Author: Vikram Edke

  • एरर्समधून चालणारी ट्रायल – ट्रायल अँड एरर

    एरर्समधून चालणारी ट्रायल – ट्रायल अँड एरर

    डॉक्युमेंटरी अथवा माहितीपट हा प्रकार आपल्याला ऐकून आणि पाहून चांगलाच परिचित आहे. जेव्हा डॉक्युमेंटरी हा प्रकार कथाकथनाचे साधन म्हणून मांडला जातो, तेव्हा मात्र त्यातून फिल्ममेकिंगची एक वेगळीच शैली निर्माण होते, त्या प्रकाराला म्हणतात मॉक्युमेंटरी, अर्थातच मॉक-डॉक्युमेंटरी! तसं बघायला गेलं तर डॉक्युमेंटरी आणि मॉक्युमेंटरी यांच्यात फारसा फरक नसतोच. बऱ्याचशा डॉक्युमेंटरीज या एखाद्या विशिष्ट विचारसरणीला वाहून घेतलेल्या, काय निष्कर्ष काढायचाय हे आधीपासूनच पक्के ठरवून असलेल्या आणि त्याच दृष्टीने सबंध मांडणी करणाऱ्या असतात, हे उघड गुपित आहे. फक्त त्या आपल्या झुकावाला निष्पक्षतेचा बेमालूम मुखवटा चढवतात. तर मॉक्युमेंटरीमध्ये कथावस्तूपासून पात्रांपर्यंत सगळेच नकली असते. त्या अनुषंगाने बघायला गेलं तर बऱ्याचशा मॉक्युमेंटरीज या डॉक्युमेंटरीजपेक्षा जास्त प्रामाणिक ठरतील!

    मॉक्युमेंटरी हा प्रकार आपल्याला काही अगदीच अपरिचित आहे असंही नाही. ‘बोराट’ (२००६) सारख्या चित्रपटांतून आणि ‘द ऑफिस’सारख्या (२००१-०३) मालिकांमधून तो आपल्याला चांगलाच माहिती झालाय. याच मॉक्युमेंटरी नामक प्रकाराला दिलेली ‘फिश-आऊट-ऑफ-वॉटर’ जॉनरची फोडणी म्हणजे अमेझॉन प्राईमवर असलेली ठसकेबाज, खटकेबाज, खुमासदार चुरचुरीत आणि तुफान विनोदी मालिका, अर्थातच एरर्समधून चालणारी ट्रायल, “ट्रायल अँड एरर” (२०१७-१८)!

    कायदा हा अत्यंत सूक्ष्म असतो. कायदा म्हणजे भावनेच्या पल्याड जाणारी वस्तुनिष्ठता आणि अत्यंत धारदार तर्कशास्त्र. परंतु जर एखाद्या न्यायप्रविष्ट केसमध्ये वरपासून खालपर्यंत सगळेच वस्तुनिष्ठतेपासून कोसो दूर आणि तर्कशास्त्र औषधालाही ठाऊक नसलेले असतील तर? या वाक्यानंतर जर तुम्हाला चटकन भारतातल्या काही केसेस आठवल्या, तर ते या उपहासगर्भ मालिकेचे यशच समजा!

    जॉश सीगल (निकोलस डि’अगस्तो) हा अमेरिकेतील एका प्रतिष्ठित फर्ममध्ये काम करणारा तरुण, तडफदार वकील. त्याला त्याच्या आयुष्यातील पहिलीवहिली खुनाची केस एकट्याच्या बळावर चालवायची संधी मिळते. वाचायला सारं कसं मस्त वाटतं ना? पण ते तसं नसतं, म्हणूनच तर मालिका बनते! हा तथाकथित खून झालाय ईस्ट पेक या साऊथ कॅरोलिनातील एका छोट्याशा (आणि अर्थातच काल्पनिक!) गावात. या गावचे राहणीमान आणि जगण्याच्या पद्धती न्यूयॉर्कच्या तुलनेत आकाश-पाताळाचा फरक म्हणावा एवढ्या भिन्न आहेत. ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे तो जॉशचा अशिल लॅरी हेंडरसन (जॉन लिथ्गो) हा स्वतःला अजाणतेपणी दोषी दाखवायला कणभरही कसर सोडत नाहीये. त्याची अत्यंत क्यूट मुलगी समर (क्रिस्टा रॉड्रीग्ज) भलतीच बेभरवशी आहे. जॉशचा मुख्य तपास अधिकारी व भूतपूर्व पोलिस अधिकारी ड्वेन रीड (स्टिव्हन बॉयर) हा अव्वल नंबरचा मूर्ख आणि वेंधळा माणूस आहे. जॉशची मदतनिस अॅन फ्लॅच (शेरी शेफर्ड) हिला जगभरचे, सगळ्या प्रकारचे अत्यंत दुर्मिळ आजार आहेत आणि ती सुद्धा मंदच आहे. स्वतः जॉश सुद्धा त्याच्या अननुभवीपणामुळे मूर्खांतच गणना व्हावी असा आहे, फक्त त्या गावात तो जरासा वासरांत लंगडी गाय आहे, एवढंच. दुसऱ्या पर्वात नवीन केसमध्ये आरोपी म्हणून लॅरी हेंडरसनची जागा गावातील सर्वाधिक प्रतिष्ठित, सर्वांची लाडकी लविनिया पेक-फॉस्टर (क्रिस्टिन चेनोवेथ) घेते.

    एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे या गटात न बसणाऱ्यांच्या गटाच्या विरोधात आहे असिस्टंट डिस्ट्रिक्ट अॅटर्नी कॅरोल अॅन कीन (जेमा मेज). ही केस जिंकून डिस्ट्रिक्ट अॅटर्नी बनण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तिची तयारी आहे. वेळप्रसंगी ती तिची परिस्थिती, लिंग, वय, रूप यांच्यापैकी कशाचाही वापर करून व्हिक्टिम कार्ड खेळायलाही मागेपुढे पाहात नाही. तिला जॉशमध्ये भयंकर रस आहे, पण तो रस मान्य करायला एक तर तिचा अहंकार आडवा येतोय आणि दुसरे म्हणजे भावना-बिवनांसारख्या फालतू प्रकारांना ती आपल्या महत्त्वाकांक्षेच्या आड येऊ देऊ इच्छित नाही. थोडक्यात उपरोक्त गटाचा सामना एका अत्यंत धूर्त विरोधकाशी आहे. यातून शेवटी काय होते हे सर्वार्थाने उत्कंठा वाढविणारेच आहे! मी बिंज-वॉचिंगवर अजिबातच विश्वास ठेवत नाही, पण ही मालिका प्रत्येक भाग अशा काही मस्त वळणावर संपवते की, मी अक्षरशः दिवसाला एक सीझन उडवला!

    सबंध कथा ही आपल्यासमोर माहितीपटाच्या स्वरूपात, विविध छोटेखानी प्रश्नोत्तरी, ऑफ द रेकॉर्ड विचार आणि ऑन द रेकॉर्ड कृती इ. माध्यमातून उलगडते. “ट्रायल अँड एरर”मध्ये मॉक्युमेंटरी हा प्रकार केवळ गिमिक म्हणून नाही, तर ते त्यांचे खऱ्या अर्थाने बलस्थान आहे. कारण, त्यातून निर्माण होणारा विनोद हा अत्यंत सहज, खळखळून हसवणारा आहे; आजकालच्या स्टँडअप कॉमेडीसारखा वांझोटा व फुसका नाही. दोनच सीझन्स आहेत या मालिकेचे परंतु त्यात इतके ट्विस्ट्स आहेत की जितके कदाचित सबंध “गेम ऑफ थ्रोन्स”मध्येदेखील (२०११-१९) नसतील. विशेषतः दुसऱ्या सीझनमध्ये तर निम्मा सीझन संपल्यानंतर सबंध केसच उलटी फिरते, तेव्हा ही बाब अजूनच जास्त जाणवते. गंमत म्हणजे मालिकेत जागोजागी भरपूर फोरशॅडोईंग आहे. एका सीझनमध्ये तर पहिल्याच भागात गंमती-गंमतीत ते खरा खुनी कोण हे सांगून टाकतात आणि तरीही अखेरच्या भागापर्यंत आपलं तिकडे लक्षही जाऊ नये याची पुरेपूर काळजी घेतात! कामंही सगळ्यांनी असली भारी केलीयेत की, काय सांगू! जॉन लिथ्गो हा तर आपले नाणे खणखणीत वाजवलेला अभिनेता आहेच, परंतु शेरी शेफर्ड या अभिनेत्रीने अशी काही खतरनाक धमाल केलीये की विचारता सोय नाही. त्या खालोखाल स्टिव्हन बॉयर भन्नाट मजा आणतो.

    अशी सगळ्यांच बाजूंनी जमून आलेली भट्टी दोनच सीझनमध्ये थंड पडली कारण, चॅनेलची अवकृपा. एनबीसीने तिसऱ्या सीझनसाठी ऑप्शन रिन्यू केलाच नाही. वॉर्नर ब्रदर्स आता दुसऱ्या वाहिनीकडे प्रयत्न करताहेत असे समजते. ते होईल किंवा होणारही नाही, परंतु दरम्यान हे दोनच सीझन्स मालिकेने ज्या दणक्यात मांडलेयत त्याला तोड नाही. मालिका भारीच आहे, फक्त अजून काही काळ चालू शकली असती तर श्रेष्ठांच्या यादीत समाविष्ट होऊ शकली असती एवढंच. पण विचार करा ना, एक सीझन एक केस आणि त्या एका केसचं माहितीपटाच्या माध्यमातून मांडलेलं प्रहसन व त्यातून निर्माण केलेला सशक्त विनोद, हा प्रकारच भारतीय मालिकांच्या डबक्यासाठी केवढा आवाक्याबाहेरचा वाटतो. आमचे अजून वाहिन्यांवरील सासू-सून, कौटुंबिक वाद, विवाहबाह्य संबंध, हजारो एपिसोड्स ताणलेली पांचट कथा आणि वेबवरील कंटेंटच्या नावाखाली सॉफ्टपॉर्न, राजकीय अजेंडा असे दुहेरी ग्रहणच सुटलेले नाही व नजिकच्या भविष्यात सुटण्याची शक्यताही नाही. परंतु जगात असेही काहीतरी छान होते हा विचार पुन्हा पुन्हा पक्का करणारी, नवी आशा देणारी ‘ट्रायल अँड एरर’ मालिका, तिच्यात थोडेसे मांडणीच्या पातळीवर एरर्स असले तरीही आवर्जून ट्राय करावी अशीच आहे!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • मौन के महाद्वीप

    मौन के महाद्वीप

    निशा थी
    चन्द्रमा था
    झील के तीर पर
    तुम थी, मैं था
    किन्तु दोनों के मध्य
    तब भी थे मौन के द्वीप
    कुछ नि:श्वासों की दूरी पर
    और कुछ शब्दों के समीप
    वे द्वीप यदि लाँघ पाते
    संकोच के बाँध यदि तोड पाते
    कथा कुछ अन्य मोड लेती
    कविता विरह की उँगली छोड देती
    विचारों-विचारों में रात्रि ढल गयी
    अधरों तक आयी बात, टल गयी
    निशा, चन्द्रमा तथा झील
    तीनों अब भी वहीं है
    नहीं है तो केवल मैं और तुम
    या है कदाचित किसी और समयधारा में
    इस आयाम में तो मौन के द्वीप सम्भवत:
    अब महाद्वीप बन गए है

    — © विक्रम श्रीराम एडके

  • रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव

    रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव

    आज विजयादशमी. आजच्याच दिवशी प्रभू श्रीरामांनी राक्षसराज रावणाचा संहार केला. पण हा संहार नेमका केला कसा? काय अस्त्र वापरलं? रावणाच्या मृत्यूच्या क्षणी नेमकं काय घडलं? समकालीन वाल्मिकींनी रामायणात या बद्दल सविस्तर लेखन केलं आहे.

    वाल्मिकी लिहितात, राम आणि रावणामध्ये द्वैरथ युद्ध झाले (युद्धकांड, स. १०७, श्लो. १). दोन्ही बाजूचे सैन्य लढायचे सोडून त्यांचेच युद्ध पाहात बसले (तत्रोक्त २). राम आणि रावण दोघांनाही स्वतःच्या विजयावर पूर्ण विश्वास होता (७). रावणाने त्वेषाने रामाच्या रथावरील ध्वज तोडण्यासाठी बाण चालवले, पण तो असफल झाला (९). रामानेही उट्टे काढण्यासाठी महासर्पासारखा असह्य व ज्वलंत बाण रावणाच्या ध्वजावर सोडला. हा बाण नेमका रावणाचा ध्वज फोडून जमिनीत जाऊन रुतला (१२). या प्रकाराने चवताळलेला रावण रोषपूर्वक बाणांचा वर्षावच करू लागला. त्याने रामाच्या घोड्यांचा वेध घेतला. पण त्यांच्यावर विशेष काहीच परिणाम झाला नाही (१६). यानंतर तर रावणाने अजूनच चिडून जाऊन बाणांसोबतच गदा, चक्र, परिघ, मुसळ, पर्वतशिखर, वृक्ष, शूल, परशू यांचा वर्षाव करायला प्रारंभ केला (१७-१८). वाल्मिकी लिहितात, रावणाने अजिबातच न थकता (अश्रान्तह्रदयोद्यम:) सहस्रावधी बाण चालवले. याला उत्तर म्हणून रामानेही शतसहस्रावधी बाण सोडले (२२). दोन्हीकडून चाललेल्या या वर्षावाने सबंध आकाश भरून गेले होते, इतके की श्वास घ्यायलादेखील जागा शिल्लक राहिली नाही (२६). दोन्हीकडचे बाण एकमेकांवर आपटून जमिनीवर पडू लागले (२५). दोघांनीही एकमेकांचे घोडे जखमी करून टाकले (२७).

    हा रोमहर्षक संग्राम सुरू असताना एक मुहूर्त (मुहूर्तमभवद्) म्हणजे अठ्ठेचाळीस मिनिटं उलटली (२८).  दोघांचे सारथीदेखील निष्णात होते. ते कधी रथाला गोल फिरवित, तर कधी सरळ नेत, कधी पुढे जातोय असं दाखवून एकदम मागे आणत तर कधी माघार घेतोय असं दाखवून पुढे नेत (३१-३२). राम आणि रावण दोघेही एकमेकांवर वार करण्यात काही एक कसर सोडत नव्हते. दोघांचेही रथ आता जणू काही भरलेल्या मेघासम (जलदाविव) दिसू लागले होते (३३-३४). आता दोन्हीही रथांचे जू एकमेकांना भिडले होते, पताका एकमेकींना स्पर्शू लागल्या होत्या (३५-३६). रामाने चार बाण मारून रावणाच्या घोड्यांना मागे ढकलले (३६-३७). त्यामुळे तळतळलेल्या रावणाने अनेक बाण चालवून रामाला जखमी करून टाकले (३७-३८). रामाने चेहऱ्यावर कोणतीच पीडा दाखवली नाही. रावणाने ताबडतोब रामाचा सारथी मातलीला लक्ष्य केले, अर्थात मातलीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही (३९-४०). आता मात्र रामाच्या क्रोधाला पारावार राहिला नाही (४१-४२). राघवाने बाणांचे जाळेच (शरजालेन), अर्थात बाणांचा समूहच सोडून रावणाला माघार घ्यायला (विमुखं रिपुम्) लावली (४१-४२). रघुनाथाने रावणावर वीस, तीस, साठ, शेकडो, हजारो बाण सोडले. त्यावर रावणाने बाणांचा वर्षाव केला (४२-४४). पुन्हा एकवार भयंकर युद्ध सुरू झाले. त्या तुंबळ युद्धाला पाहून अप्सरा आणि गंधर्वदेखील म्हणू लागले, ‘रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव’! (५२).

    त्यानंतर रघुकुळाची कीर्ती वाढवणाऱ्या रामाने धनुष्यावर एक विषारी बाण चढवला आणि रावणाचे मुंडकेच उडवून टाकले (५३-५४). पण काय आश्चर्य, त्या जागी ताबडतोब दुसरे मस्तक दिसू लागले. रामाने ते सुद्धा अविलंब धडावेगळे केले. हा प्रकार शंभरदा घडला. जणू काही या गोष्टीला काही अंतच नव्हता (५६-५८). हे असे महाभयंकर रणकंदन रात्र न् दिवस चालले (६५-६६). आता मात्र राम काळजीत पडला (५९).

    रामाला काळजीत पडलेला पाहून मातली म्हणाला, ‘हे वीरवर तुम्ही काय त्याच्या हल्ल्यावर केवळ प्रतिहल्ला करत आहात? त्याच्यावर ब्रह्मास्त्र चालवा. रावणाच्या विनाशाची घडी समीप आलीये’ (युद्धकांड, स. १०८. श्लो. १-२). मातलीच्या या सांगण्यावरून रामाने फुत्कारणाऱ्या सापासारखा एक तेजस्वी शर हाती घेतला. हे तेच अमोघ ब्रह्मास्त्र होते जे ऋषींनी (गीताप्रेसच्या प्रतीनुसार अगस्त्य ऋषींनी) रामाला दिले होते. हे अस्त्र पूर्वी ब्रह्माने त्रिलोकजयकांक्षी इंद्राला अर्पण केले होते (तत्रोक्त ३-५).

    तो बाण कसा होता? वाल्मिकी लिहितात, त्या बाणात वायूचा वेग, त्याच्या फाळात आग आणि सूर्य, त्याच्या रचनेत आकाश आणि त्याच्या जडपणात मेरू-मंदराचलांची प्रतिष्ठापना केली होती. तो सर्व भूतमात्रांच्या तेजाने बनलेला, सूर्यासारखा जाज्वल्य होता. तो स्वर्णभूषित, सुंदर पंखांचा, प्रलयाग्निच्या धूरासारखा भयंकर, दीप्तिमान, सापासारखा विषारी, माणसं, हत्ती व घोडे यांना भेदणारा व चपळ होता. दरवाजे, परिघच काय तर पर्वतांनाही भेदण्यास तो सक्षम होता. त्याचं सबंध शरीर रक्त, मेदात न्हायल्यासारखं सुदारुण होतं. तो वज्रासमान दिसणारा, मोठ्ठा आवाज करणारा व शत्रूंची झुंडच्या झुंड नष्ट करणारा होता. तो सगळ्यांना छळणाऱ्या, फुत्कारणाऱ्या सापासारखा भयंकर होता. कावळे, गिधाडं, बगळे व जंबुक इत्यादींना नित्य भक्ष्य प्रदान करणारा, साक्षात यमराजाचेच रूप होता! (६-११)

    असा तो सायक महाबली रामाने वेदोक्त विधीपूर्वक धनुष्यावर चढवला. त्यासरशी सर्व प्राणी संत्रस्त झाले व धरती दोलायमान होऊ लागली. अत्यंत चिडलेल्या रामाने मोठ्या ताकदीने प्रत्यंचा खेचली व तो बाण रावणावर सोडला. वज्रधारी इंद्राच्या हातून सुटलेल्या दुर्धर्ष वज्रासारखा तो बाण रावणाच्या छातीवर जाऊन आदळला! त्याचा वेग एवढा प्रचंड होता की तो रावणाची छाती फोडून, ह्रदय भेदून, रुधिराक्त असा जमिनीत जाऊन रुतला!! रावणाच्या निष्प्राण हातांतून धनुष्य व बाण गळून पडले. त्या महावेगशाली, महातेजस्वी राक्षसराजाचे शरीर वज्राचा फटका खाल्लेल्या वृत्रासुरासारखे रथातून जमिनीवर आपटले. तो बाण मात्र काम संपवून सहजपणे रामाच्या भात्यात पुन्हा जाऊन बसला. इकडे आपला स्वामी मेल्याचे पाहाताच समस्त राक्षस भितीपोटी पळू लागले तर चेव चढलेले वानर त्या राक्षससैन्यावर तुटून पडले! रावणाचा मृत्यू घोषित होताच सर्वत्र दुंदुभी निनादू लागल्या आणि समग्र वातावरण रामाच्या जयजयकाराने भरून गेले!! (१४-२७)

    रावणवध हा केवळ स्त्रीचे अपहरण करणाऱ्या एका राक्षसाचाच वध नव्हता, तर तो होता एका सार्वभौम सत्तेच्या अहंकाराचा एका राज्यविहिन वनवासीने वनवासींच्याच साह्याने केलेला पराभव! ही सामर्थ्य, बुद्धी व धोरणीपणाच्या जोरावर सत्याने असत्यावर विजय मिळवल्याची गाथा आहे. रामायण, ही भारताच्या इतिहासाची चिरंतन महागाथा आहे!!

    — © विक्रम श्रीराम एडके

    (रामायणाचे अभ्यासक आणि व्याख्याते. अधिक माहितीसाठी, तसेच रामायणावरील व्याख्यानांच्या आयोजनासाठी संपर्क करा, www.vikramedke.com)

    टीप: येथे लेखनाच्या सोयीसाठी तसेच वाल्मिकी रामायणातील उल्लेखांच्या संदर्भानुसार रामाचा एकेरी उल्लेख केला आहे. या मागे श्रीराम या देवतेच्या अवमानाचा चुकूनदेखील उद्देश नाही. लेखकही अन्य कोट्यवधी भारतीयांसारखाच रामभक्त आहे. शिवाय आवडत्या देवतेचा एकेरी उल्लेख करण्याची आपली पिढ्यानपिढ्यांची पद्धत आहे.

  • हवीहवीशी वाटणारी लबाडी – व्हाईट कॉलर

    थेटपणे खून करणारे, हिंसा करणारे अपराधी तर घातक असतातच, पण त्याहून शतपटींनी घातक असतात ते तुमच्यातच राहून, तुमचा विश्वास संपादन करून गंडवणारे! पहिल्या प्रकारचे लोक तुमचे शारीरिक आणि आर्थिक नुकसान करतात. पण दुसऱ्या प्रकारचे लोक तुमच्या विश्वासाला कधीही भरून न येणारा तडा देऊन जातात. हे पांढरपेशा अपराधी कधी लाचखोर शासकीय अधिकारी बनून व्यवस्थेचा भाग असतात तर कधी व्यवस्थेलाच नाकारणारे अराजकवादी. त्यांची रुपं अनेक आहेत, त्यांचे मार्ग अनंत आहेत. साधर्म्य जर काही असेल, तर केवळ त्यांची ओरबाडण्याची, आपल्या मालकीच्या नसलेल्या वस्तू हिरावण्याची वृत्ती!

    या पांढरपेशा अपराध्यांना तथा व्हाईट कॉलर क्रिमिनल्सना रोखण्यासाठी एफबीआयची एक स्वतंत्र शाखा आहे. या शाखेत धडाडीचा स्पेशल एजंट पीटर बर्क (टिम डिके) काम करतो. पीटर सलग तीन वर्षे एका अपराध्याच्या मागे होता. जगातील सर्वाधिक निष्णात चोर, तितकाच कुशल लबाड, तितकाच फसवा नक्कलकार, त्याहूनही हुशार कलाकार, हरहुन्नरी; हे आणि अशा शेकडो गुणावगुणांचा खजिना नील कॅफ्री (मॅट बोमर). इतक्या प्रवीण चोराला पीटर बर्कने महत्प्रयासाने पकडलं, म्हणजे तो स्वतः केवढा कमाल असेल याची कल्पना करा. पण या दोघांची कथा इथेच संपत नाही. खरं तर इथे सुरू सुद्धा होत नाही.

    नील कारागृहातून पळून जातो. त्यात विशेष असं काही नाही. पण चक्रावणारी गोष्ट ही की, नील त्याची शिक्षा संपायला अवघे तीनच महिने राहिलेले असताना पळून जातो! का? कशासाठी? ते काहीही असो, पण अशा माणसाला पकडू शकणारी एकमेव व्यक्ती म्हणून पुन्हा एकवार पीटरला पाचारण केले जाते. पीटर नीलला दुसऱ्यांदा पकडतो. पण या वेळी नील पीटरला जो प्रस्ताव देतो, तो ऐकून पीटरसुद्धा विचारात पडतो. काय असतो तो प्रस्ताव?

    बॉलिवूड हे अपराधी, माफिया वगैरेंचं उदात्तीकरण करण्यासाठी आधीपासूनच प्रसिद्ध आहे. संजय गढ़वीचा “धूम” (२००४) प्रदर्शित झाला, तुफान चालला आणि तेव्हापासून चोरी आणि लबाडी करणाऱ्यांवरील झगमगीत, शैलीदार चित्रपटांची लाटच आली. स्वतः “धूम” चित्रपटमालिकेनेच आजवर दहा अब्जांपेक्षा अधिक कमाई केल्याचे दिसते, चित्रपटागणिक त्यांचे दर्जात्मक अवमूल्यन होऊनही! मला व्यक्तिश: “धूम” चित्रपटमालिकेमधील सर्वांत मोठी चोरी कोणती वाटते सांगू? “धूम ३”ने केलेली ख्रिस्तोफ़र नोलनच्या “द प्रेस्टिज”च्या (२००६) प्लॉटची चोरी! मी “व्हाईट कॉलर” मालिकेबद्दल बोलत असताना अचानक “धूम”मध्ये का शिरलो? कारण, दोन्हींचे विषय जवळपास सारखेच आहेत. दोन्हीकडे चतुर पोलिस आहेत आणि पोलिसांहून वरचढ चोर आहेत. दोन्हींकडे शैलीच्या नादात बरेचदा तर्काला तिलांजली देण्यात येते. पण तरीही दोन्हींमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे, तो म्हणजे “व्हाईट कॉलर”चे कथानक मुळातच शेकडों कंगोऱ्यांनी घट्ट विणलेले व सशक्त आहे! त्यांचा एक-एक एपिसोड हा “धूम”च्या वरचढ आहे आणि असे त्यांनी ८१ एपिसोड्स खणखणीत वाजवले आहेत!

    हल्ली जरा कुठे दोन पुरुष पात्रं एकत्र पडद्यावर वावरले तर उथळ लोकांमध्ये त्याला ब्रोमान्स म्हणायची अहमहमिका लागते. खरा, अभिजात ब्रोमान्स पाहायचा असेल, तर पीटर आणि नीलमधील कमालीची केमिस्ट्री पाहा. पण मालिका केवळ मुख्य पात्रांमुळेच चांगली बनत नाही, तर सहाय्यक पात्रेसुद्धा तितकीच खतरनाक असावी लागतात. या बाबतीत “व्हाईट कॉलर”कडे एकापेक्षा एक सरस कलाकार आणि पात्रांची मालिकाच आहे. क्लिंटन जोन्स (शरीफ़ अॅटकिन्स), डायना बेरीगन (मार्शा थॉमसन), सारा एलिस (हिलरी बर्टन), अलेक्झँड्रा हंटर (ग्लोरीया व्होट्सिस), मॅथ्यू केलर (रॉस मॅक्कॉल), ज्युन एलिंग्टन (डायाहान कॅरोल), रिबेका लोव (ब्रिजेट रेगन), एलिझाबेथ बर्क (टिफनी थिएसन) ही सगळी पात्रं इतक्या तरलपणे लिहिलेली आहेत की ती सहजच आपल्या विचारविश्वाचा भाग बनून जातात. सुरुवातीचे काही एपिसोड्स तुम्ही मॅट बोमरच्या चार्मिंग मास अपीलमध्ये हरवून जाता पण हळूहळू ती खुमारी कायम ठेवूनही टिम डिकेचा क्लासिक जेंटलमन अॅक्ट तुम्हाला त्याचा चाहता बनवतो! पीटर आणि एलिझाबेथची प्रेमकथा, किंवा संसारकथा म्हणूया हवं तर, आजकालच्या तात्पुरत्या जगात खरोखरीच्या शाश्वत भावना जगणाऱ्या अल्पसंख्य मंडळींसाठी कपलगोल्स आहे अक्षरशः!! इतका अतूट विश्वास, इतकी जीवाला जीव देण्याची वृत्ती, इतकं समर्पण, इतकी अभिन्नता, इतका समजूतदारपणा आणि तरीही इतका आसपासच घडतोय असं वाटण्याइतका खरेपणा अमेरिकन मालिकांमध्ये क्वचितच दिसतो.

    वर मी बहुतांशी पात्रांबद्दल लिहूनही एका विशेष पात्राबद्दल लिहिलेलं नाही, कारण मला त्याच्यासाठी स्वतंत्र परिच्छेद लिहायचा होता. ते पात्र आहे, विली गार्सनने साकारलेले मॉझीचे पात्र! प्रत्येक कमाल टिव्ही मालिकेत एक असे दुय्यम पात्र असते जे त्या गटात बसूनही गटात न बसणारे असते व त्यामुळेच जास्त लक्षात राहाते. उदाहरणच द्यायचं झालं तर “पर्सन ऑफ इंटरेस्ट”मध्ये (२०११-१६) एकापेक्षा एक खतरनाक लोक आहेत, पण त्यातही केव्हिन चॅपमनने साकारलेला लायनेल फस्को हा खतरनाक असूनही विविधरंगी भावनांचं क्यूट टेडी बेअर वाटतो. किंवा “मंक”मध्येदेखील (२००२-०९) सगळेच भारी आहेत, पण जेसन ग्रे-स्टॅनफर्डने साकारलेला येडचॅप रँडी भाव, शिव्या आणि लाड सगळं एकाचवेळी खाऊन जातो! तसाच आहे “व्हाईट कॉलर”मधील मॉझी. अफाट पात्र आहे ते. आणि जितके शैलीदारपणे लिहिलेय त्याहून अधिक दर्जेदारपणे, बारीकसारीक लकबींसह विली गार्सनने ते साकारलेय. मी या मालिकेचा किती जरी चाहता असलो, तरीही मुख्य कथेपेक्षा मॉझीचे प्रसंग सुरू होण्याची चातकासारखी वाट बघत बसायचो मी!

    “व्हाईट कॉलर”चा ढाचा ठरलेला आहे. एक एपिसोड, एक केस. पण त्यातही प्रत्येक सीझनमध्ये जी एक मोठ्ठी, विस्तृत कथा त्यांना सांगायची असते, ती प्रत्येक सीझनच्या पहिल्याच एपिसोडपासून सुरू होते. त्यांचे स्वतंत्र एपिसोड तर भन्नाट असतातच, पण त्याहूनही जास्त भन्नाट त्यांची ती प्रत्येक सीझनमधील विस्तृत कथा असते! फक्त एकच दोष आहे त्यांचा की, ते चकचकीतपणात वाहावत जातात. झगमगाटाला भुलतात. आणि बहुतांशी वेळेस तर्कापेक्षा शैलीला झुकतं माप देतात! पण म्हणून त्यांच्या कथेमध्ये कस नाही असं नाही. प्रत्येक एपिसोडसाठी त्यांनी मेहनत घेऊन केलेले संशोधन त्या त्या कथेत दिसून येते. अपवाद फक्त एकच की, एका भागात ते देवी महालक्ष्मीचे चित्र दाखवतात आणि ती सीता असल्याचे सांगतात! ते एक असो.

    पण इतकं लिहूनही मी “व्हाईट कॉलर”च्या कथानकाबद्दल तर काही सांगितलंच नाही! चांगल्या कॉन अथवा करामतीचं हेच लक्षण असतं. ती योग्य त्या गोष्टी उघड करते, पण त्याहून अनेकपटींनी जास्त गोष्टी लपवते! “व्हाईट कॉलर” हा बोलण्याचा विषयच नाहीये तर बघण्याचा, हरवून जाण्याचा, भुलण्याचा विषय आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं, तर “व्हाईट कॉलर” ही मालिका सर्वार्थाने हवीहवीशी वाटणारी लबाडी आहे!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके.
    (अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़

    रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़

    असं म्हणतात, जेव्हा प्रलयाची घडी आली तेव्हा वैवस्वत मनूने एक नौका उभारून सबंध जीवसृष्टी नव्याने वसवली. अशीच कथा थोड्याफार फरकाने अब्राहमिक पंथांत नोहाचीदेखील आहे. बायबलमधील अॅडम, ईव्ह आणि सापाची कथादेखील प्रसिद्धच आहे. या सगळ्या पौराणिक कथा. नव्या युगाचा आरंभ आपापल्या परीने सांगणाऱ्या. पण खरोखरीच जीवसृष्टीला अशी पैलतीरी नेण्याची जबाबदारी येऊन पडली तर, कुणी आधुनिक मनू ती कशी पेलेल? त्याची नौका अथवा आर्क कोणत्या स्वरुपाचे असेल? त्यातून निर्माण होणारी नवी सृष्टी तरी कशा प्रकारची असेल? धर्माच्या अभ्यासकांना पडणाऱ्या या प्रश्नांचं उत्तर वैज्ञानिक नाट्यातून शोधण्याचा प्रयत्न म्हणजे रिडली स्कॉटची एचबीओ मॅक्सवरील नवीकोरी मालिका, ‘रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़’!

    बावीसावं शतक निम्मं सरलंय. पृथ्वीवर एक आगळाच संघर्ष सुरू आहे. हे महाभारत आहे आस्तिक आणि नास्तिकांच्या दरम्यानचं. आस्तिक आहेत ते मित्राईक पंथाचे अनुयायी. हे एका खरोखरीच्या प्राचीन इराणी पंथाचे नाव आहे. गंमतीची गोष्ट अशी की त्यांचे नाव ‘मित्र’ या संस्कृत शब्दाशी कमालीचे साधर्म्य साधणारे आहे. नावाप्रमाणे व संस्कृत अर्थाप्रमाणेच ते सूर्योपासक आहेत. वस्तुतः आता या पंथाचे कुणीच अनुयायी शिल्लक नाहीत. त्यामुळे अर्थातच मालिकेत या पंथाचे काल्पनिक रूप वापरण्यात आले आहे. कोणत्याही परमोच्च बिंदूशी पोचलेल्या संस्कृतीप्रमाणेच त्यांच्यातही सांस्कृतिक कट्टरता व सामरिक ढिलाई आलेली आहे. त्यांच्या विरुद्ध आहेत ते विज्ञाननादी नास्तिक. दोघांपैकी कुणीही सरळमार्गी नाही. दोघांकडेही एकापेक्षा एक भयकारी अस्त्रे आहेत. यातून एकच गोष्ट हाती लागते ती म्हणजे पृथ्वीचा विनाश!

    विनाशातूनच नवी प्रभात होते. कुणाच्या तरी दूरदृष्टीने पृथ्वीवरील मानवांची काही बीजे आपल्यापासून सहाशे अडतीस प्रकाशवर्ष दूर असलेल्या केप्लर-२२बी ग्रहावर पोहोचवली जातात. धर्माच्या अट्टाहासामुळे पृथ्वीची दुरवस्था झाल्याचे मानून त्या बीजांचा ‘प्रेषित’ (कोटी हेतुत:!) त्यांना कोणत्याही धर्माच्या विरहित वाढवायचं ठरवतो. यासाठी दोन यंत्रमानवांची निवड केलेली आहे, मदर (अमँडा कॉलिन) आणि फादर (अबुबकर सलीम). हे दोघेही त्या मुलांना नास्तिकतेची घुटी पाजूनच वाढवतात. पण नवीन ग्रहावर वस्ती करणे एवढे सोपे असते का? लोक दिसतात तसेच प्रत्यक्षात असतात का? आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न, मनुष्य धर्माशिवाय राहू शकतो का? या सगळ्या गुंतागुंतीच्या, अस्तित्वाचा मागोवा घेत हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच जाणाऱ्या प्रश्नमालिकेत जेव्हा मार्कससारखे (ट्रॅव्हिस फिमल) बेभरवशी चलांक येऊन मिळतात, तेव्हा आपली ही प्रलयोत्तर नौका विज्ञानकथा, मानवी नाट्य, भयकथा, गूढकथा, रहस्यकथा वगैरे अनेक लाटांवर हेलकावे खात खात, प्रवास सर्वार्थाने संस्मरणीय करून सोडते! इथेही उद्यान आहे, साप आहे, अॅडम आहे आणि ईव्हदेखील आहे, फक्त त्यांचे संदर्भ तेवढे कल्पनातीत बदलले आहेत.

    मालिकेत काही आस्तिक पात्रे आहेत आणि काही नास्तिक पात्रे. परंतु या सगळ्याच पात्रांचा प्रवास अतिशय गहीरा, रंगीत आणि भरीव झालाय. किंबहूना पात्रे कशी लिहावीत याचा वस्तुपाठच या मालिकेला म्हणता येईल. एकूण एक पात्राच्या दृढ होत जाणाऱ्या, बदलत जाणाऱ्या श्रद्धा खरोखरीच मेंदू आणि मनावर शहारे आणतात. सश्रद्धांपैकी काहींच्या श्रद्धा डगमगतात तर अश्रद्धांपैकी ज्यांच्याकडून सर्वांत कमीहूनही कमी अपेक्षा होती, त्यांच्या मनात श्रद्धेचे अंकुर फुटतात. धार्मिक असणारे सहजच अधर्माचरण करून जातात तर काही धर्मच नाकारणारे आपल्याही नकळत एखादा धर्मच स्थापन करून पाळायला सुरुवात करतात. आस्तिकतेचा अतिरेक नास्तिकतेप्रत नेऊन, मूळ सांगाडाच मोडतो तर नास्तिकतेचाही अतिरेक नास्तिकतेबाबत आस्तिकतेचा अट्टाहास निर्माण करून मूळ सांगाडाच मोडतो. वाचायला किती जरी तात्त्विक वाटत असले तरी मालिकेत ही सगळीच स्थित्यंतरे अतिशय रोमहर्षक, मनोरंजक व तितक्याच सूचक संयतपणाने मांडली आहेत, हेच मला वाटते या मालिकेचे सर्वांत मोठे यश आहे!

    अमांडा कॉलिनने इतके उत्कृष्ट काम केले आहे की, शब्दांत मांडताच येणार नाही. आई, रक्षक, भक्षक, नव्याच जाणीवांनी बिथरून गेलेले यंत्र अशा विस्तृत पटावर तिने लीलया संचार केला आहे. अबुबकर सलीमने यंत्रमानवाच्या रूपात संयतपणाची कमाल केली आहे. किंबहूना आपल्याकडे यंत्रमानव म्हटला की विनाकारण ब्रेकडान्ससारख्या हालचाली आणि विचित्र पद्धतीत बोलणे, एवढाच अर्थ ठाऊक असणाऱ्यांनी या दोघांचे काम पाहायलाच हवे! ‘रेज़्ड बाय वूल्व्ह्ज़’ नावातील कोटी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लहानग्या विण्टा मॅकग्राने मोगलीचे एक ताजे, प्रलयोत्तर (पोस्ट अपोकॅलिप्टिक) रूप साकारले आहे.

    समान अथवा समांतर घटना नास्तिकासोबत व आस्तिकासोबत घडूनही त्यांचा परिणाम मात्र दोन्हीही विचारसरणींच्या पात्रांच्या वागणुकीमुळे केवढा भिन्न असू शकतो, हे दाखवण्याची मालिकेची पद्धत काहीच्या काही बेफाट सुंदर आहे. मालिकेची आणखी एक जमेची बाजू म्हणजे अत्यधिक नग्नता आणि शिव्या वेबमालिकांचा स्थायीभाव होऊ लागलेला असताना, या मालिकेत नग्नता अतिशय कमी आहे व शिव्या तर जवळजवळ नाहीतच (एका भागात फक्त ‘बिच्’ शब्द वापरलेला दिसतो!). या दोन्ही गोष्टी कमीत कमी ठेवूनही निव्वळ कल्पनाशक्ती व सशक्त कथानक यांच्या जोरावर चांगली मालिका बनवता येऊ शकते, हे आपल्याकडील वेबसीरीजकारांनी ‘रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़’कडून आवर्जून शिकण्यासारखे आहे!

    माझा आक्षेप आहे तो ट्रॅव्हिस फिमलबद्दल. त्याने साकारलेल्या राग्नार लोथब्रोकच्या (‘व्हायकिंग’, २०१३-२०१७) भूमिकेचा मी अतोनात पंखा आहे. ही मालिका मी पाहायला सुरुवात केली ती त्याच्याच साठी. आणि तिथेच माझा भ्रमनिरास झाला. भौगोलिक परिस्थिती वगळता त्याने साकारलेले मार्कसचे पात्र आणि राग्नार यांच्या लेखनात व परिपोषात काडीमात्र फरक नाही. ही लेखकाची त्रुटी आहे. त्याहून वाईट म्हणजे ज्या देहबोलीमुळे राग्नार प्रचंड लोकप्रिय झाला, ती देहबोली नव्या पात्रासाठी म्हणून बदलण्याचे ट्रॅव्हिसने किंचितदेखील कष्ट घेतलेले नाहीत. राग्नार पाहाताना मला वाटायचं की, काय ताकदीचा कायिक अभिनेता आहे. पण आता वाटतं की, याला एकतर एवढेच जमते किंवा त्याला काहीतरी आजार आहे की काय? कारण या दोन कारणांच्या शिवाय त्याचे राग्नारसारखेच सदोदित भिरभिरणारे डोळे, बोलताना गरजेपेक्षा जास्त हलणारे चेहऱ्याचे स्नायू यांचे स्पष्टीकरण देताच येत नाही. इथे एक लक्षात घ्या की, त्याने साकारलेले मार्कसचे पात्र या मालिकेच्या दृष्टीने चपखलच आहे, मात्र त्यात लेखनाच्या व अभिनयाच्या दृष्टीने काही एक नावीन्य नाही, एवढेच! शिवाय या मालिकेवर रिडली स्कॉटच्या आधीच्या फिल्मॉग्रफीचा खूपच जास्त प्रभाव जाणवतो, हे वेगळंच.

    मालिकेच्या पहिल्या पर्वाचा अंतिम भाग आधीच्या नऊ भागांमध्ये निर्माण केलेल्या प्रश्नांपैकी काहींची उत्तरे देतो. काही भयंकर रहस्योद्घाटनेही करतो. पण त्याचवेळी अनेकपटींनी जास्त प्रश्न निर्माणसुद्धा करून पुढच्या पर्वासाठी सुयोग्य उत्कंठा निर्माण करतो! माझी एक कसोटी आहे. त्याला मी ‘दुसऱ्या पर्वाची कसोटी’ नाव दिलंय. बऱ्याच मालिका पहिले पर्व कमाल देतात. पण पहिल्या पर्वाच्या यशामुळे म्हणा वा कथेच्या कमतरतेमुळे म्हणा वा यशामुळे नको ते लोक मालिकेत रस घ्यायला लागल्यामुळे म्हणा, त्यांचे दुसरे पर्व गंडते! याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे राजकीय हव्यासापायी चुकलेले अमेझॉनच्या ‘द बॉईज़’चे दुसरे पर्व! माझे असे गृहितक आहे की, जी मालिका दुसरे पर्वदेखील पहिल्याइतकेच चांगले देते, ती नंतरचे किमान एक पर्व तरी गंडण्याची शक्यता कमी होऊन बसते. त्या अर्थी ‘रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़’ पहिल्या जबरदस्त पर्वानंतर एका अवघड वळणाशी येऊन थांबलीये. राजकीयदृष्ट्या बरोबर (पॉलिटिकली करेक्ट) ठरण्याचा अट्टाहास, कथेपेक्षा प्रोपगण्डालाच अधिक महत्त्व देणे वगैरे भोवऱ्यांपायी भल्याभल्या मालिका श्रेष्ठतेप्रत जाण्याआधीच बुडाल्या आहेत. ‘रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़’ ही सुंदररित्या बांधलेली मनूची नौका किंवा नोहाज़् आर्क आता बुडते की तरते, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या www.vikramedke.com]

  • सफ़र नया..!

    सफ़र नया..!

    जेबें तो साफ़ है
    पर आँखों में ख़्वाब है
    जुनूँ के क़ाफ़िलों की
    आदत ख़राब है
    छोड़ी है मँजिले
    रस्तों के वास्ते
    खोने-पाने का यह
    भी अपना हिसाब़ है
    डगर नयी है, जिगर वही है
    और है, सफ़र नया!

    अपने साथ में है कुछ नए फासले
    बंदिशें भी राह में खुल के साँस ले
    पंछी है, उड गए
    मोडों पे, मुड गए
    राहों में जो मिला
    हम उस से जुड गए
    डगर नयी है, जिगर वही है
    और है, सफ़र नया!

    सडक जहा पर ले जाए
    अपना भी वहीं पे ही दिल आए
    रुकना हम को सताए
    के डर को तोडो, छोडो, दौडो,
    दिन में, या रात में
    तूफ़ाँ, बरसात में
    रस्तों के बादशाह
    हम चलते रुबाब से
    डगर नयी है, जिगर वही है
    और है, सफ़र नया!

    — © विक्रम श्रीराम एडके

  • जलने दे..

    जलने दे..

    जलने दे जलने दे तेरी आँच से जलने दे
    गलने दे गलने दे मुझे काँच सा गलने दे
    मैं हूँ महताब का जाया
    दे दे तेरी धूप मुझे
    तू सच और जग है माया
    ले ले मेरी छाँव तुझे

    कभी फोन पे उँगलियाँ भी मेरे नाम पे रुकती तो होंगी
    भरमाती तो होंगी कुछ आहटें
    अश्क़ों की बदलियाँ भी तेरे ग़ालों पे झुकती तो होंगी
    धुल जाती तो होंगी मुस्काहटें
    बोल..
    सजना तू ने क्या पाया
    रख के तेरी धूप तुझे
    ग़म सच और राहत माया
    समझा है खूब मुझे

    जलने दे..

    — © विक्रम श्रीराम एडके

    (एक संगीतकार द्वारा बनायी गयी धुन पर लिखा था यह गीत। किसी भी गीतकार के अधिकांश गीतों की तरह यह भी अप्रकाशितता के समुद्र में कहीं खो गया। शब्द स्मरणीय लगे, तो सोचा आप के साथ साझा कर लूँ। कैसे लगे, अवश्य बताईएगा।)

  • शारदेच्या अंशा..

    शारदेच्या अंशा..

    आपल्याला नाही का, लहानपणी छायागीत, चित्रहार, रंगोली वगैरे पाहाताना किंवा बिनाका गीतमाला अथवा तत्सम कार्यक्रम ऐकताना, त्या सुमधूर आणि जनप्रिय गीतांच्या सोबत गुणगुणायची सवय लागते. मग हीच गाणी कधी भेंड्या खेळताना कामी येतात, कधीतरी कुणाला तरी मोहविण्यासाठी चपखल बसतात. मग कुणातरी मित्रमैत्रीणीकडून त्या गाण्याचं कधीतरी कौतुक केलं जातं. आणि ‘आपल्याला गाता येतं’ असा साक्षात्कार सहजच होऊन जातो! गाण्याचं शिक्षण तर झालेलं नसतं. असतो तो फक्त देवाने दिलेला कंठप्रसाद! काही जण तेवढ्यावरच खुश राहातात. जसजसं वय वाढतं आणि कालानुरुप विविध जबाबदाऱ्या खुणावू लागतात, तसतसं गाणं दुरावत जातं. ते उरतं फक्त चार नातेवाईक-मित्रांच्या फर्माईशीपुरतंच! पण काही जण मात्र असतात जे या कंठाला हिरा मानून पैलू पाडू लागतात. गायन त्यांना अक्षरश: झपाटून टाकतं. असाच एक मुलगा होता. गाण्याने झपाटलेला. इंजिनियरींग करत होता तो. पण म्हणतात ना, तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या पाठी धावायचं असेल, तर आधी इंजिनियर बना आणि मग इंजिनियरींग सोडून तुमच्या स्वप्नांची वाट चालू लागा. याच्याही आयुष्यात इंजिनियरींग तेवढ्याच पुरतं होतं! पुढे विषमज्वर झाला तेव्हा तर इंजिनियरींग सुटलं ते सुटलंच. पण गाणं नाही सुटलं. श्वास घेणं कुणी सोडू शकेल का? गाणं श्वास होता त्याचा. गायचा. कॉलेजच्या कार्यक्रमांत गायचा. ऑर्केस्ट्रामध्ये गायचा. स्पर्धांमध्ये गायचा. अशाच एका स्पर्धेत त्याचा दुसरा क्रमांक आला. पुरस्कार कुणाच्या हस्ते तर साक्षात एस. जानकींच्या! त्यांनी संयोजकांना सांगितलं की, “पहिल्या क्रमांकाचा मुलगा खूपच चांगला गायला, पण त्याने घंटाशालांची नक्कल केली. दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा मात्र त्याच्या स्वत:च्या आवाजात गायला”. त्यांनी त्याला पुढे बोलावून विचारलं, “तू चित्रपटांसाठी पार्श्वगायन करायचा प्रयत्न का नाही करत”? हा बावरला, “अहो मी कॉलेज सुटल्यावर मधल्या काळात काय करायचं म्हणून सहज आलो होतो हो स्पर्धेत. मी काही संगीत शिकलेलो नाही”. जानकी हसल्या, म्हणाल्या, “मी तरी कुठे शिकलेय”! त्याचा विश्वासच बसेना. एवढ्या मोठ्या गायिका ज्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर एकछत्री अधिराज्य गाजवतायत त्या आपल्याला म्हणतात की, मी कुठे संगीत शिकलेय आणि वर सांगतात की तू चित्रपटांसाठी प्रयत्न कर म्हणून! त्याला वाटलं की, आपला दुसरा क्रमांक आला म्हणून सांत्वन करण्यासाठी तर म्हणाल्या नसतील या असं? पण मनात स्वप्नाचं बीज पेरलं गेलं ते गेलंच!

    मग सुरू झाला अजून जोमाने सराव, स्पर्धा, बक्षिसं! चेन्नईत अशीच एक स्पर्धा होती. नामवंत परीक्षक होते. याने सुद्धा भाग घेतला होता. तिथे गेल्यावर समजलं की, स्पर्धेत चित्रपटगीत गाण्याची परवानगी नाही. आता आली का पंचाईत! याला तर दुसरं काही गाताच येत नव्हतं. काय करावं? याचा क्रमांक यायला वेळ होता. हा तसाच उठून चेन्नईच्या सुप्रसिद्ध मरीना बीचवर गेला. तिथे बराच वेळ वाळूत बसून त्याने एक गाणं लिहिलं. त्याला स्वत:च चाल लावली. आणि ते गाणं तो स्पर्धेत गायला! जसा तो जागेवर जाऊन बसला, तसा त्याच्यापाशी एक जण येऊन उभे राहीले. त्या सद्गृहस्थांनी तमिळमध्ये विचारलं, “सिनेमा ला पाऽडरीया?”, अर्थात, “चित्रपटात गाशील”? याला वाटलं हा बाबा आपली टिंगलच करतोय! याने पण तोऱ्यात उत्तर दिलं, “पाऽडमाट्टेन”. नाही गाणार!
    “का”?
    “का म्हणजे काय, नाही गायचं मला”.
    तो माणूस क्षणभर थांबला, मग समजूतीच्या स्वरात बोलू लागला, “अरे बाबा तू इतका छान गातोस, म्हणून मी विचारलं. मी म्युझिक डिरेक्टर आहे. माझं नाव कोदंडपाणी”!
    नाव ऐकताच हा ताडकन उभा राहीला. बाप रे! काय बोलून बसलो आपण. ते ही एवढ्या मोठ्या माणसाला. पण कोदंडपाणींनी ते मनावर घेतलं नाही. त्यांनी त्याला ऑडिशनसाठी यायला सांगितलं. कोदंडपाणी, दिग्दर्शक, निर्माते वगैरे अनेक जण बसले होते. काहीतरी गा, म्हणाल्यावर याने क्षणभर विचार केला आणि ज्या गानेश्वराच्या स्वर्गंगेचे चार तुषार अंगावर पडल्यामुळे आपल्याला ही गायनी कळा करावीशी वाटली, त्याच मखमली स्वरांच्या सम्राटाचं, मुहम्मद रफ़ीचं गीत त्याने गायलं. गाताना त्याने एका ठिकाणी, ज्याला हल्ली रिअॅलिटीशोछाप मराठीतसुद्धा इंप्रोव्हायझेशनच म्हटलं जातं त्यासाठी एक अतिशय गोड तेलुगू शब्द आहे, अधिकप्रसंगम् केला. ती जागा ऐकून कोदंडपाणी कमालीचे खुश झाले! पण म्हणून त्याला गाणं मिळालं का? तर अजिबात नाही!

    त्याला पहिलं गाणं मिळण्यासाठी तब्बल दोन वर्षे वाट पाहावी लागली. ते गीत होतं, तेलुगू चित्रपट “श्रीश्रीश्री मर्यादारामण्णा”मधील (१९६७) “येमिये विण्टा मोहम्”! एकल गीत नव्हतं ते. त्याच्याखेरीज पी. सुशीला, के. रघुरामय्या आणि पी. बी. श्रीनिवाससुद्धा होते त्यात. गाण्याचं मुद्रण झालं १५ डिसेंबर १९६६ ला. त्यानंतर आठवडाभरातच त्याने कन्नड चित्रपट “नक्करे अदे स्वर्गा”साठी (१९६७) द्वंद्वगीत गायले, “कनसिदो मनसिदो”! आणि त्याबरोब्बरच संगीतप्रेमींच्या मनात एका अढळ ध्रुवताऱ्याचा जन्म झाला, श्रीपती पंडिताराध्युला तथा एस. पी. बालसुब्रह्मण्यम!

    हे मी लिहितोय, ते एसपी अकाली गेले त्या संध्याकाळी. मी अकाली असा शब्द का वापरतोय? त्यांच्या वयाची पंचाहत्तरी आलेली. शरीर वृद्धत्वाच्या पाशी जखडलेलं. पण गळा? गळा तितकाच ताजातवाना, टवटवीत जितका तो त्रेपन्न वर्षांपूर्वी होता. जो स्फटिकासारखा स्वच्छ स्वर तुम्ही त्यांच्या साठच्या दशकातील “येमिये विण्टा मोहम्” गीतात ऐकाल तोच, तसाच, आणि तितकाच निखळ स्वर तुम्हाला काही महिन्यांपूर्वी संगीताधिपती इलयराजासाठी मुद्रित केलेल्या “भारतभूमी”मध्ये सुद्धा ऐकू येईल. आणि या दोन्हीही गाण्यांच्या मध्ये तेलुगू, तमिळ, कन्नड, मलयाळम, हिंदी, मराठी इ. १६ विविध भाषांमध्ये एसपींनी गायलेली तब्बल ४०,००० हून अधिक गाणी येतात! हा म्हटलं तर चमत्कार आहे आणि म्हटलं तर एस. पी. बालसुब्रह्मण्यम नावाच्या गंधर्वाची अतुट साधना आहे!

    गायकाची कारकीर्द नेमकी केवढी असते हो? हल्लीची चित्रपटगीते ऐका. कुणातरी रेकणाऱ्या गायकाचे एखादेच गाणे चालून जाते. तो गायक मग ऑटोट्यूनच्या बळावर दोन-पाच वर्षे चालतो न चालतो तोच त्याच्याच सारखं गाणाऱ्या दुसऱ्या गायकाचा प्रादुर्भाव होतो. गाणे गायकीपेक्षा युट्यूब व्ह्यूजवर चालण्याच्या सध्याच्या काळात खरे वाटणार नाही की, एसपींनी एम. एस. विश्वनाथन, इलयराजा, रहमान आणि आता अनिरुद्ध अशा संगीतकारांच्या चार वेगवेगळ्या पिढ्या तब्बल अर्धशतकभर गाजवल्या आहेत. आजही जेव्हा सुपरस्टार रजनीकांतच्या एखाद्या चित्रपटाचं इंट्रो साँग समोर येतं, तेव्हा फक्त आणि फक्त एसपींचाच आवाज त्या जागी सुचतो. पण हेच एसपी जेव्हा कमल हासनसाठीही करून दाखवतात, नागार्जुनसाठी करून दाखवतात, चिरंजीवीसाठी करून दाखवतात, तेव्हा कळतं की हे खायचं काम नव्हे! हिंदीतसुद्धा नव्वदच्या दशकातल्या सलमानच्या चित्रपटाची एसपींशिवाय कल्पना करणंच अवघड आहे. पण म्हणून हिंदीने एसपींना त्यांच्या अधिकाराचं स्थान दिलं का?

    सुपरस्टार एम. जी. रामचंद्रन एकदा एव्हिएम स्टुडियोत शुटिंग करत होते. दोन शॉट्सच्या मधल्या वेळेत त्यांचा एका कडुनिंबाच्या झाडाखाली बसण्याचा शिरस्ता. तसे ते बसलेले असताना त्यांच्या कानावर एका मुद्रणाचे स्वर पडले. त्यांनी गाणं ताबडतोब ओळखलं. त्यांच्याच एका तमिळ चित्रपटगीताचं तेलुगू अनुवादित गाणं होतं ते. त्यांना गायकाचा स्वर मात्र वेगळाच वाटला. एमजीआरनी एका मदतनिसाला चौकशीकरता पाठवलं. काही क्षणांत माहिती मिळाली की, हा कुणीतरी बालसुब्रह्मण्यम नावाचा पोरगा आहे आणि त्याने याआधीसुद्धा थोडीफार गाणी गायली आहेत. झालं! दुसऱ्याच दिवशी एसपींच्या दरीद्री खोलीबाहेर एक लांबलचक गाडी येऊन उभी राहिली. एसपी तर सोडाच त्या भागात तशी गाडी कधीच कुणीच पाहिली नव्हती. गाडीतून पद्मनाभन नावाचे गृहस्थ उतरले. त्यांनी एसपींना अदबीने विचारलं, “तुम्हाला वेळ कधी असेल सांगता का, एमजीआर भेटू इच्छितात”! एवढा मोठा सुपरस्टार भेटायचं म्हणतोय तर नाही कोण म्हणणार. एसपी म्हणाले, “कुठे यायचं तेवढं सांगा. माझ्याकडे सायकल आहे, मी येतो”. त्यावर पद्मनाभन म्हणाले, “तुम्ही तसदी घेऊ नका, मीच गाडी घेऊन तुम्हाला न्यायला येईन”. कट टू. पोरसवदा एसपी भल्यामोठ्ठ्या स्टुडियोत एमजीआर, संगीतकार, निर्माते वगैरेंच्या समोर उभे. एमजीआर म्हणाले की, “मला तुझं गाणं ऐकायचंय”. एसपींना वाटलं की, काहीतरी ऑडिशनसारखा प्रकार आहे. म्हणून ते काहीतरी गाणार तेवढ्यात संगीतकाराने त्यांना गाण्याचा कागद दिला. त्यांच्याकडून गाणं घटवून घ्यायला सुरुवात केली. तेव्हा कुठे एसपींना कळालं की, आपल्याला साक्षात एमजीआरसाठी गायचंय! चित्रपटाचं नाव होतं “अडिमयी पेन” (१९६९). एमजीआर आणि जयललिता अशी ऑलटाईम ब्लॉकबस्टर स्टारकास्ट! बिगबजेट! एमजीआरनी सांगितलं की, लवकरच या गाण्याचं चित्रण राजस्थानात होणार आहे. थोडक्यात, एसपींच्या कारकीर्दीला वळण देणारं गाणं असणार होतं ते. तीन दिवस गाण्याचा सराव चालला. आता चौथ्या दिवशी मुद्रण करायचं. ठरल्याप्रमाणे ती मोठ्ठी गाडी एसपींच्या खोलीबाहेर आली. पद्मनाभन आत जाऊन पाहातात तर काय, एसपी अंथरुणाला खिळलेले. विषमज्वर! एसपींना कळालं की हातातोंडाशी आलेला घास दैवगतीने हिरावून नेलाय. मध्ये दोन-तीन आठवडे गेले आणि परत एकदा एसपींच्या खोलीबाहेर तिच गाडी येऊन उभी राहीली. काय होतंय हे कळण्याच्या आत एसपी पुन्हा एकदा एमजीआरसमोर उभे! त्यांनी मनात देवाचे लाखवेळा आभार मानले की, ते गाणं तर हातून गेलं पण आपल्याला दुसरं एखादं गाणं तरी मिळतंय. पण झालं भलतंच! संगीतकार के. व्ही. महादेवनांनी त्या आधीच्याच गाण्याचा कागद दिला. एसपी ते गायले. थोड्यावेळाने जरा बुजतच त्यांनी एमजीआरना विचारले की, “तुमचं राजस्थानचं वेळापत्रक ठरलं होतं, मग अजूनही हे गाणं कसं काय ठेवलंत”? त्यावर एमजीआरनी जे उत्तर दिलं, ते एसपींच्या जडणघडणीचा कायमस्वरूपी अविभाज्य भाग बनून गेलं. एमजीआर म्हणाले की, “त्या दिवशी मी तुला हे गाणं देईन म्हणालो. तू नाही तर दुसऱ्या कुणाकडून सहजपणे गाऊन घेतलं असतं मी. पण मग मी विचार केला, या मुलाने घरी जाऊन कॉलेजच्या सगळ्या मित्रांना सांगितलं असेल की, मी एमजीआरसाठी गातोय. उद्या चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यांनी पाहिलं असतं की, हे गाणं तर दुसऱ्याच कुणीतरी गायलंय. तेव्हा त्यांना काय वाटलं असतं? आपल्या मित्राने थाप मारली! किंवा आपल्या मित्राचा आवाज सुपरस्टार एमजीआरला आवडला नाही. दोन्हीही परिस्थितीत माझं काहीच नसतं गेलं, पण तुझ्या कारकीर्दीवर मात्र कायमचा वाईट परिणाम झाला असता. एकच शेड्युल वाया गेलंय ना, काही हरकत नाही. मी दुसरे प्रसंग चित्रित केले दरम्यान. पण हे गाणं तुझंच होतं, आहे आणि राहाणार”! एसपींना त्या क्षणी केवढं भरून आलं असेल, कल्पना करा. पुढे एमजीआरनी पत्रकार परिषदेत घोषितपणे सांगितलं की, या गुणी मुलाला माझ्या सगळ्या निर्मात्यांनी एक तर गाणं प्रत्येक चित्रपटात द्यावं. सुपरस्टारचा शब्द कोण मोडणार? या घटनेनंतर गायक पी. बी. श्रीनिवास एकदा एसपींना रस्त्यात भेटल्यावर म्हणाले होते, “तू एस. पी. बालसुब्रह्मण्यम नाहीस, एल. जी बालसुब्रह्मण्यम आहेस. लकी गाय बालसुब्रह्मण्यम”!

    मला सांगा ही दानत हिंदीत कितीशा तथाकथित सुपरस्टार्समध्ये आहे? मला आठवतं सात-आठ वर्षांपूर्वी एसपींचं एका स्टारच्या चित्रपटातून हिंदीत पुनरागमन होणार होतं. गाणं मुद्रित झालं. प्रकाशितही झालं. पण चित्रपटात मात्र त्या गाण्याच्या ऐवजी त्या काळी चलती असलेल्या एका असुराचंच गाणं वापरण्यात आलं! आज एसपी गेल्यावर शेकडो हिंदी ताऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली, पण या गंधर्वाने पुन्हा हिंदीत गावं म्हणून प्रयत्न त्यांच्या पैकी किती जणांनी केले?

    १९८१ सालची गोष्ट आहे. सुविख्यात दिग्दर्शक के. बालचंदर त्यांच्याच “मरो चरित्र” (१९७८) या तेलुगू चित्रपटाची हिंदीत “एक दुजे के लिए” (१९८१) नावाने पुनर्निर्मिती करत होते. तेलुगूप्रमाणेच हिंदीतदेखील कमल हासनला एसपींनीच आवाज द्यावा असा त्यांचा आग्रह होता. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी ठाम नकार दिला. हिंदीचा गंधदेखील नसलेल्या दाक्षिणात्य गायकाचे उच्चार स्वच्छ कसे असतील, हा त्यांचा प्रश्न. त्यावर के. बालचंदरांनी बिनतोड युक्तिवाद केला की, “माझ्या कथेचा नायक हिंदी न येणारा तमिळ दाखवायचाय ना? मग गातानाच तो शुद्ध हिंदीत कसा गाईल”? या युक्तिवादाने एलपींचे समाधान झाले आणि एसपींचा हिंदीत दणक्यात प्रवेश झाला. पदार्पणातच त्यांना त्यांचे हिंदीतील पहिले राष्ट्रपती पारितोषिक मिळाले, हे सांगणे न लगे! अर्थात तत्पूर्वीच त्यांना “शंकराभरणम्”साठी (१९८०) पहिलेवहिले राष्ट्रपती पारितोषिक मिळून झाले होते. सबंध कारकीर्दीत एसपींना एकूण ६ राष्ट्रपती पारितोषिके, ७ फिल्मफेअर पारितोषिके आणि नागरी पुरस्कार व मानद डॉक्टरेटसह अगणित इतर पारितोषिके मिळाली आहेत. विशेष म्हणजे ही राष्ट्रपती पारितोषिके हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड अशा वेगवेगळ्या भाषांमधील गाण्यांसाठी मिळाली आहेत. प्रत्येक भाषेत स्वरांची तितकीच उत्कट शिंपण केल्यामुळे कुणी त्यांना गानयोगी म्हणतं, कुणी गानगंधर्व, कुणी काय तर कुणी काय. एमजीआर यांनी मात्र एसपींना एक सुरेख उपाधी दिली होती जी आज सुद्धा चपखल लागू पडते, “पाडुम निला बालू”, अर्थात “गानचंद्र बालू”!

    खूप थोड्या लोकांना ठाऊक असेल की, एसपींनी गायनाव्यतिरिक्त संगीतदिग्दर्शनदेखील तितक्याच ताकदीने करायचे. त्याहून थोड्या लोकांना ठाऊक असेल की, एसपी उत्कृष्ट अभिनय करायचे. सोपं उदाहरण देऊ? “हम से है मुक़ाबला” (१९९४)! सुप्रसिद्ध “प्रेमिका ने प्यार से जो भी दे दिया” गाण्यात तर एसपी मस्तपैकी नाचतानासुद्धा दिसतात!! सबंध कारकीर्दीत अभिनेता म्हणून पन्नास-एक तरी चित्रपट आणि मालिका केल्या असतील त्यांनी. कमल हासन, रजनीकांत, मोहनलाल वगैरे अनेकानेक अभिनेत्यांसाठी पंचवीस-एक चित्रपटांतून डबिंगसुद्धा केलीये त्यांनी. रिचर्ड अटेनबरोच्या “गांधी”साठी बेन किंग्सलेला तेलुगूमध्ये एसपींनीच आवाज दिलाय. “इटिव्ही तेलुगू”वर एक रिअॅलिटी शो लागायचा, “पाडुदा तिय्यगा” नावाने. एसपी त्याचे परीक्षक होते. त्याचे एपिसोड्स मिळवून नक्की पाहा, अगदी तेलुगू समजत नसली तरीही चिकाटीने पाहा. एकेका गाण्यानंतर एसपी ज्या सुरेल आणि सुरेख पद्धतीने त्या गीताचे आणि गाण्याचे विश्लेषण करायचे ते आपल्याकडील टिआरपीच्या हव्यासापोटी सिम्पथीवर चालणाऱ्या स्क्रिप्टेड रिअॅलिटी शोजना बापजन्मी साधणारे नाही. या कार्यक्रमात एसपी अखेरीस एक नेहमीचाच आपल्या माहितीतला श्लोक किंचित बदलून म्हणायचे, “सर्वे जना: सुजनो भवन्तु, सर्वे सुजना: सुखिनो भवन्तु”, तेव्हा खरंच सांगतो शहारा यायचा.

    सामान्यतः गायकाची शैली ठरलेली असते, रेंज ठरलेली असते. बहुतांशी गायक त्याच चौकटीत गातात. पण एसपींनी गायलेला नाही असा चित्रपटगीतांत एकसुद्धा जॉनर नाही. शृंगार, हास्य, रौद्र, कारुण्य, बीभत्स, भयानक, वीर, अद्भुत, शांत यांच्यापैकी कोणताच रस असा नाही, ज्यात एसपींनी लीलया संचार नाही केलेला. पण एसपींना कधीतरी बोलताना ऐका. त्यांचे तेलुगू, तमिळ, कन्नड शब्दोच्चार हे सुस्पष्टतेचा नमुना आहेत अक्षरशः. एसपी इंग्रजी बोलायचे तेव्हा त्या बोलण्याचा लहेजा, शब्दांची निवड, भावना अक्षरशः शोषून घ्यावंसं वाटतं.

    खरं सांगू का, खूप लिहिलंय. तरीही एसपींना एक टक्कासुद्धा शब्दांत पकडता नाही आलेलं मला. खरं तर हा लेख एसपींच्या सच्छील आयुष्याचं माझ्यासारख्या सामान्य रसिकाने केलेलं सेलिब्रेशन आहे केवळ. ही आदरांजली आहे, मृत्यूलेख खचितच नाही. कारण, संस्कृतात श्लोक आहे,
    “जयन्ति ते सुकृतिनो रससिद्धा: कवीश्वरा:।
    नास्ति येषां यश:काये जरामरणजं भयम् ।।”
    हा श्लोक जणू काही एसपींसाठीच लिहिलेला असावा, इतका त्यांना चपखल लागू पडतो तो. पण एवढं लिहूनही एक गोष्ट मात्र लिहायची राहिलीच! लेखाच्या सुरुवातीला लिहिलंय की, एसपींनी कोदंडपाणींच्या समोर अधिकप्रसंगासहीत रफ़ींचं एक गीत सादर केलं होतं. ते गीत कोणतं होतं? ते होतं, “दोस्ती” (१९६४) चित्रपटातील सुमधुर गीत, “जानेवालों ज़रा”! काल एसपी गेल्यानंतर या गीताला एक नवाच आयाम लाभलाय. विशेषतः
    “इस अनोखे जगत् की मैं तक़दीर हूँ
    मैं विधाता के हाथों की तसवीर हूँ
    इस जहाँ के लिए
    धरती माँ के लिए
    शिव का वरदान हूँ, मैं तुम्हारी तरह”
    या ओळी आता मला तरी आयुष्यभर एसपींशिवाय अन्य कुणाची सय नाही देऊ शकणार! अनेक कलाकार असतात, जे सरस्वतीचे वरदान घेऊन येतात. एसपी साक्षात वाग्देवीचा अंश होते. तो अंश काल वागेश्वरीकडे परत गेला, आपला आवाज तुम्हां-आम्हां रसिकांच्या अंत:करणात जिवंत ठेवून. शारदेच्या अंशा, तुला सद्गती लाभो!!

    — © विक्रम श्रीराम एडके

    लिंक: https://bit.ly/3cz9LjN

    (एसपींना आदरांजली वाहाण्याच्या निमित्ताने ‘विवेक साप्ताहिका’च्या ई-आवृत्तीत प्रकाशित झालेला लेख.)

  • हसरत

    जिस्मों की पहेलियों को
    साँसों की सहेलीयों को
    साँसों से सुलझा दो तुम, खुल जाऊँगी!
    गिरहा खुल जाऊँगी!!

    मैं सदियों से खोई पडी हूँ
    तारों के भुलभुलैया में
    युगों से वहीं खडी हूँ
    समय के तालतलैया में
    खाली सी हवेलीयों को
    साँसों की सहेलीयों को
    साँसों से सुलगा दो तुम, भर आऊँगी!
    पूरी भर आऊँगी!!

    मैं मौन की एक नदी हूँ
    शोर भरी इस दुनिया में
    है मेरा कोई घाट कहाँ
    छोर नहीं इस दुनिया में
    काई जमी हथेलियों को
    साँसों की सहेलीयों को
    साँसों से पिघला दो तुम, घुल जाऊँगी!
    तुझ में घुल जाऊँगी!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [www.vikramedkde.com । चित्र: प्रातिनिधिक । चित्रश्रेय: मूल चित्रकार को । चित्रस्रोत: इंटरनेट ।]

  • शब्दांत न मावणारी — बॉडीगार्ड

    मी अनेक चित्रपटांबद्दल लिहितो. गेल्या काही वर्षांपासून मला आवडलेल्या मालिकांबद्दल देखील नियमितपणे लिहितो. अगदी “गेम ऑफ थ्रोन्स”सारख्या (२०११-१९) ७३ भागांच्या किंवा “पर्सन ऑफ इंटरेस्ट”सारख्या (२०११-१६) १०३ भागांच्या मालिकेबद्दलही मी भरभरून लिहिलंय. त्यांच्याबद्दल लिहिताना माझी लेखणी कुंठित झाल्यासारखी, अवरुद्ध झाल्यासारखी आजवर कधी एकदा सुद्धा वाटली नाही. परंतु आज मात्र माझी लेखणी एका अवघ्या ६ भागांच्या मालिकेपुढे थबकली आहे. चोवीस तास उलटून गेले मी ही मालिका पाहून, परंतु अजूनही मी लिहिताना शंभरदा खोडतोय. ती मालिका म्हणजे, बीबीसी-वनची “बॉडीगार्ड” (२०१८-)!

    डेव्हिड बड/बुड (रिचर्ड मॅडेन) हा भूतपूर्व सैनिक युद्धावरून जरी परतलेला असला, तरीही युद्धाच्या जखमा अद्यापही अंगावर आणि मनावर बाळगून आहे. तशातच त्याची निवड कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाची सांसद आणि गृहसचिव ज्युलिया मॉण्टेग्यूचा (कीली हॉज) अंगरक्षक म्हणून होते. ही बाई मोठी धीराची आहे. अल्पावधीतच तिने राष्ट्रीय राजकारणात मोठी मजल मारलीये. आणि आता ती संसदेत जे विधेयक मांडणार आहे, त्यानंतर तर ती थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीतच आघाडी घेण्याची शक्यता आहे. यातून अर्थातच कल्पनेपल्याडचा आवाका असलेलं शह-काटशहांचं घट्ट जाळं विणलं जाऊ लागतं!

    माझा एक सर्वसाधारण नियम आहे. कोणत्याही मालिकेने पहिल्या पंधरा मिनिटांत मला प्रभावित केले नाही, तर नंतर तिने प्रभावित करण्याची शक्यता खूपच खालावते. उदाहरणार्थ, “पर्सन ऑफ इंटरेस्ट”. ती पहिल्या दहा मिनिटांतच चित्रपटीय तंत्रे, कथन आणि साहसदृश्ये अशा विविध आघाड्यांवर जी बाजी मारते की, मालिका पाहाण्याच्या उत्साहाला जेटपॅकच लागले पाहिजे. “बॉडीगार्ड”चा पहिला प्रसंग एका रेल्वेत घडतो. जवळजवळ पंधरा-वीस मिनिटं चालतो तो. खरं सांगतो, तो प्रसंग संपल्यावर मी दहा मिनिटं मालिका पॉज करून बसलो होतो, फक्त शांतपणे श्वास घेण्यासाठी! एवढी ही मालिका तुम्हाला शोषून घेते. इतका ताण मी अलिकडच्या काळात कोणत्याच मालिकेत अनुभवलेला नाही. एवढेच नव्हे, तर प्रत्येक भागातील तणावाच्या प्रत्येक प्रसंगात तितकाच तणाव निर्माण करण्यात ही मालिका पूर्णपणे यशस्वी ठरली आहे.

    डेव्हिड आपल्या कामात कमालीचा पक्का आहे. पण वैयक्तिक दृष्ट्या त्याला मॉण्टेग्यूचे राजकारण पटत नाही. किंबहूना त्याला राजकारणाची तितकी सखोल समजदेखील नाही. तो आपला साधा रांगडा सैनिक आहे. आयुष्य आणि परिस्थिती दोन्ही बाजूंनी गांजलेला आहे. त्याचं नशिब अतिशय वाईट आहे. त्याच्या कामाच्या ठिकाणी त्याला लोकांचं ऐकून घ्यावं लागतं, ते त्याचं कामच आहे. सगळीकडचे वरिष्ठ त्याला सहजी वापरून घेतात. परंतु वैयक्तिक आयुष्यातही तो अतिशय अपोलोजेटिक बनलाय. तो जितक्या वेळा बायकोला उगाचच सॉरी म्हणतो, तितकं क्वचितच कुणी म्हणत असेल. पण तरीही तो अत्यंत चाणाक्ष आहे. त्याच्या कामासाठी आवश्यक अशा एकूण एक थियरेटिकल आणि प्रॅक्टिकल कौशल्यांचा खजिना आहे त्याच्यापाशी. इतकं गुंतागुंतीचं पात्र अलिकडच्या काळात क्वचितच कोणत्या मालिकेत लिहिलं गेलं असेल. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या सगळ्याच्या सगळ्या बाबी रिचर्ड मॅडेनने ज्या काही संयतपणाने अधोरेखित केल्या आहेत त्याला तोड नाही.

    मुळात ही मालिका मी बघायला सुरू केली होती ती “अरे, रॉब स्टार्कची मालिका” असा विचार करून. परंतु पहिल्या दहाच मिनिटांत रिचर्ड मॅडेनने माझ्या मनातील त्याची रॉब स्टार्कची छवि कायमची पुसून टाकली. त्याने जे काम केलेय, ते अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. “बॉडीगार्ड”च्या भूमिकेत आपल्या वैयक्तिक भावना चेहऱ्यावर दिसू न देण्याची त्याची शैली निव्वळ अप्रतिम आहे. एकदा त्याला ड्युटीवर असताना हसायचा प्रसंग येतो, त्या वेळी तो ज्या प्रकारे पापणीची उघडझाप करावी तितक्या निमिषार्धात तोंड उघडून मिटतो की, वाह रे वाह! किंवा एकदा त्याला ड्युटीवर असताना एक वाईट बातमी समजते. तो त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही, परंतु त्याचा एकच गाल ज्या सहजपणे थरारतो, तो निव्वळ बघण्याचा विषय आहे. तोच रिचर्ड मॅडेन डेव्हिडचे वैयक्तिक आयुष्य चितारताना मात्र कायिक अभिनयातून भावनांचा कल्लोळ असा काही चितारतो की, विचारता सोय नाही. प्रमाणापलिकडे हँडसम, ब्रिटीश आणि अभिनयाची सांगोपांग जाण असणारा हा माणूस सर्वार्थाने उज्ज्वल भविष्याचा धनी आहे. त्यामुळेच जेम्स बॉण्डची भूमिका करण्यासाठी योग्य निवड कोण असे जर कुणी मला विचारले, तर मी क्षणाचाही विलंब न करता इथून पुढे रिचर्ड मॅडेनचेच नाव घेणार आहे. शेकडो कारणं आहेत “बॉडीगार्ड” पाहाण्याची, परंतु एकाच कोणत्या तरी कारणासाठी पाहाणार असाल, तर फक्त आणि फक्त रिचर्ड मॅडेनच्या कामासाठी पाहा! अर्थातच कीली हॉजने व्यावसायिक आयुष्यात कणखर परंतु वैयक्तिक आयुष्यात कमालीची भित्री ज्युलिया मॉण्टेग्यू तितक्याच सक्षमपणे उभी केलीये. तिच्या माध्यमातून लेखक आणि दिग्दर्शकांनी राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या दुहेरी आयुष्यावर केलेले भाष्य अगदीच अचूक आहे!

    काही मालिका या थ्रिलर असतात. काही पॉलिटिकल थ्रिलर असतात. काही सस्पेन्स थ्रिलर असतात. काही अॅक्शन थ्रिलर असतात. काही सायकॉलॉजिकल थ्रिलर असतात. “बॉडीगार्ड” मात्र अशा दुर्मिळ प्रजातीत येते की, ती एकाच वेळी या सगळ्याच प्रकारची आहे. ती एकाच वेळी जिहाद, उजव्या विचारसरणीचा नैसर्गिकरित्या जगभर चढता आलेख, युद्ध आणि त्याचे परिणाम, राजकारणातील दुर्गम डावपेच, कायदा आणि सुव्यवस्था, पीटीएसडी अशा वेगवेगळ्या – म्हटलं तर परस्परावलंबी आणि म्हटलं तर पूर्णतया भिन्न विषयांबद्दल अनेक स्तरांवर आणि सखोल भाष्य करते, आणि ते ही केवळ ६ च भागांत! या मालिकेत दाखवलेले राजकारण हे शब्दशः “हाऊस ऑफ कार्ड्स” (२०१३-१८) आणि “गेम ऑफ थ्रोन्स”च्या वरताण आहे. “बॉडीगार्ड” आणि त्यांच्यातील सगळ्यांत मोठा फरक म्हणजे, उपरोक्त दोन्हीही मालिका या नंतरच्या पर्वांमध्ये पारच गंडल्या, परंतु “बॉडीगार्ड”ला मात्र भल्याभल्यांना न समजू शकलेली एक गोष्ट समजलीये, नेमके कुठे थांबायचे! आपण कितीही अंदाज लावायचा प्रयत्न केला तरीही असीम संयतपणे उलगडत जाणाऱ्या या नाट्याने रहस्याच्या पेटाऱ्यावरील झाकण अखेरपर्यंत घट्ट बंद राखण्यात पूर्ण यश मिळवलेय.

    तुम्ही जर मालिका त्यांच्यातील चित्रपटीय तंत्रांसाठी पाहात असाल, तर या मालिकेसारखी दुसरी मालिका एवढ्यात तरी कोणतीच दिसत नाही. स्टीव्ह सिंगल्टन व अँड्र्यू जॉन मॅकक्लिलण्ड यांनी तणावाचे प्रसंग ज्या पद्धतीने संपादित केले आहेत, ते संपादनाचे वस्तुपाठ आहेत. जॉन ली ने ज्या पद्धतीने दृश्ये त्यांच्या चपखल कलर पॅलेटसह चितारली आहेत, ती छायाचित्रणाचा वस्तुपाठ आहेत. थॉमस व्हिन्सेंट आणि जॉन स्ट्रिक्लॅण्ड यांनी छोट्या छोट्या प्रसंगांतून, साध्याश्याच सूचक वाक्यांतून, सांकेतिक मौनांतून जे नाट्य उभे केलेय, ते दिग्दर्शनाचे वस्तुपाठ आहेत. एकच उदाहरण सांगतो. ज्युलियाची टिव्हिवर प्रश्नोत्तरी चित्रित होतेय. ती प्रश्नांची उत्तरं देतेय. परंतु कॅमेरा मात्र डेव्हिडच्या चेहऱ्यावर आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर तिची प्रश्नोत्तरी प्लेबॅकमध्ये दिसतेय. तिच्या शब्दांवर तो मौनातूनच प्रतिक्रिया देतोय, हे दृश्य इतक्या कल्पकतेने चित्रित केलेय की मन आपसूकच स्तुती करू लागते! एक उदाहरण म्हणालो, पण अजून एक सांगण्याचा मोह आवरतच नाहीये. डेव्हिड ज्युलियाच्या कार्यालयाबाहेर उभा राहून तिच्यावर लक्ष ठेवतोय. ती कार्यालयात एक मिटिंग घेतेय. दृश्य त्याच्या पीओव्हीने आणि त्रयस्थ असे इंटरकटमध्ये दिसते. परंतु ऐकू मात्र केवळ त्रयस्थ नजरेतूनच येते. त्याच्या पीओव्हीला पूर्ण शांतता आहे. का? कारण तो साऊंडप्रुफ काचेच्या बाहेर उभा आहे. इतक्या साध्या युक्तिने दिग्दर्शक तांत्रिक गंमत तर करतोच, शिवाय त्या दोघांमधील सामाजिक आणि बौद्धीक दरीदेखील उभी करतो! असे अनेक छोटे-छोटे प्रसंग आहेत, जे निव्वळ तांत्रिक क्षमतेच्या जोरावर शहारा निर्माण करतात. कसदार कथेला अशी तांत्रिक शुद्धतेची जोडच, या मालिकेला अजोड बनवते!

    व्यक्तिश: मी अमेरिकन मालिकांपेक्षा ब्रिटीश मालिकांचा चाहता आहे. एक तर ते अजूनही अभिनयाला व्यवसायापेक्षा कला अधिक समजतात. त्यांचे नाट्य हे कायमच नैसर्गिक असते. मी सदर्न, नॉर्दर्न, कॉक्नी, स्कॉटीश, आयरीश वगैरे विविध ब्रिटीश उच्चारपद्धतींचा अतोनात पंखा आहे. त्यांची शब्दसंपदा, उच्चारण्याच्या खानदानी आणि इतर पद्धती – हे खरं इंग्लिश. अमेरिकनांनी इंग्रजी भाषेचे आपल्या संस्कृतीहीन वर्तनाने अवमूल्यनच तेवढे केलेय. पण माझा हा झुकाव बाजूला ठेवूनही “बॉडीगार्ड” सगळ्यांच पातळ्यांवर सरसच ठरते. वर मी लिहिलेय की, या मालिकेबद्दल लिहिताना माझी लेखणी कुठून सुरुवात करू आणि काय काय लिहू, या विचारांनी अक्षरशः थबकलीये. आता एवढं लिहून झाल्यावरही माझी ती आणि तशीच भावना कायम आहे. एवढे लिहूनही खूप काही लिहायचे राहूनच गेले आहे, नि:संशय “बॉडीगार्ड” ही मालिका खरोखरच शब्दातीत आहे!

    *५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

    टीप: “बॉडीगार्ड” नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.