या देशांमध्ये बँकखाते उघडलेल्या नागरिकांची माहिती काही अटींची पूर्तता करून मिळते. तसा करार भारत व जर्मनीदरम्यान आहे. त्यानुसार आपल्याला लिंचेन्स्टाईन बँकेत काळापैसा जमा केलेल्या भारतीय खातेधारकांची नावेही मिळणार आहेत. परंतु नुसते दुसऱ्या कोणत्या देशात बँक खाते असणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही ना! त्यामुळे आपल्याकडील सर्वच खातेधारकांची नावे सरसकट सांगण्याला जर्मनीने नकार दिलाय आणि त्यांची बाजू याबाबतीत शतप्रतिशत बरोबरच आहे! आपल्याला ज्या कुणा विशिष्ट लोकांच्या खात्यांची माहिती हवी आहे, त्यांची माहिती आपल्याला देण्यात येणारच आहे. मग ती माहिती भारत सरकार उघड करेलच. मात्र चौकशीअंती! कारण याबाबतीत जनतेच्या भावना काही जरी असल्या तरीही आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वावरताना तिथले नियम काटेकोरपणे पाळणं आपल्याला भागच आहे. मग सरकारला त्या लोकांची नावे मुळात समजतातच कुठून असाही प्रश्न कुणीतरी विचारेल. याचं उत्तर मोठं ‘अर्थ’पूर्ण आहे, एवढंच मी याक्षणी सांगू शकतो. अशी ‘अर्थ’पूर्ण गोष्ट सरकार देशहितासाठी वारंवार करत असते! शिवाय एकाची माहिती मिळाली की, त्याच्यावर दबाव (!!) टाकून इतरांची माहितीही मिळवता येते.

    या गोष्टीला अजून एक पैलू आहे. सदरचा ‘डबल टॅक्सेशन अव्हॉईडंस ऍग्रीमेंट’ हा करार आपले सरकार लवकरच अन्य काही देशांबरोबरही करणार आहे, जेणेकरून तेथील काळापैसाधारकांची माहितीही आपल्याला मिळू शकेल. आता तुम्हीच विचार करा, समजा जर्मनीच्या बाबतीतच आपण लोकभावनेपुढे वाहावत जाऊन धसमुसळेपणा केला, तर इतर देश आपल्याला माहिती देतील का? माहिती तर सोडाच, आपल्यासोबत मुळात असा काही करार तरी करतील का? नाहीच! असे हे सारे गौडबंगाल आहे. ही एक प्रक्रिया आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियमांच्या व कायद्यांच्या जंजाळातून शिताफीने मार्ग काढतच पुढे जावे लागणार आहे. या सगळ्याला वेळ लागतो मित्रांनो! ही बाब स्वत: पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीदेखील व्यवस्थित जाणून आहेत, म्हणूनच लोकसभा प्रचाराच्या काळात स्वामी रामदेवांसारखी मंडळी अनेकदा ‘शंभर दिवसांत काळा पैसा परत आणू’ वगैरे वल्गना करीत असताना, मोदींनी स्वत: कधीही मते मिळवण्यासाठीसुद्धा तसे खोटे आश्वासन दिले नव्हते. त्यांचे म्हणणे एवढेच होते की, सत्तेवर आल्याबरोब्बर याबाबतीत पावले उचलेन आणि ते आश्वासन ते व्यवस्थित पाळताहेत. आजच्या प्रकाराबाबतीत श्री. जेठमलानी व खान्ग्रेसी मंडळी मोदीसरकारवर सडकून टीका करताहेत. परंतु आपण लक्षात घेतले पाहिजे की, त्या लोकांपैकी श्री. जेठमलानींना त्यांनी दाखल केलेली जनहित-याचिका जिंकायचीये तर खान्ग्रेसींना सरकारवर टीका करायचा काही ना काही बहाणाच हवा आहे. त्यांचं कामच आहे हे. अश्या प्रेरित टीकेला बळी पडायचं की नाही, हे आपण ठरवायचंय. आपण लोकांनी खरं तर अश्या नाजुक बाबींमध्ये संयम पाळायला शिकलं पाहिजे. दुसरं असं की, त्यांच्यावर अजिबात टीकाच न करायला मोदी म्हणजे काही कुणी देव नाही लागून गेले. टीका व्हावी. जिथे चूक असेल तिथे जोरदार टीका व्हावी. परंतु राजकारण, आंतरराष्ट्रीय कायदे जाणून न घेता अशी अनाठायी टीका करणं म्हणजे शुद्ध वेडेपणा ठरेल. नव्हे, समीक्षक व समर्थक दोन्हीही नात्यांनी स्वत:च स्वत:ची किंमत कमी करून घेणे ठरेल. हे होता कामा नये. अंकुश असावा, परंतु डोळसच!!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

    image

  • पहिले ते ‘हरिकथानिरुपण’, दुसरे ते ‘राजकारण’!!

    प्रभू रामचंद्रांनी जेव्हा सीतामाईचा परित्याग केला, तेव्हा त्या बिचाऱ्या ऋषी वाल्मिकींकडे आश्रयासाठी राहिल्या. वाल्मिकींनी जाणले की, राजाचे कर्तव्य म्हणून श्रीरामांना सीतेचा त्याग करणे आवश्यकच होते, परंतू त्यापोटी सीतेवर झालेला अन्यायही अस्वस्थ करून सोडणारा होता. वाल्मिकींनी सीतेला ठेवून घेतले. लव-कुशांचा जन्म झाला. त्यांचेही वाल्मिकींनी यथासांग संगोपन-शिक्षण केले. त्यांना ‘रामायण’ शिकवले. आणि योग्य वेळ येताच श्रीरामांच्या राज्यातील यज्ञाचे निमित्त करून दोन्हीही पोरांना तिकडे रामकथा गाण्यासाठी पाठवले. दोन गोजिरवाणी पोरं! अयोध्येत सगळीकडे फिरायची. चौका-चौकात, पारा-पारांवर अस्खलित संस्कृतमध्ये रामकथा गायची. लोक भावविभोर व्हायचे. मंत्रमुग्ध व्हायचे. नकळत ही दोन्ही पोरं कित्ती रामासारखी दिसतात, अशी तुलनाही सुरू व्हायची त्यांच्या मनांत! मात्र वाल्मिकींनी सक्त ताकीद दिली होती दोघांना की, कुणीही किती जरी खोदून-खोदून विचारले तरीही आपले वडील कोण ते सांगायचे नाही. फार-फार तर ‘आम्ही वाल्मिकींचे शिष्य आहोत’, एवढेच सांगायचे! झाले!! पोरांची कीर्ती हळूहळू सर्व राज्यभर पसरली. यथावकाश स्वत: रामाकडून त्यांना बोलावणे आले. पोरं भर दरबारात प्रत्यक्ष प्रभू राम, लक्ष्मण, भरत, शत्रूघ्नांसमोर रामकथा गायली. कथा ऐकताना, विशेषतः सीतात्यागाचा प्रसंग ऐकताना साऱ्या-साऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. पोरांचे श्रीरामांच्या चेहऱ्याशी असलेले साम्य तर वादातीतच होते. रामाची मुलं असती, तर आज एवढीच असली असती – हाही विचार सर्व आप्तजनांना स्पर्शून जात होता. अखेरीस स्वत: रामरायांनीच विचारले की, तुम्ही कोण, कुणाची मुले? बास!! त्याचक्षणी तिथे ऋषी वाल्मिकी स्वत: आले आणि त्यांनी श्रीरामांना सांगितले की ही तुमचीच मुलं आहेत. वाल्मिकींनी सर्व दरबारास या मुलांची हकीकत सांगितली. सीतेची पवित्रता सांगितली! सर्वांची सहानुभूती सीतेच्या बाजूने झाली. श्रीरामांनाही तेच हवे होते. परंतू मनात कुठेतरी शंका होती. ती वाल्मिकींनी ओळखली आणि श्रीरामांना, साक्षात प्रभू श्रीरामांना दरडावून सांगितले की, ‘रामा, मी ऋषी वाल्मिकी, प्रचेताचा दहावा वंशज (म्हणजेच किमान दहा पिढ्यांची शुद्धता असलेला ब्राह्मण!) तुला सांगतोय की, सीता ही निष्कलंकच आहे”!! या निर्वाणीच्या सुरानंतर सारेच प्रश्न मिटले. राम-सीता दोघेही लव-कुशांसह पुन्हा एक झाले!

    हा प्रसंग काय आहे हो? सीतेला आश्रय देणे, लव-कुशांचा जन्म होऊन ते मोठे होईपर्यंत वाट पाहाणे आणि योग्य वेळ येताच डाव टाकून रामाला सीतेचा स्वीकार करायला भाग पाडणे — या सर्व गोष्टींना एकच शब्द लागू पडतो – ‘राजकारण’!! होय हे राजकारण आहे. आणि वाल्मिकींनी हे राजकारण केलं म्हणूनच लव-कुशांना आश्रिताचं जिणं न जगता त्यांच्या अधिकाराचं राज्य मिळालं, सीतेवरचा खोटा कलंक दूर झाला. वाल्मिकी जर आश्रमाच्या दाराशी आलेल्या गर्भवती सीतेलाही पाहून ‘मी तर तपस्वी आहे, मला या राजकारणाशी काय देणं-घेणं’ असे म्हणून गप्प बसले असते तर? अन्याय करणाऱ्यापेक्षाही तो अन्याय मूकपणे पाहाणारा जास्त मोठा पापी असतो. या न्यायाने वाल्मिकीही त्यांच्या निष्क्रियतेमुळे पापाचे वाटेकरी बनले असते. परंतू वाल्मिकींकडे नीर-क्षीर-विवेक होता. त्यांनी योग्य निर्णय घेतला. राजकारणात भाग घेतला, मत व्यक्त केले. त्यासाठी प्रत्यक्ष रामचंद्रांनाही खडसवायला कमी केले नाही! हेच प्रत्येक विचारी मनुष्याचे कर्तव्य असते!

    लोक मला विचारतात की, ‘विक्रमजी तुम्ही वक्ते आहात. इतिहासावर लिहिणे, व्याख्याने देणे हे तुमचे काम आहे. असे असताना तुम्ही या घाणेरड्या राजकारणावर का लिहिता’? लोक हा प्रश्न माझ्यावरील प्रेमापोटीच करतात, हे मी जाणतो. परंतू या प्रश्नाचे उत्तर उपरोक्त ऐतिहासिक घटनेत आहे मित्रांनो. खरे आहे की मी वक्ता आहे, लेखक आहे आणि तेच माझे कर्तव्यही आहे. मात्र या सगळ्याआधी मी एक ‘हिंदुत्ववादी’सुद्धा आहे! किंबहूना मी हिंदुत्ववादी आहे म्हणूनच वक्ता आणि लेखक आहे. आणि मी असे मानतो की, आजच्या काळात हिंदुत्व पसरवायचे तर त्यासाठी राजकीय सत्ता ही आवश्यकच आहे. त्यासाठी मीच कश्याला, प्रत्येक सच्च्या हिंदुत्ववाद्याने निवडणुकांच्या काळात हिंदुहितवादी माणसेच कशी सत्तास्थानी जातील, हे पाहायला हवे. आणि ती तशी गेल्यावर त्यांच्यावर सातत्याने अंकुशही ठेवायला हवा. म्हणूनच मी राजकारणावर लिहितो आणि लिहितच राहाणार. पक्षातीत विचार करून हिंदुहितास पाठिंबा देतच राहाणार. मग पक्ष भाजप असो वा शिवसेना वा अन्य कुणी! कुणाचीही अंधभक्ती नाही. बरोबर तर बरोबर. आणि चूक तर चूकच! जिथे समष्टीविचारांसाठी वाल्मिकींनी प्रत्यक्ष रामालाही खडसावले, तिथे आजचा तर कोणताही नेता रामाच्या योग्यतेचाही नाही. मग त्यांना जाब विचारण्यात कसली अडचण? कसली भक्ती? हो, एक मात्र निश्चित की, मी वाल्मिकींच्या पासंगालाही पुरणारा नाही. मात्र माझी सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून मी माझ्या परीने खारीचा वाटा उचलू शकतोच की! स्वत: समर्थांनीही ‘हरिकथानिरुपणा’नंतर दुसरे कर्तव्य ‘राजकारण’च सांगितलेय, नव्हे का? गरज पडली तेव्हा समर्थांनी राजकारणावर प्रभाव टाकणारे वर्तन केलेच ना? मग त्याच समर्थांना आदर्श मानणाऱ्या आपण सर्वांनीही त्यांच्याच मार्गावरून चालायला नको? तेव्हा समाजशिक्षणासाठी काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने सद्य राजकारणावर मते बाळगली आणि व्यक्त केलीच पाहिजे. शिवाय निवडणुका या काही दिवसांपुरत्याच असतात. त्यांची एकदा उत्तरपूजा झाली, की माझे नेहमीचे लेखन आहेच!! बाकी सत्ता कुणाची का येईना परंतू खान्ग्रेस आणि कास्टवादीची यायला नको. सेना किंवा भाजप यांच्यापैकी कुणाची जरी सत्ता आली तरीही मला सारखाच आनंद होईल. उलट सेना व भाजप या दोघांपैकी एक पक्ष सत्ताधारी आणि दुसरा विपक्ष झाला तर माझा आनंद द्विगुणितच होईल. हो, राज्यात सत्ताधारी आणि विपक्ष दोघेही हिंदुत्ववादी असतील, तर दुग्धशर्करा योगच नव्हे काय? तेव्हा उद्या होऊ घातलेल्या प्रत्यक्ष रणसंग्रामासाठी दोन्हीही पक्षांना मन:पूर्वक शुभेच्छा!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच लेखकाची व्याख्याने डाऊनलोड करून ऐकण्या/आयोजिण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

    image

  • एकट्या ‘भाजप’चीच खिल्ली का उडवली जाते?

    मित्रांना प्रश्न पडतो की केवळ ‘महाराष्ट्र भाजप’चीच (महाराष्ट्र हा शब्द महत्वाचा!) खिल्ली का उडवली जातेय सगळीकडे? अहो साधी गोष्ट आहे. लोकांच्या मनात काँग्रेस-राष्ट्रवादीविषयी इतका काही प्रचंड राग आहे की, त्यांच्याबद्दल बोलायची सुद्धा लोकांची इच्छा नाहीये. त्यांना साफ झोपवायचं, हे तर पक्कंच ठरलंय! उरले कोण, तर शिवसेना आणि भाजप. त्यांपैकी ज्या शिवसेनेशी भाजपने २५ वर्षे घरोबा केला, ती शिवसेना म्हणजे ‘गुंडांचा पक्ष’ असल्याचा महाराष्ट्र-भाजपला अचानकच साक्षात्कार झालाय. त्यांच्याबद्दल काय बोलायचं मग?

    उरला भाजप!! त्यांना ना महाराष्ट्रात चेहरा ना व्हिजन. बहुमत मिळालं तर मुख्यमंत्रीपदासाठी खुर्चीच्या ऐवजी सोफा ठेवावा लागतो की काय असे वाटण्याइतपत त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे इच्छुक. असेना का. राजकारणात पदाची इच्छा अवश्य असावी. ते योग्यच आहे. परंतू महाराष्ट्र-भाजप लोकसभेतील मोदीलाटेच्या विजयात इतका काही वाहावत गेलाय की, त्यांनी अतिशय नकारात्मक प्रचार सुरू केलाय. पाहा – लोकसभेत त्यांची घोषणा होती, ‘अच्छे दिन आनेवाले है’. यात कशी सकारात्मकता आहे. काहीतरी काम करून दाखवण्याचा ऊर्मी आहे. तेच विधानसभेतील घोषवाक्य पाहा. ते म्हणतात, ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’. यातून केवळ एकच संदेश मिळतो की महाराष्ट्राची वाताहत झाली आहे. बाबांनो, ते तुम्हीच कश्याला सांगितलं पाहिजे? आम्हाला समजतं की ते! यावर उपाय म्हणून तुम्ही काय करणार? की नुसतेच प्रश्न उपस्थित करणार? याचं उत्तर या घोषवाक्यातून मिळत नाही. घोषवाक्य कसं हवं, तर भाजपच्याच लोकसभेतील घोषवाक्यासारखं! एका वाक्यात व्हिजन समजलं पाहिजे, सकारात्मक वाटलं पाहिजे. हा विज्ञापनशास्त्राचा नियम आहे. तुम्ही जर तोच पाळणार नसाल, तर तुमच्या ढिलाईची आणि त्यातून जन्मलेल्या वाक्याची खिल्ली उडवली जाणारच. कारण, आम्ही तुमचे डोळस समर्थक आहोत, तुमच्या कोणत्याही गोष्टीची स्तुती करणारे अंधभक्त नव्हेत.

    हीच ढिलाई मोदींच्या सभांच्या वेळापत्रकातही दिसून येते. अहो, मोदी तुमचा हुकमाचा एक्का आहे. तो जर तुम्ही असा कुठेही उधळणार असाल, तर कसं चालायचं? उदाहरणार्थ-  श्रीमती पंकजा मुंडे-पालवेंच्या मागे याक्षणी सहानुभूतीची प्रचंड लाट आहे. त्या निवडून येणार हे तर पक्कंच आहे. मग त्यांच्यावर मोदींची सभा का वाया घालवलीत? तेही आदल्याच दिवशी स्वत: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांच्यासाठी सभा घेतलेली असताना? त्याऐवजी एखाद्या दुर्बळ उमेदवारावर ती सभा खर्च केली असती, तर आणखी एक जागा निवडून नसती का आली? खरं तर मोदींना एवढ्या साऱ्या सभा घ्यायला लावणं हेच मुळात प्रादेशिक नेतृत्वात आत्मविश्वासाची कमतरता असल्याचं सिद्ध करणारं आहे. चला सभाच घ्यायच्या तर मोदींनीच दिलेल्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ या घोषणेनुसार घ्यायला नकोत? जिथं-जिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते उभे असतील (जशी तासगावात सभा घेतली!) तिथे सभा घ्यायला हव्या होत्या, म्हणजे तुमच्या हेतूंवरचा आमचा विश्वास दृढ झाला असता. परंतू तसे तर होताना दिसत नाहीये. ना सभास्थानांमध्ये काही क्रमवारी वगैरे दिसतेय. म्हणजे एकीकडे ‘आमचे शत्रू केवळ काँग्रेस-राष्ट्रवादी आहेत, शिवसेना नाही’ असं तोंड वाजवत राहायचं आणि प्रत्यक्षात मात्र सभेच्या क्रमात काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही ‘वेगळे’ नुकसान होताना दिसतच नाहीये. शिवाय या सगळ्या प्रकारामुळे मोदींचीही किती गोची झालीये पाहा. त्या माणसाला आपण देशाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कारभार हाकायला नेमलंय. ते सारं सोडून या माणसाला राज्यपातळीवर आणि गावागावांत जाऊन प्रचार करण्याची नामुष्की त्यांच्याच पक्षाच्या कर्तृत्वशून्य प्रादेशिक नेतृत्वाने आणलीये. प्रत्येक गावातली परिस्थिती वेगळी, तिथले प्रश्न वेगळे, बलाबल वेगळे. मोदींनी काय सारं काम-धाम सोडून तिथल्या प्रश्नांचा अभ्यास करत बसायचं आणि भाषणंच ठोकत राहायची? तो माणूस अभ्यासू आहे, त्यामुळे तो हे करेलही. पण मग राष्ट्रीय पातळीवर रखडलेली कामं करायला काय हे प्रदेश पातळीवरील कर्तृत्वशून्य लोक जाणार आहेत का? दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणुका असणार. म्हणजे काय प्रत्येक वर्षी मोदींनाच पळवणार का तुम्ही? यातून मोदींची प्रतिमा तर खालावतेच, शिवाय प्रादेशिक नेतृत्वाची निष्क्रियता अधोरेखित होते ती वेगळीच! अश्या निष्क्रिय पक्षाच्या नेतृत्वाला लोकांनी का म्हणून मत द्यावं? म्हणूनही भाजपची सध्या खिल्ली उडवली जातेय. आणि हे साहजिकच आहे. आजवर अनेक वर्षांत मोदींनी कधीच स्वत:च्या वैयक्तिक मोठेपणाचा डंका वाजवलेला नाही. त्यांचा तो स्वार्थी स्वभावच नाही. त्याच मोदींना आज गावोगावी जाऊन ‘मी अमेरिकेला जाऊन आलो’ असे सांगण्याची वेळ आलीये. ही नामुष्की कुणामुळे ओढवली? कर्तृत्वशून्य, बिनचेहऱ्याच्या प्रादेशिक नेतृत्वामुळेच ना? मग अश्या लोकांना का म्हणून मत द्यायचं आम्ही, हा रोकडा सवाल विचारला जाणारच. मोदींची मस्करी करणाऱ्यांची खिल्ली ही उडवली जाणारच!

    आणखी एक गोष्ट सांगतो. मोदींना ही मंडळी नुसतं दामटवतच नाही आहेत, तर त्यांच्या नावाचा वापरही करून घेताहेत. घ्या ना. अवश्य करून घ्या. तुमचेच नेते आहेत ते. पण प्रादेशिक पातळीवरील निवडणुकांमध्येही केवळ आणि केवळ त्यांचाच चेहरा वापरायचा? त्यांनी अमेरिकेत केलेलं भाषण दाखवून ‘अमेरिकेत भाषण केलेला नेता’ अश्या चुकीच्या पायावर व्यक्तिनिष्ठ उदात्तीकरण करायचं? याचा दुसरा अर्थ प्रदेश-पातळीवरील तुमचे सारेच नेते स्वीकारार्ह नाहीत, असाच होत नाही का? स्वत: मोदींनीही मग अश्यावेळी ‘मुंडे असते तर मला यायचीसुद्धा गरज नसती पडली’ अशी आडवळणाने खिल्ली उडवून घेतल्यास त्यात नवल ते काय? लोकसभेत आम्ही मोदींच्या नावावर मत दिलं. कारण त्यावेळी मोदी पंतप्रधान होणार होते. आता विधानसभेत का द्यावं मोदींच्या नावावर मत? मोदी काय मुख्यमंत्री होणार आहेत का? मुख्यमंत्री तर कुणीतरी प्रादेशिक, ज्याचा चेहराही तुम्ही जाहिरातींमध्ये दाखवू धजत नाहीत, असाच कुणीतरी नेता होणार ना? मग अश्या बिनचेहऱ्याच्या पक्षाला का मत द्यावं आम्ही? कृपा करून ‘निवडणुका झाल्या की मुख्यमंत्री ठरवू’ असलं काँग्रेसी उत्तर देऊ नका. ही काँग्रेसी पद्धत आहे. तुमची नाही. लोकसभेत केला होता की नाही चेहरा जाहीर? मग इथेही करायला कसली भीती? आणि याउप्परही जर काँग्रेसी पद्धतीच वापरणार असाल, तर मग तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये काय फरक राहिला? ‘जनसंघाचीही उद्या काँग्रेसच होईल’ असं भाकीत करणारे स्वा. सावरकर अश्यावेळी अधिकच द्रष्ट्ये वाटू लागत नाहीत काय? सबब, एकट्या भाजपचीच का खिल्ली उडवली जाते? तर त्यांनी लोकसभेला मोठमोठी स्वप्ने दाखवून आशेचा फुगा फुगवला आणि प्रदेशपातळीवरील नेतृत्वाने त्या फुग्याची हवाच काढून घेत मोदींच्या कष्टावर पाणी फिरवले म्हणून! अश्यावेळी खिल्ली ही उडवली जाणारच! लोकसभेत ज्यांना मत द्यायला आम्ही आसुसलेले होतो, विधानसभेत त्यांच्याच चुकीच्या डावपेचांमुळे त्यांना अजिबातच मत द्यावेसे वाटत नाहीये; अरे कुठे नेऊन ठेवलात महाराष्ट्र माझा??

    — © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच लेखकाची व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

    image

  • दुंदुभी निनादल्या.. नौबती कडाडल्या..!!

    अगदी साधा हिशोब करुयात. महाराष्ट्राच्या राजकारणातील युती आणि आघाड्यांचे पर्व तर सध्या संपले. तेव्हा यावेळी पंचरंगी लढत होणार हे नि:संशय. यातून कोणतातरी एकच पक्ष सर्वाधिक जागा मिळवणारा ठरेल हेही निश्चित. मात्र समविचारी (‘विचारी’ शब्द लिहितानाही खरे तर लाज वाटतेय!) पक्ष एकमेकांची मते खाणार, त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची सुतराम शक्यता नाही. सध्याची काँग्रेस-आघाडीविरोधी लाट पाहाता त्यांच्यापैकी कोणताही पक्ष सर्वाधिक जागा जिंकणार नाही, हेही नक्की. तेव्हा सर्वांत मोठा पक्ष एकतर शिवसेना तरी असणार वा भाजप तरी! मला वाटते, इथपर्यंत कुणाचेच दुमत नसेल.

    क्षणभर गृहित धरू की, भाजपला सर्वाधिक जागा मिळतील. अश्यावेळी भाजपला पुन्हा एकवार कुणासोबत तरी युती करणे भागच आहे. ती कुणाबरोबर? काँग्रेससोबत युती करण्याची तर सुतराम शक्यता नाही. कारण, ज्यांच्याविरोधात लढून केंद्रात सत्ता मिळवली, राज्यातील सत्तेच्या लालसेपोटी जर त्यांच्याच सोबत गेले तर लोक अक्षरशः शेण घालतील तोंडात. शिवाय असा भिन्नप्रवृत्तींचा बळजबरीचा विवाह फार काळ टिकणेही अशक्यच! मग भाजपवाले राष्ट्रवादीसोबत जातील का? तांत्रिकदृष्ट्या जाऊ शकतात. तसेही अलिकडच्या काही दिवसांत महाराष्ट्र भाजपमध्ये राष्ट्रवादीच्याच लोकांचा भरणा अधिक दिसतोय. शिवाय तत्त्व-बित्त्व बाजूला ठेवून भाजपवाले या ‘आयात’ मंडळींना तिकिटेही देतीलच! तेव्हा भाजपवाले राष्ट्रवादीसोबत जाऊ शकतात. मात्र प्रश्न उरतो तो असा की, हे असं निष्ठावंतांना डावलून, तत्त्वाशी तडजोड करून केलेलं गठबंधन भाजपमधील पुढाऱ्यांना रुचेलही एकवेळ, परंतू तळागाळातील सामान्य-निष्ठावंत कार्यकर्त्याला चालणार आहे का? नाही चालणार! आणि त्यांना चालो न चालो, परंतू राज्यात काँग्रेसच्या बरोबरीने ज्या राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्याच जीवावर (किमानपक्षी त्यांच्यातील आयातांच्या जीवावर!) सत्तेचे सोपान चढणे यासाठी भाजपला किती किती आणि कुठे कुठे तडजोड करावी लागेल, याची कल्पनाच केलेली बरी! यात राष्ट्रवादीचे कणभरही नुकसान नाहीये. मात्र प्रतिमा खराब होणार, विश्वासार्हता उणावणार ती भाजपचीच! शिवाय काँग्रेस काय वा राष्ट्रवादी काय, यांच्यासोबत जाणे मोदींना शोभणारे आहे का, याचाही विचार व्हायला हवा! भाजपला हे नुकसान परवडणारे वाटत असेल, तर आनंदच आहे! अन्यथा आणखी एक पर्याय समोर आहे तो मनसेचा! तसेही लोकसभेच्या काळात मनसेसोबत मधुर संबंध प्रस्थापित करण्याचा महाराष्ट्र-भाजपने (केंद्रीय नव्हे!) प्रयत्न करून पाहिलाच होता. त्या संबंधांनाच विवाहात बदलता येणे शक्य आहे. मात्र प्रामाणिकपणे सांगायला गेलं तर या निवडणुकीत मनसेच्या फार काही जागा निवडून येतील असे बिलकुल वाटत नाही. त्यामुळे या संबंधांचा भाजपला कितपत फायदा होईल याची शंकाच वाटते. दुसरा आणि सर्वात मोठा अडसर असा की, लवकरच बिहार आणि उत्तरप्रदेशात निवडणुका होऊ घातल्या आहेत. अश्यावेळी महाराष्ट्रात मनसेसोबत युती असेल, तर त्याचा हमखास फटका या दोन्ही राज्यांत बसणार, यात जराही शंका नाही. त्यातही सदर राज्यांच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी फारशी समाधानकारक नसताना भाजपचे केंद्रीय पातळीवरील नेतृत्व मनसेसोबत युती करण्याची जोखीम पत्करेल असे निदान मला तरी वाटत नाही. अश्यावेळी उरते कोण, तर शिवसेना! ज्या उद्धव ठाकरेंनी जागावाटपाच्या वेळी भाजपला काडीमात्रही भाव दिला नव्हता, ते युतीसाठी पुन्हा एकवार सहजासहजी तयार होतील असा विचार करणेही बालिशपणाचे आहे. साहजिकच ते शिवसेनेसाठी मुख्यमंत्रीपद आणि इतरही महत्वाची मंत्रिपदे मागणार. त्याशिवाय युती तर सोडाच, साधी बोलणीही करणार नाहीत. म्हणजेच, जी गोष्ट नको म्हणून युती तोडली, तीच गोष्ट मारून-मुटकून करण्याचे महाराष्ट्र-भाजपच्या नशिबी येणार! थोडक्यात काय, तर इथेही फरपटच!! किंबहूना हीच परिस्थिती यावी म्हणून शिवसेनेचे नेतृत्व शांतपणे दबा धरून वाट पाहातेय. अर्थात अजूनही एक पर्याय उरतो, तो म्हणजे विविध पक्षांचे विधायक फोडून जादुई आकडा गाठणे. सद्य परिस्थिती जर आहे तशीच कायम राहिली, तर हाच सगळ्यात सोप्पा मार्ग याक्षणी तरी वाटतो. मात्र या घोडेबाजारात भाजपला सतत जबर किंमत चुकवावी लागणार हे निश्चित! थोडक्यात काय, तर कमी प्रमाणात परंतू फरपटच!! महाराष्ट्र-भाजपला आगामी काळात, त्यांच्याच एका गाफील, अहंकारी आणि चुकीच्या निर्णयापोटी ‘न भूतो न भविष्यति’ तडजोडी कराव्या लागणार आहेत, असे जे मी परवा लिहिले होते ते या सर्व संदर्भांना धरून!

    याउलट शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या तर काय होईल? त्यांना राष्ट्रीय पातळीवर कुणालाही उत्तर देण्याचे बंधन नसल्यामुळे काँग्रेस वा राष्ट्रवादी यांच्यापैकी कुणाशीही युती करण्यात काहीही अडचण नाही. मात्र इथे प्रश्न येतो तो तत्त्वांचा! जर या दोन्ही पक्षांपैकी कुणासोबत युती केली, तर शिवसेना या नावाभोवती असलेलं वलय आणि विश्वासार्हता कायमचे संपेल. मला वाटतं, सेनानेतृत्वालाही या गोष्टीची जाणीव असेल, त्यामुळे ते कदापिही हा बालिशपणा करणार नाहीत. शिवाय भाजपला लागू होणारा नियम यांनाही तितकाच लागू होतो — एकमेकांचे विचार न पटणाऱ्यांचा विवाह चालून चालून असा कितीसा चालणार? मग आणखी पर्याय कोणता? तर मनसे!! खरं सांगू, मनसेच्या किती का जागा निवडून येईनात, मात्र या दोन पक्षांची युती झाली आणि त्यानिमित्ताने जर का दोघा भावांचे मनोमिलन झाले, तर अवघा महाराष्ट्र आनंदाने नाचेल अक्षरशः!! तेव्हा हा एक हुकमी पर्याय आहेच. मात्र यासाठी दोघांनाही कल्पनेपलिकडच्या तडजोडी कराव्या लागतील. आणि याक्षणी तरी एकाचा अहंकार आणि दुसऱ्याचा खुनशीपणा पाहाता, हे मधुर-मिलन कितपत घडू शकेल, यात मला तरी शंकाच वाटते! परंतू काहीतरी चमत्कार घडावा आणि हे मनोमिलन व्हावे अशी माझ्याप्रमाणेच सर्व मराठीजनांची इच्छा आहे एवढं नक्की! त्या दोघांनीही या लोकभावनेचा विचार करावा. शिवसेना पुन्हा एकदा भाजपसोबत युती करू गेल्यास, भाजपला पूर्ण नमविल्याखेरीज सोडणार नाही, असेच याक्षणी तरी वाटतेय. किंबहूना आपल्याला सर्वाधिक जागा न मिळाल्यास, ही अशी परिस्थिती निर्माण करून महाराष्ट्र-भाजपचे पानिपत करण्याचा सेनेचा खरा डाव असण्याचीच शक्यता याक्षणी वाटतेय! तेव्हा बोलणी तडजोडीच्या दिशेने नेण्यापेक्षा ‘येता की जाता’ अशीच करण्याकडे अश्यावेळी शिवसेनेचा कल राहाणार! आणि समजा अश्याप्रकारे केलेली बोलणी फिसकटलीच, तर विरोधी बाकावर बसताना शिवसेनेला काडीचेही दु:ख होणार नाही! कारण गमावण्यासारखे मुळात काही नव्हतेच. मग हाच विरोधी बाकावर बसण्याचा पर्याय भाजपकडेही खुला नाही का? तर आहे. मात्र त्यांच्या दृष्टीने तो सगळ्यात शेवटचा आणि नाईलाजास्तव स्वीकारलेला पर्याय असेल, एवढे नक्की! याचे कारण आहेत, अमित शहा! किंबहुना महाराष्ट्र-भाजपला युती तुटायला नको होती, त्यासाठी ते पडती बाजू घ्यायलाही तयार होते, मात्र युती तुटली ती अमित शहांनी आणलेला दबाव, दिल्लीदरबारच्य कुणा हुजऱ्याला राज्यात मुख्यमंत्रीपदी बसवून राज्यावर अंकुश ठेवण्याची – विदर्भ आणि प्रसंगी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची महत्वाकांक्षा, उत्तरप्रदेशात लोकसभेमध्ये मिळालेल्या यशामुळे आलेली बेफिकीरी, जात्याच कणखर स्वभाव आणि त्यात आता तर थेट नरेंद्र मोदींचा वरदहस्त लाभल्यामुळे आलेली निर्ममता, आणि अहंकारामुळे; असेच प्रथमदर्शनी तरी दिसतेय! अर्थात त्यांना असे करण्याचा पूर्ण अधिकारही आहे कारण, सध्यातरी तेच विजयी बाजूकडे आहेत; मात्र दुर्दैव म्हणा वा योगायोग, हा महाराष्ट्र आहे – उत्तरप्रदेश नव्हे!!

    थोडक्यात सांगायला गेलं तर, येत्या महिनाभरात महाराष्ट्रात राजकीय धूळवड होणे अटळ आहे. यात कोण तावून-सुलाखून बाहेर पडतो आणि कुणाच्या गळ्यात महाराष्ट्रलक्ष्मी माळ घालते (की तिच्या नशीबी राष्ट्रपती राजवटीतले आश्रिताचे जिणे येते!), हे बघणे निश्चितच औत्सुक्याचे ठरेल. खऱ्या नेतृत्वाची हीच परीक्षा आहे; किंबहूना ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यालाच महाराष्ट्राचा नेता म्हणवून घ्यायचा अधिकार असणार आहे! सध्यातरी, ‘दुंदुभी निनादल्या.. नौबती कडाडल्या’!!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने ऐकण्यात/डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा : www.vikramedke.com)

    image

  • लोकमान्यांना शंभर वर्षांनंतर लाभलेला शिष्य!!

    मोहनदास गांधी जेव्हा आफ्रिकेतून भारतात परतले होते आणि येथील विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते, तेव्हा आपल्या या प्रवासात ते लोकमान्य टिळकांनाही भेटले होते. भेट संपली. गांधी निघून गेले. ते जाताच लोकमान्य आपल्या सहकाऱ्यांकडे वळून म्हणाले, “हा माणूस पक्का बनिया दिसतोय. बोट दिलं तर हातच ताब्यात घेईल. याला दूर लोटू नका, पण फार जवळदेखील करू नका. नाहीतर हा विकून खाईल सगळ्यांना”. अर्थातच टिळकयुगाच्या अस्तानंतर लोकमान्यांचा हा मुत्सद्दी सल्ला कुणीच मानला नाही. हळूहळू सारी काँग्रेसच गांधींच्या कह्यात गेली. त्यातून पुढे काय काय रामायणे घडली आणि देशाला त्याचे काय काय परिणाम भोगावे लागले, हा एक वेगळाच विषय आहे.

    मात्र मला आज एक असा कुटील राजकारणी दिसला — मी मुद्दामहून ‘कुटील’ हा शब्द वापरतोय — ज्याने शंभर वर्षे उलटून गेल्यावरही लोकमान्यांचा सल्ला पक्का आत्मसात केलाय. नव्हे, तर अक्षरशः अंगी बाणवलाय! त्या कुटील राजकारण्याचं नाव आहे, मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी! मोदी कायम गांधींचे आणि त्यांच्या विचारांचे गुणगान करत असतात. पण म्हणून त्यांनी गांधींना कधी जवळ केल्याचे पाहिलेय का हो? तर अजिबात नाही! जेव्हा गुजरातची अस्मिता दाखवण्याची वेळ आली तेव्हा त्यांना गुजराती असलेले गांधी आठवले नाहीत, तर उलट त्यांनी सरदार पटेलांच्या रुपाने एक वेगळाच, प्रवाहाविरुद्धचा आदर्श उभा केला. एक काँग्रेसी महापुरुष हायजॅकच केला म्हणा ना! तर मुद्दा असा आहे की, मोदींनी गांधींना कधीच दूर लोटलं नाही, मात्र कधीच जवळही केलं नाही.

    गांधींना यांत्रिक प्रगतीचं नेहमीच वावडं होतं. ‘खेड्यांकडे चला’ हा त्यांचा मंत्र तर प्रसिद्धच आहे. मात्र ‘नागपूर मेट्रो’च्या उद्घाटनावेळी मोदींनी केलेलं भाषण जर नीट ऐकलं, तर तुम्हाला जाणवेल की — मोदींनी नुसती शहरांची आवश्यकताच बोलून दाखवलेली नाहीये तर छोट्या आकारांची नवनवीन शहरे स्थापन करण्याची जोरदार वकीलीही केली आहे. मोदींनी आपले याबाबतचे विचार याआधीही अनेकवार बोलून दाखवले आहेत. आणि मोदी जर एखादी गोष्ट इतकी ठासून मांडत असतील, तर ती गोष्ट ते अंमलातही आणणार यात काहीच शंका नाही. म्हणजे पुन्हा तेच —  ‘खेड्यांकडे चला’ म्हणणाऱ्या गांधींचं गुणगान तर करायचं, पण प्रत्यक्ष कृती मात्र अगदी उलट करायची!

    खरं तर गांधीवाद हा कधीच कालसुसंगत नव्हता. परंतू त्याचं नेहमीच सरकारी पातळीवरून उदात्तीकरण केलं गेलं. आणि हिंदुत्ववाद्यांनी तसेच वास्तववाद्यांनी या प्रकाराला विरोध केला की, तथाकथित विचारवंतांकडे अश्या विरोधकांवर कट्टरतेचा शिक्का मारण्याचं अस्त्र तयारच असायचं! परंतू स्वत:ला गांधीवादी दाखवत गांधीवादाच्या मूळालाच हात घालण्याच्या मोदींच्या खेळीवर कुणाकडेच तोडगा नाहीये. मी मोदींना ‘कुटील’ राजकारणी म्हणतो ते यासाठीच. आपल्याला हवा तो कार्यभाग समोरच्याला गंधवार्ताही लागू न देता साधणे, नव्हे नव्हे, समोरच्याला पूर्णवेळ ‘हा माणूस आपलेच काम करतोय’ असं वाटायला लावत काम साधणे — यासाठी व्यक्ती चाणक्य कोळून प्यायलेलीच असायला लागते!

    मोदी पंतप्रधान म्हणून तर प्रिय आहेतच, पण आज मोदींमधला मुत्सद्दी राजकारणी अधिकच प्रकर्षाने आवडून गेला. आज लोकमान्यांचा आत्मा स्वर्गात अतिशय खूष झाला असेल. कुणी सांगावं, एव्हाना ‘स्वर्ग-केसरी’त अग्रलेखही लिहायला घेतला असेल त्यांनी — ‘डोके ठिकाणावर असलेले सरकार आले हो’!!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच विविध क्रांतिकारक, महापुरुष आणि हिंदू धर्माची महती सांगणारी लेखकाची अनेकानेक व्याख्याने डाऊनलोड करण्यासाठी अथवा आपल्या भागात आयोजिण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

    image

  • अनुच्छेद ३७० : दशा आणि दिशा

    अनुच्छेद ३७० : दशा आणि दिशा

    “अनुच्छेद 370: दशा आणि दिशा”
    (साप्ताहिक विवेक, दि. २९ जून ते ५ जुलैच्या अंकात प्रकाशित झालेला लेख.)

    केंद्रामध्ये भाजपा आणि  राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांना स्पष्ट बहुमत मिळाल्यापासून अनुच्छेद 370चा मुद्दा पुन्हा एकवार जोर पकडू लागला आहे. तसा हा मुद्दा सुरुवातीपासूनच विवादित. त्यातून या अनुच्छेदाला विरोध करणारे सरकार अस्तित्वात आल्यापासून तर हे अनुच्छेद रद्द करावे, अशी जोरदार मागणी होणे साहजिकच होते. ही मागणी जितकी तीव्रतेने होऊ लागली, तितक्याच तीव्रतेने या अनुच्छेदाच्या पाठीराख्यांनी विरोधही सुरू केला आहे. गंमत म्हणजे या दोन्हीही बाजू आपापले म्हणणे मांडण्यासाठी हाती असलेल्या सर्व माध्यमांचा – मुख्यत्वेकरून नव्यानेच लोकप्रिय झालेल्या फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप इ. सोशल मीडियाचा – पुरेपूर वापर करीत आहेत. आणि  यातून हा मुद्दा कळणे वा त्याच्यावर मोकळेपणाने चर्चा होणे तर दूरच, परंतु सामान्यजनांच्या मनात एक प्रकारचा संभ्रम मात्र निर्माण झालाय.

    खरे तर अनुच्छेद 370चे मूळ शोधू गेल्यास आपण पोहोचतो ते शेख अब्दुल्लापर्यंत. आता हा कोण शेख अब्दुल्ला? तर काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांचे वडील व सध्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे आजोबा म्हणजे हा शेख मुहंमद अब्दुल्ला. अत्यंत बेरकी व धूर्त राजकारणी. हरिसिंह काश्मीर नरेश असताना हा त्यांच्याशी, नेहरूंशी, माउंटबॅटनशी आणि  पाकिस्तानशी अशा चौघांशीही सारखेच सौहार्द राखून होता. खाजगीत चौघेही त्याला एकमेकांचा ‘एजंट’ समजायचे. आपल्या याच धूर्ततेच्या जोरावर त्याने काश्मीरचे पंतप्रधानपद पटकावले होते आणि  काश्मीरची सत्ता या ना त्या स्वरूपात कायम आपल्याच घराण्यात कशी राहील, याचीही यशस्वी योजना करून ठेवली होती! वाचून आश्चर्य वाटेल, परंतु भारतीय घटनेचे प्रमुख रचनाकार असलेल्या डॉ.आंबेडकरांचा अनुच्छेद 370ला कडाडून विरोध होता (संदर्भ: India Today, 28 मे 2014). याच शेख अब्दुल्लाने नेहरूंसोबत मिळून त्या अनुच्छेद 370ची निर्मिती केली. नेहरूंनाही सरदार पटेलांच्या आक्रमक आणि  दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेल्या धोरणांना शह देण्यासाठी असे काहीतरी हवेच होते. या दृष्टीने पाहू गेल्यास, जिला राजकीय चूक म्हणता येईल, ती काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्र संघाकडे नेण्याची नेहरूंची चाल ही पटेलांना शह देणारी अशीच एक दुर्दैवी खेळीही असू शकते.

    ज्या प्रकारे इतर संस्थानांचे विलीनीकरण झाले, त्याच प्रकारे काश्मीरचे विलीनीकरण होणेही सहज शक्य होते. परंतु जेव्हा 1947च्या हिवाळयात भारतीय सैन्य पाकिस्तान्यांशी निकराची झुंज देत होते, तेव्हा हे अब्दुल्ला महाशय काश्मीरचे स्वतंत्र सैन्य उभारण्यात मश्गूल होते. वर ‘भारतीय सैन्य निघून गेल्यावर काश्मीर अगदी उघडयावर पडायला नको’ असे साळसूद कारण तयारच होते त्यांचे. याला नेहरूंचीही काहीच हरकत नव्हती. उघडच आहे की अब्दुल्लाला काश्मीरसाठी केवळ विशेष दर्जाच हवा होता असे नाही, तर त्याला सर्ंपूण स्वायत्तताही हवी होती. (Working a Democratic Constitution: History of Indian Experience, लेखक Granville Austin). आणि  अनुच्छेद 370द्वारे त्याने ती एक प्रकारे मिळवलीदेखील. असा सगळा प्रकार पाहून निराश झालेले सरदार पटेल आपले स्वीय सचिव व्ही.शंकर यांच्याशी खाजगीत बोलताना म्हणाले होते, ”जवाहर रोएगा!” (Article 370: The Untold Story, लेखक मेजर जनरल शेर थापलियाल, Indian Defense Review मध्ये 27 मे 2014 रोजी प्रकाशित झालेला लेख.)

    राजनीतीची वक्रगती पाहा – घटना समिती आणि  काँग्रेस कार्यकारिणी अशा दोन्हीही ठिकाणी अनुच्छेद 370चा मसुदा स्पष्टपणे नाकरण्यात आला होता. नेहरूंनी त्यानंतर अत्यंत हुशारीने हे अनुच्छेद मान्य करवून घेण्याची जबाबदारी त्या अनुच्छेदाचे प्रखर विरोधक असलेल्या सरदार पटेलांवरच सोपवली. आणि पटेलांनाही नाइलाजाने ती पार पाडावी लागली. 24 जुलै 1952 रोजी, ज्या वेळी सरदार पटेल हयात नव्हते, त्या वेळी नेहरूंनी संसदेत भाषण करताना ”सरदार पटेलच ह्या अनुच्छेदाबद्दल एकहाती सारे र्निणय घेत होते” असे धडधडीत असत्य व पराकोटीच्या कृतघ्नपणाचे विधान केले होते. त्या वेळी या विधानावर बरीच टीकाही झाली होती. किंबहुना गोपालस्वामी अय्यंगारासारख्या, नेहरूंच्या जवळचे समजल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यालाही ही बाब अजिबात पसंत पडली नव्हती.

    मुळात अनुच्छेद 370चा घटनेत समावेश हा ‘तात्पुरत्या’ स्वरूपाचा होता. आणि  म्हणूनच घटनेच्या ‘भाग 21′मध्ये त्याचा समावेश करण्यात आलाय. परंतु आरक्षणाची तरतूदही तात्पुरती असावी, असे स्वत: डॉ. आंबेडकरांचेही मत होतेच की! काय झाले त्याचे? जसे त्या विषयावर राजकीय डावपेच खेळले गेले आणि  मुळात एका अतिशय उदात्त हेतूने निर्मिलेल्या संकल्पनेचा खेळखंडोबा झाला, तीच या अनुच्छेद 370चीही अवस्था झाली आहे. आज ना भारत सरकारचे कायदे काश्मीरला लागू होऊ शकतात, ना काश्मीरमध्ये आधीच अस्तित्वात असलेले नागरिकत्व, जमिनीची खरेदी-विक्री इ. संदर्भातले कायदे रद्द होऊ शकतात. त्यामुळे ना कुणी भारतीय माणूस काश्मीरचा नागरिक होऊ शकतो, ना तिथे जमीनजुमला घेऊ शकतो. एवढेच कशाला, याच अनुच्छेद 370ची कृपा अशी की, भारत देश – सार्वभौम भारतीय गणराज्य, काश्मीरच्या राज्य सरकारच्या मान्यतेशिवाय कितीही गरज पडली तरीही अंतर्गत सुरक्षेच्या कारणास्तव वा आर्थिक मुद्दयावर काश्मीरमध्ये कदापिही अणीबाणी घोषित करू शकत नाही, आता बोला! आणि  याहून धक्कादायक बाब अशी की, संपूर्ण भारतात काश्मीर हे असे एकमेव राज्य आहे, ज्याची स्वत:ची स्वतंत्र घटना आहे! भारतात अंदमान-निकोबार, हिमाचल प्रदेश आदी अनेक राज्यांना विशेष दर्जा देण्यात आलाय, परंतु काश्मीरसारखी स्वायत्ततेची खैरात अन्य कोणत्याच राज्यावर करण्यात आलेली नाही! हे सारे केवळ चीड आणणारेच नव्हे, तर फुटीरतेला उत्तेजन देणारेही आहे. बरे, काश्मीर भारताचा घटक बनून राहावा यासाठी ही स्वायत्तता दिली असे म्हणावे, तर ही किंमत खूपच जास्त होते आहे. तुमच्या हाताचा अंगठा तुटला, तर तुम्ही काय कराल? एखाद्या निष्णात शल्यकर्मीकडून तो बसवून घ्याल ना? तरच तो अंगठा तुमच्या हाताचा अविभाज्य घटक म्हणून राहील! मात्र तुम्ही जर तो अंगठा केवळ फेव्हिकॉलने हाताला चिकटवून ठेवलात तर? ना तो अंगठा पुन्हा हाताशी जुळू शकेल, ना निघू शकेल, ना त्याला हातातून रक्तपुरवठा होईल, ना तो वस्तू पकडून हाताला मदत करू शकेल. तो स्वत: तर सडलेल्या अवस्थेत राहीलच, परंतु त्याच्या रोगटपणामुळे उर्वरित हातालाही कायमच त्रास होत राहील! पटेलांचे ऐकून जर काश्मीरवर एकदाच सैनिकी कारवाई झाली असती, तर ते एकदाच होऊन गेलेले शल्यकर्म ठरले असते. याउलट सध्या जी अवस्था आहे, ती अंगठा फेव्हिकॉलने चिकटवण्यापलीकडे अन्य काहीच नाहीये. बरे, यातून काश्मीर प्रश्न सुटण्याऐवजी मुळात चिघळलाच आहे. शिवाय गेल्या 60-65 वर्षांत मुळातच मुस्लीम बहुसंख्या असलेल्या काश्मीरमधील अनेक गटांना मुस्लीम राष्ट्र असलेले पाकिस्तान जवळचे वाटू लागलेय, हे वेगळेच. आणि याउप्पर काश्मीरमधील हिंदू पंडितांनी सहन केलेल्या व सहन करत असलेल्या अत्याचारांना तर सीमाच नाही. गोष्टी भलेही वेगवेगळया असतील, परंतु साऱ्यांचे मूळ एकच आहे, व ते म्हणजे अनुच्छेद 370!

    अर्थात हे अनुच्छेद 370 रद्द केले म्हणजे काश्मिरात एका रात्रीत सारे आलबेल होईल, असे मुळीच नाही. त्यासाठी काश्मिरी जनतेच्या मनात विश्वासच निर्माण करावा लागणार आहे. शांतपणे आणि  कठोरपणेच हे शल्यकर्म करावे लागणार आहे. त्यासाठी आवश्यकता आहे ती मनमोकळया चर्चेची. त्या चर्चेसाठी आवश्यक असणारे मोकळे आणि समसमान वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने अनुच्छेद 370 रद्द करणे हे अतिशय सकारात्मक पाऊल ठरेल. हो, आता यास काही साचलेली डबकी नक्कीच विरोध करतील; परंतु कोणताही बदल आणि  त्यातही सकारात्मक बदल हा स्वीकारायला कठीणच असतो. मात्र हेही तितकेच खरे की रात्रीच्या स्थितीत बदल घडला, तरच नवी पहाट दिसू शकते. होय ना?

    – विक्रम श्रीराम एडके.
    (लेखक इतिहासतज्ञ आणि वक्ते आहेत.)
    (मूळ लेखाची लिंक: http://magazine.evivek.com/?p=5921)

    image

  • आधुनिक महाभारताचे उपाख्यान

    आधुनिक महाभारताचे उपाख्यान

    महाभारतातली घटना आहे. कर्णाने आपली कवचकुंडले गमावून इंद्राकडून अमोघ अशी ‘वासवी शक्ती’ मिळवली होती. हेतू एकच – अर्जुनाचा वध! परंतू श्रीकृष्ण अतिशय धूर्त राजकारणी होता. त्याने युद्ध ऐन भरात असतानाच भीमपुत्र घटोत्कचाला मैदानात उतरवले. घटोत्कच हा तर मायावी राक्षस. त्यातून साक्षात भीमाचा मुलगा! त्यामुळे त्याच्या अतुल्य पराक्रमाची केवळ कल्पनाच केलेली बरी. असा हा घटोत्कच इतक्या वेगाने कौरवांचा विनाश करत सुटला की, जणू एकाच दिवसात संपूर्ण कौरवसेना संपवून टाकेल! ही परिस्थिती पाहून दुर्योधन घाबरला. त्याने घटोत्कचाला रोखण्यासाठी आपली वासवी शक्ती वापरण्याची कर्णाला विनंती केली. कर्ण पेचात पडला! शक्ती तर खास अर्जुनासाठी राखून ठेवलेली. ती कशी वापरायची? आणि दुसरीकडे ज्याने आपल्याला माणसात आणलं, मान-मरातब दिला तो आपला जीवश्चकंठश्च मित्र संकटात सापडलेला. दुर्योधन कर्णाला म्हणाला की, ‘अरे बाबा, आपण सारे आत्ताच वाचू शकलो नाही तर अर्जुनाला काय मारणार? त्यापेक्षा तू आत्ता तुझी शक्ती वापरून घटोत्कचाला मार, आपल्या सगळ्यांचा जीव वाचव. अर्जुनाला कसं मारायचं ते आपण जीव वाचल्यावर बघू’! कर्णाला हे म्हणणं पटलंच असं नाही, परंतू मित्रासाठी त्याने ते मानलं! आपल्या दिव्य कवचकुंडलांची किंमत देऊन मिळवलेली ती अमोघ वासवी शक्ती त्याने अर्जुनासाठी न वापरता घटोत्कचासाठी वापरली आणि त्याचा वध केला! समस्त कौरवसेनेत एकच जल्लोष सुरू झाला. विजयाचा जल्लोष! प्राण वाचल्याचा जल्लोष!! सारेच आनंदी होते. फक्त एकटा कर्ण सोडून. कारण या तात्कालिक विजयातच उद्याच्या अंतिम पराभवाची बीजे दडली असल्याची जाणीव होती त्याला!

    ही तर झाली ऐतिहासिक कथा (महाभारत इतिहासग्रंथ आहे, पुराण नव्हे!). आता तुम्ही म्हणाल की, ही कथा तर आम्हाला माहिती आहे किंवा या कथेचा आज काय संबंध? तर संबंध आहे. कसा, ते सांगतो!

    ही कथा आठवण्याचे कारण असे की, आजही याच कथेची पुनरावृत्ती घडताना दिसतेय. संपूर्ण पुनरावृत्ती जरी अजून झालेली नसली, तर घटनाक्रम त्याच मार्गाने चाललाय. म्हणूनच ही कथा आज महत्वाची वाटतेय. आजच्या या कथेत ‘कर्ण’ आहेत, मनसेचे अध्यक्ष मा. श्री. ‘राज ठाकरे’ – जरासे दुर्लक्षित, जरासे सापत्न, अकारणच स्वत:ला अन्यायग्रस्त समजणारे – बरोब्बर कर्णासारखे! त्यांची ‘कवचकुंडले’ होती ‘ठाकरे नावाची पुण्याई आणि त्यांचा करिश्मा’. ‘इंद्र’ म्हणजे स्वत: ‘मा. शिवसेनाप्रमुख स्व. श्री. बाळासाहेब ठाकरे’. ‘भीम’ आहे ‘मनसेबद्दल सुरुवातीचा काही काळ वाटत असलेल्या अपेक्षा’ आणि ‘भीमपुत्र घटोत्कच’ आहे ‘त्या अपेक्षांचा भंग झाल्यामुळे मनसेबद्दल निर्माण झालेले अविश्वासाचे वातावरण’. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की, या घटोत्कचाचा लोकसभा निवडणुकीशी संबंध आहेच, परंतू तो पूर्णार्थाने नाही. हा घटोत्कच आधीपासूनच अस्तित्वात आला होता. लोकसभेने त्याला केवळ आणखी शक्तीशाली करायचे काम केलेय एवढेच! या कोटीक्रमाने पाहायला गेले, तर संपूर्ण देशभर प्रादेशिक पक्षांची दुकानदारी बंद करणारे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आपोआपच श्रीकृष्ण ठरतात! तर असा हा घटोत्कच कर्णाच्या पक्षाला संपवण्यात काहीच कसूर करणार नाही, हे तर उघडच आहे. म्हणून वापरलीये ती एकमेवाद्वितीय असलेली वासवी शक्ती – ‘निवडणुका लढवण्याचा निर्णय’. वासवी शक्ती अमोघ तर खरीच. परंतू तिच्यात एक दोषही आहे. या शक्तीच्या वापरामुळे सध्या तितक्याश्या परिपूर्ण स्थानावर नसलेले शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. ‘उद्धव ठाकरे’ आपोआपच (बाय-डिफॉल्ट!) ‘अर्जुन’ ठरतायत! यात त्यांचे कर्तृत्व फारसे नसून राज ठाकरेंची वैयक्तिक हल्ले करण्याची खेळीच यास कारणीभूत आहे! त्यामुळे या शक्तीप्रयोगाचा कर्णाला फायदा होईल की नाही यापेक्षाही त्याचा परिणाम असा झालाय की, आपोआपच अर्जुन कोण ते समजलेय, आणि डाव न खेळताही आपोआपच उद्धव ठाकरेंच्या पारड्यात एक गुण जमा झालाय!

    आता कथा इथवर आलीच आहे, तर ती पुढे काय अंगाने जाणार हे सांगायला काही कुणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही. अर्थात या कथेत दुर्योधन कोण हे ठरविण्याचे काम मी सूज्ञ वाचकांवर सोपवतो. ते तुम्ही आपापल्या वकूबाप्रमाणे करालच याची खात्री आहे! मला रस वाटतोय तो दुसऱ्याच प्रश्नात. घटोत्कचावर अमोघ वासवी शक्ती वापरून आपण तात्पुरता आपल्या कौरव ‘पक्षाचा जीव जरी वाचविलेला असला’ आणि ‘आपल्या पक्षात तात्कालिक उत्साह’ जरी निर्माण केलेला असला, तरीही यात अंतिम पराभवाचीच बीजे लपलेली आहेत, याची महाभारतातल्या कर्णाला कुठेतरी जाणीव होती. आपल्या आधुनिक कर्णालाही ती जाणीव असेल का? देवच जाणे! तूर्तास तरी पात्रयोजना परिपूर्ण झालीये, एवढं नक्की!

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

  • एक डाव चाणक्याचा..!

    एक डाव चाणक्याचा..!

    image

    जातीच्याच अनुषंगाने बोलायचं झालं, तर नरेंद्र मोदी मागासवर्गीय आहेत. ही गोष्ट मला खूप पूर्वीपासून माहिती होती. कदाचित आपल्यापैकीही बहुतेकांना माहिती असेल. परंतू स्वतः मोदींनी या बाबीचा कधीही जाहीरपणे उल्लेख केला नव्हता. मला गंमत वाटायची. या अनुल्लेखामागची खेळीही लक्षात यायची. ते वाट पाहात होते की, कधी आपल्या या मौनामुळे अस्वस्थ होऊन विरोधक स्वत:च ही बाब चर्चेत आणतील. परवा काँग्रेसच्या बैठकीत मोदींना या बाबतीत लहानसे सूत सापडले, आणि मोदींमधील कसलेल्या राजकारण्याने ते सूत घट्ट पकडत थेट स्वर्ग गाठला.

    परिणाम? आज भाजपच्या बैठकीमध्ये इतक्या वर्षांत पहिल्यांदाच मोदींनी स्वत:च्या मागासवर्गीय असल्याचा उल्लेख केला आणि मोठ्या खुबीने दाखवून दिलं की, ‘मी मागासवर्गीय आहे, खालच्या जातीतून आलोय म्हणून हे सत्तेच्या मदाने उन्मत्त राजघराणे माझ्याशी लढायला पुढे येत नाहीत – कमीपणा समजतात”!

    मेंदूला अक्षरशः झिणझिण्या आल्या माझ्या! वाटलं, काय पोहोचलेला माणूस असेल हा की, विरोधकांनी चेंडू टाकण्याची सुतराम शक्यता नसताना त्यांना चेंडू टाकायला लावून, नव्हे नव्हे, तर आपल्याला पाहिजे तसाच आणि त्याच ठिकाणी टाकायला लावून या माणसाने खाड्कन षटकार ठोकला! ‘आम्ही मोदींना किंमत देत नाही’ हा जो काही आटापिटा विरोधकांनी गेले काही दिवस चालवलाय त्याचा मोदी असा अन्वयार्थ लावतील, एवढेच नव्हे तर तो जाहीरपणे मांडतील हे ना कुणा काँग्रेसी नेत्याच्या स्वप्नात आलं असेल ना पाचशे कोटी घेऊन पप्पूची आश्वासक छवी बनवायला निघालेल्या त्या पीआर कंपनीच्या! बरं, बोलायची सोय नाही – कारण स्वत:ला किती जरी धर्मनिरपेक्ष म्हणवलं तरीही या पाखंडी पक्षांचं राजकारण जाती आणि धर्माच्याच गणितांवर चालतं, हे उघड गुपित आहे. त्यामुळे आज मोदींनी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्यावर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यापलिकडे त्यांच्या हातात काहीच राहाणार नाही – कारण, बोललो तर पुन्हा ‘ती’ मागासवर्गीय मतं जाण्याची भीती. दलित राजकारण करणाऱ्या पक्षांना मोदी अजिबातच मोजत नसले, तरी त्या ही पक्षांना मोदींच्या या विधानाचा फटका हमखास बसणार!

    मुळात भारतीय जनमानसाने ‘जात’ किती जरी नाही म्हटलं तरी खोलवर कुठेतरी जपून ठेवलीये. प्रत्येकाच्या मनात आत कुठे ना कुठे ही जातीय अस्मिता तेवत असतेच. मोदींनी ही मानसिकता अश्या काही कौशल्याने वापरून घेतलीये की, मोदी कुणालाही थेटपणे जातीयवादी तर वाटणार नाहीतच, परंतू विरोधकांना मागासवर्गीय मतांचा फटका मात्र बरोब्बर बसेल!

    मी मोदींची तुलना कायम रजनीकांतशी करतो. रजनीला जसे सिनेमाच्या पडद्यावर काहीच अशक्य नसते, तद्वतच मोदींना भारतीय राजकारणात काहीच अशक्य नाही. दोन्हीचे कारण एकच – भारतीय जनमानसाची नाडी माहिती असणे! हा सूक्ष्म अभ्यास आपोआपच अचूक टायमिंग पुरवतो. मात्र आज मला मोदींची तुलना आचार्य चाणक्यांशी करावीशी वाटतेय. चाणक्यांनी जो शत्रूची बलस्थानेच शत्रूविरुद्ध वापरण्याचा आणि आपली मर्मस्थानेच बलस्थानात परिवर्तित करण्याचा जो मंत्र दिला, त्याचे तंतोतंत अनुसरण मोदी करत आहेत – किंबहूना त्या मंत्रात सुधारणा करून ते हाती येईल ती प्रत्येक गोष्ट विरोधकांविरुद्ध वापरताहेत! हे अतिशय विजिगीषू लक्षण आहे. हे भारतीय समाजाला मनापासून आवडणाऱ्या ‘अचाट शक्तीचा महानायक’ या संकल्पनेचे लक्षण आहे! असा महानायक जो बोजड तांत्रिक गोष्टी सांगत बसत नाही, तर सर्वसामान्यांना समजतील अशी स्वप्ने दाखवतो – त्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला शिकवतो आणि एका क्षणानंतर तर ते स्वप्न आपलं स्वत:चंच आहे यावरही गाढ विश्वास बसवतो! कल्पना करा, जो माणूस एकहाती सव्वाशे वर्ष जुन्या संघटनेला धूळ चारू शकतो, तो माणूस जर उद्या देशाचा पंतप्रधान झाला तर देशाच्या शत्रूंची काय अवस्था करेल!! या कल्पनेतच “वोट फॉर इण्डिया”ची बीजे सामावलेली आहेत. आणि माझी खात्री आहे की, येत्या निवडणुकीत प्रत्येक तरुण मतदार याच कल्पनेला उराशी बाळगून मतदान करणार आहे. मोदींसाठी नव्हे, तर त्यांच्या आणि स्वत:च्या स्वप्नातल्या भारतासाठी!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्याने ऐकण्यासाठी क्लिक करा – www.vikramedke.com)

  • ..तर मज बालबुद्धीला जाणवणारा खेळ हा असा आहे!

    ..तर मज बालबुद्धीला जाणवणारा खेळ हा असा आहे!

    तर मज बालबुद्धीला जाणवणारा खेळ असा आहे की.. मायला.. त्या धर्मांध मोदींनी सगळीकडेच दणका उडवून दिलाय. सोशल मिडिया तर सोशल मिडिया, पण वास्तवातही ते लक्षावधीच्या सभा खेचताहेत. बरं तर बरं.. ज्या कोणत्या निवडणुकीत हात घालतात तिथे विजयश्रीच खेचून आणतात (नुसतंच जिंकणं सोप्पं असतं हो, पण हारके जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं – जय राऊलबाबा!!). आणि यावर कडी म्हणून ती दुष्ट दुष्ट दुष्टातिदुष्ट न्यायालये.. खटाखट एकेका केसमधून मोदींना क्लिनचिट देत सुटलीयेत. वर त्या साध्वी आणि असीमानंदांनाही सोडणारेत अशी चर्चा चालूये! अरेरे.. अश्याने देशात धर्मनिरपेक्षता कशी उरेल? काल सन्माननीय आणि स्वत:ची मते गेली १० वर्षे निडरपणे मांडणारे (!) बोलके बाहुले शेवटी म्हणालेच ना की बाबा, मोदी पंतप्रधान झाले तर ते देशाला घातक ठरेल (त्यांना बहुधा ‘देशाला’च्या आधी ‘पाकिस्तान’ हा शब्द टाकायचा असावा. पण काय करणार बोलण्याची संधी कधी नव्हे ती मिळाली की गडबडायला व्हायचंच!)!!

    तर.. हे असेच चालू राहिले तर देशात धर्मनिरपेक्षता कशी उरेल? अरेरे.. मग काय करायचं? नेहमीचे यशस्वी कलाकार तर हा नरेंद्रासुर बघता बघता खाऊन टाकतोय. मतिमंद युवराजाला तर कच्चं खाल्लंय त्याने अक्षरश:! याला रोखायचं कसं?

    मग असं करुयात. या मोदीची मुख्य ताकद कोणतीये सध्या – तर काँग्रेसविरोध (आठवा घोषणा – काँग्रेसमुक्त भारत!)! मग काय करुयात – तर या भोळ्याभाबड्या (आणि आम्हाला २ टर्म मते देण्याचा इनोसंऽऽटपणा करणाऱ्या) जनतेसमोर एक नवा काँग्रेसविरोधी नायक आणू! Here comes the sizzling Kejriwal!! या बाबामागे पुरेसा भक्तपरिवार जमला की, त्याला ‘काँग्रेस नको – भाजप नको’ करत दिल्लीच्या निवडणुकीत उतरवायचे. मुळात तर तो ‘आप’लाच!! द्या त्याला पाठिंबा. करा दिल्लीवर अंत:स्थ राज्य! (अंत:स्थ म्हणजे छुपेपणाने बरं का – संस्कृत शब्द! मृतभाषेतला! You know English is so cool! Say – “Atleast he is doing something man!!” पण आपल्याला भ्रष्ट म्हणून सत्तेवर आल्यावर तो आपली चौकशी नाही का करणार? छे छे.. शांतं पापम्! अहो ‘आप’ला माणूस असं कसं करेल? उलट तो निवडणुकीतला सगळा काँग्रेसविरोधी प्रचार विसरून शहाजोगपणे विपक्षालाच म्हणणार – द्या पुरावे तरच करतो चौकशी!

    मग? मग मस्तपैकी फ्राय करके खानेका!! म्हणजे त्याचा ‘नायक’मधला अनिल कपूर करायचा – इमेज बनवायची इमेज. नाहीतरी ‘रॉकस्टार’मध्ये धिंग्रासाहेबांनी (पक्षी:  पियुष मिश्रा) म्हणून ठेवलेच आहे – Everything is image, image is everything!! कोण करणार हे? अहो कोण काय विचारता? इतकी वर्षे हाडकं टाकून पेड-मिडिया कश्याला पोसलीये? होऊ द्या खर्च!!
    आणि मग हळूच पिल्लू सोडायचे – केजरीवाल रोखणार का मोदींचा विजयरथ? चर्चा तर होणारच!! होऊ द्या चर्चा! ब्रेनवॉश करून टाकायचा सगळ्यांचा पार! विशेषतः सगळ्या Cool-Dudes चा!!

    मग हळूहळू उतरवायचे त्याला लोकसभेच्या रिंगणात! आणि भक्तजनांना एका गुरुमंत्राची दीक्षा द्यायची – Atleast he is doing something man!! हा मंत्र जपायचा एक खास विधी आहे बरं! यात फक्त पोकळ शब्दांकडेच लक्ष द्यायचं असतं. काश्मीरप्रश्नापासून ते लोकतंत्राचे नियम पाळण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. तरच मंत्र फळतो. नाहीतर लाभत नाही आज्याबाऽत!

    मग एकदा या ‘नायक’बाबाला लोकसभेत उतरवले, यंत्रणा कामाला लावून व्यवस्थित प्रोजेक्ट केले – निवडूनही आणले की, दाखवायचे एक गाजर – ‘स्वच्छ प्रतिमेचा धर्मनिरपेक्ष पंतप्रधान’. की भुललीच ‘मेणबत्तीमोर्चा’छाप मंडळी! (That Modi is horrible.. A mass-murderer you know..)! आणि असा पंतप्रधान स्वबळावर तर होऊच शकत नाही. मग काय! राबवा ‘दिल्ली पॅटर्न’. द्या पाठिंबा. मग अखेरिस २०१४ साली सत्ता कुणाची? तर पुन्हा आमचीच! मग पुन्हा पाच वर्षं जनतेला ठेंगा दाखवत म्हणायचं – हम AAP के हैं CON!! द्या टाळी!!

    आता हे सगळं असंच असेल असं काही नाही! कदाचित असं नसेलही. नसावंच. पण..! पण, तूर्तास तरी मज बालबुद्धीला जाणवणारा खेळ हा असा आहे!!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्याने ऐकण्यासाठी क्लिक करा – www.vikramedke.com)
    image

  • ..सत्यधर्माय दृष्टये!!

    ..सत्यधर्माय दृष्टये!!

    मोहनदास गांधी अत्यंत साधेपणाने राहायचे. उदा. – रेल्वेच्या तिसऱ्या वर्गातून प्रवास करणे, शेळीचे दूध पिणे, साध्या आसनावर बसणे वगैरे.. मात्र असे म्हटले जाते की – गांधींना देशात कुठेही रेल्वेप्रवास मोफत असायचा. ज्या रेल्वेतून त्यांना प्रवास करायचा असेल, त्या रेल्वेचा तिसऱ्या वर्गाचा एक डबा आसने काढून रिकामा केला जाई, तिथे साधी आसने टाकली जात. जरी तिसऱ्या वर्गाचा डबा असला, तरीही कार्यकर्ते सबंध डबा ताब्यात घेत – त्याअर्थी डबा ‘खाजगी’ होऊन जाई! तिथेच एका कोपऱ्यात गांधींची शेळी ठेवत. तिचीही चारा-पाण्याची व्यवस्था केली जाई. यात खरं-खोटं देवच जाणे. पण असं म्हणतात की, या सगळ्या संदर्भात सरोजिनी नायडू एकदा म्हणाल्या होत्या – “बापूंना गरीब आणि साधे ठेवणे हेच एक अतिशय ‘खर्चिक’ काम आहे”!

    आज रामलीला मैदानाकडे जाताना अरविंद केजरीवालही सार्वजनिक वाहतुकीच्या बसने गेले. मात्र ज्यांनी टिव्हीवर त्यावेळची मुलाखत पाहिली असेल त्यांना एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असणार की, ती सबंध बस “आआप”च्या कार्यकर्त्यांनी भरून गेली होती! थोडक्यात जरी सार्वजनिक वाहतूकीचे साधन असले तरीही त्याचा वापर “आआप”च्या खाजगी मालकीच्या वाहनासारखाच झाला. शपथग्रहणानंतर तर सचिवालयाकडे गाड्यांच्या ताफ्यातूनच गेले ना? सुरक्षाव्यवस्थाही होतीच की त्यावेळी! मग हे साधेपणाचे ढोंग कश्यासाठी? ‘मला सुरक्षा नको’ म्हणण्याची दांभिकता कश्यासाठी? मनात जे आहे तेच कृतीत दिसले तरच त्याला प्रामाणिकपणा म्हणतात ना? इथे तर गेले काही दिवस अरविंद केजरीवाल नुसते साधेपणाने राहाताहेत एवढेच नव्हे तर त्या साधेपणाची छायाचित्रे कशी प्रसिद्ध होतील याचीही (स्वत: केजरीवालकडून म्हणा वा ‘आआप’च्या कार्यकर्त्यांकडून म्हणा वा माध्यमांकडून) काळजी घेतली जात आहे.

    तुम्ही शाहरुख खानला अभिनय करताना पाहिलंय कधी? त्याची देहबोली नीट निरखून पाहा. तो विनाकारण एखादा अवयव तरी हलवेल वा विनाकारणच बोलण्यात कंप तरी आणेल; जेणेकरून लोकांचं लक्ष सतत वेधलं जाईल. हे असुरक्षिततेचं लक्षण आहे. ‘उद्या प्रसिद्धीचा झोत माझ्यापासून लांब सरकला तर काय?’ – ही ती असुरक्षितता! केजरीवालना का प्रत्येकवेळी वेगवेगळी घोषवाक्ये लिहिलेल्या टोप्या सातत्याने घालाव्या लागतात? गेले काही दिवस सतत खोकला का बरं येतोय? एकतर हा स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न आहे; किंवा जर त्यांना खरोखर इतका काळ टिकणारा खोकला झाला असेल, तर त्यांनी एकदा एखाद्या चांगल्या डॉक्टरला तरी दाखवून घ्यावे (भले डॉ. कुमार विश्वासना दाखवा, पण दाखवा!)! २१ दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला टिकला तर ‘टिबी’ असू शकतो म्हणे! तेव्हा उगाच सार्वजनिक ठिकाणी खोकून..! असो! शिवाय सतत आजारी, एरंडेल प्यायल्यासारखा चेहरा ठेवणे हे मुख्यमंत्र्याला तर शोभणारे नाहीच, परंतू ते ‘आम आदमी’चेही लक्षण नव्हे! ‘आम आदमी’ असा असतो का? ‘आम आदमी’ तर तो असेल, ज्याला आज त्या बसची खूप गरज होती, पण ती ‘आम’ मुख्यमंत्र्यांनी नेल्यामुळे त्याला नाहक टॅक्सीचा भुर्दंड पडला..! आणि देहबोलीचाच संदर्भ घेऊन बोलायला गेलं तर खरं सामर्थ्य आणि खरा साधेपणा माणसाला आतून शांत करणारा असतो. कधी पाहिलंय मनोहर पर्रिकरांना लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न करताना? साधेपणाचं भांडवल करताना? माणिक सरकारांना असे कोणते प्रकार करताना? नाहीच! आणि कधी पाहाणारही नाही तुम्ही! कारण एकदा भांडवल झालं की, तो साधेपणा, साधेपणा न राहाता ‘दांभिकता’ होऊन बसते!

    बाकी रामलीला मैदानातला सोहळा आणि त्यावेळचं भाषण याबद्दल मी काहीच टिप्पणी करणार नाही. रामलीला मैदान प्राचीन काळापासूनच नाटकं करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मैदानात उतरलं म्हटल्यावर मैदानाचा गुण तर लागणारच, नाही का!!

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी क्लिक करा — www.vikramedke.com)

    image