Author: Vikram Edke

  • अनाठायी टीका नकोच!!

    समजा आपल्या देशाने एखादा जिहादी आतंकवादी पकडला. त्याची रोज चौकशीही होतेय. तो रोज त्याच्या थोड्या थोड्या साथीदारांची नावेही सांगतोय. परंतु तरीही चौकशी पूर्ण होण्याच्या आत शासन त्या लोकांची नावं जाहीर करतं का हो? नाही करत! का? अहो कारण सोप्पं आहे. अर्धवट माहितीच्या आधारे नावं जाहीर केली, तर तो ज्यांची नावे घेणार आहे ते अपराधी सावध नाही का होणार! जिथे मोठ्ठा समूह हाती लागण्याची शक्यता आहे, तिथे चार-दोन छोटे मासे पकडून समाधान मानावं लागेल. त्यामुळे कोणतंही शासन अशी नावं चौकशीच्या दरम्यान जाहीर करत नाही. किंबहूना कुणाची चौकशी चाललीये आणि ती कोणत्या दिशेने चाललीये, हेही सांगितलं जात नाही. हे झालं जरासं अवघड उदाहरण. मला जो मुद्दा मांडायचाय तो आणखी सोपा करून सांगतो. समजा माझ्याकडे रोज एक सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे. तर मी ‘तिचं पोट फाडून सारीच अंडी पळवूयात’ असा मूर्ख विचार करेन का हो? कधीच नाही. अगदी पप्पूबाबाही असला वेडाचार करणार नाही!

    हेच नेमकं भारत सरकार स्विस बँकेतील खातेधारकांच्या संदर्भात करतंय. आज शासनाचे ऍटर्नी श्री. मुकुल रोहत्गींनी जे आवेदन दाखल केले, त्यात असं स्पष्टपणे म्हटलंय की, ज्यांच्याविरोधात चौकशी चालू नाही अश्या कुणाचीच नावे उघड करता येणार नाहीत. आणि चौकशी चालू असेपर्यंत तर कुणाचीच नावे उघड करता येणार नाहीत. याचा अर्थ विरोधकांनी आणि अर्धवट फेसबुकराव व ट्विटकरांनी ताबडतोब असा लावायला सुरुवात केली, की मोदीसरकारने काळापैसाधारकांची नावे उघड करायला नकार दिला अथवा मोदीसरकार त्या खातेधारकांना पाठिशी घालतेय. असं अजिबातच नाहीये. ना श्री. रोहत्गींच्या आवेदनातून तसे सूचित होतेय. त्यांचं म्हणणं केवळ एवढंच आहे की, सर्वच खातेधारकांची नावे उघड करता येणार नाहीत – फक्त ज्यांच्याविरोधात भारताचा आक्षेप आहे त्यांचीच नावे उघड करता येतील. तीही त्यांच्याविरोधातली चौकशी पूर्ण झाल्यावरच!

    असे का म्हटले असावे बरं त्यांनी? यामागे कारण आहे मित्रांनो. आणि त्या कारणाचं नाव आहे ‘डबल टॅक्सेशन अव्हॉईडंस ऍग्रीमेंट’ नावाचा आंतरराष्ट्रीय करार. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा करार अनेक देशामध्ये आहे. जरी हा करार करयोजनेच्या नावाखाली असला, तरी प्रत्यक्षात या करारातून दोन्हीही संलग्न देशांना एकमेकांच्या देशांमध्ये बँकखाते उघडलेल्या नागरिकांची माहिती काही अटींची पूर्तता करून मिळते. तसा करार भारत व जर्मनीदरम्यान आहे. त्यानुसार आपल्याला लिंचेन्स्टाईन बँकेत काळापैसा जमा केलेल्या भारतीय खातेधारकांची नावेही मिळणार आहेत. परंतु नुसते दुसऱ्या कोणत्या देशात बँक खाते असणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही ना! त्यामुळे आपल्याकडील सर्वच खातेधारकांची नावे सरसकट सांगण्याला जर्मनीने नकार दिलाय आणि त्यांची बाजू याबाबतीत शतप्रतिशत बरोबरच आहे! आपल्याला ज्या कुणा विशिष्ट लोकांच्या खात्यांची माहिती हवी आहे, त्यांची माहिती आपल्याला देण्यात येणारच आहे. मग ती माहिती भारत सरकार उघड करेलच. मात्र चौकशीअंती! कारण याबाबतीत जनतेच्या भावना काही जरी असल्या तरीही आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वावरताना तिथले नियम काटेकोरपणे पाळणं आपल्याला भागच आहे. मग सरकारला त्या लोकांची नावे मुळात समजतातच कुठून असाही प्रश्न कुणीतरी विचारेल. याचं उत्तर मोठं ‘अर्थ’पूर्ण आहे, एवढंच मी याक्षणी सांगू शकतो. अशी ‘अर्थ’पूर्ण गोष्ट सरकार देशहितासाठी वारंवार करत असते! शिवाय एकाची माहिती मिळाली की, त्याच्यावर दबाव (!!) टाकून इतरांची माहितीही मिळवता येते.

    या गोष्टीला अजून एक पैलू आहे. सदरचा ‘डबल टॅक्सेशन अव्हॉईडंस ऍग्रीमेंट’ हा करार आपले सरकार लवकरच अन्य काही देशांबरोबरही करणार आहे, जेणेकरून तेथील काळापैसाधारकांची माहितीही आपल्याला मिळू शकेल. आता तुम्हीच विचार करा, समजा जर्मनीच्या बाबतीतच आपण लोकभावनेपुढे वाहावत जाऊन धसमुसळेपणा केला, तर इतर देश आपल्याला माहिती देतील का? माहिती तर सोडाच, आपल्यासोबत मुळात असा काही करार तरी करतील का? नाहीच! असे हे सारे गौडबंगाल आहे. ही एक प्रक्रिया आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियमांच्या व कायद्यांच्या जंजाळातून शिताफीने मार्ग काढतच पुढे जावे लागणार आहे. या सगळ्याला वेळ लागतो मित्रांनो! ही बाब स्वत: पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीदेखील व्यवस्थित जाणून आहेत, म्हणूनच लोकसभा प्रचाराच्या काळात स्वामी रामदेवांसारखी मंडळी अनेकदा ‘शंभर दिवसांत काळा पैसा परत आणू’ वगैरे वल्गना करीत असताना, मोदींनी स्वत: कधीही मते मिळवण्यासाठीसुद्धा तसे खोटे आश्वासन दिले नव्हते. त्यांचे म्हणणे एवढेच होते की, सत्तेवर आल्याबरोब्बर याबाबतीत पावले उचलेन आणि ते आश्वासन ते व्यवस्थित पाळताहेत. आजच्या प्रकाराबाबतीत श्री. जेठमलानी व खान्ग्रेसी मंडळी मोदीसरकारवर सडकून टीका करताहेत. परंतु आपण लक्षात घेतले पाहिजे की, त्या लोकांपैकी श्री. जेठमलानींना त्यांनी दाखल केलेली जनहित-याचिका जिंकायचीये तर खान्ग्रेसींना सरकारवर टीका करायचा काही ना काही बहाणाच हवा आहे. त्यांचं कामच आहे हे. अश्या प्रेरित टीकेला बळी पडायचं की नाही, हे आपण ठरवायचंय. आपण लोकांनी खरं तर अश्या नाजुक बाबींमध्ये संयम पाळायला शिकलं पाहिजे. दुसरं असं की, त्यांच्यावर अजिबात टीकाच न करायला मोदी म्हणजे काही कुणी देव नाही लागून गेले. टीका व्हावी. जिथे चूक असेल तिथे जोरदार टीका व्हावी. परंतु राजकारण, आंतरराष्ट्रीय कायदे जाणून न घेता अशी अनाठायी टीका करणं म्हणजे शुद्ध वेडेपणा ठरेल. नव्हे, समीक्षक व समर्थक दोन्हीही नात्यांनी स्वत:च स्वत:ची किंमत कमी करून घेणे ठरेल. हे होता कामा नये. अंकुश असावा, परंतु डोळसच!!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

    image

  • पहिले ते ‘हरिकथानिरुपण’, दुसरे ते ‘राजकारण’!!

    प्रभू रामचंद्रांनी जेव्हा सीतामाईचा परित्याग केला, तेव्हा त्या बिचाऱ्या ऋषी वाल्मिकींकडे आश्रयासाठी राहिल्या. वाल्मिकींनी जाणले की, राजाचे कर्तव्य म्हणून श्रीरामांना सीतेचा त्याग करणे आवश्यकच होते, परंतू त्यापोटी सीतेवर झालेला अन्यायही अस्वस्थ करून सोडणारा होता. वाल्मिकींनी सीतेला ठेवून घेतले. लव-कुशांचा जन्म झाला. त्यांचेही वाल्मिकींनी यथासांग संगोपन-शिक्षण केले. त्यांना ‘रामायण’ शिकवले. आणि योग्य वेळ येताच श्रीरामांच्या राज्यातील यज्ञाचे निमित्त करून दोन्हीही पोरांना तिकडे रामकथा गाण्यासाठी पाठवले. दोन गोजिरवाणी पोरं! अयोध्येत सगळीकडे फिरायची. चौका-चौकात, पारा-पारांवर अस्खलित संस्कृतमध्ये रामकथा गायची. लोक भावविभोर व्हायचे. मंत्रमुग्ध व्हायचे. नकळत ही दोन्ही पोरं कित्ती रामासारखी दिसतात, अशी तुलनाही सुरू व्हायची त्यांच्या मनांत! मात्र वाल्मिकींनी सक्त ताकीद दिली होती दोघांना की, कुणीही किती जरी खोदून-खोदून विचारले तरीही आपले वडील कोण ते सांगायचे नाही. फार-फार तर ‘आम्ही वाल्मिकींचे शिष्य आहोत’, एवढेच सांगायचे! झाले!! पोरांची कीर्ती हळूहळू सर्व राज्यभर पसरली. यथावकाश स्वत: रामाकडून त्यांना बोलावणे आले. पोरं भर दरबारात प्रत्यक्ष प्रभू राम, लक्ष्मण, भरत, शत्रूघ्नांसमोर रामकथा गायली. कथा ऐकताना, विशेषतः सीतात्यागाचा प्रसंग ऐकताना साऱ्या-साऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. पोरांचे श्रीरामांच्या चेहऱ्याशी असलेले साम्य तर वादातीतच होते. रामाची मुलं असती, तर आज एवढीच असली असती – हाही विचार सर्व आप्तजनांना स्पर्शून जात होता. अखेरीस स्वत: रामरायांनीच विचारले की, तुम्ही कोण, कुणाची मुले? बास!! त्याचक्षणी तिथे ऋषी वाल्मिकी स्वत: आले आणि त्यांनी श्रीरामांना सांगितले की ही तुमचीच मुलं आहेत. वाल्मिकींनी सर्व दरबारास या मुलांची हकीकत सांगितली. सीतेची पवित्रता सांगितली! सर्वांची सहानुभूती सीतेच्या बाजूने झाली. श्रीरामांनाही तेच हवे होते. परंतू मनात कुठेतरी शंका होती. ती वाल्मिकींनी ओळखली आणि श्रीरामांना, साक्षात प्रभू श्रीरामांना दरडावून सांगितले की, ‘रामा, मी ऋषी वाल्मिकी, प्रचेताचा दहावा वंशज (म्हणजेच किमान दहा पिढ्यांची शुद्धता असलेला ब्राह्मण!) तुला सांगतोय की, सीता ही निष्कलंकच आहे”!! या निर्वाणीच्या सुरानंतर सारेच प्रश्न मिटले. राम-सीता दोघेही लव-कुशांसह पुन्हा एक झाले!

    हा प्रसंग काय आहे हो? सीतेला आश्रय देणे, लव-कुशांचा जन्म होऊन ते मोठे होईपर्यंत वाट पाहाणे आणि योग्य वेळ येताच डाव टाकून रामाला सीतेचा स्वीकार करायला भाग पाडणे — या सर्व गोष्टींना एकच शब्द लागू पडतो – ‘राजकारण’!! होय हे राजकारण आहे. आणि वाल्मिकींनी हे राजकारण केलं म्हणूनच लव-कुशांना आश्रिताचं जिणं न जगता त्यांच्या अधिकाराचं राज्य मिळालं, सीतेवरचा खोटा कलंक दूर झाला. वाल्मिकी जर आश्रमाच्या दाराशी आलेल्या गर्भवती सीतेलाही पाहून ‘मी तर तपस्वी आहे, मला या राजकारणाशी काय देणं-घेणं’ असे म्हणून गप्प बसले असते तर? अन्याय करणाऱ्यापेक्षाही तो अन्याय मूकपणे पाहाणारा जास्त मोठा पापी असतो. या न्यायाने वाल्मिकीही त्यांच्या निष्क्रियतेमुळे पापाचे वाटेकरी बनले असते. परंतू वाल्मिकींकडे नीर-क्षीर-विवेक होता. त्यांनी योग्य निर्णय घेतला. राजकारणात भाग घेतला, मत व्यक्त केले. त्यासाठी प्रत्यक्ष रामचंद्रांनाही खडसवायला कमी केले नाही! हेच प्रत्येक विचारी मनुष्याचे कर्तव्य असते!

    लोक मला विचारतात की, ‘विक्रमजी तुम्ही वक्ते आहात. इतिहासावर लिहिणे, व्याख्याने देणे हे तुमचे काम आहे. असे असताना तुम्ही या घाणेरड्या राजकारणावर का लिहिता’? लोक हा प्रश्न माझ्यावरील प्रेमापोटीच करतात, हे मी जाणतो. परंतू या प्रश्नाचे उत्तर उपरोक्त ऐतिहासिक घटनेत आहे मित्रांनो. खरे आहे की मी वक्ता आहे, लेखक आहे आणि तेच माझे कर्तव्यही आहे. मात्र या सगळ्याआधी मी एक ‘हिंदुत्ववादी’सुद्धा आहे! किंबहूना मी हिंदुत्ववादी आहे म्हणूनच वक्ता आणि लेखक आहे. आणि मी असे मानतो की, आजच्या काळात हिंदुत्व पसरवायचे तर त्यासाठी राजकीय सत्ता ही आवश्यकच आहे. त्यासाठी मीच कश्याला, प्रत्येक सच्च्या हिंदुत्ववाद्याने निवडणुकांच्या काळात हिंदुहितवादी माणसेच कशी सत्तास्थानी जातील, हे पाहायला हवे. आणि ती तशी गेल्यावर त्यांच्यावर सातत्याने अंकुशही ठेवायला हवा. म्हणूनच मी राजकारणावर लिहितो आणि लिहितच राहाणार. पक्षातीत विचार करून हिंदुहितास पाठिंबा देतच राहाणार. मग पक्ष भाजप असो वा शिवसेना वा अन्य कुणी! कुणाचीही अंधभक्ती नाही. बरोबर तर बरोबर. आणि चूक तर चूकच! जिथे समष्टीविचारांसाठी वाल्मिकींनी प्रत्यक्ष रामालाही खडसावले, तिथे आजचा तर कोणताही नेता रामाच्या योग्यतेचाही नाही. मग त्यांना जाब विचारण्यात कसली अडचण? कसली भक्ती? हो, एक मात्र निश्चित की, मी वाल्मिकींच्या पासंगालाही पुरणारा नाही. मात्र माझी सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून मी माझ्या परीने खारीचा वाटा उचलू शकतोच की! स्वत: समर्थांनीही ‘हरिकथानिरुपणा’नंतर दुसरे कर्तव्य ‘राजकारण’च सांगितलेय, नव्हे का? गरज पडली तेव्हा समर्थांनी राजकारणावर प्रभाव टाकणारे वर्तन केलेच ना? मग त्याच समर्थांना आदर्श मानणाऱ्या आपण सर्वांनीही त्यांच्याच मार्गावरून चालायला नको? तेव्हा समाजशिक्षणासाठी काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने सद्य राजकारणावर मते बाळगली आणि व्यक्त केलीच पाहिजे. शिवाय निवडणुका या काही दिवसांपुरत्याच असतात. त्यांची एकदा उत्तरपूजा झाली, की माझे नेहमीचे लेखन आहेच!! बाकी सत्ता कुणाची का येईना परंतू खान्ग्रेस आणि कास्टवादीची यायला नको. सेना किंवा भाजप यांच्यापैकी कुणाची जरी सत्ता आली तरीही मला सारखाच आनंद होईल. उलट सेना व भाजप या दोघांपैकी एक पक्ष सत्ताधारी आणि दुसरा विपक्ष झाला तर माझा आनंद द्विगुणितच होईल. हो, राज्यात सत्ताधारी आणि विपक्ष दोघेही हिंदुत्ववादी असतील, तर दुग्धशर्करा योगच नव्हे काय? तेव्हा उद्या होऊ घातलेल्या प्रत्यक्ष रणसंग्रामासाठी दोन्हीही पक्षांना मन:पूर्वक शुभेच्छा!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच लेखकाची व्याख्याने डाऊनलोड करून ऐकण्या/आयोजिण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

    image

  • एकट्या ‘भाजप’चीच खिल्ली का उडवली जाते?

    मित्रांना प्रश्न पडतो की केवळ ‘महाराष्ट्र भाजप’चीच (महाराष्ट्र हा शब्द महत्वाचा!) खिल्ली का उडवली जातेय सगळीकडे? अहो साधी गोष्ट आहे. लोकांच्या मनात काँग्रेस-राष्ट्रवादीविषयी इतका काही प्रचंड राग आहे की, त्यांच्याबद्दल बोलायची सुद्धा लोकांची इच्छा नाहीये. त्यांना साफ झोपवायचं, हे तर पक्कंच ठरलंय! उरले कोण, तर शिवसेना आणि भाजप. त्यांपैकी ज्या शिवसेनेशी भाजपने २५ वर्षे घरोबा केला, ती शिवसेना म्हणजे ‘गुंडांचा पक्ष’ असल्याचा महाराष्ट्र-भाजपला अचानकच साक्षात्कार झालाय. त्यांच्याबद्दल काय बोलायचं मग?

    उरला भाजप!! त्यांना ना महाराष्ट्रात चेहरा ना व्हिजन. बहुमत मिळालं तर मुख्यमंत्रीपदासाठी खुर्चीच्या ऐवजी सोफा ठेवावा लागतो की काय असे वाटण्याइतपत त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे इच्छुक. असेना का. राजकारणात पदाची इच्छा अवश्य असावी. ते योग्यच आहे. परंतू महाराष्ट्र-भाजप लोकसभेतील मोदीलाटेच्या विजयात इतका काही वाहावत गेलाय की, त्यांनी अतिशय नकारात्मक प्रचार सुरू केलाय. पाहा – लोकसभेत त्यांची घोषणा होती, ‘अच्छे दिन आनेवाले है’. यात कशी सकारात्मकता आहे. काहीतरी काम करून दाखवण्याचा ऊर्मी आहे. तेच विधानसभेतील घोषवाक्य पाहा. ते म्हणतात, ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’. यातून केवळ एकच संदेश मिळतो की महाराष्ट्राची वाताहत झाली आहे. बाबांनो, ते तुम्हीच कश्याला सांगितलं पाहिजे? आम्हाला समजतं की ते! यावर उपाय म्हणून तुम्ही काय करणार? की नुसतेच प्रश्न उपस्थित करणार? याचं उत्तर या घोषवाक्यातून मिळत नाही. घोषवाक्य कसं हवं, तर भाजपच्याच लोकसभेतील घोषवाक्यासारखं! एका वाक्यात व्हिजन समजलं पाहिजे, सकारात्मक वाटलं पाहिजे. हा विज्ञापनशास्त्राचा नियम आहे. तुम्ही जर तोच पाळणार नसाल, तर तुमच्या ढिलाईची आणि त्यातून जन्मलेल्या वाक्याची खिल्ली उडवली जाणारच. कारण, आम्ही तुमचे डोळस समर्थक आहोत, तुमच्या कोणत्याही गोष्टीची स्तुती करणारे अंधभक्त नव्हेत.

    हीच ढिलाई मोदींच्या सभांच्या वेळापत्रकातही दिसून येते. अहो, मोदी तुमचा हुकमाचा एक्का आहे. तो जर तुम्ही असा कुठेही उधळणार असाल, तर कसं चालायचं? उदाहरणार्थ-  श्रीमती पंकजा मुंडे-पालवेंच्या मागे याक्षणी सहानुभूतीची प्रचंड लाट आहे. त्या निवडून येणार हे तर पक्कंच आहे. मग त्यांच्यावर मोदींची सभा का वाया घालवलीत? तेही आदल्याच दिवशी स्वत: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांच्यासाठी सभा घेतलेली असताना? त्याऐवजी एखाद्या दुर्बळ उमेदवारावर ती सभा खर्च केली असती, तर आणखी एक जागा निवडून नसती का आली? खरं तर मोदींना एवढ्या साऱ्या सभा घ्यायला लावणं हेच मुळात प्रादेशिक नेतृत्वात आत्मविश्वासाची कमतरता असल्याचं सिद्ध करणारं आहे. चला सभाच घ्यायच्या तर मोदींनीच दिलेल्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ या घोषणेनुसार घ्यायला नकोत? जिथं-जिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते उभे असतील (जशी तासगावात सभा घेतली!) तिथे सभा घ्यायला हव्या होत्या, म्हणजे तुमच्या हेतूंवरचा आमचा विश्वास दृढ झाला असता. परंतू तसे तर होताना दिसत नाहीये. ना सभास्थानांमध्ये काही क्रमवारी वगैरे दिसतेय. म्हणजे एकीकडे ‘आमचे शत्रू केवळ काँग्रेस-राष्ट्रवादी आहेत, शिवसेना नाही’ असं तोंड वाजवत राहायचं आणि प्रत्यक्षात मात्र सभेच्या क्रमात काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही ‘वेगळे’ नुकसान होताना दिसतच नाहीये. शिवाय या सगळ्या प्रकारामुळे मोदींचीही किती गोची झालीये पाहा. त्या माणसाला आपण देशाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कारभार हाकायला नेमलंय. ते सारं सोडून या माणसाला राज्यपातळीवर आणि गावागावांत जाऊन प्रचार करण्याची नामुष्की त्यांच्याच पक्षाच्या कर्तृत्वशून्य प्रादेशिक नेतृत्वाने आणलीये. प्रत्येक गावातली परिस्थिती वेगळी, तिथले प्रश्न वेगळे, बलाबल वेगळे. मोदींनी काय सारं काम-धाम सोडून तिथल्या प्रश्नांचा अभ्यास करत बसायचं आणि भाषणंच ठोकत राहायची? तो माणूस अभ्यासू आहे, त्यामुळे तो हे करेलही. पण मग राष्ट्रीय पातळीवर रखडलेली कामं करायला काय हे प्रदेश पातळीवरील कर्तृत्वशून्य लोक जाणार आहेत का? दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणुका असणार. म्हणजे काय प्रत्येक वर्षी मोदींनाच पळवणार का तुम्ही? यातून मोदींची प्रतिमा तर खालावतेच, शिवाय प्रादेशिक नेतृत्वाची निष्क्रियता अधोरेखित होते ती वेगळीच! अश्या निष्क्रिय पक्षाच्या नेतृत्वाला लोकांनी का म्हणून मत द्यावं? म्हणूनही भाजपची सध्या खिल्ली उडवली जातेय. आणि हे साहजिकच आहे. आजवर अनेक वर्षांत मोदींनी कधीच स्वत:च्या वैयक्तिक मोठेपणाचा डंका वाजवलेला नाही. त्यांचा तो स्वार्थी स्वभावच नाही. त्याच मोदींना आज गावोगावी जाऊन ‘मी अमेरिकेला जाऊन आलो’ असे सांगण्याची वेळ आलीये. ही नामुष्की कुणामुळे ओढवली? कर्तृत्वशून्य, बिनचेहऱ्याच्या प्रादेशिक नेतृत्वामुळेच ना? मग अश्या लोकांना का म्हणून मत द्यायचं आम्ही, हा रोकडा सवाल विचारला जाणारच. मोदींची मस्करी करणाऱ्यांची खिल्ली ही उडवली जाणारच!

    आणखी एक गोष्ट सांगतो. मोदींना ही मंडळी नुसतं दामटवतच नाही आहेत, तर त्यांच्या नावाचा वापरही करून घेताहेत. घ्या ना. अवश्य करून घ्या. तुमचेच नेते आहेत ते. पण प्रादेशिक पातळीवरील निवडणुकांमध्येही केवळ आणि केवळ त्यांचाच चेहरा वापरायचा? त्यांनी अमेरिकेत केलेलं भाषण दाखवून ‘अमेरिकेत भाषण केलेला नेता’ अश्या चुकीच्या पायावर व्यक्तिनिष्ठ उदात्तीकरण करायचं? याचा दुसरा अर्थ प्रदेश-पातळीवरील तुमचे सारेच नेते स्वीकारार्ह नाहीत, असाच होत नाही का? स्वत: मोदींनीही मग अश्यावेळी ‘मुंडे असते तर मला यायचीसुद्धा गरज नसती पडली’ अशी आडवळणाने खिल्ली उडवून घेतल्यास त्यात नवल ते काय? लोकसभेत आम्ही मोदींच्या नावावर मत दिलं. कारण त्यावेळी मोदी पंतप्रधान होणार होते. आता विधानसभेत का द्यावं मोदींच्या नावावर मत? मोदी काय मुख्यमंत्री होणार आहेत का? मुख्यमंत्री तर कुणीतरी प्रादेशिक, ज्याचा चेहराही तुम्ही जाहिरातींमध्ये दाखवू धजत नाहीत, असाच कुणीतरी नेता होणार ना? मग अश्या बिनचेहऱ्याच्या पक्षाला का मत द्यावं आम्ही? कृपा करून ‘निवडणुका झाल्या की मुख्यमंत्री ठरवू’ असलं काँग्रेसी उत्तर देऊ नका. ही काँग्रेसी पद्धत आहे. तुमची नाही. लोकसभेत केला होता की नाही चेहरा जाहीर? मग इथेही करायला कसली भीती? आणि याउप्परही जर काँग्रेसी पद्धतीच वापरणार असाल, तर मग तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये काय फरक राहिला? ‘जनसंघाचीही उद्या काँग्रेसच होईल’ असं भाकीत करणारे स्वा. सावरकर अश्यावेळी अधिकच द्रष्ट्ये वाटू लागत नाहीत काय? सबब, एकट्या भाजपचीच का खिल्ली उडवली जाते? तर त्यांनी लोकसभेला मोठमोठी स्वप्ने दाखवून आशेचा फुगा फुगवला आणि प्रदेशपातळीवरील नेतृत्वाने त्या फुग्याची हवाच काढून घेत मोदींच्या कष्टावर पाणी फिरवले म्हणून! अश्यावेळी खिल्ली ही उडवली जाणारच! लोकसभेत ज्यांना मत द्यायला आम्ही आसुसलेले होतो, विधानसभेत त्यांच्याच चुकीच्या डावपेचांमुळे त्यांना अजिबातच मत द्यावेसे वाटत नाहीये; अरे कुठे नेऊन ठेवलात महाराष्ट्र माझा??

    — © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच लेखकाची व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

    image

  • दुंदुभी निनादल्या.. नौबती कडाडल्या..!!

    अगदी साधा हिशोब करुयात. महाराष्ट्राच्या राजकारणातील युती आणि आघाड्यांचे पर्व तर सध्या संपले. तेव्हा यावेळी पंचरंगी लढत होणार हे नि:संशय. यातून कोणतातरी एकच पक्ष सर्वाधिक जागा मिळवणारा ठरेल हेही निश्चित. मात्र समविचारी (‘विचारी’ शब्द लिहितानाही खरे तर लाज वाटतेय!) पक्ष एकमेकांची मते खाणार, त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची सुतराम शक्यता नाही. सध्याची काँग्रेस-आघाडीविरोधी लाट पाहाता त्यांच्यापैकी कोणताही पक्ष सर्वाधिक जागा जिंकणार नाही, हेही नक्की. तेव्हा सर्वांत मोठा पक्ष एकतर शिवसेना तरी असणार वा भाजप तरी! मला वाटते, इथपर्यंत कुणाचेच दुमत नसेल.

    क्षणभर गृहित धरू की, भाजपला सर्वाधिक जागा मिळतील. अश्यावेळी भाजपला पुन्हा एकवार कुणासोबत तरी युती करणे भागच आहे. ती कुणाबरोबर? काँग्रेससोबत युती करण्याची तर सुतराम शक्यता नाही. कारण, ज्यांच्याविरोधात लढून केंद्रात सत्ता मिळवली, राज्यातील सत्तेच्या लालसेपोटी जर त्यांच्याच सोबत गेले तर लोक अक्षरशः शेण घालतील तोंडात. शिवाय असा भिन्नप्रवृत्तींचा बळजबरीचा विवाह फार काळ टिकणेही अशक्यच! मग भाजपवाले राष्ट्रवादीसोबत जातील का? तांत्रिकदृष्ट्या जाऊ शकतात. तसेही अलिकडच्या काही दिवसांत महाराष्ट्र भाजपमध्ये राष्ट्रवादीच्याच लोकांचा भरणा अधिक दिसतोय. शिवाय तत्त्व-बित्त्व बाजूला ठेवून भाजपवाले या ‘आयात’ मंडळींना तिकिटेही देतीलच! तेव्हा भाजपवाले राष्ट्रवादीसोबत जाऊ शकतात. मात्र प्रश्न उरतो तो असा की, हे असं निष्ठावंतांना डावलून, तत्त्वाशी तडजोड करून केलेलं गठबंधन भाजपमधील पुढाऱ्यांना रुचेलही एकवेळ, परंतू तळागाळातील सामान्य-निष्ठावंत कार्यकर्त्याला चालणार आहे का? नाही चालणार! आणि त्यांना चालो न चालो, परंतू राज्यात काँग्रेसच्या बरोबरीने ज्या राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्याच जीवावर (किमानपक्षी त्यांच्यातील आयातांच्या जीवावर!) सत्तेचे सोपान चढणे यासाठी भाजपला किती किती आणि कुठे कुठे तडजोड करावी लागेल, याची कल्पनाच केलेली बरी! यात राष्ट्रवादीचे कणभरही नुकसान नाहीये. मात्र प्रतिमा खराब होणार, विश्वासार्हता उणावणार ती भाजपचीच! शिवाय काँग्रेस काय वा राष्ट्रवादी काय, यांच्यासोबत जाणे मोदींना शोभणारे आहे का, याचाही विचार व्हायला हवा! भाजपला हे नुकसान परवडणारे वाटत असेल, तर आनंदच आहे! अन्यथा आणखी एक पर्याय समोर आहे तो मनसेचा! तसेही लोकसभेच्या काळात मनसेसोबत मधुर संबंध प्रस्थापित करण्याचा महाराष्ट्र-भाजपने (केंद्रीय नव्हे!) प्रयत्न करून पाहिलाच होता. त्या संबंधांनाच विवाहात बदलता येणे शक्य आहे. मात्र प्रामाणिकपणे सांगायला गेलं तर या निवडणुकीत मनसेच्या फार काही जागा निवडून येतील असे बिलकुल वाटत नाही. त्यामुळे या संबंधांचा भाजपला कितपत फायदा होईल याची शंकाच वाटते. दुसरा आणि सर्वात मोठा अडसर असा की, लवकरच बिहार आणि उत्तरप्रदेशात निवडणुका होऊ घातल्या आहेत. अश्यावेळी महाराष्ट्रात मनसेसोबत युती असेल, तर त्याचा हमखास फटका या दोन्ही राज्यांत बसणार, यात जराही शंका नाही. त्यातही सदर राज्यांच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी फारशी समाधानकारक नसताना भाजपचे केंद्रीय पातळीवरील नेतृत्व मनसेसोबत युती करण्याची जोखीम पत्करेल असे निदान मला तरी वाटत नाही. अश्यावेळी उरते कोण, तर शिवसेना! ज्या उद्धव ठाकरेंनी जागावाटपाच्या वेळी भाजपला काडीमात्रही भाव दिला नव्हता, ते युतीसाठी पुन्हा एकवार सहजासहजी तयार होतील असा विचार करणेही बालिशपणाचे आहे. साहजिकच ते शिवसेनेसाठी मुख्यमंत्रीपद आणि इतरही महत्वाची मंत्रिपदे मागणार. त्याशिवाय युती तर सोडाच, साधी बोलणीही करणार नाहीत. म्हणजेच, जी गोष्ट नको म्हणून युती तोडली, तीच गोष्ट मारून-मुटकून करण्याचे महाराष्ट्र-भाजपच्या नशिबी येणार! थोडक्यात काय, तर इथेही फरपटच!! किंबहूना हीच परिस्थिती यावी म्हणून शिवसेनेचे नेतृत्व शांतपणे दबा धरून वाट पाहातेय. अर्थात अजूनही एक पर्याय उरतो, तो म्हणजे विविध पक्षांचे विधायक फोडून जादुई आकडा गाठणे. सद्य परिस्थिती जर आहे तशीच कायम राहिली, तर हाच सगळ्यात सोप्पा मार्ग याक्षणी तरी वाटतो. मात्र या घोडेबाजारात भाजपला सतत जबर किंमत चुकवावी लागणार हे निश्चित! थोडक्यात काय, तर कमी प्रमाणात परंतू फरपटच!! महाराष्ट्र-भाजपला आगामी काळात, त्यांच्याच एका गाफील, अहंकारी आणि चुकीच्या निर्णयापोटी ‘न भूतो न भविष्यति’ तडजोडी कराव्या लागणार आहेत, असे जे मी परवा लिहिले होते ते या सर्व संदर्भांना धरून!

    याउलट शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या तर काय होईल? त्यांना राष्ट्रीय पातळीवर कुणालाही उत्तर देण्याचे बंधन नसल्यामुळे काँग्रेस वा राष्ट्रवादी यांच्यापैकी कुणाशीही युती करण्यात काहीही अडचण नाही. मात्र इथे प्रश्न येतो तो तत्त्वांचा! जर या दोन्ही पक्षांपैकी कुणासोबत युती केली, तर शिवसेना या नावाभोवती असलेलं वलय आणि विश्वासार्हता कायमचे संपेल. मला वाटतं, सेनानेतृत्वालाही या गोष्टीची जाणीव असेल, त्यामुळे ते कदापिही हा बालिशपणा करणार नाहीत. शिवाय भाजपला लागू होणारा नियम यांनाही तितकाच लागू होतो — एकमेकांचे विचार न पटणाऱ्यांचा विवाह चालून चालून असा कितीसा चालणार? मग आणखी पर्याय कोणता? तर मनसे!! खरं सांगू, मनसेच्या किती का जागा निवडून येईनात, मात्र या दोन पक्षांची युती झाली आणि त्यानिमित्ताने जर का दोघा भावांचे मनोमिलन झाले, तर अवघा महाराष्ट्र आनंदाने नाचेल अक्षरशः!! तेव्हा हा एक हुकमी पर्याय आहेच. मात्र यासाठी दोघांनाही कल्पनेपलिकडच्या तडजोडी कराव्या लागतील. आणि याक्षणी तरी एकाचा अहंकार आणि दुसऱ्याचा खुनशीपणा पाहाता, हे मधुर-मिलन कितपत घडू शकेल, यात मला तरी शंकाच वाटते! परंतू काहीतरी चमत्कार घडावा आणि हे मनोमिलन व्हावे अशी माझ्याप्रमाणेच सर्व मराठीजनांची इच्छा आहे एवढं नक्की! त्या दोघांनीही या लोकभावनेचा विचार करावा. शिवसेना पुन्हा एकदा भाजपसोबत युती करू गेल्यास, भाजपला पूर्ण नमविल्याखेरीज सोडणार नाही, असेच याक्षणी तरी वाटतेय. किंबहूना आपल्याला सर्वाधिक जागा न मिळाल्यास, ही अशी परिस्थिती निर्माण करून महाराष्ट्र-भाजपचे पानिपत करण्याचा सेनेचा खरा डाव असण्याचीच शक्यता याक्षणी वाटतेय! तेव्हा बोलणी तडजोडीच्या दिशेने नेण्यापेक्षा ‘येता की जाता’ अशीच करण्याकडे अश्यावेळी शिवसेनेचा कल राहाणार! आणि समजा अश्याप्रकारे केलेली बोलणी फिसकटलीच, तर विरोधी बाकावर बसताना शिवसेनेला काडीचेही दु:ख होणार नाही! कारण गमावण्यासारखे मुळात काही नव्हतेच. मग हाच विरोधी बाकावर बसण्याचा पर्याय भाजपकडेही खुला नाही का? तर आहे. मात्र त्यांच्या दृष्टीने तो सगळ्यात शेवटचा आणि नाईलाजास्तव स्वीकारलेला पर्याय असेल, एवढे नक्की! याचे कारण आहेत, अमित शहा! किंबहुना महाराष्ट्र-भाजपला युती तुटायला नको होती, त्यासाठी ते पडती बाजू घ्यायलाही तयार होते, मात्र युती तुटली ती अमित शहांनी आणलेला दबाव, दिल्लीदरबारच्य कुणा हुजऱ्याला राज्यात मुख्यमंत्रीपदी बसवून राज्यावर अंकुश ठेवण्याची – विदर्भ आणि प्रसंगी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची महत्वाकांक्षा, उत्तरप्रदेशात लोकसभेमध्ये मिळालेल्या यशामुळे आलेली बेफिकीरी, जात्याच कणखर स्वभाव आणि त्यात आता तर थेट नरेंद्र मोदींचा वरदहस्त लाभल्यामुळे आलेली निर्ममता, आणि अहंकारामुळे; असेच प्रथमदर्शनी तरी दिसतेय! अर्थात त्यांना असे करण्याचा पूर्ण अधिकारही आहे कारण, सध्यातरी तेच विजयी बाजूकडे आहेत; मात्र दुर्दैव म्हणा वा योगायोग, हा महाराष्ट्र आहे – उत्तरप्रदेश नव्हे!!

    थोडक्यात सांगायला गेलं तर, येत्या महिनाभरात महाराष्ट्रात राजकीय धूळवड होणे अटळ आहे. यात कोण तावून-सुलाखून बाहेर पडतो आणि कुणाच्या गळ्यात महाराष्ट्रलक्ष्मी माळ घालते (की तिच्या नशीबी राष्ट्रपती राजवटीतले आश्रिताचे जिणे येते!), हे बघणे निश्चितच औत्सुक्याचे ठरेल. खऱ्या नेतृत्वाची हीच परीक्षा आहे; किंबहूना ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यालाच महाराष्ट्राचा नेता म्हणवून घ्यायचा अधिकार असणार आहे! सध्यातरी, ‘दुंदुभी निनादल्या.. नौबती कडाडल्या’!!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने ऐकण्यात/डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा : www.vikramedke.com)

    image

  • Gurupaurnima

    Dear A.R. Rahman –

    You were there when no one was
    When everyone is there, you still are
    Shadows leave, you do not
    Every moment teaching me a lot
    When I cry, you wipe out my tears
    You hold my hand, when strike out fears
    Your are a boat, sailing me through the Bhava-Saagar
    You not merely entertain, spiritually uplifts me rather
    You are the one who always give me a smile
    Which I wear everyday & walk another mile

    Dear A.R. Rahman, you are a Sad-Guru for me. Always keeping me on the right path & keeping my Vivek awake. After my parents, it is because of you I’m what I’m. Thanks for being there. Thank you so much. On this holy occasion of Guru-Paurnima, this is a small Sanskrit verse as a offering to you – my Guru. Kindly accept with my Namaskara.

    सच्चिदानन्दमूर्ती परब्रह्मरूपम् ।
    श्रुतीहितकारी: तव स्वरूपम् ।।
    सङ्गीताधिपतीर्यो वैराग्यपूर्णम् ।
    तस्मै ‘रहमाना’य नमोऽहं नमोऽहम् ।।

    – © Vikram Edke
    (www.vikramedke.com)

    image

  • तुम्हाला पुरोगामी व्हायचंय का? सोप्पं आहे!!

    हल्लीच्या जगात ‘श्वास घेण्या’पेक्षाही सोपी गोष्ट कोणती झालीये माहितीये? ‘पुरोगामी होणे’!! त्यासाठी काय करायचं? काहीच नाही, जाणून-बुजून सातत्याने हिंदूंना अपमानास्पद वाटेल असं वागत राहायचं, की ठरलातच तुम्ही पुरोगामी! मग यात सरळसरळ तुमचा ढोंगीपणा दिसला तरीही चालेल. कारण तुम्हाला काहीच करावं लागत नाही. हे मूर्ख हिंदूच ‘तुमचा ढोंगीपणा हा कसा तुमचा ढोंगीपणा नसून प्रामाणिकपणा आहे’ हे जीवाच्या आकांताने सांगायला पुढे येतात. अहो उलट तुम्ही जितका जास्त ढोंगीपणा कराल तितकी वरची पुरोगामी श्रेणी मिळेल तुम्हाला. म्हणजे थोडासा ढोंगीपणा केला की – ‘विवेकवादी’, त्याहून अधिक केला की – ‘पुरोगामी’आणि आणि ढोंगीपणाची कमाल मर्यादा गाठली की – ‘भारतीय सेक्युलर’!! आणि हे सारं अगदी सोप्पं असतं बरं का. काय करायचं – समजा कुणा गुंडांच्या जमावाने एखादा अहिंदू तरुण मारला (मग कारण काही का असेना!), तर या कृत्याचा आपल्या घरातील कुणी माणूस गेल्यागत निषेध करायचा. आणि म्हणायचं — “हिंदू दहशतवाद्यांच्या जमावाने अमुक धर्माच्या अहिंदूचा निर्घृण खून केला”. परंतू याच्या नेमकं उलट घडलं तर मात्र म्हणायचं – “समाजकंटकांच्या एका जमावानं तरुणाची हत्या केली”. लक्षात ठेवा, पुरोगामी ठरण्याचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम आहे, तो म्हणजे ‘अपराधी हिंदू नसेल तर त्याच्या धर्माचं कदापिही नाव घ्यायचं नाही. अगदीच जघन्य अपराध असला तर मात्र हळूच अल्पसंख्याक म्हणून विषय संपवायचा’!! समजलं?

    तुम्हाला सर्वधर्मसमभाववादी व्हायचंय का? सोप्पं आहे! समजा एखाद्या हिंदू मुलीवर, तुम्ही कल्पनेतही कल्पना करू शकणार नाही इतका बीभत्स बलात्कार झाला, तिच्या शरीराची शक्य ती सारी विटंबना केली गेली, इतकेच नव्हे तर बळजबरी तिचे कुणा ‘शांतिप्रिय’ धर्मात धर्मपरिवर्तन केले गेले तर..? तर ‘अजिबात लक्ष द्यायचे नाही’!! सेक्युलॅरिझमचे भारतीय अवतार असल्या फालतू गोष्टीकडे लक्ष देत नसतात. तुम्हाला त्यासाठी फारसे प्रयत्नही करावे लागणार नाहीत बरं! कारण हिंदूंची मनं इतकी बधीर झालेली आहेत की, मुळात तेच या गोष्टीकडे लक्ष देणार नाहीत. अहो, जिथं बलात्कार आणि खून असे दुहेरी अपराध केलेला अपराधी केवळ अल्पवयीन (आणि अल्पसंख्य!) आहे एवढ्याच कारणापोटी किरकोळ शिक्षेवर सुटतो आणि लोकांना त्याचे काहीही वाटत नाही, तिथे बलात्कार आणि धर्मपरिवर्तनाच्या प्रकरणातली पीडीता जिवंत वाचलीये म्हटल्यावर कोण कश्याला मरायला या बातमीला महत्व देईल? त्यातूनही जर कुणी हा विषय काढायला गेलंच तर आपण आधी भरपूर आरडाओरडा करायचा आणि त्यानंतर ‘कुणा स्वयंपाक्याला त्यानेच बनवलेली पोळी नुसती दाखवणं (इथे रेटून ‘खाऊ घातली’ असं म्हणायचं बिनधास्त!) हा त्याच्या धर्मस्वातंत्र्यावर कसा घाला आहे आणि हाच एक कसा राष्ट्रीय महत्वाचा विषय आहे’ हे तारस्वरात ओरडून सांगायचं! की झालातच तुम्ही सर्वधर्मसमभाववादी!! अभिनंदन!

    तुम्हाला ‘सामाजिक बांधिलकीचा पुरोगामी सर्वधर्मसमभाववादी’ व्हायचंय का? नाव थोडं मोठं आहे, पण होणं फार सोप्पं आहे. काहीही खास करायचं नाही. फक्त ‘दैनिक भास्कर’चा आदर्श डोळ्यापुढं ठेवून वागायचं. अहो खरंच! ‘दैनिक भास्कर’ काय करतंय — सध्या रक्षाबंधन आलाय ना, म्हणून ते मुलींसाठी मोहीम चालवतायत – “मी राखी बांधणार नाही”. का? अहो मुलींवर बलात्कार नाही का होत? मग जगातल्या सगळ्याच पुरुषांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायला मुलींना प्रोत्साहन द्यायचं आणि राखी बांधणार नाही असं सांगायचं. मग भलेही तुमचा भाऊ साक्षात रामाचा अवतार का असेना. नाही म्हणजे नाही म्हणजे नाहीच. याचे दोन फायदे होतात. एकतर तुम्ही ‘साबांपुस’ होता आणि दुसरे म्हणजे आपोआपच तुम्ही ‘स्त्रीवादी’ही ठरता! आहे की नाही एका तिकीटात दोन खेळ!! हो मात्र एक काळजी घ्यायची बरं का. की हा असा खेळ फक्त हिंदूंच्याच सणांच्या बाबतीत करायचा. अन्यधर्मीयांच्या बाबतीत चुकूनही नाही. अन्यथा जीवावर बेतू शकतं तुमच्या!! जरा जपून! हे हिंदू मात्र मूर्ख असतात. ते नुसतं हे धार्मिक अतिक्रमण सहनच करत नाहीत, तर उलट आधूनिकतेच्या नावाखाली तुम्हाला पाठिंबा पण देतात. द्या टाळी! आणि त्यातूनही कुणी समजा विचारलंच की, “का हो, रक्षाबंधनच का? स्त्रीजातीवर बलात्कार होतात तर ‘मी आजपासून व्हॅलेंटाईन-डे साजरा करणार नाही’, असं का म्हणू नये”? तर त्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. तोंडात पुरोगामित्वाच्या शेणाची गुळणी धरून गप्प राहायचं. तुमचं काम हिंदूच करतील. नाही त्या प्रश्नकर्त्यास प्रतिगामी-प्रतिगामी म्हणून त्याचं जगणं दुष्कर करून टाकलं त्यांनी, तर नाव लावणार नाही! आणि हे ‘दैनिक भास्कर’ केवळ उदाहरण झालं हो. तुम्ही या गोष्टीची आपल्याला हवी ती आवृत्ती काढू शकता. फक्त एक सूत्र लक्षात ठेवायचं — “हिंदूंचा कोणताही सण आला रे आला, की काही ना काही कारण काढून पुरोगामित्वाच्या नावाखाली त्याला विरोध करत राहायचं”. बास! अन्यधर्मीयांच्या सणांमध्ये डोकावायला जायचं नाही. त्यांना धार्मिक स्वातंत्र्य असतं ना! मग? एवढं पाळायचं फक्त. की झालातच तुम्ही ‘साबांपुस’!!

    तुम्हाला कलाप्रेमी पुरोगामी व्हायचंय का? मग त्यासाठी तुम्हाला ‘आमिर खानचा फॅन’ व्हावं लागेल. म्हणजे काय करायचं? एकतर त्याच्या चित्रपटांना कम्पल्सरी चांगलंच म्हणायचं. दुसरं म्हणजे त्या चित्रपटांमध्ये तो जे करतो त्याला अभिनय आणि सदरच्या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी तो जे काही चाळे करेल (ते किती का सवंग आणि प्रसंगी उचलेगिरी का असेना!) त्याला ‘हट के मार्केटिंग’ म्हणायचं. मग भलेही तो अभिनयाच्या बाबतीत कमल हासन, चियान विक्रम, नाना पाटेकर, धनुष, सूर्या शिवकुमार, प्रकाश राज, प्रसेनजित चटर्जी या सगळ्यांपुढे ‘बच्चा’ का असेना! भलेही उपरोक्त यादीपैकी जवळजवळ सगळेच राष्ट्रपती पारितोषिकासारख्या सर्वोच्च सन्मानाने अनेकवार गौरविलेले का असेनात. अश्यावेळी बिनधास्त म्हणायचं – “हे पुरस्कार सगळे विकत घेतलेले असतात हो. आमिरवर कायमच अन्याय होतो. शिवाय पुरस्कार काही अभिनयाचा मापदंड असतो का” वगैरे वगैरे..! थोडक्यात तो पडद्यावर जो अभिनयाचा अभिनय करतो, त्याला अभिनय म्हणायचं! याबाबतीत प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीनिवडीमुळे जरासा मतभेद होऊ शकतो म्हणा. त्यामुळे इथपर्यंत तुम्हाला कुणीही काही म्हणणार नाही. मात्र याखेरीज तो पडद्याबाहेर जे जे म्हणून काही करेल, त्याला ‘सामाजिक बांधिलकी’च म्हणायचं. याहून कमी काही म्हणायचंच नाही. चांगलं’च’ म्हणायचं. मग तो ‘सत्यमेव जयते’च्या नावाखाली केलेला निम्न दर्जाचा खोटारडेपणा असो वा अण्णा हजारे आणि त्यांचे सहकारी उपाशीपोटी उपोषणाला बसले असताना त्याच ठिकाणी याचा रोजा सोडण्याचा अट्टाहास असो वा आपला चित्रपट प्रदर्शित होत असतानाच बरोब्बर वेळ साधून ‘नर्मदा बचाव’वाल्यांना दिलेला पाठिंबा असो वा चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या नावाखाली त्याने केलेला नंगानाच असो! चांगलं’च’ म्हणायचं! आणि हो, त्याचा आगामी चित्रपट ‘साधूसंतांच्या तथाकथित ढोंगीपणावर’ आधारित आहे. मग तर काय सगळ्या सेक्युलर पुरोगाम्यांना मेजवानीच! तेव्हा ही संधी साधायची आणि कलाप्रेमी पुरोगामी व्हायचं. अर्थात अगदी आमिर खान नको असेल तर मात्र तुम्ही आपापल्या वकूबाप्रमाणे शाहरुख खान, महेश भट, शबाना आझमी इ. नाही पाठिंबा देऊ शकता. तो तुमचा निर्णय!

    उपरोक्त उपायांखेरीजही पुरोगामी होण्याचे इतर हजारो उपाय आहेत बरं का. पण ते नंतर कधीतरी. तूर्त सुरुवात करण्यासाठी हे सोप्पे सोप्पे उपाय बहुमूल्य आहेत! तर म्हणून मी म्हणत होतो की, हल्लीच्या जगात ‘श्वास घेण्या’पेक्षाही ‘पुरोगामी होणं’ जास्त सोप्पं झालंय. तेव्हा अशी शतकानुशतकांतून एकदाच येणारी सुवर्णसंधी का म्हणून दवडायची? संधीसाधू होऊन संधी साधूयात आणि तुम्ही-आम्ही-आपण सारे पुरोगामी होऊयात. देव-देश-धर्म जाऊ द्या खड्ड्यात! बोला, पुरोगामित्वाचा..?

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

    image

  • लोकमान्यांना शंभर वर्षांनंतर लाभलेला शिष्य!!

    मोहनदास गांधी जेव्हा आफ्रिकेतून भारतात परतले होते आणि येथील विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते, तेव्हा आपल्या या प्रवासात ते लोकमान्य टिळकांनाही भेटले होते. भेट संपली. गांधी निघून गेले. ते जाताच लोकमान्य आपल्या सहकाऱ्यांकडे वळून म्हणाले, “हा माणूस पक्का बनिया दिसतोय. बोट दिलं तर हातच ताब्यात घेईल. याला दूर लोटू नका, पण फार जवळदेखील करू नका. नाहीतर हा विकून खाईल सगळ्यांना”. अर्थातच टिळकयुगाच्या अस्तानंतर लोकमान्यांचा हा मुत्सद्दी सल्ला कुणीच मानला नाही. हळूहळू सारी काँग्रेसच गांधींच्या कह्यात गेली. त्यातून पुढे काय काय रामायणे घडली आणि देशाला त्याचे काय काय परिणाम भोगावे लागले, हा एक वेगळाच विषय आहे.

    मात्र मला आज एक असा कुटील राजकारणी दिसला — मी मुद्दामहून ‘कुटील’ हा शब्द वापरतोय — ज्याने शंभर वर्षे उलटून गेल्यावरही लोकमान्यांचा सल्ला पक्का आत्मसात केलाय. नव्हे, तर अक्षरशः अंगी बाणवलाय! त्या कुटील राजकारण्याचं नाव आहे, मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी! मोदी कायम गांधींचे आणि त्यांच्या विचारांचे गुणगान करत असतात. पण म्हणून त्यांनी गांधींना कधी जवळ केल्याचे पाहिलेय का हो? तर अजिबात नाही! जेव्हा गुजरातची अस्मिता दाखवण्याची वेळ आली तेव्हा त्यांना गुजराती असलेले गांधी आठवले नाहीत, तर उलट त्यांनी सरदार पटेलांच्या रुपाने एक वेगळाच, प्रवाहाविरुद्धचा आदर्श उभा केला. एक काँग्रेसी महापुरुष हायजॅकच केला म्हणा ना! तर मुद्दा असा आहे की, मोदींनी गांधींना कधीच दूर लोटलं नाही, मात्र कधीच जवळही केलं नाही.

    गांधींना यांत्रिक प्रगतीचं नेहमीच वावडं होतं. ‘खेड्यांकडे चला’ हा त्यांचा मंत्र तर प्रसिद्धच आहे. मात्र ‘नागपूर मेट्रो’च्या उद्घाटनावेळी मोदींनी केलेलं भाषण जर नीट ऐकलं, तर तुम्हाला जाणवेल की — मोदींनी नुसती शहरांची आवश्यकताच बोलून दाखवलेली नाहीये तर छोट्या आकारांची नवनवीन शहरे स्थापन करण्याची जोरदार वकीलीही केली आहे. मोदींनी आपले याबाबतचे विचार याआधीही अनेकवार बोलून दाखवले आहेत. आणि मोदी जर एखादी गोष्ट इतकी ठासून मांडत असतील, तर ती गोष्ट ते अंमलातही आणणार यात काहीच शंका नाही. म्हणजे पुन्हा तेच —  ‘खेड्यांकडे चला’ म्हणणाऱ्या गांधींचं गुणगान तर करायचं, पण प्रत्यक्ष कृती मात्र अगदी उलट करायची!

    खरं तर गांधीवाद हा कधीच कालसुसंगत नव्हता. परंतू त्याचं नेहमीच सरकारी पातळीवरून उदात्तीकरण केलं गेलं. आणि हिंदुत्ववाद्यांनी तसेच वास्तववाद्यांनी या प्रकाराला विरोध केला की, तथाकथित विचारवंतांकडे अश्या विरोधकांवर कट्टरतेचा शिक्का मारण्याचं अस्त्र तयारच असायचं! परंतू स्वत:ला गांधीवादी दाखवत गांधीवादाच्या मूळालाच हात घालण्याच्या मोदींच्या खेळीवर कुणाकडेच तोडगा नाहीये. मी मोदींना ‘कुटील’ राजकारणी म्हणतो ते यासाठीच. आपल्याला हवा तो कार्यभाग समोरच्याला गंधवार्ताही लागू न देता साधणे, नव्हे नव्हे, समोरच्याला पूर्णवेळ ‘हा माणूस आपलेच काम करतोय’ असं वाटायला लावत काम साधणे — यासाठी व्यक्ती चाणक्य कोळून प्यायलेलीच असायला लागते!

    मोदी पंतप्रधान म्हणून तर प्रिय आहेतच, पण आज मोदींमधला मुत्सद्दी राजकारणी अधिकच प्रकर्षाने आवडून गेला. आज लोकमान्यांचा आत्मा स्वर्गात अतिशय खूष झाला असेल. कुणी सांगावं, एव्हाना ‘स्वर्ग-केसरी’त अग्रलेखही लिहायला घेतला असेल त्यांनी — ‘डोके ठिकाणावर असलेले सरकार आले हो’!!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच विविध क्रांतिकारक, महापुरुष आणि हिंदू धर्माची महती सांगणारी लेखकाची अनेकानेक व्याख्याने डाऊनलोड करण्यासाठी अथवा आपल्या भागात आयोजिण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

    image

  • याद हैं..?

    रात-रात जागकर हम चाँद काटा करते थे!
    याद हैं?
    और अमावसको जब वो फ़नाह हो जाता,
    तो तारे बाँटा करते थे!!
    मैं ख्वाबोंसे भरता था माँग, तुम मुझमें सिमटा करती थी!
    मैं हार जाता था बाज़ी, और दोनों जीता करते थे!!
    तुम तो चली गयी बाज़ी आधी छोडके..
    बस मैं बचा हूँ,
    रात बची हैं,
    और हाँ, चाँदभी तो बाक़ी हैं फ़लकपे.. अधकटा!
    वोही चाँद,
    जिसकी छाँवतले ज़िंदगीभर साथ निभानेका वादा किया था तुमने..!
    याद हैं?

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (www.vikramedke.com)

    image

  • ढूँढता रहता हूँ..!!

    रातें ऊब जाती हैं अँधेरोंसे
    दिन जल जाते हैं सवेरोंसे
    मैं ढूँढता रहता हूँ तुझको पिया
    बुझती राख़के ढेरोंसे!!

    इक सुरंगसी बनी हैं मौनकी
    जीस्त निगला करती हैं
    इक चाँद दुभंगता रहता हैं
    तारोंके बिखरे डेरोंसे!!
    वो खिडकीभी अब उजड गयी हैं जहा
    तेरी ज़ुल्फोंमें शामें अटका करती थी
    बस घौंसलेके उडते हैं तिनके
    खाली पडे मुण्डेरोंसे!!

    रातें ऊब जाती हैं अधेरोंसे
    दिन जल जाते हैं सवेरोंसे
    मैं ढूँढता रहता हूँ तुझको पिया
    बुझती राख़के ढेरोंसे!!

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (www.vikramedke.com)

    image

  • अनुच्छेद ३७० : दशा आणि दिशा

    अनुच्छेद ३७० : दशा आणि दिशा

    “अनुच्छेद 370: दशा आणि दिशा”
    (साप्ताहिक विवेक, दि. २९ जून ते ५ जुलैच्या अंकात प्रकाशित झालेला लेख.)

    केंद्रामध्ये भाजपा आणि  राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांना स्पष्ट बहुमत मिळाल्यापासून अनुच्छेद 370चा मुद्दा पुन्हा एकवार जोर पकडू लागला आहे. तसा हा मुद्दा सुरुवातीपासूनच विवादित. त्यातून या अनुच्छेदाला विरोध करणारे सरकार अस्तित्वात आल्यापासून तर हे अनुच्छेद रद्द करावे, अशी जोरदार मागणी होणे साहजिकच होते. ही मागणी जितकी तीव्रतेने होऊ लागली, तितक्याच तीव्रतेने या अनुच्छेदाच्या पाठीराख्यांनी विरोधही सुरू केला आहे. गंमत म्हणजे या दोन्हीही बाजू आपापले म्हणणे मांडण्यासाठी हाती असलेल्या सर्व माध्यमांचा – मुख्यत्वेकरून नव्यानेच लोकप्रिय झालेल्या फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप इ. सोशल मीडियाचा – पुरेपूर वापर करीत आहेत. आणि  यातून हा मुद्दा कळणे वा त्याच्यावर मोकळेपणाने चर्चा होणे तर दूरच, परंतु सामान्यजनांच्या मनात एक प्रकारचा संभ्रम मात्र निर्माण झालाय.

    खरे तर अनुच्छेद 370चे मूळ शोधू गेल्यास आपण पोहोचतो ते शेख अब्दुल्लापर्यंत. आता हा कोण शेख अब्दुल्ला? तर काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांचे वडील व सध्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे आजोबा म्हणजे हा शेख मुहंमद अब्दुल्ला. अत्यंत बेरकी व धूर्त राजकारणी. हरिसिंह काश्मीर नरेश असताना हा त्यांच्याशी, नेहरूंशी, माउंटबॅटनशी आणि  पाकिस्तानशी अशा चौघांशीही सारखेच सौहार्द राखून होता. खाजगीत चौघेही त्याला एकमेकांचा ‘एजंट’ समजायचे. आपल्या याच धूर्ततेच्या जोरावर त्याने काश्मीरचे पंतप्रधानपद पटकावले होते आणि  काश्मीरची सत्ता या ना त्या स्वरूपात कायम आपल्याच घराण्यात कशी राहील, याचीही यशस्वी योजना करून ठेवली होती! वाचून आश्चर्य वाटेल, परंतु भारतीय घटनेचे प्रमुख रचनाकार असलेल्या डॉ.आंबेडकरांचा अनुच्छेद 370ला कडाडून विरोध होता (संदर्भ: India Today, 28 मे 2014). याच शेख अब्दुल्लाने नेहरूंसोबत मिळून त्या अनुच्छेद 370ची निर्मिती केली. नेहरूंनाही सरदार पटेलांच्या आक्रमक आणि  दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेल्या धोरणांना शह देण्यासाठी असे काहीतरी हवेच होते. या दृष्टीने पाहू गेल्यास, जिला राजकीय चूक म्हणता येईल, ती काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्र संघाकडे नेण्याची नेहरूंची चाल ही पटेलांना शह देणारी अशीच एक दुर्दैवी खेळीही असू शकते.

    ज्या प्रकारे इतर संस्थानांचे विलीनीकरण झाले, त्याच प्रकारे काश्मीरचे विलीनीकरण होणेही सहज शक्य होते. परंतु जेव्हा 1947च्या हिवाळयात भारतीय सैन्य पाकिस्तान्यांशी निकराची झुंज देत होते, तेव्हा हे अब्दुल्ला महाशय काश्मीरचे स्वतंत्र सैन्य उभारण्यात मश्गूल होते. वर ‘भारतीय सैन्य निघून गेल्यावर काश्मीर अगदी उघडयावर पडायला नको’ असे साळसूद कारण तयारच होते त्यांचे. याला नेहरूंचीही काहीच हरकत नव्हती. उघडच आहे की अब्दुल्लाला काश्मीरसाठी केवळ विशेष दर्जाच हवा होता असे नाही, तर त्याला सर्ंपूण स्वायत्तताही हवी होती. (Working a Democratic Constitution: History of Indian Experience, लेखक Granville Austin). आणि  अनुच्छेद 370द्वारे त्याने ती एक प्रकारे मिळवलीदेखील. असा सगळा प्रकार पाहून निराश झालेले सरदार पटेल आपले स्वीय सचिव व्ही.शंकर यांच्याशी खाजगीत बोलताना म्हणाले होते, ”जवाहर रोएगा!” (Article 370: The Untold Story, लेखक मेजर जनरल शेर थापलियाल, Indian Defense Review मध्ये 27 मे 2014 रोजी प्रकाशित झालेला लेख.)

    राजनीतीची वक्रगती पाहा – घटना समिती आणि  काँग्रेस कार्यकारिणी अशा दोन्हीही ठिकाणी अनुच्छेद 370चा मसुदा स्पष्टपणे नाकरण्यात आला होता. नेहरूंनी त्यानंतर अत्यंत हुशारीने हे अनुच्छेद मान्य करवून घेण्याची जबाबदारी त्या अनुच्छेदाचे प्रखर विरोधक असलेल्या सरदार पटेलांवरच सोपवली. आणि पटेलांनाही नाइलाजाने ती पार पाडावी लागली. 24 जुलै 1952 रोजी, ज्या वेळी सरदार पटेल हयात नव्हते, त्या वेळी नेहरूंनी संसदेत भाषण करताना ”सरदार पटेलच ह्या अनुच्छेदाबद्दल एकहाती सारे र्निणय घेत होते” असे धडधडीत असत्य व पराकोटीच्या कृतघ्नपणाचे विधान केले होते. त्या वेळी या विधानावर बरीच टीकाही झाली होती. किंबहुना गोपालस्वामी अय्यंगारासारख्या, नेहरूंच्या जवळचे समजल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यालाही ही बाब अजिबात पसंत पडली नव्हती.

    मुळात अनुच्छेद 370चा घटनेत समावेश हा ‘तात्पुरत्या’ स्वरूपाचा होता. आणि  म्हणूनच घटनेच्या ‘भाग 21′मध्ये त्याचा समावेश करण्यात आलाय. परंतु आरक्षणाची तरतूदही तात्पुरती असावी, असे स्वत: डॉ. आंबेडकरांचेही मत होतेच की! काय झाले त्याचे? जसे त्या विषयावर राजकीय डावपेच खेळले गेले आणि  मुळात एका अतिशय उदात्त हेतूने निर्मिलेल्या संकल्पनेचा खेळखंडोबा झाला, तीच या अनुच्छेद 370चीही अवस्था झाली आहे. आज ना भारत सरकारचे कायदे काश्मीरला लागू होऊ शकतात, ना काश्मीरमध्ये आधीच अस्तित्वात असलेले नागरिकत्व, जमिनीची खरेदी-विक्री इ. संदर्भातले कायदे रद्द होऊ शकतात. त्यामुळे ना कुणी भारतीय माणूस काश्मीरचा नागरिक होऊ शकतो, ना तिथे जमीनजुमला घेऊ शकतो. एवढेच कशाला, याच अनुच्छेद 370ची कृपा अशी की, भारत देश – सार्वभौम भारतीय गणराज्य, काश्मीरच्या राज्य सरकारच्या मान्यतेशिवाय कितीही गरज पडली तरीही अंतर्गत सुरक्षेच्या कारणास्तव वा आर्थिक मुद्दयावर काश्मीरमध्ये कदापिही अणीबाणी घोषित करू शकत नाही, आता बोला! आणि  याहून धक्कादायक बाब अशी की, संपूर्ण भारतात काश्मीर हे असे एकमेव राज्य आहे, ज्याची स्वत:ची स्वतंत्र घटना आहे! भारतात अंदमान-निकोबार, हिमाचल प्रदेश आदी अनेक राज्यांना विशेष दर्जा देण्यात आलाय, परंतु काश्मीरसारखी स्वायत्ततेची खैरात अन्य कोणत्याच राज्यावर करण्यात आलेली नाही! हे सारे केवळ चीड आणणारेच नव्हे, तर फुटीरतेला उत्तेजन देणारेही आहे. बरे, काश्मीर भारताचा घटक बनून राहावा यासाठी ही स्वायत्तता दिली असे म्हणावे, तर ही किंमत खूपच जास्त होते आहे. तुमच्या हाताचा अंगठा तुटला, तर तुम्ही काय कराल? एखाद्या निष्णात शल्यकर्मीकडून तो बसवून घ्याल ना? तरच तो अंगठा तुमच्या हाताचा अविभाज्य घटक म्हणून राहील! मात्र तुम्ही जर तो अंगठा केवळ फेव्हिकॉलने हाताला चिकटवून ठेवलात तर? ना तो अंगठा पुन्हा हाताशी जुळू शकेल, ना निघू शकेल, ना त्याला हातातून रक्तपुरवठा होईल, ना तो वस्तू पकडून हाताला मदत करू शकेल. तो स्वत: तर सडलेल्या अवस्थेत राहीलच, परंतु त्याच्या रोगटपणामुळे उर्वरित हातालाही कायमच त्रास होत राहील! पटेलांचे ऐकून जर काश्मीरवर एकदाच सैनिकी कारवाई झाली असती, तर ते एकदाच होऊन गेलेले शल्यकर्म ठरले असते. याउलट सध्या जी अवस्था आहे, ती अंगठा फेव्हिकॉलने चिकटवण्यापलीकडे अन्य काहीच नाहीये. बरे, यातून काश्मीर प्रश्न सुटण्याऐवजी मुळात चिघळलाच आहे. शिवाय गेल्या 60-65 वर्षांत मुळातच मुस्लीम बहुसंख्या असलेल्या काश्मीरमधील अनेक गटांना मुस्लीम राष्ट्र असलेले पाकिस्तान जवळचे वाटू लागलेय, हे वेगळेच. आणि याउप्पर काश्मीरमधील हिंदू पंडितांनी सहन केलेल्या व सहन करत असलेल्या अत्याचारांना तर सीमाच नाही. गोष्टी भलेही वेगवेगळया असतील, परंतु साऱ्यांचे मूळ एकच आहे, व ते म्हणजे अनुच्छेद 370!

    अर्थात हे अनुच्छेद 370 रद्द केले म्हणजे काश्मिरात एका रात्रीत सारे आलबेल होईल, असे मुळीच नाही. त्यासाठी काश्मिरी जनतेच्या मनात विश्वासच निर्माण करावा लागणार आहे. शांतपणे आणि  कठोरपणेच हे शल्यकर्म करावे लागणार आहे. त्यासाठी आवश्यकता आहे ती मनमोकळया चर्चेची. त्या चर्चेसाठी आवश्यक असणारे मोकळे आणि समसमान वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने अनुच्छेद 370 रद्द करणे हे अतिशय सकारात्मक पाऊल ठरेल. हो, आता यास काही साचलेली डबकी नक्कीच विरोध करतील; परंतु कोणताही बदल आणि  त्यातही सकारात्मक बदल हा स्वीकारायला कठीणच असतो. मात्र हेही तितकेच खरे की रात्रीच्या स्थितीत बदल घडला, तरच नवी पहाट दिसू शकते. होय ना?

    – विक्रम श्रीराम एडके.
    (लेखक इतिहासतज्ञ आणि वक्ते आहेत.)
    (मूळ लेखाची लिंक: http://magazine.evivek.com/?p=5921)

    image