Category: Cinema

  • रुचकर तरीही अपुरा – सीताकाती

    जयन्ति ते सुकृतिना: रससिद्धा: कवीश्वरा: ।
    नास्ति येषां यश:काये जरामरणजं भयम् ।।
    कला म्हातारी होत नाही, किंबहूना कला कधीच मरत नाही. ती अजर असते, अमर असते. हे आपण नेहमीच तात्त्विक रूपाने आसपास पाहातो, अनुभवतो. असेच अय्या आदिमूलम (विजय सेतुपती) हे रंगमंचावरील निष्णात अभिनेते आणि दिग्दर्शक. वयाच्या दहाव्या वर्षापासून हा माणूस रंगमंचालाच सर्वस्व मानून वावरतोय. त्यांच्या अभिनयपटूतेला पाहून अनेक नावाजलेल्या चित्रपट दिग्दर्शकांनी त्यांना सिनेमाची ऑफर दिली, परंतु त्या साऱ्या धुडकावून त्यांनी फक्त आणि फक्त रंगभूमीची सेवा केली आजवर. आता काळ बदललाय. लोकांना जिवंत रंगभूमीपेक्षा रंगीबेरंगी चित्रपट जास्त भुरळ घालू लागलेयत. रंगमंच ओस पडू लागलेयत. तरुणाई त्याकडे पाठ फिरवू लागलीये. जसजसा जनप्रवाह आटत चाललाय, तसतसे अय्यांच्या समोर असलेले आर्थिक प्रश्न रौद्ररूप धारण करू लागलेयत. अय्यांचं वय ७३ आहे. ते थकलेयत, काहीसे हरलेयत. पण रंगभूमीवर असलेलं त्यांचं अपरंपार प्रेम अणुमात्रही उणावलेलं नाहीये. गोष्टी आकार घेता घेताच त्यांचा रोख बदलतो आणि सबंध चित्रपटच कल्पनाविलासाच्या, फँटसीच्या अद्भुत विश्वात शिरकाव करतो.

    चित्रपटात वापरलेला फँटसीचा घटक सहजी पटण्यासारखा नाही. परंतु प्रत्येक सिनेमाचे स्वतःचे असे एक विश्व असते. त्याचे त्याच्यापुरते काही नियमही असतात. आपल्या जगाचे नियम त्याला लागत नाहीत, किंबहूना ते लावूही नयेत. लेखक-दिग्दर्शक बालाजी धरणीधरनने पटकथेत उभारलेल्या विश्वात ती गोष्ट किंचितश्या संघर्षानंतर का होईना, पटते. आणि अतिशय शोकांत मार्गाला जाणारा चित्रपट अचानकच विनोदाची नाव पकडून झुलू लागतो! आणि विनोदही कसा, तर अतिशय नैसर्गिक; कोणताही छल न करता सहजसाध्या परिस्थितीतून उद्भवणारा. इतका निखळ की त्या परिस्थितीत दुसरं काही संभवतच नाही, असंच दिग्दर्शक आपल्याला वाटायला लावतो. हळूहळू ही विनोदाची गाडी प्रहसनाच्या राज्यात शिरते. इथे दिग्दर्शक विनोदाच्याच अंगाने कला आणि तिच्याशी संबंधित खूप साऱ्या गोष्टींवर भाष्य करतो.

    थोडक्यात सांगायला गेलं, तर ‘सीताकाती’चे तीन भाग पडतात. शोकांतिका, कल्पनाविलासात्मक विनोद, आणि प्रहसन. तिन्हीही भाग वेगवेगळे पाहिले तर ते अतिशय प्रभावी झाले आहेत. परंतु हे तीन भाग जेव्हा एकच चित्रपट म्हणून गुंफले जातात, तेव्हा ते एका मर्यादेपलिकडे प्रभाव पाडत नाहीत. विशेषतः शेवटचा भाग. १७३ मिनिटे, असा भलामोठा काळ चालणारा चित्रपट, पण तरीही त्याचा शेवट उरकून घेतल्यासारखा वाटतो. शिवाय पहिला जवळजवळ पाऊण तास आपल्याला अय्यांची मनोभूमिका सांगण्यासाठी दिलाय, परंतु नंतर मात्र त्या फँटसी घटकाचे विचार, मन:स्थिती, तिची बाजू यांपैकी काहीही समोर येत नाही. चित्रपट हा माणसांच्या नजरेतून पाहात असल्यामुळे हा मार्ग तर्कशुद्ध वाटतोही, परंतु याच मार्गामुळे चित्रपट अपूर्णही वाटतो. दुसरे असे की ‘सीताकाती’मध्ये अय्यांची भूमिकाच नसलेले चित्रपट त्यांच्या नावावर विकण्याचा निषेध केलाय. प्रत्यक्षात ‘सीताकाती’मध्येच विजय सेतुपतीची भूमिका एक्स्टेंडेड कॅमिओ म्हणता येईल एवढ्याच लांबीची आहे आणि तरीही पोस्टर्सवर त्यालाच मुख्य स्थान आहे. थोडक्यात, ज्या गोष्टीचा चित्रपटात निषेध केलाय, तीच गोष्ट अगदी किंचित प्रमाणात का होईना या चित्रपटाने सुद्धा केलीये. चित्रपटाचे छायांकन, संपादन अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आहे. परंतु तरीही काही काही दृश्यांची लांबी अतिशय खटकत राहाते. चित्रपटाच्या पूर्वार्धात एक अतिशय विनोदी प्रसंग येतो. उत्तरार्धातही बरोब्बर त्याच प्रकारचा एक प्रसंग आहे. दोन्हीतील कलाकार वेगळे, अभिनय वेगळा; पण तरीही पुनरावृत्तीचा दोष आल्याशिवाय राहात नाही. हे टाळता आले असते. विशेषतः इतकी वेगळी, जबरदस्त आणि अविश्वसनीय संकल्पना असताना, हाताशी श्रेष्ठतम कलाकार आणि तंत्रज्ञ असताना, लेखनावर जास्त मेहनत घेणे फारच गरजेचे होते. ती नाही घेतली तर चित्रपटाचा ‘षमिताभ’ होऊ लागतो.

    मी वर म्हटलंय की विजय सेतुपतीचा चित्रपटात एक्स्टेंडेड कॅमिओ असल्यासारखा वाटतो. याचा अर्थ असा बिलकुल नाही बरं का की तो वाईट आहे. उलट आपल्या पंचविसाव्या चित्रपटात त्याने केलेली भूमिका ही खचितच अविस्मरणीय आहे. या माणसाच्या एवढा जबरदस्त कारकीर्दीचा आलेख मी अलिकडच्या काळात कुणाचाच पाहिलेला नाही. वयाच्या पस्तिशीनंतर त्याने सुरुवात केली आणि एकामागोमाग एक वेगळ्या वाटेवरचे चित्रपट करत तो अल्पावधीतच शिखरावर जाऊन पोहोचला. आणि तरीही, तरीही तो प्रत्येक चित्रपटात त्याच्या आधीच्या चित्रपटातील अभिनयापेक्षा दोन पावले पुढेच जातोय! त्याच्या या वर्षीच्याच भूमिकांचे वैविध्य पाहा. ‘९६’मध्ये पहिल्या प्रेमासाठी सर्वस्व अर्पिलेला राम, ‘सीसीव्ही’मध्ये दारुडा व काहीसा भ्रष्ट पोलिस अधिकारी रसूल आणि यात ७३ वर्षांचा रंगकर्मी अय्या! केवढे वैविध्य आणि तरीही प्रत्येक भूमिका तितकीच ताकदीने वठवलेली. या चित्रपटात अय्यांची विविध नाटके दाखवताना एका नाटकात त्यांनी औरंगज़ेबची भूमिका केलेली दाखवलीये. तब्बल ८-१० मिनिटांचा प्रसंग आहे तो. आणि त्या प्रसंगाचं वैशिष्ट्य सांगू? सबंध प्रसंग एकाच शॉटमध्ये केलाय! या प्रसंगात कॅमेरा जेवढा उत्कृष्ट हालचाली करतो, त्याहूनही अनेकपटींनी उत्कृष्ट काम केलेय विजय सेतुपतीने. हा प्रसंग इतक्या प्रचंड ताकदीने करू शकणारे अक्षरशः हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक असतील सध्याच्या आघाडीच्या नायकांमध्ये! हा प्रसंग खरोखरच कोणत्या नाटकातून घेतलाय की काय, मला ठाऊक नाही. परंतु त्यातील एक वाक्य मला फारच आवडून गेलेय. म्हातारपणी एकट्या पडलेल्या औरंगज़ेबसमोर साक्षात संगीत उभे राहाते. तो संगीताशी वाद घालू लागतो. सच्चा मुसलमान असल्याचे दाखले देऊ लागतो. त्यावेळी संगीत त्याला म्हणते, ‘तू इतक्या वेळा स्वतःचा सच्चा मुसलमान म्हणून उल्लेख करतोयस की कधीकधी वाटतं तुझी तुलाच या बाबतीत शंका असावी’! एका वाक्यात सांगायचं झालं तर, प्रॉस्थेटिक्सच्याही पलिकडे जाऊन विजय सेतुपतीने अय्यांना आपल्या अंतरात्म्यात उतरवलंय, इतकं की पडद्यावर एका क्षणासाठीही विजय सेतुपती नसतोच, फक्त आणि फक्त अय्याच असतात! त्याची देहबोली, हावभाव, श्वासोच्छ्वासाचे गणित सारे सारे काही डोळ्यांत कायमचे साठवण्यासारखे झालेय!

    जितकी स्तुती विजय सेतुपतीची करायला हवी तितकीच अजून एका व्यक्तीचीही केली पाहिजे. गोविंद वसंता! हा अत्यंत प्रतिभाशाली संगीतकार, गायक आणि वादक तैक्कुडम ब्रिज ऐकलेल्यांसाठी नवा नाही. परंतु जेव्हापासून त्याने वेगळ्या नावाने संगीत द्यायला सुरुवात केलीये, तेव्हापासून त्याचे आधीच सर्वांगसुरेख असलेले संगीत विलक्षणच होऊ लागलेय. त्याचा ‘९६’ तर माझ्यामते यावर्षीचा सर्वश्रेष्ठ रहमानेतर अल्बम आहे. याही चित्रपटाची गाणी त्याने तितकीच सुरेख आणि कथेच्या मूडला बरोब्बर न्याय देणारी केली आहेत. ती जितकी प्रायोगिक आहेत, तितकीच गोडसुद्धा. त्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तो लिरिक्स चांगलेच असतील, यावर खूप भर देतो आणि त्यामुळे त्याच्या गाण्यांची एकूणच शेल्फ़ व्हॅल्यू अनेकपट वाढते. आजकालच्या बहुतांशी हिंदी, मराठी संगीतकारांनी त्याच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे ही. जवळजवळ तीन तास चालणारा हा चित्रपट जरादेखील कंटाळवाणा वाटत नाही, याचेदेखील महत्त्वाचे कारण म्हणजे याच अवलियाचे अफलातून पार्श्वसंगीत! राजा, रहमान यांचे वैशिष्ट्य म्हणजे ही मंडळी कसाही प्रसंग असला तरी आपल्या पार्श्वसंगीताच्या जोरावर त्याला दैवी उंचीप्रत नेऊन ठेवतात. जर गोविंद वसंताने हेच सातत्य कायम राखले, तर त्याचेही नाव येत्या काही वर्षांत या सूचीत समाविष्ट होऊ शकते, एवढे सुंदर काम केलेय त्याने. विशेषतः विनोदी प्रसंग सारेच परिस्थितीजन्य असल्यामुळे ते खुलवण्यात तर संगीताचा वाटा जास्तच महत्त्वाचा आहे.

    थोडक्यात, ‘सीताकाती’ हा पदार्थ अतिशय रुचकर आहे. परंतु प्रत्येकच घासाला काही ना काही कमी वाटत राहाते. अखेरीस ताटभर खाऊनही जेवण अपुरेच राहिल्यासारखे वाटते. अर्थातच, चित्रपटाच्या काही त्रुटी आहेतच. परंतु त्यांचा हेतू, त्यांची संकल्पना अतिशय उदात्त व नावीन्यपूर्ण आहे. ती पडद्यावर मांडताना किंचित गडबड झालेली असली तरीही विजय सेतुपतीने जे काही केलेय ते अक्षरशः दैवी आहे. आणि आपल्याकडे, विशेषतः हिंदीत असा दैवी अभिनय क्वचितच पाहायला मिळत असल्यामुळे, अभिनय कशाशी खातात हा प्रश्न न पडण्यासाठी तरी त्याचे काम पाहाणे अत्यंत आवश्यक आहे. सिनेमा रंगभूमीचे सामर्थ्य जितक्या ताकदीने अधोरेखित करतो तितक्याच ताकदीने चित्रपट या माध्यमाचेही सामर्थ्य उत्तरार्धात मांडतो. दोन्हीही कलाप्रकार आपापल्या जागी केवढे श्रेष्ठ आणि तरीही एकमेकांपेक्षा वेगळे व समांतर रेषेवरून चालणारे आहेत हे न बोलताच मांडणारा ‘सीताकाती’ हा खरोखर वेगळाच चित्रपट आहे!

    *३/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • 2.0 नव्हे, ‘शंकर 2.0’

    मी परवाच एका व्याख्यानात बोललो होतो की, दिवसेंदिवस आपण सारेच तंत्रज्ञानावर नको तितके अवलंबून राहू लागलोय. याचे शारीरिक, मानसिक परिणाम कल्पनातीत आहेत. जणू काही एखाद्या टाईमबॉम्बचं टायमर सुरू करून त्यावर बसलो आहोत आपण. तो फुटेल तेव्हा काय होईल? भयंकर कल्पना आहे ही! भारतीय चित्रपटसृष्टीतील खऱ्या अर्थाने शो-मन म्हणावा अश्या दिग्दर्शक शंकरचं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य काय आहे माहितीये? तो अश्याच रोजच्या आयुष्यातल्या कल्पना घेतो. सत्य हे कल्पनेहून भंयकर असतं म्हणतात, परंतू शंकर त्या कल्पनेला सत्याहूनही भयंकर कल्पनेचा तडका देतो. त्यातून साकारतो तो शंकरचा कोणताही अतिप्रचंड सिनेमा! “2.0”ची कल्पनाही अशीच साधी. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे पक्ष्यांना विकिरणांचा होणारा त्रास सबंध मानवजातीला (जशी हॉलिवूडच्या चित्रपटांत मानवजात म्हणजे अमेरिका असते, तशी ती इथे चेन्नई आहे!) कडेलोटापर्यंत घेऊन जातो आणि त्याच्याविरोधात लढण्यासाठी माणसांना परत एकदा आणावा लागतो, काही वर्षांपूर्वी विंखडित केलेला चिट्टी (रजनीकांत)!

    वाचायला, ऐकायला ही कल्पना जेवढी जबरदस्त वाटते, तेवढीच ती साकारायला अवघड आहे. अगदी शंकरलासुद्धा! शंकरच्या बहुतांशी सिनेमांमध्ये नायक गुप्तरूपाने समाजातील वाईट शक्तींना संपवण्याचं काम करत असतो. आठवा, “जंटलमन” (१९९३), “इंडियन” (१९९६), “आन्नियन” (२००५). “2.0”मध्ये मात्र नेमका हाच घोळ झालाय की, ही हिरोगिरी करणाराच खलनायक आहे! त्यामुळे सुरूवातीला त्याचा द्वेष करणारे आपण, त्याची कथा समजल्यावर त्याचा द्वेष करूच शकत नाही. या त्रुटीवर मात करण्यासाठीच जणू शंकरला जवळजवळ अर्धा तास चालणारा उत्कर्षबिंदू लिहावा लागलाय. आणि तो ज्या प्रचंडाहूनही प्रचंड पातळीवर नेऊन मांडलाय, त्याला तोड नाही.

    रजनीकांत हा किती जरी सुपरस्टार असला, तरी त्याचा अखेरचा पूर्णार्थाने समाधानी करणारा सिनेमा हा शंकरचाच “यन्धिरन” (२०१०) होता. त्यानंतर रजनीने एक तर “कोचडय्यान” (२०१४), “लिंगा”सारखे (२०१४) चुकलेले सिनेमे तरी केलेयत अथवा “कबाली” (२०१६) आणि “काला”सारखे (२०१८) अजूनच जास्त चुकलेले सिनेमे तरी केलेयत. त्याच्या बॉक्सऑफिसवरील साम्राज्याला ओहोटी लागू लागलीये. त्या पार्श्वभूमीवर “2.0” हा त्याच्यासाठी अखेरच्या संधींपैकी आहे. आणि काय सांगू, रजनीने या संधीचे नुसते सोनेच नव्हे तर त्याहूनही खूपच जास्त केलेय. खूप वर्षांनी खऱ्या अर्थाने बहरलेला, बेभान असा रजनी पाहायला मिळाला. त्याने या चित्रपटात एक नव्हे तर तब्बल ४ वेगवेगळी रूपं साकारलीयेत आणि प्रत्येक रूप त्याच्या असीम क्षमतेची साक्ष देणारे आहे. तशीच गोष्ट अक्षयकुमारचीही. त्याचाही गेल्या वर्षापासून सॅच्युरेशन पॉईंट येऊ लागला होता. त्याचे चित्रपट यशस्वी होत होते, पण एका मर्यादेतच. त्यापलिकडे त्याचे आकडे जात नव्हते आणि तो सुद्धा स्वतःवर प्रयोग करत नव्हता वा स्वतःवर जोर लावत नव्हता. या चित्रपटात त्याने स्वतःवर घालून घेतलेले ते सगळे बरेवाईट नियम मोडलेयत आणि निकाल हा चांगल्याहूनही चांगला आलाय. हा खरा अक्षयकुमार आहे. त्यानेसुद्धा तब्बल २ वेगवेगळी रूपं साकारलीयेत आणि तितक्याच ताकदीने साकारलीयेत. अक्षयकुमार जर प्रत्येकच चित्रपटात अशी मेहनत घ्यायचे शिकला, तर तो आत्तापेक्षाही अनेक पटींनी पुढे जाईल. परंतु त्याची सवय त्याला हे करू देईल का, हा मोठाच प्रश्न आहे. अॅमी जॅक्सनची भूमिका या दोघांपेक्षाही चपखल जमलीये. ती एवढी सुंदर दिसते, एवढी सुंदर दिसते की, तिला अभिनय करण्याची कधी गरजच पडली नाही. त्यामुळेच की काय ती कायम निर्जीव, यांत्रिक पद्धतीचा अभिनय करते. तोच तिने इथेसुद्धा केलाय. पण गंमत अशी की, तिची भूमिकाच इथे यंत्रमानवीची असल्यामुळे तिच्या क्षमतेचा (खरं तर त्रुटीचा!) इथे शंभर टक्के वापर झालाय! मागच्या चित्रपटात जशी डॉ. बोहराला (डॅनी) साईडव्हिलनची भूमिका होती तसेच इथे सुधांशू पांडे या गुणी अभिनेत्याला डॉ. बोहराच्या मुलाची फुसकी भूमिका देऊन तितक्याच फुसक्या कामासाठी ठेवून घेतलेय.

    “2.0”चा मुख्य गुणधर्म हा, की तो पहिल्या दृश्यापासूनच विषयाला हात घालतो. त्यापासून कुठेच हटत नाही. ही जशी चांगली गोष्ट आहे, तशीच वाईटसुद्धा आहे. वाईट यासाठी की, शंकरचे वैशिष्ट्य असलेली कॉमेडी या चित्रपटात पाहायला मिळत नाही. जी काही कॉमेडी आहे ती निला (नाईस, इंटेलिजंट, लव्हली असिस्टंट) अर्थात अॅमी जॅक्सन तरी करते नाहीतर चिट्टी तरी करतो. चित्रपटात खूप सारे स्थानिक संदर्भ आहेत. खासकरून तमिळ सिनेमांचे. ते तमिळमध्ये जितके खुलतात, तितके हिंदीत खुलतीलच, असे नाही. शिवाय थेट विषयाला हात घालताना चित्रपटाचा पूर्वार्ध हा खूपच इन्व्हेस्टिगेटिव्ह पद्धतीचा झालाय. तो अजिबात कंटाळवाणा नाही. छानच आहे. परंतु हाती रजनीकांत आणि अक्षयकुमारसारखे योद्धे असताना, जितक्या ठिणग्यांची अपेक्षा करू, तितक्या त्या उडत नाहीत. उत्तरार्धात मात्र चित्रपट आपल्या अपेक्षा शतपटींहूनही अधिक पूर्ण करतो. तरीदेखील तो किंचित अधिक मानवी, भावनांचा अन्वयार्थ लावणारा, पक्षीराजनच्या दुसऱ्या रुपाच्या अंतरंगात डोकावणारा असायला हवा होता, असे वाटत राहाते. शंकरने भव्यतेच्या सर्वच सीमा अक्षरशः ओलांडल्या आहेत. नुसत्या ओलांडल्याच नव्हे, तर चोळामोळा करून, फेकून देऊन पुन्हा नव्याने आखल्यायत! हा चित्रपट जर तुम्ही थिएटरशिवाय अन्य कुठेही पाहाण्याचे ठरवत असाल, तर तुमच्यासारखे करंटे तुम्हीच! हा भारतातला पहिला खऱ्या अर्थाने त्रिमितीय सिनेमा आहे. त्याच्या ध्वनीमध्येही आजवर कधीच न करण्यात आलेले प्रयोग केलेयत. रहमानचं पार्श्वसंगीत गगनाच्याही मर्यादा ओलांडून कसे जाते, ते मोठ्या स्क्रिनवरच अनुभवले पाहिजे. तिच गोष्ट विभासांची. भारतात आजवर कधीच न अनुभवलेले विभास या मंडळींनी अतिशय यशस्वीरित्या बनवून दाखललेयत. आता तुम्ही जर याची तुलना हॉलिवूडशी करणार असाल, तर ते मुळातच चूक आहे. एक तर या मंडळींचे जे बजेट आहे, ते अतिशय कमी आहे. जेव्हा “बाहूबली”सारखा एखादा चित्रपट केवळ २५० कोटींच्या बजेटमध्ये विभासांचा भरपूर वापर करूनही पैसा कमावून दाखवतो, तेव्हा कुठे “2.0”ला ५५० कोटींचे बजेट मिळते. त्या अर्थी हे या विषयातल्या आपल्या अगदी सुरुवातीच्या पावलांपैकी आहे. जेव्हा आपल्याकडे हॉलिवूडइतके बजेट मिळायला लागेल, तेव्हा हॉलिवूडचे तथाकथित ब्लॉकबस्टर्स आपल्या प्रतिभेच्या भराऱ्यांपुढे पोरखेळ वाटू लागतील, लिहून ठेवा! मला जाणवलेला सगळ्यांत मोठा विरोधाभास मात्र हा की, मोबाईलच्या हव्यासापायी होणारे दुष्परिणाम मांडणारा हा सिनेमा बनवणारी लायका कंपनी मात्र मुख्यतः मोबाईलचेच उत्पादन करते!

    वाईटाच्या आघाडीवर सांगायला गेलं तर चित्रपटाला ठहराव नाही. गोष्टी स्थिर व्हायच्या आधीच पुढे नेण्याची घाई झाल्याचे जाणवते. दुसरे असे की, दुर्दैवाने हा सिनेमा शंकरच्या काही ठराविक, त्याच त्या गोष्टींपासून मुक्त होत नाही. परंतु असे असूनदेखील काही गोष्टी लक्षात घ्यायलाच हव्या. शंकरचाच “नन्बन” (२०१२) हा बोलूनचालून रिमेक होता. “ऐ”वर (२०१५) सगळ्यांत जास्त टिका झाली होती ती त्याच्या लांबीवरून आणि अनावश्यक साईडट्रॅक व गाण्यांवरून. शंकरने या गोष्टींची बरोब्बर नोंद या चित्रपटात घेतलीये. त्याचा स्क्रिनप्ले किंचित अवघडल्यासारखा वाटतो, परंतु त्याने जागा असूनही कॉमेडीट्रॅक टाळलाय. शंकरसारखी गाणी सबंध भारतातच काय, जगात कुणी करत नसेल, इतका तो गाण्यातील बारीकसारीक शॉटवर विचार आणि खर्च करतो. पण या चित्रपटात एकही गाणे वेगळे वापरलेले नाही. ३ गाण्यांपैकी २ पार्श्वभागी राहून कथेला पुढे नेतात तर एक थेट चित्रपट संपल्यावर येते. तो सगळा खर्च त्याने कामात वळवलेला जाणवतो. त्यामुळे चित्रपटाची लांबी आपसूकच कमी झालीये. हा शंकरचा आजवरचा सगळ्यांत छोटा सिनेमा आहे. ‘कधी संपतोय’ वाटण्यापेक्षा एखादा चित्रपट ‘अरेच्चा संपलासुद्धा’ वाटणे कधीही श्रेयस्कर! या सगळ्या अर्थांनी बोलायला गेलं, तर हा नुसता सिनेमाच “2.0” नाहीये, तर या सिनेमामुळे स्वतःचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न करणारा “शंकर 2.0” दिसणे जास्त सुखद आहे!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

    *३.७५/५

  • वृत्तावर्त

    सुरज ढलता है तो,
    और जग में जलता है वह,
    अस्त-उदय खेल है यह भेद बुद्धी का!
    मृत्यू ध्रुव है तो,
    जन्म भी तो ध्रुव होगा,
    जनन-मरण चक्र है यह भेद दृष्टी का!
    अमावस के पीछे पौर्णिमा,
    कालिमा के आगे रक्तिमा,
    वृत्तावर्त से बना है भवसमुद्र सारा!
    धानानानानानाना..!!

    अधर्म के मार्ग पुष्प उगते,
    धर्ममार्गपर है शूल चुभते!
    पाप को चाहे यदि तजना,
    पुण्य की भी रस्सी क्यूँ ना छोडे!
    पाप क्या क्या धर्म (मुद्रा),
    पुण्य क्या अधर्म (के आयाम),
    एक को हम जो दे (मिटा किंतु),
    मुद्रा तो तब भी घूमेगी ना!
    धानानानानानाना..!!

    — © विक्रम श्रीराम एडके ।

    =========================

    चित्रपट: विक्रम-वेधा
    गीत: करप्पऽ वेळ्ळई
    गीतकार: विघ्नेश शिवन
    संगीत: सॅम सी. एस.
    गायक: शिवम, सॅम सी. एस.

    =========================

    धुन के लिए गीत की लिंक: https://youtu.be/4AYAcFcFu84

    =========================

    साल २०१७ की फिल्म “विक्रम-वेधा” मेरी सब से प्रिय फिल्मों में से एक है । इस फिल्म ने न केवल बॉक्स ऑफिस पर ही झण्डे गाडें, अपितु एक रोमहर्षक गाथा को कैसे पुराणकथा के वस्त्रों में सँजोकर दर्शाया जाए, इस विषय में मानदंड भी स्थापित किए । फिल्म का संगीत भी खूब चर्चा में रहा । सॅम सी. एस. द्वारा संगीतबद्ध सारे गीत और पार्श्वसंगीत जबरदस्त हिट सिद्ध हुए । इन्हीं में से एक गीत, जिसे हर श्रोता ने ह्रदयपूर्वक सराहा, वह था विघ्नेश शिवन की लेखनी से उतरा तथा शिवम एवं सॅम सी. एस. का गाया हुआ, “करप्पऽ वेळ्ळई” । “करप्पऽ” का अर्थ होता है “काला” तथा “वेळ्ळई” यानी की “श्वेत” । अर्थ एवं ऊर्जा से भरा यह गीत प्रवृत्तीयों के बीच विरोधाभास दर्शाता है, जो कि फिल्म के विषयों में से भी एक है । पूरे गीत का अर्थ तो मैं नहीं जानता, किंतु उस के पीछे का विचार मेरे मन में घर कर गया । और मैं ने लिख डाला उसी धुन पर, उसी विषय को दर्शाता बिल्कुल नया गीत, “वृत्तावर्त” । स्वान्तसुखाय है, न कि किसी फिल्म के लिए । मैं पुनः एक बार स्पष्ट कर दूँ कि यह अनुवाद नहीं बल्कि एक पूर्णतः नया गीत है, हालाँ कि विषय वही है । पढिए और बताईए यह प्रयत्न आप को कैसा लगा ।

  • मुकम्मल ग़ज़ल : ९६

    रात्रीचे जवळजवळ साडेअकरा वाजलेयत आणि मी एका पंक्चरवाल्याच्या दुकानात बसून हे लिहितोय. घरी जायला अजून एखादा तास लागेल. एखादा तास मी थांबू शकत नाही का? मी थांबू शकतो. अंतर्मनात उसळणारा समुद्र नाही थांबू शकत. अर्ध्या तासापूर्वी सी. प्रेमकुमारचा “९६” बघून बाहेर पडलोय. तेव्हापासून सैरभैर झालोय मी. बऱ्याच वर्षांनंतर पडद्यावरच्या प्रेमकहाणीसाठी, त्या पात्रांसाठी, ते कुणीतरी जवळचे, सगे-सोयरे असल्यासारखी काळजी वाटली मला. आणि आता मी इथे डोकं खाजवत बसलोय की, मी या चित्रपटाबद्दल निष्पक्ष लिहू शकेन का? की पुरात वाहावत जाईन मी? कधीकधी बाजू घेणंच खरी निष्पक्षता असते!

    प्रेमाची स्वतःची एक भाषा असते, भावनेची! आणि या भावनेला जेव्हा शब्दांचा स्पर्श होतो, तेव्हा त्याची आपोआप कविता होते. भाषा सिनेमाचीही असते. चित्रांची, प्रतिमांचा, संकेतांची. आणि म्हणूनच सिनेमात जेव्हा प्रेम हाताळलं जातं, तेव्हा ती नुसतीच चित्रमालिका न राहाता, त्याचं चित्रकाव्य व्हावंसं वाटतं. तुम्हाला ग़ज़ल ठाऊक आहे? चांगल्या ग़ज़लेचा एक गुण असतो. तिचा प्रत्येक शे’र मुकम्मल असतो, परिपूर्ण असतो. स्वतःच संपूर्ण कविता असतो. आणि तरीही जेव्हा ते सारे शे’र एकत्र येतात, तेव्हा निर्माण होणारी अनुभूती अजूनच स्वतंत्र, अजूनच वेगळी आणि अजूनच गहिरी असते. “९६”ची प्रत्येक फ्रेम एक मुकम्मल शे’र आहे आणि सबंध चित्रपट मुकम्मल ग़ज़ल! सिनेमा जर प्रतिमांची भाषा बोलणारा असेल, तर त्याला संवादांची अशी कितीशी गरज असणार? सुरुवातीच्या काही दृश्यांत आलेली एखादी प्रतिमा, एखादं पात्र नंतर कधीतरी बरोब्बर नेमक्या जागेवर जाऊन लागणे, हा खरं तर सतर्क पटकथेचा नियम. तो या चित्रपटात इतक्या काही खूबीने जागोजागी वापरलाय की त्यांना ‘वाह’ म्हणण्यापेक्षा आपोआपच ‘आह’ म्हटले जाते. किंबहूना सबंध चित्रपटच आपल्या मनावर अलगद सुऱ्या फिरवत राहातो, हळूहळू धागा-धागा उसवत राहातो, आठवणींची एक एक आवरणे उलगडत राहातो, अशक्य कोटीचा त्रास देत राहातो आणि विचारांच्या पलिकडची शांतता देऊन जातो. असं उसवण्याची ताकद कितीशा कलाकृतींमध्ये असते?

    गेल्याच आठवड्यात मणिरत्नमचा “सीसीव्ही” प्रदर्शित झाला. त्यातसुद्धा विजय सेतूपती होताच ना? मग त्याने लगेचच पुढच्या आठवड्यात इतकी वेगळी भूमिका घेऊन का समोर उभं राहावं? इतकी वेगळी भूमिका आणि इतका अवर्णनीय सुंदर अभिनय की, तुलनेपुरतादेखील आपल्याकडचा कुणी अभिनेता सुचू नये? का? गौतम मेननचा “व्हिटिव्ही” पाहून आठ वर्षांपूर्वी ‘जेसी’ला पक्षी त्रिषा कृष्णनला घाल-घाल शिव्या घातल्या होत्या, एवढी ताकदवान भूमिका होती ती. तिनेही त्यापलिकडचा चटका लावून जावं? राम आणि जानकी ही नावे निव्वळ सांकेतिकतेपुरती न उरता त्याहून खूपच जास्त मोठी व्हावीत? रावणाने जेव्हा सीतेचं अपहरण केलं होतं तेव्हा ती एक एक दागिना खुणेसाठी सोडत गेली होती. तोच प्रसंग संपूर्णपणे वेगळ्या संदर्भात ज्यावेळी “९६”मध्ये घडतो, तेव्हा के. रामचंद्रन आणि एस. जानकीच्या प्रेमाचे पावित्र्य अजूनच ठसठशीतपणे जाणवते. आणि चित्रपट एका, अगदी एखाद्या क्षणासाठीसुद्धा हे पावित्र्य सोडत नाही. असं तरल पातळीवरचं प्रेम आपल्याकडे पाहून कित्येक वर्षे लोटली, कोण जाणे! कदाचित नव्वदच्या दशकाचा संदर्भ असल्यामुळे ते प्रेम इतकं अशारीर, आंतरिक असावं का? अशा कशा चुकीच्या पिढीत जन्माला आलो आपण की त्याकाळचा साधेपणा मनाच्या पाटीवरून पुसला जात नाही आणि तरीही नवीन काळाची नवीन बाराखडी त्याच पाटीवर मन मारून लिहिण्याखेरीज पर्यायसुद्धा नाही.

    संवाद त्या मानाने खूपच कमी आहेत, पण जेव्हा आहेत त्या त्या प्रत्येक वेळी प्रतिमांच्या भाषेहून लाखपटींनी पुढे जाता येण्यासारखे असेल, तेव्हाच आहेत. आपल्याकडे चांगली आणि टिकाऊ गाणी हल्ली का होत नाहीत, माहितीये? कारण त्यांच्यासाठी जी भावना लागते ना ती मुळातच आपल्याकडच्या चित्रपटांच्या आडात नाही आणि म्हणूनच ती गाण्यांच्या पोहऱ्यातसुद्धा येत नाहीत. परंतु “९६”ची गाणी अशा नेमक्या जागी येतात की जिथून संवादांच्याही पुढे लाखपटींनी जाता येण्यासारखे असेल. गोविंद वसंताचे संगीत आणि अनेकविध गीतकारांचे शब्द मिळून असलेला हा अल्बम माझ्या मते यावर्षीचा आत्तापर्यंतचा सर्वश्रेष्ठ रहमानेतर अल्बम तर आहेच, परंतु तितकेच श्रेष्ठ पार्श्वसंगीतसुद्धा आहे. प्रतिमा, संवाद, गीते यांच्याहीपुढे लाखपटींनी जाऊन हे पार्श्वसंगीत चित्रपटाची खोली वाढवते.

    जसजसा चित्रपटाचा शेवट जवळ येऊ लागला होता ना, तसतसं मला दोन भीती ग्रासू लागल्या होत्या. एक, संपू नये असं वाटत असतानाही चित्रपट का संपतोय ही भीती आणि सुरुवातीपासूनच रहस्यांची सुयोग्य किनार लावून चढत असलेला मनोरा पाहाता अखेरीस एखाद्याच चुकीने तो कोसळणार तर नाही ना ही दुसरी. आणि जेव्हा शेवटची फ्रेम आली, खरं सांगतो, सप्पकन एखादं हत्यार आत रुतावं तशी रुतली ती, आणि तिथेच राहिलीये मनाच्या पटलावर छापल्यासारखी, कधीच न निघण्यासारखी. असाच आहे हा चित्रपट. अनेकदा अनुभवाव्याशा ग़ज़लेसारखा. खूप लिहूनही शब्दांमध्ये पूर्णार्थाने न गवसणारा!

    — © विक्रम श्रीराम एडके

    *५/५

  • गॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम

    रामायण-महाभारत यांची आजवर जगात इतक्या वेगवेगळ्या चित्रपटकारांनी वेगवेगळ्या पद्धतींनी मांडणी केलीये की विचारता सोय नाही. पण एखाद्या चित्रपटाच्या बाबतीत मात्र हा मान जर कुणाला मिळाला असेल तर तो फक्त आणि फक्त फ्रान्सिस फोर्ड कपोलाच्या “गॉडफादर”लाच (१९७२)! मुळचीच सशक्त कथा आणि तिची पडद्यावरील तितकीच ताकदवान मांडणी. “गॉडफादर”ने सिनेमाच्या मांडणीच्या क्षेत्रात इतकी वेगवेगळी दालने खुली केली की, तेव्हापासून आत्तापर्यंत माफियांवर जेवढे म्हणून काही सिनेमे बनले असतील त्यांच्यावर कुठे ना कुठे “गॉडफादर”चा प्रभाव हा दिसतोच. कधी अजाणतेपणी तर कधी जाणून-बुजून. वर मी रामायण आणि महाभारताचं उदाहरण दिलं ना, अगदी तसंच वेगवेगळ्या चित्रपटकारांनी आपापल्या दृष्टिकोनांप्रमाणे आणि अर्थातच वकूबांप्रमाणे “गॉडफादर”ची पुनर्मांडणी करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. भारतातही असे प्रयोग कित्येकदा झालेयत. रामगोपाल वर्माचा “सरकार” (२००५), प्रकाश झाचा “राजनीती” (२०१०), दिलीप शंकरचा “आतंक ही आतंक” (१९९५) आणि मणिरत्नम किती जरी नाकारत असला तरी त्याचा “नायगन” (१९८७) अशी कित्येक उदाहरणं देता येतील. याच मालिकेत येतो परवा रिलिज झालेला “चेक्का चिवंता वानम”!

    गॉडफादरला एक मुलगी आणि तीन मुलं असतात. मुलगी कॉनी, भडक डोक्याचा सांतिआनो अथवा सॉनी, हुशार परंतु हॉटेल व कसिनोंपुरताच मर्यादित असलेला लंपट फ्रेडो आणि सगळ्यांत धाकटा मायकेल. गॉडफादरवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा ही मंडळी एकत्र येऊन आपापल्या पद्धतींनी परिस्थितीला तोंड देण्याचा प्रयत्न करतात. आता प्रश्न असा उद्भवतो की गॉडफादरवर हल्ला व्हर्जिल सोलोझोने केलाच नसेल तर? तो जर गॉडफादरच्या मुलांपैकीच कुणीतरी केला असेल तर? तर काय होईल? तर सुरू होईल गॉडफादरची भाऊबंदकी किंवा गॉडफादरचे महाभारत (कोटी हेतुत:)! नेमकी हीच कथा आहे मणिरत्नमच्या “चेक्का चिवंता वानम”ची. चेन्नईतला सगळ्यांत मोठा डॉन सेनापतीवर (प्रकाश राज) प्राणघातक हल्ला होतो. आधी वाटतं की त्याचा प्रतिस्पर्धी चिन्नप्पादासननेच (त्यागराजन) हा हल्ला घडवून आणलाय की काय, परंतु हळूहळू उलगडत जातं की हा हल्ला त्याच्या मुलांपैकीच एकाने केलाय. सेनापतीला चार मुलं. एक मुलगी आणि ताकदवान वरदराजन (अरविंद स्वामी), दुबईत राहून हॉटेलचा बिझनेस पाहाणारा कुटील त्यागराजन अथवा त्यागू (अरुण विजय) आणि सर्बियात शस्त्रांचा व्यापार करणारा निर्दयी एतिराज अथवा एति (सिलम्बरासन). तिघांपैकी एकाने कुणीतरी बापाचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय आणि आता सुरू झालीये बापाची जागा घेण्यासाठी तिघांचीही जीवघेणी चढाओढ! गॉडफादरच्या महाभारताला बऱ्याच अंशी “पोन्नियिन सेल्वन”ची किनार आणि किंचितशी करुणानिधी कुटूंबाची फोडणी!!

    सीसीव्हीची कथा मुळातच अतिशय गुंतागुंतीची आहे. त्यातसुद्धा तिला शेकडो कंगोरे आहेत. तिघांची आई लक्ष्मी (जयसुधा) हीच्या वडलांशी सेनापतीचं जुनं शत्रुत्व. त्यांना संपवल्यानंतरही त्याने तिचा भाऊ चेळीयानला (चित्रपटाचा लेखक शिवा अनंत) जिवंत ठेवलं. इतकंच नव्हे तर त्याला आपल्या ‘फॅमिली’त सामील करून घेतलं. त्याची मुलगी चित्राला (ज्योतिका) मुलीप्रमाणे वाढवलं व यथावकाश तिचं वरदराजनशी लग्नही लावून दिलं. लक्ष्मी एकदा चित्राला म्हणतेसुद्धा की ‘खूपच कठोर आहेस तू’! वरदराजनची एक प्रेयसीसुद्धा आहे, पार्वती (अदिती राव हैदरी). ही पत्रकार आहे. थोडक्यात बऱ्याच जणांचे बरेच हितसंबंध सेनापतीच्या भोवती कुठे ना कुठे गुंतलेले आहेत. वरदराजनचा बालमित्र रसूल (विजय सेतूपती) आता पोलिस इन्स्पेक्टर झालाय. तो वरदराजनला आतून मदत करतो आणि वरदराजन त्याला. हा त्यांच्यातला दोस्तीखात्यात केलेला अलिखित करार आहे. रसूलची पार्श्वभूमीही काळवंडलेलीच म्हणावी अशी आहे. पण लक्ष्मीने रसूलला आईची माया दिलीये. एतिराजची गर्लफ्रेण्ड आहे छाया (डायना एरप्पा) त्यागूची बायको रेणू (ऐश्वर्या राजेश). सांगितलं ना आधीच गुंतागुंतीची कथा आणि तिला शेकडो कंगोरे!

    पण दिग्दर्शक मणिरत्नम आहे! तो या सगळ्या कंगोऱ्यांना असा काही घट्ट धरून ठेवतो की एकसुद्धा धागा इकडचा तिकडे जात नाही. त्याने प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि त्यात तो बहुतांशी यशस्वीसुद्धा झालाय. बऱ्याच वर्षांनी जुना मणिरत्नम पाहायला मिळाला या चित्रपटात. कथेच्या वेगावर त्याची कमाल पकड आहे आणि मांडणीत वेगळीच प्रयोगशीलता. तो खऱ्या अर्थाने सीसीव्हीचा सेनापती आहे. छायाकार संतोष सिवन आणि संपादक श्रीकर प्रसाद या दोन शिलेदारांचा पुरेपूर उपयोग करून घेतलाय त्याने. गाणी नेमक्या जागी येतात. हे गणित जरा मागच्या “काऽट्र वेलियिडई”मध्ये (२०१७) चुकलं होतं. आणि रहमानचे पार्श्वसंगीत चित्रपटाचा एकूणच दृक्परिणाम शतकोटीपटींनी वाढवते, हे सांगणे न लगे! परंतु मध्यांतरानंतर काही काळ जेव्हा कथा जराशी अडखळते तेव्हा रहमानचं दैवी संगीतच आहे जे सिनेमाला पडण्यापासून रोखून धरते. खासकरून ‘सायफर’ ही माझी प्रथमश्रवणी सगळ्यांत आवडती जागा आहे! रहमानचा असा मोठ्या क्षमतेने वापर हिंदीत अनेक वर्षांत कुणी केलेला नाहीये.

    कथा अडखळते म्हणजे तरी काय? कथेला रहस्याचा, साहसपटाचा बाज असला तरीही हे मुळात एक कौटुंबिक नाट्य आहे. मध्यांतरानंतर त्याचा प्रभाव वाढतो. सिनेमांत भावना पाहायची सवय राहिली नसलेल्यांना हे काहीसे कंटाळवाणे वाटू शकेल. अर्थात रहस्योद्घाटन ज्या जागी केलंय, ती जागा मलाही फारशी आवडलेली नाही. आणि दुसरे म्हणजे इतके कंगोरे असताना मी जरा मोठ्या ट्विस्टची अपेक्षा करत होतो, तो त्या तुलनेत अगदीच सामान्य ठरतो. मुख्य पात्रांना जरासं अजून विस्तारून मांडायला हवं होतं, त्यांचे विचार त्यांचे परस्परसंबंध त्यांची घडण अजून उलगडायला हवी होती असं वाटत राहातं. अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे, सेनापती म्हणतो की मला मार्ग सापडलाय, पण त्याचा मार्ग अखेरीस गोष्टी अजूनच बिघडवून ठेवतो, मग त्याच्या नेतृत्वावर कसा विश्वास बसावा? अशा खूप साऱ्या सैल जागा आहेत. परंतु या गोष्टीची पूरेपूर भरपाई मणिने उत्कर्षबिंदूच्या दिग्दर्शनात केलीये. काय ते मी नाही सांगणार. परंतु मणिरत्नमने आजवर हाताळलेल्या सर्वश्रेष्ठ उत्कर्षबिंदूंच्या यादीत त्याचा समावेश होईल, हे नक्की!

    अभिनयाच्या पातळीवर बोलायला गेलं तर प्रकाश राज, जयसुधा या मुरलेल्या अभिनेत्यांकडून चांगल्याच अभिनयाची अपेक्षा आहे. ते ती लीलया पूर्ण करतात. मणिरत्नमच्याच “कडल”पासून (२०१२) नव्याने गवसलेला अरविंद स्वामी राकट वरदाला अक्षरशः जिवंत करतो. काही प्रसंगांत माजलेला वळू वाटण्यापासून ते अगदी हळवा माणूस वाटण्यापर्यंत वैविध्य त्याच्या वाट्याला आलंय आणि तो कुठेच कणभरही उणा पडलेला नाही. अरुण विजयला त्यागूच्या रूपाने जबरदस्त संधी मिळालीये आणि त्याने त्याचं अक्षरशः सोनं केलंय. डायनाला फारसं काम नाही. ऐश्वर्या राजेशने माती केलीये. ज्योतिका मात्र खऱ्या अर्थाने लेडी सुपरस्टार आहे. केवढं जबरदस्त काम केलंय तिने. अदिती राव हैदरीला संधी कमी होती, पण तिनेही सुंदरच काम केलंय. खरं तर सशक्त स्त्रीपात्रे हे मणिरत्नमचं वैशिष्ट्य याही चित्रपटात प्रकर्षाने जाणवतं. आणि तरीही बायकांना फारशी संधीच न देणं, खटकत राहातं. पण चित्रपटाचे खरे स्टार दोनच आहेत. एक सिम्बू! त्याच्या एण्ट्रीलाच प्रेक्षकांनी चित्रपटगृह जे डोक्यावर घेतले, की बास! त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात किती जरी विरोधी वातावरण असलं तरीही तो खऱ्या अर्थाने सुपरस्टार आहे, हे लोकांच्या त्याच्यावरील प्रेमातून बरोब्बर दिसतं. आणि तो सुद्धा ही संधी गमावत नाही. आतल्या गाठीचा एति तो अश्या काही खूबीने साकारतो ना की, मजा येते! पण त्याच्यापेक्षा जास्त जल्लोष झाला तो अर्थातच विजय सेतूपतीच्या एण्ट्रीला! या निष्णात कलाकाराचा शब्दशः ड्रीमरन सुरू आहे आत्ता. दारुडा, विचित्र पार्श्वभूमीतून आलेला आणि सदोदित संकटात सापडलेला रसूल त्याने छप्परतोड रंगवलाय. कसाही प्रसंग असो तो हास्याची लकेर उमटवतोच!

    “चेक्का चिवंता वानम” काळवंडलेले रक्ताकाश हा असा अनुभवण्याचा चित्रपट आहे. थोडा कडू-गोड असला तरीही अनुभवण्याचा. आणि अनुभवण्याचा म्हणजे पाहाण्याचाच नव्हे, तर ऐकण्याचाही! तो “आयुधा येऽळदऽ”इतका (२००४) ग्रेट नाही आणि “काऽट्र वेलियिडई”इतका सामान्यसुद्धा नाही. तो दोन्हींच्या मध्ये कुठेतरी खास जागी आहे!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [www.vikramedke.com]

    *३.५/५

  • ईसईज्ञानी

    सिम्फनी लिहायला किती वेळ लागतो? मोठमोठे संगीतकार त्यासाठी ६ महिने ते १ वर्षसुद्धा घेतात. पण एक भारतीय कलाकार आहे ज्याने आजपासून पाव शतकापूर्वी सिम्फनी लिहिलीये. सिम्फनी लिहिणारा तो भारतातलाच नव्हे, तर आशिया खंडातला पहिलाच संगीतकार आहे. त्याला किती काळ लागला माहितीये? ६ महिने? एखादं वर्षं? १९९३ साली लंडनच्या रॉयल फिलहार्मनिक ऑर्केस्ट्राला घेऊन त्याने ही सिम्फनी अवघ्या १३ दिवसांत लिहिलीये! आणि तिचा दर्जा ऐकून इंग्लंडमधील त्या प्राचीन वाद्यवृंदाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली होती. सांगायची गरजच नाही की, हा पराक्रम करण्याची ताकद असलेला केवळ एकच संगीतकार सबंध जगात आहे, ‘ईसईज्ञानी’ इलयराजा!!

    राजा प्रसंग ऐकतो. जागच्या जागी चाल लिहितो. आणि अवघ्या ५ मिनिटांत गाणं तयार होतं! शब्द लिहायला आणि गायकाला शिकून गायला वेळ लागतो, तेवढाच कालव्यय. तुम्ही विचार कराल की पाचच मिनिटांच्या गाण्याचा दर्जा तो काय असणार? एकदा बॉम्बे जयश्री म्हणाल्या होत्या, राजाकडे गाणं म्हणजे परत एकवार शाळेत जाण्यासारखं असतं. त्याच्या चालीत इतके बारकावे असतात की, प्रत्येक गाण्याची टिपणं काढण्यासाठी स्वतंत्र वहीच करावी लागते. राजाने आजवर १०००हूनही अधिक चित्रपट केलेयत आणि त्यातील किमान ८५० तरी म्युझिकल ब्लॉकबस्टर्स आहेत. जगात आजवर कुणालाच न साधलेला विक्रम आहे हा! राजा स्टुडिओत येतो. सिनेमा लावायला सांगतो. सिनेमा पुढे सरकतो तसतसा पाहात झरझर नोटेशन्स लिहितो. सिनेमा संपेपर्यंत सबंध चित्रपटाचे पार्श्वसंगीत कागदावर उतरलेलेसुद्धा असते! हे सुद्धा जगात कुणीच करू शकत नाही. राजाने आपल्या पार्श्वसंगीताच्या जोरावर अतिसामान्य चित्रपटांना व प्रसंगांनाही वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेय. इतरांची वाद्ये बोलतात, राजाच्या पार्श्वसंगीतात मौनसुद्धा बोलते! आजवर मिळालेल्या ५ राष्ट्रपती पारितोषिकांपैकी २ पार्श्वसंगीतासाठी मिळालेयत राजाला.

    आपल्याकडे जो दर्जा माऊलींच्या ज्ञानेश्वरीला आहे, तसाच दर्जा तमिळ साहित्यात ९व्या शतकातील संतकवी मणिक्कवसागरांनी लिहिलेल्या ‘तिरुवसागम’ला आहे. त्यातील ५१ रचनांपैकी ६ रचना राजाने २००५ साली निवडल्या. हंगेरीच्या बुडापेस्ट सिम्फनी ऑर्केस्ट्राला हाताशी धरलं आणि एक अभूतपूर्व ओरॅटरियो लिहिला. ओरॅटरीयो हा इटालियन शब्द आहे. सिम्फनीमध्ये नुसताच वाद्यवृंद असतो, तर ओरॅटोरियोमध्ये त्यासोबतच कॉयर आणि सोलोजसुद्धा असतात. काहीसा ऑपेराच्या जवळ जाणारा हा प्रकार. भारताने जगाला दिलेल्या सर्वश्रेष्ठ संगीतरचनांची यादी करायला घेतली, तर ‘तिरुवसागम’चा समावेश मी अतिशय वरच्या स्थानी करेन इतक्या श्रेष्ठ सांगितिक दर्जाचा अल्बम आहे हा. असाच एक प्रयोग राजाने १९८६ साली केला होता. पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतातील बरोक शैलीचा निष्णात संगीतकार बाख़ (१६८५-१७५०) आणि आपल्याकडील कर्नाटक शास्त्रीय संगीतातील संत त्यागराज (१७६७-१८४७) या दोघांच्या शैली एकत्र करून राजाने अल्बम केलेला “हाऊ टु नेम इट”. लेणं आहे हे संगीतातील अक्षरशः! त्यानंतर दोनच वर्षांनी ५० जणांचा वाद्यवृंद आणि साक्षात पं. हरिप्रसाद चौरसियांना घेऊन केलेला इन्स्ट्रुमेंटल अल्बम “नथिंग बट विण्ड”ला (१९८८) तर माझ्या प्लेलिस्टमध्ये ध्रुवबाळासारखे अढळपद आहे! आणि असे अनेक अल्बम्स राजाने आजवर केले आहेत.

    चित्रपट आणि चित्रपटेतर संगीत, दोन्हींमध्ये राजाने केलेल्या प्रयोगांची संख्या अनंत आहे. त्यांना तोडच नाही. राजाला ‘ईसईज्ञानी’ अर्थात ‘संगीतातला सर्वश्रेष्ठ ‘ म्हणतात, ते म्हणूनच सार्थ आहे. आज राजाचा वाढदिवस. आज वयाची ७४ वर्षे पूर्ण करून हा संगीतकुलगुरू पंचाहत्तरीत पदार्पण करतोय. शरीर म्हातारं होत असतं, कला मात्र मुरतच जाते! संस्कृतमध्ये म्हणतात ना,
    जयन्ति ते सुकृतिना: रससिद्धा कवीश्वरा: ।
    नास्ति येषां यश:काये जरामरणजं भयम् ।।
    या ओळींचा खरा मालक आहे इलयराजा, नव्हे राजाधिराजा इलयराजा!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • आठवणींच्या गल्लीबोळांतून

    नव्वदचं दशक हे अनेक अर्थांनी नॉस्टॅल्जियाचं दशक आहे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या अनेकांसाठी ते नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद, जतिन-ललित अश्या जोड्यांनी, अन्नू मलिक वगैरेंसारख्या सफाईदार “बाजीगरां”नी व विजू शाहसारख्या अनेकानेक अंडररेटेड माणकांनी बनवलेल्या आणि कुमार, अलका, उदित वगैरेंनी बेभान होऊन गायलेल्या दिलतोड गीतांचं दशक आहे; तर नव्वदच्याच दशकात जन्मलेल्या आजच्या तरुणांसाठी ते इंडीपॉप गाण्यांमधील नव्या प्रवाहांत केलेल्या सचैल स्नानांचं दशक आहे. दोन्हीही प्रकारच्या मंडळींसाठी ते एकत्रितपणे समीरचंदेखील दशक आहे. आणि दोन्हीही प्रकारची मंडळी त्या दिवसांबद्दल बोलताना जरादेखील थकत नाहीत.

    याच दशकाने सोनू निगम, शान, केके, शंकर असे हिरेसुद्धा दिले! याच दशकाने शंकर-अहसान-लॉय दिले आणि याच दिवसांनी रहमान दिला!! त्यामुळे “आशिकी” (१९९०) वगैरेंपासून सुरू झालेली नॉस्टॅल्जियाची गाडी “रंगीला” (१९९५), “दिल से” (१९९८), “ताल” (१९९९), “कहो ना प्यार है” (२०००), “लगान” (२००१), “दिल चाहता है” (२००१), अशी शेकडों स्टेशनं पार करत करत पार “प्यार में कभी कभी” (१९९९), “कल हो ना हो” (२००३), “हम तुम” (२००४) ते थेट “धूम”पर्यंत (२००४) जाऊन पोहोचते! २००५, २००६ सालापर्यंत हा नव्वदच्या दशकातला सांगितिक मॉन्सून परतीचा पाऊस बनून बरसत होता. त्याला खऱ्या अर्थाने ब्रेक लावला तो हिमेश रेशमियाने २००५ मध्ये “आशिक बनाया आपने”द्वारे!

    तसं बघायला गेलं, तर हिमेश हे देखील नव्वदच्याच दशकाचं बायप्रॉडक्ट! परंतु “प्यार किया तो डरना क्या” (१९९८), “कुरुक्षेत्र” (२०००), “दुल्हन हम ले जाएँगे” (२०००), “तेरे नाम” (२००३) वगैरे सरधोपट मेलडीजच्या मार्गावरून जाता जाता त्याने त्याचा साऊंड “आशिक बनाया आपने”मध्ये आमूलाग्र बदलला. हा बदल जितका सानंद स्वीकारला गेला तितकाच भल्याभल्यांना समूळ हलवूनसुद्धा गेला. पहिला धक्का ओसरताच हळूहळू सारं बॉलिवूड त्याच साऊंडची कॉपी करू लागलं. स्वतःचा वेगळा साऊंड जपणारे त्याकाळीही रहमान आणि शंकर-अहसान-लॉय वगैरे लोक होते.

    यांपैकी रहमान हा बदलांना सगळ्यांत वेगळ्या प्रकारे रिस्पॉण्ड करणारा माणूस आहे. हिमेशच्या लाटेच्याही पूर्वी आपला साऊंड जुना होऊ लागल्याचं त्याने बरोब्बर हेरलं होतं आणि “रंग दे बसंती”द्वारे (२००५) त्याने सगळा खेळच पालटून टाकला होता. पण कॉपीज हिमेशच्या बनल्या, रहमानच्या नाही. कारण, रहमानचा आधीचा साऊंड हा खूपच साधासरळ, प्रयत्नाने आत्मसात करता येण्यासारखा होता. २००४ नंतर रहमानने साऊंड बदलण्याची सुरू केलेली प्रक्रिया २००९ ला “दिल्ली ६”पर्यंत पूर्ण झाली आणि तोपर्यंत त्याचा साऊंड इतका काही गुंतागुंतीचा झाला होता की त्याची सहीसही नक्कल करूनही तो प्रतिभेच्या कवेत गवसणे शक्यच नव्हते.

    याच काळाने प्रीतम, अमित त्रिवेदींसारखी मंडळी दिली, तर विशाल-शेखरला अजून वरच्या पातळीवर पोहोचवलं. म्हणजे ज्यांना रहमान परवडत नाही आणि हिमेशपर्यंत खालीसुद्धा उतरायचं नाही, ते इन्स्टंट हिट्ससाठी प्रीतमकडे जाऊ लागले. त्यात अजून थोडासा क्लास हवा असलेले विशाल-शेखरकडे तर अजून प्रयोगशीलता हवे असलेले अमित त्रिवेदीकडे जाऊ लागले.

    शंकर-अहसान-लॉय यांचाही साऊंड २००२ चे २००५ पर्यंत रिपिटिटिव्ह होत गेला. पण तुरळक अपवाद वगळता त्यांना तो अनेक वर्षे बदलताच आला नाही. त्यामुळे त्यांचे चांगले आणि हिट असे दोन्हीही प्रकारचे अल्बम्स तुलनेने कमी कमी होत गेले. त्यांच्यातला मोठा, सकारात्मक बदल दिसला तो २०१२ सालच्या “विश्वरूपम” साऊंडट्रॅकमध्ये! त्यानंतर “कट्यार काळजात घुसली” (२०१५), “मिर्ज्या” (२०१६) अशी एकाहून एक रत्ने जरी त्यांनी दिली असली तरी आत्ता आत्ता कुठे ते पुन्हा एकवार जम बसवू लागलेयत.

    दरम्यान हिमेश केव्हाच मागे पडला. किंबहूना एकेकाळचे मोठमोठे दिग्गज विस्मृतीत गेले व जाऊ लागले. अवघ्या १०-१५ वर्षांपूर्वीपर्यंत जेवढे प्रयोग मुख्य प्रवाहातल्या चित्रपट संगीतात व्हायचे, तेवढे तर आता इंडीपॉप आणि समांतरमध्येसुद्धा होताना दिसत नाहीत. चित्रपटसंगीताची तर गोष्टच नको. ते रोज रोज नवीन पायऱ्या “उतरतच” चालले आहे. आणि गंमत म्हणजे हेही दशक उद्या कुणाच्या तरी उसासे टाकायला लावणाऱ्या नॉस्टॅल्जियाचा भाग असणार आहे! जितकी कळ आज पस्तिशीत असलेल्यांच्या काळजातून कुमार सानूसाठी उठते, तितकीच उद्या कुणाच्यातरी काळजातून अरिजित सिंहसाठी उठणार आहे! बदल हाच एकमेव शाश्वत असतो असे नाही, तर बदलणारेदेखील शाश्वत असतात. त्यामुळे रहमान हा नव्वदच्या दशकातल्यांसाठी जितका नॉस्टॅल्जियाचा भाग आहे तितकाच दहाच्या, वीसच्या दशकातल्यांसाठीसुद्धा आहे आणि तीसच्या व चाळीसच्या दशकांतल्यांसाठीसुद्धा राहिल. बाकी आपापले नॉस्टॅल्जियाज खूपच सापेक्ष असतात आणि म्हणूनच ते ह्रदयाच्या कुपीत जपून ठेवायचे असतात, हूरहूर लावणाऱ्या कातरवेळी मनगटावरून फायासारखे फिरवण्यासाठी!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (संपर्क: www.vikramedke.com)

  • मनोव्यापारांचा गूढ खेळ – जेराल्ड्स गेम

    जेसी (कार्ला गुगिनो) आणि जेराल्ड (ब्रुस ग्रीनवूड) सप्ताहांत साजरा करण्यासाठी त्यांच्या अलाबामातील नदीकाठच्या घरी जातात. एकत्र वेळ घालवणं, मजा करणं आणि त्यायोगे आपलं रुक्ष होत चाललेलं वैवाहिक जीवन वाचवणं, हा त्यांचा हेतू असतो. परंतु जेराल्डची मजेची कल्पना जरा वेगळीच असते. प्रवासाला निघतानाच त्याने सोबत खरोखरीच्या हातकड्या घेतलेल्या असतात. तो जेसीला त्या हातकड्यांनी पलंगाला जखडून ठेवतो. आणि त्याची रेप फँटसी पूर्ण करण्यात तिला भाग घ्यायला लावतो. जेसीला ही कल्पना मनापासून आवडलेली नाहीये. परंतु ती तरीही प्रयत्न करते. तिला त्या प्रकाराची क्षणोक्षणी शिसारी येऊ लागते. ती जेराल्डला सोड म्हणते. आणि मी नाही सोडलं तर, जेराल्ड उत्तरतो. जेसी घाबरते. जेसी आणि जेराल्डच्या वयात बरंच अंतर आहे. तो तिच्यापेक्षा खूप मोठा, अगदी म्हातारा म्हणावा, असा आहे. परफॉर्म करता यावं म्हणून तो व्हायाग्रा घेतो, एक नव्हे दोन! जेसी बांधलेल्या अवस्थेत आहे. तो तिच्या असहकार्यामुळे तिच्याशी वाद घालतोय. अचानक त्याला ह्रदयविकाराचा झटका येतो. आणि जेराल्ड मरतो! आता आजूबाजूला दूरदूरपर्यंत मनुष्यवस्ती नाही. नोकरचाकर किमान दोन-तीन दिवस तरी फिरकणार नाहीयेत. किमान! आणि जेसी त्या भल्यामोठ्या घरात एकटीच, जखडलेली आहे!!

    वरवर पाहाता “जेराल्ड्स गेम” हा सर्व्हायवल स्टोरी वाटू शकतो. नव्हे, त्याच्या या अश्या पार्श्वभूमीमुळे तो वाटतोच. परंतु चित्रपट पाहिल्यावर कळतं की, हा एक अतिशय गहिरा असा सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे! यात सर्व्हायवल दुय्यम आहे. प्राप्त परिस्थितीत सत्य आणि आभास यांचा मेळ राखणे, मनाचा समतोल राखणे ही जेसीची प्राथमिकता आहे. जवळच नवऱ्याचे प्रेत पडलेले आहे. घराजवळ पोहोचताना जेसीने एका भटक्या कुत्र्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला होता, जेराल्डने तिला रोखले होते. तो कुत्रा आता उघड्या दारातून आत आलाय. जेसी एकटी असूनही एकटी नाहीये. तिच्या सोबतीला तिचे अंतरात्मे आहेत. एक सोडून दोन! एक जेराल्डचं प्रतिनिधित्व करतोय तर एक जेसीचं. त्या दोघांच्या कल्लोळात जेसी अडकलीये, त्या साखळ्यांपेक्षाही घट्ट. पण या साखळ्या तरी खऱ्या आहेत का? की प्रतीकात्मक आहेत? जेसीला त्या दोघांच्या (की तिघांच्या!) संवादातून अश्याच अजून एका प्रसंगातल्या साखळ्या आठवू लागतात. कधीच, कुणालाच न सांगितलेली रहस्यं उचंबळून, उसळून वर येऊ लागतात. त्या एकाकी घरातल्या संध्याछाया अजूनच गडद होत जातात.

    “जेराल्ड्स गेम”चं वेगळेपण काय आहे माहितीये? तो जरासुद्धा सस्पेंस राखण्याचा प्रयत्न करत नाही. किंबहूना कुठे फार सस्पेस राहिल असं वाटू लागलं, तर पात्रांच्या संवादातून लगेच स्पष्टिकरणच देऊन टाकतो. हा खरं तर हॉरर चित्रपटांसाठी दोष मानला जातो. परंतु इथे तो चित्रपटाच्या बाजूने अभूतपूर्व काम करतो. बोललेल्या, संकेत केलेल्या त्या भयावह घटना कधी होतील याची आपण नकळत वाट पाहू लागतो आणि त्याचवेळी त्या होऊ नयेत म्हणून मनोमन प्रार्थनासुद्धा करू लागतो! स्टिफन किंग माझा अतिशय आवडता लेखक. सूक्ष्म, छोटछोट्या, वरवर साध्यासुध्या भासणाऱ्या गोष्टींमधून ताण निर्माण करण्याची त्याची हातोटी विलक्षण आहे. त्याच्याच, त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाने हा आत्मा बरोब्बर पकडलाय!

    हा चित्रपट त्याच्या पार्श्वभूमीमुळे “रागिणी एमएमएस”सारखा असेल की काय, अशी कुणाला शंका येऊ शकते. किंबहूना मला सुद्धा ती आली होती. परंतु हा चित्रपट इतका जास्त गहिरा आहे की, त्याच्यापुढे “रागिणी एमएमएस” नुसता भडक आणि बटबटीतच नाही तर अक्षरशः लहान पोरांचा खेळ वाटतो. “जेराल्ड्स गेम”मध्ये सांकेतिकतेचा मुक्तहस्ते वापर केलाय. विशेषतः ग्रहणाच्या. सस्पेंस कमीत कमी असूनही तो एका क्षणासाठीसुद्धा उत्कंठा कमी करत नाही. सरधोपट हॉरर अथवा थ्रिलरसारखे यात जम्प-स्केअर्स नसूनही तो सातत्याने धक्के देत राहातो. नैतिकता-अनैतिकतेचे प्रश्न उपस्थित करत राहातो. एक गंमत सांगतो, चित्रपटातली दोन्ही प्रमुख पात्रे, जेराल्ड आणि जेसी यांचे लग्न तुटण्याइतपत ताणलेले आहे. मी मूळ कादंबरी वाचलेली नाही. परंतु ही बाब स्थापित करण्यासाठी कदाचित कादंबरीत काही पानेसुद्धा खर्ची पडू शकतात. चित्रपट ही बाब एकाच वाक्यात स्थापित करतो. ही चित्रपट माध्यमाची असीम शक्ती आहे. तितकेच ते माईक फ्लॅनॅगन या दिग्दर्शकाचे कौशल्यसुद्धा आहे. कार्ला गुगिनोने अक्षरशः करिअर डिफाईनिंग म्हणावे असे जबरदस्त काम केलेय. ब्रुस ग्रीनवूडसुद्धा कमालच. हा छोटासा, कमी बजेट असलेला, बहुतांशी एकाच खोलीत घडणारा चित्रपट नेटफ्लिक्सने प्रदर्शित केलाय. नेटफ्लिक्सवर सहज मिळेल. हॉरर, थ्रिलर वगैरे जॉनर्समध्येसुद्धा काहीतरी वेगळं पाहू इच्छित असाल, तर “जेराल्ड्स गेम” बेस्ट चॉईस आहे!!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    *५/५

  • इन नोलान वुई ट्रस्ट

    अवघा ८ वर्षांचा होता तो, जेव्हा ‘नासा’त काम करणाऱ्या एका नातेवाईकाने त्याला ‘अपोलो’ मोहिमेच्या प्रक्षेपणाचे फुटेज पाठवले होते. पठ्ठ्याने ते आपल्या पद्धतीने संपादित केले आणि ‘स्टॉप मोशन अॅनिमेशन’ तंत्रज्ञान वापरुन आपली पहिलीवहिली फिल्म बनवली, “स्पेस वॉर्स” (१९७८)! त्याचे नाव ख्रिस्तोफर नोलान!! पुढे भविष्यात तो बनवणार असलेल्या “इंटरस्टेलर”सारख्या (२०१४) महागाथेची चुणूक ही अशी होती. पुढे ९०च्या दशकात त्याने खूप साऱ्या कॉर्पोरेट फिल्म्स आणि शॉर्टफिल्म्स बनवल्या. यातल्या बहुतांश त्याची तेव्हाची प्रेयसी व सध्याची पत्नी एमा थॉमसने प्रोड्युस केल्या होत्या. सिनेमा बनवण्याचे त्याचे प्रयत्न मात्र काडीमात्रही यशस्वी होत नव्हते. मोठाच निराशाजनक काळ होता तो. परंतु याच काळात त्याने आता जिला लोक शोधून शोधून पाहातात अशी “डूडलबग” (१९९७) नावाची शॉर्टफिल्म बनवली आणि सोबतच “जेंगिज ब्ल्यूज” (१९९९) या ऑस्कर नामांकनप्राप्त माहितीपटाच्या संपादनावरही काम केले.

    चित्रपट बनवण्याचे प्रयत्न सर्वच बाजूंनी अपयशी ठरत असल्याचे पाहून शेवटी त्याने स्वतःचेच पैसे घालून सिनेमा बनवायचे ठरवले. प्रोड्युसर अर्थातच पत्नी एमा! आणि असा जन्म झाला त्याच्या “फॉलोईंग”चा (१९९८)! फक्त ६ सहस्र डॉलर इतक्या कमी खर्चात बनलेल्या “फॉलोईंग”ने सगळ्याच स्तरांवर वाहवा मिळवली. अगदी आजही “नो बजेट फिल्म्स”च्या विषयात हा सिनेमा मैलाचा दगड समजला जातो! आणि अश्याप्रकारे २१ व्या शतकातील सर्वाधिक सेलिब्रेटेड फिल्ममेकरचे, इंडस्ट्रित दणक्यात आगमन झाले! यानंतर त्याने लगेचच बनवलेला “मेमेंटो” (२०००) माहिती नाही, असा सिनेरसिक क्वचितच सापडेल! मग मात्र नोलानने मागे वळून पाहिलेच नाही!

    नोलानच्या अनेक सिनेमांबद्दल आपण सविस्तर बोलू शकतो. नव्हे, त्याच्या जवळजवळ प्रत्येक सिनेमावर एक स्वतंत्र दीर्घलेखच होऊ शकतो. परंतु तरीदेखील त्यांच्यात काही समान सूत्रे आढळतात, जी माझ्या दृष्टीने नोलानच्या स्वतःच्याच व्यक्तिमत्त्वाची प्रतिबिंबे मानता येतील. त्याचा आजवरचा प्रत्येक सिनेमा हा डार्क, न्वार वर्गात मोडणारा आहे. नोलानचा कोणताही सिनेमा असो, त्याचे नायक हे अतिशय त्रासदायक पार्श्वभूमीतून आलेले असतात. ते स्खलनशील असतात, ते चुकतात, पडतात, ते आपले प्रियजन गमावतात – ते रुढार्थाने नायक नसतातच – ती असतात माणसे! तुमच्या-माझ्यासारखी सामान्य माणसे!! आणि म्हणूनच अत्यंत गुंतागुंतीची बीजं आणि तितकेच गुंतागुंतीचे कथन असूनही त्याचे सिनेमे कुणाच्याही ह्रदयाला भिडतात. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे खलनायक हे जवळजवळ प्रत्येक वेळी त्या नायकाचेच प्रतिबिंब असतात. ही मोठी मजेशीर गोष्ट आहे. आणि नोलानच्या याच गुणांमुळे त्याचा “बॅटमॅन” (२००६-२०१२) जास्त आपल्यातला वाटतो. किंबहूना, बेन अफ्लेकच्या “बॅटमॅन”ची आपण वारेमाप स्तुती करु शकतो, परंतु आपला बॅटमॅन कोणता असा प्रश्न असेल तर मात्र क्रिश्चन बेलखेरीज दुसरे कोणतेच नाव समोर येत नाही. नोलानने नुसता बॅटमॅन अजरामरच नाही केला, तर त्याला, नव्हे नव्हे अगदी बॅटमॅनशी संबंधित प्रत्येक पात्राला एक कल्चरल आयकॉन बनवले. एक सबंध पिढी या बॅटमॅनने पोसली. एक अब्जाधीश तरुण जो केवळ आपल्या आईवडलांच्या हत्येमुळे बुरखाधारी रक्षक बनतो, त्याला प्रत्येक वर्गातील प्रेक्षकाने आपलंसं करणे हा शब्दातीत चमत्कार केवळ नोलानच करु शकतो!! या आणि अश्याच गोष्टींचा परिपाक म्हणून एक अर्बन म्हण बनलीये – “इन नोलान वुई ट्रस्ट”! नोलानच्या विचारसरणीच्या व ती मांडण्याच्या पद्धतीच्या यशाची यापेक्षा मोठी पावती कोणती हवी?

    नोलानची गंमत अशी की, काही काही बाबतीत त्याची मतं ही खरोखरच तिरसट, जगावेगळी आणि तरीही यशस्वी आहेत. सांगून खरं वाटणार नाही, परंतु आज सगळं जग डिजिटल फिल्ममेकिंगच्या मागे धावत असताना एकटा नोलान मात्र रिळं वापरुन शूट करण्याच्या जुन्या पद्धतीचा प्रामाणिक पुरस्कर्ता आहे. त्याचा स्पेशल-इफेक्ट्सवर फारसा विश्वास नाही. त्याच्या कोणत्याही सिनेमात सीजीआय कमीत कमी असतात. त्याऐवजी जास्तीत जास्त दृक्श्राव्य युक्त्या वापरण्यावर त्याचा भर असतो. त्याची साहसदृश्ये ही त्यातल्या त्यात विश्वसनीय वाटावीत अशीच असतात. तो संपूर्ण शूट एकाच युनिटवर करतो. वेगवेगळ्या युनिट्सना वेगवेगळे भाग चित्रित करायला लावणे त्याला मुळातच मान्य नाही.

    ही तर झाली त्याची व्यावसायिक बाजू. परंतु त्याच्या वैयक्तिक निवडीही तितक्याच जगाविरहीत आहेत. नोलानचा स्वतःचा असा एकही इमेल आयडी नाही. तो इमेल हा प्रकार मुळातच वापरत नाही. त्याच्या सगळ्या मेल्स या त्याच्या एका मदतनीसाच्या पत्त्यावर येतात, ज्याच्या प्रिंटआऊट्स काढून दिल्यावर नोलान त्या सवडीने वाचतो. आजच्या जगातल्या सर्वाधिक यशस्वी निर्माता-दिग्दर्शकांपैकी एक असूनही नोलान मोबाईल फोन वापरत नाही! असं नाही की, त्याने त्रासून वापरणे बंद केलेय; तर मुळात त्याने कधीही फोन घेतलाच नाही. त्याच्या शांतपणे काम करु शकण्याचं रहस्य यातच दडलं असल्याचं तो स्पष्टपणे सांगतो. ज्याला माझ्यापर्यंत पोहोचायचंय तो बरोब्बर पोहोचतो, हे त्याचं यावरचं गमतीदार, आजच्या काळात भयावह वाटू शकणारं परंतु तितकंच खरं मत. पूर्वीच्या काळातही लोक कोणत्याही प्रकारच्या संपर्क-बंधनांशिवाय आरामात जगतच होती ना! आज आपण स्वतःच स्वतःला अनेक प्रकारच्या सोशल बेड्यांमध्ये जखडून टाकलंय आणि स्वतःच त्यांच्यामध्ये गुदमरवणारी धडपड करत खितपत पडलोय. या पार्श्वभूमीवर नोलान कदाचित मूर्खही वाटेल. पण या काहींच्या दृष्टीने मूर्ख वाटू शकणाऱ्या माणसाने चित्रपटसृष्टीच्या इतिहासातले काही पराकोटीचे श्रेष्ठ चित्रपट दिलेयत, देतोय आणि देत राहील; हे सत्य कोण आणि कसे नाकारणार?

    — © विक्रम श्रीराम एडके

    ********************************************
    आज Christopher Nolan चा वाढदिवस. त्यानिमित्त मी पूर्वी ‘सामना’साठी लिहिलेला हा लेख. रिपोस्ट.
    ********************************************