कर्नाटकच्या सीमेवर सैनिकांची एक तुकडी मोहिमेवर असते. त्यांचं लक्ष्य असतं नक्षलवादी गजेंद्र साहू. कर्मधर्मसंयोगाने साहू पळून जाण्यात यशस्वी होतो व एका हिंदू साधूच्या आश्रमात शरण घेतो. आश्रम, तेथील महंत आणि त्यांचा समाजावरील प्रभाव यांच्या प्रचंड ताकदीची जाणीव साहूला होते व ती ताकद हस्तगत करण्यासाठी तो महंतांचा खून करतो आणि त्यांची जागा घेतो. त्याच आसपास एका कुटूंबात प्रसुती होते. जुळी मुलं. पण एक जिवंत आणि दुसरा मृत. गावात वास्तव्यास असलेला अघोरी अनपेक्षितरित्या त्या घरी येतो आणि मृत बालकाची मागणी करतो. मुलाची आई अद्याप मूर्च्छेत असते. वडील तिच्या नकळत ते बाळ अघोरीला देऊन टाकतात. हस्ते परहस्ते त्या मृत बालकाचा प्रवास होऊ लागतो. या तसं बघितलं तर दोन वेगवेगळ्या घटना. पण त्यांना एकत्र आणण्याचं आणि त्यातून अत्यंत श्रीमंत व्यावसायिक मूल्यं असलेला ‘अखंडा’ बनवून दाखवण्याचं श्रेय जातं ते बोयापती श्रीनूला!
‘अखंडा’चा पूर्वार्ध कमालीचा संथ आहे. संथ आणि पूर्वानुमेय (प्रेडिक्टेबल) घटनांनी भरलेला! पण ते सहन करत असतानाही आपल्याला आतून वाटत राहातं की हे कोणत्या तरी मोठ्ठ्या यंत्राचे सांधे जुळवणं सुरू आहे. ते सांधे एकदा जुळले की सबंध चित्रपट फुलून येणार आहे. तसंच होतं. चित्रपट जरी मूळ संघर्ष अंथरायला वेळ घेत असला तरी एकदा तो त्या क्षेत्रात घुसला की स्फुल्लिंगातून अपरिमित तेजस्वी विस्फोट व्हावा तसा फुलून येतो!
नंदमुरी बाळकृष्ण अर्थात बालय्याला चित्रपटात दुहेरी भूमिका आहेत. एक म्हणजे रक्तपातावर विश्वास नसलेला मुरली आणि दुसरा म्हणजे दुर्जनांचा रक्तपात हेच उत्तर यावर ठाम विश्वास असलेला अखंड रुद्र सिकंदर अघोरा! पहिल्या भूमिकेतदेखील खूप सारे टाळ्या-शिट्ट्या वसूल करणारे क्षण असले तरी ते काही बालय्याचं नेहमीचं मैदान नाही. त्यामुळे त्या भूमिकेत तो काहीसा अडखळतो, काहीसा चाचपडतो. पण अंती आपल्या अनुभवाच्या जोरावर कथेचे सांधे जुळवण्याची भूमिका निभावून नेतो. आणि एकदा का ते सांधे जुळले की मग अखंडाच्या रुपात तो अक्षरशः तांडव घालतो तांडव! त्या पात्रात त्याचं रूप, त्याची देहबोली, त्याचं ठायीठायी संस्कृत बोलणं, सगळ्यांपासून तुटक व कोणत्याही सांसारिक पाशांपासून मुक्त असणं आणि कसलाही धरबंध न बाळगता थैमान घालणं साऱ्या साऱ्या गोष्टी वरच्या परिच्छेदात सांगितल्याप्रमाणेच फुलून येतात!
बॉलिवूडची प्रथाच आहे धर्माचा शक्य तितका अपमान करणं, धर्मपरायण मंडळींना शक्य तितकं नीच लेखणं. बॉलिवूडमध्ये काम करणारे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ सारेच विदेशी शिक्षणाची पैदास असल्यामुळे त्यांना ना या देशाची माती ठाऊक असते ना त्या मातीच्या भावना. त्यामुळेच त्यांचे चित्रपटही तसेच असतात – विसविशीत, उथळ आणि अगोचर! या देशाच्या वैविध्याला एका धाग्याने जोडणारा हिंदू धर्म तर त्यांना स्वप्नातही नकोसा असतो, उलट ते त्याचा आपापल्या अभिव्यक्तींतून शक्य तितका तिरस्कारच करत असतात. तेलुगू चित्रपटसृष्टी असल्या अंधश्रद्धांना थारा देत नाही. ‘अखंडा’मध्ये सबंध चित्रपटभर भगव्या संकेतांचा मुक्तहस्ते वापर केलाय. नुसत्या नायकाच्या वेशातच नाही तर गाड्या, पात्रांच्या ओळखपत्राची दोरी अशा नजरेला सहज न दिसणाऱ्या जागांवरही केसरी उधळण आहे. चित्रपटातील जोड्या विवाहसंस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या आहेत आणि कुटूंबे कुटूंबसंस्थेवर विश्वास ठेवणारी आहेत.
पण चित्रपटाचं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे लेखक-दिग्दर्शकांचा धर्माबद्दलचा अभ्यास अतिशय सूक्ष्म आहे. अघोरी पंथाचा वेश, त्यांची वर्तनाची पद्धत इ. गोष्टी तर त्यांना यथायोग्य साधल्या आहेतच. मंदिर का आवश्यक असते आणि मंदिराच्या उभारणीत धर्म किती खोलवरचा आध्यात्मिक विचार करतो हे सांगणारा प्रसंग अतिशय सुंदर झालाय. एका प्रसंगात नायक खलनायकाला मारत असताना त्याच्या शरीरावर प्रहार करताना कुंडलिनीच्या सात चक्रांची वर्णनं करतो. बॉलिवूडवाल्यांना मुळात कुंडलिनी नावाचं काही असतं हेच ठाऊक नसेल! पण सगळ्यांत जबरदस्त प्रसंग झालाय तो जिथे नायक ‘अहिंसा परमो धर्म:’च्या पुढे जात ‘धर्म: हिंसा तथैव च’ सांगतो, तसं वागतो पण तिथून निघून जात असताना पायाखाली चुकून येत असलेल्या निर्दोष मुंगळ्याचाही जीव घेत नाही!
पण या सगळ्या मारधाडीच्या आणि अभिनिवेशाच्या आत मला हा चित्रपट त्यातील सगळ्या गुणदोषांसह आवडण्याचं सगळ्यांत मोठं कारण सांगू? ते कारण आहे, अखंडा आणि मुरलीच्या लहान मुलीमधील हळवं नातं. त्यांच्यात सगळे मिळून पाच-दहा संवाद असतील. पण न बोलताच एक सन्यासी आणि अबोध बालिकेतील नात्याची घट्ट वीण बोयापती श्रीनूने जी सुरेख विणलीये आणि बालय्यानेही ती जितक्या अनपेक्षित संयतपणे चितारलीये तिला तोड नाही. जननी नाव दाखवलंय तिचं. अखंडा एकाच वेळी तिला लहान बालिका आणि जगज्जननी जगदंबा म्हणून लळा लावतो, ते अतिशय लाघवी आहे.
या नव्या वर्षात ‘पुष्पा’ने सबंध देशभर धुरळा उडवलाय. तुलनाच करायची झाली तर २५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘पुष्पा’ने ३७० कोटी म्हणजेच बजेटच्या तुलनेत दिडपट पैसे कमावले आहेत. त्याचवेळी ७० कोटींत बनलेल्या ‘अखंडा’ने १५० कोटी म्हणजेच बजेटच्या तुलनेत दुप्पट कमाई केली आहे. शुद्ध संख्याशास्त्रीय भाषेत बोलायला गेलं तर ‘अखंडा’ हा निर्मात्यांसाठी अधिक फायदेशीर ठरलाय. मी गेल्या जवळपास अर्ध्या दशकाहून अधिक काळ सांगतोय की ‘रीजनल इज द न्यू नॅशनल’. ‘अखंडा’ तसाच आहे. प्रादेशिक असूनही राष्ट्रीय स्तरावर धार्मिक अस्मितेला फुंकर घालणारा. भौतिकशास्त्राचे नियम पाळायला तो काही ख्रिस्तोफर नोलनचा चित्रपट नाही. त्याच्या पूर्वार्धातील संथपणा, अनावश्यक गाणे (जय बालय्या), पूर्वार्धात बालय्याचं अवघडलेपण सहन करू शकलात आणि मसालापट हे मसालापट म्हणून बघू शकण्याइतकी परिपक्वता तुमच्या ठायी असेल तर तुम्हाला तो आवडण्याची अखंड शक्यता आहे! सर्वोत्तम अनुभवासाठी मूळ तेलुगू भाषेतच पाहा.
Mahabharata is Itihasa. Traditionally, it’s a History, rather than imagination. And therefore, like in the real life all its characters are neither fully dark nor fully bright, but gray. Characters tilted towards the darker side are Kauravas and their allies. But even in those characters, the most vindictive was Karna. Yes, the very Karna who is presented as a hero by some writers of fictional fantasies and tv fanboys.
Karna was not even a good warrior as his fans want to present. Allow me to give you an example. After finishing the studies, Dronacharya asked Kauravas and Pandavas to wage war on King Drupad. During the duel, the so called invincible Karna was severely wounded and fled the battlefield. He did the same after many years too while fighting with Brihannala, i.e. Arjuna while all the Kauravas tried to abduct the cows of King Virat. Karna abandoned his best friend Duryodhana and fled during the battle with Chitrarath Gandharva too. All this while his so called Kavacha and Kundala, i.e. body armor and earpieces were intact. It is mentioned that during the Mahabharata war, Karna even retreated while facing Bhima. And no, they weren’t fighting with a Gada, i.e. a Mace, Bhima’s weapon of choice, it was a battle in Archery!
In the Lakshagruha arson conspiracy, Karna was an active conspirator with Duryodhana. After the Lakshagruha and the Swayamvar, when Dhritarashtra was of the mind of separating the Kingdom between Kauravas and Pandavas, it was Karna who advised against it. Remember, Pandavas were the rightful heirs and Kauravas were but the trustees who became greedy. It is said that Karna was insulted during the Swayamvar. But the truth was that he tried to compete despite being clearly aware of the rules.
Karna always lusted after Draupadi. During the Dyuta, i.e. the game of dice, when Dusshasan dragged Draupadi in the hall, Karna cheered and congratulated Dusshasana. He was the one who called the queen Draupadi a whore and argued that whether she wears clothes or not is immaterial. So stripping her off was Karna’s idea. He even called for her enslavement. Undoubtedly, Duryodhana was the head of the conspiracy. But lest we forget to assess Karna’s active role too. Remember, all this happened to that woman while she was menstruating.
Karna was a very charitable person. But his charity too wasn’t absolute. In Mahabharata he takes an oath, that until I kill Arjuna, no needy person will leave from my door without an appropriate donation. It simply means that his intentions behind the charity were not pure, but were dependent on the event of him Killing Arjuna. In other words, Karna knew that he was a sinful man and wanted to gather Punya, i.e. good virtues before facing Arjuna.
Duryodhana was a villain. He openly expressed his envy towards Pandavas many times. But he was a villain that everyone could see. Karna was more dangerous than Duryodhana because he concealed his villainy well behind the veil of a good image. He was unpredictable to common minds. He played victim card whenever it suited him. Duryodhana called Karna his friend, but Karna manipulated him several times for his desires, made sure that Duryodhana’s envy towards Pandavas will keep on burning. And when the time came for the supreme sacrifice, he shirked away. In fact, Bhishma while openly criticizing Duryodhana served his purpose better than the so called best friend. Yes, Karna was killed while not wielding a weapon and that was wrong, but then what lives wrongfully ends wrongfully too. That is why even Karna couldn’t counter Krishna when he recounted all the past sins of the latter.
Karna was deprived of status, wealth everything from childhood. But then, even Krishna faced exactly the same fate. One was emerged as the greatest philosopher of all time and other a sociopath. Karna was taken under Duryodhana’s wings at the early stages of life, while Krishna was a self-made man who survived many attempts on his life since very childhood. Krishna’s approach was positive even in poverty while Karna’s was negative even in abundance. Mahabharata is history. But it is a study in psychology too. Read original scriptures written by Vyasa who, let me add, was a contemporary of the times, and you will see a picture completely different than tv shows and novels.
स्वा. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वातील शतावधी पैलूंपैकी एकच कोणता तरी सहज, सुगम पैलू निवडायला सांगितला, तर मी क्षणभराचाही विचार न करता उत्तर देईन की, सावरकरांचे व्यक्तिमत्त्व चुंबकासारखे होते! चुंबकाकडे जसे लोहकण आपसूकच आकर्षित होतात, तसे लोक सावरकरांच्या भोवती गोळा होत. म्हणजे अगदी लहानपणीदेखील तात्यांच्या भोवती परशुराम शिंपी, राजाराम शिंपी, पुढे देशभक्त म्हणून ख्याती प्राप्त केलेले गोपाळराव देसाई, वामनराव धोपावकर, भिकू वंजारी, त्र्यंबकराव वर्तक, वामनशास्त्री दातार वगैरे मित्रपरिवाराचा गराडा असायचा (स्वा. सावरकर चरित्र, लेखक शि. ल. करंदीकर, आ. २०११, पृ. ५४). मित्रमेळा तथा अभिनव भारताचे अगदी सुरुवातीचे सदस्य असलेले त्रिंबकराव म्हसकर आणि रावजी कृष्ण पागे हे मूळचे बाबारावांचे मित्र, परंतु ते देखील तात्यारावांच्या प्रभावाखाली आल्याशिवाय राहिले नाहीत (तत्रोक्त, पृ. ७१). सावरकर लहानपणापासूनच जातिगत भेदभावाच्या विरोधात होते, त्यामुळेच पुढे नाशिकला, तिथून पुण्याला आणि त्यानंतर लंडनला गेल्यावर हा मित्रपरिवार विस्तारतच गेला.
तीच गोष्ट अंदमानची! लक्षात घ्या, सावरकर बॅरिस्टर होते. अंदमानात येण्याआधीच ‘इंडिया हाऊस’ आणि मार्सेतील समुद्रसाहसाच्या निमित्ताने त्रिखंड गाजवलेले होते. त्यांना अंदमानातील जमादार वगैरे तर सोडाच पण बारीही वचकून असे. साहजिकच सावरकरांना अर्थात ‘बडे बाबूं’ना बंदीवानांमध्ये विशेष मान होता. या योगे आणि सावरकरांच्या मूळच्याच चुंबकीय स्वभावामुळे बंदीगृहाच्या निर्बंधातही त्यांच्याकडे राजकीय व सामान्य बंदीच नव्हे तर अगदी वॉर्डरदेखील खेचले जात. सावरकरांचा कोठडीतील पहिलाच आठवडा होता, तेव्हाची गोष्ट आहे (माझी जन्मठेप, परचुरे प्रकाशन मंदिर, आ. २००७, पृ. ७८-७९). एके दिवशी एका वॉर्डरने सावरकरांच्या कोठडीतील गजांमधून एक दगड फेकला. निरखून पाहिले तर त्यासोबत एक चिठ्ठी होती. ती फेकताना नेमके एका पठाण वॉर्डरने पाहिले. त्याने आरडाओरडा केला. झडती सुरू झाली तशी सावरकरांनी ती चिठ्ठी अंगावरच बेमालूमपणे लपवली. सारे शांत झाल्यावर सावरकरांनी ती चिठ्ठी वाचली. काय होतं त्या चिठ्ठीत? तर त्यात अंदमानची परिस्थिती कथन केली होती. कोण कसं आहे, कुणावर विश्वास टाकावा वा टाकू नये वगैरे. मला सांगा, काय गरज होती त्या वॉर्डरला स्वतःची नोकरीच नव्हे तर अक्षरशः जीव धोक्यात घालून एका पन्नास वर्षांची शिक्षा झालेल्या सत्तावीस वर्षांच्या तरुणासाठी हे करायची? इंग्रजीत एक म्हण आहे, ‘Respect is commanded, not demanded’. त्या म्हणीचं चपखल उदाहरण, म्हणजेच ही घटना!
अंदमानात अनेक प्रकारचे बंदी होते. काही चोर होते, काही दरोडेखोर, लुटारू, खुनी, बलात्कारीदेखील होते. पण या नृशंस मंडळींपेक्षा सर्वस्वी भिन्न होते ते क्रांतिकारक! सावरकरांच्याच शब्दांत सांगायचं झालं (तत्रोक्त, पृ. ८७, ८८) तर त्यांच्यातही ‘बॉम्बगोळेवाले’ आणि ‘जीभवाले’ असे दोन प्रमुख प्रकार होते. स्वतः सावरकरांना अंदमानात ‘डी’ अर्थात ‘डेंजरस’ लिहिलेला बिल्ला दिला होता. या ‘डी’वाल्या मंडळींना बारी आणि त्याचे वॉर्डर्स विशेष जाच करत असत. त्यातही सावरकरांवर तर आणखीनच अवकृपा केली जात असे. कधी अंदमानला गेलात तर सावरकरांची कोठडी अवश्य पाहा, त्याच्या पुढे बसण्यापुरतीच एक विशेष जागा केलेली आहे. विशेष यासाठी की, तिथे थांबल्यास नजरेत एकच गोष्ट भरते ती म्हणजे अंदमानातील फाशीगृह! सावरकरांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी बारीने केलेला हा प्रकार अंगावर अक्षरशः शहारा आणतो. पण त्याही परिस्थितीत सावरकरांची अंतर्दृष्टी कशी तीक्ष्ण होती पाहा. एके दिवशी सावरकरांच्या समोरच बारी राजबंदीवानांस “इन की ×× फाड डालनी पडेगी” असे अश्लील बोलला (तत्रोक्त, पृ. १०८). तो निघून गेल्यावर सावरकरांनी त्या तरुणांना त्यांची नावे विचारली. त्यांची म्लानवदने पाहून सावरकर त्यांना म्हणाले, “एक दिवस क्वचित येईल की अंदमानच्या याच कारागारात राजबंदीवानांचे पुतळे उभारले जातील”! सावरकरांचे हे शब्द अक्षरशः सत्य ठरले. आज सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारकाच्या उद्यानात विविध क्रांतिकारकांचे पूर्णाकृती पुतळे डौलाने उभे आहेत! सावरकरांना राजकीय बंदी असूनही मुद्दामहूनच सापत्न वागणूक दिली जाई, कोलूला जुंपले जाई. कोलू म्हणजे घाण्याला जुंपून काढण्याची शिक्षा. रोजचं पौंडांचं उद्दिष्ट गाठताना मी-मी म्हणणाऱ्या धटिंगणांसही नाकीनऊ येत असत, तिथे या फॉरेन-रिटर्न्ड बॅरीस्टरला त्रास न झाल्यासच नवल. अशा वेळी याच उपरोक्त राजबंद्यांपैकी काही जण येऊन गुपचूप सावरकरांना मदत करून जात. कित्येकांनी तर सावरकरांना कधी जेवणाची थाळीच घासू दिली नाही, ते परस्परच स्वच्छ करून टाकत. काही जण तर सावरकर नको नको म्हणत असतानाही त्यांचे कपडे धुवून टाकत. परतफेड म्हणून सावरकर कधीतरी गुपचूप त्यांचे कपडे धूत, तेव्हा त्या मंडळींच्या मनाला कोण वाईट वाटत असे! कारागृहाच्या वाळवंटातील अशा माणूसकीच्या दुर्मिळ झऱ्यांनीच सावरकरांची जिजीविषा अखेरपर्यंत ठाम राखली होती.
अंदमान आज सुद्धा दुर्गम आहे. त्या काळात तर अजूनच दुर्गम असलेल्या अंदमानातील त्या सेल्युलर जेलमध्ये बारी एखाद्या हुकूमशहासारखा अंमल चालवित असे. बारीचे हस्तक येता-जाता सहज म्हणून शिव्या देत असत. कारागृहातील त्या वेळच्या अमानुष शिक्षांचे आणि बेड्यांचे तर आज तेथील व्यवस्थापनानेच प्रदर्शन भरवले आहे, ते पाहून आजही थरकाप होतो. छिलका कुटणे, कोलू फिरवणे, जंगलकटाई वगैरे गुरांसारखी कामे करणाऱ्या बंद्यांना जेवणात काय मिळत असे? सावरकरांच्याच शब्दांत सांगायचं झालं (तत्रोक्त, १६४) तर, ‘दुर्लक्षितपणे, घामटपणे, निष्काळजीपणे शिजवलेले आणि आरोग्यास हानिकारक’ असे हे अन्न असे. उदाहरणच द्यायचं झालं तर, बंद्यांना जी कांजी मिळे, त्यात अनेकदा घासलेट पडलेले असे. भाजीत गोम, साप तर प्रत्यही निघत. आपल्या तुलनेत अंदमान विषुववृत्ताच्या जवळ आहे. त्यामुळे तिथे पावसाळाही तसाच. बरेचदा त्याच पावसात उभे राहून भिजलेल्या पोळ्या, ओला भात खावा लागे. बरेचदा या जेवणातूनही गुलाम रसूल, मिर्ज़ाखान वगैरे पठाण जमादारांना वाटा द्यावा लागे, असे बारींद्रकुमार घोष यांनी लिहून ठेवले आहे (राजनैतिक कारस्थान, खंड २, पृ. १६०). शौचास अथवा मूत्रविसर्जनासाठी जाण्यापासूनही कैद्यांना रोखण्याचा पशूहूनही नीचतम प्रकार बारीच्या आशीर्वादाने जमादार करत असत. एकदा तत्कालीन गृहमंत्र्यांचा दौरा सुरू असताना नंदगोपाल नावाच्या एका पंजाबी राजबंद्यांनी हे गाऱ्हाणे मांडले. बारीने अर्थातच सारे काही मुळापासून नाकारले. त्यावर नंदगोपाल उसळून म्हणाले, “या बंदीगृहातील खोल्यांत तुम्ही एकदा प्रत्यक्ष हिंडा आणि तेथील भिंतींच्या कोपऱ्यांचा वास घ्या. तुमचे नाकच आमचे साक्षीदार” (माझी जन्मठेप, पृ. ९९).
हे सारे बाहेर कुणाला कळवायची सोय होती का? तर ते ही नाही. अंदमानातून बंद पाकिट पाठवताच येत नसे. जे काही टपाल जाई ते उघडेच, अर्थात अधिकाऱ्यांनी व्यवस्थित वाचल्यावरच. असेच एक गृहस्थ होते, होतीलाल. संयुक्त प्रांतातून राजद्रोहाच्या आरोपाखाली दहा वर्षांसाठी आलेले. शुद्ध हिंदी बोलणारे व ऊर्दू आणि इंग्रजीतही प्रवीण. बारा गावचेच नव्हे तर रशिया, चीन, जपान इ. बारा देशांचे पाणी प्यायलेले. हे होतीलाल म्हणजेच श्री. होतीलाल वर्मा असल्याचे काही ऑनलाईन ब्लॉग्सवर (zillion2dinnings इ.) दिसते तर अंदमान आणि निकोबार पर्यटनाच्या अधिकृत संकेतस्थळावरही तसा उल्लेख आढळतो. त्यांनी हिकमत केली. पहारेकऱ्यांची नजर चुकवत चुकवत त्यांनी कसेबसे एक पत्र लिहून काढले. बाहेरकामास बंदीवान जात असत त्या धांदलीत त्यांनी ते एकाच्या हाती बाहेर धाडले. त्याने ते झडतीपासून मुक्त अशा एका सरकारी विश्वासास पात्र प्रवाशाकडे सोपवले. त्या पत्राचे पुढे काय झाले, ते भारतात पोहोचले की तत्पूर्वीच त्या प्रवाशाने समुद्रात फेकून दिले वगैरे बंद्यांना समजावयास काहीच मार्ग नाही. आणि एके दिवशी बारीचा भडका उडाला! त्यावरून समजले की, ते पत्र भारतात सुरेंद्रनाथ बॅनर्जींपर्यंत पोहोचले होते. त्यांनीही मोठेच धैर्य दाखवत ते आपल्या ‘द बंगाली’मध्ये (२७ एप्रिल १९१२) छापले होते. एवढेच नव्हे तर त्यावर एक स्फुटदेखील लिहिले होते. त्यावरून मोठ्ठा गदारोळ झाला होता. एकदा तर पंजाबमधील कुणा थोर पुरुषाच्या क्रांतिकारक पुत्राने (सावरकरांनी गोपनीयतेच्या कारणास्तव नावे दिलेली नाहीत) पंजाबमधील तुरुंगातून एक बंदी अंदमानात पाठवला जात असताना त्याच्या बिल्ल्यावर सावरकरांसाठी पत्र लिहून पाठवले (माझी जन्मठेप, पृ. १४४). त्या बंद्याची सर्वत्र कपडे काढून झडती झाली, पण गळ्यातला बिल्ला पाहावयाचे कुणासही सुचले नाही!
पण अशा कुरघोड्या विरळ आणि कारागृहातील जाच मात्र शाश्वत होता. इंदुभूषण रॉय नावाचे एक तरुण क्रांतिकारक होते. त्यांना माणिकतोळा खटल्यात दहा वर्षांसाठी काळे पाण्याची शिक्षा झाली होती. सामान्यतः बंद्यांना जेव्हा तुरुंगाबाहेरची कामे देत, तेव्हा ती तुलनेने आरामदायक असत. त्यातही कुणी बंदी आजारी पडलाच तर त्याला बाहेरच्या, तुलनेने चांगल्या इस्पितळात धाडले जाई. पण राजबंद्यांना ही सुविधा उपलब्ध होती का? सावरकर लिहितात, ‘राजबंदीवान आजारी पडला तर त्यास त्या आजारी होण्याचाही एखाद्या अपराधासारखा दंड द्यावा लागे. कारण त्यास लगेच तापात वा रेच होत असता आपले अंथरुण डोक्यावर घेऊन, आपली थाळी हातात घेऊन दोन-चार-पाच मैल चालत परत त्या सेल्युलर तुरुंगाचे भीषण दार पाहावे लागे आणि आत येताच कोठडीबंद होऊन पडावे लागे’ (तत्रोक्त, पृ. १७६). या छळाला इंदुभूषण कंटाळले. त्यांनी काम नाकारले. दंडाबेडी पत्करली, पण हे काम नको असा पवित्रा घेतला. ‘नॉस्टॅल्जिया कोलकाता’ (https://nostalgiakolkata.blogspot.com/2016/07/indu-bhusan-roy.html?m=1) ब्लॉगचे लेखक लिहितात, ‘He had been suffering from blisters caused by the juice of the rambash so much that it was even difficult for him to move his fingers freely. It became so painful that he could not get a wink of sleep during the whole night. The pain and the raw sores in his hands prevented him from eating with his hand. The touch of ‘dal’ caused him so much pain that tears would roll down from his cheeks and the food could not be touched at all. He pleaded that if the same state of affairs were allowed to continue, he would die of starvation’. त्यांनी बारीला सोपे काम मागितल्यावर बारीने काय केले? बारीने इंदुभूषण यांना कोलू फिरवायला सांगितला! केवढं हे क्रौर्य.
सावरकरांनी इंदुभूषणना धीर दिला की, ‘तुला तर दहाच वर्षे शिक्षा आहे. मला तर जन्मठेप! तेव्हा माझ्याकडे पाहून स्वतःला धीर दे. स्वदेशासाठी स्वार्थ, प्राण यांचा त्याग करणे हे जसे कर्तव्य तसेच बंधो, मनाचाही त्याग करणे कर्तव्यच आहे. तू अजून पंचविशीचे आतबाहेर माझ्यासारखाच आहेस. आणि माझ्याहून तुला सुटण्याची आशा पुष्कळ आहे. तर धीर धर. सध्या कष्ट सोसून जग की पुढे सुटताच पुन: देशमातेची सेवा करता यावी’ (माझी जन्मठेप, पृ. १७७). त्यानंतर दोन-चारच दिवस उलटले असतील. एके दिवशी सकाळी कोठड्या उघडण्याच्या वेळी एक वॉर्डर गुपचूपपणे सावरकरांपाशी आल व म्हणाला, ‘मी सांगितले म्हणून कुणास सांगू नका, पण इंदुभूषण काल फाशी खाऊन मेला’! दिनांक होता २९ एप्रिल १९१२ आणि इंदुभूषण यांचे वय होते अवघे बावीस वर्षांचे. बारीने सारे प्रकरण ‘इंदू वेड लागून मेला’ म्हणून दाबून टाकले. सावरकरांनी स्वतः व इतरांकरवी इंदुभूषणवरील अत्याचार सर्वांसमोर आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण व्यर्थ!
असेच दुसरे क्रांतिकारक होते उल्लासकर दत्त (माझी जन्मठेप, पृ. १८०-१८७). त्यांनी लिहिलेली ‘द्वीपांतरेर कथा’ आणि ‘आमार काराजीबन’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचाही अंदमानात अतोनात छळ करण्यात आला. घाण्याला जुंपलेले बैल जिथे दिवसभरात १६ पौंड तेल काढतात, तिथे अंदमानात तीन माणसांना घाण्याला जुंपून ८० पौंड तेल काढावे लागत असे. तेही रेंगाळत नाही, तर दिवसभर पळत. एखादा जरासा रेंगाळला, तर दांडक्याने मारहाण होत असे. तरीही काम केले नाहीच तर त्याला घाण्याला बांधून इतरांना पळायला सांगत, म्हणजे हा फरपटत जाई, त्याचे डोके, तोंड आपटून फुटे. इतरांना सहा महिन्यांनंतर बाहेरचे काम देण्यात येई. पण इंग्रजांच्या दृष्टीने जहाल असलेल्यांना मात्र वर्षानुवर्षे आतच ठेवत. अखेर खूप वाट पाहिल्यानंतर उल्लासकरांना बाहेरचे काम देण्यात आले ते वीटांचे. ओल्या वीटा ने-आण करण्याचे काम बंद्यांनी करावे यासाठी त्यांना दुधाची लालूच देण्यात येई. पण त्या दुधावरही पेटी ऑफिसरचा डोळा असे. उल्लासकर आपले दूध त्याला देत नसत म्हणून रागाने त्यांची बदली बिनदुधाच्या कामावर केली गेली, ते काम म्हणजे उंच टेकडीवर असलेल्या साहेबाच्या बंगल्यावर कावडीने पाणी पोहोचवणे. जीव कासावीस व्हायचा. प्राण कंठाशी यायचे. शेवटी थकून जाऊन त्यांनी ते काम नाकारले. पण इंग्रजांना त्याचे ना सोयर ना सुतक. त्यांनी उल्लासकर दत्तांवर खटला भरला व त्यांना तुरुंगात नेऊन टाकले. तशा त्या मरणासन्न अवस्थेत उल्लासकर दत्तांना भास होऊ लागले की, बारी आपल्याला द्वंद्वयुद्ध खेळायला बोलावतो आहे व आपल्या बाजूने सावरकर लढताहेत. अखेरीस सावरकरांचा विजय होतो. उल्लासकर दत्तांना विलक्षण आनंद होतो, पण तेवढ्यात तो सारा देखावाच वितळून गेला. टळटळीत दुपारचे ऊन होते आणि उल्लासकर दत्तांच्या अंगात १०७ ताप होता! या मरणप्राय यातनांनी अखेर त्यांना उन्माद आला. तर उपचार म्हणून त्यांना वीजेचे झटके दिले गेले. तीन दिवस आणि तीन रात्र बेशुद्ध होते ते! काय अवस्था झाली असेल, फक्त एकदा विचार करून पाहा. त्यांनी फाशी घ्यायचाही प्रयत्न केला, पण नियतीला त्या क्षणी ते देखील सुख मिळू द्यायचे नव्हते त्यांना. अखेर एका पर्यवेक्षकाला त्यांची दया आली व त्याने त्यांना वेड्यांच्या इस्पितळात धाडले. दुष्ट बारी मात्र अखेरपर्यंत हेच म्हणत राहिला की, उल्लासकर ढोंग करतोय.
नानी गोपाळांना तर त्यांच्या असहकाराची शिक्षा म्हणून वेत मारण्याची शिक्षा दिली गेली. अशा निर्घृण शिक्षेची जबाबदारी तर अधिकाऱ्यांसही घेववेना. नानी गोपाळांनी अन्नत्याग केला, कुणाचेच ऐकेनात. हद्द पाहा, त्यांना नाकातून नळी टाकून दूध पाजण्यात आले. नाकातून! अखेरीस जेव्हा सावरकर त्यांना म्हणाले की, मी देखील अन्नत्याग करेन, तेव्हा त्या धाकाने त्यांनी अन्न ग्रहण केले. स्वतः सावरकरांचे मोठे बंधू बाबारावदेखील अंदमानातच होते. तरी जवळजवळ वर्षभर दोन सख्ख्या भावांना एकमेकांचे तोंडदेखील बघू दिले नव्हते इंग्रज सरकारने! अखेर या पाशवी अत्याचारांची परिणति कारागृहात संप होण्यामध्ये झाली. त्यातही पर्यवेक्षकांचे म्हणणे असे की, सावरकर संपाला उत्तेजन देतात. सावरकर ताडकन म्हणाले की, ‘इंदूस फाशी खाण्यास मी उत्तेजन दिले का? उल्लासकरास वेडे होण्यासही मीच शिकवले का? यातनाच संपास उत्तेजन देतात, मी नव्हे’. स्वतः सावरकरांनाही आत्महत्येचे विचार येऊन गेल्याचे त्यांनीच प्रांजळपणे लिहून ठेवलेय, पण प्रत्येक वेळी अतुल्य मनोबलाने त्यांनी त्या विचारांवर मात केली. १९१८ च्या सुमारास अखेर सावरकरांना अंदमानातील कष्ट व परिस्थिती सरकारी संमतीनेच कळवता आली. त्या पत्राच्या शेकडो प्रती करून नारायणराव सावरकरांनी त्या वर्षीच्या राष्ट्रीय सभेच्या सर्व प्रतिनिधींना वाटल्या. त्यातील उतारे इंग्रजी तसेच प्रादेशिक वृत्तपत्रांनीदेखील छापले. अमृतबझार पत्रिकेने तर आपल्या लेखाचा मथळाच ‘Outrageous treatment of a political prisoner’ (माझी जन्मठेप, पृ. ३४६) असा छापला होता.
या ही परिस्थितीत सावरकरांनी अंदमानात प्रचार आणि प्रसार केलाय. सोशल नेटवर्किंग नावाचा प्रकार उदित व्हायच्या किमान शंभर वर्षे आधी त्यांनी संघटनेचं घट्ट जाळं अंदमानात बारीच्या नाकावर टिच्चून विणून दाखवलंय. त्यांनी कैद्यांना लिहा-वाचायला शिकवलं. कित्येकांना वरच्या नोकऱ्या मिळवून दिल्या. कित्येकांची शुद्धिकरणे केली. जातीभेद मोडला. काव्ये-महाकाव्ये प्रसवली. हे संघटनेचे जाळे केवढे घट्ट विणले होते? ऑगस्ट १९२० ला लोकमान्य गेले. ही बातमी समजताच (माझी जन्मठेप, पृ. ४२२-४२३) सावरकरांनी ठरवले की, श्रद्धांजली म्हणून सर्व अंदमानात त्या दिवशी उपवास पाळला जावा. तत्काळ त्यांनी कारागृहातील जवळच्या मंडळींना हे कळवले. त्यांनी पुढच्यांस, त्यांनी पुढच्यांस करता करता बातमी गावोगाव पसरली. आणि एकाच वेळी सबंध अंदमानातील बंद्यांनी जेवण नाकारले! लक्षात घ्या, सेल्युलर जेलची रचनाच अशी आहे की, जेलच्या एका बाहूला दुसऱ्या बाहूची फक्त पाठ दिसते. शेजार-शेजारच्या खोल्याही एकमेकींपासून लांब आहेत, त्यामुळे बोलण्याची सोयच नाही. त्यातही कुणी बोलताना आढळला तर शिक्षा ठरलेलीच. त्या पार्श्वभूमीवर हा केवढा मोठा चमत्कार आहे, विचार करा.
सामान्य बंदीच नव्हे तर क्रांतिकारकदेखील सावरकरांकडे मार्गदर्शक म्हणून पाहात. इतकेच कशाला, महायुद्धाच्या काळात रशियन रणनौका त्या परिसरात आल्या असता त्यांचे कॅप्टनही सावरकरांना भेटून जात. एम्डेन या जर्मन युद्धनौकेची कथा तर प्रसिद्धच आहे. अखेर इंग्रजांनी सावरकर बंधूंना भारतात हलविण्याचे ठरवले. सावरकरांना पाहाण्यासाठी कारागृहाबाहेर लोकांची एकच गर्दी उसळली होती. कडेकोट बंदोबस्त होता. तो मोडून, शिक्षेची पर्वा न करता एक बंदीवान अचानक सावरकरांपाशी आला व त्याने एक साधीशीच परंतु भावनांनी ओथंबलेली चाफ्यांच्या फुलांची माळ सावरकरांच्या गळ्यात घातली. का केले असेल त्याने असे? किंबहूना का एवढा जीव लावला असेल सगळ्या बंद्यांनी सावरकरांना? अंदमान आजदेखील आपल्या मुख्यभूमीपासून सुमारे दिड हजार किलोमीटर लांब आहे. तेथे भलत्यांचीच संख्या वाढावी, त्यांचा वरचष्मा राहावा, यासाठी बारीच्या जमादारांनी काही एक कसर सोडली नव्हती. अंदमानचा पाकिस्तान झाला नाही, याचे श्रेय ज्या काही संघटनावादी मंडळींना जाते, त्यात सावरकरांचा वाटा सिंहाचा आहे! सावरकरांना भारतात जाऊन शिक्षाच भोगायची होती, मुक्तता होणार नव्हतीच त्यांची इतक्यात. पण सावरकर अंदमानातून परतले ते तेथेदेखील कर्तव्यपूर्ती केल्याच्या कृतार्थ भावनेने. यात अनेकानेक ज्ञात अज्ञात राजबंद्यांनी व सामान्य बंद्यांनीही त्यांची मदत केली. सावरकरांनी काहींची नावे दिली, काहींची नावे तत्कालीन परिस्थितीमुळे ‘माझी जन्मठेप’ छापून होईपर्यंतही नाही देऊ शकले. पण जरी इतिहासाच्या पानांवर काहीसा धूसर झालेला असला, तरीदेखील हा अंदमानातील मित्रमेळाच होता!
‘बॉश’च्या अखेरच्या पर्वात एक पात्र बॉशचा उल्लेख ‘Bosch is a living legend’ असा करते. हे वाक्य, हे लहानसंच वाक्य एखाद्या सुईसारखे माझ्या कानावाटे मेंदूत शिरले आणि सात पर्वांच्या, सात चित्रकोड्यांच्या, किमान सात हजार आठवणींचे धागे त्याने उसवायला सुरुवात केली. खरं तर नायकाचं नायकत्व अधोरेखित करणारं, त्याची स्तुती करणारं हे वाक्य. पण मला ते तसे वाटलं नाही. मला वाटला तो क्रूर विनोद, आपल्या आसपासच्या जगातील वाढतच चाललेला विरोधाभास अधोरेखित करणारा. बॉश या मालिकेत जे जे काही म्हणून करतो, ते ते सारं त्याचं एक पोलिस अधिकारी म्हणून कर्तव्यच असतं. पण साला, आपण अशा जगात राहातो ना की, हिरो होण्यासाठी हिरोगिरी करण्याची आजकाल गरजच उरलेली नाही, आपलं काम प्रामाणिकपणे करणे ही बेसिक गोष्टच हल्ली एवढी दुर्मिळ झालीये की, तिची पूर्तता करणारी कुणीही व्यक्ती आपसूकच हिरो, शब्दशः लिव्हिंग लिजण्ड वाटू लागते. मायकेल कॉनेलीच्या कादंबऱ्यांवर आधारित अमेझॉनची ‘बॉश’ ही मालिकाच व्यवस्थेवर नेमके भाष्य करणाऱ्या अशा क्रूर विनोदांनी, विरोधाभासांनी भरलेली आहे.
मी आजवर जितक्या काही मालिका पाहिल्या त्यात ‘बॉश’ सगळ्यांत वेगळी आहे. हिरोनिमस तथा हॅरी बॉश हा एलएपीडीतील हॉलिवूड डिव्हिजनचा होमिसाईड डिटेक्टिव्ह. मालिकेच्या प्रत्येक पर्वात तो एक केस सोडवतो व हा मोठा स्टोरी आर्क गाठतानाच तो काही छोट्या केसेससुद्धा सोडवतो. तुम्ही म्हणाल या परिच्छेदातील पहिलं वाक्य चुकलंय का? कारण या प्रकारच्या मालिकांचा सध्या इतका सुळसुळाट झालाय की स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मच्या गर्दीत डोळे झाकून दगड भिरकावला तरी तो सहजपणे अशाच एखाद्या मालिकेला लागेल. खरंय! ‘पोलिस प्रोसिजरल ड्रामा’ या जॉन्रामध्ये नको तितक्या मालिका बनल्या आहेत. पण तरीही मी छातीठोकपणे सांगतो की, ‘बॉश’ या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. आणि त्याचं कारण आहे, या मालिकेतील अतोनात वास्तववाद! म्हणजे नेमकं काय? तर एक पोलिस डिटेक्टिव्ह असतो, त्याच्यासमोर एखाद्या गुन्ह्याचा तपास लावायचे काम येते, तो ते काम आपल्या अक्कलहुशारीने करतो व अपराध्याला त्याच्या योग्य शिक्षेपर्यंत पोहोचवतो. हा झाला साध्यासरळ पोलिस प्रोसिजरल ड्राम्याचा फॉर्म. ‘बॉश’मध्ये हे सगळे गुण असूनही ती या पैकी कोणत्याही मार्गाने क्वचितच जाते. किंबहूना जातच नाही म्हटलं तरीही चालेल. उलटपक्षी बरेचदा बॉशसमोर येणाऱ्या केसेस हळूहळू मागची सीट पकडतात. ‘बॉश’ ही त्या अर्थाने डिटेक्टिव्ह मालिका नाहीच. तिचा मूळ उद्देश आहे व्यवस्थेवर दिलखुलास भाष्य करणं!
आपल्याला वाटतं की गुन्हा घडतो आणि पोलिस त्याचा छडा लावतात. पण ही प्रक्रियेची अक्षरशः दोन टोकं आहेत. या दोन टोकांच्या मध्ये जो पेपरवर्कचा डोंगर असतो, कल्पनेपलिकडचं हीनतम अंतर्गत राजकारण असतं, अत्यंत घाणेरड्या मनोवृत्तींचा गुंता असतो आणि छडा लावल्यानंतरही शिक्षेची कसलीच शाश्वती नसते. बहुतांशी पोलिस प्रोसिजरल ड्रामाज हे प्रोसिजरच्या या भल्यामोठ्ठ्या तुकड्याला एक तर हातच लावत नाहीत. किंवा तो अक्षरशः तोंडी लावण्याइतपतच सूचकपणे येतो. का? कारण सोपं आहे! यांच्यापैकी एकही प्रकार प्रेक्षकवर्गासाठी ग्लॅमरस नाही. उलट लिहायला, मांडायला आणि दाखवायला कमालीचा अवघडच आहे. ‘बॉश’ मी सगळ्यांत वेगळी म्हणतो ते यासाठीच की तिचा सगळा खेळ हा या नॉन-ग्लॅमरस प्रक्रियेत चालतो व गुन्हा घडणे आणि गुन्ह्याचा छडा लागणे या गोष्टी नैसर्गिकरित्या दुय्यम ठरत जातात.
याच मार्गाने जाणारी एक कमाल ब्रिटिश मालिका आहे, ‘लाईन ऑफ ड्युटी’ (२०१२-). पण ती बॉशसारखी एकनायकानुवर्ती नाही व तिचा विषयदेखील गुन्ह्यांशी संबंधित कमी व भ्रष्टाचाराशी संबंधित अधिक आहे. ‘बॉश’ची तुलनाच करायची झाली तर ती फक्त दुसरी एक ब्रिटिश मालिका ‘लुथर’शीच (२०१०-) होऊ शकते. एक तर दोन्हीही मालिका या पोलिस प्रोसिजरल आहेत. दोन्हीही मालिका या प्रोटॅगनिस्टच्या नावाने आहेत. दोन्हींचेही नायक हे समाज, डिपार्टमेंट, जग, यांनी अत्यंत नाडलेले आहेत. दोघांच्याही वैयक्तिक आयुष्यात कृष्णविवराएवढं दु:ख आहे जे त्यांना तिळातिळाने शोषून घेतंय. दोघेही सत्याचा शोध घेण्यासाठी कुणालाही बिनधास्त नडतात. किंबहूना दोघेही बॅटमॅन बनण्यापासून शब्दशः एक पाऊल मागे आहेत! पण तरीही दोन्हीही मालिकांमध्ये मूलभूत फरक आहे. लुथर हा माणूस व पोलिस अधिकारी म्हणून जितका भयानक व जबरदस्त असतो, त्याच्या एक टक्क्यानेही तो प्रत्यक्षात वागत नाही. उलट तो सतत काहीसा अपोलोजेटिकच वागत असतो. बॉश तसा अजिबात नाही. तो त्याच्या लिव्हिंग लिजण्ड असण्याला साजेसा वागण्याची धमक ठेवतो. तो अक्षरशः उद्धट वाटण्याइतपत खरं बोलतो. आणि त्यासाठी गरज पडेल तेव्हा कुणालाही फाट्यावर मारायला घाबरत नाही. तो सरळसोट भाला आहे, जो एकदा सुटला की लक्ष्यभेद करतोच करतो, मग भले लक्ष्यावर आपटून मोडलो तरी बेहत्तर! ‘बॉश’ची ओपनिंग थीम म्हणजे ‘कॉट अ घोस्ट’चं गाणं ‘आय गॉट अ फिलिंग दॅट आय काण्ट लेट गो’. बास! बॉश या एकाच तत्त्वावर काम करत असतो. मालिकेचं सार आहे त्या गाण्यात. अपराध घडलाय ही फिलिंग त्याला न्याय होईपर्यंत लेट गो करूच देत नाही. रात्रीचा दिवस करून आणि जग इकडचं तिकडे करून तो काम करतच राहातो. मी व्यक्तिश: ब्रिटिश मालिकांचा किती जरी पंखा असलो, तरीही मी प्रामाणिकपणे सांगतो, ‘बॉश’ ‘लुथर’पेक्षा शेकडो पटींनी भारी आहे!
सध्याच्या पुरोगामी व्यवस्थेमध्ये सुष्टांपेक्षा दुष्टांच्या मानवाधिकारांना जास्त किंमत दिली जाते. एखाद्या पोलिस अधिकाऱ्याने एखाद्या गुन्हेगाराला कायद्याने अटक केली तरी त्यावरून देशभर दंगली उसळून सबंध देश दिवसेंदिवस जाळला जाऊ शकतो व तो निवडणुकीतील भलामोठ्ठा मुद्दादेखील ठरू शकतो. अपराधी वाट्टेल ते करू वा बोलू शकतो, पोलिस अधिकाऱ्याने मात्र विनम्रतेचा पुतळा बनूनच वागले पाहिजे. त्याने हात बांधूनच काम केले पाहिजे. त्याने का उलट वार केला, तर त्याचं करिअर संपलंच समजा. या सगळ्यामुळे पोलिसदलात काय सुधारणा झाल्या असतील त्या असोत, पण त्याने एक झालं ते म्हणजे गुन्हेगारांसाठी अत्यावश्यक असणारा पोलिसांचा धाकच संपला. वाघाचे दात पाडल्यावर, नखे कापल्यावर त्याला कोण घाबरेल हो? आज कुणीही अपराधी हा सहजपणे लिंग, रंग, धर्म वगैरेंपैकी जे साजेल ते व्हिक्टिम कार्ड खेळून सहजच कायद्याचे गज वाकवू शकतो आणि निसटूनही जाऊ शकतो. याची अगदी खोऱ्याने उदाहरणे आपल्या आसपास रोज दिसतात. बॉशच्याही पायात व्यवस्थेच्या, आसपासच्या स्वार्थी वातावरणाच्या, कल्पनातीत राजकारणाच्या बेड्या आहेत. बॉश त्या बेड्या कधीच तोडत नाही, किंवा त्या तोडणं त्याच्या मूळच्या सैनिकी व्यक्तिमत्त्वातच नाही. पण त्या साखळीला वेळोवेळी ताणून आवाक्याबाहेरच्या आणि पगारापलिकडच्या गोष्टी करायला तो एकदाही मागे हटत नाही. त्याच्याबद्दल बोलताना एकदा त्याच्यावर फारसा खुश नसलेला एक अधिकारीदेखील बोलून जातो, Bosch goes where the truth takes him. इतके असूनही मी म्हणेन की बॉश नायक नाहीये. ज्या व्यवस्थेच्या रक्षणासाठी रात्रंदिवस झटतो, प्रत्यक्षात त्याच व्यवस्थेचा बळी आहे तो बळी!
आपल्याकडेही पोलिस आणि एकूणच व्यवस्थेबद्दल शेकडो सिनेमे आणि मालिका बनल्या आहेत, पण त्या ‘बॉश’पुढे एकजात सपाट वाटतात. कारण, किती जरी नाही म्हटले तरी त्या मनोरंजनाच्या सापळ्यात अडकून पात्रांना काळ्यापांढऱ्या रंगात रंगवू पाहातात. ‘बॉश’ ती चूक एकदाही करत नाही. ‘बॉश’मधील एक एक पात्र म्हणजे एक एक वल्ली आहे अक्षरशः! जेरी एडगर (जेमी हेक्टर), ल्यु. बिलेट्स (एमी अकिनो), क्रेट (ग्रेगरी स्कॉट कमिन्स), बॅरल (ट्रॉय इव्हान्स), चीफ अर्विंग (लान्स रेडिक), एलेनॉर विश (सेराह क्लार्क), हनी चँडलर (मिमी रॉजर्स) वगैरे प्रत्येकाच्या कपाटात त्यांचे त्यांचे व्यक्तिगत राक्षस लपलेले आहेत आणि त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यामागे शेकडो मुखवटेसुद्धा आहेत. गंमत म्हणजे मालिकेतील घटना लॉस एंजेलिसमध्ये घडत असल्या तरी एलए ही मालिकेसाठी नुसती जागा नाहीये, तर मालिकेतील महत्त्वाचे पात्र आहे ते खरोखर. मालिकेतील पात्रांना लागू पडणारे सगळे नियम एलएलाही तितकेच लागू पडतात. खरं तर मालिकेत एक मॅडी बॉश (मॅडीसन लिंट्झ) सोडल्यास कोणतेही पात्र पूर्णपणे काळे नाही वा पांढरेदेखील नाही. अगदी हॅरी बॉशसुद्धा पूर्णपणे पांढरा नाही. त्याच्यातही शेकडो त्रुटी आहेत, दोष आहेत. बॉशची अशी बहुढंगी भूमिका करणाऱ्या टायटस वेलिव्हरचे काम एकदा पाहाच. ही मालिका नायकाचे दोष दाखवताना एकदाही हात आखडता घेत नाही. किंबहूना मालिका कशातच हात आखडता घेत नाही. जे राजकीय मुद्दे बोलायला तर सोडाच चारचौघांत विचार करायलाही अडचणीचे वाटतात, त्यावर ‘बॉश’ने बिनधास्त सीझनच्या सीझन काढलेयत. त्यांचा ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’वरील सीझन तर स्क्रिनवर एखादा स्फोटक राजकीय मुद्दा किती संयतपणे व त्रयस्थपणे दाखवावा याचा वस्तुपाठ आहे अक्षरशः! त्या तुलनेत आपल्याकडील तथाकथित पुरोगामी म्हणून मिरवणारे कलाकार फक्त आणि फक्त उथळ खळखळाट तेवढा करतात, वैचारिकता औषधालाही दिसत नाही त्यांच्या कामात. अर्थात ‘बॉश’मध्येही इन्क्लुझिव्हनेसचा प्रमाणापलिकडचा अट्टाहास, एकाही अगदी एकाही पात्राचं वैवाहिक आयुष्य ठिक नसणं वगैरे प्रपोगण्डा आहेच.
‘बॉश’ची मला दुसरी सगळ्यांत जास्त भावलेली गोष्ट म्हणजे त्यात अॅक्शन जवळपास नगण्य आहे. पात्रे नुसतीच बोलत राहातात, रटाळ कामं करत राहातात, अत्यंत निरर्थक गोष्टींतून मागोवा काढत राहातात. अगदी दिड-दोन मिनिटे चालणारे सीन्स आहेत मालिकेत. अनेक उपकथानकं एकाच वेळी चालू असतात. तरीही असं वाटत राहातं की काहीच घडत नाहीये मालिकेत. पण एपिसोड संपल्याक्षणी जाणवतं, च्यायला ‘झी मराठी’वाल्यांच्या हजार एपिसोड्समध्ये जेवढं कथानक पुढे जात नाही तेवढं यांनी एकाच भागात पुढे नेलंय. मला सांगा, पोलिसांचं प्रत्यक्ष आयुष्य असंच असतं ना हो! थरारक पाठलागाचे, मारधाडीचे प्रसंग कितीसे येत असतील खऱ्या पोलिसांच्या आयुष्यात? क्वचितच ना! ‘बॉश’ला मी अतोनात वास्तववादी म्हणालो ते यासाठीच. ते नॉनग्लॅमरस रिअॅलिझममध्ये बुडी मारायला क्षणभरही घाबरत नाहीत. कारण, त्या एक एक बुडीतून ते शंभर टक्के रत्नच बाहेर काढतात! नुसतीच बडबड असूनही मी पैज लावून सांगतो की, मालिका एका क्षणासाठीही कंटाळवाणी होत नाही. उलट मी तर म्हणेन की, मी आजवर ऐकलेले बेस्ट डायलॉग्स जर कुणा मालिकेत असतील, तर ते ‘बॉश’मध्येच. एक एक प्रसंग हा नुसता चित्रकोड्याच्या एका तुकड्यासारखाच नाहीये, तर एकाच घटनेच्या शेकडो कंगोऱ्यांपैकी एक एक कंगोरा उलगडून दाखवणारा आहे. नॅरेटिव्ह स्ट्रक्चर कसं लेयर्ड आणि तरीही कसं एकजिनसी असावं ते शिकावं तर या मालिकेकडूनच. संवेदनशील असाल तर या गोष्टी अक्षरशः अंगावर येतात, व्यापून टाकतात, भिती वाटायला लावतात. मालिकेचा मुख्य भर हा अंगावर काटा आणणाऱ्या अवास्तव साहसदृश्यांपेक्षा आत्म्याला शहारा आणणार्या माईंडगेम्सवर आहे. आणि त्यात ही मालिका पूर्ण गुण मिळवते!
या मुद्याच्या बाबतीत तुलनाच करायची झाली तर ‘बॉश’ ही काहीशी जॅझ संगीतासारखी आहे. वरवर काहीसा आळशी, क्रमहीन वाटणारा हा संगीतप्रकार जसा तयार कानाच्या माणसाला समाधीप्रत नेऊ शकतो, नेमके तेच ही मालिका करते. किंबहूना त्यामुळेच कदाचित कॉनेलीने बॉशच्या अंधाऱ्या आयुष्यात जॅझचं पातळसर चांदणं लिहिलेलं असणार. जॅझ हा माझा वीकपॉईण्ट. रहमानने या संगीतप्रकाराची ओळख करून दिल्यापासून मी खुळावल्यासारखा जॅझ ऐकत असतो. ही मालिका मला प्रमाणापलिकडे आवडण्याचे हे ही एक कारण आहे की, या मालिकेत एखाद्या म्युझिकलएवढं जॅझ आहे. या मालिकेनेच ‘आर्ट पेपर’सारख्या दैवी कलाकारासोबत माझी ओळख करून देऊन केलेले उपकार मी जन्मात कधी विसरणार नाहीये. मालिका पाहा अथवा पाहू नका, पण संगीताचे चाहते असाल तर स्पॉटीफायवर हॅरी बॉशची प्लेलिस्ट जरूर ऐका. जॅझ आवडत असेल तर अक्षरशः वेड लागेल वेड! हॅरी बॉश हा असा बेक्कार माणूस आहे, ज्याची रहमानशी ओळख करून द्यायला, त्याच्यासोबत तासनतास रहमानबद्दल बोलायला मला अतिशय आवडेल. आणि खरं सांगतो, हे असं मला फारच थोड्या लोकांबद्दल वाटतं.
प्रत्येक पर्व हे कॉनेलीच्या एकाहून अधिक कादंबऱ्यांवर आधारित आहे. पण पर्व संपल्यावर ते केस संपल्याची भावना देण्याइतकेच आपल्याला एखादी परिपूर्ण कादंबरी ‘पाहिल्याची’ भावना देऊन जाते. इतकी परिपूर्णता मी तरी साहित्यावर आधारित कोणत्याच मालिकेत अथपासून इतिपर्यंत पाहिलेला नाही. भल्याभल्या मालिका शेवटाकडे ढासळताना पाहिल्या आहेत मी. ‘बॉश’ ही त्या दिव्य यादीत येते, जिला परफेक्ट शेवट कसा करावा ते समजले आहे. काही मालिका या ब्रेन्गॅझम देतात, काही माईंड्गॅझम देतात. ‘बॉश’ ही त्या दुर्मिळ प्रकारातील मालिका आहे जी तुम्हाला क्षणोक्षणी ब्रेन्गॅझम आणि माईंड्गॅझम तर देतेच, पण त्याच्याही पलिकडे जाऊन ती तुम्हाला वेळोवेळी भयानक ताकदीचा सोल्गॅझमसुद्धा देते. आणि खरंच सागतो सोल्गॅझम होणे हा आजच्या जगात शब्दशः दुर्मिळातील दुर्मिळ प्रकार आहे, अगदी या मालिकेच्या दर्जासारखाच! मनापासून सांगतो, इतकं लिहूनही ‘बॉश’चं दहा टक्केसुद्धा रसग्रहण मला जमलंय असं वाटत नाहीये. लवकरच येणारा ‘बॉश’चा स्पिनऑफदेखील या दर्जाला साजेसाच ठरो, अशी सार्थ अपेक्षा आहे.
‘बाय मोअर’ सुपरमार्केटच्या ‘नर्ड हर्ड’ या अत्यंत रटाळ आणि गचाळ अशा संगणक दुरुस्ती विभागात काम करणाऱ्या चार्ल्स तथा चक बार्टोव्स्कीचं (झकॅरी लेव्ही) आयुष्य एका रात्रीत पार बदलून जातं. त्याचं कारण म्हणजे चकचा एकेकाळचा स्टॅनफर्डसारख्या प्रथितयश विद्यापीठातील परममित्र आणि कालौघात परमशत्रू बनलेला ब्राईस लार्किन (मॅथ्यू बोमर). ब्राईसच्या कारस्थानामुळे चकला विद्यापीठाने काढून टाकलं होतं. त्या घटनेलाही आता चार वर्षं उलटून गेली. किंबहूना त्या घटनेमुळेच चकसारखा जग बदलू शकणारा अत्यंत हुशार विद्यार्थी आज ‘बाय मोअर’सारख्या फडतूस ठिकाणी काम करतोय. ब्राईस मात्र अजूनही त्याचा पिच्छा सोडत नाहीये. जगाच्या दृष्टीने साधा अकाऊंटंट असलेला लार्किन प्रत्यक्षात सीआयएचा अत्यंत खतरनाक गुप्तहेर आहे. पण तो आपल्याच देशावर उलटतो आणि ‘इंटरसेक्ट’ नावाचं सीआयएचं सगळ्यांत गुप्त संशोधन चोरतो. त्यावेळी झालेल्या मारामारीत ब्राईस तर मरतो, पण मरताना तो इंटरनेटचा सबंध प्रोग्राम चकला पाठवतो. आणि हा येडा चकदेखील तो बिनधास्त डाऊनलोड करतो. तो प्रोग्राम संगणकावर उघडताक्षणी पडद्यावर सहस्रावधी निरर्थक प्रतिमा दिसू लागतात. प्रतिमांचा तो स्फोट पाहाताच चकची तंद्री लागते आणि चक भोवळ येऊन कोसळतो. त्याला शुद्ध येते तेव्हा सकाळ झालेली असते व प्रोग्राम पूर्ण रन होऊन नष्टदेखील झालेला असतो.
त्या एका रात्रीत चकचं सारं आयुष्यच बदलून जातं. झालं असं असतं की, तो प्रोग्राम म्हणजे एक महासंगणक असतो. कूटप्रतिमांच्या स्वरूपात महाप्रचंड विदा तो चकच्या डोक्यात भरतो. आणि ती विदा म्हणजे प्रत्यक्षात सीआयएचा संपूर्ण विदानिधी (डेटाबेस) असतो. ब्राईस लार्किन, चकचा एकेकाळचा घनिष्ठ मित्र व जन्माचा वैरी, मरता-मरता चकच्या हाती सबंध अमेरिकेच्या सुरक्षेच्या किल्ल्या देऊन गेलेला असतो. या एका योगायोगामुळे साधाभोळा, काहीसा मूर्ख आणि अत्यंत अननुभवी चक अचानकपणे सीआयए आणि एनएसए या दोन्ही गुप्तदलांसाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण मालमत्ता (ऍसेट) होऊन बसतो! चकची सुरक्षितता ही अमेरिकन शासनाच्या प्राधान्यक्रमात सर्वांत वरच्या स्थानी येते. व त्यासाठी सीआयए आपली बेस्ट गुप्तहेर सेराह वॉकर (य्वेन स्ट्राहोव्स्की) तर एनएसए आपला सर्वश्रेष्ठ असॅसिन जॉन केसी (ऍडम बाल्डविन) अशा दोघांना पाठवतात. आणि मग सुरू होतो ‘चक’ नावाचा पाच पर्वे (२००७-१२) चाललेला अत्यंत विनोदी, अतिशय तंत्रशुद्ध रितीने मांडलेला, उत्तम अभिनयाने नटलेला, श्रेष्ठ लेखनाने सजलेला आणि पराकोटीचा रोमांचक असलेला खेळ!
‘चक’ची सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मालिका नुसती एस्पियोनाज-थ्रिलर नाही तर एस्पियोनाज-सिटकॉम-थ्रिलर आहे. या बाबतीत तुलनाच करायची झाली तर तिची तुलना जेम्स कॅमेरॉनच्या ‘ट्रू लाईज’सोबत (१९९४) करता येऊ शकते. अच्छा तुम्ही जर नीट विचार केला तर तुम्हाला दिसेल की ऍमेझॉन प्राईमवरील तथाकथित हिट मालिका ‘द फॅमिली मॅन’ने (२०१९-) ‘ट्रू लाईज’च्या संकल्पनेची शब्दश: चोरी केलीये. ते एक असो. पण ‘चक’ असं काही करायला जात नाही. उलट ‘ट्रू लाईज’च नव्हे तर पॉप कल्चरशी संबंधित अक्षरशः हजारो गोष्टींना ते आपल्या प्रत्येक एपिसोडमधून मानवंदना देतात. तुम्हाला जर ते सारे संदर्भ माहिती नसतील तरीही ‘चक’ अत्यंत मनोरंजक राहातेच, पण जर ते संदर्भ माहिती असतील तर तिच्या मनोरंजनमूल्याला काही मर्यादाच राहात नाहीत. ‘चक’मधील विनोद हे त्या संदर्भांमधून तर येतातच पण त्याहून जास्त ते परिस्थितीकडे पाहाण्याच्या तिरकस दृष्टीकोनातून येतात. शिवाय ‘चक’ची कथा ही अनेक पातळ्यांवर चालते. म्हणजे गुप्त मिशन्स ही एक पातळी. ‘बाय मोअर’चा स्टाफ, त्यांचे उपद्व्याप, त्यांच्या अडीअडचणी ही दुसरी पातळी. चकचं वैयक्तिक आयुष्य, त्याची बहिण एली (सेराह लँकेस्टर), तिचा बॉयफ्रेण्ड डेव्हन तथा कॅप्टन ऑसम (रायन मॅक्पार्ट्लीन) ही तिसरी पातळी. या तिन्ही पातळ्या कथानकांच्या दृष्टीने सशक्त तर आहेतच पण तिन्ही ठिकाणी विनोदाला अतिशय वाव आहे व त्याचा या मालिकेने अतोनात फायदा करून घेतलाय. गंमत म्हणजे जवळपास प्रत्येक एपिसोडमध्ये हे तिन्ही स्तर एकमेकांना छेदतात व एकमेकांवर प्रभाव टाकत असतात. ही बाब ज्या सुरेख पद्धतीने संहितेत लिहिली व दिग्दर्शनातून मांडलीये की मन अक्षरशः तृप्त होऊन जाते! खूप थोड्या मालिका असतात ज्या असं बौद्धिक, वैचारिक आणि समाधान देऊ शकतात.
त्याच धर्तीवर अजून एक विधान करतो की, खूप थोड्या मालिका अशा असतात ज्यातील प्रत्येक पात्र हे ती भूमिका साकारलेल्या अभिनेत्यासाठीच लिहिलंय असं वाटतं. ‘चक’ ही पात्रयोजनेच्या बाबतीत अत्यंत परिपूर्ण आहे. मुख्य कलाकारच नव्हे तर मॉर्गन ग्राईम्स (जोशुआ गोम्स), बिग माईक (मार्क ख्रिस्तोफर लॉरेन्स), लेस्टर पटेल (विक्रम सहाय), जेफ्री बार्न्स (स्कॉट क्रिन्स्की), जनरल बेकमन (बोनिता फ्राईडरिकी) अशा दुय्यम पात्रांच्या बाबतीतदेखील त्या त्या अभिनेत्याखेरीज इतर कुणाचाच विचारदेखील करवत नाही. मॉर्गनचे पात्र तर एखाद्या पात्राचा परिपोष कसा करावा याचा निव्वळ वस्तुपाठ आहे. किंबहूना मॉर्गन ‘द बिग बँग थियरी’मधील (२००७-१९) हॉवर्ड वॉलोविट्झचे (सायमन हेल्बर्ग) पात्र यांच्या आलेखात कमालीचे साम्य आहे. गंमत म्हणजे दोन्हीही मालिका वेगवेगळ्या नेटवर्क्सवर पण तरीही एकाच दिवशी (२४ सप्टेंबर २००७) सुरू झाल्या होत्या!
आपल्याकडे अशा विषयावर मालिका बनली तर इतकी सशक्त कथावस्तू नसेल एकवेळ, पण कमालीची नग्नता असणार म्हणजे असणारच! किंबहूना आपल्याकडील मेंढरीकरण झालेल्या मालिका त्याच मार्गाने जाव्यात याची ‘गरीबांच्या तारान्तिनो’ने पुरेपूर काळजी घेऊन ठेवलीये. ‘चक’ मात्र या ही आघाडीवर बाजी मारून जाते. तिच्यात उत्तानपणा आहे, पण नग्नता नाही. त्वेषाने केलेली वक्तव्ये आहेत, पण शिव्या नाहीत. किंबहूना त्या गोष्टी टाळल्यामुळेच ‘चक’चे रंजनमूल्य व स्मरणमूल्य कित्येक पटींनी वाढले आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे पर्वांमध्ये मांडल्या जाणाऱ्या आधुनिक मालिका म्हटल्या की त्या बहुसंख्यकांचा द्वेष करणाऱ्या व डाव्या विचारसरणीची काहीही करून भलामण करणाऱ्याच असणार, हे सांगायला कुणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. क्वचित एखाद्या अपवादाने सिद्ध होणारा अलिखित नियमच आहे म्हणा ना हा! ‘चक’चे वेगळेपण मात्र असे की, ती डाव्या विचारसरणीची भलामण करीत नाही, वर्णभेद मिटवण्याच्या बुरख्याआड गोऱ्यांचा द्वेष करीत नाही, अशांतीच्या दूतांचे गोडवे गात नाही.
किंबहूना ‘चक’मध्ये जो प्रपोगण्डा आहे तो प्रवाहाच्या नेमका उलट आहे. स्पॉयलर न देता सांगायचं तर एकवार तिच्यातील मुख्य खलनायकाच्या इंडस्ट्रीचा लोगो पाहा! असे हजारो, होय शब्दशः हजारो छुपे संदर्भ ही मालिका प्रत्येक एपिसोडगणिक देते. किंबहूना या मालिकेतील बहुतांशी नावे, पात्रे, स्थळे, घटना यांच्यात अनेक छुपे अर्थ आहेत. ते शोधणे व त्यांचा अन्वयार्थ लावणे हा एक वेगळाच मजेदार खेळ आहे. जॉन केसीचे पात्र तर उघडपणे कन्झर्व्हेटिव्ह आहे. तो रोनाल्ड रेगनचा चाहता नव्हे तर अक्षरशः भक्त आहे. तो क्लिंटन दांपत्याचा द्वेष करतो. तो सातत्याने अमेरिकेतील बंदुका बाळगू देण्याच्या स्वातंत्र्याची अभिमानाने भलामण करतो. तो कम्युनिस्टांना प्रकटपणे नावं ठेवतो. तोच कशाला, मालिकेतील नायक व नायकाच्या बाजूचे सगळेच कमालीचे राष्ट्रभक्त आहेत. ते सगळेच बलिदान, कुटूंबव्यवस्था, लग्नसंस्था इ. मूल्यांवर अतोनात विश्वास ठेवतात. बहुसंख्य भारतीयांच्या दृष्टीने ही मूल्ये अगदीच साहजिक असली तरीही सांप्रत जगाच्या हिशोबात त्यांना उजव्या विचारसरणीचीच मूल्ये मानतात. केसीचं काम करणारा ऍडम बाल्डविन प्रत्यक्ष आयुष्यात अगदी तसाच आहे. मुख्य नायक ‘चक’ची भूमिका करणारा झकॅरी लेव्ही अतिशय धार्मिक ख्रिश्चन आहे. आणि हे दोन्हीही योगायोग खचितच नाहीत! पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मालिका उजव्या विचारसरणीची आहे म्हणून ती चांगली आहे, असं नाहीये, तर ती एक चांगली मालिका आहे जी उजव्या विचारसरणीची आहे. हा लहानसा फरक समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे, विशेषतः आपल्याकडील उजव्यांनी! अपवाद वगळता आपल्याकडच्या बहुतांशी उजव्यांचं असं दिवास्वप्न असतं की, एखादी मालिका अथवा चित्रपट केवळ उजव्या विचारसरणीचा आहे म्हणून तो लोकांनी डोक्यावर घ्यावा, बाकी तो मनोरंजनाच्या आणि तांत्रिक आघाडीवर थोडा कमी पडला तरी चालेल. प्रत्यक्ष जगात असं नाही चालत. तंत्रशुद्ध पद्धतीने उजव्या विचारसरणीचा सार्थ व मनोरंजक ‘उरी’ (२०१९) किंवा ‘बाहूबली’सारखा (२०१५-१७) चित्रपट बनवा, तो धो-धो चालेल. पण केवळ उजव्या विचारसरणीच्या जोरावर लोक कधीच ‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ (२०१९) अथवा ‘पीएम नरेंद्र मोदी’ (२०१९) स्वीकारणार नाहीत, त्यांना रटाळ आणि फ्लॉपच म्हटलं जाणार. ही साधी गोष्टच लक्षात न आलेले लोक मग सबंध चित्रपटसृष्टीवरच बहिष्कार घालण्याची भाषा बोलू लागतात व लोकांची मते आपल्याला हवी तशी बनवू शकणारे एक फार मोठे अवजार आपल्या कर्माने दूर लोटतात! डावे कधीच अशा चुका करत नाहीत.
चुकांच्या विषयावरून आठवलं, ‘चक’मध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत बरं का! उदाहरणार्थ- मालिका काही ठिकाणी खूपच अतिशयोक्ती करते, तिच्यात वापरलेले विज्ञानही बरेचदा छद्मतेच्या सीमेत जाते. एवढंच कशाला, मालिकेचे अखेरचे पर्व तर काहीसे दिशाहीनच वाटते. ‘चक’ ही ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’चा (२०११-१६) दर्जा अधूनमधून गाठूनही तो राखण्यात कमी पडते, ते या लहानसहान चुकांमुळेच! मला व्यक्तिश: मालिकेचा शेवट अतिशय वेगळा, अकल्पनीय व खऱ्या अर्थाने बिटरस्वीट वाटला. पण तो सगळ्यांना आवडेलच असे नाही. अरे हो, बिटरस्वीटवरून आठवलं, ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा (२०११-१९) शेवट बिटरस्वीट असेल, असं म्हणाला होता ना खुनी म्हातारा? त्यावरून आणखी एक आठवलं, ‘एचबीओ’वर ‘जीओटी’ सुरू होण्याच्या बरोब्बर सहा दिवस आधी आधी ‘चक’च्या एका एपिसोडमध्ये (११ एप्रिल) ‘जीओटी’चा एक अत्यंत अर्थपूर्ण असा संदर्भ आहे! ‘चक’चा शेवट ‘जीओटी’पेक्षा दहा कोटी पटींनी चांगला आहे. पण मग ‘चक’ ही वाईट मालिका आहे का? काही मालिका असतात ज्या पाहून (किंवा न पाहाताच) तुम्ही इतरांसमोर भाव खाऊ शकता. या मालिका असतात ज्या तुम्ही केवळ सगळं जग बघतं म्हणून केवळ बघता आणि एकदा बघून झाल्यावर त्या परत पाहाण्याची तुमची अजिबातच इच्छा नसते. काही मालिका असतात ज्या तुम्ही आयुष्यात करायला काहीच नाहीये या गैरसमजातून केवळ बघायच्या म्हणून बघता. पण या सगळ्याच्या पलिकडे, काही मालिका असतात ज्या पाहाताना तुम्हाला त्या कधी संपूच नये असं वाटत असतं. या मालिका नुसत्या संपत नाहीत, तर सोबत तुम्हाला पार रितं करून सोडतात. ‘चक’ ही या तिसऱ्या प्रकारची मालिका आहे. ती खदखदून हसवते, त्यातील अनेकानेक धक्कादायक गोष्टींनी रोमांच उभे करते, संपू नये असं वाटायला लावते आणि संपल्यावर एखाद्या फर्मास लोणच्यासारखी मुरत जाते, आयुष्यभर!
इज़राएलचं स्थान आफ्रिका, अरब राष्ट्रे आणि युरोप तिन्हींच्या दृष्टीने मोक्याचं आहे. या स्थानाला जितकी भूराजकीय किनार आहे, तितकीच किंबहूना किंचित अधिकच धार्मिक किनारसुद्धा आहे. त्यामुळेच इज़राएल स्थिर असण्यात जसा काहींचा फायदा आहे, तसाच इज़राएलला अस्थिर करण्यात काहींचा फायदा आहे. गेल्या दोन वर्षांत इज़राएलने चार निवडणुका पाहिल्या. या चारही निवडणुकांमध्ये बेंजामिन नेतान्याहूंच्या लिकुड पक्षाने सर्वाधिक जागा जरी मिळवल्या असल्या, तरीही बहुमताचा आकडा पार न करू शकलेल्या नेतान्याहूंच्या खुर्चीला उत्तरोत्तर सुरुंगच लागत गेला होता. तरीही नेतान्याहू पंतप्रधान म्हणून टिकले याची कारणे दोन. एक म्हणजे नेतान्याहूंचा राजकीय धूर्तपणा व दुसरे म्हणजे विरोधकांचे एकमत न होऊ शकणे.
मार्च २०२० मध्ये झालेल्या निवडणुकांत लिकुडला सर्वाधिक ३६ जागांसह २९.४६ % मते मिळाली. म्हणजेच आधीच्या पेक्षा ४ जागा वाढल्या तरी बहुमताला २५ जागा कमी पडल्या. विरोधकांची इच्छा होती की दुसऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष, ब्लू अँड व्हाईटचे (३३ जागा, २६.५९% मतं) नेते बेंजामिन गँट्झ हे पंतप्रधान व्हावेत. गँट्झ यांनीदेखील शपथ घेतली होती की, नेतान्याहूंना पदभ्रष्ट करेन. परंतु नेतान्याहूंनी मात्र थेट गँट्झनाच १८ महिन्यांच्या पंतप्रधानपदाची ऑफर दिली आणि नव्या राजकीय आघाडी घोडे गंगेत न्हाले! नेतान्याहूंचा लिकुड हा उजव्या विचारसरणीचा पक्ष आहे, तर गँट्झचा ब्लू अँड व्हाईट हा मध्यममार्गी पक्ष आहे. त्यामुळे या जुगाडू आघाडीमध्ये धुसफूस होतीच. तिची परिणती म्हणून डिसेंबरमध्ये क्नेसेट भंग पावली व पुन्हा एकवार निवडणुकांचे पडघम वाजू लागले.
मार्च २०२१ मध्ये झालेल्या या निवडणुकांमध्ये गँट्झ यांच्या ब्लू अँड व्हाईटची अपेक्षेप्रमाणेच दाणादाण उडाली व नेतान्याहूंच्या लिकुडने पुन्हा एकवार २४.१९% सह सर्वाधिक ३० जागा पटकावल्या. अर्थातच हा आकडा ६१ या बहुमताला पुरेसा नसल्यामुळे नेतान्याहूंनी पुन्हा एकदा राजकीय जुगाड सुरू केला. आपल्या लिकुडसह त्यांनी शास, युनायटेड तोराह जुडाईझम आणि रिलिजियस झायनिस्ट पार्टी या उजव्या पक्षांची मोट बांधली. तरीही आकडा ५२ वरच जाऊन थांबला. त्याच वेळी नेतान्याहूंच्या विरोधातील येश आतिद, ब्लू अँड व्हाईट, लेबर पार्टी, इज़राएल बेईतेन्यू, न्यू होप आणि मेरेट्झ या पक्षांचा एकत्रित आकडादेखील ५१ वरच अडकत होता. त्यामुळे उजव्या विचारसरणीचा पक्ष यामिना (७ जागा), आणि अरबवादी पक्ष जॉईंट लिस्ट (६) व युनायटेड अरब लिस्ट तथा राम (४) यांना आत्यंतिक महत्त्व आलं.
यामिना उजव्या विचारसरणीचा पक्ष असल्यामुळे त्यांचा प्राथमिक कल साहजिकच नेतान्याहूंच्या बाजूचा होता. पण ते युतीत आले तरीही नेतान्याहूंना बहुमतासाठी २ जागा कमी पडत होत्या. त्या जागांची बेगमी न्यू होप या उजव्या विचारसरणीच्या पक्षाकडून (६ जागा) झाली असती, पण त्यांनी नेतान्याहूंचे नेतृत्व असेल तर कोणत्याही प्रकारची युती करायला स्वच्छ नकार दिला. निर्भेळ उजव्या विचारसरणीचे सरकार बनण्याचा मार्ग खुंटल्यामुळे पुढचा प्रयत्न म्हणून नेतान्याहूंनी युनायटेड अरब लिस्टला साकडे घातले. पण ते जर सरकारमध्ये सहभागी होणार असतील तर आम्ही बाहेर पडू म्हणत रिलिजियस झायनिस्ट पार्टीने तो मार्गदेखील बंद करून टाकला. नेतान्याहूंनी इतरही मार्गांनी बेरजा वजाबाक्यांची गणिते करून पाहिली, परंतु त्यांना अखेरीस अपयशच हाती लागले व ४ मे २०२१ रोजी नेतान्याहूंची सरकार स्थापनेची मुदत संपली.
पुढचा प्रयत्न येश आतिद या दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाचे नेते याईर लापिड यांनी केला. त्यांनी मोट बांधलेल्या पक्षांच्या आघाडीला चेंज ब्लॉक असे नाव पडले. राजकीय क्षितिजावर वेगवेगळ्या दिशेला कललेले हे ६ राजकीय पक्ष विचारसरणीने जरी भिन्न असले तरी नेतान्याहूंचा विरोध या एकाच समान धाग्याने जोडलेले होते. नेतान्याहूंवरील आरोपांची चौकशी व इतर काही मुद्यांवर त्यांचे हळूहळू एकमत होऊ लागले. या आघाडीने पंतप्रधानपदावर २ कार्यकाळांची मर्यादा व औपचारिक आरोप लागलेल्या कुणालाही सरकार स्थापन करता येणार नाही असे दोन कायदे करण्याबाबत काम सुरू केले, जेणेकरून नेतान्याहू भविष्यात कधीच पंतप्रधान बनू शकणार नाहीत.
दरम्यान चेंज ब्लॉकच्या यामिनासोबत सकारात्मक चर्चा झडू लागल्या. यामिनाचे नेते नफ्ताली बेनेट यांना पंतप्रधानपदाची ऑफर मिळाल्यामुळे हा पक्षदेखील आघाडीत सामील होण्याची चिन्हे दिसत असतानाच योगायोगाने (!) इज़राएल-पॅलेस्टाईन संघर्ष उद्भवला. ही संधी साधून नेतान्याहूंनी पुन्हा एकवार बेनेट यांच्यासोबत बोलणी सुरू केली. याचा परिणाम म्हणून युएएलचा सहभाग असलेली चेंज ब्लॉक ही आघाडी राष्ट्रीय सुरक्षेबाबत कठोर निर्णय घेऊ शकणार नाही, असे कारण देत बेनेट यांनी आघाडी सोडली. नेतान्याहूंच्या या मास्टरस्ट्रोकनंतरही लापिड यांनी सरकारस्थापनेची मुदत संपेपर्यंत हार मानायला नकार दिला आणि इज़राएलची वाटचाल पुन्हा एकवार निवडणुकांच्या दिशेने सुरू झाली. या प्रतिडावाचा बरोब्बर अपेक्षित परिणाम झाला व बेनेट यांनी लापिड यांच्यासोबत परत एकवार चर्चा करायची तयारी दर्शवली. पण आता नवेच प्रश्न उभे राहिले.
यामिनाच्या आयलेत शाकेद यांनी क्नेसेटच्या ज्युडिशियल अपॉईंटमेंट्स कमिटीवर निवड होण्याची मागणी केल्याच्या बातम्या येऊ लागल्या. वस्तुतः लापिड यांनी त्या पदासाठी आधीच लेबर पार्टीच्या मेराव मायकेली यांना वचन दिले होते. दरम्यान नेतान्याहूंनी आपला पुढचा डाव टाकला. अनधिकृत बांधकामांशी संबंधित कामिनिट्झ लॉ रद्द करण्याबाबत ते विचार करत असल्याच्या बातम्या पसरल्या. त्याचा परिणाम असा झाला की युएएलला चेंज ब्लॉकसोबतच्या वाटाघाटीत बळ मिळाले, त्यामुळे त्यांनी आपल्या मागण्या वाढवल्या. त्याचा परिणाम असा झाला की, यामिना आणि न्यू होप हे चेंज ब्लॉकमधील उजव्या विचारसरणीचे पक्ष अस्वस्थ झाले. अखेरीस सरकारस्थापनेची मुदत संपण्याच्या अवघ्या काही तास आधी यामिनाने लेबर पार्टीला ऑफर दिली की, शाकेद या बेनेट पंतप्रधान असेपर्यंत ज्युडिशियल अपॉईंटमेंट कमिटीवर राहातील आणि त्यानंतर पंतप्रधान होण्याची लापिड यांची पाळी आल्यावर त्या पद सोडतील व ते पद लेबर पार्टीला मिळेल. ही ऑफर मान्य करण्यात आली. त्याच सुमारास बेनेट व लापिड यांनी युएएलच्या मन्सूर अब्बास यांची भेट घेतली. ते दोघेही कामिनिट्झ लॉच्या संदर्भात चर्चा करायला व नेगेव्ह वाळवंटात वसवलेली गावे अधिकृत करायला तयार झाल्यावर अब्बास यांच्या युएएलनेही सरकारमध्ये सहभागी होण्यास होकार कळवला व बेनेट यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला.
१३ जुनला बेनेट यांनी इज़राएचे १३ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ते २०२३ पर्यंत पंतप्रधान राहातील व त्यानंतर पुढील २ वर्षांसाठी येश आतिदचे याईर लापिड पंतप्रधान होतील. एकेकाळी नेतान्याहूंचे चीफ ऑफ स्टाफ असलेले ४९ वर्षांचे बेनेट हे नेतान्याहूंपेक्षाही अधिक उजव्या विचारसरणीचे मानले जातात. परंतु त्यांच्या सरकारात येश अतिद व ब्लू अँड व्हाईट हे मध्यममार्गी पक्ष, इज़राएल बेईतेन्यू व न्यू होप हे मध्यम ते उजव्या विचारसरणीचे पक्ष, लेबर व मेरेट्झ हे डाव्या विचारसरणीचे पक्ष आणि युएएल हा अरबवादी पक्ष आहे. थोडक्यात बेनेट यांचे सरकार अक्षरशः विविध राजकीय विचारसरणींचे कडबोळे आहे. शिवाय सलग १२ वर्षे सत्ता उपभोगलेला नेतान्याहूंसारखा मुरब्बी राजकारणी गप्प बसेल, हे शक्यच नाही. सैन्य आणि व्यवसाय अशी दुहेरी पार्श्वभूमी असलेले बेनेट ही तारेवरची कसरत कशी पार पाडतात, यावर इज़राएलचे भवितव्य अवलंबून आहे.
सध्या सर्व जगभर डाव्या आणि उजव्या विचारसरणींमध्ये राजकीय घमासान सुरू आहे. ट्रम्प-नेतान्याहू-पुतिन-मोदी या उजव्या विचारसरणीच्या स्वर्णदुर्गाच्या ४ बुरुजांपैकी २ तर या डावपेचांमध्ये ढासळले. पुतिन यांचे स्थान तूर्तास तरी मजबूत दिसते आहे. मोदींना २०२४ मध्ये निवडणुकांना सामोरे जायचे आहे. तेव्हा आता इतर बुरुजदेखील ढासळतात की या स्वर्णचतुष्कोणात स्थान मिळवण्यासाठी मॅक्रॉन, जॉन्सन या आघाडीच्या प्रत्याशींसोबतच बेनेटदेखील स्पर्धेत उतरतात, हे पाहाणे रोचक ठरेल!
एरिया ५१! अमेरिकेतील अतिगोपनीय, अतिसुरक्षित ठिकाण. ज्या ठिकाणाबद्दल अर्बन-लिजण्ड्स प्रसवली जातात, अशा या एरिया ५१ मधून सैन्याचा एक कॉन्व्हॉय काहीतरी अत्यंत महत्त्वाचं पार्सल घेऊन चाललाय. या कॉन्व्हॉयसोबत एक अपघात घडतो आणि ते पार्सल रस्त्यावरच उघडं पडतं! त्या पार्सलमधून निघतो एक झॉम्बी. पण नेहमीचा, साधा, सज्जन, बिनडोकपणे हळूवार चालणारा झॉम्बी नाही बरं, तो असतो एक चपळ, हुशार आणि म्हणूनच अनेकपटींनी खतरनाक सुपरझॉम्बी! तो अर्थातच सगळ्या सैनिकांना चावतो, मारून टाकतो. आणि जवळच असलेल्या एका शहरात निसटून जातो. ते शहर म्हणजे जुगाऱ्यांचा स्वर्ग, लास व्हेगास! जुगाऱ्यांच्या जीवाशीच जुगार होतो आणि बघता बघता सारे शहर संक्रमित होते. अमेरिकन शासन तत्परतेने सबंध शहर क्वारण्टाईन करते. इथे पाया रोवला जातो नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रकाशित झालेल्या झॅक स्नायडरच्या ‘आर्मी ऑफ द डेड’चा!
‘एओडी’चे हे ओपनिंग सीन्स झॅक स्नायडरच्या आजवरच्या कर्तृत्वाला साजेसेच आहेत. त्या सीन्सची एक एक फ्रेम ही सर्वोत्कृष्ट सिनेमॅटिक संवेदनांचा उच्चतम नमुना आहे. पण नुसतं तेवढंच नाही. स्नायडर या अगदी थोड्या मिनिटांच्या सिक्वेन्समध्ये अनेक अंत:स्थ विधानेसुद्धा सुंदर पद्धतीने करतो. उदाहरणार्थ, झॉम्बी उर्वरित अमेरिकेत शिरू नयेत म्हणून अमेरिकन शासन लास व्हेगासच्या भोवती भिंत बांधते. अमेरिकेचे घुसखोरांपासून रक्षण करण्यासाठी नेमके हेच ट्रम्पसुद्धा करणार नव्हता का? झॅक स्नायडरचे प्रोडक्शन हाऊस ‘द स्टोन क्वारी’चा लोगो बघा. दगड फोडण्यासाठीची हत्यारं असणारा हा लोगो तुम्हाला नकळतपणे विळा-हातोड्याची आठवण करून देतो. त्या झॅक स्नायडरच्या चित्रपटात ट्रम्पच्या धोरणाचे एकप्रकारे समर्थन होणे, हा गंमतीदार विरोधाभास आहे आणि तो योगायोग खचितच नाही! सैन्याचा जो कॉन्व्हॉय सुरुवातीच्या झॉम्बीला नेत असतो, त्या कॉन्व्हॉयचं नाव असतं, ‘फोर हॉर्समेन’! न्यू टेस्टामेंटनुसार जेव्हा अपोकॅलिप्स येईल तेव्हा त्याचे चार घोडेस्वार असतील. एझेकेलनुसार ते चार घोडेस्वार असतील – युद्ध, दुष्काळ, रानटी पशू आणि रोगराई. झॉम्बीचे निसटणे हे लास व्हेगाससाठी अपोकॅलिप्सच ठरते की! आणि त्यातूनच युद्ध, दुष्काळ, रानटी पशू व रोगराई त्या ठिकाणी येते, हाच तर चित्रपटाचा पाया आहे. स्नायडरला आपल्या चित्रपटांतून असे पौराणिक संदर्भ द्यायला भलतंच आवडतं. आणि हा सबंध सिक्वेन्स त्यातील छुपी विधाने, संदर्भ या सगळ्यांसह जबरदस्त जमून आलाय. चित्रपट जर एवढाच असला असता, तर स्नायडरच्या करिअरमधील बेस्ट शॉर्ट्सपैकी एक असला असता. एक सैनिक जेव्हा त्या झॉम्बीला घेऊन जाणाऱ्या कंटेनरच्या जवळ जात असतो आणि आपल्याला गोष्टी झॉम्बीच्या पीओव्हीने दिसू लागतात ते पाहा. जणू त्या प्राण्यासाठी सबंध जगच नव्याने निर्माण होत असतं! त्यानंतर जे गाणं आहे, ज्यातून नायकाची पार्श्वभूमी समजते, तो तर दिग्दर्शन आणि मांडणीचा अत्युत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल.
इतक्या जबरदस्त सांकेतिकतेच्या पार्श्वभूमीवर चित्रपट सुरू होतो. स्कॉट वॉर्ड (डेव्ह बॉटिस्टा) या पूर्वाश्रमीच्या मर्सेनरीकडे तनाका (हिरोयुकी सनाडा) हा कसिनोमालक येतो. आता निर्मनुष्य झालेल्या आणि झॉम्बीजनी गजबजलेल्या व्हेगासमधील त्याच्या कसिनोत २०० मिलियन डॉलर्स ठेवले आहेत. ते जर स्कॉट घेऊन येईल, तर त्याला त्या पैशांचा भलामोठ्ठा हिस्सा द्यायचा शब्द तनाका देतो. स्कॉट आणि त्याच्या सबंध कुटूंबाने एकेकाळी व्हेगासमधील झॉम्बींशी लढा दिला आहे. खूप काही गमावलंसुद्धा आहे. मिळणाऱ्या पैशांतून चांगलं आयुष्य जगता येईल, म्हणून तो तयार होतो. पण ही चोरी करायची तर ताबडतोब केली पाहिजे कारण, पुढच्या चारच दिवसांत शासन अणुबॉम्ब टाकून सबंध शहर नष्ट करणार आहे. स्कॉट तातडीने एक एक करून मारीया (ऍना डे ला रिगेरा), व्हॅण्डेरो (ओमारी हार्डविक), लुडविग डायटर (मथियास श्वाईगुफर), मरीयन पीटर्स (टिग नोटारो), राऊल कॅस्टिलो (मिकी गझमन) वगैरे सगळा क्रू जमवतो. तनाका त्यांच्या दिमतीला मार्टिन (गॅरेट डिलाहंट) हा आपला माणूस देतो. प्रवासात त्यांना स्कॉटची मुलगी केट (एला पर्नेल) व स्मगलर लिली (नोरा आर्नेझेडर) येऊन मिळतात. आता फक्त बॉम्ब पडण्याच्या आत जाऊन, चोरी करून परतणे एवढेच बाकी आहे आणि ते अजिबातच सोपे नाही. यावरून आपण अंदाज लावू शकता की, पुढे केवढी खतरनाक ऍक्शन वाढून ठेवली असेल.
पण असे काहीच होत नाही आणि चित्रपट भरभरून माती खातो! आता माती खातो म्हणजे काय? झॅक स्नायडरच्या कोणत्याही चित्रपटातील फ्रेम्स पाहा, अप्रतिम असतात. शॉट्सची त्याच्याइतकी जबरदस्त फ्रेमिंग क्वचितच कुणी करत असेल. तो स्वतः सिनेमटॉग्राफर असल्यामुळे त्याची समज पावलोपावली दिसून येते. पण त्याचवेळी हे ही लक्षात घ्या की, स्नायडर अत्यंत वाईट स्टोरीटेलर आहे. त्याच्या कोणत्याही चित्रपटाची कथा तो पडद्यावर अत्यंत वाईट रितीने मांडतो. त्याच्या कथा या कायमच पौराणिक संदर्भांनी भरलेला, वेगवेगळ्या अंत:स्थ विधानांनी ग्रासलेला गुंता असतो फक्त. तो कधी चालून जातो आणि बहुतांशी वेळा चुकतो! ‘एओडी’मध्येही तेच झाले आहे.
‘एओडी’ची सगळ्यांत मोठी त्रुटी म्हणजे हाईस्ट-फिल्म्स या जॉनरमधील बहुतांशी क्लिषेज त्यात आहेत. वॉश्ड-आऊट हिरो, वन लास्ट जॉब, मिसफिट्सचा क्रू, एक मसल, एक वॉनाबी, एक ड्रायव्हर, सगळा प्लॅन फसवणारा एक इनसाईड मॅन, त्यातून निर्माण होणारा चित्रपटांच्या भाषेत पॉईंट ऑफ नो रिटर्न, त्यातून नायकाची रायझिंग आणि मग शेवट! सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत या चित्रपटात. त्यामुळेच चित्रपट अत्यंत अनुमेय अर्थातच प्रेडिक्टेबल बनतो. चित्रपटाचे लेखन असे काही कमाल पातळीवर सुरू होते की ज्याचे नाव ते! पण जसजसा चित्रपट पुढे सरकतो, तसतसे लेखन अधिकाधिक आळशी आणि प्रेडिक्टेबलच्याही पलिकडचे प्रेडिक्टेबल होत जाते. याच दरम्यान चित्रपट हाईस्ट-फिल्म्सच्या क्लिषेजपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो आणि अजूनच गाळात रुततो. या बाबतीत मला नोलनच्या ‘टेनेट’चे (२०२०) उदाहरण द्यावेसे वाटते. त्यातसुद्धा हाईस्ट होती. साधीसुधी नव्हे तर टाईमबेंडिंग सायंटिफिक हाईस्ट होती. पण हाईस्ट-फिल्म्सच्या एकूण एक ट्रोप्सपासून तो मुक्त आणि तरीही जबरदस्त ट्विस्ट्स घेऊन येणारा होता. स्नायडरने ‘मॅन ऑफ स्टील’मध्ये (२०१३) नोलनची नक्कल करायचा प्रयत्न केला होता व तो समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी टोकाची भूमिका घ्यावी असा टोकाला गेला होता. इथे त्याने नोलनची नक्कल केलेली नाहीये, पण हा सगळाच चित्रपट अक्षरशः हवेत गोळीबार केल्यासारखा गंडलाय!
या सगळ्या गोंधळात चित्रपटाचा बचाव कशाने होऊ शकला असता, खतरनाक आणि बेक्कार ऍक्शनने! पण दुर्दैव म्हणजे ही ऍक्शनसुद्धा चित्रपटात खूपच उशिरा सुरू होते व तिच्यातही सातत्य नाही. ज्या चित्रपटाचे नावच ‘आर्मी ऑफ द डेड’ आहे, त्यात जर तुम्ही आर्मीच्या नावाखाली क्लायमॅक्समध्ये बजेट नसल्यागत पाच-पन्नास झॉम्बीज दाखवणार असाल, तर कसं चालायचं? झॉम्बीजचं तथाकथित साम्राज्यसुद्धा खूपच उथळपणे दाखवलंय. शिवाय जो झॉम्बी वाघ हा चित्रपटाचं मुख्य आकर्षण आणि म्हणूनच अवचितपणे दाखवायला हवा होता, तो सुरुवातीलाच दाखवून स्नायडरने जो काही हिरमोड केला आहे त्याला तोड नाही. एकतर चित्रपट हा स्नायडरने जणू काही झी मराठीच्या मालिकेकडून प्रेरणा घेतली असावी इतका संथ आहे. म्हणजे चित्रपट पाहात असताना खाली ती लाईन सुरू असते ना तुम्ही व्हिडिओ किती बघितलाय, किती उरलाय हे दाखवणारी? बास, त्या लाईनची जर गोगलगायीशी स्पर्धा लावली तर गोगलगाय उसेन बोल्ट वाटेल, इतका हा चित्रपट संथ आहे. इतका वेळ निरर्थक संवाद आणि बडबडीत घालवलाय की, झोप येऊ लागते आणि अचानक जागे होऊन डोळे उघडावेत तर अजूनही तोच सीन सुरू असतो!
स्नायडर हा स्नायडर म्हणून बेस्ट केव्हा असतो, जेव्हा त्याला कुणीतरी अतिशय ताकदीचा लेखक संहिता लिहून देतो! याचं उदाहरण म्हणजे, स्नायडरने दिग्दर्शित केलेला माझा आवडता चित्रपट ‘वॉचमेन’ (२००९) आणि या नियमाला अपवाद म्हणजे स्नायडरने लेखन करूनही कमाल जमलेला ‘३००’ (२००६)! एकाचा राजकीय आस डाव्या बाजूला झुकलेला तर दुसऱ्याचा उजव्या. दुर्दैव म्हणजे ‘आर्मी ऑफ द डेड’ दोन्हींच्याही दूरदूरपर्यंत जवळपासदेखील फिरकत नाही, ना सिनेमॅटिक अनुभवाच्या दृष्टीने ना राजकीय विधानांच्या दृष्टीने. मला माहिती आहे, दूरदूरपर्यंत जवळपास या शब्दयोजनेत विरोधाभास भरला आहे, पण विश्वास ठेवा हा चित्रपट त्याहून जास्त विरोधाभासांनी भरलेला व लूपहोल्सनी पिडलेला झाला आहे. चित्रपटाचं नाव जरी ‘आर्मी ऑफ द डेड’ असलं, तरी त्या डेथचं कारण खचितच बोअरडम आहे!
भारतीय (विशेषतः उत्तरेकडील) चित्रपटसृष्टी आणि अभारतीय चित्रपटसृष्टी यांच्यात एक मूलभूत अंतर आहे. भारतीय चित्रपटसृष्टी या सजीवीकरणाला (ऍनिमेशन) लहान मुलांनी पाहायची गोष्ट मानतात तर अभारतीय चित्रपटसृष्टी मात्र जे जे काही प्रत्यक्ष चित्रणातून साध्य होऊ शकत नाही अथवा ज्याची साथ लाभल्यास प्रत्यक्ष चित्रण अनेक पटींनी अधिक खुलते अशी गोष्ट म्हणजे सजीवीकरण, असे मानतात. पहिल्या वाक्यात मुद्दामहूनच दोन गोष्टी लिहिल्या आहेत. एक म्हणजे अभारतीय चित्रपटसृष्टी. कारण, केवळ पाश्चात्यच नाही तर अनेकानेक पौर्वात्य चित्रपटसृष्टीदेखील सजीवीकरणात अग्रेसर आहेत त्या केवळ सजीवीकरण म्हणजे लहान मुलांच्या गोष्टी असा डबक्यातला विचार न करण्यामुळेच. याचे अतिशय प्रसिद्ध उदाहरण म्हणजे आपणां सर्वांनाच ठाऊक असलेला युगो साकोंचा ‘रामायण – द लिजण्ड ऑफ प्रिन्स राम’ हा १९९२ सालचा चित्रपट. वरवर लहान मुलांसाठी वाटणारा हा चित्रपट मोठ्यांच्याही मनाला तितकाच हात घालतो. आज सुमारे दोन दशके उलटल्यावरही या चित्रपटाच्या तोडीचे काहीच आपल्याकडे बनले नाही, हा दैवदुर्विलास नसून आपले या माध्यमाकडे झालेले दुर्लक्ष आहे, असे माझे ठाम मत आहे. या बाबतीत आपल्याकडील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी उत्तरेकडील चित्रपटसृष्टींपेक्षा लाखों पटींनी पुढे आहेत, हा दुसरा मुद्दा. सजीवीकरण जरी नाही तरी केवळ विभासांच्या (व्हिज्युअल इफेक्ट्स) जीवावर उभे राहिलेले अनेकानेक चित्रपट तमिळ, तेलुगू, मलयाळम चित्रपटसृष्टींत दिसतात. तसे ते हिंदीतही दिसतातच. पण तुलना केल्यास हिंदीवाले तांत्रिकदृष्ट्या अजूनही खूपच मागे आहेत.
हे नमनालाच घडाभर तेल मी का ओततोय? काही वर्षांपूर्वी एक चित्रपटदिग्दर्शक माझ्याकडे आला होता. त्याला ओटिटी प्लॅटफॉर्म्सवर पिच करण्यासाठी कल्पना हव्या होत्या. मी त्याला सुचवले की, “चित्रपटसृष्टींमध्ये विज्ञानकथा हा प्रकार फारसा का हाताळला जात नाही माहितीये? कारण त्यांना कथा कळत नाही आणि विज्ञान तर त्याहून कळत नाही. त्यांची सगळी अक्कल विज्ञानाच्या नावाखाली उथळ पाण्याच्या बालिश खळखळाटात. मी तुला दहा परिपक्व विज्ञानकथा देतो. त्या कथा आपण सजीवीकरण अधिक प्रत्यक्ष चित्रण अशा मिश्रणातून मांडू. ही कल्पना जर चालून गेली तर हवी तितकी पर्वे करू शकतो आपण”. त्याने त्यावर नेहमीचेच उत्तर दिले, “लहान मुलांसाठीचे कार्टून्स ओटिटीवर कोण पाहील”? मी म्हणालो, “अरे बाबा, सगळ्या कथा प्रौढांसाठीच असतील”. पण त्याला काही ते पटलं नाही. अर्थातच तो प्रकल्प बारगळला. आणि काही दिवसांपूर्वी माझ्या दृष्टीस डेव्हिड फिंचर, टिम मिलर व जोशुआ डोनेन कार्यकारी निर्माता असलेली नेटफ्लिक्स मालिका “लव्ह डेथ + रोबॉट्स” पडली. अधाश्यासारखा पहिला सीझन खात असताना त्या तथाकथित दिग्दर्शक मिनिटाला मिनिटागणिक कचकचीत शिव्या घालताना जी काही मजा आली, त्याला तोड नाही.
लघुपटसंग्रह अथवा अँथॉलजीचा सगळ्यांत मोठा लाभ हा असतो की, प्रेक्षकांना ठराविक विषयावर खूप मोठ्या आवाक्यातील अभिव्यक्ती हाताळलेल्या पाहायला मिळतात. “लव्ह डेथ + रोबॉट्स” या शीर्षकातच मालिकेतील कथांचे विषय सहजपणे दिसतात. संग्रहातील प्रत्येक कथा या शीर्षकातील एक किंवा अनेक विषयांचा मागोवा घेतात. पण हा मागोवा त्या घेतात, विविध विज्ञानकथालेखकांच्या लेखणीच्या जोरावर. मालिकेतील बहुतांशी कथा या कोणत्या ना कोणत्या लघुविज्ञानिकेचे दृक्माध्यमासाठी केलेले अनुकूलन (अडॅप्टेशन) आहेत.
प्रलयोत्तर (पोस्ट-अपोकॅलिप्टिक) इंग्लंडमध्ये अवैध मारामारीत सहभाग घेणारी नायिका (सॉनी’ज् एज) ही धक्कातंत्राचे उत्तम उदाहरण आहे. प्रलयोत्तर जगात तीन यंत्रमानव फिरायला आलेयत (थ्री रोबॉट्स) ही कथा प्रलयोत्तर जगाचाच विषय हाताळते, पण त्यांचा दृष्टीकोन पूर्णतः वेगळा आहे. त्या कथेतून केवळ स्टेटस सिम्बॉल म्हणून विविध ऐतिहासिक स्थळे फिरणाऱ्या पण प्रत्यक्षात इतिहासाची फारशी जाण व आवड दोन्हीही नसणाऱ्या पर्यटकांवर उत्कृष्ट रूपक साधले आहे. त्या पुढील ‘द विटनेस’ ही कथन आणि तंत्र अशा दोन्हीही पातळ्यांवर या संग्रहातील माझ्या सर्वाधिक आवडत्या कथांपैकी एक. का, ते तुम्हीच बघून ठरवा. ‘सूट्स’ कथेतून आक्रमक आणि आक्रमित यांच्या वरवर दिसणाऱ्या भूमिकांवर कमालीचे तिरकस भाष्य केले आहे. ही कथा पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की, सध्यादेखील जगभरात व्हिक्टिमकार्ड खेळणाऱ्यांकडून हेच सुरू नाहीये का! ‘सकर ऑफ सोल्स’ अभिजात थराराचा अनुभव देते, तर ‘बियॉण्ड द अक़ीला रिफ्ट’ मायावादाकडे एका वेगळ्याच दृष्टीने पाहाते. ‘गुड हंटिंग’ ब्रिटिशांच्या वसाहतवादासोबतच औद्योगिक क्रांतिचा विषय चीनी पुराणशास्त्राच्या पार्श्वभूमीवर हाताळते, तर ‘द डम्प’ भयकथा आणि तत्त्वज्ञानाच्या सीमेवर गूढ नृत्य करते. विज्ञानकथेची एक उपशैली आहे, ‘मिलिट्री-सायफाय’. त्या शैलीत मोडणारी ‘शेप शिफ्टर्स’ ही कथा कल्पनाविलासाच्या आडून वर्णद्वेष आणि अमेरिकेतील दासप्रथा मांडू पाहाते, तर ‘द हेल्पिंग हँड’ अवकाशातील थराराचा रोमहर्षक पट उलगडते. मिलिट्री-सायफाय प्रकारचीच ‘लकी १३’ निष्ठा आणि श्रद्धेची एक आगळीच कहाणी सांगते. ‘आईस एज’ कथा सिद्ध करते की मनाची कवाडे जर उघडी असतील तर कल्पना करायला, ती कागदावर मांडायला आणि कागदावर मांडलेली कल्पना पडद्यावर चित्रित करायला कसलंच बंधन नसतं. युद्धाच्या काळात कम्युनिस्ट रशियाच्या सैन्याने केलेला एक प्रयोग केवढा अंगाशी येतो याचं काल्पनिक, तरीही भयकारी पण तितकंच ह्रदयस्पर्शी चित्रण ‘द सिक्रेट वॉर’मध्ये आढळते.
नुकतेच या मालिकेचे दुसरे पर्व प्रकाशित झाले. पहिल्या पर्वात असलेल्या १८ भागांच्या तुलनेत दुसरे ८ च भागांचे पर्व निम्म्याहून छोटे आहे. पण त्यातही ‘ऑटोमेटेड कस्टमर सर्व्हिस’ तंत्रज्ञानावर आणि बिगटेक कंपन्यांवर प्रमाणाबाहेर विसंबणाऱ्या समाजाचं भयाण वास्तव चित्रित करते. ही कथा काल्पनिक आहे, पण ती कल्पना सत्यात उतरायचा दिवस कदाचित कल्पनेहूनही जवळ असेल. पुराणकाळापासून माणसाने कायमच अमरत्त्वाचा ध्यास घेतलाय. पण ज्या अमरत्त्वाला उत्तर मानावं ते नीतिमत्तेचे केवढे मोठे प्रश्न उपस्थित करू शकते, याचा मागोवा ‘पॉप स्क्वाड’ घेते. कदाचित म्हणूनच पुराणांतरी अमरत्त्व मागणारे बहुतांशी राक्षस असावेत. अमरत्त्वाचीच दुसरी गहन बाजू सांगण्याचा प्रयत्न ‘स्नो इन द डेझर्ट’ मार्मिकपणे करते. ‘द टॉल ग्रास’ ही अतिशय नेटकेपणाने विणलेली पक्की भयकथा आहे. आणि भयकथेच्याच अंगाने जाणारी लहानशी ‘ऑल थ्रू द हाऊस’देखील तितकीच कमाल आहे. ‘लाईफ हच’ ही जीवनसंघर्षकथा (सर्व्हायवल स्टोरी) काळजाचे ठोके चुकवते. पण या दोन्हीही पर्वांमध्ये मिळून माझी सर्वाधिक आवडती कथा आहे ती, ‘द ड्राऊन्ड जायण्ट’. अतिशय काव्यात्म भाषेत उलगडणारी ही विज्ञानकथा घटनात्मक कमी आणि अंतर्मुख करायला लावणारीच जास्त आहे.
पण म्हणून दोन्हीही पर्वांमध्ये वाईट कथाच नाहीत असं नाही. ‘व्हेन द योगर्ट टुक ओव्हर’ ही कथा रूपक म्हणून अतिशय उत्तम आहे, पण लघुपट म्हणून तितकीशी भिडत नाही. त्या उलट ‘फिश नाईट’ अतिशय उत्तमरित्या मांडली आहे, पण अखेरीस एकूणात मुद्दा नसल्यासारखी वाटते. ‘ब्लाईंड स्पॉट’ कथा वाईट नाही, पण त्यात काही ‘वाह’ म्हणावं असं घडतही नाही. तिला मी चांगली, पण श्रेष्ठ नाही अशा वर्गात टाकेन. या उलट ‘अल्टरनेट हिस्ट्रीज’मध्ये क्षमता अचाट होती, पण त्याचा १% ही वापर त्यांनी केला नाही. त्यांचं सगळं लक्ष सतत काहीतरी विनोदी घडवण्यातच जास्त होतं. ‘झिमा ब्लू’ ही कथा एखाद्या अमूर्त चित्रशैलीसारखी आहे. तुम्ही तासनतास तिची स्तुती करू शकता, पण त्या स्तुतीसुमनांतील एकही मुद्दा सिद्ध करू शकत नाही. ती अतिशय प्रेडिक्टेबल तर आहेच, पण त्यांनी रहस्योद्घाटन खूप आधीच केल्यामुळे तिचा पडायचा तेवढाही प्रभाव पडत नाही. दुसऱ्या पर्वात मुळातच कमी कथा आहेत. त्यामुळे ‘आईस’ ही वाईट जरी नाही तरी त्यातल्या त्यात दुर्बळ असलेली कथा अधिकच वाईट प्रकारे उठून दिसते एवढंच. अर्थात, हे माझे मत झाले. तुमच्या दृष्टीने दोन्हीही पर्वांतील चांगल्या व वाईट कथा या पेक्षा वेगळ्या असू शकतात. मुद्दा फक्त एवढाच आहे की, संग्रह म्हटला म्हणजे दर्जात्मक एकजिनसीपणाचा बळी हा जातोच.
मालिकेचे मला सर्वाधिक भावलेले वैशिष्ट्य म्हणजे, वेगवेगळ्या कथांचे सजीवीकरण वेगवेगळ्या स्टुडियोजनी केले आहे. त्यामुळे क्वचित विषय सारखेच असले तरी प्रत्येक कथेचं व्यक्तिमत्त्व दुसरीहून स्वतंत्र दिसून येतं! काही कथांचं सजीवीकरण चित्रासारखं विस्मयचकित करणारं झालंय तर काहींचं पात्रे अगदी जिवंत वाटावीत इतकं खरंखुरं झालंय. सजीवीकरण म्हणजे पोरखेळ न मानता अभिव्यक्तीचं माध्यम मानलं तर ते कथाकथनात काय साध्य करून देऊ शकतं हे अनुभवायचं असेल, तर ही मालिका पाहिली’च’ पाहिजे. विशेषतः त्यातील काही कथा या सजीवीकरण अधिक चित्रपटीय कथनतंत्रे यांची इतकी अफाट सांगड घालतात की, त्यांचा एकत्रित परिणाम हा कमालीचा रोमहर्षक घडतो. तुम्ही जर सजीवीकरण म्हणजे चारदोन माहितीतील स्टुडियोज इतकाच मर्यादित विचार करत असाल, तर ही मालिका तुमची या विषयाकडे बघण्याची दृष्टीची बदलून सोडू शकते. सजीवीकरण हा मोठ्ठा परीघ पकडून या मालिकेने एखादे कलात्मक प्रदर्शन भरवावे तशा कथेगणिक विविध शैली समर्थपणे हाताळल्या आहेत. एका विशिष्ट मुद्यावर इथे टिप्पणी करणे मला अतिशय गरजेचे वाटते. आपल्याकडे जेव्हा सजीवीकरण करतात, तेव्हा त्या व्यक्तींची त्वचा अगदीच नितळ दाखवतात, त्यांच्या कपड्यांवरील सुरकुत्याही अगदीच आळशीपणाने रेखाटतात. उलट माझ्या दृष्टीने चांगले व खरेखुरे वाटणारे सजीवीकरण तेच ज्यात पात्रांची त्वचा ही तुमच्या-माझ्या त्वचेसारखीच सुरकुत्या, डाग, वांग, खड्डे यांचे चपखल मिश्रण असलेली, त्रुटीपूर्ण दिसते. ज्यात कपड्यांवर सुरकुत्या या यादृच्छिक नव्हे तर, हालचालींना अनुरूप अशाच पडतात. या दोन्हीही संग्रहांमध्ये जेव्हा जेव्हा सजीवीकरणाची शैली वास्तववादाकडे झुकलीये, तेव्हा तेव्हा त्यांनी या बारीकसारीक बाबीदेखील साध्य करून दाखवल्या आहेत!
मी वर एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे भारताबाहेर बहुतांशी ठिकाणी सजीवीकरणाला लहान मुलांपुरतंच मर्यादित मानत नाहीत. त्यामुळे दोन्हीही पर्वांतील कथा या प्रौढांसाठीच आहेत. त्यांच्यात कामुकता, रक्तपात, बीभत्सपणा, नीचपणा यांची रेलचेल आहे, इतकी की काही काही वेळा मालिका केवळ नेटफ्लिक्सची आहे म्हणून या गोष्टी घुसडल्या किंवा तशाच कथा निवडल्या की काय असे वाटून जाते. थोडक्यात, काहीतरी टोकाचं दाखवणं म्हणजेच वेगळा विचार करणं हा प्रकार इतरत्रही कमीअधिक प्रमाणात का होईना आहेच. किंबहूना तो इतरत्र आहे, त्याचीच नक्कल इकडचे अनेक तथाकथित ‘स्वतंत्र’ विचार करणारे करतात, हे उघड गुपित आहे. पण अर्थात, प्रौढांसाठी म्हटलं की ‘तेवढंच’ येत नाही. मालिकेतील बहुतांशी कथा या विचारप्रवर्तक आहेत, अंतर्मुख करून सोडणाऱ्या आहेत, लेकी बोले सुने लागे असे रूपक करणाऱ्या आहेत. ईशोपनिषदात अध्यात्म आणि विज्ञान यांच्यापैकी कशालाच कमी लेखलेले नाही, उलट दोन्हींनाही उचित महत्त्व दिलेलं आहे. विज्ञान म्हणजे तरी काय, तर भौतिक जगात सिद्ध करता येण्याजोगे तत्त्वज्ञानच असे मी मानतो. “लव्ह डेथ + रोबॉट्स”मधील बहुतांशी कथांच्या मुळाशी असेच विज्ञानाचे तत्त्वज्ञान आहे. त्यामुळेच त्या कथा आणि पर्यायाने दोन्हीही संग्रहच त्या त्या देशकालपरिस्थितीपुरते मर्यादित न राहाता वैश्विक होऊन जातात. आणि ज्याचे डोळे बाहेरूनच नव्हे तर आतूनही उघडे असतात, त्याला वैश्विकता ही भावतेच भावते!
“And if you must, then for performing this Yadnya, you shall offer me the Earth you just conquered”, Kashyapa’s voice was calm as the Maanasarovar.
He looked at him with utmost respect. Sage Kashyapa was not a man who’d joke around. So he rose from the ground. Previously he’d risen, like a flame from the most pious pier. But that was the time when he had to fight Kaartaveerya Sahasrarjuna and his cronies. Though only a few days had been passed since then, it felt like ages. And those days saw the metamorphosis of Rama, the youngest child of Sage Jaamadagni and Sati Renuka into the most feared Parashurama, the wielder of the fiercest battle-axe. He withstood all the hardships of the war only because of the training Kashyapa gave to him. So when this time he rose, it was out of devotion, love and affection towards his Guru.
He took some water from the Kamandalu in his hand and without thinking twice poured it into the feet of Kashyapa, who said, “People earn, people spend. And in between, they give up some portion. Sometimes out of fear, sometimes out of respect and sometimes simply as a duty. But rarely anyone gives up everything he just earned, only because his Guru asked him to. You are rarest even amongst those, for you had rightfully earned this Earth through Blood and Steel, and yet you didn’t even blink once when it comes to renounce it”.
“Word of the Guru, is the word of Veda for me”, said Parashuram humbly.
“Then you must do one more thing for me”, Kashyapa said with a smile.
“Tell me, what it is and consider it done”.
“Listen, before you promise”.
“I give you my word and I’ll give my life to keep it”.
“Very well then. Since, you have given up your claim on the Earth, you don’t have any right to dwell in it. Therefore, as the rightful owner of the planet, I banish you from my land”!
‘But where’d he go?’, ‘If the earth is owned by Kashyapa, where’d Rama live?’, whispered the thousand spectators. But not Parashurama. His voice was the same as it was before hearing this dreadful wish of his Guru, when he said, “As you please Gurudeva”.
And the Emperor left with his hands empty and a heart filled with the satisfaction of fulfilling his duty.
Kashyapa knew, if the order is to be restored on the Earth, it must be ruled by the Kings, not by a Sage who conquered it in the heat of passion. And this would happen only if the conquerer leaves. So he aimed for the greater good, with but a small sacrifice.
Parashurama understood the true meaning of his Guru’s wish. But he has bigger problem to solve right now; finding a piece of Earth, that is not part of the existing Earth! His thoughts wandered around this question and so do his feet, until he reached to an impasse.
Behind him was the earth, he was forbidden to dwell. In front of him was the vast ocean, which could have devoured anything and everything. Going back was not an option and going further was impossible. But impossible were the things he did conquer, from his very birth to single-handedly defeating the greatest Emperor of his time; all through his knowledge and might.
He stood in front of the ocean. The ocean looked fierce with the army of infinite battle-ready tides. The scion of Bhrugus was never the one to run away from a good fight. He took out his bow and mounted an arrow on it. He then remembered his father, the most revered Sage Jamadagni. He remembered his mother, the Goddess Renuka herself. He remembered his Guru Kashyapa who trained him to defeat everything labeled ‘impossible’. And then he remembered God Shiva who opened the secrets of Dhanurveda in front of him. He bowed to his ancestors of Bhrugu clan who withstood each and every trouble life threw at them. And with the might that destroyed the Haihayas, he released it.
The arrow sped to the sky and caught fire. Within a second it started to look like there are two Suns above, one that bestows the gift of life and another that would snatch it. The arrow crashed into the ocean with a huge explosion. And the ocean dried. It retreated back in a haste. And when the steam cleared, there was land. Land, that was never owned by anyone. Parashurama marched towards it.
In his Aashrama, Sage Kashyapa took a moment from his busy day and simply smiled.
“मी तुझ्या प्रेमासाठी वाट्टेल ते करेन. मी आकाशात टांगलेला चंद्र उतरवून तुझ्या पायांशी ठेवेन. तारे तोडून तुझ्या भालावर त्यांची चमकदार नक्षी काढेन. रात्रीच्या अंधाराने तुझे केस सजवेन. फुलांच्या लालीम्याने तुझे ओठ रंगवेन..” या आणि अशाच अनेक अशक्य कोटींतल्या आणाभाका प्रेमात वेडे झालेले जवळपास सगळेच जण घेतात. घेणाऱ्याला आणि ऐकणाऱ्यालाही त्या शब्दांचे वास्तविक फोलपण ठाऊक असते, मात्र त्या नुसत्या शब्दांनीच मनावरून फिरणारे मोरपिसदेखील हवेहवेसे वाटत असते! त्यातूनच प्रेमकथा घडत असते. परंतु कुणी जर खरोखरच या आणाभाका खऱ्या करण्यासाठी धडपडला तर ती प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा राहात नाही, तर तिची परीकथा होऊन बसते. वास्तवाच्या जगापासून शतयोजने दूर आणि स्वप्नांच्या जगाच्या सहस्रयोजने जवळ, अशी परीकथा!
असेच एक छोटेसे खेडेगाव आहे. ‘वॉल’ नाव त्याचे. नावाप्रमाणेच गावाभोवती एक बंदिस्त भिंत बांधलेली आहे. ती पार करण्याची कुणालाच परवानगी नाही. का? कारण, त्या भिंतीपल्याडचं जग हे सामान्य माणसासाठी नाहीच मुळी! ते जग आहे जादूचं. पऱ्यांचं. गॉब्लिन्सचं. ट्रोल्सचं. युनिकॉर्न्सचं. आणि इतरही शकडो अज्ञात जीवांचं! ही भिंत ओलांडण्याची परवानगी गावकऱ्यांना ९ वर्षांतून एकदाच मिळते. ती सुद्धा तात्पुरती आणि थोड्याच अंतरापर्यंत. कारण भिंतीपल्याडची मंडळी त्यावेळी तिथे चित्रविचित्र, तऱ्हेतऱ्हेच्या जादुई वस्तूंचा बाजार भरवतात. इतरवेळी मात्र भिंतीच्या पल्याड जाणारा दरवाजा प्राणपणाने रक्षणारे पहारेकरी दिवस न् रात्र डोळ्यांत तेल घालून पहारा देतच असतात. ही भिंत ट्रायस्ट्रन थॉर्न ओलांडतो. कशासाठी?
व्हिक्टोरिया फॉरेस्टरवरील अल्लड प्रेमासाठी. गावातील रूपगर्विता व्हिक्टोरिया किराणा दुकानात काम करणाऱ्या ट्रायस्ट्रनला कशाला भाव देईल? तिच्या प्रेमाचा एखादाच क्षण मिळावा म्हणून ट्रायस्ट्रन मात्र खुळ्यागत तिच्या मागेमागे फिरत राहातो. आजकालच्या भाषेत सिम्पिंग करत राहातो म्हणा ना! शेवटी कंटाळून त्याला व्हिक्टोरिया एके दिवशी एक तुटणारा तारा दाखवते. ट्रायस्ट्रन म्हणतो, ‘तो तारा जर मी तुला आणून दिला तर तू माझी कोणतीही एक इच्छा पूर्ण करशील’? व्हिक्टोरियाला ठाऊक आहे की हे काम अवघडच नाही तर अशक्य आहे. कारण, तो तारा पडलाय वॉलच्या पल्याड! त्यामुळे ट्रायस्ट्रनचा पिच्छा सोडवण्यासाठी ती होकार देते. तिला पक्की खात्री असते की, ट्रायस्ट्रन नाद सोडून देईल. हो, कोण कशाला उगाच ती भिंत पलांडेल? पण आपली कथा ही परीकथा आहे. त्यामुळे आपला नायक साहजिकच भिंत पार करून पलिकडे जातो. पलिकडे गेल्यावर त्याचे काय होते? तो तारा नेमका काय असतो? तारा कसा काय तुटू शकतो? ट्रायस्ट्रन तो तारा आणू शकतो का? या सगळ्याची अत्यंत रोमहर्षक, नर्मविनोदी, क्षणोक्षणी चकित करणारी, राजकारणाच्या डाव-प्रतिडावांतून मार्ग काढायला लावणारी अप्रतिम गाथा म्हणजे नील गायमनची १९९९ सालची कादंबरी, “स्टारडस्ट”!
मुद्दा हा नाहीच आहे की, ट्रायस्ट्रन तो तारा आणू शकतो की नाही. परीकथाच म्हटल्यावर तो तारा आणणारच हे शेंबडं पोरदेखील सांगेल. मुद्दा हा आहे की, तारा काय असतो आणि ट्रायस्ट्रन तो कसा आणतो. परीकथांचं हेच तर वैशिष्ट्य असतं. त्यांचा शेवट सगळ्यांनाच ठाऊक असतो. पण त्या शेवटापर्यंत पोहोचायचा जो प्रवास आहे, तो जो लेखक उत्कंठावर्धक घडवू शकतो तो लेखक चांगला आणि त्याची परीकथा चांगली. दुसरे म्हणजे शेवट किती जरी ठरलेला असला तरीही त्या आखीव साच्यालाही ट्विस्ट करू शकणारे प्रतिभावंत असतातच. गायमन या दोन्हीही आघाड्यांवर पैकीच्या पैकी गुण मिळवतो. त्याच्या अनुपम लेखणीमुळेच “स्टारडस्ट” प्रेडिक्टेबल असूनही कुठेच प्रेडिक्टेबल राहात नाही. किंबहूना, त्यात परीकथा या प्रकारात कुठेच न बसणारे धक्के, महत्त्वाच्या वाटणाऱ्या अवचित मृत्यू, खुनशी राजकारण, शोकात्म भाव वगैरे वास्तववादी गोष्टींची रेलचेल आहे. या गोष्टीच “स्टारडस्ट” कादंबरीला ‘चांगली’ या वर्गातून काढून ‘अत्युत्तम’ या अजूनच वरच्या वर्गात बसवतात!
बरं ही कथा नुसती ट्रायस्ट्रनची आहे का? तर नाही! “स्टारडस्ट”मध्ये वेगवेगळ्या चेटकिणी येतात, सात राजकुमार येतात, एक दासी येते, एक केसाळ प्राणी येतो, आकाशगामी जहाजातून वीजा पकडणारं एक जहाज येतं आणि यांपैकी बहुतेकांचे ‘त्या’ ताऱ्यात हितसंबंध गुंतलेले असतात. परीकथा म्हटलं की, आपल्याला सहजपणे “एक होता राजा, एक होती राणी, दोघे मेले संपली कहाणी” असे फुसके विनोद आठवतात. पण उपकथानके आणि पात्रांचे वेगवेगळे कंगोरे मात्र “स्टारडस्ट”ला फुसकी, एकसुरी परीकथा न बनवता बहुआयामी साहित्याच्या दर्जाप्रत नेतात. या मंडळींच्या एकमेकांवरील कुरघोडी आणि त्यांचा पात्रपरिपोष या गोष्टी अत्यंत वाचनीय अशा झाल्या आहेत. या गोष्टीच “स्टारडस्ट”ला बालसाहित्य अथवा कुमारसाहित्य यांच्यापेक्षा थेट साहित्य या प्रकारात नेतात. विशेषतः हल्ली इंग्रजी साहित्याच्या नावाखाली जे निकृष्ट फास्टफूड विकले जाते, त्या समोर “स्टारडस्ट” हे निव्वळ पंचपक्वान्न आहे!
पण म्हणून काय “स्टारडस्ट”मध्ये त्रुटी नाहीतच का? आहेत की! अनेक आहेत. काही प्रसंग जे अतिशय नाट्यमय होऊ शकले असते, ते भर्रकन घडून जातात. काही प्रसंग जे कथेवर विशेष प्रभाव पाडत नाहीत, ते घोळवून घोळवून चघळले जातात. पण छप्पन्न भोग असलेल्या थाळीत एखाद-दोन पदार्थ बिघडल्याने सबंध थाळीच वाईट नसते ठरत. काही ठिकाणी तुम्हाला जर इंग्रजीतील त्या-त्या बडबडगीताचा, इतिहासातील घटनेचा संदर्भ ठाऊक नसेल, तर त्या त्या प्रसंगाची मजा पूर्णपणे घेता येणार नाही. अर्थात हा दोष काही लेखकाचा नाही, ना त्या कादंबरीचा. त्यामुळे मी आवर्जून सांगेन की, काही काळ भयाण वास्तवापासून दूर जात पण तरीही त्याच्याशी नाळ पूर्णपणे न तुटू देता तुमची मानसिक बॅटरी चार्ज करू इच्छित असाल, तर “स्टारडस्ट”सारखा पर्याय नाही. या कादंबरीवर याच नावाचा चित्रपट २००७ साली आला होता. पण सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली त्यांनी मूळ कथेचा आत्माच जखमी केल्याचे पाहून मी तो पाचच मिनिटांत बंद करून टाकला. कादंबरी मात्र, पुन्हा एकवार सांगतो, अक्षरशः छप्पन्न भोग आहे. ऍमेझॉनवर सहजपणे उपलब्ध आहे. किंडलवर घेतल्यास अजूनच स्वस्त मिळेल. अवश्यमेव अनुभवा!