Category: History

  • दुभंगाचा अभंग – शॅडो अँड बोन

    दुभंगाचा अभंग – शॅडो अँड बोन

    राष्ट्रं कशामुळे दुभंगतात? युद्धामुळे! पंथवेडामुळे! राजकारणामुळे! राष्ट्रं अनेक कारणांनी दुभंगतात. पण या सगळ्या कारणांच्या मुळाशी असते ती एकच भावना, हाव! राष्ट्रं दुभंगतात ती कुणा एकाच्या हावरटपणापायी. भले वर्तमान त्या हावरट व्यक्तीला नायक म्हणो, पण इतिहास त्या व्यक्तीच्या कर्मांची बरोब्बर नोंद ठेवत असतो. अशीच हाव ‘राव्का’मधील एकाला सुटली. आणि तिचा परिणाम अखंड राव्का दुभंगण्यात झाला. पण हा दुभंग नुसता राजकीय व सामाजिक नाहीये. हा दुभंग आहे जादूचा, ज्याचा ती व्यक्ती ‘स्मॉल सायन्स’ असा उल्लेख करते. या उपविज्ञानातून निर्माण झाले ‘द फोल्ड’. राव्काला दुभंगणारी ही तमोमय भिंत अतिशय हिंस्र अशा व्होल्क्रांनी ग्रासलेली आहे. शतकानुशतके राव्का आपल्या उद्धारकर्त्या अवताराची, ‘द सन समनर’ची वाट पाहाते आहे. ती सूर्यावाहक व्यक्ती येते खरी, पण तिचे स्वरूप राव्काच्या अपेक्षेपेक्षा खूपच भिन्न आहे. ती सूर्यावाहक खरोखर फोल्डला नष्ट करते का, की त्यातून अजूनच वेगळे काहीतरी घडते याची अतिशय रोमहर्षक, पदोपदी राजकारणाचे पाश घट्ट विणणारी, जादूच्या विश्वात मानवता शोधणारी, वर्णद्वेषापासून ते लिंगभेदापर्यंत सगळ्यांवर भाष्य करणारी मालिका म्हणजे नेटफ्लिक्सची ‘शॅडो अँड बोन’!

    मालिका नेटफ्लिक्सची असल्यामुळे, संबंध असो वा नसो, उपरोक्त यादीतील शेवटचा मुद्दा त्यांना ओढूनताणून आणणे भागच आहे, हे चाणाक्ष वाचकांनी एव्हाना ओळखले असेलच. पण तेवढा एक मुद्दा वगळता मालिका आपल्या विषयापासून एका क्षणासाठीही हटत नाही, ही जमेची बाजू. नुकतेच मालिकेचे ८ भागांचे पहिलेच पर्व प्रकाशित झाले आहे, परंतु त्यांच्या कुणाही एका भागात जेवढ्या घटना घडतात, तेवढ्या सध्याच्या कोणत्याही मराठी मालिकेच्या १००० भागांत मिळूनही घडणार नाहीत. योग्य तिथे घटनाक्रम प्रचंड वेग धारण करतो व योग्य तिथे तोच वेग मंदावतो. या लेखक, दिग्दर्शक आणि संपादकांच्या अथक परिश्रमांतून व गगनगामी प्रतिभेतून साधलेल्या अतिशय नियंत्रित कथाप्रवाहामुळे मालिकेची रसनिष्पत्ती अनेक पटींनी वाढते. पात्रपरिपोषावर त्यांनी अतिशय सुरेख काम तर केले आहेच. परंतु लेखनातून जागोजागी अनेक लहानसहान प्रसंग अशा काही कौशल्याने पेरले आहेत की त्यांचा एकूण कथापटलावर मोठ्ठा परिणाम व्हावा.

    ‘शॅडो अँड बोन’ ही मालिका लाय बार्डुगो नामक लेखिकेच्या ग्रिशा-व्हर्समधील कादंबऱ्यांवर आधारित आहे. मालिकेचे पहिले पर्व हे ग्रिशाव्हर्समधील ‘शॅडो अँड बोन’ त्रयीतील त्याच नावाच्या पहिल्या कादंबरीवर व ‘सिक्स ऑफ क्रोज’ द्वयीमधील त्याच नावाच्या पहिल्या कादंबरीवर, अशा एकूण दोन कादंबऱ्यांवर आधारलेले आहे. मी यांपैकी एकही कादंबरी वाचलेली नाही. त्यामुळे अनुकूलन कितपत जमले यावर मी भाष्य करणार नाही. पण मालिका मात्र परिपूर्ण पक्वान्नासारखी चपखल जमून आलीये, एवढे खरे. विशेष म्हणजे ग्रिशाव्हर्समधील कादंबऱ्या व त्यांचे कथानक केव्हाच पूर्ण होऊन सिद्धीस गेले आहे. त्यामुळे ‘शॅडो अँड बोन’ मालिका जेव्हा केव्हा संपेल तेव्हा ती पूर्ण झालेली असेल. हे सुख मार्टिनव्हर्सच्या चाहत्यांच्या नशिबी अनेक दशकांनंतरही नाही. ही विधीची विडंबना म्हणायची की खूनी म्हातारा हा कासवापासून प्रेरणा घेतोय, हे ज्याचे त्याने ठरवावे.

    मालिका नेटफ्लिक्सची आणि त्यातही पाश्चात्य जगतातून आलेली असल्यामुळे, पॉलिटिकली करेक्ट राहाण्यासाठी बहुसांस्कृतिकतेच्या नावाखाली काहीतरी दाखवण्याचे त्यांच्यावर प्रचंड दडपण आहे. या मुद्याचा आपल्याशी संबंध असा की, मुख्य पात्रांपैकी झोया (सुजया दासगुप्ता) ही अभिनेत्री भारतीय व इनेज (अमिता सुमन) ही अभिनेत्री मूळची भोजपुरी भाषा बोलणारी नेपाळी आहे. बाकी मालिकेतील मुख्य पात्र अलिना साकारणारी अभिनेत्री जेसी मे-ली ही चीनी वंशाची आहे, माल साकारणारा आर्ची रेनॉ हा अँग्लो-इंडियन वंशातून आलेला आहे. ‘अ साँग ऑफ आईस अँड फायर’ मालिका जशी इंग्लंडचा काल्पनिक इतिहास सांगते, तशीच ही ग्रिशाव्हर्स मालिका व ‘शॅडो अँड बोन’ कथानकाच्या ओघात रशिया, मंगोलिया वगैरे देशांना स्पर्श करत असल्यामुळे मालिकेत दाखवलेली बहुसांस्कृतिकता अनाठायी वाटत नाही. अर्थात, काही अपवाद वगळता मालिकेतील बहुतांशी मंडळी ब्रिटिश इंग्लिश उच्चारांत का बोलतात, हा प्रश्न तरीही उरतोच. पण मला व्यक्तिश: ब्रिटिश उच्चार मनापासून आवडत असल्यामुळे, मी या त्रुटीकडे दुर्लक्ष करतो. संगीतात जसा अमुक गायक ‘रहमानचा माणूस’ म्हटलं की त्याच्या प्रतिभेबद्दल आपसूकच खात्री पटते, तसेच चित्रपट व मालिकांच्या माध्यमात अमुक माणूस ‘नोलनचा माणूस’ म्हटलं की त्याच्या अभिनयक्षमतेवर आपोआपच शिक्कामोर्तब होते. जोनाथन नोलनच्या ‘वेस्टवर्ल्ड’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या बेन बार्न्सने (जनरल किरिगन) या ही मालिकेत त्या लौकिकाला साजेसेच काम केले आहे. मला मात्र त्याच्या सोबतच फ्रेडी कार्टर (कॅझ), किट यंग (जेस्पर), डॅनिएले गॅलिगन (निना), डेझी हेड (जेन्या), कॅलाहन स्कोगमन (मॅथियस) अशा एकाहून एक सरस अभिनेत्यांचा इथे उल्लेख केल्यावाचून राहावतच नाहीये.

    हल्ली बहुतेक मालिकांची पहिली पर्वे ही कथा सांगण्यासाठी कमी आणि दुसऱ्या पर्वाची तयारी करण्यातच अधिक खर्ची पडतात. त्यामुळे त्यांचं सगळंच अर्धवट वाटत राहातं. ‘शॅडो अँड बोन’ पहिल्या पर्वाच्या अखेरच्या भागात दुसऱ्या पर्वाची बीजे तर पेरतेच, पण तत्पूर्वी अतिशय तृप्त करून सोडणारा, समाधानकारक असा फिनाले-सुद्धा देते. हीच एक नव्हे तर मालिकेतील इतरही अनेक बाबी या साचा भेदणाऱ्या आहेत. खऱ्या अर्थाने ‘शॅडो अँड बोन’ हा दुभंगाचा अभंग आहे! प्रचंड पैसा गाठिशी असूनही ‘द विचर’सारखा एखाद-दुसरा अपवाद वगळता नेटफ्लिक्स गेल्या अनेक वर्षांपासून निष्कलंक यशासाठी चाचपडते आहे. ही मालिका खात्रीने ती कोंडी फोडू शकते. नीट प्रमोट केल्यास ही मालिका म्हणजे नेटफ्लिक्सची अग्रणी, त्यांचा फ्लॅगशिप-शो होऊ शकते. तितकी ताकद या कथेत आणि त्याच्या मांडणीत पहिल्या पर्वामध्ये तरी निश्चितपणे आहेच आहे!!

    *४.७५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • स्त्रीकेंद्री प्रहेलिका – द ब्लेच्ली सर्कल

    स्त्रीकेंद्री प्रहेलिका – द ब्लेच्ली सर्कल

    युद्धं केवळ सीमेवरच लढली जातात, ही अंधश्रद्धा आहे. सीमेवर असते ती केवळ दृश्य आघाडी. पण खरी युद्धं लढली जातात ती, राष्ट्राच्या नागरिकांच्या मनात. ज्या राष्ट्राच्या नागरिकांचं मनोबल अतूट असतं आणि राष्ट्रासाठी आपापल्या अश्रू, रुधिर, स्वेद यांची हवि देण्याची ज्या राष्ट्राच्या नागरिकांची तयारी असते, त्या राष्ट्राचं सैन्यबळ काही का असेना पण ते राष्ट्र युद्धं जिंकतंच. किंबहूना हरले तरीही ते पराभव पचवून अंतिम विजयासाठी पुन्हा उभे राहातात.

    दुसरं महायुद्ध ही अशाच मनोबलाच्या जोरावर जिंकलेल्या युद्धांची गाथा आहे. त्या काळी इंग्लंडमधील स्त्रियांना सीमेवर लढण्याची अनुज्ञा नव्हती. पण म्हणून काही तत्कालीन ब्रिटिश स्त्रिया शांत नाही बसल्या. त्यांनी दुसऱ्या मार्गांनी आपलं योगदान दिलं. किंबहूना त्यांचं योगदान अनेकदा सीमेवरील लढाईचा चेहरामोहराच बदलून टाकणारं ठरलं होतं. ते योगदान म्हणजे एनिग्मासारख्या यंत्रांचा वापर करून कूटसंदेशांची पाठवणी करणे आणि त्यांची फोड करणे. आपल्या पक्षाला गुप्त संदेश अनायास पाठवत असताना प्रतिपक्षाच्या संदेशांची मात्र बिनतोड उकल करणे, हे आधुनिक गुप्तचरप्रणालींचं तत्कालीन रूपच म्हणा ना! इंग्लंडने त्यासाठी ब्लेच्ली पार्कमध्ये भलंमोठ्ठं गुप्त कार्यालयच उघडलं होतं. त्या काळी काही आजच्यासारखे संगणक नव्हते. त्यामुळे गुप्त संदेशांची उकल करणं हे निरीक्षण, आकलन, आकडेमोड, चौकटबाह्य विचार वगैरे गुणांची कसोटी लावणारं ठरायचं. आणि ब्लेच्ली पार्कमधील स्त्रिया या कसोटीवर अशा काही खऱ्या उतरायच्या की त्यांच्या उल्लेखाशिवाय मित्रराष्ट्रांच्या विजयाची गाथा पूर्णच होऊ शकत नाही.

    अशीच एक कमालीची आकलनशक्ती असलेली तरुण स्त्री आहे, सूझन ग्रे (ऍना मॅक्स्वेल मार्टिन). युद्धं संपून आता जवळजवळ एक दशक उलटत आलंय. दरम्यान सूझनचा विवाह झालाय. तिला समजून घेणारा नवरा आहे. दोन गोंडस मुलं आहेत. तरीही सूझनच्या आयुष्यात एका गोष्टीची कमतरता आहे, थरार! थरार म्हणजे तिला केवळ निरर्थक रोमांचाच्या लाटा नकोयत. पण ब्लेच्ली पार्कमध्ये काम करत असताना तिच्या आयुष्याला जी उद्दिष्ट असल्याची, जगण्याला हेतू असण्याची भावना होती, ती भावनाच तिच्या आयुष्यातून निघून गेली आहे. दरम्यान शहरात तरुण मुलींचे एकामागोमाग एक खून पडू लागतात आणि अस्वस्थ सूझनमधील कूटभंजिनी उसळी मारून जागी होते. आपल्या गणितीय आकलनशक्तीच्या जोरावर ती या अपराधांचा माग काढायचा प्रयत्न करू लागते. तिला ठाऊक असतं की, हे तिच्या एकटीच्या जोरावर होणारं काम नव्हे आणि ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्टनुसार ती आपल्या नवऱ्यालाही आपल्या पूर्वायुष्याची कल्पना देऊ शकत नाहीये. अशा वेळी तिला ब्लेच्ली पार्कमधील तीन जुन्या मैत्रिणींची आठवण येते. माहितीचं जाळं विणण्यात निष्णात असलेली अनुभवी व पोक्त जीन मॅक्ब्रायन (ज्युली ग्रॅहम), मनमोकळ्या व स्वैर विचारांची कॅमिला हार्कर्ट (रेचल स्टर्लिंग), अत्यंत गोड दिसणारी पण छायाचित्रासम मेधावती ल्युसी (सोफी रंड्ल) अशा तिघींसोबत मिळून सूझन एकामागोमाग एक अपराधांचा छडा लावायचा प्रयत्न करू लागते. पुढे त्यांच्यात ऍलिस मिरेन (हॅटी मोराहन) या तैलबुद्धीच्या मैत्रिणीचाही समावेश होते. त्यांची ही कथा, ‘द ब्लेच्ली सर्कल’!

    ‘द ब्लेच्ली सर्कल’ मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे संख्या. मालिकेत एकूण तीन केसेस आहेत, दोन पर्वे आहेत, पण दोन्हींत मिळून भागांची संख्या आहे केवळ सात! मालिकेला संख्यात्मक श्रेष्ठता गाठण्यापेक्षा गुणात्मक श्रेष्ठता गाठण्याची इच्छा असावी कदाचित. कारण त्यात ते शंभर टक्क्यांहून अनेक पटींनी अधिक यशस्वी झाले आहेत. मालिकेतील तिन्ही केसेस म्हणजे तीन श्रेष्ठतम, थरारक रहस्यपट असावेत एवढे जबरदस्त झाले आहेत. आणि एक एक भाग हा कूटभंजन (कोडब्रेकिंग) व त्यासोबतच कणाकणाने मनोशास्त्रीय दबाव निर्माण करत रहस्याची एक एक गाठ उकलणारे लेणे असल्यासारखा झाला आहे! बिंजवॉचिंग करायची आहे आणि तरीही काहीतरी सकस व सशक्त पाहायचंय या दोन कसोट्या असतील, तर मी डोळे झाकून ‘द ब्लेच्ली सर्कल’चे नाव सुचवेन. अर्थात, तुम्ही मात्र डोळे उघडे ठेवूनच पाहा!

    मालिका स्त्रीकेंद्रित आहे. स्त्रीवादी आहे. पण आजकाल वेब व इतरत्रही दिसणाऱ्या स्त्रीवादी मालिका जशा स्त्रियांच्या दुर्दशेचं खापर फोडण्यासाठी कुणा ना कुणाला शोधत असतात, तितका उथळ मार्ग ‘द ब्लेच्ली सर्कल’ पत्करत नाही, हे मालिकेचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य. ही मालिका पुरुषांना वर्चस्ववादी व स्त्रियांना शोषित दाखवत सबंध जगालाच काळ्या-पांढऱ्या रंगात रंगवणाऱ्या एकांगी दृष्टीने बघत नाही. ‘द ब्लेच्ली सर्कल’ ही पुरुष व स्त्रिया, दोघांच्याही अंतरंगांत डोकावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. सामाजिक भाष्य करण्याच्या आडून काहीतरी द्वेषपूर्ण प्रपोगण्डा करण्यापेक्षा ही मालिका साठ वर्षांपूर्वीच्या सामाजिक संदर्भात गोष्टी दाखवायचा प्रयत्न करते. मालिकेतील चारही नायिकांच्या वैयक्तिक व कौटूंबिक पातळीवरील संघर्षांच्या चार स्वतंत्र कहाण्या आहेत. पण त्यांच्यापैकी एकही कहाणी ही अशक्यतेच्या कोटीत जात नाही. उलट त्यांचा संघर्ष अगदी आपल्या आसपास घडणारा व म्हणूनच सर्वार्थाने खरा वाटतो.

    काही अपवाद वगळता, अमेरिकन आणि ब्रिटिश मालिका-चित्रपटांमध्ये एक मूलभूत फरक मला जाणवतो. अमेरिकन चकाचक नेपथ्य आणि रंगरंगोटीवर खूपच जास्त भर देतात. या उलट ब्रिटिश मंडळींचा ओढा नैसर्गिकतेकडे अधिक असतो. अमेरिकन लोक पात्रांच्या कृतींतून दृश्य स्वरुपातील नाट्य उभे करायचा प्रयत्न करतात तर ब्रिटिश हे पात्रांच्या हेतूंमधील अंत:प्रवाहांतून मनोवैज्ञानिक थरार निर्माण करतात. ‘द ब्लेच्ली सर्कल’ ही ब्रिटिश मालिका असल्यामुळे अर्थातच दुसऱ्या प्रकारांत मोडते. तिच्यात साहसदृश्ये काहीशी कमी असतीलही कदाचित परंतु तिच्यातील थरार बावनकशी आहे व तो एका क्षणासाठीही कमी होत नाही. वरवरच्या हाणामाऱ्यांपेक्षा खोलवर ठसा उमटवणारे व अंती गणित सुटल्याचा किंवा कोडे उकलल्याचा आनंद देणारे काहीतरी अर्थपूर्ण पाहू इच्छित असाल, तर ‘द ब्लेच्ली सर्कल’ ही खऱ्या अर्थाने तुमच्यासाठीच बनलेली प्रहेलिका आहे!

    *५/५

    — © विक्रम श्रीराम एडके.
    [अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

    टीप: ‘द ब्लेच्ली सर्कल – सॅन फ्रान्सिस्को’ नावाने याच मालिकेचा एक अत्यंत वाईट अमेरिकन स्पिन-ऑफ आला होता. हा लेख त्या मालिकेबद्दल नाही तर मूळ ब्रिटिश मालिकेबद्दल आहे.

  • चित्रपटांच्या उत्क्रांतीमार्गातील धातुस्तंभ : २००१ – अ स्पेस ओडिसी

    चित्रपटांच्या उत्क्रांतीमार्गातील धातुस्तंभ : २००१ – अ स्पेस ओडिसी

    उत्क्रांतीच्या पहिल्या पायरीवर, जेव्हा माणसाचा अद्याप माणूस व्हायचा होता, तेव्हा एका मानवसदृश वानरांच्या कळपापुढे अचानकपणे एक धातुस्तंभ येऊन उभा राहातो. ही वानरं टोळ्या करून राहाणारी आणि पाण्याच्या डबक्यांवरून दुसऱ्या कळपांशी भांडणारी, एकमेकांना घाबरून राहाणारी आहेत. काही वानरं त्या स्तंभाला स्पर्श करतात. स्पर्श केलेल्या वानरांचा कळप नवनवीन युक्त्या वापरून दुसऱ्या कळपांवर सहजी विजय मिळवू लागतो. लक्षावधी वर्षांनंतर चंद्रावर एका अवकाशयानाला तसाच पण आधीच्यापेक्षा मोठा स्तंभ सापडतो. त्या स्तंभाच्या खुणेवरून मानवांचे अजून एक अंतराळयान गुरूच्या दिशेने झेपावते. त्यांना तिकडे काय आढळते, याचा आध्यात्मिक, तात्त्विक, भौतिक आणि वैज्ञानिक पातळीवर घेतलेला रूपकात्मक शोध म्हणजे स्टॅन्ली कुब्रिकची १९६८ सालची श्रेष्ठतम कलाकृती, ‘२००१ – अ स्पेस ओडिसी’.

    हा चित्रपट पहिल्यांदाच पाहाताना तुम्हाला कदाचित वाटेल की, ‘अरे, यात दोन तास बावीस मिनिटे दाखवण्यासारखं काय आहे, हे तर अर्ध्या तासात दाखवून संपवता आलं असतं’! तुम्हाला कदाचित कथांचे तुकडे किंवा ठिगळं एकत्र करून चिकटवल्याचीही भावना निर्माण होऊ शकते. पण जसजसा हा चित्रपट तुम्हाला आकळत जाईल तसतशा या सगळ्या शंका साधनामार्गावरील सुरुवातीच्या शंकांसारख्या विरून जातील व तुमच्यापाशी राहिल ती केवळ चित्रपटाच्या क्षेत्रातील सद्गुरूंनी, स्टॅन्ली कुब्रिकने पावणेत्रेपन्न वर्षांपूर्वी दाखवलेली अनवट वाट!

    कुब्रिकला ठाऊक होतं की, आपल्या या चित्रपटाचे शेकडो अन्वयार्थ लावता येतील. किंबहूना तोच त्याचा उद्देश होता. त्यामुळेच त्याने ‘२००१’चा त्याला अभिप्रेत असलेला अर्थ सांगण्याचे कायमच नाकारले. ही खूपच कमाल युक्ती आहे. नीट वापरली तर कोणत्याही चित्रपटाची संस्मरणीयता शतपटींनी वाढवू शकते. पण त्यासाठी मुळात तो चित्रपट हा चित्रपट म्हणून उत्कृष्टरित्या बनवलेला असायला हवा, ही मूळ अट आहे. ‘२००१’बद्दलचा सर्वाधिक दृश्य, सर्वाधिक भौतिक भाग आपल्यासमोर येतो, तो म्हणजे त्याचे दिसणे. कुब्रिक हा परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध होता. काळाच्या अनेक पटींनी पुढचा होता. त्याची अकल्पनीय झेप चित्रपटाच्या रूपामध्ये सहजी डोकावते. भले ही चित्रपटाची रिळं डागडुजी करून रिस्टोअर केलेली असतील, तरीही इतक्या उच्चतम दर्जाची मूळ दृश्यं पाच दशकांपूर्वी चित्रित केलेली आहेत, या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. एक एक चौकट चित्रित करताना केवढी मेहनत घ्यावी लागली असेल, किती नियोजन करावे लागले असेल, कसे प्रमाणबद्ध नमुने बनवावे लागले असतील, गुरूत्वाकर्षणशून्य दृश्ये चित्रित करताना प्रतिभेचा केवढा कस लागला असेल, केवढे कष्ट पडले असतील, या विचारांनी नुसते तोंडात बोटच घालावेसे वाटत नाही तर शब्दशः अस्वस्थ व्हायला होते.

    या चित्रपटासाठी कुणा विज्ञानविषयक तज्ञ लेखकाच्या शोधात असताना कुब्रिकला अवचितपणे आर्थर सी. क्लार्क सापडला होता. दोघांच्या भांडणांतून, बौद्धीक घर्षणांतून, कल्पनामालिकांच्या भराऱ्यांतून, ज्या अनेक कथा निघाल्या त्या कथांचा एकत्रित परिणाम म्हणजे हा चित्रपट आहे. त्यामुळेच सुरुवातीला अकारणच ठिगळांसारखा वाटतो तो. पण जसजसे त्या तिन्ही कथांमधील, किंबहूना काळांमधील समान सूत्र मन:पटलावर साकारू लागते, तसतसा हा चित्रपट अधिकाधिक भुरळ घालू लागतो. काही चित्रपट हे पाहिल्या पाहिल्या विसरून जावेसे वाटतात, काही चित्रपट हे पाहिल्यावर दिवसभर विचारांच्या गर्तेत ढकलून देतात, काही चित्रपट हे दिवसेंदिवस व कधीकधी महिनोंमहिने अस्वस्थतेचे आवर्त उभे करतात; पण फार थोडे चित्रपट असतात जे तुमच्या सबंध आयुष्यालाच अधिक उत्तमतेकडे, उदात्ततेकडे, उन्नततेकडे घेऊन जातात. ‘२००१’ हा त्या दुर्मिळ प्रकारचा चित्रपट आहे. आजकालच्या ‘स्कॉर्सेसीच्या भाषेतील न-चित्रपटांवर’ पोसलेल्या अनुत्क्रांत प्राण्यांसमोर भूतकाळातून प्रकट झालेला धातुस्तंभच म्हणा ना!

    सुरुवातीच्या धातुस्तंभाला ती माकडं जिज्ञासेपोटी का होईना पण हात लावतात. नंतर मानवही चंद्रावरील धातुस्तंभाला त्याच भावनेने स्पर्श करतो. इथे चित्रपट एकाच वेळी उत्क्रांती, इच्छास्वातंत्र्य या सामान्य जाणीवांच्या कक्षेतील संकल्पनांना हात घालत असतानाच आपल्याहून श्रेष्ठतम, देवत्वाच्या कक्षेत जाणारे काहीतरी आहे, हा देखील विचार मांडतो. हे दोन्हीही विचार वरवर पाहिल्यास परस्परविरोधी वाटत असूनही कुब्रिक त्यांची तात्त्विक व दृश्य पातळीवरील मोट बांधण्यात कमालीचा यशस्वी ठरलाय. या बाबतीत असं यश कुब्रिकइतक्याच सातत्याने नंतरच्या काळात केवळ त्याचा सद्शिष्य ख्रिस्तोफर नोलनच्याच वाट्याला आलंय. ‘इंटरस्टेलर’मागचीच (२०१४) नव्हे तर नोलनच्या सबंध चित्रपट कारकीर्दीचीच प्रेरणा कुब्रिक आहे, हे उघडपणे जाणवते. नोलनचा ‘फॉलोईंग’ १९९८ साली प्रदर्शित झाला आणि कुब्रिक १९९९ ला वारला, त्याला जर अजून एक-दिड दशकांचं आयुष्य मिळालं असतं, तर नोलनच्या चित्रपटांवरील त्याची वेगळ्याच अंतर्दृष्टींनी भरलेली प्रतिक्रिया जाणून घेणे हा वैचारिक अत्यानंदाचा ठेवा होऊ शकला असता. बाकी दोघेही ब्रिटिश, दोघेही हॉलिवूडमध्ये राहूनदेखील डावे नसलेले, दोघांचेही सगळेच चित्रपट अभिजात म्हणून गणले जाऊनही कधीच (व अद्याप) सर्वश्रेष्ठ चित्रपटाचे आणि दिग्दर्शनाचे ऑस्कर न मिळवू शकलेले वगैरे साम्यस्थळे आहेतच.

    ज्यांनी चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, त्यांनी आधी तो पाहावा आणि मगच हा परिच्छेद वाचावा. धातुस्तंभाला स्पर्श केल्यामुळे उत्क्रांतीला मिळालेली चालना, वळणे हा चित्रपटाचा मोठ्ठा गाभा आहे. चित्रपटातील अखेरच्या दृश्यांत हीच संकल्पना विज्ञानाच्या कक्षा ओलांडून अध्यात्माच्या कक्षेत जाते. गुरूच्या जवळ दिसणारा धातुस्तंभ आधीच्या दोघांपेक्षाही मोठा असतो. त्याच्या योगे डेव्हिड बाऊमन (कियार डुली) हा उत्क्रांतीचे लाखो टप्पे पार करून एका घरात पोहोचतो. हे घर देखील नियोक्लासिकल शैलीचे आहे, अर्थात ते सनातन तर आहेच पण त्याचवेळी नवेदेखील आहे. तिथे तो अनेक देहावस्थांचा अनुभव घेतो आणि अंती गर्भस्थ होऊन पृथ्वीच्या समकक्ष उभा राहातो. तो गर्भात आहे, याचा अर्थ त्याच्यात सृजनाची बीजं लपलीयेत. पण त्याचवेळी त्याचे डोळे सताड उघडे आहेत, कारण तो आता अंतर्दृष्टीने परिपूर्ण आहे. त्याच्यासमोर असलेली पृथ्वी ही कोणत्या काळातील आहे, ते दाखवलेले नाही. जर ती वर्तमानकाळातील असेल, तर तो तिच्या उत्क्रांतीला नवे वळण द्यायला आलाय. पण जर त्याचे यान भोवऱ्यात खेचले गेले तेव्हा त्याने खचितच काळाच्या सीमा ओलांडल्या होत्या, त्या सीमा भूतकाळाला जोडणाऱ्या असतील तर? तर कदाचित समोर असलेली पृथ्वी लक्षावधी वर्षांपूर्वीची असू शकते. मग तोच तर पहिल्या धातुस्तंभाचा स्थापक तर नसेल ना? हिंदू तत्त्वज्ञानात असाच भगवंत प्रलयानंतर सृजनापूर्वी शिशुरूपात पिंपळपानावर पहुडलेला सांगितलाय!

    आज सर्वत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुळसुळाट झालेला असताना, मानव विरुद्ध यंत्र हा एकेकाळी केवळ विज्ञानकथांच्याच वर्तुळातील विषय आपसूकच वास्तवाच्या परीघात आलाय. ‘२००१’ने पन्नास वर्षांपूर्वी संगणक एचएएल-९००० विरुद्ध मानव डॉ. डेव्हिड बाऊमनचा नियंत्रणासाठीचा संघर्ष दाखवून या बाबीचा उहापोह केलाय. ही आर्थर सी. क्लार्क आणि कुब्रिक दोघांचीही ‘भेदिले सूर्यमंडळा’ दर्जाची प्रतिभा आहे. त्या भागात डुलीने साकारलेला तणावातही शांत राहाणारा अंतराळवीर खासच जमून आलाय. पण प्रतिभेचाच विषय असेल, तर आज सर्रास वापरात असलेल्या अनेक गोष्टींचे भाकित या चित्रपटाने केलेले दिसते, उदाहरणार्थ एआय, टॅब्लेट्स वगैरे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुमारे वर्षभराने मानव पहिल्यांदा चंद्रावर उतरला. आज आपल्याला ठाऊक असलेला चंद्र आणि चित्रपटात दाखवलेला चंद्र, दोन्हींमधील समानता अचंबित करणारी आहे! नेमके हेच नोलनने ‘इंटरस्टेलर’द्वारे साधले होते. त्यात दाखवलेले कृष्णविवर आणि नासाने नंतर मिळवलेले कृष्णविवराचे पहिलेवहिले छायाचित्र हे अनेक पातळ्यांवर सारखेच आहे. अर्थात, कुब्रिककडे क्लार्क होता तसाच नोलनकडेही कीप थॉर्न आहेच. कुब्रिकने दाखवलेली अंतराळयाने भयावहरित्या सत्याच्या जवळ जाणारी आहेत. हे सारे दृक्पातळीवर आहे, फक्त ते समजून घेण्यासाठी आपले डोळे अखेरच्या शिशुप्रमाणे उघडे ठेवावे लागतात. चित्रपटात संवाद खूपच कमी आहेत व जिथे आहेत तिथेही ते फारसे महत्त्वाचे नाहीत, ही बाब कुब्रिकचा चित्रपटावर एक दृक्माध्यम म्हणून केवढा गाढ विश्वास आहे, हेच दर्शवते. कुब्रिकने चित्रपटात वापरलेले शास्त्रीय संगीत हाच दृक्परिणाम श्राव्य पातळीवर लक्षपटींनी वाढवण्यात हातभार लावते. ‘२००१’साठी कुब्रिकला सर्वश्रेष्ठ विभासांच्या विभागात ऑस्कर मिळाले आहे, ते विभास खोटे वाटण्याऐवजी आजदेखील तितकेच श्रेष्ठ भासतात, हा प्रतिभेचा अजब चमत्कारच मानला पाहिजे.

    पण इतके असूनही ‘२००१’च्या मुळाशी मानवी नाट्य आहे. ते आपल्याला आज जरासे संथ वाटेल कारण, कालौघात आपण चित्रपट हा दिड तासाचा टाईमपास मानू लागलोय. चित्रपटाकडे अनुभव म्हणून पाहाणाऱ्या प्रत्येकासाठी मात्र ‘२००१’ डोळ्यांचे, मनाचे, बुद्धीचे आणि आत्म्याचे पारणे फेडेल, यात काहीच शंका नाही. तो आपली उत्कंठा वाढवतो, भीती वाटायला लावतो, मेंदूचा भुगा करतो, आश्चर्याने आ वासायला लावतो. भावनांचे असे इंद्रधनुष्य साकारणे हीच चांगल्या चित्रपटाची ओळख नसते का! या चित्रपटाने, त्यातील धातुस्तंभांनी उत्क्रांतीला दिली तशीच पन्नास वर्षांपूर्वी विज्ञानपटांना एक नवी दिशा दिली आहे. आजही चित्रपटाला चित्रपट म्हणून बनवू इच्छिणाऱ्या, पाहू इच्छिणाऱ्या प्रत्येक ध्येसासक्ताला तो प्रेरणा देतोय, विचारांना चालना देतोय. विचार हे उत्क्रांतीचे फळ आहे की उत्क्रांती विचाराचे, हा प्रश्न उपस्थित करणारा ‘२००१’ स्वतः मात्र निश्चितपणे विचारांच्या परिसीमेचे फळ आहे, यात काहीच शंका नाही!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • अर्जुनाचे काऊन्सिलिंग

    अर्जुनाचे काऊन्सिलिंग

    पांडवांच्या शक्तीचा अत्यंत मोठा भाग असलेला अर्जुन ऐन युद्ध सुरू होण्याच्या काही तास आधी ‘सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति’ म्हणत हातपाय गाळून बसलाय. हे समोर उभे असलेले माझे भाऊ आहेत, आजोबा आहेत, काका आहेत, सासरे आहेत, नातू आहेत, गुरू आहेत, या स्वजनांशी मी कसा काय लढू असं म्हणत निवृत्तीची भाषा करतोय. श्रीकृष्णाचं देवत्व ज्या अनेक गोष्टींमध्ये सामावलंय, त्यांच्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिस्थितीचं सर्वंकष आकलन करून चटकन निर्णय घेणे. कृष्णाकडे दोनच उपाय होते, एक तर या ‘अर्जुनविषादयोगा’पुढे मान तुकवायची नाहीतर त्याला त्या अवसादातून बाहेर खेचून आणायचे! पहिला मार्ग सोपा होता, उपनिषदांच्या भाषेत प्रेयस होता पण निवडणारा साक्षात भगवंत होता म्हणूनच त्याने अवघड परंतु श्रेयस मार्ग निवडला. त्याने अर्जुनाचे ऐकून घेतले, त्याला प्रश्न विचारू दिले, त्याला पूर्णपणे रिते होऊ दिले. त्याचा एक सुद्धा प्रश्न न टाळता प्रत्येक प्रश्नाची अर्जुनाचं समाधान होईपर्यंत उत्तरं दिली. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर मनमोहनाने साक्षात मानसोपचारतज्ञाच्या भूमिकेत जाऊन अर्जुनाचं काऊन्सिलिंग केलं!

    हे करताना श्रीकृष्णाने वापरलेल्या क्लृप्त्या विलक्षण आहेत. त्याने सुरुवात केली ती अतिशय साध्या युक्तिवादाने, दोस्तीखात्यात श्रीकृष्ण अर्जुनाला सावध करतो, ‘क्लैब्यं मा स्म गम: पार्थ’! आणि मग हळूच कटाक्षपूर्ण शब्दांत तो अर्जुनाला त्याच्या कुतर्कातील चूक दाखवू लागतो, ‘अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे’. हे करताना तो ‘जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवो जन्मं मृतस्य च’ आणि ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ ही आद्यसत्ये सांगायलाही विसरत नाही. श्रीकृष्णाची विधानं अत्यंत स्पष्ट आहेत, ठाम आहेत. त्याच्या बोलण्यात कमालीचं कन्व्हिक्शन आहे, तो थेटपणे सांगतो, ‘हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग: जित्वा वा भोक्ष्यसे महिम्’. दोन्हीही परिस्थितीत युद्ध करायचंच आहे. परिस्थितीला पर्याय आहेत, युद्धाला मात्र पर्याय नाही! कन्व्हिक्शन किंवा ठामपणाच्याच बाबतीत बोलायला गेलं तर क्रोधातून संमोह, संमोहातून स्मृतिभ्रम, स्मृतिभ्रमातून बुद्धिनाश आणि बुद्धिनाशातून संपूर्ण विनाश; हा श्रीकृष्णाचा कोटिक्रम त्रिकालाबाधित आहे.

    हा ‘सांख्ययोग’ सांगूनही अर्जुन ऐकत नाही म्हटल्यावर भगवान त्याला दुसरा पैलू ‘कर्मयोग’ सांगतात. अतिशय रोखठोक तत्त्वज्ञान की बाबा, ‘नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मण:’! काय बोलणार या पुढे? श्रीकृष्णाला पक्कं ठाऊक आहे की, ‘न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम्’. तो अर्जुनाला सरळ सांगतो की, ‘स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:’! या अध्यायाच्या सुरुवातीलाच श्रीकृष्ण अर्जुनाला उद्देशून ‘अनघ’ म्हणजे निष्पाप किंवा ‘भोळ्या’ असे संबोधन वापरतो आणि मग त्याला योग्य काय ते सांगतो.

    पण तरीही अर्जुनाच्या शंका फिटत नाहीत. मग भगवान परत नवीन पैलू सांगतात, ‘ज्ञानकर्मसन्यासयोग’! साक्षात विवस्वानाला सांगितलेल्या या योगाचे गुह्य भगवंत उलगडून सांगू लागतो की, ‘बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन:, तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप’! इथेच भगवान वचन देतात, ‘अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं’! कशासाठी? ‘परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, धर्मसंस्थापनार्थाय’!! भगवान इथे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक सत्य सांगतात की, ‘ये यथा मां प्रपद्यन्ते, तांस्तथैव भजाम्यहम्’! पुढे भगवान चातुर्वर्ण्याच्या उत्पत्तीचे कारण सांगतात, ‘चातुर्वर्ण्यं मया सृष्टं’. कसे? तर ‘गुणकर्मविभागश:’! भगवान सांगतात की, ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’. पण हे ज्ञान कुणाला लाभते, तर फक्त ‘श्रद्धावांल्लभते ज्ञानं’. आणि ‘संशयात्मा विनश्यति’ सांगताना भगवान म्हणतात की, संशयी माणसासाठी परलोक तर नसतोच, पण पृथ्वीही नसते आणि त्याच्या नशिबी सुख तर अजिबातच नसते!

    एवढ्यानेही ऐकत नाही म्हटल्यावर भगवंत मग ‘कर्मसन्यासयोग’ सांगतात की, कर्मसन्यास आणि कर्मयोग दोन्हीही कल्याणकारीच आहेत. पण दोन्हींमध्ये तुलनाच करायची झाली तर कर्मांपासून सन्यास घेण्याऐवजी कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे. हे सांगताना भगवान नेमका युक्तिवाद करतात की, ‘सन्यासस्तु महाबाहो दु:खमाप्तुमयोगत:’! हे तत्त्व ज्याला समजले तो ‘नैवं किञ्चित्करोमीति युक्तो मन्येत’.

    तरीही नाहीच ऐकत म्हटल्यावर मग भगवान ‘आत्मसंयमयोग’ सांगू लागतात. यात भगवान ढोंगी आणि दांभिक मंडळींचा बुरखा टर्रकन फाडताना म्हणतात की, केवळ अग्निचा त्याग करणारा सन्यासी नसतो आणि नुसताच निष्क्रिय राहाणारा योगी नसतो, तर ‘अनाश्रित: कर्मफलं कार्यं कर्म करोति य: सन्यासी च योगी च’! इथे भ्रमाचा भोपळा फोडल्यावर मग भगवान संगतवार योग कसा करायचा हे समजावून सांगतात. एकदा योग जमला की, ज्याप्रमाणे वारा नसलेल्या ठिकाणी दिव्याची ज्योत अचल राहाते, त्याच प्रमाणे त्या व्यक्तीचे चित्तदेखील अचल राहाते! तो सगळ्यांना आणि सगळ्यालाच समभावाने पाहू लागतो. हा योग ज्याला जमला तो, ‘यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं तत:’. पण त्याचवेळी भगवान हे देखील सांगतात की, ‘असंयतात्मना योगो दुष्प्रापो इति मे मति:’.

    तरीही ऐकत नाही म्हटल्यावर मग श्रीकृष्ण ‘ज्ञानविज्ञानयोग’ सांगताना आता स्वतःचं खरं रूप हळूहळू उघड करू लागतो. तो म्हणतो की सहस्रांमध्ये कुणीतरी एक मला मिळवण्यासाठी प्रयत्न करणारा असतो आणि त्यातही कुणीतरी एकच मला पूर्णपणे जाणतो. मी काय आहे? पृथ्वी, जल, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या सगळ्यांनी मिळून माझी जड प्रकृति आहे आणि या सगळ्यांना धारण करणारीही माझीच चेतन प्रकृति आहे! ‘अहं कृत्स्नस्य जगत: प्रभवः प्रलयस्तथा’! आणि मग भगवंत या संपूर्ण प्रकृतिची बारीकसारीक अंगे समजावताना मी कशात काय आहे ते सांगू लागतो. एक प्रकारचे तात्त्विक विश्वरूपदर्शनच!

    तरीही अर्जुन ऐकत नाही म्हटल्यावर मग भगवान ‘अक्षरब्रह्मयोग’ सांगू लागतात. लक्षात घ्या, अर्जुन निश्चितच शंकेखोर आहे. पण त्याच्या शंकादेखील अभ्यासातून आलेल्या आहेत. त्याचा मार्ग चुकलाय म्हणून तो हरवलाय फक्त. मुळात तो हुशार नसता तर श्रीकृष्णाने त्याला मित्र मानलेच नसते. म्हणूनच त्याच्या शंकादेखील हळूहळू प्रगल्भ होत चालल्यायत, उदाहरणार्थ, ‘अधियज्ञं कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन’. म्हणूनच भगवानही त्यांची शिकवणूक अधिकाधिक खोल करू लागलेयत की – अक्षर ब्रह्म आहे. जीवांच्या परमस्वभावालाच अध्यात्म म्हणतात. जीवांची ज्यातून उत्पत्ती होते त्याला कर्म म्हणतात. देहाच्या क्षरभावाला अधिभूत म्हणतात. देहातील पुरुष अर्थात आत्म्याला अधिदैव म्हणतात. परंतु देहातील अधियज्ञ मात्र मी आहे, मीच देह धारण करणाऱ्यांमधील सर्वश्रेष्ठ आहे! मनुष्य अखेरीस ज्याचं स्मरण करत-करत देहत्याग करतो, तो त्याच भावाने भावित राहातो. यासाठी तू सदोदित माझं स्मरण करता-करताच युद्ध कर म्हणजे तुला माझीच प्राप्ती होईल.

    एवढ्यानेही अर्जुन ऐकत नाही म्हटल्यावर मग भगवान ‘राजविद्याराजगुह्ययोग’ सांगू लागतात, ‘मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः’! जसा वायू सर्वत्र विचरण करत असूनही आकाशातच राहातो, त्याचप्रमाणे सारी भूतमात्रे माझ्यातच वास करतात, कल्पांती माझ्यातच लीन होतात आणि कल्पारंभी मीच त्यांची रचना करतो. श्रीकृष्ण म्हणतो, ‘मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम्’. इथे तो कदाचित ‘नासदीय सूक्ता’चा संदर्भ देत असावा. या यज्ञाचा क्रतु तर मी आहेच, पण यज्ञदेखील मीच आहे. मीच त्यातील स्वधा आहे, मीच औषध आहे, मीच मंत्र आहे, मीच घृत आहे, मीच अग्नी आहे आणि एवढेच कशाला तर हवनदेखील मीच आहे! या जगताचा धाता, माता, पिता आणि पितामहदेखील मीच आहे. मीच वेद आहे आणि वेद्यही मीच आहे. जे माझे अनन्यभावाने चिंतन करत उपासना करतात, त्यांचे ‘योगक्षेमं वहाम्यहम्’!

    एवढ्यानेही ऐकत नाही म्हटल्यावर भगवान अर्जुनाला ‘विभुतियोग’ सांगू लागतात की, देव आणि महर्षीदेखील माझ्या उत्पत्तीला पूर्णपणे जाणत नाहीत कारण, ‘अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वश:’! बुद्धी, ज्ञान, असंमोह, क्षमा, सत्य, दम, शम, सुख, दु:ख, उत्पत्ती, प्रलय, भय, अभय, अहिंसा, समता, तुष्टी, तप, दान, यश, अपयश, भूतमात्रांचे विविध भाव सारे काही माझ्यामुळेच होते. सप्तर्षी, त्यांच्याही पूर्वीचे सनकादी चार ऋषी, चौदा मनू हे सगळे माझ्याच संकल्पातून उत्पन्न झाले आहेत. वाचणाऱ्याला हे कदाचित आत्मप्रौढीचे वाटेल, पण इथे हे लक्षात घेतले पाहिजे की श्रीकृष्ण इथे व्यक्तिगत अहंभावातून बोलत नसून आध्यात्मिक व यौगिक अर्थाने परमेश्वरभावातून बोलतोय. अर्जुन म्हणतो, ‘सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव’, पण तरीही तो भगवंताच्या विभूती विस्तारपूर्वक सांगण्याची विनंती करतो. आता अर्जुन विषादापासून दूर गेलाय हे ओळखून श्रीकृष्णही त्याच्या कलाने घेत ‘अहमात्मा गुडाकेश:’ पासून सुरुवात करतो व एकवीस श्लोकांमध्ये स्वतःच्या विभूती अत्यंत संक्षेपाने सांगतो.

    तरीही अर्जुनाच्या सगळ्या शंका फिटत नाहीच. मग मात्र ‘विश्वरूपदर्शनयोगा’च्या निमित्ताने आपल्या समग्र रूपाचे दर्शन देतो. ते पाहाताच अर्जून दीपून जातो. त्या रूपात भगवंत सांगतात की, ज्यांना मारायला तू नकार देतोयस त्यांना मी केव्हाच मारलंय, तू फक्त आता निमित्त बन! अर्जुन आता मात्र थरथर कापू लागतो. ज्याला आपण मित्र म्हणून वागणूक दिली तो प्रत्यक्षात काय आहे हे समजल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. भगवंताच्या विश्वरूपाची स्तुती करत तो म्हणतो, ‘नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते’! भिती वाटू लागल्यामुळे तो श्रीकृष्णाला पुन्हा एकवार सौम्यरूपात येण्यासाठी विनवतो आणि श्रीकृष्णही परत एकदा नेहमीसारखाच होऊन जातो.

    पण म्हणून अर्जुनाच्या शंका संपतात थोडीच! त्यामुळेच आता मग भगवंत त्याला ‘भक्तियोग’ सांगू लागतात की, तू तुझी बुद्धी आणि मन दोन्हीही माझ्यातच निवेश कर, जे कुणी असे करतात ‘तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्’! जर तुला असा निवेश नाही जमला, तर तू माझा अभ्यास कर. जर तुला हा अभ्यासयोगदेखील नाही जमला, तर केवळ मत्परायणच होऊन कर्म कर. जर ते ही नाही जमले, तर मी सांगितलेल्या योगाचा आश्रय घे. पण लक्षात ठेव की अभ्यास श्रेष्ठ आहे, पण त्याहून श्रेष्ठ ज्ञान आहे, त्याहून श्रेष्ठ ध्यान आहे, पण त्याहून श्रेष्ठ कर्मफलत्याग आहे!

    एवढ्यानेही समाधान होत नाही म्हटल्यावर भगवंत आता ‘क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग’ सांगू लागतात की, हे शरीर म्हणजे क्षेत्र अर्थात शेत आहे व याला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात तो ‘क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत’! पुढे श्रीकृष्ण क्षेत्राचे स्वरूप आणि विकार, दोन्ही खुलासेवार सांगतो. आणि मग पुन्हा एकवार ‘नासदीय सूक्ता’चा संदर्भ देत श्रीकृष्ण ब्रह्माचे स्वरूप समजावून सांगतो की, ‘अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते’.

    पण तरीही अर्जुन काही ऐकत नाही. तेव्हा भगवंत ‘गुणत्रयविभागयोग’ सांगताना म्हणतात की, देहीला देहामध्ये सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण बांधून ठेवतात. यातील सत्त्वगुण अनामय आहे. तो ‘सुखसङ्गेन बध्नाति ज्ञानसङ्गेन चानघ’. दुसरा रजोगुण रागात्मक आहे. तो ‘तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनम्’. आणि तिसरा आहे तो अज्ञानातून उत्पन्न होणारा तमोगुण. तो प्रमाद, आळस आणि निद्रेच्या रूपाने देहीला बांधून ठेवतो. सत्त्वगुण सुखाशी जोडतो, रजोगुण कर्माशी जोडतो आणि तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमादाशी जोडतो. हे तिन्ही गुण एकमेकांवर कुरघोडी करत असतात. विवेक उत्पन्न झाल्यास सत्त्वगुण वाढतो. रजोगुण वाढल्यास लोभ, प्रवृत्ती, सकाम कर्मारंभ, अशांती आणि स्पृहा निर्माण होतात. तमोगुण वाढल्यास अप्रकाश, अप्रवृत्ती, प्रमाद आणि मोह निर्माण होतात. या तिन्ही गुणांची आपापली फळे आहेत. पण जर परमानंदाची प्राप्ती करायची तर या तिघांनाही ओलांडणे गरजेचे असते.

    तरीही अर्जुनाच्या शंका शेष राहातात तेव्हा भगवंत त्याला ‘पुरुषोत्तमयोग’ सांगतात. यात भगवंत अश्वत्थवृक्षाचा दृष्टांत देतात की, ‘ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्’. अशा या उलट्या पिंपळाच्या झाडाचे भगवंत सांगोपांग वर्णन करतात. पण हा वृक्ष म्हणजे अंतिम सत्य नव्हे. असंगाच्या शस्त्राने त्या वृक्षाला कापून ‘यस्मिन्गता न निवर्तन्ति भूयः’ अशा परमपदाचा शोध घेण्याबाबत श्रीकृष्ण सुचवतो आणि खात्री देतो की, ‘तद्धाम परमं मम’!

    एवढ्यानेही समाधान होत नाही म्हटल्यावर मग श्रीकृष्ण पुढे ‘दैवासुरसम्पद्विभागयोग’ सांगू लागतो. अभय, सत्त्वसंशुद्धी, ज्ञानयोगामध्ये दृढस्थिती, दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, तप, आर्जव, अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांती, अपैशुनता, दया, अलोलुपता, मार्दव, लज्जा, अचंचलता, तेज, क्षमा, धैर्य, शौच, अद्रोह, अतिमानितेचा अभाव ही सारी दैवी संपदेने युक्त पुरुषाची लक्षणे आहेत. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोर वाणी व अज्ञान ही आसुरी संपत्तीने युक्त पुरुषाची लक्षणे आहेत. हे सगळं सांगून झाल्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की, ‘मा शुचः सम्पदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव’! काम, क्रोध आणि लोभ हे नरकाचे तीन दरवाजे आहेत, या तिन्हींचाही त्याग केला पाहिजे. जो या तिन्हींचा त्याग करतो, त्यालाच परमगति लाभते.

    अर्जुन विचारतो की, जे शास्त्रविधींचा त्याग करून केवळ श्रद्धापूर्वक यजन करतात, त्यांची निष्ठा सात्त्विक असते, की राजस, की तामस? भगवंत यावर उत्तर म्हणून ‘श्रद्धात्रयविभागयोग’ सांगतात की श्रद्धादेखील गुणांनुसार तीन प्रकारची असते. आणि श्रद्धाच कशाला, भगवंत सांगतात की भोजन, यज्ञ, तप आणि दान सुद्धा गुणांनुसार तीन-तीन प्रकारचे असते. भगवंत या सगळ्याचं ससंदर्भ आणि सविस्तर स्पष्टिकरण करतात.

    पुढे भगवंत ‘मोक्षसन्यासयोगा’चे निरुपण करतात. श्रीकृष्ण सांगतो की, ज्ञान, ज्ञेय आणि परिज्ञाता या तीन कर्माच्या प्रेरणा आहेत; तर करण, कर्म आणि कर्ता हे कर्माचे तीन प्रकारचे संग्रह आहेत. ज्ञान, कर्म आणि कर्ता या प्रत्येकाचेदेखील सात्त्विक, राजस आणि तामसी असे तीन-तीन प्रकार पडतात. त्याचप्रमाणे बुद्धी आणि धृती यांचेही तीन-तीन प्रकार पडतात. सुखांचेही तीन प्रकार पडतात. थोडक्यात पृथ्वीवर, अथवा स्वर्गातील देवतांमध्येही असे काहीच नाही जे या त्रिगुणांपासून मुक्त असेल. आगीतून जसा धूर येतो त्याप्रमाणेच कर्म म्हटले की दोष आलेच. पण म्हणून काही कर्म करणे सोडून द्यायचे नसते, तर केवळ आसक्ती आणि स्पृहा यांचा त्याग करायचा असतो. मी युद्ध नाही करणार, असं जे तुला वाटतं, तो तुझा अहंकार आहे. तुझा तो निश्चय मिथ्याच आहे कारण, तो तुझा स्वभाव आणि प्रकृती दोन्हींच्याही विपरित आहे.

    श्रीकृष्ण अशाप्रकारे अर्जुनाची समग्र काऊन्सिलिंग करून झाल्यावर पुढे म्हणतो की, मी तुला गोपनीयतेहूनही गोपनीय असे हे ज्ञान सांगितले, आता या उप्पर जे तुला वाटते ते तू कर – ‘यथेच्छसि तथा कुरु’! पण तू मला प्रिय असल्याने मी तुला खात्रीपूर्वक सांगतो की, ‘सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः’! आता एवढी सगळी गीता सांगून वर ठाम खात्री दिल्यावर अर्जुनाच्या मनात काय शंका राहिल? तो सुद्धा स्पष्टपणे सांगतो की, ‘नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत, स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव’! हा अद्भुत संवाद ऐकणाऱ्या संजयाच्याही अंगावर रोमांच उभे राहातात व तो सहजच बोलून जातो की, ‘यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम’! अर्थातच धृतराष्ट्राला काही ते पटणारे नसतेच. हिज लॉस! कुरुक्षेत्रावर हा एक छोटासा तरीही अत्यावश्यक असा स्पीडब्रेकर जरी आलेला असला, तरीही आता युद्धाचा गाडा सुसाट सुटणार असतो. महाभयंकर महातांडवकारी असे महाभारत होणार असते. परंतु अर्जुन आता पूर्णपणे झोकून देऊन युद्धाला उभा राहातो. त्याला कशाचीच पर्वा नसते कारण, त्याचे काऊन्सिलिंग साक्षात भगवंताने केलेले असते!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]
    टीप: कुणीही लेखक हा लिहिताना आपले तन, मन, वेळ, अभ्यास सारे काही अर्पून लिहित असतो, तेव्हा कृपया लेखकाचे नाव काढून निनावी अथवा स्वतःच्या नावाने शेअर/पोस्ट करून आपल्या मातापित्यांनी केलेले कुसंस्कार दाखवू नयेत!

  • नील

    नील

    Spoiler_Alert

    स्पॉयलर_अलर्ट

    [‘टेनेट’ पाहिलेला नसल्यास लेख वाचू नये, रसभंग होण्याची शक्यता आहे. चित्रपट पाहिल्यावरच लेख वाचावा.]

    टेनेट‘मधील माझं सध्याचं सगळ्यांत आवडतं पात्र नील आहे. एक तर रॉबर्ट पॅटिन्सनने जॉन डेव्हिड वॉशिंग्टनपेक्षा जास्त चांगलं काम केलंय. आणि दुसरं कारण असं की, त्याचं पात्र हे भविष्यातून भूतकाळात आलेलं असल्यामुळे सुरुवातीपासूनच सर्वानुभवी व परिपक्व आहे. त्या मानाने नायकाचे पात्र आत्ता कुठे शिकू लागलेय. या अनुभवाच्याच आधारे नीलने त्याच्या आयुष्याचे तत्त्वज्ञान उभारलेय, “What’s happened, happened”. या तीनच शब्दांमध्ये भौतिकशास्त्रीय आणि तात्त्विक अशा दोन्ही पातळ्यांवर अतिशय सारगर्भ चिंतन आहे.

    गणित आणि भौतिकशास्त्रात एक सिद्धांत आहे, त्याला ‘केऑस थियरी‘, अर्थात ‘कोलाहल सिद्धांत’ असे म्हणतात. हा सिद्धांत सांगतो की, कोणत्याही प्रणालीच्या वर्तमान अक्रमतेच्या पाठी मुळात काही ना काही क्रम असतो व सांप्रतची अक्रमता ही आरंभीच्या सूक्ष्म बदलांवर अवलंबून असते. दुसऱ्या भाषेत, वर्तमानावर भविष्य अवलंबून असणे, परंतु ढोबळ वर्तमानावर ढोबळ भविष्य अवलंबून नसणे, म्हणजे कोलाहल. थोडक्यात एखाद्या गतिशील प्रणालीत अथवा व्यवस्थेत सुरुवातीलाच झालेला किंचित बदलदेखील त्या प्रणाली किंवा व्यवस्थेच्या भविष्यावर फार मोठा परिणाम घडवून आणू शकतो. याचं सगळ्यांत प्रसिद्ध उदाहरण म्हणजे ‘बटरफ्लाय इफेक्ट‘ किंवा ‘पुष्पपतंग परिणाम’. असं म्हणतात की, टेक्सासमध्ये एखाद्या फुलपाखराने पंख फडफडवले तर परिणामी चीनमध्ये वादळसुद्धा होऊ शकते. अर्थात हे उदाहरण तत्त्वतः जरी सत्य असले तरीही ते शब्दशः घेण्याची आवश्यकता नाही. इथे केवळ एखाद्या लहानशा घटनेतून घटनाक्रमाची शृंखला सुरू होऊन भलं मोठ्ठं काहीतरी घडू शकतं, हा अर्थ अभिप्रेत आहे. थोडक्यात आपल्या पुढे असलेली एखादी घटना किंवा परिस्थिती ही आत्ता जशी दिसते, तशी असण्यामागे भलीमोठ्ठी कार्यकारणभावाची साखळी असू शकते. त्यामुळे जर एखादी गोष्ट आहे त्या पेक्षा वेगळी असायला हवी होती असे वाटत असेल, तर तो बदल कार्याच्या नव्हे तर कारणाच्याच पातळीवर व्हायला हवा होता. उदाहरणार्थ, पाकिस्तानची निर्मिती ही १९४७ साली झाल्यापासून सबंध जगाला आणि त्यातही विशेषतः भारताला त्रास होतोच आहे, तो त्रास व्हायलाच नव्हता पाहिजे असे वाटत असेल तर आत्ता पाकिस्तानला संपवून तो समूळ संपणारा नाही. त्याचे काही ना काही राजकीय, सामाजिक परिणाम तरी देखील उरतीलच. तो त्रास संपवायचा तर त्या भागात सहस्र वर्षांपूर्वी झालेले पहिले यशस्वी आक्रमणच मुळात अयशस्वी व्हायला हवे होते. पण ते आता काळात मागे जाऊन थोपवणे शक्य नाही. आणि त्या उप्परही कुणी ते थोपवलेच, तरीही ही गतिशील प्रणाली त्या कारणाला ओलांडून दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने पुन्हा आत्ता आहे तशीच होणार नाही, याची काही एक खात्री नाही. थोडक्यात काय, तर “What’s happened, happened”!

    माणूस म्हणजे तरी वेगळं काय? कोणत्याही माणसाचे सध्याचे अस्तित्व हे भूतकाळातील घटनांचा एकत्रित परिणामच असतो. तुम्ही आत्ता जे काही अपयशी आहात, ते भूतकाळातील घटनांमुळे तसेच, तुम्ही आत्ता जे काही यशस्वी आहात, ते देखील भूतकाळातील घटनांमुळेच. तुम्हाला लाख वाटेल की, तेवढी अमुक एक घटना बदलता आली तर आयुष्य सुंदर होऊन गेलं असतं. पण कदाचित त्या घटनेनेच तुम्हाला आत्ता आहे ती परिपक्वता दिलेली असते, त्या घटनेत लागलेल्या ठेचेमुळेच तुम्ही नंतरच्या काळात चार शहाणे निर्णय घेतलेले असतात. तेव्हा ती घटनाच जर समजा बदलली, तर आयुष्य सुंदर होईल, याची काहीच खात्री नाही. उलट ते वेगळे आणि म्हणूनच कदाचित अजून वाईट होण्याचीही तितकीच शक्यता आहे. हा तात्त्विक भाग झाला. तुमच्या हातात काय आहे, तर भविष्यकाळ चांगला करणे. थोडक्यात, कोलाहलाच्या सिद्धांतानुसार जर तुमच्या आयुष्याला एक प्रणाली मानले तर त्यात आत्ता काही बदल केले तरच भविष्य बदलू शकते. भूतकाळ बदलू शकत नाही. म्हणजेच, “What’s happened, happened”!

    उपनिषदांमधील दोन सिद्धांत मला फारच आवडतात. ईशावास्योपनिषद (मंत्र ९) सांगते की,
    अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते।
    ततो भूय इव ते तमो य उ विद्यायां रताः॥
    अर्थात, ‘जे केवळ भौतिक विद्यांच्याच मागे धावतात ते अंधारात प्रवेश करतात. परंतु जे केवळ अध्यात्माच्याच मागे धावतात, ते त्याहून मोठ्या अंधारात प्रवेश करतात’.
    पुढे ११ वा मंत्र तर सांगतो की,
    विद्याञ्चाविद्याञ्च यस्तद्वेदोभयं सह।
    अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते॥
    अर्थात, “जो ‘तत्’ला विद्या आणि अविद्या दोन्हींच्या द्वारे जाणतो तो अविद्येने मृत्यू तरून जातो तर विद्येने अमृतत्त्व मिळवतो”.
    थोडक्यात उपनिषदाने अध्यात्म आणि भौतिकता यांचा समतोल साधायला सांगितलंय. आध्यात्मिकाने विज्ञानाला तुच्छ लेखूच नये. विज्ञानाचा स्वतःचा मार्ग आहे, त्यावरून त्याला त्याच्या गतिने मार्गक्रमण करू द्यावे. तैत्तिरीय उपनिषद (भृगू. अनुवाक ५) तर स्पष्ट सांगते की, ‘विज्ञानं ब्रह्मेति व्यजानात्’ अर्थात, ‘जाणले की विज्ञानच परब्रह्म आहे’! अर्थातच, विज्ञान म्हणजे केवळ भौतिक जगातील शास्त्रे अभिप्रेत नसून त्या शास्त्रांसोबत एकूणच सर्व बाबतीत ‘विशेष ज्ञान म्हणजेच विज्ञान’ असा व्यापक अर्थ येथे अभिप्रेत आहे.

    ‘टेनेट’मधील नील व्यक्तिश: मला तरी या उपरोक्त भौतिक आणि तात्त्विक ज्ञानाने परिपूर्ण असा विद्या-अविद्येचा संगम वाटतो. नोलनला कदाचित हे असेच्या असेच अभिप्रेत नसेल. कदाचित त्याला यातील तात्त्विक संकल्पना ठाऊकही नसतील. पण त्याने नीलचे पात्र अतिशय स्थितप्रज्ञ लिहिले आहे, हे निश्चित. त्यामुळेच तो साधंच काहीतरी काम करावं तितक्या सहजपणे बलिदान देतो. तो निरर्थक ‘जर-तर’मध्ये एकदाही पडत नाही. What’s happened, happened हे त्याच्या जीवनाचं सार आहे. त्याला काळाची माया, भौतिक आणि तात्त्विक दोन्हीही पातळ्यांवर पुरती समजलीये. म्हणूनच तो जाताना नायकाला सहजपणे सांगतो की, “I’ll see you in the beginning, friend”! मला स्वतःला नायकापेक्षा नील हाच लेखक-दिग्दर्शकाचं कथेतील प्रतिबिंब वाटतो, ते यामुळेच!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]
    #TENET #TENETची_क्षणचित्रे #Neil #Robert_Pattinson #Chaos_Theory #Butterfly_Effect #Science #Spirituality #Upanishads #Time

  • ‘टेनेट’ – उलट्या काळाचा सुलटा भविष्यवेध!

    ‘टेनेट’ – उलट्या काळाचा सुलटा भविष्यवेध!

    चलचित्र बनवणं आणि चित्रपट बनवणं, यात एक मूलभूत फरक असतो. एक उदाहरण देतो. समजा की, चलचित्र म्हणजे कविता आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत काहीतरी एक विधान करणारी. चित्रपट मात्र कवितेसारखा नसतो. चित्रपट म्हणजे सूक्त असते. त्याची प्रत्येक चौकट ही एखाद्या ऋचेसारखी असते, स्वयमेव काही कथा सांगणारी. आणि या चौकटी जेव्हा एकत्र येतात तेव्हा अनेक ऋचा मिळून जसे एक परिपूर्ण आणि काहीतरी गूढ उलगडून सांगावे तसा अर्थ सांगणारे सूक्त बनते, तसा चित्रपट सबंध पाहिला तर चौकटींनी बनलेली परंतु चौकटींपेक्षा भिन्न अशी कथा उलगडते. हा निकष लावला तर मला सांगा, जगात खरोखर किती ‘चित्रपट’ बनतात! इतकी कठोर परीक्षा घेतली तर जगातील काही भलेभले आणि तिकिटबारीवर अतोनात यशस्वी असलेले चित्रपटकारही निव्वळ चलचित्रकार सिद्ध होतील! परंतु एक असा माणूस आहे ज्याचे चित्रपट हे ‘चित्रपट’ही असतात आणि त्याचवेळी ते तिकिटबारीवर धुमाकूळदेखील घालतात, तो म्हणजे ‘एकमेवाद्वितीयो नान्यकोऽपि’ ख्रिस्तोफर नोलन! त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘टेनेट’देखील याला अपवाद नाही!!

    इतर चित्रपटकारांच्या (चलचित्रकारांच्या नव्हे!) चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही चित्रपटसाक्षर असणे गरजेचे असते. नोलन आणखी एक पाऊल पुढे टाकायला लावतो. इथे तुम्हाला नुसतेच चित्रपटसाक्षर असून चालत नाही, तर विज्ञानसाक्षरदेखील असावे लागते! बहुतांशी विज्ञानपटांमध्ये कथा आणि वैज्ञानिक सिद्धांत यांचे सांधे वेगवेगळे असतात. त्यामुळे ज्यांना त्यातील विज्ञान समजत नाही त्यांनादेखील कथेचा आस्वाद घेता येतो. नोलनच्या चित्रपटांमध्ये मात्र तुम्हाला जर त्यातील विज्ञान समजत नसेल, तर तुम्हाला कथासुद्धा समजत नाही, कारण इथे कथा व विज्ञान वेगवेगळे नसतात तर ‘आत्मा-परमात्मा’सारखे त्यांच्यात अद्वैत असते. त्यामुळेच कदाचित किंवा मुद्दामहून म्हणा नोलन त्याच्या कथेतील विज्ञान एका मर्यादेपलिकडे उलगडून सांगत नाही. किंबहूना सांगूच शकत नाही कारण, त्या कथाविश्वातील बहुतांशी पात्रे ही त्या संकल्पनांशी परिचितच असतात! मी नोलनची तुलना कायमच ए. आर. रहमानशी करत असतो ते यासाठीच. रहमान कधीही त्याचे संगीत उलगडून मांडत नाही. त्यामुळे त्याचे कोणतेही नवे गाणे ऐकताना काहीतरी विचित्र ऐकल्याचा भास होतो. परंतु जसजसं आपले मन आणि मेंदू प्रशिक्षित होत जातात, तसतसं ते गाणं आपसूकच उमजू लागतं. नोलनचे चित्रपट तसेच असतात, एखादी घट्ट गुंडाळी समोर ठेवल्यासारखे. ती हळूहळू एखादं उंची मद्य मुरावं तशी तब्येतीत उलगडत जाते आणि तितका संयम ठेवला तरच आतील गाभ्याचं मूळ स्वरूप समजू शकतं! रहमान समजण्यासाठी जशी तुम्हाला जागतिक स्तरावरील संगीताच्या विविध शाखांची जाण असल्यास अनुभव शतपटींनी विस्तारतो त्याचप्रमाणे नोलनचा कोणताही चित्रपट पाहाताना तुम्हाला विज्ञानाची त्यातही भैतिकशास्त्राची परिचयापेक्षाही जास्त माहिती असेल, तरच तो अनुभव विस्तारतो. ‘टेनेट’ही याला अपवाद नाही. ‘टेनेट’ पाहायला जाणार असल्यास भौतिकशास्त्रातील दोन संकल्पना तुमच्या मनात सुस्पष्ट असल्याच पाहिजेत. आधीच पाहिला असल्यास या दोन संकल्पनांमुळे तुम्हाला तो समजण्यास, पक्षी त्याचा आस्वाद घेण्यास अजूनच साह्य होईल.

    १) एंट्रोपी
    ही भौतिकशास्त्रातील उष्मागतिकी या उपशाखेची एक संकल्पना आहे. तिचा उपयोग संख्यायामिकीमध्येही होतो. कोणत्याही प्रणालीतून उपयोगी कार्यासाठी प्रति एकक तापमानास अनुपलब्ध असलेली औष्णिक ऊर्जा म्हणजे एंट्रोपी. ही मोजता येते. साध्या भाषेत सांगायचं झालं तर, एंट्रोपी ही अव्यवस्थेचे द्योतक आहे. फक्त ही अव्यवस्था दृष्य स्तरावर नसून रेण्वीय पातळीवर असते. कार्य म्हणजे रेणूंची व्यवस्थित हालचाल. त्यामुळे एंट्रोपी मध्ये कोणत्याही प्रणालीचे रेण्वीय पातळीवर क्रमहीन होणे अपेक्षित आहे. ‘टेनेट’मध्ये मात्र ही एंट्रोपीच उलट फिरवण्याची संकल्पना मांडली आहे आणि तिचे उपयोजन थेट काळ या संकल्पनेशी केले आहे. हिंदू तत्त्वज्ञानात उत्पत्तीसाठी एक खूपच सुंदर शब्द वापरलाय, सर्ग! परंतु विनाशासाठी याच्या बरोब्बर विरुद्ध शब्द जो वापरलाय तो मात्र आहे प्रतिसर्ग! लक्षात घ्या, इथे केवळ विनाश किंवा प्रलय एवढाच अर्थ अभिप्रेत नाहीये, तर त्याहूनही सूक्ष्म पातळीला जाऊन प्रतिसर्ग म्हणजे सर्गाची प्रक्रियाच उलट फिरवणे आहे. म्हणूनच कल्पसिद्धांतानुसार प्रलयानंतर पुन्हा सृजन होते! ‘टेनेट’मध्ये एंट्रोपी उलटी फिरवल्यामुळे केवळ काळच उलटत नाही तर पदार्थ आणि पदार्थविज्ञानाचे नियमदेखील उलट होतात.

    २) फ्रेम ऑफ रेफरन्स
    फ्रेम ऑफ रेफरन्स किंवा संदर्भचौकट ही एंट्रोपीच्या तुलनेत सोपी संकल्पना आहे. कल्पना करा की, तुम्ही ‘अ’ स्थानावर आहात आणि तिथून शंभर मीटर अंतरावर सरळ रेषेत तुमचा मित्र ‘ब’ स्थानावर आहे. आता तुमच्यापासून, ‘अ’ स्थानापासून एखादी गाडी ‘ब’ स्थानाकडे म्हणजेच तुमच्या मित्राकडे गेली, तर काय होईल? दोन गोष्टी होतील. एक म्हणजे तुम्हाला गाडी ‘जाताना’ दिसेल. आणि दुसरे म्हणजे तुमच्या मित्राला गाडी ‘येताना’ दिसेल. एकाच गोष्टीचे दोन वेगवेगळे परिणाम कसे काय जाणवले? कारण, तुमचे दोघांचेही दृष्टीकोन वेगवेगळे आहेत. तुमच्या संदर्भचौकटीतून म्हणजेच तुमच्या अवकाश आणि काळातून गाडी जातेय, तर मित्राच्या संदर्भचौकटीतून गाडी येतेय. ही संकल्पना खगोलशास्त्रात अजूनच रंजक होते. समजा आपल्यापासून दहा प्रकाशवर्ष दूर असलेल्या एखाद्या ताऱ्याचा स्फोट झाला. तर आपल्या संदर्भचौकटीतून आपल्याला तो स्फोट झाल्याचे आज दिसेल. परंतु प्रत्यक्षात तो स्फोट दहा वर्षांपूर्वीच होऊन गेलाय. म्हणजेच काय, तर आपल्या संदर्भचौकटीतून आपण वर्तमानात असूनही भूतकाळ पाहातो. त्याचवेळी स्फोटाच्या दृष्टीने मात्र आपण भविष्यकाळ असतो. ही संकल्पना कथेच्या पातळीवर ‘टेनेट’मध्ये अत्यंत सुघडतेने मांडली आहे!

    आता कथानक! एक अनामिक सीआयए एजंट (जॉन डेव्हिड वॉशिंग्टन) आहे, ज्याच्यावर अचानकपणे तिसरं महायुद्ध रोखण्याची जबाबदारी येऊन पडते. हे महायुद्ध कोण घडवणार आहे? कसं घडणार आहे? त्याचे परिणाम काय होणार आहेत? त्याला काही एक ठाऊक नाही. त्याच्याकडे आहे केवळ एकच शब्द, एकच ‘हस्तसंकेत’, तो म्हणजे ‘टेनेट’! या द्विदिश शब्दातून त्याने काढलेला माग, म्हणजे हा थरारक विज्ञानपट, ‘टेनेट’. विज्ञानपट जरी असला, तरीही नोलन त्याला केवळ तेवढ्याच पातळीवर मांडत नाही. तो त्याची मांडणी करताना थरारक गुप्तचरपट अशी करतो. त्यापाठची त्याची प्रेरणा उघडपणे बाँडपट आहेत. त्यामुळे ‘टेनेट’ हा शैलीच्या पातळीवर नोलनच्याच ‘इन्सेप्शन’च्या (२०१०) समीप जाऊनही पूर्णतया भिन्न झालाय. ही भिन्नता नुसतीच कथेच्या पातळीवर नाहीये, तर इतरही अनेक पातळ्यांवर आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर ‘इन्सेप्शन’मध्ये भोवरा होता, इथे एक छल्ला आहे. परंतु त्यांचे संदर्भ अतिशय भिन्न आहेत, कथेच्या सुरुवातीपासूनच अस्तित्वात असूनही अंती नवेच आयाम देणारे! या खेरीजही काही साम्ये वेगळ्या संदर्भांत आहेतच, पण ती आत्ताच सांगणे रसभंग केल्यासारखे होईल. तो दोष न पत्करताही एक गोष्ट मी ठामपणे सांगतो की, ‘टेनेट’समोर ‘इन्सेप्शन’ भावनिक पातळीवर अधिक तरल असूनही बनवायला, मांडायला आणि रचायला खूपच जास्त सोपा चित्रपट आहे. दहा वर्षांतील नोलनची ही चित्रपटकार म्हणून झालेली उत्क्रांती अक्षरशः तोंडात बोट घालायला लावणारी आहे!

    गंमत म्हणजे, ‘टेनेट’ हा नोलनचा आजवरचा सर्वाधिक आत्मभान असलेला चित्रपटदेखील आहे. पुन्हा एकवार रसभंगाचे पातक लागू न देता एक उदाहरण देऊ इच्छितो. खूप साऱ्या अचंबित घटना घडून गेल्यानंतर एका विश्रांतीच्या क्षणी नील (रॉबर्ट पॅटिन्सन) नायकाला म्हणतो, ‘डोकं दुखायला लागलं की नाही’! तेव्हा त्याच्या माध्यमातून खरं तर नोलनच संहितेच्या पातळीवर चौथी भिंत फोडून प्रेक्षकांशी बोलत असतो! आश्चर्य असे की, २०१४ साली लिहिण्यास व २०१९ च्या पूर्वार्धात चित्रिकरणास सुरुवात झालेल्या या चित्रपटात ‘मास्क’ आणि ‘लॉकडाऊन’ या सध्याच्या काळातील सुपरिचित संकल्पना महत्त्वाच्या ठिकाणी वापरण्यात आल्या आहेत, हा भविष्यवेध समजायचा की निव्वळ योगायोग?

    ‘टेनेट’ची या सगळ्या प्रतिभा, चातुर्य, बुद्धिमत्ता वगैरेंच्याही पलिकडे जाऊन भावलेली गोष्ट म्हणजे त्यात ‘मुंबई’ दाखवलीये. तुम्ही म्हणाल, त्यात काय मोठेसे, इतर सहस्रावधी चित्रपटांमध्ये किंबहूना हॉलिवूडच्याच अनेक चित्रपटांमध्ये मुंबई दाखवलीये की! पण तरीही अंतर आहे. हॉलिवूडने बहुतांशी वेळा जेव्हा मुंबई दाखवलीये तेव्हा ती त्या शहराचं आणि पर्यायाने भारताचं बकालपण अधोरेखित करण्यासाठी दाखवलीये. नोलन हा डावा नसल्यामुळे त्याला आजवर अकॅडमी पुरस्कार जरी मिळालेला नसला, तरीही तो डावा नसल्यामुळेच दु:ख, दैन्य आणि दारिद्र्यच तेवढं विकण्याची त्याच्यावर सक्ती नाही. त्यामुळे त्याच्या नजरेतून दिसणारी मुंबई भकास नाही, तर अक्षरशः जिवंत आहे व कथेचा अत्यधिक महत्त्वाचा भागदेखील आहे. ‘इंटरस्टेलर’पासून नोलनचा छायाकार असलेल्या होय्ते व्हान होय्तेमाने टिपलेली मुंबईची दृश्ये अवर्णनीयरित्या अर्थपूर्ण झाली आहेत. एवढेच नव्हे, तर त्याने एकूण चित्रपटाचीच रंगपट्टीका अशाप्रकारे साकारलीये की गोष्टी व स्थळे ऐंशीच्या दशकातील वाटतात आणि तरीही वातावरणात एक अव्यक्त विषण्णता, प्रसंगी ताणसुद्धा जाणवत राहातो. रिळांवर चित्रण करणे ‘टेनेट’च्या पथ्यावरच पडले आहे.

    त्याचवेळी लुडविग गोरान्सनच्या रूपाने नोलनच्या कंपूत नव्यानेच दाखल झालेल्या संगीतकाराने अक्षरशः हान्स झिमरच्याही वरताण संगीत दिलेय. इतक्यातच बोलणे घाईचे होईल, परंतु जर चिकटून राहिला तर मणिरत्नमचा जसा राजानंतर रहमान झाला, तसा हा गोरान्सन सातत्य राखू शकल्यास नोलनचा होऊ शकतो. त्यातही नोलनने खूप साऱ्या छोट्याछोट्या गंमती करून ठेवल्या आहेत. उदाहरणार्थ, संगीत पुऱ्या जोमाने सुरू असतानाच एक पात्र मरतं. त्याच्या मृत्यूच्याच क्षणी बरोब्बर तेवढ्या एकाच क्षणासाठी निरव शांतता पसरते! किंवा सुरुवातीलाच एका ओपेरा हाऊसच्या प्रसंगी आता सिम्फनी चालू होण्याच्या दृष्टीने सगळी तयारी होत असतानाच एक अकल्पनीय घटना घडते आणि दृश्याचं परिमाणच बदलून जातं! एका दृश्याबद्दल लिहिल्याशिवाय राहावतच नाहीये. एक पात्र चालत असते. आणि कुंपणाच्या पलिकडे एक गाडी उभी असते. स्थिर, अचल. पण ते दृश्य चित्रित असे केलेय की वाटते ती गाडी चालत येतेय आणि मग थांबतेय. ‘फ्रेम ऑफ रेफरन्स’चे चपखल उदाहरण!

    जॉन डेव्हिड वॉशिंग्टनला त्याच्या पात्रासाठी आवश्यक असलेला माज पुरेपूर शोभलाय. पण त्याच्यापेक्षा लहान भूमिका असूनही त्याच्यापेक्षा अनेक पटींनी चांगले काम रॉबर्ट पॅटिन्सनने केलेय. चांगली संहिता असेल तर आगामी ‘द बॅटमॅन’मध्ये हा माणूस काहीच्या काही कमाल करणार, यात शंकाच नाही. ब्रिटिश मंडळी सर्जनशील गोष्टींकडे व्यवसाय म्हणून न पाहाता आसक्ती म्हणून पाहातात, याचेच हे द्योतक आहे. याच विधानाचे दुसरे उदाहरण म्हणजे मायकेल केन. या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्याने वाट्याला आलेला एकच प्रसंग खणखणीत वाजवला आहे. छोट्या, परंतु अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत डिंपल कपाडिया ठिकठाक वाटते. एलिझाबेथ डेबिकीने काम अतोनात चांगले जरी केलेले असले, तरीही तिची या चित्रपटातील भूमिका आणि ‘द नाईट मॅनेजर’मधील (२०१६) भूमिका यांच्यात लेखनाच्या पातळीवर काही एक अंतर नाही. केनेथ ब्रेनाने मात्र अत्युच्च दर्जाचे काम केले आहे. बऱ्याचशा पात्रांमधील परस्परसंबंध हे पूर्णपणे प्रस्थापित न करता सांकेतिक अर्थाने सूचित करणे ही म्हटलं तर ‘टेनेट’ची जमेची बाजू, म्हटलं तर दोषसुद्धा आहे. या मांडणीमुळे खूप साऱ्या गोष्टी गृहित धराव्या लागतात व गृहित धरलेल्या गोष्टी प्रत्येक वेळी पटतातच असे नाही.

    वरच्या परिच्छेदातील ओपेरावरून आठवलं, ‘टेनेट’ समजण्यापलिकडे अनुभवायचा तर तुम्हाला आणखी एक गोष्ट ठाऊक असायलाच हवी, ती म्हणजे ‘सॅटोर चौरस‘! हा चौरस अनेक ठिकाणी आढळून येतो. सर्वांत जुना चौरस पॉम्पेईत असल्याचे व तो इसवी सनाच्या पहिल्या शतकातील असल्याचे मानतात. या चौरसात असलेली पाचही नावे वेगवेगळ्या मार्गांनी द्विदिश आहेत. ही सगळी नावे पात्रांच्या स्वरूपात आणि पॉम्पेईसारखी ठिकाणे स्थळांच्या स्वरूपात नोलनने कथेत मार्मिकरित्या गुंफली आहेत. किंबहूना ‘टेनेट’ हे नावच त्या सॅटोर चौरसातून घेतले आहे.

    अजून एक गंमतीची गोष्ट सांगू? ‘डार्क नाईट त्रयी’नंतर (२००५ – २०१२) पहिल्यांदाच नोलनने एखाद्या चित्रपटाचे पुढे अनेक भाग बनविण्याचे उघड संकेत दिले आहे. ‘टेनेट’चा पट एवढा व्यापक आहे की, त्याचे एक सबंध चित्रपटविश्व, ज्याला मी ‘टेनेटव्हर्स’ म्हणेन, बनू शकतं. या चित्रपटविश्वावरून आठवलं, ‘वॉर्नर ब्रदर्स’ना खरोखरीच मानलं पाहिजे. कोणत्याही चित्रपटविश्वाचा भाग नसलेल्या, कोणत्याही पातळीवर सुपरहिरोपट नसलेल्या अशा वेगळ्याच विषयाच्या चित्रपटावर त्यांनी तब्बल २ अब्ज डॉलर्स लावले, ही खरोखर आजच्या काळात दुर्मिळ असलेली धाडसी गोष्ट आहे! अर्थात असा विश्वास दाखवायला नोलनसारखा सातत्यपूर्ण माणूसही त्यांच्याकडे होता, ही बाब वेगळी! पण दहा-बारा वर्षांपूर्वी तरी परिस्थिती जरा बरी होती. मग सुरू झालं एमसीयू. मार्टिन स्कॉर्सेसीच्या मते एमसीयूचे चित्रपट म्हणजे ‘चित्रपट’च नव्हेत! या संदर्भात या लेखाची सुरुवात पुन्हा एकदा वाचा. पण माझे मत जरासे वेगळे आहे. एमसीयूचे चित्रपट ‘चित्रपट’ असतील किंवा नसतीलही कदाचित, परंतु त्यांनी एक महत्पाप करून ठेवलेय. त्यांनी प्रेक्षकांचा एकूण बुद्ध्यांक कमी करून टाकलाय. तितकं भडक, तितकं उघड आणि तितकं उथळ (तिन्हींनाही काही सन्माननीय अपवाद आहेत!) काही असेल तरच ते पाहाण्याची आणि त्याहून सखोल काही असेल तर ते समूळ नाकारण्याची एक नवीनच वृत्ती निर्माण झालीये. विशेषतः जे मिलेनियल्स आता किशोरावस्थेत आहेत, त्यांच्या बाबतीत ही बाब प्रकर्षाने जाणवते. ते ‘टेनेट’ला स्वीकारण्याची शक्यता कमीच आहे. ‘भवभूती’च्याही ‘उत्तररामचरितम्’ला तत्कालीन मंडळींनी स्वीकारले नव्हते म्हणतात, त्यावर तो महाकवी ठामपणे म्हणाला होता की,
    “ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां
    जानन्ति ते किमपि तान्प्रति नैष यत्नः।
    उत्पत्स्यतेऽस्ति मम कोऽपि समानधर्मा
    कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी॥”
    अशी दंतकथा आहे. मी एमसीयू अथवा कुणावरही दोषारोप करत नाही. मी केवळ एक विधान करतोय. ‘टेनेट’चे आयएमडिबी मानांकन आज कदाचित कमी असेलही, पण गेली वीस वर्षे नोलनचा प्रत्येक चित्रपट पाहाणारा एक रसिक म्हणून सांगतो, ‘टेनेट’ हा ‘तांत्रिकदृष्ट्या’ नोलनचा आजवरचा बनविण्यास सर्वांत अवघड आणि सर्वश्रेष्ठ चित्रपट आहे. तो भावनिक पातळीवर एका मर्यादेपलिकडे साद घालत नाही, तो काही पात्रांचे परस्परसंबंध गृहित धरायला लावतो या गंभीर उणीवा सोडल्या, तर तो गेल्या तीन-एक वर्षांत आलेला सर्वाधिक अर्थपूर्ण चित्रपटसुद्धा आहे!

    *४.७५/५

    — © विक्रम श्रीराम एडके.

    [अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव

    रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव

    आज विजयादशमी. आजच्याच दिवशी प्रभू श्रीरामांनी राक्षसराज रावणाचा संहार केला. पण हा संहार नेमका केला कसा? काय अस्त्र वापरलं? रावणाच्या मृत्यूच्या क्षणी नेमकं काय घडलं? समकालीन वाल्मिकींनी रामायणात या बद्दल सविस्तर लेखन केलं आहे.

    वाल्मिकी लिहितात, राम आणि रावणामध्ये द्वैरथ युद्ध झाले (युद्धकांड, स. १०७, श्लो. १). दोन्ही बाजूचे सैन्य लढायचे सोडून त्यांचेच युद्ध पाहात बसले (तत्रोक्त २). राम आणि रावण दोघांनाही स्वतःच्या विजयावर पूर्ण विश्वास होता (७). रावणाने त्वेषाने रामाच्या रथावरील ध्वज तोडण्यासाठी बाण चालवले, पण तो असफल झाला (९). रामानेही उट्टे काढण्यासाठी महासर्पासारखा असह्य व ज्वलंत बाण रावणाच्या ध्वजावर सोडला. हा बाण नेमका रावणाचा ध्वज फोडून जमिनीत जाऊन रुतला (१२). या प्रकाराने चवताळलेला रावण रोषपूर्वक बाणांचा वर्षावच करू लागला. त्याने रामाच्या घोड्यांचा वेध घेतला. पण त्यांच्यावर विशेष काहीच परिणाम झाला नाही (१६). यानंतर तर रावणाने अजूनच चिडून जाऊन बाणांसोबतच गदा, चक्र, परिघ, मुसळ, पर्वतशिखर, वृक्ष, शूल, परशू यांचा वर्षाव करायला प्रारंभ केला (१७-१८). वाल्मिकी लिहितात, रावणाने अजिबातच न थकता (अश्रान्तह्रदयोद्यम:) सहस्रावधी बाण चालवले. याला उत्तर म्हणून रामानेही शतसहस्रावधी बाण सोडले (२२). दोन्हीकडून चाललेल्या या वर्षावाने सबंध आकाश भरून गेले होते, इतके की श्वास घ्यायलादेखील जागा शिल्लक राहिली नाही (२६). दोन्हीकडचे बाण एकमेकांवर आपटून जमिनीवर पडू लागले (२५). दोघांनीही एकमेकांचे घोडे जखमी करून टाकले (२७).

    हा रोमहर्षक संग्राम सुरू असताना एक मुहूर्त (मुहूर्तमभवद्) म्हणजे अठ्ठेचाळीस मिनिटं उलटली (२८).  दोघांचे सारथीदेखील निष्णात होते. ते कधी रथाला गोल फिरवित, तर कधी सरळ नेत, कधी पुढे जातोय असं दाखवून एकदम मागे आणत तर कधी माघार घेतोय असं दाखवून पुढे नेत (३१-३२). राम आणि रावण दोघेही एकमेकांवर वार करण्यात काही एक कसर सोडत नव्हते. दोघांचेही रथ आता जणू काही भरलेल्या मेघासम (जलदाविव) दिसू लागले होते (३३-३४). आता दोन्हीही रथांचे जू एकमेकांना भिडले होते, पताका एकमेकींना स्पर्शू लागल्या होत्या (३५-३६). रामाने चार बाण मारून रावणाच्या घोड्यांना मागे ढकलले (३६-३७). त्यामुळे तळतळलेल्या रावणाने अनेक बाण चालवून रामाला जखमी करून टाकले (३७-३८). रामाने चेहऱ्यावर कोणतीच पीडा दाखवली नाही. रावणाने ताबडतोब रामाचा सारथी मातलीला लक्ष्य केले, अर्थात मातलीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही (३९-४०). आता मात्र रामाच्या क्रोधाला पारावार राहिला नाही (४१-४२). राघवाने बाणांचे जाळेच (शरजालेन), अर्थात बाणांचा समूहच सोडून रावणाला माघार घ्यायला (विमुखं रिपुम्) लावली (४१-४२). रघुनाथाने रावणावर वीस, तीस, साठ, शेकडो, हजारो बाण सोडले. त्यावर रावणाने बाणांचा वर्षाव केला (४२-४४). पुन्हा एकवार भयंकर युद्ध सुरू झाले. त्या तुंबळ युद्धाला पाहून अप्सरा आणि गंधर्वदेखील म्हणू लागले, ‘रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव’! (५२).

    त्यानंतर रघुकुळाची कीर्ती वाढवणाऱ्या रामाने धनुष्यावर एक विषारी बाण चढवला आणि रावणाचे मुंडकेच उडवून टाकले (५३-५४). पण काय आश्चर्य, त्या जागी ताबडतोब दुसरे मस्तक दिसू लागले. रामाने ते सुद्धा अविलंब धडावेगळे केले. हा प्रकार शंभरदा घडला. जणू काही या गोष्टीला काही अंतच नव्हता (५६-५८). हे असे महाभयंकर रणकंदन रात्र न् दिवस चालले (६५-६६). आता मात्र राम काळजीत पडला (५९).

    रामाला काळजीत पडलेला पाहून मातली म्हणाला, ‘हे वीरवर तुम्ही काय त्याच्या हल्ल्यावर केवळ प्रतिहल्ला करत आहात? त्याच्यावर ब्रह्मास्त्र चालवा. रावणाच्या विनाशाची घडी समीप आलीये’ (युद्धकांड, स. १०८. श्लो. १-२). मातलीच्या या सांगण्यावरून रामाने फुत्कारणाऱ्या सापासारखा एक तेजस्वी शर हाती घेतला. हे तेच अमोघ ब्रह्मास्त्र होते जे ऋषींनी (गीताप्रेसच्या प्रतीनुसार अगस्त्य ऋषींनी) रामाला दिले होते. हे अस्त्र पूर्वी ब्रह्माने त्रिलोकजयकांक्षी इंद्राला अर्पण केले होते (तत्रोक्त ३-५).

    तो बाण कसा होता? वाल्मिकी लिहितात, त्या बाणात वायूचा वेग, त्याच्या फाळात आग आणि सूर्य, त्याच्या रचनेत आकाश आणि त्याच्या जडपणात मेरू-मंदराचलांची प्रतिष्ठापना केली होती. तो सर्व भूतमात्रांच्या तेजाने बनलेला, सूर्यासारखा जाज्वल्य होता. तो स्वर्णभूषित, सुंदर पंखांचा, प्रलयाग्निच्या धूरासारखा भयंकर, दीप्तिमान, सापासारखा विषारी, माणसं, हत्ती व घोडे यांना भेदणारा व चपळ होता. दरवाजे, परिघच काय तर पर्वतांनाही भेदण्यास तो सक्षम होता. त्याचं सबंध शरीर रक्त, मेदात न्हायल्यासारखं सुदारुण होतं. तो वज्रासमान दिसणारा, मोठ्ठा आवाज करणारा व शत्रूंची झुंडच्या झुंड नष्ट करणारा होता. तो सगळ्यांना छळणाऱ्या, फुत्कारणाऱ्या सापासारखा भयंकर होता. कावळे, गिधाडं, बगळे व जंबुक इत्यादींना नित्य भक्ष्य प्रदान करणारा, साक्षात यमराजाचेच रूप होता! (६-११)

    असा तो सायक महाबली रामाने वेदोक्त विधीपूर्वक धनुष्यावर चढवला. त्यासरशी सर्व प्राणी संत्रस्त झाले व धरती दोलायमान होऊ लागली. अत्यंत चिडलेल्या रामाने मोठ्या ताकदीने प्रत्यंचा खेचली व तो बाण रावणावर सोडला. वज्रधारी इंद्राच्या हातून सुटलेल्या दुर्धर्ष वज्रासारखा तो बाण रावणाच्या छातीवर जाऊन आदळला! त्याचा वेग एवढा प्रचंड होता की तो रावणाची छाती फोडून, ह्रदय भेदून, रुधिराक्त असा जमिनीत जाऊन रुतला!! रावणाच्या निष्प्राण हातांतून धनुष्य व बाण गळून पडले. त्या महावेगशाली, महातेजस्वी राक्षसराजाचे शरीर वज्राचा फटका खाल्लेल्या वृत्रासुरासारखे रथातून जमिनीवर आपटले. तो बाण मात्र काम संपवून सहजपणे रामाच्या भात्यात पुन्हा जाऊन बसला. इकडे आपला स्वामी मेल्याचे पाहाताच समस्त राक्षस भितीपोटी पळू लागले तर चेव चढलेले वानर त्या राक्षससैन्यावर तुटून पडले! रावणाचा मृत्यू घोषित होताच सर्वत्र दुंदुभी निनादू लागल्या आणि समग्र वातावरण रामाच्या जयजयकाराने भरून गेले!! (१४-२७)

    रावणवध हा केवळ स्त्रीचे अपहरण करणाऱ्या एका राक्षसाचाच वध नव्हता, तर तो होता एका सार्वभौम सत्तेच्या अहंकाराचा एका राज्यविहिन वनवासीने वनवासींच्याच साह्याने केलेला पराभव! ही सामर्थ्य, बुद्धी व धोरणीपणाच्या जोरावर सत्याने असत्यावर विजय मिळवल्याची गाथा आहे. रामायण, ही भारताच्या इतिहासाची चिरंतन महागाथा आहे!!

    — © विक्रम श्रीराम एडके

    (रामायणाचे अभ्यासक आणि व्याख्याते. अधिक माहितीसाठी, तसेच रामायणावरील व्याख्यानांच्या आयोजनासाठी संपर्क करा, www.vikramedke.com)

    टीप: येथे लेखनाच्या सोयीसाठी तसेच वाल्मिकी रामायणातील उल्लेखांच्या संदर्भानुसार रामाचा एकेरी उल्लेख केला आहे. या मागे श्रीराम या देवतेच्या अवमानाचा चुकूनदेखील उद्देश नाही. लेखकही अन्य कोट्यवधी भारतीयांसारखाच रामभक्त आहे. शिवाय आवडत्या देवतेचा एकेरी उल्लेख करण्याची आपली पिढ्यानपिढ्यांची पद्धत आहे.

  • रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़

    रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़

    असं म्हणतात, जेव्हा प्रलयाची घडी आली तेव्हा वैवस्वत मनूने एक नौका उभारून सबंध जीवसृष्टी नव्याने वसवली. अशीच कथा थोड्याफार फरकाने अब्राहमिक पंथांत नोहाचीदेखील आहे. बायबलमधील अॅडम, ईव्ह आणि सापाची कथादेखील प्रसिद्धच आहे. या सगळ्या पौराणिक कथा. नव्या युगाचा आरंभ आपापल्या परीने सांगणाऱ्या. पण खरोखरीच जीवसृष्टीला अशी पैलतीरी नेण्याची जबाबदारी येऊन पडली तर, कुणी आधुनिक मनू ती कशी पेलेल? त्याची नौका अथवा आर्क कोणत्या स्वरुपाचे असेल? त्यातून निर्माण होणारी नवी सृष्टी तरी कशा प्रकारची असेल? धर्माच्या अभ्यासकांना पडणाऱ्या या प्रश्नांचं उत्तर वैज्ञानिक नाट्यातून शोधण्याचा प्रयत्न म्हणजे रिडली स्कॉटची एचबीओ मॅक्सवरील नवीकोरी मालिका, ‘रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़’!

    बावीसावं शतक निम्मं सरलंय. पृथ्वीवर एक आगळाच संघर्ष सुरू आहे. हे महाभारत आहे आस्तिक आणि नास्तिकांच्या दरम्यानचं. आस्तिक आहेत ते मित्राईक पंथाचे अनुयायी. हे एका खरोखरीच्या प्राचीन इराणी पंथाचे नाव आहे. गंमतीची गोष्ट अशी की त्यांचे नाव ‘मित्र’ या संस्कृत शब्दाशी कमालीचे साधर्म्य साधणारे आहे. नावाप्रमाणे व संस्कृत अर्थाप्रमाणेच ते सूर्योपासक आहेत. वस्तुतः आता या पंथाचे कुणीच अनुयायी शिल्लक नाहीत. त्यामुळे अर्थातच मालिकेत या पंथाचे काल्पनिक रूप वापरण्यात आले आहे. कोणत्याही परमोच्च बिंदूशी पोचलेल्या संस्कृतीप्रमाणेच त्यांच्यातही सांस्कृतिक कट्टरता व सामरिक ढिलाई आलेली आहे. त्यांच्या विरुद्ध आहेत ते विज्ञाननादी नास्तिक. दोघांपैकी कुणीही सरळमार्गी नाही. दोघांकडेही एकापेक्षा एक भयकारी अस्त्रे आहेत. यातून एकच गोष्ट हाती लागते ती म्हणजे पृथ्वीचा विनाश!

    विनाशातूनच नवी प्रभात होते. कुणाच्या तरी दूरदृष्टीने पृथ्वीवरील मानवांची काही बीजे आपल्यापासून सहाशे अडतीस प्रकाशवर्ष दूर असलेल्या केप्लर-२२बी ग्रहावर पोहोचवली जातात. धर्माच्या अट्टाहासामुळे पृथ्वीची दुरवस्था झाल्याचे मानून त्या बीजांचा ‘प्रेषित’ (कोटी हेतुत:!) त्यांना कोणत्याही धर्माच्या विरहित वाढवायचं ठरवतो. यासाठी दोन यंत्रमानवांची निवड केलेली आहे, मदर (अमँडा कॉलिन) आणि फादर (अबुबकर सलीम). हे दोघेही त्या मुलांना नास्तिकतेची घुटी पाजूनच वाढवतात. पण नवीन ग्रहावर वस्ती करणे एवढे सोपे असते का? लोक दिसतात तसेच प्रत्यक्षात असतात का? आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न, मनुष्य धर्माशिवाय राहू शकतो का? या सगळ्या गुंतागुंतीच्या, अस्तित्वाचा मागोवा घेत हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच जाणाऱ्या प्रश्नमालिकेत जेव्हा मार्कससारखे (ट्रॅव्हिस फिमल) बेभरवशी चलांक येऊन मिळतात, तेव्हा आपली ही प्रलयोत्तर नौका विज्ञानकथा, मानवी नाट्य, भयकथा, गूढकथा, रहस्यकथा वगैरे अनेक लाटांवर हेलकावे खात खात, प्रवास सर्वार्थाने संस्मरणीय करून सोडते! इथेही उद्यान आहे, साप आहे, अॅडम आहे आणि ईव्हदेखील आहे, फक्त त्यांचे संदर्भ तेवढे कल्पनातीत बदलले आहेत.

    मालिकेत काही आस्तिक पात्रे आहेत आणि काही नास्तिक पात्रे. परंतु या सगळ्याच पात्रांचा प्रवास अतिशय गहीरा, रंगीत आणि भरीव झालाय. किंबहूना पात्रे कशी लिहावीत याचा वस्तुपाठच या मालिकेला म्हणता येईल. एकूण एक पात्राच्या दृढ होत जाणाऱ्या, बदलत जाणाऱ्या श्रद्धा खरोखरीच मेंदू आणि मनावर शहारे आणतात. सश्रद्धांपैकी काहींच्या श्रद्धा डगमगतात तर अश्रद्धांपैकी ज्यांच्याकडून सर्वांत कमीहूनही कमी अपेक्षा होती, त्यांच्या मनात श्रद्धेचे अंकुर फुटतात. धार्मिक असणारे सहजच अधर्माचरण करून जातात तर काही धर्मच नाकारणारे आपल्याही नकळत एखादा धर्मच स्थापन करून पाळायला सुरुवात करतात. आस्तिकतेचा अतिरेक नास्तिकतेप्रत नेऊन, मूळ सांगाडाच मोडतो तर नास्तिकतेचाही अतिरेक नास्तिकतेबाबत आस्तिकतेचा अट्टाहास निर्माण करून मूळ सांगाडाच मोडतो. वाचायला किती जरी तात्त्विक वाटत असले तरी मालिकेत ही सगळीच स्थित्यंतरे अतिशय रोमहर्षक, मनोरंजक व तितक्याच सूचक संयतपणाने मांडली आहेत, हेच मला वाटते या मालिकेचे सर्वांत मोठे यश आहे!

    अमांडा कॉलिनने इतके उत्कृष्ट काम केले आहे की, शब्दांत मांडताच येणार नाही. आई, रक्षक, भक्षक, नव्याच जाणीवांनी बिथरून गेलेले यंत्र अशा विस्तृत पटावर तिने लीलया संचार केला आहे. अबुबकर सलीमने यंत्रमानवाच्या रूपात संयतपणाची कमाल केली आहे. किंबहूना आपल्याकडे यंत्रमानव म्हटला की विनाकारण ब्रेकडान्ससारख्या हालचाली आणि विचित्र पद्धतीत बोलणे, एवढाच अर्थ ठाऊक असणाऱ्यांनी या दोघांचे काम पाहायलाच हवे! ‘रेज़्ड बाय वूल्व्ह्ज़’ नावातील कोटी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लहानग्या विण्टा मॅकग्राने मोगलीचे एक ताजे, प्रलयोत्तर (पोस्ट अपोकॅलिप्टिक) रूप साकारले आहे.

    समान अथवा समांतर घटना नास्तिकासोबत व आस्तिकासोबत घडूनही त्यांचा परिणाम मात्र दोन्हीही विचारसरणींच्या पात्रांच्या वागणुकीमुळे केवढा भिन्न असू शकतो, हे दाखवण्याची मालिकेची पद्धत काहीच्या काही बेफाट सुंदर आहे. मालिकेची आणखी एक जमेची बाजू म्हणजे अत्यधिक नग्नता आणि शिव्या वेबमालिकांचा स्थायीभाव होऊ लागलेला असताना, या मालिकेत नग्नता अतिशय कमी आहे व शिव्या तर जवळजवळ नाहीतच (एका भागात फक्त ‘बिच्’ शब्द वापरलेला दिसतो!). या दोन्ही गोष्टी कमीत कमी ठेवूनही निव्वळ कल्पनाशक्ती व सशक्त कथानक यांच्या जोरावर चांगली मालिका बनवता येऊ शकते, हे आपल्याकडील वेबसीरीजकारांनी ‘रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़’कडून आवर्जून शिकण्यासारखे आहे!

    माझा आक्षेप आहे तो ट्रॅव्हिस फिमलबद्दल. त्याने साकारलेल्या राग्नार लोथब्रोकच्या (‘व्हायकिंग’, २०१३-२०१७) भूमिकेचा मी अतोनात पंखा आहे. ही मालिका मी पाहायला सुरुवात केली ती त्याच्याच साठी. आणि तिथेच माझा भ्रमनिरास झाला. भौगोलिक परिस्थिती वगळता त्याने साकारलेले मार्कसचे पात्र आणि राग्नार यांच्या लेखनात व परिपोषात काडीमात्र फरक नाही. ही लेखकाची त्रुटी आहे. त्याहून वाईट म्हणजे ज्या देहबोलीमुळे राग्नार प्रचंड लोकप्रिय झाला, ती देहबोली नव्या पात्रासाठी म्हणून बदलण्याचे ट्रॅव्हिसने किंचितदेखील कष्ट घेतलेले नाहीत. राग्नार पाहाताना मला वाटायचं की, काय ताकदीचा कायिक अभिनेता आहे. पण आता वाटतं की, याला एकतर एवढेच जमते किंवा त्याला काहीतरी आजार आहे की काय? कारण या दोन कारणांच्या शिवाय त्याचे राग्नारसारखेच सदोदित भिरभिरणारे डोळे, बोलताना गरजेपेक्षा जास्त हलणारे चेहऱ्याचे स्नायू यांचे स्पष्टीकरण देताच येत नाही. इथे एक लक्षात घ्या की, त्याने साकारलेले मार्कसचे पात्र या मालिकेच्या दृष्टीने चपखलच आहे, मात्र त्यात लेखनाच्या व अभिनयाच्या दृष्टीने काही एक नावीन्य नाही, एवढेच! शिवाय या मालिकेवर रिडली स्कॉटच्या आधीच्या फिल्मॉग्रफीचा खूपच जास्त प्रभाव जाणवतो, हे वेगळंच.

    मालिकेच्या पहिल्या पर्वाचा अंतिम भाग आधीच्या नऊ भागांमध्ये निर्माण केलेल्या प्रश्नांपैकी काहींची उत्तरे देतो. काही भयंकर रहस्योद्घाटनेही करतो. पण त्याचवेळी अनेकपटींनी जास्त प्रश्न निर्माणसुद्धा करून पुढच्या पर्वासाठी सुयोग्य उत्कंठा निर्माण करतो! माझी एक कसोटी आहे. त्याला मी ‘दुसऱ्या पर्वाची कसोटी’ नाव दिलंय. बऱ्याच मालिका पहिले पर्व कमाल देतात. पण पहिल्या पर्वाच्या यशामुळे म्हणा वा कथेच्या कमतरतेमुळे म्हणा वा यशामुळे नको ते लोक मालिकेत रस घ्यायला लागल्यामुळे म्हणा, त्यांचे दुसरे पर्व गंडते! याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे राजकीय हव्यासापायी चुकलेले अमेझॉनच्या ‘द बॉईज़’चे दुसरे पर्व! माझे असे गृहितक आहे की, जी मालिका दुसरे पर्वदेखील पहिल्याइतकेच चांगले देते, ती नंतरचे किमान एक पर्व तरी गंडण्याची शक्यता कमी होऊन बसते. त्या अर्थी ‘रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़’ पहिल्या जबरदस्त पर्वानंतर एका अवघड वळणाशी येऊन थांबलीये. राजकीयदृष्ट्या बरोबर (पॉलिटिकली करेक्ट) ठरण्याचा अट्टाहास, कथेपेक्षा प्रोपगण्डालाच अधिक महत्त्व देणे वगैरे भोवऱ्यांपायी भल्याभल्या मालिका श्रेष्ठतेप्रत जाण्याआधीच बुडाल्या आहेत. ‘रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़’ ही सुंदररित्या बांधलेली मनूची नौका किंवा नोहाज़् आर्क आता बुडते की तरते, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या www.vikramedke.com]

  • पंचेश्वरम्

    लंकादहन करून हनुमान जसा परततो तसे युद्धकांड सुरू होते. श्रीराम हनुमानाला लंकेचे वर्णन करायला सांगतात. लक्षात घ्या, हनुमान हा जरी सीतेचा शोध लावण्यासाठीच गेलेला असला, तरीही लंकादहन करताना आणि त्याहीपूर्वी लंकेत भ्रमण करताना त्याने अतिशय बारीक नजरेने सगळे टिपलेय. तेच तो आता रामाला तपशीलवार सांगतो की (युद्ध. सर्ग ३), “लंका अत्यंत संपन्न असून मत्त हत्तींनी व्याप्त आणि रथांनी समृद्ध आहे. तिला चार मोठमोठे आणि दुर्जेय असे दरवाजे आहेत. या चारही दरवाजांवर यंत्रे बसवलेली आहेत ज्यांच्यातून शत्रूसैन्यावर बाणांचा आणि दगडांचा वर्षाव केला जाऊ शकतो. तिथेच लोखंडाने बनलेल्या अनेक काटेदार शतघ्नीसुद्धा तैनात आहेत. लंकेच्या चहुबाजूंनी अभेद्य अशी तटबंदी आहे. तिच्याभोवती खंदक आहेत ज्यात मगरी आणि मोठमोठे मासे वास करतात. खंदकांवर उपरोक्त चारही दरवाजांना जोडणारे असे चार पूल आहेत. शत्रूसैन्य या पुलांवर चढलं की त्या पुलांना पाण्यात पाडण्याची यंत्रांकरवी सोय केलेली आहे. या पैकी कोणत्याच कामांमध्ये ढिलाई न होण्याकडे रावण स्वतः जातीने लक्ष पुरवतो. याउप्पर लंकेच्या भोवती या कृत्रिम तटबंदीखेरीज नद्या, पर्वत आणि जंगलदेखील आहे. लंका ही समुद्रकिनाऱ्यापासून बरीच आत दक्षिणेकडे आहे. त्यातही ती उंचावर वसलेली आहे. तिच्या पूर्वद्वारावर दहा सहस्र राक्षसांचा खडा पहारा आहे. हे सैनिक हातात शूल धारण करतात आणि युद्धप्रसंगी तलवारींनी झुंजतात. असंच दक्षिणद्वारी एक लाखाचं चतुरंग अर्थातच हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ यांनी सुसज्ज सैन्य आहे. लंकेच्या पश्चिमेकडे सैन्यसंख्या दहा लाख आहे. हे सैनिक अस्त्रशस्त्रांमध्ये निपुण आहेत व त्यांच्याकडे ढाल आणि तलवारीसुद्धा आहेत. उत्तरेच्या दरवाजापाशी असेच दहा कोटी सैनिक उभे आहेत. त्यांच्यापैकी काही रथी आहेत व काही अश्वारोहणात निपुण असून सगळेच उच्चकुळांमध्ये जन्मलेले वीर आहेत. लंकेच्या मध्यभागी साधारण एक कोटीचे सैन्य असावे. परंतु मी इकडे येण्यापूर्वी खंदकांवरील सगळे पुल तोडून टाकलेयत. खंदक फोडून टाकलेयत. सगळीकडे आगी लावल्यायत. ठिकठिकाणी तटबंदी तोडून टाकलीये आणि सुमारे एक चतुर्थांश सैन्यदेखील मारलेय. जर आपण एखाद्या उपायाने समुद्र लांघू शकलो, तर लंका नष्ट झालीच म्हणून समजा”!

    हनुमानाची लंकेवर आक्रमण करण्यासाठी घाई चाललीये याचे कारण उघड आहे की, त्याला रावणाचे झालेले नुकसान दुरुस्त करायला वेळच मिळू द्यायचा नाहीये. त्याने लंकेचे अतिशय बारीकसारीक वर्णन केलेय. जणू लंकेचा शब्दबद्ध नकाशाच! त्यातही एक गोष्ट विशेष लक्ष वेधून घेते. ती म्हणजे (श्लो. २४ ते २७) लंकेच्या पूर्वेला दहा हजार, दक्षिणेला एक लाख, पश्चिमेला दहा लाख आणि उत्तरेला दहा कोटी सैन्य आहे. आता खरोखरच त्या काळी लंकेची लोकसंख्या एवढी होती का या भानगडीत न पडता आपण मुद्याची गोष्ट तेवढी लक्षात घेऊ. मुद्याची गोष्ट अशी की, लंकेच्या पूर्वेकडे सगळ्यांत कमी सैन्य आहे आणि घड्याळी पद्धतीने ते अनुक्रमे दक्षिण, पश्चिम व उत्तरेपर्यंत वाढत जाते. काय कारण असावे याचे? श्रीलंकेचे भौगोलिक स्थान पाहा. पूर्व आणि दक्षिण किनारपट्टीपासून कोणत्याही देशाची भूमी भरपूर लांब आहे. याउलट उत्तर आणि पश्चिमेपासून भारत खूपच जवळ आहे. त्यामुळेच रावणाने उत्तर आणि पश्चिमेकडे, जिथून आक्रमण होण्याची सर्वाधिक शक्यता आहे, तिकडे महाप्रचंड आणि विशेष सैन्य ठेवलेय तर पूर्व व दक्षिणेकडे तुलनेने कमी सैन्य ठेवलेय.

    ही तर झाली सामरिक रचना. परंतु श्रीलंकेच्या भोवती आज अशीच एक आध्यात्मिक रचनासुद्धा आहे. कोणती? लंकेच्या किनारपट्टीवर वेगवेगळ्या ठिकाणी पाच वेगवेगळी शिवमंदिरे आहेत. यांनाच पंचेश्वरम् असे म्हणतात! पहिले आहे ते उत्तरेला जाफनास्थित नगुलेश्वरम्. वायव्येला असलेले मन्नार जिल्ह्यातील केतिश्वरम् हे दुसरे. तिसरे आहे ते ईशान्येकडील त्रिंकोमाली जिल्ह्यातील कोणेश्वरम्. चौथे पश्चिमेला पुट्टालम जिल्ह्यातील मुन्नेश्वरम्. आणि पाचवे आहे दक्षिणेकडील मातरा जिल्ह्यातील तोण्डेश्वरम्! जणू श्रीलंकेचे रक्षण करण्यासाठी तिच्याभोवती उभे असलेले भगवान शिवशंकरच! त्यांचीही रचना बहुतांशी रावणाच्या सैन्यरचनेसारखीच आहे. उत्तरेपाशी तीन शिवमंदिरे आहेत आणि पश्चिम व दक्षिणेकडे अनुक्रमे एक एकच शिवमंदिरे आहेत. जणू एखादं आध्यात्मिक सुरक्षकवचच! कदाचित उत्तर आणि पश्चिमेकडून अर्थातच भारतातून जास्त दळणवळण असल्याने भाविकांची संख्या जास्त असेल व म्हणूनही मंदिरे तिकडे अधिक संख्येने असू शकतील. सतराव्या शतकात पोर्तुगीझ मिशनऱ्यांनी ही पाचही मंदिरं ध्वस्त केली होती. अनेक ठिकाणी मंदिरांच्या जागी चर्च बांधले होते. तिथे भाविकांनी वेळोवेळी परत मंदिरे उभारली आहेत.

    मी येत्या मार्चमध्ये श्रीलंकेला जातोय. या वेळच्या वेळापत्रकात सगळेच नाही तरी पंचेश्वरांपैकी दोन मंदिरांचे दर्शन घेण्याचा कार्यक्रम आहे. एक कोणेश्वरम् आणि दुसरे मुन्नेश्वरम्! यांपैकी कोणेश्वरमला दक्षिण कैलास (तमिळ: तेन कैलासम्) असे म्हणतात. याचं कारण काय असावं याचा शोध घेताना मला एक ब्लॉग आढळला. त्यात कैलास पर्वत आणि कोणेश्वरम् यांचे भौगोलिक स्थान दिले आहे. कैलासाचे स्थान ३१° ४’ उत्तर व ८१°१८’ पूर्व असे सांगितले आहे तर कोणेश्वरमचे स्थान ८°३५’ उत्तर व ८१°११’ पूर्व असे सांगितले आहे. (गुगलवर हीच स्थाने अनुक्रमे ३१°०६’ उत्तर व ८१°३१’ पूर्व आणि ८°५८’ उत्तर व ८१°२४’ पूर्व अशी आढळतात.) उपरोक्त ब्लॉगच्या लेखकाचा दावा आहे की, दोन्ही स्थाने पूर्णार्थाने जरी नाही तरी बऱ्यापैकी एकाच रेखांशावर येतात! हे वाचायला छान वाटतं, परंतु भूगोलातील कुणा तज्ञाने याची सत्यता पडताळून सांगितली तरच विश्वास ठेवलेले चांगले. दुसरे असे की, स्थानिक मान्यतेनुसार रावणाचा वध केल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी ज्या स्थानी भगवान शिवाची अर्चना केली, त्या स्थानावर मुन्नेश्वरम् मंदिर उभे आहे. मला तरी वाल्मिकी रामायणात असा कोणताच संदर्भ अद्याप आढळलेला नाही. परंतु कधीकधी स्थानिक श्रद्धा व परंपरांचे महत्त्व लेखी गोष्टींपेक्षा अधिक हे असतेच.

    दोन्हीही मंदिरांचे दर्शन घेतल्यावर त्यांच्याबद्दल सविस्तर लिहितोच. मी येत्या २ मार्च ते ९ मार्च कालावधीत श्रीलंकेला जातोय. रामायणाशी संबंधित काही स्थळे, काही पर्यटनस्थळे पाहातानाच तिथे रोज एक याप्रमाणे सोबत येणाऱ्या यात्रेकरूंसाठी वाल्मिकींच्या रामायणावर पाच व्याख्याने देणार आहे मी. तुम्हीही सहभागी होऊ इच्छित असाल, तर अद्याप जागा शिल्लक आहेत. ‘माय ट्रॅव्हल वर्ल्ड’च्या श्रीमती वीणा निंबाळकर यांच्याशी +919921907772 या क्रमांकावर संपर्क साधा आणि आजच आपल्या जागा आरक्षित करा! चला अनुभवूया रावणाच्या राज्यात रामायण!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • यह तो पूरा शैतान है..!

    जेम्स ग्रँट डफ History of Mahrattas च्या पहिल्या खंडात लिहितो की, निज़ामने जेव्हा बाजीरावांना पूर्वी कधीच पाहिले नव्हते, तेव्हा त्याने आपल्या पदरचा एक चित्रकार बाजीरावांकडे धाडला. चित्रकाराला स्पष्ट सूचना होत्या की, तुला बाजीरावांचे जे काही पहिले दर्शन होईल, तसेच्या तसे चित्र काढून मला दाखव. चित्रकार परत आल्यावर त्याने जे चित्र काढले त्याचे वर्णन डफ करतो –
    “The painter executed his task, and on his return exhibited the Peishwa mounted, with the head and heel ropes of his horse in his feeding bag, like that of a common Mahratta, his spear resting on his shoulder, whilst he was rubbing with both his hands some ears of ripened Joowaree, which he was eating as he rode”.

    The Era of Bajirao, पृ. ३०९ येथे लेखक उदय कुलकर्णी मात्र उपरोक्त चित्रकार बादशाह मुहंमदशाहने पाठवल्याचे सांगतात. चित्रकाराला बाजीराव कसे दिसले यासाठी त्यांनी एक सुंदर काव्य दिले आहे –
    “तुरंगमावरी मूर्ती शोभे एक रिकिबित पाय
    दुजा आडवा घोड्यावरती घोडा ठुमकत जाय
    मानेवरती ठेऊनि दिधली अनीन घोड्याची ती
    स्कंधी भाला हसत मुखावरी शोभे अनुपम कांती
    मंदिल मस्तकी रुभरि अांगी अंगरखा तो साजे
    पचंग कटीला वस्त्र नेसले ब्राह्मणघाटीचे जें
    स्वताच हाती कणसे चोळुनी दाणे टाकी वदनी
    लाल ठेविल्या मिरच्या त्यातुनी खाई मधुनी मधुनी”

    रियासतकार सरदेसाई लिहितात (Ibid 310. Quoted from – Peshwa Bakhar, pp 26, 1878) असं बेफिकिर योद्ध्यासारखं वर्णन ऐकून बादशाहच्या मुखातून एकच वाक्य निघालं, “This is but the Devil” – “यह तो पूरा शैतान है”!!

    बाजीराव हे पेशवे असूनही त्यांच्या सैनिकांमध्ये त्यांच्याप्रमाणेच एक होऊन राहात होते, ते जे खातील तेच खात होते, ते जे पितील तेच पीत होते! डफचेच शब्द वापरून सांगायचे झाले तर –
    “Bajee Rao was handsome in his person, and his manner was more that of a frank soldier than of a smooth courtier; when in the field with his troops he kept up no state, and shared in all the privations of the meanest horseman”.

    — © विक्रम श्रीराम एडके
    (बाजीरावांच्या युद्धनीतीचे अभ्यासक आणि ‘मस्तानीपल्याडचे बाजीराव’ या विषयावर व्याख्यान देणारे वक्ते. अधिक माहितीसाठी पाहा www.vikramedke.com)