Author: Vikram Edke

  • जय हो ‘रहमान’भाई!!

    जय हो ‘रहमान’भाई!!

    रात्रीचे दहा वाजून गेलेले. चेन्नईच्या ‘अपोलो कॅन्सर हॉस्पिटल’मध्ये सर्वत्र निजानीज झालेली. स्पेशल रुम क्र. १३३५ मध्ये लहानग्या निहारिकाचीही झोपायची तयारी चालू होती. अवघी पाच वर्षांची पोर. आजच केमोथेरपीचे एक सत्र संपले होते तिचे. आई — निखिला, बिछाना नीट करून देत होती तिचा. सर्व तयारी मनासारखी झाल्यावर निहारिकाने हळूच आईच्या डोळ्यांत पाहिले.

    “हो माहितीये मला”, आई निखिला हसून म्हणाली. आणि तिने आपल्या मोबाईलवर मंद आवाजात ‘हायवे’ चित्रपटातले गीत ‘सूहा साहा’ लावले. गेले काही दिवस हा रोजचाच दिनक्रम (की रात्रीक्रम!) झाला होता दोघींचा. रोज झोपताना निहारिकाला ‘सूहा साहा’ ऐकायचेच असायचे. काही दिवसांपूर्वी या गीताची जागा ‘कडल’मधील ‘सिथ्थिरई निला’ कडे होती. त्याआधी निहारिकाला ‘127 Hours’मधील ‘इफ आय राईज्’ हवे असायचे झोपताना. त्याआधी ‘विनईतांडी वरुवाया’चे शीर्षकगीत आणि कधी कधी ‘स्वदेस’मधले ‘आहिस्ता आहिस्ता’!! सध्या निहारिका — ‘निका’चा जीव ‘सूहा साहा’वर जडला होता. आणि लपवायचे कश्याला — तिची आई निखिलाचाही!

    इतके दिवस ऐकूनही या गीताचा रोज तस्साच आणि तितकाच जादुई प्रभाव कसा काय पडतो, हे निखिलाला कधीही न सुटलेले कोडे होते. पण आता अनुभवाच्या या टप्प्यावर तिने ‘रहमान’च्या कोणत्याही संगीतामागची कारणमीमांसा शोधणे बंद केले होते. तो — रहमान — तिच्या लेकराला जगवतोय एवढे पुरेसे होते तिच्यासाठी!

    हे गीत सुरू केल्यानंतर कितीही दुखत असलं, त्रास होत असला तरीही कशी कोण जाणे पण पाचच मिनिटांत निका गाढ झोपी जायची. आजही तेच घडलं! निका झोपी गेली आणि निखिलाचं मन रहमानच्या संगीतासोबत वाहात वाहात मागे जाऊ लागलं. चार वर्षांपूर्वीची — २०१० सालची ती सकाळ लख्खपणे डोळ्यांसमोर उभी राहिली निखिलाच्या. दिवाळीच्या एक दिवस आधीची ती सकाळ! त्याच दिवशी डॉ. टि. राजा यांनी निकाला ऍक्युट ल्युकेमिया —कॅन्सर असल्याचं सांगितलं होतं. नवरा-बायकोच्या पायाखालची जमिनच सरकली होती त्यादिवशी.

    “हे बघा मिस्टर आणि मिसेस नटराजन”, डॉक्टर जणू शब्द शोधत शोधत म्हणाले होते, “तुम्ही दोघेही सुशिक्षित आहात, समजूतदार आहात, फॉरेन रिटर्न्ड आहात. मला तुम्हाला कोणत्याही भ्रमात ठेवायचं नाहीये. ल्युकेमिया बरा झाल्याची खूप उदाहरणे आहेत. परंतू निकाची केस जरा वेगळी आहे. अवघी दोनच वर्षांची आहे ती. तिचं वय आणि आजाराची तीव्रता पाहाता तिच्या हाती आता सहा आठवड्यांपेक्षा.. अं.. जास्त काळ उरलेला नाहीये”.

    डोळ्यांत पाण्याचा सागर गोळा झालेला माझ्या. आणि त्या सागराच्या भोवऱ्यांत बुडत चाललेलं माझं मन. तश्यात डॉक्टरांचा आवाज लांबच्या कुठल्यातरी किनाऱ्यावरून आल्यासारखा वाटला नसता तरच नवल. शब्दांच्या लाटा कानावर आदळत होत्या. आज्ञाधारक संगणकासारखा मेंदू त्यांचे अर्थही लावत होता. पण त्या शब्दांचा कान ते मेंदू असा प्रवास आईचं काळीज जाळत चालला होता, हे कुणाला दिसणार? माझं अंतर्मन केव्हाच खुर्चीवरून उठलं होतं अन् डॉक्टरांची कॉलर पकडून जाब विचारत होतं,

    “काय डोकं-बिकं फिरलंय का डॉक्टर तुमचं? अहो साधा ताप आला असणार माझ्या बाळाला. रात्रीची अचानक घामाघूम होते हो ती फक्त! म्हणून थेट कॅन्सरवर कुठे चाललात? अहो, जरा बघा तरी हो तिच्याकडे एकदा. फुलासारखी नाजूक आहे हो माझी पोर. देव कसा काय तिच्याशी एवढा निष्ठूरपणा करेल. सांगा ना.. सांगा ना…”

    प्रत्यक्षात ओठ जणू शिवले गेले होते. आणि शरीर क्रुसावर चढवलेल्या येशूसारखं कुणीतरी खिळ्यांनी खुर्चीला जखडून टाकलं होतं.

    डॉक्टर सांगत होते, “आपण आता जो इलाज करणार आहोत, तो केवळ निकाचा अखेरचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी. वेदना सुसह्य व्हाव्यात म्हणून..”

    मला पुढचं काहीही ऐकू येणं केव्हाच बंद झालं होतं. ‘सहा आठवडे’ या दोनच शब्दांनी माझं अवघं आयुष्य व्यापून टाकलं होतं. आणि निष्ठूर मृत्यू मला व्यापूनही दशांगुळे उरला होता — जिभल्या चाटीत आणि माझ्या पोटच्या गोळ्याकडे वखवखलेल्या नजरेने पाहात!

    मी केव्हा आणि कशी निकाच्या रुममध्ये आले मला कळलंच नाही. नवरा औषधं आणि इंजेक्शन्स आणायला बाहेर गेला होता. निका झोपली होती. आमच्या लहानश्या जगाची झालेली उलथापालथ गावीही नव्हती तिच्या. इतका वेळ रोखून धरलेला बांध तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहाताच फुटला. आपोआप हुंदका बाहेर आला. पण तो नुसताच हुंदका नव्हता. अस्पष्टसे शब्दही मिसळले गेले होते त्यात — ओ पालनहारे, निर्गुण ओ न्यारे, तुमरे बिन हमरा कौनु नाही..! परमेश्वरा, तुझ्याशिवाय माझं दु:ख निवारणारं कुणीच नाही रे..!! सवय म्हणा वा अन्य काही, पण मनाने त्याही स्थितीत नोंद घेतली होती — ‘लगान’!

    माझ्या आवाजानेच बहुतेक, निकाला जाग आली. तिने माझ्याकडे पाहून हात पसरले. तिच्या इशाऱ्याचा अर्थ ध्यानात यायला वेळ लागला मला. पण मी ताबडतोब मोबाईलमध्ये ते गाणे शोधले. हळू आवाजात गीत लावून फोन तिच्या उश्याशी ठेवून दिला मी. त्याक्षणी तिची कोणतीही इच्छा मी पूर्ण केली असती. निका हे गाणे ओळखायची. तिच्या चेहऱ्यावर परिचयाचे हासू फुलले. त्यानंतर दोनच मिनिटांत ती पूर्वीसारखीच गाढ झोपून गेली. गीत चालूच होते — प्रभुजी हमरी हैं बिनती, दुखीजन को धीरज दो, हारे नहीं वो कभी दुखसे.. हैं पथमें अंधियारे, दे दो वरदानमें उजियारे… शब्द समजणं केव्हाच बंद झालं होतं. मात्र त्या संगीताने अवघं वातावरण कुंद करून सोडलं होतं. खूप सकारात्मक असं.. भारून टाकणारं काहीतरी रुग्णालयाच्या खोलीत निर्माण झालं होतं. त्या भारलेल्या क्षणीच मी निर्णय घेतला. निकाच्या शांत चेहऱ्याकडे पाहाताना निर्धार अजूनच पक्का झाला होता माझा!

    नवऱ्याच्या कामाच्या शिफ्ट्समुळे त्याला तर शक्यच नव्हते. त्यामुळे निखिलाच सकाळी सकाळी सारं सामान घेऊन आली. आता तिचा मुक्काम तिच्या बाळासोबतच असणार होता. औषधोपचार सुरू झाले. परंतू औषधांसोबतच निखिला आणखी एका गोष्टीचे डोस देत होती निहारिकाला — रहमानची गाणी! जगातील इतर कोट्यवधी लोकांसारखाच तिचा खूप विश्वास होता रहमानच्या संगीतावर आणि त्यात गवसणाऱ्या परमेश्वरावर! निहारिका केवळ रहमानच्याच संगीताला चांगला प्रतिसाद देते, आनंदी होते, कितीही वेदना होत असल्या तरीही विसरते; हे निखिलाने बरोब्बर हेरलं होतं. त्यातल्या त्यात ‘ओ पालनहारे’ आणि ‘कन्नथ्थिल मुथ्थमिटाल’ मधील ‘ओरु देवम् तंद पूवे’ विशेष आवडते होते तिचे. डॉक्टरांनी फक्त सहाच आठवड्यांचा, म्हणजे अवघ्या ४२ दिवसांचाच अवधी दिला होता. ती निहारिका नाही नाही म्हणता म्हणता दिड महिना उलटून गेला तरी जिवंत होती, एवढेच नव्हे तर उपचारांना प्रतिसादही देत होती. डॉ. राजांच्या भाषेत सांगायचं झालं तर हा वैद्यकीय जगतातला चमत्कारच होता. निहारिकासारख्या केसेसमध्ये कुणीच अशी प्रगती केली नव्हती. निखिलाला ठाऊक होतं, हे सारं केवळ एकाच व्यक्तीमुळे घडतंय — ए. आर. रहमान!

    एकदा निकाच्या नियमित तपासणीसाठी एक नर्स खोलीत आली. त्यावेळी योगायोगाने ‘दिल्ली ६’मधलं ‘अर्जियाँ’ सुरू होतं. दोनेक मिनिटं गाणं ऐकल्यावर नर्स अचानक म्हणाली,
    “कव्वाली? आर यू मुस्लिम्स”?

    निखिलाने मानेनेच नकार दिला. तो विषय तिथेच थांबला. निखिलाच्या मनातून मात्र तो विषय गेला नाही. त्यादिवशी रात्री सारे झोपले तरी निखिला एकटीच स्वत:शी विचार करत जागी होती — आपला धर्म हिंदू. निहारिकाचे बाबा ख्रिश्चन. निहारिकाला आजवर कित्येकदा रक्त द्यावे लागलेय. रक्तपेढी थोडीच धर्मानुसार रक्ताची वर्गवारी करते? कित्येकदा कुणा मुसलमानाचंही रक्त तिला दिलं गेलं असेलच की. म्हणजे निहारिकाच्या धमन्यांत एकाचवेळी तीन वेगवेगळ्या धर्मांचं रक्त वाहातंय! मग निहारिकाचा धर्म कोणता? रहमानच्या संगीताचंही असंच असतं का? त्याचा धर्म आहे इस्लाम. म्हणून मग त्याचं संगीत मुसलमान ठरतं का? असं असेल तर मग रोज सकाळी गणपतीच्या मंदिरात गेल्यावर माझ्या कानांत ‘अर्झियाँ’ वा ‘हायवे’मधील ‘तू कूजा’ कसं काय वाजतं मग? आपला ख्रिश्चन नवरा का बरं ‘स्वदेस’मधलं ‘पल पल हैं भारी’सारखं श्रीरामाचं भजन ऐकताना भावूक होतो मग? ‘सपने’मधलं ‘रौशन हुई रात मरियमका बेटा उतरके जमींपे आया’ ऐकल्या ऐकल्या शेजारी राहाणाऱ्या फातिमामौसींच्या डोळ्यांत का बरं पाणी उभं राहिलं होतं मग? ‘कडल’मधलं ‘अन्बिन वासले’ तर चर्चमध्ये गायचं गीत आहे ना, तरीही केवढं आवडतं आपल्याला! खरं तर इस्लाम हा रहमानचा केवळ वरवरचाच धर्म आहे. तो त्याचा खरा धर्म नाहीच. त्याचा खरा धर्म आहे अध्यात्म! अध्यात्म — जे जगातल्या प्रत्येक धर्माच्या गाभ्यात आहे. आणि म्हणूनच रहमानचं संगीत वैश्विक आहे. त्यातल्या भावना सच्च्या आहेत. त्यातल्या जाणिवा दैवी आहेत. इतरांची गाणी आवडतात किंवा आवडतही नाहीत, परंतू रहमानची गाणी मात्र पार आत्म्यात झिरपतात.. जणू काही तेच त्यांचे खरे घरटे असावे! मी जेव्हा जेव्हा रहमानचं एखादं गीत, त्याच्या संगीताचा एखादा लहानसाच तुकडादेखील ऐकते, तेव्हा तेव्हा असं वाटतं जणू मी माझ्या मोबाईलवरून थेट परमेश्वराला फोन लावलाय आणि तोही त्याच्या खाजगी क्रमांकावर!

    विचार करता करता निखिलाला केव्हा झोप लागली तेच समजले नाही! जाग आली तेव्हा नुकतंच कुठे उजाडू लागलं होतं. बघता बघता तीन वर्षं कशी भुर्रकन उडून गेली होती! निहारिका आता हळूहळू बरी होऊ लागली होती. सावरू लागली होती. बागडू लागली होती. लब्बाड ‘जोधा-अकबर’मधलं ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’ लावलं की एखाद्या सूफी संताप्रमाणे एक हात आकाशाच्या दिशेने उंचावत आणि दुसरा हात दानमुद्रेत आडवा पसरत गिरक्या घेते. मध्येच “आई ते ‘रंग दे बसंती’मधलं ‘लुकाछुपी’ लाव ना”, म्हणते! तिला रुग्णालयातून केव्हाच सुटी मिळालीये. आता फक्त अधून-मधून केमोथेरपीसाठी रुग्णालयात यावं लागतं. याप्रकारात निकाचे सारे केस झडले. निखिलाला वाईट वाटलं, तर निहारिकानेच तिला ‘लगान’मधलं ‘चले चलो’ ऐकवत धीर दिला! आजही अशीच केमोथेरपी संपवून निखिलाने गाडी सुरू केली तर मागच्या सीटवर बसलेली निहारिका मोठ्ठ्याने ओरडली, “आई, ‘रंग दे बसंती’ लाव ना, मला नाचायचंय”! अन् आनंदाला पारावार न राहिलेली निखिला कारच्या म्युझिक-सिस्टिमवर गाणं लावता-लावता स्वत:लाच ऐकू जाईलसे पुटपुटली, “जय हो रहमानभाई.. जय हो”!!!

    (सत्यघटनेवर आधारित)

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाच्या अन्य कथा/लेख वाचण्यासाठी व लेखकाने आजवर दिलेली विविध व्याख्याने ऐकण्यासाठी आणि तुमच्या परिसरात लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

  • RIP नव्हे, ‘सद्गती’ म्हणा!!

    RIP नव्हे, ‘सद्गती’ म्हणा!!

    कुणी व्यक्ती गेली की सोशल मिडियावर श्रद्धांजलीचे सत्रच सुरू होते. त्यातही हल्ली आपल्या भावना एवढ्या काही स्वस्त झाल्या आहेत की, आपल्याला Rest In Peace एवढे ३ शब्दही टंकित करण्याची तसदी घ्यावीशी वाटत नाही, अथवा तितका वेळ नसतो. त्यामुळे मंडळी थोडक्यात RIP लिहून मोकळी होतात! याच RIP संदर्भात काही गोष्टी स्पष्ट करणे आवश्यक वाटते. पाहा पटतात का —

    १) RIP अर्थात Rest In Peace चा शब्दशः अर्थ होतो – ‘(शरीर) शांततेत आराम करो’. आपण तो शब्द इतक्या काही सहजपणे वापरतो की, त्याचा अर्थ तरी आपल्याला समजतो की नाही असा प्रश्न पडावा. ही मुळात ख्रिश्चन संकल्पना आहे मित्रांनो. त्यांच्यात शरीरालाच सारे महत्व दिले जाते. ते मानतात की, न्यायाच्या दिवशी परमेश्वर सर्वांना त्यांच्या थडग्यातून उठवून त्यांच्या पाप-पुण्याचा हिशोब करेल. तो दिवस कधी येईल, माहिती नाही. परंतू तोवर त्या शरीराला त्याच्या थडग्यात आराम मिळो, यासाठी म्हणतात Rest in Peace. आता यात सामान्य तर्कबुद्धीच्याही व्यक्तीला पडणारे प्रश्न असे की,

    अ) मृत्यूनंतर काही दिवसांतच शरीराचे विघटन होते. मग कोणत्या शरीराला पुन्हा उठवणार?
    ब) समजा सर्वशक्तिमान परमेश्वर जर कुठूनही शरीराची तत्त्वे गोळा करून ते निर्माण करणारच असेल, तर मग शरीर पुरायची गरज काय? हिंदू ज्याप्रमाणे शरीर जाळतात (ही प्रथा ग्रीकांनी आपल्याकडून जशीच्या तशी उचलली!) त्याप्रमाणे जाळल्यावरही परमेश्वर ते निर्माण करेलच की!
    क) शरीर खरोखरीच जर इतके गरजेचे असते, तर परमेश्वराने मुळात ते नष्टच का होऊ दिले असते?
    ड) झाडाझुडुपांमध्येही जीव असतो आणि त्यांचा तर अंतिमसंस्कारही होत नाही. मग हा परमेश्वरी न्यायाचा नियम त्यांनाही लागू आहे का?
    इ) या नियमानुसार डायनोसॉर्सचे नेमके काय झाले?

    ही प्रश्नांची यादी कितीही वाढवता येईल. तूर्त इतकेच सांगून थांबतो की, ही ख्रिश्चन संकल्पना नंतर मुसलमानांनीही जशीच्या तशी उचलली आणि कित्येक अडाणी हिंदूच नव्हेत तर कट्टर हिंदुत्ववादी मित्रही अर्थ समजून न घेता हीच पद्धत पुढे चालवित आहेत!

    २) हिंदू धर्म सांगतो —

    ‘वासांसि जीर्णानि यथा विहाय नवाणि गृह्णाति नरोऽपराणि ।
    तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवाणि देही ।।’
    (गीता, २/२२)
    अर्थात आपण ज्याप्रमाणे वस्त्रे जुनी झाल्यावर ती टाकून नवीन वस्त्रे घालतो, त्याचप्रमाणे शरीर जुने झाल्यावर देही (देह धारण करणारा – आत्मा) ते टाकून नवीन देह परिधान करतो!

    मृत्यूच्या प्रसंगी शरीरातून काहीतरी निघून जाते, हे वैज्ञानिक स्तरावर सारेच मान्य करतात. परंतू हिंदूंनी सहस्रावधी वर्षांपूर्वीच त्या संकल्पनेसाठी ‘देही’ असा शब्द योजून आपला द्रष्टेपणा दाखवून दिला आहे. आईन्स्टाईन ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सांगतो. त्याआधारे ऊर्जा नष्ट होत नाही, तर तिचे केवळ एका प्रकारातून दुसऱ्यात रुपांतर तेवढे होते. त्यालाच अनुसरून हा चैतन्यरूप देही एकदा निघून गेला की, तो दुसऱ्या प्रकारात रुपांतरीत व्हावयास हवा. परंतू शरीर धारण करणे हा त्याचा गुणधर्म असल्याने तो शरीरच धारण करतो! या संकल्पनेत आणखी एक संकल्पना मिसळली जाते ती म्हणजे पाप-पुण्य! ज्याच्या त्याच्या कर्मांनी देही नंतर कोणते शरीर धारण करणार हे ठरते. यात सर्वच सजीव सृष्टी येते – ८४ लक्ष योनी!! यात झाडाझुडपांसहीत सर्वच सजीव, सजीव असण्याचे आणि नियमबद्ध असण्याचे उत्तर मिळते!

    परंतू देहीचे जाणे आणि दुसरे शरीर धारण करणे यात जो काळ जातो, तो त्या देहीला त्याच्या पाप-पुण्याच्या हिशोबात भोगायचा असतो. पापाचे पारडे जड असेल, तर देही जास्त लांब जाऊ शकणार नाही. इथेच घुटमळत राहील – परंतू वाईट अवस्थेत. पुण्याचे पारडे जड असेल तरीही देही ते भोगून परत इथेच घुटमळेल! म्हणूनच हिंदू संस्कृती पाप आणि पुण्य दोन्हीही शून्यावर यावे यासाठी ‘निष्काम कर्मयोग’ सांगते! तरच देहीला घर्षणरहित गती प्राप्त होईल ना! तर थोडक्यात हा प्रवास आहे. यात आप्तजनांच्या आणि शुभचिंतकांच्या शुभेच्छांचा खूप मोठा वाटा आहे.

    पण आपण काय करतो? आपण त्या आत्म्याला शुभेच्छा देण्याऐवजी ‘चिरशांति लाभो’ म्हणतो आणि नकळतच त्याच्या प्रवासाला चाप लावतो! एखादी ऊर्जा प्रवासाला निघते आणि आपण मात्र आपल्या प्रार्थनेची कळ दाबून तिला स्तब्ध राहायला सांगतो! यावर जर कुणाचा विश्वासच नसेल, तर माझे काहीच म्हणणे नाही (मग अश्या परिस्थितीत काहीही – अगदी RIP म्हणण्याची तरी औपचारिकता कश्यासाठी दाखवायची मग उगाच?). परंतू जर तुम्ही स्वत:ला हिंदू म्हणवून घेत असाल तर तुमचे हे वागणे धर्माविरुद्ध तर आहेच, सोबत अनेक वैज्ञानिक सिद्धांतांच्याही विरुद्ध आहे.

    आता प्रश्न उभा राहील की, RIP नसेल म्हणायचे तर मग काय म्हणायचे? याचेही उत्तर आहे. हा केवळ दृष्टीकोनाचा फरक आहे मित्रांनो. पाश्चात्य लोक कुणाची आठवण काढल्या-काढल्या ती व्यक्ती समोर आली तर गमतीने म्हणतात – Think of the devil & devil is here याउलट आपण म्हणतो ‘शंभर वर्षं आयुष्य आहे तुम्हाला’!! आहे की नाही दृष्टीकोनाचा फरक! तद्वतच ‘चिरशांति लाभो’ ऐवजी आपल्याकडे म्हणतात “गतात्म्यास सद्गती लाभो” – May The Soul Attain Sadgati. याचेही लघुरुप करून AS असे म्हणता येईलच की! RIP पेक्षा छोटे आणि सोप्पे!!

    तर अशी ही सद्गतीची संकल्पना आणि दृष्टीकोन! ज्यांचा या कश्यावरच विश्वास नाही, परमेश्वर त्यांचे भले करो. मात्र ज्यांचा हिंदू धर्मावर आणि त्यातील वैज्ञानिकतेवर विश्वास आहे, ती मंडळी तरी याउप्पर RIP चा रिप-रिप पाऊस थांबवून ‘सद्गती लाभो’ (AS) असे सार्थपणे म्हणतील, अशी अपेक्षा!!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी व आपल्या परिसरांत अनेकानेक विषयांवर लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी क्लिक करा – www.vikramedke.com)

  • नूर-ए-जहाँ

    जब पलकोंके नीले परदे उठे,
    तो दुनिया रौशन हुई,
    मेरी राह जैसे, तुझसे कौसर हुई..!
    जब चाहतमें तेरी राहत मिले,
    तो चुमूँ परछाईयाँ,
    ये हसीं खुमारी, मुझको क्योंकर हुई..!
    तु बेखबर, मैं बेसबर..
    फिर कैसे हो, दिलका बसर..
    अजनबी झौंकेपे ‘मैं’ उड चला..!
    नूर-ए-जहाँ, नूर-ए-जहाँ..
    तू सामने, दूर हैं जहाँ..!
    तुझसे शुरू.. तुझपे खतम,
    इतनाही हैं मेरा जहाँ..!

    – © विक्रम
    (www.vikramedke.com)

    image

  • कथा

    जुनी गोष्ट आहे. त्याकाळी खूप फळं होते. परंतू सफरचंद सगळ्यांमध्येच सर्वश्रेष्ठ होते. त्याचा रंग, आकार, चव सारे काही दैवी! लोकांनाही इतर फळेही आवडायची, मात्र सफरचंद सगळ्यात जास्त आवडायचे.

    काळ पुढे पुढे जात राहिला. काही वर्षांनी एक नवीन फळ आले – आंबा! त्याची चव, रंग, आकार, सुवास सारेच निराळे! नुसता जवळ घेतला तरी मन मोहरून जायचे अक्षरशः! साहजिकच कित्येक सफरचंद-रसिक आंब्याकडे वळले. त्यांना आता आंबाच सर्वश्रेष्ठ वाटू लागला. आंबा होताच तेवढा गुणी!! परंतू यासोबतच आणखीही काही घटना घडल्या. ज्यांनी केवळ आणि केवळ सफरचंदालाच आपल्या ह्रदयसिंहासनी बसवले होते, ते केवळ सफरचंदाशीच निष्ठावान राहिले. त्यांच्या दृष्टीने आंबा मुळातच चुकीचा, निकृष्ट ठरला. त्यांनी त्याला नावे ठेवायलाही सुरुवात केली. नाही नाही ते बोलायला सुरुवात केली. काही रसिक मात्र दोन्हीही फळांचे सारखेच दिवाने झाले होते. त्यांना काय, चव चांगली असण्याशी मतलब. याखेरीज केवळ आंब्याशीच निष्ठावान असणाऱ्या रसिकांचाही एक गट हळुहळू तयार होऊ लागला होताच! त्याही मंडळींचे सफरचंद-निष्ठांसारखेच सूत्र होते — आंबा तेवढा श्रेष्ठ, बाकी सारेच निकृष्ट!!

    दरम्यान आणखीही एक घटना घडली. इतर फळांना आंब्याला मिळालेले यश पाहून कमालीचा हेवा वाटू लागला होता. सफरचंदाची इतक्या वर्षांची मक्तेदारी आपल्याला लाख प्रयत्न करूनही मोडता आली नव्हती, पण या काल आलेल्या पोराने – या आंब्याने ती पहिल्या झटक्यातच मोडून काढली; नव्हे तर स्वत:चे अढळस्थानही स्थापित केले — हे त्यांच्या रागाचे मूळ कारण होते! अश्यातच कुणा एका फळाच्या मेंदूत कल्पना चमकली! त्याने थोडा अभ्यास केला, समजून घेतले आणि स्वत:ला आंब्याचा वेष घेतला. थोड्याफार प्रयत्नाने चवीचीही नक्कल जमवून आणली! मुळातच माल नकली असल्याने किंमतही कमीच होती. चव आणि इतर अनुभवही अगदी जसाच्या तसा नसला तरीदेखील जवळजवळ सारखाच होता. साहजिकच ज्यांना आंबा परवडत नव्हता वा ज्यांच्यात मोसम येईपर्यंत थांबण्याचा संयम नव्हता, असे सारेच लोक या नकली आंब्याकडे धाव घेऊ लागले! तुफान चालू लागला हा नकली आंबा. पण काही दिवसच. कारण ही क्लृप्ती आता इतरही फळांना समजली होती. हा हा म्हणता म्हणता बाजारात या नकली आंब्यांचे पेवच फुटले. सगळ्या फळांनी आंब्याच्या लोकप्रियतेच्या या वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला सुरुवात केली. सगळी फळं आपली मूळची, खरीखुरी चव विसरून आंबा होण्याच्या पाठी लागले होते. अपवाद केवळ — सफरचंदाचा! कितीही नाही म्हटलं तरी तो एकेकाळचा राजा होता. काळ अनुकूल असला की स्वयंप्रज्ञा नसलेली मंडळी अशीच नकला करतात, हे त्यानेही पूर्वी कधीकाळी अनुभवलेले होते. एवढेच नव्हे, तर एकच एक चव सगळीकडून मिळत राहिली, तर लोक त्या चवीलाच कंटाळतात हे त्याला पक्के ठाऊक होते! त्यामुळे तो नेटाने त्याची मूळ चव संपूर्ण ताकदीनिशी देतच राहिला, रसिकांना तृप्त करतच राहिला!

    इकडे खरा आंबा मात्र अतिशय हैराण झाला होता. सगळीकडे त्याचीच चव निर्माण झाल्यामुळे त्याची किंमत आपोआपच कमी झाली होती. शिवाय त्याची चव मुळची असल्यामुळे तिच्यासाठी एक विशेष अशी प्रक्रिया होती. तिला वेळ लागायचा. बाजारात आता तिच चव खूपच कमी वेळात उपलब्ध होऊ लागल्यामुळे आंब्याला आता कुणीच विचारेनासं झालं होतं; ना कुणाला त्याच्या मोसमाची अन् प्रक्रियेची वाट पाहायची इच्छा उरली होती. फळबाजारातून आपले चंबूगबाळे आवरण्याखेरीज आंब्याकडे कोणताच मार्ग उरला नव्हता. की होता..?

    आंब्याने निश्चय केला, अशी सहजासहजी हार मानायची नाही. कल्पनातीत कष्टांतून तावून-सुलाखून हे स्थान मिळवलं होतं त्याने. खरीखुरी, मूळची चव ही जमेची बाजू होती त्याची. गाभा होता त्याचा. त्याने खूप विचारपूर्वक निर्णय घेतला. आपला खरेपणाचा आणि वेगळेपणाचा गाभा कायम ठेवला त्याने. आणि त्याभोवती एक स्वतंत्र शरीर गुंफू लागला तो. स्वतंत्र शरीर, नवे शरीर! आधीपेक्षाही जास्त मेहनत घेतली स्वत:वर. आधीपेक्षाही अधिक कष्टांतून गेला तो. पण अखेरिस त्याने यश मिळवलेच! आंब्याचे रुपांतर आता वेगळ्याच चवीच्या, वेगळ्याच रंगाच्या, वेगळ्याच सुगंधाच्या, कुणी स्वप्नातही ज्याची कधी कल्पना केली नसेल अश्या एका नव्याच फळात झाले — स्ट्रॉबेरी!!

    स्ट्रॉबेरी पूर्ण दिमाखानिशी बाजारात उतरला. तो अनुभव जरी दैवी देत असला, तरीही त्याची अंतर्गत रचना इतकी काही गुंतागुंतीची होती की, कुणीच त्याची नक्कल करू शकत नव्हते. आणि आता नक्कल केली तरी त्याला फरक पडणार नव्हता! कारण, त्याला माहिती होते की, आपला खरेपणा हीच आपली ताकद आहे. याच खरेपणाच्या जोरावर तो जसा आंब्यातून स्ट्रॉबेरी बनला तसाच उद्या गरज पडली तर आणखीही काही वेगळे बनेल. फक्त हिंमत हारून थांबणार नव्हता तो आता!

    लोक काय, सतत नवीन चवीच्या शोधात असतात. त्यामुळे बाजाराने या स्ट्रॉबेरीचेही जोशात स्वागत केले! शिवाय पूर्वीची आंबा असतानाची पुण्याईही होतीच की त्याच्यासोबत! अर्थात रसिकांमध्ये पुन्हा एकवार गट-तट पडले. काही रसिक ताबडतोब या नव्या स्ट्रॉबेरीचे दिवाने झाले, तर काही केवळ आंब्याशीच निष्ठावंत असल्याने त्यांनी स्ट्रॉबेरीला स्पर्श करणेही पाप मानले! तेच फळ, तेच रसिक — तरीही दृष्टीकोन मात्र वेगळाच. कुठे थोडा अहंकार, तर कुठे परिवर्तन नाकारण्याची वृत्ती! परंतू स्ट्रॉबेरीला आता कश्यानेच फरक पडणार नव्हता. त्याला अनुभवाने कळून चुकले होते की, चांगला अनुभव देणे एवढेच आपल्या हातात असते. बाकी सगळेच तात्पुरते! अपेक्षेप्रमाणेच हळुहळू केवळ स्ट्रॉबेरीच्या निष्ठावंतांचाही गट तयार झालाच! त्यांपैकी बहुतेकांना आंबाही मनापासून आवडत होता आणि स्ट्रॉबेरीही! स्ट्रॉबेरी आता सिद्ध होता — नवनवीन प्रयोग करण्यासाठी! त्यासोबतच सफरचंदही टिकून होता — आपली वैशिष्ट्यपूर्ण चव देत, रसिकांना सुखावत!!

    मित्रहो, उपरोक्त कथेत सफरचंद आहे — संगीतशिरोमणी इलयराजा! आंबा आहे — १९९२ ते २००३ पर्यंतचा ए. आर. रहमान! नकली आंबे आहेत — १९९८ ते २००३ दरम्यानचे जवळजवळ सारेच संगीतकार! आणि स्ट्रॉबेरी आहे — २००३ नंतरचा ए. आर. रहमान!!

    (‘ऑर्कुट’ भरात असण्याच्या काळात वाचलेल्या एका इंग्रजी रुपककथेचा स्मृतीच्या आधारे, स्वैर आणि भरपूर स्वातंत्र्य घेऊन केलेला अनुवाद. मूळ लेखक अज्ञात.)

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख/कथा वाचण्यासाठी व व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी संपर्क करा — www.vikramedke.com)

    image

  • गूढाचा काठ.. नवांगुळे

    नवांगुळेही ह्रदय नुरले तुझ्या ह्रदयापासुनि
    का परि ते अंतर इतुके वेडावते मज हासुनि

    सांजबावरे दोन विहंग वाट रोखूनि बसलेले
    सांग सखे तू जाशील कैसी अंतर त्यांसवे राखुनि

    मेघसावळ्या भ्रमराला काय खुळा मधुछंद असे
    मालती तरी उरते कुठे सर्वस्व तया अर्पुनि

    का वामी जखमा घेऊनि वावरतात बहाद्दर हे
    रिपू तरी हा कसा टाकेना क्षणात काळीज चिरुनि

    जळावयाचे आहे भास्करा तुझी परंतू साथ नसे
    का देशी रे उगा दिलासा तू किरणांची माळ गुंफुनि

    सूर आठवा फसवा नसे ठाऊक आहे ना हे तुला
    साद देता येशील धावत तू गूढाच्या काठावरुनि

    – © विक्रम श्रीराम एडके
    (www.vikramedke.com)

    image

  • ब्राझीलच्या कार्निव्हलमध्ये शिवशंभो — एक नवी सुरुवात?

    भारत देश किती जरी दांभिक-धर्मनिरपेक्षतेच्या गाळात रुतत असला, तरीही शेष जग कसे हळुहळू परंतू निश्चितपणे हिंदू धर्म, संस्कृती आणि हिंदुत्वाकडे आकर्षित होते आहे, याची अनेक उदाहरणे मी सातत्याने देत असतो. मग तो लिसा मिलर या अमेरिकन विदुषीचा “We Are All Hindus Now” हा अमेरिकेचे हिंदुत्वाकडे वाढते आकर्षण साधार सांगणारा लेख असो (लिंक: http://www.thedailybeast.com/newsweek/2009/08/14/we-are-all-hindus-now.html) वा कोस्टारिका देशाने पाडलेले श्रीगणेशाचे सुंदर नाणे असो वा घाना या आफ्रिकन देशात प्रतिवर्षी वाढत जाणारा गणेशोत्सवाचा प्रभाव असो (लिंक: http://www.patheos.com/blogs/drishtikone/2013/09/hinduism-growing-in-africa-without-proselytizing/) वा अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये सातत्याने चर्चेसचे मंदिरांमध्ये होत असलेले रुपांतर असो (लिंक: http://vikramedke.com/blog/churches-chi-hotayat-mandire-chahul-badalatya-pravahachi/) वा कॅलिफोर्नियात साजरा होणारा हिंदू-मास असो (लिंक: http://www.hafsite.org/CA_Declares_Oct_Hindu_American_Month) वा अन्य काही!

    आजही मी असेच एक अगदी अलिकडचे उदाहरण सादर करतोय. रिओ-दि-जानेरोचा सांबा-महोत्सव (कार्निव्हल) अवघ्या जगात प्रसिद्ध आहे. “रिओ” या इंग्रजी चित्रपटातही त्याचे अतिशय मनोवेधक दर्शन सर्वांनी घेतले आहे! यावर्षीही (३ मार्च २०१४) तो अतिशय उत्साहाने साजरा होतोय. विविध सांबा-कलाकार आणि स्थानिक मंडळी या महोत्सवात अतिशय उत्साहाने सहभागी होत असतात. विविध मूर्त्या, आराशी यांची मिरवणुकीत रेलचेल असते! यावर्षीही या मिरवणुकीत अनेक प्रकारच्या आराशी होत्या. परंतू सर्वांचे लक्ष वेधून घेत होती ती ‘सल्गिरो सांबा स्कुल’च्या आराशीतील मूर्ती! तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ती होती देवाधिदेव महादेवांची अतिप्रचंड आकाराची मूर्ती! आहे की नाही गंमत.

    इथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, ब्राझील हा एक ख्रिश्चन देश आहे. किंबहुना ख्रिस्ताची अतिप्रचंड मूर्ती याच रिओ शहरात आहे. तेथील वार्षिक महोत्सवात शिवशंकरांची मूर्ती समाविष्ट करावीशी वाटणे, ही हिंदुत्वाच्या दृष्टीने निश्चितच अत्यंत आशादायी आणि सकारात्मक बाब आहे! इतर अनेक देशांप्रमाणे ब्राझीलनेही हिंदुत्वाचा सनातन मार्ग अनुसरण्याची ही केवळ सुरुवात आहे. तरीही प्रश्न उरतोच की, सबंध जग हळूहळू या मार्गावर चालू लागताना ही हिंदुत्वाची गंगोत्री मूळात जिथून उगम पावली तो हिंदुस्थान खोट्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा कधी उतरवणार? अन्यथा देव न करो, परंतू भविष्यात परिस्थिती अशी होईल की, जगभरात सर्वत्र हिंदूच हिंदू दिसतील परंतू हिंदुत्वाच्या पितृभूत मात्र हिंदू औषधालाही सापडणार नाही. हे होता उपयोगी नाही. शेवटी आपला वारसा जपणं आणि तो वाढवणं आपल्याच हाती आहे, हो ना?

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्याने ऐकण्यासाठी क्लिक करा:  www.vikramedke.com)

    image

  • अंतरात्म्यात कळ उठवणारा — हायवे

    अंतरात्म्यात कळ उठवणारा — हायवे

    आज पहिल्यांदाच असं होतंय की मी एखाद्या चित्रपटाबद्दल लिहायला बसलोय, डोक्यात खूप वाक्यंही फिरतायत — हे सांगावं, ते सांगावं.. पण नेमकी सुरुवातच सुचत नाहीये. जिथे म्हणून कुठे सुरुवात करावीशी वाटतेय, तो प्रत्येकच मुद्दा शून्यवत् वाटतोय; मी जो अनुभव शब्दबद्ध करू पाहातोय, त्यापुढे साधा वाटतोय. एखादी कलाकृती पाहिली की कधीकधी काळजात सण्णकन् कळ उठते आणि तोंडातून आपसूकच ‘वाह..’ बाहेर पडते, परंतू क्वचितच असं होतं की, उठणारी कळ काळजातून न येता थेट आत्म्यातून येते आणि मग नकळतच त्या वेदनेला आवाज देणं ही गरज होऊन बसते. अशीच काहीशी विचित्र अवस्था “हायवे” पाहून झालीये माझी.

    एका प्रथितयश व्यावसायिकाच्या पोरीचे अपहरण होते आणि काही दिवसांतच तिला तिच्या जगापेक्षा त्या अपराध्यांचं जग आणि ते अपहरणकर्ते हवेहवेसे वाटू लागतात. किती साधीशी कल्पना. तद्दन फिल्मी! परंतू खरं सांगू? कोणतीही कलाकृती अभिजात ठरायची असेल, तर मुळात ती साधीशी असणं हेच फार महत्वाचं परिमाण असतं. खरं सौंदर्य अवडंबरात नसून निखळ साधेपणातच असतं! आणि हो, खरं स्वातंत्र्य हे बंधनातच असतं!  हेच इम्तियाज अलीचा “हायवे” सिद्ध करतो. मुळात या माणसाला अशी कथा पडद्यावर साकारावीशी वाटलीच कशी, हा मला पडलेला प्रश्न आहे — कारण, आजच्या इंस्टंट जमान्यात काहीतरी साधंसोपं आणि तरीही अंतर्मुख करून सोडणारं काही पाहायची सवयच उरलेली नाहीये आम्हाला. मग का वीरा त्रिपाठीचा (आलिया भट) प्रवास आमच्यासमोर मांडतोस बाबा? का टोचणी लावतोस? का आमच्या आजूबाजूच्या जगाचा खोटारडा बुरखा फाडतोस? कश्यासाठी? मी वाचलंय की, इम्तियाजला या चित्रपटाद्वारे त्याच्या करियरची सुरुवात करायची होती. मग का इतका वेळ लावलास भाऊ? आता या चित्रपटापुढे तुझे (फक्त तुझेच नव्हे, तर बऱ्याच तथाकथित महान दिग्दर्शकांचे बरेचसे!) इतर सारेच चित्रपट निष्प्रभ वाटू लागलेत की रे! आता याला जबाबदार कोण? सिनेमातून अध्यात्म मांडायला माझी काहीच हरकत नाही रे बाबा, पण ते इतकं अंगावर येणारं — संवेदनांच्या थोबाडीत मारणारं..? असा कॅमेरा वापरावा? असं संपादन करावं? अरे इतकं चांगलं असं काही पाहायची — तेही मुख्य प्रवाहातील व्यावसायिक चित्रपटांत — सवय नाही रे आम्हाला.. आम्ही आपली ठरवून काही ठरलेल्या चित्रपटकारांच्या कृतीला चांगले म्हणणारी दांभिक माणसं.. तू मात्र सगळ्या व्याख्याच बदलून टाकतोयस आमच्या!

    सरळसोट पाहायला गेलं तर महाबीर भाटी (रणदीप हुडा)  आणि त्याच्या टोळीने वीरा त्रिपाठीचं अपहरण केलंय आणि ते लपतछपत वेगवेगळ्या राज्यांतून पळतायत. जुगनी — मोठा सुरेख शब्द वापरलाय ईर्शाद कामिलने — त्या जुगनीला अपह्रत करून आपणही या दुनियादारीत असेच लपतछपत फिरत असतो की! सुरुवातीला भीतीच्या छायेत वावरत निमूटपणे ते नेतील तिकडे जाणाऱ्या वीराच्या मागे हे अपहरणकर्तेच कसे आणि कधी गुपचुप चालू लागतात समजतही नाही. हळूहळू टोळीतला एकेक सदस्य गळू लागतो आणि अखेरिस उरतात दोघेच — वीरा आणि महाबीर! हा जितका वीराच्या आत्मबोधाचा प्रवास आहे, तितकाच तो महाबीरचाही आहेच ना! वीराला जशी आत्मिक स्वातंत्र्याची ऊर्मी आहे तितकीच अवघ्या जगाला गरीब-श्रीमंत भेदात तोलणाऱ्या आणि साऱ्या दुनियेला पाण्यात पाहाणाऱ्या महाबीरलादेखील आईच्या ऊबदार कुशीची लालसा आहे. एकदा का मोकळा श्वास अनुभवला की, वीराचा शोध संपेल आणि एकदा का ती मायेची ऊब अनुभवली की, महाबीरचाही! कोण कुठला तो अनोळखी महाबीर पण त्याला आपल्या लहानपणी घडलेला, मनाच्या डोहात खोलवर बुडवून टाकलेला प्रसंग सांगावासा वाटतो वीराला. आणि घर सांभाळणारी वीरा पाहून तीन खून पचवलेला महाबीर कसल्याश्या अनामिक वेदनेने हुंदके देत ढसढसा रडतो — शरीराने तिला बिलगतो पण तोंडाने मात्र ‘अम्मा.. अम्मा..’ म्हणतो. सतत जवळ बाळगलेली बंदुकही फेकून देतो. तीदेखील कित्येकदा संधी मिळूनही परत जात नाहीच ना! पण अखेरिस..

    महाबीर वीराला म्हणतो, घरी निघून जा तुझ्या. ती ऐकत नाही. तो विवश होतो. चिडून ओरडतो, ‘तो क्या करेगी मेरे साथ रहके? शादी करेगी? बच्चे पालेगी मेरे”? ती प्रांजळपणे सांगते, “शादी का कोई प्लान नहीं हैं. बच्चे पालनेकाभी नहीं. बस चाहती हूँ ये थोडा और चले.. थोडा और..”. आणखी एका प्रसंगात ती म्हणते, ‘जिथून तू मला आणलंस तिकडं परत जायचं नाहीये मला आणि जिकडे कुठे घेऊन चाललायस तिकडं पोहोचायची इच्छा नाहीये. असं वाटतं हा प्रवास कधी संपूच नये”. कदाचित तिच्या जगातल्या लांडग्यांपेक्षा हा भयावह आणि कठोर वाटणारा पण प्रत्यक्षात माणूसकीचा खळाळता झरा असणारा महाबीरच तिला आश्वासक वाटला असेल. नाहीतरी तिचा होणारा नवरा असंबद्ध बडबडत पळूनच गेला होता ना? आणि इकडे अपहरण करणारा महाबीर मात्र तिचं सतत रक्षण करत होता. न बोलता, न अवडंबर माजवता. त्याच्या टोळीतला एकजण तिच्यावर अतिप्रसंग करू पाहातो, त्यावेळचं महाबीरचं समतोल वागणं आणि रणदीपचा तो अभिनय खरोखरच जबरदस्त!

    आलिया भटबाबत मी कधी हे लिहीन असं खरंच वाटत नाहीये, पण पोरीने नैसर्गिक अभिनयाची परिसीमा गाठलीये. आणि रणदीप हुडानेही अगदी कायच्याकाय कमाल अभिनय केलाय! मात्र यात पुन्हा इम्तियाज अलीचेच कौतुक करावेसे वाटतेय की त्याने निवडलेले हे दोघेही त्या त्या भूमिकेसाठी इतके योग्य आहेत की बहुधा त्यांना वेगळं काही करावंच लागलेलं नाहीये. इतकी परिपूर्ण पात्रयोजना मी गेल्या कित्येक वर्षांत पाहिलेली नाही. आणि हो, चित्रपटात दाखवलेली ती ६ शहरंदेखील मुख्य पात्रांइतकीच महत्वाची आहेत बरं का! अर्थात नाही म्हणायला गालबोट म्हणून एक गोष्ट खटकते ती म्हणजे इम्तियाजची वीरा खूपश्या ठिकाणी गीतच (जब वी मेट) वाटते. पण इतक्या सुंदर कलाकृतीला अश्या शेकडो त्रुटी (चुका नव्हेत!) माफ आहेत!

    संगीताबाबत काय बोलू? रहमान तर देवच आहे खरोखर. चित्रपटातल्या गीतांसाठी इतक्या सुरेख जागा असू शकतात यावर विश्वासच बसत नाही. त्याचबरोबर रहमान अनेकदा चित्रपटापेक्षा इतका मोठा होतो की, काही सन्माननीय अपवाद वगळता कुणीच त्याच्या संगीताला पडद्यावर न्याय देऊ शकत नाही; ही मला गेली कित्येक वर्षं सलणारी तक्रार “हायवे”ने पार धुवून टाकलीये! आणि पार्श्वसंगीत.. ती तर प्रत्यक्ष चित्रपटगृहातच अनुभवण्याची — त्या स्वर्गीय लाटांत हरवून जाण्याची बाब आहे! अर्थात यात रेसूल पोकुट्टीच्या दैवी ध्वनिसंयोजनाचाही अतिशय महत्वाचा वाटा आहे. परंतू कित्येक प्रसंगांना पार्श्वसंगीतच न देऊन रहमानने त्यांची खोली अधिकच वाढवलीये — अभिव्यक्ती अधिकच गडद केलीये! शिवाय रहमानभक्तांसाठी बातमी म्हणजे चित्रपटात ‘माही वे’मध्ये काही वेगळ्याच ओळी आहेत आणि ‘तू कुजा’चं तर थेट ‘मेल व्हर्जन’च आहे!

    असो. लेख अपेक्षेपेक्षा खूपच मोठा होतोय. पण तरीही प्रामाणिकपणे सांगतो की, या चित्रपटाचं श्रेष्ठत्व एक टक्काही मांडता आलेलं नाहीये मला. खरोखर यावर्षीच्या चांगल्या चित्रपटांच्या यादीत “हायवे”चं नाव निश्चितच खूप वर असेल! चित्रपटगृहात जाऊन पाहावा, एकदा नव्हे तर पुन्हापुन्हा पाहावा, अनुभवावा — असा चित्रपट!!

    *४.७५/५

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी क्लिक करा – www.vikramedke.com)

  • एक कविता तुझ्यासाठी..!

    एक कविता तुझ्यासाठी..!

    पापण्यांच्या पाकळ्यांमध्ये, स्वप्नात्तरांचे प्याले रिते!
    ध्यास उसळी मारताना, मग का कश्याला तू भिते?

    मेघ छेदूनी किरणांची, मांड रास अवनीवरी!
    बघ उसासे टाकताना, धरणी काय विनविते!

    तुज ठाऊक आहे ना ती, घर्मबिंदूंची उष्ण नदी?
    अपयशांचे जी कराल, क्षणार्धात डोह पिते!

    भलेतरी नसशील तू, तेजोभास्कर अस्मानीचा!
    तू बन पणती अशी जी, जळुनी जगां उजळिते!

    – © विक्रम.

    (www.vikramedke.com)

  • एक डाव चाणक्याचा..!

    एक डाव चाणक्याचा..!

    image

    जातीच्याच अनुषंगाने बोलायचं झालं, तर नरेंद्र मोदी मागासवर्गीय आहेत. ही गोष्ट मला खूप पूर्वीपासून माहिती होती. कदाचित आपल्यापैकीही बहुतेकांना माहिती असेल. परंतू स्वतः मोदींनी या बाबीचा कधीही जाहीरपणे उल्लेख केला नव्हता. मला गंमत वाटायची. या अनुल्लेखामागची खेळीही लक्षात यायची. ते वाट पाहात होते की, कधी आपल्या या मौनामुळे अस्वस्थ होऊन विरोधक स्वत:च ही बाब चर्चेत आणतील. परवा काँग्रेसच्या बैठकीत मोदींना या बाबतीत लहानसे सूत सापडले, आणि मोदींमधील कसलेल्या राजकारण्याने ते सूत घट्ट पकडत थेट स्वर्ग गाठला.

    परिणाम? आज भाजपच्या बैठकीमध्ये इतक्या वर्षांत पहिल्यांदाच मोदींनी स्वत:च्या मागासवर्गीय असल्याचा उल्लेख केला आणि मोठ्या खुबीने दाखवून दिलं की, ‘मी मागासवर्गीय आहे, खालच्या जातीतून आलोय म्हणून हे सत्तेच्या मदाने उन्मत्त राजघराणे माझ्याशी लढायला पुढे येत नाहीत – कमीपणा समजतात”!

    मेंदूला अक्षरशः झिणझिण्या आल्या माझ्या! वाटलं, काय पोहोचलेला माणूस असेल हा की, विरोधकांनी चेंडू टाकण्याची सुतराम शक्यता नसताना त्यांना चेंडू टाकायला लावून, नव्हे नव्हे, तर आपल्याला पाहिजे तसाच आणि त्याच ठिकाणी टाकायला लावून या माणसाने खाड्कन षटकार ठोकला! ‘आम्ही मोदींना किंमत देत नाही’ हा जो काही आटापिटा विरोधकांनी गेले काही दिवस चालवलाय त्याचा मोदी असा अन्वयार्थ लावतील, एवढेच नव्हे तर तो जाहीरपणे मांडतील हे ना कुणा काँग्रेसी नेत्याच्या स्वप्नात आलं असेल ना पाचशे कोटी घेऊन पप्पूची आश्वासक छवी बनवायला निघालेल्या त्या पीआर कंपनीच्या! बरं, बोलायची सोय नाही – कारण स्वत:ला किती जरी धर्मनिरपेक्ष म्हणवलं तरीही या पाखंडी पक्षांचं राजकारण जाती आणि धर्माच्याच गणितांवर चालतं, हे उघड गुपित आहे. त्यामुळे आज मोदींनी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्यावर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यापलिकडे त्यांच्या हातात काहीच राहाणार नाही – कारण, बोललो तर पुन्हा ‘ती’ मागासवर्गीय मतं जाण्याची भीती. दलित राजकारण करणाऱ्या पक्षांना मोदी अजिबातच मोजत नसले, तरी त्या ही पक्षांना मोदींच्या या विधानाचा फटका हमखास बसणार!

    मुळात भारतीय जनमानसाने ‘जात’ किती जरी नाही म्हटलं तरी खोलवर कुठेतरी जपून ठेवलीये. प्रत्येकाच्या मनात आत कुठे ना कुठे ही जातीय अस्मिता तेवत असतेच. मोदींनी ही मानसिकता अश्या काही कौशल्याने वापरून घेतलीये की, मोदी कुणालाही थेटपणे जातीयवादी तर वाटणार नाहीतच, परंतू विरोधकांना मागासवर्गीय मतांचा फटका मात्र बरोब्बर बसेल!

    मी मोदींची तुलना कायम रजनीकांतशी करतो. रजनीला जसे सिनेमाच्या पडद्यावर काहीच अशक्य नसते, तद्वतच मोदींना भारतीय राजकारणात काहीच अशक्य नाही. दोन्हीचे कारण एकच – भारतीय जनमानसाची नाडी माहिती असणे! हा सूक्ष्म अभ्यास आपोआपच अचूक टायमिंग पुरवतो. मात्र आज मला मोदींची तुलना आचार्य चाणक्यांशी करावीशी वाटतेय. चाणक्यांनी जो शत्रूची बलस्थानेच शत्रूविरुद्ध वापरण्याचा आणि आपली मर्मस्थानेच बलस्थानात परिवर्तित करण्याचा जो मंत्र दिला, त्याचे तंतोतंत अनुसरण मोदी करत आहेत – किंबहूना त्या मंत्रात सुधारणा करून ते हाती येईल ती प्रत्येक गोष्ट विरोधकांविरुद्ध वापरताहेत! हे अतिशय विजिगीषू लक्षण आहे. हे भारतीय समाजाला मनापासून आवडणाऱ्या ‘अचाट शक्तीचा महानायक’ या संकल्पनेचे लक्षण आहे! असा महानायक जो बोजड तांत्रिक गोष्टी सांगत बसत नाही, तर सर्वसामान्यांना समजतील अशी स्वप्ने दाखवतो – त्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला शिकवतो आणि एका क्षणानंतर तर ते स्वप्न आपलं स्वत:चंच आहे यावरही गाढ विश्वास बसवतो! कल्पना करा, जो माणूस एकहाती सव्वाशे वर्ष जुन्या संघटनेला धूळ चारू शकतो, तो माणूस जर उद्या देशाचा पंतप्रधान झाला तर देशाच्या शत्रूंची काय अवस्था करेल!! या कल्पनेतच “वोट फॉर इण्डिया”ची बीजे सामावलेली आहेत. आणि माझी खात्री आहे की, येत्या निवडणुकीत प्रत्येक तरुण मतदार याच कल्पनेला उराशी बाळगून मतदान करणार आहे. मोदींसाठी नव्हे, तर त्यांच्या आणि स्वत:च्या स्वप्नातल्या भारतासाठी!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्याने ऐकण्यासाठी क्लिक करा – www.vikramedke.com)

  • देवा..

    देवा..

    image

    जिंदगीसे हारके
    या कोई बाजी मारके
    जब आता हूँ तुम तक
    तुम वैसे ही मिलते हो देवा..!
    वही मुस्कुराहट
    वही चरणोंमें राहत
    तुम वैसेही दिखते हो देवा..!

    शिकंजेमें फडफडाता पंछी
    तुम दूर खडे हँसते हो
    मैं हारकर बेबस हो जाऊँ
    तो पंखोंमें आ बसते हो
    और टूट जाता हैं शिकंजा
    तुम खुशी बन चीखते हो देवा..!
    तुम वैसेही मिलते हो देवा..!
    वही मुस्कुराहट
    वही चरणोंमें राहत
    तुम वैसेही दिखते हो देवा..!

    जिंदगी अंधेरी सुरंग जब
    तुम दिलमें जलती मशाल हो
    बवंडरमें फँस जाता हूँ
    तुम भरोसेका भोकाल हो
    तुम हौसलेका बनके दिया
    इरादोंमें अमूमन जलते हो देवा..!
    तुम वैसेही मिलते हो देवा..!
    वही मुस्कुराहट
    वही चरणोंमें राहत
    तुम वैसेही दिखते हो देवा..!

    – © विक्रम
    (www.vikramedke.com)