आनंदवनभुवनी

जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशावर, विशेषतः परधर्मीय देशावर आपला राजनैतिक आणि भौगोलिक अधिकार प्रस्थापित करतो; तेव्हा सगळ्यात आधी कोणते काम करत असेल, तर ते म्हणजे आपली जी कोणती संस्कृती असेल ती तिथे रुजवायचा प्रयत्न करतो. यातून काय साधतं? एकतर यामुळे तेथील लोकांना कमतर लेखून त्यांच्यावर राज्य करणं सोपं जातं. आणि दुसरा व सर्वांत महत्वाचा फायदा म्हणजे कालांतराने तेथील जनतेला आक्रमकांची संस्कृती (मग ती कदाचित पाशवी असली तरीही!) हीच आपली संस्कृती वाटू लागते, जेणेकरुन भविष्यात आक्रमकांचं त्या भूभागावरील राजकीय वर्चस्व जरी संपलं तरीदेखील संस्कृती प्रदुषित करुन ठेवल्यामुळे पिढ्यानपिढ्या तो भूभाग आक्रमकांचा सांस्कृतिकदृष्ट्या दासच बनून राहातो! याचं सर्वांत सोपं उदाहरण म्हणजे इंग्रजी ही भाषा! जगभर हाताची सगळी बोटे भरतील इतकेसुद्धा देश इंग्रजीला किंमत देत नसताना, आपल्याकडे मात्र छातीठोकपणे इंग्रजी ही अवघ्या जगाची भाषा असल्याचे खोटेच सांगितले जाते. का? कारण गोऱ्या राज्यकर्त्यांनी तसे रुजवलेय ना! तीच गोष्ट ऊर्दूची! मुळात ऊर्दू नावाची कोणतीही स्वतंत्र भाषाच अस्तित्वात नसूनदेखील आम्ही मात्र अस्तित्वात नसलेल्या भाषेचे गोडवे गातो!! राईट बंधूंना मिळालेले पेटंट हे विमानाचा शोध लावण्यासाठी मिळालेले नसून ‘विमानात उपयोगी अश्या नव्या सुधारणा करण्यासाठी’ (पेटंट क्रमांक US 821393) मिळालेले असतानाही आमच्याकडे रेटून राईट बंधूंनीच विमानाचा शोध लावल्याचे शिकवले जाते. ही अवस्था! मग राईट बंधूंच्या हयातीतच त्या पेटंटवर शेकडो केसेस चालल्या आणि जर्मनीतल्या एका कोर्टाने तर राईट बंधूंच्याच विरोधात निकाल दिला होता, हे कुठले ठाऊक असायचे!! शोध न लावणाऱ्या राईट बंधूंना श्रेय द्यायला आमच्याकडचे तथाकथित विद्वान पळपळ पळतात, परंतु तोच शोध आमच्या प्राचीन ग्रंथांतरी कुणी दाखवून दिला, तर मात्र नाके मुरडतात! परंतु त्याचवेळी तोफांच्या निर्मितीचे श्रेय बाबराला, रॉकेटच्या निर्मितीचेचे श्रेय टिपूला देताना मात्र ही मंडळी थकणार नाहीत आणि कुणी जर ह्या शोधांची वर्णने आपल्याकडच्या परंपरांमध्ये दाखवून दिली तर डोळ्यांवर कातडे ओढण्यातही कसूर करणार नाहीत!! परकीय आक्रमकांच्या कौतुकात वाहावत जाण्याची अशी एक-दोन नव्हे तर अक्षरशः सहस्रावधी उदाहरणे सांगता येतील. विवेकपिसाट फेक्युलर मंडळी किती जरी उरस्फोड करुन ह्या प्रकाराला ‘गंगाजमनी तहज़ीब’सारखे गोंडस नाव देत असली, तरीही ह्या प्रत्यक्षात मानसिक दास्यत्वाच्या रुपाने शिल्लक उरलेल्या राजकीय आणि धार्मिक दास्यत्वाच्या खुणा आहेत. मग ती आमच्या पवित्र वास्तूंची केलेली तोडफोड असो, परकीयांचे ते पाशवी आक्रमक असूनदेखील केलेले उदात्तीकरण असो, अट्टाहासाने त्यांचाच इतिहास शिकायला लावणे असो, रस्ते-वास्तू इ. ना त्यांची नावे देणे असो; थोडक्यात सांगायचे तर आपल्या देशात शत्रू म्हणून आलेल्या व इथले खऱ्या अर्थाने भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक नुकसानच केलेल्या कुणाच्याही नावाने इथले काहीही ओळखले जाणे हा सच्च्या राष्ट्रभक्तांसाठी एक सल असतो आणि असा सल मुळासकट नष्ट करणारा कुणीही नायकच ठरतो. दिल्लीतील ‘औरंगज़ेब मार्गा’चे नाव बदलून ‘एपीजे अब्दुल कलाम मार्ग’ करण्याच्या घटनेकडे ह्याही दृष्टीकोनातून पाहायला हवे. सवयीचा नसल्यामुळे थोडा जड जाईल हा दृष्टीकोन, पण अस्सल प्रामाणिक दृष्टीकोन आहे हा – परकीयांचे लांगूलचालन करणारा स्वार्थी नज़रीया नव्हे!!

अनेक दिवसांपासूनच्या नामांतर मागणीस अखेरीस शासकीय ठप्पा मिळालाय. ह्यानिमित्ताने हिंदुस्थानात येऊन लुटालूट, जिहाद व चैन करणाऱ्या मुघलांच्या नावे असलेले एक प्रतीक तरी कमी झाले!! अर्थातच बर्नॉल हाच ज्यांचा राष्ट्रीय-लेप आहे, अश्या विवेकपिसाटांना (हा शब्द ‘लिंगपिसाट’च्या चालीवर वाचावा!) आता औरंगज़ेबाच्या प्रेमाचे उमाळे फुटू लागतील, तो कसा महान वगैरे होता ह्याचे साक्षात्कार झडू लागतील. औरंगज़ेबाची प्रतिमा उंचावण्याची अहमहमिका सुरु होईल. होऊ द्या. काय वाट्टेल ते करु द्या. त्यांचे कामच आहे ते. परकीयांचे पाय चाटण्यावरच तर त्यांची दुकानदारी चालते ना! पण आपण सामान्य माणसं आहोत. दुकानदार नाही आणि तथाकथित फेक्युलर विचारजंत तर त्याहूनही नाही. त्यामुळे आपण तर्कशास्त्र वापरायचे. समर्थांनी औरंगज़ेबाला ‘औरंग्या पापी’ का संबोधले असावे, ह्याचा विचार करायचा. मोठमोठे ग्रंथ धुंडाळण्याचीही गरज नाही. सर्वांत पहिल्यांदा दृष्टीसमोर येईल, ते ह्या औरंगज़ेबाने आमच्या शिवछत्रपतींशी मांडलेले जन्माचे वैर!! असल्या वैऱ्याचे नाव इथल्या रस्त्याला द्यायचे? तेही शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याने अवघ्या शंभर वर्षांतच मुघलांची (!) दिल्ली शब्दशः अंकीत केली होती, हा सिद्ध इतिहास असताना? जरा शोध घेतला तर लक्षात येईल की, ह्या औरंगज़ेबाने तख़्तासाठी आपल्या सख्ख्या बापाला कैदेत ठेवले आणि भावाचा हालहाल करुन खून केला. त्या औरंगज़ेबाचे आपल्या श्रीरामांच्या आणि लक्ष्मण-भरत-शत्रुघ्नांच्या देशात गुणगान चालवून घ्यायचे? कौरवांनी असाच राज्याच्या हव्यासापोटी पांडवांचा अतोनात छळ केला. त्यांना तर खलनायकच मानतो ना आपण? मग मुघलांचाच उदोउदो का म्हणून चालवून घ्यायचा? केवळ काही जणांचा जीव मतपेढीत अडकलाय म्हणून? आणि ह्या पार्श्वभूमीवर आठवा अवघ्या बत्तिशीच्या शंभूराजांचा ह्याच औरंगज़ेबाने आत्यंतिक पंथवेडातून केलेला खून!! ह्या आठवणीनंतरही जर कुणी औरंगज़ेबाची बाजू घेणार असेल, तर त्याच्या वंशशुद्धीवर शंका येणे अगदीच साहजिक ठरेल!!

कुणाला वाटेल की, हे इतिहास-भुगोलाचे हिंदुकरण आहे. नाही. औरंगज़ेबाचा आम्ही मुसलमान म्हणून कधीच द्वेष करत नाही. तो मुसलमान नंतर होता, आधी एक पंथवेडा देशशत्रू होता ह्याची प्रत्येक न् प्रत्येक हिंदुत्ववाद्याला पूर्णतया जाणीव आहे. आणि म्हणूनच धर्माच्याच नावे बोलायला गेलो तर त्या रस्त्याला एका मुसलमानाचेच नाव दिले गेलेले असूनही सर्वच हिंदुत्ववादी मनापासून आनंदी आहेत. कारण, अब्दुल कलामही मुसलमान नंतर, परंतु आधी एक सच्चे देशभक्त होते हे त्याच हिंदुत्ववाद्यांना तितक्याच मनापासून ज्ञात आहे म्हणूनच!! काय करणार, हे हिंदुत्ववादी मेले असलेच असतात, जात-धर्म न बघता चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणतात. हिंदू बघून द्वेष आणि अहिंदू बघून त्याच्या देशघातकीपणाच्या प्रमाणात वाढतं प्रेम, ह्या तर सोयीस्कर फेक्युलरांच्या खोडी! त्या भोळ्या-भाबड्या हिंदुत्ववाद्यांना कुठल्या जमायला!!

थोडक्यात सांगायचे झाले तर, आज ह्या नामांतराच्या निमित्ताने परकीय दास्यत्वाच्या गलिच्छ खुणा पुसणाऱ्या एका मंगलपर्वाची सुरुवात झाली आहे. शिवरायांनी ‘राज्यव्यवहारकोश’ लिहवून घेताना जो स्वकीयतेला वरीष्ठता देण्याचा देशहितकारी दृष्टीकोन ठेवला होता, तोच दृष्टीकोन ह्यापाठीदेखील आहे. मॉरिस्कोंना हाकलताना स्पॅनिश राष्ट्रभक्तांचा जो दृष्टीकोन होता, तोच अगदी तोच दृष्टीकोन आहे हा! त्यामुळेच एक ठरलेला वर्ग सोडला तर सबंध देश पक्षीय आणि पंथीय अभिनिवेश बाजूला ठेवून ह्या आरंभाचे स्वागतच करेल. हे पहिले पाऊल अशीच इतर अनेक पावले घेऊन येवो. महाराष्ट्रातही त्याच औरंगज़ेबाच्या नावाने ‘औरंगाबाद’ नांदतंय. महाराष्ट्राच्या भाळावरील ही मुघली अत्याचारांची खूणदेखील लवकरच पुसली जावो. जेथे-तेथे केवळ आणि केवळ खऱ्या देशभक्तांनाच स्थान व वरीयता मिळो. हीच आनंदवनभुवनी प्रार्थना!!

— © विक्रम श्रीराम एडके
(‘सामना’, दि. ६ सप्टेंबर दिनी ‘उत्सव’ पुरवणीत प्रकाशित झालेला लेख. गंमत अशी की, हा लेख सुमारे ८-९ दिवसांपूर्वी लिहिलेला आहे. तोपर्यंत ना कुणी मिशाळ तरस बरळलं होतं ना कुणी खुदानंदी कोल्हा. त्यामुळे ह्या लेखात मी व्यक्त केलेलं भाकीत तंतोतंत खरं ठरलं असंच म्हणायला हवं! माझे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी पाहा: www.vikramedke.com)

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *