Author: Vikram Edke

  • गुलज़ार

    नज़्म पूरे जोबन पे थी
    नूर के कोहरे बहते थे
    इश्क़ तो तब भी था मगर
    वह और जगह रहते थे

    चलते-बहते एक रात
    सय्यार टकराया चाँद से
    नूर मिला नज़्म को जा कर
    अब्रों की दिवार फाँद के

    सागर डोल गया था उस दम
    तारे सारे उफनने लगे थे
    दूर कहीं कोहसारों में
    ख़्वाब पकने बनने लगे थे

    वक़्त थम गया था उस वक़्त
    नज़्म-ओ-नूर का दीदार हुआ
    इक हलचल सी हुई उजालों में
    इक नाम उठा ‘गुलज़ार’ हुआ

    — © विक्रम श्रीराम एडके
    Gulzar #HBDGulzarSaab

  • मनोव्यापारांचा गूढ खेळ – जेराल्ड्स गेम

    जेसी (कार्ला गुगिनो) आणि जेराल्ड (ब्रुस ग्रीनवूड) सप्ताहांत साजरा करण्यासाठी त्यांच्या अलाबामातील नदीकाठच्या घरी जातात. एकत्र वेळ घालवणं, मजा करणं आणि त्यायोगे आपलं रुक्ष होत चाललेलं वैवाहिक जीवन वाचवणं, हा त्यांचा हेतू असतो. परंतु जेराल्डची मजेची कल्पना जरा वेगळीच असते. प्रवासाला निघतानाच त्याने सोबत खरोखरीच्या हातकड्या घेतलेल्या असतात. तो जेसीला त्या हातकड्यांनी पलंगाला जखडून ठेवतो. आणि त्याची रेप फँटसी पूर्ण करण्यात तिला भाग घ्यायला लावतो. जेसीला ही कल्पना मनापासून आवडलेली नाहीये. परंतु ती तरीही प्रयत्न करते. तिला त्या प्रकाराची क्षणोक्षणी शिसारी येऊ लागते. ती जेराल्डला सोड म्हणते. आणि मी नाही सोडलं तर, जेराल्ड उत्तरतो. जेसी घाबरते. जेसी आणि जेराल्डच्या वयात बरंच अंतर आहे. तो तिच्यापेक्षा खूप मोठा, अगदी म्हातारा म्हणावा, असा आहे. परफॉर्म करता यावं म्हणून तो व्हायाग्रा घेतो, एक नव्हे दोन! जेसी बांधलेल्या अवस्थेत आहे. तो तिच्या असहकार्यामुळे तिच्याशी वाद घालतोय. अचानक त्याला ह्रदयविकाराचा झटका येतो. आणि जेराल्ड मरतो! आता आजूबाजूला दूरदूरपर्यंत मनुष्यवस्ती नाही. नोकरचाकर किमान दोन-तीन दिवस तरी फिरकणार नाहीयेत. किमान! आणि जेसी त्या भल्यामोठ्या घरात एकटीच, जखडलेली आहे!!

    वरवर पाहाता “जेराल्ड्स गेम” हा सर्व्हायवल स्टोरी वाटू शकतो. नव्हे, त्याच्या या अश्या पार्श्वभूमीमुळे तो वाटतोच. परंतु चित्रपट पाहिल्यावर कळतं की, हा एक अतिशय गहिरा असा सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे! यात सर्व्हायवल दुय्यम आहे. प्राप्त परिस्थितीत सत्य आणि आभास यांचा मेळ राखणे, मनाचा समतोल राखणे ही जेसीची प्राथमिकता आहे. जवळच नवऱ्याचे प्रेत पडलेले आहे. घराजवळ पोहोचताना जेसीने एका भटक्या कुत्र्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला होता, जेराल्डने तिला रोखले होते. तो कुत्रा आता उघड्या दारातून आत आलाय. जेसी एकटी असूनही एकटी नाहीये. तिच्या सोबतीला तिचे अंतरात्मे आहेत. एक सोडून दोन! एक जेराल्डचं प्रतिनिधित्व करतोय तर एक जेसीचं. त्या दोघांच्या कल्लोळात जेसी अडकलीये, त्या साखळ्यांपेक्षाही घट्ट. पण या साखळ्या तरी खऱ्या आहेत का? की प्रतीकात्मक आहेत? जेसीला त्या दोघांच्या (की तिघांच्या!) संवादातून अश्याच अजून एका प्रसंगातल्या साखळ्या आठवू लागतात. कधीच, कुणालाच न सांगितलेली रहस्यं उचंबळून, उसळून वर येऊ लागतात. त्या एकाकी घरातल्या संध्याछाया अजूनच गडद होत जातात.

    “जेराल्ड्स गेम”चं वेगळेपण काय आहे माहितीये? तो जरासुद्धा सस्पेंस राखण्याचा प्रयत्न करत नाही. किंबहूना कुठे फार सस्पेस राहिल असं वाटू लागलं, तर पात्रांच्या संवादातून लगेच स्पष्टिकरणच देऊन टाकतो. हा खरं तर हॉरर चित्रपटांसाठी दोष मानला जातो. परंतु इथे तो चित्रपटाच्या बाजूने अभूतपूर्व काम करतो. बोललेल्या, संकेत केलेल्या त्या भयावह घटना कधी होतील याची आपण नकळत वाट पाहू लागतो आणि त्याचवेळी त्या होऊ नयेत म्हणून मनोमन प्रार्थनासुद्धा करू लागतो! स्टिफन किंग माझा अतिशय आवडता लेखक. सूक्ष्म, छोटछोट्या, वरवर साध्यासुध्या भासणाऱ्या गोष्टींमधून ताण निर्माण करण्याची त्याची हातोटी विलक्षण आहे. त्याच्याच, त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाने हा आत्मा बरोब्बर पकडलाय!

    हा चित्रपट त्याच्या पार्श्वभूमीमुळे “रागिणी एमएमएस”सारखा असेल की काय, अशी कुणाला शंका येऊ शकते. किंबहूना मला सुद्धा ती आली होती. परंतु हा चित्रपट इतका जास्त गहिरा आहे की, त्याच्यापुढे “रागिणी एमएमएस” नुसता भडक आणि बटबटीतच नाही तर अक्षरशः लहान पोरांचा खेळ वाटतो. “जेराल्ड्स गेम”मध्ये सांकेतिकतेचा मुक्तहस्ते वापर केलाय. विशेषतः ग्रहणाच्या. सस्पेंस कमीत कमी असूनही तो एका क्षणासाठीसुद्धा उत्कंठा कमी करत नाही. सरधोपट हॉरर अथवा थ्रिलरसारखे यात जम्प-स्केअर्स नसूनही तो सातत्याने धक्के देत राहातो. नैतिकता-अनैतिकतेचे प्रश्न उपस्थित करत राहातो. एक गंमत सांगतो, चित्रपटातली दोन्ही प्रमुख पात्रे, जेराल्ड आणि जेसी यांचे लग्न तुटण्याइतपत ताणलेले आहे. मी मूळ कादंबरी वाचलेली नाही. परंतु ही बाब स्थापित करण्यासाठी कदाचित कादंबरीत काही पानेसुद्धा खर्ची पडू शकतात. चित्रपट ही बाब एकाच वाक्यात स्थापित करतो. ही चित्रपट माध्यमाची असीम शक्ती आहे. तितकेच ते माईक फ्लॅनॅगन या दिग्दर्शकाचे कौशल्यसुद्धा आहे. कार्ला गुगिनोने अक्षरशः करिअर डिफाईनिंग म्हणावे असे जबरदस्त काम केलेय. ब्रुस ग्रीनवूडसुद्धा कमालच. हा छोटासा, कमी बजेट असलेला, बहुतांशी एकाच खोलीत घडणारा चित्रपट नेटफ्लिक्सने प्रदर्शित केलाय. नेटफ्लिक्सवर सहज मिळेल. हॉरर, थ्रिलर वगैरे जॉनर्समध्येसुद्धा काहीतरी वेगळं पाहू इच्छित असाल, तर “जेराल्ड्स गेम” बेस्ट चॉईस आहे!!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    *५/५

  • खेळ

    “Boom Beach मध्ये ना आपल्याला एक आयलंड दिलेलं असतं. त्यावर आपला बेस बनवायचा, रिसोर्सेस प्रोड्युस करायचे. तसेच दुसरे बीचेस शोधून त्यांच्यावर अटॅक करायचा. आणि ते जिंकून घ्यायचे”!
    पाच वर्षांचा अर्णव बाबांना उत्साहाने सांगत होता. त्याचे बाबा, विख्यात अॅस्ट्रोफिजिसिस्ट डॉ. ज्ञानेश्वर लॅपटॉपवर काम करता करता नुसतेच “हं” म्हणाले!

    “मी आत्ता लेव्हल 47 ला आहे, माहितीये. हे तर काहीच नाही, पार्थिव तर लेव्हल 61 वर आहे पार!”, बाबा ऐकताहेत म्हणून अर्णवने माहिती पुरवणे चालूच ठेवले.

    “पण काय रे, ज्या आयलंडवर तुम्ही हल्ला करता, त्यांचेसुद्धा डिफेन्सेस असतीलच ना?”, लॅपटॉपच्या टकटकाटाच्या पार्श्वभूमीवर डॉ. ज्ञानेश्वरांनी विचारले.

    “असतात ना”, अर्णव सांगू लागला, “आपण अटॅक करायला नेमकं असं आयलंड निवडायचं जे आपल्यापेक्षा लो-लेव्हलचं असेल, म्हणजे जिंकण्याची प्रोबॅबिलिटी वाढते”.

    “आणि लो-लेव्हलचं आयलंड नसेल तर”?

    “प्रत्येक रिअल-प्लेयर आयलंडसमोर एक आयकॉन असतो. तो टच केला की, त्याची लेव्हल शफल होते आणि त्याच्याजागी दुसरं आयलंड दिसू लागतं. लो-लेव्हलचं आयलंड आलं, तर अटॅक करायचा”!

    डॉ. ज्ञानेश्वरांना गंमत वाटली, “इंटरेस्टिंग”, असं म्हणून त्यांनी लॅपटॉपवर एन्टरचे बटन दाबले. त्यासरशी त्यांना सापडलेल्या एका नवीन एक्स्ट्राटेरेस्ट्रिअल ऑब्जेक्टचा रिपोर्ट त्यांच्या इन्स्टिट्यूटला सेण्ड झाला. तो त्यांच्या लॅपटॉपमधून लहरींद्वारे सॅटेलाईटला आणि तिथून लहरींद्वारेच इन्स्टिट्यूटच्या डेटाबेसला काही सेकंदात जाणार होता, पण! पण सेकंद वाटतो तितका छोटा नसतो. हजारो नॅनोसेकंद असतात त्यात. शिवाय लहरी या अतिशय लहरी असतात, त्या थोडीच सरळ जातात!

    सुदूर अंतराळात स्थिर उभ्या असलेल्या त्या स्पेसशिपच्या डिटेक्टरने एका खास पॅटर्नमध्ये दिव्यांची उघडझाप केली. त्यासरशी शिपमधल्या त्या दोघा एलियन्सनी एकमेकांकडे पाहून डोळे मिचकावले. समोरच्या स्क्रिनवर काही अगम्य भाषेतली अक्षरं लिहून आली होती. पृथ्वीच्या इमेजशेजारी लिहिलेल्या त्या अक्षरांचे इंग्रजी भाषांतर होत होते, “लो-लेव्हल आयलंड डिटेक्टेड”!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (सर्वाधिकार लेखकाधीन. शेअरच्या बटनावर क्लिक करूनच शेअर करावे. कॉपी-पेस्ट क्षमस्व.)
    #Short_Story #Science #Fiction #SciFi #Horror #ScHorror #Science_Fiction #BoomBeach #Astro

  • इन नोलान वुई ट्रस्ट

    अवघा ८ वर्षांचा होता तो, जेव्हा ‘नासा’त काम करणाऱ्या एका नातेवाईकाने त्याला ‘अपोलो’ मोहिमेच्या प्रक्षेपणाचे फुटेज पाठवले होते. पठ्ठ्याने ते आपल्या पद्धतीने संपादित केले आणि ‘स्टॉप मोशन अॅनिमेशन’ तंत्रज्ञान वापरुन आपली पहिलीवहिली फिल्म बनवली, “स्पेस वॉर्स” (१९७८)! त्याचे नाव ख्रिस्तोफर नोलान!! पुढे भविष्यात तो बनवणार असलेल्या “इंटरस्टेलर”सारख्या (२०१४) महागाथेची चुणूक ही अशी होती. पुढे ९०च्या दशकात त्याने खूप साऱ्या कॉर्पोरेट फिल्म्स आणि शॉर्टफिल्म्स बनवल्या. यातल्या बहुतांश त्याची तेव्हाची प्रेयसी व सध्याची पत्नी एमा थॉमसने प्रोड्युस केल्या होत्या. सिनेमा बनवण्याचे त्याचे प्रयत्न मात्र काडीमात्रही यशस्वी होत नव्हते. मोठाच निराशाजनक काळ होता तो. परंतु याच काळात त्याने आता जिला लोक शोधून शोधून पाहातात अशी “डूडलबग” (१९९७) नावाची शॉर्टफिल्म बनवली आणि सोबतच “जेंगिज ब्ल्यूज” (१९९९) या ऑस्कर नामांकनप्राप्त माहितीपटाच्या संपादनावरही काम केले.

    चित्रपट बनवण्याचे प्रयत्न सर्वच बाजूंनी अपयशी ठरत असल्याचे पाहून शेवटी त्याने स्वतःचेच पैसे घालून सिनेमा बनवायचे ठरवले. प्रोड्युसर अर्थातच पत्नी एमा! आणि असा जन्म झाला त्याच्या “फॉलोईंग”चा (१९९८)! फक्त ६ सहस्र डॉलर इतक्या कमी खर्चात बनलेल्या “फॉलोईंग”ने सगळ्याच स्तरांवर वाहवा मिळवली. अगदी आजही “नो बजेट फिल्म्स”च्या विषयात हा सिनेमा मैलाचा दगड समजला जातो! आणि अश्याप्रकारे २१ व्या शतकातील सर्वाधिक सेलिब्रेटेड फिल्ममेकरचे, इंडस्ट्रित दणक्यात आगमन झाले! यानंतर त्याने लगेचच बनवलेला “मेमेंटो” (२०००) माहिती नाही, असा सिनेरसिक क्वचितच सापडेल! मग मात्र नोलानने मागे वळून पाहिलेच नाही!

    नोलानच्या अनेक सिनेमांबद्दल आपण सविस्तर बोलू शकतो. नव्हे, त्याच्या जवळजवळ प्रत्येक सिनेमावर एक स्वतंत्र दीर्घलेखच होऊ शकतो. परंतु तरीदेखील त्यांच्यात काही समान सूत्रे आढळतात, जी माझ्या दृष्टीने नोलानच्या स्वतःच्याच व्यक्तिमत्त्वाची प्रतिबिंबे मानता येतील. त्याचा आजवरचा प्रत्येक सिनेमा हा डार्क, न्वार वर्गात मोडणारा आहे. नोलानचा कोणताही सिनेमा असो, त्याचे नायक हे अतिशय त्रासदायक पार्श्वभूमीतून आलेले असतात. ते स्खलनशील असतात, ते चुकतात, पडतात, ते आपले प्रियजन गमावतात – ते रुढार्थाने नायक नसतातच – ती असतात माणसे! तुमच्या-माझ्यासारखी सामान्य माणसे!! आणि म्हणूनच अत्यंत गुंतागुंतीची बीजं आणि तितकेच गुंतागुंतीचे कथन असूनही त्याचे सिनेमे कुणाच्याही ह्रदयाला भिडतात. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे खलनायक हे जवळजवळ प्रत्येक वेळी त्या नायकाचेच प्रतिबिंब असतात. ही मोठी मजेशीर गोष्ट आहे. आणि नोलानच्या याच गुणांमुळे त्याचा “बॅटमॅन” (२००६-२०१२) जास्त आपल्यातला वाटतो. किंबहूना, बेन अफ्लेकच्या “बॅटमॅन”ची आपण वारेमाप स्तुती करु शकतो, परंतु आपला बॅटमॅन कोणता असा प्रश्न असेल तर मात्र क्रिश्चन बेलखेरीज दुसरे कोणतेच नाव समोर येत नाही. नोलानने नुसता बॅटमॅन अजरामरच नाही केला, तर त्याला, नव्हे नव्हे अगदी बॅटमॅनशी संबंधित प्रत्येक पात्राला एक कल्चरल आयकॉन बनवले. एक सबंध पिढी या बॅटमॅनने पोसली. एक अब्जाधीश तरुण जो केवळ आपल्या आईवडलांच्या हत्येमुळे बुरखाधारी रक्षक बनतो, त्याला प्रत्येक वर्गातील प्रेक्षकाने आपलंसं करणे हा शब्दातीत चमत्कार केवळ नोलानच करु शकतो!! या आणि अश्याच गोष्टींचा परिपाक म्हणून एक अर्बन म्हण बनलीये – “इन नोलान वुई ट्रस्ट”! नोलानच्या विचारसरणीच्या व ती मांडण्याच्या पद्धतीच्या यशाची यापेक्षा मोठी पावती कोणती हवी?

    नोलानची गंमत अशी की, काही काही बाबतीत त्याची मतं ही खरोखरच तिरसट, जगावेगळी आणि तरीही यशस्वी आहेत. सांगून खरं वाटणार नाही, परंतु आज सगळं जग डिजिटल फिल्ममेकिंगच्या मागे धावत असताना एकटा नोलान मात्र रिळं वापरुन शूट करण्याच्या जुन्या पद्धतीचा प्रामाणिक पुरस्कर्ता आहे. त्याचा स्पेशल-इफेक्ट्सवर फारसा विश्वास नाही. त्याच्या कोणत्याही सिनेमात सीजीआय कमीत कमी असतात. त्याऐवजी जास्तीत जास्त दृक्श्राव्य युक्त्या वापरण्यावर त्याचा भर असतो. त्याची साहसदृश्ये ही त्यातल्या त्यात विश्वसनीय वाटावीत अशीच असतात. तो संपूर्ण शूट एकाच युनिटवर करतो. वेगवेगळ्या युनिट्सना वेगवेगळे भाग चित्रित करायला लावणे त्याला मुळातच मान्य नाही.

    ही तर झाली त्याची व्यावसायिक बाजू. परंतु त्याच्या वैयक्तिक निवडीही तितक्याच जगाविरहीत आहेत. नोलानचा स्वतःचा असा एकही इमेल आयडी नाही. तो इमेल हा प्रकार मुळातच वापरत नाही. त्याच्या सगळ्या मेल्स या त्याच्या एका मदतनीसाच्या पत्त्यावर येतात, ज्याच्या प्रिंटआऊट्स काढून दिल्यावर नोलान त्या सवडीने वाचतो. आजच्या जगातल्या सर्वाधिक यशस्वी निर्माता-दिग्दर्शकांपैकी एक असूनही नोलान मोबाईल फोन वापरत नाही! असं नाही की, त्याने त्रासून वापरणे बंद केलेय; तर मुळात त्याने कधीही फोन घेतलाच नाही. त्याच्या शांतपणे काम करु शकण्याचं रहस्य यातच दडलं असल्याचं तो स्पष्टपणे सांगतो. ज्याला माझ्यापर्यंत पोहोचायचंय तो बरोब्बर पोहोचतो, हे त्याचं यावरचं गमतीदार, आजच्या काळात भयावह वाटू शकणारं परंतु तितकंच खरं मत. पूर्वीच्या काळातही लोक कोणत्याही प्रकारच्या संपर्क-बंधनांशिवाय आरामात जगतच होती ना! आज आपण स्वतःच स्वतःला अनेक प्रकारच्या सोशल बेड्यांमध्ये जखडून टाकलंय आणि स्वतःच त्यांच्यामध्ये गुदमरवणारी धडपड करत खितपत पडलोय. या पार्श्वभूमीवर नोलान कदाचित मूर्खही वाटेल. पण या काहींच्या दृष्टीने मूर्ख वाटू शकणाऱ्या माणसाने चित्रपटसृष्टीच्या इतिहासातले काही पराकोटीचे श्रेष्ठ चित्रपट दिलेयत, देतोय आणि देत राहील; हे सत्य कोण आणि कसे नाकारणार?

    — © विक्रम श्रीराम एडके

    ********************************************
    आज Christopher Nolan चा वाढदिवस. त्यानिमित्त मी पूर्वी ‘सामना’साठी लिहिलेला हा लेख. रिपोस्ट.
    ********************************************

  • इंटेलिजंट, मनोरंजक, परिपूर्ण — विक्रम-वेधा

    सम्राट विक्रमावर एक अवघड जबाबदारी येऊन पडते. दूर जंगलातल्या झाडावरून वेताळाला घेऊन येण्याची. तो पराक्रमी राजा जरादेखील न कचरता जंगलात शिरतो. वेताळाशी दोन हात करून त्याला पकडतो व खांद्यावर टाकतो. तो जायला निघतो तेवढ्यात खांद्यावर लादलेला वेताळ विचारतो, “ओरऽ कधा सोल्टऽ”? (एक गोष्ट सांगू?)!! ही सुरुवात आहे पुष्कर-गायत्री यांच्या “विक्रम-वेधा”ची. अॅनिमेटेड सिक्वेन्समध्ये दिसणारा हा दृश्यक्रम त्या वाक्यासोबतच लाईव्ह-अॅक्शनमध्ये परिवर्तित होतो आणि काही समजायच्या आतच प्रेक्षकांना एका भरीव कथानकात शोषून घेतो. चित्रपट संपल्यावरही तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाहीत.

    एन्काऊंटर स्पेशालिस्ट विक्रम (आर. माधवन) हा उत्तर मद्रासमधील डॉन वेधाला (विजय सेतुपती) शोधतोय. वेधा, ज्याच्या भयकारितेच्या नुसत्या कथाच सांगितल्या जातात, जो अपराध जगतातला जिनियस समजला जातो आणि जो बऱ्याच दिवसांत कुणाच्याच नजरेस पडलेला नाहीये. तो वेधा एका एन्काऊंटरनंतर स्वत:हूनच पोलिसांच्या स्वाधीन होतो. आता उरलेय ते फक्त त्याने आजवर केलेल्या गुन्ह्यांचा कबुलीजबाब घेणे. पण आजवर कधीच हाती न लागलेल्या वेधाने आत्मसमर्पण कसे काय केले? विक्रमला ही शंका सतावत असतानाच, चौकशीदरम्यान वेधा विक्रमला पहिली कथा सांगतो आणि चित्रपटातले गूढ अजूनच गहिरे होत जाते. तिथून रंगू लागतो, आजवर १६ खुन केलेला वेधा आणि १८ एन्काऊंटर केलेल्या विक्रम या दोघांमधला जबरदस्त मानसशास्त्रीय खेळ. विक्रम आपल्या कामात अतिशय प्रामाणिक आहे. सुरुवातीलाच एका एन्काऊंटरनंतर तो आपल्या एका सहकाऱ्याला सांगतो, “मी प्रत्येक एन्काऊंटरनंतर शांतपणे झोपू शकतो, कारण मला माहितीये मी चांगल्याच्या बाजूने आहे आणि वाईटाचाच खात्मा करतोय”. वेधा वेगवेगळ्या टप्प्यावर भेटतच राहातो, कथानकात विविध कोडी निर्माण करणाऱ्या गोष्टी विक्रमला सांगतच राहातो आणि एका टप्प्यावर विक्रमला रात्रीची ती शांत झोप लागणे बंद होते. कोण चांगला आहे, कोण वाईट आहे, कोण धर्माच्या बाजूने आहे आणि कोण अधर्माच्या बाजूने; यांच्यातल्या सगळ्याच सीमा पुसून जातात. आपल्यासमोर जे होते ते खरे होते की जे नाही ते खरे, असे प्रश्न आपला पिच्छा पुरवू लागतात. कधी विक्रम चांगला वेधा वाईट वाटू लागतो तर दुसऱ्याच क्षणी वेधा चांगला विक्रम वाईट वाटू लागतो, पुढच्याच क्षणी दोघेही सारखेच वाईट ठरतात तर कधी दोघेही सारखेच चांगले ठरतात. यातून शेवटी जे घडतं ते तर अजूनच कल्पनातीत असतं.

    पुष्कर-गायत्री या द्वयीचं वैशिष्ट्य हे की, त्यांनी त्यांच्या प्रेक्षकांना काडीमात्रही स्पून-फिडिंग केलेली नाही. ते प्रत्येक वेळी आपल्याला विचार करायला लावतात, समोर जे चालू आहे त्यात भाग घ्यायला लावतात आणि निवड करायला लावतात. पण त्याचवेळी ते सतत प्रेक्षकांच्या चार पावले पुढे राहून रहस्याच्या चाव्या शेवटपर्यंत त्यांच्याच ताब्यात राहातील याची व्यवस्थित काळजीसुद्धा घेतात. असे चित्रपट जबरदस्त असतात. त्यांचं रहस्य एकदा पाहून उलगडलं तरीही निव्वळ त्यातल्या क्राफ्ट्समनशिफ्टसाठी ते वारंवार पाहावेसे वाटतात. “विक्रम-वेधा” तर आपल्या नॉन-लिनियर मांडणीमुळे अजूनच बहारदार होतो. निओ-न्वार प्रकारचा अतिशय इंटेलिजंट सिनेमा असतानाच “विक्रम-वेधा” त्याचवेळी जबरदस्त पॉप्युलर मासवालासुद्धा राहातो. त्यात खटकेबाज संवाद आहेत, तुफान अॅक्शन आहे, जबरी डान्स आहेत आणि श्वास रोखून धरायला लावणारी अमाप दृश्ये आहेत. हे खास तमिळ इंडस्ट्रीचं वैशिष्ट्य! क्लास आणि मासचा इतका अभूतपूर्व संगम इतरत्र क्वचितच आढळतो. दिग्दर्शनासाठी आणि स्टोरीटेलिंगसाठी दिग्दर्शक द्वयीला पूर्ण गुण द्यायलाच हवेत.

    पण त्याचबरोबर पूर्ण गुण द्यायला हवेत ते जबरदस्त कास्टिंगसाठी. मॅडी आणि विजय यांच्याइतक्या परिपूर्णतेने त्या भूमिका दुसऱ्या कुणीच निभावल्या नसत्या. गेल्या काही वर्षांत मॅडीने जाणीवपूर्वक आपली चॉकलेट-बॉय प्रतिमा बदलून “इरऽधी सूट्रऽ”/”साला खडूस”सारखे (२०१६) वेगळ्या वाटेवरचे चित्रपट करायला सुरुवात केली आहे. मणिरत्नमच्या मुशीत घडलेला माधवन हा अतिशय संपन्न अभिनेता असल्याचे “विक्रम-वेधा”च्या प्रत्येक चौकटीत जाणवत राहाते. पण “विक्रम-वेधा” जर का खऱ्या अर्थाने कुणी खाल्ला असेल, तर तो आहे विजय सेतुपती! कोणतीही खास पार्श्वभूमी वा कोणताही गॉडफादर नसतानाही अतिशय संघर्ष करून केवळ आणि केवळ वेगळ्या भूमिकांच्या जोरावर या माणसाने स्वतःला ज्या उंचीवर नेऊन ठेवलेय, ती खरोखर अनुभवण्याचीच गोष्ट आहे. हा चित्रपट मी मुंबईतील एका उपनगरात पॅक-हाऊसमध्ये पाहिला. मॅडीच्या एन्ट्रीला टाळ्या-शिट्यांचा पाऊस पडला, पण विजयच्या एन्ट्रीच्यावेळी अक्षरशः कानठळ्या बसाव्यात इतका जबरदस्त जल्लोष झाला आणि पुढे प्रसंगोपात होतच राहिला. तमिळ प्रेक्षकांना खरोखर उत्तम अभिनेत्यांची जाण आहे, हेच खरे! वास्तविक अतिशय भव्य कॅनव्हासचा हा चित्रपट आणि शेकडो पैलू असलेली भूमिका. पण विजय सेतूपतीने तिचे अक्षरशः सोने केलेय सोने! त्याचे संवाद, चेहऱ्यावरील हावभाव, माफक विनोद, सहजपणे सांगितलेले तत्त्वज्ञान, अॅक्शन, नृत्य सारेच जणू काही वेगळ्या जगतातले वाटते. ते तीन तास पडद्यावर जणू फक्त आणि फक्त वेधा नावाचा राऊडीच होता, विजय नव्हेच! कहर आहे हा माणूस, कहर!! जेव्हा केव्हा संधी मिळेल त्यावेळी त्याचं काम पाहा म्हणजे पाहाच!! वरलक्ष्मी शरदकुमार, श्रद्धा श्रीनाथ, हरीश पेराडी, प्रेम वगैरे सगळ्यांचीच कामे बहारदार झालीयेत. सॅम सी. एस. या नवीन संगीतकाराने तर कमालच केली आहे. विशेषतः “करप्पऽ वेळ्ळई” तर काहीच्या काही भन्नाट झालंय.

    निओ-न्वार क्राईम-थ्रिलर प्रकारातल्या सर्वश्रेष्ठ चित्रपटांची यादी करायची म्हटली तर “विक्रम-वेधा”ला त्यात निश्चितच स्थान द्यावे लागेल, यात कसलीच शंका नाही. सर्वच बाजूंनी अतिशय परिपूर्ण असलेला, प्रेक्षकांना विचार करायला लावणारा, कोडी सोडवायला लावणारा आणि तरीही जबरदस्त मनोरंजन करणारा “विक्रम-वेधा” तुमच्या गावी अथवा जवळ जिथे कुठे लागला असेल, तिथे जाऊन आवर्जून पाहावा; पुन्हा-पुन्हा अनुभवावा असाच झालाय. असेच चित्रपट कोणत्याही चित्रपटसृष्टीला पुढे नेत असतात. तमिळ इंडस्ट्रीला इथूनपुढे वर्षानुवर्षे अभिमान वाटत राहील की, त्यांनी “विक्रम-वेधा” बनवला आणि त्यांच्या प्रेक्षकांनाही!!

    *५/५

    — © विक्रम श्रीराम एडके.

  • जीओटी आणि भारतीय प्रतिभा

    “गेम ऑफ थ्रोन्स” ही जगभरात पाहिली जाणारी, कदाचित जगातली आजघडीची सर्वाधिक प्रसिद्ध मालिका आहे. पण या मालिकेच्या न भूतो न भविष्यति यशात भारताचा सिंहाचा वाटा आहे, हे आपणापैकी किती जणांना ठाऊक आहे?

    या मालिकेच्या एकूणएक सूक्ष्मातिसूक्ष्म तपशीलांवर बारीकसारीक काम केलेले दिसते. अगदी प्रत्येक संस्कृतीच्या पोषाखांमध्ये आणि विविध ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या वस्त्रप्रावरणांमध्येदेखील अनेक अर्थ लपलेले आहेत. हे कपडे, तंबू वगैरे कुठे तयार होतात माहितीये? आपल्या दिल्लीतल्या लाजपतनगरमध्ये! अगदी पहिल्या पर्वापासून लाजपतनगरमधील “रंगारसन्स” ही कंपनी मालिकेतील सर्व वस्त्रप्रावरणे पुरवते.

    आणि सांगतो! ड्रॅगन्स!! अतिशय तपशीलवार तयार केलेले हे घातक परंतु आपल्या लाडक्या आईसाठी जीवाची बाजी लावणारे प्राणी कुठे तयार होतात माहितीये? आपल्या मुंबईतल्या “प्राणा स्टुडिओज”मध्ये!

    होय, ड्रॅगन्सचे विभास (व्हिज्युअल इफेक्ट्स) मुंबईत बनतात. याउप्पर, या मालिकेतल्या सुघड तलवारी. त्यादेखील भारतातच बनतात हे क्वचितच कुणाला ठाऊक असेल! जॉन स्नोची “लाँगक्लॉ” असो, नेडची “आईस” असो, ब्रिएनची “ओथकिपर” असो, सर आर्थर डेनची “डॉन” असो, आर्याची “नीड्ल” असो अथवा अन्य कोणतीही तलवार! नाव असलेली वा नसलेली, पण मालिकेतली एकूण एक तलवार भारतात बनते. अगदी व्हॅलेरियन स्टीलच्या तलवारीसुद्धा भारतातच बनतात. विण्डलास स्टीलक्राफ्ट्स ही देहरादूनस्थित कंपनी या सर्व तलवारी बनवते. केवळ तलवारीच नव्हे तर सगळी चिलखते, अगदी जॉनस्नोचा क्लोकसुद्धा!!

    थोडक्यात मालिकेसाठी लागणारी बहुतांश प्रॉपर्टी ही भारतात बनते, भारतीयांकडून बनवली जाते. भारत हा खरोखर प्रतिभेचे आणि कारागिरीचे भांडार आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की, हे समजायला आपल्याला एका पाश्चात्य मालिकेची गरज पडतेय. डेनेरिसचे ड्रॅगन्स जर आपण हुबेहूब बनवू शकतो तर आमच्या मेगाबजेट चित्रपटांमधील विभास सामान्य का? याचे कारण एकच आहे की, आपल्याकडचे चित्रपट-मालिकाकार आपल्या लोकांवर ना विश्वास दाखवतात ना त्यांच्या प्रतिभेला स्वातंत्र्य देतात. विशेषतः आपल्या मालिका या केवळ आणि केवळ त्या-त्या चॅनेल्सच्या लहरींवर चाललेल्या, टिआरपीपुरत्याच उरलेल्या बटकी वाटतात. कल्पना करा “गेम ऑफ थ्रोन्स”चे एखादे पर्व सुरू आहे, दरम्यान दिवाळी आली आणि अवघे सेव्हन किंग्डम्स आपली मूळ कथा सोडून दिवाळी साजरी करताना दाखवले. किंवा सगळे अचानकच करवाचौथ वा स्वातंत्र्यदिन साजरे करू लागले. कल्पनादेखील करवत नाही ना? पण हे आपल्याकडच्या मालिकांमध्ये सर्रास चालते! कारण आम्हाला कथेपेक्षा टिआरपी जास्त महत्त्वाचा वाटतो.

    मला आठवते, माझ्या लहानपणी मर्यादित भागांच्या आणि कथानकावरच लक्ष केंद्रित करणाऱ्या सुंदर मालिका असायच्या. अगदी दूरदर्शनवरील “नुक्कड”पासून ते पार झीवरील “रिश्तें”पर्यंत.

    सिनेमांच्या इतकेच किंबहूना त्यांच्यापेक्षाही जास्त सिनेमॅटिक आणि कथात्मक प्रयोग केलेले असायचे मालिकांमध्ये. आता प्रयोग आणि कथांकन औषधालाही सापडत नाही कुठेच आणि कुणालाच त्याचे काही पडलेलेही नाही. पाश्चात्य चॅनेल्सवरच्या अनेकानेक सर्वांगसुंदर मालिकांच्या पार्श्वभूमीवर आपण शून्यात तर सोडाच उणेमध्ये आहोत अक्षरशः! मध्यंतरी कोणते तरी चॅनेल सुरू झाले होते. नाव विसरलो मी त्याचे. पण जगभरच्या मालिका हिंदीत डब करून दाखवायचे त्यात. अगदी पाकिस्तानी, तुर्की, इराणीसुद्धा! सुंदर कथा आणि जबरदस्त मांडणी. त्यांच्यातल्या एकाचीही सर आपल्या मालिकांना येत नाही हो. केवढा दर्जा खालावून घेतलाय आपण आपला!!

    गुलज़ारने एका साक्षात्कारात (मुलाखत) सांगितलेला किस्सा आहे. तो “ग़ालिब़” बनवत होता तेव्हा चॅनेलने सांगितलं की, ‘५२ भागांची मालिका बनवा’. तर तो म्हणाला की, ‘एवढी मोठी कथा नाहीये ती’. मग म्हणाले, ‘१३ भागांची बनवा’. तर तो म्हणाला, ‘एवढी छोटीसुद्धा नाहीये ती’. मग काय करुया? गुलज़ार म्हणाला, ‘बघा माझी जेवढी कथा आहे तेवढीच मी सांगणार. तुमच्या नियमांत बसायला मी ती कापणार नाही वा पाणी घालून वाढवणारही नाही’. शेवटी “मिर्ज़ा ग़ालिब़” १७ भागांची बनली. आज ना कथेसाठी नियम वाकवणारे चॅनेल्स राहिलेत ना आपल्या अवकाशासाठी हटून राहाणारे दिग्दर्शक राहिलेत ना इतके कष्ट करून बनवलेल्या मालिकांच्या दर्जाचे प्रेक्षक राहिलेत. कदाचित हे तिन्ही असतीलही आजसुद्धा, पण चौकटीच्या बाहेर पडायची हिंमत मात्र कुणाचीच राहिलेली नाही हे खरे. त्यामुळेच आमच्याकडचे प्रतिभेचे झरे “गेम ऑफ थ्रोन्स”सारख्या ठिकाणी जातात आणि आम्ही या ब्रेनड्रेनलाच भारी म्हणून खुश राहातो. दर्जेदार मालिका नाहीत म्हणून प्रेक्षक नाहीत आणि प्रेक्षक नाहीत म्हणून दर्जेदार मालिका नाहीत. हे दुष्टचक्र भेदले पाहिजे. पण ते भेदणार कोण, हा यक्षप्रश्नच आहे!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (संपर्क: www.vikramedke.com)

  • बुद्धिमतां वरिष्ठम्

    सुग्रीवाने फक्त सीता कुठे आहे, याचाच शोध लावायला सांगितले होते (किष्किंधा. सर्ग ४१). त्याप्रमाणे हनुमानाने सीतेचा शोध लावलादेखील (सुंदर १५). वास्तविक सुग्रीवाने सांगितलेले काम इथेच संपले होते. आता कुणी प्रश्न विचारेल, मग लंका जाळण्याची काय गरज होती, काम तर झाले होते ना? पण लक्षात घ्या, सांगितले तेवढेच काम करतो तो असतो सांगकाम्या! हनुमान काय सांगकाम्या होता का? वाल्मिकींनी जागोजागी हनुमानाचे वर्णन केलेले आहे. किष्किंधाकांड सर्ग २ येथे तो सुग्रीवाचा मंत्री आणि सचिव (श्लो. ५, १२) असल्याचे सांगितले आहे. त्याच सर्गात हनुमानाला उद्देशून वाक्यकोविद (श्लो. १३) अर्थात चर्चा आणि वाटाघाटी करण्यात कुशल, असे विशेषण वापरले आहे. पुढे सर्ग ३ येथे तर स्वतः राम हनुमानाला वेदज्ञ (श्लो. २८), व्याकरणपटू (श्लो. २९), देहबोलीचा जाणकार (श्लो. ३०) म्हणतो आणि हनुमाच्या भाषेची, वाणीची व स्पष्टपणे विषय मांडण्याची स्तुती (श्लो. ३१-३३) करतो. पुढे सर्ग ४४ येथे सुग्रीव स्वतः हनुमानाला नीतीशास्त्राचा पंडित म्हणतो आणि वर हेही सांगतो की, नीतीशास्त्र व देशकालपरिस्थितीचं भान ठेवून वागणारा असा तू एकमेव आहेस (श्लो. ७). अशी वर्णनं जागोजागी आहेत, फक्त विस्तारभयास्तव ती सारी देत नाही एवढंच. आता हे तर निश्चित झालं की, हनुमान केवळ सांगकाम्या दूत नव्हता तर राजकारण आणि पुढे वाढून ठेवलेलं युद्ध यांची व्यवस्थित जाणीव असलेला ‘बुद्धिमतां वरिष्ठम्’ असा महाबली होता. त्याने खरोखर सीतेचा नुसता शोधच नाही लावला, तर त्या गोष्टीचा पुरावा म्हणून तिला रामाची अंगठी दिली आणि बदल्यात तिचा चूडामणिसुद्धा रामाला दाखवण्यासाठी घेतला (सुंदरकांड, सर्ग ३६, ३८). तिला पूर्णपणे आश्वस्त केलं (सर्ग ३९).

    केवळ एवढेच करून हनुमान भारताच्या मुख्यभूमीवर परतत नाही. तर तो विचार करतो की (सर्ग ४१, श्लो. २-४), “सीता तर सापडली, आता फक्त थोडंसंच काम बाकी आहे. राक्षसांसोबत सामभाव वापरून फायदा नाही. पैसा त्यांच्याकडे भरपूर आहे, त्यामुळे दान वापरूनही फायदा नाही. मुळातच गर्विष्ठ असल्यामुळे भेदनीती वापरण्यातही काही अर्थ नाही. तेव्हा यांच्यावर ताकदच वापरली पाहिजे”. पण थोडंसंच उरलेलं काम म्हणजे तरी कोणतं? हनुमान स्वत:शीच विचार करतोय (श्लो. ५-९), “जो माणूस मुख्य कामासोबतच इतर लहानसहान पण गरजेची कामं करतो, त्यानेच खरं कार्य पार पाडलं म्हणावं. जर का याच भेटीत मी राक्षसांच्या ताकदीचा अंदाज लावू शकलो, तरच भविष्यात होणाऱ्या युद्धाचं नियोजन नीट करता येईल. आणि असा अंदाज लावायचा तर रावणाचे मंत्री, सैन्य आणि सहाय्यकांसोबत काही तरी करून भांडण उकरून काढलं पाहिजे”! आणि म्हणून मग हनुमानाने राक्षसांना डिवचण्यासाठी प्रमदावनाचा विध्वंस केला, काही जणांना वाटतं त्याप्रमाणे माकडचाळा म्हणून नाही. एवढा बुद्धिमान होता हनुमान.

    उद्यानाचा असा विध्वंस झाल्याचं समजल्याबरोब्बर रावणाच्या डोळ्यांत रागाने अश्रू उभे राहिले (सर्ग ४२, श्लो. २३). त्याने किंकर नावाचे ८० सहस्र राक्षस हनुमानाच्या नाशासाठी पाठवले (श्लो. २५). गदा, परीघ वगैरे शस्त्रांनी संपन्न असे ते राक्षस जसे हनुमानावर धावून आले (श्लो. २८), तशी महावीराग्रणी हनुमंताने गर्जना केली (श्लो. ३३-३६),
    “राम, लक्ष्मण आणि सुग्रीव यांचा विजय असो. सहजपणे पराक्रम करून जाणाऱ्या कोसलेंद्र श्रीरामाचा मी दास आहे. शत्रूसैन्याचा नाश करणारा मी मारुतात्मज हनुमान आहे. मी हजारो झाडे आणि दगडधोंडे फेकत जेव्हा युद्ध करेन, तेव्हा एकच काय तुमचे सहस्र रावण जरी आले तरी माझी बरोबरी करू शकणार नाहीत. तुमच्या डोळ्यांदेखत मी लंकेचा नाश करेन आणि सीतेला प्रणाम करून निघूनसुद्धा जाईन”!

    ही नुसती रणगर्जना नव्हती, तर वाक्यज्ञ हनुमानाने जाणूनबुजून राक्षसांना डिवचण्यासाठी वापरलेले शब्द होते. थोड्याफार फरकाने हेच शब्द तो राक्षसांचा चैत्यप्रासाद तोडल्यावरही वापरतो (सर्ग ४३). हनुमानाने एक परीघ उचलला (सर्ग ४२, श्लो. ३९) आणि वीजेच्या चपळाईने तो त्या सैन्यात घुसला व रणमदाने न्हाऊन एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे राक्षसांचा संहार करू लागला. बघता बघता त्याने सारे किंकर संपवले. रावणाचा चैत्यप्रासाद उद्ध्वस्त केला. प्रहस्ताचा पुत्र जम्बुमालीची छाती फोडून त्याला मारले (सर्ग ४४). रावणाच्या मंत्र्याचे सातच्या सात पुत्र यमसदनी धाडले (सर्ग ४५). विरूपाक्ष, यूपाक्ष, दुर्धर, प्रघस, भासकर्ण असे रावणाचे ५ पराक्रमी सेनापतीसुद्धा एकहाती मारले (सर्ग ४६). एवढेच नव्हे, तर रावणाचा मुलगा अक्ष याला तर पार जमिनीवर आपटून मारलं (सर्ग ४७). रावणाचा मुलगा मेघनाद तथा इंद्रजित याने ब्रह्मपाशात हनुमानाला बांधलं खरं, पण तो ब्रह्मपाश नष्ट झाला तरी हनुमान सुटण्यासाठी काहीच करत नाहीये हे इंद्रजिताच्या लक्षात आलं (सर्ग ४८, श्लो. ४९-५०). का केलं हनुमानाने असं? कारण, हनुमानाला राक्षसांची ताकद पारखायची होती, ती पारखून झाली होती. आता त्याला रावणाला जोखायचं होतं (श्लो. ४७).

    रावणाला पाहिल्यावर हनुमान मनातल्या मनात मनापासून त्याच्या रूप, बल आणि पराक्रमाची स्तुती करतो. रावण जर अधर्माच्या बाजूने नसता, तर इंद्रासह समस्त देवांचाही संरक्षक होऊ शकला असता, असाही विचार करतो (सर्ग ४९). पण म्हणून तो रावणाच्या व्यक्तिमत्त्वापुढे दबून जातो का? तर बिलकुल नाही! तो आधी रावणाला गोडीत समजावतो. मग राम मनुष्य आहे आणि तुझ्या वरदानात मनुष्यापासून भय नसल्याची अट नाही, हे सुद्धा सांगतो. हनुमान म्हणतो, मी एकटाच तुझ्या समस्त लंकेचा नाश करू शकतो, पण रामाची आज्ञा नाही म्हणून थांबलोय. आणि रामापुढे तर ब्रह्मा, रुद्र आणि इंद्रदेखील युद्धात टिकू शकत नाही, तेव्हा वेळीच सावध हो. थोडक्यात सांगायचं तर हनुमान रावणाला अत्यंत सभ्य भाषेत तू जे करतोय ते किती चुकीचं आहे आणि आता थांबला नाहीस तर बदल्यात राम तुझं काय करील हे सांगतो. हनुमानाचे हे सबंध भाषण मूळातूनच वाचण्यासारखे (सर्ग ५१) आणि डिप्लोमॅटिक चर्चा करताना एखाद्या राजदूताने कसे बोलावे व कसा आपल्याच देशाचा कार्यभाग रेटावा याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अर्थातच रावणाला ते पटले नाही. तो वास्तविक हनुमाला मारण्याचीच आज्ञा देणार होता, पण विभीषण मध्ये पडला व म्हणाला की, दूताला मारणं न्यायोचित नसतं (सर्ग ५२, श्लो. ५). ज्या हनुमानाने एकहाती सबंध रावणसैन्याचा धुव्वा उडवला होता त्याला मारू नका तर दुसरा दंड द्या असं विभीषण म्हणतोय. काय गंमत आहे ना, वरवर वाटतं की विभीषणाने हनुमानाला वाचवलं. प्रत्यक्षात त्याने रावणालाच मूर्खपणा करण्यापासून आणि हनुमानाच्या हातून मरण्यापासून वाचवलंय! रावणाने मग हनुमानाला मारण्यापेक्षा त्याचा न्यायोचित अंगभंग करायचं ठरवलं आणि त्याच्या शेपटीला आग लावण्याची आज्ञा दिली (सर्ग ५३). पण याचा परिणाम उलटाच झाला. हनुमाला काही व्हायच्या ऐवजी त्याने त्या जळत्या शेपटीने सबंध लंकाच जाळली (सर्ग ५४). नंतर सीता ठिक आहे की नाही याची खात्री करून (सर्ग ५६) तो सहजपणे उत्तरेकडे झेपावला.

    रामादिंची भेट झाल्यावर हनुमानाने त्यांना संपूर्ण वृत्तांत तर सांगितलाच, परंतु सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्याने लंकेचं चक्षर्वैसत्यम् वर्णनसुद्धा केलं. लंकेत असलेले दुर्ग, दरवाजे, सैन्याचं बलाबल आणि त्यांची संख्या व मांडणी सारी सारी गोळा केलेली माहिती हनुमानाने सांगितली (युद्ध. सर्ग ३). किंबहूना रावण आणि विभीषण यांच्यात मतभेद आहेत हे बरोब्बर जोखून त्याने नंतर जेव्हा विभीषण आश्रय मागायला आला, तेव्हा रामाला योग्य सल्लासुद्धा दिला (युद्ध १६).

    हे सारं मी का सांगतोय? कारण आज हनुमान जन्मोत्सव! हनुमानाला उगाचच आपल्याकडे फक्त बळाची देवता समजलं जातं. तो बुद्धिमानसुद्धा होता, हे ठाऊक तर असतं. पण बुद्धिमान होता म्हणजे नेमका काय, हे हल्ली फारसं कुणाला ठाऊक नसतं. त्यामुळेच हनुमानाची ही वेगळी, परंतु खोलात माहिती नसलेली बाजू दाखवणं मला कर्तव्य वाटतं. त्यासाठी हा लेखप्रपंच. स्वा. सावरकर म्हणतात, देवाचे गुण भक्तात उतरतात. मग हनुमानाची पूजा करणाऱ्या आम्ही त्याच्याकडून फक्त शक्तीच का घ्यावी? फक्त बुद्धी तरी का घ्यावी? आम्ही हनुमंताची डोळस भक्ती करावी आणि त्याचं बुद्धी-बळ दोन्हीही अंगिकारावं, तरच तो मारुतीराया प्रसन्न होईल ना? तेव्हा हनुमानाची भक्ती करता करता त्याच्या पावलावर पाऊल टाकण्याचीही योग्यता तो देवो, हीच सर्वांना हनुमान जन्मोत्सवाची शुभेच्छा!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (संपर्क: www.vikramedke.com)

  • आत्मार्पण

    या माणसाने देशासाठी घर सोडले, पदवी सोडली, सनद सोडली, नोकरी-व्यवसायाची संधी सोडली, पैसा सोडला, आरोग्य सोडले, ज्ञातिगत अस्मिता सोडली, संसारावर उदक सोडले आणि वेळ आली तेव्हा कर्तव्यतृप्तीने क्लांत देहदेखील सोडला. मी बोलतोय सावरकरांबद्दल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांबद्दल. मी कधीच आजच्या दिवसाचा उल्लेख पुण्यतिथी म्हणून करत नाही, तर आत्मार्पणदिन म्हणून करतो ते यासाठीच. सावरकरांचे प्राण काळाने हरले नाहीत. किंबहूना तितकी काळामध्ये हिंमत तरी होती की नाही, हाच प्रश्न आहे. सावरकरांनी केलेय ते आत्मार्पण! होय, हिंदूधर्मातील शाश्वत सन्यासपरंपरेतील अनेकांनी गेली सहस्रावधी वर्षे केले तेच सहर्ष आत्मार्पण. ज्यावेळी सावरकरांना जाणीव झाली की, मातृभूमीच्या विमोचनार्थ आपण हाती घेतलेल्या व्रताचे उद्यापन झाले आहे, हिंदू समाजासाठी त्यानंतरही आवाक्यात असलेले सारे काही करून झाले आहे, तेव्हा त्यांनी या धरेला देहाचा भार न ठेवता तो सोडण्याचा निर्णय घेतला. केवढी पराकोटीची नि:स्वार्थता ही?

    आपल्या ‘आत्महत्या आणि आत्मार्पण’ लेखात (जुलै १९६४) सावरकर लिहितात –
    “अत्यंत असमाधानाने, विफलतेच्या तीव्र जाणीवेने, संकटांना कंटाळून, इच्छा असतानाही सुखाने जगता येत नाही म्हणून अत्यंत अतृप्त अशा मन:स्थितीत वैतागाच्या भरात जे बळाने जीव देतात, त्यांच्या त्या कृत्याला साधारण: आत्महत्या असे म्हटले जाते. परंतु आपले जीवितकार्य, जीवनाचे ध्येय, जीवनाचा हेतू संपूर्णपणे सफल झाला आहे अशा सफलतेच्या, कृतकृत्यतेच्या भावनेने जे आपल्या ऐहिक अस्तित्वाची हर्षभराने समाप्ती करतात, त्यांच्या त्या कृत्यास आत्मार्पण असे म्हणतात. यद्यपि या परिवर्तनशील जगात सर्वतोपरी परिपूर्णता अशी केव्हाही असू शकणार नाही. जे जीवनात संपादवायचे होते ते सर्व संपादिलेले आहे म्हणून आता कर्तव्य असे काही उरलेले नाही, अशा कृतकृत्य भावनेने रिक्तकाम किंवा पूर्णकाम झालेले धन्य पुरुष आपणहून आपले प्राण विसर्जित करतात. ते आपले नश्वर जीवन विश्वाच्या चिरंतन जीवनात विलीन करून टाकतात. योगवासिष्ठात म्हटल्याप्रमाणे –
    अन्तर्रिक्तो बहिर्रिक्तो रिक्त कुम्भरिवाम्बरे ।
    अन्त:पूर्णो बहि:पूर्णो पूर्ण कुम्भरिवार्णवे ।।
    तथापि आपल्या या जीवनकार्याची सापेक्षत: परिपूर्णता झालेली आहे, अशी आत्मसंतुष्टता वाटल्यानंतर समाजाला किंवा स्वतःला जो देह वार्धक्याने म्हणा, व्याधीने म्हणा पण केवळ भारभूत असाच राहाणार आहे, त्या देहाचा गुहाप्रवेशाने, प्रायोपवेशनाने, अग्निदिव्याने, समुद्रसमाधी किंवा अंतिम योगसमाधी घेऊन किंवा अशाच कोणत्यातरी मार्गाने जे त्याग करतात, ते त्यांचे कृत्य उत्तान अर्थी बळाने जीव देणेच असताही त्याला आत्मसमर्पण म्हणून जे गौरविले जाते, ते यथार्थच आहे”.

    हे केवढेतरी सखोल चिंतन आहे सावरकरांचे. आपल्या देहाचा आता समाजाला, देशाला अथवा कुणालाच उपयोग नाही म्हणून तो देहच सोडून देणे ही एकाचवेळी स्वार्थत्याग आणि उपयोगितावाद अशा वरकरणी विरोधी वाटणाऱ्या दोन्ही गुणांची परिसीमा आहे. सावरकरांसाठी आपण काय केलं, हा विचार आत्ता कुठे आपण करू लागलो आहोत. सावरकरांच्या मनाला हा विचार दूरान्वयानेदेखील शिवलेला नव्हता. किंबहूना आजवरच्या योगदानाच्या बदल्यात काही मागायचे तर नाहीच, उलट आहे ते सारेच देऊन टाकायचे ही त्यांची सर्वोच्चातीलही सर्वोच्चतम भावना आहे. म्हणूनच सकल सुखांचा परित्याग करून हा प्रवाहाविरुद्धचा योगी फाल्गुन शुक्ल षष्ठी, शके १८८७ अर्थात २६ फेब्रुवारी १९६६ या दिनी प्रायोपवेशनाद्वारे अनंतब्रह्माच्या प्रवासास निघून गेला. जणू परमेश्वराने मानवजातीवर कृपावंत होऊन आपल्या तेजाचा एक अंश आमच्यात धाडला होता, तो लक्षावधी आयुष्यांना तेजस्वी स्पर्श करून पुन्हा एकवार अनंतात विलीन झाला. आणि त्याने स्पर्शलेली आयुष्येच नव्हे तर पिढ्यानपिढ्या उजळून निघाल्या, कायमच्या साठी!!

    — विक्रम श्रीराम एडके
    (लेखक सावरकरांच्या चरित्राचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. व्याख्यानांच्या आयोजनासाठी संपर्क www.vikramedke.com)

  • येणें वाग्यज्ञें तोषावें

    येणें वाग्यज्ञें तोषावें

    २००४ चा सुमार होता. नुकताच कॉलेजला प्रवेश केलेला तो, आजूबाजूचं मोकळं वातावरण पाहून जरासा बुजला होता. शिकायला जायचं, पण गणवेषाची सक्ती नाही; अश्या छोट्याछोट्या गोष्टीदेखील त्याला अचंबित करायला पुरेश्या होत्या. त्या कॉलेजमध्ये अनेक दशकांपासून चालत आलेली एक नावाजलेली वादविवाद स्पर्धा व्हायची. सूचना पाहून त्यानेसुद्धा नाव दिलं. आयुष्यात कधी स्टेजवर जाऊन काही बोललेला नाही. पण वाचायचा भरपूर. भरपूर म्हणजे, पुस्तकं खायचा तो अक्षरशः! कुठेकुठे थोडंफार लिहायचादेखील. या शिदोरीच्या जोरावर, त्याने स्पर्धेत नाव दिलं. मुद्देसूद विषय तयार केला. आठ अधिक दोन मिनिटे वेळसुद्धा कदाचित पुरणार नाही, इतके मुद्दे निघाले. स्पर्धेआधी पात्रता फेरी होती. कॉलेजच्याच एक कला विभागाच्या प्राध्यापिका ती फेरी घेणार होत्या. त्याचं नाव पुकारलं. तो समोर आला. आणि ऐकणारे पाच-सहा श्रोते पाहून त्याचं अवसान गळालं. दहा मिनिटंही पुरणार नाहीत वाटणारे मुद्दे दोनच मिनिटांत संपले होते. मग उगाचच बावरून उभा राहिला. लोक हसायचे ते हसलेच. प्राध्यापिका म्हणाल्या, “तू लिहितोस बरा, पण जन्मात कधी स्टेजवर उभा राहायचा विचारदेखील करू नकोस. तुझ्यात नाहीच ते”! तो हिरमुसला. निघून गेला. या प्रसंगातला तो अपमानित मुलगा, मी होतो.

    शाळेत असताना आम्हाला ‘अवांतर वाचन’ नावाचा उपक्रम असायचा. सगळ्यांनी नाव नोंदवलं तसं मीदेखील नोंदवलं. पुस्तक आणायला गेलो. दसरे सर नावाचे ग्रंथपाल होते. त्यांना म्हणालो, “काहीतरी चंपक, ठकठक वगैरे द्या ना”! त्यांनी मला नखशिखांत न्याहाळलं. विचारलं, “कितवीत आहेस तू”? मी म्हणालो, “सातवी”! त्यावर ते कडकपणे म्हणाले, “मग आता चंपक वाचण्याचं वय राहिलंय का तुझं? हे वाच”, असं म्हणून त्यांनी माझ्या हातात एक पुस्तक दिलं, ते होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं “माझी जन्मठेप”! पुस्तक हातात पडताच काही दिवसांपूर्वीचा प्रसंग लख्खपणे नजरेसमोर उभा राहिला माझ्या!

    आमच्या शाळेत, अर्थात नगरच्या प्रसिद्ध भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये सर्वच महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या उत्साहात साजऱ्या व्हायच्या. २८ मे, या सावरकरांच्या जयंतीदिनी उन्हाळ्याच्या सुट्या असायच्या, त्यामुळे २६ फेब्रुवारी या त्यांच्या आत्मार्पण-दिनी शाळेत वक्तृत्व स्पर्धा व्हायची. अश्या स्पर्धा म्हणजे आम्हां ठोंब्यांसाठी पर्वणीच असायची अक्षरशः! कारण, स्पर्धांमध्ये दोन-तीन तास सहज निघून जायचे. अभ्यासाला सुट्टी. क्वचित शाळादेखील लवकर सुटायची. अशीच हीदेखील स्पर्धा. स्पर्धेसाठी शाळेच्या भल्यामोठ्या बॅडमिंटन हॉलचे नेट काढून त्याचे सभागृह केले जायचे. भाग-बिग घेणाऱ्या हुशार जमातीतला मी कधीच नव्हतो. मी टेकण्यासाठी पटकन एक खांब पकडला. स्पर्धा सुरू झाली तशी मला डुलक्या येऊ लागल्या आणि स्पर्धा रंगू लागली तशी माझी झोपही गाढ झाली! स्पर्धा संपली की उठव रे, असं मित्राला सांगून झोपलेलो असल्यामुळे मी निश्चिंत होतो. नंतरचा प्रसंग मला मित्रांच्या सांगण्यावरून आठवतोय तो असा. कुणीतरी मुलगी तिचं व्यवस्थित पाठ केलेलं भाषण म्हणून दाखवत होती. त्याचवेळी आमच्या वर्गशिक्षिकेची नजर माझ्यावर पडली. “त्या एडकेला उठवा रे”, त्यांनी माझ्या शेजारच्या मुलाला फर्मावलं. त्याने बिचाऱ्याने शिक्षिकेची आज्ञा म्हणून मला गदगदा हलवायला सुरुवात केली. मला वाटलं स्पर्धा संपली म्हणूनच उठवतोय तो मला. स्पर्धा संपल्यावर काय करतात? टाळ्या वाजवतात! त्याप्रमाणे मी उत्साहात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. समोर एक कुणीतरी मुलगी बोलतेय. सगळं सभागृह माझ्याकडे पाहातंय. आणि मी टाळ्या वाजवतोय! ती मुलगी बिचारी भाषण विसरली आणि गांगरून तशीच उभी राहिली. मला त्यादिवशी असा काय तुडवला की, विचारूच नका!

    दसरे सरांनी पुस्तक समोर धरताच मला हा प्रसंग आठवला आणि नकळतच गाल व पाठ हुळहुळले! ज्या माणसावरच्या वक्तृत्व स्पर्धेत आपल्याला मार बसला तो माणूस आहे तरी कोण, असा विचार करून मी ते पुस्तक हातात घेतले आणि त्याच दिवसापासून सावरकर नावाच्या पंचाक्षरी मंत्राने मला झपाटून टाकले ते कायमचेच! जन्मठेप वाचून संपवल्या-संपवल्या मी सावरकरांची इतर पुस्तके शोधू लागलो. विकत घेण्याइतकी ऐपत नव्हती. मग एकूण एक वाचनालयं पालथी घातली नगरमधील. सावरकर-स्मारकाने प्रकाशित केलेले “समग्र सावरकर”चे दहाच्या दहा खंड वेड लागल्यागत वाचून फस्त केले. काहीतरी दैवी, याआधी कधीच न अनुभवलेले विचार आपण वाचतो आहोत, हे त्या वयातही कळत होते. त्या नकळत झालेल्या संस्कारांची शिदोरी आजदेखील मजबूत आहे. सावरकर वाचू लागलो, तसे ते माझ्या बोलण्यातही डोकावू लागले. चार मित्रांमध्ये बोलायचो, तर ते मुग्ध होऊन ऐकत बसायचे. एव्हाना कॉलेजला जाऊ लागलो होतो. वर सांगितलेल्या त्या वाद-स्पर्धेत नाव नोंदवलं आणि तोंडघशी पडलो. जन्मात कधी स्टेजवर उभा राहू नको, सांगून घालवून दिले मला.

    त्याक्षणी पहिली गोष्ट जर कोणती कळाली असेल, तर तो चार मित्रांमध्ये बोलणे आणि स्टेजवर उभे राहून बोलणे यामधला फरक. ह्रदयात सावरकर धारण केलेले असल्यामुळे “अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला; मारील रिपू जगती असा कवण जन्मला” हे मनात पक्के होते. त्याच दिवशी ठरवले, हार मानायची नाही. आपले कुठे चुकले हे शोधायचे आणि त्या त्रुटी दूर करायच्या. काही दिवसांपूर्वीच मी लिहिलेल्या एका विज्ञानकथेला पुण्याच्या गरवारे महाविद्यालयात पुरस्कार मिळाला होता. त्यावेळीही स्टेजवर जाऊन दोन शब्द बोलायचे होते. त्या विचारांनीच माझी दातखिळ बसली. कसाबसा स्टेजवर उभा राहिलो, तर सभागृहाच्या दुसऱ्या टोकाला माझ्या अगदी समोरच सावरकरांचे पूर्णाकृती तैलचित्र! ते पाहिले आणि काय सुचले कुणास ठाऊक, मी म्हणालो, “माझे आदर्श असलेल्या सावरकरांच्या सान्निध्यात मला हा पुरस्कार दिला जातोय, यापेक्षा मोठी भाग्याची गोष्ट ती कोणती”? ताबडतोब सारे सभागृह टाळ्यांनी भरून गेले! अच्छा, म्हणजे श्रोत्यांना रिझवणारी वाक्यं बोलता आली पाहिजेत तर! हे एक समजले. पण नुसत्या तेवढ्याने भागणार नाही. आपल्याकडे मुळात आशय हा असलाच पाहिजे. मग ज्या विषयावर बोलायचं, त्याचे मुद्दे काढू लागलो. मुद्यांचा क्रम असा ठेवला की, एकातून दुसरा मुद्दा सहजच निघाला पाहिजे. म्हणजे कोणताच मुद्दा विसरला जाणार नाही. अवघड होते हे. पण सरावाने सारेच सोपे वाटू लागते.

    याच काळात नगरमध्ये “भास्कराचार्य अॅस्ट्रॉनॉमी रिसर्च सेंटर”शी जोडला गेलो. खगोलशास्त्राची लहानपणापासूनच आवड. “भास्कराचार्य”ने त्या आवडीला नुसती दिशाच दिली नाही, तर प्रत्यक्ष अनुभवांतून व्यवस्थापनाची मूलभूत तत्त्वेसुद्धा शिकवली. याकाळात खूप सारे आकाशदर्शनाचे कार्यक्रम घेतले मी. शाळाशाळांमध्ये जाऊन खगोलशास्त्रावर व्याख्याने दिली. हळूहळू भीड चेपू लागली होती. दरम्यान पुण्याच्या “वेद-विज्ञान मंडळा”ने विचारलं, आमच्याकडे सावरकरांवर व्याख्यान देणार का? जाहीर व्याख्यान! नुसत्या नावानेच भिती वाटू लागली. पण हिंमत करून होकार दिला. दिनांक होता २४ डिसेंबर २०११ आणि विषय होता “सावरकरांवरील आक्षेपांचे खंडन”. भरपूर तयारी करून गेलो. तोपर्यंत एक गोष्ट पक्की समजली होती की, मुद्दे काढण्यात आणि काढलेल्या मुद्यांचा कागद सोबत ठेवण्यात काहीच चूक नाही. आपण काही परीक्षेला बसलेलो नसतो. उलट मुद्दे समोर असले की वाक्प्रवाहात अडथळा येत नाही. मोठमोठे वक्तेसुद्धा हे करतात. ते व्याख्यान आधीच्यापेक्षा छान झाले. विशेष म्हणजे मी यावेळी ठरवलेच होते की, सबंध व्याख्यान रेकॉर्ड करायचे. त्याप्रमाणे फोन माईकजवळ ठेवून मस्त रेकॉर्डिंग केली. स्मार्टफोनमुळे ही एक चांगलीच सोय झालीये. रेकॉर्ड केलेले माझेच व्याख्यान मी ऐकले. पुन्हा पुन्हा ऐकले. अतिशय कठोरपणे त्यातल्या त्रुटी शोधल्या. कुठे घटनाक्रम बदलता आला असता, ते शोधले. प्रवाह बदलण्यावरही विचार केला. कुठे आवाजात चढ-उतार असले पाहिजेत, याची टिपणे काढली. याच काळात सांगलीच्या ब्राह्मणसभेने सावरकरांवरच व्याख्यानाला बोलावले. आधीच्या व्याख्यानोत्तर टिपणांचा यावेळी खूपच चांगला उपयोग झाला. पुन्हा नवे रेकॉर्डिंग आणि नवी टिपणे!

    तेव्हापासून आजवर अव्याहत हा क्रम चालू आहे. मी व्याख्यान कधीच पाठ करत नाही आणि प्रत्येकवेळी नव्याने टिपणे काढतो. त्यामुळे आजही त्याच त्या विषयांवर व्याख्याने देण्याचा माझा आणि कितीही वेळा ऐकले तरी परत परत ऐकण्याचा श्रोत्यांचा उत्साह टिकून आहे. हळूहळू सावरकरांसोबतच स्वामी विवेकानंदांवरही व्याख्यानाची बोलावणी येऊ लागली. वेद-पुराणे यांची पूर्वीपासूनच आवड. त्यामुळे काही लोकांच्या स्वार्थापोटी अकारण वादग्रस्त ठरवण्यात आलेल्या परशुरामांचा मुळातून अभ्यास केला आणि त्यावरही आजच्या काळाला सुसंगत व्याख्याने द्यायला सुरुवात केली. भन्साळीचा “बाजीराव-मस्तानी” आला त्या दरम्यान योगायोगाने एका प्रथितयश वृत्तपत्रात माझा बाजीरावांचा प्रेमकथेपल्याडचा खराखुरा पराक्रम सांगणारा लेख प्रकाशित झाला होता. त्याही विषयावर बोलावणी येऊ लागली. किंबहूना हल्ली सर्वाधिक बोलावणी त्याच विषयांवर येतात. जाहीर व्याख्याने तर होतातच, परंतु शाळा-महाविद्यालयांनाही चित्रपटामुळे हा विषय वारंवार ऐकावासा वाटतो. आजवर मस्तानी आणि बाजीरावांच्या प्रेमकथेला नको इतके चघळले गेलेय. त्यामुळे मी ठरवून मस्तानीचा भाग कमीत कमी ठेवून बाजीरावांच्या युद्धांची वर्णने आणि त्यांची त्यापाठची युद्धनीती यांवर भर देतो. त्या विषयाला मी नावच दिले आहे, “मस्तानीपल्याडचे बाजीराव”!

    या सगळ्यांत एक फार महत्त्वाचा मुद्दा मला चर्चेसाठी घ्यावासा वाटतो. तो म्हणजे वक्त्याचे मानधन. व्याख्यान ही वाङ्सेवा आहे आणि सेवेचे मूल्य होऊ शकत नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. व्याख्यान हे एक समाजकार्य, प्रबोधन असले पाहिजे; हेदेखील मला मान्यच आहे. पण याबाबतीत मी माझा वैयक्तिक आणि म्हणूनच ‘फर्स्ट-हॅण्ड’ अनुभव सांगू इच्छितो. पूर्वी मी व्याख्यानांसाठी अजिबातच मानधन घेत नसे. किंबहूना, कुणी आग्रह केलाच तर तुम्हाला शक्य होतील तेवढे द्या, असे सांगत असे. पण यातून आपणां भारतीयांची एक गमतीदार मनोवृत्ती अनुभवास आली. वक्ता फुकट येतोय, याचा अर्थ तो काही फारसा चांगला नसणार; असा समज करून घेऊन कार्यक्रमात जाणून-बुजून दुर्लक्षित करणे, गृहित धरणे, अपमान करणे असे प्रकारच जास्त अनुभवास यायला लागले. राहाण्याची व्यवस्था उत्तम तर सोडाच परंतु किमान स्वच्छ ठिकाणी होणेही मुश्किल होऊ लागले. जिथे मानधनच नाही, तिथे प्रवासखर्चाचा तर प्रश्नच उद्भवत नाही. काहींनी तर फुकट येतोय म्हणून इतरही काही गोष्टी करवून घेण्याचा प्रयत्न केला, ज्यांची चर्चा इथे अप्रस्तुत ठरेल. जेवणाचं ताट द्यावं, पण बसायचा पाट देऊ नये; ही म्हण चांगलीच शिकायला मिळाली मला. तेव्हापासून मी एक विवक्षित रक्कम मानधन म्हणून आकारण्यास सुरुवात केली अधिक प्रवासखर्च. आणि काय आश्चर्य! जी मंडळी एकेकाळी दुर्लक्ष करायची, तीच आता सन्मानपूर्वक बोलावू लागली. आपण पैसे मोजतोय म्हटल्यावर व्याख्यानाकडे अधिक लक्ष देऊ लागली. ओघानेच राहाण्याची व्यवस्थाही सुधारली. थोडक्यात व्यवहारामध्ये सेलिब्रिटी राहाण्यालाच किंमत आहे निस्वार्थ सेवेला नाही, याचा पुरेपूर प्रत्यय आला! अर्थातच याबाबतीत मी स्वतःच स्वत:वर काही नियम घालून घेतले आहेत. एक म्हणजे मी कधीच माझ्या योग्य मानधनापेक्षा अधिक रक्कम मागत नाही. योग्य म्हणजे काय, तर व्याख्यानाचे कौशल्य हे अभ्यासावर अवलंबून असते. त्यासाठी घ्यावी लागणारी पुस्तके आणि बाकी सर्व कामे सोडून द्यावा लागणारा वेळ हा उगाचच अंगावर पडणार नाही, इतकी रक्कम. साधा विचार करा, व्याख्यानासाठी जी काही तयारी केली जाते, त्यात कुणी सूट देतं का? लाईटवाला फुकट लाईट देत नाही. माईकवाला फुकटात माईक देत नाही. स्टेजवाला फुकटात स्टेज बनवत नाही. अश्या अनेक ठिकाणी पैसे मोजावेच लागतात. मग ज्या वक्त्यावर हा सगळा डोलारा अवलंबून आहे, त्यानेच तेवढं फुकट यावं अशी अपेक्षा का? अर्थातच, कुणाकडून पूर्ण मानधन घ्यायचं, कुणाकडून कमी घ्यायचं आणि कुणाकडून अजिबातच घ्यायचं नाही; याचं नैतिक तारतम्य पाळता आलंच पाहिजे. ते मी मनापासून पाळतो. दुसरे असे की, मी प्रवासाच्या साधनांवर कधीच अडून राहात नाही. जे स्वस्त आणि सोपे असेल, त्याला माझी कधीच हरकत नसेल. अगदीच गरज असेल, तरच मी विमानप्रवास करतो, तेही प्रवासाचा वेळ वाचावा आणि जोडून दुसरे व्याख्यान असेल, तर आयोजकांचा खोळंबा होऊ नये म्हणून. तिसरे म्हणजे मी शक्यतो हॉटेलचा आग्रह धरत नाही. कुणा कार्यकर्त्याकडे माझी सोय केली तर ते आयोजकांना परवडते आणि मलाही चालते. फक्त माझा एकच आग्रह असतो तो म्हणजे व्याख्यानापूर्वीचा आवश्यक एकांत आणि प्रवासाचा शीण घालवण्यासाठी पुरेशी विश्रांती. चौथी गोष्ट म्हणजे जेवण. मी अस्सल खवय्या आहे. ज्या राज्यात जाईन तेथील खासियत चाखायचा माझा हमखास प्रयत्न असतो. पण हे करतानाही आयोजकांवर भार पडू नये, याची मी पुरेपूर काळजी घेतो.

    व्याख्याने देण्यापासून ते उपरोक्त नियम स्वतःवर लादण्यापर्यंत कोणतीच गोष्ट मला कधीच कुणी शिकवली नाही. इतरांचे ऐकत, निरीक्षण करत, ठेचकाळत-धडपडत स्वतःच शिकलो. अनुभवासारखा कठोर गुरू नाही आणि सातत्यपूर्ण अभ्यासाला कोणताच पर्याय नाही. आजही मी माझ्या व्याख्यानविषयांबद्दल सतत माहिती गोळा करत राहातो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतूनच नव्हे तर देशभरातून व्याख्यानांसाठी आमंत्रणे येतात मला. गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गोवा, कर्नाटक अशी कित्येक राज्ये मी विविध महापुरुषांची ससंदर्भ चरित्रं पोहोचवण्याच्या ध्यासापायी वारंवार पालथी घातलीयेत. अंदमानात तर वर्षातून दोन वेळा (सप्टेंबर व फेब्रुवारी) सलग पाच-पाच दिवस व्याख्याने देतो मी. या उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष आहे. आणि असे करणारा मी पहिलाच सर्वांत लहान वयाचा वक्ता आहे. वयाच्या तिशीच्या आतच श्रोत्यांनी मला न भूतो न भविष्यति प्रेम दिले. कित्येकदा कार्यक्रमानंतर अनेक वयोवृद्ध मंडळी चरणस्पर्शाचा प्रयत्न करतात, मी तसे करू देत नाही, पण अक्षरशः भारावून जायला होते. चांगले दिले, तर ऐकण्याची इच्छा अजूनही टिकून आहे, याची पदोपदी जाणीव होत राहाते. सुह्रद तर किती मिळाले याची गणतीच नाही.

    पहिल्या परिच्छेदातला तो अपमानित मुलगा, एवढा लांबवरचा प्रवास करून इथवर पोहोचलाय. लवकरच परदेशातूनही व्याख्यानासाठी निमंत्रण आहेच. पण अजून एक गंमत सांगू? ज्या स्पर्धेच्या पात्रताफेरीतूनच मला हाकलून दिले होते, त्याच अगदी त्याच स्पर्धेसाठी यंदा मला परीक्षक म्हणून बोलावण्यात आले होते! निमंत्रणाचे पत्र पाहून डोळे आपसूकच पाणावले. नकळतच एक वर्तुळ पूर्ण झाल्याचे जाणवले. मी हे माझ्या मोठेपणासाठी सांगत नाही. ज्या प्राध्यापिकेने मला हाकलून दिले होते, त्यांच्यावर तर काडीमात्रही राग नाही माझा. उलट त्यादिवशी त्या मला टोचून बोलल्या म्हणूनच तर मी ही भरारी घेऊ शकलो. अन्यथा जगाच्या जंजाळात कुठेतरी खितपत पडलो असतो आज. या लेखाचादेखील हाच तर उद्देश आहे. आपल्या प्रत्येकामध्ये एक फिनिक्स दडलेला असतो. राखेतून जन्म घेऊन उड्डाणाच्या तयारीत असलेला! त्या प्रत्येक फिनिक्सच्या आयुष्यावर साचलेल्या राखेला फुंकर घालण्याचे लहानसेच योगदान या लेखाने दिले तरी पुरे. मग होणाऱ्या गगनभेदी उड्डाणाला देवदेखील रोखू नाही शकणार!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (स्वबोध. दिवाळी अंक. २०१७)

    टीप: अॅडव्होकेट विक्रम एडकेंची व्याख्याने आयोजित करण्यासाठी संपर्क करा www.vikramedke.com

  • ख़याल

    कई दफ़ा खयाल, बयाँसे ज्यादा खुबसुरत होते हैं,
    और हर इक बयाँ के पीछे होते हैं सैकडों मुर्दा ख़याल!
    नज़्मोंकी तआरीफ करते हैं लोग, ख़यालोंके नआले कौन सुनता हैं?
    फूटे अल्फ़ाज़, चीखते ख़यालोंसे ज्यादा भाते हैं शायद!!
    ऐ मेरे ख़याल, ऐ मेरी कल्पना..
    इक तुम्हींपे तो लिखता हूँ मैं नज़्में,
    बयाँ करता हूँ तुम्हारा हुस्न, जो पकडमें नहीं आता,
    फिसल जाता हैं..
    सच कहता हूँ..
    मेरी नज़्मोंसे कहीं ज्यादा खुबसूरत हो तुम, जँचती हैं वह तुमसे!
    इक तुम्हाराही तो आसरा हैं उन्हें..
    वरना नज़्मोंका क्या हैं..
    उडते परीन्दे हैं महज, ना कोई ठिकाना – ना कोई आशियाँ..!

    — © विक्रम.

    image