माझ्या मना..

सकाळचा हिंसाचार सायंकाळच्या तांडवापुढे क्षुल्लक वाटू लागतो
उद्दाम अनौरस अंधार तेवढा रात्रंदिन जागतो
अरे अंधारातच तर जगायचंय आपल्याला,
कारण उजेडासाठी गरजेची असते आग!
तेव्हा माझ्या मना स्वस्थ राहा, येऊ देऊ नकोस राग!!

आग लागण्यासाठी जाळावा लागतो जीव
आणि षंढा, तुला तर नुसत्या विचारानेच भरते हीव
त्यापेक्षा सोपे मेणबत्ती जाळणे, निरुपद्रवी जिची आग!
माझ्या मना स्वस्थ राहा, येऊ देऊ नकोस राग!!

ते येतात मुडदे पाडतात, आणि आम्ही पाडतो मुद्दे
‘दहशतवादाला धर्म नसतोच मुळी’, मग कितीही बसू देत गुद्दे
गुद्दे खा, मस्त राहा, फारफार तर बन सेक्युलरी नाग!
माझ्या मना स्वस्थ राहा, येऊ देऊ नकोस राग!!

अरे मृत्यू कुणाला चुकलाय, मग त्यांनी मारले तर बिघडते कुठे?
शील-अब्रू फालतू कल्पना, म्हणे काचेचे भांडे खळकन फुटे
अरे वेड्या, अहिंसेतच तर खरा राम आहे,
बाकी विसर रामबाणाचा धाक!
आणि माझ्या मना स्वस्थ राहा, येऊ देऊ नकोस राग!!

राग, जो आला होता भीमाला दुर्योधनाचा
राग, जो आला होता पुरुला शिकंदराचा
अरे तोच की रे राग, जो आला होता शिवप्रभूंना अफझुल्ल्याचा
तो राग, तोच राग, तो तुला येत नाही कारण तुझं करून टाकलंय मेंढरू,
सत्य आणि अहिंसेच्या पोकळ कल्पनांनी!!
त्यामुळेच तर तुला पडत नाही प्रश्न की,
‘जर अहिंसा नि सत्यच सर्वस्व असेल,
तर काय वेडाचार केला होता चक्र धरताना माधवांनी’?
अरे, दुराचाऱ्यांना समूळ उखडून फेकण्याची अक्कल आली,
तरच आली खरी जाग!
माझ्या मना, उठ चल आज येऊच दे थोडासा राग!!

अरे, तुला जर राग आला तर वणवा पेटेल
भ्रमाचे जंगल जळेल अन् न्यायाचा सूर्य भेटेल
हरलास तर गाठशील स्वर्ग, खरे आहे बाबा;
पण भविष्यासाठी आहे जिंकणेच तुला भाग!
तेव्हा माझ्या मना, उठ चल यावेळी येऊच दे तुला राग!!

— © विक्रम श्रीराम एडके
[कवीच्या अन्य कविता वाचण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com]

image

One thought on “माझ्या मना..

Leave a Reply to Vishal Firodiya on Facebook Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *