Blog

  • खरेच गणेशविसर्जनाने प्रदूषण होते का ?

    खरेच गणेशविसर्जनाने प्रदूषण होते का ?

    खरेच गणेशविसर्जनाने प्रदूषण होते का ?

    गणेशोत्सव जवळ येऊ लागलाय त्याअर्थी आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन आणि त्याद्वारे होणार्या प्रदूषणाच्या नावाने शिमगा जोरजोरात सुरु होईल, हेही ओघाने आलेच. अर्थातच हिंदूंच्या प्रत्येक सणाला असा शिमगा होणे नित्याचेच असल्याने, सर्वांनाच या प्रकाराची सवय झाली आहे. हा आरडाओरडा करणारी मंडळी अन्यधर्मीयांच्या सणांच्या प्रसंगी विवेकवादी आणि पुरोगामी चिंतनात इतकी काही व्यस्त असतात की, त्यांना त्यातले प्रदूषण दिसतच नाही आणि दिसले तरी त्याबद्दल बोलावेसे वाटत नाही! असो.

    परंतू खरंच प्लॅस्टरच्या गणेशमूर्तींनी प्रदूषण होते का हो? केलाय कधी विचार? किंबहूना असे काही प्रदूषण होते हीच जर अंधश्रद्धेचे निर्मूलन करू म्हणणार्यांची अंधश्रद्धा असली तर? तसे असेल तर त्यांच्या या अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हायला नको? त्यासाठी आधी प्लॅस्टर ऑफ पॅरिस (रेणूसूत्र – 2CaSO4.1/2H2O) म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे.
    प्लॅस्टर ऑफ पॅरिसची निर्मिती CaSO4 अर्थात जिप्समला (सल्फेटच्या पाण्यात विरघळू शकणार्या प्रकारांपैकी एक – कॅल्शियम सल्फेट) सुमारे १५०° C तापमानावर तापवून केली जाते. सूत्राच्या दृष्टीने पाहिल्यास,

    प्लॅस्टर ऑफ पॅरिस = जिप्सम + पाणी

    बेल्जियमस्थित “युरोजिप्सम” या संघटनेने यासंदर्भात काही प्रयोग केले आहेत. या प्रयोगांचे निष्कर्ष १४ डिसेंबर २०१० रोजी अहवालरुपाने प्रसिद्ध करण्यात आले असून “सल्फेट पाण्याद्वारे पोटात गेल्यास त्यांचा मानवी शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नसल्याचे” त्यात स्पष्टपणे म्हटले आहे. या निष्कर्षाला ‘Sulphate in drinking water: interaction with human health’ by Dr. Maurice Arnaud – Eurogypsum workshop 25 Oct. 2007 चा ही आधार देण्यात आला आहे. अहवालात पुढे असेही म्हटले आहे की, “पाण्यात मुळातच सल्फेट असते; एवढेच नव्हे तर पेय खनिजजल विकणार्या अनेक कंपन्यांच्या उत्पादनांतही सल्फेटचे प्रमाण बर्यापैकी असते”. PoP हे जिप्सम आणि पाणी यांपासून बनलेले असल्याने त्याचाही शरीराला काहीच अपाय नाही हेही ओघानेच आले.
    अर्थात, हा अहवाल जिप्समउत्पादक कंपन्यांच्या संघटनेने प्रकाशित केलेला असल्याने तो ग्राह्य धरण्यात येऊ नये, असा युक्तिवाद कुणी करू शकतो. तेव्हा याबाबतीत भारताच्या “राष्ट्रीय हरित लवादा”चे (National Green Tribunal) काय म्हणणे आहे, हेही पाहूयात.
    ९ मे २०१३ रोजी लवादाच्या दिल्ली विभागाने एक निर्णय दिला, लवादाने “केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळा”चे (Central Pollution Control Board) म्हणणे अमान्य केले असून “प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे जलप्रदूषण होत नसल्याचे” स्पष्ट केले आहे. यासाठी लवादाने पुणेस्थित Srishti Eco-Research Institute (SERI) या संस्थेने Air Quality Management Cell यांच्यासोबत पुणे येथे केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आधारभूत मानला आहे.
    २०१२ साली केलेल्या या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार मुठा नदीत दररोज सुमारे १५ टन कचरा जमा होतो. गणेशमूर्तींच्या विसर्जनाने या रोजच्या कचर्यात १% हूनही कमी भर पडते. तीही वर्षातून एकदाच.
    SERI चे अध्यक्ष डॉ. संदीप जोशी यांच्या मते, “CPCB च्या निर्देशांनुसार पाहू गेल्यास PoP प्रदूषक असल्याचे कुठेच आढळत नाही. नदीत PoP च्या गणेशमूर्ती विसर्जित केल्याने प्रदूषण होते, असे महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळदेखील म्हणत नाही”. सुरेश वागवणकर या मूर्तीकाराच्या मते, “लोकांमध्ये उगाचच काहीतरी अपसमज आहेत. खरं तर PoP मुळे प्रदूषण होत नसून उलट शेतजमिनीची उत्पादनक्षमता वाढते”.
    PoP पाण्यात लवकर विरघळत नाही, ते तळाशीच साचून राहाते, PoP मुळे पाणी अल्कली होते; इ. मतेही लवादाने आपला निर्णय देताना अमान्य केली आहेत.
    यानिर्णयासंदर्भात “मिड-डे”च्या दि. १३ मे २०१३ रोजीच्या अंकात कै. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मत प्रसिद्ध झाले आहे. ते म्हणतात, “मूर्तीकार तर या निर्णयाचे स्वागत करणारच. परंतू आम्ही मात्र आमच्या मतांशी चिकटून राहाणार आहोत. आणि PoP च्या गणेशमूर्ती वापरू नयेत, असा प्रचार करीतच राहाणार आहोत”. आता डॉ. दाभोलकर आपल्यात नसल्याने मी त्यांच्याबद्दल काही टीप्पणी करीत नाही. परंतू न्यायिक संस्थेने दिलेले निर्णय मान्य न करणे, सत्याचा आधार नसतानाही आपल्याच मतांना चिकटून राहाणे, त्यांचा रेटून प्रचार-प्रसार करीत राहाणे इ. जर दुराग्रहाची आणि वैज्ञानिक दृष्टीच्या अभावाची लक्षणे असतील, तर डॉ. दाभोलकरांच्या उपरोक्त विधानाचे वर्गीकरण कश्यात करायचे याचा पुरोगामी विचारवंतांनी एकवार अवश्य विचार करावा.
    आपल्याच मतांना चिकटून राहाणारे अंधश्रद्ध लोक निदान भोळेभाबडे तरी असतात, परंतू स्वत:ला विज्ञानवादी म्हणवणारे पुरोगामीही जर असेच करत असतील तर त्यांच्या अंधश्रद्धेला काय म्हणावे, याचा एकदा विचार व्हायला हवा. शिवाय “आम्ही सांगू तीच तेवढी अंधश्रद्धा आणि केवळ तिचेच निर्मूलन झाले पाहिजे” या विचारसरणीला काय म्हणतात, याचाही आता विचार होण्याची वेळ आली आहे. शाडूच्या मूर्ती तुलनेने महाग असतात. त्या घेणे लोकांना परवडतेच असे नाही. तेव्हा विरोधकांचे याबाबतीत काही “अर्थ”पूर्ण हितसंबंध आहेत की काय, याही शक्यतेवर विचार व्हावयास हवा. तूर्तास श्रींच्या आगमनाचा मुहूर्त जवळ आला आहे, तेव्हा सामान्यजनांनी कोणत्याही भुलाव्याला न भूलता सुखकर्त्याच्या आगमनाच्या तयारीला लागावे. PoP ची मूर्ती अवश्य आणावी परंतू तिचे रंग नैसर्गिकच असावेत असा आग्रह मात्र धरावा. मूर्तींचे आपल्या परंपरेनुसार, कायद्यानुसार आणि शास्त्रानुसारच विसर्जन करावे. देव मानणार्यांसोबत तो न मानणार्यांनाही बुद्धीदाता श्रीगणेश सद्बुद्धी देवो, हीच विघ्ननाशकाच्या चरणी प्रार्थना! सर्वे सुखिनो भवन्तु!!

  • हुतात्मा राजगुरू – काही शल्ये, काही प्रश्न!

    हुतात्मा राजगुरू
    हुतात्मा राजगुरू

    आज २४ ऑगस्ट. अर्थात हुतात्मा राजगुरू यांची जयंती. विषय केवळ आजच्या दिवसापुरते त्यांना प्रणाम करण्याचा नाहीये. विषय आहे यानिमित्ताने जरासं आत्मपरिक्षण करण्याचा. जरा स्वत:ला विचारण्याचा की, ज्या माणसाने तुमच्या-माझ्या सुखासाठी अतिशय कोवळ्या वयात आपल्या प्राणांची आहुती दिली, त्याची आज जयंती आहे हे आपल्या लक्षात तरी होतं का? जयंती सोडा राजगुरूंचे संपूर्ण नाव तरी आपण गुगलचा आधार घेतल्याशिवाय अथवा कुणाला विचारल्याशिवाय सांगू शकतो का? संपूर्ण नावही राहू द्या, राजगुरू नावाची व्यक्ती कोण होती आणि तिने काय कार्य केले होते, हे तरी आपण धडपणे सांगू शकतो का? सौ बात की एक बात – मूळात आपल्याला राजगुरूंना प्रणाम करण्याचा तरी हक्क आहे का?
    मला नकारात्मकता पसरवायची नाही, परंतू खेदाने सांगावेसे वाटते की यांपैकी बहुतांश प्रश्नांची उत्तरे “नाही” अशीच येतील. का म्हणून आपल्याला या देशासाठी झटणार्यांना विसरायची आणि भलत्यासलत्यांनाच डोक्यावर बसवण्याची सवय लागलीय? भगतसिंह आणि त्यांचे कार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे, याचं कारण आहे भगतसिंगांच्या स्मृती जपण्यासाठी पंजाबने घेतलेली अपार मेहनत. राजगुरूंसाठी महाराष्ट्राने काय केले? शासकीय गोष्टी जरावेळ राहूद्या बाजूला, तुम्ही-आम्ही मराठी म्हणवणार्या लोकांनी राजगुरूंसाठी काय केले? राजगुरूनगरातील त्यांचा राहाता वाडा आज काय अवस्थेत आहे हे पाहाण्याची, किमान चौकशी करण्याची तरी तसदी घेतलीये का आपण?
    साधासा वेष करणारा, पोलादासारखे शरीर कमावलेला, अस्खलित संस्कृतात संभाषण करणारा, शब्दवेधी नेमबाजी करणारा, पिस्तुलाच्या केवळ एकाच गोळीने दूरवर असलेल्या स्कॉटचा मर्मभेद करणारा, मृत्यूलाही शहारे यावेत असे हाल तुरूंगात सोसूनही साथीदारांची नावे न सांगणारा, आपल्या अधिकारांखातर १०० दिवसांचे उपोषण करणारा (खरोखरचे उपोषण बरं का – मिडियाच्या गर्दीशिवाय आणि अन्नपाण्याविरहीत!), देशासाठी-धर्मासाठी फाशीचा दोरही हसत-हसत कवटाळणारा – असे सहस्रावधी गुण अंगी असणार्या या माणसात कधी आपण आपला आदर्श, आपला आयडॉल शोधण्याचा प्रयत्न केलाय? नाही केला. कोणत्या अचाट भावनेपायी हा मनुष्य वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी फाशी जाण्यास सिद्ध झाला, हे पाहण्याचा आपण कधी प्रयत्न केलाय? नाही केला. बाकी सारे राहू द्या हो – हा माणूस वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी फाशी गेला; जरा एकदा आपल्या मनाला विचारा की, आपण आपल्या वयाच्या २३व्या वर्षी काय करत होतो – तेव्हा कुठे आपल्याला राजगुरूंची थोरवी कळेल. खेदपूर्वक म्हणावंसं वाटतं की, कै. वि. श्री. जोशींचे “वडवानल” आणि तत्सम अन्य चार-दोन पुस्तके वगळता मराठी भाषेत राजगुरूंबद्दल सप्रमाण लेखनच झालेले नाही, यापरतें मोठे दुर्दैव कोणते? अर्थात हे दुर्दैव नेमके कुणाचे आहे, राजगुरूंचे की आपले, हा एक वेगळाच प्रश्न आहे. असो.
    अशी शेकडो शल्ये आहेत. अनेक प्रश्न आहेत की, ज्यांची उत्तरे नकारार्थीच आहेत. आज राजगुरूंची जयंती आहे, परंतू मला वाटतं की उपरोक्त प्रश्नांपैकी काही प्रश्नांची तरी उत्तरे आपण जेव्हा आपण नकारातून होकारात बदलू शकू, तेव्हाच आपल्याला राजगुरूंना आदरांजली वाहाण्याचा वा नमन करण्याचा अधिकार असेल. अन्यथा मुर्दाडांचा आदरही मुर्दाडच असतो, नाही का!

    – © विक्रम श्रीराम एडके.

  • हुतात्म्यांचा गौरव

    हुतात्म्यांचा गौरव

    खरे तर आपण राजकुमार संतोषी आणि राकेश ओमप्रकाश मेहरांचे आभारच मानायला हवेत. कारण, आजच्या पिढीला भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद “बिस्मिल”, अशफाकउल्ला खान इ. वीर हुतात्म्यांबद्दल जी काही थोडेफार माहिती आहे आणि या लोकांनी या देशाच्या बंधमोचनासाठी काहीतरी त्याग केला होता हे त्यांना कळले, ते याच दोन दिग्दर्शकांमुळे. हवं तर दुर्दैवी म्हणा पण ही वस्तुस्थिती आहे की, आमच्या देशाचे क्रांतिकारक त्यांच्यावर चित्रपट निघेपर्यंत आम्हाला धड माहितीही नसतात! बर्याच जणांना तर या वीरांची कथा चित्रपटात सांगितली तेवढीच फक्त माहिती आहे. त्यापलीकडे जाऊन या व्यक्तीमत्वांचा शोध घ्यायचा प्रयत्न यांपैकी किती जणांनी केला? वाईट वाटतं!
    चेतन भगतसारख्या सुमार लेखकाची सगळी पुस्तके वाचणारे अनेक तरुण सापडतील, पण एखाद्या थरारक कादंबरीहूनही अधिक रोमहर्षक आयुष्य जगलेल्या या हुतात्म्यांची पूर्ण नावेही त्यांना सांगता येणार नाहीत. हुतात्मा राजगुरूंचे किंवा सुखदेवांचे एवढेच कशाला अगदी भगतसिंहांचेही पूर्ण नाव काय असे विचारले तर हा लेख वाचणार्यांपैकी निम्मे जण गुगलचा आधार शोधतील.
    पंजाबातील लोकांच्या जागृतीमुळे आपल्याला भगतसिंहांबद्दल त्रोटक तरी माहिती असते, परंतू राजगुरू मराठी असूनही आपल्याला त्यांची माहिती चार वाक्यांपलीकडे सांगता येणार नाही. ही काय दर्जाची किळसवाणी उपेक्षा म्हणायची? या महायोद्ध्याला तर चित्रपटातही विनोदी पात्र बनून राहाणेच नशिबी आले. मूळचा खेड (राजगुरुनगर) येथील असलेला हा तरुण स्वकर्तृत्वाने काशीस संस्कृतचा पंडित बनला होता. ते इतके निष्णात होते की, संस्कृतमधून सहज संभाषण करीत असत. कुस्तीत त्यांचा हात धरणारा कुणीच नव्हता. नेमबाजीत ते शब्दवेधी होते, एवढेच नव्हे तर उताणे झोपून पाठीमागे असलेले लक्ष्यही ते बाणाने सहज उडवित (कधी प्रयत्न करा मग कळेल ही गोष्ट किती अवघड आहे ते!). स्वत:स कणखर बनविण्यासाठी रात्रीतून धावत-धावत १५-२० मैलांवरील स्मशानात जात, तेथील विहिरीत पोहत आणि तशीच दौड करीत पुन्हा येऊन झोपत, इतका त्यांचा दम (स्टॅमिना) होता. तासनतास मुंग्यांच्या वारुळावर बसून दाखवत, दंश झाले तरीही चेहर्यावरील रेषही न हलवता. एकदा तर त्यांनी एक जळती चिमणी एका हाताने दाबून फोडली, लोखंडी सांगाड्याचाही पार चुरा केला – हात भाजला, काचांनी रक्तबंबाळ झाले तरीही त्यांनी हुं की चूं देखील केले नाही! आणि त्याहूनही मोठी गोष्ट सांगतो. सॉंडर्स आपल्या टप्प्याबाहेर आहे, त्याला गोळी लागणे शक्य नाही अशी भगतसिंहांना शंका वाटत होती, परंतू राजगुरूंनी मात्र भगतसिंह नको नको म्हणत असतानाही तितक्याच अंतरावरून चालवलेला गोळी सॉंडर्सच्या दोन भूवयांच्या बरोब्बर मधोमध कपाळातून आरपार गेली. त्यांना परत लक्ष्याकडे पाहायचीही आवश्यकता भासली नाही. विश्वास न बसून भगतसिंहांनी नंतर त्या प्रेताला जवळून आठ गोळ्या मारल्या! असे होते राजगुरू!
    हे सगळे रामायण लिहिण्याचे कारण म्हणजे, आता २३ मार्च येतोय. केवळ त्यादिवसापुरताच या हुतात्म्यांचा गौरव नको व्हायला. तर तो त्यांच्यासारखं बनण्याचा संकल्पदिन ठरावा. “दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल” च्या भ्रमातून आपण केव्हाच बाहेर पडलो आहोत. आता जरा “आझादी” कुणामुळे मिळाली याचा अभ्यास करुयात. तरच महासत्ता वगैरे स्वप्ने पाहण्यात अर्थ आहे, नाहीतर सारेच स्वाभिमानशून्य आणि म्हणूनच व्यर्थ आहे!
    – © विक्रम श्रीराम एडके.
  • वसंत पंचमी

    वसंत पंचमी

    हल्ली “व्हॅलेंटाईन डे”चे सर्वत्र फॅड सुरू आहे. मी या दिवसाचा विरोधक आहे आणि म्हणून याला फॅड म्हणतोय असा कृपया समज करून घेऊ नका. मी फॅड म्हणतोय कारण, त्रयस्थपणे विचार केल्यावर कळते की या दिवसाचा आणि प्रेमाचा तसा काही संबंध नाही. ही फक्त प्रेमाच्या नावाखाली फुले, ग्रिटींग्ज आदी वस्तू विकण्याची मार्केटींग स्ट्रॅटेजी आहे, बाकी काही नाही. आणि पाश्चात्यांहूनही अधिक पाश्चात्याळलेले आपल्याकडचे तरुण याला बरोब्बर बळी पडतात. प्रेमाच्या नावाखाली या दिवसाची भलावण करीत अगदी पाच रुपयांचा गुलाब वीस रुपयांना घेण्यापासून सर्व मूर्खपणा सुरू असतो! मागे नाही का त्या हॉलिवूडवाल्यांनी त्यांचे पिक्चर चालत नाहीत म्हटल्यावर “डिसेंबर २०१२”चा बागुलबुवा उभा करून, त्यावर पिक्चर काढून, चालवूनही दाखवला होता! आणि वेडे लोक त्याच्याशी संबंधित सर्वच गोष्टी विकत घेत होते. मग त्यात पुस्तके आली, चित्रपट आले अगदी येऊ घातलेल्या जगबुडीपासून वाचण्याचे उपायही आले. थोडक्यात तुमच्या भावनांच्या नावावर तुम्हाला “येड्यात” (हा फारच सौम्य शब्द आहे. खरं तर इथे मला “च्यु”ने सुरू होणारा एक असंसदीय शब्द सुचतोय!) काढून त्यांच्या वस्तू त्यांनी तुमच्या गळ्यात मारल्या! व्हॅलेंटाईनच्या नावाखालीही तेच चालत नाही का? तुम्ही त्यांची दरवर्षीची हमखास बाजारपेठ आहात. चराऊ कुरण, बाकी काही नाही!
    असो. तो ज्याचा त्याचा प्रश्न. माझा आणखी एक वेगळा मुद्दा आहे. आपल्याला प्रेमाचा दिवस उधार घेण्याची का बरे गरज पडावी? जगातील मोठमोठ्या संस्कृती असलेल्या मोठमोठ्या देशांतील लोकांना जेव्हा कपडे घालण्याचीही अक्कल नव्हती, तेव्हा भारतीय संस्कृती तिच्या चरमावस्थेस पोहोचलीही होती. प्रेम, विशेषत: कामभावनेचा आपल्या संस्कृतीत जितका सखोल विचार केलाय, तितका क्वचितच अन्यत्र कुठे केला गेला असेल. केवळ आपल्याकडेच या विषयाला शास्त्र म्हणून मान्यता आहे. हा विषय आपल्याकडे सर्व थरांत शिकवला तर जायचाच, इतकेच नव्हे तर आदी शंकराचार्यांचा पराभव एका स्त्रीने केवळ याच एका विषयाच्या आधारावर केला होता (आठवतेय ना परकायाप्रवेशाची गोष्ट?), इतका हा विषय महत्वाचा आहे. मग आपल्याकडे प्रेमासाठी एखादा दिवसही राखून ठेवलेला नसावा का? आहे ना, अवश्य आहे. फक्त जरा व्हॅलेंटाईनच्या प्रभावातून बाहेर येऊन पाहाता आले पाहिजे! त्या दिवसाचं नाव आहे “वसंत पंचमी”! आपल्या संस्कृतीनुसार प्रेम व्यक्त करण्याचा दिवस, रति-मदनाच्या पूजेचा दिवस! आणि यात अभिप्रेत असलेले प्रेम आई-वडलांवरील, भावा-बहिणीवरील प्रेम नाही बरं (हो, व्हॅलेंटाईनच्या समर्थनासाठी काही लोक अश्या गोष्टी बोलतात, म्हणून म्हटलं)! यात नर-मादी यांचे एकमेकांवरील प्रेमच अभिप्रेत आहे. हो, क्युपिडपेक्षा आमच्या कामदेवाचा इतिहास अधिक जुना आहे! वसंतपंचमी दरवर्षी माघ शुक्ल पंचमीला असते. यावर्षी योगायोगाने ती १४ फेब्रुवारीलाच येतेय.
    आता पुन्हा एकदा आधीच्या “मार्केटींग स्ट्रॅटेजी” या विषयाकडे येऊ! किती दिवस परकियांची बाजारपेठ म्हणून जगणार आहोत आपण? आता प्रवाह उलटा फिरवायची वेळ आलीय असे नाही वाटत का? आधीच आपल्याकडील गोष्टींचे वेड असलेल्या पाश्चिमात्यांपुढे जर आपण वसंत पंचमीचे व्यवस्थित मार्केटींग केले, तर तिला व्हॅलेंटाईन डे ची जागा सहजच मिळवून देता येईल. नाहीतरी योग, पूजा, हवन आणि हिंदू अध्यात्म या गोष्टी पाश्चिमात्य जगात “स्टेटस सिम्बॉल” बनल्या आहेतच की! मग त्यात आणखी एकाची भर घालायला काय हरकत आहे? येऊ द्या की वसंतपंचमीच्या ग्रिटींग्स, रति-मदनाच्या “गुडीज्”, बाहुल्या वगैरे! विकूयात की त्यांना! कमवूयात की पैसे. घेऊ देत की क्युपिडची जागा कामदेवाला! आपल्याकडील हौशी उद्योजक तरुणांनी खरोखर वसंतपंचमीला एकप्रकारचे “थिमॅटीक” स्वरुप देण्यासाठी आत्तापासूनच जर मेहनत घ्यायला सुरुवात केली, तर पुढील वर्षीपर्यंत सहज मार्केटमध्ये उतरता येईल. फक्त या विषयाकडे एक संधी म्हणून पाहायची तयारी तेवढी हवी! एकतर स्वदेशी, त्यात हिंदू संस्कृतीशी घट्ट नाळ असलेले, भारताला परकीय चलन मिळवून देणारे आणि वर व्यवसायाची संधी, असा चौफेर फायदा! बरे वसंत-पंचमी संपूर्णतया वैज्ञानिकही आहे बरं का! यादिवसांत निसर्गाला नवी झळाळी प्राप्त झालेली असते, प्राणीही जोड्या बनवतात. अनेक प्रजातींचा हा विणीचा हंगामही असतो. म्हणून तर आपल्या हुशार पूर्वजांनी या काळाची निवड केली ना, प्रेम व्यक्त करण्यासाठी! इंग्रजांनी इंग्रजीची, किंबहुना त्यांच्याकडील सर्वच गोष्टींची व्यवस्थित जाहिरात केली, म्हणूनच तर आज आपण वेड्यागत त्यांचं अनुकरण करतो ना! आपल्याला फक्त गोष्टी “रिप्लेस” करता यायला हव्यात! काहीतरी सेलिब्रेट करण्यासाठी सतत झुरणारी चंगळवादी मंडळी ताबडतोब नवी फॅशन म्हणून आपल्यामागे पळतील! अर्थात, त्या गोष्टींची सात्विकता राखण्याचीही काळजी आपण घ्यायलाच हवी! आणि पाश्चात्य ती गोष्ट करू लागले की, पैजेवर सांगतो, आपल्याकडचे “काळे इंग्रज” त्यांच्याही पुढे चार पावले जाऊन त्यांचे अनुकरण करतील.
    चीनने फेंगशुईच्या बाबतीत काय वेगळे केले? आता आपली वेळ आहे. यावर्षी तुम्ही तर वसंतपंचमी साजरी कराच, परंतू जगालाही ती कशी साजरी करायला लावता येईल याचाही विचार करा! अर्थातच परंपरा आणि आधुनिकता यांचा योग्य संगम करून!
    व्हॅलेंटाईन डे ला नुसताच विरोध करीत राहिलात तर हाती काहीच लागायचे नाही. तरुणाई दुरावेल आणि विरोध होतोय म्हणून अधिकच जोषात व्हॅलेंटाईन साजरा करेल हा भाग वेगळाच. शिवाय विरोध करणार्यांकडे त्या तोडीची पर्यायी व्यवस्था आहे कुठे? या संधीच्या रुपाने तो पर्याय उपलब्ध होईल. तरुणांना त्यांना कळणार्या भाषेत हिंदू संस्कृती समजावून देण्याची संधी मिळेल. एक ना अनेक फायदे. गरज आहे ती हे सारे योजनाबद्धरित्या राबविण्याची. योजकस्तत्र दुर्लभ:!
    – © विक्रम श्रीराम एडके.

  • जो जीता वोही सिकंदर ???

    जो जीता वोही सिकंदर ???

    काल दूरचित्रवाणीवर एक प्रसिद्ध गीत पाहात होतो. बोल होते, “वो सिकंदर ही दोस्तो कहलाता हैं, हारी बाजीको जीतना जिसे आता हैं”! चित्रपटाचंही नाव साजेसंच होतं, “जो जीता वोही सिकंदर”. गेले दोन दिवस मी असत्याधारित, विकृत आणि राष्ट्राचा तेजोभंग करणार्या इतिहासाबद्दल लिहितोय. जे आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलोय -” जो जीता वोही सिकंदर” असं खरंच होतं का?
    अलेक्झँडर हा अतिशय महत्वाकांक्षी होता, विश्वविजयासाठी निघाला होता हे खरे. परंतू कोणत्याही अर्थाने विश्वविजयी नव्हता. ग्रीस ते इराणपर्यंतचे प्रदेश त्याने सहज जिंकले. भारताच्या सीमेवरील गांधारजवळची (अफगाणिस्तान) छोटीछोटी गणराज्ये पाहून त्याला नक्कीच आनंदाच्या उकळ्या फुटल्या असणार! मी यापेक्षा अनेकपट मोठी साम्राज्ये सहज जिंकली, ही छोटी राज्ये तर मी पाहातापाहाता फस्त करेन, अशी दर्पोक्तीही त्याने स्वत:शी केली असणार. परंतू कठ, ब्राह्मणक ही छोटीछोटी गणराज्येही संपूर्ण ताकदीनिशी अलेक्झँडरविरोधात उभी राहीली. शरण या सांगून कुणीच शरण जाईनात. प्रत्येकाने असा काही लढा दिला की, ग्रीक सैन्याला “विजय नको पण युद्ध आवर” असे होऊन गेले. त्यातच एक पूर्वी कधी न घडलेली गोष्ट घडली. स्वात खोर्यातील एका अज्ञात राष्ट्रवीराच्या विषारी बाणाने थेट अलेक्झँडरचाच वेध घेतला. प्रत्यक्ष सम्राटाचा वेध? त्याने कधी विचारही केला नव्हता की, एका लहानश्या राज्यातला एक अज्ञात सैनिक हे करेल! केवळ अलेक्झँडरचे सुदैवच की, तो वाचला. परंतू भारतीयांच्या पराक्रमाची त्याने धास्ती घेतली ती कायमचीच! त्याही परिस्थितीत त्याने वाटचाल चालूच ठेवली. परंतू पौरवांच्या छोट्याश्या राज्यानेही जेव्हा अलेक्झँडरला मार दिला तेव्हा त्याची अवस्था बिकट झाली. मनोधैर्य खचले. नि:संशय त्याने ही युद्धे जिंकली होती, परंतू या विजयाला काय महत्त्व होते? अहमदशहानेही पानिपत जिंकले होतेच की! परंतू तो विजय साजरा करण्याची त्याची कधी हिंमत झाली नाही. पळूनच जावं लागलं. दुसरीकडे ज्या मराठ्यांना इतिहास हरलेले म्हणून सांगतो, त्याच मराठ्यांनी अवघ्या दहाच वर्षांत पुन्हा दिल्ली काबीज केली! तेव्हा जय-पराजय हा तात्कालिक स्थितीवर अवलंबून नसतो तर दूरगामी घटनांवर अवलंबून असतो. अलेक्झँडरचेही असेच नाही का? त्याचे मनोधैर्य खचलेले, सैन्य पुढे जायला तयार नाही. सेनानायक बंडाची भाषा बोलू लागलेले. परत फिरण्यावाचून पर्यायच उरला नव्हता. विश्वविजयाला निघालेला अलेक्झँडर, भारताच्या सीमेवरूनच पळाला. छोट्याछोट्या गणराज्यांमुळे पळाला. मगधासारखी प्रचंड साम्राज्ये तर तो पाहूदेखील शकला नाही! सावरकर अगदी चपखल लिहितात,
    “असो कुणाचा जरी शिकंदर परंतू भारतजेता ना
    अंगणही ना तये देखिले कळलाही ना कुणा कुणा”
    असा हा अलेक्झँडर भारताचे अंगणही पाहू शकला नाही आणि उरलेल्या भारताला तर कळलंही नाही की असा कुणी आक्रमक हा देश जिंकण्याच्या हेतूने आला होता. अश्या माणसाला आपण जगज्जेता म्हणायचं का? काय अर्थ आहे, “जो जीता वोही सिकंदर” या म्हणीला? विचार करा. भारतातून गेल्यानंतर काही काळातच अलेक्झँडरचा मृत्यू झाला हेही उल्लेखनीय. भारत मात्र अजिंक्यचा अजिंक्यच आहे. आपण ग्रीक पचवले, शक, हूण आणि कुशाणही पचवले. ज्या टोळधाडीखाली सारे काही रगडले जात होते, त्या तुर्कांना आणि मुघलांनाही आपण नुसते पचवलेच नव्हे तर मांडलिकही केले. हा इतिहास आहे. आपला तेजस्वी इतिहास. कुणीतरी काहीतरी सांगते म्हणून तेजोभंग करून घेण्यात काय अर्थ आहे. विचार करा. अभिमान बाळगा. भविष्यातील विजयासाठी प्रेरणा घ्या! कृतिशील व्हा!
    – © विक्रम श्रीराम एडके.

  • मानवाधिकारछाप गोष्ट

    मानवाधिकारछाप गोष्ट

    एकदा काश्मीरातील एका जिहादी आतंकवाद्याने तीन जणांना पकडले – एक पुढारी, एक मानवाधिकारछाप (हा शब्द “कछुआछाप”च्या चालीवर वाचावा) पत्रकार बाई आणि एक भारतीय जवान!
    आतंकवादी म्हणाला, “तुम्ही तिघंही आता मरणार आहात. काही शेवटची इच्छा असेल तर बोला”.
    इच्छापूर्ती म्हटली की सर्वात पुढे पळण्याचा पुढार्यांचा स्वभावच असतो! आपले पुढारीबुवाही त्याला अपवाद नव्हते. पण इच्छा पूर्ण झाली की लगेच मरावे लागणार या कल्पनेने ते काहीच बोलले नाहीत. अतिरेक्याच्याच काय मनात आलं कुणास ठाऊक, त्याने पुढार्याकडे बोट दाखवले, “तू बोल”.
    पुढार्याने क्षणभर विचार केला. म्हणाला, “आयुष्यभर मला कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहायची, त्यांच्याकडून जयजयकार ऐकायची सवय. तुही माझ्या नावाने ‘की जय..!’ असे ओरड आणि हा जयघोष चालू असतानाच मला मार. म्हणजे मी समाधानाने मरेन”.
    अतिरेकी “ठीक आहे” म्हणाला. आणि पुढार्याच्या नावाने जयजयकार करतच त्याने त्याला गोळ्या घातल्या!
    आता क्रमांक सैनिकाचा होता. अतिरेक्याने त्यालाही शेवटची इच्छा विचारली. क्षणभर विचार करून सैनिकाने आपली इच्छा पुढे ठेवली,
    “मला मारण्याआधी तू मला एक जोरदार लाथ घाल!”
    अशी विचित्र इच्छा ऐकून शेजारी उभी असलेली बाईच काय(बाईंनी आजवर मानवाधिकाराच्या लंब्याचौड्या गप्पा खूप मारल्या होत्या, पण रक्त आणि त्यातही एखाद्याचा खून पहिल्यांदाच पाहिला होता. शिवाय पुढे काय वाढून ठेवलंय यामुळे भेदरल्याही होत्या बिचार्या!), तो अतिरेकीही चकित झाला! पण शेवटची इच्छा त्याने पूर्ण करायचे ठरवले होतेच.
    त्याप्रमाणे त्याने जवानाला समोरून एक जोरदार लाथ घातली. जवान अतिरेक्याच्या पायाशी कोसळलाच. आता अतिरेकी बंदुक ताणून गोळी घालणारा, इतक्यात ते घडले! डोळ्याचे पाते लवायच्या आत आणि कुणाला काही कळायच्या आत घडले! सैनिकानेवीजेच्या वेगाने इतका वेळ आपल्या कपड्यांत बेमालूमपणे लपवून ठेवलेला चाकू काढला आणि अतिरेक्याचे डोळेही विस्फारायच्या आत त्याच्या पोटात तिरका फिरवला! फाटकी आतडी बाहेर पडत, तोंडातून रक्त ओकत अतिरेकी कोसळला, मेला!
    शत्रूच्या रुधिराने न्हाऊन निघालेला तो शूर भारतीय जवान उभा राहिला. भेदरलेल्या बाईंना त्याने आधार देऊन बसवले. जरासे पाणी पाजले. शांत झाल्यावर न राहवून बाईंनी अखेर विचारलेच,
    “तुमच्याकडं जर लपवून ठेवलेलं शस्त्र होतं आणि तुम्ही त्याला मारू शकत होता तर आधीच का नाही मारलंत? त्याला लाथ का मारायला लावलीत?”
    सैनिकाने खांदे उडवले आणि शांतपणे म्हणाला, “त्याने जर मला आधी लाथ मारण्याआधीच मी त्याला मारलं असतं, तर परिस्थिती कशी का असेना, पण बाई, तुम्हीच उद्या तुमच्या चॅनेलवर मोठमोठ्याने ओरडत सुटला असता की, भारतीय सैन्य काश्मिरात गरीब बिच्चार्या काश्मिरींवर अत्याचार करते. शेवटी जे तुम्हाला टीआरपी मिळवून देतील, तुमच्या दृष्टीने मानवाधिकार केवळ त्यांनाच असतात ना!”
    (काही महिन्यांपूर्वी वाचलेल्या इंग्रजी रुपककथेचा मी केलेला स्वैर अनुवाद. मूळ लेखक अज्ञात.)

  • मेरा रंगदे बसंती चोला…

    मेरा रंगदे बसंती चोला…

    मेरा रंगदे बसंती चोला
    मेरा रंगदे बसंती चोला

    तिघा वीरांना फाशी होणार हे आता नक्की झालं होतं. तीन वीर – भगतसिंह, राजगुरु अन् सुखदेव – भारतमातेच्या उद्धारासाठी जन्माला आलेली त्रिमूर्तीच जणू! अवघ्या विशी-बाविशीतली कोवळी पोरं, परंतू आपलं आयुष्य आता संपणार याचं वैषम्य वाटण्यापेक्षा आपलं जीवन कृतार्थ झालं, याची धन्यताच त्यांच्या चेहर्‍यावर झळकत होती.
    जन्मठेप न होता फाशी झाली याचं दु:ख होत नाही का, असं कुणीतरी विचारताच राजगुरु सहजपणे म्हणाले, “अहो, जन्मठेपेवर गेलो असतो तर मरायला वेळ लागला असता. त्यापेक्षा फाशीने चटकन् मरु म्हणजे स्वातंत्र्यलक्ष्मीच्या सेवेसाठी पटकन् पुन्हा जन्मासही येता येईल, काय!” आणि मिष्किल हसत टाळीसाठी हात पुढे केला! हे धैर्य!!
    इकडे सबंध देश या तिघांसाठी आक्रंदत होता. आझादही अस्वस्थ होते. काय करावं? बाबाराव सावरकर तर सारे मतभेद विसरुन, मानापमान दृष्टीआड करून गांधींच्या भेटीसाठी वर्ध्यासही जाऊन आले. त्यांना विनंती केली, “बापू, लॉर्ड आयर्विनशी तुम्ही करत असलेल्या करारात क्रांतिकारकांच्या सुटकेचेही एक विधेय टाका”.
    “तसे केल्यास मी माझ्या अहिंसेच्या मार्गापासून ढळून हीन नाही का ठरणार”? गांधी उत्तरले.
    “असं कसं म्हणता बापू?”, सावरकरांचा प्रतिप्रश्न, “आणि जर तुम्ही हीन ठरणारच असाल, तर स्वामी श्रद्धानंदांचा खूनी असलेल्या अब्दुल रशीद या हिंसकासाठी रदबदली करून तुम्ही एकदा हीन ठरलाच आहात, तर मग यावेळी देशासाठी हीन ठरायला काय हरकत आहे?” यावर गांधींनी मौन बाळगले! त्या काळात गांधींच्या लॉर्ड आयर्विनशी तब्बल ८ भेटी झाल्या पण तिघा बाळांच्या सुटकेचा विषय काढून मौन सोडणे काही त्या महात्म्याच्या तत्त्वात बसले नाही.
    होता होता फाशीचा दिवस उजाडला. २३ मार्च! संध्याकाळी ७ ची अडनिडी वेळ ठरवण्यात आली होती. फाशी शक्यतो सकाळी होत असते, परंतू हे कृष्णकृत्य सकाळच्या मंगलप्रहरी करायचं धाडस सैतानी इंग्रज सरकारलाही झालं नसावं! सर्वत्र आणि सर्वांवरच एकप्रकारचा तणाव होता, तीन नायक सोडून. त्या तिघांचे हास्यविनोद चालू होते. अखेरच्या आंघोळीसाठी पाणी दिले तर त्यावेळीही तिघे मजेत गात होते, “मेरा रंगदे बसंती चोला… आई मला भगवी वस्त्रे परिधान करू दे..” अन्य बंद्यांच्या अंगावर सरसरून काटा आला नसता तरच नवल!
    त्रिदेवांना फाशीच्या तख्ताकडे चालवले. जातानाही तिघे मोठमोठ्याने घोषणा देत होते, “भारतमाता की जय!”, “लॉंग लिव्ह रिव्हॉल्युशन!” गुणगुणत होते,
    “मरके भी न निकलेगी दिलसे वतन की उल्फत ।
    मेरी मिट्टीसे भी खुशबु-ए-वतन आएगी ।।
    तिघांना फाशीघरात आणण्यात आले. तेथे एक काळा जल्लाद आणि गोरा मॅजिस्ट्रेट असे दोघे उपस्थित होते. त्यातही भगतसिंहांना लहर आली, ते त्या मॅजिस्ट्रेटला म्हणाले, “मॅजिस्ट्रेटसाहेब, तुम्ही मोठे भाग्यवान बरं का! आजवर तुम्ही अनेकांना फाशी जाताना पाहिले असेल, परंतू भारतमातेचे पुत्र तिच्यासाठी कसे हसत-हसत फाशी जातात, हे आज तुम्ही पहिल्यांदाच अनुभवाल! हा अनुपम सोहळा पाहणे सर्वांच्याच नशिबी नसते बरं!” तो मॅजिस्ट्रेट बिचारा काय बोलणार यावर?
    वेळ झाली. तिघांनी अभिमानभरल्या नजरांनी एकमेकांना अखेरचे पाहून घेतले. “वंदे मातरम्”चा जयघोष झाला. तिघांनाही फाशीच्या दोरांची चुंबने घेतली. चेहर्‍यावर मुखवटे चढले. जल्लादाने खटका ओढला. शरीरे थरथरली. यथावकाश खेळ संपला. तिघांपैकी कुणाच्याही माता-पित्यांस अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही इंग्रजांनी. तीन शरीरे संपली, तीन प्राण गेले. पण तीन आत्मे मात्र अमर झाले, कोट्यवधी भारतीयांच्या ह्रदयात…
    – © विक्रम श्रीराम एडके.

     

  • अवतार कल्पना

    अवतार कल्पना

    अवतार कल्पना
    अवतार कल्पना

    पृथ्वीवर जीवनाची उत्पत्ती पाण्यात झाल्याचा सिद्धांत चार्ल्स डार्विनने मांडला [संदर्भ: Darwin, Francis ed (1887), Vol. 3, “The Life & Letters Of Charles Darwin, Including An Autobiographical Chapter”, London : John Murray, Pg. 18]. आजही काही वर्ग सोडल्यास बहुतांशी शास्त्रज्ञ हाच सिद्धांत मानतात. यातूनच पुढे डार्विनचा उत्क्रांतिवाद जन्मास आला. मीही आज उत्क्रांतिवादच समजावून सांगणार आहे, पण जरा वेगळ्या प्रकारे! मला आकळला तसा. पहा पटतोय का!
    जीवनाची उत्पत्ती पाण्यात झाल्याचे ऋषींनी शोधले. जीवन निर्माण करणं परमेश्वराच्याच हातात, त्यामुळे त्यांनी या प्राथमिक जीवनास परमेश्वराचा, पालनकर्ती देवता श्रीविष्णूचा अवतार मानले. नाव दिले, “मत्स्यावतार”! पुढे आणखी उत्क्रांती झाली. आता जीव पाण्यासोबतच जमिनीवरही राहू शकत होता. याला आपण नाव दिलं, “कूर्मावतार”. आणखी थोडी प्रगती झाली. प्राथमिक स्तरावरचे रानटी प्राणी निर्माण झाले. याला आपण नाव दिलं “वराहावतार”! आता मानवही निर्माण झाला होता. वन्य मानव! पशुतुल्य रानटी मानव! हाच तो “नृसिंहावतार”! आता मानव माणसात येत होता. सुसंस्कृत होत होता. पण अजून पूर्णत: मानव न होता “वामन”च राहिला होता. हा झाला “वामनावतार”. हळूहळू मानव शस्त्रे वापरायला शिकला. सुसंस्कृत तर बनला, परंतू रानटी जीवनातील शीघ्रकोपीता अजून संपली नव्हती. हाच तो परशुधारी राम, अर्थातच “परशुराम”! आणखी थोडी प्रगती झाल्यावर मानव आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकला. त्याच्यातली मानवता वाढीस लागली होती. हाच तो मर्यादापुरुषोत्तम “श्रीरामावतार”! थोडा आणखी प्रगत झाल्यावर मानवाने सारी भौतिकता तर वश केलीच, शिवाय अध्यात्मावरही प्रभुत्व मिळवलं. त्याला म्हटलं गेलं, “श्रीकृष्णावतार”. कालौघात मानवाला भौतिक प्रगतीची क्षणभंगुरता कळून चुकली आणि अध्यात्म हेच शाश्वत सत्य असल्याचं जाणवलं. हाच तो करुणामयी “श्रीबुद्धावतार”! काहींच्या मते “आदी शंकराचार्य” हे नवमावतार आहेत. त्याही परिस्थितीत उपरोक्त विधान योग्यच ठरते! यापुढे असेल तो मानवीय उत्क्रांतिचा परमोच्च बिंदू, “कल्क्यावतार”! हा अजून व्हायचाय.
    काय, “दशावतार” संकल्पनेकडे याआधी कधी अश्या दृष्टीकोनातून पाहिलंच नव्हतं ना? हिंदुंची ही पौराणिक संकल्पना (काही अतिशहाण्यांच्या भाषेत दंतकथा) इतकी निखालसपणे वैज्ञानिक असेल, असं कधी वाटलंच नव्हतं ना? पण आता जे आहे ते आहे! अवतारांची अशी संकल्पना जगात फक्त हिंदूंकडेच आहे, तेव्हा ही शतप्रतिशत हिंदू ऋषिंनीच निर्माण केलीय, यात काही दुमत असायचं कारण नाही. काही जण म्हणतात की, बुद्धाचा दशावतारांत समावेश हा नंतरचा आहे. त्यांचं म्हणणं जरी खरं मानलं तरी, अवतारकल्पना किमान २००० वर्षे तरी निश्चितपणे जुनी आहे. शंकराचार्यांना नववा अवतार मानल्यासही ती किमान १२०० वर्षे जुनी ठरते. अर्थातच, त्यावेळी उत्क्रांतिवादाचा तथाकथित जनक मानला जाणार्या डार्विनचे पार खापर-खापर-खापर-खापर पणजोबाही काय करत होते, आणि कश्या परिस्थितीत जगत होते, हे काही मी वेगळे सांगायला नको!
    या अश्या संपन्न हिंदू धर्मात आपण जन्मलो याचा अभिमान बाळगा. आपल्या संस्कृतीरुपी महासागरात जरा डोळसपणाने बुड्या मारायला शिका. लक्षावधी मोती दडलेयत तिथे! आज मला एक सापडला, न जाणो उद्या तुम्हालाही सापडतील! या मोत्यांचा सर मातृभूस अर्पण करुयात. जिद्द बाळगुयात, प्रयत्न करुयात आणि भारतमातेस पुनरपि गतगौरव प्राप्त करून देऊयात!
    – © विक्रम श्रीराम एडके

     

  • अस्वस्थ मनाचे चिंतन

    अस्वस्थ मनाचे चिंतन

    आज सकाळी सकाळी जाग आली तीच मुळी जिया खानने आत्महत्या केल्याच्या बातमीने. ती काही माझी आवडती अभिनेत्री अथवा आवडती सौंदर्यवती नव्हती. आमच्यात समान म्हणावी अशी एकच गोष्ट म्हणजे, वय! अवघ्या पंचविशीच्या कुणाही तरुण जीवाचे जाणे जितके चटका लावणारे असते, तितकाच तिच्या जाण्याचा त्रास झाला मला.
    प्रत्येकासाठी आपापली दु:खे मोठी असतात हे खरे, पण कोणते दु:ख आणि कोणता त्रास इतका मोठा असतो की, परमेश्वराने दिलेली सगळ्यात मोठी भेटवस्तू – हे आयुष्यच संपवावेसे वाटावे? मी हिंदू संस्कृतीला, अध्यात्माला मानणारा माणूस आहे, त्यामुळे आजच्या भौतिक जगात तुम्हाला माझे म्हणणे खुळे वाटेल, पण आपल्यापैकी प्रत्येकाला परमेश्वराने काही ना काही उद्देश देऊन या पृथ्वीवर पाठवलेले असते असे मी मानतो. आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट कोणते हे शोधणे आणि सर्व शक्तिनिशी ते पुरे करणे, हे अतिशय रोमांचक आह्वान आहे! त्यासाठी आवश्यक ती सारीच शस्त्रास्त्रे परमेश्वराने आपल्याला बरोब्बर पुरवलेली असतात. ती न जाणता, न वापरताच खेळ असा अर्ध्यावर विस्कटणे, हा कुठला न्याय? हा रडीचाच डाव नव्हे काय? काही ना काही पेनल्टी तर द्यावीच लागणार ना मग त्यासाठी! ईशावास्योपनिषदातला तिसरा मंत्र सांगतो की, जे कुणी आत्महत्या करतात त्यांना मानवी जीवनाचे मूल्य कळण्यासाठी “असूर्य”नामक लोकात पाठवून दिले जाते. खरे-खोटे माहिती नाही, पण कर्म करणे परंतू फलांपासून मात्र पळणे हे बेजबाबदारपणाचे, पळपुटेपणाचे लक्षण आहे एवढे निश्चित!
    आणि संकटे कुणाला नसतात हो? स्वामी विवेकानंदांना आयुष्यभर ७३ प्रकारच्या व्याधी साथ करत होत्या! त्यातच त्यांचा अंतही झाला. पण त्याही परिस्थितीत त्यांनी विश्वविजय केला, सगळ्या जगाला हिंदू तत्त्वज्ञान समजावून दिलं! इतका त्रास सहन करण्यापेक्षा आत्महत्या सोपी, असा खुळचट विचार नाही केला त्यांनी. वीर सावरकरांनी अंदमानात सतत ११ वर्षे जे अमानुष अत्याचार भोगले, ते नुसते वाचले तरीही डोळ्यांतून पाणी येते. अनेकदा आत्महत्येचे विचार मनात आल्याचे सावरकरांनीच प्रांजळपणे लिहून ठेवलेय. पण म्हणून त्यांनी मातृभूमीला वाहिलेले हे जीवन संपवले नाही. उलट त्यांनी मृत्यूलाच ठणकावून सांगितले की, “अरे मृत्यो.. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला? अग्नि जाळिसी न मला खड्ग छेदितो, भिऊनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो!” आणि खरोखरच सावरकरांच्या या ललकारीने घाबरलेला काळ पुढे आयुष्यभर त्यांना स्पर्श करण्याचे साहस करू शकला नाही. शेवटी तो आला तोही सावरकरांच्याच इच्छेने, त्यांच्याच आमंत्रणाने! दुर्दैवाने या दोन्हीही महामानवांबद्दल जिया खानला किंचितशीही माहिती असण्याची सुतराम शक्यता नव्हती. खरं सांगू गेलं तर, स्वप्नरुपी बीजांत मुळातच ऊर्मी नसेल तर ते अडचणींच्या उन्हापुढे करपणारच ना! पण म्हणून बीज आणि आसपासची मातीच नष्ट करणे हे काही त्याला उत्तर होऊ शकत नाही. त्याऐवजी जियाने त्याला मेहनत, सकारात्मकता आणि विश्वासाचे खत-पाणी घातले असते तर बरे झाले असते, असे वाटते. असो. जाणारा जीव तर गेला. आता काही जरी वाटले, तरी त्याला काय अर्थ आहे? तिची कर्मे तिला आज ना उद्या भोगावी तर लागणारच. पण तिचे हे भोग लवकरच संपो, तिला सत्याची जाणीव होवो आणि तिला लवकरात लवकर सद्गती मिळो अशी मन:पूर्वक प्रार्थना मात्र मी करतो. जियाच्या जाण्याने भौतिकतेलाच सर्वस्व मानणार्या तरुणाईने काहीतरी धडा घ्यावा, हीदेखील अपेक्षा आहेच. बघूयात, ही अपेक्षा पूर्ण होते की नाही. शेवटी काळाइतके अनिश्चित, बलवान आणि उत्तरदायी दुसरे काय आहे!
    – © विक्रम श्रीराम एडके.

  • आपल्या इतिहासाचे प्रदूषण

    आपल्या इतिहासाचे प्रदूषण

    हिंदुत्वाचा दृष्टीकोन काही काळ बाजूला जरी ठेवला, तरीही आपल्याकडे अक्षरशः निस्तेज इतिहास शिकविला जातो, ही बाब खरोखर अक्षम्य आहे. आपण भारतीय मुळात अतिशय निकृष्ट दर्जाचे जिणे जगत होतो आणि सुरुवातीला मुघल व नंतर इंग्रजांनी आपल्याला सभ्यता, संस्कृती शिकवून आपल्यावर न भूतो न भविष्यति असे उपकार केले; अश्याच थाटात आपल्याकडे इतिहास – विशेषतः शालेय इतिहास मांडला जातो.
    “मुघलांनी या देशाच्या बहुसांस्कृतिकतेत भर घातली”, हे सांगताना “मुघलांच्या आगमनापूर्वी हा देश अतिशय शांततेने नांदत होता” हे सत्य का सांगितले जात नाही? बहुसांस्कृतिकता ही काही आपली गरज नव्हे! “इथे आलेले सगळेच तुर्की राजे हे एकजात रानटी, धर्मांध आणि विकृत वासनांनी पछाडलेले होते” हे सत्य का सांगितले जात नाही?
    मुघल साम्राज्याचा अधिकृत काळ आहे इ. स. १५८२-१८५७. म्हणजे सुमारे ३०० वर्षे. शालेय इतिहासाची पुस्तके उलगडून पाहा, या मुघल साम्राज्याबद्दल पानेच्या पाने भरून लिहिलेले असते. परंतू आपल्याला कल्पनाही नसते की, विजयनगरचे अतिप्रचंड, सुसंस्कृत आणि १००% स्वदेशी असलेले साम्राज्यही तितकीच, म्हणजे जवळजवळ ३०० वर्षे मोठ्या दिमाखात उभे होते (१३३६-१६४६)! का? कारण सोपे आहे. शालेय इतिहासाच्या पुस्तकात विजयनगरच्या वाट्याला पुरती ४ पानेही आलेली नसतात! परकीयांचा उदोउदो करण्यातून फुरसत तर मिळाली पाहिजे ना! या मुघल साम्राज्याचा माज उतरवणारे आणि सर्व जगात आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजविणारे मराठा साम्राज्य तरी महाराष्ट्र सोडून इतरत्र कुठे सविस्तर शिकविले जाते? आणि महाराष्ट्रातही “धार्मिक भावना” या बाष्कळ मथळ्याखाली शिवछत्रपती आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासावरून कात्री फिरविण्याचाच प्रयत्न होताना दिसत नाही का?
    परवा मी खानदेशात व्याख्यान द्यायला गेलो होतो. बोलता बोलता मी खानदेशातील निकुंभ (हल्लीचे निकम) राजवंशाबद्दल बोललो. या निकुंभ घराण्याने ८०० वर्षांहूनही अधिक काळ (१०००-१८५८) खानदेशावर सत्ता चालविली (Gazetter of the Bombay Presidency, Vol. XII, Khandesh). आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवले. एवढेच नव्हे तर ज्या अकबराला हल्ली चांगला ठरविण्याचा, महान प्रशासक वगैरे ठरविण्याचा प्रयत्न होतोय, त्या आक्रमक अकबरालाही या निकुंभांनीच हरवून हाकलून लावले होते. मला वाटले की, ही बाब सर्व श्रोत्यांना माहिती असेल. परंतू हा इतिहास कुणालाच माहिती नव्हता. तुरळक लोकांनी निकुंभांबद्दल केवळ ऐकले होते एवढेच! खरं सांगायचं तर त्या श्रोत्यांचा यत्किंचितही दोष नाही. आजच्या “सेक्युलर” वातावरणात निकुंभांसारख्या “सांप्रदायिक” राजांचा इतिहास शिकवलाच जात नाही याला कोण काय करणार? त्यांनी आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याऐवजी महान अकबरासारख्या “सेक्युलर” सम्राटापुढे हार पत्करली असती तर कुठेतरी त्यांचा उल्लेख व्हायची संधी तरी होती. निकुंभांनी आपल्याच कर्माने ती घालवली असेल, तर कुणाचा काय दोष? दोष सगळा त्या निकुंभांचाच, नाही का!
    ही अशी सगळी अवस्था आहे! ही तर फक्त १-२ उदाहरणे झाली. असा नि:सत्व इतिहास शिकविला जातो. त्याच्यापासून कुणाला काय प्रेरणा लाभणार? असा इतिहास शिकून मोठी झालेल्या पिढीला का म्हणून या देशासाठी लढावेसे वाटेल? का या देशाच्या इतिहासात योगदान द्यावेसे वाटेल? त्यांना स्वत:पुरताच विचार करावासा वाटला तर त्यांना दोष कसा काय देता येईल? लक्षात घ्या, देशासाठी काहीतरी करून दाखवायचे असेल तर ह्रदयात राष्ट्रभक्तीची आग असावी लागते आणि या आगीत इतिहासापासून घेतलेल्या स्फुर्तीचेच तेल ओतावे लागते – अन्यथा दुसरीकडून कुठून कार्यप्रेरणा मिळणार? प्रेरणेचा अभाव असणार्या पिढीकडून अपेक्षा तरी कशी काय करता येईल? म्हणजे आपणच गाढवे आणि खेचरे जन्माला घालायची, पण त्यांच्याकडून अपेक्षा मात्र श्यामकर्णी अश्वांच्या दर्जाची करायची अथवा आपण मातीची मडकी घडवायची परंतू त्यांनी पोलादी कणखरपणाच दाखवायला हवा असा अट्टाहास करायचा! याला काय अर्थ आहे?
    १५०० वर्षे चाललेल्या आक्रमणांच्या शृंखलेत मध्यपूर्वेतील आक्रमकांनी आपली केवळ डोकी मारली, परंतू अवघ्या १५० वर्षांच्या काळात धूर्त इंग्रजांनी कावेबाजपणाने बरोब्बर आपल्या डोक्यांच्या आतले मेंदूच मारले! त्याचेच हे असे परिणाम आपण आज भोगतो आहोत. यानंतरही अजून किती काळ भोगणार आहोत, देवच जाणे!
    – © विक्रम श्रीराम एडके.