Category: Reviews

  • मुकम्मल ग़ज़ल : ९६

    रात्रीचे जवळजवळ साडेअकरा वाजलेयत आणि मी एका पंक्चरवाल्याच्या दुकानात बसून हे लिहितोय. घरी जायला अजून एखादा तास लागेल. एखादा तास मी थांबू शकत नाही का? मी थांबू शकतो. अंतर्मनात उसळणारा समुद्र नाही थांबू शकत. अर्ध्या तासापूर्वी सी. प्रेमकुमारचा “९६” बघून बाहेर पडलोय. तेव्हापासून सैरभैर झालोय मी. बऱ्याच वर्षांनंतर पडद्यावरच्या प्रेमकहाणीसाठी, त्या पात्रांसाठी, ते कुणीतरी जवळचे, सगे-सोयरे असल्यासारखी काळजी वाटली मला. आणि आता मी इथे डोकं खाजवत बसलोय की, मी या चित्रपटाबद्दल निष्पक्ष लिहू शकेन का? की पुरात वाहावत जाईन मी? कधीकधी बाजू घेणंच खरी निष्पक्षता असते!

    प्रेमाची स्वतःची एक भाषा असते, भावनेची! आणि या भावनेला जेव्हा शब्दांचा स्पर्श होतो, तेव्हा त्याची आपोआप कविता होते. भाषा सिनेमाचीही असते. चित्रांची, प्रतिमांचा, संकेतांची. आणि म्हणूनच सिनेमात जेव्हा प्रेम हाताळलं जातं, तेव्हा ती नुसतीच चित्रमालिका न राहाता, त्याचं चित्रकाव्य व्हावंसं वाटतं. तुम्हाला ग़ज़ल ठाऊक आहे? चांगल्या ग़ज़लेचा एक गुण असतो. तिचा प्रत्येक शे’र मुकम्मल असतो, परिपूर्ण असतो. स्वतःच संपूर्ण कविता असतो. आणि तरीही जेव्हा ते सारे शे’र एकत्र येतात, तेव्हा निर्माण होणारी अनुभूती अजूनच स्वतंत्र, अजूनच वेगळी आणि अजूनच गहिरी असते. “९६”ची प्रत्येक फ्रेम एक मुकम्मल शे’र आहे आणि सबंध चित्रपट मुकम्मल ग़ज़ल! सिनेमा जर प्रतिमांची भाषा बोलणारा असेल, तर त्याला संवादांची अशी कितीशी गरज असणार? सुरुवातीच्या काही दृश्यांत आलेली एखादी प्रतिमा, एखादं पात्र नंतर कधीतरी बरोब्बर नेमक्या जागेवर जाऊन लागणे, हा खरं तर सतर्क पटकथेचा नियम. तो या चित्रपटात इतक्या काही खूबीने जागोजागी वापरलाय की त्यांना ‘वाह’ म्हणण्यापेक्षा आपोआपच ‘आह’ म्हटले जाते. किंबहूना सबंध चित्रपटच आपल्या मनावर अलगद सुऱ्या फिरवत राहातो, हळूहळू धागा-धागा उसवत राहातो, आठवणींची एक एक आवरणे उलगडत राहातो, अशक्य कोटीचा त्रास देत राहातो आणि विचारांच्या पलिकडची शांतता देऊन जातो. असं उसवण्याची ताकद कितीशा कलाकृतींमध्ये असते?

    गेल्याच आठवड्यात मणिरत्नमचा “सीसीव्ही” प्रदर्शित झाला. त्यातसुद्धा विजय सेतूपती होताच ना? मग त्याने लगेचच पुढच्या आठवड्यात इतकी वेगळी भूमिका घेऊन का समोर उभं राहावं? इतकी वेगळी भूमिका आणि इतका अवर्णनीय सुंदर अभिनय की, तुलनेपुरतादेखील आपल्याकडचा कुणी अभिनेता सुचू नये? का? गौतम मेननचा “व्हिटिव्ही” पाहून आठ वर्षांपूर्वी ‘जेसी’ला पक्षी त्रिषा कृष्णनला घाल-घाल शिव्या घातल्या होत्या, एवढी ताकदवान भूमिका होती ती. तिनेही त्यापलिकडचा चटका लावून जावं? राम आणि जानकी ही नावे निव्वळ सांकेतिकतेपुरती न उरता त्याहून खूपच जास्त मोठी व्हावीत? रावणाने जेव्हा सीतेचं अपहरण केलं होतं तेव्हा ती एक एक दागिना खुणेसाठी सोडत गेली होती. तोच प्रसंग संपूर्णपणे वेगळ्या संदर्भात ज्यावेळी “९६”मध्ये घडतो, तेव्हा के. रामचंद्रन आणि एस. जानकीच्या प्रेमाचे पावित्र्य अजूनच ठसठशीतपणे जाणवते. आणि चित्रपट एका, अगदी एखाद्या क्षणासाठीसुद्धा हे पावित्र्य सोडत नाही. असं तरल पातळीवरचं प्रेम आपल्याकडे पाहून कित्येक वर्षे लोटली, कोण जाणे! कदाचित नव्वदच्या दशकाचा संदर्भ असल्यामुळे ते प्रेम इतकं अशारीर, आंतरिक असावं का? अशा कशा चुकीच्या पिढीत जन्माला आलो आपण की त्याकाळचा साधेपणा मनाच्या पाटीवरून पुसला जात नाही आणि तरीही नवीन काळाची नवीन बाराखडी त्याच पाटीवर मन मारून लिहिण्याखेरीज पर्यायसुद्धा नाही.

    संवाद त्या मानाने खूपच कमी आहेत, पण जेव्हा आहेत त्या त्या प्रत्येक वेळी प्रतिमांच्या भाषेहून लाखपटींनी पुढे जाता येण्यासारखे असेल, तेव्हाच आहेत. आपल्याकडे चांगली आणि टिकाऊ गाणी हल्ली का होत नाहीत, माहितीये? कारण त्यांच्यासाठी जी भावना लागते ना ती मुळातच आपल्याकडच्या चित्रपटांच्या आडात नाही आणि म्हणूनच ती गाण्यांच्या पोहऱ्यातसुद्धा येत नाहीत. परंतु “९६”ची गाणी अशा नेमक्या जागी येतात की जिथून संवादांच्याही पुढे लाखपटींनी जाता येण्यासारखे असेल. गोविंद वसंताचे संगीत आणि अनेकविध गीतकारांचे शब्द मिळून असलेला हा अल्बम माझ्या मते यावर्षीचा आत्तापर्यंतचा सर्वश्रेष्ठ रहमानेतर अल्बम तर आहेच, परंतु तितकेच श्रेष्ठ पार्श्वसंगीतसुद्धा आहे. प्रतिमा, संवाद, गीते यांच्याहीपुढे लाखपटींनी जाऊन हे पार्श्वसंगीत चित्रपटाची खोली वाढवते.

    जसजसा चित्रपटाचा शेवट जवळ येऊ लागला होता ना, तसतसं मला दोन भीती ग्रासू लागल्या होत्या. एक, संपू नये असं वाटत असतानाही चित्रपट का संपतोय ही भीती आणि सुरुवातीपासूनच रहस्यांची सुयोग्य किनार लावून चढत असलेला मनोरा पाहाता अखेरीस एखाद्याच चुकीने तो कोसळणार तर नाही ना ही दुसरी. आणि जेव्हा शेवटची फ्रेम आली, खरं सांगतो, सप्पकन एखादं हत्यार आत रुतावं तशी रुतली ती, आणि तिथेच राहिलीये मनाच्या पटलावर छापल्यासारखी, कधीच न निघण्यासारखी. असाच आहे हा चित्रपट. अनेकदा अनुभवाव्याशा ग़ज़लेसारखा. खूप लिहूनही शब्दांमध्ये पूर्णार्थाने न गवसणारा!

    — © विक्रम श्रीराम एडके

    *५/५

  • गॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम

    रामायण-महाभारत यांची आजवर जगात इतक्या वेगवेगळ्या चित्रपटकारांनी वेगवेगळ्या पद्धतींनी मांडणी केलीये की विचारता सोय नाही. पण एखाद्या चित्रपटाच्या बाबतीत मात्र हा मान जर कुणाला मिळाला असेल तर तो फक्त आणि फक्त फ्रान्सिस फोर्ड कपोलाच्या “गॉडफादर”लाच (१९७२)! मुळचीच सशक्त कथा आणि तिची पडद्यावरील तितकीच ताकदवान मांडणी. “गॉडफादर”ने सिनेमाच्या मांडणीच्या क्षेत्रात इतकी वेगवेगळी दालने खुली केली की, तेव्हापासून आत्तापर्यंत माफियांवर जेवढे म्हणून काही सिनेमे बनले असतील त्यांच्यावर कुठे ना कुठे “गॉडफादर”चा प्रभाव हा दिसतोच. कधी अजाणतेपणी तर कधी जाणून-बुजून. वर मी रामायण आणि महाभारताचं उदाहरण दिलं ना, अगदी तसंच वेगवेगळ्या चित्रपटकारांनी आपापल्या दृष्टिकोनांप्रमाणे आणि अर्थातच वकूबांप्रमाणे “गॉडफादर”ची पुनर्मांडणी करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. भारतातही असे प्रयोग कित्येकदा झालेयत. रामगोपाल वर्माचा “सरकार” (२००५), प्रकाश झाचा “राजनीती” (२०१०), दिलीप शंकरचा “आतंक ही आतंक” (१९९५) आणि मणिरत्नम किती जरी नाकारत असला तरी त्याचा “नायगन” (१९८७) अशी कित्येक उदाहरणं देता येतील. याच मालिकेत येतो परवा रिलिज झालेला “चेक्का चिवंता वानम”!

    गॉडफादरला एक मुलगी आणि तीन मुलं असतात. मुलगी कॉनी, भडक डोक्याचा सांतिआनो अथवा सॉनी, हुशार परंतु हॉटेल व कसिनोंपुरताच मर्यादित असलेला लंपट फ्रेडो आणि सगळ्यांत धाकटा मायकेल. गॉडफादरवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा ही मंडळी एकत्र येऊन आपापल्या पद्धतींनी परिस्थितीला तोंड देण्याचा प्रयत्न करतात. आता प्रश्न असा उद्भवतो की गॉडफादरवर हल्ला व्हर्जिल सोलोझोने केलाच नसेल तर? तो जर गॉडफादरच्या मुलांपैकीच कुणीतरी केला असेल तर? तर काय होईल? तर सुरू होईल गॉडफादरची भाऊबंदकी किंवा गॉडफादरचे महाभारत (कोटी हेतुत:)! नेमकी हीच कथा आहे मणिरत्नमच्या “चेक्का चिवंता वानम”ची. चेन्नईतला सगळ्यांत मोठा डॉन सेनापतीवर (प्रकाश राज) प्राणघातक हल्ला होतो. आधी वाटतं की त्याचा प्रतिस्पर्धी चिन्नप्पादासननेच (त्यागराजन) हा हल्ला घडवून आणलाय की काय, परंतु हळूहळू उलगडत जातं की हा हल्ला त्याच्या मुलांपैकीच एकाने केलाय. सेनापतीला चार मुलं. एक मुलगी आणि ताकदवान वरदराजन (अरविंद स्वामी), दुबईत राहून हॉटेलचा बिझनेस पाहाणारा कुटील त्यागराजन अथवा त्यागू (अरुण विजय) आणि सर्बियात शस्त्रांचा व्यापार करणारा निर्दयी एतिराज अथवा एति (सिलम्बरासन). तिघांपैकी एकाने कुणीतरी बापाचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय आणि आता सुरू झालीये बापाची जागा घेण्यासाठी तिघांचीही जीवघेणी चढाओढ! गॉडफादरच्या महाभारताला बऱ्याच अंशी “पोन्नियिन सेल्वन”ची किनार आणि किंचितशी करुणानिधी कुटूंबाची फोडणी!!

    सीसीव्हीची कथा मुळातच अतिशय गुंतागुंतीची आहे. त्यातसुद्धा तिला शेकडो कंगोरे आहेत. तिघांची आई लक्ष्मी (जयसुधा) हीच्या वडलांशी सेनापतीचं जुनं शत्रुत्व. त्यांना संपवल्यानंतरही त्याने तिचा भाऊ चेळीयानला (चित्रपटाचा लेखक शिवा अनंत) जिवंत ठेवलं. इतकंच नव्हे तर त्याला आपल्या ‘फॅमिली’त सामील करून घेतलं. त्याची मुलगी चित्राला (ज्योतिका) मुलीप्रमाणे वाढवलं व यथावकाश तिचं वरदराजनशी लग्नही लावून दिलं. लक्ष्मी एकदा चित्राला म्हणतेसुद्धा की ‘खूपच कठोर आहेस तू’! वरदराजनची एक प्रेयसीसुद्धा आहे, पार्वती (अदिती राव हैदरी). ही पत्रकार आहे. थोडक्यात बऱ्याच जणांचे बरेच हितसंबंध सेनापतीच्या भोवती कुठे ना कुठे गुंतलेले आहेत. वरदराजनचा बालमित्र रसूल (विजय सेतूपती) आता पोलिस इन्स्पेक्टर झालाय. तो वरदराजनला आतून मदत करतो आणि वरदराजन त्याला. हा त्यांच्यातला दोस्तीखात्यात केलेला अलिखित करार आहे. रसूलची पार्श्वभूमीही काळवंडलेलीच म्हणावी अशी आहे. पण लक्ष्मीने रसूलला आईची माया दिलीये. एतिराजची गर्लफ्रेण्ड आहे छाया (डायना एरप्पा) त्यागूची बायको रेणू (ऐश्वर्या राजेश). सांगितलं ना आधीच गुंतागुंतीची कथा आणि तिला शेकडो कंगोरे!

    पण दिग्दर्शक मणिरत्नम आहे! तो या सगळ्या कंगोऱ्यांना असा काही घट्ट धरून ठेवतो की एकसुद्धा धागा इकडचा तिकडे जात नाही. त्याने प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि त्यात तो बहुतांशी यशस्वीसुद्धा झालाय. बऱ्याच वर्षांनी जुना मणिरत्नम पाहायला मिळाला या चित्रपटात. कथेच्या वेगावर त्याची कमाल पकड आहे आणि मांडणीत वेगळीच प्रयोगशीलता. तो खऱ्या अर्थाने सीसीव्हीचा सेनापती आहे. छायाकार संतोष सिवन आणि संपादक श्रीकर प्रसाद या दोन शिलेदारांचा पुरेपूर उपयोग करून घेतलाय त्याने. गाणी नेमक्या जागी येतात. हे गणित जरा मागच्या “काऽट्र वेलियिडई”मध्ये (२०१७) चुकलं होतं. आणि रहमानचे पार्श्वसंगीत चित्रपटाचा एकूणच दृक्परिणाम शतकोटीपटींनी वाढवते, हे सांगणे न लगे! परंतु मध्यांतरानंतर काही काळ जेव्हा कथा जराशी अडखळते तेव्हा रहमानचं दैवी संगीतच आहे जे सिनेमाला पडण्यापासून रोखून धरते. खासकरून ‘सायफर’ ही माझी प्रथमश्रवणी सगळ्यांत आवडती जागा आहे! रहमानचा असा मोठ्या क्षमतेने वापर हिंदीत अनेक वर्षांत कुणी केलेला नाहीये.

    कथा अडखळते म्हणजे तरी काय? कथेला रहस्याचा, साहसपटाचा बाज असला तरीही हे मुळात एक कौटुंबिक नाट्य आहे. मध्यांतरानंतर त्याचा प्रभाव वाढतो. सिनेमांत भावना पाहायची सवय राहिली नसलेल्यांना हे काहीसे कंटाळवाणे वाटू शकेल. अर्थात रहस्योद्घाटन ज्या जागी केलंय, ती जागा मलाही फारशी आवडलेली नाही. आणि दुसरे म्हणजे इतके कंगोरे असताना मी जरा मोठ्या ट्विस्टची अपेक्षा करत होतो, तो त्या तुलनेत अगदीच सामान्य ठरतो. मुख्य पात्रांना जरासं अजून विस्तारून मांडायला हवं होतं, त्यांचे विचार त्यांचे परस्परसंबंध त्यांची घडण अजून उलगडायला हवी होती असं वाटत राहातं. अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे, सेनापती म्हणतो की मला मार्ग सापडलाय, पण त्याचा मार्ग अखेरीस गोष्टी अजूनच बिघडवून ठेवतो, मग त्याच्या नेतृत्वावर कसा विश्वास बसावा? अशा खूप साऱ्या सैल जागा आहेत. परंतु या गोष्टीची पूरेपूर भरपाई मणिने उत्कर्षबिंदूच्या दिग्दर्शनात केलीये. काय ते मी नाही सांगणार. परंतु मणिरत्नमने आजवर हाताळलेल्या सर्वश्रेष्ठ उत्कर्षबिंदूंच्या यादीत त्याचा समावेश होईल, हे नक्की!

    अभिनयाच्या पातळीवर बोलायला गेलं तर प्रकाश राज, जयसुधा या मुरलेल्या अभिनेत्यांकडून चांगल्याच अभिनयाची अपेक्षा आहे. ते ती लीलया पूर्ण करतात. मणिरत्नमच्याच “कडल”पासून (२०१२) नव्याने गवसलेला अरविंद स्वामी राकट वरदाला अक्षरशः जिवंत करतो. काही प्रसंगांत माजलेला वळू वाटण्यापासून ते अगदी हळवा माणूस वाटण्यापर्यंत वैविध्य त्याच्या वाट्याला आलंय आणि तो कुठेच कणभरही उणा पडलेला नाही. अरुण विजयला त्यागूच्या रूपाने जबरदस्त संधी मिळालीये आणि त्याने त्याचं अक्षरशः सोनं केलंय. डायनाला फारसं काम नाही. ऐश्वर्या राजेशने माती केलीये. ज्योतिका मात्र खऱ्या अर्थाने लेडी सुपरस्टार आहे. केवढं जबरदस्त काम केलंय तिने. अदिती राव हैदरीला संधी कमी होती, पण तिनेही सुंदरच काम केलंय. खरं तर सशक्त स्त्रीपात्रे हे मणिरत्नमचं वैशिष्ट्य याही चित्रपटात प्रकर्षाने जाणवतं. आणि तरीही बायकांना फारशी संधीच न देणं, खटकत राहातं. पण चित्रपटाचे खरे स्टार दोनच आहेत. एक सिम्बू! त्याच्या एण्ट्रीलाच प्रेक्षकांनी चित्रपटगृह जे डोक्यावर घेतले, की बास! त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात किती जरी विरोधी वातावरण असलं तरीही तो खऱ्या अर्थाने सुपरस्टार आहे, हे लोकांच्या त्याच्यावरील प्रेमातून बरोब्बर दिसतं. आणि तो सुद्धा ही संधी गमावत नाही. आतल्या गाठीचा एति तो अश्या काही खूबीने साकारतो ना की, मजा येते! पण त्याच्यापेक्षा जास्त जल्लोष झाला तो अर्थातच विजय सेतूपतीच्या एण्ट्रीला! या निष्णात कलाकाराचा शब्दशः ड्रीमरन सुरू आहे आत्ता. दारुडा, विचित्र पार्श्वभूमीतून आलेला आणि सदोदित संकटात सापडलेला रसूल त्याने छप्परतोड रंगवलाय. कसाही प्रसंग असो तो हास्याची लकेर उमटवतोच!

    “चेक्का चिवंता वानम” काळवंडलेले रक्ताकाश हा असा अनुभवण्याचा चित्रपट आहे. थोडा कडू-गोड असला तरीही अनुभवण्याचा. आणि अनुभवण्याचा म्हणजे पाहाण्याचाच नव्हे, तर ऐकण्याचाही! तो “आयुधा येऽळदऽ”इतका (२००४) ग्रेट नाही आणि “काऽट्र वेलियिडई”इतका सामान्यसुद्धा नाही. तो दोन्हींच्या मध्ये कुठेतरी खास जागी आहे!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [www.vikramedke.com]

    *३.५/५

  • कॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण

    कलियुग हे आसुरी शक्तींचं युग आहे. त्रेता आणि द्वापारातच आसुरी शक्तींनी प्रचंड उच्छाद मांडलेला असताना, कलीत त्या शक्ती चरमसीमेवर नसतील तरच नवल! अशीच एक प्राचीन कृष्णशक्ती पृथ्वीवर आलीये. मागच्या अनेक युगांतरी तिचा ब्रह्मांडावर नियंत्रण मिळवण्याचा डाव फसला होता. परंतु हे युग काळीम्याला पोषक आहे. यावेळी चूक होणेच शक्य नाही. सबंध विश्वावरच नव्हे तर सगळ्यांच मितींमध्ये आपलं काळं साम्राज्य पसरायचं असेल, तर एका चेहऱ्याची गरज आहे. कुठे मिळणार तो चेहरा? दुसरीकडे नागराजचा काका असलेला सैतानी नागपाशा अमृतप्राशन केल्यामुळे अमर आहे, परंतु तरीदेखील तो नागराजपुढे वारंवार हरतच आलाय. तो का प्रत्येकवेळी हरतो, याचे कारण शोधून त्याच्या कुटील गुरूंनी एक आगळाच प्रयोग आखलाय यावेळी. हा प्रयोग पूर्ण होणार तोच, उपरोल्लिखित महाकाय कृष्णशक्ती पृथ्वीच्या आयामात प्रवेश करते आणि घटनांचे सारे संदर्भच बदलून जातात. सुरू होते कलियुगातले रामायण, अर्थात नागायण!

    आर्ष महाकाव्यच नव्हे तर इतिहास म्हणून गौरविलेले रामायण गेली हजारो वर्षे आपण वाचत, ऐकत, पाहात आलोय. अनेकांनी आपापल्या बुद्धी आणि प्रतिभेनुसार त्याचा अन्वयार्थ लावायचे प्रयत्नही केले. त्यातून उद्भवलेल्या शेकडो कलाकृती, ग्रंथ, नाटके, सिनेमे, कादंबऱ्या आपापल्या वकूबानुसार आज प्रसिद्ध आहेत. परंतु कॉमिक्सच्या विश्वात, विशेषतः भारतीय कॉमिक्सच्या विश्वात रामायणावर थेटपणे नव्हे तर वेगळ्या कथेच्या संदर्भाने भाष्य क्वचितच झाले असेल. कॉमिक्स वाचणाऱ्यांना सुपरिचित असलेल्या ‘राज कॉमिक्स’ने हे शिवधनुष्य (कोटी हेतुत:!) उचलले आणि उचललेच नव्हे तर त्याला प्रत्यंचा चढवून अचूक संधानही केलेय. त्यातूनच उभी राहिलीये काळ, दिशा, स्थल सगळ्यांनाच भेदून उरणारी महागाथा ‘नागायण’!

    या ‘नागायणा’त श्रीराम आहेत, सीता, लक्ष्मण, हनुमान, कैकेयी, जटायू, विश्वामित्र, राक्षस, वानर आणि अगदी रावणसुद्धा आहेत! मला आवडलेली सगळ्यांत मोठी गोष्ट म्हणजे यांतलं एकही पात्र ओढून-ताणून नाहीये. बहुतांश पात्रे नैसर्गिकरित्या आधीपासूनच राज-कॉमिक्सविश्वाचा भाग असलेली आहेत. त्यांच्या मूळ स्वभावांचे रामायणानुसार लावलेले अन्वयार्थ इतके चपखल बसतात की वाटावं, १९८६ पासून ‘राज कॉमिक्स’ जणू याच एका शृंखलेची तयारी करत होते! वाल्मिकींचे ‘रामायण’ जसे बाल, अयोध्या, अरण्य किष्किंधा, सुंदर, युद्ध आणि उत्तर अशा ७ कांडांमध्ये पसरलेले आहे, तद्वतच अनुपम सिन्हा व जॉली सिन्हांचे हे ‘नागायण’ वरण, ग्रहण, हरण, शरण, दहन, रण, समर, इति अशी ८ कांडे व १ उपसंहार अशा एकूण ९ खंडांत (पक्षी कॉमिक्समध्ये) पसरलेले आहे. यांपैकी कोणतेही कॉमिक्स दुसऱ्याहून यत्किंचितही कमी नाही. भारतीय कॉमिक्सविश्वाला सुपरकमांडो ध्रुवसारखे एकमेवाद्वितीय न अन्य कोऽपि पात्र देणारे Anupam Sinha नि:संशय शतकातील सर्वश्रेष्ठ कॉमिक-लेखकांपैकी एक आहेत आणि ‘नागायण’ची रोमहर्षक कथा व तितकीच रोमांचक मांडणी हे या गोष्टीचे जिवंत पुरावे आहेत.

    ज्यांनी मूळ वाल्मिकींचे रामायण वाचलेले असेल, त्यांना कथेचा काही काही ठिकाणी अंदाज येईल. हा म्हटलं तर दोष आहे. परंतु हे संदर्भ अनेकवार अनपेक्षित ठिकाणी आलेले असल्यामुळे ते उलगडताना अनुभवणे हा एक वेगळाच सौख्यदायी अनुभव आहे. अनेक ठिकाणी मूळ स्रोताशी विलग होताना घेतलेले स्वातंत्र्य कथेसाठी पोषकच ठरले आहे. परंतु त्यासोबतच पात्रांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांचा मूळ कथेवर होणारा परिणाम या सबंध शृंखलेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. सबंध कथाच भविष्यकाळात घडत असल्यामुळे नागराज आणि सुपरकमांडो ध्रुव या महानायकांच्या वैयक्तिक आयुष्यांमध्ये प्रचंड उलथापालथ झाली आहे. त्यांचे दिसणे आणि पेहरावही कथेला अनुरुप बदललेयत. आणि तरीही अंतरी ते पूर्वीचेच नागराज व ध्रुव आहेत. हा समतोल राखणे ही मोठीच अवघड जबाबदारी, परंतु ती येथे लीलया पार पाडली गेली आहे. आणि याचवेळी अरेषीय पद्धतीने मांडणी करताना पुढच्या पिढ्यांनाही उचित स्थान देऊन त्यांची चपखल स्थापनादेखील केली आहे. अर्थात ‘राज कॉमिक्स’ हे नागराजच्या तुलनेत ध्रुवला, तो सगळ्यांपेक्षा वरचढ असूनही, कायमच सापत्नभावाची वागणुक देत आलंय, हा माझ्या मनातील जुनाच सल याही शृंखलेत काहीसा जाणवतो.

    तुम्ही याआधी ‘राज कॉमिक्स’ वाचले नसेल तर काही गोष्टींचे संदर्भ लागणे अवघड जाऊन रसभंग होण्याची शक्यता आहे. या शृंखलेत हल्लीच्या परिस्थितीला अनुलक्षून काही ईस्टर-एग्ससुद्धा आहेत. परंतु ते डोळसपणे वाचणाऱ्यालाच सापडतील. अर्थात क्वचित काही गोष्टी सोडल्यास ही सबंध शृंखलाच मोठी अविस्मरणीय व अक्षरशः ‘कलेक्टर्स एडिशन’ घेऊन संग्रही ठेवावी अशीच झाली आहे. कॉमिक्स म्हणजे पोरासोरांनी वाचायच्या गोष्टी, हा आरोप तर ‘राज कॉमिक्स’ने केव्हाच धुवून टाकलाय, किंबहूना ‘नागायण’द्वारे ते या बाबतीत अजूनच शंभर पावले पुढे गेले आहेत. कधी जर ‘राज कॉमिक्स’मधील पात्रांवर चित्रपट बनलेच तर ‘नागायण’ हे शंभर ‘इन्फिनिटी वॉर’लाही भारी ठरेल, एवढा त्याचा आवाका आहे आणि एवढी त्याची महत्त्वाकांक्षी मांडणी आहे. तुम्ही तर वाचाच, परंतु आपल्या आर्ष ग्रंथांपासून दूर गेलेल्या पुढच्या पिढ्यांनाही मनोरंजक चित्रकथेद्वारे मांडलेली ही शृंखला वाचायला द्या, त्यांना त्याचे संदर्भ आणि अन्वयार्थ उलगडून सांगा व हलकेच त्यांना मूळ ग्रंथांकडे घेऊन या. संस्कार असेच होत असतात!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [www.vikramedke.com]

  • मनोव्यापारांचा गूढ खेळ – जेराल्ड्स गेम

    जेसी (कार्ला गुगिनो) आणि जेराल्ड (ब्रुस ग्रीनवूड) सप्ताहांत साजरा करण्यासाठी त्यांच्या अलाबामातील नदीकाठच्या घरी जातात. एकत्र वेळ घालवणं, मजा करणं आणि त्यायोगे आपलं रुक्ष होत चाललेलं वैवाहिक जीवन वाचवणं, हा त्यांचा हेतू असतो. परंतु जेराल्डची मजेची कल्पना जरा वेगळीच असते. प्रवासाला निघतानाच त्याने सोबत खरोखरीच्या हातकड्या घेतलेल्या असतात. तो जेसीला त्या हातकड्यांनी पलंगाला जखडून ठेवतो. आणि त्याची रेप फँटसी पूर्ण करण्यात तिला भाग घ्यायला लावतो. जेसीला ही कल्पना मनापासून आवडलेली नाहीये. परंतु ती तरीही प्रयत्न करते. तिला त्या प्रकाराची क्षणोक्षणी शिसारी येऊ लागते. ती जेराल्डला सोड म्हणते. आणि मी नाही सोडलं तर, जेराल्ड उत्तरतो. जेसी घाबरते. जेसी आणि जेराल्डच्या वयात बरंच अंतर आहे. तो तिच्यापेक्षा खूप मोठा, अगदी म्हातारा म्हणावा, असा आहे. परफॉर्म करता यावं म्हणून तो व्हायाग्रा घेतो, एक नव्हे दोन! जेसी बांधलेल्या अवस्थेत आहे. तो तिच्या असहकार्यामुळे तिच्याशी वाद घालतोय. अचानक त्याला ह्रदयविकाराचा झटका येतो. आणि जेराल्ड मरतो! आता आजूबाजूला दूरदूरपर्यंत मनुष्यवस्ती नाही. नोकरचाकर किमान दोन-तीन दिवस तरी फिरकणार नाहीयेत. किमान! आणि जेसी त्या भल्यामोठ्या घरात एकटीच, जखडलेली आहे!!

    वरवर पाहाता “जेराल्ड्स गेम” हा सर्व्हायवल स्टोरी वाटू शकतो. नव्हे, त्याच्या या अश्या पार्श्वभूमीमुळे तो वाटतोच. परंतु चित्रपट पाहिल्यावर कळतं की, हा एक अतिशय गहिरा असा सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे! यात सर्व्हायवल दुय्यम आहे. प्राप्त परिस्थितीत सत्य आणि आभास यांचा मेळ राखणे, मनाचा समतोल राखणे ही जेसीची प्राथमिकता आहे. जवळच नवऱ्याचे प्रेत पडलेले आहे. घराजवळ पोहोचताना जेसीने एका भटक्या कुत्र्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला होता, जेराल्डने तिला रोखले होते. तो कुत्रा आता उघड्या दारातून आत आलाय. जेसी एकटी असूनही एकटी नाहीये. तिच्या सोबतीला तिचे अंतरात्मे आहेत. एक सोडून दोन! एक जेराल्डचं प्रतिनिधित्व करतोय तर एक जेसीचं. त्या दोघांच्या कल्लोळात जेसी अडकलीये, त्या साखळ्यांपेक्षाही घट्ट. पण या साखळ्या तरी खऱ्या आहेत का? की प्रतीकात्मक आहेत? जेसीला त्या दोघांच्या (की तिघांच्या!) संवादातून अश्याच अजून एका प्रसंगातल्या साखळ्या आठवू लागतात. कधीच, कुणालाच न सांगितलेली रहस्यं उचंबळून, उसळून वर येऊ लागतात. त्या एकाकी घरातल्या संध्याछाया अजूनच गडद होत जातात.

    “जेराल्ड्स गेम”चं वेगळेपण काय आहे माहितीये? तो जरासुद्धा सस्पेंस राखण्याचा प्रयत्न करत नाही. किंबहूना कुठे फार सस्पेस राहिल असं वाटू लागलं, तर पात्रांच्या संवादातून लगेच स्पष्टिकरणच देऊन टाकतो. हा खरं तर हॉरर चित्रपटांसाठी दोष मानला जातो. परंतु इथे तो चित्रपटाच्या बाजूने अभूतपूर्व काम करतो. बोललेल्या, संकेत केलेल्या त्या भयावह घटना कधी होतील याची आपण नकळत वाट पाहू लागतो आणि त्याचवेळी त्या होऊ नयेत म्हणून मनोमन प्रार्थनासुद्धा करू लागतो! स्टिफन किंग माझा अतिशय आवडता लेखक. सूक्ष्म, छोटछोट्या, वरवर साध्यासुध्या भासणाऱ्या गोष्टींमधून ताण निर्माण करण्याची त्याची हातोटी विलक्षण आहे. त्याच्याच, त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाने हा आत्मा बरोब्बर पकडलाय!

    हा चित्रपट त्याच्या पार्श्वभूमीमुळे “रागिणी एमएमएस”सारखा असेल की काय, अशी कुणाला शंका येऊ शकते. किंबहूना मला सुद्धा ती आली होती. परंतु हा चित्रपट इतका जास्त गहिरा आहे की, त्याच्यापुढे “रागिणी एमएमएस” नुसता भडक आणि बटबटीतच नाही तर अक्षरशः लहान पोरांचा खेळ वाटतो. “जेराल्ड्स गेम”मध्ये सांकेतिकतेचा मुक्तहस्ते वापर केलाय. विशेषतः ग्रहणाच्या. सस्पेंस कमीत कमी असूनही तो एका क्षणासाठीसुद्धा उत्कंठा कमी करत नाही. सरधोपट हॉरर अथवा थ्रिलरसारखे यात जम्प-स्केअर्स नसूनही तो सातत्याने धक्के देत राहातो. नैतिकता-अनैतिकतेचे प्रश्न उपस्थित करत राहातो. एक गंमत सांगतो, चित्रपटातली दोन्ही प्रमुख पात्रे, जेराल्ड आणि जेसी यांचे लग्न तुटण्याइतपत ताणलेले आहे. मी मूळ कादंबरी वाचलेली नाही. परंतु ही बाब स्थापित करण्यासाठी कदाचित कादंबरीत काही पानेसुद्धा खर्ची पडू शकतात. चित्रपट ही बाब एकाच वाक्यात स्थापित करतो. ही चित्रपट माध्यमाची असीम शक्ती आहे. तितकेच ते माईक फ्लॅनॅगन या दिग्दर्शकाचे कौशल्यसुद्धा आहे. कार्ला गुगिनोने अक्षरशः करिअर डिफाईनिंग म्हणावे असे जबरदस्त काम केलेय. ब्रुस ग्रीनवूडसुद्धा कमालच. हा छोटासा, कमी बजेट असलेला, बहुतांशी एकाच खोलीत घडणारा चित्रपट नेटफ्लिक्सने प्रदर्शित केलाय. नेटफ्लिक्सवर सहज मिळेल. हॉरर, थ्रिलर वगैरे जॉनर्समध्येसुद्धा काहीतरी वेगळं पाहू इच्छित असाल, तर “जेराल्ड्स गेम” बेस्ट चॉईस आहे!!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    *५/५

  • इंटेलिजंट, मनोरंजक, परिपूर्ण — विक्रम-वेधा

    सम्राट विक्रमावर एक अवघड जबाबदारी येऊन पडते. दूर जंगलातल्या झाडावरून वेताळाला घेऊन येण्याची. तो पराक्रमी राजा जरादेखील न कचरता जंगलात शिरतो. वेताळाशी दोन हात करून त्याला पकडतो व खांद्यावर टाकतो. तो जायला निघतो तेवढ्यात खांद्यावर लादलेला वेताळ विचारतो, “ओरऽ कधा सोल्टऽ”? (एक गोष्ट सांगू?)!! ही सुरुवात आहे पुष्कर-गायत्री यांच्या “विक्रम-वेधा”ची. अॅनिमेटेड सिक्वेन्समध्ये दिसणारा हा दृश्यक्रम त्या वाक्यासोबतच लाईव्ह-अॅक्शनमध्ये परिवर्तित होतो आणि काही समजायच्या आतच प्रेक्षकांना एका भरीव कथानकात शोषून घेतो. चित्रपट संपल्यावरही तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाहीत.

    एन्काऊंटर स्पेशालिस्ट विक्रम (आर. माधवन) हा उत्तर मद्रासमधील डॉन वेधाला (विजय सेतुपती) शोधतोय. वेधा, ज्याच्या भयकारितेच्या नुसत्या कथाच सांगितल्या जातात, जो अपराध जगतातला जिनियस समजला जातो आणि जो बऱ्याच दिवसांत कुणाच्याच नजरेस पडलेला नाहीये. तो वेधा एका एन्काऊंटरनंतर स्वत:हूनच पोलिसांच्या स्वाधीन होतो. आता उरलेय ते फक्त त्याने आजवर केलेल्या गुन्ह्यांचा कबुलीजबाब घेणे. पण आजवर कधीच हाती न लागलेल्या वेधाने आत्मसमर्पण कसे काय केले? विक्रमला ही शंका सतावत असतानाच, चौकशीदरम्यान वेधा विक्रमला पहिली कथा सांगतो आणि चित्रपटातले गूढ अजूनच गहिरे होत जाते. तिथून रंगू लागतो, आजवर १६ खुन केलेला वेधा आणि १८ एन्काऊंटर केलेल्या विक्रम या दोघांमधला जबरदस्त मानसशास्त्रीय खेळ. विक्रम आपल्या कामात अतिशय प्रामाणिक आहे. सुरुवातीलाच एका एन्काऊंटरनंतर तो आपल्या एका सहकाऱ्याला सांगतो, “मी प्रत्येक एन्काऊंटरनंतर शांतपणे झोपू शकतो, कारण मला माहितीये मी चांगल्याच्या बाजूने आहे आणि वाईटाचाच खात्मा करतोय”. वेधा वेगवेगळ्या टप्प्यावर भेटतच राहातो, कथानकात विविध कोडी निर्माण करणाऱ्या गोष्टी विक्रमला सांगतच राहातो आणि एका टप्प्यावर विक्रमला रात्रीची ती शांत झोप लागणे बंद होते. कोण चांगला आहे, कोण वाईट आहे, कोण धर्माच्या बाजूने आहे आणि कोण अधर्माच्या बाजूने; यांच्यातल्या सगळ्याच सीमा पुसून जातात. आपल्यासमोर जे होते ते खरे होते की जे नाही ते खरे, असे प्रश्न आपला पिच्छा पुरवू लागतात. कधी विक्रम चांगला वेधा वाईट वाटू लागतो तर दुसऱ्याच क्षणी वेधा चांगला विक्रम वाईट वाटू लागतो, पुढच्याच क्षणी दोघेही सारखेच वाईट ठरतात तर कधी दोघेही सारखेच चांगले ठरतात. यातून शेवटी जे घडतं ते तर अजूनच कल्पनातीत असतं.

    पुष्कर-गायत्री या द्वयीचं वैशिष्ट्य हे की, त्यांनी त्यांच्या प्रेक्षकांना काडीमात्रही स्पून-फिडिंग केलेली नाही. ते प्रत्येक वेळी आपल्याला विचार करायला लावतात, समोर जे चालू आहे त्यात भाग घ्यायला लावतात आणि निवड करायला लावतात. पण त्याचवेळी ते सतत प्रेक्षकांच्या चार पावले पुढे राहून रहस्याच्या चाव्या शेवटपर्यंत त्यांच्याच ताब्यात राहातील याची व्यवस्थित काळजीसुद्धा घेतात. असे चित्रपट जबरदस्त असतात. त्यांचं रहस्य एकदा पाहून उलगडलं तरीही निव्वळ त्यातल्या क्राफ्ट्समनशिफ्टसाठी ते वारंवार पाहावेसे वाटतात. “विक्रम-वेधा” तर आपल्या नॉन-लिनियर मांडणीमुळे अजूनच बहारदार होतो. निओ-न्वार प्रकारचा अतिशय इंटेलिजंट सिनेमा असतानाच “विक्रम-वेधा” त्याचवेळी जबरदस्त पॉप्युलर मासवालासुद्धा राहातो. त्यात खटकेबाज संवाद आहेत, तुफान अॅक्शन आहे, जबरी डान्स आहेत आणि श्वास रोखून धरायला लावणारी अमाप दृश्ये आहेत. हे खास तमिळ इंडस्ट्रीचं वैशिष्ट्य! क्लास आणि मासचा इतका अभूतपूर्व संगम इतरत्र क्वचितच आढळतो. दिग्दर्शनासाठी आणि स्टोरीटेलिंगसाठी दिग्दर्शक द्वयीला पूर्ण गुण द्यायलाच हवेत.

    पण त्याचबरोबर पूर्ण गुण द्यायला हवेत ते जबरदस्त कास्टिंगसाठी. मॅडी आणि विजय यांच्याइतक्या परिपूर्णतेने त्या भूमिका दुसऱ्या कुणीच निभावल्या नसत्या. गेल्या काही वर्षांत मॅडीने जाणीवपूर्वक आपली चॉकलेट-बॉय प्रतिमा बदलून “इरऽधी सूट्रऽ”/”साला खडूस”सारखे (२०१६) वेगळ्या वाटेवरचे चित्रपट करायला सुरुवात केली आहे. मणिरत्नमच्या मुशीत घडलेला माधवन हा अतिशय संपन्न अभिनेता असल्याचे “विक्रम-वेधा”च्या प्रत्येक चौकटीत जाणवत राहाते. पण “विक्रम-वेधा” जर का खऱ्या अर्थाने कुणी खाल्ला असेल, तर तो आहे विजय सेतुपती! कोणतीही खास पार्श्वभूमी वा कोणताही गॉडफादर नसतानाही अतिशय संघर्ष करून केवळ आणि केवळ वेगळ्या भूमिकांच्या जोरावर या माणसाने स्वतःला ज्या उंचीवर नेऊन ठेवलेय, ती खरोखर अनुभवण्याचीच गोष्ट आहे. हा चित्रपट मी मुंबईतील एका उपनगरात पॅक-हाऊसमध्ये पाहिला. मॅडीच्या एन्ट्रीला टाळ्या-शिट्यांचा पाऊस पडला, पण विजयच्या एन्ट्रीच्यावेळी अक्षरशः कानठळ्या बसाव्यात इतका जबरदस्त जल्लोष झाला आणि पुढे प्रसंगोपात होतच राहिला. तमिळ प्रेक्षकांना खरोखर उत्तम अभिनेत्यांची जाण आहे, हेच खरे! वास्तविक अतिशय भव्य कॅनव्हासचा हा चित्रपट आणि शेकडो पैलू असलेली भूमिका. पण विजय सेतूपतीने तिचे अक्षरशः सोने केलेय सोने! त्याचे संवाद, चेहऱ्यावरील हावभाव, माफक विनोद, सहजपणे सांगितलेले तत्त्वज्ञान, अॅक्शन, नृत्य सारेच जणू काही वेगळ्या जगतातले वाटते. ते तीन तास पडद्यावर जणू फक्त आणि फक्त वेधा नावाचा राऊडीच होता, विजय नव्हेच! कहर आहे हा माणूस, कहर!! जेव्हा केव्हा संधी मिळेल त्यावेळी त्याचं काम पाहा म्हणजे पाहाच!! वरलक्ष्मी शरदकुमार, श्रद्धा श्रीनाथ, हरीश पेराडी, प्रेम वगैरे सगळ्यांचीच कामे बहारदार झालीयेत. सॅम सी. एस. या नवीन संगीतकाराने तर कमालच केली आहे. विशेषतः “करप्पऽ वेळ्ळई” तर काहीच्या काही भन्नाट झालंय.

    निओ-न्वार क्राईम-थ्रिलर प्रकारातल्या सर्वश्रेष्ठ चित्रपटांची यादी करायची म्हटली तर “विक्रम-वेधा”ला त्यात निश्चितच स्थान द्यावे लागेल, यात कसलीच शंका नाही. सर्वच बाजूंनी अतिशय परिपूर्ण असलेला, प्रेक्षकांना विचार करायला लावणारा, कोडी सोडवायला लावणारा आणि तरीही जबरदस्त मनोरंजन करणारा “विक्रम-वेधा” तुमच्या गावी अथवा जवळ जिथे कुठे लागला असेल, तिथे जाऊन आवर्जून पाहावा; पुन्हा-पुन्हा अनुभवावा असाच झालाय. असेच चित्रपट कोणत्याही चित्रपटसृष्टीला पुढे नेत असतात. तमिळ इंडस्ट्रीला इथूनपुढे वर्षानुवर्षे अभिमान वाटत राहील की, त्यांनी “विक्रम-वेधा” बनवला आणि त्यांच्या प्रेक्षकांनाही!!

    *५/५

    — © विक्रम श्रीराम एडके.

  • ‘आय’ — अदक्कम मेलऽ

    ஜ या तमिळ भाषेतील अक्षराचा उच्चार होतो ‘आय’ अथवा ‘ऐ’. एकच अक्षर, पण त्याचे अर्थ मात्र खूप सारे होतात. ‘आय’ म्हणजे सौंदर्य, मी, राग, बाण, सूड, प्रेम, गुरू, राजा, मालक, दुर्बल, आश्चर्य आणि अजून बरंच काही! परंतु जेव्हा शंकर हे सगळेच्या सगळे अर्थ एकाच कथेत बांधतो, तेव्हा बनतो ३ तास ८ मिनिटे चालणारा चमत्कार ‘आय’!! अविश्वसनीय, अद्भुत, अकल्प्य आणि तरीही तपशीलांचा पाया पक्का असलेले चित्रपट बनवण्यासाठी शंकर प्रसिद्ध आहे. त्याचा प्रत्येक अन् प्रत्येक चित्रपट हा तमिळच नव्हे, तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन दिशा देत असतो. परंतु २०० कोटींच्या भयावह किमतीत बनवलेला ‘आय’सारखा चित्रपट शंकरनेही आजवर कधीच बनवला नव्हता, हे निश्चित!! यानिमित्ताने शंकरने आयुष्यात पहिल्यांदाच प्रणयप्रधान थरारपट बनवलाय!! आणि त्याची सारी जबाबदारी समर्थपणे शिरावर उचललीये ‘चियान’ विक्रमने!! अत्यंत साधीशी, सुडाच्या अंगाने जाणारी प्रेमकथा! मात्र जेव्हा तिला शंकरचा स्पर्श होतो, तेव्हा कुणी कल्पनेतही कल्पना करू शकणार नाही, इतकी भव्यता निर्माण होते! श्वास रोखून धरायला लावणारी साहसदृश्ये, भीती वाटायला लावणारी थरारकता, सौंदर्यानेही लाजून मान लववावी असं सौंदर्य. आणि तरीही त्याच्या प्रत्येक न् प्रत्येक चौकटीवर कोरलेलं लिंगेसनचं (विक्रम) दिया (ऍमी) साठीचं प्रेम!! शरीरसौष्ठवापासून ते मॉडेलिंग व वैद्यकशास्त्रापर्यंत आणि चेन्नईच्या गल्लीबोळांपासून ते चीनमधल्या बहारदार स्थळांपर्यंत ‘आय’ लीलया संचार करतो!

    सर्वात आधी उल्लेख करायला हवा तो विक्रमचा! विक्रम नि:संशय याक्षणीचा भारतातील सर्वश्रेष्ठ अभिनेता आहे. त्याच्याइतका मेहनती अभिनेताही भारतात दुसरा कुणीच नसेल. परंतु ही सारी विशेषणं थिटी वाटावीत असा चमत्कार त्याने लिंगेसनच्या रुपाने घडवलाय! ‘आय’च्या एकेका चौकटीच्या परिपूर्णतेसाठी आपल्या ४८ वर्षे जीर्ण शरीराची अक्षरशः दधिचीप्रमाणे प्रत्येक मिनिटा मिनिटाला किंमत मोजलीये त्याने! सौंदर्याची मूर्ती म्हणजे विक्रम, शैलीदारपणाचे दुसरे नाव विक्रम, रागावण्याच्या अभिनयात जमदग्नीचा अवतार विक्रम, साहसदृश्यांत बाणासारखा तीक्ष्ण भासणारा विक्रम, सुडाची अग्नि म्हणजे विक्रम, साक्षात मदन म्हणजे विक्रम पडद्यावरचा राजा विक्रम, ३ तास ८ मिनिटांचा मालक विक्रम, धुलिकणही जड वाटावा इतका दुर्बळ होऊन दाखवणारा विक्रम, भारतीय चित्रपटसृष्टीतलं आश्चर्य विक्रम आणि भारतातल्या सर्वच अभिनेत्यांनी ज्याच्याकडून काही ना काही शिकावं, असा गुरू म्हणजे विक्रम! थोडक्यात ‘आय’चे सर्वच्या सर्व अर्थ ज्याला चपखल लागू पडतात, असा ‘आय’स्वरूप विक्रम!! त्याचा अभिनय शब्दांत बांधताच येणार नाही. ‘आय’च्या कित्येक दृश्यांत डोईच्या केसांपासून ते पायीच्या नखांपर्यंत रंगभूषेखाली झाकलेला आहे तो, परंतु तरीही त्याचे डोळे आणि देहबोली भावना तितक्याच तीव्रतेने पोहोचवतात!! काही काही दृश्यांमध्ये तर स्वत:लाच समजावून सांगावे लागते की, ‘हा विक्रमच आहे बरं का’!! गरज असेल तेव्हा तो चक्क अर्नॉल्डही भासतो आणि गरज असेल तेव्हा तो कस्पटासमानही भासतो! ‘रावण’ (२०१०) मध्ये त्याने स्वत:चेच पुनर्मुद्रण अत्यंत वाईट केले होते, ती एकमेव कमतरता त्याने ‘आय’द्वारे व्यवस्थित भरून काढलीये!! कुणाला जर ‘आय’ पाहाण्यासाठी असलेल्या शेकडों कारणांपैकी केवळ एकच कारण हवे असेल, तर मी आनंदाने रहमान आणि शंकरच्याही आधी विक्रमचे नाव घेईन! ‘आय’चे नेपथ्यकार टी. मुथ्थुराज यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर, “विक्रम मानव नाहीच, विक्रम तर वरदान आहे परमेश्वराने दिलेलं”!!

    ‘आय’ पाहाताना समजतं की, का छायांकनकार पी. सी. श्रीराम यांना ‘बापमाणूस’ म्हटलं जातं! सुंदर दृश्ये तर त्यांच्या चित्रकातून (कॅमेरा) दैवी वाटतातच, परंतु साध्या साध्या चौकटींचेही त्यांच्या परिसस्पर्शाने सोने झाले आहे. ‘आय’ची थोडीशी गूढ, अरेषीय पद्धतीने चालणारी कथा इतरवेळी सामान्य प्रेक्षकाला कंटाळवाणी वाटूही शकली असती, परंतु पी. सी. श्रीरामचा चित्रक अखेरपर्यंत तुम्हाला खुर्चीशी खिळवूनच ठेवतो! आणि या दुधात साखर म्हणजे नेपथ्यकार टी. मुथ्थुराज! गेली साडेसहा वर्षे या सर्व संघासोबत कष्ट उपसणाऱ्या या माणसाने जर तीच मेहनत खऱ्याखुऱ्या स्थापत्यरचनेला वापरली असती, तर कित्येक पक्क्या वसाहती बांधून झाल्या असत्या! एक प्रमाणन मंडळाचं प्रमाणपत्र सोडलं तर ‘आय’ची अशी एकही चौकट नाही, ज्यात नेपथ्यरचनेचा वापर केलेला नाही. आणि विशेष उल्लेख व्हायला हवा तो ‘वेटा वर्कशॉप’ या आंतरराष्ट्रीय रंगभूषा कंपनीचा! हॉलिवूडलाही लवकर न झेपणाऱ्या या मंडळींकडून शंकरने एक भारतीय आणि त्यातही तमिळ चित्रपट करून घेतलाय, ही बाब माझ्यासारख्या तमिळ चित्रपटांच्या रसिकाला निश्चितच अभिमानास्पद आहे! त्या मंडळींनीही अशी काही जादू केली आहे की ‘आय’मधल्या विविध पात्रांच्या विविध प्रसंगांमधल्या रंगभूषेची आपण कल्पनेतही कल्पना करू शकणार नाही! अत्यंत सौंदर्यपूर्ण ते अत्यंत किळसवाणं या टप्प्यांत त्यांनी पाहून डोळे पांढरे व्हावेत अशी रंगभूषा केली आहे!!

    आणि रहमान! रहमानबद्दल काय बोलू!! साक्षात देवच आहे तो!! पार आत्म्याला हात घालणारी गीते तर त्याने दिलीच आहेत, परंतु आधीच परिपूर्णतेचा परिसस्पर्श लाभलेल्या चित्रचौकटींना त्याने आपल्या पार्श्वसंगीताद्वारे दिव्यतेच्या शिखरावर नेऊन ठेवलंय! तुम्ही जेव्हा ‘आय’ पाहायला जाल, तेव्हा पार्श्वसंगीताकडे विशेष लक्ष द्या हे मी आवर्जून सुचवू इच्छितो!! आणि त्याची दैवी गाणी पडद्यावर चितारावीत ती केवळ आणि केवळ शंकरनेच! नुसत्या गीतांच्या चित्रिकरणासाठी निर्माता व्हि. रविचंद्रन या गूढ माणसाने जितका पैसा ओतलाय, तितक्या किमतीत एखादा स्वतंत्र बिगबजेट चित्रपट बनू शकेल! अर्थातच शंकरचा द्रष्टेपणा तेवढा मोठा आहे आणि रहमानचं संगीत तितकं अनुभूतीसंपन्न आहे, म्हणूनच हे शक्य होऊ शकलंय हेही तितकंच खरं म्हणा! परंतु इर्शाद कामिलचे हिंदी गीतलेखन काही काही जागा सोडता, अगदीच वाईट झाले आहे. या पार्श्वभूमीवर तमिळ गीतांचे लेखन अतिशय सुंदर व अर्थपूर्ण आहे, हे मी आवर्जून सांगू इच्छितो! गीते ऐकू इच्छित असाल, तर तमिळ ऐका! त्यांची झिंग चढायला वेळ लागेल, परंतु एकदा चढली की आयुष्यभर उतरता उतरणार नाही ती!!

    सुरेश गोपी या अत्यंत गुणी मल्याळम अभिनेत्याने खरोखर डॉ. वासुदेवनच्या भूमिकेत प्राण फुंकले आहेत. संथानमची विनोदनिर्मितीतली अचूकता काही नव्याने सांगण्याची गोष्ट नव्हे! ऍमी जॅक्सन आणि उपेन पटेल यांना बरोब्बर ‘सुपरमॉडेल्स’च्या भूमिका देऊन शंकरने पुन्हा एकवार चित्रपटमाध्यमावरील त्याची पकड दाखवून दिली आहे! शुभा आणि शंकरची कथा अत्यंत अकल्पनीय असली, तरीही पटकथा शंकरच्या इतर चित्रपटांइतकी चटकदार झालेली नाही, हे कबूल केलेच पाहिजे. परंतु ‘आय’ हा मुळातच इतका जगाविरहीत प्रयत्न आहे आणि शंकरने पडद्यावर भव्यता या शब्दाला असे एक नवेच परिमाण दिले आहे; की पटकथेतल्या त्रुटी आपोआपच दुर्लक्षित होतात. शिवाय आपल्या इतर सर्वच चित्रपटांप्रमाणे शंकरने ‘आय’मधलेदेखील वैज्ञानिक तपशील अतिशय परिपूर्ण व विश्वसनीय ठेवले आहेत!!

    खरं तर, मी ही समीक्षा लिहित असेन तोपर्यंतच ‘आय’ने शंभर कोटींचा पल्ला पार केला असेल. त्याअर्थी ‘आय’ माझ्या समीक्षणाला जरादेखील बांधील नाही! परंतु भारतातल्याच एका वेगळ्या आणि श्रेष्ठतेच्या बाबतीत ज्याची तुलना केवळ हॉलिवूडशी व आशयसंपन्नतेच्या बाबतीत ज्याची तुलना केवळ आणि केवळ स्वत:शीच होऊ शकते, त्या तमिळ चित्रपटसृष्टीलाही वेगळा भासणारा हा अद्भुत प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचवणे मला माझे कर्तव्य वाटते, म्हणून हा सारा लेखनप्रपंच! बाकी ‘आय’मधले एक पात्र (कोण ते मी सांगणार नाही!) सातत्याने भयानकतेची परिसीमा सांगितली तरी सार्थपणे ‘अधक्कम मेलऽ’ अर्थात ‘त्याहूनही भयंकर’ असे म्हणत असते! मी या एक-दिडहजार शब्दांच्या समीक्षणात ‘आय’च्या जबरदस्तपणाचा कणही पूर्णपणे पकडू शकलेलो नाही. तेव्हा कुणी जर मला विचारले की, “आय कसा आहे?”, तर मी त्याला या लेखानंतरही सांगेन ‘अदक्कम मेलऽ’!! तेव्हा जा आणि चित्रपटगृहाच्या भव्य पडद्यावर त्याहून शतपट भव्य भासणाऱ्या ‘आय’चा आस्वाद घेऊन या!!

    *४.८०/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

    image

  • विरलेल्या काठाचे सुंदर रेशमी वस्त्र : लोकमान्य – एक युगपुरुष

    ज्यावेळी कुणी एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वावर कादंबरी लिहायला घेतो, त्यावेळी लेखकाला पृष्ठसंख्येचं जराही बंधन नसतं. त्यामुळे लेखक त्याला हवी तितकी पाने लिहू शकतो. मग त्या कादंबरीत कधी चरित्रनायकाचं संपूर्ण आयुष्य चितारलं जातं, तर कधी त्याचा काही भाग तेवढा रंगवला जातो. परंतु चित्रपटाची तशी परिस्थिती नसते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, चित्रपटाला वेळेचं बंधन असतं. एका विविक्षित वेळेतच, प्रेक्षकांना सलगपणे पाहाताना कंटाळा येणार नाही; अश्या बेताने चरित्रपट बनवायचा असतो. मग त्यात नायकाचं संपूर्ण आयुष्य दाखवायचं म्हटलं तरी दाखवता येत नाही. काही विशिष्ट घटनांवरच तेवढा भर द्यावा लागतो व दृक्माध्यमाच्या दृष्टीने अनावश्यक असलेले तपशील हे टाळावेच लागतात. माझ्या मते, चरित्रपटांचं खरं कार्य हे निवडलेलं ऐतिहासिक चरित्र मांडणं नसतं, तर त्या चरित्राची स्थापना करणं हे असतं. चांगला चरित्रपट कश्याला म्हणावं, तर जो चित्रपट या माध्यमाला आवश्यक असणारा दृक्परिणाम तर साधतोच, परंतु त्या चरित्रनायकाबद्दल फारशी माहिती न देता प्रेक्षकाला त्या संबंधित नायकाबद्दल अधिकाधिक माहिती मिळवायला प्रवृत्त करतो. यामागे लेखक-दिग्दर्शकाचं संहिता निवडण्याचं आणि त्या संहितेचं चित्रपटात रुपांतरण करण्याचं कौशल्य अतिशय मोलाचं असतं. ते जर साधलं, तरच उत्तम चरित्रपट झाला असं समजावं. तो एखाद्या कादंबरीसारखा असावा, परिणामकारक!! आणि या सर्व विवेचनाच्या पार्श्वभूमीवर बोलायला गेलं, तर खूप साऱ्या उण्या बाजू असूनही ओम राऊतांचा ‘लोकमान्य – एक युगपुरुष’ हा चित्रपट, चांगल्या चरित्रपटांच्या श्रेणीत मोडतो!

    चित्रपट सुरु होतो तो लोकमान्यांना (सुबोध भावे) ‘मंडाले’च्या कारावासाची शिक्षा सुनावली जाते त्या क्षणापासून. आणि मग आजच्या काळातील मकरंद (चिन्मय मांडलेकर) या संभ्रमित तरुणाच्या नजरेतून तो उलगडत जातो. दिग्दर्शक, छायाचित्रकार (प्रसाद भेंडे), रंगभूषाकार (विक्रम गायकवाड), नेपथ्यकार (नितीन चंद्रकांत देसाई?), कलाकार या सर्वांनी मिळून शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीचा काळ जसाच्या तसा उभा केला आहे. चित्रपटाच्या शेवटी श्रेयनामावलीसोबत खऱ्या व्यक्तीमत्त्वांची व घटना आणि जागांची संदर्भासाठी वापरलेली ऐतिहासिक छायाचित्रे आणि त्यासोबत चित्रपटातील त्या त्या व्यक्ती, घटना व जागांची छायाचित्रे सरकत जातात, आणि ती सगळी इतकी हुबेहुब जमली आहेत, की आश्चर्याने तोंडात बोट घातल्याशिवाय राहावत नाही. यासोबतच, दिग्दर्शक (ओम राऊत)-लेखक (ओम राऊत, कौस्तुभ सावरकर)-संपादक (आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले) या त्रयीने निवडलेल्या घटना इतक्या काही चपखल आहेत, की त्यातून जरी लोकमान्यांचं चरित्र पूर्णपणे कळत नसलं, तरीही लोकमान्यांचं व्यक्तीमत्त्व आणि त्यांच्या कार्याचा आवाका पुरेपूर मनात ठसतो! अगदी लोकमान्यांबद्दल फारशी माहिती नसलेल्या प्रेक्षकाच्या मनात सुद्धा! अजित-समीर यांनी दिलेले चित्रपटाचे संगीत हे एक स्वतंत्र गीतमाला (अल्बम) म्हणून फारसे प्रभावी नसले, तरीदेखील चित्रपटात गीतांसाठी अगदी सोळा आणे नेमक्या जागा आहेत. एकही गीत पडद्यावर पाहाताना अनाठायी वाटत नाही, याबद्दल संगीतकारद्वयी आणि दिग्दर्शकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. पार्श्वसंगीत मात्र काही काही महत्वाच्या प्रसंगांमध्ये कर्कश्य वाटते, एवढेच!

    आणि सुबोध भावे!! लोकमान्य म्हणजे सुबोध भावे आणि सुबोध भावे म्हणजे लोकमान्य! हा चित्रपट पाहाताना एका क्षणासाठीदेखील ‘हा सुबोध भावे आहे’, असे वाटत नाही; इतका तो त्या भूमिकेत शिरलाय. नव्हे, ती भूमिका जगलाय तो शब्दश:!! अगदी सुरुवातीच्या काळात त्याचे ते आगरकरांसोबतचे (समीर विद्वांस) ठाम वादविवाद, आगरकरांनी “संमतीवयाचा कायदा” करू म्हटल्याबरोब्बर त्याचे ते त्वेषाने उसळून “म्हणजे इंग्रजांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदूधर्मात सुधारणा करणार? शक्य नाही! हिंदूधर्मात काय सुधारणा करायची आणि काय नाही, हे हिंदूच ठरवतील. कायद्याने लादलेली बळजबरीची सुधारणा चालणार नाही”, म्हणणे, निव्वळ अप्रतिम! “हा माझा वर्ग आहे, डॉग्स.. अँड ब्रिटिश.. आर नॉट अलाऊड..!!” म्हणताना तर त्याचे ते इतरवेळी मृदू भासणारे डोळे आग ओकत असतात अक्षरशः,  आग! किंबहूना सर्वच पंचलाईन्स पार सीमारेषेपार वाजवल्या आहेत त्याने! सुधारकांची सभा उधळून लावल्यानंतर त्याचे ते कुटील हसणे आणि आसपासच्या गदारोळाला क:पदार्थ समजत ऐटीत निघून जाणे तर मी कधीच विसरू शकणार नाही. याबाबतीत ओम राऊतांची जितकी स्तुती करावी तेवढी थोडीच आहे. हाती सुबोध भावेसारखा हुकमाचा एक्का असताना तो कसा वापरायचा – कुठे त्याच्यातले नायकत्व बाहेर काढायचे, कुठे अभिनय खुलवून घ्यायचा हे सारे त्यांनी बरोब्बर साधले आहे. एवढंच नव्हे, तर कथेशी प्रामाणिक राहून खूप सारी हिंदुत्ववादी फटकेबाजी दे दणादण करून घेतली आहे, कुठेही प्रचारकी थाट न आणता! मग ते राजकारणात अहिंसा घुसडणाऱ्या बेगडी तत्त्वाच्या एकाच प्रसंगात चिंधड्या उडवणं असो, राष्ट्रहितासाठी कराव्या लागणाऱ्या वधाचे समर्थन करणे असो वा दृष्टांत देताना ‘अफज़लखान हिंदूंची मंदिरे फोडायला आला होता’ हे ऐतिहासिक सत्य बेधडक मांडणे असो; लोकमान्यांची हिंदुत्ववादी बाजू दाखवण्यात चित्रपट कुठेही कमी पडत नाही. किंबहुना लोकमान्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी – मग त्या स्वदेशी असो, असहकार असो, धर्मसुधारणा असो; सगळ्या मोजक्या प्रसंगांतून साकारतात, त्यापाठी असलेल्या लोकमान्यांच्या तत्त्वज्ञानासह!! ‘गीतारहस्य’च्या लेखनाची आणि त्याद्वारे लोकमान्यांना झालेल्या आत्मबोधाची दृश्ये तर निव्वळ अप्रतिम!!

    परंतु चित्रपटाचा लोकमान्यांच्या काळातील घटनांचा मकरंदच्या आयुष्यातील आजच्या जगातल्या घटनांशी संबंध जोडण्याचा अट्टाहास पटत नाही. किंबहूना मकरंदची अतिआदर्शवादी कथा आणि त्यातून अखेरीस त्याने निवडलेला मार्ग; हे दोन्हीही मांडणीच्या पातळीवर खूपच कच्चे वाटतात. मकरंदची होऊ घातलेली बायको समीरा (प्रिया कामत) सदानकदा अतिवास्तववादी होत त्याच्यावर चिडत असते, तीच शेवटी त्याच्या अतिआदर्शवादी मार्गावरून चालू लागते; हे चुकीचं वाटतं. तिच्या काय वा मकरंदच्या काय, आयुष्यात एवढं मोठं स्थित्यंतर येण्यामागे लोकमान्यांचा वाटा खूपच ओढून ताणून वाटतो. समीराचे पात्र संपूर्ण चित्रपटभर दुय्यम भूमिकेत वावरते, तेच अखेरीस तत्त्वज्ञाच्या भूमिकेत जाऊन मकरंदचा संभ्रम दूर करते, हे पटत नाही. असाच समांतर कथेचा मार्ग याआधी ‘रंग दे बसंती’ (२००४) मध्येही वापरला होता. परंतु त्यात आजच्या काळातील कथादेखील कमालीची सशक्त रेखाटली होती. ऐतिहासिक घटनांपासून प्रेरणा घेत, त्यातली पात्रे आजच्या जगातही काही घटना घडवून आणतात, हे दाखवताना त्या पात्रांच्या आयुष्यात अपेक्षित स्थित्यंतर होण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला होता. खलनायकही त्या तोडीचे दाखवले होते. परंतु यापैकी काहीही मकरंद आणि समीराच्या कथेत होत नाही. त्यामुळेच ती कथा वरवरची वाटते. एखाद्या सुंदर, मऊ, तलम रेशमी वस्त्राचा काठच जर विरलेला असेल, तर कसे वाटेल, तशी! त्यामुळेच चिन्मय मांडलेकरने जबरदस्त आणि प्रिया कामतने चांगले काम करूनही त्यांची कथा मनाची जरादेखील पकड घेत नाही. असा दोन्हीही डगरींवर पाय ठेवण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा जर दिग्दर्शक-लेखक-संपादकांनी लोकमान्यांचाच काळ अजून वाढवला असता, तर बघायला अजून मजा आली असती. शेवटी चित्रपटातून काय शिकायचं आणि काय नाही अथवा मुळात काही शिकायचं की नाही, हा सर्वस्वी प्रेक्षकांचा प्रश्न असतो. लेखक-दिग्दर्शकांनी त्यांना अभिप्रेत असलेली शिकवण प्रेक्षकांवर लादू नये. प्रेक्षकांना मोकळीक द्यावी. तरच चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिला जाण्याची शक्यता निर्माण होते. याउलट दोन्ही डगरींवर पाय ठेवल्यामुळे ‘लोकमान्य’चा दर्जा आणि पुनर्गमनाची शक्यता, दोन्हींवरही जाणवण्याइतपत परिणाम झाला आहे.

    या सगळ्यात एका व्यक्तीचा विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो. तो म्हणजे लोकमान्यांच्या पत्नीची भूमिका केलेल्या अभिनेत्रीचा. दुर्दैवाने आपल्याकडे चित्रपटांचे विकिपेडीया पेजेस बनवण्याच्या आघाडीवर अतिशय दुष्काळ आहे. त्यामुळे या गुणी अभिनेत्रीचे नाव समजू शकले नाही. परंतु तिने सुबोध भावेच्या तोडीस तोड अभिनय केला आहे. आभाळाएवढ्या नवऱ्याच्या मागोमाग जाताना होत असलेली फरपट, संसाराची धुळदाण होत असतानाची तिची विवश अगतिकता, नवऱ्याशी वेगवेगळ्या पातळ्यांवर असलेला दुरावा, सारे काही तिने मूकपणे व्यक्त केले आहे. तिचे पात्र तिने अतिशय ताकदीने उभे केले आहे. फारसे संवाद नाहीत तिच्या वाट्याला. परंतु तिचे डोळे बोलतात! आणि चित्रपटाच्या सुरुवातीला येणारी नाना पाटेकरांच्या प्रभावी आवाजातली कविता तर केवळ अवर्णनीय!

    चित्रपटात ऐतिहासिकदृष्ट्या खूप साऱ्या चुकादेखील आहेत. उदा. सावरकर रेखाटताना त्यांचे १९०३ सालचे पुण्यात शिकतानाचे छायाचित्र संदर्भासाठी घेतले आहे. प्रत्यक्षात चापेकरांच्या हौतात्म्याच्या प्रसंगी सावरकर नाशिकमध्येच शिकत होते. चित्रपटात दाखवले तसे महाविद्यालयीन युवक मुळीच नव्हते. चापेकरांचाही उल्लेख चित्रपटात ‘चापेकर’ असा बरोबर तर श्रेयनामावलीत ‘चाफेकर’ असा चुकीचा आला आहे. गांधी-लोकमान्य अशी भेट झाली होती, हे खरे आहे. मात्र ती १९१५ साली, अर्थात लोकमान्य मंडालेहून सुटून आल्यानंतर. चित्रपटात मात्र हा प्रसंग मंडालेला जाण्यापूर्वीच दाखवलाय. काढायला गेल्यास अश्या खूप साऱ्या चुका काढता येतील. परंतु महत्वाचे हे आहे की; चित्रपटाचा उद्देश, त्यापाठची अमर्याद मेहनत आणि त्याची अत्युत्कृष्ट मांडणी हे सारे सारे अतिशय प्रामाणिक आहे. हे एकदा लक्षात घेतले की, त्रुटी आपोआपच गौण ठरतात आणि उरतो तो ‘लोकमान्य – एक युगपुरुष’! गांधी-नेहरुंना वाहिलेल्या शालेय पाठ्यपुस्तकांवर पोसलेल्या आजच्या पिढीने चित्रपटगृहात जाऊन आवर्जून पाहायलाच हवे असे उत्तम चित्रशिल्प!!

    *३.५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

    image

  • स्वत:च्याच सापळ्यात अडकलेला : आजोबा

    एखाद्या कादंबरीवर चित्रपट बनवणे ही अतिशय अवघड गोष्ट असते. अवघड अश्या अर्थाने की, ती एकप्रकारची तारेवरची कसरतच असते! काय ठेवायचं, काय कापायचं यासोबतच मूळ लेखकाची दृष्टी आणि आपला दिग्दर्शक या नात्याने असलेला दृष्टीकोन या सगळ्याचा समन्वय साधणे अतिशय जोखमीचे काम असते. या तराजूत तोलल्यास ‘शाळा’ हा अजिबात वेगळा प्रयोग नव्हता. एका चांगल्या पुस्तकाचे पडद्यावर केलेले माध्यमांतर, एवढेच ‘शाळा’बद्दल सांगता येईल. पण मग तरीही ‘शाळा’ का वेगळा वाटतो? काही जण त्याला मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक मैलाचा दगड का समजतात? याचे उत्तर आहे त्याच्या सादरीकरणात. कथा जरी जशीच्या तशी ठेवलेली असली, तरीही त्यातील पात्रे अचूक निभावणारे कलाकार शोधणे, त्यांच्याकडून चोख काम करवून घेणे — जोश्या असणार तर हाच, सुऱ्या हाच, शिरोडकर हिच्यापेक्षा वेगळी नसणारच; हे प्रेक्षकांना वाटायला भाग पाडणे आणि याहूनही अवघड म्हणजे तो आणीबाणीचा काळ उभा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे, या अश्या गोष्टींमध्ये दिग्दर्शक सुजय डहाकेचे खरे कौशल्य होते आणि त्यात तो शतप्रतिशत खरा उतरला होता. अन्यथा ‘शाळा’चाही ‘बीपी’, ‘दुनियादारी’, ‘टाईमपास’ इ. सारखा विस्कोट व्हायला वेळ नसता लागला!

    या पार्श्वभूमीवर सुजय डहाकेंच्या नव्या ‘आजोबा’ चित्रपटाबद्दल अपेक्षा वाटल्या नसत्या तरच नवल! त्यातून तो चित्रपट एका बिबट्याच्या प्रवासाभोवती फिरणारा, अनेकानेक चित्रपट-महोत्सवांनी गौरवलेला! शिवाय एकेकाळी हिंदी चित्रपट गाजवणाऱ्या उर्मिलाचे मराठीत पदार्पण घडविणारा चित्रपट, मराठीत पहिल्यांदाच ऍनिमेशन एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापरलेला चित्रपट. उत्सुकता ताणायला आणि उत्कंठा वाढवायला एक नव्हे तर शेकडों कारणं होती. चित्रपट सुरू झाला व ‘शाळा’च्याच दर्जाची उत्कृष्ट ऍनिमेटेड श्रेयनामावली सरकू लागली आणि मी निश्चिंत झालो. परंतू ही निश्चिंतता काही मिनिटांतच संपली आणि भ्रमाचा भोपळा भसकन् फुटला!

    एका बिबट्याचा वनखात्याने सोडल्यापासून ते आपल्या निवासस्थानी परतेपर्यंतचा प्रवास, ही कल्पनाच किती थरारक आहे! स्वत: दिग्दर्शकानेच अनेकदा याबद्दल सांगितले आहे. परंतू प्रत्यक्षात मात्र या बिबट्याचा जो काही प्रवास दिसतो तो एकतर संगणकीकृत सिग्नल्समध्ये अथवा कार्टूनच्या (ऍनिमेशन नव्हे) माध्यमातून. शिवाय जिथे खरोखरीच ऍनिमेशन वापरलेय, त्यांपैकी कित्येक ठिकाणी त्याचा दर्जा अतिशय सुमार असा आहे. जे अजिबात पाहावत नाही. इथं तुम्ही ‘मराठी चित्रपट आहे, बजेट कमी आहे, मराठीला आपण उत्तेजन दिले पाहिजे’ वगैरे बचाव नाही करू शकत. कारण इतरवेळी आपणच म्हणतो ना की, सिनेमाला भाषा नसते! एकदा बाजारात उतरवलं की, तुमचं उत्पादन दर्जेदारच हवं. तिथे ‘आपलं आहे, घ्या सांभाळून’ असं नाही ना म्हणता येत! एकवेळ ही भावनिकता इतर कुठे दाखवता येईलही, परंतू जो प्रेक्षक काही-शे रुपये खर्चून चित्रपटगृहात येतो, त्याने का ही तडजोड स्वीकारावी?

    बरं एकवेळ तेही चालवून घेऊ. पण मुळात सिनेमाला कथा तरी हवी की नको! कथा हवी, तिला पुढे सरकण्यासाठी एखादा अवघड ता होईना मार्ग असावा. इथे मात्र दिग्दर्शक कधी डॉक्यु-ड्रामा दाखवू इच्छितो, तर कधी पर्यावरण आणि मानवाच्या संघर्षावर भाष्य करू पाहातो, तर कधी या सगळ्याची सामाजिक बाजू दाखवू पाहातो, तर कधी काही वैज्ञानिक बाजू दाखवू पाहातो. आणि अश्या या सगळ्या गोंधळात कथा नावाचा लहानसा जीव कुठे हरवून जातो, तेच कळत नाही. जे काही दाखवलंय, ते इतकं विखुरलंय की, कश्याचाच कश्याला मेळ लागत नाही. कोणत्याही, अगदी कोणत्याही पात्राचा व्यवस्थित पात्र-परिपोषच केलेला नाही. पूर्वा राव (उर्मिला मातोंडकर) ही दाक्षिणात्य आहे, हे कुणीतरी पात्र सांगतं तेवढंच – अन्यथा तिने संपूर्ण चित्रपटभर एकच दाक्षिणात्य शब्द उच्चारलाय. तोही उत्तरार्धात! इतरवेळी ती वाया गेलेली प्रौढा, दारुडी, चेन-स्मोकर, हिस्टेरिक, बायपोलर डिसॉर्डर आणि मल्टिपल पर्सनॅलिटी डिसॉर्डरची रुग्ण इथपासून ते एक अतिशय उथळ आणि डिप्रेस्ड, खेड्यापाड्यांत अंगप्रदर्शन करत फिरणारी एक भंपक बाई इथपर्यंत काहीही वाटू शकते. कथेप्रमाणे काही गोष्टी नाईलाजास्तव कराव्या लागल्यामुळे ती अधून-मधून संशोधिका वाटते एवढंच! बाकी तिची संवादफेक तर अक्षरशः ‘दिव्य’ आहे. बिबट्या जर तिच्यासमोर आला असता ना, तर मूळची मराठी असूनही चायनिज वाटावी अशी मराठी बोलते, एवढ्या एकाच गोष्टीसाठी ते उमदं जनावर नरभक्षक (की नारीभक्षक) झालं असतं! याहून विचित्र गोष्ट म्हणजे बिबट्याचं नाव ‘आजोबा’ असंच का ठेवलं, याची कारणमीमांसा करण्याची दिग्दर्शकाला थोडीशीही गरज भासलेली नाहीये, बोला!! जे काय समजायचं ते आपणच दिग्दर्शकाच्या मुलाखतींवरून समजून घ्यायचं (आणि वरून पैसे खर्चून चित्रपट पाहायलाही जायचं)! कथेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असलेलं यशपाल शर्माचं उपकथानक तर इतकं काही ढीलेपणाने हाताळलंय की, ते लक्षातही राहात नाही. गोष्टी अगदीच उरकून घेतल्याहेत हो! बरं तर बरं, तिथे यशपाल शर्मांसारखा नाणावलेला अभिनेता होता, म्हणून त्याने ते व्यवस्थित निभावलं तरी! पूर्वाच्या इंटर्नची प्रेमकहाणी मात्र अगदीच कथेला विसंगत अशी. अजिबातच आवश्यकता नसलेली. अश्या गोष्टी चित्रपटात का घुसडल्या तेच समजत नाही. तीस दिवसांत एकशेवीस किलोमीटरचा प्रवास, तोही मानवी वस्त्यांमधून करणारा बिबट्या विरुद्ध मनुष्यप्राणी असा एक संघर्ष फुलायला हवा होता. बिबट्या संपूर्ण प्रवासात कुणाही माणसावर हल्ला करत नाही, मनुष्य मात्र सतत या ना त्या प्रकारे त्याला ओरबाडू पाहातोय – कधी शिकारीसाठी तर कधी संशोधनासाठी. या गोष्टी अधोरेखित व्हायला हव्या होत्या, ज्या नेमक्या होत नाहीत. आणि तरीही दिग्दर्शकाचा आव मात्र हा संघर्ष व्यवस्थित चितारल्याचा! आणि यामुळेच, बिबट्या गेल्यावर पात्रांना काही का वाटले असेना, परंतू प्रेक्षकांना मात्र जरादेखील वाईट वाटत नाही. आणखी एका तांत्रिक बाबीकडे लक्ष वेधायचं झालं तर सब-टायटल्सचा दर्जा अतिशय सुमार आहे व त्यात खूप साऱ्या चुकाही आहेत. दिलीप प्रभावळकरांसारख्या सर्वच दृष्टींनी थोर कलाकाराला केवळ तीन-चारच प्रसंगांपुरतं वापरून दिग्दर्शकाने काय मिळवलं, हे देवच जाणे. त्यातून कपडेपट कुणी सांभाळलाय आणि दिग्दर्शक त्यातून काय दाखवू पाहात होता कुणास ठाऊक, परंतू दिवस असो वा रात्र प्रभावळकरांना ‘जंगल के लिए तैय्यार’ अश्याच कपड्यांत दाखवलंय. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात भर रात्री फेल्ट-हॅट घालून फिरतो हा माणूस? का? कश्यासाठी??

    याचा अर्थ ‘आजोबा’मध्ये एकसुद्धा चांगली गोष्ट नाही का? असं अजिबात नाही. ज्ञानोबाच्या भूमिकेचा परिपोषही इतरांसारखाच सुमार असूनदेखील ह्रषिकेश जोशी या गुणी अभिनेत्याने ती भूमिका अतिशय ताकदीने साकारलीये. ज्ञानोबा (सब-टायटल्समध्ये पूर्णवेळ ‘द्यानोबा’ असे लिहून येते) त्याने अक्षरशः  जिवंत केलाय! काय ती त्याची सुरेख शब्दफेक आणि काय तो बिनतोड मुद्राभिनय!! अहाहा!!! जियो,  जियो ह्रषिकेश जोशी, जियो!!! ‘आजोबा’चे छायाचित्रण अतिशय सुरेख आणि दर्जेदार जमून आलेय – अगदी ‘फॅण्ड्री’च्या खालोखाल. त्यासाठी दिएगो रोमेरो यांना दाद द्यायलाच हवी! परंतू ह्रषिकेश जोशींच्या खालोखाल चित्रपटाची सर्वाधिक जमेची बाजू आहे, ती म्हणजे त्याचं पार्श्वसंगीत! साकेत कानेटकर या ताज्या दमाच्या संगीतकाराने अतिशय सुरेख, अर्थवाही आणि तरीही अत्यंत शैलीदार असे पार्श्वसंगीत निर्माण केले आहे. प्रणाम त्यांच्या प्रतिभेला!!

    मराठीतला एक वेगळा प्रयोग म्हणून या चित्रपटाकडे नक्कीच पाहाता येईल! परंतू काही जमेच्या बाजू असल्या तरीही ‘आजोबा’ एक सिनेमा म्हणून प्रभाव पाडण्यात कमी पडतो, असेच म्हणावे लागेल. ‘एका बिबट्याचा एकाकी प्रवास’ ही कल्पनाच दिग्दर्शकाला इतकी थरारक वाटलेली दिसतेय, की त्याभोवती कथेची गुंफण करण्याचे भानच त्यांना राहिलेले नाही. त्यामुळे तयार झालाय एक विसविशीत आणि कमालीचा ढीला चित्रपट! आपल्याच जाळ्यात अडकून जेरबंद झालेला ‘आजोबा’!!

    *२.५/५

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

    image

  • अंतरात्म्यात कळ उठवणारा — हायवे

    अंतरात्म्यात कळ उठवणारा — हायवे

    आज पहिल्यांदाच असं होतंय की मी एखाद्या चित्रपटाबद्दल लिहायला बसलोय, डोक्यात खूप वाक्यंही फिरतायत — हे सांगावं, ते सांगावं.. पण नेमकी सुरुवातच सुचत नाहीये. जिथे म्हणून कुठे सुरुवात करावीशी वाटतेय, तो प्रत्येकच मुद्दा शून्यवत् वाटतोय; मी जो अनुभव शब्दबद्ध करू पाहातोय, त्यापुढे साधा वाटतोय. एखादी कलाकृती पाहिली की कधीकधी काळजात सण्णकन् कळ उठते आणि तोंडातून आपसूकच ‘वाह..’ बाहेर पडते, परंतू क्वचितच असं होतं की, उठणारी कळ काळजातून न येता थेट आत्म्यातून येते आणि मग नकळतच त्या वेदनेला आवाज देणं ही गरज होऊन बसते. अशीच काहीशी विचित्र अवस्था “हायवे” पाहून झालीये माझी.

    एका प्रथितयश व्यावसायिकाच्या पोरीचे अपहरण होते आणि काही दिवसांतच तिला तिच्या जगापेक्षा त्या अपराध्यांचं जग आणि ते अपहरणकर्ते हवेहवेसे वाटू लागतात. किती साधीशी कल्पना. तद्दन फिल्मी! परंतू खरं सांगू? कोणतीही कलाकृती अभिजात ठरायची असेल, तर मुळात ती साधीशी असणं हेच फार महत्वाचं परिमाण असतं. खरं सौंदर्य अवडंबरात नसून निखळ साधेपणातच असतं! आणि हो, खरं स्वातंत्र्य हे बंधनातच असतं!  हेच इम्तियाज अलीचा “हायवे” सिद्ध करतो. मुळात या माणसाला अशी कथा पडद्यावर साकारावीशी वाटलीच कशी, हा मला पडलेला प्रश्न आहे — कारण, आजच्या इंस्टंट जमान्यात काहीतरी साधंसोपं आणि तरीही अंतर्मुख करून सोडणारं काही पाहायची सवयच उरलेली नाहीये आम्हाला. मग का वीरा त्रिपाठीचा (आलिया भट) प्रवास आमच्यासमोर मांडतोस बाबा? का टोचणी लावतोस? का आमच्या आजूबाजूच्या जगाचा खोटारडा बुरखा फाडतोस? कश्यासाठी? मी वाचलंय की, इम्तियाजला या चित्रपटाद्वारे त्याच्या करियरची सुरुवात करायची होती. मग का इतका वेळ लावलास भाऊ? आता या चित्रपटापुढे तुझे (फक्त तुझेच नव्हे, तर बऱ्याच तथाकथित महान दिग्दर्शकांचे बरेचसे!) इतर सारेच चित्रपट निष्प्रभ वाटू लागलेत की रे! आता याला जबाबदार कोण? सिनेमातून अध्यात्म मांडायला माझी काहीच हरकत नाही रे बाबा, पण ते इतकं अंगावर येणारं — संवेदनांच्या थोबाडीत मारणारं..? असा कॅमेरा वापरावा? असं संपादन करावं? अरे इतकं चांगलं असं काही पाहायची — तेही मुख्य प्रवाहातील व्यावसायिक चित्रपटांत — सवय नाही रे आम्हाला.. आम्ही आपली ठरवून काही ठरलेल्या चित्रपटकारांच्या कृतीला चांगले म्हणणारी दांभिक माणसं.. तू मात्र सगळ्या व्याख्याच बदलून टाकतोयस आमच्या!

    सरळसोट पाहायला गेलं तर महाबीर भाटी (रणदीप हुडा)  आणि त्याच्या टोळीने वीरा त्रिपाठीचं अपहरण केलंय आणि ते लपतछपत वेगवेगळ्या राज्यांतून पळतायत. जुगनी — मोठा सुरेख शब्द वापरलाय ईर्शाद कामिलने — त्या जुगनीला अपह्रत करून आपणही या दुनियादारीत असेच लपतछपत फिरत असतो की! सुरुवातीला भीतीच्या छायेत वावरत निमूटपणे ते नेतील तिकडे जाणाऱ्या वीराच्या मागे हे अपहरणकर्तेच कसे आणि कधी गुपचुप चालू लागतात समजतही नाही. हळूहळू टोळीतला एकेक सदस्य गळू लागतो आणि अखेरिस उरतात दोघेच — वीरा आणि महाबीर! हा जितका वीराच्या आत्मबोधाचा प्रवास आहे, तितकाच तो महाबीरचाही आहेच ना! वीराला जशी आत्मिक स्वातंत्र्याची ऊर्मी आहे तितकीच अवघ्या जगाला गरीब-श्रीमंत भेदात तोलणाऱ्या आणि साऱ्या दुनियेला पाण्यात पाहाणाऱ्या महाबीरलादेखील आईच्या ऊबदार कुशीची लालसा आहे. एकदा का मोकळा श्वास अनुभवला की, वीराचा शोध संपेल आणि एकदा का ती मायेची ऊब अनुभवली की, महाबीरचाही! कोण कुठला तो अनोळखी महाबीर पण त्याला आपल्या लहानपणी घडलेला, मनाच्या डोहात खोलवर बुडवून टाकलेला प्रसंग सांगावासा वाटतो वीराला. आणि घर सांभाळणारी वीरा पाहून तीन खून पचवलेला महाबीर कसल्याश्या अनामिक वेदनेने हुंदके देत ढसढसा रडतो — शरीराने तिला बिलगतो पण तोंडाने मात्र ‘अम्मा.. अम्मा..’ म्हणतो. सतत जवळ बाळगलेली बंदुकही फेकून देतो. तीदेखील कित्येकदा संधी मिळूनही परत जात नाहीच ना! पण अखेरिस..

    महाबीर वीराला म्हणतो, घरी निघून जा तुझ्या. ती ऐकत नाही. तो विवश होतो. चिडून ओरडतो, ‘तो क्या करेगी मेरे साथ रहके? शादी करेगी? बच्चे पालेगी मेरे”? ती प्रांजळपणे सांगते, “शादी का कोई प्लान नहीं हैं. बच्चे पालनेकाभी नहीं. बस चाहती हूँ ये थोडा और चले.. थोडा और..”. आणखी एका प्रसंगात ती म्हणते, ‘जिथून तू मला आणलंस तिकडं परत जायचं नाहीये मला आणि जिकडे कुठे घेऊन चाललायस तिकडं पोहोचायची इच्छा नाहीये. असं वाटतं हा प्रवास कधी संपूच नये”. कदाचित तिच्या जगातल्या लांडग्यांपेक्षा हा भयावह आणि कठोर वाटणारा पण प्रत्यक्षात माणूसकीचा खळाळता झरा असणारा महाबीरच तिला आश्वासक वाटला असेल. नाहीतरी तिचा होणारा नवरा असंबद्ध बडबडत पळूनच गेला होता ना? आणि इकडे अपहरण करणारा महाबीर मात्र तिचं सतत रक्षण करत होता. न बोलता, न अवडंबर माजवता. त्याच्या टोळीतला एकजण तिच्यावर अतिप्रसंग करू पाहातो, त्यावेळचं महाबीरचं समतोल वागणं आणि रणदीपचा तो अभिनय खरोखरच जबरदस्त!

    आलिया भटबाबत मी कधी हे लिहीन असं खरंच वाटत नाहीये, पण पोरीने नैसर्गिक अभिनयाची परिसीमा गाठलीये. आणि रणदीप हुडानेही अगदी कायच्याकाय कमाल अभिनय केलाय! मात्र यात पुन्हा इम्तियाज अलीचेच कौतुक करावेसे वाटतेय की त्याने निवडलेले हे दोघेही त्या त्या भूमिकेसाठी इतके योग्य आहेत की बहुधा त्यांना वेगळं काही करावंच लागलेलं नाहीये. इतकी परिपूर्ण पात्रयोजना मी गेल्या कित्येक वर्षांत पाहिलेली नाही. आणि हो, चित्रपटात दाखवलेली ती ६ शहरंदेखील मुख्य पात्रांइतकीच महत्वाची आहेत बरं का! अर्थात नाही म्हणायला गालबोट म्हणून एक गोष्ट खटकते ती म्हणजे इम्तियाजची वीरा खूपश्या ठिकाणी गीतच (जब वी मेट) वाटते. पण इतक्या सुंदर कलाकृतीला अश्या शेकडो त्रुटी (चुका नव्हेत!) माफ आहेत!

    संगीताबाबत काय बोलू? रहमान तर देवच आहे खरोखर. चित्रपटातल्या गीतांसाठी इतक्या सुरेख जागा असू शकतात यावर विश्वासच बसत नाही. त्याचबरोबर रहमान अनेकदा चित्रपटापेक्षा इतका मोठा होतो की, काही सन्माननीय अपवाद वगळता कुणीच त्याच्या संगीताला पडद्यावर न्याय देऊ शकत नाही; ही मला गेली कित्येक वर्षं सलणारी तक्रार “हायवे”ने पार धुवून टाकलीये! आणि पार्श्वसंगीत.. ती तर प्रत्यक्ष चित्रपटगृहातच अनुभवण्याची — त्या स्वर्गीय लाटांत हरवून जाण्याची बाब आहे! अर्थात यात रेसूल पोकुट्टीच्या दैवी ध्वनिसंयोजनाचाही अतिशय महत्वाचा वाटा आहे. परंतू कित्येक प्रसंगांना पार्श्वसंगीतच न देऊन रहमानने त्यांची खोली अधिकच वाढवलीये — अभिव्यक्ती अधिकच गडद केलीये! शिवाय रहमानभक्तांसाठी बातमी म्हणजे चित्रपटात ‘माही वे’मध्ये काही वेगळ्याच ओळी आहेत आणि ‘तू कुजा’चं तर थेट ‘मेल व्हर्जन’च आहे!

    असो. लेख अपेक्षेपेक्षा खूपच मोठा होतोय. पण तरीही प्रामाणिकपणे सांगतो की, या चित्रपटाचं श्रेष्ठत्व एक टक्काही मांडता आलेलं नाहीये मला. खरोखर यावर्षीच्या चांगल्या चित्रपटांच्या यादीत “हायवे”चं नाव निश्चितच खूप वर असेल! चित्रपटगृहात जाऊन पाहावा, एकदा नव्हे तर पुन्हापुन्हा पाहावा, अनुभवावा — असा चित्रपट!!

    *४.७५/५

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी क्लिक करा – www.vikramedke.com)

  • सौंदर्यदृष्टीची सद्गुणविकृती: राम-लीला

    स्वा. सावरकरांनी मानवी स्वभाव स्पष्ट करणारी एक जबरदस्त संकल्पना मांडलीय – सद्गुणविकृती! अर्थात सद्गुणांचाही जर एका मर्यादेपलिकडे अतिरेक झाला तर ते वाईटच. त्यातून विकृतताच उभी राहाते. सिनेमा क्षेत्रात या संकल्पनेचे चपखल उदाहरण आहे – संजय लीला भन्साळी! कमालीच्या सौंदर्यदृष्टीने चित्रीकरण करणारा हा माणूस केव्हा त्या सौंदर्यदृष्टीच्या अतिरेकात आणि अट्टाहासात हरवून जातो, त्याचे त्यालाही कळत नाही. एरव्ही व्यवस्थित ठिकाणी घडणारी कथा त्याला भव्यातिभव्य सेट्सवरच (तेही चित्रविचित्र रंगांच्या!) का घडायला हवी असते तेच कळत नाही. मोठमोठे सेट्स आणि पात्रांच्या साध्यासाध्या प्रसंगांतही प्रमाणबद्ध हालचाली कथेला मारून टाकतात आणि उरतो फक्त एक मोठ्ठा डोलारा! सद्गुणविकृती, दुसरं काय!

    अगदी हेच “राम-लीला”च्याही बाबतीत घडलंय. मुळात “रोमिओ-ज्युलिएट” ही कथा चावून चोथा झालेली. अगदी हिंदी सिनेमातच या कथेचा गेल्या २ वर्षांत तब्बल ३ वेळा रिमेक झालेला (इशकजादे, इसक आणि राम-लीला)!! तीच जुनी ‘खानदानी दुश्मनी’ची कथा घेऊन त्याला गुजरातच्या खेड्यांत एकेकाळी अस्तित्वात असलेल्या माफिया-राजची फोडणी द्यायची, त्यात दर पाच मिनिटांनी एक गाणे टाकायचे आणि हे सारेच्या सारे प्रकरण भल्यामोठ्ठ्या सेट्सवर(च) चित्रित करायचे; की झालीच भन्साळींची ‘राम-लीला’ तयार! बरं, चित्रपट इतका मोठा आहे की, त्याचा शोकांत होत असताना प्रेक्षकांना वाईट वाटण्याऐवजी सुटकेची भावना वाटते हो!! चित्रपट चालू असताना मला स्वत:लाच कित्येकदा एकदाचं ‘राम’ आणि ‘लीला’ला मारून टाकावं आणि सगळा किस्साच संपवून टाकावा असं वाटून गेलं..!

    हा झाला एक भाग. परंतू कथा घडताना कुठेतरी, काहीतरी तर्कशास्त्र हवं की नको? ‘राम’ आणि ‘लीला’ एकमेकांना पाहातात आणि दुसऱ्याच क्षणी रोमान्स करायला लागतात. तोही शारिरीक! हा काय प्रकार आहे बुवा? म्हणजे एखादं लहान बाळ पहिल्याच भेटीत अगदी आनंदाने आपल्या कडेवर आलं की, त्याची आई कशी म्हणते – ‘ओळख लागत नाही हो आमच्या शोन्याला, लगेच झेपावतो’! अगदी तस्संच!! नायक आणि नायिका आहेत म्हटल्यावर ते एकमेकांच्या प्रेमात पडलेच पाहिजेत, त्यासाठी कारण कश्याला हवं; या अश्या प्रेक्षकांना गृहित धरण्याच्या वृत्तीपायी व्यक्तिरेखा कच्च्याच राहून गेल्यायत. याचा सगळ्यात जास्त फटका बसलाय तो ‘राम’च्या व्यक्तिरेखेला. त्याची व्यक्तिरेखा सर्वाधिक विखुरलेली झालीये. त्यामुळे जिथे त्याने शांत राहाणे गरजेचे असते तिथे तो तलवार उपसून धावतो तर जिथे नायकत्व दाखवायला हवे तिथे उगाचच शांत राहातो वा रडतो-भेकतो! असाच प्रकार ‘लीला’च्याही बाबतीत झालाय, परंतू दिपिकाने आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर व्यक्तिरेखेतली ही कमतरता सहज लपवलीय. बरं रणबीरच्या लकबी पाहा, दिपिकाची एन्ट्री पाहा – कश्याची आठवण येते? ‘हम दिल दे चुके सनम’मधल्या सलमान-ऐश्वर्याची? बरोब्बर!! हेच पाहायचं होतं तर आम्ही तोच चित्रपट परत पाहू ना. पैसे खर्चून ‘हे’ का पाहावं? एक दिग्दर्शक म्हणून भन्साळीत येत असलेला हा तोच-तोचपणा वाईट आहे. नि:संशय ते सारं पडद्यावर सुंदर दिसतं. पण अर्थपूर्ण आहे का, तर अजिबातच नाही! पुन्हा सद्गुणविकृती!!

    अभिनयाच्या पातळीवर सर्वाधिक कमाल केलीये ती सुप्रिया पाठकने! संतोकबेन जडेजापासून प्रेरित वाटणारी ही ‘बा’ची व्यक्तिरेखा तिने इतकी जबरदस्त उभी केलीये की, तिची स्तुती करायला माझ्याकडे शब्दच नाहीत! त्याखालोखाल आहे ती दिपिका. किंबहुना दिपिकाचा अभिनय नसता, तर चित्रपट सहन करणं अशक्यच होतं. रणबीरनेही अतिशय उत्तम काम केलंय. पण तो दिपिकासारखा व्यक्तिरेखा-लेखनातील उणीवांवर मात करू शकलेला नाहीये, हे उघड आहे. लहानश्याच भूमिकांमध्ये अभिमन्यू सिंग, रिचा चड्ढा, बरखा बिष्ट, शरद केळकर ही मंडळी प्रभाव टाकून जातात. परंतू मुळातच कथेच्या पातळीवर एवढी मोठ्ठी बोंब आहे की, कुणाचाही अभिनयाविष्कार चित्रपटाला समर्थनीय ठरवू शकलेला नाहीये. भन्साळीचे एकाच बाबतीत कौतुक करावेसे वाटतेय, ते म्हणजे ‘संगीत’! चित्रपटाचे संगीत खरोखर चांगले आहे.

    चित्रपटात काही तुरळक चांगले क्षणही आहेत. उदा. – गोळ्यांच्या तालावर केलेला ‘भाई-भाई’ गरबा, अभिमन्यू सिंग आणि शरद केळकरच्या मृत्यूचा प्रसंग, ‘लीला’चे बोट कापण्याचा प्रसंग वगैरे. परंतू चित्रपटाच्या लांबीच्या मानाने अश्या प्रसंगांची संख्या अगदीच कमी आहे.

    ‘राम-लीला’ करणारे पिढीजात कलावंत असतात. आणि ‘जेनो काम तेनो थाये, दूजा करे सो गोता खाये’ ही म्हण आपण सर्वांनीच ऐकलीय. भन्साळींनी ‘राम-लीला’द्वारे तीच म्हण पुन्हा एकवार सिद्ध केलीये. त्यामुळेच उत्तम चित्रपट बनवण्याची क्षमता असलेल्या भन्साळींचा हा प्रयत्न सौदर्यदृष्टीच्या सद्गुणविकृतीचे एक उदाहरण तेवढे बनून राहिलाय..!

    * २/५.

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या – www.vikramedke.com)

    image