Author: Vikram Edke

  • सावरकरांचे सामाजिक कार्य : एक वस्तुनिष्ठ आकलन

    सावरकरांच्या आयुष्याचे ढोबळमानाने ५ कालखंड पडतात. पहिला जन्मापासून ते अटकेपर्यंत. दुसरा अंदमानपर्व. तिसरा रत्नागिरीपर्व. चौथा सुटकेपासून ते स्वातंत्र्यापर्यंत. आणि पाचवा स्वातंत्र्यापासून ते आत्मार्पणापर्यंत. ह्या कालखंडांपैकी रत्नागिरीपर्वात सावरकरांनी अतुल्य समाजकार्य केलेले दिसते. इतके की, डॉ. आंबेडकरांच्या “जनता”ने (एप्रिल, १९३३; संदर्भ: सावरकर-चरित्र, कीर, आ. २००८, पृ. २०८) सावरकरांच्या कार्याची तुलना थेट भगवान बुद्धांशी केली आहे. परंतु सावरकरांवर जे अनेक आक्षेप घेतले जातात, त्यात प्रमुख आक्षेप हादेखील असतो की, सावरकरांनी रत्नागिरीतून सुटल्यानंतर अथवा रत्नागिरीत स्थलबद्ध होण्याआधी कोणतेही सामाजिक कार्य केलेच नाही. सदर आक्षेपाला सावरकरद्वेषाचे, जातीद्वेषाचे आणि राजकारणाचे अनेक कंगोरे आहेत. आपण त्यामध्ये न पडता केवळ ह्या आक्षेपात कितपत तथ्य आहे याचा वस्तुनिष्ठपणे विचार करु.

    सावरकरांना शिक्षा झाली ती वयाच्या २७व्या वर्षी! अवघ्या पंचविशीतल्या पोराने का बरं काही समाजकार्य केले नाही, असा प्रश्न जर कुणाला पडणार असेल तर ते हास्यास्पद व म्हणूनच उत्तर देण्याच्याही योग्यतेचे नाही. याकाळातच सावरकरांनी केलेले क्रांतिकार्य भल्याभल्यांना जन्मभर अभ्यासावयाला पुरेल एवढे मोठे आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अनेक सूक्ष्म पदर असलेले आहे. किंबहूना त्याच क्रांतिकार्याची शिक्षा म्हणून ब्रिटीशांनी सावरकरांना फाशीहूनही कठोर अशी काळेपाण्याची शिक्षा सुनावली (१९१०). परंतु त्याही काळात सावरकरांचे विचार काय होते ते मुख्यतः त्यांच्या काव्यातून समजतात. वास्तविक अभिजन वर्गात जन्माला आलेला हा मुलगा. त्यांना कोणत्याही प्रकारचा सामाजिक प्रश्न अजिबातच दिसला नसता, तरीदेखील तत्कालीन परिस्थितीला धरुनच असले असते ते. परंतु त्याही काळात सावरकर स्वदेश, स्वदेशी, स्वधर्म, स्वातंत्र्य इ. बाबत जागृत असल्याचे त्यांच्या लेखनातून पदोपदी दिसते. आपल्या “बालविधवा दु:स्थितीकथन” (१९०२) कवितेत अवघ्या १९ वर्षांचे सावरकर लिहितात —
    “ज्यांच्या गृहिणी जाती कालांतराने ते गृहस्थ होतात ।
    कन्यापुत्रही लाभती द्यायाला धीरही स्वस्थ हो तात ।।
    वृद्धाचा सुत गेला स्वांकी तो दत्तकासि घेईल ।
    स्वपिता मरता तद्विण सुत संसारी समर्थ होईल ।।
    सर्वांसि उपाय असे शास्त्राने वा सुरुढिने विहित ।
    परि न दया ये उभयान्वयी विधवांचे साधण्यास तेवि हित ।।
    शास्त्रे उपेक्षिल्या त्या छळिल्या रुढिने तयांत शतपट हो ।
    अबलांना विधवांना अजुनि तरी तारण्यास खटपट हो ।।
    आताहि जरी उपेक्षा दु:स्थितीतुनि त्यांसि उद्धारायाते ।
    तरि हा पातकपर्वत शक्त न होईल धरू धरा याते ।।
    वैदिक हो, भिक्षुक हो, उद्धारक हो, अहो सुधारक हो ।
    सदय मनाने कोणी अबलांना संकटात तारक हो ।।
    अवलोकिता न पतिचे वदनही वैधव्य मात्र अवलोकी ।
    क तत्पुनर्विवाहा प्राप्त असो संमती न तव लोकी? ।।”
    हा सावरकरांचा खडा सवाल आहे. सावरकर ह्यावर उपायही सांगतात —
    “सत्वर कडाड मोडा हानिद ह्या रुढिचा महा खोडा ।
    तोडा दु:स्थितीबेडी अबला तारोनि धवलयश जोडा ।।”

    किंबहुना सावरकरांच्या आयुष्याचा उद्देशच मुळी भारतभूमीचा सर्वंकष उद्धार करण्यासाठी शक्य होईल ते सारे काही करणे, हाच होता. हे जसे सावरकरांनी वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी घेतलेल्या प्रतिज्ञेत दिसते. तसाच त्याचा पुनरुच्चार “सागरास”मध्येही (१९०९) आढळतो. सावरकर लिहितात —
    “जगदनुभवयोगे बनुनि मी, तव अधिकशक्त उद्धरणी मी”!

    परंतु हिंदु धर्मातील जातीव्यवस्था व त्यायोगे राष्ट्राची होत असलेली हानी यांचे दाहक वास्तव सावरकरांना सर्वाधिक जाणवले ते अंदमानात. संख्येने मुठभर असूनही मुसलमान वॉर्डर हिंदू कैद्यांवर कसे काय अत्याचार करु शकतात, याचे उत्तर त्यांना सापडले ते हिंदू पाळत असलेल्या स्पृश्यास्पृश्यतेच्या घातक रुढीमध्ये! याविषयावर सावरकरांनी अंदमानात शक्य तेवढे कार्य केले. यातूनच जन्म झाला तो हिंदुसंघटनाचा. परंतु हिंदूंनी हिंदू म्हणून जगात एकत्र यायचे असेल तर जन्मजात जातीभेदाच्या बेड्या तोडल्या पाहिजेत, हे उघड होते. रत्नागिरीतील स्थलबद्धतेचा याकामी सावरकरांनी पुरेपूर वापर केला व जातीभेदावर सुसूत्रपणे हल्ला चढवला. एकप्रकारे स्थलबद्धता इष्टापत्तीच ठरली सावरकरांसाठी. जे कार्य डॉ. आंबेडकर विवर्ण स्तरातून करत होते तेच सावरकरांनी समाजाच्या सवर्ण स्तरातून केले. दोघांचेही कार्य परस्परपूरक होते. दोघांनाही एकमेकांबद्दल आदर होता व तो त्यांनी वेळोवेळी व्यक्तदेखील केलेला दिसतो. रत्नागिरीतील कीर-मंदिर अखिल हिंदूंना खुले करण्यात येणार होते. ह्या मंदिराचे उद्घाटन डॉ. आंबेडकरांच्या हस्ते व्हावे अशी सावरकरांची प्रामाणिक इच्छा होती. परंतु आधीच ठरलेल्या वेळापत्रकामुळे डॉ. आंबेडकरांना ते शक्य झाले नाही. याप्रसंगी त्यांनी सावरकरांना पाठवलेल्या पत्राचा उल्लेख आंबेडकर व सावरकर दोघांचेही चरित्रकार असलेल्या धनंजय कीर यांनी (सावरकर-चरित्र, कीर, आ. २००८, पृ. २०२) केला आहे —
    “सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करीत आहात त्याविषयी अनुकूल अभिप्राय देण्याची ही संधी घेत आहे. जर अस्पृश्यवर्ग हिंदुसमाजाचा अभिन्न भाग व्हायचा असेल, तर नुसती अस्पृश्यता जाऊन भागणार नाही; चातुर्वर्ण्याचे उच्चाटन झाले पाहिजे. ज्या थोड्या लोकांना ह्याची आवश्यकता पटली आहे, त्यांपैकी आपण एक आहात हे सांगावयास मला आनंद वाटतो”.
    दोघांच्याही अश्या परस्परपूरकतेमुळेच दोघांचाही उल्लेख कीरांनी “समाजक्रांतिकारक” असा केला असल्याचा संदर्भ शेषराव मोरेदेखील (सावरकरांच्या समाजक्रांतिचे अंतरंग, संक्षिप्त आ. २०१५, पृ. १) देतात.

    सावरकरांनी जर आपले कार्य सामाजिक क्रांतिपुरतेच मर्यादित ठेवले असते, तर अवघ्या ५ वर्षांच्या आतच त्यांनी सबंध हिंदुस्थानातून अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन करुन दाखवले असते. हे मत आहे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे (कीर, २०८) यांचे! मग आता प्रश्न असा उभा राहातो की, सावरकरांनी बिनशर्त सुटकेनंतर हे कार्य का थांबवले? वरवर पाहाता सावरकरांनी खरोखरच कार्य थांबविल्याचे दिसते. याची कारणे २! एक म्हणजे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी राजकारणाचा व्याप अंगावर घेण्याची आवश्यकता. आणि दुसरे म्हणजे पाकिस्तानच्या रुपाने भारताचे तुकडे पडण्याची येऊन ठेपलेली वेळ. ह्या दोन्हीही गोष्टी तत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने केव्हाही अधिक निकडीच्या होत्या. परंतु याचा अर्थ सावरकरांची समाजकार्याबाबतची आस्था संपली होती असे नव्हे. सावरकरांसाठी समाजकार्य हेच हिंदुसंघटन होते व हिंदुसंघटन हेच समाजकार्य होते. यामागचे साधेसोपे तर्कशास्त्र असे की, अस्पृश्यता नष्ट झाली तरच हिंदु संघटीत होऊ शकतील ना! त्यामुळे सावरकरांसाठी हिंदुसंघटनाचा अर्थ अस्पृश्यतानिर्मूलन हादेखील होताच. किंबहूना याच अर्थाने त्यांनी हिंदुमहासभेच्या ध्येयश्लोकात “अभ्युत्थानाय हिंदुनाम्” हे शब्द समाविष्ट करुन घेतले होते. “राजकीय सुधारणा व सामाजिक सुधारणा ही राष्ट्राच्या गाड्याची दोन चाके आहेत. यांतील कोणतीही सुधारणा मागे ठेवणे योग्य नाही. या दोन चाकांवर भारत देश पुढे न्यायचा आहे. कोणतेही चाक मागे राहून चालणार नाही” (समाजसुधारक सावरकर, केळकर, आ. १९८६, पृ. १२५). तसेच १९४३ मध्ये “सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले तर तीन दिवससुद्धा टिकणार नाही” (स्वा. सावरकर – अखंड हिंदुस्थान पर्व, बाळाराव सावरकर, आ. १९७६, पृ. २०२) ही सावरकरांची ह्याविषयावरील मते आहेत.

    एवढेच नव्हे, तर १९४७ साली ‘हरिजन सेवक संघा’चे श्री. वि. न. बर्वे यांना पाठवलेल्या पत्रात सावरकरांनी प्रकृती ठिक झाली की अस्पृश्यतेच्या घातक रुढीवर आणखी एक अखिलभारतीय चढाई करण्याचा मनोदय बोलून दाखवला आहे (तत्रोक्त, पृ. ३६९). दुर्दैवाने त्यानंतर वर्षभरातच गांधीहत्या झाली व स्वकीय सरकारच्या कारभारातही नाहक खटल्यात गोवले गेलेले सावरकर नवीन कार्य करण्याची उभारी कधीच धरु शकले नाहीत. अर्थातच वयाच्या १५व्या वर्षापासून जो देह सतत देशकार्यासाठी झिजला, त्यापायी नानाप्रकारचे त्रास व अपमान भोगले, त्याच्याकडून पुन्हा वार्धक्यातही नव्याने कार्य करण्याची अपेक्षा करणे हेच मुळी स्वार्थीपणाचे आहे. परंतु त्याही परिस्थितीत सावरकरांनी आपल्या मृत्युपत्रात हिंदुसंघटनासाठी तरतूद केल्याचे दिसून येते. यावरुनच सावरकरांना सामाजिक कार्याबाबत वाटत असलेली कळकळ लक्षात घ्यावी. सावरकरांचे मूल्यमापन द्वेषपूर्ण अथवा विरोधी भूमिकेतून न करता वस्तुनिष्ठपणे केल्यास, आजही भयाण असलेल्या सामाजिक वास्तवात सावरकरांचे कार्य व त्यासाठी त्यांनी वापरलेले अभिनव मार्ग दीपस्तंभ बनून मार्गदर्शन करताना दिसतील!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [सावरकरांच्या चरित्राचे अभ्यासक आणि सावरकरांवर व्याख्याने देणारे वक्ते. व्याख्यानांच्या आयोजनासाठी संपर्क www.vikramedke.com]

    image

  • हिंदू चैतन्याचे अवतार!!

    बाजीराव सरकारांचे सार्वजनिक व्यक्तीमत्त्व कसे होते? चिमाजी अप्पा एका पत्रात लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३०), “वाटेस घोड्यावर बसोन चालले होते. तेव्हा एके गावचा पाटील भेटीस आला. तेव्हा असावध होते. त्यामुळे पाटलासी सहजात बोलले, जे कोंबड्यांचे प्रयोजन आहे. घेऊन येणे”. इथे चिमाजी खरे तर रागावून लिहितायत की, राऊंनी उघडउघड पाटलाकडे कोंबड्या मागितल्या. परंतु बाजीराव असेच होते. राजकारणात कुटील, मात्र त्याव्यतिरिक्त जे मनात असेल तेच ओठांवर ठेवणारे शिपाईगडी. ते उघडपणे मांसाहार करीत. मद्यप्राशन करीत. त्याकाळी पाहायला गेलं तर दोन्हीही ब्राह्मण्याला न शोभणाऱ्या गोष्टी. परंतु तसंच पाहायचं झालं तर, हिंदुपदपातशाही हे एकच उद्दीष्ट मनी बाळगून पायाला भिंगरी बांधल्यागत देशभर ससैन्य संचार करणे तरी कुठे ब्राह्मण्यात बसते? बाजीरावांना जाणीव होती की, सध्याचा काळ हा धर्म-धर्म करीत बसण्याचा नाही, तर त्या धर्माचं रक्षण करण्याचा आहे. खाणे-पिणे हे गौण आहे. ज्याला सबंध समाजाला आपलंसं करायचं असतं, त्याला आपल्या घरातल्या परंपरा बाहेरही लादण्याचा अट्टाहास करुन चालत नसतं. सतत फिरतीवर असणाऱ्याने, मुलुखगिरी-शिपाईगिरी करणाऱ्याने तर खाण्याचे चोचले करुच नयेत. तिथे सोवळेपणाची अपेक्षाही मूर्खपणाची आहे. जे मिळेल ते आणि जसे मिळेल तसे खाण्याची तयारी हवी, तरच मोहीमा साधतात.

    बाजीराव असेच होते. त्यांचे सैनिकच नव्हे तर ते स्वतःसुद्धा कधीच मोहीमांवर शिदोरी नेत नसत. काय करायचेय निष्कारण ओझे? भूक लागली, तर शत्रूचा मुलुख लुटून खायचं. ते साधणारे नसेल, तर मिळेल त्या गावी, मिळेल ती मीठभाकरी खायची. कित्येकदा तर हे जगज्जयी मराठी सैन्य घोड्यावरुन उतरतही नसे. कुठूनतरी कणसं आणायची. हातावरच हुरडा मळायचा. पोटात ढकलायचा. आणि वरुन पाणी मारायचं. हे जसे शिंदे, होळकर, सोमवंशी, जाधव, पवार, विंचूरकर करीत; तसाच त्यांचा लाडका पेशवाही करी! सरदार, सैनिकांसोबत मोहीमा करायच्या आणि खाण्यापिण्याच्या वेळी मात्र स्वत:चं सामाजिक श्रेष्ठत्व कुरवाळायचं, असा दुटप्पीपणा बाजीरावांच्या स्वभावात नव्हता. ते आपल्या सर्व थरांतल्या सरदारांसोबत राहात. त्यांच्यासोबतच जेवत. सगळे मित्र गप्पा मारत. झोप आली तर आकाशाच्या पांघरुणाखाली फत्तराचं अंथरुण करीत ताणून देत. आपले धनी आपल्यातच मिळून मिसळून वागतात, हे जेव्हा सैन्याला दिसतं, तेव्हाच कुठे सैन्य एकजिनसी राहातं. आणि म्हणूनच पालखेडसारख्या मोहीमांमध्ये हजारों किलोमीटर्सचा प्रवास घडूनही सैनिकांपैकी कुणीच हूं की चूं केलं नाही अथवा बाजीरावांवर शंका घेतली नाही. कारण, त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसत होतं की; ज्या परिस्थितीतून आपण जातोय, जे खातोय, जसं राहातोय, तसंच आपला पेशवाही राहातोय. त्याने स्वतःसाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा बादशाही थाट केलेला नाही. आपले भोग हेच त्याचेसुद्धा भोग आहे. मग क्षोभ कसा काय होणार? हेच बाजीरावांच्या सैन्याच्या अजिंक्यतेमागचं एक अतिशय महत्त्वाचं कारण होतं. बाजीराव सैन्यात राहून जसे थट्टामस्करी करायचे, सैन्यासोबत एकत्र बसल्यावर गाणी गायचे तसेच प्रसंगी कुणी चुकलाच तर “शिपाईगिरी कशास करता? रांडा जाले असते तर कामास येते” (मस्तानी – द. ग. गोडसे, पृ. १६२) असे अस्सल भाषेत सुनवायचेसुद्धा! त्यामुळेच सैन्याला ते जास्त आपल्यातले वाटायचे.

    स्वतः शाहू छत्रपतींना बाजीरावांच्या ह्या गुणांची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी बहुतांश बाबतीत राऊंना स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळेच अनेकदा मोहीमांवर बाजीराव परस्पर निर्णय घ्यायचे, तरी बाजीरावांच्या निष्ठेबद्दल शाहू थोडीदेखील शंका बाळगत नसत. बाजीरावांवर कधीच नाराज होत नसत. उलट १७२८ मध्ये सातारा दरबारातील पेशव्यांचे मुतालिक लिहितात (तत्रोक्त), “..राऊ स्वामींची मर्जी अवघियांनी पालावी. त्यांचे चित्तास क्षोभ करु नये”! किंवा मस्तानीच्याही संदर्भात शाहूंचे चिटणीस गोविंद खंडो दि. २१ जानेवारी १७४० यादिवशी नानासाहेबांना लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३२), “ऐसियास राजश्री स्वामींची मर्जी पाहाता ते वस्तू (मस्तानी) त्याजबरोबर (बाजीराव) न द्यावी, ठेवून घ्यावी, चौकी बसवावी; त्यामुळे राऊ खटे जाले, तऱ्ही करावे ऐसी नाही”! एवढी मर्जी सांभाळत असत शाहू बाजीरावांची.

    दुर्दैव असे की, बाजीरावांचे हे वेगळेपण, देशकालपरिस्थितीनुरुप आवश्यक असलेली वागणूक, सामाजिक स्तरावर किती जरी क्रांतिकारक असली, तरी वैयक्तिक स्तरावर त्यांना कधीच समजून घेतले गेले नाही. मित्र, सैन्य आणि मालक कायमच बाजीरावांच्या बाजूने असताना त्यांना तत्कालीन इतरांची फारशी साथ लाभल्याचे दिसून येत नाही. राऊंच्या अकाली जाण्यामागे हेदेखील कारण आहे, असे वाटते. नासिरजंगला हरवून पुण्यासही न परतता खरगोण प्रांतातील जहागिरीची व्यवस्था पाहायला बाजीराव निघाले होते. जाताना त्यांनी “मस्तानीस तिकडे पाठवून द्या” असेही चिमाजींना सांगितले होते. चिमाजींनी ते मान्य केले. नानासाहेबांना लिहिलेल्या पत्रात चिमाजी लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३३), “पुण्यास गेल्यावर तिची रवानगी त्यांजकडे करावी, आपले निमित्य वारावे, त्यांचे प्राक्तनी असेल ते होईल ऐसा विचार केला आहे”. परंतु प्रत्यक्षात मात्र मस्तानीस न पाठवता काशीबाईंनाच रावेरखेडी पाठवण्यात आले. किचन-पॉलिटिक्सचे धागे हे असे गुंतागुंतीचे होते! काशीबाई येण्यापूर्वीच बाजीरावांना ताप भरला होता. त्या आल्यानंतर अवघ्या २-३ दिवसांतच बाजीराव गेले! इतरांचे माहिती नाही, परंतु स्वतः बाजीरावांच्या मनात अखेरपर्यंत कुणाबद्दलच किंतु नव्हता. २३ मार्च १७४० यादिवशी ते बुऱ्हाणपुराहून मातोश्री राधाबाईंना त्याच अप्पांबद्दलच्या काळजीपोटी लिहितात (रियासत, पृ. ३९५), “आपांस उष्णकाळामध्ये बाहेर जाऊ न द्यावे”.

    समकालीनांनी व उत्तरकालीनांनी बाजीरावांबद्दल काही का गैरसमज करुन घेतलेले असेनात, सर जदुनाथ सरकार मात्र दिघेंच्या “Peshwa Bajirao I & Maratha Expansion” च्या प्रस्तावनेत म्हणतात, “Bajirao was a heaven born cavalry leader. In the long and distinguished galaxy of Peshwas, Bajirao was unequalled for the daring and originality of his genius and the volume and value of his achievements”! परंतु मला सर्वाधिक भावते ते इंग्रज इतिहासकार सर रिचर्ड कार्नॅक टेंपल यांचे मत. आपल्या “Shivaji & The Rise of Marathas” ग्रंथात ते बाजीरावांबद्दल लिहितात, “He died as he lived, in camp under canvas among his men, and he is remembered to this day among the Marathas as the fighting Peshwa and the incarnation of Hindu energy”! Incarnation of Hindu Energy, अर्थातच “हिंदुंच्या चैतन्याचा अवतार”! केवढे चपखल विशेषण आहे हे. बाजीरावांचे अवघे आयुष्य अवघ्या चारच शब्दांत पकडणारे अमोघ विशेषण!! खरोखर बाजीराव हे हिंदूंच्या चैतन्याचे अवतारच तर होते!! त्यांनी आमची मरगळ झटकून टाकली व आम्हांला स्वाभिमान शिकवला. हिंदुपदपातशाहीची कल्पना आमच्या मनांत ठाम केली. छत्रसालसारख्या दूरदेशीच्या राजाला मदत करुन “हिंदू तेवढा एक” हा संदेश आपल्या कृतीतून दिला. स्वराज्याचे साम्राज्य केले. आणि हे सारे करताना, वैयक्तिक ऐषाराम, सुखदुःख, तहान-भूक यांची काडीमात्रही पर्वा केली नाही. स्वार्थ नेहमीच दुय्यम मानला. अवघे ४० वर्षांचे आयुष्य. त्यात अवघ्या २०व्या वर्षी पडलेली पेशवाईची अवघड जबाबदारी. केवळ २०च वर्षांत स्वराज्याचा चारही बाजूंनी अतोनात विस्तार करण्याचे कर्तृत्व. त्यासाठी अथकपणे लढलेल्या लढाया आणि सर्वच्या सर्व लढायांमध्ये अजिंक्यपद!! खरोखर तो एक झंझावातच होता. आमच्या फाटक्या झोळीत कधीच न मावणारा झंझावात. म्हणूनच आम्ही त्याला कधीच गवसणी घालू शकलो नाही. तो आला, कर्तव्य केले आणि वै. शु. १३, अर्थात २८ एप्रिल १७४० यादिवशी निजधामी निघूनसुद्धा गेला, आज नाही तर काहीशे वर्षांनी तरी आपले कर्तृत्व ह्या निद्रिस्त हिंदुसमाजास समजेल, ह्या खात्रीने!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    *लेखकाच्या नावाशिवाय अथवा स्वत:च्या नावाने कॉपी करुन या लेखामागील कष्टांचा अपमान करु नये.
    (लेखक बाजीरावांच्या युद्धनीतीचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. अधिक माहितीसाठी पाहा www.vikramedke.com)

    image

  • प्रवासचित्रे : ३. भारद्वाज

    व्याख्याने-कार्यक्रमांनिमित्त होणाऱ्या सततच्या प्रवासाने मला काय दिलं? तर जीवाभावाची माणसं आणि कोणत्याही, अगदी कोणत्याही पुस्तकातून कधीच मिळू शकणार नाही अशी शिकवण! परवा मुंबईच्या व्याख्यानावेळी मी अधिवक्ता श्री. भारद्वाज चौधरी यांच्या घरी राहायला होतो!

    चौधरीसाहेब म्हणजे एकदा नव्हे तर चक्क दोनदा युपीएससी फायनल पार केलेला माणूस. साधेसुधे वकील नाहीत, तर गेली ९ वर्षे थेट सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करताहेत ते. अपार बुद्धीमत्ता, निढळाच्या घामाने कमावलेली श्रीमंती आणि कट्टर शिवसैनिकाचं भाबडं मन; यांचा त्रिवेणीसंगम म्हणजे आमचे भरद्वाज चौधरी! बोलता बोलता ते त्यांच्या लहानपणीचे किस्से सांगत होते.

    घरी अठराविश्वे दारिद्र्य. पहाटेच लवकर उठायचं. आवरुन ५.२०ची गाडी पकडायची. ती शाळेपासून ३-५ किमी अंतरावर सोडायची. तिथून रोज पायपीट. एवढं करुन शाळेत पोहोचायला दोन-एक मिनिटं जरी उशिर झाला, तरी गेट बंद आणि दप्तर डोक्यावर घेऊन साडेसात एकरात पसरलेल्या मैदानाला पळत पळत चकरा मारण्याची शिक्षा! ठाण्यातली नामवंत शाळा ती. शाळा सगळी ब्राह्मणांची. शिक्षकही ब्राह्मण आणि विद्यार्थीही. हे एकटेच ब्राह्मणेतर – आगरी! सतत एवढ्यातेवढ्या कारणांवरुन शिक्षा व्हायच्या त्यांना. गृहपाठ तपासायचा असला की, शिक्षक म्हणायचे –
    “भरद्वाज, उभा राहा”!
    “केलाय मी गृहपाठ सर”!
    “तुला विचारलं? विचारलं मी? चल वर्गाच्या बाहेर हो”!
    अशी परिस्थिती. चूक कुणाचीही असो, मार भरद्वाजला!

    ते भरद्वाज चौधरी, माझ्यासारख्या ‘ब्राह्मणा’चे एका फोरस्टार हॉटेलात आतिथ्य करत होते. सारी कामे बाजूला सारत सतत सोबत करत होते. माझ्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार आपली गाडी दिमतीला देत होते, स्वतः चालवत होते. भावना निखळ मैत्रीची!! न राहावून मी शेवटी विचारलंच –
    “मग तुम्हाला नाही वाटलं इतरांसारखं ब्राह्मणद्वेष्टा बनावंसं? तुमच्याकडं तर कारणसुद्घा होतं. कुणीच दोष दिला नसता तुम्हाला ब्राह्मणद्वेष करण्यासाठी”!

    ह्यावर त्यांनी दिलेलं उत्तर मी आजवर ऐकलेलं सर्वोत्तम उत्तर होतं. तिथे फरक कळतो रिकामटेकडे बिग्रेडी आणि अतीव मेहनतीने सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेला बुद्धिमंत ह्यांच्यातला! “तुम्हाला नाही वाटलं ब्राह्मणद्वेष्टा बनावंसं?”, ह्यावर भरद्वाज एकाच वाक्यात उत्तरले –
    “ते लोक माझी गरीबी पाहून माझ्याशी वाईट वागले होते, माझी जात पाहून नव्हे”!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • प्रवासचित्रे : २. नीलेश

    “स्टेशनला येणार का”?
    “१०० रु. होतील”!
    “म्हणजे? मीटरप्रमाणे नाही घेणार का? कश्यासाठी बसवलंय मग ते”?
    “मीटरने परवडत नाही साहेब. तिकडून भाडं नाही मिळत लवकर. असं करा, ८० द्या”.
    “स्टेशनवरुन भाडं मिळणार नाही? कोण विश्वास ठेवेल यावर! मीटरप्रमाणे नेत असलात तर चला, ८० च काय १८० सुद्धा देईन”.
    “नाही जमणार”.
    “ठिकंय. दुसरी रिक्षा पाहातो मी”.

    एक बारीक चणीचा, तिशीचा दिसणारा मनुष्य आमची ‘चर्चा’ ऐकत होता. तो जवळ आला आणि मला म्हणाला,
    “साहेब, माझ्यासोबत चला. मीटरप्रमाणं न्हेतो”.

    मी जाऊन त्याच्या रिक्षात बसलो. त्याने खटका ओढला. जरा पुढं गेल्यावर तो बोलला,
    “किती म्हणत होता हो साहेब तो मा×××द”?
    “१००”, मी म्हणालो, “नंतर ८० पर्यंत आला होता”!
    “आईची ×× त्याच्या! ह्या असल्या मा××××मुळे आम्ही लोक बदनाम झालोय. लईतलई ५५ रुपये होतील इथून. कमवायचंच, तर ६० सांगायचे. पण हाव काय जगू देती का मान्साला”?

    त्याच्या बोलण्यावरुन मला दोन गोष्टी समजल्या. स्टेशनपर्यंत जायचे मीटरप्रमाणे ५५ रु. होतात, हे एक. आणि मकारारंभी शिवी त्याची आवडती दिसतेय, हे दुसरं! त्याच्या आवाजाने तंद्री भंगली माझी –
    “स्टेशनवर कुठं सोडायचं साहेब”?
    “शिवनेरी डेपोला”!

    या प्रश्नानंतर तशी संवादाला फारशी जागाच उरली नव्हती. मीही मुंबईला पोहोचून द्यायच्या असलेल्या व्याख्यानाचे मुद्दे मनात घोळवत शांत बसलो. पण त्याला गप्पा मारण्याची सवय असावी. तोच बोलला –
    “नीलेश नाव साहेब माझं. त्यो मा×××द तसलाचे! ह्या लोकांमुळं धंदा बदनाम होतो साहेब आमचा”!

    खरं तर हे फारच फिल्मी वाक्य आहे. “चँद लोगोंकी वजहसे पूरी कौम बदनाम होती है”, लेव्हलचं. ते कितपत खरं, माहिती नाही. पण त्याच्या पुढच्या वाक्याने मात्र मला त्याच्या बोलण्यात रस निर्माण झाला. नीलेश म्हणाला,
    “परवा एक ताई आलत्या. कल्याणीनगरला सोडा म्हणाल्या. मी न्हेलं. लई सामान होतं, त्ये मागं टाकलं त्यांनी. उतरल्या. गेल्या. मला तिथून बालेवाडीचं भाडं लागलं. तिकडून परत शिवाजीनगरला आलो एकाला घेऊन. तो उतरता उतरता म्हन्ला, तुमचं सामान मागच्या मागं कुणी मारुन न्हेईल, जपून ठेवा. मी विचार करायला लागलो, आपलं सामान? म्हनून मागं जाऊन पाहिलं तर ल्यॅप्टाप! जास्त डोकं खाजवावं नाही लागलं. सकाळच्या ताईशिवाय कुनाचा असनार? तसाच ग्येलो कल्याणीनगरला त्यांना जिथं सोडलं तिथं. त्या शोधतच होत्या. लई रडत होत्या. दिला ल्यॅप्टाप. आपल्याला काय करायचंय? मला १००० रु. काढून द्यायला लागल्या त्या. म्हने, माझं सगळं कालेजचं काम होतं ह्याच्यात, हरवला असता तर करियर बर्बाद झालं असतं. मी म्हन्लं, ह्ये माझं मीटर. चालूच ठेवून आलोय. ह्यात झालेयत त्येवढे द्या. वर काही नको मला”!

    “मग”?

    “त्यांनी दिले. मी आलो. आयुष्यात काय कमवायचं साह्येब? मानसं कमवली तर सगळं कमवलं. त्यांच्या १००० रु. वर मी माडी बांधनार न्हवतो. तुमच्या १०० रु. वर त्यो मा×××द माडी बांधनार न्हवता. आयुष्य ह्ये असलंये”!

    मला त्याच्या साध्यासरळ तत्त्वज्ञानाची गंमत वाटत होती. कुणीतरी श्रोता लाभलेला पाहून त्यालाही बोलण्यात आनंद वाटत होता. तो उत्साहात येऊन म्हणाला,
    “साहेब मी फक्त एकालाच मानतो. मानसं जोडनं पन मी त्याच्याकडूनच शिकलो. द्येव होता त्यो. ह्ये बगा..”
    असं म्हणून त्याने त्याचा मोबाईल माझ्या हातात दिला. मी की-पॅड उघडलं. समोर वॉलपेपरला एकच फोटो होता –
    “बाळासाहेब ठाकरे”!
    आम्ही दोघेही एकदमच म्हणालो. त्या प्रतिमेपुढे बोलणंच खुंटलं. शब्दाला नि:शब्द आणि काळाला स्तब्ध करणारा माणूस तो. त्यांना देव मानणारे लक्षावधी लोक मला सच्चे वाटतात. नीलेशही क्षणार्धात मनाला स्पर्शून गेला!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा – www.vikramedke.com]

  • वैनतेय

    काल तू मला मारलं होतंस ना,
    पाहा आज मी पुन्हा उभा राहिलोय!
    तू करुन टाकलं होतंस छिन्नविच्छिन्न मला,
    मी ते सगळे तुकडे गोळा केले
    आणि सांधलंय बघ हे देहभर आभाळ!
    आजपासून इथे बरसतील केवळ असण्याचेच मेघ,
    होय मी आहे अजूनही, मी आहे आणि मी राहाणार,
    मी असलो आणि नसलो तरीही नेहमीच तुझ्या अपराधगंडाने सडलेल्या मनात,
    मी राहाणार!
    कारण.. कारण, तूच तर होतास ना मला तोडून-मोडून फेकणारा?
    तू मला तोडलंस आणि पाहा, मी झालोय कृष्णबासरी!
    अवघं वृंदावन डोलवण्याची ताकद आहे माझ्यात आज!!
    तुझा एक एक घाव जरी मला संपवण्यासाठी होता तरी नव्याने मला माझ्याच दगडात माझ्याच हक्काचा देव सापडत होता त्यातून..
    कशी झळाळून उठलीये माझी मूर्ती नाही?
    पण तू मला जाळलंस..
    तू मला जाळलंस आणि पाहा तरी, मी स्वतःच बनलोय एक अग्निकंकण!!
    वेड्या, तुझ्या क्षुद्र स्वार्थापायी माझी राख-राख करताना एक गोष्ट पार विसरुन गेला होतास तू अरे..
    की सगळ्याच राखेतून फिनिक्स उभे राहात नसतात काही!
    काही काही राखेतून वैनतेयसुद्धा जन्माला येत असतो!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [www.vikramedke.com]

    image

  • तेरा नाम

    लफ़्ज़ अटक-अटकके आते है इन दिनों
    ख़यालात बिखरतेसे जा रहे है
    बदमाश बदली चिढ़ाती है तेरा नाम ले-लेके
    दिलके दोशमें उलझसा जाता हूँ मैं तब..
    तब वहीं तेरा नाम खुद एक नज़्म बनके चलता है मेरे साथ
    सुलझाता है वह खयालोंके धागे, जो अस्तव्यस्त पडे रहते है किसी सुर्ख़ जगह..
    ऐसी जगह, जहा ना सुरज होता है उपर ना पाँवोंतले ज़मीं
    बस यहीं सोचके रह जाता हूँ मैं की –
    यह किस नदीमें बहता चला जा रहा हूँ मैं,
    ना हाथमें पतवार है, ना बहावको कोई दिशा
    साथ है तो बस इक तेरे नामकी खुशबू
    जो खींचके ले जा रही है दूर कहीं
    शायद उस पार ख़ुदा होगा
    शायद उस पार तुम होगी
    या फिर शायद तुम दोनोंही होंगे उस पार
    कहीं तुम दोनों एकही तो नहीं?

    — © विक्रम श्रीराम एडके
    [www.vikramedke.com]

    image

  • प्रवासचित्रे : १. षण्मुगम

    सोलापूरात बाजीराव सांगून निघालो, तर रेल्वेत षण्मुगम भेटला. अर्थात, भेटला असं मी आत्ता म्हणतोय. भेटला तेव्हा तर आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो – ना नाव माहिती होते! माझ्या शेजारच्याच आसनावर तो बसला होता. लुंगी सांभाळत नाश्त्याची कसरत चालली होती त्याची. गडी साधारण चाळीशीचा. त्यातून तमिळ, हे बघताक्षणीच समजत होतं. आता तमिळ म्हटलं की, माझे अष्टसात्त्विक भाव जागृत होतात खरं तर, पण त्या राज्याला प्रचंड बुद्धीवैभव असूनही मख्ख चेहऱ्याचा आणि भिडस्तपणाचा शापच आहे की काय, न कळे. षण्मुगमच्या चेहऱ्यावरचे त्रयस्थ भाव पाहून मी स्वत:हून काहीच बोललो नाही. कानात रहमान घातला आणि ब्रह्मानंदी टाळी लागली माझी.

    जरावेळाने त्याने एक तमिळ मासिक काढले आणि वाचत बसला. तो वाचत असलेल्या लेखाच्या शीर्षकातली अक्षरे लावायचा मी आपसूकच प्रयत्न करु लागलो – “पा.. सं.. गा.. २”! आता यात माझ्या तमिळ अक्षरज्ञानाचा वाटा किती आणि लेखावर असलेल्या ‘सूर्या’च्या चित्राचा वाटा किती, हा एक संशोधनाचाच विषय ठरावा! कानात इयरफोन्स असले की, माणूस अंमळ मोठ्यानेच बोलत असतो. माझे हे तमिळ-साक्षरता अभियान षण्मुगमने ऐकले आणि हसला. मीही तत्परतेने इयरफोन्स काढले.
    त्याने विचारले, “नी तमिळाऽ (तुम्ही तमिळ आहात का)?
    मी बावरुन म्हणालो, “इल्लऽसाऽऽर, येनक्के तेरीयो.. कोंचोकोंचो (नाही सर, मला येते थोडी थोडी)! ना मराठी ईर्कऽ (मी मराठी आहे)”!

    त्याला आश्चर्य वाटले. मराठी असून या माणसाला तमिळ कशी काय येते? कोणत्याही तमिळ माणसाने विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर देणे मला सर्वाधिक रम्य वाटते. मी त्याला रहमानबद्दलची माझी आवड सांगितली. कसं त्या आवडीपायी तमिळ गाणी ऐकायला सुरुवात केली, तेही सांगितले. अर्थ कळत नसायचा, त्यामुुळे इंटरनेटवर अर्थ शोधू लागलो. त्यातून काही शब्द समजले. मग कुठून शिकता येईल ही भाषा? मी तमिळ चित्रपट पाहू लागलो. सब-टायटल्स वाचून शिकू लागलो. कामानिमित्ताने चेन्नईवारी होणार असेल, तर चुकवत नाही मी. गेली ९ वर्षे हाच क्रम आहे माझा. असे करुन करुन आता मला तमिळ ३०-४०% बोलता येते आणि ५०-६०% समजते!

    हे सारे मी त्याला थोडे हिंदी, थोडे इंग्रजी, थोडे तमिळ असे सांगितले. कुणीतरी आपल्या राज्याची भाषा शिकण्यासाठी एवढी मेहनत घेतंय, हे ऐकून त्याला धक्का बसला. अभिमान वाटला. या संमिश्र भावनांनी काहीसा अंतर्मुख झाला षण्मुगम. जरा वेळ कुणीच काही बोललं नाही. रेल्वेची लयबद्धता तेवढी शांततेवर लकेरी उमटवत होती. विचार केल्यासारखा चेहरा करुन षण्मुगम बोलला,
    “म्येरा पूरा बाचपान चेन्नै में गया. म्येरा मामा ता वुदर. कपडा का बिजनेस करता ता वो. मैं तो कबी इस्कूल गया नै. मेरेको क्या आयेगा? बाचपानसेई मामा का पास जानेकू ओना. वो मे को सिकाता, बिजनेस. मई बारा साल का ता, जब वो मे को पूणा ले आया. और बोला, मैं चार दिन बाद आयेगा. ये तेरा कोली. इदर रैनेका. मैं डर गया. पर वो माना नै. मेको सौ रुपै देके चला गया. वो चार दिनमें बोत मराटी सिका मैं. बूक तो लगती ना. प्यास तो लगती ना. सिका. काना बोलना सिका. पीना बोलना सिका. चार दिन बाद मामा आया तो मै पूरा मस्त देकके बोत कुश उवा. बोला, अब तू तैय्यार ओ गया. पिर मामाने कबी पूणाके उदर द्यान इ नै दिया. मैं चेन्नैसे कपडा लाता. बेचता. अबी मामातो मर गया. पर मैं अकेला पूरा माराष्ट्र गूमता. कपडा बेचता. उंगंऽ मोळीऽ.. क्या कैते उसकू..”?

    “भाषा”, मी म्हणालो.

    “आं! तुमारा बाषा की वजऽ से. सब समजता मे को. काली बोलते नै आता”!

    मला आता षण्मुगमच्या कथेत रस वाटू लागला होता. पण आम्हां वकीलांचं एक तत्त्व असतं. समोरच्याला पूर्ण मोकळं होऊ द्यायचं. फारच भरकटू लागला तर त्याला रुळावर आणायचं, की सुरु पुन्हा गाडी! षण्मुगम पुढं सांगू लागला,
    “अबी तुमने ये पडने का कोशिश किया. मैं तो कबी इस्कूल गयाई नै. पिर बी पडता. देक-देकके, सुन-सुनके. तमिळ पडता. इंग्लिश पडता. इंदि पडता. बिलकुल तुमारे जैसा. बिजनेसमें नजर बोत लगती. वो काम आता सिकनेको. तुम बोला वो सुनके मेैं को अपना बाचपान याद आया”!

    मी ऐकत होतो. मध्येच तो एखादा हिंदी शब्द अडला, तर सांगायचो मी. तो पुन्हा बोलू लागला,
    “मैं गरीब अन्पड. पिर बी सिका. मेको बोत गुस्सा आता जब कोई बोलता, ‘तमिळ बोत मुश्किल’ या ये-वो बाषा बोत हार्ड. ऐसे कैसे ओ सक्ता? बाषा आदमीके वास्ते बनाई, आदमी बाषा के वास्ते नई. अगर कोई ओर बोलता तो तुम बी बोल सकता”.

    जगाच्या दृष्टीने अडाणी असलेला षण्मुगम भल्याभल्या सुशिक्षितांना न समजलेलं तत्त्व सांगत होता –
    “आदमी दुसरे आदमीका बाषा सिकेगा तो ई तो दुनियामें बात ओगा. ये मेरा बाषा, ये तेरा बाषा करके बैटे तो किसीको कुच नई मिलेगा. अपनी बाषा का प्राऊड ओना. पर उससे सिकना नई रुकना चाईए. जितना ज्यादा सिकेंगा उतनी अपनी कुद की बाषा और प्यारी लगती. सिकना. लेकीन अपनी बाषा, अपनी माँ को कबी गाली नई देना. तुमारा रजनीकांत अमारा तलैवा. कैसे बना? अमारा दिल जीत के ना! अबीबी मराटी बोलता वो. तमिळसे प्यार करता. पर मराटी चोडके नई”!

    आम्ही खूप गप्पा मारल्या नंतर. तमिळ गाण्यांच्या भेंड्या लावल्या. त्याला मराठी बोलायला लावलं. चांगलीच दोस्ती झाली आमची. कोण कुठला हा षण्मुगम, आयुष्यात पुन्हा कदाचित कधीच भेटणार नाही मला. पण अशिक्षित माणूस सुशिक्षिताला काहीतरी शिकवून गेला. धूमकेतूसारखा आला आणि मनोगाभाऱ्यातला एक कोपरा उजळून गेला. इतरवेळी त्या कोपऱ्यात सुशिक्षितपणाच्या माजाचाच अंधार साचलेला असायचा!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • सावरकर नावाचा ब्रॅण्ड!!

    नव्याने विमानात बसणाऱ्यांची एक बेक्कार गंमत होते. उद्धरिणीने (लिफ्ट हो!) जाताना कसं वजनरहित वाटतं आणि डोकं पिसाहून हलकं होतं, तसं वाटतं. आणि त्या अवस्थेत प्रतितास शेकडो किलोमीटर वेगाने आपण हवेत तिरके भिरकावलो जात असतो!! बाऽबोऽऽ!! शब्दातीत अवस्था असते उड्डाण म्हणजे!! यात एक वेगळाच त्रास होतो. कान भयानक दुखतात. हवेचा दाब सतत बदलत असतो. त्यामुळे कानांवर प्रचंड ताण येतो. जरा कुठं वर-खाली झालं की, “पुटूक पुटूक” आवाज करत कानात लहानसे स्फोट होतात की “सुंईईईऽऽ..” आवाज करत अडकून राहिलेली हवा निघून जाते. परत नव्याने दाब. तात्पुरता बहिरेपणा येतो. उतरल्यावरही कित्येक तास कान दुखत राहातात. यासगळ्यात नाक व तोंड दाबायचं आणि प्रयत्नपूर्वक कानावाटे श्वास सोडायचा, ह्या द्राविडी प्राणायामाची निराळीच गंमत असते!!

    मुंबई ते चेन्नई प्रवासात फारच त्रास झाला मला. कारण असं काही होईल याची कल्पना होती, पण इतकं होईल असं कुणाला वाटतंय!! त्यातून हवाईसुंदरीला मी फारसा आवडलो नसावा, कारण तीनतीनदा बोलावल्यावर तिने शेवटी कापसाचे बोळे आणून दिले. तशी ती पण नुसती “हवाई”च होती मेली, “सुंदरी” तर औषधालाही नव्हती! शेवटी व्हायचा तो त्रास झालाच. पण तिथून पुढे चेन्नई ते पोर्टब्लेअर प्रवासाच्या वेळी मात्र मी मानसिक तयारी करुन ठेवली होती. त्याप्रवासात काही मला खिडकीजवळची जागा नव्हती मिळालेली. उजव्या रांगेतली पहिली जागा. दोन तमिळ ख्रिश्चन कुटूंबे बिचारी माझ्यामुळे निम्मी इकडं आणि निम्मी तिकडं झालेली. नवरे, बायका आणि चिल्लीपिल्ली! “तमिळ” म्हटलं की मुळातच माझे अष्टसात्त्विकभाव जागृत होतात. का कोण जाणे पण मला मी मागच्या जन्मीचा तमिळ वाटतो, इतकी ओढ वाटते मला त्या भाषा आणि संस्कृतीबद्दल. त्यामुळे मी त्या अण्णा-अम्मांशी मोडक्यातोडक्या तमिळमध्ये गप्पा सुरु केल्या!

    त्यांच्यातले एक अण्णा कोटक बँकेत कामाला होते. मग देशाची सध्याची अवस्था, मोदी-बिदी असले “लडकोंवाले” विषय बोलून झाल्यावर गाडी हळूच “अंदमानला कश्यासाठी?” ह्या प्रश्नाकडे वळली. ती कुटूंबं सप्ताहान्त साजरा करायला सहज म्हणून चालली होती. मला विचारलं तर मी सांगितलं की, “महाराष्ट्रातून आम्ही काही लोक चाललोय अंदमानला. सावरकरांसाठी! आम्ही नुसते फिरणारच नाही आहोत तर मी व्याख्याने देणार आहे तिथे सावरकरांवर. त्यासाठी वक्ता म्हणून चाललोय”, वगैरे वगैरे. यावर साहजिकपणे त्यांनी विचारलं की, “कोण सावरकर बुवा”? बास!! नाहीतरी महाविद्यालयीन काळात एका बिग्रेडी प्राध्यापकाला नडलो होतो त्यावेळी त्यांनी हताश आवाजात म्हटलेच होते, “तू जिथं-तिथं सावरकर घुसडतोस सतत”! इथे तर सरळ समोरुन प्रश्न आला होता, “कोण सावरकर”? माझ्या डोक्यात उलटी गणती सुरु झाली, “३.. २.. १.. सुरु”!! मी तासभर त्या चार-पाच जणांना इंग्लिश आणि तमिळमध्ये सावरकर समजावून सांगत होतो. त्यांची साहजिक प्रतिक्रिया होती, “देशासाठी आयुष्यभर एवढा त्रास भोगलेला हा माणूस आम्हाला माहितीच नव्हता”! त्यांच्यापैकी एकाने विचारले की, “सावरकर प्रत्यक्षात किती थोर होते”? तेवढ्यात घोषणा झाली, “कृपया कुर्सीकी पेटियाँ बाँध ले, हम कुछही मिनटोंमें पोर्टब्लेअरके वीर सावरकर आंतरराष्ट्रीय हवाईअड्डेपे उतरनेवाले है..”! मी म्हणालो, “अंदमानमधल्या एकमेव विमानतळाला एका मराठी माणसाचं नाव द्यावं लागलं, इतके थोर होते सावरकर”! यावर आम्ही सगळेच हसायला लागलो. बोलण्याच्या भाषा लाखों असतील जगात, पण हास्याची भाषा एकच असते!!

    हा काही अंदमानप्रवासातला असा एकमेव अनुभव नाही. तिकडे आमचा समन्वयक होता एक. विकास नाव त्याचं. वडील पंजाबी, आई तेलुगू, वाढला बंगाली बहुसंख्य असलेल्या अंदमानमध्ये. त्यामुळे ह्या तिन्ही भाषा तर तो अस्खलित बोलतोच. शिवाय अंदमानात राहून राहून तमिळ आणि हिंदीतसुद्धा पारंगत झालेला. इंग्रजीही अतिशय उत्तम. बाकीचे आमच्या ठरलेल्या गाड्यांमधून फिरायचे. मी म्हणालो, “मला नाही असं फिरायचं”! तर मला त्याच्या बाईकवरुन सबंध पोर्टब्लेअर फिरवायचा हा गडी. आमच्यासोबत राहून राहून मराठीसुद्धा शिकून घेतलं त्याने गरजेपुरतं. एके दिवशी मला म्हणाला, “यार तुम ये डेढ़-दो घण्टे क्या भाषण देते हो? मुझे सुनना है”! मी म्हणालो, “आ जाओ आज शामको”! आला. सगळ्यात मागे बसला. मराठी व्याख्यान. साहेबांना एक शब्दसुद्धा कळला नाही. पण शेवटपर्यंत बसला होता. व्याख्यान संपल्यावर म्हणाला, “विक्रमसर, मुझे समझमें तो कुछ नहीं आया, पर पूरा माहौल भावूकसा हो गया था. ज़रुर कुछ अच्छी बातेंही बताई होंगी! इतना मानते हो आप महाराष्ट्रीयन लोग वीर सावरकरको”? मी म्हणालो, “सावरकर अगर भगवान नहीं तो भगवानसे कम भी नहीं हमारे लिए”! तो विचारात पडला. जरा वेळाने म्हणाला, “हम आजतक सेल्युलर जेल किसी टुरिस्ट स्पॉटकी तरहही दिखाते आए है. आज पहली बार सोच रहा हूँ की, उसके साथ लोगोंकी कितनी भावनाएँ जुडी हो सकती है! आईंदासे मैं जेल ले जाते वक़्त ये ध्यान रखूँगा और लोगोंको बताऊँगा की जिस इन्सानके लिए आपलोग यह जेल देखने आए हो, वह भगवानसमान है महाराष्ट्रमें”!!

    मला वाटतं, आपण मराठी लोक आपल्याच महापुरुषांबद्दल न्यूनगंड बाळगतो ना, म्हणून आपल्या लोकांना कुणी फारसे ओळखत नाही बाहेर. आपण आपल्याच लोकांची सकारात्मक बाजू डंके की चोटपे सांगायला लाजतो. तिकडे हॅवेलॉक बेटावर एक “राधानगर बीच” नावाचा नितांतसुंदर समुद्रकिनारा आहे. आशिया खंडातला तिसरा सगळ्यात सुंदर आणि भारतातला तर सगळ्यात सुंदर समुद्रकिनारा. पार गळ्यापर्यंत पाण्यात गेलात तरीही खाली पाहिल्यास पावले स्पष्ट दिसतील, एवढा स्वच्छ! तिकडे आम्ही सगळे मनसोक्त खेळलो. खेळून झाल्यावर कपडे-बिपडे बदलले आणि तिथल्या बाकड्यांच्या समूहात सगळेजण अर्धवर्तुळाकार बसलो. आमच्या मंडळींचा अतरंगीपणा असा की, आजचे व्याख्यान इथेच करुया. मग काय! अतीवसुंदर, नादमय समुद्र आणि त्या पार्श्वभूमीवर सावरकरांची कीर्ती सांगणारा मी! एवढे सगळे लोक एकत्र जमून एकाच माणसाचं ऐकताहेत म्हटल्यावर कुठून कुठून आलेले पर्यटकसुद्धा जमून ऐकू लागले. पाहाता-पाहाता शे-दिडशे माणसं जमली. क्वचितच कुणाला मराठी समजत असावं त्यांच्यापैकी. मी मुद्दामच मराठीतून व्याख्यान सुरु ठेवलं. व्याख्यान संपल्यावर एक बंगाली काका हातात भेळेचा पुडा घेऊन बकाणे भरता-भरता आले, “ये जो आप ‘सावन.. सावन..’ कह रहे थे, वह क्या था?” मला हसू आले. मी त्यांना म्हणालो, “सावन नहीं, सावरकर”! मग मी त्यांना सावरकर समजावून सांगितले, ते कसे सेल्युलर जेलमध्ये होते हेही सांगितले. त्यावर ते बाबूमोशाय काय म्हणाले असतील? म्हणे, “फिर हमारे सुभाषबाबू कौनसे सेलमें थे”? मी म्हणालो, “वह यहाँ कभी कैद थे ही नहीं! अंदमान प्रसिद्ध है मात्र सावरकरजीकी वजहसे”! तर म्हणे, “क्या बात करते हो? क्या सावरकर हमारे सुभाषबाबूसेभी बडे थे”? मी म्हणालो, “जी बिल्कुल! बल्की, सुभाषबाबूको आज़ाद हिंद सेनाकी कल्पनाभी सावरकरजीनेही दी थी. गुरु मानते थे वह सावरकरजी को! उनकी पुस्तकें बंगालीमें प्रकाशितभी करते थे सुभाषबाबू”! बंगालीकाका आता चमकले, “अरे बापरे, यह तो हमें पताही नहीं था. धन्यवाद सर”!

    पाहिलंत? इतर राज्यांनी महाराष्ट्राच्या तुलनेत खूपच कमी क्रांतिकारक दिले. पण केवढा पूज्यभाव त्यांच्या मनात आपापल्या क्रांतिकारकांबद्दल! नाहीतर आपण!! नुसती मराठी क्रांतिकारकांची यादीच करायची म्हटलं तरी खंडांमागून खंड भरतील, पण आम्ही करंटे न्यूनगंडी, त्यांच्याबद्दल बोलायलादेखील लाजतो. मुळात आम्हालाच काही माहिती नसतं तर बोलणार तरी काय म्हणा! पण माहिती तर त्या बंगाली काकांनाही नव्हती. तरीदेखील रेटून विचारलंच ना त्यांनी सुभाषबाबूंबद्दल? आणि आम्ही आमच्याच गौरवबिंदूंपासून दूर दूर पळतो. मला नाही वाटत, पंजाबात शीखेतर भगतसिंहांचा द्वेष करत असतील. नाही! तो ब्रॅण्ड आहे त्यांच्या राज्याचा!! बंगालात कायस्थविरोधी चळवळ आहे की नाही कोण जाणे, पण असली तरी कुणीही बंगालीबाबू सुभाषबाबूंचा द्वेष करताना नाही आढळणार तुम्हाला. ब्रॅण्ड आहे तो त्यांच्या राज्याचा! पण त्याच भगतसिंहांच्या इतके, किंबहूना काकणभर जास्तच क्रांतिकार्य केलेले राजगुरु! केवळ त्यांच्या जातीपायी त्यांचा द्वेष करणारे किती मराठी दाखवू तुम्हाला, बोला! यांची तोंडं सदोदित वाकडीच!! यांना टिळक नको, चापेकर नको, सावरकर तर साताजन्मीसुद्धा नको. बरं बाबा, मग जे तुम्हाला गोड लागतात त्यांच्याबद्दल तरी बोला. छे!! परप्रांतीयांसमोर आपल्याच लोकांचे गुणगान गातानाही हातभर फाटते. मुळात माहितीच काही नसतं. आणि इतरांचा द्वेष करण्यातच सगळं आयुष्य गेल्यामुळे सर्वसमावेशक भाषेत आपला माणूस पटवून देण्याचं कौशल्य तर त्याहूनही नसतं. काय कप्पाळ ब्रॅण्ड निर्माण होणार महाराष्ट्राचा? मग बोंबलायचं, “त्या अमुक राज्यात शिवाजी महाराजांना लुटारू म्हणून शिकवलं जातंय होऽ”! अरे थुक्रटराव, तू जर कधी बाहेरच्या जगात शिवरायांची चांगली बाजू सांगितलीच नाही, तर ते त्यांना जे समोर दिसेल तेच खरं मानणार ना ते येडपटा!! पण तू तर “शिवाजी कसे हिंदू नव्हतेच” असला पागल फेसबुकीया शोध लावत किबोर्ड बडवत बसलायस नाहीतर व्हिएतनामचा तो कोणतातरी नेता कसा रायगड बघायला आला होता याच्या खोट्यानाट्या कथा पसरवत बसलायस. मग जग शिवरायांना असंच काहीतरी वाट्टेल ते संबोधणार!!

    टिळक असोत, सावरकर असोत, शिवराय-शंभूराय वा थोरले बाजीराव असोत, हे ब्रॅण्ड आहेत महाराष्ट्राचे. छातीठोकपणे अमराठी आणि अभारतीय लोकांना कर्तृत्व सांगा त्यांचं. सकारात्मक बोला आणि बघाच त्यांचा महाराष्ट्राबद्दलचा आदर कसा दुणावतो ते! एवढे मोठे मोदी, पण पटेल आणि गांधी किती जरी भिन्न विचारधारांचे असले तरीही त्यांचं कर्तृत्व सांगताना कधी थकत नाहीत. केवळ ते त्यांच्या गुजरातचे आहेत म्हणून. मग आपणच का कर्मदरिद्रीपणा करावा? बिनधास्तपणे सांगा. मी आजवर जेव्हा जेव्हा बाहेरच्या राज्यांत गेलोय, तिथे तिथे सावरकर नावाचा ब्रॅण्ड स्थापन करुन आलोय. ही तरी नुसती अंदमानातलीच उदाहरणं झाली. भाग्यनगरात (हैदराबाद) तर ठाकूर राजासिंह सावरकरांचं कर्तृत्व समजल्यावर केवळ रडायचेच बाकी होते!! येत्या फेब्रुवारीत पुन्हा चाललोय मी अंदमानला. सावरकरांबद्दल अजाण असणाऱ्यांना सावरकर सांगायला. या माझ्यासोबत. ‘फिरस्ती टूर्स’च्या श्री. Abhijeet Kulkarni (+917843011155) यांच्याकडे नोंदणी करा, आणि गर्जा जयजयकार!! आपल्याकडे सोनं आहे रे. उधळा बेभानपणे मित्रांनो! आज-उद्या आदराच्या रुपाने महाराष्ट्राकडेच परत येणार आहे ते!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाच्या नावाशिवाय कॉपी करु नये. लेखकाचे अन्य लेख वाचायचे असल्यास पाहा www.vikramedke.com)

    image

  • द्वीपशिखा

    द्वीपशिखा

    पोर्टब्लेअरपासून अवघ्या ८-१० मिनिटांच्या अंतरावर ‘रॉस’ नावाचे बेट आहे. ब्रिटिश खलाशी डॅनिअल रॉसच्या नावावरुन या बेटाचे नाव ठेवलेय. ह्या बेटावर राहाते एक देवी! अनुराधा राव नाव तिचं. पण का तिची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला? काय एवढं विशेष आहेत तिच्यात? एकाच वाक्यात सांगायचं झालं तर, अंदमानातली सगळ्यात महत्त्वाची अगदी तिथल्या सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांच्याइतकी आणि सेल्युलरजेलइतकीच महत्त्वाची गोष्ट आहे ती! तुम्हाला खोटं वाटेल, पण माझ्या दौऱ्यात पहिल्या दिवशी त्यांची भेट होऊ शकली नाही तर तिसऱ्या दिवशी काही स्थळं पाहाणे रद्द केले मी, पण तिची भेट घेतलीच! यावरुनच तिच्या महत्तेची कल्पना यावी!!

    अनुराधाचे वडील रॉस बेटावरचे रहिवासी. ते वारल्यावर निव्वळ कुतुहलापोटी अनुराधा ह्या बेटावर आली. अवघं ३ वर्षाचं वय होतं तिचं. बेटावर ससे होते, हरणं होती, मोर होते, बुलबुल होते. पण सर्वत्र अनागोंदी माजलेली. सरकारी खलाशी वाट्टेल तेव्हा शिकार करत असत. झाडं तोडत असत. कुणी सांसद-विधायक येणार असला की त्याच्यासाठी हरणं मारुन नेत असत. असं होता होता आख्ख्या बेटावर केवळ ८-१०च प्राणी उरलेले. तेही जखमी. आजारी. भुकेलेले. लहानगी अनुराधा हे सगळं पाहात होती. तिने एकदा थांबवायचा प्रयत्न केला. वाईट मारले खलाश्यांनी तिला. बास! त्यादिवसापासूनच अनुराधा कुणाशीही बोलेनाशी झाली. एक कोळी तिच्याबद्दल सहानुभूती बाळगून होता. लहानगं वय! उंची कमी!! त्या कोळ्याच्या खांद्यावर चढायची. झाडपाला तोडायची. आणि दिवसभर भटकून सगळ्या प्राण्यांना खाऊ घालायची. अगदी रोज! नित्यनेमाने!! खलाशी वेडी समजू लागले होते तिला. हीसुद्धा कुणी काही बोलले की दगड उगारुन मागे लागायची त्याच्या. तिच्या वेडेपणावर अजूनच शिक्कामोर्तब व्हायचे त्याने!!

    हा क्रम १-२ नव्हे, तर तब्बल २० वर्षे चालला. २० खडतर वर्षे! ह्याकाळात ती शेकडो वेळा पडली. हजारो वेळा धडपडली. बेदम मार तर कितीदा खाल्ला ह्याची गणतीच नाही! काय मिळवलं तिने त्या २० वर्षांत? ज्या बेटावर अवघे ८-१० प्राणी उरले होते, तिथल्या प्राण्यांची संख्या हजारावर गेली. एकट्या अनुराधाच्या तपश्चर्येमुळे!! १९८७ साली रॉस बेट सैन्याच्या ताब्यात गेले आणि अनुराधाच्या आयुष्यातला दुस्वासाचा भीषण काळ संपला. सैन्याने नुसत्या तिच्या कल्पना ऐकल्याच नाहीत तर त्या प्रत्यक्षात उतरण्यासाठी सगळी मदतसुद्धा केली. तिच्यामुळे हे बेट टिकून राहिलंय. आज अनुराधाचे वय ५१ वर्षे आहे व ती तिथली अधिकृत स्थलदर्शी (गाईड) आहे. पण एवढ्यावरच तिची कहाणी संपत नाही.

    आम्ही अनुराधाला भेटलो आणि ती बेटाची माहिती देऊ लागली. तेवढ्यात तिथे एक हरिण दिसले. त्याला पाहाताच अनुराधाने हाक मारली,
    “ए राजूऽऽ इधर आ”!
    आणि काय आश्चर्य, ते हरिण चक्क आम्हां माणसांच्या घोळक्यात येऊन उभे राहिले. अनुराधा त्याच्याशी गप्पा मारु लागली. जसजसे आम्ही पुढे जात गेलो, तसतसा आमचा समूह वाढत होता. हरणं आली, मोर आले, लांडोरी आल्या, ससे आले, तऱ्हेतऱ्हेचे पक्षी आले. अनुराधा सगळ्यांशी गप्पा मारत होती. त्या प्राण्यांपैकी एकेकाच्या सवयी आणि स्वभाव सांगत होती. अगदी जवळच्या मित्र-नातेवाईकांबद्दल बोलावं तस्सं! मग ती मध्येच एखाद्या लांडोरीला म्हणायची,
    “रेश्मा, तेरा बच्चा तो बीमार था ना? किधर है, दिखा”?
    आणि ती लांडोर ताबडतोब तिच्या पिल्लाला शोधून घेऊन आली.
    “अरे, यह तो ज़ख़्मी है! जा उसे वह वाले पेड ते पत्ते चूसके लगा”!
    आणि खरोखरच ती लांडोर पिल्लाला घेऊन त्या झाडापाशी गेली व उपचार करायला लागली! मग ती कधी सश्याशी बोलायची तर कधी हरणांशी. अचानक वरुन एक बुलबूल पक्ष्यांचा थवा उडत गेला. अनुराधाने पटकन हाक मारुन बोलावलं. त्याबरोब्बर ते शेकडो पक्षी खाली उतरले. तिने मोठ्ठ्याने ओरडून सांगितले,
    “जाओ जाके बाकीके दोस्तोंकोभी बुलाके लाओ. बोलो, अम्मा बुला रही है!”
    पटकन चार-दोन पक्षी उडाले आणि अजून शे-सव्वाशे दोस्तांना घेऊन आले. सगळे जमल्यावर अनुराधाने त्यांना सांगितलं की,
    “अभी यह नये लोग है ना, इन्होंने कभी तुमको नज़दिकसे देखा नहीं. तो यह तुम्हारे फोटो-वोटो लेंगे. डरना नहीं हां!”
    आणि काय आश्चर्य! सगळे प्राणी, पक्षी आम्हांला हात लावू देऊ लागले. फोटो काढू देऊ लागले!!

    अशी अनुराधा. यांच्यापैकी कोणत्याही जीवाला तिने प्रशिक्षण दिलेले नाही. ती त्यांच्याचसोबत वाढलीये. हे सारं गणगोत आहे तिचं. त्यांना तिची भाषा समजते आणि तिला त्यांची! त्सुनामीने सगळंच्या सगळं कुटूंब हिरावून घेतल्यानंतर तर ह्या मंडळींशिवाय अनुराधाचं आपलं असं कुणीच राहिलं नाही. जे कुणी आहेत ते हेच आहेत. कित्येकदा त्यांना वाचवताना जीव धोक्यात घातलाय अनुराधाने. एक-दोन नव्हे, तर चक्क २५ वेगवेगळ्या शस्त्रक्रिया झाल्यायत तिच्यावर. तरीही तिच्या दिनचर्येत एक दिवसही खाडा झालेला नाही. मी तिला विचारलं,
    “ऐसी खस्ता तबियतके बावजूद कैसे कर लेती है आप यह सब”?
    तर म्हणाली, “वह जो उपर बैठा है ना, बहोत बडा झगडा चल रहा है मेरा उसके साथ! मैंने उसको बोल दिया है की, अगर यह जानवर ज़िंदा रखने है तो मुझे अपने पैरोंपे खडा रख. वरना बेशक़ मार दे मुझे. मेरा क्या है! कोई नहीं आगेपीछे रोनेवाला. मगर इन लोगोंका मेरे सिवा कोई नहीं. बस, तबसे भगवान मुझे मारता नहीं और इन जानवरोंका सहारा छिनता नहीं!”
    मी पाया पडू लागलो तर पाय चटकन मागे घेतला आणि प्रेमाने माझ्या पाठित धपाटा घालून हसत-हसत म्हणाली,
    “हट सुव्वर”!!

    निघताना आमच्यातल्या एकाने पटकन पाचशेची नोट काढून दिली तिला. तिने ती घेतली आणि “थँक्यू” म्हणाली. कुणी काही कुणी काही रक्कम देऊ केली तिला तर घेईचना. म्हणाली,
    “इतने ज़्यादा पैसे मैं नहीं ले सकती. पाँचसौ बस हो गए मेरे लिए”.
    ऐकेचना. शेवटी बळजबरी कोंबले पैसे तिच्या हातात. ती सांगत होती,
    “टूरिस्ट लोगोंसे तो मैं कई-कई बार पैसे लेतीभी नहीं. हाँ, पर अगर कोई एम्पी-एमेले आए, तो छोडती नहीं सालेको. उससे मनमर्ज़ी पैसे वसूलती हूँ. क्यूँ छोडे? हरामी रोज़ लूटते है हमें. कहीं तो जेबें ढीली करना सीखो!”
    तिच्या ह्या मार्मिक तत्त्वज्ञानाची गंमत वाटत होती. पण ते मनापासून पटतही होते! ती म्हणाली,
    “पीछले महिने वह तुम्हारे ठाकरेका बच्चा आया था ना? वह आनेवाला था मुझसे मिलने! उसके पहलेही उसका पीए आ धमका मेरे पास. कहने लगा, सुना है तुम किसीभी मिनिस्टर और पॉलिटिशियनको जो मनमें आए बोल देती हो? हमारे साहबके सामने ऐसा मत करना हाँ! मैं बोली, क्यूँ ना करु? अगर वह कुछ ग़लत बोलेगा तो मैं उसे नहीं छोडूँगी! बादमें जब उसका साहब आया तो मैंने उससे पूछा, तेरा पीए ऐसा बोल रहा था. तो वह बत्तीस दाँत दिखाके हँसने लगा! बोला, नहीं अम्मा जो तुमको ठीक लगे वहीं बोलो. छोडा नहीं मैंने उसकोभी! अच्छा आदमी लगता है पर वह!”

    भूतकाळातल्या कटू आठवणींमुळे अनुराधा सगळ्याच राजकारण्यांवर उखडून आहे. पण असं नाही की, ती नुसती फटकळच आहे. तिच्या मनात एका व्यक्तीविषयी अपरंपार भक्ती भरुन राहिलीये. महाराष्ट्राच्या जातीची ना गोताची अनुराधा आम्हांला सांगत होती –
    “जब दुनियाका अंत होता है ना, तब नई संस्कृती पनपती है. वह लोग ज़मीं खोदते है तो पीछली सभ्यताके कुछ बर्तन मिलते है, मूर्तीयाँ मिलती है. उन्हींको वह भगवान समझके पूजने लगते है. जब हमारी संस्कृती खत्म हो जाएगी ना, तबभी आनेवाली नस्ल ऐसीही खुदाई करेगी. उस मिट्टीसे पता है कौनसा भगवान निकलेगा? उस माटीसे निकलनेवाले भगवान होंगे, वीर विनायक दामोदर सावरकर..!”
    माझ्याच्याने पुढचे ऐकवलेच गेले नाही. कानांवर तिचे शब्द पडत होते केवळ. मेंदू त्यांचा अर्थच लावायचा बंद झाला होता. डोळ्यांतून अश्रूंचा श्रावण बरसत होता. ती म्हणाली,
    “..जब वह नस्ल सावरकरजीको भगवान मानना शुरु कर देगी, समझो बस तभीसे धरतीका स्वर्ग बनना शुुरु हो जाएगा!”
    सावरकरांच्या स्वतःच्या राज्यात त्यांची जात पाहून द्वेष करणारी डुकरं राहात असताना अडिच-तीन हजार किलोमीटर लांबवर सावरकरांना देव मानणारी ही बाई आम्हाला त्यांचा महीमा सांगत होती. डोळ्यांतून झरणारे पाणी आणि त्यात सूर्याचा प्रखर प्रकाश, यांमुळे अस्पष्ट दिसणारी अनुराधा त्याक्षणी मानवी वाटतच नव्हती, मानव राहिलीच नव्हती. ती झाली होती “द्वीपशिखा”! चमचमणारी तेजोमयी द्वीपशिखा!! इथून पुढचे माझे अंदमानातले सारे व्याख्यानदौरे केवळ आणि केवळ ह्या द्वीपशिखेच्या दर्शनानेच पूर्ण होणार आहेत!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाच्या नावाशिवाय कॉपी-पेस्ट करु नये. लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com]

    image

  • आनंदवनभुवनी

    जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशावर, विशेषतः परधर्मीय देशावर आपला राजनैतिक आणि भौगोलिक अधिकार प्रस्थापित करतो; तेव्हा सगळ्यात आधी कोणते काम करत असेल, तर ते म्हणजे आपली जी कोणती संस्कृती असेल ती तिथे रुजवायचा प्रयत्न करतो. यातून काय साधतं? एकतर यामुळे तेथील लोकांना कमतर लेखून त्यांच्यावर राज्य करणं सोपं जातं. आणि दुसरा व सर्वांत महत्वाचा फायदा म्हणजे कालांतराने तेथील जनतेला आक्रमकांची संस्कृती (मग ती कदाचित पाशवी असली तरीही!) हीच आपली संस्कृती वाटू लागते, जेणेकरुन भविष्यात आक्रमकांचं त्या भूभागावरील राजकीय वर्चस्व जरी संपलं तरीदेखील संस्कृती प्रदुषित करुन ठेवल्यामुळे पिढ्यानपिढ्या तो भूभाग आक्रमकांचा सांस्कृतिकदृष्ट्या दासच बनून राहातो! याचं सर्वांत सोपं उदाहरण म्हणजे इंग्रजी ही भाषा! जगभर हाताची सगळी बोटे भरतील इतकेसुद्धा देश इंग्रजीला किंमत देत नसताना, आपल्याकडे मात्र छातीठोकपणे इंग्रजी ही अवघ्या जगाची भाषा असल्याचे खोटेच सांगितले जाते. का? कारण गोऱ्या राज्यकर्त्यांनी तसे रुजवलेय ना! तीच गोष्ट ऊर्दूची! मुळात ऊर्दू नावाची कोणतीही स्वतंत्र भाषाच अस्तित्वात नसूनदेखील आम्ही मात्र अस्तित्वात नसलेल्या भाषेचे गोडवे गातो!! राईट बंधूंना मिळालेले पेटंट हे विमानाचा शोध लावण्यासाठी मिळालेले नसून ‘विमानात उपयोगी अश्या नव्या सुधारणा करण्यासाठी’ (पेटंट क्रमांक US 821393) मिळालेले असतानाही आमच्याकडे रेटून राईट बंधूंनीच विमानाचा शोध लावल्याचे शिकवले जाते. ही अवस्था! मग राईट बंधूंच्या हयातीतच त्या पेटंटवर शेकडो केसेस चालल्या आणि जर्मनीतल्या एका कोर्टाने तर राईट बंधूंच्याच विरोधात निकाल दिला होता, हे कुठले ठाऊक असायचे!! शोध न लावणाऱ्या राईट बंधूंना श्रेय द्यायला आमच्याकडचे तथाकथित विद्वान पळपळ पळतात, परंतु तोच शोध आमच्या प्राचीन ग्रंथांतरी कुणी दाखवून दिला, तर मात्र नाके मुरडतात! परंतु त्याचवेळी तोफांच्या निर्मितीचे श्रेय बाबराला, रॉकेटच्या निर्मितीचेचे श्रेय टिपूला देताना मात्र ही मंडळी थकणार नाहीत आणि कुणी जर ह्या शोधांची वर्णने आपल्याकडच्या परंपरांमध्ये दाखवून दिली तर डोळ्यांवर कातडे ओढण्यातही कसूर करणार नाहीत!! परकीय आक्रमकांच्या कौतुकात वाहावत जाण्याची अशी एक-दोन नव्हे तर अक्षरशः सहस्रावधी उदाहरणे सांगता येतील. विवेकपिसाट फेक्युलर मंडळी किती जरी उरस्फोड करुन ह्या प्रकाराला ‘गंगाजमनी तहज़ीब’सारखे गोंडस नाव देत असली, तरीही ह्या प्रत्यक्षात मानसिक दास्यत्वाच्या रुपाने शिल्लक उरलेल्या राजकीय आणि धार्मिक दास्यत्वाच्या खुणा आहेत. मग ती आमच्या पवित्र वास्तूंची केलेली तोडफोड असो, परकीयांचे ते पाशवी आक्रमक असूनदेखील केलेले उदात्तीकरण असो, अट्टाहासाने त्यांचाच इतिहास शिकायला लावणे असो, रस्ते-वास्तू इ. ना त्यांची नावे देणे असो; थोडक्यात सांगायचे तर आपल्या देशात शत्रू म्हणून आलेल्या व इथले खऱ्या अर्थाने भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक नुकसानच केलेल्या कुणाच्याही नावाने इथले काहीही ओळखले जाणे हा सच्च्या राष्ट्रभक्तांसाठी एक सल असतो आणि असा सल मुळासकट नष्ट करणारा कुणीही नायकच ठरतो. दिल्लीतील ‘औरंगज़ेब मार्गा’चे नाव बदलून ‘एपीजे अब्दुल कलाम मार्ग’ करण्याच्या घटनेकडे ह्याही दृष्टीकोनातून पाहायला हवे. सवयीचा नसल्यामुळे थोडा जड जाईल हा दृष्टीकोन, पण अस्सल प्रामाणिक दृष्टीकोन आहे हा – परकीयांचे लांगूलचालन करणारा स्वार्थी नज़रीया नव्हे!!

    अनेक दिवसांपासूनच्या नामांतर मागणीस अखेरीस शासकीय ठप्पा मिळालाय. ह्यानिमित्ताने हिंदुस्थानात येऊन लुटालूट, जिहाद व चैन करणाऱ्या मुघलांच्या नावे असलेले एक प्रतीक तरी कमी झाले!! अर्थातच बर्नॉल हाच ज्यांचा राष्ट्रीय-लेप आहे, अश्या विवेकपिसाटांना (हा शब्द ‘लिंगपिसाट’च्या चालीवर वाचावा!) आता औरंगज़ेबाच्या प्रेमाचे उमाळे फुटू लागतील, तो कसा महान वगैरे होता ह्याचे साक्षात्कार झडू लागतील. औरंगज़ेबाची प्रतिमा उंचावण्याची अहमहमिका सुरु होईल. होऊ द्या. काय वाट्टेल ते करु द्या. त्यांचे कामच आहे ते. परकीयांचे पाय चाटण्यावरच तर त्यांची दुकानदारी चालते ना! पण आपण सामान्य माणसं आहोत. दुकानदार नाही आणि तथाकथित फेक्युलर विचारजंत तर त्याहूनही नाही. त्यामुळे आपण तर्कशास्त्र वापरायचे. समर्थांनी औरंगज़ेबाला ‘औरंग्या पापी’ का संबोधले असावे, ह्याचा विचार करायचा. मोठमोठे ग्रंथ धुंडाळण्याचीही गरज नाही. सर्वांत पहिल्यांदा दृष्टीसमोर येईल, ते ह्या औरंगज़ेबाने आमच्या शिवछत्रपतींशी मांडलेले जन्माचे वैर!! असल्या वैऱ्याचे नाव इथल्या रस्त्याला द्यायचे? तेही शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याने अवघ्या शंभर वर्षांतच मुघलांची (!) दिल्ली शब्दशः अंकीत केली होती, हा सिद्ध इतिहास असताना? जरा शोध घेतला तर लक्षात येईल की, ह्या औरंगज़ेबाने तख़्तासाठी आपल्या सख्ख्या बापाला कैदेत ठेवले आणि भावाचा हालहाल करुन खून केला. त्या औरंगज़ेबाचे आपल्या श्रीरामांच्या आणि लक्ष्मण-भरत-शत्रुघ्नांच्या देशात गुणगान चालवून घ्यायचे? कौरवांनी असाच राज्याच्या हव्यासापोटी पांडवांचा अतोनात छळ केला. त्यांना तर खलनायकच मानतो ना आपण? मग मुघलांचाच उदोउदो का म्हणून चालवून घ्यायचा? केवळ काही जणांचा जीव मतपेढीत अडकलाय म्हणून? आणि ह्या पार्श्वभूमीवर आठवा अवघ्या बत्तिशीच्या शंभूराजांचा ह्याच औरंगज़ेबाने आत्यंतिक पंथवेडातून केलेला खून!! ह्या आठवणीनंतरही जर कुणी औरंगज़ेबाची बाजू घेणार असेल, तर त्याच्या वंशशुद्धीवर शंका येणे अगदीच साहजिक ठरेल!!

    कुणाला वाटेल की, हे इतिहास-भुगोलाचे हिंदुकरण आहे. नाही. औरंगज़ेबाचा आम्ही मुसलमान म्हणून कधीच द्वेष करत नाही. तो मुसलमान नंतर होता, आधी एक पंथवेडा देशशत्रू होता ह्याची प्रत्येक न् प्रत्येक हिंदुत्ववाद्याला पूर्णतया जाणीव आहे. आणि म्हणूनच धर्माच्याच नावे बोलायला गेलो तर त्या रस्त्याला एका मुसलमानाचेच नाव दिले गेलेले असूनही सर्वच हिंदुत्ववादी मनापासून आनंदी आहेत. कारण, अब्दुल कलामही मुसलमान नंतर, परंतु आधी एक सच्चे देशभक्त होते हे त्याच हिंदुत्ववाद्यांना तितक्याच मनापासून ज्ञात आहे म्हणूनच!! काय करणार, हे हिंदुत्ववादी मेले असलेच असतात, जात-धर्म न बघता चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणतात. हिंदू बघून द्वेष आणि अहिंदू बघून त्याच्या देशघातकीपणाच्या प्रमाणात वाढतं प्रेम, ह्या तर सोयीस्कर फेक्युलरांच्या खोडी! त्या भोळ्या-भाबड्या हिंदुत्ववाद्यांना कुठल्या जमायला!!

    थोडक्यात सांगायचे झाले तर, आज ह्या नामांतराच्या निमित्ताने परकीय दास्यत्वाच्या गलिच्छ खुणा पुसणाऱ्या एका मंगलपर्वाची सुरुवात झाली आहे. शिवरायांनी ‘राज्यव्यवहारकोश’ लिहवून घेताना जो स्वकीयतेला वरीष्ठता देण्याचा देशहितकारी दृष्टीकोन ठेवला होता, तोच दृष्टीकोन ह्यापाठीदेखील आहे. मॉरिस्कोंना हाकलताना स्पॅनिश राष्ट्रभक्तांचा जो दृष्टीकोन होता, तोच अगदी तोच दृष्टीकोन आहे हा! त्यामुळेच एक ठरलेला वर्ग सोडला तर सबंध देश पक्षीय आणि पंथीय अभिनिवेश बाजूला ठेवून ह्या आरंभाचे स्वागतच करेल. हे पहिले पाऊल अशीच इतर अनेक पावले घेऊन येवो. महाराष्ट्रातही त्याच औरंगज़ेबाच्या नावाने ‘औरंगाबाद’ नांदतंय. महाराष्ट्राच्या भाळावरील ही मुघली अत्याचारांची खूणदेखील लवकरच पुसली जावो. जेथे-तेथे केवळ आणि केवळ खऱ्या देशभक्तांनाच स्थान व वरीयता मिळो. हीच आनंदवनभुवनी प्रार्थना!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (‘सामना’, दि. ६ सप्टेंबर दिनी ‘उत्सव’ पुरवणीत प्रकाशित झालेला लेख. गंमत अशी की, हा लेख सुमारे ८-९ दिवसांपूर्वी लिहिलेला आहे. तोपर्यंत ना कुणी मिशाळ तरस बरळलं होतं ना कुणी खुदानंदी कोल्हा. त्यामुळे ह्या लेखात मी व्यक्त केलेलं भाकीत तंतोतंत खरं ठरलं असंच म्हणायला हवं! माझे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी पाहा: www.vikramedke.com)

    image