Category: Politics

  • Prisoner Of Subtlety — Joker

    Give a man some tragedy and you can make a hero out of him, but give him more and you might end up making a villain you never wished for. Todd Phillips’ “Joker” can be summed up in these two lines. The fact that this theme has played in a number of artistic expressions over several times gets diluted by the performances it commands. Though marketed as a psychological thriller, the tale is more of a psychological study that delves into the mind of Batman’s most celebrated antagonist ever.

    Arthur Fleck (Phoenix) is a struggling stand-up comedian. His struggle is more personal than professional. He has dreams, wishes and feelings like every other person, but he is ridden by many psychological conditions that hinder both his professional and personal lives. The whole city of Gotham is slowly sinking into the chaos and so do the conscience of its residents. People are sharply divided into wealthy and poor classes, there is no middle ground. Those who are wealthy, don’t care and for others, poverty has taken a toll on their sensibilities. Arthur’s world torns apart between these outer and inner conflicts. In fact both the situations affect each other and he slithers down the path of darkness.

    Joaquin Phoenix has given everything for the role, physically and mentally. He is in almost every other scene and still you don’t get tired of him, not even for a single moment. He is sheer magic. His eyes illuminate with anger and at the same time darken with melancholy. His body emotes even the smallest nuances of the character. He laughs when he cries and cries as he laughs. You can see his each and every mental condition through the language of his terribly skinny body. The way he walks, the way he talks, the way he moves a muscle, everything adds up something to the character and its story. In this universe, Joker isn’t insane or lunatic. He just sees, feels and experiences the world differently, in a way that can only be understood to him. Phoenix has immersed himself into this psyche of Joker so literally that you start to worry for the actor’s wellbeing. And for some strange resemblance, I saw Akshaye Khanna in his place too many times. I really wish Khanna should get such a role at least once in his lifetime to show the world what he is capable of. But that’s beside the point.

    Every tale comes with its flaws. Joker takes too much time to set the premise, almost to the half of the second act. Though Phoenix holds the reins firmly, the writing doesn’t support him in some of those parts. Joker starts in an alley and ends symbollically in another. But the road in between gets bumpy sometimes. Their core theme has been played out so many times in movies and fiction that there’s almost nothing novel remained to do in it. This makes the first half somewhat unfocused, disoriented, almost to the point that some of Arthur’s conditions start looking like mere tools to fill in the blanks. Comedy is always been a way to make political statements and given the times we live in, Joker too does this in its own tragicomic way. But when it comes to owning those statements, it shys away. The class division seems forced. Characters like Thomas Wayne (Brett Cullen) are reduced to mere caricatures and their speeches nonsensical to create a forced conflict the movie wants. The film is in too much hangover (pun intended) of Scorcese’s “Taxi Driver” (1976) and though at first it seems an artsy homage to the classic with Robert De Niro himself on board, many a times it works against the film. The twist in the tale at the end of the second act, though predictable and adds up to the hesitance of owning the narrative, is beautifully unfolded.

    In the climactic moments when Joker spreads his wings to the fullest, many things were happening around. Some lives are taken, some characters change forever, those who are responsible for the tragedy cheer up for the outcome. And I wondered, was the posing Joker sensing all this in that moment? Does he have a faintest of the inkling of the butterfly effect caused on and due to his existence, that built up this very moment? These are those subtle moments, one cannot answer for real. Joker, though a good movie, is a prisoner of those moments!

    PS: I might sound foolish to see Akshaye Khanna in Joaquin Phoenix, my wish that he should get to showcase his potential in such a role, might sound even insane. But you know, insanity is just a form of sanity not everyone understands!

    *4/5

    — © Vikram Edke
    [For more articles visit www.vikramedke.com]

  • दोन भेटी

    बाजीराव ८ ऑक्टोबर १७३५ ला (Bajirao I – An Outstanding Cavalry General. Author Col. R. D. Palsokar. Pp 183) उदयपूरकडे निघाले. त्यांच्यासोबत सुमारे ८ ते १० सहस्र सैन्य होते. त्याशिवाय इतर मराठी फौजा मेवाड ते बुंदेलखंडदरम्यान (Palsokar. Pp 183) पसरलेल्या होत्या. जानेवारी १७३६ च्या अखेरीस त्यांनी तापी ओलांडली (Selections of Peshwa Daftar. Author G. S. Sardesai. Vol. 14.42 quoted at The Era of Bajirao. Author Uday S. Kulkarni. Pp 205). पुढे उदय कुलकर्णी (Pp 206-07) वंशभास्करच्या (Vol. 6) हवाल्याने एक घटना देतात. अशीच घटना ई. जयवंत पॉल (Bajirao The Warrior Peshwa. Pp 145) सर जदुनाथ सरकारांच्या हवाल्याने देतात.

    घडले असे की, महाराणा जगतसिंहांनी (दुसरा) पेशव्यांचे ५ सहस्र रुपये नजराणा, मानाची वस्त्रे, घोडे आणि एक हत्ती देऊन यथोचित स्वागत केले. दुसऱ्या दिवशी त्यांना राजदरबारात सन्मानपूर्वक बोलावण्यात आले. तिथे त्यांच्या स्वागतासाठी स्वतः महाराणा सामोरे आले. दरबारात दोन आसने ठेवली होती. एक बाजीरावांसाठी आणि दुसरे साक्षात महाराणांसाठी. बाजीराव पुढे चालत गेले आणि आसनावर न बसता खाली जमिनीवर बसले. एवढेच नव्हे, तर तेथीलच एक चामर घेऊन ते महाराणांना वारासुद्धा घालू लागले. महाराणा अर्थातच भांबावून गेले. ते म्हणाले (Sardesai. E. Jaiwant Paul), “तुम्ही ब्राह्मण आहात, मी तुमची सेवा करायला हवी”. त्यावर बाजीरावांनी त्यांना उत्तर दिले की, “मी इथे फक्त तुम्हालाच राजा मानतो कारण तुमच्या पदरी १६ उमराव आहेत”!

    काही दिवसांनी बाजीरावांनी जयपूरला प्रस्थान केले. तिथे त्यांची सवाई जयसिंहांशी भेट झाली. या ही भेटीबद्दल “वंशभास्कर”च्याच हवाल्याने कुलकर्णी (Pp 208, 209) लिहितात. सवाई जयसिंहांनी जगतसिंहांच्या इतकाच सन्मान बाजीरावांनी मलाही द्यावा अशी मागणी केली. बाजीरावांनी त्यांना ताबडतोब उत्तर दिले, “(स्वैर अनुवाद)उदयपूरच्या महाराण्यांनी कधीच मुघलांची सत्ता मानली नाही, त्या संदर्भाने मी त्यांना आमच्या छत्रपतींसारखेच मानतो. तुम्ही लोक मात्र यवनांच्या चाकरीतच धन्यता मानत आलात. त्यामुळे तुम्ही खरे तर मला कनिष्ठ. पण तरीही मी तुम्हाला बरोबरीचा दर्जा देतोय (गुह्यर्थ – मी त्यांच्याकडे बसलो तसा तुमच्याकडेही खाली बसेन अशी स्वप्नं पाहू नका!). आपण बरोबरीच्या आसनांवर बसू. मी उजवीकडे बसेन आणि तुम्ही डावीकडे बसा”! या भेटीत बाजीरावांनी हुक्क्याची मागणी केली आणि सवाई जयसिंहांना त्रास होत असूनही मुद्दामच त्यांच्या तोंडावर (Paul. Pp 146) धूर सोडत राहिले (Kulkarni. Pp 209. with reference from Vansh Bhaskar)! अशी वागणुक देण्यामागे सवाई जयसिंहांच्या पूर्वजांनी स्वराज्याला दिलेल्या त्रासाची आठवण बाजीरावांना असल्यास नवल नाही!

    गंमत अशी की, बाजीरावांनी एकीकडे महाराणा जगतसिंहांना सन्मान दिला आणि दुसरीकडे सवाई जयसिंहांना त्यांची जागा दाखवून दिली, यात बाजीरावांचे चातुर्य आणि माणसांना जोखण्याचा स्वभाव तर दिसतोच. परंतु बाजीरावांचे खरे कर्तृत्व यात दिसते की, बाजीरावांनी जशी सवाई जयसिंहांकडून चौथाई व इतर रक्कम वसूल केली (Palsokar. Pp 183) तशीच जगतसिंहांकडूनही रक्कम वसूल केली (तत्रोक्त)! किंबहूना दिल्ली दरबाराकडून इतर मागण्याही मान्य करून घेतल्या. थोडक्यात, भावनिकता आपल्या जागी आणि राजकारण आपल्या जागी! अर्थातच बाजीरावांच्या सगळ्याच मागण्या काही मान्य झाल्या नाहीत. त्याचीच परिणती पुढे दिल्लीवर धडक देण्यात (मार्च १७३७) आणि नंतर भोपाळमध्ये निज़ामाला मार देण्यात (डिसेंबर १७३७) झाली. कुलकर्णी (Pp 202) सरदेसाईंच्या हवाल्याने (Marathi Riyasat. Vol. 3. Pp 215) शाहूंचे एक वाक्य देतात त्यातच बाजीरावांचे महत्त्व आणि स्थान कळून येते. शाहू म्हणतात, “मला १ लाख सैन्य आणि बाजीराव यांच्यातून एक निवडायला सांगितले, तर मी बाजीरावांनाच निवडेन”!

    — © विक्रम श्रीराम एडके

    (बाजीरावांचे चरित्र व युद्धनीतीचे अभ्यासक आणि व्याख्याते. अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • नव्या भारताचा नवा चित्रपट : उरी – द सर्जिकल स्ट्राईक

    १८ सप्टेंबर २०१६ यादिवशी पाकिस्तानच्या चार आतंकवाद्यांनी काश्मिरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील आपल्या सैन्यतळावर हल्ला केला. आपण त्या चारही आतंकवाद्यांना नरकात धाडले परंतु हे होईपर्यंत आपले सुमारे एकोणावीस जवान हुतात्मा झाले होते तर सुमारे ऐंशी ते शंभर जखमी. युद्धाची दाहकता ही अशी असते आणि ती कधीच एकतर्फी शांतता राखून कमी होत नाही. आपण जर याचे काही उत्तर दिले नसते, तर उलट त्या अतिरेक्यांच्या मालकांची हिंमत अजूनच वाढली असती. आणि म्हणूनच भारत सरकारने आणि आपल्या भारतीय सैन्याने निर्णय घेतला सर्जिकल स्ट्राईक करण्याचा! शरीरावर शल्यकर्म करताना जसे फक्त त्या रोगग्रस्त भागापुरतेच केले जाते, तसाच हा हल्लादेखील सर्जिकल अर्थातच लक्ष्यांपुरता मर्यादित असतो. यात इतरांना लक्ष्य केलेले नसते. थोडक्यात कोलॅटरल डॅमेज शून्य ठेवण्याचा यात प्रयत्न असतो. नेमके हेच आपल्या सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात घुसून यशस्वीरित्या पार पाडले! ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ हा त्याच घटनांचे काल्पनिक रुपांतरण करतो.

    ‘उरी’ हा अतिशय रंगीत सिनेमा आहे. चित्रपटभर तुम्हाला वेगवेगळे रंग वापरलेले दिसतात. आजवर आपल्याकडे बनलेल्या युद्धपटांच्या तुलनेत हा अतिशय स्वागतार्ह बदल आहे. चित्रपटात खूप सारे खटकेबाज संवाद आहेत, पण चित्रपट त्यांच्यातही अडकून पडत नाही. उलट स्ट्राईक्सची थंड डोक्याने आखलेली योजना आणि तिची तितक्याच शिताफीने केलेली अंमलबजावणी यांच्यावर त्याचा जास्त भर आहे. याही चित्रपटात ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’सारख्याच खरोखरच्या राजकीय व प्रशासनिक व्यक्ती आहेत. त्यांची नावे चित्रपटात बदललेली असली, तरी त्या व्यक्ती प्रत्यक्षात कोण आहेत याबद्दल प्रेक्षकांना जराही संभ्रम निर्माण होत नाही. उलट ‘उरी’सोबतच प्रदर्शित झालेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’प्रमाणे यातील पात्रे या त्या त्या व्यक्तींच्या निव्वळ नकला वा अर्कचित्रे न वाटता जिवंत माणसे वाटतात, हे चित्रपटाचे मोठेच यश आहे. चित्रपट हा काही पातळ्यांवर प्रचंड भावनिक आहे. विशेषतः पूर्वार्धात. आणि तसा तो आहे म्हणूनच नंतर जे दाखवले गेलेय, त्याला एक तात्त्विक आधार प्राप्त होतो. तसं बघायला गेलं, तर चित्रपट पाहाण्यापूर्वीच आपल्याला त्याची सबंध कथा माहिती आहे. सुरुवात काय, शेवट काय; सारंच. इतकी सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट असूनही चित्रपट आपल्याला पूर्णवेळ खूर्चीच्या कडेवर बसवून श्वास वारंवार रोखायला लावतो, यासाठी लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धर आणि संपादक शिवकुमार पणिकर यांचे कौतुक करावे तितके थोडे! मोठी हुशारीने गुंफलेली पटकथा आणि जागोजागी वापरलेला नैसर्गिक विनोद, या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत तर शाश्वत सचदेव यांचे जबरदस्त पार्श्वसंगीत घटनांची खोली व चित्रपटाची उंची कैकपटींनी वाढवणारे आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रेक्षकांवर विश्वास टाकून त्यांना कमीत कमी स्पून फीडिंग करणारा ‘उरी’ एक अतिशय स्मार्ट चित्रपट आहे. त्याची फ्रेमिंग आणि टेकिंग दिग्दर्शकीयदृष्ट्या अतिशय विचारपूर्वक केलेली आहे. पण!

    पण म्हणून काही तो त्रुटी आणि दोषांपासून मुक्त आहे, असं अजिबात नाही. प्रचंड हुशारीने रचलेला चित्रपट शेवटाकडे जाताना किंचित फिल्मीपणाकडे झुकू लागतो. ‘शूट टू किल’ची जागा क्वचित ठिकाणी अनावश्यक मारामारी घेते. दोन मिनिटांत पोहोचतील अशी बातमी असलेले पोलिस सोयीस्करपणे उशिरा येतात. एवढ्या मोठ्या मिशनचा महत्त्वाचा भाग एक इंटर्न होऊन बसतो. परतीच्या प्रवासात मोक्याच्या क्षणी एका पात्राची फिल्मी पद्धतीची एंट्री होते. देशासाठी केल्या जात असलेल्या अभियानालाही वैयक्तिक सूडाची फोडणी दिली जाते. गुप्ततेबद्दल प्रसिद्ध असलेले एक पात्र रिक्षाच्या प्रवासात राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीच्या गोष्टी उघडपणे बोलते. हे आणि असे बरेच काही! सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यात काहीच चूक नाही. परंतु एक प्रेक्षक म्हणून दिग्दर्शकाने अधिक वास्तववादी मार्ग चोखाळलेला पाहाणे मनापासून आवडले असते. कथा-पटकथा किती जरी आकर्षक असली, तरी त्यात संशोधनाचा अभाव जाणवतो.

    अभिनय ही चित्रपटाची भक्कम बाजू आहे! विकी कौशल हा जर असेच काम करत राहिला, तर तो खचितच उद्याचा सुपरस्टार असणार आहे! परेश रावल यांच्याकडून तर वाईट कामाची अपेक्षाही नाही. मोठ्या पडद्यावर मोहित रैना या गुणी अभिनेत्याला पाहाणे अतिशय सुखद आहे. कीर्ती कुल्हारीने तिची भूमिका प्रामाणिकपणे केलीये तशीच मानसी पारेख व इतरांनीही. या सगळ्यांत यामी गौतम मात्र काहीशी खटकते. तिने वाईट काम केलेय असे नाही, परंतु इंटेलिजन्स ऑफिसरच्या भूमिकेत व संवादांतही ती जराशी नाजूकच वाटते. याखेरीज स्वरूप संपतना खूप दिवसांनी पाहाणे आनंददायी आहे. योगेश सोमण, राकेश बेदी, रुख्सार वगैरेंनाही छोट्याछोट्या परंतु महत्त्वाच्या भूमिका आहेत व त्या त्यांनी ताकदीने निभावल्या आहेत.

    अर्थातच हल्ली प्रत्येक व्यक्ती, गोष्ट, कलाकृती यांना कोणत्यातरी एका गटात टाकायची फॅशन आलीये. त्या अर्थी बोलायला गेलं तर ‘उरी’ उजव्या गटातील सिनेमा आहे. तसा तो असेलही, पण त्यापेक्षाही जास्त तो बदलत्या काळाचा द्योतक आहे. चित्रपटाच्याच एका संवादाचा आधार घेऊन बोलायचं झालं, तर ‘उरी’ हा नव्या भारताचा चित्रपट आहे. तो काहीसा अडखळतो पण उठतो, उभा राहातो आणि त्याचं इच्छितस्थळ गाठतो, अगदी भारतासारखाच!!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके

    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • बऱ्याच गोष्टींनी मारलेला पण अभिनयाने तारलेला : द अॅक्सिडेंटल प्राईममिनिस्टर

    ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ सुरू होतो तो काँग्रेसप्रणित संपुआने २००४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यापासून. त्यानंतर उभ्या राहिलेल्या पेचप्रसंगांतून मनमोहनसिंह (अनुपम खेर) यांना पंतप्रधानपदी निवडले जाते आणि चित्रपटात आरंभ होतो दोन सत्तास्थानांमधील अघोषित संघर्ष. याला मी लिहिण्याच्या सोयीसाठी संघर्ष म्हणतोय कारण, चित्रपटात एक सत्तास्थान खूपच सौम्य चितारलेय तर दुसरे जवळजवळ अप्रत्यक्ष. नेमके हेच सगळ्यांत मोठे कारण आहे की, यावर्षीच्या सगळ्यांत स्फोटक चित्रपटांपैकी एक मानला जाणारा ‘टिएपीएम’ फारसा रंगत नाही.

    मनमोहनसिंह हे मुळातच मितभाषी नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. चित्रपटातही त्यांची प्रतिमा तिच ठेवण्यात आलीये. असा परोक्ष नायक कसा काय चालेल? म्हणून मग त्यांचा आवाज बनतात संजय बारू (अक्षय खन्ना), सांकेतिक अर्थानेच नव्हे तर त्यांचे माध्यम सल्लागार या नात्याने प्रत्यक्षातही. सबंध चित्रपट आपण संजय बारूंच्या संदर्भबिंदूने पाहातो. अभिनयात एक वाक्प्रचार असतो, ज्याला म्हणतात ‘ब्रेकिंग द फोर्थ वॉल’. म्हणजे काय, तर अभिनेता रंगमंचाच्या तीन भिंतींच्या चौकटीत काम करतो आणि समोर अदृश्य अशा चौथ्या भिंतीच्या पल्याड प्रेक्षक असतात. जेव्हा काम करता करता अभिनेता थेट ही चौथी भिंत फोडून प्रेक्षकांशीच बोलू लागतो, तेव्हा त्याला म्हणतात ‘ब्रेकिंग द फोर्थ वॉल’. या तंत्राचा वापर अनेक चित्रपटांमध्ये केल्याचे तुम्ही पाहिले असेल. ‘हाऊस ऑफ कार्ड्स’मध्ये फ्रँक अंडरवूड (केव्हिन स्पॅसी) याच माध्यमातून सातत्याने आपल्याशी संवाद साधत असतो. तेच तंत्र इथेही वापरलेय. अक्षय खन्ना, संजय बारूंच्या रूपाने आपल्याशी सतत बोलत असतो, पात्रांच्या ओळखी करून देत असतो, राजकीय घडामोडी उलगडून सांगत असतो. थोडक्यात सगळ्याच गोष्टी, व्यक्ती, घटनांबद्दल त्याचं मत देत असतो. अर्थात, हे मत संजय बारूंचं किती आणि दिग्दर्शकाचं स्वतःचं किती, हा भाग वेगळा! राजकीय विषय असल्यामुळेच मी वर मुद्दामहून ‘एचओसी’चा उल्लेख केलाय. त्यात फ्रँक अंडरवूड आपल्याशी संवाद साधण्याचे प्रसंग खूप कमी येतात हे एक, दुसरे म्हणजे ते एकतर अचानक तरी येतात किंवा प्रचंड उपहासात्मक तरी येतात. त्यातील वाक्येसुद्धा विशेष असतात. इथे मात्र ते प्रसंग खूप वेळा येतात आणि ते प्रत्येकवेळी इंटरेस्टिंग असतीलच असे नाही. काही काही वेळा तर दिसत असते की सिनेमाची लांबी फार वाढू नये म्हणून संजय बारूंच्या तोंडून घटना सांगितली जातेय. याचा तोटा हा झालाय की, सिनेमा हा बरेचदा टिव्हीवरचा डॉक्युड्रामा वाटू लागतो आणि आपण ‘पंतप्रधान’ अथवा तत्सम कार्यक्रमाचा एखादा एपिसोड पाहातोय की काय, असे वाटू लागते.

    राजकीय विषयांवर चित्रपट करताना दोन मार्ग असतात. एक म्हणजे जे दाखवायचे आहे ते पूर्ण आत्मविश्वासाने, सगळ्या गुंत्याला तसेच ठेवून दाखवावे व प्रेक्षक हुशार आहेत यावर विश्वास ठेवावा; अथवा सारे काही उलगडून, सोपे करून चमच्याने भरवत राहावे. खरं तर राजकीयच कशाला, प्रत्येक सिनेमासाठी हेच दोन मार्ग असतात, त्यातला कोणता, कधी आणि कुठे वापरायचा यालाच चांगल्या लेखक, दिग्दर्शकांचं तारतम्य म्हणतात. या चित्रपटात दोन्हीही मार्ग वापरलेयत पण त्यांचे गणित काहीसे चुकल्यामुळे चित्रपटाचा एकजिनसीपणा कमी झालाय. काही गोष्टी फारच थेटपणे दाखवल्यायत तर काही खूपच संयतपणे. त्यामुळे दोन्ही प्रकारचे प्रेक्षक खुश न होता पटकथेच्या पातळीवर गोंधळ तेवढा उरतो. गंमत म्हणजे, तरीही चित्रपट प्रचंड एंजॉयेबल राहातो. दिग्दर्शकाने विषय हलक्या-फुलक्या, काहीश्या विनोदी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय. काही ठिकाणी ही गोष्ट कमालीची भारी जमलीये तर काही ठिकाणी कमालीची चुकलीये.

    सिनेमा ज्या स्फोटक बिंदूवर सुरू होतो, तिथून पुढे एकामागोमाग एक धमाके होत जातील असं वाटतं. परंतु लवकरच तो असा काही ढीला पडतो की आपण केवळ त्या काळाबद्दलचा एखादा माहितीपट पाहातोय की काय, अशी शंका येऊ लागते. परत काही ठिकाणी स्फोटकता निर्माण होते आणि परत काही ठिकाणी ती ढेपाळते. पटकथेतला हा विस्कळीतपणा पार्श्वसंगीतातही जाणवतो. चित्रपटाचे वैशिष्ट्य असे की, त्यात अतिशय धीटपणाने खरी नावे वापरलीयेत, अगदी खलनायक म्हणून चितारलेल्या व्यक्तींचीसुद्धा. परंतु नावांच्या पलिकडे जाऊन सगळ्यांच गोष्टी उघड बोलणे कदाचित भारतीय परिप्रेक्ष्यात चालणार नाही किंवा इतर अडचणी (ज्या तरीही आल्याच!) येतील की काय असा विचार करून चाचरत चित्रपट बनवल्यासारखे मध्येच वाटून जाते. जर हे असेच झाले असेल, तर पटकथेच्या विस्कळीतपणाचे आणि चित्रपट पुरेसा नाट्यमय नसल्याचे खरे मूळ तिथे असू शकते. चित्रपट बनवायचाच आहे तर मग दिग्दर्शकाने बिनधास्त त्याचे म्हणणे तरी मांडायचे होते. ते बरोबर की चूक हा विषय वेगळा. उलट बोटचेप्या धोरणामुळे चित्रपट धीट राजकीयपट न राहाता फक्त बोटे दाखवून निर्देश करणारा प्रोपेगेण्डा होऊन राहातो. अर्थात, तेच जर दिग्दर्शकाला अपेक्षित असेल, तर मात्र गोष्ट वेगळी. मनमोहनसिंहांचा सबंध कार्यकाळ दाखवण्यापेक्षा सिनेमा जर एखाद्या विशिष्ट घटनेभोवतीच उभारला असता, तर चित्रपट कदाचित नेमका व चांगला होऊ शकला असता असे वाटते. तसे होण्यासाठी खूप घटनासुद्धा आहेत चित्रपटात. परंतु दहा वर्षांचा काळ दाखवण्याच्या नादात चित्रपट त्या प्रत्येक घटनेला फक्त खो देऊन पुढे सरकतो.

    अनुपम खेर यांनी केलेल्या मनमोहनसिंहांच्या भूमिकेबद्दल बरेच लिहिले बोलले गेले. त्यांनी काम उत्तमच केले आहे. परंतु त्यांना वेशभूषा आणि रंगभूषेचा प्रचंड आधार आहे. याउलट दोन्हीतले काहीच बाजूने नसतानाही, किंबहूना ती व्यक्ती किमान दिसते कशी हे देखील बहुतांशी जणांना माहिती नसतानाही, अक्षय खन्नाने उभे केलेले संजय बारू हे काहीच्या काही अप्रतिम वाटतात. इतर मुख्य पात्रांप्रमाणेच हेही पात्र काहीसे अंडर-रिटनच. तरीदेखील अक्षय खन्नाने वेगवेगळ्या मार्गाने त्यात अक्षरशः जीव ओतलाय. चित्रपट जरी मनमोहनसिंह आणि म्हणूनच अनुपम खेरबाबतीत असल्याचे प्रथमदर्शनी वाटले, तरीही त्याचा खरा नायक संजय बारू हे पात्रच आहे. अक्षय खन्नाने अक्षरशः खाऊन टाकलाय हा चित्रपट. मला या अभिनेत्याचे प्रचंड कौतुक वाटते. तुम्ही अक्षय खन्नाच्या कोणत्याही चित्रपटाला वाईट म्हणू शकता, परंतु कोणत्याही चित्रपटात अक्षय खन्नाला वाईट म्हणू शकत नाहीत. इतका हा कमाल अभिनेता इंडस्ट्रीला काही कारणामुळे सहन झाला नाही की तोच थोडासा अकडू होता कोण जाणे, परंतु दुर्दैवाने त्याचा उमेदीचा काळ सरल्यावरच आपल्याला त्याची किंमत कळू लागलीये. फक्त दोनच तास चालणारा असूनही ‘टिएपीएम’ खूप ठिकाणी रटाळ होतो परंतु अक्षय खन्नाने त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या समर्थ खांद्यावर चित्रपटाला अलगदपणे उचलून पुढे नेलेय. त्या मानाने अनुपम खेरना परोक्ष नायक रंगवायचा असल्यामुळे तितकासा वावच नाहीये. पण जो आहे, त्यात त्यांनीही मजा आणलीये. या दोघांच्या खालोखाल मी अभिनेता म्हणून अजून एका व्यक्तीचे नाव घेईन, तो म्हणजे विपिन शर्मा. बाकी काही अपवाद वगळता बहुतांश पात्रांना त्या त्या व्यक्तीची सहीसही नक्कल वाटण्यापलिकडे काहीही काम व अर्थ नाही!

    या चित्रपटात प्रोपेगेण्डा आहे का? आहेच! पण प्रोपेगेण्डा आहे, एवढ्या एकाच कारणासाठी काही माध्यमं त्याला टाकाऊ म्हणतायत ते बरोबर वाटत नाही. प्रोपेगेण्डाच्या पलिकडेही हा चित्रपट त्याच्या काही गुणांमुळे चांगला आहे आणि काही दोषांमुळे वाईट आहे. एक उदाहरण सांगतो. नुकतेच ‘गल्ली बॉय’ चित्रपटाचे ट्रेलर रिलिज झाले. सामान्य प्रेक्षकांना चटकन कळणारही नाही इतका बेमालूम प्रोपेगेण्डा ठासून भरलाय त्यात. म्हणून काही त्याला टाकाऊ थोडीच म्हणतील? किमान मेनस्ट्रीम मिडिया तरी नाही म्हणणार, किंबहूना त्यात काही प्रोपेगेण्डा असल्याचा उल्लेखही कुणी तथाकथित विचारवंत नाही करणार. प्रोपेगेण्डाचं असंच असतं ना, तो आपल्या लोकांनी केला तर चांगला आणि विरोधातल्या लोकांनी केला तर वाईट असतो. तसंच याही चित्रपटाचं आहे. काँग्रेसविरोधी विचारधारा ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चे सगळे दोष झाकून त्याचा उदोउदो करतील तर भाजपविरोधी विचारधारा त्याचे सगळे गुण झाकून त्याला कचरा म्हणतील. प्रत्येकाची काही ना काही राजकीय विवशता आहे त्यात, एवढेच. लोकशाहीची हीच तर खूबी आहे! याउप्पर आपापल्या विचारधारांच्या पलिकडे जाऊन प्रेक्षक म्हणून जर ‘टिएपीएम’ पाहावासा वाटला, तर अवश्य पाहावा आणि समजा त्यावर बहिष्कार घालावासा वाटला तर बहिष्कार घालावा, आपल्याला दोन्हींचेही स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य, ही सुद्धा लोकशाहीचीच तर खूबी आहे!

    *३/५

    — © विक्रम श्रीराम एडके.

    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • हिंदू चैतन्याचे अवतार!!

    बाजीराव सरकारांचे सार्वजनिक व्यक्तीमत्त्व कसे होते? चिमाजी अप्पा एका पत्रात लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३०), “वाटेस घोड्यावर बसोन चालले होते. तेव्हा एके गावचा पाटील भेटीस आला. तेव्हा असावध होते. त्यामुळे पाटलासी सहजात बोलले, जे कोंबड्यांचे प्रयोजन आहे. घेऊन येणे”. इथे चिमाजी खरे तर रागावून लिहितायत की, राऊंनी उघडउघड पाटलाकडे कोंबड्या मागितल्या. परंतु बाजीराव असेच होते. राजकारणात कुटील, मात्र त्याव्यतिरिक्त जे मनात असेल तेच ओठांवर ठेवणारे शिपाईगडी. ते उघडपणे मांसाहार करीत. मद्यप्राशन करीत. त्याकाळी पाहायला गेलं तर दोन्हीही ब्राह्मण्याला न शोभणाऱ्या गोष्टी. परंतु तसंच पाहायचं झालं तर, हिंदुपदपातशाही हे एकच उद्दीष्ट मनी बाळगून पायाला भिंगरी बांधल्यागत देशभर ससैन्य संचार करणे तरी कुठे ब्राह्मण्यात बसते? बाजीरावांना जाणीव होती की, सध्याचा काळ हा धर्म-धर्म करीत बसण्याचा नाही, तर त्या धर्माचं रक्षण करण्याचा आहे. खाणे-पिणे हे गौण आहे. ज्याला सबंध समाजाला आपलंसं करायचं असतं, त्याला आपल्या घरातल्या परंपरा बाहेरही लादण्याचा अट्टाहास करुन चालत नसतं. सतत फिरतीवर असणाऱ्याने, मुलुखगिरी-शिपाईगिरी करणाऱ्याने तर खाण्याचे चोचले करुच नयेत. तिथे सोवळेपणाची अपेक्षाही मूर्खपणाची आहे. जे मिळेल ते आणि जसे मिळेल तसे खाण्याची तयारी हवी, तरच मोहीमा साधतात.

    बाजीराव असेच होते. त्यांचे सैनिकच नव्हे तर ते स्वतःसुद्धा कधीच मोहीमांवर शिदोरी नेत नसत. काय करायचेय निष्कारण ओझे? भूक लागली, तर शत्रूचा मुलुख लुटून खायचं. ते साधणारे नसेल, तर मिळेल त्या गावी, मिळेल ती मीठभाकरी खायची. कित्येकदा तर हे जगज्जयी मराठी सैन्य घोड्यावरुन उतरतही नसे. कुठूनतरी कणसं आणायची. हातावरच हुरडा मळायचा. पोटात ढकलायचा. आणि वरुन पाणी मारायचं. हे जसे शिंदे, होळकर, सोमवंशी, जाधव, पवार, विंचूरकर करीत; तसाच त्यांचा लाडका पेशवाही करी! सरदार, सैनिकांसोबत मोहीमा करायच्या आणि खाण्यापिण्याच्या वेळी मात्र स्वत:चं सामाजिक श्रेष्ठत्व कुरवाळायचं, असा दुटप्पीपणा बाजीरावांच्या स्वभावात नव्हता. ते आपल्या सर्व थरांतल्या सरदारांसोबत राहात. त्यांच्यासोबतच जेवत. सगळे मित्र गप्पा मारत. झोप आली तर आकाशाच्या पांघरुणाखाली फत्तराचं अंथरुण करीत ताणून देत. आपले धनी आपल्यातच मिळून मिसळून वागतात, हे जेव्हा सैन्याला दिसतं, तेव्हाच कुठे सैन्य एकजिनसी राहातं. आणि म्हणूनच पालखेडसारख्या मोहीमांमध्ये हजारों किलोमीटर्सचा प्रवास घडूनही सैनिकांपैकी कुणीच हूं की चूं केलं नाही अथवा बाजीरावांवर शंका घेतली नाही. कारण, त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसत होतं की; ज्या परिस्थितीतून आपण जातोय, जे खातोय, जसं राहातोय, तसंच आपला पेशवाही राहातोय. त्याने स्वतःसाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा बादशाही थाट केलेला नाही. आपले भोग हेच त्याचेसुद्धा भोग आहे. मग क्षोभ कसा काय होणार? हेच बाजीरावांच्या सैन्याच्या अजिंक्यतेमागचं एक अतिशय महत्त्वाचं कारण होतं. बाजीराव सैन्यात राहून जसे थट्टामस्करी करायचे, सैन्यासोबत एकत्र बसल्यावर गाणी गायचे तसेच प्रसंगी कुणी चुकलाच तर “शिपाईगिरी कशास करता? रांडा जाले असते तर कामास येते” (मस्तानी – द. ग. गोडसे, पृ. १६२) असे अस्सल भाषेत सुनवायचेसुद्धा! त्यामुळेच सैन्याला ते जास्त आपल्यातले वाटायचे.

    स्वतः शाहू छत्रपतींना बाजीरावांच्या ह्या गुणांची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी बहुतांश बाबतीत राऊंना स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळेच अनेकदा मोहीमांवर बाजीराव परस्पर निर्णय घ्यायचे, तरी बाजीरावांच्या निष्ठेबद्दल शाहू थोडीदेखील शंका बाळगत नसत. बाजीरावांवर कधीच नाराज होत नसत. उलट १७२८ मध्ये सातारा दरबारातील पेशव्यांचे मुतालिक लिहितात (तत्रोक्त), “..राऊ स्वामींची मर्जी अवघियांनी पालावी. त्यांचे चित्तास क्षोभ करु नये”! किंवा मस्तानीच्याही संदर्भात शाहूंचे चिटणीस गोविंद खंडो दि. २१ जानेवारी १७४० यादिवशी नानासाहेबांना लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३२), “ऐसियास राजश्री स्वामींची मर्जी पाहाता ते वस्तू (मस्तानी) त्याजबरोबर (बाजीराव) न द्यावी, ठेवून घ्यावी, चौकी बसवावी; त्यामुळे राऊ खटे जाले, तऱ्ही करावे ऐसी नाही”! एवढी मर्जी सांभाळत असत शाहू बाजीरावांची.

    दुर्दैव असे की, बाजीरावांचे हे वेगळेपण, देशकालपरिस्थितीनुरुप आवश्यक असलेली वागणूक, सामाजिक स्तरावर किती जरी क्रांतिकारक असली, तरी वैयक्तिक स्तरावर त्यांना कधीच समजून घेतले गेले नाही. मित्र, सैन्य आणि मालक कायमच बाजीरावांच्या बाजूने असताना त्यांना तत्कालीन इतरांची फारशी साथ लाभल्याचे दिसून येत नाही. राऊंच्या अकाली जाण्यामागे हेदेखील कारण आहे, असे वाटते. नासिरजंगला हरवून पुण्यासही न परतता खरगोण प्रांतातील जहागिरीची व्यवस्था पाहायला बाजीराव निघाले होते. जाताना त्यांनी “मस्तानीस तिकडे पाठवून द्या” असेही चिमाजींना सांगितले होते. चिमाजींनी ते मान्य केले. नानासाहेबांना लिहिलेल्या पत्रात चिमाजी लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३३), “पुण्यास गेल्यावर तिची रवानगी त्यांजकडे करावी, आपले निमित्य वारावे, त्यांचे प्राक्तनी असेल ते होईल ऐसा विचार केला आहे”. परंतु प्रत्यक्षात मात्र मस्तानीस न पाठवता काशीबाईंनाच रावेरखेडी पाठवण्यात आले. किचन-पॉलिटिक्सचे धागे हे असे गुंतागुंतीचे होते! काशीबाई येण्यापूर्वीच बाजीरावांना ताप भरला होता. त्या आल्यानंतर अवघ्या २-३ दिवसांतच बाजीराव गेले! इतरांचे माहिती नाही, परंतु स्वतः बाजीरावांच्या मनात अखेरपर्यंत कुणाबद्दलच किंतु नव्हता. २३ मार्च १७४० यादिवशी ते बुऱ्हाणपुराहून मातोश्री राधाबाईंना त्याच अप्पांबद्दलच्या काळजीपोटी लिहितात (रियासत, पृ. ३९५), “आपांस उष्णकाळामध्ये बाहेर जाऊ न द्यावे”.

    समकालीनांनी व उत्तरकालीनांनी बाजीरावांबद्दल काही का गैरसमज करुन घेतलेले असेनात, सर जदुनाथ सरकार मात्र दिघेंच्या “Peshwa Bajirao I & Maratha Expansion” च्या प्रस्तावनेत म्हणतात, “Bajirao was a heaven born cavalry leader. In the long and distinguished galaxy of Peshwas, Bajirao was unequalled for the daring and originality of his genius and the volume and value of his achievements”! परंतु मला सर्वाधिक भावते ते इंग्रज इतिहासकार सर रिचर्ड कार्नॅक टेंपल यांचे मत. आपल्या “Shivaji & The Rise of Marathas” ग्रंथात ते बाजीरावांबद्दल लिहितात, “He died as he lived, in camp under canvas among his men, and he is remembered to this day among the Marathas as the fighting Peshwa and the incarnation of Hindu energy”! Incarnation of Hindu Energy, अर्थातच “हिंदुंच्या चैतन्याचा अवतार”! केवढे चपखल विशेषण आहे हे. बाजीरावांचे अवघे आयुष्य अवघ्या चारच शब्दांत पकडणारे अमोघ विशेषण!! खरोखर बाजीराव हे हिंदूंच्या चैतन्याचे अवतारच तर होते!! त्यांनी आमची मरगळ झटकून टाकली व आम्हांला स्वाभिमान शिकवला. हिंदुपदपातशाहीची कल्पना आमच्या मनांत ठाम केली. छत्रसालसारख्या दूरदेशीच्या राजाला मदत करुन “हिंदू तेवढा एक” हा संदेश आपल्या कृतीतून दिला. स्वराज्याचे साम्राज्य केले. आणि हे सारे करताना, वैयक्तिक ऐषाराम, सुखदुःख, तहान-भूक यांची काडीमात्रही पर्वा केली नाही. स्वार्थ नेहमीच दुय्यम मानला. अवघे ४० वर्षांचे आयुष्य. त्यात अवघ्या २०व्या वर्षी पडलेली पेशवाईची अवघड जबाबदारी. केवळ २०च वर्षांत स्वराज्याचा चारही बाजूंनी अतोनात विस्तार करण्याचे कर्तृत्व. त्यासाठी अथकपणे लढलेल्या लढाया आणि सर्वच्या सर्व लढायांमध्ये अजिंक्यपद!! खरोखर तो एक झंझावातच होता. आमच्या फाटक्या झोळीत कधीच न मावणारा झंझावात. म्हणूनच आम्ही त्याला कधीच गवसणी घालू शकलो नाही. तो आला, कर्तव्य केले आणि वै. शु. १३, अर्थात २८ एप्रिल १७४० यादिवशी निजधामी निघूनसुद्धा गेला, आज नाही तर काहीशे वर्षांनी तरी आपले कर्तृत्व ह्या निद्रिस्त हिंदुसमाजास समजेल, ह्या खात्रीने!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    *लेखकाच्या नावाशिवाय अथवा स्वत:च्या नावाने कॉपी करुन या लेखामागील कष्टांचा अपमान करु नये.
    (लेखक बाजीरावांच्या युद्धनीतीचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. अधिक माहितीसाठी पाहा www.vikramedke.com)

    image

  • सावरकर नावाचा ब्रॅण्ड!!

    नव्याने विमानात बसणाऱ्यांची एक बेक्कार गंमत होते. उद्धरिणीने (लिफ्ट हो!) जाताना कसं वजनरहित वाटतं आणि डोकं पिसाहून हलकं होतं, तसं वाटतं. आणि त्या अवस्थेत प्रतितास शेकडो किलोमीटर वेगाने आपण हवेत तिरके भिरकावलो जात असतो!! बाऽबोऽऽ!! शब्दातीत अवस्था असते उड्डाण म्हणजे!! यात एक वेगळाच त्रास होतो. कान भयानक दुखतात. हवेचा दाब सतत बदलत असतो. त्यामुळे कानांवर प्रचंड ताण येतो. जरा कुठं वर-खाली झालं की, “पुटूक पुटूक” आवाज करत कानात लहानसे स्फोट होतात की “सुंईईईऽऽ..” आवाज करत अडकून राहिलेली हवा निघून जाते. परत नव्याने दाब. तात्पुरता बहिरेपणा येतो. उतरल्यावरही कित्येक तास कान दुखत राहातात. यासगळ्यात नाक व तोंड दाबायचं आणि प्रयत्नपूर्वक कानावाटे श्वास सोडायचा, ह्या द्राविडी प्राणायामाची निराळीच गंमत असते!!

    मुंबई ते चेन्नई प्रवासात फारच त्रास झाला मला. कारण असं काही होईल याची कल्पना होती, पण इतकं होईल असं कुणाला वाटतंय!! त्यातून हवाईसुंदरीला मी फारसा आवडलो नसावा, कारण तीनतीनदा बोलावल्यावर तिने शेवटी कापसाचे बोळे आणून दिले. तशी ती पण नुसती “हवाई”च होती मेली, “सुंदरी” तर औषधालाही नव्हती! शेवटी व्हायचा तो त्रास झालाच. पण तिथून पुढे चेन्नई ते पोर्टब्लेअर प्रवासाच्या वेळी मात्र मी मानसिक तयारी करुन ठेवली होती. त्याप्रवासात काही मला खिडकीजवळची जागा नव्हती मिळालेली. उजव्या रांगेतली पहिली जागा. दोन तमिळ ख्रिश्चन कुटूंबे बिचारी माझ्यामुळे निम्मी इकडं आणि निम्मी तिकडं झालेली. नवरे, बायका आणि चिल्लीपिल्ली! “तमिळ” म्हटलं की मुळातच माझे अष्टसात्त्विकभाव जागृत होतात. का कोण जाणे पण मला मी मागच्या जन्मीचा तमिळ वाटतो, इतकी ओढ वाटते मला त्या भाषा आणि संस्कृतीबद्दल. त्यामुळे मी त्या अण्णा-अम्मांशी मोडक्यातोडक्या तमिळमध्ये गप्पा सुरु केल्या!

    त्यांच्यातले एक अण्णा कोटक बँकेत कामाला होते. मग देशाची सध्याची अवस्था, मोदी-बिदी असले “लडकोंवाले” विषय बोलून झाल्यावर गाडी हळूच “अंदमानला कश्यासाठी?” ह्या प्रश्नाकडे वळली. ती कुटूंबं सप्ताहान्त साजरा करायला सहज म्हणून चालली होती. मला विचारलं तर मी सांगितलं की, “महाराष्ट्रातून आम्ही काही लोक चाललोय अंदमानला. सावरकरांसाठी! आम्ही नुसते फिरणारच नाही आहोत तर मी व्याख्याने देणार आहे तिथे सावरकरांवर. त्यासाठी वक्ता म्हणून चाललोय”, वगैरे वगैरे. यावर साहजिकपणे त्यांनी विचारलं की, “कोण सावरकर बुवा”? बास!! नाहीतरी महाविद्यालयीन काळात एका बिग्रेडी प्राध्यापकाला नडलो होतो त्यावेळी त्यांनी हताश आवाजात म्हटलेच होते, “तू जिथं-तिथं सावरकर घुसडतोस सतत”! इथे तर सरळ समोरुन प्रश्न आला होता, “कोण सावरकर”? माझ्या डोक्यात उलटी गणती सुरु झाली, “३.. २.. १.. सुरु”!! मी तासभर त्या चार-पाच जणांना इंग्लिश आणि तमिळमध्ये सावरकर समजावून सांगत होतो. त्यांची साहजिक प्रतिक्रिया होती, “देशासाठी आयुष्यभर एवढा त्रास भोगलेला हा माणूस आम्हाला माहितीच नव्हता”! त्यांच्यापैकी एकाने विचारले की, “सावरकर प्रत्यक्षात किती थोर होते”? तेवढ्यात घोषणा झाली, “कृपया कुर्सीकी पेटियाँ बाँध ले, हम कुछही मिनटोंमें पोर्टब्लेअरके वीर सावरकर आंतरराष्ट्रीय हवाईअड्डेपे उतरनेवाले है..”! मी म्हणालो, “अंदमानमधल्या एकमेव विमानतळाला एका मराठी माणसाचं नाव द्यावं लागलं, इतके थोर होते सावरकर”! यावर आम्ही सगळेच हसायला लागलो. बोलण्याच्या भाषा लाखों असतील जगात, पण हास्याची भाषा एकच असते!!

    हा काही अंदमानप्रवासातला असा एकमेव अनुभव नाही. तिकडे आमचा समन्वयक होता एक. विकास नाव त्याचं. वडील पंजाबी, आई तेलुगू, वाढला बंगाली बहुसंख्य असलेल्या अंदमानमध्ये. त्यामुळे ह्या तिन्ही भाषा तर तो अस्खलित बोलतोच. शिवाय अंदमानात राहून राहून तमिळ आणि हिंदीतसुद्धा पारंगत झालेला. इंग्रजीही अतिशय उत्तम. बाकीचे आमच्या ठरलेल्या गाड्यांमधून फिरायचे. मी म्हणालो, “मला नाही असं फिरायचं”! तर मला त्याच्या बाईकवरुन सबंध पोर्टब्लेअर फिरवायचा हा गडी. आमच्यासोबत राहून राहून मराठीसुद्धा शिकून घेतलं त्याने गरजेपुरतं. एके दिवशी मला म्हणाला, “यार तुम ये डेढ़-दो घण्टे क्या भाषण देते हो? मुझे सुनना है”! मी म्हणालो, “आ जाओ आज शामको”! आला. सगळ्यात मागे बसला. मराठी व्याख्यान. साहेबांना एक शब्दसुद्धा कळला नाही. पण शेवटपर्यंत बसला होता. व्याख्यान संपल्यावर म्हणाला, “विक्रमसर, मुझे समझमें तो कुछ नहीं आया, पर पूरा माहौल भावूकसा हो गया था. ज़रुर कुछ अच्छी बातेंही बताई होंगी! इतना मानते हो आप महाराष्ट्रीयन लोग वीर सावरकरको”? मी म्हणालो, “सावरकर अगर भगवान नहीं तो भगवानसे कम भी नहीं हमारे लिए”! तो विचारात पडला. जरा वेळाने म्हणाला, “हम आजतक सेल्युलर जेल किसी टुरिस्ट स्पॉटकी तरहही दिखाते आए है. आज पहली बार सोच रहा हूँ की, उसके साथ लोगोंकी कितनी भावनाएँ जुडी हो सकती है! आईंदासे मैं जेल ले जाते वक़्त ये ध्यान रखूँगा और लोगोंको बताऊँगा की जिस इन्सानके लिए आपलोग यह जेल देखने आए हो, वह भगवानसमान है महाराष्ट्रमें”!!

    मला वाटतं, आपण मराठी लोक आपल्याच महापुरुषांबद्दल न्यूनगंड बाळगतो ना, म्हणून आपल्या लोकांना कुणी फारसे ओळखत नाही बाहेर. आपण आपल्याच लोकांची सकारात्मक बाजू डंके की चोटपे सांगायला लाजतो. तिकडे हॅवेलॉक बेटावर एक “राधानगर बीच” नावाचा नितांतसुंदर समुद्रकिनारा आहे. आशिया खंडातला तिसरा सगळ्यात सुंदर आणि भारतातला तर सगळ्यात सुंदर समुद्रकिनारा. पार गळ्यापर्यंत पाण्यात गेलात तरीही खाली पाहिल्यास पावले स्पष्ट दिसतील, एवढा स्वच्छ! तिकडे आम्ही सगळे मनसोक्त खेळलो. खेळून झाल्यावर कपडे-बिपडे बदलले आणि तिथल्या बाकड्यांच्या समूहात सगळेजण अर्धवर्तुळाकार बसलो. आमच्या मंडळींचा अतरंगीपणा असा की, आजचे व्याख्यान इथेच करुया. मग काय! अतीवसुंदर, नादमय समुद्र आणि त्या पार्श्वभूमीवर सावरकरांची कीर्ती सांगणारा मी! एवढे सगळे लोक एकत्र जमून एकाच माणसाचं ऐकताहेत म्हटल्यावर कुठून कुठून आलेले पर्यटकसुद्धा जमून ऐकू लागले. पाहाता-पाहाता शे-दिडशे माणसं जमली. क्वचितच कुणाला मराठी समजत असावं त्यांच्यापैकी. मी मुद्दामच मराठीतून व्याख्यान सुरु ठेवलं. व्याख्यान संपल्यावर एक बंगाली काका हातात भेळेचा पुडा घेऊन बकाणे भरता-भरता आले, “ये जो आप ‘सावन.. सावन..’ कह रहे थे, वह क्या था?” मला हसू आले. मी त्यांना म्हणालो, “सावन नहीं, सावरकर”! मग मी त्यांना सावरकर समजावून सांगितले, ते कसे सेल्युलर जेलमध्ये होते हेही सांगितले. त्यावर ते बाबूमोशाय काय म्हणाले असतील? म्हणे, “फिर हमारे सुभाषबाबू कौनसे सेलमें थे”? मी म्हणालो, “वह यहाँ कभी कैद थे ही नहीं! अंदमान प्रसिद्ध है मात्र सावरकरजीकी वजहसे”! तर म्हणे, “क्या बात करते हो? क्या सावरकर हमारे सुभाषबाबूसेभी बडे थे”? मी म्हणालो, “जी बिल्कुल! बल्की, सुभाषबाबूको आज़ाद हिंद सेनाकी कल्पनाभी सावरकरजीनेही दी थी. गुरु मानते थे वह सावरकरजी को! उनकी पुस्तकें बंगालीमें प्रकाशितभी करते थे सुभाषबाबू”! बंगालीकाका आता चमकले, “अरे बापरे, यह तो हमें पताही नहीं था. धन्यवाद सर”!

    पाहिलंत? इतर राज्यांनी महाराष्ट्राच्या तुलनेत खूपच कमी क्रांतिकारक दिले. पण केवढा पूज्यभाव त्यांच्या मनात आपापल्या क्रांतिकारकांबद्दल! नाहीतर आपण!! नुसती मराठी क्रांतिकारकांची यादीच करायची म्हटलं तरी खंडांमागून खंड भरतील, पण आम्ही करंटे न्यूनगंडी, त्यांच्याबद्दल बोलायलादेखील लाजतो. मुळात आम्हालाच काही माहिती नसतं तर बोलणार तरी काय म्हणा! पण माहिती तर त्या बंगाली काकांनाही नव्हती. तरीदेखील रेटून विचारलंच ना त्यांनी सुभाषबाबूंबद्दल? आणि आम्ही आमच्याच गौरवबिंदूंपासून दूर दूर पळतो. मला नाही वाटत, पंजाबात शीखेतर भगतसिंहांचा द्वेष करत असतील. नाही! तो ब्रॅण्ड आहे त्यांच्या राज्याचा!! बंगालात कायस्थविरोधी चळवळ आहे की नाही कोण जाणे, पण असली तरी कुणीही बंगालीबाबू सुभाषबाबूंचा द्वेष करताना नाही आढळणार तुम्हाला. ब्रॅण्ड आहे तो त्यांच्या राज्याचा! पण त्याच भगतसिंहांच्या इतके, किंबहूना काकणभर जास्तच क्रांतिकार्य केलेले राजगुरु! केवळ त्यांच्या जातीपायी त्यांचा द्वेष करणारे किती मराठी दाखवू तुम्हाला, बोला! यांची तोंडं सदोदित वाकडीच!! यांना टिळक नको, चापेकर नको, सावरकर तर साताजन्मीसुद्धा नको. बरं बाबा, मग जे तुम्हाला गोड लागतात त्यांच्याबद्दल तरी बोला. छे!! परप्रांतीयांसमोर आपल्याच लोकांचे गुणगान गातानाही हातभर फाटते. मुळात माहितीच काही नसतं. आणि इतरांचा द्वेष करण्यातच सगळं आयुष्य गेल्यामुळे सर्वसमावेशक भाषेत आपला माणूस पटवून देण्याचं कौशल्य तर त्याहूनही नसतं. काय कप्पाळ ब्रॅण्ड निर्माण होणार महाराष्ट्राचा? मग बोंबलायचं, “त्या अमुक राज्यात शिवाजी महाराजांना लुटारू म्हणून शिकवलं जातंय होऽ”! अरे थुक्रटराव, तू जर कधी बाहेरच्या जगात शिवरायांची चांगली बाजू सांगितलीच नाही, तर ते त्यांना जे समोर दिसेल तेच खरं मानणार ना ते येडपटा!! पण तू तर “शिवाजी कसे हिंदू नव्हतेच” असला पागल फेसबुकीया शोध लावत किबोर्ड बडवत बसलायस नाहीतर व्हिएतनामचा तो कोणतातरी नेता कसा रायगड बघायला आला होता याच्या खोट्यानाट्या कथा पसरवत बसलायस. मग जग शिवरायांना असंच काहीतरी वाट्टेल ते संबोधणार!!

    टिळक असोत, सावरकर असोत, शिवराय-शंभूराय वा थोरले बाजीराव असोत, हे ब्रॅण्ड आहेत महाराष्ट्राचे. छातीठोकपणे अमराठी आणि अभारतीय लोकांना कर्तृत्व सांगा त्यांचं. सकारात्मक बोला आणि बघाच त्यांचा महाराष्ट्राबद्दलचा आदर कसा दुणावतो ते! एवढे मोठे मोदी, पण पटेल आणि गांधी किती जरी भिन्न विचारधारांचे असले तरीही त्यांचं कर्तृत्व सांगताना कधी थकत नाहीत. केवळ ते त्यांच्या गुजरातचे आहेत म्हणून. मग आपणच का कर्मदरिद्रीपणा करावा? बिनधास्तपणे सांगा. मी आजवर जेव्हा जेव्हा बाहेरच्या राज्यांत गेलोय, तिथे तिथे सावरकर नावाचा ब्रॅण्ड स्थापन करुन आलोय. ही तरी नुसती अंदमानातलीच उदाहरणं झाली. भाग्यनगरात (हैदराबाद) तर ठाकूर राजासिंह सावरकरांचं कर्तृत्व समजल्यावर केवळ रडायचेच बाकी होते!! येत्या फेब्रुवारीत पुन्हा चाललोय मी अंदमानला. सावरकरांबद्दल अजाण असणाऱ्यांना सावरकर सांगायला. या माझ्यासोबत. ‘फिरस्ती टूर्स’च्या श्री. Abhijeet Kulkarni (+917843011155) यांच्याकडे नोंदणी करा, आणि गर्जा जयजयकार!! आपल्याकडे सोनं आहे रे. उधळा बेभानपणे मित्रांनो! आज-उद्या आदराच्या रुपाने महाराष्ट्राकडेच परत येणार आहे ते!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाच्या नावाशिवाय कॉपी करु नये. लेखकाचे अन्य लेख वाचायचे असल्यास पाहा www.vikramedke.com)

    image

  • आनंदवनभुवनी

    जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशावर, विशेषतः परधर्मीय देशावर आपला राजनैतिक आणि भौगोलिक अधिकार प्रस्थापित करतो; तेव्हा सगळ्यात आधी कोणते काम करत असेल, तर ते म्हणजे आपली जी कोणती संस्कृती असेल ती तिथे रुजवायचा प्रयत्न करतो. यातून काय साधतं? एकतर यामुळे तेथील लोकांना कमतर लेखून त्यांच्यावर राज्य करणं सोपं जातं. आणि दुसरा व सर्वांत महत्वाचा फायदा म्हणजे कालांतराने तेथील जनतेला आक्रमकांची संस्कृती (मग ती कदाचित पाशवी असली तरीही!) हीच आपली संस्कृती वाटू लागते, जेणेकरुन भविष्यात आक्रमकांचं त्या भूभागावरील राजकीय वर्चस्व जरी संपलं तरीदेखील संस्कृती प्रदुषित करुन ठेवल्यामुळे पिढ्यानपिढ्या तो भूभाग आक्रमकांचा सांस्कृतिकदृष्ट्या दासच बनून राहातो! याचं सर्वांत सोपं उदाहरण म्हणजे इंग्रजी ही भाषा! जगभर हाताची सगळी बोटे भरतील इतकेसुद्धा देश इंग्रजीला किंमत देत नसताना, आपल्याकडे मात्र छातीठोकपणे इंग्रजी ही अवघ्या जगाची भाषा असल्याचे खोटेच सांगितले जाते. का? कारण गोऱ्या राज्यकर्त्यांनी तसे रुजवलेय ना! तीच गोष्ट ऊर्दूची! मुळात ऊर्दू नावाची कोणतीही स्वतंत्र भाषाच अस्तित्वात नसूनदेखील आम्ही मात्र अस्तित्वात नसलेल्या भाषेचे गोडवे गातो!! राईट बंधूंना मिळालेले पेटंट हे विमानाचा शोध लावण्यासाठी मिळालेले नसून ‘विमानात उपयोगी अश्या नव्या सुधारणा करण्यासाठी’ (पेटंट क्रमांक US 821393) मिळालेले असतानाही आमच्याकडे रेटून राईट बंधूंनीच विमानाचा शोध लावल्याचे शिकवले जाते. ही अवस्था! मग राईट बंधूंच्या हयातीतच त्या पेटंटवर शेकडो केसेस चालल्या आणि जर्मनीतल्या एका कोर्टाने तर राईट बंधूंच्याच विरोधात निकाल दिला होता, हे कुठले ठाऊक असायचे!! शोध न लावणाऱ्या राईट बंधूंना श्रेय द्यायला आमच्याकडचे तथाकथित विद्वान पळपळ पळतात, परंतु तोच शोध आमच्या प्राचीन ग्रंथांतरी कुणी दाखवून दिला, तर मात्र नाके मुरडतात! परंतु त्याचवेळी तोफांच्या निर्मितीचे श्रेय बाबराला, रॉकेटच्या निर्मितीचेचे श्रेय टिपूला देताना मात्र ही मंडळी थकणार नाहीत आणि कुणी जर ह्या शोधांची वर्णने आपल्याकडच्या परंपरांमध्ये दाखवून दिली तर डोळ्यांवर कातडे ओढण्यातही कसूर करणार नाहीत!! परकीय आक्रमकांच्या कौतुकात वाहावत जाण्याची अशी एक-दोन नव्हे तर अक्षरशः सहस्रावधी उदाहरणे सांगता येतील. विवेकपिसाट फेक्युलर मंडळी किती जरी उरस्फोड करुन ह्या प्रकाराला ‘गंगाजमनी तहज़ीब’सारखे गोंडस नाव देत असली, तरीही ह्या प्रत्यक्षात मानसिक दास्यत्वाच्या रुपाने शिल्लक उरलेल्या राजकीय आणि धार्मिक दास्यत्वाच्या खुणा आहेत. मग ती आमच्या पवित्र वास्तूंची केलेली तोडफोड असो, परकीयांचे ते पाशवी आक्रमक असूनदेखील केलेले उदात्तीकरण असो, अट्टाहासाने त्यांचाच इतिहास शिकायला लावणे असो, रस्ते-वास्तू इ. ना त्यांची नावे देणे असो; थोडक्यात सांगायचे तर आपल्या देशात शत्रू म्हणून आलेल्या व इथले खऱ्या अर्थाने भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक नुकसानच केलेल्या कुणाच्याही नावाने इथले काहीही ओळखले जाणे हा सच्च्या राष्ट्रभक्तांसाठी एक सल असतो आणि असा सल मुळासकट नष्ट करणारा कुणीही नायकच ठरतो. दिल्लीतील ‘औरंगज़ेब मार्गा’चे नाव बदलून ‘एपीजे अब्दुल कलाम मार्ग’ करण्याच्या घटनेकडे ह्याही दृष्टीकोनातून पाहायला हवे. सवयीचा नसल्यामुळे थोडा जड जाईल हा दृष्टीकोन, पण अस्सल प्रामाणिक दृष्टीकोन आहे हा – परकीयांचे लांगूलचालन करणारा स्वार्थी नज़रीया नव्हे!!

    अनेक दिवसांपासूनच्या नामांतर मागणीस अखेरीस शासकीय ठप्पा मिळालाय. ह्यानिमित्ताने हिंदुस्थानात येऊन लुटालूट, जिहाद व चैन करणाऱ्या मुघलांच्या नावे असलेले एक प्रतीक तरी कमी झाले!! अर्थातच बर्नॉल हाच ज्यांचा राष्ट्रीय-लेप आहे, अश्या विवेकपिसाटांना (हा शब्द ‘लिंगपिसाट’च्या चालीवर वाचावा!) आता औरंगज़ेबाच्या प्रेमाचे उमाळे फुटू लागतील, तो कसा महान वगैरे होता ह्याचे साक्षात्कार झडू लागतील. औरंगज़ेबाची प्रतिमा उंचावण्याची अहमहमिका सुरु होईल. होऊ द्या. काय वाट्टेल ते करु द्या. त्यांचे कामच आहे ते. परकीयांचे पाय चाटण्यावरच तर त्यांची दुकानदारी चालते ना! पण आपण सामान्य माणसं आहोत. दुकानदार नाही आणि तथाकथित फेक्युलर विचारजंत तर त्याहूनही नाही. त्यामुळे आपण तर्कशास्त्र वापरायचे. समर्थांनी औरंगज़ेबाला ‘औरंग्या पापी’ का संबोधले असावे, ह्याचा विचार करायचा. मोठमोठे ग्रंथ धुंडाळण्याचीही गरज नाही. सर्वांत पहिल्यांदा दृष्टीसमोर येईल, ते ह्या औरंगज़ेबाने आमच्या शिवछत्रपतींशी मांडलेले जन्माचे वैर!! असल्या वैऱ्याचे नाव इथल्या रस्त्याला द्यायचे? तेही शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याने अवघ्या शंभर वर्षांतच मुघलांची (!) दिल्ली शब्दशः अंकीत केली होती, हा सिद्ध इतिहास असताना? जरा शोध घेतला तर लक्षात येईल की, ह्या औरंगज़ेबाने तख़्तासाठी आपल्या सख्ख्या बापाला कैदेत ठेवले आणि भावाचा हालहाल करुन खून केला. त्या औरंगज़ेबाचे आपल्या श्रीरामांच्या आणि लक्ष्मण-भरत-शत्रुघ्नांच्या देशात गुणगान चालवून घ्यायचे? कौरवांनी असाच राज्याच्या हव्यासापोटी पांडवांचा अतोनात छळ केला. त्यांना तर खलनायकच मानतो ना आपण? मग मुघलांचाच उदोउदो का म्हणून चालवून घ्यायचा? केवळ काही जणांचा जीव मतपेढीत अडकलाय म्हणून? आणि ह्या पार्श्वभूमीवर आठवा अवघ्या बत्तिशीच्या शंभूराजांचा ह्याच औरंगज़ेबाने आत्यंतिक पंथवेडातून केलेला खून!! ह्या आठवणीनंतरही जर कुणी औरंगज़ेबाची बाजू घेणार असेल, तर त्याच्या वंशशुद्धीवर शंका येणे अगदीच साहजिक ठरेल!!

    कुणाला वाटेल की, हे इतिहास-भुगोलाचे हिंदुकरण आहे. नाही. औरंगज़ेबाचा आम्ही मुसलमान म्हणून कधीच द्वेष करत नाही. तो मुसलमान नंतर होता, आधी एक पंथवेडा देशशत्रू होता ह्याची प्रत्येक न् प्रत्येक हिंदुत्ववाद्याला पूर्णतया जाणीव आहे. आणि म्हणूनच धर्माच्याच नावे बोलायला गेलो तर त्या रस्त्याला एका मुसलमानाचेच नाव दिले गेलेले असूनही सर्वच हिंदुत्ववादी मनापासून आनंदी आहेत. कारण, अब्दुल कलामही मुसलमान नंतर, परंतु आधी एक सच्चे देशभक्त होते हे त्याच हिंदुत्ववाद्यांना तितक्याच मनापासून ज्ञात आहे म्हणूनच!! काय करणार, हे हिंदुत्ववादी मेले असलेच असतात, जात-धर्म न बघता चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणतात. हिंदू बघून द्वेष आणि अहिंदू बघून त्याच्या देशघातकीपणाच्या प्रमाणात वाढतं प्रेम, ह्या तर सोयीस्कर फेक्युलरांच्या खोडी! त्या भोळ्या-भाबड्या हिंदुत्ववाद्यांना कुठल्या जमायला!!

    थोडक्यात सांगायचे झाले तर, आज ह्या नामांतराच्या निमित्ताने परकीय दास्यत्वाच्या गलिच्छ खुणा पुसणाऱ्या एका मंगलपर्वाची सुरुवात झाली आहे. शिवरायांनी ‘राज्यव्यवहारकोश’ लिहवून घेताना जो स्वकीयतेला वरीष्ठता देण्याचा देशहितकारी दृष्टीकोन ठेवला होता, तोच दृष्टीकोन ह्यापाठीदेखील आहे. मॉरिस्कोंना हाकलताना स्पॅनिश राष्ट्रभक्तांचा जो दृष्टीकोन होता, तोच अगदी तोच दृष्टीकोन आहे हा! त्यामुळेच एक ठरलेला वर्ग सोडला तर सबंध देश पक्षीय आणि पंथीय अभिनिवेश बाजूला ठेवून ह्या आरंभाचे स्वागतच करेल. हे पहिले पाऊल अशीच इतर अनेक पावले घेऊन येवो. महाराष्ट्रातही त्याच औरंगज़ेबाच्या नावाने ‘औरंगाबाद’ नांदतंय. महाराष्ट्राच्या भाळावरील ही मुघली अत्याचारांची खूणदेखील लवकरच पुसली जावो. जेथे-तेथे केवळ आणि केवळ खऱ्या देशभक्तांनाच स्थान व वरीयता मिळो. हीच आनंदवनभुवनी प्रार्थना!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (‘सामना’, दि. ६ सप्टेंबर दिनी ‘उत्सव’ पुरवणीत प्रकाशित झालेला लेख. गंमत अशी की, हा लेख सुमारे ८-९ दिवसांपूर्वी लिहिलेला आहे. तोपर्यंत ना कुणी मिशाळ तरस बरळलं होतं ना कुणी खुदानंदी कोल्हा. त्यामुळे ह्या लेखात मी व्यक्त केलेलं भाकीत तंतोतंत खरं ठरलं असंच म्हणायला हवं! माझे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी पाहा: www.vikramedke.com)

    image

  • उडी, नव्हे भारतीय स्वातंत्र्याची गुढी : भाग २

    सावरकरांनी मार्सेल्स बंदरात उडी ठोकून जो ‘भूतो न भविष्यति’ पराक्रम केला आणि त्यांच्या ह्या कुटील डावाला बळी पडून मूर्ख इंग्रज पहारेकऱ्यांनीही त्यांना तसेच नौकेवर नेण्याचा गाढवपणा केला, त्याचे पडसाद अवघ्या जगभर उमटल्याचे आपण मागील लेखांकात पाहिलेच. ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की, दोन देशांतील वादांचा निकाल ज्या हेगस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयात दिला जातो, त्या न्यायालयात सावरकरांपायी इंग्लंडला आणि सावरकरांच्या डावात ओढल्या गेलेल्या फ्रान्सलाही जावे लागले. तसा करारच दोन्हीही देशांत ४ आणि ५ ऑक्टोबरदिनी झालेल्या पत्रव्यवहारान्वये झाला. न्यायालयासमोर एकच विषय होता – Ought Vinayak Damodar Sawarkar, in conformity with the rules of International Law to be or not to be surrenderred by the Government of the Britanic Majesty to the Government of the French Republic.

    यथाविधी न्यायाधीशमंडळ ठरवले गेले. अध्यक्षस्थानी होते, बेल्जियमचे भूतपूर्व पंतप्रधान M. Beernaert. ब्रिटनचे प्रतिनिधी होते Earl of Desert तर फ्रान्सचे प्रतिनिधी होते Louis Renault. याखेरीज नॉर्वेचे एक भूतपूर्व मंत्री Graham आणि हॉलंडच्या वरीष्ठ सभागृहाचे (Second Chamber) सदस्य Jonkheer A. F. De Savornin Lohman असे दोघे त्रयस्थ राष्ट्रांचे प्रतिनिधी होते. कामकाज असे चालणार होते की, दोन्हीही पक्ष ६ डिसेंबर १९१० दिनी न्यायालयाच्या कार्यालयात आपापली बाजू मांडणाऱ्या लेखाच्या प्रत्येकी १५ प्रती सादर करतील. पुराव्यासाठी व संदर्भ म्हणून काही कागदपत्रे वापरावयाची असतील, तर त्यांच्याही सत्यापित प्रती त्याचवेळी सादर करतील. प्रत्येक पक्षाला परस्पर बाजूच्या कागदपत्रांच्या २-२ प्रती देण्यात येतील व २ प्रती कार्यालयाच्या नोंदीसाठी राहातील. त्यानंतर १७ जानेवारी दिनी दोन्हीही पक्ष वरील पद्धतीनेच आपापले उत्तर व प्रमाणभूत पुरावे सादर करतील. ह्या उत्तरांनाही प्रत्युत्तरे द्यावयाची शक्यता व आवश्यकता निर्माण झाल्यास ती वरील उत्तरे सादर केल्यापासून १५ दिवसांचे आतच करावी लागतील. ह्यानंतर न्यायाधीश-मंडळ १४ फेब्रुवारी १९११ दिनी हेग येथे स्थानापन्न होईल व प्रत्येक पक्षाचा १-१ प्रतिनिधी त्यांच्यापुढे उपस्थित राहून आपले म्हणणे लेखी वा तोंडी आवश्यकतेनुसार मांडेल. यानंतर प्रत्युत्तरे व साक्षीही आवश्यकतेनुसार होतील. त्यानंतर न्यायमंडळ बसल्यापासून ३० दिवसांचे आत अथवा लेखी स्पष्टीकरण सादर झाल्यापासून ३० दिवसांचे आत निर्णय देणे न्यायमंडळावर बंधनकारक राहिल. परंतु न्यायाधीश-मंडळाच्या मागणीनुसार व दोन्हीही पक्षांच्या संमतीनुसार ही मुदत वाढवताही येऊ शकते (संदर्भ: २५ ऑक्टोबर १९१० दिनी लंडन येथे झालेला करार).

    ह्याप्रमाणे खटल्याचे कामकाज चालले व निकाल आला तो अर्थातच फ्रान्सच्या विरोधात! येथे खालील विधेये लक्षात घेणे अतिशय आवश्यक आहे –
    १) न्यायाधीश मंडळ ठरवताना जर्मनी, इटली, रशिया इ. युरोपातील ताकदवान राष्ट्रांच्या प्रतिनिधींना न नेमता बेल्जियम, हॉलंड व नॉर्वे ह्या तुलनेने दुर्बळ व दुय्यम राष्ट्रांच्या प्रतिनिधींनाच तेवढे नेमले गेले. ताकदवान राष्ट्रांपैकी एकाचाही प्रतिनिधी ह्या मंडळावर नसणे, ही गोष्ट अतिशय शंकास्पद होती. हा अर्थातच इंग्लंडचा धाकदपटशा होता.
    २) न्यायालयाचे कामकाज पहिला आणि शेवटचा दिवस वगळता पूर्णतः बंद दाराआडच चालले. हे सत्यान्वेषणात अर्थातच बाधक होते.
    ३) ज्या व्यक्तीसंदर्भात हा सगळा घाट घातला गेला, त्या सावरकरांना आपली बाजू मांडण्याची साधी संधीसुद्धा दिली गेली नाही. Jean Longuet नामक गृहस्थांनी सावरकरांची बाजू मांडली (‘कैसर-ए-हिंद’मधील एम. पी. टी. आचार्य यांचा १० जानेवारी १९४३ चा लेख).
    ४) बरे करारानुसार कामकाज किमान महिनाभर चालेल असा अंदाज होता. एवढेच कश्याला, तर कामकाजास मुदत वाढवून द्यावी लागते की काय अशीही शक्यता त्या करारातच समाविष्ट केली गेली होती. प्रत्यक्षात १४ फेब्रुवारीला सुरु झालेल्या खटल्याचा निकाल दहाव्याच दिवशी म्हणजे २४ फेब्रुवारीलाच देऊनही टाकला गेला होता. खटला म्हणजे नुसता फार्सच होता, हे यावरुन उघडच दिसते! एवढे असूनही अखेरीस न्यायालयाला लाजेकाजेस्तव का होईना पण ‘सावरकरांना पकडण्याच्या व तदनंतर ब्रिटिश पोलिसांच्या हवाली करण्याच्या कामी हलगर्जीपणा झाला’ हे मान्यच करावे लागले.
    ५) आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला अडकून (Pending) असताना ब्रिटिशांनी भारतात सावरकरांवर त्याच संदर्भात खटला चालवणे कायद्याप्रमाणे चुकीचे होते. पण दरम्यानच्या काळातच भारतात नाशिक-कट-खटल्याचा निकाल लावण्यात येऊन सावरकरांना पहिली जन्मठेपदेखील सुनावण्यात आली. बरे, हा खटला प्रकरण हेगकडे जाण्यापूर्वीच सुरु झाला म्हणावे, तर जानेवारीतच म्हणजे हेगचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच ब्रिटिशांनी सावरकरांवरील दुसऱ्याही आरोपाची चौकशी सुरु केली, एवढेच नव्हे तर महिना संपायच्या आतच म्हणजे ३० जानेवारी दिनी त्याही खटल्याचा निकाल लावून सावरकरांना दुसरी जन्मठेपदेखील सुनावली. ब्रिटिशांच्या ह्या कुटील खेळीमुळे हेगचा निकाल येण्याआधीच सावरकरांवर ‘दोषी’ असल्याचा शिक्का बसला व अर्थातच आंतरराष्ट्रीय न्यायमंडळाचे मत सावरकरांविषयी आपसूकच कलुषित झाले. त्यामुळे सावरकरांना फ्रान्सच्या ताब्यात दिल्याने काहीही साधले जाणार नाही असेच न्यायमंडळाचे मत पडले.

    सावरकरांना अवैधरित्या अटक केल्यावर जश्या जगभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, तश्याच या निकालामुळेही उमटल्या. काही उदाहरणे देणे अगदीच विषयाला धरुन ठरेल. खालील सर्व संदर्भ शि. ल. करंदीकरलिखित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र’मधून –
    १) ‘लंडन टाईम्स’चा हेगस्थित प्रतिनिधी लिहितो की, हेगचा निकाल देताना न्यायमंडळाची एकवाक्यता नव्हती; एवढेच नव्हे तर फ्रान्सने मांडलेले मुद्दे पुर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले.
    २) ‘पोस्ट’ ह्या जर्मन वृत्तपत्राने लिहिले की, सदर निर्णायाने सावरकर-प्रकरणाच्या खऱ्या मुद्द्यालाच बगल दिली आहे.
    ३) ‘मँचेस्टर गार्डियन’ने लिहिले की, हेगचा निर्णय वाचून लोक आश्चर्याने स्तिमित होऊन जातील.
    ४) ‘डेली न्यूज’ने तर लिहिले की, ह्या निर्णयामुळे आरोपींना असलेल्या परदेशात आश्रय मिळवण्याच्या अधिकाराचाच संकोच झाला आहे.
    ५) ब्रिटिश सांसद Wagewood ह्यांनी पं. श्यामजी कृष्ण वर्मा यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले की, “सावरकर-प्रकरण मुळात त्रयस्थांकडे सोपविणे ही फ्रान्सची घोडचूक असल्याचे L’Humanite वृत्तपत्राचे म्हणणेच शेवटी खरे ठरले. माझ्या एका सांसद मित्राने मला खात्रीपूर्वक सांगितले होते की, फ्रान्सने आपली बाजू जेव्हा महत्वाची विधेये वगळून मांडली तेव्हाच फ्रान्सचे हरणे ठरुन गेले होते”.

    युरोपातली वृत्तपत्रे सावरकरांना ‘Martyr’ म्हणून गौरवित असताना आपल्याकडील अँग्लो-इंडियन वृत्तपत्रे मात्र हर्षभरित झाली होती. एकाने तर ‘The rascal at last met his fate’ अशी नीच भाषा वापरण्याइतपत मजल मारली.

    आणि सावरकर..? ज्याच्यापायी सबंध जग ढवळून निघत होते, ते सावरकर ह्यावेळी काय करीत होते?तो क्रांतियोगी शांत, अविचल, स्थितप्रज्ञ अवस्थेत डोंगराच्या तुरुंगात अंदमानला जाण्याची वाट पाहात दिवस कंठत होता. इंग्लंडला मान खाली घालायला लावून भारतीय स्वातंत्र्ययुद्ध सातासमुद्रापल्याड नेत जगभर गाजविण्याचा त्यांचा हेतू पुरेपूर सफल झाला होता. प्राप्त परिस्थितीत याहून अधिक काही करता येण्यासारखे नव्हतेच. ना सावरकर हेगच्या निकालावर अवलंबून होते. एखाद्या आरोपीला जर दोन वेगवेगळ्या अपराधांसाठी दोन वेगवेगळ्या जन्मठेपी सुनावल्या असतील, तर कायद्यानुसार त्या दोन्हीही एकत्र करुन एकच जन्मठेप भोगावयाची असा नियम असतानाही सावरकरांच्या बाबतीत मात्र स्वतःच केलेला कायदा मोडून ब्रिटिश त्यांना एकामागोमाग एक दोन जन्मठेपी – म्हणजे ५० वर्षे शिक्षा भोगायला लावत होते. ब्रिटिश सरकार सावरकरांना किती घाबरुन होते, याची याहून मोठी काय पावती हवी? हेगचा निकाल येण्याआधीच सावरकरांनी अन्यायाचा पहाड सोसला होता. त्यापुढे हेगचा निकाल म्हणजे किस झाडकी पत्ती! गंमत म्हणजे दोन जन्मठेपी सलग भोगण्याचा निर्णय घेऊन जो इंग्रज अधिकारी सावरकरांकडे आला, त्याला वाटले सावरकर आता रडतील – मग रडतील!! उलट हसत हसत सावरकर त्याला म्हणाले, “चला, एका मागोमाग एक दोन जन्म शिक्षा भोगण्याच्या निमित्ताने का होईना पण तुमच्या ख्रिस्ती सरकारने आम्हां हिंदूंचा पुनर्जन्माचा सिद्धांत तर मानला”!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच विविध विषयांवर लेखकाची व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

    image

  • उडी, नव्हे भारतीय स्वातंत्र्याची गुढी!!

    ८ जुलै १९१० दिनी स्वा. सावरकरांनी त्रिखंडात गाजलेली उडी मारली. म्हणजे नेमकं काय केलं? गुडघ्यात मेंदू आणि त्या मेंदूलाही मूळव्याध झालेले बिग्रेडी सोडले, तर का त्या उडीला जगभरचे इतिहासकार एवढं महत्त्व देतात? सावरकरांनी उडी मारली ती ‘मोरिया’ नौका मार्सेल्स (फ्रान्स) येथील धक्क्यावर उभी असताना पोर्टहोलमधून! लक्षात घ्या, जहाज ते धक्क्याची भिंत हे अंतर आहे सुमारे ८.५ फूट. सावरकरांचा देह ५-५.५ फुटाचा. म्हणजे उडी मारताना सावरकरांना मोकळी जागा किती मिळतेय? अवघी २.५-३ फूट!! जरादेखील इकडेतिकडे झालं, तरी एकतर कपाळमोक्ष तरी होणार वा हातपाय तरी तुटणार! कारण पुन्हा पोर्टहोल ते समुद्रसपाटी ही उंची आहे सुमारे २७ फूट! एवढ्या उंचीवरुन सावरकर समुद्रात पडले. समुद्रात बरं का! मामाच्या गावच्या विहिरीत नव्हे!! त्यानंतर अवघ्या काही क्षणांत त्यांनी पोहत पोहत जहाजाच्या सुकाणूला वळसा घातला आणि ते बंदराच्या दुसऱ्या भिंतीशी आले! ही भिंत होती सुमारे ९ फूट. शिवाय सतत पाण्याच्या संपर्कामुळे अर्थातच निसरडी झालेली! सावरकर ही ९ फुटांची निसरडी भिंत अवघ्या काही पळांमध्ये चढले, यावरुन कल्पना करा की काय अचाट सामर्थ्याचा माणूस असेल तो. सावरकर बंदरावर पोहोचले, तेव्हा कुठे जहाजावर पहारेकऱ्याच्या लक्षात आलं की, ‘बंदी पळाला’. नाहीतर इतका वेळ सगळे शुंभासारखेच बसून होते. मग धावाधाव सुरु झाली. मग सावरकरांना पकडलं गेलं, जहाजावर परत आणलं गेलं आणि मग पुढचा प्रवास सुरु झाला. (सर्व संदर्भ श्रीमती अनुरुपा सिनार ह्यांच्या संशोधनातून). हे वर्णन वाचायलाही अधिक वेळ लागला असेल, इतक्या कमी वेळात ही जगाच्या इतिहासावर कायमचा परिणाम करणारी घटना घडून गेली. सावरकरांना एकदा एका चिनी सहबंद्याने विचारलं होतं की, ‘किती महिने पोहत होता’? त्यावर सावरकर म्हणाले, ‘महिने कसले? पाच मिनिटंही पोहलो नसेन’!

    मग आता प्रश्न असा उभा राहातो की, जी उडी मारुन पुन्हा अटक होईपर्यंत पाच-दहा मिनिटेसुद्धा धड गेली नव्हती, तिला इतिहासाने एवढं महत्त्व का द्यावं? पलायन म्हणाल, तर कुणी म्हणेल ते फसलेलं पलायन होतं. साहस म्हणाल, तर कुणी म्हणेल ते वाया गेलेलं साहस होतं. खरंच का ते फसलेलं पलायन आणि वाया गेलेलं साहस होतं? याचं उत्तर अवघ्या तीनच दिवसांत वृत्तपत्रांनी दिलं!!

    १) ‘ल लिबर्सियन’ ह्या वृत्तपत्राने ११ जुलै १९१० ला संपादकीय लिहिलं, “इंग्लंडचे कुख्यात साम्राज्य हे रक्तपात व दडपशाहीवरच आधारलेले आहे. सावरकरांना फ्रान्सच्या भूमीवर केलेली अवैध अटक हे त्याचेच प्रतीक आहे. सरकारने फ्रेंच राज्यक्रांतीची वैभवशाली मर्यादा राखायला हवी व सावरकरांचा ताबा मिळवून त्यांना संपूर्ण संरक्षण द्यावयास हवे”.
    २) ‘ल ह्युमनाईत’ने १२ जुलै १९१० दिनी ह्या घटनेचे वर्णन ‘फ्रान्सच्या राज्यक्रांतीशी प्रतारणा’ असे केले.
    ३) ‘द प्रेझेन्स’ने फ्रान्सच्या विदेशमंत्र्यांकडे मागणी केली की, ‘सावरकरांना ताबडतोब परत मिळवावे’.
    ४) ‘ल एब्लर’ने १६ जुलै १९१० ला लिहिले की, “स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना आश्रय देण्याची फ्रान्सची परंपरा आहे. तिलाच फ्रेंच सरकारच्या भ्याडपणामुळे काळीमा फासला गेलाय. प्रत्येक फ्रेंच माणसाला शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे”.
    ५) ‘ल टेम्पस’ने १८ जुलैला लिहिले की, “सावरकरांच्या अलौकिक शौर्याचे कौतुक प्रत्येक फ्रेंच माणसाने करावयास हवे. सावरकरांची मुक्तता व सन्मानपूर्वक फ्रान्समध्ये आगमन हे फ्रेंच सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठी सावरकरांवरील अन्याय दूर होईपर्यंत कुणाही फ्रेंच माणसाने विश्रांती घेता कामा नये”.
    ६) ‘ल मातिम’ने २१ जुलैला लिहिले की, “फ्रेंच सरकारने सावरकरांना सोडवले नाही, तर जगात तोंड दाखवायला जागा राहाणार नाही”.

    इंग्लंडमध्येही धुमश्चक्री सुरु झाली. सावरकरांच्या खेळीमुळे ब्रिटिशच कसे ब्रिटिशांवर तुटून पडले पाहा –
    ७) द डेली मेल’चे संपादक रॉबर्ट लिंड २२ जुलैला लिहितात, “ब्रिटीश पोलिसांच्या नीच कृतीमुळे अन्य देशांमध्ये आश्रय घेण्याच्या कायद्याची थट्टाच झाली आहे. कायद्याची अक्षरशः टवाळी केली आहे आपण ब्रिटिशांनी”.
    ८) ‘द मॉर्निंग पोस्ट’ने ३० जुलैला लिहिले, “कायद्याचे सार्वभौमत्व जपण्याचा ब्रिटनने आजवर अभिमान बाळगला होता, तो आपण स्वत:च्याच हातांनी आज उद्ध्वस्त केला”.

    भारतमंत्री लॉर्ड मोर्लेंना चक्क आपले पद गमवावे लागले. इतर देशांत काय झाले –
    ९) १२ जुलैच्या ‘द बर्लिन पोस्ट’ ह्या जर्मन वृत्तपत्राच्या अंकात लिहिलेय, “इंग्लंड आजवर जगाला अक्कल शिकवत आलाय, पण स्वतः मात्र किती पाखंडी आहे पाहा. सावरकरांना पकडून प्रत्यक्ष कायद्याचाच बळी दिला त्यांनी”.
    १०) इटलीतील रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. झान्द्रीन ह्यांनी सावरकरांच्या मुक्ततेसाठी आंदोलन आरंभले. इटलीत!!
    ११) स्विस वृत्तपत्र ‘डेर् वॉण्डरर’ लिहिते, “ब्रूटसच्या खंजिराप्रमाणे विश्वासघात करुन ब्रिटिश सरकारने स्वातंत्र्यदेवतेचा खून केलाय”.
    १२) ‘ल सोसिएत’ हे बेल्जियन वृत्तपत्र लिहिते, “इंग्लंडच्या एका कृतीने सबंध युरोपला तमोयुगात लोटलेय”.
    १३) ब्रिटनमधील स्पेनचे उपाधिकारी पिअरॉ, पॅराग्वेचे राजदूत जॉम्बॉ, पोर्तुगालचे राजदूत इ. सर्व उच्चाधिकाऱ्यांनी ब्रिटिश सरकारचा निषेध केला आणि ब्रिटनची कारवाई अनैतिक आहे व सावरकरांना तात्काळ फ्रान्समध्ये आश्रय द्यावा, असे लेखी पत्र दिले.
    १४) ‘द असाही शिम्बुन’ ह्या जपानी वृत्तपत्रानुसार जपानचे सांसद मोयो यांनी संसदेत सावरकरांच्या मुक्ततेची मागणी प्रतिपादली.

    उपरोक्त सर्व संदर्भ डॉ. प. वि. वर्तकांच्या ‘सावरकर – चावट की वात्रट’मधून. आंतरराष्ट्रीय राजकारणात असा सर्वत्र दबाव निर्माण झाल्यामुळे अखेरीस २९ जुलैला फ्रेंच सरकारने सावरकरांच्या मुक्ततेची अधिकृत मागणी केली आणि अवघे प्रकरणच हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले! विचार करा, एका गुलाम देशातला एक साधासा कैदी, पण त्याच्या एकाच डावामुळे फ्रान्स आणि इंग्लंड हे युरोपातले दोन ‘दादा’ देश चक्क न्यायालयात एकमेकांशी भांडताहेत आणि ह्या सगळ्याला कारणीभूत असलेले सावरकर मात्र गावातल्या गालात हसत मजा पाहाताहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल इंग्लंडच्या बाजूने लागला खरा, पण इंग्लंडने शेकडो वर्षे झडून कमावलेला सन्मान सावरकरांनी अवघ्या पाचच मिनिटांत धुळीस मिळवला होता! ह्या निकालाचा परिणाम एवढा खोल झाला की, त्यानंतर अवघ्या ५ च दिवसांत चक्क फ्रान्सच्या पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागला! आता बोला!! सावरकरांच्या ह्या कुटील खेळीमुळे इतिहासात पहिल्यांदाच जगाला समजले की, भारत नावाचा कुणीतरी देश आहे जो आपल्या स्वातंत्र्यासाठी झगडतोय. नाहीतर तोपर्यंत सगळेच आपल्याकडे दुर्लक्ष करायचे! ह्या घटनेमुळे सावरकरांचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रभाव पडला, तो कायमचाच. याच प्रभावाचा पुढे सुभाषबाबूंना उपयोग झाला! अशी ही सावरकरांची त्रिखंडात गाजलेली उडी. अवघ्या जगाला प्रेरणा देणारी. कवींनी थेट हनुमंताच्या उडीसोबत तुलना केलेली. जगाच्या इतिहासात कायमची छाप सोडणारी! काय गंमत आहे पाहा, वर मी संदर्भ दिले आहेत की अवघ्या जगाने काय प्रतिक्रिया दिली. त्यावरुन दिसते की, साऱ्या जगाने सावरकरांच्या चातुर्याला कसा बरोब्बर प्रतिसाद दिला. राजकारणच ना ते! सावरकरांनी साऱ्या जगाचाच पट केला आणि चाल रचली. केवढे मोठे साहस! आपल्याला अभिमान वाटायला हवा याचा. पण आपल्याकडची काही डुकरं मात्र केवळ ‘सावरकर आपल्या जातीचे नाहीत’ एवढ्या एकाच कारणासाठी ह्या उडीची निर्भत्सना करतात. सावरकरांना ‘संडासवीर’ सारखे गलिच्छ दूषण देतात. अरे पावट्यांनो, सावरकरांनी त्या जहाजाच्या संडासातून उडी मारली म्हणून आज तुम्ही मुक्त राहून तोंडाचा कमोड करु शकता, हे विसरु नका!! अन्यथा आज तुम्ही आडून आडून देशशत्रूंचे तळवे चाटताय, ते प्रत्यक्षात चाटत बसावे लागले असते तुम्हाला!! असो. ही तर झाली गद्दारांची लायकी. पण प्रत्येक सच्च्या भारतीयास नेहमीच सावरकरांच्या ह्या उडीचा, नव्हे भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या गुढीचा अभिमान वाटत राहिल. आणि कोटी कोटी मस्तके स्वातंत्र्यवीरांपुढे नतमस्तक होत राहातील, होतच राहातील!!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा: www.vikramedke.com)

    image

  • डोवालसाहेबांच्या भाषणातले कटू तात्पर्य

    हिंदुस्थानचे राष्ट्रीयसुरक्षा-सुमंत (‘सल्लागार’ या अरबी-उद्भव शब्दासाठी मी योजलेला संस्कृतनिष्ठ मराठी शब्द. एकतर शिवकालीन इतिहासामुळे ‘सुमंत’ सर्वांना माहिती आहे आणि शिवाय तो उपयोजण्यास सोपाही आहे! मूळ रामायणकालीन संस्कृत शब्द आहे ‘सुमंत्र’ अर्थात ‘चांगले सुचविणारा’!) श्री. अजित डोवाल यांनी तब्बल ७ वर्षे पाकिस्तानात हेरगिरी करत काढली आहेत. काही दिवसांपूर्वी ‘विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशन’च्या कार्यक्रमात सहभागी झाले असताना श्री. डोवाल यांनी स्वतःच एक अनुभव सांगितला होता. मला तो मोठा अर्थपूर्ण वाटल्यामुळे येथे सांगतोय.

    डोवालसाहेब पाकिस्तानात असताना मुसलमानवेष करून राहायचे. लाहौरला (प्रभू श्रीरामांचे सुपुत्र ‘लव’ यांच्या नावावरून असलेले मूळ हिंदू नाव ‘लवपूर’) एक मोठी ‘मज़ार’ आहे. तिथे ते एकदा गेले. धार्मिक विधी करीत असताना त्यांना जवळच बसलेल्या एका म्हाताऱ्या हाजीने हाक मारून जवळ बोलावले. डोवालसाहेब त्यांच्याकडे गेले. दुआ-सलामच्याही आधी हाजीसाहेब ताडकन म्हणाले, “तू हिंदू आहेस”!
    डोवालसाहेब गडबडले, पण त्यांनी चेहऱ्यावर तसे भासवले नाही. चेहरा निर्विकार ठेवून ते म्हणाले, “तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी मुसलमानच आहे”!
    त्या हाजीने डोवालसाहेबांना आपल्या मागे येण्याची खूण केली. त्याप्रमाणे हे त्याच्या पाठोपाठ गेले. काही कक्ष ओलांडल्यावर एका लहानश्या कक्षात दोघेही पोहोचले. हाजीसाहेबांनी दार आतून लावून घेतले आणि पुन्हा डोवालसाहेबांकडे वळून म्हणाले, “तू हिंदू आहेस”!
    डोवालसाहेब विचारले, “असं कश्यावरून म्हणता”?
    त्यावर हाजीसाहेबांनी हसून सांगितले, “कारण, तुझे कान टोचलेले आहेत”!
    आता असा बिनतोड पुरावाच दिला म्हटल्यावर डोवालसाहेब वरमले. कहीतरी बोलून वेळ मारून नेण्यासाठी ते म्हणाले, “होय, मी पूर्वी हिंदू होतो. आता मात्र धर्मांतरण करून मुसलमान झालोय. अनेक वर्षे झाली त्याला”.
    हाजीसाहेब तरीसुद्धा हसून म्हणाले, “तू खोटं बोलतोयस. तू अजूनही हिंदूच आहेस”!
    आता मात्र डोवालसाहेबांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. ते काही बोलणार तेवढ्यात हाजीसाहेबच पुढे म्हणाले, “आणि माहितीये, मी तुला कसे काय ओळखले? कारण, मीसुद्धा हिंदूच आहे”!!
    डोवालसाहेब धक्क्याने पडायचेच बाकी राहिले होते! हाजीसाहेब (?) पुढं सांगू लागले, “या हरामखोरांनी माझं सारं कुटूंब मारून टाकलं. बलात्कार केले, लुटालूट केली. मी एकटाच वाचलो. आणि आता या मज़ारच्या आश्रयाने राहातोय. इथले लोक मला हाजी समजतात. मीही बाहेर त्यांच्यासारखाच नमाज़ पढतो. पण आत या माझ्या खोलीत मात्र मी रोज गुपचुप यांची पूजा करतो -“, असं म्हणून त्यांनी एक शंकराची आणि दुर्गेची मूर्ती डोवालसाहेबांना दाखवली. “..तुझ्यासारखा कुणी दिसला की मला माझं कुटूंबच परत मिळाल्यासारखं वाटतं बघ! आणि म्हणूनच माझी सगळीकडे बारीक नजर असते, की कर्णछेदन केलेला कुणी सापडतो का”!

    मित्रहो, ‘अमन की आशा’ आणि पाकिस्तानशी चर्चा या गोष्टी बोलायला खूप सोप्या आहेत. किंबहूना त्या बोलायला फारशी अक्कलसुद्धा लागत नाही. केवळ मनात अहिंसा आणि प्रेमाच्या बेगडी कल्पना असल्या की काम भागतं! परंतु खरं सांगायला गेलं, तर पाकिस्तान हा केवळ एक आतंकवादी देशच नाहीये तर ‘दार-उल-इस्लाम’च्या अभद्र कल्पनेने पछाडलेला एक अभद्र देश आहे. तो जोपर्यंत आपली जिहादी मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी मैत्री शक्यच नाही कारण, भारतासारख्या काफीर देशाला ते सातत्याने शत्रूच समजणार! कालच पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकला २६ वर्षं तुरुंगवासाची शिक्षा फर्मावली – अपराध काय, तर एका दूरचित्रवाणी कार्यक्रमात तिने एका तथाकथित धार्मिक गीतावर नृत्य केले होते! या दर्जाचे माथेफिरू आहेत ते. आणि आधुनिक शिक्षण वगैरे मिळाल्यावर तर त्यांची धर्मांधता उलट अजूनच वाढते! या सगळ्याचे मूळ त्यांच्या ‘शिकवणूकी’त आहे. ती शिकवणूक जोपर्यंत आहे, तोपर्यंत शांतता नांदणे शक्यच नाही! आणि दुर्दैवाने ती शिकवणूक भारतातही जोरदार प्रचारली जातेय. आपले पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी याबाबतीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय योग्य भूमिका घेताहेत, पण तेवढेच पुरेसे नाहीये. आपणही यात हातभार लावला पाहिजे. आपल्या डोक्यात घुसलेलं हे ‘फेक्युलॅरिझम’ नावाचं भूत समूळ उखडून फेकलं पाहिजे. लक्षात घ्या, कट्टरतेला प्रेमाने जिंकणं हा कल्पनाविलासापुरताच असलेला बेगडी आदर्शवाद झाला. प्रत्यक्ष युद्धभूमीवर मात्र कट्टरतेला त्याहून आक्रमक अशी प्रतिकट्टरताच हरवते, हा इतिहास आहे. तेव्हा हीच वेळ आहे कट्टरांच्या विरोधात प्रतियोगिता म्हणून का होईना, पण धर्माभिमानी होण्याची! नाहीतर तो दिवस दूर नाही की आपल्याला आपल्याच भूमीवर त्या हाजीसाहेबांसारखेच अज्ञातवासात जगावे लागेल. ‘लवपूर’ही एकेकाळी आपलीच भूमी नव्हती का! डोवालसाहेबांच्या भाषणातलं कटू तात्पर्य हे असं आहे!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने ऐकण्यासाठी/आपल्या परिसरात आयोजिण्यासाठी क्लिक करा:  www.vikramedke.com)

    image