काल काँग्रेसची अधिकृत प्रतिक्रिया होती की, हा भाजपचा अंतर्गत मामला आहे. आता लवकरच राहूल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी घोषित करून त्यांच्या नावे फटाके-पेढे आदी जल्लोष करवून घेण्यात आल्यास मला नवल वाटणार नाही. अर्थातच काल काँग्रेसने दिलेली प्रतिक्रिया यावेळी भाजप देईल! परंतू पंतप्रधानपदाचे प्रत्याषी घोषित करणं हा खरंच एखाद्या पक्षाचा अंतर्गत मामला असतो का हो? तसं असतं तर भाजप काल सहजच आडवाणींचं नाव घोषित करू शकले असते आणि सोनिया गांधी २००४ सालीच पंतप्रधान झाल्या असत्या. तेव्हा असा कोणताही अंतर्गत मामला नसतो, तर जो काही असतो तो पक्षाला जनतेतून बहुमत मिळवून देऊ शकणारा निर्णय असतो. थोडक्यात, तो जनतेच्या दबावाचा परिणाम असतो – एकप्रकारे जनतेचाच निर्णय असतो.
त्यातल्या त्यात भाजपचे श्रेय एवढेच की, त्यांनी अनेकांची नाराजी पत्करून जनतेचा हा निर्णय स्वीकारण्याची हिंमत दाखवली. काँग्रेसही यावर राजकीय प्रतिक्रिया देत न बसता जर काल लोकांनी उत्स्फूर्तपणे वाजवलेल्या फटाक्यांचा, वाटलेल्या पेढ्यांचा आणि केलेल्या जल्लोषाचा योग्य अन्वयार्थ लावेल तर बरं. जनतेला बदल हवा आहे आणि जनता ते वारंवार कृतीतून दाखवून देते आहे. जनमताच्या विरूद्ध जाणारे इतिहासाच्या पानापुरतेही उरत नाहीत, हा इतिहास आहे. काँग्रेसचे तसे काही होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे. अर्थात त्यांनी स्वत:ला सावरण्याची आणि जनतेला किंमत देण्याची नितांत आवश्यकता आहे.
दुसरीकडे भाजप आणि सामान्य मोदीसमर्थकांनीही आता जल्लोषात वेळ न घालवता आता मतदारांमध्ये जागृती करायची आवश्यकता आहे. आम्ही तुमच्या भावनेला प्रतिसाद दिला आता चेंडू तुमच्या कोर्टात आहे, ही बाब जनतेपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. तरच त्यांना कालचा निर्णय “कॅश” करता येईल. लढाई जिंकलेली नाही – खरं तर अजून लढाई सुरूदेखील झालेली नाही. रणनीतीचे काही टप्पे तेवढे गाठले गेले आहेत. या युद्धाला कुणी “ॐ × रोम” म्हणो अथवा अन्य काही, परंतू आता कुठे खऱ्या युद्धाला तोंड फुटेल. तयार राहा. तूर्तास, “आरंभ हैं प्रचंड..”!
– © विक्रम श्रीराम एडके.

Leave a Reply