Author: Vikram Edke

  • 2.0 नव्हे, ‘शंकर 2.0’

    मी परवाच एका व्याख्यानात बोललो होतो की, दिवसेंदिवस आपण सारेच तंत्रज्ञानावर नको तितके अवलंबून राहू लागलोय. याचे शारीरिक, मानसिक परिणाम कल्पनातीत आहेत. जणू काही एखाद्या टाईमबॉम्बचं टायमर सुरू करून त्यावर बसलो आहोत आपण. तो फुटेल तेव्हा काय होईल? भयंकर कल्पना आहे ही! भारतीय चित्रपटसृष्टीतील खऱ्या अर्थाने शो-मन म्हणावा अश्या दिग्दर्शक शंकरचं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य काय आहे माहितीये? तो अश्याच रोजच्या आयुष्यातल्या कल्पना घेतो. सत्य हे कल्पनेहून भंयकर असतं म्हणतात, परंतू शंकर त्या कल्पनेला सत्याहूनही भयंकर कल्पनेचा तडका देतो. त्यातून साकारतो तो शंकरचा कोणताही अतिप्रचंड सिनेमा! “2.0”ची कल्पनाही अशीच साधी. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे पक्ष्यांना विकिरणांचा होणारा त्रास सबंध मानवजातीला (जशी हॉलिवूडच्या चित्रपटांत मानवजात म्हणजे अमेरिका असते, तशी ती इथे चेन्नई आहे!) कडेलोटापर्यंत घेऊन जातो आणि त्याच्याविरोधात लढण्यासाठी माणसांना परत एकदा आणावा लागतो, काही वर्षांपूर्वी विंखडित केलेला चिट्टी (रजनीकांत)!

    वाचायला, ऐकायला ही कल्पना जेवढी जबरदस्त वाटते, तेवढीच ती साकारायला अवघड आहे. अगदी शंकरलासुद्धा! शंकरच्या बहुतांशी सिनेमांमध्ये नायक गुप्तरूपाने समाजातील वाईट शक्तींना संपवण्याचं काम करत असतो. आठवा, “जंटलमन” (१९९३), “इंडियन” (१९९६), “आन्नियन” (२००५). “2.0”मध्ये मात्र नेमका हाच घोळ झालाय की, ही हिरोगिरी करणाराच खलनायक आहे! त्यामुळे सुरूवातीला त्याचा द्वेष करणारे आपण, त्याची कथा समजल्यावर त्याचा द्वेष करूच शकत नाही. या त्रुटीवर मात करण्यासाठीच जणू शंकरला जवळजवळ अर्धा तास चालणारा उत्कर्षबिंदू लिहावा लागलाय. आणि तो ज्या प्रचंडाहूनही प्रचंड पातळीवर नेऊन मांडलाय, त्याला तोड नाही.

    रजनीकांत हा किती जरी सुपरस्टार असला, तरी त्याचा अखेरचा पूर्णार्थाने समाधानी करणारा सिनेमा हा शंकरचाच “यन्धिरन” (२०१०) होता. त्यानंतर रजनीने एक तर “कोचडय्यान” (२०१४), “लिंगा”सारखे (२०१४) चुकलेले सिनेमे तरी केलेयत अथवा “कबाली” (२०१६) आणि “काला”सारखे (२०१८) अजूनच जास्त चुकलेले सिनेमे तरी केलेयत. त्याच्या बॉक्सऑफिसवरील साम्राज्याला ओहोटी लागू लागलीये. त्या पार्श्वभूमीवर “2.0” हा त्याच्यासाठी अखेरच्या संधींपैकी आहे. आणि काय सांगू, रजनीने या संधीचे नुसते सोनेच नव्हे तर त्याहूनही खूपच जास्त केलेय. खूप वर्षांनी खऱ्या अर्थाने बहरलेला, बेभान असा रजनी पाहायला मिळाला. त्याने या चित्रपटात एक नव्हे तर तब्बल ४ वेगवेगळी रूपं साकारलीयेत आणि प्रत्येक रूप त्याच्या असीम क्षमतेची साक्ष देणारे आहे. तशीच गोष्ट अक्षयकुमारचीही. त्याचाही गेल्या वर्षापासून सॅच्युरेशन पॉईंट येऊ लागला होता. त्याचे चित्रपट यशस्वी होत होते, पण एका मर्यादेतच. त्यापलिकडे त्याचे आकडे जात नव्हते आणि तो सुद्धा स्वतःवर प्रयोग करत नव्हता वा स्वतःवर जोर लावत नव्हता. या चित्रपटात त्याने स्वतःवर घालून घेतलेले ते सगळे बरेवाईट नियम मोडलेयत आणि निकाल हा चांगल्याहूनही चांगला आलाय. हा खरा अक्षयकुमार आहे. त्यानेसुद्धा तब्बल २ वेगवेगळी रूपं साकारलीयेत आणि तितक्याच ताकदीने साकारलीयेत. अक्षयकुमार जर प्रत्येकच चित्रपटात अशी मेहनत घ्यायचे शिकला, तर तो आत्तापेक्षाही अनेक पटींनी पुढे जाईल. परंतु त्याची सवय त्याला हे करू देईल का, हा मोठाच प्रश्न आहे. अॅमी जॅक्सनची भूमिका या दोघांपेक्षाही चपखल जमलीये. ती एवढी सुंदर दिसते, एवढी सुंदर दिसते की, तिला अभिनय करण्याची कधी गरजच पडली नाही. त्यामुळेच की काय ती कायम निर्जीव, यांत्रिक पद्धतीचा अभिनय करते. तोच तिने इथेसुद्धा केलाय. पण गंमत अशी की, तिची भूमिकाच इथे यंत्रमानवीची असल्यामुळे तिच्या क्षमतेचा (खरं तर त्रुटीचा!) इथे शंभर टक्के वापर झालाय! मागच्या चित्रपटात जशी डॉ. बोहराला (डॅनी) साईडव्हिलनची भूमिका होती तसेच इथे सुधांशू पांडे या गुणी अभिनेत्याला डॉ. बोहराच्या मुलाची फुसकी भूमिका देऊन तितक्याच फुसक्या कामासाठी ठेवून घेतलेय.

    “2.0”चा मुख्य गुणधर्म हा, की तो पहिल्या दृश्यापासूनच विषयाला हात घालतो. त्यापासून कुठेच हटत नाही. ही जशी चांगली गोष्ट आहे, तशीच वाईटसुद्धा आहे. वाईट यासाठी की, शंकरचे वैशिष्ट्य असलेली कॉमेडी या चित्रपटात पाहायला मिळत नाही. जी काही कॉमेडी आहे ती निला (नाईस, इंटेलिजंट, लव्हली असिस्टंट) अर्थात अॅमी जॅक्सन तरी करते नाहीतर चिट्टी तरी करतो. चित्रपटात खूप सारे स्थानिक संदर्भ आहेत. खासकरून तमिळ सिनेमांचे. ते तमिळमध्ये जितके खुलतात, तितके हिंदीत खुलतीलच, असे नाही. शिवाय थेट विषयाला हात घालताना चित्रपटाचा पूर्वार्ध हा खूपच इन्व्हेस्टिगेटिव्ह पद्धतीचा झालाय. तो अजिबात कंटाळवाणा नाही. छानच आहे. परंतु हाती रजनीकांत आणि अक्षयकुमारसारखे योद्धे असताना, जितक्या ठिणग्यांची अपेक्षा करू, तितक्या त्या उडत नाहीत. उत्तरार्धात मात्र चित्रपट आपल्या अपेक्षा शतपटींहूनही अधिक पूर्ण करतो. तरीदेखील तो किंचित अधिक मानवी, भावनांचा अन्वयार्थ लावणारा, पक्षीराजनच्या दुसऱ्या रुपाच्या अंतरंगात डोकावणारा असायला हवा होता, असे वाटत राहाते. शंकरने भव्यतेच्या सर्वच सीमा अक्षरशः ओलांडल्या आहेत. नुसत्या ओलांडल्याच नव्हे, तर चोळामोळा करून, फेकून देऊन पुन्हा नव्याने आखल्यायत! हा चित्रपट जर तुम्ही थिएटरशिवाय अन्य कुठेही पाहाण्याचे ठरवत असाल, तर तुमच्यासारखे करंटे तुम्हीच! हा भारतातला पहिला खऱ्या अर्थाने त्रिमितीय सिनेमा आहे. त्याच्या ध्वनीमध्येही आजवर कधीच न करण्यात आलेले प्रयोग केलेयत. रहमानचं पार्श्वसंगीत गगनाच्याही मर्यादा ओलांडून कसे जाते, ते मोठ्या स्क्रिनवरच अनुभवले पाहिजे. तिच गोष्ट विभासांची. भारतात आजवर कधीच न अनुभवलेले विभास या मंडळींनी अतिशय यशस्वीरित्या बनवून दाखललेयत. आता तुम्ही जर याची तुलना हॉलिवूडशी करणार असाल, तर ते मुळातच चूक आहे. एक तर या मंडळींचे जे बजेट आहे, ते अतिशय कमी आहे. जेव्हा “बाहूबली”सारखा एखादा चित्रपट केवळ २५० कोटींच्या बजेटमध्ये विभासांचा भरपूर वापर करूनही पैसा कमावून दाखवतो, तेव्हा कुठे “2.0”ला ५५० कोटींचे बजेट मिळते. त्या अर्थी हे या विषयातल्या आपल्या अगदी सुरुवातीच्या पावलांपैकी आहे. जेव्हा आपल्याकडे हॉलिवूडइतके बजेट मिळायला लागेल, तेव्हा हॉलिवूडचे तथाकथित ब्लॉकबस्टर्स आपल्या प्रतिभेच्या भराऱ्यांपुढे पोरखेळ वाटू लागतील, लिहून ठेवा! मला जाणवलेला सगळ्यांत मोठा विरोधाभास मात्र हा की, मोबाईलच्या हव्यासापायी होणारे दुष्परिणाम मांडणारा हा सिनेमा बनवणारी लायका कंपनी मात्र मुख्यतः मोबाईलचेच उत्पादन करते!

    वाईटाच्या आघाडीवर सांगायला गेलं तर चित्रपटाला ठहराव नाही. गोष्टी स्थिर व्हायच्या आधीच पुढे नेण्याची घाई झाल्याचे जाणवते. दुसरे असे की, दुर्दैवाने हा सिनेमा शंकरच्या काही ठराविक, त्याच त्या गोष्टींपासून मुक्त होत नाही. परंतु असे असूनदेखील काही गोष्टी लक्षात घ्यायलाच हव्या. शंकरचाच “नन्बन” (२०१२) हा बोलूनचालून रिमेक होता. “ऐ”वर (२०१५) सगळ्यांत जास्त टिका झाली होती ती त्याच्या लांबीवरून आणि अनावश्यक साईडट्रॅक व गाण्यांवरून. शंकरने या गोष्टींची बरोब्बर नोंद या चित्रपटात घेतलीये. त्याचा स्क्रिनप्ले किंचित अवघडल्यासारखा वाटतो, परंतु त्याने जागा असूनही कॉमेडीट्रॅक टाळलाय. शंकरसारखी गाणी सबंध भारतातच काय, जगात कुणी करत नसेल, इतका तो गाण्यातील बारीकसारीक शॉटवर विचार आणि खर्च करतो. पण या चित्रपटात एकही गाणे वेगळे वापरलेले नाही. ३ गाण्यांपैकी २ पार्श्वभागी राहून कथेला पुढे नेतात तर एक थेट चित्रपट संपल्यावर येते. तो सगळा खर्च त्याने कामात वळवलेला जाणवतो. त्यामुळे चित्रपटाची लांबी आपसूकच कमी झालीये. हा शंकरचा आजवरचा सगळ्यांत छोटा सिनेमा आहे. ‘कधी संपतोय’ वाटण्यापेक्षा एखादा चित्रपट ‘अरेच्चा संपलासुद्धा’ वाटणे कधीही श्रेयस्कर! या सगळ्या अर्थांनी बोलायला गेलं, तर हा नुसता सिनेमाच “2.0” नाहीये, तर या सिनेमामुळे स्वतःचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न करणारा “शंकर 2.0” दिसणे जास्त सुखद आहे!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

    *३.७५/५

  • वादा

    (धुन: इरऽविन्ग तीऽवाय. फिल्म: 96. संगीत: Govind Vasantha)

    ************************************

    हक़ीक़त से कैसे साझा करे
    नयनों में तैरे सपने
    समय से क्या हम वादा करे
    दो ही मिले थे लम्हें
    रैना ले के चाँद के निशाँ
    बहती चली है और ही दिशा
    भोर ने है उस का आँचल यह भरा
    चाँद के है हिस्से में काली ख़ला
    फिर भी क्यूँ ना आह वह भरे
    हक़ीक़त से कैसे साझा करे
    नयनों में तैरे सपने

    एक आँच थी मेरा जीवन पिघला गयी
    एक बाँसुरी नयी सरगम सिखला गयी
    यूँ तो उम्र भर मैं थी भागी जिस के लिए
    थी वह कस्तुरी मेरे दो जग महका गयी
    ना मोह ना ही कोई भी है शिकवा अब
    दिल था दिल है और है बहता दरिया

    कदम-कदम मैं याद बन के साथ साथ आऊँगा
    उदास सी हो जाओगी तो गीतों से मनाऊँगा
    तू नूर की नदी है तेरा ज़िक़्र भी तो नूर है
    पपीहा बन के था जिया मैं पपीहा बन के गाऊँगा
    सही-ग़लत के दायरे है जिस्म के लिबास पे
    मैं पार की बहार में यूँ रूह से पुकारूँगा तुझ को
    तू आ जा ना..

    — © विक्रम श्रीराम एडके
    [www.vikramedke.com]

    ************************************
    टीप: यह अनुवाद या भाषांतर नहीं, अपितु फिल्म में चित्रित प्रसंग एवं संहिता को ध्यान में रखते हुए लिखा गया एक स्वतंत्र गीत है । जिन्होंने फिल्म देखी है, वह इस गीत से कदाचित अधिक संबद्ध हो पाएँगे, किंतु आशा है की औरों को भी यह उतना ही भाएगा ।

  • वृत्तावर्त

    सुरज ढलता है तो,
    और जग में जलता है वह,
    अस्त-उदय खेल है यह भेद बुद्धी का!
    मृत्यू ध्रुव है तो,
    जन्म भी तो ध्रुव होगा,
    जनन-मरण चक्र है यह भेद दृष्टी का!
    अमावस के पीछे पौर्णिमा,
    कालिमा के आगे रक्तिमा,
    वृत्तावर्त से बना है भवसमुद्र सारा!
    धानानानानानाना..!!

    अधर्म के मार्ग पुष्प उगते,
    धर्ममार्गपर है शूल चुभते!
    पाप को चाहे यदि तजना,
    पुण्य की भी रस्सी क्यूँ ना छोडे!
    पाप क्या क्या धर्म (मुद्रा),
    पुण्य क्या अधर्म (के आयाम),
    एक को हम जो दे (मिटा किंतु),
    मुद्रा तो तब भी घूमेगी ना!
    धानानानानानाना..!!

    — © विक्रम श्रीराम एडके ।

    =========================

    चित्रपट: विक्रम-वेधा
    गीत: करप्पऽ वेळ्ळई
    गीतकार: विघ्नेश शिवन
    संगीत: सॅम सी. एस.
    गायक: शिवम, सॅम सी. एस.

    =========================

    धुन के लिए गीत की लिंक: https://youtu.be/4AYAcFcFu84

    =========================

    साल २०१७ की फिल्म “विक्रम-वेधा” मेरी सब से प्रिय फिल्मों में से एक है । इस फिल्म ने न केवल बॉक्स ऑफिस पर ही झण्डे गाडें, अपितु एक रोमहर्षक गाथा को कैसे पुराणकथा के वस्त्रों में सँजोकर दर्शाया जाए, इस विषय में मानदंड भी स्थापित किए । फिल्म का संगीत भी खूब चर्चा में रहा । सॅम सी. एस. द्वारा संगीतबद्ध सारे गीत और पार्श्वसंगीत जबरदस्त हिट सिद्ध हुए । इन्हीं में से एक गीत, जिसे हर श्रोता ने ह्रदयपूर्वक सराहा, वह था विघ्नेश शिवन की लेखनी से उतरा तथा शिवम एवं सॅम सी. एस. का गाया हुआ, “करप्पऽ वेळ्ळई” । “करप्पऽ” का अर्थ होता है “काला” तथा “वेळ्ळई” यानी की “श्वेत” । अर्थ एवं ऊर्जा से भरा यह गीत प्रवृत्तीयों के बीच विरोधाभास दर्शाता है, जो कि फिल्म के विषयों में से भी एक है । पूरे गीत का अर्थ तो मैं नहीं जानता, किंतु उस के पीछे का विचार मेरे मन में घर कर गया । और मैं ने लिख डाला उसी धुन पर, उसी विषय को दर्शाता बिल्कुल नया गीत, “वृत्तावर्त” । स्वान्तसुखाय है, न कि किसी फिल्म के लिए । मैं पुनः एक बार स्पष्ट कर दूँ कि यह अनुवाद नहीं बल्कि एक पूर्णतः नया गीत है, हालाँ कि विषय वही है । पढिए और बताईए यह प्रयत्न आप को कैसा लगा ।

  • मुकम्मल ग़ज़ल : ९६

    रात्रीचे जवळजवळ साडेअकरा वाजलेयत आणि मी एका पंक्चरवाल्याच्या दुकानात बसून हे लिहितोय. घरी जायला अजून एखादा तास लागेल. एखादा तास मी थांबू शकत नाही का? मी थांबू शकतो. अंतर्मनात उसळणारा समुद्र नाही थांबू शकत. अर्ध्या तासापूर्वी सी. प्रेमकुमारचा “९६” बघून बाहेर पडलोय. तेव्हापासून सैरभैर झालोय मी. बऱ्याच वर्षांनंतर पडद्यावरच्या प्रेमकहाणीसाठी, त्या पात्रांसाठी, ते कुणीतरी जवळचे, सगे-सोयरे असल्यासारखी काळजी वाटली मला. आणि आता मी इथे डोकं खाजवत बसलोय की, मी या चित्रपटाबद्दल निष्पक्ष लिहू शकेन का? की पुरात वाहावत जाईन मी? कधीकधी बाजू घेणंच खरी निष्पक्षता असते!

    प्रेमाची स्वतःची एक भाषा असते, भावनेची! आणि या भावनेला जेव्हा शब्दांचा स्पर्श होतो, तेव्हा त्याची आपोआप कविता होते. भाषा सिनेमाचीही असते. चित्रांची, प्रतिमांचा, संकेतांची. आणि म्हणूनच सिनेमात जेव्हा प्रेम हाताळलं जातं, तेव्हा ती नुसतीच चित्रमालिका न राहाता, त्याचं चित्रकाव्य व्हावंसं वाटतं. तुम्हाला ग़ज़ल ठाऊक आहे? चांगल्या ग़ज़लेचा एक गुण असतो. तिचा प्रत्येक शे’र मुकम्मल असतो, परिपूर्ण असतो. स्वतःच संपूर्ण कविता असतो. आणि तरीही जेव्हा ते सारे शे’र एकत्र येतात, तेव्हा निर्माण होणारी अनुभूती अजूनच स्वतंत्र, अजूनच वेगळी आणि अजूनच गहिरी असते. “९६”ची प्रत्येक फ्रेम एक मुकम्मल शे’र आहे आणि सबंध चित्रपट मुकम्मल ग़ज़ल! सिनेमा जर प्रतिमांची भाषा बोलणारा असेल, तर त्याला संवादांची अशी कितीशी गरज असणार? सुरुवातीच्या काही दृश्यांत आलेली एखादी प्रतिमा, एखादं पात्र नंतर कधीतरी बरोब्बर नेमक्या जागेवर जाऊन लागणे, हा खरं तर सतर्क पटकथेचा नियम. तो या चित्रपटात इतक्या काही खूबीने जागोजागी वापरलाय की त्यांना ‘वाह’ म्हणण्यापेक्षा आपोआपच ‘आह’ म्हटले जाते. किंबहूना सबंध चित्रपटच आपल्या मनावर अलगद सुऱ्या फिरवत राहातो, हळूहळू धागा-धागा उसवत राहातो, आठवणींची एक एक आवरणे उलगडत राहातो, अशक्य कोटीचा त्रास देत राहातो आणि विचारांच्या पलिकडची शांतता देऊन जातो. असं उसवण्याची ताकद कितीशा कलाकृतींमध्ये असते?

    गेल्याच आठवड्यात मणिरत्नमचा “सीसीव्ही” प्रदर्शित झाला. त्यातसुद्धा विजय सेतूपती होताच ना? मग त्याने लगेचच पुढच्या आठवड्यात इतकी वेगळी भूमिका घेऊन का समोर उभं राहावं? इतकी वेगळी भूमिका आणि इतका अवर्णनीय सुंदर अभिनय की, तुलनेपुरतादेखील आपल्याकडचा कुणी अभिनेता सुचू नये? का? गौतम मेननचा “व्हिटिव्ही” पाहून आठ वर्षांपूर्वी ‘जेसी’ला पक्षी त्रिषा कृष्णनला घाल-घाल शिव्या घातल्या होत्या, एवढी ताकदवान भूमिका होती ती. तिनेही त्यापलिकडचा चटका लावून जावं? राम आणि जानकी ही नावे निव्वळ सांकेतिकतेपुरती न उरता त्याहून खूपच जास्त मोठी व्हावीत? रावणाने जेव्हा सीतेचं अपहरण केलं होतं तेव्हा ती एक एक दागिना खुणेसाठी सोडत गेली होती. तोच प्रसंग संपूर्णपणे वेगळ्या संदर्भात ज्यावेळी “९६”मध्ये घडतो, तेव्हा के. रामचंद्रन आणि एस. जानकीच्या प्रेमाचे पावित्र्य अजूनच ठसठशीतपणे जाणवते. आणि चित्रपट एका, अगदी एखाद्या क्षणासाठीसुद्धा हे पावित्र्य सोडत नाही. असं तरल पातळीवरचं प्रेम आपल्याकडे पाहून कित्येक वर्षे लोटली, कोण जाणे! कदाचित नव्वदच्या दशकाचा संदर्भ असल्यामुळे ते प्रेम इतकं अशारीर, आंतरिक असावं का? अशा कशा चुकीच्या पिढीत जन्माला आलो आपण की त्याकाळचा साधेपणा मनाच्या पाटीवरून पुसला जात नाही आणि तरीही नवीन काळाची नवीन बाराखडी त्याच पाटीवर मन मारून लिहिण्याखेरीज पर्यायसुद्धा नाही.

    संवाद त्या मानाने खूपच कमी आहेत, पण जेव्हा आहेत त्या त्या प्रत्येक वेळी प्रतिमांच्या भाषेहून लाखपटींनी पुढे जाता येण्यासारखे असेल, तेव्हाच आहेत. आपल्याकडे चांगली आणि टिकाऊ गाणी हल्ली का होत नाहीत, माहितीये? कारण त्यांच्यासाठी जी भावना लागते ना ती मुळातच आपल्याकडच्या चित्रपटांच्या आडात नाही आणि म्हणूनच ती गाण्यांच्या पोहऱ्यातसुद्धा येत नाहीत. परंतु “९६”ची गाणी अशा नेमक्या जागी येतात की जिथून संवादांच्याही पुढे लाखपटींनी जाता येण्यासारखे असेल. गोविंद वसंताचे संगीत आणि अनेकविध गीतकारांचे शब्द मिळून असलेला हा अल्बम माझ्या मते यावर्षीचा आत्तापर्यंतचा सर्वश्रेष्ठ रहमानेतर अल्बम तर आहेच, परंतु तितकेच श्रेष्ठ पार्श्वसंगीतसुद्धा आहे. प्रतिमा, संवाद, गीते यांच्याहीपुढे लाखपटींनी जाऊन हे पार्श्वसंगीत चित्रपटाची खोली वाढवते.

    जसजसा चित्रपटाचा शेवट जवळ येऊ लागला होता ना, तसतसं मला दोन भीती ग्रासू लागल्या होत्या. एक, संपू नये असं वाटत असतानाही चित्रपट का संपतोय ही भीती आणि सुरुवातीपासूनच रहस्यांची सुयोग्य किनार लावून चढत असलेला मनोरा पाहाता अखेरीस एखाद्याच चुकीने तो कोसळणार तर नाही ना ही दुसरी. आणि जेव्हा शेवटची फ्रेम आली, खरं सांगतो, सप्पकन एखादं हत्यार आत रुतावं तशी रुतली ती, आणि तिथेच राहिलीये मनाच्या पटलावर छापल्यासारखी, कधीच न निघण्यासारखी. असाच आहे हा चित्रपट. अनेकदा अनुभवाव्याशा ग़ज़लेसारखा. खूप लिहूनही शब्दांमध्ये पूर्णार्थाने न गवसणारा!

    — © विक्रम श्रीराम एडके

    *५/५

  • गॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम

    रामायण-महाभारत यांची आजवर जगात इतक्या वेगवेगळ्या चित्रपटकारांनी वेगवेगळ्या पद्धतींनी मांडणी केलीये की विचारता सोय नाही. पण एखाद्या चित्रपटाच्या बाबतीत मात्र हा मान जर कुणाला मिळाला असेल तर तो फक्त आणि फक्त फ्रान्सिस फोर्ड कपोलाच्या “गॉडफादर”लाच (१९७२)! मुळचीच सशक्त कथा आणि तिची पडद्यावरील तितकीच ताकदवान मांडणी. “गॉडफादर”ने सिनेमाच्या मांडणीच्या क्षेत्रात इतकी वेगवेगळी दालने खुली केली की, तेव्हापासून आत्तापर्यंत माफियांवर जेवढे म्हणून काही सिनेमे बनले असतील त्यांच्यावर कुठे ना कुठे “गॉडफादर”चा प्रभाव हा दिसतोच. कधी अजाणतेपणी तर कधी जाणून-बुजून. वर मी रामायण आणि महाभारताचं उदाहरण दिलं ना, अगदी तसंच वेगवेगळ्या चित्रपटकारांनी आपापल्या दृष्टिकोनांप्रमाणे आणि अर्थातच वकूबांप्रमाणे “गॉडफादर”ची पुनर्मांडणी करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. भारतातही असे प्रयोग कित्येकदा झालेयत. रामगोपाल वर्माचा “सरकार” (२००५), प्रकाश झाचा “राजनीती” (२०१०), दिलीप शंकरचा “आतंक ही आतंक” (१९९५) आणि मणिरत्नम किती जरी नाकारत असला तरी त्याचा “नायगन” (१९८७) अशी कित्येक उदाहरणं देता येतील. याच मालिकेत येतो परवा रिलिज झालेला “चेक्का चिवंता वानम”!

    गॉडफादरला एक मुलगी आणि तीन मुलं असतात. मुलगी कॉनी, भडक डोक्याचा सांतिआनो अथवा सॉनी, हुशार परंतु हॉटेल व कसिनोंपुरताच मर्यादित असलेला लंपट फ्रेडो आणि सगळ्यांत धाकटा मायकेल. गॉडफादरवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा ही मंडळी एकत्र येऊन आपापल्या पद्धतींनी परिस्थितीला तोंड देण्याचा प्रयत्न करतात. आता प्रश्न असा उद्भवतो की गॉडफादरवर हल्ला व्हर्जिल सोलोझोने केलाच नसेल तर? तो जर गॉडफादरच्या मुलांपैकीच कुणीतरी केला असेल तर? तर काय होईल? तर सुरू होईल गॉडफादरची भाऊबंदकी किंवा गॉडफादरचे महाभारत (कोटी हेतुत:)! नेमकी हीच कथा आहे मणिरत्नमच्या “चेक्का चिवंता वानम”ची. चेन्नईतला सगळ्यांत मोठा डॉन सेनापतीवर (प्रकाश राज) प्राणघातक हल्ला होतो. आधी वाटतं की त्याचा प्रतिस्पर्धी चिन्नप्पादासननेच (त्यागराजन) हा हल्ला घडवून आणलाय की काय, परंतु हळूहळू उलगडत जातं की हा हल्ला त्याच्या मुलांपैकीच एकाने केलाय. सेनापतीला चार मुलं. एक मुलगी आणि ताकदवान वरदराजन (अरविंद स्वामी), दुबईत राहून हॉटेलचा बिझनेस पाहाणारा कुटील त्यागराजन अथवा त्यागू (अरुण विजय) आणि सर्बियात शस्त्रांचा व्यापार करणारा निर्दयी एतिराज अथवा एति (सिलम्बरासन). तिघांपैकी एकाने कुणीतरी बापाचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय आणि आता सुरू झालीये बापाची जागा घेण्यासाठी तिघांचीही जीवघेणी चढाओढ! गॉडफादरच्या महाभारताला बऱ्याच अंशी “पोन्नियिन सेल्वन”ची किनार आणि किंचितशी करुणानिधी कुटूंबाची फोडणी!!

    सीसीव्हीची कथा मुळातच अतिशय गुंतागुंतीची आहे. त्यातसुद्धा तिला शेकडो कंगोरे आहेत. तिघांची आई लक्ष्मी (जयसुधा) हीच्या वडलांशी सेनापतीचं जुनं शत्रुत्व. त्यांना संपवल्यानंतरही त्याने तिचा भाऊ चेळीयानला (चित्रपटाचा लेखक शिवा अनंत) जिवंत ठेवलं. इतकंच नव्हे तर त्याला आपल्या ‘फॅमिली’त सामील करून घेतलं. त्याची मुलगी चित्राला (ज्योतिका) मुलीप्रमाणे वाढवलं व यथावकाश तिचं वरदराजनशी लग्नही लावून दिलं. लक्ष्मी एकदा चित्राला म्हणतेसुद्धा की ‘खूपच कठोर आहेस तू’! वरदराजनची एक प्रेयसीसुद्धा आहे, पार्वती (अदिती राव हैदरी). ही पत्रकार आहे. थोडक्यात बऱ्याच जणांचे बरेच हितसंबंध सेनापतीच्या भोवती कुठे ना कुठे गुंतलेले आहेत. वरदराजनचा बालमित्र रसूल (विजय सेतूपती) आता पोलिस इन्स्पेक्टर झालाय. तो वरदराजनला आतून मदत करतो आणि वरदराजन त्याला. हा त्यांच्यातला दोस्तीखात्यात केलेला अलिखित करार आहे. रसूलची पार्श्वभूमीही काळवंडलेलीच म्हणावी अशी आहे. पण लक्ष्मीने रसूलला आईची माया दिलीये. एतिराजची गर्लफ्रेण्ड आहे छाया (डायना एरप्पा) त्यागूची बायको रेणू (ऐश्वर्या राजेश). सांगितलं ना आधीच गुंतागुंतीची कथा आणि तिला शेकडो कंगोरे!

    पण दिग्दर्शक मणिरत्नम आहे! तो या सगळ्या कंगोऱ्यांना असा काही घट्ट धरून ठेवतो की एकसुद्धा धागा इकडचा तिकडे जात नाही. त्याने प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि त्यात तो बहुतांशी यशस्वीसुद्धा झालाय. बऱ्याच वर्षांनी जुना मणिरत्नम पाहायला मिळाला या चित्रपटात. कथेच्या वेगावर त्याची कमाल पकड आहे आणि मांडणीत वेगळीच प्रयोगशीलता. तो खऱ्या अर्थाने सीसीव्हीचा सेनापती आहे. छायाकार संतोष सिवन आणि संपादक श्रीकर प्रसाद या दोन शिलेदारांचा पुरेपूर उपयोग करून घेतलाय त्याने. गाणी नेमक्या जागी येतात. हे गणित जरा मागच्या “काऽट्र वेलियिडई”मध्ये (२०१७) चुकलं होतं. आणि रहमानचे पार्श्वसंगीत चित्रपटाचा एकूणच दृक्परिणाम शतकोटीपटींनी वाढवते, हे सांगणे न लगे! परंतु मध्यांतरानंतर काही काळ जेव्हा कथा जराशी अडखळते तेव्हा रहमानचं दैवी संगीतच आहे जे सिनेमाला पडण्यापासून रोखून धरते. खासकरून ‘सायफर’ ही माझी प्रथमश्रवणी सगळ्यांत आवडती जागा आहे! रहमानचा असा मोठ्या क्षमतेने वापर हिंदीत अनेक वर्षांत कुणी केलेला नाहीये.

    कथा अडखळते म्हणजे तरी काय? कथेला रहस्याचा, साहसपटाचा बाज असला तरीही हे मुळात एक कौटुंबिक नाट्य आहे. मध्यांतरानंतर त्याचा प्रभाव वाढतो. सिनेमांत भावना पाहायची सवय राहिली नसलेल्यांना हे काहीसे कंटाळवाणे वाटू शकेल. अर्थात रहस्योद्घाटन ज्या जागी केलंय, ती जागा मलाही फारशी आवडलेली नाही. आणि दुसरे म्हणजे इतके कंगोरे असताना मी जरा मोठ्या ट्विस्टची अपेक्षा करत होतो, तो त्या तुलनेत अगदीच सामान्य ठरतो. मुख्य पात्रांना जरासं अजून विस्तारून मांडायला हवं होतं, त्यांचे विचार त्यांचे परस्परसंबंध त्यांची घडण अजून उलगडायला हवी होती असं वाटत राहातं. अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे, सेनापती म्हणतो की मला मार्ग सापडलाय, पण त्याचा मार्ग अखेरीस गोष्टी अजूनच बिघडवून ठेवतो, मग त्याच्या नेतृत्वावर कसा विश्वास बसावा? अशा खूप साऱ्या सैल जागा आहेत. परंतु या गोष्टीची पूरेपूर भरपाई मणिने उत्कर्षबिंदूच्या दिग्दर्शनात केलीये. काय ते मी नाही सांगणार. परंतु मणिरत्नमने आजवर हाताळलेल्या सर्वश्रेष्ठ उत्कर्षबिंदूंच्या यादीत त्याचा समावेश होईल, हे नक्की!

    अभिनयाच्या पातळीवर बोलायला गेलं तर प्रकाश राज, जयसुधा या मुरलेल्या अभिनेत्यांकडून चांगल्याच अभिनयाची अपेक्षा आहे. ते ती लीलया पूर्ण करतात. मणिरत्नमच्याच “कडल”पासून (२०१२) नव्याने गवसलेला अरविंद स्वामी राकट वरदाला अक्षरशः जिवंत करतो. काही प्रसंगांत माजलेला वळू वाटण्यापासून ते अगदी हळवा माणूस वाटण्यापर्यंत वैविध्य त्याच्या वाट्याला आलंय आणि तो कुठेच कणभरही उणा पडलेला नाही. अरुण विजयला त्यागूच्या रूपाने जबरदस्त संधी मिळालीये आणि त्याने त्याचं अक्षरशः सोनं केलंय. डायनाला फारसं काम नाही. ऐश्वर्या राजेशने माती केलीये. ज्योतिका मात्र खऱ्या अर्थाने लेडी सुपरस्टार आहे. केवढं जबरदस्त काम केलंय तिने. अदिती राव हैदरीला संधी कमी होती, पण तिनेही सुंदरच काम केलंय. खरं तर सशक्त स्त्रीपात्रे हे मणिरत्नमचं वैशिष्ट्य याही चित्रपटात प्रकर्षाने जाणवतं. आणि तरीही बायकांना फारशी संधीच न देणं, खटकत राहातं. पण चित्रपटाचे खरे स्टार दोनच आहेत. एक सिम्बू! त्याच्या एण्ट्रीलाच प्रेक्षकांनी चित्रपटगृह जे डोक्यावर घेतले, की बास! त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात किती जरी विरोधी वातावरण असलं तरीही तो खऱ्या अर्थाने सुपरस्टार आहे, हे लोकांच्या त्याच्यावरील प्रेमातून बरोब्बर दिसतं. आणि तो सुद्धा ही संधी गमावत नाही. आतल्या गाठीचा एति तो अश्या काही खूबीने साकारतो ना की, मजा येते! पण त्याच्यापेक्षा जास्त जल्लोष झाला तो अर्थातच विजय सेतूपतीच्या एण्ट्रीला! या निष्णात कलाकाराचा शब्दशः ड्रीमरन सुरू आहे आत्ता. दारुडा, विचित्र पार्श्वभूमीतून आलेला आणि सदोदित संकटात सापडलेला रसूल त्याने छप्परतोड रंगवलाय. कसाही प्रसंग असो तो हास्याची लकेर उमटवतोच!

    “चेक्का चिवंता वानम” काळवंडलेले रक्ताकाश हा असा अनुभवण्याचा चित्रपट आहे. थोडा कडू-गोड असला तरीही अनुभवण्याचा. आणि अनुभवण्याचा म्हणजे पाहाण्याचाच नव्हे, तर ऐकण्याचाही! तो “आयुधा येऽळदऽ”इतका (२००४) ग्रेट नाही आणि “काऽट्र वेलियिडई”इतका सामान्यसुद्धा नाही. तो दोन्हींच्या मध्ये कुठेतरी खास जागी आहे!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [www.vikramedke.com]

    *३.५/५

  • कॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण

    कलियुग हे आसुरी शक्तींचं युग आहे. त्रेता आणि द्वापारातच आसुरी शक्तींनी प्रचंड उच्छाद मांडलेला असताना, कलीत त्या शक्ती चरमसीमेवर नसतील तरच नवल! अशीच एक प्राचीन कृष्णशक्ती पृथ्वीवर आलीये. मागच्या अनेक युगांतरी तिचा ब्रह्मांडावर नियंत्रण मिळवण्याचा डाव फसला होता. परंतु हे युग काळीम्याला पोषक आहे. यावेळी चूक होणेच शक्य नाही. सबंध विश्वावरच नव्हे तर सगळ्यांच मितींमध्ये आपलं काळं साम्राज्य पसरायचं असेल, तर एका चेहऱ्याची गरज आहे. कुठे मिळणार तो चेहरा? दुसरीकडे नागराजचा काका असलेला सैतानी नागपाशा अमृतप्राशन केल्यामुळे अमर आहे, परंतु तरीदेखील तो नागराजपुढे वारंवार हरतच आलाय. तो का प्रत्येकवेळी हरतो, याचे कारण शोधून त्याच्या कुटील गुरूंनी एक आगळाच प्रयोग आखलाय यावेळी. हा प्रयोग पूर्ण होणार तोच, उपरोल्लिखित महाकाय कृष्णशक्ती पृथ्वीच्या आयामात प्रवेश करते आणि घटनांचे सारे संदर्भच बदलून जातात. सुरू होते कलियुगातले रामायण, अर्थात नागायण!

    आर्ष महाकाव्यच नव्हे तर इतिहास म्हणून गौरविलेले रामायण गेली हजारो वर्षे आपण वाचत, ऐकत, पाहात आलोय. अनेकांनी आपापल्या बुद्धी आणि प्रतिभेनुसार त्याचा अन्वयार्थ लावायचे प्रयत्नही केले. त्यातून उद्भवलेल्या शेकडो कलाकृती, ग्रंथ, नाटके, सिनेमे, कादंबऱ्या आपापल्या वकूबानुसार आज प्रसिद्ध आहेत. परंतु कॉमिक्सच्या विश्वात, विशेषतः भारतीय कॉमिक्सच्या विश्वात रामायणावर थेटपणे नव्हे तर वेगळ्या कथेच्या संदर्भाने भाष्य क्वचितच झाले असेल. कॉमिक्स वाचणाऱ्यांना सुपरिचित असलेल्या ‘राज कॉमिक्स’ने हे शिवधनुष्य (कोटी हेतुत:!) उचलले आणि उचललेच नव्हे तर त्याला प्रत्यंचा चढवून अचूक संधानही केलेय. त्यातूनच उभी राहिलीये काळ, दिशा, स्थल सगळ्यांनाच भेदून उरणारी महागाथा ‘नागायण’!

    या ‘नागायणा’त श्रीराम आहेत, सीता, लक्ष्मण, हनुमान, कैकेयी, जटायू, विश्वामित्र, राक्षस, वानर आणि अगदी रावणसुद्धा आहेत! मला आवडलेली सगळ्यांत मोठी गोष्ट म्हणजे यांतलं एकही पात्र ओढून-ताणून नाहीये. बहुतांश पात्रे नैसर्गिकरित्या आधीपासूनच राज-कॉमिक्सविश्वाचा भाग असलेली आहेत. त्यांच्या मूळ स्वभावांचे रामायणानुसार लावलेले अन्वयार्थ इतके चपखल बसतात की वाटावं, १९८६ पासून ‘राज कॉमिक्स’ जणू याच एका शृंखलेची तयारी करत होते! वाल्मिकींचे ‘रामायण’ जसे बाल, अयोध्या, अरण्य किष्किंधा, सुंदर, युद्ध आणि उत्तर अशा ७ कांडांमध्ये पसरलेले आहे, तद्वतच अनुपम सिन्हा व जॉली सिन्हांचे हे ‘नागायण’ वरण, ग्रहण, हरण, शरण, दहन, रण, समर, इति अशी ८ कांडे व १ उपसंहार अशा एकूण ९ खंडांत (पक्षी कॉमिक्समध्ये) पसरलेले आहे. यांपैकी कोणतेही कॉमिक्स दुसऱ्याहून यत्किंचितही कमी नाही. भारतीय कॉमिक्सविश्वाला सुपरकमांडो ध्रुवसारखे एकमेवाद्वितीय न अन्य कोऽपि पात्र देणारे Anupam Sinha नि:संशय शतकातील सर्वश्रेष्ठ कॉमिक-लेखकांपैकी एक आहेत आणि ‘नागायण’ची रोमहर्षक कथा व तितकीच रोमांचक मांडणी हे या गोष्टीचे जिवंत पुरावे आहेत.

    ज्यांनी मूळ वाल्मिकींचे रामायण वाचलेले असेल, त्यांना कथेचा काही काही ठिकाणी अंदाज येईल. हा म्हटलं तर दोष आहे. परंतु हे संदर्भ अनेकवार अनपेक्षित ठिकाणी आलेले असल्यामुळे ते उलगडताना अनुभवणे हा एक वेगळाच सौख्यदायी अनुभव आहे. अनेक ठिकाणी मूळ स्रोताशी विलग होताना घेतलेले स्वातंत्र्य कथेसाठी पोषकच ठरले आहे. परंतु त्यासोबतच पात्रांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांचा मूळ कथेवर होणारा परिणाम या सबंध शृंखलेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. सबंध कथाच भविष्यकाळात घडत असल्यामुळे नागराज आणि सुपरकमांडो ध्रुव या महानायकांच्या वैयक्तिक आयुष्यांमध्ये प्रचंड उलथापालथ झाली आहे. त्यांचे दिसणे आणि पेहरावही कथेला अनुरुप बदललेयत. आणि तरीही अंतरी ते पूर्वीचेच नागराज व ध्रुव आहेत. हा समतोल राखणे ही मोठीच अवघड जबाबदारी, परंतु ती येथे लीलया पार पाडली गेली आहे. आणि याचवेळी अरेषीय पद्धतीने मांडणी करताना पुढच्या पिढ्यांनाही उचित स्थान देऊन त्यांची चपखल स्थापनादेखील केली आहे. अर्थात ‘राज कॉमिक्स’ हे नागराजच्या तुलनेत ध्रुवला, तो सगळ्यांपेक्षा वरचढ असूनही, कायमच सापत्नभावाची वागणुक देत आलंय, हा माझ्या मनातील जुनाच सल याही शृंखलेत काहीसा जाणवतो.

    तुम्ही याआधी ‘राज कॉमिक्स’ वाचले नसेल तर काही गोष्टींचे संदर्भ लागणे अवघड जाऊन रसभंग होण्याची शक्यता आहे. या शृंखलेत हल्लीच्या परिस्थितीला अनुलक्षून काही ईस्टर-एग्ससुद्धा आहेत. परंतु ते डोळसपणे वाचणाऱ्यालाच सापडतील. अर्थात क्वचित काही गोष्टी सोडल्यास ही सबंध शृंखलाच मोठी अविस्मरणीय व अक्षरशः ‘कलेक्टर्स एडिशन’ घेऊन संग्रही ठेवावी अशीच झाली आहे. कॉमिक्स म्हणजे पोरासोरांनी वाचायच्या गोष्टी, हा आरोप तर ‘राज कॉमिक्स’ने केव्हाच धुवून टाकलाय, किंबहूना ‘नागायण’द्वारे ते या बाबतीत अजूनच शंभर पावले पुढे गेले आहेत. कधी जर ‘राज कॉमिक्स’मधील पात्रांवर चित्रपट बनलेच तर ‘नागायण’ हे शंभर ‘इन्फिनिटी वॉर’लाही भारी ठरेल, एवढा त्याचा आवाका आहे आणि एवढी त्याची महत्त्वाकांक्षी मांडणी आहे. तुम्ही तर वाचाच, परंतु आपल्या आर्ष ग्रंथांपासून दूर गेलेल्या पुढच्या पिढ्यांनाही मनोरंजक चित्रकथेद्वारे मांडलेली ही शृंखला वाचायला द्या, त्यांना त्याचे संदर्भ आणि अन्वयार्थ उलगडून सांगा व हलकेच त्यांना मूळ ग्रंथांकडे घेऊन या. संस्कार असेच होत असतात!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [www.vikramedke.com]

  • ईसईज्ञानी

    सिम्फनी लिहायला किती वेळ लागतो? मोठमोठे संगीतकार त्यासाठी ६ महिने ते १ वर्षसुद्धा घेतात. पण एक भारतीय कलाकार आहे ज्याने आजपासून पाव शतकापूर्वी सिम्फनी लिहिलीये. सिम्फनी लिहिणारा तो भारतातलाच नव्हे, तर आशिया खंडातला पहिलाच संगीतकार आहे. त्याला किती काळ लागला माहितीये? ६ महिने? एखादं वर्षं? १९९३ साली लंडनच्या रॉयल फिलहार्मनिक ऑर्केस्ट्राला घेऊन त्याने ही सिम्फनी अवघ्या १३ दिवसांत लिहिलीये! आणि तिचा दर्जा ऐकून इंग्लंडमधील त्या प्राचीन वाद्यवृंदाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली होती. सांगायची गरजच नाही की, हा पराक्रम करण्याची ताकद असलेला केवळ एकच संगीतकार सबंध जगात आहे, ‘ईसईज्ञानी’ इलयराजा!!

    राजा प्रसंग ऐकतो. जागच्या जागी चाल लिहितो. आणि अवघ्या ५ मिनिटांत गाणं तयार होतं! शब्द लिहायला आणि गायकाला शिकून गायला वेळ लागतो, तेवढाच कालव्यय. तुम्ही विचार कराल की पाचच मिनिटांच्या गाण्याचा दर्जा तो काय असणार? एकदा बॉम्बे जयश्री म्हणाल्या होत्या, राजाकडे गाणं म्हणजे परत एकवार शाळेत जाण्यासारखं असतं. त्याच्या चालीत इतके बारकावे असतात की, प्रत्येक गाण्याची टिपणं काढण्यासाठी स्वतंत्र वहीच करावी लागते. राजाने आजवर १०००हूनही अधिक चित्रपट केलेयत आणि त्यातील किमान ८५० तरी म्युझिकल ब्लॉकबस्टर्स आहेत. जगात आजवर कुणालाच न साधलेला विक्रम आहे हा! राजा स्टुडिओत येतो. सिनेमा लावायला सांगतो. सिनेमा पुढे सरकतो तसतसा पाहात झरझर नोटेशन्स लिहितो. सिनेमा संपेपर्यंत सबंध चित्रपटाचे पार्श्वसंगीत कागदावर उतरलेलेसुद्धा असते! हे सुद्धा जगात कुणीच करू शकत नाही. राजाने आपल्या पार्श्वसंगीताच्या जोरावर अतिसामान्य चित्रपटांना व प्रसंगांनाही वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेय. इतरांची वाद्ये बोलतात, राजाच्या पार्श्वसंगीतात मौनसुद्धा बोलते! आजवर मिळालेल्या ५ राष्ट्रपती पारितोषिकांपैकी २ पार्श्वसंगीतासाठी मिळालेयत राजाला.

    आपल्याकडे जो दर्जा माऊलींच्या ज्ञानेश्वरीला आहे, तसाच दर्जा तमिळ साहित्यात ९व्या शतकातील संतकवी मणिक्कवसागरांनी लिहिलेल्या ‘तिरुवसागम’ला आहे. त्यातील ५१ रचनांपैकी ६ रचना राजाने २००५ साली निवडल्या. हंगेरीच्या बुडापेस्ट सिम्फनी ऑर्केस्ट्राला हाताशी धरलं आणि एक अभूतपूर्व ओरॅटरियो लिहिला. ओरॅटरीयो हा इटालियन शब्द आहे. सिम्फनीमध्ये नुसताच वाद्यवृंद असतो, तर ओरॅटोरियोमध्ये त्यासोबतच कॉयर आणि सोलोजसुद्धा असतात. काहीसा ऑपेराच्या जवळ जाणारा हा प्रकार. भारताने जगाला दिलेल्या सर्वश्रेष्ठ संगीतरचनांची यादी करायला घेतली, तर ‘तिरुवसागम’चा समावेश मी अतिशय वरच्या स्थानी करेन इतक्या श्रेष्ठ सांगितिक दर्जाचा अल्बम आहे हा. असाच एक प्रयोग राजाने १९८६ साली केला होता. पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतातील बरोक शैलीचा निष्णात संगीतकार बाख़ (१६८५-१७५०) आणि आपल्याकडील कर्नाटक शास्त्रीय संगीतातील संत त्यागराज (१७६७-१८४७) या दोघांच्या शैली एकत्र करून राजाने अल्बम केलेला “हाऊ टु नेम इट”. लेणं आहे हे संगीतातील अक्षरशः! त्यानंतर दोनच वर्षांनी ५० जणांचा वाद्यवृंद आणि साक्षात पं. हरिप्रसाद चौरसियांना घेऊन केलेला इन्स्ट्रुमेंटल अल्बम “नथिंग बट विण्ड”ला (१९८८) तर माझ्या प्लेलिस्टमध्ये ध्रुवबाळासारखे अढळपद आहे! आणि असे अनेक अल्बम्स राजाने आजवर केले आहेत.

    चित्रपट आणि चित्रपटेतर संगीत, दोन्हींमध्ये राजाने केलेल्या प्रयोगांची संख्या अनंत आहे. त्यांना तोडच नाही. राजाला ‘ईसईज्ञानी’ अर्थात ‘संगीतातला सर्वश्रेष्ठ ‘ म्हणतात, ते म्हणूनच सार्थ आहे. आज राजाचा वाढदिवस. आज वयाची ७४ वर्षे पूर्ण करून हा संगीतकुलगुरू पंचाहत्तरीत पदार्पण करतोय. शरीर म्हातारं होत असतं, कला मात्र मुरतच जाते! संस्कृतमध्ये म्हणतात ना,
    जयन्ति ते सुकृतिना: रससिद्धा कवीश्वरा: ।
    नास्ति येषां यश:काये जरामरणजं भयम् ।।
    या ओळींचा खरा मालक आहे इलयराजा, नव्हे राजाधिराजा इलयराजा!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • लढ मित्रा

    डरतो कश्याला तू लढ मित्रा
    लढत्याची दासी धरणी मित्रा

    दु:ख तितुके माया हो
    सूर्य गिळतो छाया हो
    टाकीच्या घावांमधुनी
    देव बनते काया हो
    वेदना रे वीराला
    लिहिली असे जन्माला
    वेणांची करुनि गीते
    गा तू आपुल्या कर्माला
    तुझिया रे कष्टांनी हो अवनिला आधारा
    तू बांध माथ्यावरती जखमांचा हा भारा
    व्रण हे जरी भीषण रे
    युद्ध वीरा भूषण रे
    तू पार्थ तुझा तू कृष्ण तुझा तू तुझी गीता रे
    होतील कविता ह्या तलवारी
    देतील अंधारा त्या ललकारी

    डरतो कश्याला तू लढ मित्रा
    लढत्याची दासी धरणी मित्रा

    गंध मातीचा येण्या
    चार महिने ताप हो
    तपाचे फळ मिळण्या
    पाहावी लागते वाट हो
    शंभरवेळा पडताना
    शंभरवेळा जो उठतो
    त्याचीच होते सरशी
    जुळण्यासाठी जो तुटतो
    असू दे किती जरी उन्नत हिमवंताचा माथा
    धीराच्या पदचिन्हांकित विजयाच्या या गाथा
    ध्येय असे ह्रदयात
    बदले हार विजयात
    हे मर्म असे रण कर्म असे हा इतिहासच आहे
    होतील कविता ह्या तलवारी
    देतील अंधारा त्या ललकारी

    डरतो कश्याला तू लढ मित्रा
    लढत्याची दासी धरणी मित्रा

    — © विक्रम श्रीराम एडके
    **************************************
    चाल: ओव्वोरु पूकळुमे (ऑटोग्राफ)
    राग: सिंधुभैरवी
    **************************************

  • आठवणींच्या गल्लीबोळांतून

    नव्वदचं दशक हे अनेक अर्थांनी नॉस्टॅल्जियाचं दशक आहे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या अनेकांसाठी ते नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद, जतिन-ललित अश्या जोड्यांनी, अन्नू मलिक वगैरेंसारख्या सफाईदार “बाजीगरां”नी व विजू शाहसारख्या अनेकानेक अंडररेटेड माणकांनी बनवलेल्या आणि कुमार, अलका, उदित वगैरेंनी बेभान होऊन गायलेल्या दिलतोड गीतांचं दशक आहे; तर नव्वदच्याच दशकात जन्मलेल्या आजच्या तरुणांसाठी ते इंडीपॉप गाण्यांमधील नव्या प्रवाहांत केलेल्या सचैल स्नानांचं दशक आहे. दोन्हीही प्रकारच्या मंडळींसाठी ते एकत्रितपणे समीरचंदेखील दशक आहे. आणि दोन्हीही प्रकारची मंडळी त्या दिवसांबद्दल बोलताना जरादेखील थकत नाहीत.

    याच दशकाने सोनू निगम, शान, केके, शंकर असे हिरेसुद्धा दिले! याच दशकाने शंकर-अहसान-लॉय दिले आणि याच दिवसांनी रहमान दिला!! त्यामुळे “आशिकी” (१९९०) वगैरेंपासून सुरू झालेली नॉस्टॅल्जियाची गाडी “रंगीला” (१९९५), “दिल से” (१९९८), “ताल” (१९९९), “कहो ना प्यार है” (२०००), “लगान” (२००१), “दिल चाहता है” (२००१), अशी शेकडों स्टेशनं पार करत करत पार “प्यार में कभी कभी” (१९९९), “कल हो ना हो” (२००३), “हम तुम” (२००४) ते थेट “धूम”पर्यंत (२००४) जाऊन पोहोचते! २००५, २००६ सालापर्यंत हा नव्वदच्या दशकातला सांगितिक मॉन्सून परतीचा पाऊस बनून बरसत होता. त्याला खऱ्या अर्थाने ब्रेक लावला तो हिमेश रेशमियाने २००५ मध्ये “आशिक बनाया आपने”द्वारे!

    तसं बघायला गेलं, तर हिमेश हे देखील नव्वदच्याच दशकाचं बायप्रॉडक्ट! परंतु “प्यार किया तो डरना क्या” (१९९८), “कुरुक्षेत्र” (२०००), “दुल्हन हम ले जाएँगे” (२०००), “तेरे नाम” (२००३) वगैरे सरधोपट मेलडीजच्या मार्गावरून जाता जाता त्याने त्याचा साऊंड “आशिक बनाया आपने”मध्ये आमूलाग्र बदलला. हा बदल जितका सानंद स्वीकारला गेला तितकाच भल्याभल्यांना समूळ हलवूनसुद्धा गेला. पहिला धक्का ओसरताच हळूहळू सारं बॉलिवूड त्याच साऊंडची कॉपी करू लागलं. स्वतःचा वेगळा साऊंड जपणारे त्याकाळीही रहमान आणि शंकर-अहसान-लॉय वगैरे लोक होते.

    यांपैकी रहमान हा बदलांना सगळ्यांत वेगळ्या प्रकारे रिस्पॉण्ड करणारा माणूस आहे. हिमेशच्या लाटेच्याही पूर्वी आपला साऊंड जुना होऊ लागल्याचं त्याने बरोब्बर हेरलं होतं आणि “रंग दे बसंती”द्वारे (२००५) त्याने सगळा खेळच पालटून टाकला होता. पण कॉपीज हिमेशच्या बनल्या, रहमानच्या नाही. कारण, रहमानचा आधीचा साऊंड हा खूपच साधासरळ, प्रयत्नाने आत्मसात करता येण्यासारखा होता. २००४ नंतर रहमानने साऊंड बदलण्याची सुरू केलेली प्रक्रिया २००९ ला “दिल्ली ६”पर्यंत पूर्ण झाली आणि तोपर्यंत त्याचा साऊंड इतका काही गुंतागुंतीचा झाला होता की त्याची सहीसही नक्कल करूनही तो प्रतिभेच्या कवेत गवसणे शक्यच नव्हते.

    याच काळाने प्रीतम, अमित त्रिवेदींसारखी मंडळी दिली, तर विशाल-शेखरला अजून वरच्या पातळीवर पोहोचवलं. म्हणजे ज्यांना रहमान परवडत नाही आणि हिमेशपर्यंत खालीसुद्धा उतरायचं नाही, ते इन्स्टंट हिट्ससाठी प्रीतमकडे जाऊ लागले. त्यात अजून थोडासा क्लास हवा असलेले विशाल-शेखरकडे तर अजून प्रयोगशीलता हवे असलेले अमित त्रिवेदीकडे जाऊ लागले.

    शंकर-अहसान-लॉय यांचाही साऊंड २००२ चे २००५ पर्यंत रिपिटिटिव्ह होत गेला. पण तुरळक अपवाद वगळता त्यांना तो अनेक वर्षे बदलताच आला नाही. त्यामुळे त्यांचे चांगले आणि हिट असे दोन्हीही प्रकारचे अल्बम्स तुलनेने कमी कमी होत गेले. त्यांच्यातला मोठा, सकारात्मक बदल दिसला तो २०१२ सालच्या “विश्वरूपम” साऊंडट्रॅकमध्ये! त्यानंतर “कट्यार काळजात घुसली” (२०१५), “मिर्ज्या” (२०१६) अशी एकाहून एक रत्ने जरी त्यांनी दिली असली तरी आत्ता आत्ता कुठे ते पुन्हा एकवार जम बसवू लागलेयत.

    दरम्यान हिमेश केव्हाच मागे पडला. किंबहूना एकेकाळचे मोठमोठे दिग्गज विस्मृतीत गेले व जाऊ लागले. अवघ्या १०-१५ वर्षांपूर्वीपर्यंत जेवढे प्रयोग मुख्य प्रवाहातल्या चित्रपट संगीतात व्हायचे, तेवढे तर आता इंडीपॉप आणि समांतरमध्येसुद्धा होताना दिसत नाहीत. चित्रपटसंगीताची तर गोष्टच नको. ते रोज रोज नवीन पायऱ्या “उतरतच” चालले आहे. आणि गंमत म्हणजे हेही दशक उद्या कुणाच्या तरी उसासे टाकायला लावणाऱ्या नॉस्टॅल्जियाचा भाग असणार आहे! जितकी कळ आज पस्तिशीत असलेल्यांच्या काळजातून कुमार सानूसाठी उठते, तितकीच उद्या कुणाच्यातरी काळजातून अरिजित सिंहसाठी उठणार आहे! बदल हाच एकमेव शाश्वत असतो असे नाही, तर बदलणारेदेखील शाश्वत असतात. त्यामुळे रहमान हा नव्वदच्या दशकातल्यांसाठी जितका नॉस्टॅल्जियाचा भाग आहे तितकाच दहाच्या, वीसच्या दशकातल्यांसाठीसुद्धा आहे आणि तीसच्या व चाळीसच्या दशकांतल्यांसाठीसुद्धा राहिल. बाकी आपापले नॉस्टॅल्जियाज खूपच सापेक्ष असतात आणि म्हणूनच ते ह्रदयाच्या कुपीत जपून ठेवायचे असतात, हूरहूर लावणाऱ्या कातरवेळी मनगटावरून फायासारखे फिरवण्यासाठी!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (संपर्क: www.vikramedke.com)

  • कधी कधी

    कधी कधी रात्र विरताना,
    दिवस उगवायाचा असतो अजून,
    सूर्य उमलायाचा असतो अजून!
    चंद्राचं इंधन पुरतं संपलेलं नसतं आणि
    लुकलुकत असतात ताऱ्यांचे लाखो पलिते,
    क्षितिजचुंबी गगनाच्या लाक्षागृहात!
    कुणीतरी साखरझोपेत कूस बदलतो,
    कुणाची मिठी घट्ट होते
    कुठे कुरकुरत असतो पंखा तर
    कुठे स्वप्नांची होडी पैल होते!
    अश्या एकाकी अंधारवेळी
    मी टक्क जागा असतो,
    कधी सुटलेले हात आठवत,
    तर कधी मिटलेली दारे साठवत!
    तू विचारलं होतंस, ‘विसरणार तर नाहीस ना मला’
    आणि ‘मला विसर, माझं लग्न ठरलंय’,
    हेदेखील तूच म्हणाली होतीस!
    मला तेव्हाही उत्तर सुचलं नव्हतं,
    मला तेव्हाही उत्तर सुचलं नाही!
    त्या एकांत प्रहरी मात्र,
    सुचत राहातात सारीच न दिलेली उत्तरे,
    आणि त्यावरच्या न आलेल्या प्रतिक्रिया!
    थेंब थेंब झरणारे चांदणे आटत जाते
    आणि रात्रही लागलेली असते सरू,
    पण दिवस उगवायाचा असतो अजून,
    सूर्य उमलायाचा असतो अजून,
    कधी कधी रात्र विरताना!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (www.vikramedke.com)