Category: स्फुट लेख

  • सुसंस्कृतम्..!

    “तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाज्ञानदायकम् ।
    तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाज्ञानदायकम् ।।”

    वरवर पाहाता असे वाटेल की, इथे एकाच संस्कृत ओळीची पुनरावृत्ती करण्यात आली आहे. पण हीच तर संस्कृत भाषेची मौज आहे. जरी दोन्हीही ओळी समान असल्या तरीही दोन्ही ओळींचे अर्थ वेगळे आहेत. आणि दोन्ही ओळी मिळून एक संपूर्ण श्लोक तयार होतो.
    सुभाषितकार कुणा राजाच्या दरबारात गेलाय. तिथे त्याने पाहिले की, राजा भर दरबारात कामकाज चालू असतानाही तंबाखूचे व्यसन करतोय. ते पाहून लगेच सुभाषितकाराला ओळ स्फुरली –
    “तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाज्ञानदायकम्”.
    याची फोड होते – “तमाखुपत्रं राजेन्द्र भज मा अज्ञानदायकम्”.
    अर्थात – हे राजेन्द्रा, नशा आणणारे (अज्ञानदायकम्) तंबाखूचे पान (तमाखुपत्र) नको खाऊस (मा भज).
    राजाने यावर विचारले, “मग काय करू”?
    त्यावर सुभाषितकार पुन्हा म्हणतो,
    “तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाज्ञानदायकम्”.
    यावेळी मात्र त्याची फोड होते – “तम् आखुपत्रं राजेन्द्र भज मा ज्ञानदायकम्”.
    अर्थात – हे राजेन्द्रा, त्या (तम्) मा (म्हणजे लक्ष्मी) आणि ज्ञान देणाऱ्या (मा, ज्ञानदायकम्) आखुपत्राची (म्हणजे गणपतीची) भक्ती कर.
    अर्थातच चाणाक्ष राजाला (हो, त्याकाळचे सत्ताधारी विद्वान होते बरं का. आत्ताचे “पाँचवी पास से तेज” जरी निघाले तरी आम्हाला जग जिंकल्यासारखे वाटते!) सुभाषितकाराच्या दोन्ही ओळींचा अर्थ कळला, हे सांगणे नकोच!

    परंतू हीच संस्कृत भाषेची थोरवी आहे. या समुद्रात तुम्ही जितक्या बुड्या माराल तितकी अधिक रत्ने तुम्हाला गवसतील. उपरोक्त श्लोक हा संस्कृतातील “काव्यशास्त्रविनोद”चा केवळ एक प्रकारमात्र आहे! शिवाय एकाच ओळीतून दोन इतके भिन्न अर्थ निघतात आणि त्याद्वारे दोन्ही ओळींच्या समुच्चयास एक पूर्णत्व प्राप्त होते, यावरूनच संस्कृतची समृद्धता तुमच्या लक्षात येईल. माझ्या माहितीप्रमाणे इतकी समृद्ध भाषा अवघ्या जगात दुसरी कोणतीच नाही. आपण मात्र विनाकारणच इंग्रजीसारख्या उधार-उसनवारीवर पोसलेल्या भाषेच्या पाठी धावतो आहोत!

    – © विक्रम श्रीराम एडके.

    image

  • एक कृतिशील पूल: स्वामी विवेकानंद

    मला एका बाबतीत कायम स्वामी विवेकानंदांचं उदाहरण द्यावंसं वाटतं. स्वामीजी हे आपल्या काळातल्याच नव्हे तर आत्ताच्या काळातल्याही कित्येक धर्मज्ञांहून अधिक धर्मज्ञ आणि कित्येक सुधारकांहूनही अधिक सुधारक होते. परंतू त्यांनी कधी निव्वळ निष्क्रिय अध्यात्म लोकांच्या माथी मारलं नाही, वा पराकोटीच्या इहवादाने लोकांच्या श्रद्धांची नासधूस केली नाही. लोकांमध्ये राहिले, लोकांचे बनून राहिले. आत्यंतिक धर्मवाद्यांचे बोट पकडून हळूच त्यांना आवश्यक ती भौतिकता शिकवली आणि आत्यंतिक धर्मवाद्यांना अध्यात्माची वैज्ञानिकता दाखवून दिली. हे सारे नुसते बोलून नव्हे बरं का, तर कृतीने!
    आठवा त्या संस्थानिकाचा किस्सा! टोकाचा इहवादी असलेला तो संस्थानिक मूर्तीपूजेचा कट्टर विरोधक होता. स्वामीजींनी त्याच्याच दरबारात टांगलेली त्याचीच तसबीर मागवली. सारे पाहातायत.
    “प्रधानजी, असे समोर या. जरा या तसबीरीवर थुंका बघू”! प्रधानजी दचकले. राजाच्या तसबीरीवर थुंकायचं? तेही राजा स्वत: समोर असताना? भलतंच! राजाच्याही डोळ्यांत रागाची छटा तरळली.
    “अरे? तुम्ही थुंकत नाहीत? मग दुसरे कुणीतरी पुढे या”.
    कोण पुढे येणार?
    शेवटी राजाच म्हणाला, “स्वामीजी, असे कसे शक्य आहे? माझ्या तसबीरीवर थुंकायला सांगताय? तेही माझ्यात दरबारात?”
    “काय फरक पडतो? निर्जीव तसबीर तर आहे!” — स्वामीजी!
    “अहो पण ती ‘माझी’ तसबीर आहे ना. माझं चित्र काढलंय त्यात. दरबाऱ्यांच्या दृष्टीने त्यात मीच आहे. तिच्यावर थुंकणं म्हणजे माझ्यावरच थुंकणं! कोण कसा काय पुढे येईल? शिवाय तुम्ही सन्यासी. माझे अतिथी. माझ्याच घरी येऊन माझ्याच तसबिरीवर थुंकायला शिकवताय, हा माझा अपमान नाही का?”
    “अगदी बरोब्बर बोललात राजे! आता जरा हेच तत्त्व मूर्तीपूजेला लावा पाहू”, स्वामीजी म्हणाले.
    दुसऱ्याच क्षणी राजाच्या डोक्यात प्रकाश पडला! मूर्ती जरी निर्जीव असली तरी ती देवाची मूर्ती असते. भाविकाच्या दृष्टीने त्यात परमेश्वरच असतो. तो मूर्तीची उपासना करत नसतो, तर मूर्तीमधील ईश्वराची उपासना करत असतो. मूर्ती हे ईश्वराचे केवळ प्रतीक असते. सामान्य माणसांना थेट निर्गुण निराकार ईश्वर समजणार नाही म्हणून सगुणाची पूजा. ही पायरी आहे. सगुणाकडूनच निर्गुणाकडे जायचे असते! एवढं सगळं स्वामीजी समजावत बसले असते, तर ते त्या संस्थानिकाला समजलंच असतं, असं नाही. परंतू केवळ एकाच प्रात्यक्षिकाद्वारे स्वामीजींनी अघ्यात्मातली एवढी सूक्ष्म गोष्ट समजावून दिली, तीही एका आत्यंतिक इहवाद्याला!
    स्वामीजींकडे एकदा एक म्हातारा साधू आला होता. म्हणाला, मी आयुष्यभर तप करून एक सिद्धी मिळवली आहे. स्वामीजी म्हणाले, दाखवा! तो स्वामीजींना घेऊन नदीकिनारी गेला. काठावर उभा राहिला आणि हाहा म्हणता म्हणता त्या खळाळत्या पाण्यावरून चालत-चालत नदी पार करून दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचला. परत तसाच स्वामीजींकडे आला. त्याच्या नजरेत विजयाची चमक होती!
    स्वामीजींनी जवळच असलेल्या एका नावाड्याला विचारले, “मला पलिकडल्या किनाऱ्यावर जायचेय. नेशील का?”
    “हो, नेतो ना!”
    “किती पैसे घेशील?”
    “चार आणे!”
    स्वामीजी झटकन त्या साधूकडे वळले. म्हणाले, “आयुष्यभर तप करून अखेरिस काय मिळवले, तर चार आण्यांची सिद्धी”!
    साधूचा चेहरा खाडकन उतरला.
    स्वामीजी पुढे म्हणाले, “जी आयुष्याची बारा-पंधरा वर्षे तुम्ही ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी घातलीत, तीच जर गरीब-अशिक्षित-भोळ्याभाबड्या जनतेच्या उत्थानासाठी खर्च केली असती, आणि फार नाही पण चार-दोनच माणसांचे कल्याण केले असते, तर तुम्ही थेट परमेश्वराजवळच पोहोचला नसता का? सिद्धी नाही, तर साक्षात सिद्धीदाताच प्राप्त झाला असता तुम्हाला”!
    साधूला आपली चूक उमगली! केवळ एकाच प्रात्यक्षिकाद्वारे स्वामीजींनी भौतिक जगात आवश्यक असलेले आध्यात्मिक कर्म समजावून दिले, तेही एका साधूला!
    स्वामीजी आज दिडशे वर्षांनंतरही हवेहवेसे वाटतात, अनुकरणीय वाटतात. मला वाटते, स्वामीजींच्या या चिरंतनत्वाचे गमक त्यांच्या या वृत्तीतच असावे. त्यांनी इहवाद आणि अध्यात्म यांच्यातला दुवा बनून कार्य केले. दोहोंतल्या कमतरता ओळखून दोन्हींनाही एकमेकांचा हात धरून परिपूर्ण व्हायला, पुढे जायला शिकवले. हे करताना त्यांनी कधीच आततायीपणा नाही केला. अध्यात्म सांगताना विज्ञानाची कधी खिल्ली उडवली नाही आणि भौतिकता सांगताना आस्तिकतेला कधी अंधश्रद्धा ठरवले नाही. आज नेमकी हीच अडचण होऊन बसलीय. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या बाबा-बुवांना वाटतं मीच तेवढा खरा, बाकी जग झूठ! अंधश्रद्धा निर्मूलनछाप विवेकवादी विचारजंतांना वाटते, आम्हीच तेवढे खरे बाकी देव-बिव सगळं झूठ! यांचा त्यांना मेळ नाही आणि त्यांचा यांना मेळ नाही. वरून दोन्हीही विचारसरणींची सारखीच तक्रार असते, “काय सांगणार हो, आम्ही एवढी मेहनत घेतो, पण समाज आम्हाला स्वीकारतच नाही”. कसा स्वीकारणार? समाज हा प्रकार मुळातच बहुढंगी असतो. तो कधीच एकाच एक विचाराने चालत नाही. समाजातले ऐहिक प्रश्न ऐहिक उपायांनीच सोडवायला हवे, परंतू आध्यात्मिक निर्लेपता ठेवून! आणि अध्यात्म तर करायलाच हवं, परंतू सांसारिक कर्मे न विसरता! एका विचारसरणीने अहंकारापोटी दुसरीला वाईट ठरवण्यापेक्षा तिच्यातलं चांगलं कसं घेता येईल आणि त्याद्वारे आपली विचारप्रणाली अधिक समृद्ध कशी करता येईल हे पाहिलं पाहिजे. मला वाटतं, असं केलं तरच समाज एकसंध राहिल – तुटणार नाही.
    भगवद्गीतेत एक मोठे सुंदर तत्त्व सांगितले आहे,
    “न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् ।
    जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्त: समाचरन् ।। (गीता: ३/२६)
    अर्थात, लोक समजा चुकीचे वागत असतील, परंतू त्यांची त्या वागण्यावर श्रद्धा असेल, तर शहाण्याने विनाकारण त्यांचा बुद्धीभेद करू नये. अन्यथा ते तुम्ही सांगता तसे तर करणार नाहीतच, कारण त्यांना ते पटलेलेच नाही. शिवाय ते जे श्रद्धापूर्वक वागायचे त्याबद्दलही त्यांच्या मनात तुम्ही शंका उत्पन्न करून दिल्याने त्यांना आता तेही मनापासून करता येणार नाही. म्हणजे ते सुधारणं तर दूरच, उलट निष्क्रिय होऊन बसतील. त्यापेक्षा शहाण्याने त्यांना त्यांची कर्मे करू द्यावीत, वर आपण मात्र योग्य वागून कृतीद्वारे त्यांना आदर्श घालून द्यावा. म्हणजे मग आपोआपच हळूहळू ती मंडळी तुमचा आदर्श पाहून नको त्या गोष्टी त्यागतील, आणि चांगले तेवढे घेऊन वागायला लागतील. हल्ली मॅनेजमेंट शिकवताना मोठमोठे जडजंबाल शब्द वापरून हेच तत्त्व शिकवतात ना? तेच गीतेने सहस्रावधी वर्षांपूर्वी सांगितले. आणि तेच स्वामीजींनी दिडशे वर्षांपूर्वी स्वत:च्या कृतीने दाखवून दिले. मला वाटते, स्वामीजींच्या चरित्रातून आपण हा एवढा एक बोध घेतला तरी पुरे!

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी अथवा “स्वामी विवेकानंद” या विषयावर लेखकाचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी संपर्क करा: www.vikramedke.com)

    image

  • चर्चेसची होताहेत मंदिरे : चाहूल बदलत्या प्रवाहाची

    मी माझ्या व्याख्यानांतून आणि लेखनातून एक गोष्ट कायम मांडत असतो की, हिंदूंनी जर दांभिक-धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुतेची सद्गुणविकृती सोडली नाही, तर लवकरच जगभरात सर्वत्र हिंदुच हिंदू दिसतील परंतू सनातनच्या उगमस्थानी भारतात मात्र औषधालाही हिंदू सापडणार नाहीत. एकीकडे भारतातील सामान्य हिंदू आधुनिकतेच्या खोट्या कल्पनांपायी आपल्या समृद्ध धर्म आणि संस्कृतीपासून दूर जात असताना उरलेले जग (त्यातही विशेषत्वाने पाश्चात्य देश!) हळूहळू का होईना परंतू हिंदू संस्कृती अंगिकारत आहे. एवढेच नव्हे तर तिथे हिंदू धर्माचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतोच आहे.
    हा मुद्दा मी पूर्वीदेखील फेसबुकवर आणि अन्यत्र मांडला आहे. त्यासाठी वेळोवेळी प्रसंगोपात उदाहरणेही दिली आहेत. मग तो श्रीमती लिसा मिलर या अमेरिकन विदुषीचा We Are Hindus Now हा “The Newsweek”मध्ये (सध्याचे “Daily Beast”) प्रकाशित झालेला लेख असो, वेगवेगळ्या देशांनी हिंदू देवीदेवतांची नाणी पाडण्याचे प्रसंग असो, कॅलिफोर्नियात साजरा होणारा हिंदू मास असो, घाना या आफ्रिकन देशातील स्थानिक आफ्रिकन रहिवाश्यांमध्ये वाढत जाणारा गणेशोत्सवाचा प्रभाव असो, वा अन्य काही! आज असेच अजून एक उदाहरण मी आपल्यासमोर मांडणार आहे.
    दिनांक २९ जुन २०१२ रोजी Times Of India मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. तिचे शीर्षक आहे, “Churches are turning into temples in UK and US!” बातमीत लिहिलेय की, इंग्लंड आणि अमेरिकेत अनेकानेक एकरांत पसरलेल्या जुन्या चर्चेसचे रुपांतर हिंदू मंदिरांमध्ये होतेय. अनेक हिंदू संघटना अशी जुनी चर्चेस लक्षावधी डॉलर्सना विकत घेऊन, त्यांचे नुतनीकरण करून, हिंदू मंदिरे बनवत आहेत. यासाठी बातमीत अनेक उदाहरणेही देण्यात आली आहेत. श्रीस्वामीनारायण मंदिर संस्थानने सुमारे वर्षभरापूर्वी अनेक एकरांत पसरलेले ८० वर्ष जुने चर्च सुमारे १० लक्ष ३० सहस्र डॉलर्सना विकत घेतले व त्याचे मंदिरात रुपांतर केलेय. नुकतेच त्यांनी टोरोंटो (कॅनडा) येथील एक १२१ वर्ष जुने ऐतिहासिक चर्च सुमारे १० लक्ष ६० सहस्र डॉलर्सना विकत घेतले असून त्याच्याही मंदिरीकरणाचे काम जोरात सुरु आहे. बातमीनुसार अशी किमान पाच तरी चर्चेस आत्तापर्यंत मंदिरीकरणासाठी विकत घेण्यात आली आहेत! नुकतेच डल्लास (टेक्सास) येथील एक ४० वर्षे जुने चर्चदेखील याच उद्देशाने सुमारे ७ लक्ष डॉलर्स खर्चून विकत घेण्यात आले आहे. बातमीनुसार या सर्व खरेदीसाठी पैसा पुरवणारे लोक हे मुख्यतः विदेशांत स्थायिक झालेले गुजराती भाविक आहेत आणि अशी मंदिरे बांधली जावीत यासाठी ते वाट्टेल तेवढा पैसा मोजायला तयार आहेत.
    या सगळ्याची सुरुवात १९८२ साली इंग्लंडमध्ये झाली. तेथील “सेण्ट निनीयन” हे जवळपास २.५ एकरांत पसरलेले चर्च सुमारे २ लक्ष पाउंड्स खर्चून विकत घेण्यात आले व त्याचे रुपांतर मंदिरात केले गेले. १९९८ साली बोल्टनमध्येही असेच एक ७० वर्षे जुने चर्च विकत घेऊन त्याचे मंदिर केले गेले. विशेष म्हणजे यांपैकी बहुतेक चर्चेसचे नक्षीकाम व त्यांवरील येशू ख्रिस्त आणि माता मेरी आदींची चित्रे ऐतिहासिक ठेवा असल्याने जसेच्या तसेच ठेवण्यात आले आहेत. या सर्व नवमंदिरांना केवळ हिंदुच नव्हे तर, परिसरातील सर्वच धर्मांचे भाविक भेट देतात.
    धर्म ही किती जरी आध्यात्मिक आणि वैयक्तिक बाब असली तरीही वास्तव जगात केवळ मागणी असलेल्या गोष्टींचाच पुरवठा केला जातो. आणि ज्याअर्थी अमेरिका आणि युरोपात एवढा प्रचंड पैसा खर्चून चर्चेसचे रुपांतर मंदिरांत केले जातेय, त्याअर्थी तिकडे कश्याचा अस्त आणि कश्याचा उदय होतोय, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही; असे मला वाटते! सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी पाश्चात्य जगतात लावलेला हिंदू धर्माचा वेलू गगनावरी गेला आहे, वरवरच जातोय! परंतू या वेलूचे भारतवर्षात असलेले बीज भारतीय हिंदूंच्या सद्गुणविकृतीमुळे नासणार तर नाही ना, अशी सार्थ भीतीही वाटतेय! स्वामी विवेकानंद भारतातील हिंदूंना “अमृतपुत्र” अश्या उपाधीने गौरवित असत. त्या अमृतत्त्वाची जाणीव मात्र येथील हिंदूंना कधी होईल, न कळे! ज्यांच्या जीवनशैलीची भ्रष्ट नक्कल करण्यात येथील आधुनिक समाज गुंतलाय, तीच मंडळी आज आपण प्रतिगामी म्हणून त्यागलेल्या सनातन जीवनशैलीकडे आशेने पाहातायत. अंगिकारतायत. हे सत्य आम्हांला उमगेल तो सुदिन! पाश्चात्यांकडून एखादी गोष्ट आल्यास तिचा डोळे झाकून स्वीकार करण्यात आम्ही पटाईत आहोत – भविष्यात हिंदू धर्म आणि त्याची महती पाश्चात्यांकडूनच समजावून घेण्याची वेळ आपल्यावर आल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये! आणि तसे झाले तर मात्र नक्कल करण्यात पटाईत असलेले एतद्देशीय दांभिक-धर्मनिरपेक्ष त्याच हिंदू धर्माला फॅशन स्टेटमेंट समजून डोक्यावर घेत नाचतील, हेही तितकेच खरे! अजूनही वेळ गेलेली नाहीये – हिंदू धर्म स्वत:हूनच समजून घ्या, आचरणात आणा – अभिमान बाळगा या दैवी परंपरेचा – येणारा काळ आपलाच आहे!

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी अथवा विविध क्रांतिकारक-महापुरुष आणि हिंदू संस्कृतीवर लेखकाचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी संपर्क करा: www.vikramedke.com)

  • परावर्तित प्रसिद्धीचे दिवाने!!

      ईस्माईल दरबार या संगीतकाराने “हम दिल दे चुके सनम”, “देवदास” आणि “किस्ना”ची काही गाणी सोडता काय संगीत निर्माण केलेय हा एक संशोधनाचाच विषय ठरावा. कुणाच्याही लक्षात नसलेला हा माणूस अचानकच प्रसिद्धीच्या झोतात आला ते “ए. आर. रहमानने ऑस्कर मिळवले नसून विकत घेतलेय” या विधानामुळे!
      अश्या प्रकारच्या प्रसिद्धीला मी परावर्तित प्रसिद्धी म्हणतो. म्हणजे, स्वत: तर काहीच कर्तृत्व दाखवायचे नाही, परंतू इतर कुणी स्वकष्टाने वर येत असेल तर त्याचेही प्रतिमाभंजन करायचा प्रयत्न करायचा. माझी रेष तुझ्या रेषेपेक्षा मोठी होऊ शकत नाही, तर थांब तुझी रेषच पुसतो – असा आकस दाखवायचा. सूर्यावर दगड फेकला की चार-दोन प्रकाशाचे शिंतोडे आपल्यावरही उडतील, असा हा साधासरळ हिशोब असतो.
      संस्कृतमध्ये एक फार सुंदर सुभाषित आहे –
    “घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभरोहणम् ।
    येनकेनप्रकारेण प्रसिद्धो पुरुषो भवेत् ।।”
    अर्थात, प्रसिद्धीसाठी हपापलेला माणूस प्रसंगी स्वत:च्याच घरातली भांडी फोडतो, स्वत:चे कपडे फाडतो, एवढेच नव्हे तर गाढवावरही स्वार व्हायला तयार होतो; कारण त्याला कोणतीही किंमत देऊन प्रसिद्ध व्हायचेच असते!
      ऑस्कर ऍकॅडमीने ५ कोटी डॉलरचा दावा ठोकण्याची धमकी दिल्यावर तत्क्षणीच शेपूट घालणारा ईस्माईल दरबार आणि मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडून जाईन या आपल्या विधानावरून पलटी मारणारे यू. आर. अनंतमूर्ती यांच्यात तत्त्वतः काहीच फरक नाही, असे मला वाटते! दोघांचीही जातकुळी एकच – दोघेही परावर्तित प्रसिद्धीचे दिवाने!!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (www.vikramedke.com)

    image

  • आरंभ हैं प्रचंड..!

      काल काँग्रेसची अधिकृत प्रतिक्रिया होती की, हा भाजपचा अंतर्गत मामला आहे. आता लवकरच राहूल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी घोषित करून त्यांच्या नावे फटाके-पेढे आदी जल्लोष करवून घेण्यात आल्यास मला नवल वाटणार नाही. अर्थातच काल काँग्रेसने दिलेली प्रतिक्रिया यावेळी भाजप देईल! परंतू पंतप्रधानपदाचे प्रत्याषी घोषित करणं हा खरंच एखाद्या पक्षाचा अंतर्गत मामला असतो का हो? तसं असतं तर भाजप काल सहजच आडवाणींचं नाव घोषित करू शकले असते आणि सोनिया गांधी २००४ सालीच पंतप्रधान झाल्या असत्या. तेव्हा असा कोणताही अंतर्गत मामला नसतो, तर जो काही असतो तो पक्षाला जनतेतून बहुमत मिळवून देऊ शकणारा निर्णय असतो. थोडक्यात, तो जनतेच्या दबावाचा परिणाम असतो – एकप्रकारे जनतेचाच निर्णय असतो.
      त्यातल्या त्यात भाजपचे श्रेय एवढेच की, त्यांनी अनेकांची नाराजी पत्करून जनतेचा हा निर्णय स्वीकारण्याची हिंमत दाखवली. काँग्रेसही यावर राजकीय प्रतिक्रिया देत न बसता जर काल लोकांनी उत्स्फूर्तपणे वाजवलेल्या फटाक्यांचा, वाटलेल्या पेढ्यांचा आणि केलेल्या जल्लोषाचा योग्य अन्वयार्थ लावेल तर बरं. जनतेला बदल हवा आहे आणि जनता ते वारंवार कृतीतून दाखवून देते आहे. जनमताच्या विरूद्ध जाणारे इतिहासाच्या पानापुरतेही उरत नाहीत, हा इतिहास आहे. काँग्रेसचे तसे काही होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे. अर्थात त्यांनी स्वत:ला सावरण्याची आणि जनतेला किंमत देण्याची नितांत आवश्यकता आहे.
      दुसरीकडे भाजप आणि सामान्य मोदीसमर्थकांनीही आता जल्लोषात वेळ न घालवता आता मतदारांमध्ये जागृती करायची आवश्यकता आहे. आम्ही तुमच्या भावनेला प्रतिसाद दिला आता चेंडू तुमच्या कोर्टात आहे, ही बाब जनतेपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. तरच त्यांना कालचा निर्णय “कॅश” करता येईल. लढाई जिंकलेली नाही – खरं तर अजून लढाई सुरूदेखील झालेली नाही. रणनीतीचे काही टप्पे तेवढे गाठले गेले आहेत. या युद्धाला कुणी “ॐ × रोम” म्हणो अथवा अन्य काही, परंतू आता कुठे खऱ्या युद्धाला तोंड फुटेल. तयार राहा. तूर्तास, “आरंभ हैं प्रचंड..”!

    – © विक्रम श्रीराम एडके.

    image

  • मानवाधिकारछाप गोष्ट

    मानवाधिकारछाप गोष्ट

    एकदा काश्मीरातील एका जिहादी आतंकवाद्याने तीन जणांना पकडले – एक पुढारी, एक मानवाधिकारछाप (हा शब्द “कछुआछाप”च्या चालीवर वाचावा) पत्रकार बाई आणि एक भारतीय जवान!
    आतंकवादी म्हणाला, “तुम्ही तिघंही आता मरणार आहात. काही शेवटची इच्छा असेल तर बोला”.
    इच्छापूर्ती म्हटली की सर्वात पुढे पळण्याचा पुढार्यांचा स्वभावच असतो! आपले पुढारीबुवाही त्याला अपवाद नव्हते. पण इच्छा पूर्ण झाली की लगेच मरावे लागणार या कल्पनेने ते काहीच बोलले नाहीत. अतिरेक्याच्याच काय मनात आलं कुणास ठाऊक, त्याने पुढार्याकडे बोट दाखवले, “तू बोल”.
    पुढार्याने क्षणभर विचार केला. म्हणाला, “आयुष्यभर मला कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहायची, त्यांच्याकडून जयजयकार ऐकायची सवय. तुही माझ्या नावाने ‘की जय..!’ असे ओरड आणि हा जयघोष चालू असतानाच मला मार. म्हणजे मी समाधानाने मरेन”.
    अतिरेकी “ठीक आहे” म्हणाला. आणि पुढार्याच्या नावाने जयजयकार करतच त्याने त्याला गोळ्या घातल्या!
    आता क्रमांक सैनिकाचा होता. अतिरेक्याने त्यालाही शेवटची इच्छा विचारली. क्षणभर विचार करून सैनिकाने आपली इच्छा पुढे ठेवली,
    “मला मारण्याआधी तू मला एक जोरदार लाथ घाल!”
    अशी विचित्र इच्छा ऐकून शेजारी उभी असलेली बाईच काय(बाईंनी आजवर मानवाधिकाराच्या लंब्याचौड्या गप्पा खूप मारल्या होत्या, पण रक्त आणि त्यातही एखाद्याचा खून पहिल्यांदाच पाहिला होता. शिवाय पुढे काय वाढून ठेवलंय यामुळे भेदरल्याही होत्या बिचार्या!), तो अतिरेकीही चकित झाला! पण शेवटची इच्छा त्याने पूर्ण करायचे ठरवले होतेच.
    त्याप्रमाणे त्याने जवानाला समोरून एक जोरदार लाथ घातली. जवान अतिरेक्याच्या पायाशी कोसळलाच. आता अतिरेकी बंदुक ताणून गोळी घालणारा, इतक्यात ते घडले! डोळ्याचे पाते लवायच्या आत आणि कुणाला काही कळायच्या आत घडले! सैनिकानेवीजेच्या वेगाने इतका वेळ आपल्या कपड्यांत बेमालूमपणे लपवून ठेवलेला चाकू काढला आणि अतिरेक्याचे डोळेही विस्फारायच्या आत त्याच्या पोटात तिरका फिरवला! फाटकी आतडी बाहेर पडत, तोंडातून रक्त ओकत अतिरेकी कोसळला, मेला!
    शत्रूच्या रुधिराने न्हाऊन निघालेला तो शूर भारतीय जवान उभा राहिला. भेदरलेल्या बाईंना त्याने आधार देऊन बसवले. जरासे पाणी पाजले. शांत झाल्यावर न राहवून बाईंनी अखेर विचारलेच,
    “तुमच्याकडं जर लपवून ठेवलेलं शस्त्र होतं आणि तुम्ही त्याला मारू शकत होता तर आधीच का नाही मारलंत? त्याला लाथ का मारायला लावलीत?”
    सैनिकाने खांदे उडवले आणि शांतपणे म्हणाला, “त्याने जर मला आधी लाथ मारण्याआधीच मी त्याला मारलं असतं, तर परिस्थिती कशी का असेना, पण बाई, तुम्हीच उद्या तुमच्या चॅनेलवर मोठमोठ्याने ओरडत सुटला असता की, भारतीय सैन्य काश्मिरात गरीब बिच्चार्या काश्मिरींवर अत्याचार करते. शेवटी जे तुम्हाला टीआरपी मिळवून देतील, तुमच्या दृष्टीने मानवाधिकार केवळ त्यांनाच असतात ना!”
    (काही महिन्यांपूर्वी वाचलेल्या इंग्रजी रुपककथेचा मी केलेला स्वैर अनुवाद. मूळ लेखक अज्ञात.)

  • Burning For Freedom

     

       इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या आभासी जगताने कुणाला काय दिलं माहिती नाही. पण मला मात्र अनेक जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी दिले आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे पुष्कराज खेडेकर! आमची ओळख कधी आणि कुठे झाली मला खरोखरच आठवत नाही, पण २ वेगवेगळ्या देशांत राहत असूनही आमचा संवाद निरंतर सुरु आहे. याचे कारण म्हणजे आम्हाला जोडणारा समान धागा – स्वातंत्र्यवीर सावरकर! मला आठवतं कि पुण्यात मी दिलेल्या पहिल्याच व्याख्यानालाही त्यांनी भारतातील त्यांच्या सुट्टीचा कालावधी अडजस्ट करून हजेरी लावली होती!

        पुष्कराजमुळेच माझी ओळख श्रीमती अनुरूपा सिनार यांच्याशी झाली. खरंच सांगतो, झपाटलेपण काय असतं ना, ते या जिद्दी विदुषीकडून शिकावं! मराठीचा फारसा गंध नसताना, दूरदेशी वास्तव्यास असताना आणि संदर्भ-साहित्य मिळण्यापासून अनेक अडचणी असतानाही यांनी २००९ साली वीर सावरकरांची जीवनगाथा सबंध जगाला कळावी म्हणून इंग्रजीतून कादंबरी लिहिण्याचा संकल्प सोडला, आणि अक्षरशः शेकडो अडथळे ओलांडून तो पूर्णत्वासही नेला. आणि यातून जन्माला आली कादंबरी – Burning For Freedom!

        या दोन्हीही गोष्टी सांगायचे कारण म्हणजे, मी सावरकरांवर तसेच हिंदुत्वावर व्याख्याने देतो म्हणून माझ्या अभ्यासासाठी पुष्कराजने हे पुस्तक मला पार अमेरिकेहून पाठवायचं ठरवलं आणि अनुरुपाजींनी तत्परतेने त्यासाठी वैयक्तिक संदेशही दिला. पुष्कराजने पाठवलेलं हे पुस्तक मला आजच मिळालंय आणि मी झपाटल्यागत वाचायला सुरुवातही केली आहे. अतिशय काव्यमय तरीही विषयाशी पूर्णतः प्रामाणिक राहत लिहिलेली इंग्रजीतील ही या विषयावरील एकमेव कादंबरी असावी. कादंबरी असूनही त्यातील काही भागांसाठी अनुरुपाजींनी केलेले संशोधन नवे तर आहेच परंतु त्यांच्या चिकाटीची साक्ष देणारेही आहे! सावरकरांवर ज्यांची निष्ठा आहे त्यांनी तर हे पुस्तक अवश्य वाचावेच शिवाय इंग्रजी साहित्याची आवड असणार्या परंतु सावरकर माहिती नसणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींनाही हे पुस्तक आवर्जून वाचायला द्यावे – इतके हे पुस्तक सुंदर आहे!

        पुस्तकाच्या मलपृष्ठावर असलेला पुढील मजकूर माझ्या मनाला फारच भिडला आहे –

    This is the story of one man’s – Vinayak Damodar Savarkar’s – sacrifice of his name, fame, comfort & family life in the fifty years of his quest for the freedom of his beloved motherland, India. It is the story of politics & power plays. Exposed here is the reality that lies behind the mask of Truth; exposed are the shenanigans of Mahatma Gandhi in the Freedom Movement of India. The reality is a far cry from the rosy picture presented by what passes as history.
    Here, Savarkar’s life is creatively intertwined with a fictional character, Keshav Wadkar, taking the reader from the horrors of the Cellular Jail in 1913 to the assassination of Mahatma Gandhi in 1948. Savarkar fought to preserve the integrity of India, to reinstate the honor of his motherland without ripping her heart out. For the emancipation of his beloved country & people, he suffered agonies & gross injustices at the hands of the British government. Gandhi-Nehru-led Indian National Congress, and the successive Governments of free India.
    That his contribution to India should be negated to bolster the political aspirations of any political party is inacceptable.
    THE TRUTH CANNOT – AND SHALL NOT –BE HIDDEN!

        मला खात्री आहे की हि कादंबरी पाठवल्याबद्दल मी आभार मानणे या दोघांनाही आवडणार नाही, तेव्हा तो प्रयत्नही मी करणार नाही. उलट त्यांच्या या प्रेमळ ऋणाखाली राहण्यात मला आनंदच आहे! हे पुस्तक आपण सर्वांनीही अवश्य मागवून वाचावे असे मी नक्की म्हणेन.

    * काही उपयुक्त लिंक्स –
    १) श्रीमती अनुरूपा सिनार यांची वेबसाईट :
    www.anurupacinar.com
    २) श्रीमती अनुरूपा सिनार यांचा ब्लॉग :
    http://anurupacinar.blogspot.in/
    ३) पुस्तक ऑनलाईन मागविण्यासाठी लिंक :
    http://www.amazon.com/Burning-Freedom-Goddess-Death-without/dp/1426974981

    – आपलाच,
    विक्रम श्रीराम एडके
    (edkevikram@gmail.com)

  • भाषाभिमान – एक स्फुट चिंतन.

       लॉर्ड मेकोले आपल्या २ फेब्रु. १८३५ रोजी ब्रिटीश संसदेत केलेल्या भाषणात म्हणतो,
    I have traveled across the length and breadth of India and I have not seen one person who is a beggar, who is a thief. Such wealth I have seen in this country, such high moral values, people of such caliber, that I do not think we would ever conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage, and, therefore, I propose that we replace her old and ancient education system, her culture, for if the Indians think that all that is foreign and English is good and greater than their own, they will lose their self-esteem, their native culture and they will become what we want them, a truly dominated nation“.
        दुर्दैवाने मेकोले यशस्वी झालाय असं नाही वाटत का आपल्याला? भाषेपुरताच विचार करू. आज आपण इंग्रजीत बोलणेच भूषण मानू लागलो आहोत. माझ्या माहितीत काही लोक असेही आहेत जे प्रसंगी उपाशी राहतात पण भरमसाठ शुल्क भरून मुलाला इंग्रजी शाळेतच टाकतात! का तर म्हणे, इंग्रजी ही जगाची भाषा आहे, इंग्रजी येत नसेल तर आजच्या जगात वावरणे अशक्य आहे, वगैरे.. खरंच तसं आहे का हो?
        चीनमध्ये इंग्रजीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता नाही. जपानमध्ये कुणी इंग्रजीत बोलत नाही. जर्मनी, फ्रान्समध्ये इंग्रजीत बोललात तर लोक तुमच्याकडे तुच्छतेने पाहतात. रशियात सर्व कारभार रशियन भाषेतच चालतो. इंग्लंडसारखे काही अपवाद वगळले तर सबंध युरोपात कोणताही देश इंग्रजी-भाषिक नाही. उपरोक्त सर्व देशांत शिक्षण, प्रशासन आणि व्यापार हे तिन्ही त्यांच्याच भाषेत चालतात. हे सर्व देश तथाकथित “प्रगत देश” या व्याख्येत बसतात. मग कश्याच्या आधारावर आम्ही इंग्रजीला “जगाची भाषा” म्हणतो? बरं, मी इंग्रजी अजिबातच शिकू नये असे म्हणतोय का? नाही. इंग्रजी शिकावी, अवश्य शिकावी पण कोणतीही इतर परकीय भाषा कामापुरती शिकतो तशी. याउप्पर तिचा अतिवापर टाळावा.
       एक उदाहरण सांगतो. विख्यात विद्वान श्री. रामदास कळसकर कामानिमित्त फ्रान्समध्ये जात, राहत असत. तिथे गेले कि नेहमीच एका फ्रेंच कुटुंबाकडे उतरत. काही वर्षांचा हा परिचय दाट स्नेहात बदलला होता. एकदा कळसकर तेथे काही काळासाठी वास्तव्यास असताना त्यांना भारतातून काही पत्रे आली. कळसकर बाहेर गेले होते म्हणून घरमालकिणीच्या मुलीने ती पत्रे स्वत:कडे ठेवली आणि ते आल्यावर त्यांना ती दिली. देताना तिने विचारले की, ‘मी पत्रे फोडली नाहीत पण पाकीटावरचा मजकूर वाचला. तो इंग्रजीत आहे. असे का?’ कळसकर तिला म्हणाले की, ‘आमच्या देशात बर्याचदा पत्रव्यवहारासाठी वगैरे इंग्रजीचा वापर होतो.’ ही गोष्ट त्या मुलीने आपल्या आईला सांगितली. जेवणाच्या वेळी त्या बाई कळसकरांना म्हणाल्या, ‘तुम्ही आमच्या घरातून कृपया दुसरीकडे राहायला जा. ज्या देशातील लोक स्वभाषेचा वापर करीत नाहीत त्या लोकांना आमच्याकडे रानटी समजतात. आणि अश्या व्यक्तीला मी आमच्या घरात ठेवू इच्छित नाही.’ गोष्ट थोडीशी तिखट वाटेल, पण अंजन झणझणीतच असायला हवे!
        याउलट पहा. स्वातंत्र्य मिळाल्यावर इस्रायेलने आपल्या हिब्रू भाषेच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. “शुद्ध हिब्रूत बोला आणि बक्षीस मिळवा” अश्या धर्तीच्या स्पर्धाही घेतल्या गेल्या आणि मृतप्राय झालेल्या हिब्रूचे पुनरुज्जीवन झाले. ही त्यांची निष्ठा!
        कुणाला काही शिकवावे इतका काही मी मोठा नाही, पण माझ्यासारख्या अतिसामान्य माणसालाही एवढं नक्की कळतं की आपल्या भाषेची काळजी आपणच घ्यायला हवी. इंग्रजीतच एक म्हण आहे – Alphabet follows the religion. दुर्दैवाने ही म्हण खरी ठरू पाहतेय. हे व्हायला नको. आपला श्रेष्ठ वारसा आपण आपल्याच कर्मांनी गमवायला नको. किमान माझ्याशी सहमत होणार्यांनी तरी आपल्या मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यावे. इंग्रजीचा दुराग्रह हा आपल्या मानसिक पारतंत्र्याच्या पाउलखुणा आहेत, त्या पुसायची जबाबदारी आपलीच आणि त्यासाठी स्वभाषाभिमानाची वाट बांधायची जबाबदारीदेखील आपलीच!

    – विक्रम श्रीराम एडके.
    (edkevikram@gmail.com)

  • शांती नव्हे, "सद्गती"

    कुणीही महत्वाची व्यक्ती गेली की मी फेसबूकवर पोस्ट्स वाचतो किंवा मला भ्रमणध्वनीवर संदेश येतात, “त्यांच्या आत्म्याला शांती लाभो” अथवा “Rest In Peace”. वास्तविक ही इंग्रजांनी रूढ केलेली पद्धत, आपली नव्हे. पण आपल्यातले बहुतांशी लोक कळत-नकळत हीच पद्धत पुढे चालवतायत. यालाच साध्या भाषेत मानसिक-पारतंत्र्य म्हणतात.
    ख्रिशचन धर्मात अशी समजूत प्रचलित आहे की, व्यक्तीचा आत्मा त्याच्यासह कबरीत अंतिम निवाड्याचा

    दिवस येईपर्यंत पडून राहणार आहे. मग इतकी हजारो वर्षे पडून राहण्याचे त्या आत्म्याच्या नशिबात आहेच तर ते किमान शांततेने होवो, म्हणून म्हणतात, “शांती लाभो”. याउलट भारतीय संस्कृतीत मृत्यूला एक मंगल-सोहळा मानतात. आपण ज्याप्रमाणे जुने कपडे टाकून देत नवीन कपडे घालतो, त्याप्रमाणेच आत्माही जुने शरीर टाकून मोक्षप्राप्ती होईपर्यंत नवनवीन शरीरे परिधान करत असतो. आपल्या संस्कृतीत मृत्यूला स्वल्पविरामच नव्हे, तर एका प्रवासाची, अनंताच्या यात्रेची सुरूवात मानतात. या अश्या प्रवासासाठी त्या आत्म्याला साहजिकच गतीची आवश्यकता असणार. म्हणूनच आपली संस्कृती जाणणारे म्हणतात, “त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो” किंवा “May His/Her Soul Attain Sadgati”.
    आता काही तर्कट मंडळी प्रश्न करतील की, भारतीय संस्कृतीत खरी कश्यावरून? त्याच्यासाठी काही मुद्दे –
    १) मृत्यूनंतर आत्म्याला शरीराबाहेर ढकलण्याचे काम अपान वायू करतो. वैज्ञानिकदृष्ट्या एक गोष्ट नक्की की, मृत्युसमयी शरीरातून “काहीतरी बाहेर जाते”. आता बाहेर जाते म्हटलं की गतीशी संबंध आलाच.
    २) पाश्चात्यांकडून आपल्या संस्कृतीतली एखादी गोष्ट मान्य झाली तर आणि तरच ती मान्य करणारे काही महाभाग असतात. अश्यांनी कृपया विविध पाश्चात्त्य Theosophists ची या विषयावर मते वाचावीत आणि एक्टोप्लाझ्म वगैरे त्यांच्याच भाषेत समजून घ्यावे, कारण त्यांना आत्मा, गती वगैरे शब्द डाऊन-मार्केट वाटण्याची शक्यता आहे.
    ३) पाश्चात्य शांतीची संकल्पना बरोबर की आपली गतीची हे वैज्ञानिकदृष्ट्या अजूनतरी १००% सिद्ध झालं नाही. मग जर का दोन्हीही शंकास्पदच असतील तर त्यांची संकल्पना का वापरावी? जरासा स्वाभिमान वापरत खरं काय ते कळेपर्यंत आपलीच संकल्पना का वापरू नये?
    इतर सूज्ञांनाही माझी नम्र विनंती आहे की, किमान स्वाभिमान आणि आपल्या संस्कृतीवरील विश्वास या दोन कारणांनी तरी आपण व्यक्तीस “सद्गती लाभो” असे म्हणावे. श्राद्ध या संकल्पनेमागेही मृतात्म्यास सद्गती देण्याचाच विचार असतो.