सावरकर नावाचा ब्रॅण्ड!!

नव्याने विमानात बसणाऱ्यांची एक बेक्कार गंमत होते. उद्धरिणीने (लिफ्ट हो!) जाताना कसं वजनरहित वाटतं आणि डोकं पिसाहून हलकं होतं, तसं वाटतं. आणि त्या अवस्थेत प्रतितास शेकडो किलोमीटर वेगाने आपण हवेत तिरके भिरकावलो जात असतो!! बाऽबोऽऽ!! शब्दातीत अवस्था असते उड्डाण म्हणजे!! यात एक वेगळाच त्रास होतो. कान भयानक दुखतात. हवेचा दाब सतत बदलत असतो. त्यामुळे कानांवर प्रचंड ताण येतो. जरा कुठं वर-खाली झालं की, “पुटूक पुटूक” आवाज करत कानात लहानसे स्फोट होतात की “सुंईईईऽऽ..” आवाज करत अडकून राहिलेली हवा निघून जाते. परत नव्याने दाब. तात्पुरता बहिरेपणा येतो. उतरल्यावरही कित्येक तास कान दुखत राहातात. यासगळ्यात नाक व तोंड दाबायचं आणि प्रयत्नपूर्वक कानावाटे श्वास सोडायचा, ह्या द्राविडी प्राणायामाची निराळीच गंमत असते!!

मुंबई ते चेन्नई प्रवासात फारच त्रास झाला मला. कारण असं काही होईल याची कल्पना होती, पण इतकं होईल असं कुणाला वाटतंय!! त्यातून हवाईसुंदरीला मी फारसा आवडलो नसावा, कारण तीनतीनदा बोलावल्यावर तिने शेवटी कापसाचे बोळे आणून दिले. तशी ती पण नुसती “हवाई”च होती मेली, “सुंदरी” तर औषधालाही नव्हती! शेवटी व्हायचा तो त्रास झालाच. पण तिथून पुढे चेन्नई ते पोर्टब्लेअर प्रवासाच्या वेळी मात्र मी मानसिक तयारी करुन ठेवली होती. त्याप्रवासात काही मला खिडकीजवळची जागा नव्हती मिळालेली. उजव्या रांगेतली पहिली जागा. दोन तमिळ ख्रिश्चन कुटूंबे बिचारी माझ्यामुळे निम्मी इकडं आणि निम्मी तिकडं झालेली. नवरे, बायका आणि चिल्लीपिल्ली! “तमिळ” म्हटलं की मुळातच माझे अष्टसात्त्विकभाव जागृत होतात. का कोण जाणे पण मला मी मागच्या जन्मीचा तमिळ वाटतो, इतकी ओढ वाटते मला त्या भाषा आणि संस्कृतीबद्दल. त्यामुळे मी त्या अण्णा-अम्मांशी मोडक्यातोडक्या तमिळमध्ये गप्पा सुरु केल्या!

त्यांच्यातले एक अण्णा कोटक बँकेत कामाला होते. मग देशाची सध्याची अवस्था, मोदी-बिदी असले “लडकोंवाले” विषय बोलून झाल्यावर गाडी हळूच “अंदमानला कश्यासाठी?” ह्या प्रश्नाकडे वळली. ती कुटूंबं सप्ताहान्त साजरा करायला सहज म्हणून चालली होती. मला विचारलं तर मी सांगितलं की, “महाराष्ट्रातून आम्ही काही लोक चाललोय अंदमानला. सावरकरांसाठी! आम्ही नुसते फिरणारच नाही आहोत तर मी व्याख्याने देणार आहे तिथे सावरकरांवर. त्यासाठी वक्ता म्हणून चाललोय”, वगैरे वगैरे. यावर साहजिकपणे त्यांनी विचारलं की, “कोण सावरकर बुवा”? बास!! नाहीतरी महाविद्यालयीन काळात एका बिग्रेडी प्राध्यापकाला नडलो होतो त्यावेळी त्यांनी हताश आवाजात म्हटलेच होते, “तू जिथं-तिथं सावरकर घुसडतोस सतत”! इथे तर सरळ समोरुन प्रश्न आला होता, “कोण सावरकर”? माझ्या डोक्यात उलटी गणती सुरु झाली, “३.. २.. १.. सुरु”!! मी तासभर त्या चार-पाच जणांना इंग्लिश आणि तमिळमध्ये सावरकर समजावून सांगत होतो. त्यांची साहजिक प्रतिक्रिया होती, “देशासाठी आयुष्यभर एवढा त्रास भोगलेला हा माणूस आम्हाला माहितीच नव्हता”! त्यांच्यापैकी एकाने विचारले की, “सावरकर प्रत्यक्षात किती थोर होते”? तेवढ्यात घोषणा झाली, “कृपया कुर्सीकी पेटियाँ बाँध ले, हम कुछही मिनटोंमें पोर्टब्लेअरके वीर सावरकर आंतरराष्ट्रीय हवाईअड्डेपे उतरनेवाले है..”! मी म्हणालो, “अंदमानमधल्या एकमेव विमानतळाला एका मराठी माणसाचं नाव द्यावं लागलं, इतके थोर होते सावरकर”! यावर आम्ही सगळेच हसायला लागलो. बोलण्याच्या भाषा लाखों असतील जगात, पण हास्याची भाषा एकच असते!!

हा काही अंदमानप्रवासातला असा एकमेव अनुभव नाही. तिकडे आमचा समन्वयक होता एक. विकास नाव त्याचं. वडील पंजाबी, आई तेलुगू, वाढला बंगाली बहुसंख्य असलेल्या अंदमानमध्ये. त्यामुळे ह्या तिन्ही भाषा तर तो अस्खलित बोलतोच. शिवाय अंदमानात राहून राहून तमिळ आणि हिंदीतसुद्धा पारंगत झालेला. इंग्रजीही अतिशय उत्तम. बाकीचे आमच्या ठरलेल्या गाड्यांमधून फिरायचे. मी म्हणालो, “मला नाही असं फिरायचं”! तर मला त्याच्या बाईकवरुन सबंध पोर्टब्लेअर फिरवायचा हा गडी. आमच्यासोबत राहून राहून मराठीसुद्धा शिकून घेतलं त्याने गरजेपुरतं. एके दिवशी मला म्हणाला, “यार तुम ये डेढ़-दो घण्टे क्या भाषण देते हो? मुझे सुनना है”! मी म्हणालो, “आ जाओ आज शामको”! आला. सगळ्यात मागे बसला. मराठी व्याख्यान. साहेबांना एक शब्दसुद्धा कळला नाही. पण शेवटपर्यंत बसला होता. व्याख्यान संपल्यावर म्हणाला, “विक्रमसर, मुझे समझमें तो कुछ नहीं आया, पर पूरा माहौल भावूकसा हो गया था. ज़रुर कुछ अच्छी बातेंही बताई होंगी! इतना मानते हो आप महाराष्ट्रीयन लोग वीर सावरकरको”? मी म्हणालो, “सावरकर अगर भगवान नहीं तो भगवानसे कम भी नहीं हमारे लिए”! तो विचारात पडला. जरा वेळाने म्हणाला, “हम आजतक सेल्युलर जेल किसी टुरिस्ट स्पॉटकी तरहही दिखाते आए है. आज पहली बार सोच रहा हूँ की, उसके साथ लोगोंकी कितनी भावनाएँ जुडी हो सकती है! आईंदासे मैं जेल ले जाते वक़्त ये ध्यान रखूँगा और लोगोंको बताऊँगा की जिस इन्सानके लिए आपलोग यह जेल देखने आए हो, वह भगवानसमान है महाराष्ट्रमें”!!

मला वाटतं, आपण मराठी लोक आपल्याच महापुरुषांबद्दल न्यूनगंड बाळगतो ना, म्हणून आपल्या लोकांना कुणी फारसे ओळखत नाही बाहेर. आपण आपल्याच लोकांची सकारात्मक बाजू डंके की चोटपे सांगायला लाजतो. तिकडे हॅवेलॉक बेटावर एक “राधानगर बीच” नावाचा नितांतसुंदर समुद्रकिनारा आहे. आशिया खंडातला तिसरा सगळ्यात सुंदर आणि भारतातला तर सगळ्यात सुंदर समुद्रकिनारा. पार गळ्यापर्यंत पाण्यात गेलात तरीही खाली पाहिल्यास पावले स्पष्ट दिसतील, एवढा स्वच्छ! तिकडे आम्ही सगळे मनसोक्त खेळलो. खेळून झाल्यावर कपडे-बिपडे बदलले आणि तिथल्या बाकड्यांच्या समूहात सगळेजण अर्धवर्तुळाकार बसलो. आमच्या मंडळींचा अतरंगीपणा असा की, आजचे व्याख्यान इथेच करुया. मग काय! अतीवसुंदर, नादमय समुद्र आणि त्या पार्श्वभूमीवर सावरकरांची कीर्ती सांगणारा मी! एवढे सगळे लोक एकत्र जमून एकाच माणसाचं ऐकताहेत म्हटल्यावर कुठून कुठून आलेले पर्यटकसुद्धा जमून ऐकू लागले. पाहाता-पाहाता शे-दिडशे माणसं जमली. क्वचितच कुणाला मराठी समजत असावं त्यांच्यापैकी. मी मुद्दामच मराठीतून व्याख्यान सुरु ठेवलं. व्याख्यान संपल्यावर एक बंगाली काका हातात भेळेचा पुडा घेऊन बकाणे भरता-भरता आले, “ये जो आप ‘सावन.. सावन..’ कह रहे थे, वह क्या था?” मला हसू आले. मी त्यांना म्हणालो, “सावन नहीं, सावरकर”! मग मी त्यांना सावरकर समजावून सांगितले, ते कसे सेल्युलर जेलमध्ये होते हेही सांगितले. त्यावर ते बाबूमोशाय काय म्हणाले असतील? म्हणे, “फिर हमारे सुभाषबाबू कौनसे सेलमें थे”? मी म्हणालो, “वह यहाँ कभी कैद थे ही नहीं! अंदमान प्रसिद्ध है मात्र सावरकरजीकी वजहसे”! तर म्हणे, “क्या बात करते हो? क्या सावरकर हमारे सुभाषबाबूसेभी बडे थे”? मी म्हणालो, “जी बिल्कुल! बल्की, सुभाषबाबूको आज़ाद हिंद सेनाकी कल्पनाभी सावरकरजीनेही दी थी. गुरु मानते थे वह सावरकरजी को! उनकी पुस्तकें बंगालीमें प्रकाशितभी करते थे सुभाषबाबू”! बंगालीकाका आता चमकले, “अरे बापरे, यह तो हमें पताही नहीं था. धन्यवाद सर”!

पाहिलंत? इतर राज्यांनी महाराष्ट्राच्या तुलनेत खूपच कमी क्रांतिकारक दिले. पण केवढा पूज्यभाव त्यांच्या मनात आपापल्या क्रांतिकारकांबद्दल! नाहीतर आपण!! नुसती मराठी क्रांतिकारकांची यादीच करायची म्हटलं तरी खंडांमागून खंड भरतील, पण आम्ही करंटे न्यूनगंडी, त्यांच्याबद्दल बोलायलादेखील लाजतो. मुळात आम्हालाच काही माहिती नसतं तर बोलणार तरी काय म्हणा! पण माहिती तर त्या बंगाली काकांनाही नव्हती. तरीदेखील रेटून विचारलंच ना त्यांनी सुभाषबाबूंबद्दल? आणि आम्ही आमच्याच गौरवबिंदूंपासून दूर दूर पळतो. मला नाही वाटत, पंजाबात शीखेतर भगतसिंहांचा द्वेष करत असतील. नाही! तो ब्रॅण्ड आहे त्यांच्या राज्याचा!! बंगालात कायस्थविरोधी चळवळ आहे की नाही कोण जाणे, पण असली तरी कुणीही बंगालीबाबू सुभाषबाबूंचा द्वेष करताना नाही आढळणार तुम्हाला. ब्रॅण्ड आहे तो त्यांच्या राज्याचा! पण त्याच भगतसिंहांच्या इतके, किंबहूना काकणभर जास्तच क्रांतिकार्य केलेले राजगुरु! केवळ त्यांच्या जातीपायी त्यांचा द्वेष करणारे किती मराठी दाखवू तुम्हाला, बोला! यांची तोंडं सदोदित वाकडीच!! यांना टिळक नको, चापेकर नको, सावरकर तर साताजन्मीसुद्धा नको. बरं बाबा, मग जे तुम्हाला गोड लागतात त्यांच्याबद्दल तरी बोला. छे!! परप्रांतीयांसमोर आपल्याच लोकांचे गुणगान गातानाही हातभर फाटते. मुळात माहितीच काही नसतं. आणि इतरांचा द्वेष करण्यातच सगळं आयुष्य गेल्यामुळे सर्वसमावेशक भाषेत आपला माणूस पटवून देण्याचं कौशल्य तर त्याहूनही नसतं. काय कप्पाळ ब्रॅण्ड निर्माण होणार महाराष्ट्राचा? मग बोंबलायचं, “त्या अमुक राज्यात शिवाजी महाराजांना लुटारू म्हणून शिकवलं जातंय होऽ”! अरे थुक्रटराव, तू जर कधी बाहेरच्या जगात शिवरायांची चांगली बाजू सांगितलीच नाही, तर ते त्यांना जे समोर दिसेल तेच खरं मानणार ना ते येडपटा!! पण तू तर “शिवाजी कसे हिंदू नव्हतेच” असला पागल फेसबुकीया शोध लावत किबोर्ड बडवत बसलायस नाहीतर व्हिएतनामचा तो कोणतातरी नेता कसा रायगड बघायला आला होता याच्या खोट्यानाट्या कथा पसरवत बसलायस. मग जग शिवरायांना असंच काहीतरी वाट्टेल ते संबोधणार!!

टिळक असोत, सावरकर असोत, शिवराय-शंभूराय वा थोरले बाजीराव असोत, हे ब्रॅण्ड आहेत महाराष्ट्राचे. छातीठोकपणे अमराठी आणि अभारतीय लोकांना कर्तृत्व सांगा त्यांचं. सकारात्मक बोला आणि बघाच त्यांचा महाराष्ट्राबद्दलचा आदर कसा दुणावतो ते! एवढे मोठे मोदी, पण पटेल आणि गांधी किती जरी भिन्न विचारधारांचे असले तरीही त्यांचं कर्तृत्व सांगताना कधी थकत नाहीत. केवळ ते त्यांच्या गुजरातचे आहेत म्हणून. मग आपणच का कर्मदरिद्रीपणा करावा? बिनधास्तपणे सांगा. मी आजवर जेव्हा जेव्हा बाहेरच्या राज्यांत गेलोय, तिथे तिथे सावरकर नावाचा ब्रॅण्ड स्थापन करुन आलोय. ही तरी नुसती अंदमानातलीच उदाहरणं झाली. भाग्यनगरात (हैदराबाद) तर ठाकूर राजासिंह सावरकरांचं कर्तृत्व समजल्यावर केवळ रडायचेच बाकी होते!! येत्या फेब्रुवारीत पुन्हा चाललोय मी अंदमानला. सावरकरांबद्दल अजाण असणाऱ्यांना सावरकर सांगायला. या माझ्यासोबत. ‘फिरस्ती टूर्स’च्या श्री. Abhijeet Kulkarni (+917843011155) यांच्याकडे नोंदणी करा, आणि गर्जा जयजयकार!! आपल्याकडे सोनं आहे रे. उधळा बेभानपणे मित्रांनो! आज-उद्या आदराच्या रुपाने महाराष्ट्राकडेच परत येणार आहे ते!!

— © विक्रम श्रीराम एडके
(सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाच्या नावाशिवाय कॉपी करु नये. लेखकाचे अन्य लेख वाचायचे असल्यास पाहा www.vikramedke.com)

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *