"चांगले" आणि "वाईट"च्या पलीकडला – रॉकस्टार

कोणताही कलाकार घ्या. किंवा आपापल्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ ठरलेली कुणीही व्यक्ती घ्या. ते जर आत्ता आहेत तसे नसते तर कसे असले असते? ए. आर. रहमान घ्या. त्याच्या संगीताला जर अध्यात्माची बैठक नसती तर? तर तो कसा असला असता? कसा सोडा. “काय” असला असता? सहस्रो नद्यांच्या जंजाळात समुद्र “एक”च असतो… पण मग त्याने “किनारा” घेऊनच जन्माला यावं ना? समुद्राला किनारच नसला तर कसे चालेल?
  “रॉकस्टार” पाहून प्रथमदर्शनी विचित्र वाटणारे असे शेकडो प्रश्न मनात उभे राहिलेयत. ही रॉकस्टारची समीक्षा नव्हे. रसग्रहण वगैरेही नव्हे. हा आहे एक प्रयत्न. रॉकस्टार पाहून मनात कल्लोळणार्या वादळाला शब्दांत पकडण्याचा एक निष्फळ प्रयत्न. प्रत्येकाने तो आपापल्या नजरेने पाहावा.
  “पता हैं, यहाँ से बहोत दूर… “गलत” और “सही” के पार एक मैदान हैं..! मैं वहाँ मिलूँगा तुझे..!” या “रुमी”च्या ओळींनी चित्रपट सुरु होतो. आणि शेवटपर्यंत याच भावनेच्या लाटांवर हेलकावे घेत राहतो. कधी त्या लाटा आपल्याला हलकेच भिजवतात तर कधी जोरदार शिपकारा मारतात. फाडकन कुणीतरी कानफटात वाजवल्यासारख्या. पण कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही आणि तुमची नाव या वादळाच्या पार काही जाऊ शकत नाही. जाउच शकत नाही.
  “त्या”ला “ती” भेटत नाही आणि भेटूनही भेटत नाही, हाच “त्या”च्या संगीताचा पाया आहे. “पुढे काय” याचा “तो” विचार करीत नाही, किंबहुना “तो” त्या पातळीलाच पोहोचलेला नाही. “त्या”चा शेवट अटळ आहे. प्रतिभेला दुखा:ची किनार देण्यापेक्षा जर अध्यात्माचे आसन जॉर्डन देऊ शकला असता, तर निश्चितपणे उस्ताद जमील खान (शम्मी कपूर) बनू शकला असता; ही भावना पाहणार्याला सतत जाळीत राहाते. शम्मीच्या डोळ्यांतील दयेतून तर ती त्याची अगतिकता अधिकच अधोरेखित करते. जॉर्डनला जर हे कळलं असतं तर? तर, तर कदाचित त्याचं कुढणं, तुटणं, जरासं कमी होऊ शकलं असतं. “ती” केवळ निमित्तमात्र. “त्या”चं दु:ख मात्र सनातन आहे. “ती” नसती तर “त्या”ला दुसरं काहीतरी निमित्त मिळालं असतं, आणि त्याही स्थितीत Dichotomy Of Fame कायमच राहिली असती. म्हणून श्रेष्ठतेला गरज असते अध्यात्माची. त्याशिवाय श्रेष्ठतेला तिचं श्रेष्ठत्व नाही सांभाळता येत. म्हणूनच कदाचित “बीटल्स” भारतात आले होते. “स्टीव्ह जॉब्स” इकडे सन्याश्यासारखा भटकला होता. आणि म्हणूनच कदाचित “स्वामी विवेकानंद” जगभर खर्या अर्थाने “रॉकस्टार” ठरले. म्हणूनच रहमान ऑस्करलाही साधेपणाने सामोरा जाऊ शकतो आणि एकेकाळचा “सम्राट” मायकेल जाक्सन काळाच्या वस्त्रावरील एका क्षुद्र ठिपक्यासारखा क्षणात नाहीसा होतो.
“सौ दर्द बदन पे फैले हैं |
हर करम के कपडे मैले हैं ||”
हे कितीजारी खरं असलं तरी “नादान परीन्द्या”ला घरी यावंच लागतं. शेवटी डोळे मिटले तर भर सूर्यप्रकाशातही अंधारच अंधार आहे आणि डोळे उघडले तर पणतीच्या मिणमिणत्या उजेडातही सर्वत्र प्रकाशच प्रकाश आहे. तो “रंगरेज़” रंगवायला बसलेलाच आहे. फक्त आपली रंगवून घ्यायची तयारी मात्र हवी.
  हा आहे माझ्या भावनेचा कल्लोळ. कितीही प्रयत्न केले तरी शब्दांत न मावणारा.
“जो भी मैं कहना चाहूँ |
बर्बाद करे अल्फाज़ मेरे ||”
  नेहमीच्या धोपटमार्गाने जाऊन सांगायचं तर “रॉकस्टार” अवश्य पाहा. संवेदनशील असलात तर तुमच्याही मनात भावनेचा एखादा उठेल. कदाचित यापेक्षा वेगळा. पण निश्चित उठेल. रणबीरने त्याच्या वाटेला आलेल्या प्रत्येक दृश्यात सिद्ध केलेय की तो उद्याचा “सुपरस्टार” आहे. SSRK म्हणून आपण आज Super Star RajiniKanth ला ओळखतो. भविष्यातला SSRK निश्चितपणे रणबीर आहे. इम्तियाझने हा वेगळा विषय कमालीच्या प्रयोगशीलतेने मांडलाय. एकूणच चित्रपटक्षेत्रात त्याने मोलाची भर घातलीय. रहमान बद्दल काय लिहू? तो “देव” आहे एवढे पुरेसे नाही का? बाकी “नर्गिस” आणि “अदिती राव” यांनीही अतिशय उत्तम काम केलेय. कथानक आणि मांडणीच इतकी सशक्त आहे की, नायिका म्हणून कुणीही चालली असती.
  रेटिंग विचाराल तर थोड्याफार चुका लक्षात घेऊन मी ५ पैकी ४ गुण देईन. पण खरं सांगू? रॉकस्टार म्हणजे रूमीच्या कवितेसारखा आहे. “चांगले” आणि “वाईट” यांच्या पलीकडचा. त्याचं त्या पातळीला जाऊनच आस्वाद घ्यावा. बाकी
“साड्डा हक़..!
ऐत्थे रख़..!!”

© विक्रम श्रीराम एडके.
(इतरत्र प्रसिद्ध करण्याआधी लेखकाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *