Category: स्फुट लेख

  • अनाठायी टीका नकोच!!

    समजा आपल्या देशाने एखादा जिहादी आतंकवादी पकडला. त्याची रोज चौकशीही होतेय. तो रोज त्याच्या थोड्या थोड्या साथीदारांची नावेही सांगतोय. परंतु तरीही चौकशी पूर्ण होण्याच्या आत शासन त्या लोकांची नावं जाहीर करतं का हो? नाही करत! का? अहो कारण सोप्पं आहे. अर्धवट माहितीच्या आधारे नावं जाहीर केली, तर तो ज्यांची नावे घेणार आहे ते अपराधी सावध नाही का होणार! जिथे मोठ्ठा समूह हाती लागण्याची शक्यता आहे, तिथे चार-दोन छोटे मासे पकडून समाधान मानावं लागेल. त्यामुळे कोणतंही शासन अशी नावं चौकशीच्या दरम्यान जाहीर करत नाही. किंबहूना कुणाची चौकशी चाललीये आणि ती कोणत्या दिशेने चाललीये, हेही सांगितलं जात नाही. हे झालं जरासं अवघड उदाहरण. मला जो मुद्दा मांडायचाय तो आणखी सोपा करून सांगतो. समजा माझ्याकडे रोज एक सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे. तर मी ‘तिचं पोट फाडून सारीच अंडी पळवूयात’ असा मूर्ख विचार करेन का हो? कधीच नाही. अगदी पप्पूबाबाही असला वेडाचार करणार नाही!

    हेच नेमकं भारत सरकार स्विस बँकेतील खातेधारकांच्या संदर्भात करतंय. आज शासनाचे ऍटर्नी श्री. मुकुल रोहत्गींनी जे आवेदन दाखल केले, त्यात असं स्पष्टपणे म्हटलंय की, ज्यांच्याविरोधात चौकशी चालू नाही अश्या कुणाचीच नावे उघड करता येणार नाहीत. आणि चौकशी चालू असेपर्यंत तर कुणाचीच नावे उघड करता येणार नाहीत. याचा अर्थ विरोधकांनी आणि अर्धवट फेसबुकराव व ट्विटकरांनी ताबडतोब असा लावायला सुरुवात केली, की मोदीसरकारने काळापैसाधारकांची नावे उघड करायला नकार दिला अथवा मोदीसरकार त्या खातेधारकांना पाठिशी घालतेय. असं अजिबातच नाहीये. ना श्री. रोहत्गींच्या आवेदनातून तसे सूचित होतेय. त्यांचं म्हणणं केवळ एवढंच आहे की, सर्वच खातेधारकांची नावे उघड करता येणार नाहीत – फक्त ज्यांच्याविरोधात भारताचा आक्षेप आहे त्यांचीच नावे उघड करता येतील. तीही त्यांच्याविरोधातली चौकशी पूर्ण झाल्यावरच!

    असे का म्हटले असावे बरं त्यांनी? यामागे कारण आहे मित्रांनो. आणि त्या कारणाचं नाव आहे ‘डबल टॅक्सेशन अव्हॉईडंस ऍग्रीमेंट’ नावाचा आंतरराष्ट्रीय करार. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा करार अनेक देशामध्ये आहे. जरी हा करार करयोजनेच्या नावाखाली असला, तरी प्रत्यक्षात या करारातून दोन्हीही संलग्न देशांना एकमेकांच्या देशांमध्ये बँकखाते उघडलेल्या नागरिकांची माहिती काही अटींची पूर्तता करून मिळते. तसा करार भारत व जर्मनीदरम्यान आहे. त्यानुसार आपल्याला लिंचेन्स्टाईन बँकेत काळापैसा जमा केलेल्या भारतीय खातेधारकांची नावेही मिळणार आहेत. परंतु नुसते दुसऱ्या कोणत्या देशात बँक खाते असणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही ना! त्यामुळे आपल्याकडील सर्वच खातेधारकांची नावे सरसकट सांगण्याला जर्मनीने नकार दिलाय आणि त्यांची बाजू याबाबतीत शतप्रतिशत बरोबरच आहे! आपल्याला ज्या कुणा विशिष्ट लोकांच्या खात्यांची माहिती हवी आहे, त्यांची माहिती आपल्याला देण्यात येणारच आहे. मग ती माहिती भारत सरकार उघड करेलच. मात्र चौकशीअंती! कारण याबाबतीत जनतेच्या भावना काही जरी असल्या तरीही आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वावरताना तिथले नियम काटेकोरपणे पाळणं आपल्याला भागच आहे. मग सरकारला त्या लोकांची नावे मुळात समजतातच कुठून असाही प्रश्न कुणीतरी विचारेल. याचं उत्तर मोठं ‘अर्थ’पूर्ण आहे, एवढंच मी याक्षणी सांगू शकतो. अशी ‘अर्थ’पूर्ण गोष्ट सरकार देशहितासाठी वारंवार करत असते! शिवाय एकाची माहिती मिळाली की, त्याच्यावर दबाव (!!) टाकून इतरांची माहितीही मिळवता येते.

    या गोष्टीला अजून एक पैलू आहे. सदरचा ‘डबल टॅक्सेशन अव्हॉईडंस ऍग्रीमेंट’ हा करार आपले सरकार लवकरच अन्य काही देशांबरोबरही करणार आहे, जेणेकरून तेथील काळापैसाधारकांची माहितीही आपल्याला मिळू शकेल. आता तुम्हीच विचार करा, समजा जर्मनीच्या बाबतीतच आपण लोकभावनेपुढे वाहावत जाऊन धसमुसळेपणा केला, तर इतर देश आपल्याला माहिती देतील का? माहिती तर सोडाच, आपल्यासोबत मुळात असा काही करार तरी करतील का? नाहीच! असे हे सारे गौडबंगाल आहे. ही एक प्रक्रिया आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियमांच्या व कायद्यांच्या जंजाळातून शिताफीने मार्ग काढतच पुढे जावे लागणार आहे. या सगळ्याला वेळ लागतो मित्रांनो! ही बाब स्वत: पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीदेखील व्यवस्थित जाणून आहेत, म्हणूनच लोकसभा प्रचाराच्या काळात स्वामी रामदेवांसारखी मंडळी अनेकदा ‘शंभर दिवसांत काळा पैसा परत आणू’ वगैरे वल्गना करीत असताना, मोदींनी स्वत: कधीही मते मिळवण्यासाठीसुद्धा तसे खोटे आश्वासन दिले नव्हते. त्यांचे म्हणणे एवढेच होते की, सत्तेवर आल्याबरोब्बर याबाबतीत पावले उचलेन आणि ते आश्वासन ते व्यवस्थित पाळताहेत. आजच्या प्रकाराबाबतीत श्री. जेठमलानी व खान्ग्रेसी मंडळी मोदीसरकारवर सडकून टीका करताहेत. परंतु आपण लक्षात घेतले पाहिजे की, त्या लोकांपैकी श्री. जेठमलानींना त्यांनी दाखल केलेली जनहित-याचिका जिंकायचीये तर खान्ग्रेसींना सरकारवर टीका करायचा काही ना काही बहाणाच हवा आहे. त्यांचं कामच आहे हे. अश्या प्रेरित टीकेला बळी पडायचं की नाही, हे आपण ठरवायचंय. आपण लोकांनी खरं तर अश्या नाजुक बाबींमध्ये संयम पाळायला शिकलं पाहिजे. दुसरं असं की, त्यांच्यावर अजिबात टीकाच न करायला मोदी म्हणजे काही कुणी देव नाही लागून गेले. टीका व्हावी. जिथे चूक असेल तिथे जोरदार टीका व्हावी. परंतु राजकारण, आंतरराष्ट्रीय कायदे जाणून न घेता अशी अनाठायी टीका करणं म्हणजे शुद्ध वेडेपणा ठरेल. नव्हे, समीक्षक व समर्थक दोन्हीही नात्यांनी स्वत:च स्वत:ची किंमत कमी करून घेणे ठरेल. हे होता कामा नये. अंकुश असावा, परंतु डोळसच!!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

    image

  • तुम्हाला पुरोगामी व्हायचंय का? सोप्पं आहे!!

    हल्लीच्या जगात ‘श्वास घेण्या’पेक्षाही सोपी गोष्ट कोणती झालीये माहितीये? ‘पुरोगामी होणे’!! त्यासाठी काय करायचं? काहीच नाही, जाणून-बुजून सातत्याने हिंदूंना अपमानास्पद वाटेल असं वागत राहायचं, की ठरलातच तुम्ही पुरोगामी! मग यात सरळसरळ तुमचा ढोंगीपणा दिसला तरीही चालेल. कारण तुम्हाला काहीच करावं लागत नाही. हे मूर्ख हिंदूच ‘तुमचा ढोंगीपणा हा कसा तुमचा ढोंगीपणा नसून प्रामाणिकपणा आहे’ हे जीवाच्या आकांताने सांगायला पुढे येतात. अहो उलट तुम्ही जितका जास्त ढोंगीपणा कराल तितकी वरची पुरोगामी श्रेणी मिळेल तुम्हाला. म्हणजे थोडासा ढोंगीपणा केला की – ‘विवेकवादी’, त्याहून अधिक केला की – ‘पुरोगामी’आणि आणि ढोंगीपणाची कमाल मर्यादा गाठली की – ‘भारतीय सेक्युलर’!! आणि हे सारं अगदी सोप्पं असतं बरं का. काय करायचं – समजा कुणा गुंडांच्या जमावाने एखादा अहिंदू तरुण मारला (मग कारण काही का असेना!), तर या कृत्याचा आपल्या घरातील कुणी माणूस गेल्यागत निषेध करायचा. आणि म्हणायचं — “हिंदू दहशतवाद्यांच्या जमावाने अमुक धर्माच्या अहिंदूचा निर्घृण खून केला”. परंतू याच्या नेमकं उलट घडलं तर मात्र म्हणायचं – “समाजकंटकांच्या एका जमावानं तरुणाची हत्या केली”. लक्षात ठेवा, पुरोगामी ठरण्याचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम आहे, तो म्हणजे ‘अपराधी हिंदू नसेल तर त्याच्या धर्माचं कदापिही नाव घ्यायचं नाही. अगदीच जघन्य अपराध असला तर मात्र हळूच अल्पसंख्याक म्हणून विषय संपवायचा’!! समजलं?

    तुम्हाला सर्वधर्मसमभाववादी व्हायचंय का? सोप्पं आहे! समजा एखाद्या हिंदू मुलीवर, तुम्ही कल्पनेतही कल्पना करू शकणार नाही इतका बीभत्स बलात्कार झाला, तिच्या शरीराची शक्य ती सारी विटंबना केली गेली, इतकेच नव्हे तर बळजबरी तिचे कुणा ‘शांतिप्रिय’ धर्मात धर्मपरिवर्तन केले गेले तर..? तर ‘अजिबात लक्ष द्यायचे नाही’!! सेक्युलॅरिझमचे भारतीय अवतार असल्या फालतू गोष्टीकडे लक्ष देत नसतात. तुम्हाला त्यासाठी फारसे प्रयत्नही करावे लागणार नाहीत बरं! कारण हिंदूंची मनं इतकी बधीर झालेली आहेत की, मुळात तेच या गोष्टीकडे लक्ष देणार नाहीत. अहो, जिथं बलात्कार आणि खून असे दुहेरी अपराध केलेला अपराधी केवळ अल्पवयीन (आणि अल्पसंख्य!) आहे एवढ्याच कारणापोटी किरकोळ शिक्षेवर सुटतो आणि लोकांना त्याचे काहीही वाटत नाही, तिथे बलात्कार आणि धर्मपरिवर्तनाच्या प्रकरणातली पीडीता जिवंत वाचलीये म्हटल्यावर कोण कश्याला मरायला या बातमीला महत्व देईल? त्यातूनही जर कुणी हा विषय काढायला गेलंच तर आपण आधी भरपूर आरडाओरडा करायचा आणि त्यानंतर ‘कुणा स्वयंपाक्याला त्यानेच बनवलेली पोळी नुसती दाखवणं (इथे रेटून ‘खाऊ घातली’ असं म्हणायचं बिनधास्त!) हा त्याच्या धर्मस्वातंत्र्यावर कसा घाला आहे आणि हाच एक कसा राष्ट्रीय महत्वाचा विषय आहे’ हे तारस्वरात ओरडून सांगायचं! की झालातच तुम्ही सर्वधर्मसमभाववादी!! अभिनंदन!

    तुम्हाला ‘सामाजिक बांधिलकीचा पुरोगामी सर्वधर्मसमभाववादी’ व्हायचंय का? नाव थोडं मोठं आहे, पण होणं फार सोप्पं आहे. काहीही खास करायचं नाही. फक्त ‘दैनिक भास्कर’चा आदर्श डोळ्यापुढं ठेवून वागायचं. अहो खरंच! ‘दैनिक भास्कर’ काय करतंय — सध्या रक्षाबंधन आलाय ना, म्हणून ते मुलींसाठी मोहीम चालवतायत – “मी राखी बांधणार नाही”. का? अहो मुलींवर बलात्कार नाही का होत? मग जगातल्या सगळ्याच पुरुषांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायला मुलींना प्रोत्साहन द्यायचं आणि राखी बांधणार नाही असं सांगायचं. मग भलेही तुमचा भाऊ साक्षात रामाचा अवतार का असेना. नाही म्हणजे नाही म्हणजे नाहीच. याचे दोन फायदे होतात. एकतर तुम्ही ‘साबांपुस’ होता आणि दुसरे म्हणजे आपोआपच तुम्ही ‘स्त्रीवादी’ही ठरता! आहे की नाही एका तिकीटात दोन खेळ!! हो मात्र एक काळजी घ्यायची बरं का. की हा असा खेळ फक्त हिंदूंच्याच सणांच्या बाबतीत करायचा. अन्यधर्मीयांच्या बाबतीत चुकूनही नाही. अन्यथा जीवावर बेतू शकतं तुमच्या!! जरा जपून! हे हिंदू मात्र मूर्ख असतात. ते नुसतं हे धार्मिक अतिक्रमण सहनच करत नाहीत, तर उलट आधूनिकतेच्या नावाखाली तुम्हाला पाठिंबा पण देतात. द्या टाळी! आणि त्यातूनही कुणी समजा विचारलंच की, “का हो, रक्षाबंधनच का? स्त्रीजातीवर बलात्कार होतात तर ‘मी आजपासून व्हॅलेंटाईन-डे साजरा करणार नाही’, असं का म्हणू नये”? तर त्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. तोंडात पुरोगामित्वाच्या शेणाची गुळणी धरून गप्प राहायचं. तुमचं काम हिंदूच करतील. नाही त्या प्रश्नकर्त्यास प्रतिगामी-प्रतिगामी म्हणून त्याचं जगणं दुष्कर करून टाकलं त्यांनी, तर नाव लावणार नाही! आणि हे ‘दैनिक भास्कर’ केवळ उदाहरण झालं हो. तुम्ही या गोष्टीची आपल्याला हवी ती आवृत्ती काढू शकता. फक्त एक सूत्र लक्षात ठेवायचं — “हिंदूंचा कोणताही सण आला रे आला, की काही ना काही कारण काढून पुरोगामित्वाच्या नावाखाली त्याला विरोध करत राहायचं”. बास! अन्यधर्मीयांच्या सणांमध्ये डोकावायला जायचं नाही. त्यांना धार्मिक स्वातंत्र्य असतं ना! मग? एवढं पाळायचं फक्त. की झालातच तुम्ही ‘साबांपुस’!!

    तुम्हाला कलाप्रेमी पुरोगामी व्हायचंय का? मग त्यासाठी तुम्हाला ‘आमिर खानचा फॅन’ व्हावं लागेल. म्हणजे काय करायचं? एकतर त्याच्या चित्रपटांना कम्पल्सरी चांगलंच म्हणायचं. दुसरं म्हणजे त्या चित्रपटांमध्ये तो जे करतो त्याला अभिनय आणि सदरच्या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी तो जे काही चाळे करेल (ते किती का सवंग आणि प्रसंगी उचलेगिरी का असेना!) त्याला ‘हट के मार्केटिंग’ म्हणायचं. मग भलेही तो अभिनयाच्या बाबतीत कमल हासन, चियान विक्रम, नाना पाटेकर, धनुष, सूर्या शिवकुमार, प्रकाश राज, प्रसेनजित चटर्जी या सगळ्यांपुढे ‘बच्चा’ का असेना! भलेही उपरोक्त यादीपैकी जवळजवळ सगळेच राष्ट्रपती पारितोषिकासारख्या सर्वोच्च सन्मानाने अनेकवार गौरविलेले का असेनात. अश्यावेळी बिनधास्त म्हणायचं – “हे पुरस्कार सगळे विकत घेतलेले असतात हो. आमिरवर कायमच अन्याय होतो. शिवाय पुरस्कार काही अभिनयाचा मापदंड असतो का” वगैरे वगैरे..! थोडक्यात तो पडद्यावर जो अभिनयाचा अभिनय करतो, त्याला अभिनय म्हणायचं! याबाबतीत प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीनिवडीमुळे जरासा मतभेद होऊ शकतो म्हणा. त्यामुळे इथपर्यंत तुम्हाला कुणीही काही म्हणणार नाही. मात्र याखेरीज तो पडद्याबाहेर जे जे म्हणून काही करेल, त्याला ‘सामाजिक बांधिलकी’च म्हणायचं. याहून कमी काही म्हणायचंच नाही. चांगलं’च’ म्हणायचं. मग तो ‘सत्यमेव जयते’च्या नावाखाली केलेला निम्न दर्जाचा खोटारडेपणा असो वा अण्णा हजारे आणि त्यांचे सहकारी उपाशीपोटी उपोषणाला बसले असताना त्याच ठिकाणी याचा रोजा सोडण्याचा अट्टाहास असो वा आपला चित्रपट प्रदर्शित होत असतानाच बरोब्बर वेळ साधून ‘नर्मदा बचाव’वाल्यांना दिलेला पाठिंबा असो वा चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या नावाखाली त्याने केलेला नंगानाच असो! चांगलं’च’ म्हणायचं! आणि हो, त्याचा आगामी चित्रपट ‘साधूसंतांच्या तथाकथित ढोंगीपणावर’ आधारित आहे. मग तर काय सगळ्या सेक्युलर पुरोगाम्यांना मेजवानीच! तेव्हा ही संधी साधायची आणि कलाप्रेमी पुरोगामी व्हायचं. अर्थात अगदी आमिर खान नको असेल तर मात्र तुम्ही आपापल्या वकूबाप्रमाणे शाहरुख खान, महेश भट, शबाना आझमी इ. नाही पाठिंबा देऊ शकता. तो तुमचा निर्णय!

    उपरोक्त उपायांखेरीजही पुरोगामी होण्याचे इतर हजारो उपाय आहेत बरं का. पण ते नंतर कधीतरी. तूर्त सुरुवात करण्यासाठी हे सोप्पे सोप्पे उपाय बहुमूल्य आहेत! तर म्हणून मी म्हणत होतो की, हल्लीच्या जगात ‘श्वास घेण्या’पेक्षाही ‘पुरोगामी होणं’ जास्त सोप्पं झालंय. तेव्हा अशी शतकानुशतकांतून एकदाच येणारी सुवर्णसंधी का म्हणून दवडायची? संधीसाधू होऊन संधी साधूयात आणि तुम्ही-आम्ही-आपण सारे पुरोगामी होऊयात. देव-देश-धर्म जाऊ द्या खड्ड्यात! बोला, पुरोगामित्वाचा..?

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

    image

  • अनुच्छेद ३७० : दशा आणि दिशा

    अनुच्छेद ३७० : दशा आणि दिशा

    “अनुच्छेद 370: दशा आणि दिशा”
    (साप्ताहिक विवेक, दि. २९ जून ते ५ जुलैच्या अंकात प्रकाशित झालेला लेख.)

    केंद्रामध्ये भाजपा आणि  राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांना स्पष्ट बहुमत मिळाल्यापासून अनुच्छेद 370चा मुद्दा पुन्हा एकवार जोर पकडू लागला आहे. तसा हा मुद्दा सुरुवातीपासूनच विवादित. त्यातून या अनुच्छेदाला विरोध करणारे सरकार अस्तित्वात आल्यापासून तर हे अनुच्छेद रद्द करावे, अशी जोरदार मागणी होणे साहजिकच होते. ही मागणी जितकी तीव्रतेने होऊ लागली, तितक्याच तीव्रतेने या अनुच्छेदाच्या पाठीराख्यांनी विरोधही सुरू केला आहे. गंमत म्हणजे या दोन्हीही बाजू आपापले म्हणणे मांडण्यासाठी हाती असलेल्या सर्व माध्यमांचा – मुख्यत्वेकरून नव्यानेच लोकप्रिय झालेल्या फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप इ. सोशल मीडियाचा – पुरेपूर वापर करीत आहेत. आणि  यातून हा मुद्दा कळणे वा त्याच्यावर मोकळेपणाने चर्चा होणे तर दूरच, परंतु सामान्यजनांच्या मनात एक प्रकारचा संभ्रम मात्र निर्माण झालाय.

    खरे तर अनुच्छेद 370चे मूळ शोधू गेल्यास आपण पोहोचतो ते शेख अब्दुल्लापर्यंत. आता हा कोण शेख अब्दुल्ला? तर काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांचे वडील व सध्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे आजोबा म्हणजे हा शेख मुहंमद अब्दुल्ला. अत्यंत बेरकी व धूर्त राजकारणी. हरिसिंह काश्मीर नरेश असताना हा त्यांच्याशी, नेहरूंशी, माउंटबॅटनशी आणि  पाकिस्तानशी अशा चौघांशीही सारखेच सौहार्द राखून होता. खाजगीत चौघेही त्याला एकमेकांचा ‘एजंट’ समजायचे. आपल्या याच धूर्ततेच्या जोरावर त्याने काश्मीरचे पंतप्रधानपद पटकावले होते आणि  काश्मीरची सत्ता या ना त्या स्वरूपात कायम आपल्याच घराण्यात कशी राहील, याचीही यशस्वी योजना करून ठेवली होती! वाचून आश्चर्य वाटेल, परंतु भारतीय घटनेचे प्रमुख रचनाकार असलेल्या डॉ.आंबेडकरांचा अनुच्छेद 370ला कडाडून विरोध होता (संदर्भ: India Today, 28 मे 2014). याच शेख अब्दुल्लाने नेहरूंसोबत मिळून त्या अनुच्छेद 370ची निर्मिती केली. नेहरूंनाही सरदार पटेलांच्या आक्रमक आणि  दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेल्या धोरणांना शह देण्यासाठी असे काहीतरी हवेच होते. या दृष्टीने पाहू गेल्यास, जिला राजकीय चूक म्हणता येईल, ती काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्र संघाकडे नेण्याची नेहरूंची चाल ही पटेलांना शह देणारी अशीच एक दुर्दैवी खेळीही असू शकते.

    ज्या प्रकारे इतर संस्थानांचे विलीनीकरण झाले, त्याच प्रकारे काश्मीरचे विलीनीकरण होणेही सहज शक्य होते. परंतु जेव्हा 1947च्या हिवाळयात भारतीय सैन्य पाकिस्तान्यांशी निकराची झुंज देत होते, तेव्हा हे अब्दुल्ला महाशय काश्मीरचे स्वतंत्र सैन्य उभारण्यात मश्गूल होते. वर ‘भारतीय सैन्य निघून गेल्यावर काश्मीर अगदी उघडयावर पडायला नको’ असे साळसूद कारण तयारच होते त्यांचे. याला नेहरूंचीही काहीच हरकत नव्हती. उघडच आहे की अब्दुल्लाला काश्मीरसाठी केवळ विशेष दर्जाच हवा होता असे नाही, तर त्याला सर्ंपूण स्वायत्तताही हवी होती. (Working a Democratic Constitution: History of Indian Experience, लेखक Granville Austin). आणि  अनुच्छेद 370द्वारे त्याने ती एक प्रकारे मिळवलीदेखील. असा सगळा प्रकार पाहून निराश झालेले सरदार पटेल आपले स्वीय सचिव व्ही.शंकर यांच्याशी खाजगीत बोलताना म्हणाले होते, ”जवाहर रोएगा!” (Article 370: The Untold Story, लेखक मेजर जनरल शेर थापलियाल, Indian Defense Review मध्ये 27 मे 2014 रोजी प्रकाशित झालेला लेख.)

    राजनीतीची वक्रगती पाहा – घटना समिती आणि  काँग्रेस कार्यकारिणी अशा दोन्हीही ठिकाणी अनुच्छेद 370चा मसुदा स्पष्टपणे नाकरण्यात आला होता. नेहरूंनी त्यानंतर अत्यंत हुशारीने हे अनुच्छेद मान्य करवून घेण्याची जबाबदारी त्या अनुच्छेदाचे प्रखर विरोधक असलेल्या सरदार पटेलांवरच सोपवली. आणि पटेलांनाही नाइलाजाने ती पार पाडावी लागली. 24 जुलै 1952 रोजी, ज्या वेळी सरदार पटेल हयात नव्हते, त्या वेळी नेहरूंनी संसदेत भाषण करताना ”सरदार पटेलच ह्या अनुच्छेदाबद्दल एकहाती सारे र्निणय घेत होते” असे धडधडीत असत्य व पराकोटीच्या कृतघ्नपणाचे विधान केले होते. त्या वेळी या विधानावर बरीच टीकाही झाली होती. किंबहुना गोपालस्वामी अय्यंगारासारख्या, नेहरूंच्या जवळचे समजल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यालाही ही बाब अजिबात पसंत पडली नव्हती.

    मुळात अनुच्छेद 370चा घटनेत समावेश हा ‘तात्पुरत्या’ स्वरूपाचा होता. आणि  म्हणूनच घटनेच्या ‘भाग 21′मध्ये त्याचा समावेश करण्यात आलाय. परंतु आरक्षणाची तरतूदही तात्पुरती असावी, असे स्वत: डॉ. आंबेडकरांचेही मत होतेच की! काय झाले त्याचे? जसे त्या विषयावर राजकीय डावपेच खेळले गेले आणि  मुळात एका अतिशय उदात्त हेतूने निर्मिलेल्या संकल्पनेचा खेळखंडोबा झाला, तीच या अनुच्छेद 370चीही अवस्था झाली आहे. आज ना भारत सरकारचे कायदे काश्मीरला लागू होऊ शकतात, ना काश्मीरमध्ये आधीच अस्तित्वात असलेले नागरिकत्व, जमिनीची खरेदी-विक्री इ. संदर्भातले कायदे रद्द होऊ शकतात. त्यामुळे ना कुणी भारतीय माणूस काश्मीरचा नागरिक होऊ शकतो, ना तिथे जमीनजुमला घेऊ शकतो. एवढेच कशाला, याच अनुच्छेद 370ची कृपा अशी की, भारत देश – सार्वभौम भारतीय गणराज्य, काश्मीरच्या राज्य सरकारच्या मान्यतेशिवाय कितीही गरज पडली तरीही अंतर्गत सुरक्षेच्या कारणास्तव वा आर्थिक मुद्दयावर काश्मीरमध्ये कदापिही अणीबाणी घोषित करू शकत नाही, आता बोला! आणि  याहून धक्कादायक बाब अशी की, संपूर्ण भारतात काश्मीर हे असे एकमेव राज्य आहे, ज्याची स्वत:ची स्वतंत्र घटना आहे! भारतात अंदमान-निकोबार, हिमाचल प्रदेश आदी अनेक राज्यांना विशेष दर्जा देण्यात आलाय, परंतु काश्मीरसारखी स्वायत्ततेची खैरात अन्य कोणत्याच राज्यावर करण्यात आलेली नाही! हे सारे केवळ चीड आणणारेच नव्हे, तर फुटीरतेला उत्तेजन देणारेही आहे. बरे, काश्मीर भारताचा घटक बनून राहावा यासाठी ही स्वायत्तता दिली असे म्हणावे, तर ही किंमत खूपच जास्त होते आहे. तुमच्या हाताचा अंगठा तुटला, तर तुम्ही काय कराल? एखाद्या निष्णात शल्यकर्मीकडून तो बसवून घ्याल ना? तरच तो अंगठा तुमच्या हाताचा अविभाज्य घटक म्हणून राहील! मात्र तुम्ही जर तो अंगठा केवळ फेव्हिकॉलने हाताला चिकटवून ठेवलात तर? ना तो अंगठा पुन्हा हाताशी जुळू शकेल, ना निघू शकेल, ना त्याला हातातून रक्तपुरवठा होईल, ना तो वस्तू पकडून हाताला मदत करू शकेल. तो स्वत: तर सडलेल्या अवस्थेत राहीलच, परंतु त्याच्या रोगटपणामुळे उर्वरित हातालाही कायमच त्रास होत राहील! पटेलांचे ऐकून जर काश्मीरवर एकदाच सैनिकी कारवाई झाली असती, तर ते एकदाच होऊन गेलेले शल्यकर्म ठरले असते. याउलट सध्या जी अवस्था आहे, ती अंगठा फेव्हिकॉलने चिकटवण्यापलीकडे अन्य काहीच नाहीये. बरे, यातून काश्मीर प्रश्न सुटण्याऐवजी मुळात चिघळलाच आहे. शिवाय गेल्या 60-65 वर्षांत मुळातच मुस्लीम बहुसंख्या असलेल्या काश्मीरमधील अनेक गटांना मुस्लीम राष्ट्र असलेले पाकिस्तान जवळचे वाटू लागलेय, हे वेगळेच. आणि याउप्पर काश्मीरमधील हिंदू पंडितांनी सहन केलेल्या व सहन करत असलेल्या अत्याचारांना तर सीमाच नाही. गोष्टी भलेही वेगवेगळया असतील, परंतु साऱ्यांचे मूळ एकच आहे, व ते म्हणजे अनुच्छेद 370!

    अर्थात हे अनुच्छेद 370 रद्द केले म्हणजे काश्मिरात एका रात्रीत सारे आलबेल होईल, असे मुळीच नाही. त्यासाठी काश्मिरी जनतेच्या मनात विश्वासच निर्माण करावा लागणार आहे. शांतपणे आणि  कठोरपणेच हे शल्यकर्म करावे लागणार आहे. त्यासाठी आवश्यकता आहे ती मनमोकळया चर्चेची. त्या चर्चेसाठी आवश्यक असणारे मोकळे आणि समसमान वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने अनुच्छेद 370 रद्द करणे हे अतिशय सकारात्मक पाऊल ठरेल. हो, आता यास काही साचलेली डबकी नक्कीच विरोध करतील; परंतु कोणताही बदल आणि  त्यातही सकारात्मक बदल हा स्वीकारायला कठीणच असतो. मात्र हेही तितकेच खरे की रात्रीच्या स्थितीत बदल घडला, तरच नवी पहाट दिसू शकते. होय ना?

    – विक्रम श्रीराम एडके.
    (लेखक इतिहासतज्ञ आणि वक्ते आहेत.)
    (मूळ लेखाची लिंक: http://magazine.evivek.com/?p=5921)

    image

  • सेक्युलरी गौडबंगाल : एक चिंतन

    सेक्युलरी गौडबंगाल : एक चिंतन

    आपल्या बऱ्याच मित्रांना स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणवून घ्यायची खाज असते. कारण काय, तर म्हणे भारत हा एक सेक्युलर देश आहे. या ‘सेक्युलर’ शब्दाचे उपद्रवमूल्य समजल्यामुळे हा शब्द एखाद्या शिवीसारखा वापरणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. पण या सेक्युलर-भक्तांना आणि विरोधकांनाही एक गोष्ट अजिबात ठाऊक नसते की, भारतात हे सेक्युलरी गौडबंगाल आलं कधी?

    तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल मित्रहो, परंतू हा ‘सेक्युलर’ शब्द भारताच्या संविधानात ४२व्या घटनादुरुस्तीअन्वये घुसडण्यात आला! मी मुद्दामच ‘घुसडण्यात आला’ असे म्हणतोय, कारण भारतात ढोबळमानाने १९७५ ते १९७७ आणीबाणी होती आणि ही उपरोक्त घटनादुरुस्ती झाली आहे १९७६ साली! तेव्हा हा ‘सेक्युलर’ शब्द घटनेत कुणी टाकला असेल, काय हेतूने टाकला असेल, आणि किती मोकळ्या वातावरणात टाकला असेल; हे वेगळे सांगायलाच नको! म्हणजे थोडक्यात, घटना अस्तित्वात आल्यापासून सुमारे पाव-शतक या ‘सेक्युलर’ देशाच्या घटनेत ‘सेक्युलर’ हा शब्दच नव्हता आणि तरीही हा देश ‘सेक्युलर’ होता!!

    अजून एक गंमत सांगतो. भारतात आज अस्तित्वात असलेला कोणताही कायदा उघडून पाहा. त्यात धारा (सेक्शन) क्र. २ हा नेहमीच व्याख्या-विभाग (डेफिनिशन क्लॉज) असतो. अगदी संविधानातसुद्धा! या व्याख्याविभागात त्या-त्या कायद्यात आलेल्या सर्वच पारिभाषिक शब्दांची त्या-त्या कायद्याला अभिप्रेत असणारी व्याख्या केलेली असते. आणि त्या-त्या कायद्यात तो-तो शब्द केवळ त्याच आणि त्याच अर्थाने वापरला जातो, अन्य नाही! आपल्या देशाच्या संविधानाचा गाभा हा त्याच्या प्रस्तावनेत (प्रिऍम्बल) आहे. हा ‘सेक्युलर’ शब्ददेखील त्याच प्रस्तावनेत येतो, परंतू तुम्हाला नवल वाटेल – व्याख्याविभाग तर सोडाच, परंतू संपूर्ण संविधानात कुठेही ‘सेक्युलर’ या शब्दाची व्याख्याच केलेली नाही! आता बोला!! आता व्याख्याच नाही म्हटल्यावर ‘आपला देश धर्मनिरपेक्ष, की निधर्मी’ असे प्रश्न उभे राहाणे साहाजिकच आहे ना!

    तेव्हा आपले जे कोणी मित्र स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेण्यात धन्यता मानत असतील, त्यांनी एक गोष्ट पक्की समजून असावे की ते स्वत:स एक अव्याख्यित आणि प्रसंग व राजकीय सोयीनुसार सातत्याने बदलणाऱ्या अर्थाची बिरुदावली चिकटवताहेत! कारण संविधानात या शब्दाची व्याख्याच नसल्यामुळे प्रत्येकवेळी व्याख्येसाठी बाह्य साधनांवरच अवलंबून राहाणे भाग आहे. आणि अमुकच ठिकाणी केलेली व्याख्या अधिकृत असादेखील काही नियम नसल्याने प्रसंगानुसार अथवा व्याख्या करणाऱ्या न्यायसंस्थेनुसार ही व्याख्या सतत बदलत राहाणेही साहजिकच आहे! मग ती अगदी ‘निधर्मी’ पासून ते ‘धर्मनिरपेक्ष’ पर्यंत काहीही होऊ शकते. आणि त्या-त्या प्रमाणे आपल्या या सेक्युलरांध मित्रांचे वैचारिक अस्तित्वही बदलत जाते! आहे की नाही गंमत!

    खरं तर आपल्या देशात अधूनमधून जे विचित्र प्रवाह वाहातात, त्याचे मूळ हे या ‘सेक्युलर’नामक अव्यक्त शब्दास अवास्तव महत्व देण्यात आहे! या शब्दाचा आपल्याकडे नेहमीच राजकीय स्वार्थाच्या अनुषंगाने अन्वयार्थ लावला जातो, हे एक उघड गुपित आहे! त्यामुळेच रझा अकादमीसारख्या संस्थेवर बंदी घातलीच जात नाही, मात्र ‘हिंदूराष्ट्र सेना’ या अद्यापि आरोप सिद्धदेखील न झालेल्या संघटनेवर बंदी घालण्याची भाषा बोलली जाते. आसारामबापूंवर टिकेचे भलेमोठे सत्र चालते परंतू त्याचप्रकारचा आणि तितकाच गंभीर गुन्हा केलेल्या पॉल दिनाकरनबद्दल कुणालाच चकार शब्दही काढावासा वाटत नाही! ‘मोस्ट वॉण्टेड’ अबू सालेम तुरुंगातच एखाद्या मल्लासारखी शरीरयष्टी कमावतो मात्र अद्यापपावेतो आरोपपत्रही दाखल न झालेले स्वामी असीमानंद आणि साध्वी प्रज्ञासिंहजी तुरुंगात नरकयातना भोगतात! मालेगावच्या तरुणांना पुराव्याअभावी निर्दोष सोडले जाते आणि नंतर देशाचे तत्कालीन गृहमंत्री असलेले एक पूर्व-सांसद पोलिसांना खुशाल ‘मुसलमानांना हात लावाल तर खबरदार’ अशी सरसकट धार्मिक भेदभाव करणारी धमकी देऊन टाकतात! काही धर्माने हिंदू असलेल्या गुंडांनी पुण्यातल्या त्या मुसलमान तरुणाला मारले, तर ते हिंदूंनी मुसलमानाला मारणे ठरते, मात्र त्याच काळात मुसलमानांनी त्या निखिल तिकोनेवर केलेला जीवघेणा हल्ला केवळ ‘माथेफिरू जमावाने’ केलेला हल्ला ठरतो. धनंजय देसाईंची पुण्यातल्या प्रकरणाबाबत चौकशी करावी हीच पहिली जबाबदारी असताना त्याचा छडा लावण्याआधीच आपल्या अतिहुशार आणि पराकोटीच्या कार्यकुशल गृहमंत्र्यांना त्यांची दाभोळकर-प्रकरणातही चौकशी करायचा मोह होतो, तो कश्याच्या आधारावर? सर्वोच्च न्यायालयाने शाहबानो प्रकरणात दिलेला निकाल तत्कालीन सरकारला का डावलावासा वाटतो? दहशतवादाचा रंग ठरवताना हटकून फक्त भगवा रंगच का आठवतो – जेव्हा की लोकांना बरोब्बर माहिती आहे सबंध जगात कोण दहशतवाद माजवतंय! आणि या सगळ्यावर कडी म्हणजे धार्मिक आणि जातीय अभिनिवेश चुचकारणारे आपल्याकडे ‘सर्वसमावेशक’ ठरतात, तर देशाच्या सर्व नागरिकांना समान पातळीवर ठेवून ‘समान नागरी कायदा’ लागू करा म्हणणारे मात्र ‘सांप्रदायिक’ ठरतात! या सगळ्या गमती-जमतींची उत्तरं ही ‘सेक्युलर’ शब्दाच्या भारतीय आवृत्तीत दडलेली आहेत!

    असे हे ‘सेक्युलर’ नावाचे गौडबंगाल आहे. आणि आगामी काळात हे गौडबंगाल कितपत चालवून घ्यायचे हे आपण ठरवायचे आहे. ‘तथाकथित अल्पसंख्याकांना (जे आता अजिबातच अल्पसंख्य नाहीत) गोंजारायचे, सहस्रावधी वर्षांपासून हा देश ज्यांनी सुजलाम-सुफलाम केला त्या बहुसंख्याकांना लाथाडायचे आणि आपलेच वर्चस्व कसे कायम राहील एवढेच पाहायचे’ एवढाच सांप्रतच्या राजकीय परिस्थितीत ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ होऊन बसलाय. आणि तो अर्थ आजचा नाही तर पार खिलाफतवाल्या बांडगुळांना कुरवाळणाऱ्या अहिंसेच्या बेगडी पुजाऱ्यापासून चालत आलाय. या प्रकाराला भुलून मतं देण्याचा मूर्खपणा आता थांबवायला हवा आपण, मग तो कोणता का राजकीय पक्ष असेना! या अश्याप्रकारचा ‘सेक्युलर’ असण्यावर मतं मिळत नाहीत, हे दिसले की कित्येक ‘जाणत्या राजां’चा आणि त्यांच्या ‘हुजऱ्यां’चा सूरही कसा बदलेल पाहाच! अश्या वेळी त्यांनाही सर्वात आधी बहुसंख्यकांचाच विचार करावा लागतो की नाही हेही पाहाच! तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘सेक्युलर’ असण्याच्या भारतीय आवृत्तीचे पिढ्यानपिढ्या चालत आलेले गौडबंगाल संपेल!!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी व विविध विषयांवर लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी पाहा: www.vikramedke.com)

  • सावरकरांची उडी, नव्हे — भारतीय स्वातंत्र्याची गुढी!

    सावरकरांची उडी, नव्हे — भारतीय स्वातंत्र्याची गुढी!

    आज ८ जुलै. आजच्याच दिवशी स्वा. सावरकरांनी मार्सेल्स बंदरात ती त्रिखंड गाजविणारी जगप्रसिद्ध उडी ठोकली होती. आता काही टिनपाट लोक म्हणतात की, सावरकर ५ मिनिटंही पोहोले नसतील आणि ती उडी गाजलेली नव्हे तर गाजवलेली होती इ. काहीजण तर या उडी मारण्याच्या पराक्रमासाठी सावरकरांना पळपुटे म्हणण्याइतकी मजल मारतात!

    वास्तविक सावरकर किती वेळ पोहोले, हे महत्वाचं नाहीच आहे. त्या पोहोण्याचे परिणाम काय झाले हे महत्वाचे! आणि सावरकर फक्त पाचच मिनिटं पोहोले हे सांगायला सावरकरांचे जातीयवादी टीकाकारच कश्याला हवेत? सावरकर तुरुंगात असताना एका चीनी बंद्याने सावरकरांना अतिशय भक्तिभावाने विचारले होते, ‘महाराज आपण किती दिवस पोहत होता’? तर सावरकर शांतपणे उत्तरले होते, ‘दिवस कसले, पाच मिनिटंही पोहलो नसेन’! हे स्वत: सावरकरांनीच लिहून ठेवलंय. त्याचवेळी त्या चीनी बंद्याचा कसा हिरमोड झाला हेही त्यांनी प्रांजळपणाने लिहिले!

    आता जरा काय घडलं हे पाहूयात. सावरकरांविरुद्ध अटक वॉरंट निघालं त्यावेळी सावरकर इंग्लंडमध्ये नव्हतेच. ते फ्रान्समध्ये होते. याचाच दूसरा अर्थ असा की, सावरकर जर इंग्लंडमध्ये परतलेच नसते, तर इंग्रज सरकार त्यांना बापजन्मीही पकडू शकले नसते. फ्रान्समधून बाहेर पडण्याच्या आणि भूमिगत राहून क्रांतिकार्य करण्याच्या हजारो वाटा होत्या. पण तरीही सावरकर परतले आहेत ते केवळ ‘मी सापडत नाही म्हणून माझ्या अनुयायांना त्रास दिला जातोय. तो थांबवावा’ यासाठी! यातून हेच स्पष्ट होते की, सावरकरांना जर फ्रान्सच्या एका बंदरात उडी मारून पळूनच जायचे असते, तर मुळात ते फ्रान्सहून इंग्लंडला अटक करवून घ्यायला आलेच नसते! दुसरे असे की, सावरकरांचे इंग्लिश अनुयायी श्री. गाय आल्ड्रेड हे सावरकरांना एकदा इंग्लंडच्या तुरुंगात भेटले आणि त्यांनी विचारले की, तुम्हाला इथून पळून जाण्याची काही व्यवस्था करू का? सावरकरांनी त्यांना स्वच्छ सांगितले की, मी माझी योजना तयार केली आहे. हे स्वत: आल्ड्रेड यांनीच आपल्या आत्मचरित्रात नोंदवले आहे. याचाच अर्थ असा की, सावरकरांच्या डोक्यात दुसरेच काहीतरी शिजत असले पाहिजे. आता ते काय, हे पाहू!

    दि. ८ जुलै १९१० रोजी सावरकरांनी पहारेकऱ्यास शौचाला जायची परवानगी मागितली. तो त्यांना घेऊन गेला व शौचालयाबाहेरच थांबला. सावरकरांनी आत जाताच दार लावून घेतले. त्या दाराला असलेल्या पोर्टहोलवर आपला कोट टांगला. ते त्या पहारेकऱ्याच्या लक्षात आले. पण बहुतेक लज्जेमुळे सावरकरांनी असे केले असावे, असा विचार करून तो गप्प बसला. त्या दाराच्या बरोब्बर समोर – थोडे वरच्या बाजूला – समुद्राकडे उघडणारे एक दुसरे पोर्टहोल होते. सावरकरांनी आदल्या दिवशीच आपल्या यज्ञोपविताने मापे घेऊन ठेवली होती. त्यांनी उपनेत्र (चष्मा – सावरकरांचा शब्द!) काढून बाजूला ठेवले. आणि सारे शरीर त्या उघड्या पोर्टहोलमधून खाली झोकून दिले. विचार करा — पलिकडे किती फूटांवर पाणी आहे, मुळात पाणी आहे की नाही याचीदेखील कल्पना नसताना सावरकरांनी उडी घेतलीये! यापाठी सावरकरांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याची नुसती कल्पनाच केलेली बरी!

    जहाज ते पाणी यांत २७ फुट अंतर होते. इतक्या उंचावरून समुद्राच्या पाण्याचा फटका किती जोरात बसतो, याची कल्पना पट्टीचे पोहणारे करू शकतात! जहाज ते बंदराची भिंत यात सुमारे ८ फुट अंतर होते. सावरकरांची उंची सुमारे पाच-साडेपाच फुट. म्हणजेच उडी मारताना घाई-गडबडीत थोडी जरी वेडीवाकडी हालचाल झाली असती, तरीही कपाळमोक्ष ठरलेलाच! बरं पाण्यात पडल्यावर तरी सुटका झाली का? अजिबात नाही. क्षणाचीही उसंत न घेता सावरकर जहाजाला वळसा घालून बंदराच्या भिंतीच्या दिशेने पोहायला लागले. बंदराची भिंत सुमारे ९ फुट उंचीची होती. सतत पाण्याशी संपर्क येऊन ती किती निसरडी झाली असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता! शिवाय तिचा वापर माणसांच्या चढ-उतारासाठी कधीच केला जात नसल्याने तिला हात-पाय रोवायला किंचितही जागा नव्हती. सावरकर तश्याही परिस्थितीत वर चढले. एक-दोन नव्हे, तर तब्बल ९ फूट! आणि मग ते पळत सुटले. सावरकरांना घ्यायला मादाम कामा आणि श्री. व्हि. व्हि. एस.  अय्यर येणार होते, हा कुणीतरी पसरवलेला ऐतिहासिक अपसमज आहे. वास्तविक असे कुणीही येणार नव्हते. एव्हाना पहारेकऱ्यांना सावरकर निसटल्याची कल्पना आलीच होती. ते सावरकरांच्या मागे लागले. सावरकरांनी तश्याच अवस्थेत एक फ्रेंच पोलिस गाठला. मात्र सावरकरांची अवस्था पाहून आणि त्यांचे बोलणे नीटसे न समजल्यामुळे तो सावरकरांची काहीच मदत करू शकला नाही.  तोपर्यंत पोहोचलेल्या इंग्रजी पहारेकऱ्यांनी त्या फ्रेंच पोलिसास काहीतरी चिरीमिरी दिली, सावरकरांना आपल्या ताब्यात घेतले आणि पुन्हा जहाजाच्या दिशेने चालवले!

    हे ते सावरकरांचे तथाकथित ५ मिनिटांचे पोहणे! उपरोक्त वर्णन वाचून सावरकरांनी किती जोखीम उचलली याची वाचकांना कल्पना आलीच असेल! हा कसला पराक्रम, ही तर फसलेली योजना – असंही काही मित्रांना वाटण्याचा संभव आहे! सावरकरांनी श्री. गाय आल्ड्रेडला सांगितलेली ‘योजना’ सुरू होते ती नेमकी इथेच!!

    सावरकरांना पळूनच जायचे असते तर ते कधी इंग्लंडला परतलेच नसते. भूमिगत राहून कार्य केले असते. मग सावरकरांनी इंग्लंडला येऊन, परत इंग्रजांच्या खर्चाने फ्रान्सला जाऊन आणि मग जाहीर उडी ठोकून काय मिळवले? याचे उत्तर दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांनी दिले! एखाद्या देशाचा गुन्हेगार जर दुसऱ्या देशाच्या भूमिवर असेल, तर त्याला पकडण्यासाठी त्या संबंधित देशांमध्ये ‘गुन्हेगार हस्तांतरणाचा करार’ असावा लागतो — असे आंतरराष्ट्रीय कायद्याचे तत्त्व आहे! तसा तो करार इंग्लंड आणि फ्रान्सदरम्यान होता. मात्र त्याची एक प्रक्रिया असते. ती न पाळताच सावरकरांना इंग्रज पहारेकऱ्यांनी ओढत नेले होते. थोडक्यात एक बेकायदेशीर गोष्ट घडली होती. दुसऱ्या दिवशीची सारी फ्रेंच वर्तमानपत्रे ही इंग्लंडच्या या बेकायदेशीर वागण्यावर टीकेची झोड उठवण्यात रंगून गेलेली होती! ज्या साम्राज्यावर कधीच सूर्य मावळते नाही त्या इंग्रजी साम्राज्याला आपल्या कूटनीतीच्या बळावर सावरकरांनी एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील बेकायदेशीर गोष्ट करायला भाग पाडले होते. अवघ्या इंग्रज सरकारचा आपल्या योजनेत एखाद्या प्याद्यासारखा वापर करून घेतला होता! हळूहळू हे टीकेचे लोण जगभरात पसरले. फ्रान्सच नव्हे तर अवघा युरोप, अमेरिका खंड, पार जपान, रशिया आदी दूरचे देशही इंग्लंडवर जहरी टीका करू लागले व सावरकरांना सोडण्याची मागणी करू लागले. अवघे जग या एकाच विषयाने दुमदुमून गेले! मार्सेल्सच्या महापौरांनी इंग्रज सरकारला खरमरीत पत्र लिहून सावरकरांना सोडण्याची मागणी केली. वाद इतका वाढला की, सारे प्रकरण अखेर आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यावे लागले! कल्पना करा — आंतरराष्ट्रीय न्यायालय, जिथे दोन देश एकमेकांशी भांडतात. तिथे इंग्लंड आणि फ्रान्स हे दोन देश एकमेकांशी भांडताहेत. तेही कुणासाठी? तर एका तिसऱ्याच गुलाम देशातील विनायक दामोदर सावरकर नावाच्या माणसासाठी! एका रात्रीत ‘भारत नावाचा काहीतरी देश आहे आणि तिथले नागरिक अन्यायी इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झगडताहेत’ ही बाब जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली! कश्यामुळे? तर सावरकरांनी चाणक्यमतिने केलेल्या एका खेळीमुळे!! त्यानंतर लवकरच फ्रान्सच्या पंतप्रधानांना त्यागपत्र द्यावे लागले. भारताने, विशेषत: सावरकरांनी मिळवलेल्या या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्धीचा फायदा भारतीय स्वातंत्र्यलढ्याला पुढे अनेकदा झाला. तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे!

    आज या उडीला शंभर वर्षांहूनही अधिक काळ लोटलाय. मात्र त्यापाठी सावरकरांनी दाखवलेल्या आंतरराष्ट्रीय राजनीतीच्या सूक्ष्म आकलनाची खुमारी यत्किंचितही कमी झालेली नाही. सावरकरांच्या राजनीतीपटुत्वापुढे नतमस्तक होताना सार्थपणे म्हणावेसे वाटते की, सावरकरांनी मारलेली उडी ही नुसती उडी नव्हती तर भारतीय स्वातंत्र्याची उभारलेली गुढी होती!!

    (संदर्भ साभार: संशोधिका श्रीमती Anurupa Cinar – www.anurupacinar.com)
    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या:  www.vikramedke.com)

  • शाहरुख नाचलाच पाहिजे!

    शाहरुख नाचलाच पाहिजे!

    देशाच्या पंतप्रधानाइतकं व्यस्त कुणी असू शकतं का हो? नाही ना! काल कै. मुंडेंच्या निधनाची बातमी समजल्यानंतर ताबडतोब पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदींनी सारे कार्यक्रम रद्द केले व राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. मात्र बहुतेक हिंदी सिनेमातला बोबडा नाच्या शाहरुख खान हा स्वत:ला पंतप्रधानांपेक्षाही मोठा समजत असावा. कारण या राष्ट्रीय दु:खाच्या प्रसंगी कार्यक्रम रद्द करणे तर दूरच, हा घरबुडव्या बंगालात ठुमके लावत होता – ममता बॅनर्जीसोबत! त्याला देशाच्या दु:खापेक्षा स्वत:च्या संघाच्या विजयाचा जास्त आनंद महत्वाचा वाटत होता. इतके दिवस शाहरुखनामक माकडसदृश प्राणी माझ्या भारत देशात राहातो, याची लाज वाटायची. काल मला त्याची लाज नाही, घृणा वाटली – घृणा! एखाद्या सडलेल्या मांसाच्या तुकड्याची जशी घृणा वाटते, तशी घृणा!

    खानाने ‘मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडून जाईन’ असे विधान केले नव्हते. मान्य! शंभर टक्के मान्य. ती कुणीतरी पसरवलेली अफवाच होती. परंतू त्यावेळी तावातावाने खानाची बाजू घेऊन भांडायला आलेल्या एकाने तरी हा विचार केला का की — अशी अफवा शाहरुखबद्दलच का पसरते? सलमानसारख्या इतर कुणा खानाबद्दल का नाही? कारण एकच – धूर तिथूनच उठतो, जिथे आग असते! परंतू ‘सत्या’ची बाजू घेतल्याचा आव आणणाऱ्यांपैकी किती लोकांनी त्या अफवेची कारणमीमांसा पाहाण्याचा प्रयत्न केला होता? स्वत:लाच विचारा हा प्रश्न! आणि ज्याचं चारित्र्य आधीच डागाळलेलं असतं, त्याच्याच चारित्र्यावर अफवांचे नवनवे शिंतोडे उडतात ना? खानाने याआधीदेखील कुणाही देशभक्ताच्या डोक्यात संतापाची तिडीक उठावी अश्या गोष्टी केलेल्याच आहेत ना — मग ते पाकिस्तानी खेळाडूंची केलेली वकिली असो, चित्रपटांतून जाणीवपूर्वक केलेला भारत देश व भारतीय संस्कृतीचा अपमान असो, वानखेडे स्टेडियमवर एखाद्या सामान्य टपोरीसारखे केलेले वर्तन असो — एक ना अनेक गोष्टी सांगता येतील.

    त्यामुळेच खरं तर एका दृष्टीने बघावयास गेलो तर, काल जो नीचपणा खानाने केला त्यात आश्चर्य वाटायचे काहीच कारण नाही. त्याची लायकीच तेवढी आहे. तो असंच वागणार.  आणि तो असं कुणाच्या जीवावर वागतो माहितीये? तुमच्या जीवावर. त्या फडतूस नाच्याला सुपरस्टार समजणाऱ्या प्रत्येकाच्या जीवावर! त्याच्या एका दर्शनासाठी पडद्याकडे चातकासारखे डोळे लावून बसणाऱ्या प्रत्येकाच्या जीवावर! ‘आयपीएल’ नावाची गटारगंगा पाहाणाऱ्या, प्रत्येक चेंडूगणिक स्टेटस-अपडेट करणाऱ्या, कोलकात्याच्या (ज्यात सर्वाधिक पाकिस्तानी खेळाडू आहेत म्हणे!) संघासाठी जल्लोष करणाऱ्या, त्याचा संघ जिंकल्यावर घरी पुत्ररत्न झाल्यागत आनंद साजरा करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवावर! त्यामुळे त्याचं जर कालचं कृत्य देशद्रोहाचं असेल, तर त्या देशद्रोहाला तो कमी आणि तुम्ही जास्त जबाबदार आहात. कारण कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं म्हणून जर माणसेही वाकडी लागायला लागली, तर दोष माणसांचा असतो, कुत्र्याचा नव्हे! किंबहुना कुत्र्यालाच का कुत्रा म्हणावं — एवढे होऊनही मंडळी ना आयपीएल पाहाणे थांबवणार आहेत, ना खानाचे चित्रपट, ना त्याच्या पोकळ स्टारडमचे गोडवे गाणे थांबवणार आहेत. त्यामुळे शेपूट याही मंडळींचे वाकडेच आहे की! करा. अवश्य करा. फक्त इथून पुढे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलादेखील तोंडातून ‘देशभक्ती’ नावाचा शब्द उच्चारणे बंद करा — शोभत नाही तुमच्या तोंडी!

    चला, आयपीएलचा हा हंगाम तर संपला. यंदाच्या दिवाळीत खानाचा नवा चित्रपट प्रदर्शित होतोय. गर्दी तर केलीच पाहिजे ना ‘भक्तांनी’! त्यानंतर येतोच आहे ‘आयपीएल’चा नवा हंगाम! त्यावेळी काय स्टेटस-अपडेट केले पाहिजेत, कसे केकेआरचे उत्साहवर्धन केले पाहिजे याची तयारी तर करायलाच हवी! त्यासाठी गरज पडली तर कामधंदा सोडून तासनतास टिव्हीसमोर तर बसायलाच हवे! आणि हो, काळ्या पैश्यावर पोसलेला आयपीएलचा नंगानाच चवीने पाहातानाच ‘स्विस बँकेतला काळा पैसा भारतात आणणे कसे गरजेचे आहे’ यावर गरमागरम चर्चा केल्याच पाहिजेत! मधल्या काळात नाच्याच्या जाहिराती, एखाद-दुसरा फालतू रिऍलिटी-शो पाहायलाच हवा! त्याची बाजू तर घेतलीच पाहिजे. त्याच्या कुटुंबाचे उदाहरण देऊन सर्वधर्मसमभावाचे पोकळ गोडवे तर गायलेच पाहिजेत (त्याच्या मुलांची नुसती नावेच सर्वसमावेशक आहेत – धर्मही आहे का, कुणी पाहिलंय?)! खानाचा चित्रपट चाललाच पाहिजे! त्याच्या दांभिकतेला विनम्रता म्हटलंच पाहिजे! त्याच्या फिट आल्यागत हावभावांना अभिनय, म्हटलंच पाहिजे! आणि च्यायला तिकडे कुणा लोकनेत्याचे निर्वाण होवो वा आख्खा देश खड्ड्यात जावो, आमचा शाहरुख आनंदाने नाचलाच पाहिजे!! शाहरुख आनंदाने नाचलाच पाहिजे!!!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी व लेखकाची व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

  • RIP नव्हे, ‘सद्गती’ म्हणा!!

    RIP नव्हे, ‘सद्गती’ म्हणा!!

    कुणी व्यक्ती गेली की सोशल मिडियावर श्रद्धांजलीचे सत्रच सुरू होते. त्यातही हल्ली आपल्या भावना एवढ्या काही स्वस्त झाल्या आहेत की, आपल्याला Rest In Peace एवढे ३ शब्दही टंकित करण्याची तसदी घ्यावीशी वाटत नाही, अथवा तितका वेळ नसतो. त्यामुळे मंडळी थोडक्यात RIP लिहून मोकळी होतात! याच RIP संदर्भात काही गोष्टी स्पष्ट करणे आवश्यक वाटते. पाहा पटतात का —

    १) RIP अर्थात Rest In Peace चा शब्दशः अर्थ होतो – ‘(शरीर) शांततेत आराम करो’. आपण तो शब्द इतक्या काही सहजपणे वापरतो की, त्याचा अर्थ तरी आपल्याला समजतो की नाही असा प्रश्न पडावा. ही मुळात ख्रिश्चन संकल्पना आहे मित्रांनो. त्यांच्यात शरीरालाच सारे महत्व दिले जाते. ते मानतात की, न्यायाच्या दिवशी परमेश्वर सर्वांना त्यांच्या थडग्यातून उठवून त्यांच्या पाप-पुण्याचा हिशोब करेल. तो दिवस कधी येईल, माहिती नाही. परंतू तोवर त्या शरीराला त्याच्या थडग्यात आराम मिळो, यासाठी म्हणतात Rest in Peace. आता यात सामान्य तर्कबुद्धीच्याही व्यक्तीला पडणारे प्रश्न असे की,

    अ) मृत्यूनंतर काही दिवसांतच शरीराचे विघटन होते. मग कोणत्या शरीराला पुन्हा उठवणार?
    ब) समजा सर्वशक्तिमान परमेश्वर जर कुठूनही शरीराची तत्त्वे गोळा करून ते निर्माण करणारच असेल, तर मग शरीर पुरायची गरज काय? हिंदू ज्याप्रमाणे शरीर जाळतात (ही प्रथा ग्रीकांनी आपल्याकडून जशीच्या तशी उचलली!) त्याप्रमाणे जाळल्यावरही परमेश्वर ते निर्माण करेलच की!
    क) शरीर खरोखरीच जर इतके गरजेचे असते, तर परमेश्वराने मुळात ते नष्टच का होऊ दिले असते?
    ड) झाडाझुडुपांमध्येही जीव असतो आणि त्यांचा तर अंतिमसंस्कारही होत नाही. मग हा परमेश्वरी न्यायाचा नियम त्यांनाही लागू आहे का?
    इ) या नियमानुसार डायनोसॉर्सचे नेमके काय झाले?

    ही प्रश्नांची यादी कितीही वाढवता येईल. तूर्त इतकेच सांगून थांबतो की, ही ख्रिश्चन संकल्पना नंतर मुसलमानांनीही जशीच्या तशी उचलली आणि कित्येक अडाणी हिंदूच नव्हेत तर कट्टर हिंदुत्ववादी मित्रही अर्थ समजून न घेता हीच पद्धत पुढे चालवित आहेत!

    २) हिंदू धर्म सांगतो —

    ‘वासांसि जीर्णानि यथा विहाय नवाणि गृह्णाति नरोऽपराणि ।
    तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवाणि देही ।।’
    (गीता, २/२२)
    अर्थात आपण ज्याप्रमाणे वस्त्रे जुनी झाल्यावर ती टाकून नवीन वस्त्रे घालतो, त्याचप्रमाणे शरीर जुने झाल्यावर देही (देह धारण करणारा – आत्मा) ते टाकून नवीन देह परिधान करतो!

    मृत्यूच्या प्रसंगी शरीरातून काहीतरी निघून जाते, हे वैज्ञानिक स्तरावर सारेच मान्य करतात. परंतू हिंदूंनी सहस्रावधी वर्षांपूर्वीच त्या संकल्पनेसाठी ‘देही’ असा शब्द योजून आपला द्रष्टेपणा दाखवून दिला आहे. आईन्स्टाईन ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सांगतो. त्याआधारे ऊर्जा नष्ट होत नाही, तर तिचे केवळ एका प्रकारातून दुसऱ्यात रुपांतर तेवढे होते. त्यालाच अनुसरून हा चैतन्यरूप देही एकदा निघून गेला की, तो दुसऱ्या प्रकारात रुपांतरीत व्हावयास हवा. परंतू शरीर धारण करणे हा त्याचा गुणधर्म असल्याने तो शरीरच धारण करतो! या संकल्पनेत आणखी एक संकल्पना मिसळली जाते ती म्हणजे पाप-पुण्य! ज्याच्या त्याच्या कर्मांनी देही नंतर कोणते शरीर धारण करणार हे ठरते. यात सर्वच सजीव सृष्टी येते – ८४ लक्ष योनी!! यात झाडाझुडपांसहीत सर्वच सजीव, सजीव असण्याचे आणि नियमबद्ध असण्याचे उत्तर मिळते!

    परंतू देहीचे जाणे आणि दुसरे शरीर धारण करणे यात जो काळ जातो, तो त्या देहीला त्याच्या पाप-पुण्याच्या हिशोबात भोगायचा असतो. पापाचे पारडे जड असेल, तर देही जास्त लांब जाऊ शकणार नाही. इथेच घुटमळत राहील – परंतू वाईट अवस्थेत. पुण्याचे पारडे जड असेल तरीही देही ते भोगून परत इथेच घुटमळेल! म्हणूनच हिंदू संस्कृती पाप आणि पुण्य दोन्हीही शून्यावर यावे यासाठी ‘निष्काम कर्मयोग’ सांगते! तरच देहीला घर्षणरहित गती प्राप्त होईल ना! तर थोडक्यात हा प्रवास आहे. यात आप्तजनांच्या आणि शुभचिंतकांच्या शुभेच्छांचा खूप मोठा वाटा आहे.

    पण आपण काय करतो? आपण त्या आत्म्याला शुभेच्छा देण्याऐवजी ‘चिरशांति लाभो’ म्हणतो आणि नकळतच त्याच्या प्रवासाला चाप लावतो! एखादी ऊर्जा प्रवासाला निघते आणि आपण मात्र आपल्या प्रार्थनेची कळ दाबून तिला स्तब्ध राहायला सांगतो! यावर जर कुणाचा विश्वासच नसेल, तर माझे काहीच म्हणणे नाही (मग अश्या परिस्थितीत काहीही – अगदी RIP म्हणण्याची तरी औपचारिकता कश्यासाठी दाखवायची मग उगाच?). परंतू जर तुम्ही स्वत:ला हिंदू म्हणवून घेत असाल तर तुमचे हे वागणे धर्माविरुद्ध तर आहेच, सोबत अनेक वैज्ञानिक सिद्धांतांच्याही विरुद्ध आहे.

    आता प्रश्न उभा राहील की, RIP नसेल म्हणायचे तर मग काय म्हणायचे? याचेही उत्तर आहे. हा केवळ दृष्टीकोनाचा फरक आहे मित्रांनो. पाश्चात्य लोक कुणाची आठवण काढल्या-काढल्या ती व्यक्ती समोर आली तर गमतीने म्हणतात – Think of the devil & devil is here याउलट आपण म्हणतो ‘शंभर वर्षं आयुष्य आहे तुम्हाला’!! आहे की नाही दृष्टीकोनाचा फरक! तद्वतच ‘चिरशांति लाभो’ ऐवजी आपल्याकडे म्हणतात “गतात्म्यास सद्गती लाभो” – May The Soul Attain Sadgati. याचेही लघुरुप करून AS असे म्हणता येईलच की! RIP पेक्षा छोटे आणि सोप्पे!!

    तर अशी ही सद्गतीची संकल्पना आणि दृष्टीकोन! ज्यांचा या कश्यावरच विश्वास नाही, परमेश्वर त्यांचे भले करो. मात्र ज्यांचा हिंदू धर्मावर आणि त्यातील वैज्ञानिकतेवर विश्वास आहे, ती मंडळी तरी याउप्पर RIP चा रिप-रिप पाऊस थांबवून ‘सद्गती लाभो’ (AS) असे सार्थपणे म्हणतील, अशी अपेक्षा!!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी व आपल्या परिसरांत अनेकानेक विषयांवर लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी क्लिक करा – www.vikramedke.com)

  • ब्राझीलच्या कार्निव्हलमध्ये शिवशंभो — एक नवी सुरुवात?

    भारत देश किती जरी दांभिक-धर्मनिरपेक्षतेच्या गाळात रुतत असला, तरीही शेष जग कसे हळुहळू परंतू निश्चितपणे हिंदू धर्म, संस्कृती आणि हिंदुत्वाकडे आकर्षित होते आहे, याची अनेक उदाहरणे मी सातत्याने देत असतो. मग तो लिसा मिलर या अमेरिकन विदुषीचा “We Are All Hindus Now” हा अमेरिकेचे हिंदुत्वाकडे वाढते आकर्षण साधार सांगणारा लेख असो (लिंक: http://www.thedailybeast.com/newsweek/2009/08/14/we-are-all-hindus-now.html) वा कोस्टारिका देशाने पाडलेले श्रीगणेशाचे सुंदर नाणे असो वा घाना या आफ्रिकन देशात प्रतिवर्षी वाढत जाणारा गणेशोत्सवाचा प्रभाव असो (लिंक: http://www.patheos.com/blogs/drishtikone/2013/09/hinduism-growing-in-africa-without-proselytizing/) वा अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये सातत्याने चर्चेसचे मंदिरांमध्ये होत असलेले रुपांतर असो (लिंक: http://vikramedke.com/blog/churches-chi-hotayat-mandire-chahul-badalatya-pravahachi/) वा कॅलिफोर्नियात साजरा होणारा हिंदू-मास असो (लिंक: http://www.hafsite.org/CA_Declares_Oct_Hindu_American_Month) वा अन्य काही!

    आजही मी असेच एक अगदी अलिकडचे उदाहरण सादर करतोय. रिओ-दि-जानेरोचा सांबा-महोत्सव (कार्निव्हल) अवघ्या जगात प्रसिद्ध आहे. “रिओ” या इंग्रजी चित्रपटातही त्याचे अतिशय मनोवेधक दर्शन सर्वांनी घेतले आहे! यावर्षीही (३ मार्च २०१४) तो अतिशय उत्साहाने साजरा होतोय. विविध सांबा-कलाकार आणि स्थानिक मंडळी या महोत्सवात अतिशय उत्साहाने सहभागी होत असतात. विविध मूर्त्या, आराशी यांची मिरवणुकीत रेलचेल असते! यावर्षीही या मिरवणुकीत अनेक प्रकारच्या आराशी होत्या. परंतू सर्वांचे लक्ष वेधून घेत होती ती ‘सल्गिरो सांबा स्कुल’च्या आराशीतील मूर्ती! तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ती होती देवाधिदेव महादेवांची अतिप्रचंड आकाराची मूर्ती! आहे की नाही गंमत.

    इथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, ब्राझील हा एक ख्रिश्चन देश आहे. किंबहुना ख्रिस्ताची अतिप्रचंड मूर्ती याच रिओ शहरात आहे. तेथील वार्षिक महोत्सवात शिवशंकरांची मूर्ती समाविष्ट करावीशी वाटणे, ही हिंदुत्वाच्या दृष्टीने निश्चितच अत्यंत आशादायी आणि सकारात्मक बाब आहे! इतर अनेक देशांप्रमाणे ब्राझीलनेही हिंदुत्वाचा सनातन मार्ग अनुसरण्याची ही केवळ सुरुवात आहे. तरीही प्रश्न उरतोच की, सबंध जग हळूहळू या मार्गावर चालू लागताना ही हिंदुत्वाची गंगोत्री मूळात जिथून उगम पावली तो हिंदुस्थान खोट्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा कधी उतरवणार? अन्यथा देव न करो, परंतू भविष्यात परिस्थिती अशी होईल की, जगभरात सर्वत्र हिंदूच हिंदू दिसतील परंतू हिंदुत्वाच्या पितृभूत मात्र हिंदू औषधालाही सापडणार नाही. हे होता उपयोगी नाही. शेवटी आपला वारसा जपणं आणि तो वाढवणं आपल्याच हाती आहे, हो ना?

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्याने ऐकण्यासाठी क्लिक करा:  www.vikramedke.com)

    image

  • विस्मृतीत गेलेली त्रिमूर्ती

    आज १९ डिसेंबर. १९२७ साली याच दिवशी पं. रामप्रसाद “बिस्मिल”, अशफाकउल्लाह खान “हसरत” आणि ठाकूर रोशनसिंह यांना फाशी देण्यात आली होती. तीन जीव हुतात्मा झाले होते. दुर्दैवाने क्रमिक पुस्तकांतून राजकीय हेतूंनी प्रेरित इतिहास शिकलेल्या आम्हाला, चार-दोन अहिंसक राजकारणी सोडल्यास, मातृभूमीसाठी प्राणांचीही बाजी लावणारे अन्य हुतात्मे माहितीदेखील नसतात. त्यामुळे उपरोक्त तिघांबद्दल थोडक्यात सांगतो, जेणेकरून वाचकांना त्यांची माहिती व्हावी व या देशभक्तांचा अधिक अभ्यास करण्याची प्रेरणा मिळावी..

    १) आर्यसमाजी असलेले पं. रामप्रसाद बिस्मिल हे कट्टर हिंदुत्ववादी. शुद्धीकार्यात अग्रेसर. बाणेदारपणा तर असा की, फाशीपूर्व खटला चालू असताना एकदा त्यांचा उल्लेख “मुलजिम” (आरोपी) ऐवजी चुकून “मुलाजिम” (नोकर) असा झाला तर या पठ्ठ्याने थेट न्यायाधिशाला सुनावले –
    “मुलाजिम हमको मत कहिये, बड़ा अफ़सोस होता है; अदालत के अदब से हम यहाँ तशरीफ लाए हैं। पलट देते हैं हम मौजे-हवादिस अपनी जुर्रत से; कि हमने आँधियों में भी चिराग अक्सर जलाये हैं।”
    ही शायरी ऐकून न्यायाधीश चाटच पडला, हे सांगणे न लगे!
    त्यांची तर्कनिष्ठ शैली पाहून एकदा न्यायाधीशांनी त्यांना विचारले होते की, “बिस्मिल, कोणत्या विद्यापीठातून मिळवलीत कायद्याची पदवी?” हे महाशय खाडकन् उत्तरले होते, “किंगमेकर डज् नॉट नीड एनी डिग्री”!
    २) रामप्रसाद किती जरी हिंदुत्ववादी असले तरी त्यांचे जीवश्चकंठश्च मित्र होते – अशफाकउल्लाह खान! किंबहुना भारतीय स्वातंत्र्यासाठी फाशी जाणारे पहिले मुसलमान होते अशफाकउल्लाह खान! फाशी जाण्यापूर्वी लिहिलेल्या “अशफाक की आखरी रात” या काव्यात हा वीर काय म्हणतो पाहा तरी एकदा –
    “जाऊँगा खाली हाथ मगर,यह दर्द साथ ही जायेगा;जाने किस दिन हिन्दोस्तान,आजाद वतन कहलायेगा।
    बिस्मिल हिन्दू हैं कहते हैं, फिर आऊँगा-फिर आऊँगा; ले नया जन्म ऐ भारत माँ! तुझको आजाद कराऊँगा।।
    जी करता है मैं भी कह दूँ, पर मजहब से बँध जाता हूँ; मैं मुसलमान हूँ पुनर्जन्म की बात नहीं कह पाता हूँ।
    हाँ, खुदा अगर मिल गया कहीं, अपनी झोली फैला दूँगा; औ’ जन्नत के बदले उससे, यक नया जन्म ही माँगूँगा।।”
    त्यांच्या मजारवर त्यांचे किती चपखल काव्य आहे पाहा—
    “जिन्दगी वादे-फना तुझको मिलेगी ‘हसरत’,
    तेरा जीना तेरे मरने की बदौलत होगा।”
    ३) या त्रयीतले तिसरे वीर होते ठाकूर रोशनसिंह! या महाधीराने फाशीच्या अवघ्या तीनच दिवस आधी आपल्या मित्राला एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी जे लिहिलंय, त्यावरून त्यांच्या देशभक्तीचा आणि स्थितप्रज्ञतेचा अंदाज बांधता येतो –
    “इस सप्ताह के भीतर ही फाँसी होगी। ईश्वर से प्रार्थना है कि वह आपको मोहब्बत का बदला दे। आप मेरे लिये रंज हरगिज न करें। मेरी मौत खुशी का बाइस (कारण) होगी। दुनिया में पैदा होकर मरना जरूर है। दुनिया में बदफैली करके अपने को बदनाम न करे और मरते वक्त ईश्वर की याद रहे;यही दो बातें होनी चाहिये और ईश्वर की कृपा से मेरे साथ ये दोनों बातें हैं। इसलिये मेरी मौत किसी प्रकार अफसोस के लायक नहीं है। दो साल से बाल-बच्चों से अलग रहा हूँ। इस बीच ईश्वर भजन का खूब मौका मिला। इससे मेरा मोह छूट गया और कोई वासना बाकी न रही। मेरा पूरा विश्वास है कि दुनिया की कष्ट भरी यात्रा समाप्त करके मैं अब आराम की जिन्दगी जीने के लिये जा रहा हूँ। हमारे शास्त्रों में लिखा है कि जो आदमी धर्म युद्ध में प्राण देता है उसकी वही गति होती है जो जंगल में रहकर तपस्या करने वाले ऋषि मुनियों की।”

    भारतमाता ही खरोखर वीरप्रसवा आहे. परंतू या वीरांना विसरून जाणे हा इथल्या धर्मनिरपेक्षतेचा रिवाज आहे! आज या तिन्ही हुतात्म्यांना नमन करताना भीती वाटते की, आम्ही जर आमच्या वीरांना आणि त्यांच्या कार्याला विसरलो, तर येणारी पिढी प्रेरणा कुणापासून घेणार? ज्यांच्यावर पुढच्या पिढीने डोकी ठेवावीत, असे पाय कुठून येणार? तुम्हालाही वाटतेय का हो ही भीती? जर वाटत असेल, तर उठा – जागे व्हा आणि मिळवून द्या या हुतात्म्यांना त्यांचे उचित स्थान! नाहीतर
    “शहिदोंकी मजारोंपर लगेंगे हर बरस मेले
    वतनपर मिटनेवालोंका बाकी निशाँ होगा”
    या ओळी वल्गनाच ठरतील, व्यर्थ ठरतील. आणि असे झाले, तर आपल्यासारख्या करंटे केवळ आपणच असू..!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच लेखकाने व्याख्यानांतून मांडलेली विविध क्रांतिकारकांची चरित्रे ऐकण्यासाठी आणि या विषयांवर लेखकाचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी संपर्क करा – www.vikramedke.com)

    image

  • अभिव्यक्तीस्वातंत्र्य असेही..!

    गिरीश कर्नाड ही व्यक्ती तर आपणा सर्वांना माहितीच असेल. ते लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत. अभिनेतेही आहेत. परंतू एवढीच एक ओळख नाहीये त्यांची. या सगळ्यासोबतच श्री. कर्नाड हे सेक्युलॅरिझमच्या भारतीय आवृत्तीचे मूर्तीमंत प्रतीकही आहेत! मग त्यासाठी ते विविध मंचांवरून हिंदूत्वविरोधी वक्तव्ये (बऱ्याचदा प्रसंग सोडून!! आठवा काही महिन्यांपूर्वी व्हि. एस. नायपॉल यांच्यावर त्यांनी केलेली टिका!) करीत असतात. मराठा साम्राज्याच्या शूर पेशव्यांना कित्येकदा पाठ दाखवून पळालेल्या जिहादी टिपूचे समर्थन करत असतात. त्यांना तुघलकही आवडतो म्हणे! मागील वर्षी तर या महानुभावांनी कमालच केली. जयपूरच्या साहित्य महोत्सवात त्यांनी भारतरत्न रवींद्रनाथ ठाकूरांचा उल्लेख “एक थर्डक्लास नाटककार” असा केला. त्यावरून बरेच वादळही उठले होते. कर्नाडांनी त्यावेळी स्वत:च्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे जोरदार समर्थनही केले होते!

    नुकताच या प्रकरणाचा उत्तरार्ध पार पडला. मात्र सुदैवाने म्हणा वा दुर्दैवाने, परंतू तो कर्नाडांसाठी फारसा आनंददायी नाहीये!

    बेंगरुळूच्या “रंगशंकरा”ने श्री. कर्नाड यांच्या नाट्यरचनांवर आधारित एका महोत्सवाचे आयोजन केले होते. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात काही चर्चासत्रे होणार होती, कर्नांडांच्या नाटकांचे प्रयोग होणार होते, इतकेच नव्हे तर कर्नाडांनी दिग्दर्शित केलेला चित्रपटही दाखवला जाणार होता. असा सगळा ‘कर्नाडमय’ प्रकारचा मोठ्ठा घाट घातलेला होता! या कार्यक्रमात २३ ऑक्टोबर रोजी पुदुच्चेरीच्या एका नाट्यसंस्थेने बसवलेले आणि कर्नाडांनी लिहिलेले “ड्रिम्स ऑफ टिपू सुलतान” नाटक सादर होणार होते. नाटक व्यवस्थित चालू असताना अखेरच्या १५ मिनिटांत मात्र गंमत घडली! मंचावर अचानक एका अतिरेक्याने प्रवेश केला आणि तो जोरजोराने भारतविरोधी घोषणा द्यायला लागला. पुदुच्चेरीच्या त्या दिग्दर्शकाने नाटकाचा अखेरचा प्रसंग बदललाय हे प्रेक्षकांच्या लक्षात येईपर्यंत, पात्रांपैकी एकाने त्या अतिरेक्याला मारल्याचा अभिनय केला. मग दुसऱ्याने त्याच्या चेहऱ्यावरील बुरखा बाजूला केला. मग त्यांच्यापैकी एकजण म्हणाला ‘अरे हे तर गिरीश कर्नाड’! आणखी एकजण म्हणाला, ‘कर्नाड मेले’! एकाने त्या अतिरेक्याच्या (की कर्नाडांच्या!) पात्राचे खिसे तपासले, तर त्यात काही कागद सापडले. मग एकाने ‘हे फालतू आहे’ असं म्हणून ते सारे कागद फेकून दिले!
    तोपर्यंत प्रेक्षकांमध्ये कुजबूज आणि चुळबूळ सुरू झालेली! काहींनी विरोध करत थेट रंगमंचावर धाव घेतली. कडाक्याचे भांडण होईल असे वाटत असतानाच ‘रंगशंकरा’च्या संचालिका आणि अभिनेत्री अरुंधती नाग मध्ये पडल्या आणि ‘कुणाला जर या खोडसाळपणाबद्दल दिग्दर्शकाला जाब विचारायचा असेल तर त्यांनी संध्याकाळी ७.३० च्या प्रयोगात थेट दिग्दर्शकालाच विचारावं’ असं सांगितलं.

    संध्याकाळच्या प्रयोगातही हाच प्रकार! परत गोंधळ सुरू झाला तेव्हा दिग्दर्शक कुमार वल्लवन स्वत:च मंचावर आले आणि त्यांनी सांगितले की, “एवढा गोंधळ घालायला काय झालं? मंचावर उभे राहून दुसऱ्या नाटककाराचा अपमान करणे तर आम्ही श्री. कर्नाडांकडूनच शिकलो आहोत! त्यांनीही नाही का रवींद्रनाथांचा अगदी असाच अपमान केला? त्या घटनेचा जर आम्ही असा प्रतिकात्मक निषेध करतोय तर काय चुकलं? रवींद्रनाथांना थर्डक्लास नाटककार म्हणणे हे जर कर्नाडांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य असेल, तर त्याचा असा निषेध करणे हे आमचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नव्हे काय”!!

    यानंतर काय झाले हे समजू शकलेले नाही, परंतू कर्नाडांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य त्यांच्याच महोत्सवात त्यांच्यावरच उलटले हे नक्की. बाकी त्यांचे दात घश्यात गेले किंवा काय हे कर्नाडच जाणे!!
    (‘इंडियाफॅक्ट्स’मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीच्या आधारे.
    मूळ बातमीची लिंक – http://www.indiafacts.co.in/girish-karnad-medicine/)

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या – www.vikramedke.com)

    image