Category: Vaidik Knowledge

  • पंचेश्वरम्

    लंकादहन करून हनुमान जसा परततो तसे युद्धकांड सुरू होते. श्रीराम हनुमानाला लंकेचे वर्णन करायला सांगतात. लक्षात घ्या, हनुमान हा जरी सीतेचा शोध लावण्यासाठीच गेलेला असला, तरीही लंकादहन करताना आणि त्याहीपूर्वी लंकेत भ्रमण करताना त्याने अतिशय बारीक नजरेने सगळे टिपलेय. तेच तो आता रामाला तपशीलवार सांगतो की (युद्ध. सर्ग ३), “लंका अत्यंत संपन्न असून मत्त हत्तींनी व्याप्त आणि रथांनी समृद्ध आहे. तिला चार मोठमोठे आणि दुर्जेय असे दरवाजे आहेत. या चारही दरवाजांवर यंत्रे बसवलेली आहेत ज्यांच्यातून शत्रूसैन्यावर बाणांचा आणि दगडांचा वर्षाव केला जाऊ शकतो. तिथेच लोखंडाने बनलेल्या अनेक काटेदार शतघ्नीसुद्धा तैनात आहेत. लंकेच्या चहुबाजूंनी अभेद्य अशी तटबंदी आहे. तिच्याभोवती खंदक आहेत ज्यात मगरी आणि मोठमोठे मासे वास करतात. खंदकांवर उपरोक्त चारही दरवाजांना जोडणारे असे चार पूल आहेत. शत्रूसैन्य या पुलांवर चढलं की त्या पुलांना पाण्यात पाडण्याची यंत्रांकरवी सोय केलेली आहे. या पैकी कोणत्याच कामांमध्ये ढिलाई न होण्याकडे रावण स्वतः जातीने लक्ष पुरवतो. याउप्पर लंकेच्या भोवती या कृत्रिम तटबंदीखेरीज नद्या, पर्वत आणि जंगलदेखील आहे. लंका ही समुद्रकिनाऱ्यापासून बरीच आत दक्षिणेकडे आहे. त्यातही ती उंचावर वसलेली आहे. तिच्या पूर्वद्वारावर दहा सहस्र राक्षसांचा खडा पहारा आहे. हे सैनिक हातात शूल धारण करतात आणि युद्धप्रसंगी तलवारींनी झुंजतात. असंच दक्षिणद्वारी एक लाखाचं चतुरंग अर्थातच हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ यांनी सुसज्ज सैन्य आहे. लंकेच्या पश्चिमेकडे सैन्यसंख्या दहा लाख आहे. हे सैनिक अस्त्रशस्त्रांमध्ये निपुण आहेत व त्यांच्याकडे ढाल आणि तलवारीसुद्धा आहेत. उत्तरेच्या दरवाजापाशी असेच दहा कोटी सैनिक उभे आहेत. त्यांच्यापैकी काही रथी आहेत व काही अश्वारोहणात निपुण असून सगळेच उच्चकुळांमध्ये जन्मलेले वीर आहेत. लंकेच्या मध्यभागी साधारण एक कोटीचे सैन्य असावे. परंतु मी इकडे येण्यापूर्वी खंदकांवरील सगळे पुल तोडून टाकलेयत. खंदक फोडून टाकलेयत. सगळीकडे आगी लावल्यायत. ठिकठिकाणी तटबंदी तोडून टाकलीये आणि सुमारे एक चतुर्थांश सैन्यदेखील मारलेय. जर आपण एखाद्या उपायाने समुद्र लांघू शकलो, तर लंका नष्ट झालीच म्हणून समजा”!

    हनुमानाची लंकेवर आक्रमण करण्यासाठी घाई चाललीये याचे कारण उघड आहे की, त्याला रावणाचे झालेले नुकसान दुरुस्त करायला वेळच मिळू द्यायचा नाहीये. त्याने लंकेचे अतिशय बारीकसारीक वर्णन केलेय. जणू लंकेचा शब्दबद्ध नकाशाच! त्यातही एक गोष्ट विशेष लक्ष वेधून घेते. ती म्हणजे (श्लो. २४ ते २७) लंकेच्या पूर्वेला दहा हजार, दक्षिणेला एक लाख, पश्चिमेला दहा लाख आणि उत्तरेला दहा कोटी सैन्य आहे. आता खरोखरच त्या काळी लंकेची लोकसंख्या एवढी होती का या भानगडीत न पडता आपण मुद्याची गोष्ट तेवढी लक्षात घेऊ. मुद्याची गोष्ट अशी की, लंकेच्या पूर्वेकडे सगळ्यांत कमी सैन्य आहे आणि घड्याळी पद्धतीने ते अनुक्रमे दक्षिण, पश्चिम व उत्तरेपर्यंत वाढत जाते. काय कारण असावे याचे? श्रीलंकेचे भौगोलिक स्थान पाहा. पूर्व आणि दक्षिण किनारपट्टीपासून कोणत्याही देशाची भूमी भरपूर लांब आहे. याउलट उत्तर आणि पश्चिमेपासून भारत खूपच जवळ आहे. त्यामुळेच रावणाने उत्तर आणि पश्चिमेकडे, जिथून आक्रमण होण्याची सर्वाधिक शक्यता आहे, तिकडे महाप्रचंड आणि विशेष सैन्य ठेवलेय तर पूर्व व दक्षिणेकडे तुलनेने कमी सैन्य ठेवलेय.

    ही तर झाली सामरिक रचना. परंतु श्रीलंकेच्या भोवती आज अशीच एक आध्यात्मिक रचनासुद्धा आहे. कोणती? लंकेच्या किनारपट्टीवर वेगवेगळ्या ठिकाणी पाच वेगवेगळी शिवमंदिरे आहेत. यांनाच पंचेश्वरम् असे म्हणतात! पहिले आहे ते उत्तरेला जाफनास्थित नगुलेश्वरम्. वायव्येला असलेले मन्नार जिल्ह्यातील केतिश्वरम् हे दुसरे. तिसरे आहे ते ईशान्येकडील त्रिंकोमाली जिल्ह्यातील कोणेश्वरम्. चौथे पश्चिमेला पुट्टालम जिल्ह्यातील मुन्नेश्वरम्. आणि पाचवे आहे दक्षिणेकडील मातरा जिल्ह्यातील तोण्डेश्वरम्! जणू श्रीलंकेचे रक्षण करण्यासाठी तिच्याभोवती उभे असलेले भगवान शिवशंकरच! त्यांचीही रचना बहुतांशी रावणाच्या सैन्यरचनेसारखीच आहे. उत्तरेपाशी तीन शिवमंदिरे आहेत आणि पश्चिम व दक्षिणेकडे अनुक्रमे एक एकच शिवमंदिरे आहेत. जणू एखादं आध्यात्मिक सुरक्षकवचच! कदाचित उत्तर आणि पश्चिमेकडून अर्थातच भारतातून जास्त दळणवळण असल्याने भाविकांची संख्या जास्त असेल व म्हणूनही मंदिरे तिकडे अधिक संख्येने असू शकतील. सतराव्या शतकात पोर्तुगीझ मिशनऱ्यांनी ही पाचही मंदिरं ध्वस्त केली होती. अनेक ठिकाणी मंदिरांच्या जागी चर्च बांधले होते. तिथे भाविकांनी वेळोवेळी परत मंदिरे उभारली आहेत.

    मी येत्या मार्चमध्ये श्रीलंकेला जातोय. या वेळच्या वेळापत्रकात सगळेच नाही तरी पंचेश्वरांपैकी दोन मंदिरांचे दर्शन घेण्याचा कार्यक्रम आहे. एक कोणेश्वरम् आणि दुसरे मुन्नेश्वरम्! यांपैकी कोणेश्वरमला दक्षिण कैलास (तमिळ: तेन कैलासम्) असे म्हणतात. याचं कारण काय असावं याचा शोध घेताना मला एक ब्लॉग आढळला. त्यात कैलास पर्वत आणि कोणेश्वरम् यांचे भौगोलिक स्थान दिले आहे. कैलासाचे स्थान ३१° ४’ उत्तर व ८१°१८’ पूर्व असे सांगितले आहे तर कोणेश्वरमचे स्थान ८°३५’ उत्तर व ८१°११’ पूर्व असे सांगितले आहे. (गुगलवर हीच स्थाने अनुक्रमे ३१°०६’ उत्तर व ८१°३१’ पूर्व आणि ८°५८’ उत्तर व ८१°२४’ पूर्व अशी आढळतात.) उपरोक्त ब्लॉगच्या लेखकाचा दावा आहे की, दोन्ही स्थाने पूर्णार्थाने जरी नाही तरी बऱ्यापैकी एकाच रेखांशावर येतात! हे वाचायला छान वाटतं, परंतु भूगोलातील कुणा तज्ञाने याची सत्यता पडताळून सांगितली तरच विश्वास ठेवलेले चांगले. दुसरे असे की, स्थानिक मान्यतेनुसार रावणाचा वध केल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी ज्या स्थानी भगवान शिवाची अर्चना केली, त्या स्थानावर मुन्नेश्वरम् मंदिर उभे आहे. मला तरी वाल्मिकी रामायणात असा कोणताच संदर्भ अद्याप आढळलेला नाही. परंतु कधीकधी स्थानिक श्रद्धा व परंपरांचे महत्त्व लेखी गोष्टींपेक्षा अधिक हे असतेच.

    दोन्हीही मंदिरांचे दर्शन घेतल्यावर त्यांच्याबद्दल सविस्तर लिहितोच. मी येत्या २ मार्च ते ९ मार्च कालावधीत श्रीलंकेला जातोय. रामायणाशी संबंधित काही स्थळे, काही पर्यटनस्थळे पाहातानाच तिथे रोज एक याप्रमाणे सोबत येणाऱ्या यात्रेकरूंसाठी वाल्मिकींच्या रामायणावर पाच व्याख्याने देणार आहे मी. तुम्हीही सहभागी होऊ इच्छित असाल, तर अद्याप जागा शिल्लक आहेत. ‘माय ट्रॅव्हल वर्ल्ड’च्या श्रीमती वीणा निंबाळकर यांच्याशी +919921907772 या क्रमांकावर संपर्क साधा आणि आजच आपल्या जागा आरक्षित करा! चला अनुभवूया रावणाच्या राज्यात रामायण!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • आत्मबोध

    ‘धप्प’ असा जोरदार आवाज झाला आणि अरुळसामीने आवाजाच्या दिशेने पाहिले. काय घडले, हे लक्षात यायला क्षणभरही नाही लागला त्याला.लागलीच बोंब ठोकली त्याने! त्याचा आवाज ऐकून बघता-बघता इतर नावाडीही आसपास जमा झाले त्याच्या.
    “काय झालं रं बोंबलायला”, एकाने विचारलं!
    “त्यो.. त्यो सन्याशी.. त्यो मला दर्यापारच्या फत्तरावर न्हे म्हनत हुता.. त्यानी समिंदरात उडी मारलीन् ना..”
    कुणाला काहीच लक्षात येईना हा काय सांगतोय ते. मग पुन्हा पुन्हा खोदून विचारल्यावर तुकड्या तुकड्यांनी माहिती हाती लागू लागली ती अशी की, एक कुणीतरी सन्यासी, ‘पलिकडे श्रीपादशिलेवर पोहोचवशील का’, असं विचारत नावाडी अरुळसामीकडे आला होता. हे तर अरुळसामीचे रोजचेच काम! त्याने ताबडतोब नेण्या-आणण्याचा दर सांगितला. सन्याश्याकडे तर एक फुटकी कवडीदेखील नव्हती. तो खट्टू झाला. त्याने अरुळसामीला विनवणी करून पाहिली, पण भाडं मिळाल्याशिवाय जायला नकार दिला अरुळसामीने! सन्याश्याने वाट पाहिली की कुणी भाविक आपला खर्च करेल का. पण तसं तिथे कुणीच दिसत नव्हतं. अखेरीस सन्याश्याने जरा विचार केला, काश्या आवळला आणि ‘जय माँ कालीऽ’ अशी आरोळी ठोकत समुद्रात उडी ठोकला व पोहत पोहत पुढे जाऊ लागला. हे दृश्य पाहून अरुळसामी घाबरला. पट्टीच्या पोहोणाऱ्यासाठीदेखील अंतर काही कमी नव्हते ते. शिवाय समुद्रात अनेकविध पाशवी जलचर भरलेले! पोहत पोहत श्रीपादशिलेपर्यंत पोहोचण्याची शक्यता जवळजवळ शून्यवत् होती! आपला दोन पैश्यांचा व्यवसाय एखाद्याच्या जीवावर बेतणार या भीतीने घाबरून जाऊन अरुळसामीने बोंब ठोकली!

    “आरं पन तुला तरी काय येवढं नडलं होतं पैश्यांचं? नावेत येवढे लोक बसवून न्हेतोस, त्यांच्यात एकजण फुकट न्हेला अस्ता तर काय झिजली आस्ती तुझी व्हडी”, एकाने विचारले.
    अरुळसामी अजूनच खचला. म्हणाला,
    “माजी लई म्होटी चुकी झाली ह्ये तर खरंच, पन आता येळ दवडायला नगं! आधी त्या साधुबाबाला वाचिवलं पाह्यजे”!
    हे म्हणणं सगळ्यांना पटलं. ताबडतोब एक नाव काढण्यात आली आणि तिच्यात बसून ८-१० कोळी श्रीपादशिलेच्या दिशेने निघाले. रस्त्यात ना कुठे सन्यासी दिसला ना काही झटापट झाल्याचं लक्षण! कुणा मगरीने वा माश्याने फाडलं तरी या समुद्रात काय समजणार म्हणा! अखेरची आशा म्हणून सारे श्रीपादशिलेवर पोहोचले. आणि त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही – चिंब भिजलेला तो पंचविशीचा बलदंड सन्यासी शिलेवर ध्यानस्थ बसला होता. या मंडळींची चाहूल लागताच त्याने डोळे उघडले. एवढं दिव्य करीत श्रीपादशिलेवर पोहोचणे ही केवढीतरी मोठी गोष्ट होती. सन्यासी साधासुधा तर खचितच नव्हता. या दिव्यतेने दिपलेल्या सर्वांनी वाकून नमस्कार केला सन्याश्याला.

    काही क्षण शांततेत गेले. पहिला शब्द अरुळसामीच्याच तोंडून बाहेर पडला,
    “म्हाराज मला क्षमा करा. म्या चुकलो. पैश्यापायी खुळावलो हुतो म्या. तुमचं मोठंपण वळखू शकलो न्हाई मी. जो मानूस इथवर यायला सोत्ताच्या जीवाची बी पर्वा करत न्हाई, त्याचा हितं येन्यामागं नक्कीच कायतरी हेतू आसनार. कायतरी दैवी काम आसनार. मी मूर्ख तुमच्या या कानामध्ये येत होतो. नरकात बी जागा मिळनार न्हाई मला”!
    अरुळसामी स्वत:च्याच थोबाडीत मारून घेऊ लागला. ते पाहून सन्यासी झटकन पुढे झाला. अरुळसामीचे हात धरले आणि आसपासच्या समुद्राहूनही अधिक शांत, धीरगंभीर आवाजात म्हणाला,
    ‘वेडे की खुळे नावाडीबाबा तुम्ही? का स्वत:ला प्रताडित करताहात? अहो आईची इच्छा होती लेकराने पोहत पोहत तिच्यापाशी यावं, ती तिने पूर्ण करून घेतली. तुमचा कुणाचाही काहीही दोष नाही यात. खरंच”!
    सन्याश्याचा तो दृष्टीकोन आणि आभाळभर मोठेपण सर्वांना एका क्षणात वश करून गेले! एकाने धीर करून विचारले,
    “म्हाराज हितं तुमची जेवनाची काही सोय..”?
    “सोय अशी काहीच नाही. इथे ध्यान करण्यासाठी आलोय मी. मातेने जेवू घातलं तर जेवेन, अन्यथा ध्यान संपेपर्यंत उपवेशन!”, सन्यासी सहजपणे म्हणाला!
    “त्ये काही न्हाई, माझ्यामुळं तुमास्नी तरास झालाय, तुमी हितं आसेपत्तुर रोज म्याच जेवन आनून द्येनार तुमाला. तुमी आरामात ऱ्हावा, ध्यान करा. म्या घेईन सारी काळजी. येवढं तरी प्रायश्चित्त घेऊंद्याच मला”, अरुळसामीने जाहीर करून टाकलं!
    “जशी आईची इच्छा”, सन्याश्याने हसून मान डोलावली!
    “पन म्हाराज, तुमचं नाव काय? कुठनं आलात? तमिळ तर वाटत न्हाईत तुमी?”, अरुळसामीने विचारले.
    “होय, इथला नाही मी. बंगालहून आलोय. तीर्थयात्रा करतोय मी सध्या. अवघा देश फिरलो. अंती देशाच्या शेवटच्या टोकावर ध्यान करायचं म्हणून या कन्याकुमारीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिलेवर आलो! आणि नावाचं म्हणाल, तर बरीच नावे आहेत मला. कुणी विविदिशानंद म्हणतं, तर कुणी सच्चिदानंद म्हणतं! गेले काही दिवस लोक एका वेगळ्याच नावाने हाक मारतात मला. मलाही ते नाव आवडलंय – उच्चारायला सोपं, सुटसुटीत तरीही अर्थपूर्ण – विवेकानंद! तुम्हीही हवं तर याच नावाने हाक मारा मला!”, सन्याश्याचे निरागस उत्तर!
    “स्वामी विवेकानंद”, अरुळसामीने एकवार हे नाव मनात घोळवले व सारे परत फिरले!
    त्यानंतर तीन दिवस रोज दिवसातून दोनदा अरुळसामी जेवण घेऊन यायचा व खरकटं घेऊन जायचा. या तीन दिवसांत स्वामी एक शब्दही बोलले नाहीत. सातत्याने ध्यानमग्न असायचे ते. भोजनादी विधींसाठी उठत तेवढेच!

    तिसऱ्या दिवशी चमत्कार झाला. आजवरचे सारे आयुष्य स्वामीजींच्या नजरेसमोरून सरकू लागले. प्रेमळ वडील विश्वनाथबाबू आठवले – त्यांनी शिकवलेल्या एकेक गोष्टी, बाळपणीचा रम्य, श्रीमंती काळ आठवला! दाट केसांतून मायेने हात फिरवणारी आई भुवनेश्वरी देवी आठवली! आपला झालेला नास्तिकतेकडून आस्तिकतेपर्यंतचा प्रवास नजरेसमोर उभा राहिला त्यांच्या! वडील गेल्यानंतर नशिबी आलेलं पराकोटीचं दारिद्र्य आणि त्या जीवघेण्या काळात सुखाचा झरा बनलेली श्रीरामकृष्णांची साजरी छवि डोळ्यांपुढे उभी राहिली! ठाकूर म्हणत होते, “अरे नोरेन, तुझा देव हिमालयात नाही! या.. या.. दरिद्री लोकांमध्ये आहे! होय नोरेन, हा दरिद्रीनारायणच तुझा परमेश्वर आहे! यांची सेवा कर, तीच ईश्वराची सेवा ठरेल! ना जीवाची सेवा कर ना शिवाची, ‘शिवभावे जीवसेवा’ कर नोरेन ‘शिवभावे जीवसेवा’ कर! तोच तुझा मार्ग आहे! हिमालयात जाऊन या दु:ख-दैन्यापासून पळू नकोस. लोकांमध्ये जा! त्यांचं दु:ख अनुभव! ही अनुभूतीच तुला मार्ग दाखवेल! मार्ग – दु:खहरणाचा आणि मोक्षाचाही”!
    आणि आपणही कश्यातच, अगदी आश्रमातही न गुंतता तीर्थयात्रेला निघालो होतो! सारा भारत फिरलो आपण! पराकोटीची श्रीमंती पाहिली आणि तेवढंच दारिद्र्यही अनुभवलं! सोन्यारुप्यांत खेळणारे लोक पाहिले आणि एकवेळच्या जेवणाला मोताद माणसेही पाहिली! जनतेशी काहीही देणंघेणं नसलेले संस्थानिक जमिनदार पाहिले, जुलमी इंग्रज पाहिले; तर दुसरीकडे खेतडीच्या महाराजांसारखे जाणते शासकही पाहिले! अज्ञानात खितपत पडलेला समाज पाहिला, तसेच टिळकांसारखे ज्ञानीही पाहिले! हा देश शेकडो रंगांनी नटलेला तर खराच!
    पण एक आहे, या देशातला गरीब माणूस उपाशीपोटी झोपेल एकवेळ, पण त्याच्या मनात समाधान असेल! आस्थेचं, आस्तिकतेचं आणि अध्यात्माचं समाधान! याउलट इंग्रज शासकांकडे पैश्याने विकत घेण्याजोग्या साऱ्या काही सुखसुविधा आहेत, पण शांत झोप नाही, समाधान नाही!
    हे दोन्ही जोडलं पाहिजे! एकत्र केलं पाहिजे!! पाश्चात्यांची औद्योगिकता टिकवून त्यांना भारतीय अध्यात्म शिकवलं पाहिजे आणि भारतीयांचं समाधान टिकवून येथे पाश्चात्य सुखसोयी आणल्या पाहिजेत! कुणीतरी पूल बनून हे काम केलं पाहिजे!
    स्वामीजींच्या नजरेसमोर दिव्य प्रकाश पसरला होता! आत्मबोधाचा हा क्षण! त्या प्रकाशात जराशी हालचाल झाली आणि स्वामीजींच्या अत्यधिक संवेदनशील झालेल्या ग्रहणक्षम मनावर तरंग उमटले,
    ‘कुणीतरी? कुणीतरी का? तूच का नाही? तूच का बनत नाहीस या दोन परस्परपूरक जगांना जोडणारा पूल?’
    स्वामीजींच्या नजरेसमोर काही दिवसांपूर्वी वाचलेली ‘जागतिक धर्मपरिषदे’ची बातमी झळकू लागली! आज त्यांच्या प्रवासाची सांगता झाली होती. तीर्थयात्रेचं उद्यापन झालं होतं. आत्मबोधाची अनुभूती झाली होती. आणि आयुष्याला उद्देश मिळाला होता!

    यानंतर काही महिन्यांतच शिकागोची ‘जागतिक धर्मपरिषद’ टाळ्यांचा कडकडाट आणि भावनातिरेकाने मारलेल्या आरोळ्यांनी दुमदुमून गेली! याला कारणीभूत होते पाच शब्द! होय, केवळ पाचच शब्दांत स्वामीजींनी उपस्थित सर्व धर्ममार्तंडांना सर्वश्रेष्ठ धर्म कोणता, ते सप्रमाण दाखवून दिले! तलवार न उगारता, कुणालाही न फसवता, रक्ताचा एकही थेंब न सांडता एका हिंदू सन्याश्याने अवघी अमेरिका जिंकून घेतली! बघायला गेलं तर केवळ पाचच शब्द! पण त्यांच्यामागे स्वामीजींची सारी तीर्थयात्रा, सारा अनुभव, भावना आणि सारी सारी आध्यात्मिक अनुभूती सामावलेली होती! ते पाच विश्वविजयी शब्द होते,
    “सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका”!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही स्वरुपात पुनप्रकाशित करू नये. केल्यास गुन्हा समजून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. आवडल्यास केवळ शेअर बटनावर क्लिक करून शेअर करावे, ही विनंती. लेखकाच्या अन्य कथा वाचण्यासाठी व ‘स्वामी विवेकानंद’ या विषयावर लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

    image

  • व्यासांची विज्ञानकथा

    भगवान परशुरामांवर जाहीर व्याख्याने देणारा मी महाराष्ट्रातील बहुतेक एकमेव वक्ता असेन. ही व्याख्यानेदेखील मी पारंपरिक भक्तिचरित्रात्मक ढंगाने देत नाही; उलट परशुरामांच्या चरित्राचे सामाजिक क्रांतिकारक, मुत्सद्दी राजकारणी इ. आजवर फारसे कुणाला माहिती नसलेले पैलू उलगडून विस्ताराने सांगत असतो. त्या ओघात खूप साऱ्या राजवंशांचे व ऋषिवंशांचे सविस्तर वर्णन येते. विशेषतः परशुरामांच्या भार्गववंशीय पूर्वजांच्या कथा येतात. त्यादेखील मी विस्ताराने सांगतो. हेतू हा की, लोकांना समजावे – ज्याकाळात इतर तथाकथित संस्कृतींना लज्जारक्षणासाठी वल्कले गुंडाळण्याचीदेखील अक्कल नव्हती आली, त्याकाळापासून भारत देश हा नुसता प्रगतच नव्हता तर आपल्याकडील थोर पुरुषांच्या व्यवस्थित वंशावळी राखण्याइतका काटेकोरदेखील होता. बायबलमध्येही अश्या वंशावळी येतात, मात्र काही अपवाद वगळता त्यांच्यामध्ये सर्वत्र परस्परविसंगतीच आढळून येते. हिंदू पुराणांमध्ये मात्र क्वचितच वंशावळी विसंगत आढळतात. याच व्याख्यानात मी ऋषि च्यवनांचीही कथा सांगतो. यांचा विवाह शर्याति राजाची कन्या सुकन्येशी झालेला होता.

    आज मी तुम्हाला याच संबंधीची एक विज्ञानकथा सांगणार आहे. तुम्ही म्हणाल की आत्तापर्यंत तर हा माणूस पुराणात होता, आता अचानक विज्ञानात कसा काय घुसला? पण मी चुकून असे बोललेलो नाहीये. मी विज्ञानकथाच सांगणार आहे. आणि तीदेखील साधीसुधी नव्हे, तर संस्कृत विज्ञानकथा! स्वत: महर्षी व्यासांनी लिहिलेली!! भागवत पुराणाच्या ९व्या स्कंधातील ३ऱ्या अध्यायात श्लोक क्र. २७ ते ३६ पर्यंत ही विज्ञानकथा येते. ती मी थोडक्यात सांगतो. इच्छुकांना ती मुळातूनच सविस्तर वाचावी!

    उपरोक्त राजा शर्यातिला सुकन्येखेरीज आणखी तीन मुले होती – उत्तानबर्हि, आनर्त आणि भूरिषेण! यांपैकी आनर्ताच्या वंशजांना ‘रेवत’ असे म्हणतात. त्यांची राजधानी होती कुशस्थली नावाची नगरी! या आनर्ताच्या मुलांमध्ये सर्वात मोठा होता ‘ककुद्मी’! त्याची मुलगी रेवती! खूप शोधूनही ककुद्मीला रेवतीलायक वर सापडत नव्हता. तेव्हा याबाबतीत मंत्रणा (सल्ला) घेण्यासाठी ककुद्मी रेवतीला घेऊन ब्रह्मलोकी ब्रह्मदेवांकडे गेला. तिथे पोहोचल्यानंतर ब्रह्मदेवांची भेट मिळण्यासाठी या दोघांना काही ‘क्षण’ (श्लोक ३०) थांबावे लागले. ब्रह्मदेव भेटल्यानंतर ककुद्मीने त्यांना नमस्कार केला. आपला येण्यामागचा उद्देश सांगितला आणि आपल्याला मुलीसाठी स्थळ म्हणून आवडलेल्या राजपुत्रांची यादीदेखील सांगितली व विनंती केली की, यातून कोणता मुलगा माझ्या मुलीसाठी नवरा म्हणून योग्य आहे, ते सांगावे. हे ऐकून ब्रह्मदेव हसले. म्हणाले, “महाराज, तुम्ही ज्यांची ज्यांची नावे सांगताहात, ते तर सर्व केव्हाच कालवश झाले. काहीकाहींच्या तर वंशातदेखील कुणी शिल्लक नाहीये सध्या. तुम्ही इकडे काही क्षण थांबलात, परंतु तिकडे पृथ्वीवर मात्र २७ चतुर्युगे (किमान २७ × १२००० × ४ = १२९६००० वर्षे) लोटली आहेत. तेव्हा तुम्ही परत जा. तुम्ही जाईपर्यंत नारायणाचा अंशावतार बलराम नावाने झालेला असेल. त्याच्याशी तुमच्या मुलीचा विवाह करा”. याप्रमाणे ककुद्मी व रेवती परत आले. रेवती व बलरामाचा विवाह झाला आणि ककुद्मी तपश्चर्येसाठी बद्रिनाथधामला निघून गेला.

    तुम्ही म्हणाल, यात विज्ञान कुठे आहे? सांगतो. भौतिकशास्त्रात सापेक्षतेचा सिद्धांत सांगितला जातो. याच सापेक्षतेच्या सिद्धांतातून एक विरोधाभास (पॅरॅडॉक्स) निर्माण होतो, ज्याला म्हणतात ‘जुळ्यांचा विरोधाभास’ (ट्विन्स पॅरॅडॉक्स). एकाच वेळी जन्माला आलेली एकसारखीच दिसणारी जुळी भावंडे. समजा वयाच्या विसाव्या वर्षी त्यांच्यापैकी एक जवळजवळ प्रकाशाच्या वेगाने अवकाशप्रवासाला गेला व समजा वीस वर्षांनी परत आला, तर इकडे पृथ्वीवर त्याचा भाऊ चाळीस वर्षांचा झालेला असेल. परंतु अवकाशगामी भाऊ मात्र त्यावेळीही विशीचाच असेल! हे घडते कारण, भौतिकशास्त्राचा नियम सांगतो की प्रकाशाच्या वेगाने जर एखादा कण मार्गक्रमण करत असेल, तर त्याच्यासाठी काळ हा थांबल्यासारखाच असतो. त्यामुळेच त्या अवकाशगामी भावंडाचे वय वाढत नाही. इकडे पृथ्वीवर राहाणारा भाऊ मात्र म्हातारा होतो! यालाच म्हणतात जुळ्यांचा विरोधाभास. हाच सिद्धांत ख्रिस्तोफर नोलानने आपल्या ‘इंटरस्टेलर’ (२०१४) या चित्रपटातही वापरला आहे. किंबहुना सध्याची अवकाशयाने प्रकाशाच्या वेगाने प्रवास करत नसूनही त्यांच्यातून प्रवास करणाऱ्यांना हा सिद्धांत सूक्ष्मप्रमाणात लागू पडतो, ज्याला ‘कालविस्तार’ (टाईम डायलेशन) असे म्हणतात. अर्थात, या विरोधाभासाची खूप सारी उदाहरणे व पर्याय आहेत, आपण समजण्यास सोपे व्हावे म्हणून सर्वात आदर्श पर्याय तेवढा पाहातो आहोत.

    उपरोक्त ‘जुळ्यांचा विरोधाभास’ सर्वप्रथम पॉल लँगेविन या शास्त्रज्ञाने १९११ साली मांडला. भागवताचा काळ हा इ. स. पू. ३५०० वर्षांपासून ते इ. स. ६०० पर्यंत वेगवेगळे संशोधक सांगतात. मात्र कुणीही संशोधक हा काळ १९११ नंतरचा असल्याचे सांगत नाही! परंतु तरीदेखील हाच जुळ्यांचा विरोधाभास व्यासांनी ककुद्मीच्या कथेत मांडल्याचे आढळत नाही का? ककुद्मी आणि रेवती प्रवास करत ‘ब्रह्मलोक’ नावाच्या ठिकाणी गेले, तिथे काही क्षण थांबले व परत आले. मात्र तेवढ्या काळात पृथ्वीवर लाखो वर्षे उलटून गेली होती. तरीदेखील परत आल्यानंतरही रेवती व ककुद्मीचे वय मात्र तेवढेच राहिले होते. ही ‘जुळ्यांचा विरोधाभास’ स्पष्ट करणारी कथाच नव्हे काय? व्यासांनी तर या कथेत ‘त्या लोकावर (ग्रहावर?) घालवलेला वेळ’ही विचारात घेतलाय!

    एक हिंदू म्हणून माझा ठाम विश्वास आहे की, आपली पुराणे हा ललित अंगाने मांडलेला का होईना पण खरा इतिहास आहे. मात्र हल्ली काही आंग्लाळलेली मंडळी भारतीय संस्कृतीचे ऐतिहासिकत्व मुळापासून नाकारतात. तर ठिक आहे. वादात नको पडायला. सदर कथा भागवतपुराणात आहे? आहे! ती ‘जुळ्यांचा विरोधाभास’ मांडला जाण्याच्या खूप वर्षे आधी लिहिलेली आहे? आहे! त्यात आजच्या जगातले विज्ञान विचारात पाडण्याइतपत प्रमाणात आहे? आहे! तर मग व्यासांनी एक काल्पनिक का होईना परंतु विज्ञानकथा लिहिली, एवढे तरी आपल्याला मान्य करणे भागच आहे. शिवाय विज्ञानकथा लिहिण्यासाठीसुद्धा कुठेतरी त्या अचूक विचारांपर्यंत पोहोचण्याइतके प्रगत विज्ञान अस्तित्वात असावे लागते. भारतीय संस्कृती व्यासांच्या काळात तेवढी तरी वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत होती, हेही मान्यच करावे लागते. कारण कल्पनेलादेखील कुठे ना कुठे वास्तवजगतातील अनुभवाचा आधार असतो; इथे तर व्यासांनी एका अतिशय तात्त्विक व गणितीय बाबीचा आपल्या कथेत खुबीने वापर केल्याचे दिसतेय! तेव्हा कुणी नाकारो वा स्वीकारो, सदर कथा खरोखर घडलेली असो वा नसो; या कथेतील वैज्ञानिकता कदापिही दुर्लक्षिण्याजोगी नाही. धर्मग्रंथ म्हणून सोडून दिलेल्या संस्कृत ग्रंथांतरी या कथेसारखीच सहस्रावधी विज्ञानरत्ने पडून आहेत. अवकाश आहे तो केवळ कुणीतरी डोळसपणे शोधण्याचा!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच अनेकानेक विषयांवर लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी संपर्क करा:  www.vikramedke.com]

    image

  • नरकचतुर्दशीच्या निमित्ताने

    व्याख्यानांच्या निमित्ताने प्रवास करताना मनुष्यस्वभावाचे अनेक नमुने पाहावयास मिळतात. वाईट कुणीच नसतं. केवळ व्यक्ती तितक्या प्रकृती एवढंच! असाच एके ठिकाणी गेलो असता, एक बाई भेटल्या. प्रचंड स्त्रीवादी! पितृसत्ताक पद्धती झुगारून समानता मागता मागता हल्लीच्या बहुतांश स्त्रीवादी बायका जश्या नकळत ‘स्त्रीवर्चस्वाचा’ टोकाचा आग्रह धरतात ना, अगदी तश्या! बोलताना त्यांच्या तोंडी एका दमात तस्लिमा नसरीनपासून ते शोभा देपर्यंत एकाहून एक नावे येत होती. स्त्रीवर किती अत्याचार होतात आणि तिने त्यापासून कशी सुटका करून घेतली पाहिजे, हाच एक धोशा. बाईंचा नवरा अजून या जगात तग धरून आहे का आणि असल्यास अश्या प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची जिद्द त्या महानुभावाने कशी कमावली, हे विचारण्याचा मला वारंवार मोह होत होता. पण तो मी टाळला. म्हटलं, बाई रागाने अंगावर धावून आल्या तर मी एवढास्सा जीव कधी कसा चेंदामेंदा होऊन जाईन समजणारही नाही! वर मीच स्त्रीयांवर अत्याचार वगैरे करणारा ठरेन ते वेगळंच! काहीही न बोलणारा श्रोता मिळाल्यामुळे बाईंना बहुतेक अजूनच चेव आला असावा. त्या त्वेषाने माझ्या दिशेने बोट करत म्हणाल्या, “तुम्ही इतिहासकारही स्त्रियांचा केवढा अपमान करता. तुम्ही म्हणता ‘हिस्टरी’ म्हणजे ‘हिज् स्टोरी’! का असं? इतिहास काय फक्त तुम्हां पुरुषांचाच असतो का? बायकांचा नसतो? ‘हिज् स्टोरी’च का? ‘हर स्टोरी’ का नाही? सांगा ना. सांगा. आता सांगा..!!”

    खरं तर इतिहासाचा ‘गमभन’ही धड माहिती नसणाऱ्या मला बाईंनी थेट ‘इतिहासकार’च ठरवून टाकल्यामुळे मी मनापासून सुखावलो होतो. पण म्हणून काय हा असा आपल्याला समस्त पुरुषजातीचे प्रतिनिधित्व (तेही न मागताच!) देत केलेला हा असा हल्ला सहन करायचा? मी हात उंचावत त्यांना थांबवलं. म्हणालो, “मी भारतीय संस्कृतीला मानणारा माणूस आहे. आपली संस्कृती ना स्त्रीवादी आहे ना तुम्हाला वाटते तशी पुरषसत्ताक. ती सत्यवादी आहे! आता राहिला प्रश्न ‘हिज् स्टोरी’ की ‘हर स्टोरी’चा, तर ते केवळ इंग्रजाळलेल्यांचे चोचले आहेत. आपल्याकडे ‘इतिहासा’ला ‘इतिहास’ असंच म्हणतात. इति + ह + आस = इतिहास. शब्दशः  अर्थ होतो, ‘पूर्वी असे घडले’!! यात कसला आलाय स्त्री आणि पुरुषाचा संबंध”?

    या बोलण्याने बाई जराश्या वरमल्या. मूक श्रोत्याकडून अश्या ‘वेगळ्याच’ प्रत्युत्तराची त्यांना अपेक्षा नसावी. मी पुढे म्हणालो,
    “तुम्ही ‘न स्त्रीस्वातंत्र्यमर्हति’ सांगणाऱ्या मनू ऋषींना स्त्रियांचा शत्रू ठरवता. पण कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का की, मनू नेमकं काय म्हणाले आहेत? अध्याय ९ वा, श्लोक ३ –
    ‘पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।
    रक्षंति स्थविरे पुत्रा: न स्त्रीस्वातंत्र्यमर्हति।।’
    अर्थात स्त्रीचे कुमारवयात पिता रक्षण करतो, तरुणपणी पति आणि उतारवयात मुलगा. स्त्रीला स्वातंत्र्य नसते! इथे ‘स्वातंत्र्य’ हा शब्द आधीच्या तीन ओळीत आलेल्या ‘रक्षण’ या शब्दाच्या संदर्भात वापरलाय. आणि सर्वत्र वर्तमानकालीन रुपे वापरली आहेत, त्याअर्थी मनू काही ‘स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नयेत’ असं आज्ञार्थी बोलत नाहीयेत, तर उलट त्याकाळचं समाजजीवन समजावून सांगताहेत की, ‘आपल्या समाजात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीच्या रक्षणाची इतकी काही काळजी घेतली जाते की, तिला स्वसंरक्षणासाठी करण्याची वेळ यावी इथपर्यंत गोष्टी पोहोचूच दिल्या जात नाहीत! थोडक्यात स्त्रीच्या सुखासाठी पुरुषांना कामाला लावलंय. यात काडीचा तरी स्त्रीद्वेष आहे का”?

    ही ‘बातमी’ बाईंना नवीच असावी! परंतु त्यांच्या स्त्रीवादी (की स्त्रीनियंत्रणवादी!) विचारांना असा पराभव झेपणारा नसावा. त्या काही न बोलता उठून गेल्या. हे सारं आजच आठवण्याचं कारण असं की, आज आहे नरकचतुर्दशी! आजच्याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून त्याने जबरदस्तीने बंदीवान करून ठेवलेल्या स्त्रीयांची सुटका केली होती. परंतु बराच काळ नरकासुराच्या ताब्यात राहिलेल्या त्या स्त्रियांच्या चारित्र्यावर मूर्ख समाजाने संशय घेणे साहजिकच होते. अहो, जिथे समाजाने साक्षात सीतामाईंच्या चारित्र्यावर संशय घेतला होता, तिथे या सामान्य स्त्रियांची काय कथा? किंबहूना शतपैलू मतिच्या श्रीकृष्णांसमोर या ऐतिहासिक घटनेचे उदाहरण असणारच! प्रभू श्रीरामचंद्रांचे त्यासंदर्भातले वर्तन अतिशय सरळमार्गी होते. श्रीकृष्ण अतिशय कुटील नीतीज्ञ! विवाहित सीतेवर संशय घेणे वेगळे आणि या कुमारिकांवर संशय घेणे वेगळे! श्रीकृष्ण एका शब्दाचेही स्पष्टीकरण देण्याच्या फंदात पडले नाहीत. त्यांनी सरळ त्या सगळ्या १६१०० युवतींशी एकाच मंडपात विवाहच करून टाकला. आणि एवढ्या एकाच कृतीने स्वत: राजा असलेले श्रीकृष्ण त्या स्त्रियांच्या चारित्र्याबाबत काय विचार करतात, याचा संदेश लोकांपर्यंत न बोलताच पोहोचवला! आता काय बिशाद होती कुणाची त्या तरुणींच्या चारित्र्यावर संशय घेण्याची! शिवाय या एकाच कृतीने त्या स्त्रियांचे पुनर्वसन तर झालेच, शिवाय त्यांना समाजात आवश्यक तो दर्जाही मिळाला! एकाच फटक्यात सोळा सहस्र आयुष्ये बरबाद होण्यापासून वाचली! श्रीमद्भागवतपुराणाच्या १० व्या स्कंधाच्या ५९ व्या अध्यायात या सर्व युवतींना श्रीकृष्णांनी स्वतंत्र महाल, दास-दासी इ. पुरवल्याचेही उल्लेख आहेत. त्याअर्थी स्त्रीमुक्तीवाल्यांनी आजचा दिवस ‘खराखुरा स्त्रीमुक्तीदिन’ म्हणून साजरा करायला हरकत नाही!!

    माझा स्त्रीमुक्तीवादाला काडीचाही विरोध नाही. कुणी काय विचार करावा हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. इस्लाम वा ख्रिश्चॅनिटीचा इतिहास स्त्रियांवरील अनन्वित अत्याचारांनी गच्च भरलेला आहे. त्याच्या खुणा जर पाहायच्या असतील तर आजही ISIS आणि तालिबानमध्ये काय चालतं ते तुम्ही पाहू शकता. किंबहूना त्यांच्या धर्मग्रंथांमध्येच अश्याप्रकारच्या अनेकानेक अन्यायांना नुसती परवानगीच दिलेली नाहीये, तर त्याचे धर्माच्या नावाखाली समर्थनही केले आहे. परंतु जर कुणी त्याच तागडीत हिंदू धर्मालाही तोलणार असतील, तर मात्र माझा आक्षेप आहे. धर्माचे तथाकथित ठेकेदार काय म्हणतात याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही, परंतु हिंदूंचा कोणताही धर्मग्रंथ स्त्रियांवर अत्याचार सुचवत नाही, एवढे मी एक अभ्यासक या नात्याने निश्चितपणे सांगू शकतो! आणि अतिरेकी-स्त्रीवाद्यांना आवडणार नाही, परंतु भारतीय संस्कृती कोणत्याही बाबतीत स्त्रियांची बाजू घेत नाही, एवढेही मी तितक्याच निश्चयाने सांगू शकतो. आणि न रागावता विचार करणार असाल, तर भारतीय संस्कृती कोणत्याही बाबतीत पुरुषांची बाजू घेत नाही हेही मी तितक्याच ठामपणे सांगू इच्छितो! भारतीय संस्कृती बाजू घेते ती केवळ सत्याची. त्याअर्थी हिंदू संस्कृती कायम नैसर्गिक न्यायाच्या बाजूने असते. स्त्रीवादी मान्य करणार नाहीत कदाचित, परंतु स्त्री आणि पुरुषाची रचना भिन्न असते. स्त्रीमध्ये निसर्गतःच नाजूकपणा, सौम्यता असते. हिंदू संस्कृती हे ओळखून त्या-त्या बाबींमध्ये पुरुषाला तिची काळजी घ्यायला लावते. स्त्रीला वरचा दर्जा देते. म्हणून तर ‘न स्त्रीस्वातंत्र्यमर्हति’ असा काळजीचा संदेश देणारे मनू त्याच मनूस्मृतीत ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते..’ सांगून स्त्रीला थेट देवतेचा दर्जा देतात. तद्वतच पुरुषातही निसर्गतः काही रचनात्मक वैगुण्ये असतात, तिथे हिंदू संस्कृती स्त्रियांना पुढाकार घ्यायला लावते! उदाहरणार्थ – संसाररथ हाकणे!! हे पुरुषाच्या एकट्याच्या हातचे काम नोहे!! तिथे स्त्रियांमधली विचारक्षमता, समंजसपणा, सहनशीलताच कामी येते. इतके साधे सोपे आहे हे सारे! खरं तर, आपण जेव्हा केव्हा एखाद्या गोष्टीसाठी हिंदू संस्कृतीला दोष देऊ पाहातो, तेव्हा शंभरातील नव्व्याण्णव वेळा तरी तो आपल्याच गैरसमजाचा वा अनाभ्यासाचा दोष आहे, असे खुशाल समजावे! माझे अनुभवाचे बोल आहेत हे. आपण गैरसमज करतो ते आपला हिंदू धर्म आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास नसतो म्हणून. म्हणजे दोष आपल्याच दृष्टीकोनाचा असतो, पण बोल मात्र हिंदू धर्म आणि संस्कृतीला लावला जातो. आणि नेमक्या अश्याचवेळी ‘सत्यमेव जयते’सारख्या उथळ मालिका बनवणाऱ्यांचं फावतं. मी तर त्याहीपुढे जाऊन असे म्हणेन की, आज जी स्त्रियांवरील अत्याचारांत वाढ झालेली दिसतेय ते आपली हिंदू संस्कृतीशी असलेली नाळ तुटण्यामुळे आणि आपल्या दिवसेंदिवस सेक्युलर होण्याच्या फालतू अट्टाहासामुळेच. नाहीतर जर समाजात स्त्रियांच्या चारित्र्याचे रक्षण करण्यासाठी झटणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचा आदर्श ठेवला गेला असता, नारीला देवतेचे स्थान देणाऱ्या मनूंचा आदर्श ठेवला गेला असता, तर समाजाचा स्त्रीकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही सुधारला नसता का? चुकीच्या आधुनिकीकरणाचे तोटे आहेत ते हे असे! असो. जे झाले ते झाले. इथून पुढे तरी आपण स्त्रीमुक्ती, त्यासंदर्भात भारतीय संस्कृती यांचा पुनर्विचार करायला शिकूयात. आपल्या मुलांना खरोखरचे हिंदू संस्कार देऊयात. त्यांना उद्याचे युगपुरुष श्रीकृष्ण वा स्मृतीकार मनू होण्याची प्रेरणा देऊयात. आजच्या नरकचतुर्दशीच्या निमित्ताने याच प्रेमादरपूर्वक शुभेच्छा!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच व्याख्याने डाऊनलोड करण्यासाठी अथवा आपल्या परिसरात/शाळा-महाविद्यालयांत लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

    image

  • सुसंस्कृतम्..!

    “तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाज्ञानदायकम् ।
    तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाज्ञानदायकम् ।।”

    वरवर पाहाता असे वाटेल की, इथे एकाच संस्कृत ओळीची पुनरावृत्ती करण्यात आली आहे. पण हीच तर संस्कृत भाषेची मौज आहे. जरी दोन्हीही ओळी समान असल्या तरीही दोन्ही ओळींचे अर्थ वेगळे आहेत. आणि दोन्ही ओळी मिळून एक संपूर्ण श्लोक तयार होतो.
    सुभाषितकार कुणा राजाच्या दरबारात गेलाय. तिथे त्याने पाहिले की, राजा भर दरबारात कामकाज चालू असतानाही तंबाखूचे व्यसन करतोय. ते पाहून लगेच सुभाषितकाराला ओळ स्फुरली –
    “तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाज्ञानदायकम्”.
    याची फोड होते – “तमाखुपत्रं राजेन्द्र भज मा अज्ञानदायकम्”.
    अर्थात – हे राजेन्द्रा, नशा आणणारे (अज्ञानदायकम्) तंबाखूचे पान (तमाखुपत्र) नको खाऊस (मा भज).
    राजाने यावर विचारले, “मग काय करू”?
    त्यावर सुभाषितकार पुन्हा म्हणतो,
    “तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाज्ञानदायकम्”.
    यावेळी मात्र त्याची फोड होते – “तम् आखुपत्रं राजेन्द्र भज मा ज्ञानदायकम्”.
    अर्थात – हे राजेन्द्रा, त्या (तम्) मा (म्हणजे लक्ष्मी) आणि ज्ञान देणाऱ्या (मा, ज्ञानदायकम्) आखुपत्राची (म्हणजे गणपतीची) भक्ती कर.
    अर्थातच चाणाक्ष राजाला (हो, त्याकाळचे सत्ताधारी विद्वान होते बरं का. आत्ताचे “पाँचवी पास से तेज” जरी निघाले तरी आम्हाला जग जिंकल्यासारखे वाटते!) सुभाषितकाराच्या दोन्ही ओळींचा अर्थ कळला, हे सांगणे नकोच!

    परंतू हीच संस्कृत भाषेची थोरवी आहे. या समुद्रात तुम्ही जितक्या बुड्या माराल तितकी अधिक रत्ने तुम्हाला गवसतील. उपरोक्त श्लोक हा संस्कृतातील “काव्यशास्त्रविनोद”चा केवळ एक प्रकारमात्र आहे! शिवाय एकाच ओळीतून दोन इतके भिन्न अर्थ निघतात आणि त्याद्वारे दोन्ही ओळींच्या समुच्चयास एक पूर्णत्व प्राप्त होते, यावरूनच संस्कृतची समृद्धता तुमच्या लक्षात येईल. माझ्या माहितीप्रमाणे इतकी समृद्ध भाषा अवघ्या जगात दुसरी कोणतीच नाही. आपण मात्र विनाकारणच इंग्रजीसारख्या उधार-उसनवारीवर पोसलेल्या भाषेच्या पाठी धावतो आहोत!

    – © विक्रम श्रीराम एडके.

    image

  • श्रीगणेश विज्ञान

     

    खूप दिवसांपासून या विषयावर लिहायचे मनात होते. आजचा मुहूर्त अगदी योग्य आहे. श्रीगणेश-जन्माची कथा आपणा सर्वांना माहितीच आहे.

    तरीही संदर्भासाठी थोडक्यात देतो.
    पार्वतीने आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार केली. त्यात प्राण फुंकून त्याला स्वत:चा मुलगाच मानले. पुढे या मुलाचे शिर श्रीशंकराच्या हातून उडवले जाते. पार्वतीचा विलाप पाहून शिवशंकर एखाद्या दुसर्या बालकाचे शिर आणण्याची आज्ञा …देतात. शिवगण चुकून एका हत्तीच्या पिल्लाचे शिर घेऊन येतात. मानवी शिर शोधण्याइतका वेळ उरला नसल्याने अखेरीस तेच शिर लावले जाते, आणि अश्याप्रकारे गणेशाचा जन्म होतो.”

    आता या कथेत खालील गोष्टी महत्वाच्या आहेत.

    १) देवी पार्वती आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार करतात. ही मूर्ती सजीव होते.
    २) कोणतेच दुसरे शिर न मिळाल्याने शिवगण एका हत्तीच्या पिल्लाचे शिर
    आणतात. अखेरीस तेच शिर लावले जाते.

    आता या कथेकडे व्यवस्थित पाहिल्यास कळते की ही कथा म्हणजे “क्लोनिंग” आणि “अवयावारोपण” करण्याचा जगातील पहिला प्रयोग असू शकतो. कसे ते पहा. पार्वती आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार करते,
    जी सजीव होते. जीवशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास, आपण जेव्हा एक साधी चुटकी वाजवतो, तेव्हाही सहस्रावधी पेशी शरीरापासून विलग होतात. पार्वतीने जाणून-बुजून अंगावरील मळ खरवडला होता. तिला जिवंत
    उति (tissues) मिळवावयाच्या असाव्यात ही शक्यता नाकारता येत नाही. तात्विक दृष्ट्या हे सहज-शक्य आहे. तसेच शंकराने गणेशाचे शिर उडवल्यावर घाईने दुसरे शिर हवे असते, कारण त्या बालकाचा प्राण गेला होता पण मध्ये फार काळ गेला नसल्याने “वैद्यकीय मृत्यू (Clinical Death)” झाला नसावा. शिवगणांनी वेंधळेपणा केल्यावर पुन्हा मानवी शिर शोधण्यात आणखी कालापव्यय झाला असता. म्हणून हत्तीचेच शिर बसवले गेले. हा तत्कालीन अवयावारोपणाचा प्रकार असण्यात अशक्य काय आहे? आजही विज्ञान मानवी अवयवांचे रोपण करूशकते. अजून थोडी प्रगती झाल्यावर प्राण्यांच्या अवयवांचे रोपण होऊ शकेलच ना? म्हणजे ही देखील गोष्ट तात्विक-दृष्ट्या अशक्य नाही. आता हे सगळे वाचल्यावर काही लोक एक ठेवणीतला प्रश्न विचारतील, “एवढी प्रगती इतक्या प्राचीन काळी झाली असणे कसे शक्य आहे?” त्यांना मी विचारतो की, का अशक्य आहे? केवळ काळ फार प्राचीन आहे, हे काही कारण नाही होऊ शकत. या प्रश्नकर्त्या मंडळींचे खरे दुखणे काय असते माहितीय का? ते आहे “न्यूनगंड”. हो, न्यूनगंड. एखादी गोष्ट हिंदू म्हणजेच भारतीय म्हटली की ती वाईटच असली पाहिजे, हा तो न्यूनगंड होय. हीच गोष्ट जर कुणा युरोपीय अथवा अमेरिकन संशोधकाने शोधली असती तर मात्र आम्ही ती मानानार्यांत अग्रभागी असलो असतो! कारण “साहेबं वाक्यं प्रमाणं!” आपण गोऱ्या कातडीच्या मानसिक गुलामीतून बाहेर यायला आजही तयार नाही हेच खरे! बरे, हिंदू संस्कृती आणि धर्म हा जगात सर्वाधिक विज्ञान-निष्ठ असल्याचे हिंदू सोडून जगातील सगळ्याच संशोधकांचे मत आहे. पण आमचा न्यूनगंड आणि आपसातील भांडण मात्र आपल्याला हे सत्य स्वीकारण्यापासून रोखतेय! हिंदूंच्या विज्ञान-निष्ठेचे आजवर शेकडो पुरावे सापडले आहेत, पण ज्यांनी झोपेचे सोंग घेतलेय त्यांच्या नजरेला ही गोष्ट कशी पडणार? त्यांना मुळात आपले वेद-पुराणे हेच खोटे वाटतात. चला, क्षणभर वादासाठी तेही गृहीत धरू. आता पुन्हा वरील कथा पहा. याही परिस्थितीत वरील कथा पाहिल्यास ती वैद्यकीय-दृष्ट्या १००% योग्य असल्याचेच आढळेल! मग निदान व्यासांनी “विज्ञान-कथा”
    लिहिली एवढे तरी मान्य कराल? आणि कुठेतरी या गोष्टी खरोखर असल्याशिवाय इतकी “सुयोग्य” विज्ञान-कथा तरी कशी सुचेल? या कथेपेक्षाही कितीतरी प्राचीन काळात “ऋभू” नावाच्या ३ बंधूंनी विविध शस्त्रक्रिया केल्याचे पुरावे ऋग्वेदात आहेत. “चरक” हा “सर्जन” शस्त्रक्रियेपूर्वी आपली हत्यारे उकळून घेत असल्याचे त्यानेच
    लिहून ठेवलेय. याचा अर्थ त्याला इतक्या प्राचीन काळातही सूक्ष्मजीवांचे ज्ञान होते असाच होतो ना? विमान बनवण्याची प्राचीन भारतीय विधी मीच पूर्वी प्रसिद्ध केली होती. राजा भोज याच्या “समरांगण सूत्रधार” नामक ग्रंथात तर “यंत्रमानव” बनविण्याचीही विधी दिलीय. मग इतके सगळे विज्ञान असणार्या संस्कृतीत मी म्हणतो त्याच प्रमाणे गणेश- जन्म झाला नसेल कशावरून?
     पहा, विचार करा. “सूज्ञांना” पटेल.

    गणपती बाप्पा मोरया”

    सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

    आपलाच,
    विक्रम श्रीराम एडके.
    (संपर्क : edkevikram@gmail.com)

  • ३३ कोटी देवांचे कोडे


    खूपशी हिंदुद्रोही मंडळी वाद घालताना एक प्रश्न हमखास विचारतात, कि “तुमच्या त्या फडतूस हिंदू धर्मात म्हणे ३३ कोटी देव आहेत, त्यांची नावे तरी माहिती आहेत का तुम्हाला?” आणि आमचे भोळे-भाबडे हिंदू बंधू या प्रश्नासमोर गडबडून जातात. मलाही व्याख्यानाच्या वगैरे निमित्ताने जेव्हा इतर मंडळी भेटतात, तेव्हा हा प्रश्न विचारणे ठरलेले असते. कधी खोडसाळपणे, तर कधी जिज्ञासेने! तेव्हा माझ्या फेसबुक मित्रांना देखील या प्रश्नाचे उत्तर माहिती असावे म्हणून सांगतो.
    मुळात हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे. यात एकही गोष्ट “उगीचच” या सदराखाली येत नाही. तरीही जर तसे वाटले, तर निश्चितच समजावे कि आपले ज्ञान कमी पडतेय.
    आता नमनालाच घडाभर तेल न ओतता मूळ विषयाला हात घालतो.

    ३३ कोटी या शब्दाचा जो सरळ-सरळ ३३ करोड असा अर्थ लावला जातो, तो चुकीचा आहे हे मी एक संस्कृतचा अभ्यासक म्हणून ठामपणे सांगतो. खर तर येथे कोटी या शब्दाचा अर्थ होतो Degree किंवा सोप्या भाषेत, “प्रकार”. कोटी ज्यावेळी आपण पैशासंदर्भात वापरतो तेथेही हाच अर्थ मुळात अभिप्रेत असतो हे खोलवर विचार केल्यास कळते. शिवाय आपण गणितात “बैजिक पदांच्या कोटी” हि संज्ञा वापरतो तेथेही हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रश्न असा येईल कि हे ३३ कोटी, म्हणजे ३३ प्रकारचे देव नेमके कोण? तर त्यांची नावे देतो.
    धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू हे १२ आदित्य. (संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६)
    धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास हे ८ वसु. (संदर्भ: महाभारत, आदि. ६६/१८)
    हर, बहुरूप, त्रयम्बक, अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली हे ११ रुद्र. (संदर्भ: हरिवंश, १/३/५१-५२)
    आणि याखेरीज २ अश्विनीकुमार!
    असे सारे मिळून ३३ प्रकारचे देव होतात. आता तुम्ही कुणाही प्राश्निकास हे उत्तर देऊ शकता, मी व्यवस्थित संदर्भही दिले आहेत.
    © विक्रम श्रीराम एडके (edkevikram@gmail.com)
    टीप: हा मजकूर माझ्या पूर्व-परवानगीशिवाय कुठेही वापरलात तरी चालेल.
    या प्रश्नास आपले बहुतांशी बांधव उत्तर देऊ शकत नसण्याचे कारण म्हणजे हिंदू धर्माचा विशेषत: संस्कृत भाषेचा अभ्यास नसणे. तेव्हा मी येथे सर्वांना आवाहन करतो कि त्यांनी संस्कृतचा शक्य होईल तेवढा अभ्यास करावा. तीच हिंदू धर्माची किल्ली आहे. याखेरीज इतर प्रश्न आणि शंकांसाठी मला वर दिलेल्या विद्युत पत्त्यावर संपर्क करावा.

  • वेदकाळात ब्राह्मणवाद : एक पोकळ कल्पना

    हल्ली वेद मानणार्यांवर ब्राह्मणवादाचा आरोप करण्याची FASHION च झालीय. जो तो उठतो आणि स्वत:ची पातळी, अभ्यास वगैरे काहीही न बघता असले बिनबुडाचे आरोप करीत सुटतोय. कदाचित तो त्यांचा स्वत:ला “पुरोगामी” ठरविण्याचा मार्ग असावा. पण माझ्यासारख्या संशोधकासाठी मात्र त्यांच्या आरोपात किती तथ्य आहे हे शोधणे, आणि तथ्य नसेल तर सत्य काय ते सर्वांसमोर मांडणे क्रमप्राप्त ठरते, म्हणून हा लेखनप्रपंच.
      वेदांतील सर्वांत जुना आणि प्रमुख वेद म्हणजे ऋग्वेद. एखादी गोष्ट ऋग्वेदाच्या बाबतीत खरी असेल तर ती इतर ३ वेदांच्या बाबतीतही खरी असते. आणि ऋग्वेदाबाबतीत एखादी गोष्ट खरी नसेल तर ती इतर ३ वेदांनीही स्वीकारलेली नसते हे आपणास माहिती आहे. तेव्हा शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने जर ऋग्वेदात ब्राह्मणवाड नसेल तर इतर ३ वेदांतही तो नाही हे मानण्यास प्रत्यवाय नाही. असा विचार करून मनात काहीही पूर्वकल्पना न ठेवता जेव्हा मी ऋग्वेद संहिता तपासू लागलो तेव्हा संशोधनांती हाती आलेले निष्कर्ष धक्कादायक होते. तेच आत्ता तुमच्यासमोर मांडतोय.
       ऋग्वेदाच्या १० मंडलांत मिळून एकूण १०२८ सूक्ते आहेत. हि सारी सूक्ते एकूण ३९० ऋषींनी लिहिलीयत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण मला सापडलेल्या माहितीनुसार, या मंत्रद्रष्ट्या ऋषीपैकी २१ स्त्रिया स्त्रिया आहेत आणि याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे त्या सार्या ऋषीपैकी ४७ ऋषी अब्राह्मण आहेत! या अब्राह्मण ऋषींची नावे आणि त्यांनी रचलेल्या सूक्तांची(ऋचांची नव्हे!) संख्या येथे देत आहे.
    मधुछंद  विश्वामित्र (११)
    जेता  मधुछंदस (१)
    अंबरिष (१)
    वर्षागीर (१)
    इंद्र (३)
    मरुत (१)
    विश्वामित्र  गाथिन (४९)
    ऋषभ  वैश्वामित्र (३)
    कत वैश्वामित्र (२)
    प्रजापति वैश्वामित्र (५)
    भारताश्वमेध राजा (१)
    संवरण प्राजापत्य (२)
    कुमार आग्नेय (२)
    वैवस्वत (५)
    ययाती (१)
    नहुष (१)
    साम्वरण (१)
    वैश्वामित्र वाच्य (२)
    रुणन्चय राजर्षी (१)
    सिंधुद्विप आंबरिष (१)
    यमी (२)
    विवस्वान (१)
    यम (२)
    शंख यामायन (१)
    दमन यामायन (१)
    देवश्रवा यामायन (१)
    सुंशुक यामायन (१)
    मथित यामायन (१)
    विमद ऐन्द्र  अथवा प्राजापती (७)
    वसुक्र ऐन्द्र (३)
    इंद्रस्नुषा (१)
    अभिताप सौर्य (१)
    मुष्कवान ऐन्द्र (१)
    वैकुंठ ऐंद्र (३)
    नाभानेदिष्ट मानव (२)
    सर्प ऐरावत जरत्कर्ण (१)
    सावित्री सूर्या (१)
    इंद्राणी (३)
    वृषाकपि ऐन्द्र (१)
    रेणू वैश्वामित्र (१)
    शार्यत मानव (१)
    अर्बुद सर्प (१)
    उर्वशी (1)
    सर्वाहारी ऐन्द्र (१)
    अप्रतिरथ ऐन्द्र (१)
    अष्टक वैश्वामित्र (१)
    पणय: असुर तथा देवशुनी सरमा (१)
    लबरुपापन्न ऐन्द्र (१)
    हिरण्यगर्भ प्राजापती (१)
    अग्नी, वरूण, सोम (१)
      यावरून असे दिसते कि सुमारे १३९ म्हणजे ऋचान्च्या एकूण संख्येच्या १०% हूनही अधिक ऋचा या अब्राह्मण मंत्रद्रष्ट्या ऋषींनी लिहिल्या आहेत. वरील आकडेवारीबद्दल कुणाला शंका असल्यास आपण स्वत: ऋग्वेद संहिता पाहून खात्री करू शकता.
      यावरून कुणीही सूज्ञ व्यक्ती हाच निष्कर्ष काढेल कि वेदकाळात कोणत्याही प्रकारचा जातीयवाद अजिबातच अस्तित्वात नव्हता. कुणीही व्यक्ती (मग ती स्त्री असो वा पुरुष) त्याच्या गुण आणि कर्मांनी योग्य तो वर्ण प्राप्त करून घेऊ शकत असे. जातीव्यवस्था ही कधीही भारतीय समाजाचा भाग नव्हती, हिंदू धर्माचा तर नव्हतीच. जातीव्यवस्था ही अहिन्दुंच्या आक्रमणामूळे झालेले जे अनेक दुष्परिणाम आहेत त्यांपैकी एक आहे – आणि आजचे राजकारणी व अन्य भारतद्वेषी लोक तिला खतपाणी घालत आहेत आणि ते ही “ब्राह्मणवाद” नामक एका निरर्थक आणि पोकळ शब्दाचा आश्रय घेऊन! अश्यांना किती थारा द्यायचा हे आपणच ठरवा. आपण सूज्ञ आहात.
    जयतु भारतं ||

    – © विक्रम श्रीराम एडके
    edkevikram@gmail.com