Category: A R Rahman

  • आठवणींच्या गल्लीबोळांतून

    नव्वदचं दशक हे अनेक अर्थांनी नॉस्टॅल्जियाचं दशक आहे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या अनेकांसाठी ते नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद, जतिन-ललित अश्या जोड्यांनी, अन्नू मलिक वगैरेंसारख्या सफाईदार “बाजीगरां”नी व विजू शाहसारख्या अनेकानेक अंडररेटेड माणकांनी बनवलेल्या आणि कुमार, अलका, उदित वगैरेंनी बेभान होऊन गायलेल्या दिलतोड गीतांचं दशक आहे; तर नव्वदच्याच दशकात जन्मलेल्या आजच्या तरुणांसाठी ते इंडीपॉप गाण्यांमधील नव्या प्रवाहांत केलेल्या सचैल स्नानांचं दशक आहे. दोन्हीही प्रकारच्या मंडळींसाठी ते एकत्रितपणे समीरचंदेखील दशक आहे. आणि दोन्हीही प्रकारची मंडळी त्या दिवसांबद्दल बोलताना जरादेखील थकत नाहीत.

    याच दशकाने सोनू निगम, शान, केके, शंकर असे हिरेसुद्धा दिले! याच दशकाने शंकर-अहसान-लॉय दिले आणि याच दिवसांनी रहमान दिला!! त्यामुळे “आशिकी” (१९९०) वगैरेंपासून सुरू झालेली नॉस्टॅल्जियाची गाडी “रंगीला” (१९९५), “दिल से” (१९९८), “ताल” (१९९९), “कहो ना प्यार है” (२०००), “लगान” (२००१), “दिल चाहता है” (२००१), अशी शेकडों स्टेशनं पार करत करत पार “प्यार में कभी कभी” (१९९९), “कल हो ना हो” (२००३), “हम तुम” (२००४) ते थेट “धूम”पर्यंत (२००४) जाऊन पोहोचते! २००५, २००६ सालापर्यंत हा नव्वदच्या दशकातला सांगितिक मॉन्सून परतीचा पाऊस बनून बरसत होता. त्याला खऱ्या अर्थाने ब्रेक लावला तो हिमेश रेशमियाने २००५ मध्ये “आशिक बनाया आपने”द्वारे!

    तसं बघायला गेलं, तर हिमेश हे देखील नव्वदच्याच दशकाचं बायप्रॉडक्ट! परंतु “प्यार किया तो डरना क्या” (१९९८), “कुरुक्षेत्र” (२०००), “दुल्हन हम ले जाएँगे” (२०००), “तेरे नाम” (२००३) वगैरे सरधोपट मेलडीजच्या मार्गावरून जाता जाता त्याने त्याचा साऊंड “आशिक बनाया आपने”मध्ये आमूलाग्र बदलला. हा बदल जितका सानंद स्वीकारला गेला तितकाच भल्याभल्यांना समूळ हलवूनसुद्धा गेला. पहिला धक्का ओसरताच हळूहळू सारं बॉलिवूड त्याच साऊंडची कॉपी करू लागलं. स्वतःचा वेगळा साऊंड जपणारे त्याकाळीही रहमान आणि शंकर-अहसान-लॉय वगैरे लोक होते.

    यांपैकी रहमान हा बदलांना सगळ्यांत वेगळ्या प्रकारे रिस्पॉण्ड करणारा माणूस आहे. हिमेशच्या लाटेच्याही पूर्वी आपला साऊंड जुना होऊ लागल्याचं त्याने बरोब्बर हेरलं होतं आणि “रंग दे बसंती”द्वारे (२००५) त्याने सगळा खेळच पालटून टाकला होता. पण कॉपीज हिमेशच्या बनल्या, रहमानच्या नाही. कारण, रहमानचा आधीचा साऊंड हा खूपच साधासरळ, प्रयत्नाने आत्मसात करता येण्यासारखा होता. २००४ नंतर रहमानने साऊंड बदलण्याची सुरू केलेली प्रक्रिया २००९ ला “दिल्ली ६”पर्यंत पूर्ण झाली आणि तोपर्यंत त्याचा साऊंड इतका काही गुंतागुंतीचा झाला होता की त्याची सहीसही नक्कल करूनही तो प्रतिभेच्या कवेत गवसणे शक्यच नव्हते.

    याच काळाने प्रीतम, अमित त्रिवेदींसारखी मंडळी दिली, तर विशाल-शेखरला अजून वरच्या पातळीवर पोहोचवलं. म्हणजे ज्यांना रहमान परवडत नाही आणि हिमेशपर्यंत खालीसुद्धा उतरायचं नाही, ते इन्स्टंट हिट्ससाठी प्रीतमकडे जाऊ लागले. त्यात अजून थोडासा क्लास हवा असलेले विशाल-शेखरकडे तर अजून प्रयोगशीलता हवे असलेले अमित त्रिवेदीकडे जाऊ लागले.

    शंकर-अहसान-लॉय यांचाही साऊंड २००२ चे २००५ पर्यंत रिपिटिटिव्ह होत गेला. पण तुरळक अपवाद वगळता त्यांना तो अनेक वर्षे बदलताच आला नाही. त्यामुळे त्यांचे चांगले आणि हिट असे दोन्हीही प्रकारचे अल्बम्स तुलनेने कमी कमी होत गेले. त्यांच्यातला मोठा, सकारात्मक बदल दिसला तो २०१२ सालच्या “विश्वरूपम” साऊंडट्रॅकमध्ये! त्यानंतर “कट्यार काळजात घुसली” (२०१५), “मिर्ज्या” (२०१६) अशी एकाहून एक रत्ने जरी त्यांनी दिली असली तरी आत्ता आत्ता कुठे ते पुन्हा एकवार जम बसवू लागलेयत.

    दरम्यान हिमेश केव्हाच मागे पडला. किंबहूना एकेकाळचे मोठमोठे दिग्गज विस्मृतीत गेले व जाऊ लागले. अवघ्या १०-१५ वर्षांपूर्वीपर्यंत जेवढे प्रयोग मुख्य प्रवाहातल्या चित्रपट संगीतात व्हायचे, तेवढे तर आता इंडीपॉप आणि समांतरमध्येसुद्धा होताना दिसत नाहीत. चित्रपटसंगीताची तर गोष्टच नको. ते रोज रोज नवीन पायऱ्या “उतरतच” चालले आहे. आणि गंमत म्हणजे हेही दशक उद्या कुणाच्या तरी उसासे टाकायला लावणाऱ्या नॉस्टॅल्जियाचा भाग असणार आहे! जितकी कळ आज पस्तिशीत असलेल्यांच्या काळजातून कुमार सानूसाठी उठते, तितकीच उद्या कुणाच्यातरी काळजातून अरिजित सिंहसाठी उठणार आहे! बदल हाच एकमेव शाश्वत असतो असे नाही, तर बदलणारेदेखील शाश्वत असतात. त्यामुळे रहमान हा नव्वदच्या दशकातल्यांसाठी जितका नॉस्टॅल्जियाचा भाग आहे तितकाच दहाच्या, वीसच्या दशकातल्यांसाठीसुद्धा आहे आणि तीसच्या व चाळीसच्या दशकांतल्यांसाठीसुद्धा राहिल. बाकी आपापले नॉस्टॅल्जियाज खूपच सापेक्ष असतात आणि म्हणूनच ते ह्रदयाच्या कुपीत जपून ठेवायचे असतात, हूरहूर लावणाऱ्या कातरवेळी मनगटावरून फायासारखे फिरवण्यासाठी!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (संपर्क: www.vikramedke.com)

  • Gurupaurnima

    Dear A.R. Rahman –

    You were there when no one was
    When everyone is there, you still are
    Shadows leave, you do not
    Every moment teaching me a lot
    When I cry, you wipe out my tears
    You hold my hand, when strike out fears
    Your are a boat, sailing me through the Bhava-Saagar
    You not merely entertain, spiritually uplifts me rather
    You are the one who always give me a smile
    Which I wear everyday & walk another mile

    Dear A.R. Rahman, you are a Sad-Guru for me. Always keeping me on the right path & keeping my Vivek awake. After my parents, it is because of you I’m what I’m. Thanks for being there. Thank you so much. On this holy occasion of Guru-Paurnima, this is a small Sanskrit verse as a offering to you – my Guru. Kindly accept with my Namaskara.

    सच्चिदानन्दमूर्ती परब्रह्मरूपम् ।
    श्रुतीहितकारी: तव स्वरूपम् ।।
    सङ्गीताधिपतीर्यो वैराग्यपूर्णम् ।
    तस्मै ‘रहमाना’य नमोऽहं नमोऽहम् ।।

    – © Vikram Edke
    (www.vikramedke.com)

    image

  • जय हो ‘रहमान’भाई!!

    जय हो ‘रहमान’भाई!!

    रात्रीचे दहा वाजून गेलेले. चेन्नईच्या ‘अपोलो कॅन्सर हॉस्पिटल’मध्ये सर्वत्र निजानीज झालेली. स्पेशल रुम क्र. १३३५ मध्ये लहानग्या निहारिकाचीही झोपायची तयारी चालू होती. अवघी पाच वर्षांची पोर. आजच केमोथेरपीचे एक सत्र संपले होते तिचे. आई — निखिला, बिछाना नीट करून देत होती तिचा. सर्व तयारी मनासारखी झाल्यावर निहारिकाने हळूच आईच्या डोळ्यांत पाहिले.

    “हो माहितीये मला”, आई निखिला हसून म्हणाली. आणि तिने आपल्या मोबाईलवर मंद आवाजात ‘हायवे’ चित्रपटातले गीत ‘सूहा साहा’ लावले. गेले काही दिवस हा रोजचाच दिनक्रम (की रात्रीक्रम!) झाला होता दोघींचा. रोज झोपताना निहारिकाला ‘सूहा साहा’ ऐकायचेच असायचे. काही दिवसांपूर्वी या गीताची जागा ‘कडल’मधील ‘सिथ्थिरई निला’ कडे होती. त्याआधी निहारिकाला ‘127 Hours’मधील ‘इफ आय राईज्’ हवे असायचे झोपताना. त्याआधी ‘विनईतांडी वरुवाया’चे शीर्षकगीत आणि कधी कधी ‘स्वदेस’मधले ‘आहिस्ता आहिस्ता’!! सध्या निहारिका — ‘निका’चा जीव ‘सूहा साहा’वर जडला होता. आणि लपवायचे कश्याला — तिची आई निखिलाचाही!

    इतके दिवस ऐकूनही या गीताचा रोज तस्साच आणि तितकाच जादुई प्रभाव कसा काय पडतो, हे निखिलाला कधीही न सुटलेले कोडे होते. पण आता अनुभवाच्या या टप्प्यावर तिने ‘रहमान’च्या कोणत्याही संगीतामागची कारणमीमांसा शोधणे बंद केले होते. तो — रहमान — तिच्या लेकराला जगवतोय एवढे पुरेसे होते तिच्यासाठी!

    हे गीत सुरू केल्यानंतर कितीही दुखत असलं, त्रास होत असला तरीही कशी कोण जाणे पण पाचच मिनिटांत निका गाढ झोपी जायची. आजही तेच घडलं! निका झोपी गेली आणि निखिलाचं मन रहमानच्या संगीतासोबत वाहात वाहात मागे जाऊ लागलं. चार वर्षांपूर्वीची — २०१० सालची ती सकाळ लख्खपणे डोळ्यांसमोर उभी राहिली निखिलाच्या. दिवाळीच्या एक दिवस आधीची ती सकाळ! त्याच दिवशी डॉ. टि. राजा यांनी निकाला ऍक्युट ल्युकेमिया —कॅन्सर असल्याचं सांगितलं होतं. नवरा-बायकोच्या पायाखालची जमिनच सरकली होती त्यादिवशी.

    “हे बघा मिस्टर आणि मिसेस नटराजन”, डॉक्टर जणू शब्द शोधत शोधत म्हणाले होते, “तुम्ही दोघेही सुशिक्षित आहात, समजूतदार आहात, फॉरेन रिटर्न्ड आहात. मला तुम्हाला कोणत्याही भ्रमात ठेवायचं नाहीये. ल्युकेमिया बरा झाल्याची खूप उदाहरणे आहेत. परंतू निकाची केस जरा वेगळी आहे. अवघी दोनच वर्षांची आहे ती. तिचं वय आणि आजाराची तीव्रता पाहाता तिच्या हाती आता सहा आठवड्यांपेक्षा.. अं.. जास्त काळ उरलेला नाहीये”.

    डोळ्यांत पाण्याचा सागर गोळा झालेला माझ्या. आणि त्या सागराच्या भोवऱ्यांत बुडत चाललेलं माझं मन. तश्यात डॉक्टरांचा आवाज लांबच्या कुठल्यातरी किनाऱ्यावरून आल्यासारखा वाटला नसता तरच नवल. शब्दांच्या लाटा कानावर आदळत होत्या. आज्ञाधारक संगणकासारखा मेंदू त्यांचे अर्थही लावत होता. पण त्या शब्दांचा कान ते मेंदू असा प्रवास आईचं काळीज जाळत चालला होता, हे कुणाला दिसणार? माझं अंतर्मन केव्हाच खुर्चीवरून उठलं होतं अन् डॉक्टरांची कॉलर पकडून जाब विचारत होतं,

    “काय डोकं-बिकं फिरलंय का डॉक्टर तुमचं? अहो साधा ताप आला असणार माझ्या बाळाला. रात्रीची अचानक घामाघूम होते हो ती फक्त! म्हणून थेट कॅन्सरवर कुठे चाललात? अहो, जरा बघा तरी हो तिच्याकडे एकदा. फुलासारखी नाजूक आहे हो माझी पोर. देव कसा काय तिच्याशी एवढा निष्ठूरपणा करेल. सांगा ना.. सांगा ना…”

    प्रत्यक्षात ओठ जणू शिवले गेले होते. आणि शरीर क्रुसावर चढवलेल्या येशूसारखं कुणीतरी खिळ्यांनी खुर्चीला जखडून टाकलं होतं.

    डॉक्टर सांगत होते, “आपण आता जो इलाज करणार आहोत, तो केवळ निकाचा अखेरचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी. वेदना सुसह्य व्हाव्यात म्हणून..”

    मला पुढचं काहीही ऐकू येणं केव्हाच बंद झालं होतं. ‘सहा आठवडे’ या दोनच शब्दांनी माझं अवघं आयुष्य व्यापून टाकलं होतं. आणि निष्ठूर मृत्यू मला व्यापूनही दशांगुळे उरला होता — जिभल्या चाटीत आणि माझ्या पोटच्या गोळ्याकडे वखवखलेल्या नजरेने पाहात!

    मी केव्हा आणि कशी निकाच्या रुममध्ये आले मला कळलंच नाही. नवरा औषधं आणि इंजेक्शन्स आणायला बाहेर गेला होता. निका झोपली होती. आमच्या लहानश्या जगाची झालेली उलथापालथ गावीही नव्हती तिच्या. इतका वेळ रोखून धरलेला बांध तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहाताच फुटला. आपोआप हुंदका बाहेर आला. पण तो नुसताच हुंदका नव्हता. अस्पष्टसे शब्दही मिसळले गेले होते त्यात — ओ पालनहारे, निर्गुण ओ न्यारे, तुमरे बिन हमरा कौनु नाही..! परमेश्वरा, तुझ्याशिवाय माझं दु:ख निवारणारं कुणीच नाही रे..!! सवय म्हणा वा अन्य काही, पण मनाने त्याही स्थितीत नोंद घेतली होती — ‘लगान’!

    माझ्या आवाजानेच बहुतेक, निकाला जाग आली. तिने माझ्याकडे पाहून हात पसरले. तिच्या इशाऱ्याचा अर्थ ध्यानात यायला वेळ लागला मला. पण मी ताबडतोब मोबाईलमध्ये ते गाणे शोधले. हळू आवाजात गीत लावून फोन तिच्या उश्याशी ठेवून दिला मी. त्याक्षणी तिची कोणतीही इच्छा मी पूर्ण केली असती. निका हे गाणे ओळखायची. तिच्या चेहऱ्यावर परिचयाचे हासू फुलले. त्यानंतर दोनच मिनिटांत ती पूर्वीसारखीच गाढ झोपून गेली. गीत चालूच होते — प्रभुजी हमरी हैं बिनती, दुखीजन को धीरज दो, हारे नहीं वो कभी दुखसे.. हैं पथमें अंधियारे, दे दो वरदानमें उजियारे… शब्द समजणं केव्हाच बंद झालं होतं. मात्र त्या संगीताने अवघं वातावरण कुंद करून सोडलं होतं. खूप सकारात्मक असं.. भारून टाकणारं काहीतरी रुग्णालयाच्या खोलीत निर्माण झालं होतं. त्या भारलेल्या क्षणीच मी निर्णय घेतला. निकाच्या शांत चेहऱ्याकडे पाहाताना निर्धार अजूनच पक्का झाला होता माझा!

    नवऱ्याच्या कामाच्या शिफ्ट्समुळे त्याला तर शक्यच नव्हते. त्यामुळे निखिलाच सकाळी सकाळी सारं सामान घेऊन आली. आता तिचा मुक्काम तिच्या बाळासोबतच असणार होता. औषधोपचार सुरू झाले. परंतू औषधांसोबतच निखिला आणखी एका गोष्टीचे डोस देत होती निहारिकाला — रहमानची गाणी! जगातील इतर कोट्यवधी लोकांसारखाच तिचा खूप विश्वास होता रहमानच्या संगीतावर आणि त्यात गवसणाऱ्या परमेश्वरावर! निहारिका केवळ रहमानच्याच संगीताला चांगला प्रतिसाद देते, आनंदी होते, कितीही वेदना होत असल्या तरीही विसरते; हे निखिलाने बरोब्बर हेरलं होतं. त्यातल्या त्यात ‘ओ पालनहारे’ आणि ‘कन्नथ्थिल मुथ्थमिटाल’ मधील ‘ओरु देवम् तंद पूवे’ विशेष आवडते होते तिचे. डॉक्टरांनी फक्त सहाच आठवड्यांचा, म्हणजे अवघ्या ४२ दिवसांचाच अवधी दिला होता. ती निहारिका नाही नाही म्हणता म्हणता दिड महिना उलटून गेला तरी जिवंत होती, एवढेच नव्हे तर उपचारांना प्रतिसादही देत होती. डॉ. राजांच्या भाषेत सांगायचं झालं तर हा वैद्यकीय जगतातला चमत्कारच होता. निहारिकासारख्या केसेसमध्ये कुणीच अशी प्रगती केली नव्हती. निखिलाला ठाऊक होतं, हे सारं केवळ एकाच व्यक्तीमुळे घडतंय — ए. आर. रहमान!

    एकदा निकाच्या नियमित तपासणीसाठी एक नर्स खोलीत आली. त्यावेळी योगायोगाने ‘दिल्ली ६’मधलं ‘अर्जियाँ’ सुरू होतं. दोनेक मिनिटं गाणं ऐकल्यावर नर्स अचानक म्हणाली,
    “कव्वाली? आर यू मुस्लिम्स”?

    निखिलाने मानेनेच नकार दिला. तो विषय तिथेच थांबला. निखिलाच्या मनातून मात्र तो विषय गेला नाही. त्यादिवशी रात्री सारे झोपले तरी निखिला एकटीच स्वत:शी विचार करत जागी होती — आपला धर्म हिंदू. निहारिकाचे बाबा ख्रिश्चन. निहारिकाला आजवर कित्येकदा रक्त द्यावे लागलेय. रक्तपेढी थोडीच धर्मानुसार रक्ताची वर्गवारी करते? कित्येकदा कुणा मुसलमानाचंही रक्त तिला दिलं गेलं असेलच की. म्हणजे निहारिकाच्या धमन्यांत एकाचवेळी तीन वेगवेगळ्या धर्मांचं रक्त वाहातंय! मग निहारिकाचा धर्म कोणता? रहमानच्या संगीताचंही असंच असतं का? त्याचा धर्म आहे इस्लाम. म्हणून मग त्याचं संगीत मुसलमान ठरतं का? असं असेल तर मग रोज सकाळी गणपतीच्या मंदिरात गेल्यावर माझ्या कानांत ‘अर्झियाँ’ वा ‘हायवे’मधील ‘तू कूजा’ कसं काय वाजतं मग? आपला ख्रिश्चन नवरा का बरं ‘स्वदेस’मधलं ‘पल पल हैं भारी’सारखं श्रीरामाचं भजन ऐकताना भावूक होतो मग? ‘सपने’मधलं ‘रौशन हुई रात मरियमका बेटा उतरके जमींपे आया’ ऐकल्या ऐकल्या शेजारी राहाणाऱ्या फातिमामौसींच्या डोळ्यांत का बरं पाणी उभं राहिलं होतं मग? ‘कडल’मधलं ‘अन्बिन वासले’ तर चर्चमध्ये गायचं गीत आहे ना, तरीही केवढं आवडतं आपल्याला! खरं तर इस्लाम हा रहमानचा केवळ वरवरचाच धर्म आहे. तो त्याचा खरा धर्म नाहीच. त्याचा खरा धर्म आहे अध्यात्म! अध्यात्म — जे जगातल्या प्रत्येक धर्माच्या गाभ्यात आहे. आणि म्हणूनच रहमानचं संगीत वैश्विक आहे. त्यातल्या भावना सच्च्या आहेत. त्यातल्या जाणिवा दैवी आहेत. इतरांची गाणी आवडतात किंवा आवडतही नाहीत, परंतू रहमानची गाणी मात्र पार आत्म्यात झिरपतात.. जणू काही तेच त्यांचे खरे घरटे असावे! मी जेव्हा जेव्हा रहमानचं एखादं गीत, त्याच्या संगीताचा एखादा लहानसाच तुकडादेखील ऐकते, तेव्हा तेव्हा असं वाटतं जणू मी माझ्या मोबाईलवरून थेट परमेश्वराला फोन लावलाय आणि तोही त्याच्या खाजगी क्रमांकावर!

    विचार करता करता निखिलाला केव्हा झोप लागली तेच समजले नाही! जाग आली तेव्हा नुकतंच कुठे उजाडू लागलं होतं. बघता बघता तीन वर्षं कशी भुर्रकन उडून गेली होती! निहारिका आता हळूहळू बरी होऊ लागली होती. सावरू लागली होती. बागडू लागली होती. लब्बाड ‘जोधा-अकबर’मधलं ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’ लावलं की एखाद्या सूफी संताप्रमाणे एक हात आकाशाच्या दिशेने उंचावत आणि दुसरा हात दानमुद्रेत आडवा पसरत गिरक्या घेते. मध्येच “आई ते ‘रंग दे बसंती’मधलं ‘लुकाछुपी’ लाव ना”, म्हणते! तिला रुग्णालयातून केव्हाच सुटी मिळालीये. आता फक्त अधून-मधून केमोथेरपीसाठी रुग्णालयात यावं लागतं. याप्रकारात निकाचे सारे केस झडले. निखिलाला वाईट वाटलं, तर निहारिकानेच तिला ‘लगान’मधलं ‘चले चलो’ ऐकवत धीर दिला! आजही अशीच केमोथेरपी संपवून निखिलाने गाडी सुरू केली तर मागच्या सीटवर बसलेली निहारिका मोठ्ठ्याने ओरडली, “आई, ‘रंग दे बसंती’ लाव ना, मला नाचायचंय”! अन् आनंदाला पारावार न राहिलेली निखिला कारच्या म्युझिक-सिस्टिमवर गाणं लावता-लावता स्वत:लाच ऐकू जाईलसे पुटपुटली, “जय हो रहमानभाई.. जय हो”!!!

    (सत्यघटनेवर आधारित)

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाच्या अन्य कथा/लेख वाचण्यासाठी व लेखकाने आजवर दिलेली विविध व्याख्याने ऐकण्यासाठी आणि तुमच्या परिसरात लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

  • कथा

    जुनी गोष्ट आहे. त्याकाळी खूप फळं होते. परंतू सफरचंद सगळ्यांमध्येच सर्वश्रेष्ठ होते. त्याचा रंग, आकार, चव सारे काही दैवी! लोकांनाही इतर फळेही आवडायची, मात्र सफरचंद सगळ्यात जास्त आवडायचे.

    काळ पुढे पुढे जात राहिला. काही वर्षांनी एक नवीन फळ आले – आंबा! त्याची चव, रंग, आकार, सुवास सारेच निराळे! नुसता जवळ घेतला तरी मन मोहरून जायचे अक्षरशः! साहजिकच कित्येक सफरचंद-रसिक आंब्याकडे वळले. त्यांना आता आंबाच सर्वश्रेष्ठ वाटू लागला. आंबा होताच तेवढा गुणी!! परंतू यासोबतच आणखीही काही घटना घडल्या. ज्यांनी केवळ आणि केवळ सफरचंदालाच आपल्या ह्रदयसिंहासनी बसवले होते, ते केवळ सफरचंदाशीच निष्ठावान राहिले. त्यांच्या दृष्टीने आंबा मुळातच चुकीचा, निकृष्ट ठरला. त्यांनी त्याला नावे ठेवायलाही सुरुवात केली. नाही नाही ते बोलायला सुरुवात केली. काही रसिक मात्र दोन्हीही फळांचे सारखेच दिवाने झाले होते. त्यांना काय, चव चांगली असण्याशी मतलब. याखेरीज केवळ आंब्याशीच निष्ठावान असणाऱ्या रसिकांचाही एक गट हळुहळू तयार होऊ लागला होताच! त्याही मंडळींचे सफरचंद-निष्ठांसारखेच सूत्र होते — आंबा तेवढा श्रेष्ठ, बाकी सारेच निकृष्ट!!

    दरम्यान आणखीही एक घटना घडली. इतर फळांना आंब्याला मिळालेले यश पाहून कमालीचा हेवा वाटू लागला होता. सफरचंदाची इतक्या वर्षांची मक्तेदारी आपल्याला लाख प्रयत्न करूनही मोडता आली नव्हती, पण या काल आलेल्या पोराने – या आंब्याने ती पहिल्या झटक्यातच मोडून काढली; नव्हे तर स्वत:चे अढळस्थानही स्थापित केले — हे त्यांच्या रागाचे मूळ कारण होते! अश्यातच कुणा एका फळाच्या मेंदूत कल्पना चमकली! त्याने थोडा अभ्यास केला, समजून घेतले आणि स्वत:ला आंब्याचा वेष घेतला. थोड्याफार प्रयत्नाने चवीचीही नक्कल जमवून आणली! मुळातच माल नकली असल्याने किंमतही कमीच होती. चव आणि इतर अनुभवही अगदी जसाच्या तसा नसला तरीदेखील जवळजवळ सारखाच होता. साहजिकच ज्यांना आंबा परवडत नव्हता वा ज्यांच्यात मोसम येईपर्यंत थांबण्याचा संयम नव्हता, असे सारेच लोक या नकली आंब्याकडे धाव घेऊ लागले! तुफान चालू लागला हा नकली आंबा. पण काही दिवसच. कारण ही क्लृप्ती आता इतरही फळांना समजली होती. हा हा म्हणता म्हणता बाजारात या नकली आंब्यांचे पेवच फुटले. सगळ्या फळांनी आंब्याच्या लोकप्रियतेच्या या वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला सुरुवात केली. सगळी फळं आपली मूळची, खरीखुरी चव विसरून आंबा होण्याच्या पाठी लागले होते. अपवाद केवळ — सफरचंदाचा! कितीही नाही म्हटलं तरी तो एकेकाळचा राजा होता. काळ अनुकूल असला की स्वयंप्रज्ञा नसलेली मंडळी अशीच नकला करतात, हे त्यानेही पूर्वी कधीकाळी अनुभवलेले होते. एवढेच नव्हे, तर एकच एक चव सगळीकडून मिळत राहिली, तर लोक त्या चवीलाच कंटाळतात हे त्याला पक्के ठाऊक होते! त्यामुळे तो नेटाने त्याची मूळ चव संपूर्ण ताकदीनिशी देतच राहिला, रसिकांना तृप्त करतच राहिला!

    इकडे खरा आंबा मात्र अतिशय हैराण झाला होता. सगळीकडे त्याचीच चव निर्माण झाल्यामुळे त्याची किंमत आपोआपच कमी झाली होती. शिवाय त्याची चव मुळची असल्यामुळे तिच्यासाठी एक विशेष अशी प्रक्रिया होती. तिला वेळ लागायचा. बाजारात आता तिच चव खूपच कमी वेळात उपलब्ध होऊ लागल्यामुळे आंब्याला आता कुणीच विचारेनासं झालं होतं; ना कुणाला त्याच्या मोसमाची अन् प्रक्रियेची वाट पाहायची इच्छा उरली होती. फळबाजारातून आपले चंबूगबाळे आवरण्याखेरीज आंब्याकडे कोणताच मार्ग उरला नव्हता. की होता..?

    आंब्याने निश्चय केला, अशी सहजासहजी हार मानायची नाही. कल्पनातीत कष्टांतून तावून-सुलाखून हे स्थान मिळवलं होतं त्याने. खरीखुरी, मूळची चव ही जमेची बाजू होती त्याची. गाभा होता त्याचा. त्याने खूप विचारपूर्वक निर्णय घेतला. आपला खरेपणाचा आणि वेगळेपणाचा गाभा कायम ठेवला त्याने. आणि त्याभोवती एक स्वतंत्र शरीर गुंफू लागला तो. स्वतंत्र शरीर, नवे शरीर! आधीपेक्षाही जास्त मेहनत घेतली स्वत:वर. आधीपेक्षाही अधिक कष्टांतून गेला तो. पण अखेरिस त्याने यश मिळवलेच! आंब्याचे रुपांतर आता वेगळ्याच चवीच्या, वेगळ्याच रंगाच्या, वेगळ्याच सुगंधाच्या, कुणी स्वप्नातही ज्याची कधी कल्पना केली नसेल अश्या एका नव्याच फळात झाले — स्ट्रॉबेरी!!

    स्ट्रॉबेरी पूर्ण दिमाखानिशी बाजारात उतरला. तो अनुभव जरी दैवी देत असला, तरीही त्याची अंतर्गत रचना इतकी काही गुंतागुंतीची होती की, कुणीच त्याची नक्कल करू शकत नव्हते. आणि आता नक्कल केली तरी त्याला फरक पडणार नव्हता! कारण, त्याला माहिती होते की, आपला खरेपणा हीच आपली ताकद आहे. याच खरेपणाच्या जोरावर तो जसा आंब्यातून स्ट्रॉबेरी बनला तसाच उद्या गरज पडली तर आणखीही काही वेगळे बनेल. फक्त हिंमत हारून थांबणार नव्हता तो आता!

    लोक काय, सतत नवीन चवीच्या शोधात असतात. त्यामुळे बाजाराने या स्ट्रॉबेरीचेही जोशात स्वागत केले! शिवाय पूर्वीची आंबा असतानाची पुण्याईही होतीच की त्याच्यासोबत! अर्थात रसिकांमध्ये पुन्हा एकवार गट-तट पडले. काही रसिक ताबडतोब या नव्या स्ट्रॉबेरीचे दिवाने झाले, तर काही केवळ आंब्याशीच निष्ठावंत असल्याने त्यांनी स्ट्रॉबेरीला स्पर्श करणेही पाप मानले! तेच फळ, तेच रसिक — तरीही दृष्टीकोन मात्र वेगळाच. कुठे थोडा अहंकार, तर कुठे परिवर्तन नाकारण्याची वृत्ती! परंतू स्ट्रॉबेरीला आता कश्यानेच फरक पडणार नव्हता. त्याला अनुभवाने कळून चुकले होते की, चांगला अनुभव देणे एवढेच आपल्या हातात असते. बाकी सगळेच तात्पुरते! अपेक्षेप्रमाणेच हळुहळू केवळ स्ट्रॉबेरीच्या निष्ठावंतांचाही गट तयार झालाच! त्यांपैकी बहुतेकांना आंबाही मनापासून आवडत होता आणि स्ट्रॉबेरीही! स्ट्रॉबेरी आता सिद्ध होता — नवनवीन प्रयोग करण्यासाठी! त्यासोबतच सफरचंदही टिकून होता — आपली वैशिष्ट्यपूर्ण चव देत, रसिकांना सुखावत!!

    मित्रहो, उपरोक्त कथेत सफरचंद आहे — संगीतशिरोमणी इलयराजा! आंबा आहे — १९९२ ते २००३ पर्यंतचा ए. आर. रहमान! नकली आंबे आहेत — १९९८ ते २००३ दरम्यानचे जवळजवळ सारेच संगीतकार! आणि स्ट्रॉबेरी आहे — २००३ नंतरचा ए. आर. रहमान!!

    (‘ऑर्कुट’ भरात असण्याच्या काळात वाचलेल्या एका इंग्रजी रुपककथेचा स्मृतीच्या आधारे, स्वैर आणि भरपूर स्वातंत्र्य घेऊन केलेला अनुवाद. मूळ लेखक अज्ञात.)

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख/कथा वाचण्यासाठी व व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी संपर्क करा — www.vikramedke.com)

    image

  • जब तक है जान (संगीत-समीक्षण) : भाग – १

    चित्रपटागणिक प्रगती करत करत कायम स्वतःची शैली बदलत राहणारा माझ्या माहितीतील एकमेव संगीतकार म्हणजे ए. आर. रहमान! १९९५ च रहमान २००५ साली आढळत नाही आणि २००५ चा रहमान २०१२ साली आढळणार नाही!
       परंतु मला सर्वाधिक आकर्षित करणारी गोष्ट हि नव्हे! मला कळतं तेव्हापासून मी रहमानचं सर्व संगीत ऐकत आलोय. सुरुवातीच्या काळात त्याने लता मंगेशकर, आशा भोसले, एस. पी. बालासुब्रह्मण्यम, येसुदास, एस. जानकी, के. एस. चित्रा आदी दिग्गजांसोबत खूप सुरेख गाणी दिली. आजही तो, गीताची तशी गरजच असेल तर या महानुभावांकडून गाऊन घेतोच. पण त्याने लवकरच बहुधा विचार सुरु केला असावा की, ‘ही मंडळी गेल्यानंतर काय‘? म्हणूनच त्याने जाणीवपूर्वक या लोकांची जागा नव्या गायकांना देणे सुरु केले. सुरुवातीला त्याच्यावर चहूबाजूंनी प्रखर टीकाही झाली, परंतु तो डगमगला नाही. १०-१२ वर्षे मेहनत घेऊन त्याने काही हिरे घडवले. आज हे गायक उपरोक्त दिग्गजांच्या तुलनेत कुठेही कमी तर नाहीतच, उलट या प्रत्येकाचा स्वत:च एक दिग्गज बनण्याकडे प्रवास चालू झाल्याचे स्पष्ट दिसते. ही काही नावे पहा – कार्तिक, जावेद अली, बेनी दयाल, चिन्मयी, हर्षदीप कौर, विजयप्रकाश, नरेश अय्यर, राशीद अली, विजय येसुदास – सगळीच नावे देणे मला शक्यही होणार नाही. कदाचित, घेतलेल्या नावांपेक्षा राहिलेली नावेच अधिक असतील!
       आता या लोकांना घडवलं म्हणजे नेमकं काय केलं? काही उदाहरणे देतो. जावेद अलीची रहमानकडे गायलेली जश्न-ए-बहारा (जोधा अकबर – २००८) पासून ते जोहरा जबीन (एक दिवाना था – २०१२) या चार वर्षांतली सारी गीते ऐका. तुम्हाला त्याचा ‘एक साधा गायक’ ते ‘एक दिग्गज’ असा झालेला प्रवास सहज जाणवेल. तीच गोष्ट चिन्मयीची, कार्तिकची आणि इतर सर्वांची! किलीमांजारो (एनधिरन – २०१०) हे गीत ज्या जावेद-चिन्मयी जोडीने गायलेय, त्याच जोडीने मैय्या यशोदा (झूठा हि सही – २०१०) देखील गायलेय हे खरेच वाटत नाही इतके वैविध्य त्यांनी आपल्या गायकीत आणलेय. यात त्यांचा गुरु असलेल्या रहमानचा वाटा काय असेल हे मी निराळे सांगायची आवश्यकता नाही! आता तर रहमानने के. एम. म्युझिक कॉन्झरवेटरीद्वारे असे हिरे अधिक शिस्तबद्ध पद्धतीने घडविणारे विद्यालयच सुरु केले आहे. याच विद्यालयात शिकलेला फणी कल्याण हा संगीतकार सध्या तमिळ चित्रपटसृष्टीत नाव कमावतो आहे. रहमानचा भाचा जी. व्ही. प्रकाशकुमार तिकडे तर प्रसिद्ध आहेच, शिवाय ग्यांग्स ऑफ वासेपूर (२०१२) आणि जोकर (२०१२) द्वारे तो इकडेही हळूहळू प्रसिद्ध होतोय. असो, विस्तारभयास्तव एवढीच उदाहरणे पुरे!
       यावेळी हाच ए. आर. रहमान रॉकस्टार (२०११) नंतर तब्बल वर्षभराने संगीतप्रेमींसाठी मेजवानी घेऊन आलाय ‘जब तक है जान’च्या रूपाने. एकीकडे यश चोप्रांचा शेवटचा चित्रपट असे वलय लाभलेले तर दुसरीकडे दिल से (१९९८) पासून ते रावण (२०१०) पर्यंत एकाहून एक सरस गीते देण्याची परंपरा असलेली रहमान-गुलजार ही जोडी! वर चर्चा केल्याप्रमाणे, इतका भव्य प्रकल्प असूनही बहुतांशी गीते नवोदितांनी गायली आहेत तर उरलेली गीते नवदिग्गजांनी! आता ही गीते खरोखरीच जमून आली आहेत किंवा काय हे पाहूया याच लेखाच्या पुढील भागात!

    – © विक्रम श्रीराम एडके

    (edkevikram@gmail.com)

  • होस्साना – जयघोष प्रेमाचा… जयघोष माझ्या "देवा"चा..!

    ११ किंवा १२ जानेवारी २०१० चा काळ असावा. मला त्या काळात तमिळ अजिबातच कळत नव्हतं (अजूनही फार कुठं कळतंय!). तिरूअनंतपूरम ते मदुराई या रेल्वेप्रवासात भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला मी माझ्या “देवा”च्या गाण्यांचे शब्द आठवून-आठवून अर्थ विचारात होतो. त्यावेळी ते तमिळ कुटुंब भेटलं. नवरा-बायको आणि दोन लहान मुलं! ते “अण्णा” भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते पण संगीतात त्यांना प्रचंड रुची. आणि शिवाय कुणाही तमिळ व्यक्तीइतकेच “रहमानियन“! आम्ही खूप वेळ बोलत होतो. त्या भल्या माणसाने मला “सहाना सारल.. (शिवाजी – द बॉस – २००७)”, “एल्लापगळूम.. (आळगिया तमिळ माकन – २००७)” अशी कित्येक गीते संपूर्ण समजावून सांगितली. अचानक मी त्यांना विचारलं, “होस्साना म्हणजे काय हो”? ते थोडेसे विचारात पडले, म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे हा तमिळ शब्द नाहीये. इंग्लिशही नाही. त्याचा अर्थ कदाचित वेगळा काहीतरी होत असावा”.
      त्या काळात गौतम वासुदेव मेननच्या “विनईतांडी वरुवाया”ची गीते प्रकाशित झालेली होती. “देवा”ची गाणी “चढायला” थोडा वेळ घेतात पण आधी प्रकाशित झालेलं एकक-गीत (Single) “होस्साना” मात्र पूर्णपणे चढलं होतं. त्या भेटीत फक्त “होस्साना” हा तमिळ शब्द नाही एवढीच माहिती कळली.
      किती सुंदर गीत! अहाहा..! “देव” नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येतो. ‘मुखडा-अंतरा” पद्धतीची फिल्मी गीते ऐक्नार्यांसाठी “होस्साना” एक वेगळा अनुभव होता. गाणं आल्या-आल्याच “हिट” झालं. नगरला आल्यावर आधी “होस्साना”चा अर्थ शोधला. “ऑक्सफर्ड शब्दकोश”नुसार त्याचा अर्थ होतो “Shout of Adoration”. मूळचा हिब्रू असलेला हा शब्द माथ्यू – २१ : ९, १५ अश्या ठिकाणी येशूच्या जयघोषासाठी वापरला गेलाय.
      हे सारं कळल्यावर त्या गाण्याचा एक नवाच अर्थ उलगडला! होस्साना! जयघोष! प्रेमाचा जयघोष! नव्याने आयुष्यात येऊ घातलेल्या प्रेमाचा जयघोष! प्रेमाला सलाम! वाह, क्या बात हैं! किती सुंदर कल्पना! मानलं तामरईला (होस्सानाची गीतकार)! मानलं विजयप्रकाश-सुझेनला! आणि हो, मानलं माझ्या “देवा”ला! गाण्याच्या सुरुवातीला असलेल्या व्हायोलीनच्या सुंदर तुकड्याचाही अर्थ कळला! अहाहा, जणू “तो” त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रेमाचेच स्वागत करतोय! हे सारे कळाल्यावर माझी अवस्था खरोखर पहिल्या कडव्यात म्हटल्याप्रमाणे –
    “नान आडीपोगिरेन..!
    सुक्कू नुरागीरेन..!”
    (I was shaken..!
    I was broken into pieces..!)
    अशीच झाली!

      हिंदीत हे गीत विजयप्रकाशच्याऐवजी “लिओन डिसुझा” या नव्या गायकाने गायलेय. RAP देखील त्यानेच गायलेय. सुरुवातीला ऐकताना तो “राशीद अली” वाटतो. पण अजून अजून ऐकल्यावर कळते कि लिओनला स्वत:चा असा एक अतिशय सुंदर आवाज आहे. आणि याउप्परही मी म्हणेन की, सनी लिओनच्या या काळात लिओन डिसुझा या नवख्या गायकाचे गाणे हिट करून दाखवणे हे माझ्या “देवा”चेच कर्तृत्व नव्हे काय? जावेद अख्तरने हिंदीत हे गीत तामरईइतक्याच ताकदीने लिहिलेय. तुम्हाला मूळ तमिळ गाण्याची सवय झाली असेल तर हे गीत चढायला थोडा वेळ लागेल. पण एकदा का हे गीत चढले, तर चढलेच! माझी तर अवस्था हे गीत ऐकून –
    “अब क्या बताऊँ मैं,
    किस हाल में हूँ मैं…
    यहाँ-वहाँ बस अपना दिल और होश ढूंढ़ता हूँ मैं..!”
    अशीच झालीय!
      या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यातील “ब्लाझे”च्या RAP चा भागदेखील लिओनने स्वत”च्या पद्धतीने गाण्याच्याच चालीत गायलाय. ब्लाझेचे RAP ऐकायची सवय असणार्यांना हे RAP वाटणारच नाही. चित्रपटातील प्रसंगाला हे अधिक धरून आहे. “देवा”च्या या प्रयोगशीलतेला दाद द्यावी तितकी कमीच! नव्याने ऐकणार्यांना तर हा इंग्लिश भाग अधिकच गोड वाटेल!

      आज माझ्या देवा”चा वाढदिवस! त्याचे संगीत तर अमर झालेच आहे, आणि संगीताच्या रूपाने तोही अजरामर! मग अश्या वेळी त्याला उदंड आयुष्य चिंतणारा मी कोण? मी फक्त त्याच्या चरणांवर हे वाकुडे लेखनपुष्प वाहून नतमस्तक होऊ शकतो. खरोखर माझी तेवढीच इच्छा आहे. मला खात्री आहे, “होस्साना” तुम्हालाही नक्की आवडेल!

  • इलयराजा", "रहमान" आणि "क्या हैं मुहब्बत…

    गुरुदत्तच्या “प्यासा (१९५७)” मधील “ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है…” ज्याला माहिती नसेल असा संगीत-रसिक सापडणे अशक्यच! खरोखरंच, किती सुंदर संगीताची निर्मिती व्हायची त्या काळात! आजही ती अवीट गीते अंगावर रोमांच उभा करतात. याउलट आजच्या काळातील संगीत पहा. “आत्माहीन” एवढे एकाच विशेषण त्यास शोभून दिसेल. याचे मुख्य कारण म्हणजे आजची चित्रपट-गीते ही केवळ तत्काळ आणि तेवढ्यापुरती गाजावित म्हणूनच बनवली जातात. आणि इतकेच नव्हे तर बरेचदा त्यांत मांडलेल्या भावनाही यांत्रिकच असतात. त्यामुळेच आज गाजणारं गीत महिन्याभरानंतर कुणाच्या लक्षातही नसतं.
        अर्थातच या सगळ्याला इलयराजा आणि रहमानसारखे काही सन्माननीय अपवादही आहेत (आणि जी. व्ही. प्रकाशकुमारसुद्धा – पण त्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचाय). रहमान आणि राजाबाबतीत बोलायचं झालं तर, दोघांचीही संगीतरचनेची शैली भिन्न आहे. उदाहरणार्थ, राजा सरांचा भर गीताची मूळ चाल जशीच्या तशी ठेवण्यावर अधिक असतो. मग जेवणात वरून मीठ भुरभुरावं तश्या ते त्या गीतात वाद्यसंयोजनाद्वारे भावना भुरभूरतात. त्या गीतातील भावनांची अभिव्यक्ती सुयोग्य गायक अथवा गायिकेद्वारे करवून घेणे त्यांना अधिक आवडते. अश्याप्रकारे सिद्ध केलेली त्यांची पाकक्रिया परिपूर्ण असते आणि शिवाय श्रोत्यालाही समजायला सोपी असते. याउलट रहमान सर मात्र गीताच्या मूळ चालीत शब्दांखेरीज संगीताचे वेगवेगळे थर (Layers) पेरतात – कधी वैशिष्ट्यपूर्ण वाद्यसंयोजनाद्वारे तर कधी वैशिष्ट्यपूर्ण ध्वनिमिश्रणाद्वारे. त्यांना गीतातील भावनांच्या अभिव्यक्तीसाठी विशिष्ट गायक-गायिकेची गरज असतेच असे नाही, तर त्यांच्या गीतातील भावना ही चाल, वाद्यासंयोजन, वैविध्यपूर्ण ध्वनींचा वापर अश्या खुपश्या घटकांचा एकत्रित परिणाम असतो. त्यामुळेच त्यांची गीते एकदा ऐकल्यावर काळातही नाहीत, किंबहुना कंटाळवाणीच वाटतात. पण हळूहळू, अधिकाधिक ऐकत गेल्यावर त्यातील नवनव्या गोष्टी मनात रुंजी घालू लागतात. याला मी ते गाणे “चढणे’ असे म्हणतो! ही नवनव्या गोष्टी सापडण्याची प्रक्रिया कधीकधी त्या गीताच्या प्रकाशनानंतर वर्षभरही चालू असते आणि यामुळेच ते गीत महिन्याभरात मरत नाही, उलट जुन्या दारूसारखे अधिकाधिक परिपक्व होत जाते, तजेलदार होत जाते.
        याचा अर्थ असा नव्हे की, राजा सर गुंतागुंतीच्या रचना करतंच नाहीत अथवा रहमान सर साध्यासोप्या रचना करतंच नाहीत. सर्वांना समजावे म्हणून हिंदीतीलच उदाहरणे पाहू. “बातें हवा हैं… (चीनी कम – २००७)” या गीतातील दोन्हीही मध्यमेळ (Interludes) ऐका. एकीकडे सिम्फनी आणि दुसरीकडे रॉक! आणि या दोन्हींच्या एकत्रित परिणामाद्वारे गाण्याच्या अभिव्यक्तीत होणारा बदल हा एकदा ऐकून समजणारा नाही; किंबहुना विचित्रच वाटणारा आहे. आज ५ वर्षांनंतरही मी आश्चर्यात बुडालेलो आहे की इतक्या गुंतागुंतीच्या थरांत या साध्यासोप्या चालीची मांडणी करणे कसे सुचले असेल? किंवा “पा(२००९)” मधील “उडी उडी…” या गीताची ३ विविध भावना मांडणारी ३ विविध रूपे (व्हर्जन्स) आहेत. एकाच चालीतून वेगवेगळ्या वाद्यांद्वारे ३ वेगवेगळ्या भावनांची मांडणी अतिशय रोमांचक आहे. हेही गीत (३ही रूपे) एकदा ऐकून समजणारे नाही. याउलट, रहमान सरांच्या “झूठा ही सही (२०१०)” तील गाणी ऐका. अतिशय सोप्या चाली आणि तितकंच सोपं वाद्यसंयोजन! एकदा ऐकूनच “चढतील” (अपवाद फक्त त्यातील “मूनलाईट”चा!).
        हे सारं विस्ताराने मांडण्याचं कारण म्हणजे “एक दीवाना था (२०१२)”मधील एकमेव नवीन गाणे “क्या हैं मुहब्बत…”! अतिशय साधीसोप्पी चाल, तितकंच साधं (सामान्य नव्हे!) वाद्यसंयोजन! सुरुवातीला मुद्दामच गुरुदत्तच्या गीताची आठवण सांगितली, कारण त्याच धर्तीवर हेही गीत “तरन्नुम” पद्धतीचं! विशेष म्हणजे रहमानची आधीचीच सुरेख असलेली गायकी हरेक गाण्यात अजूनच सुधारत चाललीय! खास करून “मुहब्बत खुदा हैं, खुदा हैं मुहब्बत…” हे शब्द गाताना त्याची सांगीतिक बुद्धिमत्ता आणि गायकी ऐका. कित्येक वर्षांत तरन्नुम हा गीत-प्रकार कुणी हाताळला नव्हता, कारण नुसते “शेर” विशिष्ट पद्धतीने मांडणे म्हणजे तरन्नुम नव्हे तर गीताचा एकूण परिणामही अर्थवाही व्हायला हवा असतो. “संगीताच्या देवा”ने हे सारेच आह्वान अतिशय ताकदीने पेललेय आणि तरीही गीताचा ताजेपणा व प्रामाणिकपणा अबाधित ठेवलाय! तुमच्या वेगवेगळ्या मनोवस्थेत हे गीत तुम्हाला वेगवेगळे वाटेल. कधी ते “Jazz” वाटेल तर कधी ‘गझल” तर कधी “प्रेम म्हणजे नक्की काय हो?” असा सनातन प्रश्न विचारणाऱ्या तत्ववेत्त्याचे मुक्त चिंतन! काहीही असो, हे गीत प्रत्येक वेळी तितकेच गोड वाटते, सुंदर वाटते, प्रामाणिक वाटते! जुन्या गीतांची आवड असणाऱ्या श्रोत्यांना तर हे गीत ऐकल्यावर “तो” सुवर्णकाळच परत आल्यासारखं वाटेल. विशेषत: त्यातील एकूणएक शब्द लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला निश्चितच जावेद अख्तरच्या प्रतिभेला प्रणाम करावासा वाटेल.

        एकूण सांगायचं झालं तर, इलयराजाही रहमानसारखी गुंतागुंतीची रचना करू शकतो आणि रहमानही इलयराजासारखी सोपी! पण यावेळी मात्र रहमान हा राजाच्या सोपेपणापेक्षाही एक पाऊल पुढे गेलाय! हा “शिष्यादिच्छेत्पराजयम्” स्वत: इलयराजालाही निश्चितच आवडेल आणि माझी खात्री आहे की तुम्हां सर्वांना सुद्धा!