Author: Vikram Edke

  • सोशल मिडिया हाताळताना

    मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. मला माहितीये, फारच वापरून वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे हे, पण खरं आहे. आणि या समाजप्रियतेतूनच संपर्काची वेगवेगळी साधने विकसित झाली. कालौघात या साधनांचे स्वरूपही बदलत गेले. हा वेग इतका प्रचंड आहे की पत्रे, फोन आणि मोबाईल एकत्र पाहिलेली पिढी अजूनही अस्तित्वात आहे. परंतु गेल्या दशकभरात या संपर्काच्या क्षेत्राने त्याच्या मूळच्याच अतिप्रचंड वेगालाही चक्कर यावी असे वळण घेतले आणि उभा ठाकला सोशल-मिडिया! सोशल मिडिया म्हणजे काय? फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॅप, इन्स्टाग्राम, युट्यूब, स्नॅपचॅट वगैरे वगैरे? ही तर सोशल मिडियाची उदाहरणं झाली! या उदाहरणांना सोशल मिडिया का म्हणायचं, याच्या ४ मुख्य कसोट्या आहेत.

    १) वेब २.० : पारंपारिक वेबचे स्वरूप असे असते की त्यावरील मजकूर केवळ वाचता येतो. परंतु वेब २.० हे परस्परसंवादी व्यासपीठ आहे. एखाद्या वेबसाईट अथवा अॅपला सोशल मिडिया म्हणण्याची पहिली कसोटी ही, की ती वेबसाईट अथवा अॅप वेब २.० वर आधारित असावी.

    २) मजकूर : वर सांगितल्याप्रमाणे पारंपारिक वेबवरील मजकुर हा त्या वेबासाईटकडूनच फक्त पुरवला जायचा. इतरांनी फक्त वाचायचं. त्यापलिकडे वाचकांचा सहभाग अतिशय मर्यादित होता. एकप्रकारे ही सगळी एकमार्गी वाहतूक होती. परंतु सोशल मिडिया मात्र ‘वेब २.०’वर चालतो. तेव्हा दुसरी कसोटी ही की सोशल मिडियावर त्या वेबसाईटच्या अथवा अॅपच्या चालक-मालकांपेक्षाही त्याचे वापरकर्ते आणि वाचक त्या वेबसाईट अथवा अॅपवरीलवरील मजकूर लेखनाच्या, फोटोंच्या किंवा व्हिडिओजच्या स्वरूपात निर्माण करू शकले पाहिजेत.

    ३) प्रोफाईल्स : प्रोफाईल्स म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर खाती. जसे आपले बँकेत खाजगी खाते असते, तसेच सोशल मिडियावर खाते तयार करता येते. ही झाली तिसरी कसोटी.

    ४) नेटवर्किंग : अनेक खाती नुसती आहेत, पण त्यांचा परस्परांशी काही संपर्कच नसेल, तर ते माध्यम मृतच म्हणावे लागेल! आणि म्हणूनच सोशल मिडियाची चौथी कसोटी आहे ती म्हणजे त्यावरील खात्यांची परस्परांशी जोडणी.

    या ४ कसोट्या पूर्ण करणाऱ्या कोणत्याही ऑनलाईन व्यासपीठाला सोशल मिडिया असे म्हणतात.

    संपर्काचे एक प्रभावी माध्यम म्हणून सुरू झालेला हा सोशल-मिडिया कधी आपल्यासमोरील संगणकातून निघून लॅपटॉपच्या रूपाने मांडीवर विसावला आणि कधी तिथून उडी मारून मोबाईलच्या रूपाने आपल्या खिश्यात जाऊन बसला, समजलंही नाही. हल्ली तर प्रत्येक बाबतीत लोक सोशल मिडियावर अवलंबून राहू लागलेयत. पूर्वी लग्न जुळवताना पत्रिका पाहिली जायची आता पत्रिकेच्याही आधी एकमेकांची फेसबुक अकाऊंट्स तपासली जातात. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, तिच्या आवडी-निवडी काय, राजकीय मते काय वगैरे एकूण एक माहिती आजकाल योग्यप्रकारे शोधली तर कुणालाही काही क्लिक्सवर सहज उपलब्ध आहे. जगाच्या एका कोपऱ्यातला माणूस दुसऱ्या कोपऱ्यातील माणसाशी फोन, पत्रे यांच्यापेक्षाही वेगाने आणि स्वस्तात बोलू लागला, जोडला गेला. एवढेच नव्हे, तर या दशकात जगभरातील कित्येक मोठमोठे राजकीय, सामाजिक उठाव हे या सोशल मिडियाच्याच जोरावर झाले. ‘व्हायरल’ हा एकेकाळी काळजीचा वाटणारा शब्द आता परवलीचा बनलाय.

    हे जितके छान आहे, तितकेच धोक्याचेसुद्धा आहे. लोक जास्त जास्त मनोमोकळे झालेयत आणि तितकेच भेद्य अर्थात व्हल्नरेबलसुद्धा. जाणता-अजाणता आपण कुठे जातो, काय करतो, काय आवडते, काय नाही आवडत, एखाद्या व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल आपले बरे-वाईट मत काय वगैरे अनंत गोष्टींची माहिती सोशल मिडियावर शेअर करत असतो. सध्याचे युग हे माहितीचे युग आहे. माहिती हे आजच्या जगात शस्त्र आहे आणि या शस्त्राचा वापर चतुर लोक कसा करू शकतात याचे केंब्रिज अॅनालिटिकासारखे उदाहरण फार जुने नाही. या तथाकथित पॉलिटिकल कन्सल्टिंग कंपनीने फेसबुकवरील एका अॅपद्वारे बेकायदेशीररित्या लोकांची माहिती मिळवली आणि तिचा वापर करून निवडणुकांवर प्रभाव टाकायचा प्रयत्न केला. फेसबुकवर आपण “तुम्ही मागच्या जन्मी कोण होता” वगैरे टाईमपास चाचण्या देत असतो ना? नीट पाहा, या चाचण्यांचे अॅप्स आपली पब्लिक प्रोफाईल आणि इतरही अनेक प्रकारची माहिती मागवत असतात. ‘त्याने काय फरक पडतोय’ अथवा ‘माझ्याकडे काय आहे चोरण्यासारखं’ म्हणून आपण सहज त्यांना परवानग्या देऊन टाकतो. परंतु केंब्रिज अॅनालिटिकाच्या प्रकरणात माहिती एकाची, गोळा केली दुसऱ्याने आणि वापरली तिसऱ्यानेच. तेव्हा, ‘माझी माहिती चोरून कुणाला काय मिळणार आहे’ म्हणण्याआधी लक्षात घ्या की, तुमच्या माहितीचा वापर हा तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल इतक्या वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो.

    काही दिवसांपूर्वी एके ठिकाणी माझे थोरले बाजीरावांवर व्याख्यान होते. व्याख्यानानंतर एक माझ्याच वयाच्या आसपासचा तरुण मुलगा भेटायला आला. मला म्हणाला, ‘मी सुद्धा बाजीरावांचा अभ्यासक आहे’. मी म्हणालो, ‘वाह, कोणकोणते संदर्भ अभ्यासता तुम्ही’? माझा विचारण्याचा हेतू असा की, एखादा नवीन संदर्भग्रंथ किंवा अभ्यासाचा मुद्दा समजावा. तर तो उत्तरला की, ‘खूप कसून अभ्यास करतोय मी बाजीरावांचा. व्हॉट्सॅपवर त्यांच्याबद्दल आलेले सगळे मेसेजेस वाचलेयत मी’! मला गंमत वाटली. मी स्वतःही काही परिपूर्ण नाही, परंतु तो तरुण मित्र मात्र व्हॉट्सॅपलाच संदर्भ समजून बसला होता. वर म्हणालो त्याप्रमाणे, सध्याचे युग माहितीचे युग आहे. आपली नेमकी गडबड होते ती इथेच. आपण माहिती आणि ज्ञान यांच्यात फरक आहे, हेच मुळात समजून घेत नाही. साधी गोष्ट सांगतो. ज्ञानाला आह्वान नसते, माहितीची मात्र दुसरी बाजूसुद्धा असू शकते. उदाहरणच द्यायचं झालं तर, दुधी भोपळ्याचा रस एखाद्यासाठी चांगला आहे की नाही, हे कोण व्यवस्थित सांगू शकतं? फक्त तज्ञ डॉक्टर! कारण, त्यांच्याकडे त्याबाबतीत ज्ञान आहे. याउलट सोशल मिडियावर तुम्हाला दुधी भोपळ्याचा रस जणू अमृतच असतो इथपासून ते दुधी भोपळ्याचा रस म्हणजे विषच इथपर्यंत सगळ्या स्वरूपाची माहिती दिसेल! तिची कोणती तरी एकच बाजू बरोबर असणार, परंतु ज्ञान मात्र संपूर्ण बरोबर असतं! व्हॉट्सॅप, ट्विटर, फेसबुक, युट्यूब किंवा इतर कोणत्याही सोशल मिडियावर आलेल्या कोणत्याही पोस्टला, फोटोला, व्हिडिओला; ते विशेषतः इतिहास, धर्म, राजकारण, विज्ञान इ. विषयांवर असतील तर, जर आपण उपरोक्त वाक्याची कसोटी लावली आणि त्यांना पारखून घेऊ लागलो, तर विचार करा, केवढ्या साऱ्या अफवा थांबतील!

    या विषयाला आणखी एक पैलू आहे. हायपोकॉण्ड्रिया नावाचा एक विकार असतो. यात व्यक्तीला सतत वाटत राहाते की आपल्याला काहीतरी भयंकर आजार झालाय. जरासं काही झालं की या व्यक्ती त्या लक्षणांवरून आपल्याला त्याच्याशी संबंधित एखादा मोठा आजार झाल्याचा समज करून घेतात. याच विकाराचं एक भावंड आहे, त्याला म्हणतात सायबरकॉण्ड्रिया! नावाप्रमाणेच या विकारात लोक एखाद्या आजाराबद्दल ऑनलाईन वाचून किंवा बघून आपल्यालाही तोच आजार झाल्याचा समज करून घेतात. टाईम्स ऑफ इंडियातील १८ जानेवारी २०१६च्या बातमीनुसार गुगलवरील दर २० मागे १ सर्च हा वैद्यकीय गोष्टींशी संबंधित असतो. आज हा आकडा काय असेल, याची कल्पनाच केलेली बरी. केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांमध्ये स्वनिदानाचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय आहे.

    केवळ सायबरकॉण्ड्रियाच नव्हे, तर सध्या सर्वत्र वाढत चाललेले तणाव, अस्वस्थता, निद्रानाश इ. अनेक गोष्टींच्या मुळाशी हेच सोशल मिडिया, मोबाईल आणि इंटरनेटचे व्यसन आहे. इंटरनेट अॅडिक्शन डिसॉर्डर आणि त्याचाच भाऊ फेसबुक अॅडिक्शन डिसॉर्डर हे प्रकार उंबऱ्याशीच नव्हे तर उंबऱ्याच्या आत, तुमच्या-माझ्या आयुष्यामध्ये येऊन ठेपले आहेत व आपल्या मन:शांतीशी छेडछाड करताहेत. फेसबुक, इंटरनेट, मोबाईल यांच्यापलिकडे काही जग असतं, हेच जणू विसरून गेलो आहोत आपण! तुम्हाला गोल्डफिश माहितीये? अॅक्वेरियममध्ये ठेवतात तो मासा. त्याची एखाद्या गोष्टीवरची सरासरी एकाग्रता किती वेळाची असते, ठाऊक आहे? सुमारे ९ सेकंद! आणि माणसाची किती आहे? जवळजवळ ८ सेकंद! दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं, तर आपण गोल्डफिशपेक्षाही जास्त चंचल झालो आहोत. मी मुद्दामहून झालो आहोत म्हणतोय कारण, इ. स. २००० मध्ये आपली सरासरी एकाग्रता होती, जवळजवळ १२ सेकंद! म्हणजेच गेल्या १८ वर्षांत आपल्या एकाग्रतेची सरासरी जवळजवळ १/३ कमी झालीये!! डेलॉईट मोबाईल कन्झ्युमर सर्व्हे २०१६च्या आकडेवारीनुसार, ६१% लोकांना झोपेतून उठल्यावर पहिल्या ५ च मिनिटांत मोबाईल लागतो. ८८% लोक पहिल्या अर्ध्या तासात तर तब्बल ९६% लोक पहिल्या तासाभरात मोबाईल पाहातात. झोपण्याच्या १५ मिनिटे आधीपर्यंत मोबाईल पाहाणाऱ्यांचे प्रमाण ७४% आहे. याच सर्वेक्षणानुसार मोबाईल उघडल्या उघडल्या लोक आधी सोशल नेटवर्किंग साईट्स तपासतात, त्याखालोखाल मेसेजेस आणि इमेल्सचा क्रमांक लागतो. हा सर्व्हेदेखील जवळजवळ ३ वर्षे जुना आहे. आता काय परिस्थिती असेल, याची कल्पनाच केलेली बरी! हे कुठेतरी थांबावे असे नाही वाटत का? काही मिनिटे जरी इंटरनेट, व्हॉट्सॅप, फेसबुक गडगडलं तरीही आपण चिंताक्रांत होतो, हीच खरी चिंतेची परिस्थिती नाही का? ‘डिजिटल डिटॉक्स’ आणि त्यापेक्षाही ‘डिजिटल डिटॅचमेंट’ ही आता हळूहळू काळाची गरज बनू पाहातेय.

    बघा ना, पूर्वी एकेकाळी कॉलेजमध्ये कुणीतरी आवडायचं. पण बोलण्याची हिंमत कुठे? आज बोलू, उद्या बोलू करत कित्येकांची शिक्षणं झाली आणि त्याच्या किंवा तिच्या लग्नाला हजेरीसुद्धा लावून झाली. दहा-एक वर्षांपूर्वी सोशल मिडिया नावाचा मेघदूत अवतरला आणि ज्याच्याशी किंवा जिच्याशी नजरेला नजर भिडवण्याचीसुद्धा हिंमत नव्हती, हळूहळू त्या व्यक्तीला संगणकाच्या पडद्याआडून फ्रेण्ड रिक्वेस्ट टाकणे जमू लागले! आमच्या नगरकडे ना, फ्रेण्डशिप करत नाहीत. मागतात! एकेकाळी “फ्रेण्डशिप देतीस का” हे तीन जादुई शब्द पोट्ट्यांसाठी “आय लव्ह यू”इतकेच महत्त्वाचे होते. उच्चारणाऱ्याला आणि ऐकणारीला सर्रास ठाऊक असायचं की गाडी मैत्रीपूरच्या फाट्यावरून पलिकडे न्यायचीये. अर्थातच फाटा आहे तिथे फाट्यावर मारणंसुद्धा आहे! त्या तीन जादुई शब्दांनी कित्येकांना चपलेची चव कशी असते, याचाही अनुभव दिलाय. सोशल मिडियाने ही भिती कमी केली. ब्लॉकचा धोका होता, पण चपलेपेक्षा त्याने कमी दुखतं म्हणतात. एकेकाळी जशी गुलाबांची संख्या हे ब्युटीक्वीन्सच्या पॉप्युलॅरिटीचं परिमाण असायचं, त्याची जागा हळूच पेण्डिंग फ्रेण्डरिक्वेस्ट्सनी घेतली. ब्युटीसुद्धा हळूहळू गार्ड्स आणि फिल्टरपाठी लपू लागली! काही मंडळी जिला फ्रेण्डशिप मागू शकले नव्हते तिला “झालं का जेवण” विचारण्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्याचे बरेवाईट परिणामसुद्धा भोगले. तरुणाईला, मदर्स डे ला मानलेली सासू आणि फादर्स डे ला मानलेल्या सासऱ्यांची दर्शनं घडू लागली. पोरं बऱ्याच विषयांवर बोलती झाली. “फूड व्लॉगर (Food Vlogger)” या व्यवसायाची दहा वर्षांपूर्वी कुणी कल्पना तरी केली असती का हो? पण आज हा व्यवसाय आहे! हे आणि असे कित्येक बदल या पिढीने नको तितक्या वेगात पचवले. पुढे पुढे जाताना बरंच काही मागं राहून गेलं. नव्या पुस्तकांचा वास आता मनाच्या दुर्लक्षित कप्प्यात कुठेतरी पडून आहे, तसाच तळमळून लिहिलेल्या प्रेमपत्रांचा चुंबनस्पर्शसुद्धा कुठेतरी हरवलाय. लेखणीचा स्पर्श कामाशिवाय होतच नाही आता. क्लिक आणि टचची भुरळ पडू लागलीये. कवितांची जुनी डायरी दूर कुठेतरी हरवलीये. पुस्तक वाचता वाचता छातीवर उपडं ठेवून तासनतास विचार करणं जणू दुसऱ्याच कोणत्यातरी युनिव्हर्समध्ये व्हायचं. कालचं वर्तमानपत्र आज जुनं होतं, इथं मिनिटभरापूर्वी लिहिलेली पोस्टसुद्धा जुनी वाटू लागलीये. प्रेम आजही फुलते. नाती आजही बनतात. पण पूर्वी ती तुटल्यावर जितकी सलायची तितकी आता सलत नाहीत. लाईक आणि कमेंटपुरत्याच कॉम्प्लिमेंट्सने छाती फारशी धडधडत नाही. आज एक प्रोफाईल अनफ्रेण्ड केली की तिच्या जागी दुसरी सहज तयार असते. एकूण जगण्याचाच अटेन्शन-स्पॅन कमी झालाय. जणू सबंध आयुष्याचाच सोशल-मिडिया झालाय!

    बदल सृष्टीचा नियम आहे. पण तो बदल स्वीकारताना आपला मूळ गाभा, व्यक्तीमत्त्व तर त्याने चुरमडून जात नाहीये ना; आपल्यातल्या चांगल्या आणि साध्यासुध्या गुणांची किंमत तर त्यासाठी मोजावी लागत नाहीये ना, हे पाहायला नको? आजच्या काळात, सोशल मिडिया वापरणे कुणीच टाळू शकत नाही; परंतु तो आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनवताना आपलं जगणंच त्याच्यावर सोपवणं कितपत योग्य? कुठेतरी अंतर राखता आले पाहिजे. कुठेतरी आयुष्यातल्या इतर सहजसुंदर नैसर्गिक गोष्टींचा आस्वाद घ्यायला शिकले पाहिजे. आहे तो क्षण साजरा करायला शिकले पाहिजे. सगळ्याच गोष्टी कॅमेऱ्यात आणि नंतर इन्स्टाफीडमध्ये बंदिस्त करायचा अट्टाहास का? आणि सगळ्यांत महत्त्वाचे. कुठे थांबायचे हे ठरवायला शिकले पाहिजे. थोडक्यात, सोशल मिडिया आपलं आयुष्य हाताळायला लागलाय, त्याच्या आत आपणच त्याला योग्यप्रकारे हाताळायला शिकले पाहिजे!

    — © अॅड. विक्रम श्रीराम एडके

    (अभ्यासक आणि व्याख्याते. २६ जानेवारी २०१९ दिनी प्रकाशित झालेल्या वार्षिक ‘सहजीवन’ साठी लिहिलेला लेख.)

  • अपेक्षाभंग करणारा : मणिकर्णिका

    १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील झाशीच्या राणीचे स्थान केवळ मराठीजनांसाठीच नव्हे, तर सबंध भारतीयांसाठीदेखील कायमच गौरवाचे राहिले आहे. राणीवर आजपर्यंत खूप सारे साहित्य लिहिले गेले, मालिका बनल्या, चित्रपटही बनले. परंतु जेव्हा के. व्ही. विजयेंद्र प्रसाद, प्रसून जोशी, राधाकृष्ण जगर्लामुडी आणि कंगना राणावतसारखे दिग्गज या विषयासाठी एकत्र आले तेव्हा बनणारी कलाकृती निश्चितच वेगळ्या दर्जाची असणार होती. पण बुद्धीमंतांचा एक दोषच असतो की, बरेचदा ते एकत्र आल्यावर त्यांच्या बुद्धीच्या बेरजा होण्याऐवजी एकमेकांना छेद देऊन भागाकार तेवढा होऊन बसतो. माझ्या दृष्टीने ‘मणिकर्णिका’मध्येही तेच झाले.

    सुरुवातीपासूनच कंगना आणि क्रिशमध्ये दिग्दर्शनावरून वाद होते, हे सर्वश्रृत आहे. कोण चित्रपटाची माती करत होतं आणि कुणी कोणते प्रसंग दिग्दर्शित केले याबद्दल दोघांचेही वेगवेगळे दावे आहेत. परंतु आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या दाव्यांना फारसा काही अर्थ नाही, कारण जवळपास सगळीच दृश्ये सारख्याच प्रमाणात दिशाहीन वाटतात. चित्रपट एका चांगल्या बिंदूवर सुरू होतो आणि त्यानंतर सतत कसली तरी घाई असल्यासारखा पडूच लागतो. अधूनमधून काही काळ तो वर उचललाही जातो, पण दुर्दैवाने तसे प्रसंग कमीच येतात. बरं त्यांना मुद्यावर येण्याची घाई आहे म्हणावं, तर ते ही होत नाही. मुद्याच्या आजूबाजूला घुटमळणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी घडत राहातात, पण मुद्दा काही फारसा येत नाही. आणि जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा तो इतक्या निष्काळजीपणे हाताळलाय की, त्याचे गांभीर्य नुसतेच जाणवते पण त्याची अनुभूती काही येत नाही. चित्रपट ऐतिहासिक सत्यतेचा दावा करत नाही, हे समजून घेण्यासारखे आहे. परंतु चित्रपटाच्या सुरुवातीलाच इतिहासाच्या अभ्यासकांचा सल्ला घेतल्याचे व इतरही काही कथा-लोककथांचा आधार घेतल्याचे सांगणाऱ्या चित्रपटाला राणीचे आडनाव नेवाळकर होते एवढी साधी गोष्टही समजू नये? चित्रपटात अनेकदा नवलकर असा उल्लेख आहे! हे एकीकडे तर दुसरीकडे झलकारीबाई आणि क्वचित राणी यांचे आयटम साँग टाकता? मग भन्साळी आणि तुमच्यात फरक काय राहिला? पात्रांचा स्वभाव, त्यांचं आयुष्य आणि त्यांच्या मौजेच्या कल्पना दाखवण्याचा एवढा एकच मार्ग बॉलिवूडला का दिसत असावा? सिनेमॅटिक लिबर्टीला माझा जराही आक्षेप नाही, आक्षेप आहे तो निष्काऴजी सिनेमॅटिक लिबर्टीच्या जंत्रीला!

    चित्रपटाची कथा-पटकथा के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची. साक्षात ‘बाहूबली’चे लेखक आणि राजमौलीचे वडील. त्यांनी लिहिलेले प्रसंग, त्यांची काल्पनिकता व ऐतिहासिकता यांच्या पलिकडेही उत्तमच आहेत. परंतु ते सगळेच दिशाहीन आणि जागा चुकल्यासारखे वाटतात. त्यांच्या जागा जर बदलल्या असत्या, तर ते बऱ्याच अंशी सुसह्य तरी झाले असते. आता हे पाप लेखकाचे, की दिग्दर्शकांचे, की संपादकांचे ते न कळे. राजमौली का थोर आहे ते इथे कळतं. त्याने एका काल्पनिक गोष्टीच्याही बारीकसारीक अंगांवर पाच वर्षे मेहनत घेतली. ‘मणिकर्णिका’कारांना मात्र कसली घाई होती, हेच समजत नाही. तुमचे नुसते सेट, कपडे वगैरे भारी असून चालत नाही, तुमचा दृष्टीकोन हा त्या सगळ्या भौतिक गोष्टींपेक्षा शंभरपटींनी भारी असला तरच असे शिवधनुष्य पेलले जाते. राणीच्या व्यक्तीमत्त्वाला उंची खूप दाखवलीये, पण तिला आणि इतरही पात्रांना खोलीसुद्धा तेवढीच दाखवली असती, तर बरं झालं असतं. एकूण एक पात्रं ही सपाट, एकमार्गी आहेत. त्यातही इंग्रज तर खूपच स्टिरीयोटिपिकल दाखवले आहेत. इतकी सरधोपट पात्रे निदान इतक्या मोठ्या स्तरावर बनलेल्या चित्रपटाकडून तरी अपेक्षित नव्हती. अतिशय सामान्य वाटणारे अंकित आणि संचित बलहारांचे पार्श्वसंगीत हे या पसाऱ्यात भरच तेवढी घालते. पार्श्वसंगीतात एके ठिकाणी वापरलेल्या महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे उच्चारही चुकीचे आहेत. छायांकन उत्तम पण व्हिएफएक्स काही काही ठिकाणी फारच सुमार आहेत. मला अजूनही न कळालेली गोष्ट म्हणजे कंगना राणावत काही प्रसंग वगळता युद्धात शिरस्त्राण का घालत नाही? मी काही राणीच्या चरित्राचा तज्ञ नाही, परंतु युद्धावर जाताना राणी नेहमीच शिरस्त्राण घालत असणार असे तर्कबुद्धी सांगते. कंगना मात्र प्रत्येक वेळी ते घालतेच असं नाही. का? केवळ पडद्यावर छान दिसावं म्हणून? इंग्रजांशी बाचाबाची झाल्यावर राणी अचानक घोडा दौडवत कुठे जाते, हे समजत नाही. ती उद्विग्न झाली म्हणावे तर त्याच प्रसंगात संग्रामसिंहशी भेट होते व अजूनच खटका उडतो. तो पूर्ण सिक्वेन्सच गोंधळात टाकणारा आहे. किमान मला तरी तो समजला नाही.

    प्रसून जोशींनी लिहिलेले संवाद काही क्लिषे वगळता फारच जबरदस्त आहेत. ते भूतकाळाच्या माध्यमातून वर्तमानकाळावर अतिशय नेमके भाष्य करतात. पण त्या संवादांनाही अडसर आहे तो कंगना राणावतचा. ती अत्यंत उत्तम अभिनेत्री आहे. पण तिची वाणी शुद्ध नाही. त्यामुळे तिने उच्चारल्यावर भलीभली वाक्येही सपाट वाटतात. अतुल कुलकर्णींच्या भूमिकेवरून काही ना काही कारणाने कात्री फिरवली गेली की काय असे वाटते, पण त्यांनी काम छान केलेय. जिशू सेनगुप्तांचेही काम उत्तमच, पण चित्रपट गंगाधररावांच्या मनोविश्वात डोकावण्याचे फारसे कष्टच घेत नाही. मुहंमद झीषान अय्युब, अंकिता लोखंडे, मिष्टी, डॅनी, वैभव तत्त्ववादी, सुरेश ओबेरॉय, कुलभूषण खरबंदा सगळेच आपापल्या भूमिकांत ठिकठाक. चित्रपटाची सगळ्यांत चांगली गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे गाणी! शंकर-अहसान-लॉयच्या संगीतदिग्दर्शनात प्रसून जोशींची शुद्ध हिंदीचा प्रभाव असलेली गीते फारच गोड, सुरेख आणि अर्थवाही झाली आहेत. पण चित्रपटात त्यांच्याही जागा काही वेळा चुकल्यायत.

    राणी लक्ष्मीबाई हे खरोखर आपल्या इतिहासातील एक तेजस्वी पृष्ठ आहे. त्याचा रुपेरी पडद्यावर सन्मान करतानाच सिनेमा म्हणून त्याची मांडणीदेखील चांगली असणे अपेक्षित होते. दुर्दैवाने चित्रपट अनेक आघाड्यांवर निराशाच तेवढी करतो. सर्जनशील बाजूंवर नियंत्रण असणाऱ्या कुणीतरी हुशार व्यक्तीने या विषयाला स्पर्श करेपर्यंत थांबणे, एवढेच प्रेक्षक म्हणून आपल्या हाती आहे!

    *२.५/५

    — © विक्रम श्रीराम एडके

    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • रुणुझुणू वारा

    २०१६ मध्ये माझ्याकडे एक मराठी चित्रपट-दिग्दर्शक आला होता, ‘मी एक रोमँटिक चित्रपट करतोय त्यासाठी गाणं लिहून द्याल का’ विचारत. मी त्याला चालीबद्दल विचारले. तो म्हणाला की, ‘तुम्ही लिहा आपले संगीतकार चाल लावतील’. असे म्हणून त्याने मराठीतल्या एका बरे नाव असलेल्या संगीतकाराचे नाव घेतले. म्हणजे गाणं आधी लिहून मग चाल लावली जाणार होती. प्रासंगिक गीत असल्यामुळे मी दिग्दर्शकाकडून संहिता मागवून घेतली. त्या तथाकथित रोमँटिक प्रसंगावर गाणे लिहिले आणि संगीतकाराला पाठवून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळीच मला संगीतकाराचा फोन आला.
    “हे काय लिहिलेय तुम्ही”?
    “गाणे”, मी.
    “हे असं नकोय आपल्याला”.
    “असं नकोय, मग कसं हवंय”?
    त्यावर त्याने वापरलेले वाक्य अक्षरशः असे होते –
    “तुम्ही खूपच चांगले गाणे लिहिलेय. इतके चांगले नकोय आपल्याला”!
    आपल्याला? मी मनात म्हणालो की, मला तर चांगलेच हवे आहे, तुमचे मी काय सांगू? प्रत्यक्षात मात्र,
    “‍‍‌तुमची काय अपेक्षा आहे नेमकी”?
    “मी ही अशी चाल करत असतो”, असं म्हणून त्याने तोंडातून कोणत्याच लिपित न गावणारा ताल, चालीच्या नावाखाली म्हणून दाखवला.
    “बरं, मग”?
    “आता यावर काहीतरी गावरान लिहा”!
    “गावरान”?
    “होय, गावरान”!
    मी म्हणालो, “साहेब तुम्ही चित्रपटाची संहिता वाचलीये का नीट? तुमची नायिका आयुष्यभर शहरात वाढलेली, क्लासवन ऑफिसरची मुलगी आहे. ती अचानक गावरान भाषेत का गाईल”?
    “स्क्रिप्टवाल्यांना काय कळतंय हो? इथं गाणं हिट गेलं पाहिजे”, त्याने ज्ञान पाजळलं, “अहो हेच खपतं आज मराठीत”.
    मी स्वतःवर ताबा ठेवत शांतपणे म्हणालो, “साहेब, मराठीत खूप चांगल्या चांगल्या गोष्टी खपतात. तुमची नजर त्याकडे जात नाही, याला कोण काय करणार? माफ करा, तुमच्या लहरीसाठी मी माझी लेखणी गुलाम बनवू शकत नाही. कृपया दुसरा गीतकार शोधा”.
    मी फोन कट केला. पुढे नोटबंदीच्या काळात तो चित्रपटच बंद झाल्याचं समजलं.

    ************************************

    संहितेत बसत नसतानाही गावरान गीताचा अट्टाहास धरणाऱ्या आणि ‘एवढे चांगले गाणे नको’ म्हणून गीत नाकारणाऱ्या त्या तथाकथित संगीतकारासाठी लिहिलेले, हेच ते गीत. सबंध गीत स्त्रीभूमिकेतून व एका प्रसंगानुरूप लिहिले आहे.

    चाल: मुन्गिल तोट्टम (कडल)

    ************************************

    रुणुझुणू वारा गाई भरारा
    उजळुनि आला आसमंत सारा
    आणि दिसते छवि सजनाची
    अंगभर दाटे अवखळ शहारा
    पहिलेच प्रेम हे पहिली नशा
    पहिल्या खुणा या लपवू कशा!

    सीता मी जरी रघुवर तू तरी
    रुक्मिणी मी होतास तू कान्हा
    जन्मांतरीचे हे नाते असूनही
    जाणले नाही मी घडला हा गुन्हा
    पहिलेच प्रेम हे पहिली नशा
    पहिल्या खुणा या लपवू कशा!

    कोवळी पाकळी की सोनसाखळी
    तैसे प्रेम हे नाजुक ध्याससे
    स्वप्नां माझिया चुंबुनि घेता तू
    भवति रातभर हळवा मधुश्वाससे
    पहिलेच प्रेम हे पहिली नशा
    पहिल्या खुणा या लपवू कशा!

    — © विक्रम श्रीराम एडके

  • नव्या भारताचा नवा चित्रपट : उरी – द सर्जिकल स्ट्राईक

    १८ सप्टेंबर २०१६ यादिवशी पाकिस्तानच्या चार आतंकवाद्यांनी काश्मिरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील आपल्या सैन्यतळावर हल्ला केला. आपण त्या चारही आतंकवाद्यांना नरकात धाडले परंतु हे होईपर्यंत आपले सुमारे एकोणावीस जवान हुतात्मा झाले होते तर सुमारे ऐंशी ते शंभर जखमी. युद्धाची दाहकता ही अशी असते आणि ती कधीच एकतर्फी शांतता राखून कमी होत नाही. आपण जर याचे काही उत्तर दिले नसते, तर उलट त्या अतिरेक्यांच्या मालकांची हिंमत अजूनच वाढली असती. आणि म्हणूनच भारत सरकारने आणि आपल्या भारतीय सैन्याने निर्णय घेतला सर्जिकल स्ट्राईक करण्याचा! शरीरावर शल्यकर्म करताना जसे फक्त त्या रोगग्रस्त भागापुरतेच केले जाते, तसाच हा हल्लादेखील सर्जिकल अर्थातच लक्ष्यांपुरता मर्यादित असतो. यात इतरांना लक्ष्य केलेले नसते. थोडक्यात कोलॅटरल डॅमेज शून्य ठेवण्याचा यात प्रयत्न असतो. नेमके हेच आपल्या सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात घुसून यशस्वीरित्या पार पाडले! ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ हा त्याच घटनांचे काल्पनिक रुपांतरण करतो.

    ‘उरी’ हा अतिशय रंगीत सिनेमा आहे. चित्रपटभर तुम्हाला वेगवेगळे रंग वापरलेले दिसतात. आजवर आपल्याकडे बनलेल्या युद्धपटांच्या तुलनेत हा अतिशय स्वागतार्ह बदल आहे. चित्रपटात खूप सारे खटकेबाज संवाद आहेत, पण चित्रपट त्यांच्यातही अडकून पडत नाही. उलट स्ट्राईक्सची थंड डोक्याने आखलेली योजना आणि तिची तितक्याच शिताफीने केलेली अंमलबजावणी यांच्यावर त्याचा जास्त भर आहे. याही चित्रपटात ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’सारख्याच खरोखरच्या राजकीय व प्रशासनिक व्यक्ती आहेत. त्यांची नावे चित्रपटात बदललेली असली, तरी त्या व्यक्ती प्रत्यक्षात कोण आहेत याबद्दल प्रेक्षकांना जराही संभ्रम निर्माण होत नाही. उलट ‘उरी’सोबतच प्रदर्शित झालेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’प्रमाणे यातील पात्रे या त्या त्या व्यक्तींच्या निव्वळ नकला वा अर्कचित्रे न वाटता जिवंत माणसे वाटतात, हे चित्रपटाचे मोठेच यश आहे. चित्रपट हा काही पातळ्यांवर प्रचंड भावनिक आहे. विशेषतः पूर्वार्धात. आणि तसा तो आहे म्हणूनच नंतर जे दाखवले गेलेय, त्याला एक तात्त्विक आधार प्राप्त होतो. तसं बघायला गेलं, तर चित्रपट पाहाण्यापूर्वीच आपल्याला त्याची सबंध कथा माहिती आहे. सुरुवात काय, शेवट काय; सारंच. इतकी सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट असूनही चित्रपट आपल्याला पूर्णवेळ खूर्चीच्या कडेवर बसवून श्वास वारंवार रोखायला लावतो, यासाठी लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धर आणि संपादक शिवकुमार पणिकर यांचे कौतुक करावे तितके थोडे! मोठी हुशारीने गुंफलेली पटकथा आणि जागोजागी वापरलेला नैसर्गिक विनोद, या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत तर शाश्वत सचदेव यांचे जबरदस्त पार्श्वसंगीत घटनांची खोली व चित्रपटाची उंची कैकपटींनी वाढवणारे आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रेक्षकांवर विश्वास टाकून त्यांना कमीत कमी स्पून फीडिंग करणारा ‘उरी’ एक अतिशय स्मार्ट चित्रपट आहे. त्याची फ्रेमिंग आणि टेकिंग दिग्दर्शकीयदृष्ट्या अतिशय विचारपूर्वक केलेली आहे. पण!

    पण म्हणून काही तो त्रुटी आणि दोषांपासून मुक्त आहे, असं अजिबात नाही. प्रचंड हुशारीने रचलेला चित्रपट शेवटाकडे जाताना किंचित फिल्मीपणाकडे झुकू लागतो. ‘शूट टू किल’ची जागा क्वचित ठिकाणी अनावश्यक मारामारी घेते. दोन मिनिटांत पोहोचतील अशी बातमी असलेले पोलिस सोयीस्करपणे उशिरा येतात. एवढ्या मोठ्या मिशनचा महत्त्वाचा भाग एक इंटर्न होऊन बसतो. परतीच्या प्रवासात मोक्याच्या क्षणी एका पात्राची फिल्मी पद्धतीची एंट्री होते. देशासाठी केल्या जात असलेल्या अभियानालाही वैयक्तिक सूडाची फोडणी दिली जाते. गुप्ततेबद्दल प्रसिद्ध असलेले एक पात्र रिक्षाच्या प्रवासात राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीच्या गोष्टी उघडपणे बोलते. हे आणि असे बरेच काही! सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यात काहीच चूक नाही. परंतु एक प्रेक्षक म्हणून दिग्दर्शकाने अधिक वास्तववादी मार्ग चोखाळलेला पाहाणे मनापासून आवडले असते. कथा-पटकथा किती जरी आकर्षक असली, तरी त्यात संशोधनाचा अभाव जाणवतो.

    अभिनय ही चित्रपटाची भक्कम बाजू आहे! विकी कौशल हा जर असेच काम करत राहिला, तर तो खचितच उद्याचा सुपरस्टार असणार आहे! परेश रावल यांच्याकडून तर वाईट कामाची अपेक्षाही नाही. मोठ्या पडद्यावर मोहित रैना या गुणी अभिनेत्याला पाहाणे अतिशय सुखद आहे. कीर्ती कुल्हारीने तिची भूमिका प्रामाणिकपणे केलीये तशीच मानसी पारेख व इतरांनीही. या सगळ्यांत यामी गौतम मात्र काहीशी खटकते. तिने वाईट काम केलेय असे नाही, परंतु इंटेलिजन्स ऑफिसरच्या भूमिकेत व संवादांतही ती जराशी नाजूकच वाटते. याखेरीज स्वरूप संपतना खूप दिवसांनी पाहाणे आनंददायी आहे. योगेश सोमण, राकेश बेदी, रुख्सार वगैरेंनाही छोट्याछोट्या परंतु महत्त्वाच्या भूमिका आहेत व त्या त्यांनी ताकदीने निभावल्या आहेत.

    अर्थातच हल्ली प्रत्येक व्यक्ती, गोष्ट, कलाकृती यांना कोणत्यातरी एका गटात टाकायची फॅशन आलीये. त्या अर्थी बोलायला गेलं तर ‘उरी’ उजव्या गटातील सिनेमा आहे. तसा तो असेलही, पण त्यापेक्षाही जास्त तो बदलत्या काळाचा द्योतक आहे. चित्रपटाच्याच एका संवादाचा आधार घेऊन बोलायचं झालं, तर ‘उरी’ हा नव्या भारताचा चित्रपट आहे. तो काहीसा अडखळतो पण उठतो, उभा राहातो आणि त्याचं इच्छितस्थळ गाठतो, अगदी भारतासारखाच!!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके

    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • बऱ्याच गोष्टींनी मारलेला पण अभिनयाने तारलेला : द अॅक्सिडेंटल प्राईममिनिस्टर

    ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ सुरू होतो तो काँग्रेसप्रणित संपुआने २००४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यापासून. त्यानंतर उभ्या राहिलेल्या पेचप्रसंगांतून मनमोहनसिंह (अनुपम खेर) यांना पंतप्रधानपदी निवडले जाते आणि चित्रपटात आरंभ होतो दोन सत्तास्थानांमधील अघोषित संघर्ष. याला मी लिहिण्याच्या सोयीसाठी संघर्ष म्हणतोय कारण, चित्रपटात एक सत्तास्थान खूपच सौम्य चितारलेय तर दुसरे जवळजवळ अप्रत्यक्ष. नेमके हेच सगळ्यांत मोठे कारण आहे की, यावर्षीच्या सगळ्यांत स्फोटक चित्रपटांपैकी एक मानला जाणारा ‘टिएपीएम’ फारसा रंगत नाही.

    मनमोहनसिंह हे मुळातच मितभाषी नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. चित्रपटातही त्यांची प्रतिमा तिच ठेवण्यात आलीये. असा परोक्ष नायक कसा काय चालेल? म्हणून मग त्यांचा आवाज बनतात संजय बारू (अक्षय खन्ना), सांकेतिक अर्थानेच नव्हे तर त्यांचे माध्यम सल्लागार या नात्याने प्रत्यक्षातही. सबंध चित्रपट आपण संजय बारूंच्या संदर्भबिंदूने पाहातो. अभिनयात एक वाक्प्रचार असतो, ज्याला म्हणतात ‘ब्रेकिंग द फोर्थ वॉल’. म्हणजे काय, तर अभिनेता रंगमंचाच्या तीन भिंतींच्या चौकटीत काम करतो आणि समोर अदृश्य अशा चौथ्या भिंतीच्या पल्याड प्रेक्षक असतात. जेव्हा काम करता करता अभिनेता थेट ही चौथी भिंत फोडून प्रेक्षकांशीच बोलू लागतो, तेव्हा त्याला म्हणतात ‘ब्रेकिंग द फोर्थ वॉल’. या तंत्राचा वापर अनेक चित्रपटांमध्ये केल्याचे तुम्ही पाहिले असेल. ‘हाऊस ऑफ कार्ड्स’मध्ये फ्रँक अंडरवूड (केव्हिन स्पॅसी) याच माध्यमातून सातत्याने आपल्याशी संवाद साधत असतो. तेच तंत्र इथेही वापरलेय. अक्षय खन्ना, संजय बारूंच्या रूपाने आपल्याशी सतत बोलत असतो, पात्रांच्या ओळखी करून देत असतो, राजकीय घडामोडी उलगडून सांगत असतो. थोडक्यात सगळ्याच गोष्टी, व्यक्ती, घटनांबद्दल त्याचं मत देत असतो. अर्थात, हे मत संजय बारूंचं किती आणि दिग्दर्शकाचं स्वतःचं किती, हा भाग वेगळा! राजकीय विषय असल्यामुळेच मी वर मुद्दामहून ‘एचओसी’चा उल्लेख केलाय. त्यात फ्रँक अंडरवूड आपल्याशी संवाद साधण्याचे प्रसंग खूप कमी येतात हे एक, दुसरे म्हणजे ते एकतर अचानक तरी येतात किंवा प्रचंड उपहासात्मक तरी येतात. त्यातील वाक्येसुद्धा विशेष असतात. इथे मात्र ते प्रसंग खूप वेळा येतात आणि ते प्रत्येकवेळी इंटरेस्टिंग असतीलच असे नाही. काही काही वेळा तर दिसत असते की सिनेमाची लांबी फार वाढू नये म्हणून संजय बारूंच्या तोंडून घटना सांगितली जातेय. याचा तोटा हा झालाय की, सिनेमा हा बरेचदा टिव्हीवरचा डॉक्युड्रामा वाटू लागतो आणि आपण ‘पंतप्रधान’ अथवा तत्सम कार्यक्रमाचा एखादा एपिसोड पाहातोय की काय, असे वाटू लागते.

    राजकीय विषयांवर चित्रपट करताना दोन मार्ग असतात. एक म्हणजे जे दाखवायचे आहे ते पूर्ण आत्मविश्वासाने, सगळ्या गुंत्याला तसेच ठेवून दाखवावे व प्रेक्षक हुशार आहेत यावर विश्वास ठेवावा; अथवा सारे काही उलगडून, सोपे करून चमच्याने भरवत राहावे. खरं तर राजकीयच कशाला, प्रत्येक सिनेमासाठी हेच दोन मार्ग असतात, त्यातला कोणता, कधी आणि कुठे वापरायचा यालाच चांगल्या लेखक, दिग्दर्शकांचं तारतम्य म्हणतात. या चित्रपटात दोन्हीही मार्ग वापरलेयत पण त्यांचे गणित काहीसे चुकल्यामुळे चित्रपटाचा एकजिनसीपणा कमी झालाय. काही गोष्टी फारच थेटपणे दाखवल्यायत तर काही खूपच संयतपणे. त्यामुळे दोन्ही प्रकारचे प्रेक्षक खुश न होता पटकथेच्या पातळीवर गोंधळ तेवढा उरतो. गंमत म्हणजे, तरीही चित्रपट प्रचंड एंजॉयेबल राहातो. दिग्दर्शकाने विषय हलक्या-फुलक्या, काहीश्या विनोदी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय. काही ठिकाणी ही गोष्ट कमालीची भारी जमलीये तर काही ठिकाणी कमालीची चुकलीये.

    सिनेमा ज्या स्फोटक बिंदूवर सुरू होतो, तिथून पुढे एकामागोमाग एक धमाके होत जातील असं वाटतं. परंतु लवकरच तो असा काही ढीला पडतो की आपण केवळ त्या काळाबद्दलचा एखादा माहितीपट पाहातोय की काय, अशी शंका येऊ लागते. परत काही ठिकाणी स्फोटकता निर्माण होते आणि परत काही ठिकाणी ती ढेपाळते. पटकथेतला हा विस्कळीतपणा पार्श्वसंगीतातही जाणवतो. चित्रपटाचे वैशिष्ट्य असे की, त्यात अतिशय धीटपणाने खरी नावे वापरलीयेत, अगदी खलनायक म्हणून चितारलेल्या व्यक्तींचीसुद्धा. परंतु नावांच्या पलिकडे जाऊन सगळ्यांच गोष्टी उघड बोलणे कदाचित भारतीय परिप्रेक्ष्यात चालणार नाही किंवा इतर अडचणी (ज्या तरीही आल्याच!) येतील की काय असा विचार करून चाचरत चित्रपट बनवल्यासारखे मध्येच वाटून जाते. जर हे असेच झाले असेल, तर पटकथेच्या विस्कळीतपणाचे आणि चित्रपट पुरेसा नाट्यमय नसल्याचे खरे मूळ तिथे असू शकते. चित्रपट बनवायचाच आहे तर मग दिग्दर्शकाने बिनधास्त त्याचे म्हणणे तरी मांडायचे होते. ते बरोबर की चूक हा विषय वेगळा. उलट बोटचेप्या धोरणामुळे चित्रपट धीट राजकीयपट न राहाता फक्त बोटे दाखवून निर्देश करणारा प्रोपेगेण्डा होऊन राहातो. अर्थात, तेच जर दिग्दर्शकाला अपेक्षित असेल, तर मात्र गोष्ट वेगळी. मनमोहनसिंहांचा सबंध कार्यकाळ दाखवण्यापेक्षा सिनेमा जर एखाद्या विशिष्ट घटनेभोवतीच उभारला असता, तर चित्रपट कदाचित नेमका व चांगला होऊ शकला असता असे वाटते. तसे होण्यासाठी खूप घटनासुद्धा आहेत चित्रपटात. परंतु दहा वर्षांचा काळ दाखवण्याच्या नादात चित्रपट त्या प्रत्येक घटनेला फक्त खो देऊन पुढे सरकतो.

    अनुपम खेर यांनी केलेल्या मनमोहनसिंहांच्या भूमिकेबद्दल बरेच लिहिले बोलले गेले. त्यांनी काम उत्तमच केले आहे. परंतु त्यांना वेशभूषा आणि रंगभूषेचा प्रचंड आधार आहे. याउलट दोन्हीतले काहीच बाजूने नसतानाही, किंबहूना ती व्यक्ती किमान दिसते कशी हे देखील बहुतांशी जणांना माहिती नसतानाही, अक्षय खन्नाने उभे केलेले संजय बारू हे काहीच्या काही अप्रतिम वाटतात. इतर मुख्य पात्रांप्रमाणेच हेही पात्र काहीसे अंडर-रिटनच. तरीदेखील अक्षय खन्नाने वेगवेगळ्या मार्गाने त्यात अक्षरशः जीव ओतलाय. चित्रपट जरी मनमोहनसिंह आणि म्हणूनच अनुपम खेरबाबतीत असल्याचे प्रथमदर्शनी वाटले, तरीही त्याचा खरा नायक संजय बारू हे पात्रच आहे. अक्षय खन्नाने अक्षरशः खाऊन टाकलाय हा चित्रपट. मला या अभिनेत्याचे प्रचंड कौतुक वाटते. तुम्ही अक्षय खन्नाच्या कोणत्याही चित्रपटाला वाईट म्हणू शकता, परंतु कोणत्याही चित्रपटात अक्षय खन्नाला वाईट म्हणू शकत नाहीत. इतका हा कमाल अभिनेता इंडस्ट्रीला काही कारणामुळे सहन झाला नाही की तोच थोडासा अकडू होता कोण जाणे, परंतु दुर्दैवाने त्याचा उमेदीचा काळ सरल्यावरच आपल्याला त्याची किंमत कळू लागलीये. फक्त दोनच तास चालणारा असूनही ‘टिएपीएम’ खूप ठिकाणी रटाळ होतो परंतु अक्षय खन्नाने त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या समर्थ खांद्यावर चित्रपटाला अलगदपणे उचलून पुढे नेलेय. त्या मानाने अनुपम खेरना परोक्ष नायक रंगवायचा असल्यामुळे तितकासा वावच नाहीये. पण जो आहे, त्यात त्यांनीही मजा आणलीये. या दोघांच्या खालोखाल मी अभिनेता म्हणून अजून एका व्यक्तीचे नाव घेईन, तो म्हणजे विपिन शर्मा. बाकी काही अपवाद वगळता बहुतांश पात्रांना त्या त्या व्यक्तीची सहीसही नक्कल वाटण्यापलिकडे काहीही काम व अर्थ नाही!

    या चित्रपटात प्रोपेगेण्डा आहे का? आहेच! पण प्रोपेगेण्डा आहे, एवढ्या एकाच कारणासाठी काही माध्यमं त्याला टाकाऊ म्हणतायत ते बरोबर वाटत नाही. प्रोपेगेण्डाच्या पलिकडेही हा चित्रपट त्याच्या काही गुणांमुळे चांगला आहे आणि काही दोषांमुळे वाईट आहे. एक उदाहरण सांगतो. नुकतेच ‘गल्ली बॉय’ चित्रपटाचे ट्रेलर रिलिज झाले. सामान्य प्रेक्षकांना चटकन कळणारही नाही इतका बेमालूम प्रोपेगेण्डा ठासून भरलाय त्यात. म्हणून काही त्याला टाकाऊ थोडीच म्हणतील? किमान मेनस्ट्रीम मिडिया तरी नाही म्हणणार, किंबहूना त्यात काही प्रोपेगेण्डा असल्याचा उल्लेखही कुणी तथाकथित विचारवंत नाही करणार. प्रोपेगेण्डाचं असंच असतं ना, तो आपल्या लोकांनी केला तर चांगला आणि विरोधातल्या लोकांनी केला तर वाईट असतो. तसंच याही चित्रपटाचं आहे. काँग्रेसविरोधी विचारधारा ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चे सगळे दोष झाकून त्याचा उदोउदो करतील तर भाजपविरोधी विचारधारा त्याचे सगळे गुण झाकून त्याला कचरा म्हणतील. प्रत्येकाची काही ना काही राजकीय विवशता आहे त्यात, एवढेच. लोकशाहीची हीच तर खूबी आहे! याउप्पर आपापल्या विचारधारांच्या पलिकडे जाऊन प्रेक्षक म्हणून जर ‘टिएपीएम’ पाहावासा वाटला, तर अवश्य पाहावा आणि समजा त्यावर बहिष्कार घालावासा वाटला तर बहिष्कार घालावा, आपल्याला दोन्हींचेही स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य, ही सुद्धा लोकशाहीचीच तर खूबी आहे!

    *३/५

    — © विक्रम श्रीराम एडके.

    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • गावाकडचे जॅझ – महेशिण्टे प्रतिकारम

    तुमच्याकडे नोकरी, व्यवसाय, शिक्षण वगैरेपैकी काहीतरी एक असतं. चार लोकांत तुमचं काहीतरी अस्तित्व असतं. तुमची लव्हलाईफ फार भारी नसते, पण जे आहे ते आपलं म्हणून तुम्ही त्याचा मनापासून स्वीकार केलेला असतो. थोडक्यात सारं काही छान चाललेलं असतं. संथ वाहाणाऱ्या कृष्णामाईसारखं. पण एक दिवस असा येतो की तुमची प्रतिष्ठा, अब्रू, तुमचं प्रेम सारं सारं काही एका क्षणात हिरावून घेतलं जातं. होत्याचं नव्हतं होतं. बरं झालेली गोष्टदेखील इतकी सहजपणे झालेली असते की, आपल्यावर फार मोठा अन्याय झालाय असं बोंबलायला जागाच नसते. गेलेली अब्रू परत मिळवण्यासाठी आपण जीवतोड प्रयत्न करतो. कारण, तेवढंच आपल्या हातात असतं. पण हरवलेलं प्रेम कुठून परत मिळणार? तुम्ही गेलाय कधी या परिस्थितीतून? मी तरी गेलोय. मोठाच उद्ध्वस्त काळ असतो तो. वर्षानुवर्षे ज्या व्यक्तीपलिकडे कधी विचारच केलेला नसतो आणि जिच्यावर आपल्या स्वतःपेक्षाही जास्त विश्वास दाखवलेला असतो, त्या व्यक्तीने एका क्षुल्लक, क्षुद्र स्वार्थापायी आपल्याला लाथाडून निघून जावं? का? इतके फालतू असतो आपण खरंच? लाख प्रश्नांचं काहूर माजतं आणि डोकं फुटेस्तोवर विचार केला, पार रात्रीच्या रात्री जागून काढल्या तरी उत्तर मात्र एकही मिळत नाही. कारण, उत्तर असतं काळ. तो जसं क्षणात होत्याचं नव्हतं करतो, तसंच हळूहळू आपल्याकडे होतं त्यापेक्षाही सुंदर आयुष्य आपल्याला देतो. माणूस म्हणून पार बदलूनच टाकतो तो आपल्याला. आपल्यातली निरागसता दगडाने ठेचून टाकतो आणि आपल्या भूतकाळातील स्वरूपाच्या काही हलक्या निशाण्या तेवढ्या मागे ठेवतो. यालाच परिपक्व होणे म्हणतात. मग खरं प्रेम काय असतं ते उलगडतं, एखादा पूर्वी कधीच नसलेला छंद गवसतो, करिअरची एखादी वेगळीच वाट सापडते. मग मागे वळून पाहाताना आपल्यालाच कळतं की, परमेश्वर ज्यावेळी आपल्याकडून काहीतरी हिसकावून घेत होता आणि आपण विरोध करून स्वतःलाच त्रास करून घेत होतो, त्यावेळी खरं तर तो आपल्याकडचं बिनकामाचं खेळणं काढून घेत होता, त्याहून मोठं आणि अधिक सुंदर काहीतरी देण्यासाठी!!

    नाही, मी माझ्या आयुष्याचे चिंतन मांडत नाहीये तुमच्यासमोर. म्हणजे हे तुमच्या-माझ्या आयुष्याचे चिंतन तर आहेच, पण त्यापेक्षा जास्त ही आहे दिलीश पोदनच्या “महेशिण्टे प्रतिकारम”ची (२०१६) मूळ कल्पना. अगदी तुमच्या आमच्या आयुष्यातली संकल्पना वाटते ना ही? वाटणारच, कारण मुळातच ती केरळमधील आलप्पुळा जिल्ह्यातील तुरावूरमध्ये घडलेली सत्यकथा आहे. “महेशिण्टे प्रतिकारम” म्हणजे “महेशचा प्रतिकार” अर्थात महेशने केलेला प्रतिकार अथवा महेशने घेतलेला सूड. महेश (फ़हाद फ़ासिल) हा इडुक्की जिल्ह्यातील एका रमणीय खेड्यात राहाणारा एक साधासरळ छायाचित्रकार. तो म्हाताऱ्या वडलांचा सांभाळ करतो आणि गावातील सण-समारंभांची छायाचित्रे काढून गुजराण करतो. त्याचे आणि सौम्याचे (अनुश्री) लहानपणापासूनच एकमेकांवर प्रेम आहे. महेशला गावात मान आहे. छान, मस्त आयुष्य चालले आहे त्याचे. एकेदिवशी तो सहज गावात घडणारे एक भांडण सोडवायला जातो आणि ते लोक याच्यावरच राग काढतात. बेदम मारतात ते त्याला. याच दरम्यान त्याचे प्रेमही त्याच्यापासून दूर जाते. मार खाल्लेला, अपमानित, जखमी महेश तिरीमिरीत प्रतिज्ञा करतो की, जोपर्यंत मी मला मारणाऱ्याचा सूड उगवणार नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही. पुढे काय होतं, याची दिल खुश करून टाकणारी गोष्ट म्हणजे हा चित्रपट!!

    “महेशिण्टे प्रतिकारम”ची सगळ्यांत जमेची बाजू ही की, ही कथा एका लहानश्या खेडेगावात घडते. त्यामुळे गावकऱ्यांचा इरसालपणा दाखवायला यात पुरेपूर जागा आहे आणि ती तितक्याच ताकदीने वापरून घेतल्यामुळे सबंध चित्रपटभर एक नर्मविनोदाची पखरण झालीये. याबाबतीत दिग्दर्शक दिलीश पोदनपेक्षाही लेखक श्याम पुष्करन ज्यांना या चित्रपटाच्या लेखनासाठी राष्ट्रपती पारितोषिक मिळालेय, त्यांची भूमिका जास्त महत्त्वाची आहे. कुठेही संयतपणा न सोडता, चित्रपट-माध्यमाच्या समग्र कलात्मकतेशी प्रामाणिक राहूनदेखील एक खुसखुशीत मनोरंजक कलाकृती बनवता येऊ शकते, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे “महेशिण्टे प्रतिकारम”. किंबहूना समस्त मलयाळम इंडस्ट्रीकडूनच ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. चित्रपटात बेबीचेट्टा (अॅलेन्शिए लोपेझ), क्रिस्पिन (सौबिन शाहिर), व्हिन्सेंट भावना (के. एल. अँटनी कोची) अश्या दुय्यम भूमिकादेखील इतक्या चपखल विणल्या आहेत की, त्यामुळे सबंध चित्रटपटालाच एक कलात्मक रेखीवता प्राप्त होते.

    एका माणसाबद्दल न बोलणे अपराधच नव्हे तर अक्षरशः पाप ठरेल. तो माणूस म्हणजे महेशची भूमिका केलेला फ़हाद फ़ासिल. त्याने एवढे सुंदर, एवढे चांगले, एवढे जबरदस्त, एवढे संयत, एवढे सुरेख, एवढे कमाल, एवढे भारी काम केलेय की विचारता सोय नाही. पूर्वी हा माणूस मला अभिनेता म्हणून नुसताच आवडायचा. पण या चित्रपटापासून मात्र मी अक्षरशः फॅन झालोय त्याचा. काही काही प्रसंगी त्याने केलेला अभिनय असा काही बिनतोड आहे की, ते फक्त तोच करू शकतो. लग्नाच्या दिवशी तो दुरूनच सौम्याकडे ज्या नजरेने पाहातो; ती नजर, त्यातली हतबलता आणि तरीही तिच्यातील मनापासून चिंतलेली शुभेच्छा अक्षरशः काळीज कापत जाते. किंवा जिम्सनचा गळा आवळताना जो कर्तव्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर असतो, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. आपल्याकडे जरा बरं काम केलं की, अभिनेत्यांना गगन ठेंगणे होते. पण ते सारेच बच्चे वाटावे असे एक एक अभिनयसम्राट दक्षिणेत आहेत. त्यांचं काम पाहिलं की, आपल्याकडच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या तथाकथित अभिनेत्यांवर हसू आल्याशिवाय राहावत नाही. नायकाला साजेशी पिळदार शरीरयष्टी नसताना, तिशीतच केसांची पीछेहाट झालेली असतानाही या दिसायला सामान्य फ़हाद फ़ासिलने जे काम केलेय, ते आपल्याकडच्या भल्याभल्यांना जमणारे नाही. दुर्दैवी आहे, परंतु सत्य आहे हे. आणि हे सत्य मान्य केलं तरच त्यावर उपाय काढता येणार आहेत.

    बिजिबालचे संगीत अतिशय सुरेख झालेय. विशेषतः “इडुक्की” आणि “मौनंगळ” ही गाणी. आपल्याकडे इतकी सुरेख गाणी का होत नाही, याची राहून राहून खंत वाटते. चित्रपटात मला जाणवलेली एकमेव त्रुटी म्हणजे तो मूळ विषयाकडे यायला फारच वेळ लावतो. दोन तासांच्या चित्रपटापैकी पहिला जवळ जवळ एक तास हा पात्रपरिपोष आणि वातावरणनिर्मितीसाठी घालवलाय. म्हटलं तर ही चांगली गोष्ट आहे आणि म्हटलं तर वाईट. कारण, सबंध चित्रपटच सुशेगात आहे. त्याचा धीमेपणानेच आस्वाद घ्यायचाय. जॅझ संगीतासारखा. किंवा अधिक मुद्देसूद बोलायचं झालं, तर “महेशिण्टे प्रतिकारम” हा चित्रपटच निसर्गरम्य केरळमधील गावाकडचे जॅझ आहे. रेंगाळणारे, संपल्यावरही चव ठेवून जाणारे आणि पुन्हापुन्हा आठवणी काढायला लावणारे. अगदी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे परमेश्वर आपल्याकडून एक गोष्ट हिसकावून घेतो ते दुसरी त्याहून चांगली गोष्ट देण्यासाठीच. “महेशिण्टे प्रतिकारम”मध्ये ही बाब अतिशय कलात्मक ढंगाने आणि तरीही रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमधून सहजगत्या चितारलीये. कशी, ते चित्रपटात पाहूनच समजून घ्यावे. चुकूनही चुकवू नये असा गोड अनुभव आहे हा!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके

    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • क्रिएटिविटी की बूँदें

    परेशानियाँ बो के जब उधेड़ोगे नीन्दें,
    तब जा कर बरसती है दो-चार क्रिएटिविटी की बूँदें!
    टप्प कर के गिरती है कुछ,
    और कुछ कँकर सी सटाक लगती है,
    अाधे जल रहे दिल से लग के भाँप भी बन जाती है कोई!
    एक-आध बच भी जाती है कुछ,
    तो वह भी हम मोबाईल, लैपटाप या टिवी के पराश्राव्य शोर से मार देते है!
    और फिरते रहते है भौकाल बन के बाकी बचा कुछ-एक हज़ारवाँ भाग सहलाते हुए!
    कि देखो, मैं ने कितना ऑफबीट कर दिया यह!
    अरे भाई, देने वाले ने क्या दिया था, तू ने कितना लिया है!
    छप्पर तो खैर फटा ही था, तू ने झोला भी तो फाड दिया है!!
    न रिऐलिटी के रहे, न मटेरिऐलिटी के रहे,
    इन्सानियत के चक्कर में हम तो बस इन्सैनिटी के रहे!
    आगे है फिर वही डिप्रैशन फिर वही अवसाद,
    वहीं रोज़ परेशानियाँ बोना वहीं नीन्दें उजाड!
    सह सह के गुबार भर आता है कभी,
    तब फिर से होती है दो बूँद क्रिएटिविटी की बरसात!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [www.vikramedke.com]

  • नाव राखणारा अद्वितीय थरारपट : राक्षसन (रात्ससन)

    अरुणकुमार (विष्णु विशाल) हा एक होतकरू चित्रपटकार आहे. अतिशय चिकाटीने, खूप सारं संशोधन करून त्याने एक संहितासुद्धा लिहिली आहे. अनेक निर्मात्यांना तो ती ऐकवतो. हाती काय लागतं? कोणत्याही स्ट्रगलरच्या हाती जे सुरुवातीची अनेक वर्षं लागतं तेच, बिनपैश्यांचा तरीही अमूल्य असा अनुभव! कुणीच त्याच्या कथेवर पैसा लावायला तयार होत नाही. हा दुसरे काहीच काम करत नाही, काहीच कमवत नाही त्यामुळे त्याची बहिण (विनोदिनी) आणि भावोजींची (रामदास) सतत भुणभुण चाललेली. अरुणचे वडील पोलिसांत होते. भावोजीही पोलिसच. त्यामुळे साहजिकच अरुणनेही पोलिस व्हावे हा सगळ्यांचा लकडा. शेवटी स्ट्रगल करून करून थकलेला अरुण त्याच्या मनाविरुद्ध पोलिस भरतीच्या परीक्षा देतो आणि उत्तीर्ण होऊन पोलिस खात्यात रुजूसुद्धा होतो. हा सगळा घटनाक्रम घडत असतानाच शहरात एक विचित्र खूनसत्र सुरू होतं. अरुण त्यात साहजिकपणे ओढला जातो. पुढे काय होतं याची थरारक हा शब्दही अपुरा वाटेल अशी भयचकित करणारी अविश्वसनीय कथा, नव्हे नव्हे थरारपट कसा असावा याचा अप्रतिम नमुना म्हणजे ‘राक्षसन’!

    वरवर पाहायला गेलं तर ‘राक्षसन’चा परिसर अतिशय प्रेडिक्टेबल आहे. त्या अनुषंगाने काही घटनासुद्धा सहज ओळखता येतात. पण हे प्रमाण किती आहे, तर अगदी दहा-पाच टक्केही नसेल. मुळात हा पोलिसपट वाटावा अशी त्याची बाह्य आखणी आहे. परंतु हा थेटपणे पोलिसपट नाही. पोलिसपटांमध्ये हिरोसाठी त्याचा गणवेश, त्यापाठोपाठ येणारी कर्तव्याची भावना आणि आपसूकच येणारे नायकत्व सर्वोपरी असते. इथे अरुणमध्ये मुळातच तितके हिरोईझम नाही. तो तर अनिच्छेने पोलिस झालेला एक रिलक्टंट-हिरो आहे. आणि विश्वास ठेवा, रिलक्टंट-हिरो हे या चित्रपटासाठी नुसते कथाकथनाचे एक तंत्र नाही, तर या कमालीच्या घट्ट विणलेल्या कथेचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि केवळ अरुणच नव्हे, तर यातील बहुतांश पात्रे, त्यांचा स्वभाव, त्यांचे व्यवसाय या गोष्टी कथेसाठी अत्यावश्यक ठराव्यात इतक्या चपखलपणे गुंफलेल्या आहेत. कथा-पटकथा कशी लिहावी याचा वस्तुपाठ म्हणावा असाच आहे हा चित्रपट. कित्येकदा गोष्टी आपल्या नजरेसमोर लपवलेल्या असतात, परंतु दिग्दर्शक दाखवेपर्यंत त्यांचा संदर्भच लागत नाही; या चांगल्या रहस्यपटाच्या निकषावर हा सिनेमा खरा उतरतो. कित्येक प्रसंगांमध्ये अतिशय संयत फोरशॅडोईंग केलीये, जी योग्य वेळीच उलगडते. आणि तशी ती उलगडताना अनुभवण्याचा स्वतंत्र असा आनंद आहे. स्पून-फिडींग अगदी कमीत कमी आणि तरीही मनोरंजनाची हमी, हा हिंदी-मराठीमध्ये क्वचितच कुणाला साधणारा समतोल या चित्रपटाला बरोब्बर साधलाय.

    पण म्हणून हा चित्रपट फक्त बुद्धीचा खेळ आहे का? मी हा चित्रपट घरी पाहिला. प्रदर्शित झाला तेव्हा कसा कोण जाणे, पण राहून गेला होता माझ्याकडून. पण जवळजवळ अडिच तासांचा हा चित्रपट पाहाताना पहिल्या वीस-एक मिनिटांतच मी बायकोला म्हणालो की, ‘बंद करुया का?’ इतका प्रचंड अस्वस्थ झालो होतो मी. राग, भिती, काळजी, हतबलता, करुणा, घृणा, किळस या आणि अशा कित्येक भावना शतपटींनी अधिक तीव्रपणे भासायला लावण्याची अजब ताकद आहे या चित्रपटात. घरी, छोट्या पडद्यावर पाहाताना माझं असं झालं तर प्रत्यक्ष चित्रपटगृहात पाहाणाऱ्यांची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाच केलेली बरी. चित्रपट त्याची ही आत्यंतिक भावोत्कटता अगदी शेवटपर्यंत सोडत नाही. अमला पॉल वगैरे सगळ्यांनीच चांगली कामे केली आहेत. परंतु विनोद सागर या अभिनेत्याने मात्र अक्षरशः कमालच केली आहे. गिब्रनचे संगीत हे नेहमीप्रमाणेच जेवढ्यास तेवढे आणि कथेला पूरक आहे.

    अतिशय धीटपणे लिहिलेला आणि तरीही शैलीदारपणे मांडलेला हा चित्रपट थरारपट किंवा रहस्यपट म्हणवण्याच्या दृष्टीने मात्र किंचित मोठा आहे. मी हे जे बोलतोय, ते आजकालच्या संयमशून्य आणि एकाग्रताविरहीत पिढीच्या संदर्भात. प्रत्यक्षात तीन-साडेतीन तासांचे चित्रपटही चवीने पाहाणारी माणसं आपण. परंतु असे चित्रपट अगदी नेमके तेवढेच मांडणारे असावेत, असं म्हणतात. कदाचित लेखक-दिग्दर्शक रामकुमारही याच विचाराला बळी पडला असावा. कारण प्रचंड स्मार्ट, तपशीलवार तरीही रहस्याच्या चाव्या राखून असलेला हा चित्रपट जसजसा शेवटाकडे येतो तसतसा किंचित घाई करू लागतो. त्याचं तर्कशास्त्र क्वचित गडबडू लागतं. परिणामतः उत्कर्षबिंदूत जेवढी मजा यायला हवी तेवढी ती येतच नाही. अर्थात, त्यातही जे काही घडतं ते हल्लीच्या भल्याभल्या चित्रपटांच्या कल्पनेच्याही पलिकडचं आहे. परंतु तरीही अजून पाच-दहा मिनिटे इकडे-तिकडे झाली असती, तर पोट पूर्ण भरलं असतं एवढंच!

    पण तरीही खात्रीने सांगतो की, हा छोट्या बजेटचा आणि फारशी प्रसिद्ध स्टारकास्ट नसलेला तमिळ चित्रपट यावर्षीच्या सर्वश्रेष्ठ चित्रपटांपैकी आहे. किंबहूना आपल्याकडच्या सर्वोत्तम थरारपटांच्या यादीत याला पुढची अनेक वर्षे कुठे ना कुठे स्थान द्यावेच लागेल असा आहे. असा चित्रपट आपल्याकडे का बनत नाही, याची मनापासून खंत वाटते हा चित्रपट पाहाताना. राक्षस हा शब्द जरी आपण वाईट अर्थाने वापरत असलो, तरी त्याचा खरा अर्थ होतो राखणारा! आणि खरोखरच हा चित्रपट प्रयोगशील तरीही मनोरंजक अशा तमिळ चित्रपटसृष्टीचे नाव बरोब्बर राखणारा आहे. या जॉनरचेच नव्हे, तर एकूणच चित्रपट माध्यमाचे चाहते असाल, तर चुकूनही चुकवू नका हा ‘राक्षसन’!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • रुचकर तरीही अपुरा – सीताकाती

    जयन्ति ते सुकृतिना: रससिद्धा: कवीश्वरा: ।
    नास्ति येषां यश:काये जरामरणजं भयम् ।।
    कला म्हातारी होत नाही, किंबहूना कला कधीच मरत नाही. ती अजर असते, अमर असते. हे आपण नेहमीच तात्त्विक रूपाने आसपास पाहातो, अनुभवतो. असेच अय्या आदिमूलम (विजय सेतुपती) हे रंगमंचावरील निष्णात अभिनेते आणि दिग्दर्शक. वयाच्या दहाव्या वर्षापासून हा माणूस रंगमंचालाच सर्वस्व मानून वावरतोय. त्यांच्या अभिनयपटूतेला पाहून अनेक नावाजलेल्या चित्रपट दिग्दर्शकांनी त्यांना सिनेमाची ऑफर दिली, परंतु त्या साऱ्या धुडकावून त्यांनी फक्त आणि फक्त रंगभूमीची सेवा केली आजवर. आता काळ बदललाय. लोकांना जिवंत रंगभूमीपेक्षा रंगीबेरंगी चित्रपट जास्त भुरळ घालू लागलेयत. रंगमंच ओस पडू लागलेयत. तरुणाई त्याकडे पाठ फिरवू लागलीये. जसजसा जनप्रवाह आटत चाललाय, तसतसे अय्यांच्या समोर असलेले आर्थिक प्रश्न रौद्ररूप धारण करू लागलेयत. अय्यांचं वय ७३ आहे. ते थकलेयत, काहीसे हरलेयत. पण रंगभूमीवर असलेलं त्यांचं अपरंपार प्रेम अणुमात्रही उणावलेलं नाहीये. गोष्टी आकार घेता घेताच त्यांचा रोख बदलतो आणि सबंध चित्रपटच कल्पनाविलासाच्या, फँटसीच्या अद्भुत विश्वात शिरकाव करतो.

    चित्रपटात वापरलेला फँटसीचा घटक सहजी पटण्यासारखा नाही. परंतु प्रत्येक सिनेमाचे स्वतःचे असे एक विश्व असते. त्याचे त्याच्यापुरते काही नियमही असतात. आपल्या जगाचे नियम त्याला लागत नाहीत, किंबहूना ते लावूही नयेत. लेखक-दिग्दर्शक बालाजी धरणीधरनने पटकथेत उभारलेल्या विश्वात ती गोष्ट किंचितश्या संघर्षानंतर का होईना, पटते. आणि अतिशय शोकांत मार्गाला जाणारा चित्रपट अचानकच विनोदाची नाव पकडून झुलू लागतो! आणि विनोदही कसा, तर अतिशय नैसर्गिक; कोणताही छल न करता सहजसाध्या परिस्थितीतून उद्भवणारा. इतका निखळ की त्या परिस्थितीत दुसरं काही संभवतच नाही, असंच दिग्दर्शक आपल्याला वाटायला लावतो. हळूहळू ही विनोदाची गाडी प्रहसनाच्या राज्यात शिरते. इथे दिग्दर्शक विनोदाच्याच अंगाने कला आणि तिच्याशी संबंधित खूप साऱ्या गोष्टींवर भाष्य करतो.

    थोडक्यात सांगायला गेलं, तर ‘सीताकाती’चे तीन भाग पडतात. शोकांतिका, कल्पनाविलासात्मक विनोद, आणि प्रहसन. तिन्हीही भाग वेगवेगळे पाहिले तर ते अतिशय प्रभावी झाले आहेत. परंतु हे तीन भाग जेव्हा एकच चित्रपट म्हणून गुंफले जातात, तेव्हा ते एका मर्यादेपलिकडे प्रभाव पाडत नाहीत. विशेषतः शेवटचा भाग. १७३ मिनिटे, असा भलामोठा काळ चालणारा चित्रपट, पण तरीही त्याचा शेवट उरकून घेतल्यासारखा वाटतो. शिवाय पहिला जवळजवळ पाऊण तास आपल्याला अय्यांची मनोभूमिका सांगण्यासाठी दिलाय, परंतु नंतर मात्र त्या फँटसी घटकाचे विचार, मन:स्थिती, तिची बाजू यांपैकी काहीही समोर येत नाही. चित्रपट हा माणसांच्या नजरेतून पाहात असल्यामुळे हा मार्ग तर्कशुद्ध वाटतोही, परंतु याच मार्गामुळे चित्रपट अपूर्णही वाटतो. दुसरे असे की ‘सीताकाती’मध्ये अय्यांची भूमिकाच नसलेले चित्रपट त्यांच्या नावावर विकण्याचा निषेध केलाय. प्रत्यक्षात ‘सीताकाती’मध्येच विजय सेतुपतीची भूमिका एक्स्टेंडेड कॅमिओ म्हणता येईल एवढ्याच लांबीची आहे आणि तरीही पोस्टर्सवर त्यालाच मुख्य स्थान आहे. थोडक्यात, ज्या गोष्टीचा चित्रपटात निषेध केलाय, तीच गोष्ट अगदी किंचित प्रमाणात का होईना या चित्रपटाने सुद्धा केलीये. चित्रपटाचे छायांकन, संपादन अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आहे. परंतु तरीही काही काही दृश्यांची लांबी अतिशय खटकत राहाते. चित्रपटाच्या पूर्वार्धात एक अतिशय विनोदी प्रसंग येतो. उत्तरार्धातही बरोब्बर त्याच प्रकारचा एक प्रसंग आहे. दोन्हीतील कलाकार वेगळे, अभिनय वेगळा; पण तरीही पुनरावृत्तीचा दोष आल्याशिवाय राहात नाही. हे टाळता आले असते. विशेषतः इतकी वेगळी, जबरदस्त आणि अविश्वसनीय संकल्पना असताना, हाताशी श्रेष्ठतम कलाकार आणि तंत्रज्ञ असताना, लेखनावर जास्त मेहनत घेणे फारच गरजेचे होते. ती नाही घेतली तर चित्रपटाचा ‘षमिताभ’ होऊ लागतो.

    मी वर म्हटलंय की विजय सेतुपतीचा चित्रपटात एक्स्टेंडेड कॅमिओ असल्यासारखा वाटतो. याचा अर्थ असा बिलकुल नाही बरं का की तो वाईट आहे. उलट आपल्या पंचविसाव्या चित्रपटात त्याने केलेली भूमिका ही खचितच अविस्मरणीय आहे. या माणसाच्या एवढा जबरदस्त कारकीर्दीचा आलेख मी अलिकडच्या काळात कुणाचाच पाहिलेला नाही. वयाच्या पस्तिशीनंतर त्याने सुरुवात केली आणि एकामागोमाग एक वेगळ्या वाटेवरचे चित्रपट करत तो अल्पावधीतच शिखरावर जाऊन पोहोचला. आणि तरीही, तरीही तो प्रत्येक चित्रपटात त्याच्या आधीच्या चित्रपटातील अभिनयापेक्षा दोन पावले पुढेच जातोय! त्याच्या या वर्षीच्याच भूमिकांचे वैविध्य पाहा. ‘९६’मध्ये पहिल्या प्रेमासाठी सर्वस्व अर्पिलेला राम, ‘सीसीव्ही’मध्ये दारुडा व काहीसा भ्रष्ट पोलिस अधिकारी रसूल आणि यात ७३ वर्षांचा रंगकर्मी अय्या! केवढे वैविध्य आणि तरीही प्रत्येक भूमिका तितकीच ताकदीने वठवलेली. या चित्रपटात अय्यांची विविध नाटके दाखवताना एका नाटकात त्यांनी औरंगज़ेबची भूमिका केलेली दाखवलीये. तब्बल ८-१० मिनिटांचा प्रसंग आहे तो. आणि त्या प्रसंगाचं वैशिष्ट्य सांगू? सबंध प्रसंग एकाच शॉटमध्ये केलाय! या प्रसंगात कॅमेरा जेवढा उत्कृष्ट हालचाली करतो, त्याहूनही अनेकपटींनी उत्कृष्ट काम केलेय विजय सेतुपतीने. हा प्रसंग इतक्या प्रचंड ताकदीने करू शकणारे अक्षरशः हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक असतील सध्याच्या आघाडीच्या नायकांमध्ये! हा प्रसंग खरोखरच कोणत्या नाटकातून घेतलाय की काय, मला ठाऊक नाही. परंतु त्यातील एक वाक्य मला फारच आवडून गेलेय. म्हातारपणी एकट्या पडलेल्या औरंगज़ेबसमोर साक्षात संगीत उभे राहाते. तो संगीताशी वाद घालू लागतो. सच्चा मुसलमान असल्याचे दाखले देऊ लागतो. त्यावेळी संगीत त्याला म्हणते, ‘तू इतक्या वेळा स्वतःचा सच्चा मुसलमान म्हणून उल्लेख करतोयस की कधीकधी वाटतं तुझी तुलाच या बाबतीत शंका असावी’! एका वाक्यात सांगायचं झालं तर, प्रॉस्थेटिक्सच्याही पलिकडे जाऊन विजय सेतुपतीने अय्यांना आपल्या अंतरात्म्यात उतरवलंय, इतकं की पडद्यावर एका क्षणासाठीही विजय सेतुपती नसतोच, फक्त आणि फक्त अय्याच असतात! त्याची देहबोली, हावभाव, श्वासोच्छ्वासाचे गणित सारे सारे काही डोळ्यांत कायमचे साठवण्यासारखे झालेय!

    जितकी स्तुती विजय सेतुपतीची करायला हवी तितकीच अजून एका व्यक्तीचीही केली पाहिजे. गोविंद वसंता! हा अत्यंत प्रतिभाशाली संगीतकार, गायक आणि वादक तैक्कुडम ब्रिज ऐकलेल्यांसाठी नवा नाही. परंतु जेव्हापासून त्याने वेगळ्या नावाने संगीत द्यायला सुरुवात केलीये, तेव्हापासून त्याचे आधीच सर्वांगसुरेख असलेले संगीत विलक्षणच होऊ लागलेय. त्याचा ‘९६’ तर माझ्यामते यावर्षीचा सर्वश्रेष्ठ रहमानेतर अल्बम आहे. याही चित्रपटाची गाणी त्याने तितकीच सुरेख आणि कथेच्या मूडला बरोब्बर न्याय देणारी केली आहेत. ती जितकी प्रायोगिक आहेत, तितकीच गोडसुद्धा. त्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तो लिरिक्स चांगलेच असतील, यावर खूप भर देतो आणि त्यामुळे त्याच्या गाण्यांची एकूणच शेल्फ़ व्हॅल्यू अनेकपट वाढते. आजकालच्या बहुतांशी हिंदी, मराठी संगीतकारांनी त्याच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे ही. जवळजवळ तीन तास चालणारा हा चित्रपट जरादेखील कंटाळवाणा वाटत नाही, याचेदेखील महत्त्वाचे कारण म्हणजे याच अवलियाचे अफलातून पार्श्वसंगीत! राजा, रहमान यांचे वैशिष्ट्य म्हणजे ही मंडळी कसाही प्रसंग असला तरी आपल्या पार्श्वसंगीताच्या जोरावर त्याला दैवी उंचीप्रत नेऊन ठेवतात. जर गोविंद वसंताने हेच सातत्य कायम राखले, तर त्याचेही नाव येत्या काही वर्षांत या सूचीत समाविष्ट होऊ शकते, एवढे सुंदर काम केलेय त्याने. विशेषतः विनोदी प्रसंग सारेच परिस्थितीजन्य असल्यामुळे ते खुलवण्यात तर संगीताचा वाटा जास्तच महत्त्वाचा आहे.

    थोडक्यात, ‘सीताकाती’ हा पदार्थ अतिशय रुचकर आहे. परंतु प्रत्येकच घासाला काही ना काही कमी वाटत राहाते. अखेरीस ताटभर खाऊनही जेवण अपुरेच राहिल्यासारखे वाटते. अर्थातच, चित्रपटाच्या काही त्रुटी आहेतच. परंतु त्यांचा हेतू, त्यांची संकल्पना अतिशय उदात्त व नावीन्यपूर्ण आहे. ती पडद्यावर मांडताना किंचित गडबड झालेली असली तरीही विजय सेतुपतीने जे काही केलेय ते अक्षरशः दैवी आहे. आणि आपल्याकडे, विशेषतः हिंदीत असा दैवी अभिनय क्वचितच पाहायला मिळत असल्यामुळे, अभिनय कशाशी खातात हा प्रश्न न पडण्यासाठी तरी त्याचे काम पाहाणे अत्यंत आवश्यक आहे. सिनेमा रंगभूमीचे सामर्थ्य जितक्या ताकदीने अधोरेखित करतो तितक्याच ताकदीने चित्रपट या माध्यमाचेही सामर्थ्य उत्तरार्धात मांडतो. दोन्हीही कलाप्रकार आपापल्या जागी केवढे श्रेष्ठ आणि तरीही एकमेकांपेक्षा वेगळे व समांतर रेषेवरून चालणारे आहेत हे न बोलताच मांडणारा ‘सीताकाती’ हा खरोखर वेगळाच चित्रपट आहे!

    *३/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • अॅक्वामॅन – समतोलाच्या दिशेने

    २००८ साली एमसीयू सुरू झाल्यापासून मार्व्हलने जी एक थीम जशीच्या तशी राखलीये, ती ही की ते त्यांच्या पात्रांना एका मर्यादेपलिकडे अजिबात गंभीरपणे घेत नाहीत. त्यामुळे त्यांचे चित्रपटदेखील हलकेफुलके, सगळे मिळून आनंद लुटू शकतील असे रंगीबेरंगी असतात. एकाचवेळी कॉमिकनर्ड्स आणि सामान्य प्रेक्षक यांना खुश करण्याचे समतोल सूत्रच जणू त्यांनी शोधलेय. याउलट डिसीने त्यांच्या अतिमानवी पात्रांची मानवी बाजू शोधण्यावर जास्त भर दिला. परिणामतः त्यांची पात्रे अधिकाधिक गंभीर, आयुष्यातील कटकटींनी सतावल्यामुळे सतत ओढलेल्या चेहऱ्यांची होत गेली. त्यांच्या रुक्ष जीवनात विनोद मृगजळासारखा झाला. त्यांचे चित्रपटही तितकेच भेसूर होत गेले. एकीकडे मार्व्हलच्या अतरंगी चित्रपटांनी प्रचंड यश पाहिले, तर दुसरीकडे डिसी जास्तीत जास्त श्यामरंगी व टीकेचे धनी होऊ लागले. आणि २०१७ साली ‘वंडर वुमन’ आला! याची २ वैशिष्ट्ये. एक म्हणजे हा चित्रपट स्त्रीकेंद्रीत होता. ही हिंमत मार्व्हलनेही आजवर कधीच दाखवली नव्हती. आणि दुसरे म्हणजे या अफलातून स्त्रीच्या आयुष्यात जरासा का होईना, विनोद होता! त्याच्या पुढच्याच वर्षी आलेला ‘डेडपूल २’ जरी एमसीयूचा भाग नसला, तरी त्यात विनोद, मनोरंजन आणि पात्रपरिपोष सगळ्याचाच समतोल ढळला होता. इथे पारडे झुकू लागले. आपल्या पात्रांचा स्वभाव कायम राखूनही त्यांच्या आयुष्यात किंचित रंग भरण्याची किमया डिसी हळूहळू शिकू लागले होते. या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालाय, डिसीचा ‘अॅक्वामॅन’!

    कथा अगदीच साधी आहे. म्हणजे ‘बाहूबली’ (२०१५-१७) नावाची रुपेरी पडद्यावरील महागाथा जर दोन भागांत विभाजित न करता संपादित करून एकाच भागात बसवली आणि त्यात शब्दशः भरपूर ‘पाणी घातलं’, तर जी होईल ती! या कथेत बाहूबली आहे, भल्लालदेव आहे, कट्टप्पा आहे, देवसेना आहे, अवंतिका आहे, शिवगामी आहे; अगदी सगळा सगळा गोतावळा आहे. फक्त कोण नेमकं कोण आहे आणि ही पात्रं वेगवेगळीच आहेत की काहीवेळा एकमेकांमध्ये मिसळली आहेत, हे मी सांगणार नाही. लक्षात घ्या, कथा ‘बाहूबली’ची आहे याचा अर्थ ती ‘बाहूबली’वरून उचललीये किंवा ‘बाहूबली’ने त्यांची कथा मूळ ‘अॅक्वामॅन’वरून उचललीये, या दोन्हींपैकी काहीही मी सुचवू इच्छित नाही. मी पूर्वी कुठेतरी वाचलं होतं की, जगात मूळ कथा फक्त ५ च आहेत. त्याअर्थी कोणत्याही दोन कथा या कोणत्या ना कोणत्या पातळीवर एकमेकींसारख्या असणारच. ‘अॅक्वामॅन’चे ‘बाहूबली’शी जरा जास्तच साम्य आहे, एवढंच! तसं ते काही प्रमाणात ‘ब्लॅकपँथर’चंही (२०१८) होतंच. परंतु ‘बाहूबली’च्या मुळाशी महाभारत असल्यामुळे ‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्’ न्यायाने या गोष्टी सहज शक्य आहेत. याला चोरी म्हणत नाहीत. गंमत अशी की, ‘बाहूबली – द कन्क्ल्युजन’मधील प्रसिद्ध गीत ‘ओक्क प्राणम्’सारख्याच थीमवर, त्याच प्रकारचे व्हिज्युअल्स असलेले एक गीत ‘अॅक्वामॅन’मध्येही आहे, आता बोला!! यह थोडा ज़्यादा हो गया!!

    ‘बाहूबली’चा विषय निघालाच आहे, तर एक मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे. त्या चित्रपटाचीही कथा काही फार वेगळी, पुढे काय होणार याचा अंदाज बांधता न येण्यासारखी होती का? तर अजिबातच नाही. तो चित्रपट त्याच्या कथेमुळे श्रेष्ठ नाहीये, तर त्या सामान्य कथेच्या असामान्य मांडणीमुळे तो श्रेष्ठ आहे. तीच बाब ‘अॅक्वामॅन’लाही लागू पडते. कथा (जिऑफ जोन्स, जेम्स वॅन, विल बिल) क्लिषेड असली, पटकथा (डेव्हिड लेस्ली जॉन्सन-मॅक्गोल्ड्रिक, विल बिल) उत्तरार्धात किंचित रस्ता चुकल्यासारखी असली, तरीही दिग्दर्शक जेम्स वॅनची हाताळणी मात्र लाल्याच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘एकदम कॅडॅक्क’ आहे! डिसी युनिव्हर्समध्ये एखादं जग एवढं सतरंगी असू शकतं, त्यातली सगळीच नाही परंतु मुख्य पात्रं एवढी मजेदार असू शकतात आणि त्यांची कहाणी एवढी तुफान मनोरंजक असू शकते या अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत अशक्य वाटणाऱ्या सगळ्याच गोष्टी जेम्स वॅनने प्रत्यक्षात आणून दाखवल्यायत. डिसीचा पार चेहरामोहराच बदलून टाकला वॅनभाऊंनी!! आणि या बाहूबलीयन (आपल्याकडे बाहूबली असताना उगाच हर्क्युलियन का म्हणू मी!) कार्यात भाऊंना खंबीर साथ दिलीये ती जेसनमामांनी! याला मराठी न जाणणारे लोक उगाचच जेसन मोमोआ वगैरे म्हणतात, पण ते एक असो. खाल ड्रोगो आणि बाहूबलीच्या मिश्रणामुळे हा ‘हाफ-ब्रीड’ (कोटी हेतुत:) काहीच्या काही जबरदस्त झालाय. तो जितका देखणा आहे, त्याहून जास्त तो पडद्यावर करतो ती प्रत्येकच गोष्ट देखणी वाटते. हिरोच तो! त्याला वेळोवेळी हिरोपदाला शोभेल अशा खूप साऱ्या ‘वाजीव शिट्ट्या, बडीव टाळ्या’ एण्ट्रीज आहेत. आणि सबंध चित्रपटात तो अशा काही आवेश, आत्मविश्वास आणि आविर्भावात वावरलाय की, त्याच्यासमोर साक्षात हल्क जरी आला तरी तो त्याला कुत्र्यासारखा मारेल आणि वर तो मेलाय याची खात्री करण्यापुरतंही मागे वळून पाहाणार नाही, हे शंभर टक्के सत्य भासतं! याउलट अॅम्बर हर्ड ही दृष्ट लागण्याइतकी देखणी दिसते, पडद्यावर निरनिराळ्या करामतीसुद्धा करते परंतु चेहरा मात्र कायम गर्दीत पर्स मारली गेल्यासारखा चिंताक्रांतच! म्हणजे मारामारी करतेय, चेहरा असाच. समजावून सांगतेय, चेहरा असाच. रोमान्स करतेय, चेहरा असाच! बाकी निकोल किडमन, टेम्युरा मॉरिसन, विल्यम डॅफो, पॅट्रिक विल्सन, डॉल्फ लंडग्रेन यांनी त्यांची कामे चोख बजावली आहेत. याह्या अब्दुल मतिन – दुसरा, याने साकारलेला ‘ब्लॅक-मॅण्टा’ मस्तच झालाय, परंतु पुढच्या भागांमध्ये त्याचा अधिक पात्रपरिपोष होईल, अशी अपेक्षा करुया. आणि हो, रुपर्ट ग्रेगसन-विल्यम्सचं संगीत ‘वंडर वुमन’प्रमाणेच याही चित्रपटात फारच कमाल आहे!

    आर्थरच्या लहानपणी भल्यामोठ्ठ्या अॅक्वेरियममधील सगळे मासे त्याच्या पाठिशी गोळा होतात, हा प्रसंग अक्षरशः अंगावर काटा आणणारा झाला आहे. तसाच आर्थर आणि मेराने समुद्राखाली ट्रेंचच्या समूहातून वाट काढत जाण्याचा प्रसंगही वॅनच्या आधीच्या फिल्मोग्राफीची आठवण करून देणारा झाला आहे. पण राहून राहून वाटत राहातं की, मनुष्याने समुद्रात टाकलेला बेसुमार कचरा, या मुद्याला चित्रपटात केवळ हलका स्पर्श करून सोडून दिलंय, त्याऐवजी जर तोच मुख्य मुद्दा असता आणि त्याभोवतीच अॅक्वामॅनची ओरिजिन-स्टोरी गुंफली गेली असती तर? तर चित्रपट लाखपटींनी जास्त ससंदर्भ आणि मजेदार वाटला असता. असो, सारेच काही आपल्या मनासारखे थोडीच होते! परंतु’वंडर वुमन’च्या वेळी झुकू लागलेले पारडे ‘अॅक्वामॅन’ने समतोलाच्या दिशेने फारच जास्त झुकवलेय. एमसीयूची तिसरी फेज संपत आलेली असताना डिसीला सुर सापडू लागणे किंचित उशिर झाल्यासारखे वाटेल. परंतु उशिरा काय किंवा लवकर काय, समतोल हा शेवटी समतोलच असतो. तो साधणे महत्त्वाचे. ‘अॅक्वामॅन’लाही तो पूर्णार्थाने साधता आलेला नसला तरीही त्याने डिसीला समतोलाच्या कधी नव्हे इतक्या जवळ नेऊन ठेवलेय. ते कसे, हे थिएटरमध्येच आणि तेही थ्रीडीतच पाहाणे, ही एक वेगळीच मजा आहे!!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]