Author: Vikram Edke

  • एका प्रसंगावधानाची गोष्ट!

    २००१ साली अमेरिकेत आतंकवादी हल्ला झाला तेव्हा मी नववीत होतो. काही दिवसांतच त्यादिवशी घडलेल्या घटना आणि त्यांचं विश्लेषण करणाऱ्या बातम्या येऊ लागल्या. मला आठवतं, एका बातमीत सांगितलं होतं की ट्विन टॉवर्सवर विमाने आदळली तेव्हा जॉर्ज बुश कोणत्यातरी पूर्वनियोजित कार्यक्रमांतर्गत लहान मुलांच्या एका शाळेत – वर्गात तिथल्या लहानग्यांशी गप्पा मारत होते. व्हाईट हाऊसच्या कर्मचाऱ्यांपैकी एकाने धावत येऊन त्यांच्या कानात घडलेली घटना सांगितली. श्री. बुश यांनी ते ऐकले. चेहऱ्यावरील रेषही ढळू न देता त्यांनी अत्यंत हलक्या आवाजात त्या कर्मचाऱ्याला काही सूचना दिल्या आणि परत ते त्या लहानग्यांशी बोलू लागले. त्यांनी कार्यक्रम संपवला आणि मगच ते ९/११ संदर्भात पुढील कारवाई करायला बाहेर पडले.

    मी स्वत:च त्यावेळी शालेय विद्यार्थी होतो. ही बातमी वाचली त्याचवेळी मला वाटून गेलं होतं की, “कर्मचाऱ्याने सांगितलेली बातमी ऐकल्या-ऐकल्या श्री. बुश समजा गडबडून गेले असते तर? तर समोरच्या लहान मुलांच्या मनोधैर्यावर या गोष्टीचा काय परिणाम झाला असता?”

    जनतेचे नेतृत्व करू इच्छिणार्‍या,  विशेषत: जनतेच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या नेत्याने खरोखरच अश्याबाबतीत प्रचंड काळजी घेणे गरजेचे असते — कारण त्याच्या एका प्रतिक्रियेवर समोरील संपूर्ण “जमावा”चे वर्तन ठरणार असते. तोच जर गडबडून गेला, तर समोरचा सगळाच्या सगळा जमाव बिथरायला वेळ लागत नाही — आणि मग घडलेल्या दुर्दैवी घटनेपेक्षाही मोठी दुर्दैवी घटना घडायलाही अजिबात वेळ लागत नाही.

    भाजपाचे पंतप्रधानपदाच्या उमेदवार श्री. नरेंद्र मोदी यांचेही परवाच्या बिहार सभेदरम्यानचे वर्तन याच निकषावर तपासायला हवे. मोदींना कल्पना नसणार का, की आसपास कसे स्फोट होताहेत. जर मैदानाच्या इतक्या जवळ आतंकवादी पोहोचू शकतात, तर थेट मंचावरच एखादा बॉम्ब असण्याचीही शक्यता अजिबात नाकारता येत नव्हती. अश्या परिस्थितीतही त्यांनी अत्यंत संयमाने आपले भाषण चालू ठेवले. त्या स्फोटांत ८ लोक गेल्याची दु:खद बातमी आपण सर्वांनी ऐकलीय. परंतू विचार करा, मोदींच्या चेहऱ्यावर जरासा जरी ताण उमटला असता, अथवा त्यांनी चुकूनही स्फोटांसंदर्भात काही प्रतिक्रिया दिली असती — आणि उत्तरादाखल तो सबंध आठ-दहा लाखांचा जमाव बिथरला असता, तर काय परिणाम झाला असता? आठ लाखांच्या जमावाची चेंगराचेंगरी होतेय, या नुसत्या कल्पनेनेही अंगावर शहारा येतो. मोदींनी उलट भाषणाच्या शेवटी “घरी जाताना सर्वांनी काळजी घ्या, जपून जा” असे सांगितले. लोकांचे मनोधैर्य खचणार नाही असे शब्द वापरले. शांतता आणि सौहार्द राखण्याचा संदेश दिला. आणि मगच काही काळ उलटून गेल्यानंतर स्फोटांसंदर्भात ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. हे एका परिपक्व नेत्याचेच लक्षण (सध्याच्या भारतीय राजकारणात अभावानेच आढळणारे!) नव्हे काय? उलट हे स्फोट टाळणे ही ज्यांची जबाबदारी होती ते मात्र कोणत्यातरी हिंदी चित्रपटाच्या संगीतविमोचन सोहळ्यात दंग होते म्हणे!

    खरं तर गेल्या दहा वर्षांपासूनही अधिक काळ मला मोदींबद्दल आदर वाटत आलाय, पण अगदी मनापासून सांगतो, परवाच्या या घटनेनंतर त्या आदरात अक्षरश: शतपटींनी भर पडलीये. मोदी भविष्यात पंतप्रधान होतील न होतील हा भाग वेगळा, मात्र अश्या प्रसंगी देशाच्या सर्वोच्च नेत्याकडे लागणारं प्रसंगावधान मोदींच्या ठायी ठासठासून भरलंय, एवढं मात्र निश्चित! “नमो” नम:!!

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी क्लिक करा – www.vikramedke.com)

    image

  • “आवडलेला क्रिश-३”

    काल फार्मास्युटिकल्स कंपनीचा कर्ताधर्ता असलेला काल (विवेक ओबेरॉय) हा अपंग आहे. लहानपणापासूनच त्याच्या गुणसूत्रांमध्ये दोष असल्याने तो आपल्या शरीरातील केवळ चेहरा आणि एका हाताची बोटेच तेवढी हलवू शकतो. परंतू त्याच्या शरीराची सारी शक्ती याच दोन अवयवांत एकवटून त्याच्याकडे अतिंद्रीय शक्तींचा भलामोठा संचय झालाय. काल जरी एक फार्मास्युटिकल कंपनी चालवत असला, तरीही त्याचा मुख्य व्यवसाय हा विषाणू बनवून कोणत्या तरी देशात सोडणं आणि नंतर त्याच देशाला प्रतिजैविक विकून पैसा कमावणं, हा आहे. या उपद्व्यापात कालने अनेक अमानव (म्यटंट्स / चित्रपटात वापरलेला शब्द – मानवर) तयार केले आहेत. त्यांच्याद्वारे तो आपल्या अपंगत्वावर इलाज शोधू पाहातोय आणि आपल्या जैवतंत्रज्ञानातील ज्ञानाचा वापर करून सबंध जगावर राज्य करू पाहातोय. त्याने भारतात सोडलेला एक अतिशय भयानक रोगजंतू प्रो. रोहित मेहरा (ह्रथिक रोशन) आणि क्रिश (ह्रथिक रोशन) हे दोघे निकामी करतात अन् त्यातून सुरू होते काल आणि क्रिशमधील संघर्षाची गाथा. या संघर्षगाथेला हळुहळू अनेक भावनिक पदर जोडले जातात आणि त्यातून उलगडत जाते “क्रिश ३” रुपी वस्त्र!

    हिंदीतील पहिला सुपरहिरो-पट हे “क्रिश”च्या पहिल्या भागाचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. वर्तमान भागाद्वारे “क्रिश”च्याही पुढे जाण्याचे, हॉलिवूडमधील सुपरहिरोपटांशी साहजिकपणे होणाऱ्या तुलनेच्या कसोटीवर खरे उतरण्याचे आणि भारतीय प्रेक्षकांना आवडेल असा चित्रपट देण्याचे तिहेरी आह्वान दिग्दर्शक राकेश रोशनवर होते. भारतीय प्रेक्षक हा निव्वळ तंत्रज्ञानाला भुलणारा नव्हे (आठवा – रा.वन) वा निव्वळ सुपरहिरोपटासाठी जीव टाकणाराही नव्हे ( पुन्हा आठवा – रा.वन). तर आपल्याकडे तेच चालतं, जे आपल्या ह्रदयापर्यंत पोहोचतं. तांत्रिकदृष्ट्या कितीही सफाईदार चित्रपट जरी असला, तरीही तो जर भारतीय प्रेक्षकाच्या ह्रदयातील भावनेच्या कप्प्याला उघडणारा नसेल, तर तो आपल्याकडे चालणं शक्यच नाही. याउलट एखादा चित्रपट म्हणून सुमार असलेला चित्रपटही जर आवडून गेला तर आपल्याकडे चालतोच! राकेश रोशनने भारतीयांची ही मानसिकता बरोब्बर ओळखली आणि एका मानवी नातंसंबंधांच्या भावनिक कथेला अत्युत्कृष्ट तंत्रज्ञानाची फोडणी देऊन बनवला “क्रिश ३” नामक चविष्ट पदार्थ. असा पदार्थ जो आपल्याकडील प्रेक्षकांना नुसता आवडेल एवढेच नव्हे तर तिकीटबारीवर चालेलही! भावनेच्या मुद्यावर त्याने हॉलिवुडमधील भावनाहीन सुपरहिरोपटांना मात दिली, तर अद्वितीय दृक्परिणामांच्या (VFX) आणि एकूणच तंत्रज्ञानाच्या बळावरआपल्या देशात बहुसंख्येने असलेल्या हॉलिवूड-अंधभक्तांच्या काकदृष्टीलाही मात दिली! असा हा “क्रिश ३” व्यावसायिकदृष्ट्या अचूक जमवून आणलेला खेळ आहे! मला वैयक्तिक अतिशय आवडलाय आणि आपल्याकडील प्रेक्षकांनाही तो आवडणार याची १००% खात्री आहे.

    अर्थातच चित्रपटात काही तांत्रिकदृष्ट्या न पटणाऱ्या गोष्टीही आहेत –
    १) “जादू”ची उन्हापासून मिळणारी शक्ती नियंत्रित करण्यासाठी “बुद्धीमान गाळणी”चीच आवश्यकता का पडावी? गाळणी (फिल्टर) विविध प्रक्रियांमध्ये वापरले जाते. त्याला एक नियंत्रक (रेग्युलेटर) तेवढा बसवला तरी काम भागण्यासारखे असताना चित्रपटातील गाळणीला असलेली स्वयंप्रज्ञेची आवश्यकता काही पटत नाही. अर्थात राकेश रोशनने विज्ञानपट बनविण्याचा दावा केला नसल्याने आणि उपरोक्त चूक कथेच्या दृष्टीने आवश्यकच असल्याने तशी दुर्लक्षिण्याजोगी आहे.
    २) शूर्पणखा म्युटंट (अमानवी) असल्याचे चित्रपटात सांगितलेय. ते चूक आहे. शूर्पणखा ही राक्षसी होती आणि राक्षसही एक नैसर्गिक प्रजातीच होते, म्युटंट नव्हे.
    ३) चित्रपटात आधी प्रियाच्या (प्रियांका चोप्रा) पोटातील मूल मेल्याचा प्रसंग दाखवलाय आणि नंतर कायाने (कंगना राणावत) तिची जागा घेण्याचा प्रसंग दाखवलाय. प्रत्यक्षात कायाने प्रियाची जागा घेतल्यामुळे डॉक्टरांना प्रियाच्या पोटातील बाळ मेल्याचा गैरसमज होतो. ही चित्रपटाच्या संपादनातली चूक आहे.
    ४) नुकताच ज्याचा बोन-मॅरो काढून घेण्यात आलाय तो रोहित मेहरा पुढच्याच प्रसंगी स्वत:च्या पायावर उभा असतो. हे अजिबातच पटणारे नाही.

    अश्या अनेक लहानमोठ्या त्रुटी चित्रपटात असल्या तरीही चित्रपटाचा आस्वाद घेण्यात त्यांच्यामुळे किंचितही बाधा येत नाही, हे तितकेच खरे! उलट चित्रपटातले दृक्परिणाम तर इतके काही सुंदर जमून आले आहेत की हॉलिवूडपटांनीही तोंडात बोट घालावे. जे दृक्परिणाम जमवून आणण्यासाठी हॉलिवूडला अब्जावधी डॉलर्स ओतावे लागतात, त्याच दर्जाचे काम या भारतीय चित्रपटाने अवघ्या काही कोटी रुपयांमध्ये साधलेय – आणि तेही अगदी निर्दोष! ही गोष्ट हॉलिवूडला बापजन्मीही साधणारी नाही. आणि हेच “क्रिश ३”चं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. चित्रपटातील एकूण एक साहसदृश्ये अक्षरश: श्वासोच्छ्वास विसरायला लावण्याइतकी दर्जेदार झाली आहेत! परंतू संगीताच्या पातळीवर मात्र बोंबच आहे. पार्श्वसंगीत अतिशय उत्तम असताना गाणी मात्र कालविसंगत वाटताहेत. चाल वगैरे प्रकार क्षणभर बाजूला ठेवला तरीही राजेश रोशनचा ध्वनिच (साऊंड) मुळात शिळा वाटतोय. फुकट मिळतं म्हणून घरच्याच माणसाचं संगीत वापरायचं, हा प्रकार राकेश रोशनने थांबवला आणि राजेश रोशननेही आता आपला काळ संपलाय तेव्हा आपण एकतर निवृत्त व्हावं अथवा स्वत:च्या संगीताचा पुन्हा नव्याने शोध घ्यावा – अश्या दोन गोष्टी झाल्या तर प्रेक्षक आणि फिल्मक्राफ्ट दोघांसाठीही बरं होईल. आणखी एक अडचण म्हणजे, चित्रपटातली मुंबई ही मुंबई वाटतच नाही – उगाचच मुंबईचं शांघाय केल्यासारखं वाटतं.

    अभिनयाच्या पातळीवर नेहमीचेच यशस्वी कलाकार असल्याने बोलण्यासारखे फारसे काही नाहीच. तरीही यावेळी मला आश्चर्यकारकरित्या कंगना राणावतचे काम सर्वात जास्त आवडलेय. एकतर तिची भूमिकाही अतिशय दमदार आहे आणि तिने ती व्यवस्थित, संयतपणे निभावलीय. त्यामानाने प्रियांका चोप्राला काहीच काम नाहीये. ह्रथिक रोशन हा निर्मितीसंस्था आणि भूमिका अश्या दोन्हीही बाबतीत घरच्याच मैदानावर असल्याने त्यानेही चांगलेच काम केलेय. “काल”च्या भूमिकेत विवेक ओबेरॉयही अतिशय शोभलाय – विशेषत: मध्यंतरानंतरच्या प्रसंगांमध्ये. परंतू त्याचे पात्र उगाचच स्टिफन हॉकिंग आणि “एक्स मेन”मधील पात्रे यांचे मिश्रण वाटते. ओरिजनल वाटत नाही.

    तर असा हा कुठे कडू, कुठे गोड तर कुठे आंबट असलेला “क्रिश ३”. वर सांगितल्याप्रमाणे अतिशय स्वादिष्ट जमलाय. चाखणाऱ्या प्रत्येकाला तो निश्चितपणे आवडेल. अर्थात, तो दुसऱ्यांदा-तिसऱ्यांदा ताटात वाढून घ्यायचा की नाही, हे मात्र ज्याने त्याने आपापल्या चवीप्रमाणे ठरवावे!

    *३.५/५

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या – www.vikramedke.com)

    image

  • सुसंस्कृतम्..!

    “तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाज्ञानदायकम् ।
    तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाज्ञानदायकम् ।।”

    वरवर पाहाता असे वाटेल की, इथे एकाच संस्कृत ओळीची पुनरावृत्ती करण्यात आली आहे. पण हीच तर संस्कृत भाषेची मौज आहे. जरी दोन्हीही ओळी समान असल्या तरीही दोन्ही ओळींचे अर्थ वेगळे आहेत. आणि दोन्ही ओळी मिळून एक संपूर्ण श्लोक तयार होतो.
    सुभाषितकार कुणा राजाच्या दरबारात गेलाय. तिथे त्याने पाहिले की, राजा भर दरबारात कामकाज चालू असतानाही तंबाखूचे व्यसन करतोय. ते पाहून लगेच सुभाषितकाराला ओळ स्फुरली –
    “तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाज्ञानदायकम्”.
    याची फोड होते – “तमाखुपत्रं राजेन्द्र भज मा अज्ञानदायकम्”.
    अर्थात – हे राजेन्द्रा, नशा आणणारे (अज्ञानदायकम्) तंबाखूचे पान (तमाखुपत्र) नको खाऊस (मा भज).
    राजाने यावर विचारले, “मग काय करू”?
    त्यावर सुभाषितकार पुन्हा म्हणतो,
    “तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाज्ञानदायकम्”.
    यावेळी मात्र त्याची फोड होते – “तम् आखुपत्रं राजेन्द्र भज मा ज्ञानदायकम्”.
    अर्थात – हे राजेन्द्रा, त्या (तम्) मा (म्हणजे लक्ष्मी) आणि ज्ञान देणाऱ्या (मा, ज्ञानदायकम्) आखुपत्राची (म्हणजे गणपतीची) भक्ती कर.
    अर्थातच चाणाक्ष राजाला (हो, त्याकाळचे सत्ताधारी विद्वान होते बरं का. आत्ताचे “पाँचवी पास से तेज” जरी निघाले तरी आम्हाला जग जिंकल्यासारखे वाटते!) सुभाषितकाराच्या दोन्ही ओळींचा अर्थ कळला, हे सांगणे नकोच!

    परंतू हीच संस्कृत भाषेची थोरवी आहे. या समुद्रात तुम्ही जितक्या बुड्या माराल तितकी अधिक रत्ने तुम्हाला गवसतील. उपरोक्त श्लोक हा संस्कृतातील “काव्यशास्त्रविनोद”चा केवळ एक प्रकारमात्र आहे! शिवाय एकाच ओळीतून दोन इतके भिन्न अर्थ निघतात आणि त्याद्वारे दोन्ही ओळींच्या समुच्चयास एक पूर्णत्व प्राप्त होते, यावरूनच संस्कृतची समृद्धता तुमच्या लक्षात येईल. माझ्या माहितीप्रमाणे इतकी समृद्ध भाषा अवघ्या जगात दुसरी कोणतीच नाही. आपण मात्र विनाकारणच इंग्रजीसारख्या उधार-उसनवारीवर पोसलेल्या भाषेच्या पाठी धावतो आहोत!

    – © विक्रम श्रीराम एडके.

    image

  • एक कृतिशील पूल: स्वामी विवेकानंद

    मला एका बाबतीत कायम स्वामी विवेकानंदांचं उदाहरण द्यावंसं वाटतं. स्वामीजी हे आपल्या काळातल्याच नव्हे तर आत्ताच्या काळातल्याही कित्येक धर्मज्ञांहून अधिक धर्मज्ञ आणि कित्येक सुधारकांहूनही अधिक सुधारक होते. परंतू त्यांनी कधी निव्वळ निष्क्रिय अध्यात्म लोकांच्या माथी मारलं नाही, वा पराकोटीच्या इहवादाने लोकांच्या श्रद्धांची नासधूस केली नाही. लोकांमध्ये राहिले, लोकांचे बनून राहिले. आत्यंतिक धर्मवाद्यांचे बोट पकडून हळूच त्यांना आवश्यक ती भौतिकता शिकवली आणि आत्यंतिक धर्मवाद्यांना अध्यात्माची वैज्ञानिकता दाखवून दिली. हे सारे नुसते बोलून नव्हे बरं का, तर कृतीने!
    आठवा त्या संस्थानिकाचा किस्सा! टोकाचा इहवादी असलेला तो संस्थानिक मूर्तीपूजेचा कट्टर विरोधक होता. स्वामीजींनी त्याच्याच दरबारात टांगलेली त्याचीच तसबीर मागवली. सारे पाहातायत.
    “प्रधानजी, असे समोर या. जरा या तसबीरीवर थुंका बघू”! प्रधानजी दचकले. राजाच्या तसबीरीवर थुंकायचं? तेही राजा स्वत: समोर असताना? भलतंच! राजाच्याही डोळ्यांत रागाची छटा तरळली.
    “अरे? तुम्ही थुंकत नाहीत? मग दुसरे कुणीतरी पुढे या”.
    कोण पुढे येणार?
    शेवटी राजाच म्हणाला, “स्वामीजी, असे कसे शक्य आहे? माझ्या तसबीरीवर थुंकायला सांगताय? तेही माझ्यात दरबारात?”
    “काय फरक पडतो? निर्जीव तसबीर तर आहे!” — स्वामीजी!
    “अहो पण ती ‘माझी’ तसबीर आहे ना. माझं चित्र काढलंय त्यात. दरबाऱ्यांच्या दृष्टीने त्यात मीच आहे. तिच्यावर थुंकणं म्हणजे माझ्यावरच थुंकणं! कोण कसा काय पुढे येईल? शिवाय तुम्ही सन्यासी. माझे अतिथी. माझ्याच घरी येऊन माझ्याच तसबिरीवर थुंकायला शिकवताय, हा माझा अपमान नाही का?”
    “अगदी बरोब्बर बोललात राजे! आता जरा हेच तत्त्व मूर्तीपूजेला लावा पाहू”, स्वामीजी म्हणाले.
    दुसऱ्याच क्षणी राजाच्या डोक्यात प्रकाश पडला! मूर्ती जरी निर्जीव असली तरी ती देवाची मूर्ती असते. भाविकाच्या दृष्टीने त्यात परमेश्वरच असतो. तो मूर्तीची उपासना करत नसतो, तर मूर्तीमधील ईश्वराची उपासना करत असतो. मूर्ती हे ईश्वराचे केवळ प्रतीक असते. सामान्य माणसांना थेट निर्गुण निराकार ईश्वर समजणार नाही म्हणून सगुणाची पूजा. ही पायरी आहे. सगुणाकडूनच निर्गुणाकडे जायचे असते! एवढं सगळं स्वामीजी समजावत बसले असते, तर ते त्या संस्थानिकाला समजलंच असतं, असं नाही. परंतू केवळ एकाच प्रात्यक्षिकाद्वारे स्वामीजींनी अघ्यात्मातली एवढी सूक्ष्म गोष्ट समजावून दिली, तीही एका आत्यंतिक इहवाद्याला!
    स्वामीजींकडे एकदा एक म्हातारा साधू आला होता. म्हणाला, मी आयुष्यभर तप करून एक सिद्धी मिळवली आहे. स्वामीजी म्हणाले, दाखवा! तो स्वामीजींना घेऊन नदीकिनारी गेला. काठावर उभा राहिला आणि हाहा म्हणता म्हणता त्या खळाळत्या पाण्यावरून चालत-चालत नदी पार करून दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचला. परत तसाच स्वामीजींकडे आला. त्याच्या नजरेत विजयाची चमक होती!
    स्वामीजींनी जवळच असलेल्या एका नावाड्याला विचारले, “मला पलिकडल्या किनाऱ्यावर जायचेय. नेशील का?”
    “हो, नेतो ना!”
    “किती पैसे घेशील?”
    “चार आणे!”
    स्वामीजी झटकन त्या साधूकडे वळले. म्हणाले, “आयुष्यभर तप करून अखेरिस काय मिळवले, तर चार आण्यांची सिद्धी”!
    साधूचा चेहरा खाडकन उतरला.
    स्वामीजी पुढे म्हणाले, “जी आयुष्याची बारा-पंधरा वर्षे तुम्ही ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी घातलीत, तीच जर गरीब-अशिक्षित-भोळ्याभाबड्या जनतेच्या उत्थानासाठी खर्च केली असती, आणि फार नाही पण चार-दोनच माणसांचे कल्याण केले असते, तर तुम्ही थेट परमेश्वराजवळच पोहोचला नसता का? सिद्धी नाही, तर साक्षात सिद्धीदाताच प्राप्त झाला असता तुम्हाला”!
    साधूला आपली चूक उमगली! केवळ एकाच प्रात्यक्षिकाद्वारे स्वामीजींनी भौतिक जगात आवश्यक असलेले आध्यात्मिक कर्म समजावून दिले, तेही एका साधूला!
    स्वामीजी आज दिडशे वर्षांनंतरही हवेहवेसे वाटतात, अनुकरणीय वाटतात. मला वाटते, स्वामीजींच्या या चिरंतनत्वाचे गमक त्यांच्या या वृत्तीतच असावे. त्यांनी इहवाद आणि अध्यात्म यांच्यातला दुवा बनून कार्य केले. दोहोंतल्या कमतरता ओळखून दोन्हींनाही एकमेकांचा हात धरून परिपूर्ण व्हायला, पुढे जायला शिकवले. हे करताना त्यांनी कधीच आततायीपणा नाही केला. अध्यात्म सांगताना विज्ञानाची कधी खिल्ली उडवली नाही आणि भौतिकता सांगताना आस्तिकतेला कधी अंधश्रद्धा ठरवले नाही. आज नेमकी हीच अडचण होऊन बसलीय. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या बाबा-बुवांना वाटतं मीच तेवढा खरा, बाकी जग झूठ! अंधश्रद्धा निर्मूलनछाप विवेकवादी विचारजंतांना वाटते, आम्हीच तेवढे खरे बाकी देव-बिव सगळं झूठ! यांचा त्यांना मेळ नाही आणि त्यांचा यांना मेळ नाही. वरून दोन्हीही विचारसरणींची सारखीच तक्रार असते, “काय सांगणार हो, आम्ही एवढी मेहनत घेतो, पण समाज आम्हाला स्वीकारतच नाही”. कसा स्वीकारणार? समाज हा प्रकार मुळातच बहुढंगी असतो. तो कधीच एकाच एक विचाराने चालत नाही. समाजातले ऐहिक प्रश्न ऐहिक उपायांनीच सोडवायला हवे, परंतू आध्यात्मिक निर्लेपता ठेवून! आणि अध्यात्म तर करायलाच हवं, परंतू सांसारिक कर्मे न विसरता! एका विचारसरणीने अहंकारापोटी दुसरीला वाईट ठरवण्यापेक्षा तिच्यातलं चांगलं कसं घेता येईल आणि त्याद्वारे आपली विचारप्रणाली अधिक समृद्ध कशी करता येईल हे पाहिलं पाहिजे. मला वाटतं, असं केलं तरच समाज एकसंध राहिल – तुटणार नाही.
    भगवद्गीतेत एक मोठे सुंदर तत्त्व सांगितले आहे,
    “न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् ।
    जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्त: समाचरन् ।। (गीता: ३/२६)
    अर्थात, लोक समजा चुकीचे वागत असतील, परंतू त्यांची त्या वागण्यावर श्रद्धा असेल, तर शहाण्याने विनाकारण त्यांचा बुद्धीभेद करू नये. अन्यथा ते तुम्ही सांगता तसे तर करणार नाहीतच, कारण त्यांना ते पटलेलेच नाही. शिवाय ते जे श्रद्धापूर्वक वागायचे त्याबद्दलही त्यांच्या मनात तुम्ही शंका उत्पन्न करून दिल्याने त्यांना आता तेही मनापासून करता येणार नाही. म्हणजे ते सुधारणं तर दूरच, उलट निष्क्रिय होऊन बसतील. त्यापेक्षा शहाण्याने त्यांना त्यांची कर्मे करू द्यावीत, वर आपण मात्र योग्य वागून कृतीद्वारे त्यांना आदर्श घालून द्यावा. म्हणजे मग आपोआपच हळूहळू ती मंडळी तुमचा आदर्श पाहून नको त्या गोष्टी त्यागतील, आणि चांगले तेवढे घेऊन वागायला लागतील. हल्ली मॅनेजमेंट शिकवताना मोठमोठे जडजंबाल शब्द वापरून हेच तत्त्व शिकवतात ना? तेच गीतेने सहस्रावधी वर्षांपूर्वी सांगितले. आणि तेच स्वामीजींनी दिडशे वर्षांपूर्वी स्वत:च्या कृतीने दाखवून दिले. मला वाटते, स्वामीजींच्या चरित्रातून आपण हा एवढा एक बोध घेतला तरी पुरे!

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी अथवा “स्वामी विवेकानंद” या विषयावर लेखकाचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी संपर्क करा: www.vikramedke.com)

    image

  • तरल संवेदनांची सरल गोष्ट – द लंचबॉक्स

      साजन फर्नांडिस (इरफान खान) हा एक मध्यमवयीन, विधुर, एकटाच राहाणारा, जरासा माणुसघाणा असा सरकारी कर्मचारी आहे. एकटेपणामुळे आणि मुंबईतल्या रोजच्या दगदगीमुळे लवकरच स्वेच्छानिवृत्ती घेऊन नाशिकला स्थायिक होण्याचा विचार आहे त्याचा. त्याने स्वेच्छानिवृत्तीचा अर्जही दिलाय आणि आता आपल्या कार्यालयात तो केवळ महिनाभराचाच पाहुणा आहे. एकटा राहातो, म्हणून घराजवळच मेस लावलीये त्याने. तिथून आलेला डबा मुंबईतले डबेवाले रोज त्याला कार्यालयात पोहोचवतात. अर्थात ही केवळ एक सोय आहे, कारण त्याच्या बिचाऱ्याच्या डब्यात रोज महाराष्ट्रातल्या सगळ्या खानावळींची खासियत असलेली “बटाट्याची भाजी”च तेवढी असते! थोडक्यात साजन एकाकी आहे. एकाकी अन् दु:खी. शिवाय जीवनाबाबतचा त्याचा आत्तापर्यंतचा अनुभवही वाईटच आहे. एके दिवशी मात्र चमत्कार घडतो. साजनच्या डब्यात चक्क वेगळी भाजी आणि सुग्रास जेवण असतं! अर्थातच साजन त्यादिवशी डबा चाटून-पुसून स्वच्छ करतो. संध्याकाळी मुद्दाम खानावळीत जाऊन सांगतोही – ‘असा डबा बनवावा’!
      इला (निमरत कौर) एक मध्यमवर्गीय आणि एका ७-८ वर्षांच्या मुलीची आई असलेली गृहिणी आहे. मुंबईतल्या बहुतेक चाकरमान्यांच्या बायकांचा असलेला प्रॉब्लेम – नवरा वेळ देत नाही – हा तिचाही प्रॉब्लेम आहे. त्यातून लग्नाला बरीच वर्षे झाल्यामुळं वैवाहिक आयुष्यही नीरस होऊन गेलंय तिचं. नवऱ्याचं आपल्याकडं लक्ष नाही एवढंच नव्हे तर त्याचं बाहेर लफडं चालू आहे असंही वाटतंय तिला. भाऊ वारलेला. वडील कॅन्सरने आजारी. आई त्यांचं करण्यात गुंतलेली. इला अगदी एकाकी आहे. एकाकी अन् दु:खी. तिच्या आयुष्यातला एकमेव चांगला भाग म्हणजे वरच्या मजल्यावर राहाणाऱ्या देशपांडे काकू (आवाज – भारती आचरेकर). त्यांच्याशी बोलणे, त्यांच्या टेपवरची गाणी ऐकणे, त्यांच्याकडून नवनव्या पाककृती शिकणे हा तिचा एकमेव विरंगुळा. वैवाहिक नातं जर पुन्हा फुलवायचं असेल तर नवऱ्याच्या डब्यात काहीतरी स्वादिष्ट पाठव ही त्यांचीच कल्पना. इला अनेक तास खपून डबा बनवते. डबेवाला तो घेऊनही जातो. संध्याकाळी ती आतुरतेने नवऱ्याच्या प्रतिसादाची वाट पाहात असते. नवरा मात्र ढिम्मच! काही बोलतच नाही. शेवटी न राहावून हीच विचारतो. तर ‘बटाट्याची भाजी ना, चांगली होती की!’ एवढेच उत्तर. तेव्हा तिला कळते की, आपली मेहनत दुसऱ्याच कुणाला तरी पोहोचलीये!
      या गैरसमजाबद्दल इला, दुसऱ्यादिवशी एक क्षमा मागणारी चिठ्ठी पाठवते. आणि इथून सुरू होतो ‘द लंचबॉक्स’च्या अनोख्या प्रेमकथेचा प्रवास!
      या कथेला एक तिसराही कोन आहे. साजनकडे शिकाऊ कर्मचारी म्हणून असणारा शेख (नवाझुद्दीन सिद्दिकी). त्याचाही या कथेत एक महत्वाचा आयाम आहे.
      अशी साधीच कथा. परंतू दिग्दर्शक रितेश बत्राने तिचा आलेख अतिशय उत्कृष्ट चितारलाय. इलाच्या सुरुवातीच्या भिडस्त चिठ्ठ्यांना साजनची खत्रुड उत्तरं मिळण्यापासून ते दोघांना एकमेकांची काळजी वाटणं, त्यांचं एकमेकांत गुंतत जाणं हा सारा प्रवास पाहाणाऱ्याला अक्षरश: जाणवतो. आणि कथेची खुबी म्हणजे, हा प्रवास घडवण्यासाठी कुठेच नाट्यमयता वापरावे लागलेले नाही. साधेच प्रसंग. किंबहुना इला आणि साजन एकमेकांशी वाटून घेत असलेले अनुभवही साधेच. रोजच्या आयुष्यातले. कधी आयुष्याचे चटके दाखवणारे, तर कधी नर्मविनोदाची पखरण असलेले. पण साधेच. आणि यामुळेच ही कथा जवळची वाटते. आपल्यातली वाटते. काल्पनिक असूनही शक्य कोटीतली वाटते. इला आणि साजनचं नातं त्या दोघांसाठी इतकं काही सुखद विश्रामस्थळ आहे, की ते कधीच चुकूनही विवाहबाह्य संबंध (अश्या संबंधांसाठी आवश्यक असणारं शारीरिक आकर्षण या नात्यात जवळजवळ नाहीच!)— वाटत नाही. उलट ते जितकं त्या दोघांना गरजेचं आणि हवंहवंसं वाटतं, तितकंच ते प्रेक्षकांनाही आवश्यक आणि हवंहवंसं वाटायला लावण्यात लेखक-दिग्दर्शक यशस्वी झालाय.
      चित्रपटात बहुतांशी त्याचत्याच जागा आहेत. पण तरीही मायकेल सायमण्ड्सने त्या आपल्या कॅमेऱ्यात इतक्या वेगवेगळ्या प्रकारे बद्ध केल्या आहेत ना, की त्या प्रत्येकवेळी नव्याच वाटतात. चित्रपटात गाणी नाहीत. पार्श्वसंगीतही जवळजवळ नाहीच. परंतू जे आहे ते खूपच सुखद आणि प्रत्ययकारी आहे. यासाठी मॅक्स रिक्टरचे कौतुक करायलाच हवे! चित्रपटात प्रसंग जोडण्यासाठी नव्वदच्या दशकातल्या हिंदी गीतांचा आणि डबेवाल्यांच्या भजनांचा मोठ्या खुबीने वापर करण्यात आलाय. अर्थातच हे श्रेय दिग्दर्शक रितेश बत्राचे! यासोबतच महत्वाची बाब अशी की, असे चित्रपट कायम बनतच असतात, परंतू ते केवळ काही महोत्सवांपुरतेच मर्यादित राहातात. या चित्रपटाबाबतीत मात्र करण जोहरने तोटा होण्याची शक्यता असूनही वितरणाची जबाबदारी उचलली. यासाठी त्याचे आणि ‘धर्मा प्रॉडक्शन्स’चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे!
      अभिनयाच्या पातळीवर काही बोलले नाही तरी चालेल. कारण इरफान खान असो वा नवाझुद्दिन सिद्दिकी, दोघेही अतिशय नाणावलेले अभिनेते आहेत. निमरत कौरनेही इला आणि तिचे अंतर्द्वंद्व मोठ्या कौशल्याने साकारलेय. लिलिएट दुबे, भारती आचरेकर, नकुल वैद, डेन्झिल स्मिथ आदींच्या लहानश्याच परंतू महत्वपूर्ण भूमिका आहेत, आणि यांपैकी प्रत्येकानेच आपापल्या भूमिकेला व्यवस्थित न्यायही दिलाय.
      चित्रपटाची कथा छोटिशीच आहे. परंतू ती अतिशय तपशीलवार मांडल्यामुळे चित्रपट जवळजवळ दिड तासाचा झालाय (अर्थातच सामान्य हिंदी सिनेमाच्या तुलनेत हा काळ खूपच छोटा आहे!)! प्रत्येक घटनेला व्यवस्थित वेळ दिलाय, तिचे सारे कंगोरे व्यवस्थित मांडले आहेत. प्रत्येक पात्राचा पात्रपरिपोष हळूहळू परंतू निश्चितपणे होऊ दिलाय. उदाहरणार्थ, नवाझुद्दिन सिद्दिकीचे पात्र अनाथ आणि रोज दुपारच्या जेवणाच्या नावाखाली केळी आणि सफरचंद खाणारे आहे. त्याच्या हाती जेव्हा पहिल्यांदा इरफान खानचा डबा पडतो, तेव्हा तो अधाश्यागत एका हातात पोळी ठेवून खाऊ लागतो. हा तपशील आहे. असे शेकडो तपशील चित्रपटाच्या प्रत्येक चौकटीत भरलेले आहेत. अर्थातच अश्या तपशीलांमुळे चित्रपट काहींना कंटाळवाणा वाटण्याचीही शक्यता आहे. परंतू ही कथाच इतकी हळूवार आणि अंत:प्रवाही आहे ना की, जर ती इतक्या तपशीलांसह मांडली नसती तर ती विसविशीत वाटली असती, वरवरची वाटली असती!
      अखेरिस एकच सांगावंसं वाटतं की, सध्याचं युग इतकं काही धकाधकीचं होऊन बसलंय की, त्यात एखादी साधीसोपी गोष्ट केवळ ती साधी आहे एवढ्या एकाच कारणामुळे कंटाळवाणी वाटण्याची शक्यता आहे. तुम्हाला ‘द लंचबॉक्स’ आवडला नाही, तरी हरकत नाही परंतू जर आवडला नाही तर स्वत:च्या मनाला एक प्रश्न अवश्य विचारा की, ‘चित्रपट वाईट आहे म्हणून आवडला नाही की, केवळ तो साधा आहे – मसालेदार नाही, फिल्मी नाही म्हणून आवडला नाही?’. या एका प्रश्नाच्या उत्तरात, आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित इतर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत. ती उत्तरे आपल्या मानवी जाणीवांची आणि संवेदनांची घसरण दाखवून देणारी न ठरोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या चित्रपटात वापरलेल्या भाषेतच सांगायचं झालं तर, ‘कभी कभी गलत ट्रेनभी सही स्टेशनपर पहुँचा देती हैं’!
      ‘द लंचबॉक्स’बद्दल बोलण्यासारखे अजून बरेच आहे. मात्र प्रत्येकाने हा चित्रपट स्वत:च पाहून त्याचा आपल्याला भावेल तसा अन्वय लावावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि ही ‘द लंचबॉक्स’ नावाची तरल संवेदनांची सरल गोष्ट तितकी सक्षम आहे, अशी माझी खात्री आहे! ‘चित्रपट साक्षरता’ तरी दुसरे काय असते!

    *४.७५/५

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

    image

  • परावर्तित प्रसिद्धीचे दिवाने!!

      ईस्माईल दरबार या संगीतकाराने “हम दिल दे चुके सनम”, “देवदास” आणि “किस्ना”ची काही गाणी सोडता काय संगीत निर्माण केलेय हा एक संशोधनाचाच विषय ठरावा. कुणाच्याही लक्षात नसलेला हा माणूस अचानकच प्रसिद्धीच्या झोतात आला ते “ए. आर. रहमानने ऑस्कर मिळवले नसून विकत घेतलेय” या विधानामुळे!
      अश्या प्रकारच्या प्रसिद्धीला मी परावर्तित प्रसिद्धी म्हणतो. म्हणजे, स्वत: तर काहीच कर्तृत्व दाखवायचे नाही, परंतू इतर कुणी स्वकष्टाने वर येत असेल तर त्याचेही प्रतिमाभंजन करायचा प्रयत्न करायचा. माझी रेष तुझ्या रेषेपेक्षा मोठी होऊ शकत नाही, तर थांब तुझी रेषच पुसतो – असा आकस दाखवायचा. सूर्यावर दगड फेकला की चार-दोन प्रकाशाचे शिंतोडे आपल्यावरही उडतील, असा हा साधासरळ हिशोब असतो.
      संस्कृतमध्ये एक फार सुंदर सुभाषित आहे –
    “घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभरोहणम् ।
    येनकेनप्रकारेण प्रसिद्धो पुरुषो भवेत् ।।”
    अर्थात, प्रसिद्धीसाठी हपापलेला माणूस प्रसंगी स्वत:च्याच घरातली भांडी फोडतो, स्वत:चे कपडे फाडतो, एवढेच नव्हे तर गाढवावरही स्वार व्हायला तयार होतो; कारण त्याला कोणतीही किंमत देऊन प्रसिद्ध व्हायचेच असते!
      ऑस्कर ऍकॅडमीने ५ कोटी डॉलरचा दावा ठोकण्याची धमकी दिल्यावर तत्क्षणीच शेपूट घालणारा ईस्माईल दरबार आणि मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडून जाईन या आपल्या विधानावरून पलटी मारणारे यू. आर. अनंतमूर्ती यांच्यात तत्त्वतः काहीच फरक नाही, असे मला वाटते! दोघांचीही जातकुळी एकच – दोघेही परावर्तित प्रसिद्धीचे दिवाने!!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (www.vikramedke.com)

    image

  • आरंभ हैं प्रचंड..!

      काल काँग्रेसची अधिकृत प्रतिक्रिया होती की, हा भाजपचा अंतर्गत मामला आहे. आता लवकरच राहूल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी घोषित करून त्यांच्या नावे फटाके-पेढे आदी जल्लोष करवून घेण्यात आल्यास मला नवल वाटणार नाही. अर्थातच काल काँग्रेसने दिलेली प्रतिक्रिया यावेळी भाजप देईल! परंतू पंतप्रधानपदाचे प्रत्याषी घोषित करणं हा खरंच एखाद्या पक्षाचा अंतर्गत मामला असतो का हो? तसं असतं तर भाजप काल सहजच आडवाणींचं नाव घोषित करू शकले असते आणि सोनिया गांधी २००४ सालीच पंतप्रधान झाल्या असत्या. तेव्हा असा कोणताही अंतर्गत मामला नसतो, तर जो काही असतो तो पक्षाला जनतेतून बहुमत मिळवून देऊ शकणारा निर्णय असतो. थोडक्यात, तो जनतेच्या दबावाचा परिणाम असतो – एकप्रकारे जनतेचाच निर्णय असतो.
      त्यातल्या त्यात भाजपचे श्रेय एवढेच की, त्यांनी अनेकांची नाराजी पत्करून जनतेचा हा निर्णय स्वीकारण्याची हिंमत दाखवली. काँग्रेसही यावर राजकीय प्रतिक्रिया देत न बसता जर काल लोकांनी उत्स्फूर्तपणे वाजवलेल्या फटाक्यांचा, वाटलेल्या पेढ्यांचा आणि केलेल्या जल्लोषाचा योग्य अन्वयार्थ लावेल तर बरं. जनतेला बदल हवा आहे आणि जनता ते वारंवार कृतीतून दाखवून देते आहे. जनमताच्या विरूद्ध जाणारे इतिहासाच्या पानापुरतेही उरत नाहीत, हा इतिहास आहे. काँग्रेसचे तसे काही होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे. अर्थात त्यांनी स्वत:ला सावरण्याची आणि जनतेला किंमत देण्याची नितांत आवश्यकता आहे.
      दुसरीकडे भाजप आणि सामान्य मोदीसमर्थकांनीही आता जल्लोषात वेळ न घालवता आता मतदारांमध्ये जागृती करायची आवश्यकता आहे. आम्ही तुमच्या भावनेला प्रतिसाद दिला आता चेंडू तुमच्या कोर्टात आहे, ही बाब जनतेपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. तरच त्यांना कालचा निर्णय “कॅश” करता येईल. लढाई जिंकलेली नाही – खरं तर अजून लढाई सुरूदेखील झालेली नाही. रणनीतीचे काही टप्पे तेवढे गाठले गेले आहेत. या युद्धाला कुणी “ॐ × रोम” म्हणो अथवा अन्य काही, परंतू आता कुठे खऱ्या युद्धाला तोंड फुटेल. तयार राहा. तूर्तास, “आरंभ हैं प्रचंड..”!

    – © विक्रम श्रीराम एडके.

    image

  • ब्रिटिशांचा कर्दनकाळ : मदनलाल धिंग्रा

    ब्रिटिशांचा कर्दनकाळ : मदनलाल धिंग्रा

    17 ऑगस्ट 1909 हा दिवस कुणीही सच्चा देशभक्त कधीही विसरणार नाही. कारण याच दिवशी सर विल्यम हट कर्झन वायली या इंग्रज अधिकार्‍याचा वध करणारे हुतात्मा मदनलाल दित्तमल धिंग्रा हसत हसत फासावर चढले. 1 जुलै 1909 रोजी पिस्तुलाच्या चार गोळ्या झाडून धिंग्राजींनी कर्झन वायलीचा वध केला होता. ‘एका इंग्रज अधिकार्‍याचा भारतीय क्रांतियोद्धय़ाने केलेला वध’ एवढेच केवळ या घटनेचे महत्त्व नाही, तर हा होता अजिंक्यतेचा तोरा मिरवणार्‍या ब्रिटिशांच्या भूमीवर राहून त्यांच्याच एका अधिकार्‍याचा केलेला वध! अभूतपूर्व अशीच घटना होती ही. याआधी आम्ही भारतीयांनी कुणी गोरा अधिकारी कधी मारलाच नव्हता, असे नाही. दु:शासनी कारवाया करणार्‍या रँडला चापेकर बंधूंनी घातलेले कंठस्नान इंग्रज विसरलेले नव्हते; पण ते सारे भारतात. प्रत्यक्ष शत्रूच्या भूमीवर राहून, त्यांच्याच उच्चाधिकार्‍यास मारण्याचा पहिला मान जातो तो केवळ धिंग्राजींकडेच!

    या घटनेनंतर सबंध हॉलमध्ये पळापळ माजलेली असताना मदनलालजींची नाडी सामान्य गतीनेच चालत होती. एवढेच काय, तर त्यांना अटक करून ठाण्यात नेल्यावरही ते पाचच मिनिटांत घोरू लागले होते. धिंग्राजींची झडती घेऊन त्यांच्याजवळ सापडलेल्या एकूणएक वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. त्यातच धिंग्राजी ज्यांना गुरुस्थानी मानत त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहून दिलेले कोर्टात मांडावयाचे निवेदन challenge हेही गेले. पुढे न्यायी (!) इंग्रज शासनाने ते निवेदन दाबून टाकले व कोर्टात मांडूच दिले नाही.

    इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे वायलीला धिंग्राजींनी मारले 1 जुलै 1909 ला. धिंग्राजींना फाशी झाली ती 29 जुलैला. फाशी देण्यात आली ती 17 ऑगस्ट 1909 ला. म्हणजे अवघ्या महिनाभरातच इंग्रज शासनाने त्यांच्या दृष्टीने शत्रू असलेल्या क्रांतिवीरास फाशी जाहीर केली व दीडच महिन्यात तिची अंमलबजावणीही करून टाकली. आता या गोष्टीची तुलना अफजल गुरू वा कसाब यांना आपण किती वष्रे पोसतोय (आणि आणखी किती वष्रे पोसणार आहोत!) याच्याशी करा म्हणजे समजेल की इंग्रजांनी आपल्यावर इतकी वष्रे राज्य कसं काय केलं आणि आजही आपण केवळ एक ‘विकसनशील देश’च का आहोत ते.

    असो. धिंग्राजींच्या कृत्यामुळे जगभरात इंग्लंडची अब्रू गेलीच होती. उरलेली अब्रू वाचवण्यासाठी 5 तारखेला धिंग्राजींचा निषेध करणारी सभा घेण्याचा प्रयत्न केला गेला, तर तोही स्वा. सावरकरांनी हाणून पाडला. तोपर्यंत इंग्रज याच भ्रमात होते की, धिंग्राजींच्या अखेरच्या निवेदनाच्या सर्व प्रती आपण जप्त करून टाकल्या आहेत. जेव्हा धिंग्राजींच्या फाशीच्या आदल्या दिवशी, म्हणजे 16 ऑगस्ट 1909 ला ‘डेली मेल’मध्ये जेव्हा सावरकरांनी धिंग्राजींचे challenge नावाचे निवेदन प्रसिद्ध करविले, तेव्हा तर ब्रिटिश शासन कोलमडलेच. ज्या आपल्या निवेदनानंतर धिंग्राजी जगभरच्या क्रांतिकारकांचे प्रात:स्मरणीय प्रेरणास्थान झाले, त्यात ते म्हणतात :”एक हिंदू म्हणून माझी भावना अशी आहे की, माझ्या देशाचा अपमान हा परमेश्वराचाच अपमान होय.

    कृश प्रकृतीच्या आणि सामान्य बुद्धिमत्तेच्या अशा मजसारख्या भारतपुत्राजवळ मायभूमीसाठी देता येईल असे काही असलेच तर ते केवळ स्वत:चे रक्तच होय. तेच मी माझ्या मातृभूमीच्या वेदीवर अर्पिले आहे! माझ्या मातृभूमीचा पक्ष हा प्रभू रामचंद्रांचा पक्ष आहे. तिची सेवा ही प्रत्यक्ष भगवान र्शीकृष्णाचीच सेवा आहे. हिंदू आणि इंग्लिश हे दोन वंश अस्तित्वात आहेत आणि त्यांच्यात सध्या असलेले हे अनैसर्गिक राजकीय संबंध कायम आहेत, तोपर्यंत हा स्वातंत्र्यसंग्राम चालूच राहील.

    आत्मबलिदान कसे करावे ही एकच शिकवण सध्या हिंदुस्थानला शिकवण्यायोग्य आहे आणि ते शिकवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वत:चे बलिदान देऊन मोकळे होणे होय! याच जाणिवेने प्रेरित होऊन मी प्राणार्पण करीत आहे व माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान आहे. या भारतभूची संतान म्हणून मला पुनर्जन्म प्राप्त होवो व याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पडो एवढीच माझी परमेश्वरचरणी प्रार्थना आहे.”

    धिंग्राजींचे हे ओजस्वी निवेदन मुळातूनच वाचण्याजोगे आहे. ते केवळ चांगले आहे म्हणून नव्हे, तर ज्या मार्गावरून छत्रपती संभाजी, राणी लक्ष्मीबाई, सेनापती तात्या टोपे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आदीसारखे असंख्य महान वीर चालले, तो हौतात्म्याचा मार्ग चालण्याची प्रेरणा तुम्हा-आम्हाला मिळावी म्हणून! त्या राजमार्गाचे आकर्षण तुम्हा-आम्हाला निर्माण व्हावे म्हणून! कारण आजघडीलाही आपला देश काळोखातच बुडालेला आहे आणि देशातील अंधार दूर करायचा असेल तर त्या देशातील तरुणांनी अखंड जळणे आवश्यकच नव्हे, तर योग्यच आहे. तीच मदनलाल धिंग्राजींना खरी र्शद्धांजली ठरेल, अन्यथा त्यांचे बलिदान फुकटच गेले असे म्हणावे लागेल.


    ब्रिटिशांचा कर्दनकाळ : मदनलाल धिंग्रा
    ब्रिटिशांचा कर्दनकाळ : मदनलाल धिंग्रा

     

  • वाकियात

    वाकियात

    Javaan- Vikram Edke
    Javaan- Vikram Edke

    चँद कंचोंकी आवाज हुई बस,
    फिर खेल सारा बिखर गया!
    पंछी उड गये पेडोंसे और,
    माँ का दामन सिहर गया!!

    सफेद बर्फपे गिरे थे जो,
    वो स्याह खूनके छींटें थे!
    फर्जकी खुशबू थी जिनमें,
    वो आँसू बडे ही मीठे थे!!

    गुजर गये थे मौसम यूँ ही,
    सावन सारे रुठे थे!
    ‘लौट आऊँगा प्रिये’, कहा था जिनमें
    वो वादे सारे झूठे थे!!

    परसोंही जन्मे बच्चेका उसने,
    मुख भी अब तक देखा न था!
    बूढे पिताके चरणोंमें, सुना हैं,
    कई दिनोंसे मथ्था टेका न था!!

    नेता मस्त थे घोटालोंमें,
    आवाम चैनसे सोया था!
    बस धरतीका सीना उस दिन,
    चुपके चुपके रोया था!!

    न बातोंमें चर्चा था कोई,
    न न्यूजमें थी कोई हरारत!
    वैसेभी इन बातोंकी,
    उसको कब कहाँ थी चाहत!!

    ‘कडी निंदा’के दौरे पडे बस,
    श्रद्धांजलीकी भाषा थी!
    कहनेवालेकी आँखोंमें लेकीन,
    झूठे ‘अमन की आशा’ थी!!

    कुल मिलाके वोही हुआ था,
    जिसकी रोज हमें हैं आदत!
    सबकुछ मझेमें चल रहा हैं अपना,
    सीमापे जवान मरा था शायद!!

    – © विक्रम.

  • उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य-वरान्निबोधत!!

    The track “Nenje Ezhu” from Maryan is one of my favorite songs. It’s great music & soulful voice of none other than A.R. Rahman inspired me so much that I decided to write a Hindi poem on this tune. So, here is my take on this song. This is not a translation but an independent poetry conveying the meaning of the song. I’ve taken the poetic-freedom of incorporating many concepts from the holy Katha-Upanishada (“Awake, Arise.. & stop not till the goal is achieved”!! – Katha/1.3.14; Apparently the favorite quote of Swami Vivekananda!) & the Bhagawad-Geeta (“Nainam Chhindati Shastrani – Geeta/2.23) in it. I’ve taken the reference of great martyr Sage Dadhichi also. So, in a way, this one is quite different – more universal – from the original Tamizh version, as it is not bound with the situation of the movie.

    Do tell me how do you like it.


    [Note: This poetry is a copyrighted work & author’s permission is necessary before any kind of reproduction of it.]


    Song – Nenje Ezhu
    Music & Singer – A.R. Rahman
    Film – Maryan

    “अंतर्द्वंद्वकी राहोंमें,
    अथाह, कराल प्रवाहोंमें,
    अग्निग्रसित दिशाएँ हो,
    कण्टकस्तंभ धराएँ हो,
    सूर्यभी यदि शर उगले,
    तुझे तबभी चलना हैं..
    उत्तिष्ठत (६),
    जाग्रत, प्राप्य-वरान्निबोधत!!

    मार्गरोधी चट्टानोंको,
    कर दे परास्त आह्वानोंको!
    “नैनं छिन्दति शस्त्राणि”
    भय कैसा फिर प्राणोंको?
    इस गीतार्थको प्राशन कर,
    तुझे आगे बढना हैं..
    उत्तिष्ठत (६),
    जाग्रत, प्राप्य-वरान्निबोधत!!

    जो सहता वोही जाने होती हैं कैसी वेदना,
    पर यारा, जीवन तो अस्तोंसे उभरी चेतना!
    तू वंशज दधिचीका, हैं वज्र अस्थियोंमें,
    बस लड जा, तू फल का क्यूँ सोचे?
    उत्तिष्ठत (६),
    जाग्रत, प्राप्य-वरान्निबोधत!!

    अंतर्द्वंद्वकी राहोंमें,
    अथाह, कराल प्रवाहोंमें,
    वेलाभी जो दिखाई न पडें,
    तुझे तब भी चलना हैं..
    उत्तिष्ठत (६),
    जाग्रत, प्राप्य-वरान्निबोधत!!”

    – © विक्रम.

    [For those who have problem understanding such a hard, Sanskrit-alike Hindi, here is a line by line translation for you –

    “In the paths of inner-dilemma,
    In the endless, fierce streams,
    When there is nothing but fire in all the directions,
    When there are nothing but spikes on the roads,
    When even the sun shoots you with the arrows of heat,
    You still have to walk..
    Awake, Arise.. & stop not till the goal is achieved!!

    To every rock that is hurdle for you,
    & destroy each & every challenge in front of you,
    ‘No weapon can kill the Aatman’
    Then what is the fear to your soul?
    Grasping this moral of Bhagawad-Geeta,
    You have to go ahead & ahead..
    Awake, Arise.. & stop not till the goal is achieved!!

    He who suffers, only knows how it pains,
    But O dear friend, this is life & it rises from where it sets only!
    O mighty warrior, you are the descendent of Sage Dadhichi & have the Thunderbolt in your bones like him,
    Go & just fight your battle, why should you think about its consequences?
    Awake, Arise.. & stop not till the goal is achieved!!

    In the paths of inner-dilemma,
    In the endless, fierce streams,
    Where you cannot see the shore too,
    You still have to walk..
    Awake, Arise.. & stop not till the goal is achieved!!”

    – © Vikram.]