कर्नाटकच्या सीमेवर सैनिकांची एक तुकडी मोहिमेवर असते. त्यांचं लक्ष्य असतं नक्षलवादी गजेंद्र साहू. कर्मधर्मसंयोगाने साहू पळून जाण्यात यशस्वी होतो व एका हिंदू साधूच्या आश्रमात शरण घेतो. आश्रम, तेथील महंत आणि त्यांचा समाजावरील प्रभाव यांच्या प्रचंड ताकदीची जाणीव साहूला होते व ती ताकद हस्तगत करण्यासाठी तो महंतांचा खून करतो आणि त्यांची जागा घेतो. त्याच आसपास एका कुटूंबात प्रसुती होते. जुळी मुलं. पण एक जिवंत आणि दुसरा मृत. गावात वास्तव्यास असलेला अघोरी अनपेक्षितरित्या त्या घरी येतो आणि मृत बालकाची मागणी करतो. मुलाची आई अद्याप मूर्च्छेत असते. वडील तिच्या नकळत ते बाळ अघोरीला देऊन टाकतात. हस्ते परहस्ते त्या मृत बालकाचा प्रवास होऊ लागतो. या तसं बघितलं तर दोन वेगवेगळ्या घटना. पण त्यांना एकत्र आणण्याचं आणि त्यातून अत्यंत श्रीमंत व्यावसायिक मूल्यं असलेला ‘अखंडा’ बनवून दाखवण्याचं श्रेय जातं ते बोयापती श्रीनूला!
‘अखंडा’चा पूर्वार्ध कमालीचा संथ आहे. संथ आणि पूर्वानुमेय (प्रेडिक्टेबल) घटनांनी भरलेला! पण ते सहन करत असतानाही आपल्याला आतून वाटत राहातं की हे कोणत्या तरी मोठ्ठ्या यंत्राचे सांधे जुळवणं सुरू आहे. ते सांधे एकदा जुळले की सबंध चित्रपट फुलून येणार आहे. तसंच होतं. चित्रपट जरी मूळ संघर्ष अंथरायला वेळ घेत असला तरी एकदा तो त्या क्षेत्रात घुसला की स्फुल्लिंगातून अपरिमित तेजस्वी विस्फोट व्हावा तसा फुलून येतो!
नंदमुरी बाळकृष्ण अर्थात बालय्याला चित्रपटात दुहेरी भूमिका आहेत. एक म्हणजे रक्तपातावर विश्वास नसलेला मुरली आणि दुसरा म्हणजे दुर्जनांचा रक्तपात हेच उत्तर यावर ठाम विश्वास असलेला अखंड रुद्र सिकंदर अघोरा! पहिल्या भूमिकेतदेखील खूप सारे टाळ्या-शिट्ट्या वसूल करणारे क्षण असले तरी ते काही बालय्याचं नेहमीचं मैदान नाही. त्यामुळे त्या भूमिकेत तो काहीसा अडखळतो, काहीसा चाचपडतो. पण अंती आपल्या अनुभवाच्या जोरावर कथेचे सांधे जुळवण्याची भूमिका निभावून नेतो. आणि एकदा का ते सांधे जुळले की मग अखंडाच्या रुपात तो अक्षरशः तांडव घालतो तांडव! त्या पात्रात त्याचं रूप, त्याची देहबोली, त्याचं ठायीठायी संस्कृत बोलणं, सगळ्यांपासून तुटक व कोणत्याही सांसारिक पाशांपासून मुक्त असणं आणि कसलाही धरबंध न बाळगता थैमान घालणं साऱ्या साऱ्या गोष्टी वरच्या परिच्छेदात सांगितल्याप्रमाणेच फुलून येतात!
बॉलिवूडची प्रथाच आहे धर्माचा शक्य तितका अपमान करणं, धर्मपरायण मंडळींना शक्य तितकं नीच लेखणं. बॉलिवूडमध्ये काम करणारे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ सारेच विदेशी शिक्षणाची पैदास असल्यामुळे त्यांना ना या देशाची माती ठाऊक असते ना त्या मातीच्या भावना. त्यामुळेच त्यांचे चित्रपटही तसेच असतात – विसविशीत, उथळ आणि अगोचर! या देशाच्या वैविध्याला एका धाग्याने जोडणारा हिंदू धर्म तर त्यांना स्वप्नातही नकोसा असतो, उलट ते त्याचा आपापल्या अभिव्यक्तींतून शक्य तितका तिरस्कारच करत असतात. तेलुगू चित्रपटसृष्टी असल्या अंधश्रद्धांना थारा देत नाही. ‘अखंडा’मध्ये सबंध चित्रपटभर भगव्या संकेतांचा मुक्तहस्ते वापर केलाय. नुसत्या नायकाच्या वेशातच नाही तर गाड्या, पात्रांच्या ओळखपत्राची दोरी अशा नजरेला सहज न दिसणाऱ्या जागांवरही केसरी उधळण आहे. चित्रपटातील जोड्या विवाहसंस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या आहेत आणि कुटूंबे कुटूंबसंस्थेवर विश्वास ठेवणारी आहेत.
पण चित्रपटाचं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे लेखक-दिग्दर्शकांचा धर्माबद्दलचा अभ्यास अतिशय सूक्ष्म आहे. अघोरी पंथाचा वेश, त्यांची वर्तनाची पद्धत इ. गोष्टी तर त्यांना यथायोग्य साधल्या आहेतच. मंदिर का आवश्यक असते आणि मंदिराच्या उभारणीत धर्म किती खोलवरचा आध्यात्मिक विचार करतो हे सांगणारा प्रसंग अतिशय सुंदर झालाय. एका प्रसंगात नायक खलनायकाला मारत असताना त्याच्या शरीरावर प्रहार करताना कुंडलिनीच्या सात चक्रांची वर्णनं करतो. बॉलिवूडवाल्यांना मुळात कुंडलिनी नावाचं काही असतं हेच ठाऊक नसेल! पण सगळ्यांत जबरदस्त प्रसंग झालाय तो जिथे नायक ‘अहिंसा परमो धर्म:’च्या पुढे जात ‘धर्म: हिंसा तथैव च’ सांगतो, तसं वागतो पण तिथून निघून जात असताना पायाखाली चुकून येत असलेल्या निर्दोष मुंगळ्याचाही जीव घेत नाही!
पण या सगळ्या मारधाडीच्या आणि अभिनिवेशाच्या आत मला हा चित्रपट त्यातील सगळ्या गुणदोषांसह आवडण्याचं सगळ्यांत मोठं कारण सांगू? ते कारण आहे, अखंडा आणि मुरलीच्या लहान मुलीमधील हळवं नातं. त्यांच्यात सगळे मिळून पाच-दहा संवाद असतील. पण न बोलताच एक सन्यासी आणि अबोध बालिकेतील नात्याची घट्ट वीण बोयापती श्रीनूने जी सुरेख विणलीये आणि बालय्यानेही ती जितक्या अनपेक्षित संयतपणे चितारलीये तिला तोड नाही. जननी नाव दाखवलंय तिचं. अखंडा एकाच वेळी तिला लहान बालिका आणि जगज्जननी जगदंबा म्हणून लळा लावतो, ते अतिशय लाघवी आहे.
या नव्या वर्षात ‘पुष्पा’ने सबंध देशभर धुरळा उडवलाय. तुलनाच करायची झाली तर २५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘पुष्पा’ने ३७० कोटी म्हणजेच बजेटच्या तुलनेत दिडपट पैसे कमावले आहेत. त्याचवेळी ७० कोटींत बनलेल्या ‘अखंडा’ने १५० कोटी म्हणजेच बजेटच्या तुलनेत दुप्पट कमाई केली आहे. शुद्ध संख्याशास्त्रीय भाषेत बोलायला गेलं तर ‘अखंडा’ हा निर्मात्यांसाठी अधिक फायदेशीर ठरलाय. मी गेल्या जवळपास अर्ध्या दशकाहून अधिक काळ सांगतोय की ‘रीजनल इज द न्यू नॅशनल’. ‘अखंडा’ तसाच आहे. प्रादेशिक असूनही राष्ट्रीय स्तरावर धार्मिक अस्मितेला फुंकर घालणारा. भौतिकशास्त्राचे नियम पाळायला तो काही ख्रिस्तोफर नोलनचा चित्रपट नाही. त्याच्या पूर्वार्धातील संथपणा, अनावश्यक गाणे (जय बालय्या), पूर्वार्धात बालय्याचं अवघडलेपण सहन करू शकलात आणि मसालापट हे मसालापट म्हणून बघू शकण्याइतकी परिपक्वता तुमच्या ठायी असेल तर तुम्हाला तो आवडण्याची अखंड शक्यता आहे! सर्वोत्तम अनुभवासाठी मूळ तेलुगू भाषेतच पाहा.
रायलसीमा भागात अतिदुर्मिळ अशा रक्तचंदनाचे वृक्ष उगवतात. लाल सोने म्हटले जाते त्या झाडांना. अत्यंत मौल्यवान अशा या वृक्षाच्या लाकडांची अर्थातच तस्करी झाली नसती, तरच नवल. अशाच एका ठेक्यावर काम करणारा हमाल आहे पुष्पराज (अल्लु अर्जुन). तिरकं डोकं चालवणारा निडर पुष्पराज या चंदनाच्या तस्करीतून यशाच्या आणि सामर्थ्याच्या शिड्या कशा चढतो, याची कहाणी म्हणजे ‘पुष्पा – द राईज, पार्ट १’.
हा चित्रपट निर्माण कसा झाला असेल? एके दिवशी दिग्दर्शक सुकुमार आणि अल्लु अर्जुन या दोघांपैकी एक कुणीतरी दुसऱ्याकडे गेला असेल व म्हणाला असेल, ‘अरे तो केजीएफ काय तुफान चालला यार! यश दाढी वाढवून कसला कूल दिसलाय! आपण पण असा एक पिक्चर केला पाहिजे’! बास, या तीन वाक्यांवर ‘पुष्पा’ उभा राहिलाय असं पाहाताक्षणीच जाणवतं. साखळी कशी असते पाहा. ‘पुष्पा’ पाहून प्रशांत नीलच्या ‘केजीएफ’ची (२०१८) आठवण येते. ‘केजीएफ’ पाहून अनुराग काश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ची (२०१२) आठवण येते. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ पाहाताना रामूच्या ‘रक्तचरित्र’ची (२०१०) आठवण येते! ‘सर्वदेवकृतं नमस्कारं केशवं प्रतिगच्छति’च्या चालीवर म्हणावेसे वाटते की, जसे जगातील सगळे ऑर्गनाईझ्ड क्राईमवर आधारलेले चित्रपट कुठे ना कुठे ‘गॉडफादर’वरून (१९७२) प्रेरित झालेले असतात, तद्वतच भारतातील सगळे माफियावाले सिनेमे कुठे ना कुठे रामूच्या एखाद्या चित्रपटावरून प्रेरित झालेले असतातच असतात. रामू आजकाल कसा का वागत असेना, चित्रपट बनवण्याच्या तंत्रात आणि हिंमतीत तो खराखुरा ट्रेंडसेटर आहे! आणि ‘रक्तचरित्र २’ (२०१०) रिकॅपमध्ये किती जरी वेळ वाया घालवत असला तरीही ही जोडगोळी चित्रपट म्हणून काहीच्या काही वरच्या दर्जाची आहे! त्या काळात सूर्या शिवकुमार अभिनयावर खरोखर मेहनत घ्यायचा. असो. विशेष म्हणजे उपरोल्लिखित साखळीतील सगळेच्या सगळे चित्रपट किमान दोन भागांत बनलेले आहेत किंवा बनताहेत आणि एक ‘केजीएफ’चा अपवाद वगळता सगळेच्या सगळे बॉक्स ऑफिसवर अंडरपरफॉर्मर्स आहेत. ‘पुष्पा’ किती जरी दणक्यात कमावत असला तरीही २००-२५० कोटींच्या बजेटवर बनलेल्या चित्रपटाला ओटिटीने हात दिल्याशिवाय रिकव्हरी होणं अवघडच आहे.
वर मी ज्या साखळीचा उल्लेख केला त्याचे अजून एक कारण आहे. हे सगळेच्या सगळे चित्रपट एका टेम्प्लेटवर चालतात. ते टेम्प्लेट म्हणजे, पहिल्या भागात अभावातून आलेला नायक कसा मोठा डॉन होतो याची कथा आणि दुसऱ्या भागात त्या नायकाचा स्वकर्मानेच कसा ऱ्हास होतो याची कथा. याची सुरुवातही रामूनेच करून दिली आहे. रामूने आखून दिलेल्या मार्गातच दोन-पाच पावले इकडं-तिकडं करून हे सिनेमे बनतात. अपवाद फक्त एकाच चित्रपटाचा. तो टेम्प्लेट फॉलो करूनही टेम्प्लेटपेक्षा खूपच वेगळ्या धाटणीचा होता. त्याचे लेखन, दिग्दर्शन, मांडणी, संपादन, अभिनय सारं काही अक्षरशः मास्टरक्लास म्हणावं असंच होतं. तो सुद्धा बॉक्स ऑफिसवर या जॉन्राच्या बहुतांशी चित्रपटाप्रमाणेच अंडरपरफॉर्मर होता. तो चित्रपट म्हणजे वेट्रिमारनचा, ‘वडाच्चेन्नई’ (२०१८)! त्याची सर कशालाच येऊ शकत नाही.
‘पुष्पा’देखील ठरीव टेम्प्लेटच फॉलो करत असल्यामुळे बऱ्यापैकी प्रेडिक्टेबल आहे. पण त्या प्रेडिक्टेबिलिटीतही आपण तो पाहात राहातो याचं कारण म्हणजे, पोलिश सिनेमॅटोग्राफर मिरोस्लाव कुबा ब्रोझेकचं अत्यंत देखणं छायांकन. एकही चौकट अशी नाही जिच्या मागे काही ना काही विचार अथवा नियोजन नाही. चित्रपट प्रत्यक्षात अत्यंत शब्दबंबाळ आहे. पण तो गोंगाट बाजूला सारला तर असा देखणा चित्रपट या जॉन्रामध्ये (अर्थातच ‘वडाच्चेन्नईचा’ अपवाद वगळता) क्वचितच बनला असेल. या अत्युत्कृष्ट छायांकनाला तितक्याच जबरदस्त अभिनयाची साथ लाभलीये. रश्मिका, जगदिश प्रताप भंडारी, अजय घोष, धनंजय, राव रमेश, अजय, अनसूया वगैरे भरवश्याचे खेळाडू तर आहेतच. पण सुनील या केवळ कॉमेडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याला मुख्य खलनायकाची भूमिका देणे हा दिग्दर्शक सुकुमारचा खरोखरच मास्टरस्ट्रोक म्हटला पाहिजे! फ़हाद फ़ासिल किती जरी नटराज असला तरीही पहिल्या भागात त्याला काहीच काम नाही.
गडबड केव्हा होते? जेव्हा आपण पटकथेचा एकजिनसी विचार करू लागतो, तेव्हा तिच्यातले दोष हे गुणांपेक्षा अधिक ठळकपणे जाणवू लागतात! ‘विक्रम वेधा’मधील (२०१७) वेधा हा कायमच मॅन विथ द प्लॅन होता. त्याच्या एकूण एक कृतींच्या मागे अतिशय सूक्ष्म विचार आणि चपखल नियोजन असायचं. पुष्पराज मात्र सबंध चित्रपटभर टोकाचा इम्पल्सिव्ह वागत राहातो. हे एक सुकुमारच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य. ‘आर्या’ (२००४) घ्या, ‘आर्या २’ (२००९) घ्या किंवा माझा अत्यंत आवडता ‘१ नेनोक्कडिने’ (२०१४) घ्या, त्याचे नायक असेच सायकॅट्रिस्टची गरज असल्यासारखे वागत राहातात. हेच भविष्यात त्याच्या पतनाचं कारण दाखवायचं असेल तर गोष्ट वेगळी, पण आत्ताच्या स्किम ऑफ थिंग्समध्ये ते हळूहळू विचित्र वाटू लागतं. इतकं की, नायकाबद्दलची सहानुभूती एक त्याचा अत्यंत वेदनामय भूतकाळ वगळता कमी होऊ लागते.
पुष्पा चंदनाच्या तस्करीवर हमाल म्हणून काम करू लागल्याच्या पहिल्याच दिवशी जी शक्कल लढवतो, ती सुद्धा पटत नाही. मुळात त्याच्या वर मुकादम असतील, अजून माणसे असतील ते एका हमालाला स्वतंत्र निर्णय घेऊ देतील हेच शक्य वाटत नाही. ट्रक जिथं गायब झाला त्याच्या आसपास शोध घेण्याच्या ऐवजी पोलिस पुष्पालाच विचारत बसतात, हे सुद्धा पटत नाही. पुष्पाचा भूतकाळ किती जरी त्रासाचा असला तरीही एका मर्यादेपर्यंत त्याच्या सावत्र भावांचं वागणं दुनियादारीच्या दृष्टीने चूक वाटत नाही. पुष्पाला आवडणाऱ्या श्रीवल्लीची तर अजूनच वेगळी तऱ्हा. जी पोरगी हजार रुपयांत स्माईल द्यायला तयार होते आणि पाच हजारांत चुंबन, तिने चेहरा किती जरी भोळा केला तरी ते पात्र सरळ वाटत नाही. एका प्रसंगात ती पुष्पाला म्हणते, मला तुझ्यासोबत झोपायचंय, त्याच्यानंतर काही दिवसांतच ती एकदमच लाजरेपणाचा आव आणून त्याला हात सुद्धा लावू देत नाही. मग पहिल्या प्रसंगात ती जे बोलली ते केवळ आपद्धर्म म्हणून होतं की काय, असं वाटू लागणारच की! खासदाराच्या दर्जाच्या माणसाला चंदनाचा खरा दर माहिती नाही आणि एक साधा सिंडिकेट मेंबर त्याला वर्षानुवर्षे फसवत राहातो, ही तर भाबडेपणाची हद्द आहे. फ़हाद फ़ासिलचा तर शेवटचा सबंध सिक्वेन्स केवळ अतिरंजित नाट्यनिर्मिती करण्यासाठीच ताणलाय की काय वाटते. त्या ऐवजी त्याला केवळ इंट्रोड्युस करून चित्रपट संपवला असता तर सस्पेन्स तर राहिलाच असता शिवाय चित्रपटाची जी अमर्याद लांबी आहे, ती सुद्धा काहीशी आटोक्यात आली असती. हा सस्पेन्स राखण्याचा प्रकार राजमौलीने ‘बाहूबली’मध्ये (२०१५) केवढ्या खुबीने वापरला होता, आठवा! पुढच्या भागाचे नाव जर ‘पुष्पा – द रुल’ असणार आहे तर या भागाचे नाव नुसतेच ‘पुष्पा – द राईज’ एवढेच असणे सुसंगत वाटले असते, त्यात ‘पार्ट १’ आणि ‘पार्ट २’ ही शेपटं अतिरिक्त वाटतात. सांगण्यासारखे अजून बरेच मुद्दे आहेच. पण खरं सांगू, ‘पुष्पा’ हा जर तेलुगूतील इतर मसाला चित्रपटांसारखा हलकाफुलका असला असता तर मी एवढं खोलात गेलो सुद्धा नसतो. चित्रपट स्वतःच स्वतःला अतिगंभीरपणे घेतो व वास्तववादाकडे झुकतो म्हटल्यावर मात्र त्याच अंगाने विचार करणे प्राप्त आहे!
इतक्या सगळ्या त्रुटी असूनदेखील चित्रपट आपण पाहातच राहातो, याचं एकमेव कारण म्हणजे अल्लु अर्जुन. इतका जबरदस्त मेकअप आणि कॉस्च्युम डिझाईन हिंदीत पाहायला सुद्धा मिळत नाही. तो ज्या प्रकारे बसतो, वावरतो, कुणाला सांगून खरं वाटणार नाही की तो बन्नी आहे! ‘दुव्वाडा जगन्नाथम्’मध्ये (२०१७) त्याने जितक्या सहजपणे विजयवाड्याचा ब्राह्मणी ॲक्सेंट वापरला होता तितक्याच सहजपणे तो इथे चित्तुर ॲक्सेंटमध्ये बोलतो. त्याच्या नृत्याबद्दल तर काही बोलायची गरजच नाही. पटकथेची फारशी साथ नसूनही त्याने सबंध चित्रपट आपल्या खांद्यांवर नुसता पेललेलाच नाही, तर पार सुद्धा केलाय! देविश्री प्रसादचे संगीत चित्रपटात बरोब्बर मिसळून जाते. मी कायम म्हणतो, डिएसपी हा तिकडचा प्रीतम आहे. सिनेमा रिलिज होण्याआधी पंधरा दिवस आणि रिलिज झाल्यानंतर पंधरा दिवस गाजणारी गाणी तो प्रीतमइतक्याच चलाखीने देतो. त्या पलिकडे ना निर्माते-दिग्दर्शकांची अपेक्षा असते ना त्याची स्वतःची इच्छा. तेच त्याने इथेही यथासांग करून दाखवलेय. अल्लु अर्जुनच्या खालोखाल पुष्पा सुसह्य होण्यात त्याचा वाटा आहे. माझ्या मते हेच तात्पर्य आहे. अत्यंत डिटेल्ड पद्धतीने १७८ मिनिटं चालूनही पुष्पा सुसह्यच राहातो, स्मरणीय होत नाही. तो धडाक्यात कमावतो आहे तर कदाचित ब्रेक-ईव्हनपर्यंत जाईलही, पण क्लासिक्सच्या यादीत जाण्याची पात्रता असूनही तो त्या उपाधीच्या खूपच अलिकडे राहातो, हे दुर्दैव आहे!
‘अतरंगी रे’ सुरू झाल्यापासून पहिल्या पाच-सात मिनिटांतच तुम्हाला तो पॉईण्टलेस वाटू लागतो. निष्फळतेची जागा हळूहळू घृणा घेऊ लागते. तुम्ही तो कित्येकदा पॉजसुद्धा करता, पण स्टॉप करून ॲपमधून बाहेर काही तुम्ही पडत नाही. तुम्ही तो पाहातच राहाता, अगदी शेवटपर्यंत!
बॉलिवूडच्या तुलनेत अत्यंत नव्या पार्श्वभूमीवर बेतलेला हा चित्रपट इतक्या पातळ्यांवर फसलाय आणि इतक्या निष्काळजीपणाने साकारलाय की, कुठून सुरूवात करावी आणि काय सांगू नये, तेच समजत नाही. आपल्याकडे चांगली कथा आहे म्हटल्यावर ती कशी जरी मांडली तरी चालून जाईल, या अतिआत्मविश्वासाचं फळ आहे हा चित्रपट. त्यातूनच मग कथेच्या सादरीकरणात अनेक खिंडारं आणि त्याहून जास्त प्रश्न उभे राहातात. ‘तनू वेड्स मनू’चे दोन्हीही भाग आणि ‘रांझणा’सारखे चित्रपट बनवून मानवी मनांच्या गाभाऱ्यात डोकावणारी आनंद एल. राय आणि हिमांशू शर्मा यांची दिग्दर्शक-लेखकाची जोडी जेव्हा पहिल्यांदाच खराखुरा मानसशास्त्रीय विषयावरील चित्रपट करायला घेते तेव्हाच तो उथळ आणि अतिसोपा करून मांडते, हा दैवदुर्विलास म्हणावा, की आपराधिक श्रेणीचा निष्काळजीपणा, की दोन्ही?
एका अत्यंत ताकदवान बिहारी कुटूंबाला भर बिहारमध्ये आपली नात ज्याच्यासोबत इतक्या वेळा पळून जाते, त्याचा ठावठिकाणा का शोधता येत नाही? विशूच्या (धनुष) आईवडलांची प्रतिक्रिया इतकी कोरडेपणाने का चितारलीये? मँडीचे (डिंपल हयाती) पुढे काय होते? विशूला जी नापास होण्याची भिती वाटत असते, त्याचे पुढे काय होते? या अशा लहानसहान प्रश्नांचे तर सोडाच पण चित्रपटाची कथा फोडू नये या तत्त्वापायी मी जे मोठे प्रश्न सांगतही नाही आहे, त्यांचेसुद्धा उत्तर चित्रपटात कुठेच येत नाही. कारण लेखक-दिग्दर्शकाला माहिती आहे की, आपण थांबून एक क्षण जरी विचार केला तरी कथाबीज नावाचा पत्त्यांचा बंगला त्याच क्षणी कोसळेल. त्यामुळे ते घाई करत नुसते धावतच सुटले आहेत.
ही घाई, हाच आजकालच्या चित्रपटांचा जणू स्थायीभाव होऊन बसलाय. मला आठवतच नाही की अखेरचा असा हिंदी चित्रपट मी कोणता पाहिला होता ज्यात भावनिक प्रसंग नुसते लांबच नाही तर गहिरेसुद्धा होते! सगळंच कसं द्विमितीय, दोन तासांच्या मर्यादेत कोंबलेलं. त्यामुळे मुळं धरतच नाहीत, भावनेचे बीज अंकुरतच नाही. ते आहे, हे गृहित धरून यंत्रवत चालणाऱ्या गोष्टी तेवढ्या मेलेल्या नजरेने पाहात राहायच्या. आता याच चित्रपटाचं बघा ना! रिंकूचं पात्र अत्यंत प्रतिकर्षक वाटावं असं लिहिलंय. तिच्यासोबत जपण्यासारखं काहीच नसताना किंबहूना जीव लावावा असं काहीच घडलेलं नसताना विशूने का म्हणून तिच्या प्रेमात पडावं? एकच उत्तर, की तो हिरो आणि आणि ती हिरोईन म्हणून!
सबंध चित्रपट अशा प्राचीन गृहितकांनाच सिद्धांत मानून रेटलाय. आणि जिथे ते चौकट मोडतात, तिथे ते इतके उथळ होतात की, काय सांगू! मानसशास्त्रीय आजाराचे इतके घाणेरड्या व हीन दर्जाचे सादरीकरण क्वचितच एखाद्या तथाकथित पुरोगामी चित्रपटात पाहायला मिळाले असेल. त्यासोबतच बिहारची ओळख केवळ ऑनरकिलिंगपुरतीच भासवणे, दक्षिण भारताला ‘निचला हिस्सा’ म्हणणे वगैरे भेदभावमूलक हिणकस प्रकार आहेतच. हे करताना एकही, अगदी एकही ट्विस्ट धक्का देत नाही. सारे काही पहिल्या काही मिनिटांतच आपल्याला जे समजते ते शेवटपर्यंत सरळसोट रस्त्यासारखे समजतच राहाते. त्या आघाडीवर लेखक-दिग्दर्शकांनी काडीमात्रही प्रयत्न केल्याचे दिसत नाही. काडीमात्रवरून आठवलं, सारा अली खानला काडीचाही अभिनय जमत नाही. तिच्या तोंडी सगळे संवाद आणि चेहऱ्यावर सगळे भाव सपाटच वाटतात. अक्षयकुमारला एक उत्कर्षबिंदू सोडल्यास काहीही काम नाही. एकेकाळी चित्रपटांमध्ये हिरोच्या मित्रांनाही किंमत असायची. आठवा राय यांच्याच ‘रांझणा’तील मुहंमद झिषान अय्युब, ‘तनू वेड्स मनू’मधील दीपक डोब्रियाल वगैरे. इथे मात्र कथानकातील अवघड गुंते कसल्याही त्रासाविना सोपे करण्यापुरतेच त्यांना वापरून घेतलेले दिसते. चित्रपट गंडलाय हे एकदा मनाने स्वीकारलं की उत्तरार्धात तो काहीसा सुसह्य होतो, पण तोपर्यंत वेळ निघून केलेली असते.
इतके असूनही किंवा काहीच नसूनही आपण चित्रपट शेवटपर्यंत पाहातच राहातो, याची कारणे दोन. एक म्हणजे धनुषचा नवनवीन मानांकने रचणारा वेधक अभिनय. तो जे डोळ्यांचे खेळ करतो, हसता हसता रडतो, टायमिंग साधून विनोद करतो, बॉलिवूडच्या एकूण एक हिरोंना लाजवेल अशी संवादफेक करतो, वीजेसारखा सहज नाचतो, ते सारंच अशक्य कोटीचं आहे! आणि दुसरं कारण म्हणजे रहमानचं दैवी संगीत. गाणी तर हिट आहेतच. पण रहमानने पार्श्वसंगीतातून जे अमृत ओतलंय ते तर निव्वळ अप्रतिम! विशेषतः विविध गाण्यांच्या चाली रहमान प्रसंगोपात जिब्रिश गातो ते सगळेच भाग श्रेष्ठतेने ओतप्रोत झाले आहेत. चित्रपटाच्या शेवटी जेव्हा दिग्दर्शकाच्याही नावाच्या आधी लिहून येतं की, A film by A.R. Rahman, तेव्हा रहमान नुसता त्याच्या श्रेष्ठतेमुळे हा मान हक्काने मिळवतच नसतो, तर चित्रपटात खरोखरच त्याने लेखक-दिग्दर्शकांच्याही पुढे जाऊन आत्मा ओतलाय याची ती पोचपावती असते.
पण धनुष काय किंवा रहमान काय, चित्रपट नावाच्या यंत्राचे आटे आहेत. यंत्र जर स्वतःच चुकीच्या दिशेला घरंगळत असेल तर आटे त्याला थांबवू शकत नाहीत. पंचपक्वान्नाच्या जेवणात श्रीखंडपुरीच तेवढी चवदार निघून उपयोग नसतो. चांगल्या विषयाची वाट लावणारा ‘अतरंगी रे’ हे असेच घरंगळणारे यंत्र आहे, फसलेला बेत आहे. त्याला कुणीच वाचवू शकत नाही!
‘रिझरेक्शन्स’च्या साधारण विसाव्या मिनिटाला स्मिथ (जोनाथन ग्रॉफ) थॉमस अँडरसनला (कियानू रीव्ह्ज़) सांगतो की, ‘आपली पॅरेंट कंपनी वॉर्नर ब्रदर्सने मूळ त्रयीचा पुढचा भाग बनवायचं ठरवलंय. आपण तयार झालो तर आपल्यासोबत नाही तर आपल्या शिवाय’! तो प्रत्यक्षातील वास्तव आणि सिनेमाच्या काल्पनिक अशा दोन्ही जगांमधील सत्यच त्या प्रसंगात सांगत असतो. सबंध चित्रपट असाच वास्तव आणि कल्पनेची सरमिसळ करत बनलाय. पण वाईट गोष्ट अशी की, त्या विसाव्या मिनिटापर्यंत सांगावं, लक्षात ठेवावं आणि आठवावं असं काहीच न घडल्यामुळे आपल्याला हा प्रसंग किती जरी स्वसंदर्भ असला तरीही अनाठायीच वाटत राहातो, अगदी पुढे वाढून ठेवलेल्या सबंध चित्रपटासारखाच. गंमत म्हणजे नियोदेखील पुढचा भाग बनवणं ही कल्पना फारशी चांगली नसल्याचं बोलून दाखवतो, त्यावेळी एक तर दिग्दर्शिका त्याच्या तोंडून चित्रपटाची निष्फळता तरी सांगत असते अथवा निर्माते उर्मट वल्गना तरी करत असतात!
मी चित्रपटविषयक लेखन जरी गेली दहा-बारा वर्षे करत असलो तरी माझं चित्रपटसाक्षर होण्याच्या वाटेवरचं सगळ्यांत पहिलं पाऊल म्हणजे ‘द मॅट्रिक्स’ (१९९९). कळण्या-नकळण्याच्या सीमारेषेवरील वयात मी हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला आणि चित्रपट या विषयाकडे पाहाण्याची माझी दृष्टीच बदलून गेली! पुढे जसजसं चित्रपट आणि त्यातून चालवला जात असलेला राजकीय प्रपोगण्डा हे विषय आकळू लागले, तसतसं ‘द मॅट्रिक्स’ने कशी कथा व त्यातील छुपा डावा प्रपोगण्डा यांची सुरेख वीण विणली आहे हे समजत गेलं व त्यातील राजकीय विचार किती जरी निरर्थक असले तरीही चित्रपटाबद्दलचा माझा आदर वाढतच गेला. कित्येकांना त्या त्रयीतील पुढचे दोन्हीही चित्रपट आवडत नाहीत. माझ्या मनात मात्र जगभरातील कोट्यवधी लोकांप्रमाणेच सबंध त्रयीबद्दल तिच्या गुणदोषांसकट एक हळवा कोपरा आहे. त्यामुळेच चौथा भाग म्हणा वा पुनश्च हरि: ॐ, मी ‘रिझरेक्शन्स’बद्दल मनापासून उत्सुक होतो.
पण वीस-एक वर्षांपूर्वी परिस्थिती कशी होती ना की, चित्रपटांमध्ये प्रपोगण्डा जरी असला तरी तो उघड नसल्यामुळे त्याला चांगली कथा व चांगल्या मांडणीच्या संयतपणाखाली झाकणे भाग होते. आता मात्र जगभरच्या प्रपोगण्डावाल्यांची एकत्रित वैचारिक पातळीच खालावल्यामुळे संयतपणाला औषधापुरतीही जागा राहिलेली नाही. सगळंच भडक, बटबटीत, उथळ आणि म्हणूनच अल्पायुषी होऊन बसलंय. ते तरी काय करतील म्हणा! त्यांचा प्रेक्षकवर्गच जिथे एकाग्रतेचा अभाव असलेले स्नोफ्लेक मिलेनियल्स आहेत, तिथे प्रपोगण्डाचे सुद्धा उथळ, नि:सत्त्व जंकफूड होऊन बसणे साहजिकच आहे! मेरोविन्जियन (लॅम्बर्ट विल्सन) या अशा उथळ जगासाठी नियोला जो दोष देतो, तो सगळाच प्रसंग गमतीदार झालाय!
तर सांगायचा मुद्दा असा की, आजकालच्या कोणत्याही प्रपोगण्डाछाप चित्रपटासारखाच ‘रिझरेक्शन’ भडक व उथळ झालाय. चित्रपटातील प्रसंग घडत असताना, ‘अरेच्चा हे तर सेम रिलोडेडसारखं/रिव्हॉल्युशन्ससारखं’ असं प्रेक्षकांना आश्चर्य वाटायला जागाच ठेवलेली नाहीये. उलट आपल्याला काही वाटण्याच्या आतच त्या त्या चित्रपटातील प्रसंग इंटरकट्समध्ये चिकटवण्याचेच प्रकार प्रत्येक ठिकाणी केले आहेत. सुरुवातीला स्मृतिरंजक (नॉस्टॅल्जिक) वाटणारी ही दृश्यं केव्हा डम्ब ओव्हर-एक्स्पोझिशन वाटू लागतात, दिग्दर्शिकेला व संपादकाला कळलेलंही दिसत नाही. आणि दिलेली दृश्य-स्पष्टीकरणेसुद्धा मिलेनियल्सना कळणार नाहीत ही खात्री असल्यामुळेच की काय, पण त्यांनी आपला प्रत्येक मुद्दा संवादांतूनदेखील स्पष्ट सांगितलाय. पटकथालेखनाचा एक नियम आहे, ‘शो, डोण्ट टेल’! पण कथेप्रमाणेच या नियमालाही ‘मॅट्रिक्स’कारांनी रॅबिट होलमध्ये फेकून दिलंय!
चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कृत्रिम भावनिकता! चित्रपटात तीन-चार तरी प्रसंग असे आहेत की, पडद्यावरील पात्रे अतिशय भावूक झालेली असतात, पण आपल्याला प्रेक्षक म्हणून वाटत राहातं की, ‘च्यायला एवढं सेंटी होण्याइतकं तर काहीच घडलेलं नाहीये’! याचं कारण म्हणजे लेखन व मांडणीतील अनाठायी घाई. मॉर्फियसचं (याह्या अब्दुल मतिन – २) पात्र मध्येच कॉमिक रिलिफपासून ते उगाचच चिडखोर असण्यापर्यंत का हेलकावे खातं, एक पात्र निळी गोळी निवडलेली असूनही कसल्याही कारणाशिवाय लाल गोळी का निवडतं, म्हातारी नायोबी (जेडा पिंकेट स्मिथ) मेलेल्या मॉर्फियसबद्दल इतकी खऊट का बोलते, सतीला (प्रियांका चोप्रा) इतकी क्लिषेड् बॅकस्टोरी का दिली, प्रियांका चोप्राने सगळे मिळून दोन-चार मिनिटांच्या भूमिकेत काय दिवे लावले, स्मिथला शेवटी नेमकं काय हवं आहे, अंगावर कोसळणारे निर्बुद्ध डिजिटल झॉम्बीज बॉम्ब कोणत्या अँगलने वाटतात, यांपैकी कशाचेही; अगदी एकाही प्रश्नाचे उत्तर चित्रपट देत नाही. कशालाच काहीही लॉजिक नाही, काही अर्थ नाही. किंबहूना चित्रपटालाच काही अर्थ नाही.
अजून एक गोष्ट म्हणजे चित्रपट लिबरल असल्यामुळे हिंसेसारख्या गोष्टींच्या बहुतेक विरोधात आहे. त्यामुळे झालंय काय की, चित्रपटात ॲक्शन शब्दशः चिमुटभर आहे. आणि जी आहे ती सुद्धा अतिशय पाणचट आहे. म्हणजे काही काही प्रसंगांमध्ये तर आपल्याला दिसत असतं की मारामारी करणाऱ्या पात्रांचे हातपाय एकमेकांपासून चांगले फुट-फुटभर लांबून जातायत आणि तरीही पात्रे फटका बसल्यासारखं करतायत. इतकी ढिली ॲक्शन बी-ग्रेडच्या चित्रपटांमध्येही नसते आजकाल. काही काही प्रसंगी तीच ॲक्शन चांगली झाली आहे, पण ते सगळे प्रसंग त्यांनी आधीच ट्रेलरमध्ये दाखवून टाकले आहेत! चित्रपटात नवी वाटलेली एकमेव गोष्ट म्हणजे बुलेट टाईम आणि देज्या-वूचं एकत्रिकरण करण्याची संकल्पना! आणि आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे हॉलिवूडच्या सिनेमांसाठी अप्रत्यक्षरीत्या सक्तीचे असलेले इन्क्लुझिव्हिटीचे सगळे रकाने टिक करणारे वोक गेम डेव्हलपर्स एकत्र बसून सगळ्या जगाची व पर्यायाने चित्रपटाचीही खिल्ली उडवतात, ते प्रसंग. या मंडळींचा पोस्ट-क्रेडिट सीन तर खतरनाक जमून आलाय!
कियानू रीव्ह्ज़ अभिनेता म्हणून भारीच आहे, हे काही नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. त्याने अतिशय जबरदस्त काम केले आहे. कॅरी-ॲन मॉसनेही तितकेच चांगले काम केले आहे. सबंध चित्रपट हा एक प्रकारे त्या दोघांची प्रेमकथाच आहे. पण त्यातही तिच्या पात्राला अक्षरशः एक्स्टेंडेड कॅमिओ वाटावा एवढा कमी स्क्रिनटाईम दिला आहे, का कोण जाणे! जेसिका हेनविकने ओव्हरॲक्टिंग केली आहे. याह्या अब्दुल मतिननेही वाईट काम केलं आहे, पण त्यात त्याचा दोष कमी आणि वाईट लेखनाचा दोष जास्त आहे. जोनाथन ग्रॉफ हा स्मिथच्या भूमिकेत ह्यूगो व्हिव्हींगच्या जवळपाससुद्धा जात नाही. खरं कमाल काम केलंय ते नील पॅट्रिक हॅरीसने ॲनालायझरच्या भूमिकेत!
गेल्या काही काळापासून हा नियमच होऊ लागलाय की, डाव्या प्रपोगण्डाने भरलेले चित्रपट एकापाठोपाठ एक वाईट निघताहेत व फ्लॉप होताहेत. किंबहूना एक म्हण तर प्रचलितच आहे की, ‘गो वोक, गो ब्रोक’! अर्थात, याला अपवाद निश्चितपणे असतीलच. ‘रिझरेक्शन्स’ हिट होईल की फ्लॉप हे मी नाही सांगू शकत. पण तो अति स्पष्टीकरणे देणारा, भावशून्य, रटाळ, संथ, मनोरंजनाचा अभाव असलेला, आधीच्या चित्रपटांच्या पुण्याईवर पैसा कमवू पाहाणारा, प्रेक्षकांच्या लाडक्या पात्रांचा चुथडा करून टाकणारा, ‘रिव्हॉल्युशन्स’ बरा होता असं म्हणण्याची पाळी आणणारा अतिशय सुमार चित्रपट आहे. मूळ युनिव्हर्समध्ये काडीचंही योगदान न देणारा हा चित्रपट ‘निर्मात्यांसाठी पैसा कमवण्याचं एक साधन’ हे कारण वगळता सर्वार्थाने अनावश्यक होता. तरीही त्यांच्या कथेपेक्षा प्रपोगण्डाचं वजन जास्त झालं नसतं तर हा पोकळ डोलारा कदाचित इतका वाईट कोसळला नसता!
आपल्याकडे म्हण आहे की, एक सडका आंबा अवघी पेटी नासवून टाकतो. पण सध्याचं वास्तव त्याच्या अगदी उलट झालंय. सगळ्या पेट्याच नासक्या आंब्यांनी भरलेल्या आहेत. त्यात एखादाच आंबा चांगला असेल आणि दैवयोगाने त्याच्यावरच जर सडके आंबे वेचून फेकायची जबाबदारी आली तर? वरवर पाहाता हे काम अतिशय धाडसी, साहसी, शूर वगैरे गुणांनी संपन्न अशा रुबाबदार नायकाचं अथवा नायकांचं वाटतं. पण लक्षात घ्या, आपण बोलतोय ते वास्तवाबद्दल. वास्तवात जर सडक्या आंब्यांचीच बहुसंख्या असेल तर त्या चांगल्या आंब्याला त्यांना वेचून काढणे तर दूरच, पण निव्वळ जगणेदेखील अवघड होऊन बसणार हे सांगायला काही कुणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही. पाण्यात राहून मगरीशी वैर करणाऱ्या माश्याला प्रत्यक्षात केवळ मगरीपासूनच नव्हे तर स्वजातीय माशांपासूनही तितकाच धोका असतो की, न जाणो मगर याच्या नादाने आपल्यावरच उलटली तर काय? व्हिसलब्लोअर्स हे नाटक, सिनेमे आणि कथा, कादंबऱ्यांमध्येच नायक असतात. प्रत्यक्ष जगात त्यांच्यापैकी कित्येकांना लपत-छपतच जगावं लागतं. तुम्ही म्हणाल मासे काय, आंबे काय, मी काय खाण्यापिण्याच्या गोष्टींवर बोलतोय की काय! नाही, मी बोलतोय ते ब्रिटनच्या ‘बीबीसी’ची जगप्रसिद्ध मालिका, ‘लाईन ऑफ ड्युटी’बद्दल!
पोलिसांचं काम असतं, अपराध्यांवर वचक ठेवणं. पण पोलिसच गुन्हेगार झाले तर त्यांच्यावर वचक कोण ठेवणार? इथे येते ब्रिटिश पोलिस खात्यातील भ्रष्टाचारविरोधी शाखा, अर्थातच काल्पनिक ‘एसी १२’. या शाखेचा महाधिक्षक असलेल्या टेड हेस्टिंग्सचं (एड्रियन डनबार) एकच सूत्र आहे जे त्याच्या एका संवादातून वारंवार येतं, ‘I’m interested in bent Coppers and bent Coppers only’ . बेण्ट कॉपर्स अर्थात भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांच्या पलिकडे तो कसलाच विचार करत नाही. आणि एकदा का त्याला तसा वास आला तर तो कुणाच्या बापाच्यानेही थांबत नाही. या कामात त्याला मदत करतात त्याचे दोन निष्ठावंत सैनिक, स्टीव्ह अर्नॉट (मार्टिन कॉम्प्स्टन) आणि केट फ्लेमिंग (विकी मॅक्क्ल्यूर). एकेका पर्वात एकेका भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याचा पर्दाफाश करतानाच ते व पर्यायाने मालिका ही कुठेच भाषणबाज न होता देखील सबंध व्यवस्थेवर बोचरं भाष्य करून जाते.
या शेवटच्या मुद्यावर ‘लाईन ऑफ ड्युटी’ची तुलना ही ॲमेझॉनच्या ‘बॉश’शी (२०१४-२१) करता येईल. त्यातदेखील व्यवस्थेवर याच दर्जाचं भाष्य केलंय. यातदेखील ‘बॉश’सारखेच कसलाही धरबंद नसलेले अपराधी आणि नियमांच्या बेड्यांनी बांधलेले पोलिस आहेत. पण एका महत्त्वाच्या बाबतीत मात्र ‘लाईन ऑफ ड्युटी’ ‘बॉश’पेक्षा वेगळा मार्ग निवडते. हा या मालिकेचाच नव्हे तर ‘स्पूक्स’सारख्या (२००२-११) काही ओव्हर-द-टॉप मालिका वगळता बहुतांशी ब्रिटिश मालिकांचा स्थायीभाव आहे, तो म्हणजे नाट्यमयतेतील संयतपणा! प्रत्यक्षात दाखवताना ते एखादंच साहसदृश्य दाखवतील अथवा दाखवणारही नाहीत, पण आतमध्ये मात्र नाट्यमयतेचा कल्लोळ सुरू असतो व तो सूचकपणे त्यांच्या संहितांमधून बरसत असतो. कंटेंटच्या तात्पुरत्या मुसळधार पावसापेक्षा अशी दमदार रिमझिम मला भारी आवडते, अंतरात्म्यापर्यंत चिंब करून सोडते पार! ‘लाईन ऑफ ड्युटी’मध्येदेखील पहिल्या पर्वाच्या शेवटी जसा कथेत एक गूढ धक्का बसतो, तसा मालिकेच्या पटाचा अंदाज येऊ लागतो. तो पट इतका भव्य आहे की, आपले नायक त्याच्यापुढे खुजे वाटू लागतात. सामना अवचितच मानवी राम आणि महाकाय रावणाच्या सामन्यासारखा असंतुलित वाटू लागतो. त्रेतायुगात या युद्धाचा निकाल काय लागला होता, आपल्याला ठाऊकच आहे, पण कलियुगात कशाची खात्री देता येते का?
आपल्याकडे अशा विषयावर मालिका बनवताना एक तर व्यवस्थेची खूपच वरवर चाचपणी तरी केली जाते किंवा मग वोक कलाकारांचा अराजकवादी प्रपोगण्डा राबवून समस्त व्यवस्थेलाच खलनायक ठरवलं जातं. ‘लाईन ऑफ ड्युटी’ दोन्हीही प्रकारचा वेडगळपणा करत नाही. ते राजकारण, हितसंबंध वगैरे कशा कशाचीच पर्वा न करता थेट एखाद्या तीक्ष्ण दाभणीसारखे आतपर्यंत घुसत जातात, त्यातून निघणाऱ्या रक्त, पू यांच्याकडे लक्ष न देता मालिकेतील पात्रांचं शल्यकर्म सुरूच असतं. आणि अर्थातच ते नायक आहेत म्हणून त्यांना प्लॉट-आर्मर असण्यापेक्षा ते सगळेच आपापल्या कृतींचे परिणामही अतिशय कठोरपणे भोगतात. दुसरे म्हणजे ही मालिका कुठेच व्यवस्थेला खलनायक ठरवत नाही. उलट त्यातील सुष्ट पात्रांचा ते ज्या व्यवस्थेला सुधारू पाहातायत त्या व्यवस्थेच्या मूळ शिवस्वरूपावर अतोनात विश्वासच आहे. किंबहूना त्यांचा तसा विश्वास आहे, म्हणूनच ते सातत्याने हा द्राविडी प्राणायाम सहस्रावधी संकटांनंतरही करतच राहातात. या बाबतीत ही मालिका ‘बॉश’पेक्षा वरचढ आहे. कारण, हॅरी बॉशला निदान एका मर्यादेपलिकडे ढकलल्यावर थेट बॅटमॅन बनायचं सुख तरी आहे. पण ‘लाईन ऑफ ड्युटी’मधील एकही सुष्ट पात्र तसं करणं तर सोडाच, पण व्यवस्थेच्या विरोधात जाऊन व्हिजिलंट जस्टिस लादण्याचं मनातही आणत नाहीत. ते त्या व्यवस्थेच्या जाचक बंधनांत राहूनच आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत राहातात कारण, जर व्यवस्था सुधारण्यासाठी ती तोडण्याची गरज पडत असेल तर त्याच व्यवस्थेने त्यांच्यासारखे चांगले अधिकारीदेखील घडवले आहेत या सत्याशी आपोआपच प्रतारणा ठरेल. या दाहक परंतु सत्य अशा विरोधाभासामुळेच त्यांची हतबलता जास्त बोचत राहाते पाहाणाऱ्याला.
‘लाईन ऑफ ड्युटी’चं सगळ्यांत उत्कृष्ट वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात संशयाची सुई कुणाकडेही, अगदी कुणाकडेही फिरू शकते. हा तसा म्हटलं तर घासून-घासून गुळगुळीत झालेला प्रकार आहे. पण ही मालिका त्याच क्लिषेला वास्तववादी पुराव्यांचा असा काही भरभक्कम पाया देते की, प्रत्येक संशयित हा खरोखरच अपराधी वाटू लागतो. वर मी एका ठिकाणी लिहिले आहे की, केट आणि स्टिव्ह हे टेडचे निष्ठावंत आहेत, पण मालिकेच्या एकूण प्रवासात या तिघांच्याही निष्ठांचा अतिशय अनपेक्षित ठिकाणी अनेकदा कस लागतो व त्यातून कल्पनातीत कलाटण्या मिळत जातात. लेखनाच्या या सूक्ष्म कंगोऱ्यांसाठी या मालिकेची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे!
दुसरं खरोखर अनुभवण्यासारखं वैशिष्ट्य म्हणजे मालिकेत दाखवलेल्या अत्यंत वास्तववादी उलटतपासण्या अर्थातच इंटरॉगेशन्स. मालिकेच्या नाट्यमयतेतील निम्मं नाट्य हे या उलटतपासण्यांमध्ये आहे. आणि तरीही मी शपथेवर सांगू शकतो की एकदाही, अगदी एकदाही नाट्यमयता आणण्यासाठी म्हणून त्यांनी या चौकश्यांमध्ये आपण बॉलिवूडच्या सिनेमांत पाहातो तशा छपरी युक्त्या वापरलेल्या नाहीत. सगळं काही कायद्याने आणि कमीत कमी कल्पनाविलास करून! त्यामुळे त्यांचा उमटणारा ठसा हा अमिट आहे. अत्युत्कृष्ट ‘लाईफ ऑन मार्स’चा (२००६-०७) अत्यंत फालतू सिक्वल ‘ॲशेस टू ॲशेस’ (२००८-१०) पाहून माझे कीली हॉजच्या अभिनयाबद्दल अतिशय वाईट मत झाले होते. पण तिला या मालिकेत पाहून मी तिच्या अभिनयाच्या अक्षरशः प्रेमात पडलोय. आणि केवळ तिच नव्हे तर लेनी जेम्स, डॅनियल मेज, थँडीवे न्यूटन, स्टिव्हन ग्रॅहम, केली मॅक्डोनाल्ड अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या, वेगवेगळा बाज असणाऱ्या अभिनयसंपन्न कलाकारांनी मालिकेची मजा अनेकपटींनी वाढवली आहे. त्यातही टेड हेस्टिंग्सचे काम करणाऱ्या एड्रियन डनबारच्या वाट्याला आलेले संवाद इतके काही अप्रतिम आहेत की बासच! मालिकेत इन्क्लुझिव्हनेसच्या बळजबरीपायी जागोजागी व बरेचदा मुख्य भूमिकांमध्येही अनेक भारतीय वंशाचे कलाकारदेखील दिसतात. मी इथे जाणीवपूर्वक बळजबरीपायी असा शब्द वापरतोय, नाहीतर पटेल अशा गुजराती आडनावाच्या माणसाचं नाव गुरजित असं पंजाबी कोण ठेवतं बरं!
मालिकेत सूचकता आहे, नग्नता नाही. शिव्या आहेत पण त्यांचा मुक्तहस्ते वापर नाही. आपल्याकडच्या ज्या तथाकथित ओटिटी प्लॅटफॉर्म्सना वाटतं की या दोन गोष्टींशिवाय मालिका बनूच शकत नाही, त्यांनी ही मालिका पाहू नये, अन्यथा जन्माचा धक्का बसण्याची शक्यता आहे. पण या दोन गोष्टींव्यतिरिक्तही हल्ली जी इन्क्लुझिव्हनेसची जबरदस्ती केली जाते, तिला न्याय देण्यासाठी मालिकेने केलेली कसरत वाखाणण्याजोगी आहे. स्त्रिया सगळ्या चांगल्याच दाखवल्या पाहिजेत, विशिष्ट रंगाचे लोक गुन्हेगार नाही दाखवले पाहिजेत, विशिष्ट पंथाचे लोक आतंकवादी नाही दाखवले पाहिजेत वगैरे तथाकथित पोस्ट-ट्रूथ पॉलिटिकल करेक्टनेसच्या अट्टाहासाचा या मालिकेत दुसरी बाजूसुद्धा दाखवून शिताफीने समाचार घेतलाय. एका सीझनमध्ये तर एका लहान मुलाला जाणीवपूर्वक अकल्पनीय घाणेरड्या गोष्टी करताना दाखवलंय. आणि ही गोष्ट उगाचच घुसडलेली नाही, तर तिला मालिकेच्या विश्वात अतिशय पक्का आधारसुद्धा दिलाय.
ही ब्रिटिश मालिका असल्यामुळे आपल्याकडील मालिकांसारखे तिचे भरमसाठ एपिसोड्स नाहीत. सहा सीझन्स मिळून एकूण छत्तीसच एपिसोड्स आहेत. पण एक एक एपिसोड खराखुरा हिरा आहे हिरा! मालिकेची आत्तापर्यंत नऊ वर्षांत फक्त सहाच पर्वे झाली. सातवे पर्व यायला कथेत जागा आहे, पण ते येईलच असे नाही. आले तरी ते २०२३ च्या आधी खचितच येणार नाही. पण हाती असलेली सहा पर्वे देखील परिपूर्ण आहेत. एका वाक्यात सांगतो, काहीतरी परिपूर्ण आणि तरीही दर्जात्मकदृष्ट्या सर्वश्रेष्ठ पाहू इच्छित असाल तर, डोळे झाकून ‘बॉडीगार्ड’वाल्या (२०१८) जेड मर्क्युरिओच्याच तैलबुद्धीतून साकारलेली ‘लाईन ऑफ ड्युटी’ निवडा व अर्थातच डोळे उघडे ठेवून पाहा!
‘बॉश’च्या अखेरच्या पर्वात एक पात्र बॉशचा उल्लेख ‘Bosch is a living legend’ असा करते. हे वाक्य, हे लहानसंच वाक्य एखाद्या सुईसारखे माझ्या कानावाटे मेंदूत शिरले आणि सात पर्वांच्या, सात चित्रकोड्यांच्या, किमान सात हजार आठवणींचे धागे त्याने उसवायला सुरुवात केली. खरं तर नायकाचं नायकत्व अधोरेखित करणारं, त्याची स्तुती करणारं हे वाक्य. पण मला ते तसे वाटलं नाही. मला वाटला तो क्रूर विनोद, आपल्या आसपासच्या जगातील वाढतच चाललेला विरोधाभास अधोरेखित करणारा. बॉश या मालिकेत जे जे काही म्हणून करतो, ते ते सारं त्याचं एक पोलिस अधिकारी म्हणून कर्तव्यच असतं. पण साला, आपण अशा जगात राहातो ना की, हिरो होण्यासाठी हिरोगिरी करण्याची आजकाल गरजच उरलेली नाही, आपलं काम प्रामाणिकपणे करणे ही बेसिक गोष्टच हल्ली एवढी दुर्मिळ झालीये की, तिची पूर्तता करणारी कुणीही व्यक्ती आपसूकच हिरो, शब्दशः लिव्हिंग लिजण्ड वाटू लागते. मायकेल कॉनेलीच्या कादंबऱ्यांवर आधारित अमेझॉनची ‘बॉश’ ही मालिकाच व्यवस्थेवर नेमके भाष्य करणाऱ्या अशा क्रूर विनोदांनी, विरोधाभासांनी भरलेली आहे.
मी आजवर जितक्या काही मालिका पाहिल्या त्यात ‘बॉश’ सगळ्यांत वेगळी आहे. हिरोनिमस तथा हॅरी बॉश हा एलएपीडीतील हॉलिवूड डिव्हिजनचा होमिसाईड डिटेक्टिव्ह. मालिकेच्या प्रत्येक पर्वात तो एक केस सोडवतो व हा मोठा स्टोरी आर्क गाठतानाच तो काही छोट्या केसेससुद्धा सोडवतो. तुम्ही म्हणाल या परिच्छेदातील पहिलं वाक्य चुकलंय का? कारण या प्रकारच्या मालिकांचा सध्या इतका सुळसुळाट झालाय की स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मच्या गर्दीत डोळे झाकून दगड भिरकावला तरी तो सहजपणे अशाच एखाद्या मालिकेला लागेल. खरंय! ‘पोलिस प्रोसिजरल ड्रामा’ या जॉन्रामध्ये नको तितक्या मालिका बनल्या आहेत. पण तरीही मी छातीठोकपणे सांगतो की, ‘बॉश’ या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. आणि त्याचं कारण आहे, या मालिकेतील अतोनात वास्तववाद! म्हणजे नेमकं काय? तर एक पोलिस डिटेक्टिव्ह असतो, त्याच्यासमोर एखाद्या गुन्ह्याचा तपास लावायचे काम येते, तो ते काम आपल्या अक्कलहुशारीने करतो व अपराध्याला त्याच्या योग्य शिक्षेपर्यंत पोहोचवतो. हा झाला साध्यासरळ पोलिस प्रोसिजरल ड्राम्याचा फॉर्म. ‘बॉश’मध्ये हे सगळे गुण असूनही ती या पैकी कोणत्याही मार्गाने क्वचितच जाते. किंबहूना जातच नाही म्हटलं तरीही चालेल. उलटपक्षी बरेचदा बॉशसमोर येणाऱ्या केसेस हळूहळू मागची सीट पकडतात. ‘बॉश’ ही त्या अर्थाने डिटेक्टिव्ह मालिका नाहीच. तिचा मूळ उद्देश आहे व्यवस्थेवर दिलखुलास भाष्य करणं!
आपल्याला वाटतं की गुन्हा घडतो आणि पोलिस त्याचा छडा लावतात. पण ही प्रक्रियेची अक्षरशः दोन टोकं आहेत. या दोन टोकांच्या मध्ये जो पेपरवर्कचा डोंगर असतो, कल्पनेपलिकडचं हीनतम अंतर्गत राजकारण असतं, अत्यंत घाणेरड्या मनोवृत्तींचा गुंता असतो आणि छडा लावल्यानंतरही शिक्षेची कसलीच शाश्वती नसते. बहुतांशी पोलिस प्रोसिजरल ड्रामाज हे प्रोसिजरच्या या भल्यामोठ्ठ्या तुकड्याला एक तर हातच लावत नाहीत. किंवा तो अक्षरशः तोंडी लावण्याइतपतच सूचकपणे येतो. का? कारण सोपं आहे! यांच्यापैकी एकही प्रकार प्रेक्षकवर्गासाठी ग्लॅमरस नाही. उलट लिहायला, मांडायला आणि दाखवायला कमालीचा अवघडच आहे. ‘बॉश’ मी सगळ्यांत वेगळी म्हणतो ते यासाठीच की तिचा सगळा खेळ हा या नॉन-ग्लॅमरस प्रक्रियेत चालतो व गुन्हा घडणे आणि गुन्ह्याचा छडा लागणे या गोष्टी नैसर्गिकरित्या दुय्यम ठरत जातात.
याच मार्गाने जाणारी एक कमाल ब्रिटिश मालिका आहे, ‘लाईन ऑफ ड्युटी’ (२०१२-). पण ती बॉशसारखी एकनायकानुवर्ती नाही व तिचा विषयदेखील गुन्ह्यांशी संबंधित कमी व भ्रष्टाचाराशी संबंधित अधिक आहे. ‘बॉश’ची तुलनाच करायची झाली तर ती फक्त दुसरी एक ब्रिटिश मालिका ‘लुथर’शीच (२०१०-) होऊ शकते. एक तर दोन्हीही मालिका या पोलिस प्रोसिजरल आहेत. दोन्हीही मालिका या प्रोटॅगनिस्टच्या नावाने आहेत. दोन्हींचेही नायक हे समाज, डिपार्टमेंट, जग, यांनी अत्यंत नाडलेले आहेत. दोघांच्याही वैयक्तिक आयुष्यात कृष्णविवराएवढं दु:ख आहे जे त्यांना तिळातिळाने शोषून घेतंय. दोघेही सत्याचा शोध घेण्यासाठी कुणालाही बिनधास्त नडतात. किंबहूना दोघेही बॅटमॅन बनण्यापासून शब्दशः एक पाऊल मागे आहेत! पण तरीही दोन्हीही मालिकांमध्ये मूलभूत फरक आहे. लुथर हा माणूस व पोलिस अधिकारी म्हणून जितका भयानक व जबरदस्त असतो, त्याच्या एक टक्क्यानेही तो प्रत्यक्षात वागत नाही. उलट तो सतत काहीसा अपोलोजेटिकच वागत असतो. बॉश तसा अजिबात नाही. तो त्याच्या लिव्हिंग लिजण्ड असण्याला साजेसा वागण्याची धमक ठेवतो. तो अक्षरशः उद्धट वाटण्याइतपत खरं बोलतो. आणि त्यासाठी गरज पडेल तेव्हा कुणालाही फाट्यावर मारायला घाबरत नाही. तो सरळसोट भाला आहे, जो एकदा सुटला की लक्ष्यभेद करतोच करतो, मग भले लक्ष्यावर आपटून मोडलो तरी बेहत्तर! ‘बॉश’ची ओपनिंग थीम म्हणजे ‘कॉट अ घोस्ट’चं गाणं ‘आय गॉट अ फिलिंग दॅट आय काण्ट लेट गो’. बास! बॉश या एकाच तत्त्वावर काम करत असतो. मालिकेचं सार आहे त्या गाण्यात. अपराध घडलाय ही फिलिंग त्याला न्याय होईपर्यंत लेट गो करूच देत नाही. रात्रीचा दिवस करून आणि जग इकडचं तिकडे करून तो काम करतच राहातो. मी व्यक्तिश: ब्रिटिश मालिकांचा किती जरी पंखा असलो, तरीही मी प्रामाणिकपणे सांगतो, ‘बॉश’ ‘लुथर’पेक्षा शेकडो पटींनी भारी आहे!
सध्याच्या पुरोगामी व्यवस्थेमध्ये सुष्टांपेक्षा दुष्टांच्या मानवाधिकारांना जास्त किंमत दिली जाते. एखाद्या पोलिस अधिकाऱ्याने एखाद्या गुन्हेगाराला कायद्याने अटक केली तरी त्यावरून देशभर दंगली उसळून सबंध देश दिवसेंदिवस जाळला जाऊ शकतो व तो निवडणुकीतील भलामोठ्ठा मुद्दादेखील ठरू शकतो. अपराधी वाट्टेल ते करू वा बोलू शकतो, पोलिस अधिकाऱ्याने मात्र विनम्रतेचा पुतळा बनूनच वागले पाहिजे. त्याने हात बांधूनच काम केले पाहिजे. त्याने का उलट वार केला, तर त्याचं करिअर संपलंच समजा. या सगळ्यामुळे पोलिसदलात काय सुधारणा झाल्या असतील त्या असोत, पण त्याने एक झालं ते म्हणजे गुन्हेगारांसाठी अत्यावश्यक असणारा पोलिसांचा धाकच संपला. वाघाचे दात पाडल्यावर, नखे कापल्यावर त्याला कोण घाबरेल हो? आज कुणीही अपराधी हा सहजपणे लिंग, रंग, धर्म वगैरेंपैकी जे साजेल ते व्हिक्टिम कार्ड खेळून सहजच कायद्याचे गज वाकवू शकतो आणि निसटूनही जाऊ शकतो. याची अगदी खोऱ्याने उदाहरणे आपल्या आसपास रोज दिसतात. बॉशच्याही पायात व्यवस्थेच्या, आसपासच्या स्वार्थी वातावरणाच्या, कल्पनातीत राजकारणाच्या बेड्या आहेत. बॉश त्या बेड्या कधीच तोडत नाही, किंवा त्या तोडणं त्याच्या मूळच्या सैनिकी व्यक्तिमत्त्वातच नाही. पण त्या साखळीला वेळोवेळी ताणून आवाक्याबाहेरच्या आणि पगारापलिकडच्या गोष्टी करायला तो एकदाही मागे हटत नाही. त्याच्याबद्दल बोलताना एकदा त्याच्यावर फारसा खुश नसलेला एक अधिकारीदेखील बोलून जातो, Bosch goes where the truth takes him. इतके असूनही मी म्हणेन की बॉश नायक नाहीये. ज्या व्यवस्थेच्या रक्षणासाठी रात्रंदिवस झटतो, प्रत्यक्षात त्याच व्यवस्थेचा बळी आहे तो बळी!
आपल्याकडेही पोलिस आणि एकूणच व्यवस्थेबद्दल शेकडो सिनेमे आणि मालिका बनल्या आहेत, पण त्या ‘बॉश’पुढे एकजात सपाट वाटतात. कारण, किती जरी नाही म्हटले तरी त्या मनोरंजनाच्या सापळ्यात अडकून पात्रांना काळ्यापांढऱ्या रंगात रंगवू पाहातात. ‘बॉश’ ती चूक एकदाही करत नाही. ‘बॉश’मधील एक एक पात्र म्हणजे एक एक वल्ली आहे अक्षरशः! जेरी एडगर (जेमी हेक्टर), ल्यु. बिलेट्स (एमी अकिनो), क्रेट (ग्रेगरी स्कॉट कमिन्स), बॅरल (ट्रॉय इव्हान्स), चीफ अर्विंग (लान्स रेडिक), एलेनॉर विश (सेराह क्लार्क), हनी चँडलर (मिमी रॉजर्स) वगैरे प्रत्येकाच्या कपाटात त्यांचे त्यांचे व्यक्तिगत राक्षस लपलेले आहेत आणि त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यामागे शेकडो मुखवटेसुद्धा आहेत. गंमत म्हणजे मालिकेतील घटना लॉस एंजेलिसमध्ये घडत असल्या तरी एलए ही मालिकेसाठी नुसती जागा नाहीये, तर मालिकेतील महत्त्वाचे पात्र आहे ते खरोखर. मालिकेतील पात्रांना लागू पडणारे सगळे नियम एलएलाही तितकेच लागू पडतात. खरं तर मालिकेत एक मॅडी बॉश (मॅडीसन लिंट्झ) सोडल्यास कोणतेही पात्र पूर्णपणे काळे नाही वा पांढरेदेखील नाही. अगदी हॅरी बॉशसुद्धा पूर्णपणे पांढरा नाही. त्याच्यातही शेकडो त्रुटी आहेत, दोष आहेत. बॉशची अशी बहुढंगी भूमिका करणाऱ्या टायटस वेलिव्हरचे काम एकदा पाहाच. ही मालिका नायकाचे दोष दाखवताना एकदाही हात आखडता घेत नाही. किंबहूना मालिका कशातच हात आखडता घेत नाही. जे राजकीय मुद्दे बोलायला तर सोडाच चारचौघांत विचार करायलाही अडचणीचे वाटतात, त्यावर ‘बॉश’ने बिनधास्त सीझनच्या सीझन काढलेयत. त्यांचा ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’वरील सीझन तर स्क्रिनवर एखादा स्फोटक राजकीय मुद्दा किती संयतपणे व त्रयस्थपणे दाखवावा याचा वस्तुपाठ आहे अक्षरशः! त्या तुलनेत आपल्याकडील तथाकथित पुरोगामी म्हणून मिरवणारे कलाकार फक्त आणि फक्त उथळ खळखळाट तेवढा करतात, वैचारिकता औषधालाही दिसत नाही त्यांच्या कामात. अर्थात ‘बॉश’मध्येही इन्क्लुझिव्हनेसचा प्रमाणापलिकडचा अट्टाहास, एकाही अगदी एकाही पात्राचं वैवाहिक आयुष्य ठिक नसणं वगैरे प्रपोगण्डा आहेच.
‘बॉश’ची मला दुसरी सगळ्यांत जास्त भावलेली गोष्ट म्हणजे त्यात अॅक्शन जवळपास नगण्य आहे. पात्रे नुसतीच बोलत राहातात, रटाळ कामं करत राहातात, अत्यंत निरर्थक गोष्टींतून मागोवा काढत राहातात. अगदी दिड-दोन मिनिटे चालणारे सीन्स आहेत मालिकेत. अनेक उपकथानकं एकाच वेळी चालू असतात. तरीही असं वाटत राहातं की काहीच घडत नाहीये मालिकेत. पण एपिसोड संपल्याक्षणी जाणवतं, च्यायला ‘झी मराठी’वाल्यांच्या हजार एपिसोड्समध्ये जेवढं कथानक पुढे जात नाही तेवढं यांनी एकाच भागात पुढे नेलंय. मला सांगा, पोलिसांचं प्रत्यक्ष आयुष्य असंच असतं ना हो! थरारक पाठलागाचे, मारधाडीचे प्रसंग कितीसे येत असतील खऱ्या पोलिसांच्या आयुष्यात? क्वचितच ना! ‘बॉश’ला मी अतोनात वास्तववादी म्हणालो ते यासाठीच. ते नॉनग्लॅमरस रिअॅलिझममध्ये बुडी मारायला क्षणभरही घाबरत नाहीत. कारण, त्या एक एक बुडीतून ते शंभर टक्के रत्नच बाहेर काढतात! नुसतीच बडबड असूनही मी पैज लावून सांगतो की, मालिका एका क्षणासाठीही कंटाळवाणी होत नाही. उलट मी तर म्हणेन की, मी आजवर ऐकलेले बेस्ट डायलॉग्स जर कुणा मालिकेत असतील, तर ते ‘बॉश’मध्येच. एक एक प्रसंग हा नुसता चित्रकोड्याच्या एका तुकड्यासारखाच नाहीये, तर एकाच घटनेच्या शेकडो कंगोऱ्यांपैकी एक एक कंगोरा उलगडून दाखवणारा आहे. नॅरेटिव्ह स्ट्रक्चर कसं लेयर्ड आणि तरीही कसं एकजिनसी असावं ते शिकावं तर या मालिकेकडूनच. संवेदनशील असाल तर या गोष्टी अक्षरशः अंगावर येतात, व्यापून टाकतात, भिती वाटायला लावतात. मालिकेचा मुख्य भर हा अंगावर काटा आणणाऱ्या अवास्तव साहसदृश्यांपेक्षा आत्म्याला शहारा आणणार्या माईंडगेम्सवर आहे. आणि त्यात ही मालिका पूर्ण गुण मिळवते!
या मुद्याच्या बाबतीत तुलनाच करायची झाली तर ‘बॉश’ ही काहीशी जॅझ संगीतासारखी आहे. वरवर काहीसा आळशी, क्रमहीन वाटणारा हा संगीतप्रकार जसा तयार कानाच्या माणसाला समाधीप्रत नेऊ शकतो, नेमके तेच ही मालिका करते. किंबहूना त्यामुळेच कदाचित कॉनेलीने बॉशच्या अंधाऱ्या आयुष्यात जॅझचं पातळसर चांदणं लिहिलेलं असणार. जॅझ हा माझा वीकपॉईण्ट. रहमानने या संगीतप्रकाराची ओळख करून दिल्यापासून मी खुळावल्यासारखा जॅझ ऐकत असतो. ही मालिका मला प्रमाणापलिकडे आवडण्याचे हे ही एक कारण आहे की, या मालिकेत एखाद्या म्युझिकलएवढं जॅझ आहे. या मालिकेनेच ‘आर्ट पेपर’सारख्या दैवी कलाकारासोबत माझी ओळख करून देऊन केलेले उपकार मी जन्मात कधी विसरणार नाहीये. मालिका पाहा अथवा पाहू नका, पण संगीताचे चाहते असाल तर स्पॉटीफायवर हॅरी बॉशची प्लेलिस्ट जरूर ऐका. जॅझ आवडत असेल तर अक्षरशः वेड लागेल वेड! हॅरी बॉश हा असा बेक्कार माणूस आहे, ज्याची रहमानशी ओळख करून द्यायला, त्याच्यासोबत तासनतास रहमानबद्दल बोलायला मला अतिशय आवडेल. आणि खरं सांगतो, हे असं मला फारच थोड्या लोकांबद्दल वाटतं.
प्रत्येक पर्व हे कॉनेलीच्या एकाहून अधिक कादंबऱ्यांवर आधारित आहे. पण पर्व संपल्यावर ते केस संपल्याची भावना देण्याइतकेच आपल्याला एखादी परिपूर्ण कादंबरी ‘पाहिल्याची’ भावना देऊन जाते. इतकी परिपूर्णता मी तरी साहित्यावर आधारित कोणत्याच मालिकेत अथपासून इतिपर्यंत पाहिलेला नाही. भल्याभल्या मालिका शेवटाकडे ढासळताना पाहिल्या आहेत मी. ‘बॉश’ ही त्या दिव्य यादीत येते, जिला परफेक्ट शेवट कसा करावा ते समजले आहे. काही मालिका या ब्रेन्गॅझम देतात, काही माईंड्गॅझम देतात. ‘बॉश’ ही त्या दुर्मिळ प्रकारातील मालिका आहे जी तुम्हाला क्षणोक्षणी ब्रेन्गॅझम आणि माईंड्गॅझम तर देतेच, पण त्याच्याही पलिकडे जाऊन ती तुम्हाला वेळोवेळी भयानक ताकदीचा सोल्गॅझमसुद्धा देते. आणि खरंच सागतो सोल्गॅझम होणे हा आजच्या जगात शब्दशः दुर्मिळातील दुर्मिळ प्रकार आहे, अगदी या मालिकेच्या दर्जासारखाच! मनापासून सांगतो, इतकं लिहूनही ‘बॉश’चं दहा टक्केसुद्धा रसग्रहण मला जमलंय असं वाटत नाहीये. लवकरच येणारा ‘बॉश’चा स्पिनऑफदेखील या दर्जाला साजेसाच ठरो, अशी सार्थ अपेक्षा आहे.
‘बाय मोअर’ सुपरमार्केटच्या ‘नर्ड हर्ड’ या अत्यंत रटाळ आणि गचाळ अशा संगणक दुरुस्ती विभागात काम करणाऱ्या चार्ल्स तथा चक बार्टोव्स्कीचं (झकॅरी लेव्ही) आयुष्य एका रात्रीत पार बदलून जातं. त्याचं कारण म्हणजे चकचा एकेकाळचा स्टॅनफर्डसारख्या प्रथितयश विद्यापीठातील परममित्र आणि कालौघात परमशत्रू बनलेला ब्राईस लार्किन (मॅथ्यू बोमर). ब्राईसच्या कारस्थानामुळे चकला विद्यापीठाने काढून टाकलं होतं. त्या घटनेलाही आता चार वर्षं उलटून गेली. किंबहूना त्या घटनेमुळेच चकसारखा जग बदलू शकणारा अत्यंत हुशार विद्यार्थी आज ‘बाय मोअर’सारख्या फडतूस ठिकाणी काम करतोय. ब्राईस मात्र अजूनही त्याचा पिच्छा सोडत नाहीये. जगाच्या दृष्टीने साधा अकाऊंटंट असलेला लार्किन प्रत्यक्षात सीआयएचा अत्यंत खतरनाक गुप्तहेर आहे. पण तो आपल्याच देशावर उलटतो आणि ‘इंटरसेक्ट’ नावाचं सीआयएचं सगळ्यांत गुप्त संशोधन चोरतो. त्यावेळी झालेल्या मारामारीत ब्राईस तर मरतो, पण मरताना तो इंटरनेटचा सबंध प्रोग्राम चकला पाठवतो. आणि हा येडा चकदेखील तो बिनधास्त डाऊनलोड करतो. तो प्रोग्राम संगणकावर उघडताक्षणी पडद्यावर सहस्रावधी निरर्थक प्रतिमा दिसू लागतात. प्रतिमांचा तो स्फोट पाहाताच चकची तंद्री लागते आणि चक भोवळ येऊन कोसळतो. त्याला शुद्ध येते तेव्हा सकाळ झालेली असते व प्रोग्राम पूर्ण रन होऊन नष्टदेखील झालेला असतो.
त्या एका रात्रीत चकचं सारं आयुष्यच बदलून जातं. झालं असं असतं की, तो प्रोग्राम म्हणजे एक महासंगणक असतो. कूटप्रतिमांच्या स्वरूपात महाप्रचंड विदा तो चकच्या डोक्यात भरतो. आणि ती विदा म्हणजे प्रत्यक्षात सीआयएचा संपूर्ण विदानिधी (डेटाबेस) असतो. ब्राईस लार्किन, चकचा एकेकाळचा घनिष्ठ मित्र व जन्माचा वैरी, मरता-मरता चकच्या हाती सबंध अमेरिकेच्या सुरक्षेच्या किल्ल्या देऊन गेलेला असतो. या एका योगायोगामुळे साधाभोळा, काहीसा मूर्ख आणि अत्यंत अननुभवी चक अचानकपणे सीआयए आणि एनएसए या दोन्ही गुप्तदलांसाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण मालमत्ता (ऍसेट) होऊन बसतो! चकची सुरक्षितता ही अमेरिकन शासनाच्या प्राधान्यक्रमात सर्वांत वरच्या स्थानी येते. व त्यासाठी सीआयए आपली बेस्ट गुप्तहेर सेराह वॉकर (य्वेन स्ट्राहोव्स्की) तर एनएसए आपला सर्वश्रेष्ठ असॅसिन जॉन केसी (ऍडम बाल्डविन) अशा दोघांना पाठवतात. आणि मग सुरू होतो ‘चक’ नावाचा पाच पर्वे (२००७-१२) चाललेला अत्यंत विनोदी, अतिशय तंत्रशुद्ध रितीने मांडलेला, उत्तम अभिनयाने नटलेला, श्रेष्ठ लेखनाने सजलेला आणि पराकोटीचा रोमांचक असलेला खेळ!
‘चक’ची सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मालिका नुसती एस्पियोनाज-थ्रिलर नाही तर एस्पियोनाज-सिटकॉम-थ्रिलर आहे. या बाबतीत तुलनाच करायची झाली तर तिची तुलना जेम्स कॅमेरॉनच्या ‘ट्रू लाईज’सोबत (१९९४) करता येऊ शकते. अच्छा तुम्ही जर नीट विचार केला तर तुम्हाला दिसेल की ऍमेझॉन प्राईमवरील तथाकथित हिट मालिका ‘द फॅमिली मॅन’ने (२०१९-) ‘ट्रू लाईज’च्या संकल्पनेची शब्दश: चोरी केलीये. ते एक असो. पण ‘चक’ असं काही करायला जात नाही. उलट ‘ट्रू लाईज’च नव्हे तर पॉप कल्चरशी संबंधित अक्षरशः हजारो गोष्टींना ते आपल्या प्रत्येक एपिसोडमधून मानवंदना देतात. तुम्हाला जर ते सारे संदर्भ माहिती नसतील तरीही ‘चक’ अत्यंत मनोरंजक राहातेच, पण जर ते संदर्भ माहिती असतील तर तिच्या मनोरंजनमूल्याला काही मर्यादाच राहात नाहीत. ‘चक’मधील विनोद हे त्या संदर्भांमधून तर येतातच पण त्याहून जास्त ते परिस्थितीकडे पाहाण्याच्या तिरकस दृष्टीकोनातून येतात. शिवाय ‘चक’ची कथा ही अनेक पातळ्यांवर चालते. म्हणजे गुप्त मिशन्स ही एक पातळी. ‘बाय मोअर’चा स्टाफ, त्यांचे उपद्व्याप, त्यांच्या अडीअडचणी ही दुसरी पातळी. चकचं वैयक्तिक आयुष्य, त्याची बहिण एली (सेराह लँकेस्टर), तिचा बॉयफ्रेण्ड डेव्हन तथा कॅप्टन ऑसम (रायन मॅक्पार्ट्लीन) ही तिसरी पातळी. या तिन्ही पातळ्या कथानकांच्या दृष्टीने सशक्त तर आहेतच पण तिन्ही ठिकाणी विनोदाला अतिशय वाव आहे व त्याचा या मालिकेने अतोनात फायदा करून घेतलाय. गंमत म्हणजे जवळपास प्रत्येक एपिसोडमध्ये हे तिन्ही स्तर एकमेकांना छेदतात व एकमेकांवर प्रभाव टाकत असतात. ही बाब ज्या सुरेख पद्धतीने संहितेत लिहिली व दिग्दर्शनातून मांडलीये की मन अक्षरशः तृप्त होऊन जाते! खूप थोड्या मालिका असतात ज्या असं बौद्धिक, वैचारिक आणि समाधान देऊ शकतात.
त्याच धर्तीवर अजून एक विधान करतो की, खूप थोड्या मालिका अशा असतात ज्यातील प्रत्येक पात्र हे ती भूमिका साकारलेल्या अभिनेत्यासाठीच लिहिलंय असं वाटतं. ‘चक’ ही पात्रयोजनेच्या बाबतीत अत्यंत परिपूर्ण आहे. मुख्य कलाकारच नव्हे तर मॉर्गन ग्राईम्स (जोशुआ गोम्स), बिग माईक (मार्क ख्रिस्तोफर लॉरेन्स), लेस्टर पटेल (विक्रम सहाय), जेफ्री बार्न्स (स्कॉट क्रिन्स्की), जनरल बेकमन (बोनिता फ्राईडरिकी) अशा दुय्यम पात्रांच्या बाबतीतदेखील त्या त्या अभिनेत्याखेरीज इतर कुणाचाच विचारदेखील करवत नाही. मॉर्गनचे पात्र तर एखाद्या पात्राचा परिपोष कसा करावा याचा निव्वळ वस्तुपाठ आहे. किंबहूना मॉर्गन ‘द बिग बँग थियरी’मधील (२००७-१९) हॉवर्ड वॉलोविट्झचे (सायमन हेल्बर्ग) पात्र यांच्या आलेखात कमालीचे साम्य आहे. गंमत म्हणजे दोन्हीही मालिका वेगवेगळ्या नेटवर्क्सवर पण तरीही एकाच दिवशी (२४ सप्टेंबर २००७) सुरू झाल्या होत्या!
आपल्याकडे अशा विषयावर मालिका बनली तर इतकी सशक्त कथावस्तू नसेल एकवेळ, पण कमालीची नग्नता असणार म्हणजे असणारच! किंबहूना आपल्याकडील मेंढरीकरण झालेल्या मालिका त्याच मार्गाने जाव्यात याची ‘गरीबांच्या तारान्तिनो’ने पुरेपूर काळजी घेऊन ठेवलीये. ‘चक’ मात्र या ही आघाडीवर बाजी मारून जाते. तिच्यात उत्तानपणा आहे, पण नग्नता नाही. त्वेषाने केलेली वक्तव्ये आहेत, पण शिव्या नाहीत. किंबहूना त्या गोष्टी टाळल्यामुळेच ‘चक’चे रंजनमूल्य व स्मरणमूल्य कित्येक पटींनी वाढले आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे पर्वांमध्ये मांडल्या जाणाऱ्या आधुनिक मालिका म्हटल्या की त्या बहुसंख्यकांचा द्वेष करणाऱ्या व डाव्या विचारसरणीची काहीही करून भलामण करणाऱ्याच असणार, हे सांगायला कुणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. क्वचित एखाद्या अपवादाने सिद्ध होणारा अलिखित नियमच आहे म्हणा ना हा! ‘चक’चे वेगळेपण मात्र असे की, ती डाव्या विचारसरणीची भलामण करीत नाही, वर्णभेद मिटवण्याच्या बुरख्याआड गोऱ्यांचा द्वेष करीत नाही, अशांतीच्या दूतांचे गोडवे गात नाही.
किंबहूना ‘चक’मध्ये जो प्रपोगण्डा आहे तो प्रवाहाच्या नेमका उलट आहे. स्पॉयलर न देता सांगायचं तर एकवार तिच्यातील मुख्य खलनायकाच्या इंडस्ट्रीचा लोगो पाहा! असे हजारो, होय शब्दशः हजारो छुपे संदर्भ ही मालिका प्रत्येक एपिसोडगणिक देते. किंबहूना या मालिकेतील बहुतांशी नावे, पात्रे, स्थळे, घटना यांच्यात अनेक छुपे अर्थ आहेत. ते शोधणे व त्यांचा अन्वयार्थ लावणे हा एक वेगळाच मजेदार खेळ आहे. जॉन केसीचे पात्र तर उघडपणे कन्झर्व्हेटिव्ह आहे. तो रोनाल्ड रेगनचा चाहता नव्हे तर अक्षरशः भक्त आहे. तो क्लिंटन दांपत्याचा द्वेष करतो. तो सातत्याने अमेरिकेतील बंदुका बाळगू देण्याच्या स्वातंत्र्याची अभिमानाने भलामण करतो. तो कम्युनिस्टांना प्रकटपणे नावं ठेवतो. तोच कशाला, मालिकेतील नायक व नायकाच्या बाजूचे सगळेच कमालीचे राष्ट्रभक्त आहेत. ते सगळेच बलिदान, कुटूंबव्यवस्था, लग्नसंस्था इ. मूल्यांवर अतोनात विश्वास ठेवतात. बहुसंख्य भारतीयांच्या दृष्टीने ही मूल्ये अगदीच साहजिक असली तरीही सांप्रत जगाच्या हिशोबात त्यांना उजव्या विचारसरणीचीच मूल्ये मानतात. केसीचं काम करणारा ऍडम बाल्डविन प्रत्यक्ष आयुष्यात अगदी तसाच आहे. मुख्य नायक ‘चक’ची भूमिका करणारा झकॅरी लेव्ही अतिशय धार्मिक ख्रिश्चन आहे. आणि हे दोन्हीही योगायोग खचितच नाहीत! पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मालिका उजव्या विचारसरणीची आहे म्हणून ती चांगली आहे, असं नाहीये, तर ती एक चांगली मालिका आहे जी उजव्या विचारसरणीची आहे. हा लहानसा फरक समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे, विशेषतः आपल्याकडील उजव्यांनी! अपवाद वगळता आपल्याकडच्या बहुतांशी उजव्यांचं असं दिवास्वप्न असतं की, एखादी मालिका अथवा चित्रपट केवळ उजव्या विचारसरणीचा आहे म्हणून तो लोकांनी डोक्यावर घ्यावा, बाकी तो मनोरंजनाच्या आणि तांत्रिक आघाडीवर थोडा कमी पडला तरी चालेल. प्रत्यक्ष जगात असं नाही चालत. तंत्रशुद्ध पद्धतीने उजव्या विचारसरणीचा सार्थ व मनोरंजक ‘उरी’ (२०१९) किंवा ‘बाहूबली’सारखा (२०१५-१७) चित्रपट बनवा, तो धो-धो चालेल. पण केवळ उजव्या विचारसरणीच्या जोरावर लोक कधीच ‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ (२०१९) अथवा ‘पीएम नरेंद्र मोदी’ (२०१९) स्वीकारणार नाहीत, त्यांना रटाळ आणि फ्लॉपच म्हटलं जाणार. ही साधी गोष्टच लक्षात न आलेले लोक मग सबंध चित्रपटसृष्टीवरच बहिष्कार घालण्याची भाषा बोलू लागतात व लोकांची मते आपल्याला हवी तशी बनवू शकणारे एक फार मोठे अवजार आपल्या कर्माने दूर लोटतात! डावे कधीच अशा चुका करत नाहीत.
चुकांच्या विषयावरून आठवलं, ‘चक’मध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत बरं का! उदाहरणार्थ- मालिका काही ठिकाणी खूपच अतिशयोक्ती करते, तिच्यात वापरलेले विज्ञानही बरेचदा छद्मतेच्या सीमेत जाते. एवढंच कशाला, मालिकेचे अखेरचे पर्व तर काहीसे दिशाहीनच वाटते. ‘चक’ ही ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’चा (२०११-१६) दर्जा अधूनमधून गाठूनही तो राखण्यात कमी पडते, ते या लहानसहान चुकांमुळेच! मला व्यक्तिश: मालिकेचा शेवट अतिशय वेगळा, अकल्पनीय व खऱ्या अर्थाने बिटरस्वीट वाटला. पण तो सगळ्यांना आवडेलच असे नाही. अरे हो, बिटरस्वीटवरून आठवलं, ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा (२०११-१९) शेवट बिटरस्वीट असेल, असं म्हणाला होता ना खुनी म्हातारा? त्यावरून आणखी एक आठवलं, ‘एचबीओ’वर ‘जीओटी’ सुरू होण्याच्या बरोब्बर सहा दिवस आधी आधी ‘चक’च्या एका एपिसोडमध्ये (११ एप्रिल) ‘जीओटी’चा एक अत्यंत अर्थपूर्ण असा संदर्भ आहे! ‘चक’चा शेवट ‘जीओटी’पेक्षा दहा कोटी पटींनी चांगला आहे. पण मग ‘चक’ ही वाईट मालिका आहे का? काही मालिका असतात ज्या पाहून (किंवा न पाहाताच) तुम्ही इतरांसमोर भाव खाऊ शकता. या मालिका असतात ज्या तुम्ही केवळ सगळं जग बघतं म्हणून केवळ बघता आणि एकदा बघून झाल्यावर त्या परत पाहाण्याची तुमची अजिबातच इच्छा नसते. काही मालिका असतात ज्या तुम्ही आयुष्यात करायला काहीच नाहीये या गैरसमजातून केवळ बघायच्या म्हणून बघता. पण या सगळ्याच्या पलिकडे, काही मालिका असतात ज्या पाहाताना तुम्हाला त्या कधी संपूच नये असं वाटत असतं. या मालिका नुसत्या संपत नाहीत, तर सोबत तुम्हाला पार रितं करून सोडतात. ‘चक’ ही या तिसऱ्या प्रकारची मालिका आहे. ती खदखदून हसवते, त्यातील अनेकानेक धक्कादायक गोष्टींनी रोमांच उभे करते, संपू नये असं वाटायला लावते आणि संपल्यावर एखाद्या फर्मास लोणच्यासारखी मुरत जाते, आयुष्यभर!
एरिया ५१! अमेरिकेतील अतिगोपनीय, अतिसुरक्षित ठिकाण. ज्या ठिकाणाबद्दल अर्बन-लिजण्ड्स प्रसवली जातात, अशा या एरिया ५१ मधून सैन्याचा एक कॉन्व्हॉय काहीतरी अत्यंत महत्त्वाचं पार्सल घेऊन चाललाय. या कॉन्व्हॉयसोबत एक अपघात घडतो आणि ते पार्सल रस्त्यावरच उघडं पडतं! त्या पार्सलमधून निघतो एक झॉम्बी. पण नेहमीचा, साधा, सज्जन, बिनडोकपणे हळूवार चालणारा झॉम्बी नाही बरं, तो असतो एक चपळ, हुशार आणि म्हणूनच अनेकपटींनी खतरनाक सुपरझॉम्बी! तो अर्थातच सगळ्या सैनिकांना चावतो, मारून टाकतो. आणि जवळच असलेल्या एका शहरात निसटून जातो. ते शहर म्हणजे जुगाऱ्यांचा स्वर्ग, लास व्हेगास! जुगाऱ्यांच्या जीवाशीच जुगार होतो आणि बघता बघता सारे शहर संक्रमित होते. अमेरिकन शासन तत्परतेने सबंध शहर क्वारण्टाईन करते. इथे पाया रोवला जातो नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रकाशित झालेल्या झॅक स्नायडरच्या ‘आर्मी ऑफ द डेड’चा!
‘एओडी’चे हे ओपनिंग सीन्स झॅक स्नायडरच्या आजवरच्या कर्तृत्वाला साजेसेच आहेत. त्या सीन्सची एक एक फ्रेम ही सर्वोत्कृष्ट सिनेमॅटिक संवेदनांचा उच्चतम नमुना आहे. पण नुसतं तेवढंच नाही. स्नायडर या अगदी थोड्या मिनिटांच्या सिक्वेन्समध्ये अनेक अंत:स्थ विधानेसुद्धा सुंदर पद्धतीने करतो. उदाहरणार्थ, झॉम्बी उर्वरित अमेरिकेत शिरू नयेत म्हणून अमेरिकन शासन लास व्हेगासच्या भोवती भिंत बांधते. अमेरिकेचे घुसखोरांपासून रक्षण करण्यासाठी नेमके हेच ट्रम्पसुद्धा करणार नव्हता का? झॅक स्नायडरचे प्रोडक्शन हाऊस ‘द स्टोन क्वारी’चा लोगो बघा. दगड फोडण्यासाठीची हत्यारं असणारा हा लोगो तुम्हाला नकळतपणे विळा-हातोड्याची आठवण करून देतो. त्या झॅक स्नायडरच्या चित्रपटात ट्रम्पच्या धोरणाचे एकप्रकारे समर्थन होणे, हा गंमतीदार विरोधाभास आहे आणि तो योगायोग खचितच नाही! सैन्याचा जो कॉन्व्हॉय सुरुवातीच्या झॉम्बीला नेत असतो, त्या कॉन्व्हॉयचं नाव असतं, ‘फोर हॉर्समेन’! न्यू टेस्टामेंटनुसार जेव्हा अपोकॅलिप्स येईल तेव्हा त्याचे चार घोडेस्वार असतील. एझेकेलनुसार ते चार घोडेस्वार असतील – युद्ध, दुष्काळ, रानटी पशू आणि रोगराई. झॉम्बीचे निसटणे हे लास व्हेगाससाठी अपोकॅलिप्सच ठरते की! आणि त्यातूनच युद्ध, दुष्काळ, रानटी पशू व रोगराई त्या ठिकाणी येते, हाच तर चित्रपटाचा पाया आहे. स्नायडरला आपल्या चित्रपटांतून असे पौराणिक संदर्भ द्यायला भलतंच आवडतं. आणि हा सबंध सिक्वेन्स त्यातील छुपी विधाने, संदर्भ या सगळ्यांसह जबरदस्त जमून आलाय. चित्रपट जर एवढाच असला असता, तर स्नायडरच्या करिअरमधील बेस्ट शॉर्ट्सपैकी एक असला असता. एक सैनिक जेव्हा त्या झॉम्बीला घेऊन जाणाऱ्या कंटेनरच्या जवळ जात असतो आणि आपल्याला गोष्टी झॉम्बीच्या पीओव्हीने दिसू लागतात ते पाहा. जणू त्या प्राण्यासाठी सबंध जगच नव्याने निर्माण होत असतं! त्यानंतर जे गाणं आहे, ज्यातून नायकाची पार्श्वभूमी समजते, तो तर दिग्दर्शन आणि मांडणीचा अत्युत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल.
इतक्या जबरदस्त सांकेतिकतेच्या पार्श्वभूमीवर चित्रपट सुरू होतो. स्कॉट वॉर्ड (डेव्ह बॉटिस्टा) या पूर्वाश्रमीच्या मर्सेनरीकडे तनाका (हिरोयुकी सनाडा) हा कसिनोमालक येतो. आता निर्मनुष्य झालेल्या आणि झॉम्बीजनी गजबजलेल्या व्हेगासमधील त्याच्या कसिनोत २०० मिलियन डॉलर्स ठेवले आहेत. ते जर स्कॉट घेऊन येईल, तर त्याला त्या पैशांचा भलामोठ्ठा हिस्सा द्यायचा शब्द तनाका देतो. स्कॉट आणि त्याच्या सबंध कुटूंबाने एकेकाळी व्हेगासमधील झॉम्बींशी लढा दिला आहे. खूप काही गमावलंसुद्धा आहे. मिळणाऱ्या पैशांतून चांगलं आयुष्य जगता येईल, म्हणून तो तयार होतो. पण ही चोरी करायची तर ताबडतोब केली पाहिजे कारण, पुढच्या चारच दिवसांत शासन अणुबॉम्ब टाकून सबंध शहर नष्ट करणार आहे. स्कॉट तातडीने एक एक करून मारीया (ऍना डे ला रिगेरा), व्हॅण्डेरो (ओमारी हार्डविक), लुडविग डायटर (मथियास श्वाईगुफर), मरीयन पीटर्स (टिग नोटारो), राऊल कॅस्टिलो (मिकी गझमन) वगैरे सगळा क्रू जमवतो. तनाका त्यांच्या दिमतीला मार्टिन (गॅरेट डिलाहंट) हा आपला माणूस देतो. प्रवासात त्यांना स्कॉटची मुलगी केट (एला पर्नेल) व स्मगलर लिली (नोरा आर्नेझेडर) येऊन मिळतात. आता फक्त बॉम्ब पडण्याच्या आत जाऊन, चोरी करून परतणे एवढेच बाकी आहे आणि ते अजिबातच सोपे नाही. यावरून आपण अंदाज लावू शकता की, पुढे केवढी खतरनाक ऍक्शन वाढून ठेवली असेल.
पण असे काहीच होत नाही आणि चित्रपट भरभरून माती खातो! आता माती खातो म्हणजे काय? झॅक स्नायडरच्या कोणत्याही चित्रपटातील फ्रेम्स पाहा, अप्रतिम असतात. शॉट्सची त्याच्याइतकी जबरदस्त फ्रेमिंग क्वचितच कुणी करत असेल. तो स्वतः सिनेमटॉग्राफर असल्यामुळे त्याची समज पावलोपावली दिसून येते. पण त्याचवेळी हे ही लक्षात घ्या की, स्नायडर अत्यंत वाईट स्टोरीटेलर आहे. त्याच्या कोणत्याही चित्रपटाची कथा तो पडद्यावर अत्यंत वाईट रितीने मांडतो. त्याच्या कथा या कायमच पौराणिक संदर्भांनी भरलेला, वेगवेगळ्या अंत:स्थ विधानांनी ग्रासलेला गुंता असतो फक्त. तो कधी चालून जातो आणि बहुतांशी वेळा चुकतो! ‘एओडी’मध्येही तेच झाले आहे.
‘एओडी’ची सगळ्यांत मोठी त्रुटी म्हणजे हाईस्ट-फिल्म्स या जॉनरमधील बहुतांशी क्लिषेज त्यात आहेत. वॉश्ड-आऊट हिरो, वन लास्ट जॉब, मिसफिट्सचा क्रू, एक मसल, एक वॉनाबी, एक ड्रायव्हर, सगळा प्लॅन फसवणारा एक इनसाईड मॅन, त्यातून निर्माण होणारा चित्रपटांच्या भाषेत पॉईंट ऑफ नो रिटर्न, त्यातून नायकाची रायझिंग आणि मग शेवट! सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत या चित्रपटात. त्यामुळेच चित्रपट अत्यंत अनुमेय अर्थातच प्रेडिक्टेबल बनतो. चित्रपटाचे लेखन असे काही कमाल पातळीवर सुरू होते की ज्याचे नाव ते! पण जसजसा चित्रपट पुढे सरकतो, तसतसे लेखन अधिकाधिक आळशी आणि प्रेडिक्टेबलच्याही पलिकडचे प्रेडिक्टेबल होत जाते. याच दरम्यान चित्रपट हाईस्ट-फिल्म्सच्या क्लिषेजपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो आणि अजूनच गाळात रुततो. या बाबतीत मला नोलनच्या ‘टेनेट’चे (२०२०) उदाहरण द्यावेसे वाटते. त्यातसुद्धा हाईस्ट होती. साधीसुधी नव्हे तर टाईमबेंडिंग सायंटिफिक हाईस्ट होती. पण हाईस्ट-फिल्म्सच्या एकूण एक ट्रोप्सपासून तो मुक्त आणि तरीही जबरदस्त ट्विस्ट्स घेऊन येणारा होता. स्नायडरने ‘मॅन ऑफ स्टील’मध्ये (२०१३) नोलनची नक्कल करायचा प्रयत्न केला होता व तो समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी टोकाची भूमिका घ्यावी असा टोकाला गेला होता. इथे त्याने नोलनची नक्कल केलेली नाहीये, पण हा सगळाच चित्रपट अक्षरशः हवेत गोळीबार केल्यासारखा गंडलाय!
या सगळ्या गोंधळात चित्रपटाचा बचाव कशाने होऊ शकला असता, खतरनाक आणि बेक्कार ऍक्शनने! पण दुर्दैव म्हणजे ही ऍक्शनसुद्धा चित्रपटात खूपच उशिरा सुरू होते व तिच्यातही सातत्य नाही. ज्या चित्रपटाचे नावच ‘आर्मी ऑफ द डेड’ आहे, त्यात जर तुम्ही आर्मीच्या नावाखाली क्लायमॅक्समध्ये बजेट नसल्यागत पाच-पन्नास झॉम्बीज दाखवणार असाल, तर कसं चालायचं? झॉम्बीजचं तथाकथित साम्राज्यसुद्धा खूपच उथळपणे दाखवलंय. शिवाय जो झॉम्बी वाघ हा चित्रपटाचं मुख्य आकर्षण आणि म्हणूनच अवचितपणे दाखवायला हवा होता, तो सुरुवातीलाच दाखवून स्नायडरने जो काही हिरमोड केला आहे त्याला तोड नाही. एकतर चित्रपट हा स्नायडरने जणू काही झी मराठीच्या मालिकेकडून प्रेरणा घेतली असावी इतका संथ आहे. म्हणजे चित्रपट पाहात असताना खाली ती लाईन सुरू असते ना तुम्ही व्हिडिओ किती बघितलाय, किती उरलाय हे दाखवणारी? बास, त्या लाईनची जर गोगलगायीशी स्पर्धा लावली तर गोगलगाय उसेन बोल्ट वाटेल, इतका हा चित्रपट संथ आहे. इतका वेळ निरर्थक संवाद आणि बडबडीत घालवलाय की, झोप येऊ लागते आणि अचानक जागे होऊन डोळे उघडावेत तर अजूनही तोच सीन सुरू असतो!
स्नायडर हा स्नायडर म्हणून बेस्ट केव्हा असतो, जेव्हा त्याला कुणीतरी अतिशय ताकदीचा लेखक संहिता लिहून देतो! याचं उदाहरण म्हणजे, स्नायडरने दिग्दर्शित केलेला माझा आवडता चित्रपट ‘वॉचमेन’ (२००९) आणि या नियमाला अपवाद म्हणजे स्नायडरने लेखन करूनही कमाल जमलेला ‘३००’ (२००६)! एकाचा राजकीय आस डाव्या बाजूला झुकलेला तर दुसऱ्याचा उजव्या. दुर्दैव म्हणजे ‘आर्मी ऑफ द डेड’ दोन्हींच्याही दूरदूरपर्यंत जवळपासदेखील फिरकत नाही, ना सिनेमॅटिक अनुभवाच्या दृष्टीने ना राजकीय विधानांच्या दृष्टीने. मला माहिती आहे, दूरदूरपर्यंत जवळपास या शब्दयोजनेत विरोधाभास भरला आहे, पण विश्वास ठेवा हा चित्रपट त्याहून जास्त विरोधाभासांनी भरलेला व लूपहोल्सनी पिडलेला झाला आहे. चित्रपटाचं नाव जरी ‘आर्मी ऑफ द डेड’ असलं, तरी त्या डेथचं कारण खचितच बोअरडम आहे!
भारतीय (विशेषतः उत्तरेकडील) चित्रपटसृष्टी आणि अभारतीय चित्रपटसृष्टी यांच्यात एक मूलभूत अंतर आहे. भारतीय चित्रपटसृष्टी या सजीवीकरणाला (ऍनिमेशन) लहान मुलांनी पाहायची गोष्ट मानतात तर अभारतीय चित्रपटसृष्टी मात्र जे जे काही प्रत्यक्ष चित्रणातून साध्य होऊ शकत नाही अथवा ज्याची साथ लाभल्यास प्रत्यक्ष चित्रण अनेक पटींनी अधिक खुलते अशी गोष्ट म्हणजे सजीवीकरण, असे मानतात. पहिल्या वाक्यात मुद्दामहूनच दोन गोष्टी लिहिल्या आहेत. एक म्हणजे अभारतीय चित्रपटसृष्टी. कारण, केवळ पाश्चात्यच नाही तर अनेकानेक पौर्वात्य चित्रपटसृष्टीदेखील सजीवीकरणात अग्रेसर आहेत त्या केवळ सजीवीकरण म्हणजे लहान मुलांच्या गोष्टी असा डबक्यातला विचार न करण्यामुळेच. याचे अतिशय प्रसिद्ध उदाहरण म्हणजे आपणां सर्वांनाच ठाऊक असलेला युगो साकोंचा ‘रामायण – द लिजण्ड ऑफ प्रिन्स राम’ हा १९९२ सालचा चित्रपट. वरवर लहान मुलांसाठी वाटणारा हा चित्रपट मोठ्यांच्याही मनाला तितकाच हात घालतो. आज सुमारे दोन दशके उलटल्यावरही या चित्रपटाच्या तोडीचे काहीच आपल्याकडे बनले नाही, हा दैवदुर्विलास नसून आपले या माध्यमाकडे झालेले दुर्लक्ष आहे, असे माझे ठाम मत आहे. या बाबतीत आपल्याकडील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी उत्तरेकडील चित्रपटसृष्टींपेक्षा लाखों पटींनी पुढे आहेत, हा दुसरा मुद्दा. सजीवीकरण जरी नाही तरी केवळ विभासांच्या (व्हिज्युअल इफेक्ट्स) जीवावर उभे राहिलेले अनेकानेक चित्रपट तमिळ, तेलुगू, मलयाळम चित्रपटसृष्टींत दिसतात. तसे ते हिंदीतही दिसतातच. पण तुलना केल्यास हिंदीवाले तांत्रिकदृष्ट्या अजूनही खूपच मागे आहेत.
हे नमनालाच घडाभर तेल मी का ओततोय? काही वर्षांपूर्वी एक चित्रपटदिग्दर्शक माझ्याकडे आला होता. त्याला ओटिटी प्लॅटफॉर्म्सवर पिच करण्यासाठी कल्पना हव्या होत्या. मी त्याला सुचवले की, “चित्रपटसृष्टींमध्ये विज्ञानकथा हा प्रकार फारसा का हाताळला जात नाही माहितीये? कारण त्यांना कथा कळत नाही आणि विज्ञान तर त्याहून कळत नाही. त्यांची सगळी अक्कल विज्ञानाच्या नावाखाली उथळ पाण्याच्या बालिश खळखळाटात. मी तुला दहा परिपक्व विज्ञानकथा देतो. त्या कथा आपण सजीवीकरण अधिक प्रत्यक्ष चित्रण अशा मिश्रणातून मांडू. ही कल्पना जर चालून गेली तर हवी तितकी पर्वे करू शकतो आपण”. त्याने त्यावर नेहमीचेच उत्तर दिले, “लहान मुलांसाठीचे कार्टून्स ओटिटीवर कोण पाहील”? मी म्हणालो, “अरे बाबा, सगळ्या कथा प्रौढांसाठीच असतील”. पण त्याला काही ते पटलं नाही. अर्थातच तो प्रकल्प बारगळला. आणि काही दिवसांपूर्वी माझ्या दृष्टीस डेव्हिड फिंचर, टिम मिलर व जोशुआ डोनेन कार्यकारी निर्माता असलेली नेटफ्लिक्स मालिका “लव्ह डेथ + रोबॉट्स” पडली. अधाश्यासारखा पहिला सीझन खात असताना त्या तथाकथित दिग्दर्शक मिनिटाला मिनिटागणिक कचकचीत शिव्या घालताना जी काही मजा आली, त्याला तोड नाही.
लघुपटसंग्रह अथवा अँथॉलजीचा सगळ्यांत मोठा लाभ हा असतो की, प्रेक्षकांना ठराविक विषयावर खूप मोठ्या आवाक्यातील अभिव्यक्ती हाताळलेल्या पाहायला मिळतात. “लव्ह डेथ + रोबॉट्स” या शीर्षकातच मालिकेतील कथांचे विषय सहजपणे दिसतात. संग्रहातील प्रत्येक कथा या शीर्षकातील एक किंवा अनेक विषयांचा मागोवा घेतात. पण हा मागोवा त्या घेतात, विविध विज्ञानकथालेखकांच्या लेखणीच्या जोरावर. मालिकेतील बहुतांशी कथा या कोणत्या ना कोणत्या लघुविज्ञानिकेचे दृक्माध्यमासाठी केलेले अनुकूलन (अडॅप्टेशन) आहेत.
प्रलयोत्तर (पोस्ट-अपोकॅलिप्टिक) इंग्लंडमध्ये अवैध मारामारीत सहभाग घेणारी नायिका (सॉनी’ज् एज) ही धक्कातंत्राचे उत्तम उदाहरण आहे. प्रलयोत्तर जगात तीन यंत्रमानव फिरायला आलेयत (थ्री रोबॉट्स) ही कथा प्रलयोत्तर जगाचाच विषय हाताळते, पण त्यांचा दृष्टीकोन पूर्णतः वेगळा आहे. त्या कथेतून केवळ स्टेटस सिम्बॉल म्हणून विविध ऐतिहासिक स्थळे फिरणाऱ्या पण प्रत्यक्षात इतिहासाची फारशी जाण व आवड दोन्हीही नसणाऱ्या पर्यटकांवर उत्कृष्ट रूपक साधले आहे. त्या पुढील ‘द विटनेस’ ही कथन आणि तंत्र अशा दोन्हीही पातळ्यांवर या संग्रहातील माझ्या सर्वाधिक आवडत्या कथांपैकी एक. का, ते तुम्हीच बघून ठरवा. ‘सूट्स’ कथेतून आक्रमक आणि आक्रमित यांच्या वरवर दिसणाऱ्या भूमिकांवर कमालीचे तिरकस भाष्य केले आहे. ही कथा पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की, सध्यादेखील जगभरात व्हिक्टिमकार्ड खेळणाऱ्यांकडून हेच सुरू नाहीये का! ‘सकर ऑफ सोल्स’ अभिजात थराराचा अनुभव देते, तर ‘बियॉण्ड द अक़ीला रिफ्ट’ मायावादाकडे एका वेगळ्याच दृष्टीने पाहाते. ‘गुड हंटिंग’ ब्रिटिशांच्या वसाहतवादासोबतच औद्योगिक क्रांतिचा विषय चीनी पुराणशास्त्राच्या पार्श्वभूमीवर हाताळते, तर ‘द डम्प’ भयकथा आणि तत्त्वज्ञानाच्या सीमेवर गूढ नृत्य करते. विज्ञानकथेची एक उपशैली आहे, ‘मिलिट्री-सायफाय’. त्या शैलीत मोडणारी ‘शेप शिफ्टर्स’ ही कथा कल्पनाविलासाच्या आडून वर्णद्वेष आणि अमेरिकेतील दासप्रथा मांडू पाहाते, तर ‘द हेल्पिंग हँड’ अवकाशातील थराराचा रोमहर्षक पट उलगडते. मिलिट्री-सायफाय प्रकारचीच ‘लकी १३’ निष्ठा आणि श्रद्धेची एक आगळीच कहाणी सांगते. ‘आईस एज’ कथा सिद्ध करते की मनाची कवाडे जर उघडी असतील तर कल्पना करायला, ती कागदावर मांडायला आणि कागदावर मांडलेली कल्पना पडद्यावर चित्रित करायला कसलंच बंधन नसतं. युद्धाच्या काळात कम्युनिस्ट रशियाच्या सैन्याने केलेला एक प्रयोग केवढा अंगाशी येतो याचं काल्पनिक, तरीही भयकारी पण तितकंच ह्रदयस्पर्शी चित्रण ‘द सिक्रेट वॉर’मध्ये आढळते.
नुकतेच या मालिकेचे दुसरे पर्व प्रकाशित झाले. पहिल्या पर्वात असलेल्या १८ भागांच्या तुलनेत दुसरे ८ च भागांचे पर्व निम्म्याहून छोटे आहे. पण त्यातही ‘ऑटोमेटेड कस्टमर सर्व्हिस’ तंत्रज्ञानावर आणि बिगटेक कंपन्यांवर प्रमाणाबाहेर विसंबणाऱ्या समाजाचं भयाण वास्तव चित्रित करते. ही कथा काल्पनिक आहे, पण ती कल्पना सत्यात उतरायचा दिवस कदाचित कल्पनेहूनही जवळ असेल. पुराणकाळापासून माणसाने कायमच अमरत्त्वाचा ध्यास घेतलाय. पण ज्या अमरत्त्वाला उत्तर मानावं ते नीतिमत्तेचे केवढे मोठे प्रश्न उपस्थित करू शकते, याचा मागोवा ‘पॉप स्क्वाड’ घेते. कदाचित म्हणूनच पुराणांतरी अमरत्त्व मागणारे बहुतांशी राक्षस असावेत. अमरत्त्वाचीच दुसरी गहन बाजू सांगण्याचा प्रयत्न ‘स्नो इन द डेझर्ट’ मार्मिकपणे करते. ‘द टॉल ग्रास’ ही अतिशय नेटकेपणाने विणलेली पक्की भयकथा आहे. आणि भयकथेच्याच अंगाने जाणारी लहानशी ‘ऑल थ्रू द हाऊस’देखील तितकीच कमाल आहे. ‘लाईफ हच’ ही जीवनसंघर्षकथा (सर्व्हायवल स्टोरी) काळजाचे ठोके चुकवते. पण या दोन्हीही पर्वांमध्ये मिळून माझी सर्वाधिक आवडती कथा आहे ती, ‘द ड्राऊन्ड जायण्ट’. अतिशय काव्यात्म भाषेत उलगडणारी ही विज्ञानकथा घटनात्मक कमी आणि अंतर्मुख करायला लावणारीच जास्त आहे.
पण म्हणून दोन्हीही पर्वांमध्ये वाईट कथाच नाहीत असं नाही. ‘व्हेन द योगर्ट टुक ओव्हर’ ही कथा रूपक म्हणून अतिशय उत्तम आहे, पण लघुपट म्हणून तितकीशी भिडत नाही. त्या उलट ‘फिश नाईट’ अतिशय उत्तमरित्या मांडली आहे, पण अखेरीस एकूणात मुद्दा नसल्यासारखी वाटते. ‘ब्लाईंड स्पॉट’ कथा वाईट नाही, पण त्यात काही ‘वाह’ म्हणावं असं घडतही नाही. तिला मी चांगली, पण श्रेष्ठ नाही अशा वर्गात टाकेन. या उलट ‘अल्टरनेट हिस्ट्रीज’मध्ये क्षमता अचाट होती, पण त्याचा १% ही वापर त्यांनी केला नाही. त्यांचं सगळं लक्ष सतत काहीतरी विनोदी घडवण्यातच जास्त होतं. ‘झिमा ब्लू’ ही कथा एखाद्या अमूर्त चित्रशैलीसारखी आहे. तुम्ही तासनतास तिची स्तुती करू शकता, पण त्या स्तुतीसुमनांतील एकही मुद्दा सिद्ध करू शकत नाही. ती अतिशय प्रेडिक्टेबल तर आहेच, पण त्यांनी रहस्योद्घाटन खूप आधीच केल्यामुळे तिचा पडायचा तेवढाही प्रभाव पडत नाही. दुसऱ्या पर्वात मुळातच कमी कथा आहेत. त्यामुळे ‘आईस’ ही वाईट जरी नाही तरी त्यातल्या त्यात दुर्बळ असलेली कथा अधिकच वाईट प्रकारे उठून दिसते एवढंच. अर्थात, हे माझे मत झाले. तुमच्या दृष्टीने दोन्हीही पर्वांतील चांगल्या व वाईट कथा या पेक्षा वेगळ्या असू शकतात. मुद्दा फक्त एवढाच आहे की, संग्रह म्हटला म्हणजे दर्जात्मक एकजिनसीपणाचा बळी हा जातोच.
मालिकेचे मला सर्वाधिक भावलेले वैशिष्ट्य म्हणजे, वेगवेगळ्या कथांचे सजीवीकरण वेगवेगळ्या स्टुडियोजनी केले आहे. त्यामुळे क्वचित विषय सारखेच असले तरी प्रत्येक कथेचं व्यक्तिमत्त्व दुसरीहून स्वतंत्र दिसून येतं! काही कथांचं सजीवीकरण चित्रासारखं विस्मयचकित करणारं झालंय तर काहींचं पात्रे अगदी जिवंत वाटावीत इतकं खरंखुरं झालंय. सजीवीकरण म्हणजे पोरखेळ न मानता अभिव्यक्तीचं माध्यम मानलं तर ते कथाकथनात काय साध्य करून देऊ शकतं हे अनुभवायचं असेल, तर ही मालिका पाहिली’च’ पाहिजे. विशेषतः त्यातील काही कथा या सजीवीकरण अधिक चित्रपटीय कथनतंत्रे यांची इतकी अफाट सांगड घालतात की, त्यांचा एकत्रित परिणाम हा कमालीचा रोमहर्षक घडतो. तुम्ही जर सजीवीकरण म्हणजे चारदोन माहितीतील स्टुडियोज इतकाच मर्यादित विचार करत असाल, तर ही मालिका तुमची या विषयाकडे बघण्याची दृष्टीची बदलून सोडू शकते. सजीवीकरण हा मोठ्ठा परीघ पकडून या मालिकेने एखादे कलात्मक प्रदर्शन भरवावे तशा कथेगणिक विविध शैली समर्थपणे हाताळल्या आहेत. एका विशिष्ट मुद्यावर इथे टिप्पणी करणे मला अतिशय गरजेचे वाटते. आपल्याकडे जेव्हा सजीवीकरण करतात, तेव्हा त्या व्यक्तींची त्वचा अगदीच नितळ दाखवतात, त्यांच्या कपड्यांवरील सुरकुत्याही अगदीच आळशीपणाने रेखाटतात. उलट माझ्या दृष्टीने चांगले व खरेखुरे वाटणारे सजीवीकरण तेच ज्यात पात्रांची त्वचा ही तुमच्या-माझ्या त्वचेसारखीच सुरकुत्या, डाग, वांग, खड्डे यांचे चपखल मिश्रण असलेली, त्रुटीपूर्ण दिसते. ज्यात कपड्यांवर सुरकुत्या या यादृच्छिक नव्हे तर, हालचालींना अनुरूप अशाच पडतात. या दोन्हीही संग्रहांमध्ये जेव्हा जेव्हा सजीवीकरणाची शैली वास्तववादाकडे झुकलीये, तेव्हा तेव्हा त्यांनी या बारीकसारीक बाबीदेखील साध्य करून दाखवल्या आहेत!
मी वर एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे भारताबाहेर बहुतांशी ठिकाणी सजीवीकरणाला लहान मुलांपुरतंच मर्यादित मानत नाहीत. त्यामुळे दोन्हीही पर्वांतील कथा या प्रौढांसाठीच आहेत. त्यांच्यात कामुकता, रक्तपात, बीभत्सपणा, नीचपणा यांची रेलचेल आहे, इतकी की काही काही वेळा मालिका केवळ नेटफ्लिक्सची आहे म्हणून या गोष्टी घुसडल्या किंवा तशाच कथा निवडल्या की काय असे वाटून जाते. थोडक्यात, काहीतरी टोकाचं दाखवणं म्हणजेच वेगळा विचार करणं हा प्रकार इतरत्रही कमीअधिक प्रमाणात का होईना आहेच. किंबहूना तो इतरत्र आहे, त्याचीच नक्कल इकडचे अनेक तथाकथित ‘स्वतंत्र’ विचार करणारे करतात, हे उघड गुपित आहे. पण अर्थात, प्रौढांसाठी म्हटलं की ‘तेवढंच’ येत नाही. मालिकेतील बहुतांशी कथा या विचारप्रवर्तक आहेत, अंतर्मुख करून सोडणाऱ्या आहेत, लेकी बोले सुने लागे असे रूपक करणाऱ्या आहेत. ईशोपनिषदात अध्यात्म आणि विज्ञान यांच्यापैकी कशालाच कमी लेखलेले नाही, उलट दोन्हींनाही उचित महत्त्व दिलेलं आहे. विज्ञान म्हणजे तरी काय, तर भौतिक जगात सिद्ध करता येण्याजोगे तत्त्वज्ञानच असे मी मानतो. “लव्ह डेथ + रोबॉट्स”मधील बहुतांशी कथांच्या मुळाशी असेच विज्ञानाचे तत्त्वज्ञान आहे. त्यामुळेच त्या कथा आणि पर्यायाने दोन्हीही संग्रहच त्या त्या देशकालपरिस्थितीपुरते मर्यादित न राहाता वैश्विक होऊन जातात. आणि ज्याचे डोळे बाहेरूनच नव्हे तर आतूनही उघडे असतात, त्याला वैश्विकता ही भावतेच भावते!
हच मॅन्सेल (बॉब ओडेनकर्क) हा एक सर्वसाधारण, मध्यमवयीन आणि मध्यमवर्गीय मनुष्य आहे. पुलंनी लिहून ठेवलेले बहुतांशी त्रासदायक ग्रहयोग नशिबात वाढून ठेवलेल्या कुणाही सर्वसामान्य माणसासारखा माणूस म्हणजे हच मॅन्सेल. त्या धोंडो भिकाजी कडमडेकर-जोश्याच्या आयुष्यासारखं आयुष्य त्याचं. त्याला बायको आहे, दोन गोंडस मुलं आहेत. बायको करिअरमध्ये प्रचंड यशस्वी आणि हा मात्र सासऱ्याच्या वर्कशॉपमध्ये साधं काहीतरी काम करतो. आसपासचे लोकच नव्हेत तर सख्खं पोरगंसुद्धा येता-जाता, कळत-नकळतपणे हचच्या कर्तृत्वशून्यतेवरून त्याला टोमणे मारत असतो. या अशा ‘असामी’ हचच्या घरी एके दिवशी दोन चोर शिरतात. हचचं पोरगं मोठ्या धिटाईने एका चोरावर झडप घालतं. चोरासोबत असलेली चोरणी मुलावर बंदूक रोखते. हच तिच्या पाठिमागून येतो. हचच्या हातात गोल्फस्टिक आहे. आता फक्त एकच फटका आणि काम तमाम! पण.. पण हचचा हात वार करायला धजतच नाही. चोर सहिसलामत निसटून जातात. मार खाल्लेला, जीवनातील प्रत्येक क्षेत्रासारखाच या ही बाबतीत अपयशी झालेला हच कार्यालय, शेजार-पाजार सगळ्यांच्याच विनोदाचा विषय होतो. चार-दोन दिवसांनी हचची धाकटी मुलगी त्यांच्या मांजरीचा पट्टा शोधत असते. तो सापडत नाही म्हटल्यावर निष्कर्ष निघतो की चोरांनी इतर गोष्टींसोबतच तो पट्टादेखील चोरलाय. नुकताच घरी परतलेला हच हे ऐकताच मनातील राग, आजवरचा अपमान, टोमणे, टोचून बोललेले शब्द सारं काही उरात घेऊन निघतो. ‘नोबडी’ असलेल्या हचच्या पूर्वायुष्यातील एक एक पान हळूहळू उलगडू लागते.
‘नोबडी’चं नुसतं ट्रेलर जरी पाहिलं तरी कुणीही सहजपणे त्याची तुलना ‘जॉन विक’शी (२०१४) करेल. ‘जॉन विक’चा निर्माता डेव्हिड लाईच या ही चित्रपटाचा निर्माता आहे म्हटल्यावर तर ही तुलना अजूनच साहजिक वाटू लागते. दोन्हीकडे मुख्य खलनायक रशियन माफिया आहेत. पण दोन्हींमध्ये खूप सारे फरक आहेत. ‘जॉन विक’चा अप्रोच खूपच जास्त स्टायलिश आहे. म्हणजे फाईटसीन्समध्ये जॉन विकने समजा मार जरी खाल्ला, तरी तो शैलीदारपणे मार खातो. त्याच्या जखमा आणि व्रणदेखील एखाद्या चित्रासारख्या दिसतात आणि कवितेसारख्या पाझरतात. जॉन विक शेकडो जणांना मारतो आणि त्याच्या कपाळावर आठीसुद्धा उमटत नाही. ‘नोबडी’चा अप्रोच मात्र अधिक वास्तववादी आहे. हचने पाच-सात जणांना जरी मारले तरी ते करायला जितका वेळ खरोखरच लागला पाहिजे, तितकाच वेळ त्याला लागतो. किंबहूना त्या लोकांना मारताना तो ही तितकाच जखमी होतो, जितका अशा मारामारीत सापडलेला कुणीही होईल. ‘जॉन विक’ इतकाच ‘नोबडी’ प्रेडिक्टेबल आहे. त्याचाही आरंभ, मध्य आणि अंत सहजच ओळखता येण्यासारखा आहे. पण जॉन विक हा प्रवास शिताफीने पार पाडतो. हचला मात्र या आखीव प्रवासातही पदोपदी ट्विस्ट्स आणि टर्न्सची साथ आहे. थोडक्यात, तुम्ही किती जरी प्रयत्न केले तरी प्रत्यक्षात कधीच जॉन विक बनू शकत नाही. पण तुम्ही जर योग्य प्रशिक्षण घेतले तर हच मॅन्सेल होणं अशक्य नाही. या मुद्यावर ‘नोबडी’ पूर्ण गुण मिळवतो.
वरच्या परिच्छेदात सांगितलेला प्रेडिक्टेबल असूनही ट्विस्ट्स आणि टर्न्सने भरलेल्या प्रवासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. हच ज्या वेळी त्या दोन चोरांना शोधायला बाहेर पडतो, त्या वेळी मी विचार करू लागलो होतो की, चिडलेला नायक विरुद्ध दोन चिंधीचोर हा संघर्ष काय कप्पाळ मनोरंजक ठरणार? पण पुढील पाचच मिनिटांत चित्रपटात असा काही ट्विस्ट येतो की, संघर्षाचा पट अनेक पटींनी विस्तारून जातो. हे श्रेय दिग्दर्शकापेक्षाही नि:संशय डेरेक कोल्स्टॅड (यानेच ‘जॉन विक’सुद्धा लिहिला होता) या लेखकाचे आहे. ज्यांना स्क्रिनरायटिंग स्मार्ट कशी असावी याचा अभ्यास करायचा आहे, त्यांनी तर ‘नोबडी’ आवर्जून पाहावा. हचचं एकसुरी आयुष्य चितारायला हिंदी चित्रपटांनी काही मिनिटं आणि एक गाणं दवडलं असतं, मराठी मालिकांनी तेच दाखवायला पाचशे भाग आणि पन्नास महाएपिसोड्स खर्ची घातले असते. ते हचचं आयुष्य ‘नोबडी’ अवघ्या काही सेकंदांत दाखवतो. आणि काही मिनिटं ते पाचशे एपिसोड्स यांचा मिळून जितका प्रभाव पडला नसता त्याहून अनेकपट अधिक प्रभाव त्या काही सेकंदांचा पडतो. हे यश लेखक डेरेक कोल्स्टॅड आणि दिग्दर्शक इल्या नाईशुलर या द्वयीचेच म्हटले पाहिजे. पण मी सांगत होतो ते स्मार्ट स्क्रिनरायटिंगबद्दल. हच आणि त्याची पत्नी बेका (कॉनी निएल्सन) यांच्यातील नात्याची पडझड दाखवताना हिंदी चित्रपटांनी पाच रोमँटिक सीन्स, पाच दु:खी सीन्स आणि अरिजितच्या आवाजात नव्वदच्या दशकातील एखाद्या चांगल्या गाण्याचा खून पाडला असता. ती गोष्ट हा चित्रपट दोनच ओळींच्या संवादांतून अधोरेखित करतो. दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा आपल्या प्रेक्षकांच्या बुद्धीवर विश्वास असला की, लेखकाला असे स्वातंत्र्य सहजतेने दिले जाते. चित्रपटातील एखादा निरर्थक वाटणाऱ्या प्रसंगानेही चित्रपटाच्या एकूण पटावर पुढे चालून परिणाम घडवावा, असेच प्रसंग लिहिले व निवडले आहेत, ही अतिशय शिकण्यासारखी बाब आहे. हचच्या वडलांचे, डेव्हिड मॅन्सेलचे (ख्रिस्तोफर लॉईड) पात्र तर उत्तम लेखनाचा उत्कृष्ट नमूना म्हणून पाहिले पाहिजे. हचचे पूर्वायुष्य बऱ्याच अंशी उलगडते ते तो वेळोवेळी त्याच्या बळींना जे सांगतो त्यातून. त्यातही कुठेच प्रतिमा नाहीत. शुद्ध, स्पष्ट संवाद! पण त्या नुसत्या सांगण्यातही त्यांनी दोन वेळेस जो विनोदी ट्विस्ट आणलाय, तो स्मार्ट रायटिंगचेच उदाहरण आहे.
इतके असूनही वर लिहिल्याप्रमाणे ‘नोबडी’मध्ये एक मोठा दोष आहे, तो म्हणजे त्याची प्रेडिक्टिबिलिटी. या प्रेडिक्टिबिलिटीमुळेच चित्रपट एन्जॉयेबल राहूनही ग्रेटनेसप्रत पोहोचत नाही. ते ही झालं असतं. पण चित्रपटातील पात्रांना भावनिक उंची जरी खूप असली, तरी त्यांची भावनिक खोली चितारण्यात लेखक-दिग्दर्शक कमी पडले आहेत. या आघाडीवर ‘जॉन विक’ निर्विवादपणे बाजी मारून जातो. उदाहरणच द्यायचं तर ‘जॉन विक’मध्ये व्हिगो (मायकेल नायक्विस्ट) आणि लोसेफ (आल्फी ऍलन) यांचे नाते जितक्या ताकदीने मांडलेय, तितक्या ताकदीने युलियन (ऍलेक्सी सेरेब्रियाकोव्ह) आणि टेडी (अलेक्झँडर पॅल) यांचे नाते मांडल्याचे जाणवत नाही. इथे खलनायकाची उद्दिष्ट्ये भावनिक कमी व आर्थिक जास्त आहेत. त्याचप्रमाणे हचच्या वर्तणूकीमागेही कुटूंबाप्रत असलेल्या भावनेपेक्षा पूर्वायुष्याची आस या गोष्टीचा जास्त हात वाटतो. परिणामतः चित्रपट हा ह्रदयस्पर्शी न होता हात, पाय व बंदुकांनी लढलेला बौद्धिक खेळ जास्त वाटू लागतो. पण त्यातही सिक्वेल आणि प्रिक्वेल दोन्हींचीही बीजे मस्तच पेरली आहेत. ‘ब्रेकिंग बॅड’ (२००८-२०१३) आणि ‘बेटर कॉल सोल’मुळे (२०१५-) प्रेक्षकांना परिचित झालेल्या बॉब ओडेनकर्कने हचच्या भूमिकेतील सगळे कंगोरे सारख्याच खणखणीतपणे वाजवले आहेत. तो त्याच्या अभिनयाने शब्दशः चित्रपटातील त्रुटी दुर्लक्षित करायला भाग पाडतो. सारांश, चित्रपट जरी ‘नोबडी’ असला आणि त्यात खूप साऱ्या त्रुटी जरी असल्या तरी तो अगदीच नथिंग नाही. चित्रपट माध्यमाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांसाठी खूप काही शिकण्यासारखा, सामान्य प्रेक्षकांचं कोणत्याही प्रपोगण्डाविरहित मनोरंजन करणारा हा स्मार्ट, हिंसक ‘असा मी असामी’ एकूणातच अतिशय कमाल जमलेला चित्रपट आहे!